राजकारण
माया की माया
प्रेषक मराठे ( मंगळ, 03/16/2010 - 00:27) .निर्लज्जपणाची हद्द!
"पुतळा उभारणीवर टीका करणार्यांना मी विचारते की, जिवंत माणसांचे पुतळे उभारू नयेत असं कुठल्या पुस्तकात लिहिलेय?" - इती (जिवंतपणी स्वतःचा पुतळा स्वतःच उभारणारी) मायावती
आपल्या देशात करदात्याच्या पैशाचा अपव्यय कधी आणि कसा होतो ह्याचं आणखी एक उदाहरण. मायावतीचा २०० कोटींचा हार .नुसता राग राग होतोय. तिकडे कुठल्यातरी गावात जेवण आणि कपडे मिळणार म्हणून चेंगराचेंगरीत लहान मुलं मरतात आणी इथे हे !!!
जाता जाता: जर युपीवाल्यांकडे इतका पैसा आहे तर मुंबईत कशाला येतात? का हा पैसा मुंबईतूनच तिकडे गेला आहे?? असं असेल तर आणखीनच तळतळाट!
प्रकरण पाचवे: फसवणूक-पाकिस्तान, अमेरिका व अण्वस्त्रांचा गुप्त व्यापार
प्रेषक सुधीर काळे ( रवी, 03/14/2010 - 13:06) .
फसवणूक-पाकिस्तान, अमेरिका व अण्वस्त्रांचा गुप्त व्यापार
प्रकरण पाचवे: एकत्र बांधणारे धागे
संक्षिप्तीकरण व अनुवाद: सुधीर काळे, जकार्ता
(या लेखातील सर्व मतें लेखकद्वयीची आहेत)
(चौथ्या प्रकरणात अफगाणिस्तानवर रशियाने केलेले आक्रमण कसे झियांच्या पथ्यावर पडले, परिणामत: कार्टर यांच्या धरसोडीच्या परराष्ट्रधोरणाचा त्यांनी कसा फायदा घेतला, इतिहासातील इराणी राज्यक्रांती, इराणने ओलीस ठेवलेले अमेरिकन मुत्सद्दी, इराण-इराक युद्ध व शेवटी रेगन यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड, त्यांनी खोटे-नाटे करून अमेरिकेचे परराष्ट्रधोरण कसे बदलले याची माहिती आहे. आता पुढे वाचा.....)
आधीच्या भागात लिहिल्याप्रमाणे 'युरेंको'ची युरेनियम शुद्धीकरणप्रक्रिया वीजनिर्मितीपुरती अंशत: शुद्धीकरणाची होती. त्यात योग्य ते बदल करून खानसाहेबांनी सेंट्रीफ्यूजेसची एकापाठोपाठ एक अशी मांडणी करून अतिशुद्धीकृत आणि अण्वस्त्रयोग्य युरेनियम यशस्वीपणे नमुन्यादाखल बनविल्याचे झियांना १९८१ च्या मार्च-एप्रिलमध्ये कळविले होते. १ मे रोजी त्यांच्या फोनची घंटी खणखणली व झियांनी त्यांना फर्मावले कीं ते त्यादिवशी जातीने त्यांचा कहूता प्रकल्प पहायला येत आहेत. पूर्वसूचना न देता खुद्द राष्ट्राध्यक्ष येत होते त्यामुळे खानसाहेबांची एकच तारांबळच उडाली. त्यांनी ब्रि. सजवालना या भेटीबद्दल कळविले व सांगितले कीं ते स्वत: त्यांना त्यांच्या घरी गाडी आणतील व त्यांनी त्यांच्याबरोबर यायला गणवेषात तयार असावे.
झियांची कल्पना होती कीं शाळा-कॉलेजात असतो तसा कांहींतरी प्रकार त्यांना पहायला मिळेल, पण त्यांना दिसली ती शुभ्र कोटातल्या शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली काचेच्या दालनांत शांतपणे फिरणार्या सेंट्रीफ्यूजेसची मालिका असलेली एक पाश्चात्य प्रयोगशाळेच्या धर्तीवरची प्रयोगशाळा! त्यांचे डोळे विस्फारले व ते उद्गारले कीं हे तर एक साम्राज्यच आहे!
ही झियांची कहूताभेट खानसाहेबांना व त्यांच्या सहकार्यांना नीतिधैर्य देणारी ठरली. झिया इतके दिपून गेले होते कीं त्यांनी तडकाफडकी "Engineering Research Laboratories" या सध्याच्या नावाऐवजी "Dr. A. Q. Khan Research Laboratories" असे नवे नांव ठेवले. "असा सन्मान कुठल्याच वैज्ञानिकाला त्याच्या हयातीत कधीच मिळाला नव्हता!" असे खानसाहेब आपल्या स्वभाववैशिष्ट्यानुसार आढ्यतेखोरपणे लिहून मोकळे झाले.
झियांनी खानसाहेबांना प्रशस्तीपत्रकेही (citations) दिली. त्यातले एक खानसाहेबांनी फ्रेम करून मुख्यालयात लावले व प्रत्येक पाहुण्याला ते अभिमानाने दाखवत असत. त्यांच्या नावाचा फलकही मुख्य फाटकावर लागला. झियांनी त्यांना अधीक निधी उपलब्ध करून दिला व cold testing साठी एक बाँब बनविण्याची व दुप्पट गतीने काम करण्याची आज्ञा केली.
एवढी मोठी घटना झाली पण त्याचे प्रतिसाद कुठेच उमटले नाहींत. उलट मे १९८१ साली पाकिस्तानवर असलेली नियंत्रणे सहा वर्षांसाठी उचलण्यात आली व १०० कोटी डॉलर्सची मदत व F-16 विमानेही विकायची अनुज्ञाही मिळाली!
या दरम्यान CIAचे पाकिस्तानसाठीचे नवे प्रमुख हॉवर्ड हार्ट इस्लामाबादला आले. इस्लामाबादयेथील दूतावासाची जळालेली इमारत तयार नव्हती (प्रकरण ३ पहा) म्हणून त्यांनी आपले ऑफीस जुन्या 'USAID'च्या इमारतीत थाटले. आता इथूनच अफगाणिस्तानमधील युद्धाचे नियंत्रण केले जायचे होते. हार्टना स्पष्ट आदेश होते की अण्वस्त्रप्रकल्प व पाकिस्तानातील इतर अंतर्गत बाबीवर त्यांनी लक्ष द्यायचे नाही, त्या गोष्टी परराष्ट्रखाते सांभाळेल. हार्ट यांचे पाकिस्तानी संपर्काधिकारी होते ISI चे प्रमुख व झियांशी खूप जवळीक असलेले ज. अख्तर अब्दुर रहमान. पाकिस्तानला रशियाला डिवचायचे नव्हते म्हणुन ही बंडखोरी हलकीच ठेवायची होती. शिवाय कुठल्या अफगाण मुजाहिदीनना कुठली व किती शस्त्रे द्यायची हे ठरवायला ISI लाही वेळ हवा होता.
दरम्यान पाकिस्तानला प्रचंड मदत देण्याच्या रेगन यांच्या योजनेला विरोध वाढतच राहिला. त्यात २ जून १९८१ रोजी इस्रायलचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत यहूदा ब्लूम यांनी एक सनसनाटी बातमी आमसभेत फोडली. त्यानुसार 'खान रिसर्च लॅबोरॅटरी'मध्ये युरोपमधील 'युरेंको'कडून चोरलेले तंत्रज्ञान वापरून व चौदा देशांत उभ्या केलेल्या 'डमी' कंपन्यांच्या शृंखलांमधून खरेदी केलेले सुटे घटकभाग वापरून उभारलेली १००० सेंट्रीफ्यूजेस चालू असून आणखी ९००० सेंट्रीफ्यूजेस उभारून वर्षाला ७ अणूबाँब बनविण्यास पुरेल इतके (१५० किलो) अतिशुद्धीकृत युरेनियम बनविण्याची योजना आहे.
अमेरिकेला कित्येक वर्षांपासून हे माहीत होते पण त्या देशाने 'चुप्पी' साधली होती! उलट त्यांनी इस्रायलला एका गुप्त खलित्याद्वारे पूर्णपणे खोटी माहिती कळविली कीं आतापर्यंत पाकिस्तानला सेंट्रीफ्यूजेस चालविण्यात यश आलेले नाहीं व त्यांनी अद्याप अतिशुद्धीकृत युरेनियम बनवलेलेही नाहीं आणि जरी पाकिस्तान्यांनी या अडचणींवर मात केली तरी त्यांना एक अणूबाँब बनवायला लागेल इतके शुद्धीकृत युरेनियम बनविण्याला कांहीं वर्षें लागतील. अणूबाँब वाहू शकतील अशी क्षेपणास्त्रे बनवायलाही दहा एक वर्षें लागतील. थोडक्यात अमेरिका केवळ उपलब्ध असलेल्या गुप्त माहितीचा विपर्यासच करीत नव्हती तर पाश्चात्य परमाणूविषयक नियतकालिकांत कहूताला सेंट्रीफ्यूजेस उभारणीतील अडचणींवर कशी मात करण्यात आली याबद्दलच्या खानसाहेबांनी स्वतःच लिहिलेल्या अनेक लेखांकडेही दुर्लक्ष करीत होती. म्हणूनच अमेरिकेचा गुप्त खलिता वाचल्यावर जेरुसलेममध्ये सन्नाटा झाला. अमेरिका सफाईने थापा मारत होती कारण पाकिस्तान त्यांचे अवघड जागेचे दुखणे झाले होते! इस्रायलची खात्री होती कीं जेवढे इस्रायलींना माहीत होते त्याहून जास्त माहिती अमेरिकनांना होती कारण इराणच्या शहांच्या पतनानंतर अमेरिकेला जाणार्या गुप्त माहितीचा भरघोस भाग इस्रायलकडूनच त्यांना जात होता!
खरे तर 'RAW (रॉ)' भारतीय गुप्तहेरसंघटनेने अमेरिकेच्या दूतावासात उगम झालेल्या व सायरस व्हान्स या परराष्ट्रमंत्र्यांना जाणार्या संदेशाची प्रत इस्रायलींना दाखविली होती! या संदेशात पाकिस्तान २-३ वर्षांत अणूबाँबचा स्फोट करू शकेल अशी माहिती दिली होती. हे वाचून इस्रायलींना इतका धक्का बसला कीं ते कहूतावर हवाई हल्ला करायची योजना आखू लागले पण अमेरिकेच्या दबावाखाली ती योजना सोडून द्यावी लागली. आणि आता तर पाकिस्तानच्या अण्वस्त्रचांचणीसाठी 'रास कोह' पर्वतात खोल बोगदे खणण्याचेही काम सुरू झाले होते व भारत व इस्रायल आणखीनच चिंतेत पडले.
भारताचे ले.ज. सुंदरजींनी तर पाकिस्तानने जर अणूबाँब बनवला तर कसा प्रतिकार करायचा याबाबत एक 'वॉर-गेम'ही(*१) बनवला. पण इस्रायलने १९८१मध्ये अमेरिकन विमाने वापरून, अमेरिकन दारूगोळा वापरून, अमेरिकन उपग्रहाच्या मदतीने नेम साधून इराकमधील ओसीराकवर हल्ला करून ते केंद्र उध्वस्त केले होते व जगाला सांगितले होते कीं अमेरिकेचे धोरण कांहींही असो, इस्रायल अण्वस्त्रधारी बनू पहाणार्या नव्या राष्ट्रांची गय करणार नव्हता. आता त्यांनी पाकिस्तानवर नजर रोखली व खानसाहेबांना माल पुरवणार्या कंपन्यांवर हल्ले सुरू केले.
पहिला हल्ला झाला खानसाहेबांचे West Berlin Technische Universitat मधले जुने मित्र मेबुसवर व मिग्युलेंवर. या दोघांनी पकिस्तानची फ्लुओराईड व युरेनियम रूपांतराची साधनसामुग्री १९७९ मध्ये बसवून दिली होती. एरलांगेन येथील मेबुसच्या घरात तो घरी नसताना पाकिटातल्या बाँबचा स्फोट झाला. या स्फोटाचे स्वित्झर्लंडमधील बर्न येथे 'कोरा' कंपनीच्या व्यवस्थापकीय निर्देशक एदुआर्ड गेर्मान यांच्या घरी आधीच्या जानेवारीत झालेल्या स्फोटाशी साम्य आढळले. या कंपनीने पाकिस्तानला UF6चे वायूकरण् करणारी व या वायूचे पुनर्घनीकरण करणारी यंत्रणा पुरवली होती. अशाच साधनसामुग्रीचा आणखी एक संच निर्यातीला तयार होता त्याचवेळी हा स्फोट झाला. पाठोपाठ कोराने पाकिस्तानशी चालवलेला व्यापार ताबडतोब थांबवावा अशी मागणी करणारा एक निनावी फोनही आला. या घटनेची दोन महिन्यात पुनरावृत्ती झाल्यावर कोराने पाकिस्तानशी असलेला आपला व्यापार थांबवला. अमेरिकेला हे कळले पण मदतीची पहिली गाडी सुटणार होती त्यात खीळ नको म्हणून त्यांनी ही बातमी गुप्तच ठेवली.
बर्नच्या पोलिसांना या बाँबहल्ल्याच्या हल्लेखोरांचा पत्ता लागला नाहीं. फक्त 'दक्षिण आशिया अण्वस्त्रप्रसारविरोधी संघटना' या नावाखेरीज कांहींच हाती लागले नाहीं. अशाच तर्हेचे हल्ले अशाच धागादोरा न सापडणार्या संघटनांकडून खानसाहेबांशी व्यापार करणार्या इतर युरोपीय कंपन्यांवरही झाले होते.
इंटरपोलच्या सहकार्याने मिळालेल्या माहितीनुसार 'अल्कॉम इंजिनियरिंग' या धातूचे घटकभाग पुरवणार्या कंपनीलाही अशाच तर्हेची पत्राद्वारे दमदाटी झाली होती व परिणामार्थी या कंपनीने पाकिस्तानशी व्यापार थांबविला होता. १९८१च्या 'मे'मध्ये १९७६पासून पाकिस्तानशी व्यापार करणार्या व मार्कडॉर्फ गावातल्या एका कंपनीतही स्फोट झाला. पाठोपाठ नोव्हेंबरमध्ये आलब्रेक्ट मिग्युलेंच्या फ्राइबर्गमधील घरी पाठविलेल्या पाकिटातल्या स्फोटकाचा स्फोट झाला. स्विस पोलिसांचे गुन्हा अन्वेषण धडपडतच चालले होते. यात सरकारी दहशतवादाचा हात असल्याचा त्यांना संशय आला व 'मोसाद'चे नांव सर्वात वर होते. ग्रिफिननाही असाच अनुभव आला. एकदा बॉनला गेलेले असतांना एका 'बार'मध्ये एक अनोळखी माणूस त्यांच्या शेजारी येऊन बसला व "तुम्ही करताय् ते आम्हाला पसंत नाहीं. तरी ते थांबवावे" असा निरोप देऊन तो नाहींसा झाला. मग ग्रिफिन आपल्या सर्व व्यवहाराचे व हालचालींचे टिप्पण ठेवू लागले आणि कंपनीचे सर्व दस्तावेज बॅन्केच्या वॉल्टमध्ये ठेवू लागले व आपले कांहीं बरे-वाईट झाल्यास काय करायचे याबद्दल सूचनाही त्यांनी आपल्या पत्नीला दिल्या.
दुसरीकडे रेगन यांच्या कंपूने अण्वस्त्रप्रसारबंदीबाबतच्या आपल्या निष्ठेचे नाटक चालूच ठेवले. इराकमधील अण्वस्त्र बनवणारी सुविधा नष्ट केल्यावर रेगन म्हणाले कीं अमेरिकेचा अण्वस्त्रप्रसाराला विरोध आहे व अण्वस्त्रप्रसार होऊ नये म्हणून जरूर ते सर्व अमेरिका करेल*२). पुढे जूनमध्ये जॉन ग्लेन यांच्या 'शासन कारभार समिती'ला त्यांनी सांगितले कीं त्यांना पाकिस्तानकडून निखालस ग्वाही मिळाली आहे कीं पाकिस्तान अण्वस्त्रें बनविणार नाहीं किंवा त्यांची चांचणीही करणार नाहीं. सप्टेंबरमध्ये उपपरराष्ट्रमंत्री बकलींनीही प्रतिनिधी सोलार्त्झ व प्रतिनिधीगृहाच्या परराष्ट्रसंबंध समितीपुढे दिलेल्या साक्षीत सांगितले कीं अमेरिकेची अशी भरघोस मदत मिळाल्यावर पाकिस्तान आपल्या अण्वस्त्रप्रकल्पाचा पाठपुरावा करण्याचे नक्की थांबवेल व संयुक्त राष्ट्रांतर्फे निर्बंध लादून अयशस्वी झालेल्या प्रयत्नांऐवजी रेगन सरकार अशा राष्ट्रांना मदत देऊन त्यांची अण्वस्त्र बनवायची मूलभूत गरजच नाहींशी करून अण्वस्त्रप्रसार थांबवणार आहे. ग्लेनचे सहायक म्हणाले कीं अण्वस्त्रसज्ज होऊ पहाणार्या राष्ट्राला पैसे व विमाने बक्षीस देणे ही एक विपरीत पद्धतच झाली.
अशा साक्षी चालू असतानाच अण्वस्त्रप्रकल्पाबद्दलचे करार 'मागच्या दाराने' आणखी स्पष्ट करण्यासाठी बकलींच्या व इतर अधिकार्यांच्या इस्लामाबाद वार्या चालूच होत्या! थोडक्यात अमेरिकेला हे पाकिस्तानला स्पष्ट करायचे होते कीं रेगन यांचे "अमेरिका पाकिस्तानच्या अण्वस्त्र महत्वाकांक्षांच्याकडे दुर्लक्ष करेल" हे विधान चुकून केलेले विधान नव्हते. म्हणूनच F-16 विमानांच्या आगमनानंतर ज. आरिफनी अण्वस्त्रांचा विषय काढताक्षणी बकली उद्गारले होते कीं त्याबद्दल बोलायची गरजच नाहीं.
१९८१च्या डिसेंबरमध्ये ३२० कोटी डॉलर्सच्या मदतीवर सिनेटने शिक्कामोर्तब केले. इस्रायल व इजिप्तनंतर पाकिस्तान एवढी मोठी मदत मिळविणारे तिसर्या क्रमांकाचे राष्ट्र होते. रेगन सरकारने प्रतिनिधिगृहाला सांगितले होते कीं ही मदत पाकिस्तानने अण्वस्त्रप्रकल्प बंद करण्याशी निगडित आहे. पण जेंव्हा आगाशाहींनी बकलींना मुद्दाम विचारले कीं उद्या आम्ही बाँब बनवला व चांचणी करायचे ठरविले तर अमेरिका त्याबद्दल कांहींच करू शकणार नाहीं. त्यावर बकली म्हणाले ते अमेरिकेला माहीत आहे.
दरम्यान पाकिस्तानच्या खरेदीजालाचे धागे पाश्चात्य व इस्रायली हेरखात्याला मिळत राहिले व पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पाचे पुरावेही समोर येऊ लागले. १९८०च्या एप्रिलमध्ये अझीझसाहेबांसकट तीन पाकिस्तानी कॅनेडियन लोकांना अटक झाली. सिहालाप्रकल्प छोट्या प्रमाणावर सुरुवात झाल्यापासून कहूतापर्यंतच्या वाटचालीचे वर्णन करणारी, खानसाहेबांच्या विश्वासू सहकार्यांची आणि माल पुरवणार्या कंपन्यांची नावे असलेली खानसाहेबांची पत्रेही जप्त झाली. पण ही केस क्यूबेकमधील कोर्टात बंद दारांमागे चालली व पुरावाही सीलबंद केला होता!
अण्वस्त्रांबद्दलची रहस्यें, खास करून अमेरिकन कंपन्यांनी बरेच घटकभाग खानसाहेबांना पुरवल्याबद्दलची रहस्यें, गुप्त ठेवण्यासाठी कॅनेडियन सरकारने या खटल्याची मुस्कटदाबी केली होती असे वाटते. पण त्यामुळे अमेरिकन प्रतिनिधीगृहाला इतर बाबतीतही तपास करता आला नाहीं. पुढे अज़ीजसाहेब "मी केवळ खाद्यप्रक्रियेची व वस्त्रनिर्मितीची निरुपद्रवी सामुग्री विकली" असा युक्तिवाद करून निर्दोष सुटले. पण खूपसे पुरावे या खटल्यात अडकून राहिल्यामुळे खानसाहेबांच्या अनेक 'डमी' कंपन्यांचे अस्तित्व वगैरेबद्दलचा तपास झालाच नाहीं व झियांचे "शांततेसाठीच परमाणूतंत्रज्ञान, आम्ही कष्ट करू, उसनवारी करू, भीक मागू पण ते ज्ञान दुसर्याला देणार नाहीं""चे तुणतुणे चालूच राहिले.
याच वेळी ५००० पौंडाची झिर्कोनियम धातूची SJ Enterprise या 'डमी' कंपनीला चाललेली निर्यात पकडली गेली. एका पाकिस्तानी प्रवासी तो माल न्यूयॉर्कच्या केनेडी विमानतळावर 'पाकिस्तान इंटरनॅशनल एअरवेज'च्या विमानात 'गिर्यारोहणाचे साहित्य' या खोट्या नावाखाली चढवत होता. कस्ट्म्सच्या अधिकार्यांनी ते सामान उघडायला सांगितल्याबरोबर तो प्रवासी नाहींसा झाला. तो एक झियांचा खास दोस्त व सेवानिवृत्त लष्करी अधिकारी होता. चौकशीचे अश्वासन दिले गेले पण कांहींच चौकशी झाली नाहीं.
'व्हाईटहाऊस'ला उत्तर अमेरिकेमधील व प. युरोपमधील खानसाहेबांच्या सेंट्रीफ्यूजेसना, कार्यशाळांना (machine shops) व संशोधनाला लागणार्या सुविधांच्या घटकभागांच्या 'खरेदीजाळ्या'ची बित्तंबातमी होती पण ती प्रतिनिधीगृहाला कधी पोचायचीच नाहीं. पण परराष्ट्रखात्याच्या नजरेखालून जाणार्या हजारों तारांमधील "पाकिस्तान अणूबाँब बनवायचे जोरात प्रयत्न करतोय् व अण्वस्त्राचा स्फोट सुरू करण्यासाठी लागणारी उपकरणें शोधत आहे अशी दाट शंका आम्हाला आहे" अशा आशयाची एक महत्वाची तार त्यात होती.
झियांनी खानसाहेबांना cold test साठी दिलेला आदेश CIA ला कळला होता. बाँब बनवायची जबाबदारी PAEC चा संस्थापक सदस्य व मुलतानच्या बैठकीला हजर असलेला डॉ. मुबारकमंद यांच्याकडे होती. इस्लामाबादच्या उत्तरेस असलेल्या 'वाह'च्या दारूगोळ्याच्या कारखान्यात काम करणारा मुबारकमंद एका अज्ञात प्रयोगशाळेत सहकारी शास्त्रज्ञांच्या व अभियंत्यांच्या गटाबरोबर १९७४ सालापासून काम करत होता पण अणूबाँबची संरचना अजून संपली नव्हती. १९८१ साली झियांनी केवळ एक 'शर्यत' लावण्यासाठी खानसाहेबांनाही कहूताला प्रतिस्पर्धी गट बनवायला सांगितले.
इतके इशारे मिळूनही रेगन यांनी झियांना 'व्हाईटहाऊस'ला निमंत्रित केले. त्या प्रसंगीच्या शाही जेवणाच्या वेळी (डिसेंबर १९८२) प्रशंसापर भाषणात रेगन म्हणाले कीं अमेरिका व पाकिस्तान यांच्या संबंधांत मतभेद झाले आहेत पण ते क्षणभंगुर होते. आपल्याला एकत्र बांधणारे धागे (*५) मात्र दर वर्षी मजबूतच होत चालले आहेत. दुसर्याच दिवशी झियांनी पाकिस्तानवर लबाडीचा आरोप करणार्यांना 'आमच्या मुलकी परमाणूप्रकल्पावर अस्तित्वातही नसलेल्या लष्करी महत्वाकांक्षांचा आरोप करून पाकिस्तानच्या नालस्तीची एक खोटी मोहीमच सुरू करण्यात आलेली आहे' या शब्दात धारेवर धरले! NEC च्या Meet the Press कार्यक्रमात त्यांनी जाहीर केले कीं "शांतीपूर्ण परमाणू उपकरण" कधीच नसते. ते उपकरण एक तलवार आहे. तुम्ही आपला गळा कापून घेऊ शकता. तुम्ही स्वतःला वाचवू शकता. आम्हाला दोन्ही करायचे नाहीं.
एका वर्षात एक बदनाम राष्ट्र म्हणून ओळखले जाणारे पाकिस्तान अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या मांडीला मांडी लावून जेवू घातले गेलेले राष्ट्र बनले. नाताळच्या निमित्ताने अमेरिकन जनतेला दिलेल्या चित्रवाणीवरील भाषणात रेगननी दूरवर पहाडी मुलुखात स्वातंत्र्यासाठी रशियाशी झुंजणार्या झुंजार अफगाण योद्ध्यांची अमेरिकन लोकांना आठवण करून दिली व त्याचा अमेरिकन जीवनावर कसा परिणाम होतोय हे "आपल्यापासून कितीही दूर असले तरी अफगाणी योद्ध्यांची ही झुंज आपण विसरता कामा नये" या शब्दात विशद केले.
पण रेगन कंपूच्या खानसाहेब अणूबाँबची संरचना करत आहेत याबद्दलचा पुरावा दडपायच्या हालचाली पडद्यामागून चालूच होत्या. अण्वस्त्रांची स्फोटक शक्ती कित्येक पटीने वाढवू शकणार्या बेरिलियम परावर्तकांची खरेदी ब्रिटिश हेरखात्याने उघडकीस आणल्यावर रेगननी CIAचे ज्येष्ठ अधिकारी ज. वर्नन वॉल्टर्स यांना झियाला ताकीद देण्यासाठी घाईघाईत १९८२च्या ऑक्टोबरमध्ये इस्लामाबादला धाडले. परराष्ट्रखात्याच्या मध्यपूर्व व दक्षिण आशिया विभागाचे प्रमुख रॉबर्ट गालुच्चीही बरोबर गेले. अमेरिकन सरकार तुम्हाला खलित्यावर खलिते पाठवत आहे व सांगत आहे कीं तुमच्या सरकारातील कांहीं लोक मोठ्या चुका सातत्याने करत आहेत!" या चुकांचा पुरावाही त्यांनी झियांना दाखवला. पण ही माहिती तुम्हाला भारताकडून मिळालेली चुकीची माहिती आहे असे सांगून झियांनी हे आरोप नाकारले. कहूताचे फोटो दाखवल्यावर "हे परमाणूकेंद्र कसे असेल? ही तर बकर्या बांधायची टपरी आहे" असे उडवा-उडवीचे उत्तर दिले. झिया त्यांच्याशी खोटं बोलत होते यावर वॉल्टर्सचा विश्वासच बसेना!
पण वॉल्टर्सना 'व्हाईटहाऊस'कडून झियांना अत्यंत अदबीने त्यांचे अण्वस्त्रप्रकल्पाचे खरेदीचे व्यवहार जास्त गुप्तपणे करायला सांगण्याची आज्ञा होती, अण्वस्त्रप्रकल्प बंद करण्याची नव्हे हे गालुच्चींना माहीत नव्हते! वॉल्टर्सनी पडलेल्या चेहेर्याने त्यांच्या वरिष्ठांना सांगितले कीं मला हुकूम होता कीं झियांना त्यांचे परमाणूधंदे गुपचुप करा असे सांगायचा. म्हणजे सडेतोडपणे हे उद्योग बंद करायला सांगायच्या ऐवजी रेगन त्यांना ते गुपचुप करायला व त्यांना स्वतःला अडचणीत न आणायला सांगत होते. त्यांचे वरिष्ठही चाटच पडले कारण रेगन जनतेला एक सांगत होते तर करत होते उलटेच!
पण झियांनी कांहीं ऐकले नाहीं व पुरावे वाढत गेले! गुप्तहेर, इलेक्ट्रॉनिक हेरगिरी, फोनटॅपिंग, उपग्रह, मानवी व तंत्रज्ञानावर आधारित अशा अनेक मार्गाने मिळविलेली माहिती परराष्ट्रखात्याकडे होती, पण रेगन यांच्याकडून त्यांना आदेश हवा होता. राजनीती हा या अधिकार्यांचा प्रांत नव्ह्ता. शेवटी रेगन हे अण्वस्त्रप्रसारबंदीचे खंदे पुरस्कर्ते होते ही एक परीकथाच निघाली.
कहूताच्या आसपास पाळत ठेवण्यासाठी त्या पर्वतावरील खडकात बेमालूमपणे मिसळून जाईल अशी एक 'हायटेक' यंत्रणा तिथल्या डोंगरावर ठेवली होती. दुर्दैवाने एका उघड्या ट्रकमधून त्या टेकडीवरून जाणारा एक पाकिस्तानी विद्यार्थी बेभान थट्टा-मस्करी करतांना तिथे पडला. पण त्याच्या लक्षात आले की जरी आपले डोके खडकावर आदळले असले तरी आपल्याला मोठी इजा झालेली. शिवाय त्या 'खडका'तून अनेक दिवे मिचमिचतही होते व खडकातून 'भिरभिरे' आवाजही येत होते. नंतर हा खडक पाकिस्तान्यांनी हलवून हेरगिरी प्रशिक्षण केंद्रात ठेवला.
झिया अण्वस्त्रनिर्मितीत गुंतले नाहींत असे प्रशस्तीपत्र सतत तिसर्या वर्षी दिल्यापासून चारच महिन्यात गालुच्चींनी अत्यंत प्रतिकूल असा अहवाल सादर केला. "पाकिस्तान अण्वस्त्रनिर्मितीत सक्रीयपणे गुंतलेला आहे असा निःसंदिग्ध पुरावा उपलब्ध आहे. झियांच्या राजनैतिक व स्थानिक धोरणानुसार कारणांसाठी झिया म्हणतील त्याक्षणी 'तात्काळ' अण्वस्त्रचांचणी घेण्याची क्षमता असणे हा पाकिस्तानचा प्राथमिक उद्देश आहे.
सगळ्यात नुकसानकारक भाग होता 'परमाणू स्फोटकां'चा. यात अण्वस्त्रें डागण्याची प्रक्रिया कार्यप्रवण करणारी कळ प्रज्वलित करणार्या इलेक्ट्रॉनिक विद्युत्मंडलांवर पाकिस्तान कसा काम करीत होता, बाँबच्या गाभार्यावरील स्फोटक अशा नेहमीच्या आणि खास आकारांच्या आवरणांवर (परमाणूविघटनमालिकेची(*3) सुरुवात या आवरणांपासून होते) कसे काम करत होता याबद्दल माहिती दिली होती. असे संरचनेचे व स्फोटकांचे बरेच प्रयोग पाकिस्तानने आधीच केले असून तो आता एक चांचणीयोग्य बाँब बनवण्याच्या टप्प्यावर आला आहे या निष्कर्षावर गालुच्ची आले होते. वॉल्टर्सनी झियांना त्यांच्या खरेदीचे उद्योग उघड-उघड करू नयेत ही सूचना देऊनही खरेदी केलेल्या कितीतरी गोष्टी त्यात होत्या इतकेच काय कीं जी ड्रॉइंग्ज खानसाहेबांच्या सहाय्यकांनी माल पुरवणार्या कंपन्यांना दिली होती तिच्या प्रतीही गालुच्चींनी मिळविल्या होत्या व त्यात दाखविलेला माल स्पष्टपणे अण्वस्त्रसंबंधित होता.
गालुच्चींना पाकिस्तानच्या चीनबरोबरच्या कराराची धक्कादायक बातमीही मिळाली. चीनकडून आलेल्या ड्रॉइंग्सवर मॅन्डारिन भाषेतली माहिती अमेरिकेत तपासून पाहता १९६४ साली 'लोप नोर' येथील चीनच्या बाँबस्फोटाशी उल्लेखनीय साम्य आढळले व यावरून चीनने पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मितीत अण्वस्त्रप्रसारबंदीच्या अटींना धाब्यावर बसवून भरघोस मदत दिली होती हे गालुच्चींना उघड झाले. ही माहिती इतकी सर्वंकष होती की तीवरून फुटबॉलच्या आकाराच्या पाकिस्तानच्या भावी अणूबाँबची प्रतिकृतीही बनवून पेंटॅगॉनमध्ये ठेवली गेली. शिवाय त्यात अनेक डिटोनेटर्स होते व संगणकाच्या सिम्यूलेशनमध्ये प्रत्येक वेळी ते डागले गेले.
एवढेच नव्हे तर हवे तितके युरेनियम कहुताप्रकल्पात बनायच्या आधीच झिया चांचणीला तयार झाल्यास अडचण येऊ नये म्हणून चीनने एक-दोन बाँब बनविता येतील इतके अण्वस्त्रयोग्य अतिशुद्धीकृत युरेनियमही पाठविले होते व खानसाहेबांच्या शास्त्रज्ञांनी चिनी संरचनेच्या बाँबमध्ये सरकवता येईल असा युरेनियमचा गाभाही बनवला होता. हा चांचणी बाँब २०-२५ किलोटनचा चीनने केलेल्या चौथ्या चांचणीस्फोटाइतका व एक लाखाचा नरसंहार करू शकेल अशा शक्तीचा होता.
चिनी लोकांनी पाकिस्तानचे युरेनियम शुद्धीकरणाचे कालचक्रही सुधारून दिले होते व या चीन-पाकिस्तान संबंधांतील वैशिष्ठ्यांना गालुच्चींनी अधोरेखित केले. चीनसारख्या अनुभवी अण्वस्त्रधारी राष्ट्राची मदत मिळाल्याने पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पातल्या एरवी जाणवल्या असत्या अशा अडचणी चुटकीसरशी सुटू लागल्या होत्या. तरीही १९८३ साली आपल्या सायमिंग्टन-ग्लेन घटनादुरुस्त्यांमुळे पाकिस्तानला मदत देण्याबद्दलच्या अडचणी बाजूला केल्याच्या समर्थनार्थ प्रतिनिधीगृहाला पाठविलेल्या एका गुप्त अहवालात रेगन यांनी ठोकून दिले होते कीं नजीकच्या भविष्यकाळात पाकिस्तान अण्वस्त्रचांचणी करेल असे वाटत नाहीं कारण कहूता व पिन्सटेक प्रयोगशाळेतून (PINSTECH) पाकिस्तानला शुद्धीकृत युरेनियम मिळायला अडचणी आहेत.
याउलट एका सुरक्षेच्या वेढ्यात कहूतात काम जोशात चालले होते. मुख्य फाटकावर सोनेरी रंगाची चकचकीत अक्षरे असलेली खानसाहेबांच्या नावाची पाटी झळकत होती, ISI चे व हेरखात्याचे सैनिक इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणार्या रस्त्यावर गस्त घालत होते. ब्रि, सजवाल या व्यवस्थेचे प्रमुख होते व त्यांची या रस्त्यावर हलणार्या प्रत्येक वस्तूवर नजर होती. प्रत्येक आयात केलेल्या मालाचा अहवाल सैन्याच्या मुख्यालयाला दिला जायचा. टेकडीवरही सशस्त्र सैनिक तैनात होते. सैनिकी हेरखाते, १०००० सैनिकांच्या दोन ब्रिगेड्स, एक विमानवेधी तोफखाना, एक श्वानपथकासह कमांडो तुकडी व संदेशवाहक बटालियन अशी रचना होती. मध्यावर चार आत्मनिर्भर असलेले विभाग होते. मध्यवर्ती व सगळ्यात जास्त संवेदनाशील असे सेंट्रीफ्यूजेसचे दालन होते, B विभाग क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी होता, संवेदनाशील नसलेल्या कार्यशाळा (workshops) होत्या व जखमा व किरणोत्सर्गामुळे झालेल्या विकारांवर इलाज करू शकणारा वैद्यकीय विभागही होता. एका विभागात काम करणार्याला दुसर्या विभागात प्रवेश करायला मनाई होती. कुठेही पाट्या नव्हत्या. भेट देणार्या पाहुण्यांसाठी व तंत्रज्ञांसाठी वातानुकूल यंत्रणेला लागणार्या पाण्यासाठी बांधलेल्या कृत्रिम तलावाकाठी बांधलेली अतिथीगृहे होती. ज्या देशांचे लोक इतरात मिसळू इच्छित नव्हते असे चिनी, इराणी व उत्तर कोरियन लोक या अतिथी गृहात रहात.
सर्व हालचाली cold testच्या दिशेने घोडदौड करत होत्या. रेगन यांनी पाकिस्तानला अण्वस्त्रांच्या मार्गापासून दूर करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांचे कौतुक करून दोनच महिने झाले होते तर मार्च १९८३मध्ये अण्वस्त्रचांचणीसाठी सरगोढा या हवाईदलाच्या सर्वात मोठ्या तळापासून व दारूगोळ्याच्या कोठारापासून जवळ असलेल्या 'किराना' डोंगरात भूमीगत बोगदे खणण्याचे कामही सुरू झाले. cold tests ची जबाबदारी डॉ मुबारकमंद या PAEC च्या शास्त्रज्ञाकडे होती. त्यांनी खानसाहेबांच्या सहाय्याने नुकताच एक चांचणीयोग्य बाँब बनवला होता. शास्त्रज्ञांनी अमेरिका व जर्मनीहून मिळविलेले सुपरसंगणक 'बूट' केले. चांचणीचा उद्देश होता triggering mechanism बरोबर काम करतो कीं नाहीं हे पहाणे. (Cold Test साठी किरणोत्सर्गी गाभा काढून ठेवला होता.)
एक सशस्त्र लष्करी गाडी हा बाँब घेऊन आली. बाँबच्या सुट्या घटकविभागांची जुळणी त्या बोगद्यातच करण्यात आली, मापनयंत्रें जोडण्यात आणि तपासण्यात आली. पहिली चांचणी रचली होती trigger mechanism चालतो का व परमाणूविघटनमालिका सुरू करण्याएवढे पुरेसे neutrons बनतात कां याची. थोडी बारीकसारीक दुरुस्ती केल्यावर चांचणी यशस्वीरीत्या पार पडली. मग ज. आरिफ, PAECचे प्रमुख डॉ. मुनीर खान व वित्तमंत्री गुलाम इशाक खान यांच्या उपस्थितीत केलेली चांचणीही व्यवस्थित पार पडली. "सोनेरी अक्षरात लिहिण्यासारखा दिवस" असे ज. आरिफ उद्गारले. पाकच्या हातात अणूबाँब आला. अशा २४ चांचण्या केल्यावर त्या triggering mechanism स्वामित्व येणार होते.
पण १८ ऑक्टोबरला डच राजदूताने खानसाहेबांवर १९७५ सालच्या 'युरेंको'ची हेरगिरी केल्याच्या आरोप ठेवून त्यांच्यासाठी असलेला कोर्टात हजर रहाण्याचा हुकूम पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयास जारी केला. परराष्ट्रमंत्रालयाने कायदेमंत्रालयाला दिला पण त्यांनी वेळेवर उत्तर न दिल्याने डच कोर्टाने त्यांना गैरहजरीत खटला चालवून दोषी ठरवून चार वर्षें कारावासाची शिक्षाही दिली. खानसाहेब भडकले व किंचाळत राहिले कीं त्यांनी कुठलीही चूक केली नव्हती आणि डचांनी त्यांना समन्सही दिले नाहीं. जी माहिती त्यांनी हॉलंडहून आणली ती मुक्तपणे मिळणारी सार्वजनिक क्षेत्रातली होती! "त्यांच्या लोकशाहीचा त्यांच्याविरुद्ध वापर करून त्यांना छळून काढू!" वगैरे वल्गनाही झाल्या. या खटल्याचा निकाल स्वतःच्या बाजूने लावून घेतल्याशिवाय त्यांना हॉलंडला व इतर पश्चिम युरोपीय देशांना भेटणे अशक्य होते. झियांच्या परवानगीने व पाकिस्तानच्या सरकारी खर्चाने त्यांनी खूप नावाजलेल्या व खूप खर्चिक अशा सर डेव्हिड नाप्ली यांना आपला वकील नेमले.
भडकू स्वभाव, इतका गुंतागुंतीचा प्रकल्प चालविण्यातील तणाव व त्यांच्यावरील गुन्हेगारी खटला या सर्वांमुळे त्यांचे हेनीशी भांडण होऊ लागले. डच कोर्टात केस लावल्यावर तिने घटस्फोट मागितला. खानसाहेबांनी तिला शारीरिक इजा करण्याबद्दल धमकी दिली अशी एका मित्राने माहिती दिली. खानसाहेबांनी हा आरोप अमान्य केला. दोघांनी प्रा. हारून अहमद या मानसोपचारतज्ञाकडे जायचे मान्य केले. "मी शांतिप्रिय, हिंदुस्तानची समर्थक व बाँबच्या विरोधात असलेली बाई खानबरोबर कशी जोडली गेले तेच कळत नाहीं. खान कधीही बेसुमार रागावतात, त्यांच्याबरोबर रहाणे असह्य झाले आहे. ते एक सायको केस झाले आहेत" असे उद्गार तिने काढले.
त्यांचा मानसिक तणाव वाढला होता कारण त्यांना "इस्लामिक जगाला बाँब देणारा पहिला शास्त्रज्ञ" व्हायचे होते. युरेनियमच्या शुद्धीकरणाची बाजी त्यांनी मारली पण पहिला बाँबही PAEC ला हरवून त्यांनाच बनवायचा होता. कारण ते फक्त युरेनियमच्या रूपाने कच्चा माल पुरवणार होते, बाँब डिझायनर नव्हे. "मला रेसिंग कार चालवायची आहे, पेट्रोल पंपावरचा 'पोर्या' नाहीं बनायचे!" असेही ते म्हणायचे. हेनीनेही या शर्यतीत त्यांना साथ द्यावी असे त्यांना वाटे. खान नव्या-नव्या पायर्या चढत होते तर हेनी विणकाम आणि तिच्या कुत्र्यांत रमणारी होती. असुरक्षिततेची भावना असणारे खानसाहेब प्रा. अहमदना वारंवार फोन करू लागले, त्यांना कराचीला जाऊन भेटू लागले व त्यांचे म्हणणे ऐकू लागले.
त्यांच्या फीची भरपाई म्हणून खानसाहेबांनी प्रा. अहमद बनवत असलेल्या मोफत मनोरुग्णालयाचे आश्रयदाते बनून एक इमारत देण्याचा निर्णय घेतला. त्यांना इस्पितळाच्या प्रशासनमंडळावर घेण्यात आले. पण हेनी बरोबरचे त्यांचे संबंध बिघडत गेले. 'होयबां'च्या कळपात वावरणार्या खानसाहेबांचा paranoia वाढत गेला. हेनी दुरावत गेली. पुन्हा तिने खानसाहेबांनी दिलेल्या शारीरिक इजेच्या, खुनाच्या धमकीची वाच्यता केली. तिच्या व मुलींच्या मागे ISI चे लोक लावले होते हेही त्यांनी मान्य केले. या तिघांची पाकिस्तानपेक्षा युरोपवर जास्त निष्ठा आहे असे त्यांना वाटे तर त्यांच्या विशीतल्या मुलींना युरोपसारखी अनामिक जीवनशैली हवी होती. इराकचा प्रकल्प उद्ध्वस्त केल्यापासून आपल्या कुटुंबियांना अमेरिका किंवा इस्रायल पळवून नेऊन पाकिस्तानी अण्वस्त्रप्रकल्प पूर्णपणे सुटा करे पर्यंता ओलीस म्हणून वापरेल अशीही एक भीति त्याना वाटे. आधी त्यांना स्वतःच्या (नसलेल्या) हीनतेची लाज वाटे. पण युरेंकोची खाण हाती लागल्यावर त्यांचा स्वभाव एकदम उलटा झाला. ते जणू हिटलरच झाले.
पुढच्या क्षणी खानसाहेब काय करतील याची प्रा. अहमदना भीती वाटे. ते स्वतःला सरकारच्याही वर समजत. लष्कर व ते जणू 'सयामी जुळ्या'सारखे कमरेला जोडले गेले होते. हेनीच्यामागे लागल्याची माहिती बाहेर आल्यापासून हेरांनाही त्यांच्या वाटेला न जाण्याचा हुकूम होता. त्यांच्या महत्वाकांक्षेला कुठलीच अडकाठी नव्हती. पण तेच त्यांचे सर्वात मोठे शत्रू होते.
(या प्रकरणासून मी या पुस्तकाचे पूर्ण मूळ नाव "फसवणूक-पाकिस्तान, अमेरिका व अण्वस्त्रांचा गुप्त व्यापार" वापरायचे ठरवले आहे. आधीच्या प्रकरणातील नांवही बदलेन.)
------------------------------
*१) A wargame is a game that deals with military operations of various types, real or fictional.
*२) (भाषांतराबाहेरील माझे मत): थोडक्यात इस्रायलने केलेल्या कृतीचे परस्पर श्रेय रेगन यांनी उपटले!
*३) Fission chain reaction
*४) Government Affairs Committeशीर्षकया
*५) या प्रकरणाचे शीर्षक
Detonators, fissile material, triggering circuit, wargames, signals battalion cold test paranoia, Government Affairs Committee Fission chain reactionयासाठी अधिक चांगले मराठी प्रतिशब्द हवेत.
महदाश्चर्यम्!
प्रेषक सुधीर काळे ( गुरू, 03/11/2010 - 10:41) .महदाश्चर्यम्!
मी या व इतर फोरम्सवर नेहमीच लिहीत आलोय् कीं लोकशाहीमध्ये आपण श्रेष्ठींना त्यांच्या धोरणांबद्दल व निर्णयांबद्दल आपला संतोष, राग-संताप त्यांच्यापर्यंत पोचवला पाहिजे व मी हे काम करत असतो, अगदी मनमोहन सिंग-जी, प्रतिभाताई, बराकसाहेब यांच्यापर्यंत! (मी मनमोहन सिंग-जीं व प्रतिभाताईंना 'अरुणाचल'बद्दल लिहिलेले निरोप मी श्री विकास यांच्या "अरुणाचल" या धाग्याखाली लिहिले होते.) हा निरोप लिहिताना त्यांच्या वेबवर असलेल्या ५०० 'characters'च्या मर्यादेमुळे अडचण आली म्हणून मी काल PM साहेबांच्या ऑफीसला (PMO) लिहिले होते कीं "५०० 'characters' च्या मर्यादेमुळे कांहींच meaningful लिहिता येत नाहीं, तरी ही मर्यादा वाढवून ५०० शब्द करावी!"
महदाश्चर्यम्! मला PMO कडून कांहीं तासांतच खालील उत्तर आले.....
From:
"Web PMO"
To:
kbkale@yahoo.com
Dear Mr. Kale,
The mail ID is pmosb@pmo.nic.in
regards
Communications Incharge
म्हणजे आपली पत्रे (कधी-कधी तरी) वाचली जातात असे म्हणायला हरकत नाही! एका क्षणात माझा आपल्या लोकशाहीबद्दलचा आदर द्विगुणित झाला!
आपणा सर्वांना ही विनंती कीं आपली लोकशाही गुंडांच्या हातून सुशिक्षितांच्या हातात जावी असे ज्यांना-ज्यांना वाटत असेल तर अशा सर्वांनी आपापले मतप्रदर्शन करण्यात आढेवेढे घेऊ नयेत व 'बिनधास' लिहीत जावे!
(मूळ 'अरुणाचल'वरील मतप्रदर्शनाला अद्याप उत्तर आलेले नाहीं!)
सुधीर काळे
दुतोंडी पाकिस्तानी नेते
प्रेषक सुधीर काळे ( बुध, 03/10/2010 - 14:03) .दुतोंडी पाकिस्तानी नेते
हा लेख दि. ९ मार्च २०१० रोजी 'सकाळ'च्या वेब एडिशनवर प्रसिद्ध झाला असून अद्यापही खाली दिलेल्या दुव्यावर वाचता येईल.
http://72.78.249.124/esakal/20100309/5306183452989196847.htm
----------------------------------------------------------------------------------------------
नुकतीच एक बातमी मी वाचली व मी थक्क झालो! तसा मी मुशर्रफला नेहमीच 'सरडा' म्हणतो व इथेही त्याचा रंग बदलायचा गुण दिसून आला. http://www.zeenews.com/News607311.html
काश्मीरमधल्या अतिरेकी कारवायांचा जनक पाकिस्तानच आहे, तिची सुरुवातही १९८९ मध्ये झाली व बंडखोरीला हवा देण्याचे काम आजही चालू आहे हे पाकिस्तानचे भूतपूर्व हुकुमशहा व राष्ट्राध्यक्ष ज. मुशर्रफ यांनी मान्य केले. ते 'हाऊस ऑफ लॉर्डस्'च्या एका खोलीत (chamber) 'हाऊस ऑफ लॉर्डस्'च्या कांहीं मुस्लिम सभासदांसमोर 'Leadership' या विषयावर बोलत होते. काश्मिरी मुजाहिदीन टोळ्या २० वर्षांपूर्वी जेव्हा अस्तित्वात आल्या तेव्हापासून आजपर्यंत त्यांना पाकिस्तानमध्ये खूप समर्थन मिळत आहे, काश्मीर हेच भारत व पाकिस्तान यांच्यातील तेढीचे मूळ कारण आहे व हा प्रश्न सुटणार नाहीं तोपर्यंत या भागात शांती व वैभव नांदणार नाहीं असे बरेच तारे त्यांनी तोडले. मुशर्रफ सध्या लंडनमध्ये 'अघोषित (गुपचुप) निर्वासित' आहेत.
पण सत्य परिस्थिती ही आहे कीं सैन्यात ते ब्रिगेडियर/मेजरजनरलसारख्या हुद्द्यावर असताना काश्मीरमधील अतिरेक्यांच्या प्रशिक्षणाची केंद्रे उभारून त्याला चालना देणारे प्रमुख नेता होते.
स्वात खोर्यात तालीबानची मजबूत पकड बसली होती तिथे अलीकडे पाक सैन्याने लष्करी कारवाई केली. आपले सैन्य काश्मीरमध्ये करते ते जर 'अत्याचार', तर मग यांनी काय केले? 'लाल मस्जिद'वरील हल्ला करणारे आपल्या तत्सम हल्ल्यावर कुठल्या तोंडाने टीका करतात? वजीरिस्तानमधले रोज एक बॉम्बस्फोट करणारे अतिरेकी स्वातंत्र्यसैनिक आहेत का?
९/११ नंतर या बोटावरची थुंकी त्या बोटावर करून तालीबानला हवेवर सोडून दिल्याचे नाटक मुशर्रफ यांनी जरूर केले पण आतून त्यांना ते सामीलच होते असे अनेक वेळा दिसून आले आहे. आजही ओसामा बिन लादेन पाकिस्तानच्या संरक्षणाखाली पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या भुसभुशीत सीमेवर आश्रयाला आहे असा अनेकांचा अंदाज आहे.
खरे नाहीं वाटत? मग हा दुवा उघडा! http://tinyurl.com/ygnmc2h
इथे तर नवाज शरीफसारखा नेता पाच वेळा ओसामा बिन लादेनला भेटल्याचे वृत्त खालिद ख्वाजा या ISI च्या एका अधिकार्याने ARY News या पाकिस्तानी चित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. नवाज शरीफ यांनी लागलीच या वृत्ताचा इन्कार केला त्याला आव्हान म्हणून या अधिकार्याने म्हटले आहे, “या वृत्ताचा इन्कार करणार्यांना मी आव्हान देतो कीं मी अशा बैठकींबद्दल भक्कम पुरावा सादर करू शकतो व नवाज शरीफ याबाबतीत खोटे बोलणार नाहींत अशी आशा करतो." (ख्वाजा स्वतः ओसामा बिन लादेनला १०० पेक्षा जास्त वेळा भेटले आहेत असेही ते म्हणाले.)
अशा दुतोंडी पाकिस्तानी नेत्यांबरोबार काय डोंबल चर्चा करणार आपण? आपल्या सरकारला व परराष्ट्रमंत्री कृष्णा यांना कधी जाग येणार?
(तेंडुलकर आणि गांगुली फालतु क्रिकेटर -मायकेल कॅस्प्रोविचचे मत)
प्रेषक चेतन ( सोम, 03/08/2010 - 11:27) .रावसाहेबांचा हा लेख वाचला आणि बाष्कळ चर्चा करणार्या फोर्थ अंपायरची आठवण झाली. (रण ही पाहिला होताच म्हणा)
असो...
इंडिया २४/७ वर राजपाल यादवांनी घेतलेल्या मुलाखतीत मायकेल कॅस्प्रोविचचे सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या भारतातील दोन बुजुर्ग क्रिकेटरांविषयीचे सडेतोड विचार ऍकले/पाहिले त्यांच्या मते:
१. सचिन तेंडुलकरने गेली २० वर्षे फक्त रेकॉर्ड बनवण्यापलीकडे काहीही केले नाही. भारतीय खेळाडुला पाश्चात्य देशातिल अंपायर मुद्दामुन दंड करतात / आउट देतात असे ब्रेनवॉशिंग बीसीसीआयने केले, पण प्रत्यक्षात भारतीय खेळाडुंना पुढे आणण्यासाठी ठोस असे काहीही बीसीसीआयने, आणि विशेषतः सचिन तेंडुलकरनी केले नाही. ज्या आयपीएल मध्ये बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना उचलून धरल्याचा दावा केला, त्या स्पर्धेत अभारतीय खेळाडूंची आजची संख्या दोन वर्षांपूर्वीच्या संख्येपेक्षा अधिक आहे.
२. गेल्या वीस वर्षात भारतातील खेळांच्या र्हासाचे प्रमुख कारण म्हणजे बीसीसीआय. बीसीसीआयने अर्वाच्च, गलिच्छ आणि शिवराळ स्लेजींगचे उदात्तीकरण केले. कायदा धाब्यावर बसवण्याचा राजरोसपणा बीसीसीआयने भारताच्या क्रिकेट्मध्ये आणला. 'आयपीएल' मधील कित्येक चीअर गर्ल्सवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, पण सचिन तेंडुलकरला बाहेर करणारा माईका लाल अजून जन्माला यायचा आहे, ही मस्तवाल भाषा आणि गुर्मी बीसीसीआयने भारतात प्रथम सुरु केली.
३. बीसीसीआयचे भारतीय कैवाराचे धोरण स्वतःला सोयीस्कर आणि धरसोडीचे आहे. भारतात भारतीय माध्यमातून सुरु झालेल्या काही क्रिकेट स्पर्धांना (आयसीएल) पहिला विरोध बीसीसीआयचा होता.
४. सौरव गांगुली बीसीसीआयची ताकद ओळखण्यात अपयशी ठरला. बीसीसीआयला ताब्यात ठेवणे त्यांला शक्य असूनही त्यानी (कदाचित काही वेगळी राजकीय समीकरणे डोक्यात असल्याने) ते केले नाही. त्याच्या जेंव्हा ते ध्यानात आले, तेंव्हा फार उशीर झाला होता.
५. 'एक लढाउ संघनायक' ही सौरव गांगुलीची ओळख फारशी खरी नाही. इतर क्रिकेट संघनायकांच्या मानाने त्यातल्या त्यात आक्रमक भाषा व काही स्पर्धांमध्ये उठबस एवढा फरक सोडला तर सौरव गांगुली आणि इतर क्रिकेट खेळाडु यांच्यात काही फरक नाही. 'अजित वाडेकर नंतरचा भारताचा उत्तम कर्णधार' हे सौरव गांगुलीचे वर्णन निरर्थक आहे.
६. धोनीला मिळणारा प्रतिसाद ही वीस वर्षे क्रिकेट पाहून भ्रमनिरास झालेल्यांची प्रतिक्रिया आहे. धोनी देखील सचिन तेंडुलकरप्रमाणेच उथळ आणि सवंग खेळ या एकाच अस्त्रावर लोकप्रिय होताहेत. फरक इतकाच वाटतो, की त्यांच्या मागे जाणारे आता वीस वर्षे थांबणारा नाहीत. ते लवकर हिशेब मागतील.
बीसीसीआयने ज्यांची ज्यांची कल्हई केली त्यांना सोन्याचे दिवस आले, असे इतिहास सांगतो. जडेजा, अझरुद्दीनपासुन स्टीव बकनरपर्यंतची उदाहरणे आहेत. मायकेल कॅस्प्रोविच हा तर फार पूर्वीपासून बीसीसीआयच्या हिटलिस्टवर असणार्या. त्यांला सचिन तेंडुलकरनी ज्याला 'खास स्ट्रेट ड्राईव्ह' असे कौतुकाने म्हटले जाते त्या भाषेत 'झोडपुन' घेतले आहे. मायकेल कॅस्प्रोविचच्या या मुलाखतीत सचिन तेंडुलकरचा राग (मला तरी) दिसला नाही. दिसली ती फक्त दया. मरणासन्न अवस्थेतल्या, दात आणि नखे झडून गेलेल्या आणि तरीही सोन्याचा पिंजरा सोडू न शकणार्या वाघाकडे बघताना वाटावी अशी दया.
डिस्क्लेमिअरः हे लिखाण काल्पनिक आहे. (पण फोर्थ अंपायर आणि निखील बगळे बघुन डोक फिरतं हे नक्की)
ठाकरे आणि पवार नाकर्ते राजकारणी - पुष्पा भावे यांचे मत
प्रेषक सन्जोप राव ( रवी, 03/07/2010 - 14:56) .आयबीएन लोकमतवर निखील वागळेंनी घेतलेल्या मुलाखतीत पुष्पा भावेंचे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या महाराष्ट्रातील दोन बुजुर्ग राजकारण्यांविषयीचे सडेतोड विचार ऐकले / पाहिले. त्यांच्या मते:
१. बाळासाहेब ठाकर्यांनी गेली चाळीस वर्षे मराठी मनाचे ब्लॅकमेलिंग यापलीकडे काहीही केले नाही. मराठी माणसाला 'तू पीडीत आहेस, तुझ्यावर अन्याय होतो आहे' असे ब्रेनवॉशिंग शिवसेनेने केले, पण प्रत्यक्षात मराठी माणसाला पुढे आणण्यासाठी ठोस असे काहीही शिवसेनेने, आणि विशेषतः बाळासाहेब ठाकर्यांनी केले नाही. ज्या दादर बांद्र्यात शिवसेनेनेने मराठी माणसाला उचलून धरल्याचा दावा केला, त्या भागात अमराठी दुकानांची आजची संख्या चाळीस वर्षांपूर्वीच्या संख्येपेक्षा अधिक आहे.
२. गेल्या चाळीस वर्षात महाराष्ट्रातील सांस्कृतिक र्हासाचे प्रमुख कारण म्हणजे शिवसेना. शिवसेनेनेने अर्वाच्च, गलिच्छ आणि शिवराळ भाषेचे उदात्तीकरण केले. कायदा धाब्यावर बसवण्याचा राजरोसपणा शिवसेनेने महाराष्टाच्या राजकारणात आणला. 'सामना' मधील कित्येक उतार्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, पण बाळासाहेब ठाकर्यांना अटक करणारा माईका लाल अजून जन्माला यायचा आहे, ही मस्तवाल भाषा आणि गुर्मी शिवसेनेने महाराष्ट्रात प्रथम सुरु केली.
३. शिवसेनेचे मराठी कैवाराचे धोरण स्वतःला सोयीस्कर आणि धरसोडीचे आहे. मुंबईत मराठी माध्यमातून सुरु झालेल्या काही महाविद्यालयीन अभ्यासक्रमांना पहिला विरोध शिवसेनेचा होता.
४. शरद पवार शिवसेनेची ताकद ओळखण्यात अपयशी ठरले. शिवसेनेला ताब्यात ठेवणे त्यांना शक्य असूनही त्यांनी (कदाचित काही वेगळी राजकीय समीकरणे डोक्यात असल्याने) ते केले नाही. त्यांच्या जेंव्हा ते ध्यानात आले, तेंव्हा फार उशीर झाला होता.
५. 'एक सुसंस्कृत राजकारणी' ही शरद पवारांची ओळख फारशी खरी नाही. इतर काँग्रेस नेत्यांच्या मानाने त्यातल्या त्यात मवाळ भाषा व काही साहित्यीक वर्तुळांत उठबस एवढा फरक सोडला तर शरद पवार आणि इतर काँग्रेसचे नेते यांच्यात काही फरक नाही. 'यशवंतराव चव्हाणांनंतरचा महाराष्ट्रातला द्रष्टा नेता' हे शरद पवारांचे वर्णन निरर्थक आहे.
६. राज ठाकरेंना मिळणारा प्रतिसाद ही चाळीस वर्षे शिवसेनेत राहून भ्रमनिरास झालेल्यांची प्रतिक्रिया आहे. राज ठाकरेही बाळासाहेब ठाकर्यांप्रमाणेच उथळ आणि सवंग वक्तृत्व या एकाच अस्त्रावर लोकप्रिय होताहेत. फरक इतकाच वाटतो, की त्यांच्या मागे जाणारे आता चाळीस वर्षे थांबणारा नाहीत. ते लवकर हिशेब मागतील.
शिवसेनेने ज्यांची ज्यांची कल्हई केली त्यांना सोन्याचे दिवस आले, असे इतिहास सांगतो. भुजबळ राणेंपासून सचिन तेंडुलकरांपर्यंतची उदाहरणे आहेत. पुष्पा भावे या तर फार पूर्वीपासून शिवसेनेच्या हिटलिस्टवर असणार्या. त्यांना बाळासाहेब ठाकर्यांनी ज्याला 'खास ठाकरी भाषा' असे कौतुकाने म्हटले जाते त्या भाषेत 'हडळ' वगैरे म्हणून घेतले आहे. पुष्पा भावेंच्या या मुलाखतीत ठाकरेंबद्दलचा राग (मला तरी) दिसला नाही. दिसली ती फक्त दया. मरणासन्न अवस्थेतल्या, दात आणि नखे झडून गेलेल्या आणि तरीही सोन्याचा पिंजरा सोडू न शकणार्या वाघाकडे बघताना वाटावी अशी दया.
अरूणाचल प्रदेश
प्रेषक विकास ( रवी, 03/07/2010 - 10:13) .आत्ताच टाईम्स ऑफ इंडीया आणि इकॉनॉमिक टाईम्स मधे वाचलेल्या बातमीप्रमाणे आपल्या तत्पर परराष्ट्रमंत्रालयाने जागतिक बँकेस अरूणाचल प्रदेशसाठी निधी मागणार नाही अशी ग्वाही दिली आहे आणि चीनने हे परराष्ट्रमंत्र्यांचे विधान अधिकृत करण्याची मागणी बँकेकडे केली आहे.
श्री. कृष्णा आता म्हणतात की आम्ही तेथील प्रकल्प स्वखर्चाने पुर्ण करू शकू म्हणून अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे आता सरकार नक्की कुठले प्रकल्प अरूणाचल प्रदेशात करत आहे आणि त्यासाठी किती पैसे देत आहे हे माहीतीअधिकाराखाली विचारण्याची वेळ आली आहे असे वाटते. मात्र त्याच बरोबर खालील वाक्य देखील पहाण्यासारखे आहे:
What is more surprising is that the oblique acceptance of the Beijing line on Arunachal at the World Bank meeting on February 12, attended by Mr Chatterjee, ED-China Shaolin Yang, and World Bank general counsel (legal) and vice-president, South Asia division, came about without the Union Cabinet’s consent.
ही बातमी टाईम्स मधे आंर्तजालावर प्रमुख पानावर (होमपेजवर) आहे. मात्र हिंदू आणि इतरत्र टेलीग्राफ, डिएनए वगैरेच्या पानावर मात्र लगेच दिसत नाही. मराठी वृत्तपत्रांना तर अजून हे समजायचे असावे...
फसवणूक-प्रकरण चौथे: "कवड्या!"
प्रेषक सुधीर काळे ( शुक्र, 03/05/2010 - 16:28) .फसवणूक-प्रकरण चौथे: "कवड्या!"
(भाषांतराबाहेरचे: चिंचोक्याऐवजी कवड्या हा 'पहाटवारा' यांनी सुचविलेला शब्द वापरला आहे. पहाटवारांना धन्यवाद.)
१९८० च्या जानेवारीत(१) व नंतर त्यांच्या 'देशाची सद्यःस्थिती'बद्दलच्या (State of the Union) भाषणात कार्टर यांनी त्यांच्या सोविएत महासंघाविरुद्धच्या धोरणाचा भाग म्हणून घोषित केलेल्या "कार्टर प्रणाली"नुसार उत्तरेकडील वाढत्या धोक्यापासून स्वतःची राष्ट्रीय सुरक्षितता व स्वातंत्र्य रक्षण्याकरिता अमेरिका पाकिस्तानला लष्करी साधनसामुग्री, अन्न व इतर सहाय्य देऊ करेल असे जाहीर झाले. नव्या अमेरिका-पाकिस्तान धोरणासाठी प्रतिनिधीगृहातील सभासदांवर वजन आणणे, त्यांचे मन वळविणे सुरू झाले होते. अमेरिका आपल्य कायद्याच्या चौकटीत बसेल त्यानुसार पाकिस्तानला मदत करेल व मध्यपूर्वेतील कुठल्याही भागावरील आक्रमण हे अमेरिकेवरील आक्रमण समजले जाईल व त्यानुसार त्यांचा अमेरिका प्रतिकार करेल असेही त्यांनी सांगितले.
सोविएत महासंघाच्या अफगाणिस्तानवरील आक्रमणानंतर व CIA व ब्रेझिन्स्कींचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कार्टर यांना त्यांच्या परराष्ट्रधोरणाची दिशा सापडली होता. ब्रेझिन्स्कींच्या दृष्टीने अफगाणिस्तान हा सोविएत महासंघाच्या व्यापक परराष्ट्रनीतीचा एक छोटासा भाग होता. त्यांची नैऋत्य आशियाच्या मोठ्या भागावर व इराणवर नजर होती. इस्लामी क्रांतीनंतर इराणमधील परिस्थिती-राजकीय, सामाजिक व आर्थिक-गोंधळाची होती. सोविएत सैन्य अफगाणिस्तानमध्ये आल्यावर ते इराणच्या तेलसाठ्यांच्या अगदीच जवळ आले होते.
पण पाकिस्तानबरोबरच्या जवळिकीला अडचण होती अमेरिकेच्या कायद्यांची. कारण सिनेटच्या व प्रतिनिधीगृहाच्या परराष्ट्रविषयक समित्यांना या चर्चेत भाग घ्यायचा होता. ही शस्त्रास्त्रांसाठी दिली जाणारी मदत कर्जनिवारण, अफगाणी निर्वासितांना मदत या नावाने देता येईल कां किंवा सौदीसारख्या एकाद्या मुस्लिम मित्रराष्ट्राद्वारा पाठवता येईल कां हे राष्ट्रीय सुरक्षा समिती, परराष्ट्रमंत्रालय व संरक्षणमंत्रालय पहात होते. पण याऐवजी पाकिस्तानकडून अण्वस्त्रांसंबंधी कसलाच धोका नाहीं असे सांगून सायमिंग्टन व ग्लेन यांच्या घटनादुरुस्तीतून पळवाट काढण्याकडे 'सज्जन' कार्टर यांचा विचार होता. पण कहूता व डॉ. खान यांच्याबद्दल भरपूर प्रतिकूल माहिती असतांना असे सांगणे फारच अंगलट येईल असे वरिष्ठ अधिकार्यांचे म्हणणे होते.
सोविएत महासंघाचे अफगाणिस्तानवरचे आक्रमण झियांच्या चांगलेच पथ्यावर पडले होते. मानवाधिकारांबद्दलची तुच्छता, अण्वस्त्रांबद्दलचे धोरण आणि भुत्तोंची फाशी यासारखे झियांनी केलेले सारे अपराध विसरले गेले. त्यामुळे झियांचा सूर बदलला. त्यांना गुर्मी चढली. ते अगदी शेवटच्या पैशापर्यंत वाद घालू लागले. त्यांच्या मते अफगाणिस्तानच्या युद्धाला अमेरिकेच्या मदतीपेक्षा जास्त खर्च येणार होता व पूर्ण युद्धावर त्यांना पाकिस्तानी नियंत्रण हवे होते. झियांना भेटण्याचे टाळून कार्टर यांनी वॉरन ख्रिस्तोफरना यबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या अफगाणिस्तानबद्दलच्या खास अधिवेशनासाठी आलेल्या परराष्ट्रमंत्री आगाशाहींबरोबर चर्चा करायला सांगितले. कार्टर यांच्याबरोबरच्या जानेवारीतल्या बैठकीआधी आगाशाहींना थोडे नरमवायचे होते व मग ४० कोटी डॉलर्सची लष्करी व आर्थिक मदत दोन वर्षांच्या अवधीत द्यायची असा बेत होता. यातले ९ कोटी शस्त्रास्त्रें, २-३ Lockheed LI00 Super Hercules transporters, ६ 'चिनूक' हेलीकॉप्टर्स, सहा "TPS-43" हवाई संरक्षणाची रडार्स, १०,००० हाऊविट्झर तोफांचे गोळे, रात्री दिसू देणारे २०० चष्मे व त्याच्या पाठोपाठ एका वर्षानंतर १० 'चिनूक' हेलीकॉप्टर्स व २०० चिलखती गाड्या द्यायची योजना होती. अमेरिकन मीडियाने या योजनेचे स्वागत केले.
पण झियांना हवी होती 'मिग'ला तोडीस तोड अशी F-16 जेट फायटर विमाने. सैन्याच्या हालचालींसाठी देऊ केलेली वहानें अफगाणिस्तानच्या वाळवंटी व तोरा-बोरासारख्या दुर्गम पहाडी भागात कामाची नव्हतीच. नाटोसाठीच 'राखीव' असलेली F-16 फायटर विमाने अमेरिकेने नाकारली होती हे झियांना आवडले नव्हते. अमेरिकेने देऊ केलेल्या मदतीची 'कवड्या' (peanuts)(२) अशी अवहेलना करून त्यांनी उलटा वार केला कीं जोवर अमेरिका स्वतः एक विश्वासार्ह व टिकाऊ मित्रराष्ट्र आहे असे सिद्ध करत नाहीं तोपर्यंत ते कुठलाही करार करूच इच्छित नाहींत. सुरक्षिततेबाबत पाकिस्तान कुठलाच समझोता करायला तयार नसून ४० कोटी डॉलर्सच्या 'कवडीमोल' किमतीला स्वतःला विकूही इच्छित नाहीं असेही त्यांनी ठणकावून सांगितले. या कराराने आठवडाभरात सोविएत महासंघावर राजनैतिक कुरघोडी करू इच्छिणार्या अमेरिकेवर हा एक आघातच होता. विश्वासार्हता व टिकाऊपणा सिद्ध करायच्या निराकार व ठिसूळ प्रश्नावर किती वेळ लागला असता हे झियांच्याच हातात होते.
कार्टर यांनी ब्रेझिन्स्कींना व ख्रिस्तोफरना इस्लामाबादला पाठवून ISI ला CIA द्वारा आणखी छुपी मदत द्यायचे अमीष पाकिस्तानला दाखविले. वाटाघाटींत ज. आरिफ, आगाशाही व वित्तमंत्री गुलाम इशाक खान हेही झियांच्याबरोबर होते. (आरिफ हे पाकिस्तानात झियांच्या खालोखाल बलवान गृहस्थ होते). चर्चा कांहीं केल्या पुढे सरकेना. अमेरिकेला पाकिस्तानबरोबर लांब पल्ल्याची मैत्री हवी आहे असे सांगितल्यावर झियांनी विचारले कीं तसे असेल तर आमच्यावर हल्ला झाल्यास अमेरिका आम्हाला 'विनाअट' सुरक्षा कवच देईल काय? अमेरिकेला प्रतिनिधीगृहाची पसंती मिळवावी लागेल व ते कठीण दिसते असे ब्रेझिन्स्कींनी सांगितले.
चाळीस-पन्नास कोटी मदत अपुरी आहे हेच पाकिस्तानचे मत होते व त्यावर सगळी चर्चा अडकली. झियांनी कार्टरना फोन करून सांगून टाकले कीं तुमच्या प्रतिनिधींना अपुरे अधिकार दिलेले आहेत त्यामुळे हा करार होऊ शकत नाहीं.
पाकिस्तानबरोबर करार आवश्यक असल्यामुळे ब्रेझिन्स्की रियाधला गेले व त्यांच्याकडूनही आणखी ५० कोटीबद्दल संमती घेतली. शिवाय जपान, चीन व कित्येक मुस्लिम राष्ट्रांकडूनही आश्वासन मिळविले. पण झियांनी एकदम पलटी खाल्ली. ते म्हणाले कीं १९६५च्या व १९७१च्या युद्धांत पाकिस्तानला गरज असताना अमेरिकेने मदत केली नाहीं त्यामुळे पाकिस्तान अमेरिकेवर निर्भर राहू शकत नाहीं. झियांनी घोषणा केली कीं पाकिस्तान मुस्लिम व तटस्थराष्ट्रांबरोबर व जुना अन् विश्वासू मित्र चीनबरोबर राजनैतिक, नैतिक व साधनसामुग्रीविषयक मदतीचा वेगळाच करार करेल.
अशा तर्हेने हा करार अमेरिकेच्या हाततून निसटत असतानाच आणखी कांहीं धक्कादायक व अनिष्ट घटना घडल्या. इराणमध्ये ओलीस ठेवलेल्या मुत्सद्द्यांना सोडविण्याची १९८०च्या एप्रिलमधील मोहीम अयशस्वी झाली. इराण्च्या वाळवंटात अमेरिकन हेलीकॉप्टरची दुसर्या अमेरिकन विमानाशी टक्कर होऊन आठ अमेरिकन सैनिक मृत्युमुखी पडले. पुढच्याच महिन्यात कार्टर यांनी फक्त दोघांत खासगी व गुपचुप वाटाघाटी सुरू करण्यासाठी झियांना बोलावले असता झियांनी टाळाटाळीची उत्तरे दिली!
याच वेळी १९८०च्या जून महिन्यात 'बीबीसी'ने ध्वनिक्षेपित केलेल्या "Project 706—The Islamic Bomb" या अनुबोधपटात खानसाहेबांनी केलेल्या बेकायदेशीर युरेनियम शुद्धीकरणाबद्दलच्या प्रकल्पाचा पूर्ण 'पर्दाफाश' करण्यात आला व त्यामुळे पाकिस्तानात एकच गदारोळ माजला. हा कार्यक्रम नंतर हॉलंडमध्येही ध्वनिक्षेपित केला गेला व तो हेनीने तिथे पाहिला. त्याच्या दुसर्याच दिवशी ती पाकिस्तानला परत येत असतांना डच सीमारक्षकांना (Immigration officer) हेनी 'त्या' खानसाहेबांची पत्नी असल्याचे लक्षात न आल्यामुळे "आतापर्यंत हा डॉ खान कोट्याधीश झाला असेल" असे उद्गार काढत तिला जाऊ दिले. आता खानसाहेब हॉलंडमध्ये एक गुन्हेगार "wanted" झाले व हेनीला अडविले असते तर खानसाहेबांना परत आणण्यासाठी एक आमिष म्हणून वापरता आले असते! पण न ओळखल्यामुळे तिला जाऊ दिले गेले. सत्य परिस्थिती ही होती कीं खानसाहेबांन फक्त ४०० डॉलर पगार होता!
पाठोपाठ इराण व इराकमध्ये युद्ध भडकले. झिया त्यावेळी OIC(२) चे (इस्लामी राष्ट्र संघटना) चे अध्यक्ष होते व त्यांना मध्यस्ती करण्यासाठी आवाहन करण्यात आले. त्यामुळे ते १९८०च्या ऑक्टोबरमध्ये त्यांच्या सद्दाम हुसेन व अबोलहसन बानी सद्र (इराक व इराणचे तत्कालीन अध्यक्ष) यांच्यात झालेल्या चर्चेचा वृत्तांत संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला देण्यासाठी न्यूयॉर्कला रवाना झाले. पुढच्याच महिन्यात अध्यक्षीय निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या कार्टर यांनी करार करण्याची शेवटची संधी म्हणून त्यांना व्हाईट हाऊसला आमंत्रित केले व F-16 विमाने देण्याचेही मान्य केले. पण कार्टर यांची लोकप्रियला न्यूनतम असल्यामुळे झियांनी उद्धटपणे त्यांना सांगितले कीं निवडणूक होऊ दे मग पाहू. थोडक्यात झियांना रेगन यांच्याशी वाटाघाटी करायच्या होत्या!
निवडणुका व्हायच्या आधीच रिपब्लिकन पक्षाकडून झियांना निरोप आला कीं ते निवडून आल्यास अमेरिकेच्या परराष्ट्रधोरणात अमूलाग्र फरक पडेल. न्यूयॉर्कला असतांना झियांना अफगाणिस्तानमधील आणीबाणीबद्दल चर्चा करण्यासाठी निक्सन यांचाही फोन आला. तासाभरच्या संभाषणात पाकिस्तानचा अण्वस्त्रप्रकल्पही चर्चेला आला. ज. आरिफ यांच्या आठवणीप्रमाणे निक्सन तर पाकिस्तानकडे अण्वस्त्रे असण्याला अनुकूल होते. जरी ते रेगन यांच्या वतीने बोलत नव्हते पण वार्याची दिशा कळली! अशीच घटना अलेक्झांडर हेग जेंव्हा झियांना आपण होऊन म्हणाले कीं अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अडचणी होत्या, पण आता परिस्थिती बदलणार आहे!
रेगन आल्यावर धोरण बदलणार हे सगळ्यांनाच माहीत होते. अफगाणिस्तानविषयी त्यांची ठाम मते असल्यामुळे पाकिस्तानबरोबर मैत्री होणार व ते भारताला जड जाणार याची परराष्ट्र मंत्रालयात भारताबद्दलचे विषय (India Desk) हाताळणार्या हॉवर्ड शाफरना कल्पना होती. कार्टर यांच्या कारकीर्दीत CIAचे सोविएत महासंघासंबंधीचे राष्ट्रीय गुप्तहेर अधिकारी असलेले रॉबर्ट गेट्स(४) यांच्या मते परराष्ट्रधोरणातला हा बदल म्हणजे हवाई-चांचेगिरीने किंवा जबरदस्तीने घेतलेला ताबाच होता. रेगन यांनी राजनैतिक मुत्सद्देगिरी, आजूबाजूने केलेल्या गुप्त हालचाली, ढोंगें व मानसिक युद्धखोरीसारखी सर्व 'अस्त्रें' विजेच्या वेगाने वापरून वॉशिंग्टनवर कबजाच केला!
रेगन यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात विएतनाम युद्धातील पराभव, वॉटरगेट ब्रह्मघोटाळा व इराणमधील हेलिकॉप्टरचे पतन वगैरे घटनांमुळे अमेरिकन जनमानसात घर करून असलेली राष्ट्रीय कमकुवतपणाची भावना संपविण्याबाबत आश्वासन देण्यात आले होते. सोविएत महासंघाशी नरम धोरण अवलंबिल्याबद्दल रेगन यांच्या शिलेदारांनी कार्टर यांच्या कारकीर्दीची रेवडी उडवली होती व सोविएत महासंघाच्या लालचौकातून (Red Square) अफगाणिस्तानद्वारे येऊ घातलेल्या व इराण्च्या आखाताद्वारे संपूर्ण मध्यपूर्व व तिथले तेल गिळू पहाणार्या 'रशियन परमाणूहिवाळ्या'चे भूतही उठवले होते.
यावेळी अमेरिकेत व्याजाचे दर आणि महागाई कडाडून २० टक्क्यावर आली होती आणि बेकारी आकाशाला भिडली होती. तेलाचे भाव कडाडल्यामुळे इतर युरोपबरोबर अमेरिकाही मंदीच्या फेर्यात अडकली होती. त्यामुळे सारेच विषय लोकांच्या भावनाना भडकावणारे व निर्वाणीचे झाले होते. रेगन यांनी आल्या-आल्या "सोविएत महासंघ अंगोलापासून अफगाणिस्तानपर्यंत पाश्चात्य देशांना अनुकूल असलेल्या राष्ट्रांना कमकुवत करून तिथल्या मार्क्सवादी विकल्पांना मदत करीत आहे व अशा तर्हेने तो सगळीकडे प्रगती करीत आहे" असे पडघम वाजवायला सुरुवात केली व त्यांच्या शिलेदारांनी संरक्षण व गुप्तहेरखात्यावर जास्त खर्च करण्याच्या बाजूने जनमत बनवायला सुरुवात केली.
परराष्ट्रमंत्री असलेल्या हेगनी तर कमालच केली! सर्व आंतर्देशीय अतिरेक्यांच्या मुळाशी सोविएत महासंघच आहे आणि त्याला थोपविले पाहिजे असाही प्रचार त्यांनी सुरू केला. पण त्यांना या मुद्द्यावर प्रतिनिधीगृहात आव्हान देण्यात आल्यावर व तसा पुरावा ते देऊ न शकल्यामुळे त्यांनी CIA ला हेरखात्याकडून राष्ट्रीय पातळीवरचा अहवाल बनवायला सांगितले. त्यानुसार सोविएत महासंघाला अतिरेकी कारवाया नापसंत असून निष्पाप लोकांच्या हत्या झालेल्या त्यांना आवडत नाहींत असा अहवाल दिला. हेग यांची चांगलीच पंचाईत झाली! पण बिल केसी यांना काय करायचे ते नीट माहीत होते व त्यांनी आधीचा अहवाल रद्दबातल केला व हेगनी Defense Intelligence Agency कडून नवा अहवाल मागवला. त्यात सोविएत महासंघ जगभर क्रांतिकारी अतिरेकाला टेकू देत आहे असा निष्कर्ष होता. पुढे असे खोटे अहवाल मागवायची प्रथाच पडली. केसींना हे काम त्याच्या "होय, साहेब" वृत्तीमुळेच मिळाले होते. ते दुसर्या महायुद्धाच्या काळात व्यूहरचना आखणार्या खात्यात गुप्तहेर होते. युद्धानंतर त्यांनी हेरखात्याला राम-राम ठोकला व 'वॉल स्ट्रीट'वर वकीलीच्या प्रॅक्टीसमध्ये पैसा कमावला. रेगन निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर त्यांच्या विजयी निवडणुकमोहिमेचे ते व्यवस्थापक बनले व त्या मार्गाने CIAचे प्रमुख झाले. रेगन यांच्या इतर शिलेदारांप्रमाणे केसींनाही वाटत होते कीं कार्टर यांच्या कारकीर्दीत CIA सारख्या संस्था सोविएत महासंघापुढे मऊ झाल्या! त्यांना हुकूम मिळाला कीं असल्या उदारमतवादी मंडळींना दरवाजा दाखवायचा. ६८ वर्षाचे केसी श्रीमंत, कडक स्वभावाचे, चाकोरीबद्ध नसलेले व धोका पत्करणारे गृहस्थ होते. साधनशुचितेची पर्वा नसलेले केसी CIA चा उपयोग गदेसारखा करून सोविएत महासंघाला चेचू इच्छित होते. त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले(५). केसींनी राष्ट्रीय सुरक्षा समिती व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचे अवमूल्यन केले व रेगनना त्यांच्याकडून थेट माहिती जाणार नाहीं याची त्यांनी खात्री केली!
Arms Control and Disarmament Agency (ACDA) या संस्थेचे संचालक अण्वस्त्रप्रसारबंदीसंबंधी राष्ट्रपतींना सल्ला देत असे. कार्टर यांच्या कारकीर्दीत खानसाहेब व त्यांचा कहूता प्रकल्प याबद्दल हेच माहिती देत असत. आता या संस्थेचेही अवमूल्यन करण्यात आले. त्यांचे मनुष्यबळ खूप प्रमाणात कमी करण्यात आले आणि तिच्या संचालकाना रेगन यांच्यापासून दूर ठेवण्यात आले! याच वेळी रिचर्ड बार्लो या संघटनेत आला व अण्वस्त्रप्रसारबंदीसंबंधी माहितीचा अव्वल छाननीकार(६) बनला.
सोविएत महासंघापासून उद्भवलेल्या धोक्याला पाकिस्तानासारखे प्यादे वापरून शह द्यायची कल्पना पाकिस्तानातले अमेरिकेचे राजदूत अर्थर हमेल यांची, पण हेगने ती उचलून धरली. पाकिस्तानला सोविएत महासंघाची भीती होतीच व अमेरिकन रक्त न सांडता परस्पर काटा काढायची ही संधी अमेरिकेलाही हवी होती. मग असे एक धोरण पुढे आले कीं पाकिस्तानला भरपूर मदत द्यायची म्हणजे त्याला अण्वस्त्रांची गरजच भासणार नाही व हे युद्ध परस्पर जिंकता येईल.
या निकडीच्या व महत्वपूर्ण धोरणाला सौदीच्या राजपुत्राचा पूर्ण पाठिंबा होता. पण पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पामुळे अमेरिकेचे प्रतिनिधीगृह नाराज होते. संपूर्णपणे पाश्चात्य तंत्रज्ञान, साधनसामुग्री व सदिच्छांवर आधारित असलेला हा प्रकल्प कुणीच विसरले नव्हते! त्यामुळे झियांशी दोस्ती करण्याआधी अमेरिकन प्रतिनिधींची सहमती मिळविणे व कायद्यात जरूर ती घटनादुरुस्ती करणे आवश्यक होते.
रेगन यांच्या शिलेदारांतही अण्वस्त्रप्रकल्प सक्रीयपणे राबविणार्या पाकिस्तानसारख्या राष्ट्राला अशी भरघोस मदत देण्याबाबत नाराजी होती. परिणामतः त्यांच्याकडून या धोरणाबद्दलची बातमी गुपचुप व्हाईट हाऊसच्या वार्ताहारांत फोडण्यात आली. पण झियांनी न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रसंघात काम केलेल्या व त्यामुळे पाश्चात्य राष्ट्रांत जरासे विश्वसनीय झालेल्या PAECच्या भूतपूर्व अध्यक्ष डॉ इश्रत उस्मानींना मातब्बर परमाणूविषयक नियतकालिकांत "लोकांच्या समजुती कांहींही असोत पण पाकिस्तानला कहूता प्रकल्पात अतीशय अवघड अशी आव्हाने पार पाडायची आहेत" असा लेख लिहायला सांगितले. कहूता येथील व्यवस्थितपणे चालणार्या सेंट्रीफ्यूजेसची माहिती असूनही 'Nucleonics Week' या नियतकालिकाच्या वार्ताहाराला दिलेल्या मुलाखतीत डॉ. उस्मानी यांनी ठोकून दिले कीं पाकिस्तानपुढे जबरदस्त तांत्रिक आव्हाने आहेत व अगदी ढोबळ परमाणूबॉम्बसुद्धा बनविण्याची क्षमता पाकिस्तानकडे नाहीं.
पाकिस्तान कराराबाबत असा कांहीं उत्साह होता कीं रेगन यांनी शपथ ग्रहण केल्यावर तीन आठवड्यात अमेरिकन परराष्ट्रमंत्रालयाने एक गुप्त टांचण बनवले. त्यात पाकिस्तानला परस्पर रशियन फौजेला रक्तबंबाळ करायला उद्युक्त करून त्याची पिळवणूक करण्याची अमेरिकेची इच्छा व पाकिस्तानला असलेली संरक्षणाची गरज यांच्यातले समीकरण मांडले होते. तसेच पाकिस्तान हा आघाडीवरचा देश आहे. त्याची राष्ट्रीय निष्ठा व सोविएत महासंघाविरोधी धोरण अमेरिकेच्या दृषीने महत्वाचे आहे. सोविएत महासंघाच्या १४ महिन्याच्या आक्रमणानंतर अमेरिकेची विश्वासार्हता बुडाली आहे पण पाकिस्तानच्या नव्या राष्ट्राध्यक्षांकडूनच्या अपेक्षा वाढल्या आहेत. वेळेवर कृती नाहीं केली तर वातावरण चिघळेलयाचाही उल्लेख त्या टांचणात होता.
पाकिस्तानला पैसे ताबडतोड पाठवणे जरूरीचे होते. १५ मेपर्यंत पैसे पाठवायचे म्हणजे १५ मार्चपर्यंत अंदाजपत्रक समितीकडे (budget committee) जायला हवे! एकच घाई झाली होती सार्यांना! पण हा प्रस्ताव प्रतिनिधीगृहापुढे ठेवायच्या आधीच पाकिस्तानातले राजदूत हमेल यांनी तो पाकिस्तानला कळवला व आगाशाहींना एक शिष्टमंडळ वॉशिंग्टनला न्यायची सूचना केली! पण आगाशाही जरासे साशंक होते, जेरार्ड स्मिथनी दिलेले 'मृत्यूच्या दरी’चे धमकीवजा भाषण ते विसरले नव्हते. अब्जावधी डॉलर्सचा मलिदा समोर असूनही हमेलच्या प्रस्तावाबद्दल आगाशाही साशंक होते. ही तारेवरची कसरत होती म्हणून त्यांनी झियांना सल्ला दिला कीं यात पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाला धक्का बसणार नाहीं व अण्वस्त्रप्रकल्पाबद्दलही कुठली अट असणार नाही हे पहावे लागेल व तळाशी असलेल्या 'टिपा'(७) नीट वाचाव्या लागतील.
अण्वस्त्रप्रकल्प राबविणार्या पाकिस्तानला अशी मदत करायला विरोध असणार्यांचा संतापही वाढत होता. कांहीं प्रतिनिधींना वाटले कीं आपल्यावर हा चुकीचा निर्णय लादण्यासाठी आपल्याला क्षुल्लक कारणांवरून डिवचले जात आहे! व्हाईट हाऊसमधून झिरपलेल्या माहितीवरून किती प्रचंड प्रमाणावर ही मदत द्यायचे घाटते आहे याचा अंदाज आल्यावर सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असले तरी बंडाळीची लक्षणे दिसू लागली व दुसर्या महायुद्धातला वीरपुरुष, पृथ्वीभोवती सर्वप्रथम अंतराळातून प्रदक्षिणा घालणारा अंतराळवीर व १९७७च्या अण्वस्त्रांचा स्फोट करणार्या देशांना मदत नाकारण्याबाबतच्या घटनादुरुस्तीचा लेखक असलेल्या जॉन ग्लेन या डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतृत्वाखाली हे बंडखोर एकत्र येऊ लागले कारण तो एकच असा नेता होता जो रेगनना टक्कर देऊ शकला असता.
या घटनादुरुस्तीच्या लेखनात ग्लेन यांचे मदतनीस असलेल्या लेन वाइसनी रेगन यांच्या शिलेदारांनी प्रतिनिधीगृहाला कसे दडपून टाकले आहे याचा अभ्यास केला. पाकिस्तानचा विरोधक म्हणजे सोविएत महासंघाचा समर्थक, सोविएत महासंघाचा विरोधक म्हणजे पाकिस्तानचा समर्थक यापलीकडील "सोविएत महासंघाचा आणि पाकिस्तानचा विरोधक" या पर्यायाचा विचार करायची उद्यमी व दूरदृष्टी रेगन यांच्यात वा त्यांच्या शिलेदारांत नव्हती कारण ते आळशी होते. एका अण्वस्त्रधारी राष्ट्राच्या (सोविएत महासंघ) शक्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणखी एका राष्ट्राला (पाकिस्तान) अण्वस्त्रधारी बनविण्याविरुद्ध ठामपणे उभे राहिले एकटे जॉन ग्लेन.
ग्लेन यांना टेकू दिला डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर ऍलन क्रॅनस्टननी. युरोप व आफ्रिकेत पत्रकारिता केलेले क्रॅनस्टन डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रतोद (whip) होते. अण्वस्त्रप्रसारबंदी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेचा गाभा असल्यामुळे त्यांचा हमेल योजनेला विरोध होता व प्रतिनिधीगृहात आगामी (वाक्)युद्धाची समज त्यांनी परराष्ट्रखात्याला दिली. शिवाय ते अभ्यासू असल्यामुळे पाकिस्तानने संवेदनशील गोष्टींच्या सतत केलेल्या खरेदीचा अभ्यास त्यांनी केला होता. पाकिस्तान युरेनियम शुद्धीकरणाच्या प्रकल्पात किती पुढारला आहे याची त्यांना कल्पना होती. प्रतिनिधीगृहाच्या परराष्ट्रधोरणविषयक समितीचे सभासद असलेल्या सिनेटर स्टीफन सोलार्झ यांच्या आठवणीनुसार सगळ्याना पाकिस्तानच्या प्रगतीची कल्पना होती. "मदत हवी? तर अण्वस्त्रे फेकून द्या" असे एकमताने सांगायच्या ऐवजी बरोबर उलटा संदेश पाकिस्तानला दिला जात होता. सोविएत महासंघाला गुढग्यावर आणण्यात अफगाणिस्तानचे अव्वल स्थान होते हे खरे पण ते करताना अण्वस्त्रप्रसारबंदीचा अनेकमजली डोलारा खाली आणण्यात काहींच अर्थ नव्हता. पण रेगन यांचे शिलेदार हेच करायला निघाले होते!
हे शिलेदार आक्रमक पवित्र्यात होते. पाकिस्तानला देऊ केलेल्या मदतीचे मूल्यमापन करायची जबाबदारी असलेल्या प्रतिनिधीगृहाच्या परराष्ट्रधोरणविषयक समितीचे अध्यक्ष सिनेटर पर्सी यांना परराष्ट्रखात्यातील एका ज्येष्ठ अधिकार्याचा फोन गेला व "पाकिस्तानपुढे अफगाणिस्तानस्थित सोविएत महासंघाकडून तातडीचा व वाढता धोका आहे व केवळ अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्यसैनिकांवर पाकिस्तानचे अस्तित्व अवलंबून आहे" असे सांगायला पढवले. पाकिस्तान अण्वस्त्रप्राप्तीसाठी जोरदार प्रयत्न करीत असून पूर्वी घातलेल्या निर्बंधांचा कांहींही उपयोग झालेला नाहीं. म्हणून पैसे व लढाऊ विमाने दिल्यास डॉ. खान आपला प्रकल्प गुंडाळतील असे सांगायला पढवले. हे जगावेगळे तर्कशास्त्र मूळ धरू लागले होते!
पाकिस्तान अण्वस्त्रांची चांचणी करण्यास एक ते दीड वर्षांत तयार होईल व हे तंत्रज्ञान आपल्या शेजारी राष्ट्रांना द्यायला तो सज्ज आहे अशी ताजी माहिती हेरखात्याकडून आलेली असूनही रेगन यांच्या शिलेदारांनी पर्सींना जाणून-बुजून सांगितले कीं पाकिस्तान याबाबतीत खूपच मागे आहे व पाकिस्तान शेजारी राष्ट्रांना हे तंत्रज्ञान देण्याच्या बाबतीत स्वतःवर नियंत्रण ठेवेल असाही त्या शिलेदारांना विश्वास आहे.
रेगन यांनी पाकिस्तानयोजनेवर आपली इभ्रत पणाला लावून फारच धोक्याचा मार्ग पत्करला होता आणि जो त्या योजनेला विरोध करे तो तुडवला जाऊ लागला! रेगन यांच्याच अंदाजपत्रक व व्यवस्थापन कार्यालयाने(८) पाकिस्तान प्रस्ताव राजनैतिकदृष्ट्या धोकादायक असून युद्धाला पैसा नसल्याचे जाहीर केल्याबरोबर परराष्ट्रखात्याने पाकिस्तानयोजना रेगन यांच्या कारकीर्दीच्या यशासाठी महत्वाची असून ते अमेरिकेचा संरक्षण पवित्रा सुधारू इच्छित होते व त्यासाठी ही मदत महत्वाची पायरी होती असा प्रचार केला. हेग व बकलींनी परराष्ट्रधोरण समितीपुढे साक्ष दिली होती कीं पाकिस्तानची असुरक्षिततेची भावना दूर केल्यासच त्याची अण्वस्त्रांबाबतची तहान मिटेल.
आगाशाहींचे २० एप्रिलला वॉशिंग्टनला आगमन झाल्यावर अण्वस्त्रांचा विषय निघालाच, पण हेगनी अण्वस्त्रांचे चांचणीस्फोट न केल्यास तो रेगनधोरणाचा मध्यवर्ती विषय बनणार नाहीं असे सांगून पाकिस्तानी शिष्टमंडळाला सुखद धक्काच दिला.
ज. आरिफही या बैठकीत होते आणि ते अमेरिकेच्या 'घूम जाव' धोरणाने थक्कच झाले! हेगनी तर अण्वस्त्रे हा पाकिस्तानचा 'खासगी मामला' आहे असे सांगितले. सांरांश: रेगन अण्वस्त्रधारी पाकिस्तानीबरोबर 'जगायला तयार होते'! रेगन यांनी पाकिस्तानच्या संरक्षणाला व स्थैर्याला अमेरिकेचा पूर्ण पुष्टी दिली. आरिफ यांच्यावर त्यांची खूप छाप पडली.
अशा तर्हेने अठरा महिन्याच्या कालावधीत पाकिस्तानी अण्वस्त्रप्रकल्प अमेरिकेकडून किंवा इस्रायली बॉम्बहल्ल्याने उध्वस्त होता-होता अमेरिकन धोरणाच्या केंद्रस्थानी आला.
------------------------------------------------------------------------------------------------------
(१) कार्टरसाहेब त्यांच्या कारकीर्दीच्या शेवटच्या वर्षात प्रवेश करत होते. ती २० जानेवारी १९८१साली संपली. त्या दिवशी रेगन अमेरिकेचे ४०वे राष्ट्रपती झाले.
(२) Organisation of the Islamic Conference
(३) कार्टर स्वतः एक शेंगदाण्याचे शेतकरी होते (Peanut farmer). त्यावर ही कोपरखळी होती.
(४) हे नंतर बुश-४३ यांच्या कारकीर्दीत संरक्षणमंत्री होते व आज ओबामांच्या कारकीर्दीतही संरक्षणमंत्री आहेत.
(५) मंत्रीमंडळात स्थान मिळविणारे ते पहिलेच CIA चे प्रमुख होते.
(६) मी लिहिलेली बर्लोबद्दलची माहिती "उत्तम कथा" मासिकाच्या २००९च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली आहे. PDF format मध्ये असल्याने इथे देता येणार नाहीं. ज्याना ती वाचण्यात रस असेल त्यांना मी ई-मेलने पाठवून देईन.
(७) Footnotes
(८) Office of Management and Budget
हुसेन, हिंदू, त्यांच्या दुखावणार्या भावना आणि आमचं (अर्थात) शंकेखोर मन...
प्रेषक चिंतातुरजंतू ( शुक्र, 02/26/2010 - 18:32) .मकबूल फिदा हुसेन यांना कतारचे नागरिकत्व बहाल झाल्याने जो उत्स्फूर्त भावनांचा अविष्कार भवताल व्यापून राहिला आहे, त्यामुळे आमचे शंकाखोर मन पुन्हा उसळी खाऊ लागले. भावनाविष्काररूपी अमृताच्या मंथनातून उत्पन्न झालेल्या काही शंका:
- परकीय नागरिकत्व घेतल्याने अशा त्रासदायक, हरामी इसमाची आपसूकच आपल्या पवित्र देशातून मरेस्तोवर हकालपट्टी झाली, तर आम्हांस किंचितसा आनंद का बरे होत नाही? सभोवार इतका क्षोभ का?
- या प्रकाराने आपल्या पवित्र देशाची नालस्ती कशी होते? आम्हांस वाटले होते की ९५ वर्षांच्या वृध्दास कोठडीत डांबून तृतीय रत्न दाखविल्यास नालस्ती होण्याची शक्यता होती.
- 'भारतात अल्पसंख्याकांच्या जिवास धोका आहे' असा अपप्रचार करण्यास इस्लामी आणि मानवतावादी यांचे फावते. - यास इलाज काय? अखेर, हुसेन यांच्यावर हल्ले आपणच केले, १२५०खटले आपणच भरले, त्यांविषयीच्या हलाहलाने आंतरजाल आपणच भरले. मग आता त्याची फळे आपणच भोगायची. यांतले काहीच न होते, तर आपण इतरांस 'तुम्ही कांगावा करता' असे छातीठोकपणे म्हणू शकलो असतो. रणांगणावर गेल्यावर रक्तमांसाचा चिखल अंगावर उडताच गर्भगळित होणारे नेभळट तर आम्ही नव्हेत. आम्ही तर ही अभिमानाने मिरवण्याची बाब मानायला हवी.
- आणि मुळात आम्हांस पडलेला एक 'सनातन' प्रश्नः आमची पुराणे आणि त्यांवर आधारित आमचे अभिजात साहित्य तर देवादिकांच्या आणि ऋषीमुनींच्या चाळ्यांनी आणि त्यांच्या सुटलेल्या चळांच्या रसभरित वर्णनांनी ओतप्रोत भरले आहे. आमचे देव काही अनाघ्रात मेरीच्या पोटी जन्मास आलेल्या येशुबाळासारखे शामळू आणि पुळचट नव्हते. पुष्ट, मांसल शरीरांच्या स्त्रिया दाखवून याच देवादिकांचे चित्रण करणार्या राजा रविवर्म्याची चित्रे - उदा. ही आमची शकुंतलाआजी. आमच्या (दुष्यंत नसलेल्या) आजोबांचा हिच्यावर फार जीव! - तर आबालवृध्दांच्या नजरा निवळण्यासाठी अभिमानाने आपापल्या दिवाणखान्यांत एकेकाळी मिरवणारे आपण इतके का बरे त्रासलो? सारखे एवढ्या-तेवढ्यास हात कलम करणे, दगड फेकून मारणे असे रानटी आणि रासवट चाळे करणार्यांच्या रांगेत जाऊन बसण्यास आपण एवढे उतावीळ का बरे झालो?
असो. आता आम्ही आमच्या शंकेखोर मनास आलेला शीण हलका करण्यासाठी या संस्थळाच्या मुखपॄष्ठावरील पुष्ट, कायस्थ स्त्रीचे काही काळ आमच्या लोलुप नेत्रांनी अवलोकन करावे म्हणतो. अहो, त्यातून आमच्या पुणेरी बावन्नखणी संस्कृतीचे रक्षण होते! आता परस्त्री देवी असते, असे या जननी-जन्मभूमीत काही जण मानतात म्हणे. आशा आहे की आमच्या संस्कृतीरक्षक लोलुप अवलोकनाने अशा कायस्थ वा कायस्थेतरांच्या भावना दुखावणार नाहीत!
आपला स्नेह-(आणि बरेच काही) लोलुप,
चिंतातुर जंतू
एम एफ हुसेनांचे कतार नागरिकत्व
प्रेषक भास्कर केन्डे ( शुक्र, 02/26/2010 - 02:34) .एम एफ हुसेन या चित्रकाराच्या जीवाला म्हणे भारतामध्ये प्रचंड धोका असल्याने हे महाशय भारताबाहेर आश्रयास आहेत. अशातच या वादग्रस्त हुसेनांना कतारने नागरिकत्व देऊ केल्याच्या बातम्या द हिंदू सह टाईम्स वगैरे वर्तमानपत्रात झळकत आहेत.
भारतीय नागरिकाने इतर देशांचे वा परदेशी लोकांनी भारताचे नागरिकत्व घेण्याच्या शेकडो घटना दररोज घडत असतात. मात्र एखाद्या इसमावर त्याच्या मायदेशात जर काही खटले चालू असतील तर त्या देशाचा आदर म्हणून इतर देश त्या इसमाला नागरिकत्व न देण्याचा आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल आहे. या प्रोटोकॉलचे उल्लंघन म्हणजे दुसर्या देशाला दिलेला एक संदेश समजला जातो.
अरबी देशांत भारतीयांना सहसा नागरिकत्व दिले जात नाही. या समजा बाहेर जाऊन व आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलला डावलून कतारने ज्या इसमावर समाजाचा अपमान करणे, दंगल भडकवण्यासदृश साहित्य (चित्रे) प्रसिद्ध करणे, धार्मिक तेढ वाढवणे, सामाजिक तणाव वाढवणे अशा गंभीर अरोपांखाली अनेक खटले सुरु आहेत अशा इसमाला नागरिकत्व का दिले असावे?...
१. भारताला आम्ही जुमानत नाही. तसेच आमच्या अरब लॉबी मुळे भारत आमचे काही वाकडे करु शकत नाही असा माज.
२. भारतीय राज्यकर्त्यांकडे कणा नाही याची पूर्ण जाणीव.
३. आम्ही "सर्वच" भारतीयांना कनिष्ठ मानतो. पण काफिरांचा सर्व पातळीवर आपमान करणार्या भारतीय मुसलमानांना अरब देश भारताच्या कायद्यापासून वाचवतील असा संदेश देण्यासाठी.
४. 'भारतात अल्पसंख्यांकांच्या जीवाला धोका आहे' या पाकिस्तानी तसेच तथाकथित मानवतावाद्यांच्या लॉबींगला आकड्यांची मदत करण्यासाठी.
द हिंदूचे संपादक राम यांनी या घटनेवर टिपण्णी करताना असे म्हटले आहे की या महान चित्रकाराला आयुष्याच्या अंतिम कालखंडात मरण्यासाठी सुद्धा भारतात यायला जमत नसल्याने त्यांनी भारताचे नागरिकत्व सोडून कतारचे नागरिकत्व घ्यावे. का?
१. संपादक महोदयांना आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलची वा त्यायोगे भारताच्या होणार्या नाचक्कीची माहिती नसावी.
२. संपादक महाशयांना भारताच्या इभ्रतीपेक्षा आपल्या स्नेह्यावरील खटल्यांची जास्त काळजी असावी.
वा आणखी काही?
अशा प्रकरणांत आपल्या देशाच्या विदेश मंत्रालयाकडून आपण काही अपेक्षा करु शकतो काय?




