राजकारण

गूगल मॅप व गूगल अर्थ मध्ये काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश विवादास्पद

गूगल मॅपवर सहज पहाताना लक्षात आले की काश्मीरचा काही भाग आणि अरुणाचल प्रदेश तुटक रेषेने दाखवले आहेत. दुसरा असा तुटक रेषेचा प्रदेश आहे तो गाझा पट्टीचा. 'गूगल अर्थ'वरपण हे प्रदेश लाल रेघेने दाखवले आहेत. ह्याचा अर्थ होतो काश्मीरचा काही भाग आणि अरुणाचल प्रदेश भारतात नाहीत.
आपण याबाबतीत काय करु शकतो? काय केले पाहिजे. केवळ राज्यकर्त्यांना शिव्याशाप देउन चालेल का?
निदान गूगल कंपनीकडे निषेध नोंदवता येइल का? जाणकारांनी आपले मत मांडावे.

साक्षात परमेश्वरही...

आज इ-सकाळवर खालील बातमी वाचली (संक्षिप्त स्वरूपः)

साक्षात परमेश्वरही या देशाला वाचवू शकत नाही

नवी दिल्ली, ता. ५ - या देशाला आता साक्षात परमेश्वरही वाचवू शकत नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला.
सरकारी निवासस्थानात बेकायदा राहणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यास सरकारने नकार दिल्याने न्यायालय संतप्त झाले आहे. या प्रकरणी कायद्यात दुरुस्ती न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अमरिंदर शरण यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर ""कारकुनाने दिलेल्या मताला आव्हान देण्याचीही धमक या सरकारमध्ये नाही. आम्ही या सरकारला कंटाळलो आहोत'' अशा शब्दांत न्यायमूर्ती बी. एन. आगरवाल व जी. एस. सिंघवी यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ""साक्षात परमेश्वर जरी या देशात अवतरला, तरी तो या देशाला बदलू शकत नाही. आपल्या देशाचे चारित्र्य संपुष्टात आले आहे. आम्ही आता निराश झालो आहोत. ...

...गुन्हे करणाऱ्यांना शासन करण्याची धमक सरकारमध्ये नाही, असेही न्यायालयाने फटकारले.
_________

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींकडून अशा तर्‍हेची भाषा वाचून दुहेरी अस्वस्थता आली. (१) न्याय संस्थापण हतबल झालेली दिसते (२) न्यायसंस्थेकडून असे शब्द वापरले जाणे आणि स्पष्ट ताशेरे दिलेले जाहीरपणे दिसणे....

त्या व्यतिरीक्त ज्या संदर्भात हे वक्तव्य आहे त्या संदर्भात सामान्य माणसाचे काय होते ते पहा...जर एखादा बँकेचा घरासाठीचा हप्ता देण्याचा राहीला तर बॅंका काय करतात/करू शकतात...

'कम्युनल' विरोधाच्या नावाखाली चालणारा संधिसाधुपणा

भारत देशात जरी हिंदु बहुसंख्य असले तरी त्यांच्यासाठी बोलणारा 'कम्युनल' म्हणजे सांप्रदायिक ठरतो.आणि हे ठरवणारे म्हणजे भारतातील बहुतांश धर्मनिरपेक्ष पक्ष आणि धर्मनिरपेक्ष पत्रकारीता.पण जर का याचा नीट अभ्यास केला तर अस दिसुन येत की सांप्रदायिक शक्तींना विरोधाचे कारण पुढे करुन प्सुडोसेक्युलर पक्ष संधिसाधुपणा करतात्.यामधे अनेक उदाहरणे देता येतील्.सध्याचच सगळ्यात गाजणार उदाहरण म्हणजे समाजवादी पक्ष्.

समाजवादी हा मुळात मुस्लिम लोकांमधे प्रसिध्द असलेला पक्ष्.या पक्षातील नेत्यांनी हिंदुंवर कारसेवा करायला गेले म्हणुन गोळ्याही झाडल्या होत्या.मागच्या लोकसभेच्या निवडणुकांपुर्वी 'आम्ही ज्यांना पाठींबा देउ तेच सरकार बनवतील' अशा थाटात यांचे मुलायम सिंग आणि अमर सिंग वावरत होते.पण निकालांनंतर चित्रच पालटल.कधी नव्हे ते कम्युनिस्टांचे ५२ खासदार निवडुन आले आणि त्यांनी काँग्रेसला बिनशर्त पाठींबा दिला.त्यांच्या व इतर युपीए च्या घटक पक्षांच्या आधारे सरकार बनणार हे स्पष्ट झाल्यावर समाजवादीच्या नेत्यांनी केलेल्या वल्गना खोट्या ठरल्या आणि त्यांच्याशिवायच सरकार बनु लागले.मग अमर सिंग तरीही काँग्रेसच्या स्नेहभोजनाला 'बिनबुलाये मेहमान' बनुन गेले.आधीच सरकार येणार हे स्पष्ट झाल्याने सोनिया मॅडम निश्चिंत होत्या त्यांनी सरळ सरळ 'अमर सिंग येथे काय करत आहेत??' म्हणुन त्यांना जवळपास हाकलुन दिले.त्यानंतर अगदी मागच्या वर्षीपर्यंत अमर सिंग 'काँग्रेसनी आमचा कसा अपमान केला' हे सांगत फिरत होते.पण मायावतींनी त्यांचा फडशा पाडल्यावर मात्र त्यांना महत्व मिळत नव्हते.आणि शेवटी अणुकरारावरुन डाव्यांनी सरकारचा पाठींबा काढल्यावर लगेच तेच अमर सिंग सोनिया व इतर काँग्रेस नेत्यांकडे फेर्‍या मारुन भाव खाउ लागले.आणि कारण सांगताना सांगु लागले की 'कम्युनल' पक्षांना सत्तेपासुन दुर ठेवण्यासाठी आम्ही सरकारला पाठींबा देत आहोत्.त्याचबरोबर कम्युनल आडवाणींपेक्षा बुश बरे अशीही टुम सध्या उडवत आहेत्.पण या सर्व निरर्थक गोष्टी आहेत हे तेही जाणतात आणि आपणही जाणतो.मुळात बसपचा 'हत्ती' अडवण्यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे म्हणुन समाजवादीने केलेला हा संधिसाधुपणा आहे.राष्ट्रीय पटलावर आपल महत्व दाखवुन देण्याचा प्रयत्न आहे.यात कम्युनल विरोध कुठेच नाही.मुलायम सिंग युपीच्या निवडणुका हरल्यावर अनेक कार्यक्रमात सांगत फिरत होते की 'राजकारणात कुणीही कायमचा शत्रु अथवा मित्र नसतो'.हे वाक्य सगळ काही सांगुन जात्.म्हणजे वेळ आली तर आम्ही काँग्रेसबरोबरच काय तर भाजपबरोबरही युती करु शकतो असे यात स्पष्ट होते.मग कम्युनल विरोध आलाच कुठुन???

दुसरा संधिसाधु पक्ष म्हणजे करुणानिधींचा द्रविड मुन्नेत कळघम म्हणजे 'द्रमुक'.यांचा संधिसाधुपणा तर फारच स्पष्ट आहे. हिंदुंना 'चोर' म्हणणार्‍या आणि आयुष्यभर हिंदुविरोध करणार्‍या या पक्षाने मागच्या वेळी त्यांच्याच वैचारीक शत्रु असलेल्या भाजपला पाठींबा दिला.आणि गेले ४ वर्ष तेच भाजपाला पाठींबा देणारे करुणानिधी आता म्हणतात की 'भाजपसारख्या सांप्रदायिक पक्षांना दुर ठेवण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र याव्.कम्युनल पार्ट्या हिंदु मुस्लिम एकीसाठी मारक आहेत्'.आता कम्युनलविरोधाचा मुखवटा चढवुन द्रमुक त्यांच्या कट्टर विरोधी असलेल्या काँग्रेसशी युती करुन आहे.भारतीय राजकारणात सर्वाधिक विरोधाभास असलेली ही युती आहे.राजीव गांधीची हत्या करणार्‍या 'एलटीटीइ'ला द्रमुकचा पाठींबा होता आणि अजुनही तो पाठींबा आहे असे म्हणायला वाव आहे.मुळात राजीव गांधी हत्येची चौकशी करणार्‍या जैन आयोगाने 'द्रमुक नेतृत्वावर कायदेशीर आरोप ठेवणे शक्य आहे' असा अहवाल दिल्यानंतर काँग्रेस्-द्रमुक युती व्हायची शक्यताच निर्माण व्हायला नको होती.द्रमुकचा जन्म जिच्यापासुन झाला ती जस्टिस पार्टी काँग्रेसची स्वातंत्र्यलढ्यात कडवी विरोधक होती.काँग्रेस स्वातंत्र्यासाठी चळवळ करत होता तेंव्हा ही पार्टी ब्रिटीशांना समर्थन देत होती,काँग्रेसने सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली देश एकसंध ठेवला होता तेंव्हा द्रमुक 'द्रविडनाडु' या देशाची मागणी धरुन होता,काँग्रेसने हिंदी भाषा राष्ट्रभाषा असावी म्हणुन महात्मा गांधींपासुन तशी भुमिका घेतली होती तेंव्हा कट्टर हिंदीविरोधाचे नेत्रूत्व द्रमुक करत होता,राजीव गांधींनी श्रीलंकेत शांतीसेना पाठवली त्याकाळात तर द्रमुक लंकेतील तामीळींसाठी चिडला होता.इतका प्रचंड विरोधाभास असलेली द्रमुक-काँग्रेस युतीही 'कम्युनल्'ला सत्तेपासुन दुर ठेवण्यासाठी झाली.पण ही करताना (तसे सांगताना तरी),त्याच कम्युनल भाजपबरोबर आपण ५ वर्ष सरकारात राहीलेलो आहोत हे द्रमुक विसरतो.

देवेगौडांचे सेक्युलर जनता दल तर संधिसाधुपणा लपवायचाही प्रयत्न करत नाहीत्.आपण कधी इकडे तर कधी तिकडे अशी सततची पळापळ करुन आपल्याला कुठलीही वैचारीक बैठक नाही हे त्यांचा पक्ष दाखवुन देत असतो.आत्ता परवाच एकाच दिवशी युपीए बरोबर आणि युपीए विरोध्यांबरोबर देवेगौडा दिसले होते.यांनी काँग्रेसबरोबर युती करुन धरम सिंग यांचे सरकार कर्नाटकात आणले आणि मग लगेच ते पाडुन भाजपाबरोबर सरकार आणले.त्यांचा मुलगा २० महीने मुख्यमंत्री आणि पुढचे २० महीने भाजपचा मुख्यमंत्री असेल असे ठरले.पण स्वतःचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाल संपल्यावर कारभार भाजपकडे सोपवण्यास गौडांनी नकार दिला मग परत काँग्रेसबरोबर जायचा प्रयत्न केला आणि ते जमत नाही म्हणुन परत भाजपला पाठींबा दिला आणि ७ दिवसात तो काढुनही घेतला.हे सगळ करत असताना आपला संधिसाधुपणा उघडा पडतोय याचीही त्यांना चिंता नव्हती.मग देवेगौडांनी मुलाचा निर्णय होता असे म्हणुन सारवासारव केली. हे सर्व होतानाच आपल्या पक्षाचे नाव सेक्युलर आहे म्हणुन कम्युनल राजकारणाचा विरोधही ते अधुनमधुन करतात्.पण काहीच दिवसात परत ते भाजपबरोबर युती होउ शकते असेही सांगतात. आत्ताच काही दिवसांपुर्वी 'केंद्रात भाजपबरोबर युती होउ शकते' असेही त्यांनी स्पष्ट केले आणि हे केल्यानंतर काहीच दिवसात दिल्लीचे वारे पलटले आणि त्यात आपणही बातम्यांमधे याव म्हणुन धर्मनिरपेक्षांचा पंगतीत जाउन देवेगौडा परत बसले आहेत.

या सर्वांपेक्षा मायावतींची बहुजन समाज पार्टी तरी बरी.कारण ते सरळ सरळ हे मान्य करतात की 'आम्ही संधिसाधु आहोत.फायद्यासाठी आम्ही कुणाबरोबरही जाउ'.संसदेत एकदा कांशीराम म्हणाले होते की 'आम्ही संधिसाधु आहोत असे तुम्हीच म्हणता आणि वरुन आम्ही भाजपबरोबर गेलो म्हणुन टिकाही करता.मग तुम्हीच सांगा की आम्ही कुणाबरोबर जाव की ज्यामुळे आमचा फायदा होईल?'.जुन्या काळी मनुवादी म्हणुन ,कम्युनल म्हणुन ज्यांच्यावर टिका बसपने केली,त्यांच्याच बरोबर बसपने अनेकदा युतीही केली.सध्या पक्ष देशभरात वाढवण्यासाठी मायावती प्रयत्न करत आहेत्.ते करण्यासाठी वेळ पडल्यास 'कम्युनल' पक्षांशी युती करतील आणि वेळ पडल्यास त्यांना 'कम्युनल' आहेत म्हणुन विरोधही करतील्.बाकी युपीए सरकारला बाहेरुन पाठींबा देताना उत्तर प्रदेशच्या विकासाबरोबर जातीयवाद्यांना विरोध हाही मुद्दा होताच की!सध्या मायावती देशात युपिबाहेर सगळीकडे स्वतःचे उमेदवार उभ्या करत आहेत आणि याचा फायदा अप्रत्यक्षपणे भाजपाला होतोय.कारण त्या काँग्रेसचा मतदार स्वतःकडे खेचत आहेत.गुजरातमधे १५-१६ काँग्रेसचे मतदार त्यांनी घरी बसवले तर कर्नाटकात १०-११ काँग्रेसचे उमेदवार त्यांच्यामुळे हरले.अनेकदा भाजपबरोबर युती करणार्‍या आणि नरेंद्र मोदींसारख्या कट्टर हिंदुत्ववाद्याच्या प्रचारासाठी सभा घेणार्‍या मायावती राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेस उमेदवाराला पाठींबा देताना म्हणाल्या की 'भाजपला पाठींबा देण्याचा प्रश्नच येत नाही कारण ते कम्युनल आहेत.कम्युनल पक्षांना कुठल्याही प्रकारे मदत व्हायला नको म्हणुन बसपने नेहमीच लढा दिलेला आहे'.असे असले तरी त्यांनी संधिसाधुपणा मान्य केलाय हे तरी ठिक आहे.

बाकी एका दृष्टीने राष्ट्रवादीवरही हा आरोप ठेवला जाउ शकतो.कारण सोनियांच्या परदेशी मुळाचा मुद्दा घेउन राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर काहीच महीन्यात महाराष्ट्रात त्यांनी काँग्रेसशी युती केली आणि सरकार बनवले.ते करताना 'राष्ट्रिय स्तरावर हे होणार नाही 'हे सांगितले आणि मग हळुहळु पवार भाजपकडे झुकु लागले.वाजपेयींचा उघड गौरव करु लागले.मग काही जागांवरुन बोलणी फिस्कटल्यावर पवारांनी सोनियांच्या काँग्रेसबरोबर लोकसभेसाठी निवडणुकपुर्व युती केली.मग त्यांच्या सरकारातही ते सामील झाले.'सोनिया पंतप्रधान आमच्याशिवायच होतील म्हणुन आम्ही त्यांना पाठींबा देतो' असे पवारांनी सांगितले.आणि हे केल्यानंतर सोनियांनी पंतप्रधानपद नाकारले.त्यानंतर काहीच महीन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत्या.त्यात शरद पवारांनी असेही सांगितले की 'सोनिया पंतप्रधान होणार नाहीत हे स्पष्ट झाल्यावर कृषीमंत्रीपद स्विकारले'.पण हे करत असताना 'डबल कम्युनल' शिवसेनेशी ते संबंध ठेवुन आहेत्.पुण्यात त्यांची सेनेशी युतीही आहे.

याप्रमाणे प्सुडोसेक्युलर कम्युनलच्या नावाखाली संधिसाधुपणा करतात्.तर या कम्युनल पक्षांचा इतका खरच दोष आहे का???आणि खरच हे पक्ष कम्युनल आहेत का हा प्रश्न कोणीच विचारत नाही.महाराष्ट्रात तर सेना-युती शासनाच्या वेळी सांप्रदायीक दंगे जवळपास झालेच नव्हते.नरेंद्र मोदींना धर्मनिरपेक्ष लोक शिव्या देत असतात पण १९६९ साली गुजरातमधे २००२ सालपेक्षा कितीतरी मोठी दंगल उसळली होती हे विसरतात्.अनेक दंगली धर्मनिरपेक्ष सत्तेवर असताना झाल्या आहेत तरीही शिवसेना-भाजप सारखे पक्ष सत्तेत आल्यास अराजक माजेल असे एक चित्र निर्माण केले जाते जे साफ चुकीचे आहे.मुळात हिंदुंवरील अन्याय आणि हेटाळणी बंद केली तर आपोआपच या पक्षांचा जनाधार कमी होईल्.पण हे लक्षात न घेता धर्मनिरपेक्ष पक्ष सत्तेत येताच हिंदुविरोध सुरु करतात्.रामसेतुचा मुद्दाही त्यातलाच्. भाजप्-शिवसेना या पक्षांना कम्युनल म्हणने कितपत बरोबर आहे हाही एक मुद्दा आहेच्.धर्मांध मुस्लिम देशविरोधी कारवाया करु शकतो म्हणुन त्यांच्या धर्मांधतेला आळा घालण्याची मागणी कम्युनल कशी ठरते??एका दृष्टीने बघितल्यास कम्युनला शक्तींना सत्तेपासुन दुर ठेवण्याच्या नावाखाली प्सुडोसेक्युलर संधिसाधुपणा करतात्.त्यामानाने शिवसेना-भाजप युती गेले २० वर्ष एका मुद्द्याच्या जोरावर टिकुन आहे.अनेकदा त्यांच्यातले संबंध ताणले गेले पण सत्तेसाठी संधिसाधुपणा करण्यासाठी त्यांनी त्यांच्या तत्वांशी तडजोड टाळली आहे.

मोरारजी आणि जेठमलानी

राजकारण म्हणजे विरोधाभासाचं आगार....
त्यातही दिल्लीतलं राजकारण म्हणजे महाभयंकर...
ही राजकारणीमंडळी एकमेकांवर सदैव कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतात. या नादात तत्वांना कधी तिलांजली दिली जाते, द्यावी लागते हे त्यांनाही कळत नाही. अर्थात, हे आपल्यालाही जाणवते. पण कधीतरी या तत्वच्युतीला आदर्शवादाचं समर्थन घेण्याचा प्रयत्न केला जातो. या साऱ्या प्रकारांना वेगळ्या चष्म्यातून पाहिलं कधी कधी विनोदी चित्र पाहावयास मिळतं.

त्यामुळे बाबूंच्या सरकारीपणाचे किस्से आपल्याला प्रत्यक्ष दिसतात. पण राजकारणीमंडळींचे किस्से कळायला चांगलं माध्यम लागतं. त्याशिवाय ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे ते समजण्यासाठी पत्रकारितेपेक्षा उत्तम माध्यम नक्कीच नाही. या माध्यमातूनच एक किस्सा या अस्सल राजकारणी शहरात कळाला. तोही नेहमीच वादग्रस्त राहिलेले हुशार वकील, विधिज्ञ राम जेठमलानी यांच्या तोंडून.

जेठमलानी यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. मुद्दाम प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा प्रयत्न करून चर्चेच्या केंद्रस्थानी राहण्याची धडपड करणारा हा बेधडक माणूस. प्रत्यक्ष गप्पांमध्ये ते अमळ अघळपघळ जाणवले. (कदाचित पत्रकारांशी बोलायचे म्हणूनही असेल.)

दुपारी तीनची वेळ होती. अकबर रोडवरील बंगल्यावर बोलावून त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. नेहमीप्रमाणे काही खायला देण्याचा जगन्मान्य असलेला शिरस्ता त्यांनीही पाळला. समोसे आणि कोल्ड्रिंक्‍स होते. बोलणे आटोपल्यानंतर त्यांनी खाण्याचा आग्रह धरला.
कोल्ड्रिंक वर त्यांची कोटी भन्नाटच होती.
जेठमलानी म्हणाले, ""अहो, दुपारीच वेळ आहे म्हणून हे कोल्ड्रिंक. नाही तर "वेगळ्याच ड्रिंक'ची व्यवस्था केली असती.''
हा ओला विषया निघाल्यामुळे ते एकदमच मोरारजी देसाईंच्या काळात गेले.

जेठमलानींच्या मते मोरारजीभाई म्हणजे स्वतःच एक संस्था होते. मद्यपानाला नव्हे तर मद्यनिर्मितीलाही त्यांचा कट्टर विरोध सर्वश्रृत होता. 1978 की 79 (वर्ष नक्की आठवत नाही.) त्यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचे सरकार अंतिम घटका मोजत होते. मोरारजीभाईंसोबत असलेली सर्व मंडळी त्यांच्या विरोधात गेली होती. लोकसभेतही त्यांनी मोराराजींच्या विरोधातच मतदान केले. जेठमलानी मात्र त्यांच्या बाजूने होते.
पराभवामुळे प्रचंड चिडलेल्या मोरारजीभाईंना जेठमलानी भेटले. म्हणाले, ""बघा, तुम्ही दारूचे कट्टर विरोधक. पण, तुमच्या सारखेच दारूचे कट्टर विरोधक तुमच्याही विरोधात गेले. माझ्यासारखा मदिराभक्त मात्र तुमच्या बाजुला आहे.'' त्यावर मोरारजी देसाई हसले.

त्यांचा राग जॉर्ज फर्नांडीस यांच्यावर होता. त्यामुळे ते म्हणाले, "" अहो, त्या बदमाश माणसाने (जॉर्ज) साथ देण्याचे सांगत अगदी शेवटच्या क्षणी दगा दिला.'' त्यावर जेठमलानींच्या उत्तराला मात्र त्यांनी खळाळून दाद दिली.

जेठमलानींचे उत्तर होते, ""अहो, तुम्ही जे रोज घेतात (शिवाम्बू) तेच जॉर्जसुद्धा घेतात.''
----------------------------------------------------
दुसराही एक किस्सा त्यांनी ऐकवला.
मोरारजीभाईंनी दारूबंदी सर्वत्र लागू करावी, यावर विचारविनीमय करत होते. त्यावर जेठमलानी त्यांना म्हणाले, की मला माफक मद्यपान आवडते. मात्र तुम्ही त्यावर बंदी आणणार असाल, तर मला माझे व्यक्तिस्वातंत्र्य (पिण्याचे) टिकविण्यासाठी तरी त्याचे प्रमाण वाढवावे लागेल.
--------------------------------------------

हे किस्से कदाचित कुठे लिहिलेही गेले असतील किंवा कोणी वाचलेही असतील. कदाचित नसेलही. मला तो प्रत्यक्ष ऐकल्यामुळे सर्वांसोबत शेअर करावासा वाटत असल्याने खास आपल्यासाठी..........

सट्टाशाही

सध्या भारतात विश्वासदर्शक ठरावाच्या नावाखाली जे काही चालले आहे ते पहाता आपली सर्वात मोठी "सट्टाशाही" आहे असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. खालील बातम्या वाचताना अथवा जे काही चालले आहे ते पहाताना आपल्याला काय वाटते? परिस्थिती बदलता येईल का हे असेच चालणार म्हणत गप्प बसण्याला पर्याय नाही? सामान्य माणसाला यात काय करता येईल - एकट्याने अथवा एकत्रीत?

संदर्भः महाराष्ट्र टाइम्स

युपीए सत्तेवर राहील म्हणून ० . ३८ पैसे तर युपीए सत्तेवर राहणार नाही यासाठी २.९० पैसे असा भाव सध्या बाजारात सुरू आहे. याव्यतिरिक्त २७२ मतांसाठी ०.३८ पैसे , २७३ मतांसाठी ० . ५० पैसे , २७४ मतांसाठी ० . ८० पैसे भाव सुरू आहे.

सरकार जिंकलं तर या एक रुपयाला वर दिलेल्या किंमतीनुसार भाव मिळेल. पण सरकार पडलं तर बुकींना प्रत्येक रुपयावर दोन रुपये मोजावे लागतील. दिवसेंवदिवस सट्टा बाजार गरम होत चालला आहे. आत्तापर्यंत सट्टाबाजारात ८५० कोटी लावण्यात आले आहेत. बुकिंच्या म्हणण्यानुसार २२ जुलैपर्यंत हा आकडा ३ हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल.

  1. रेंगे-पाटीलांना उचललं कुणी?
  2. स्पीकरपद न सोडल्याने सोमनाथदांवर लाल खफा

इत्यादी...

मिपा संपादकीय...! जाहीर आवाहन..

सर्व मायबाप मिपाकरांना माझा दंडवत...!

राम राम मंडळी,

मिपा हे एक साप्तहिक आहे किंवा पाक्षिक आहे असे मानून 'मिपा संपादकीय...' हे एक सदर दर आठवड्याला किंवा पंधरवड्याला सुरू करावे असे मनात आहे. आपल्याकडे सामाजिक, राजकीय भान असणारे, वाचन असणारे, उत्तम विचार असणारे बरेच जण आहेत. या मंडळींचे वृतपत्रीय/आंतरजालीय वाचनही चौरस असते असे माझ्या निदर्शनास आले आहे. या मंडळींनी 'मिपा संपादकीय' या सदरात दर सप्ताहात/पाक्षिकात एक अग्रलेख लिहावा असे वाटते. हा अग्रलेख बहुतकरून भारतातील किंवा भारताबहेरील राजकीय, सामाजिक विषयांवर, ताज्या घडामोडींवरच असेल. त्यातली मते अर्थातच संपूर्णपणे त्या संपादकाचीच असतील. वर म्हटल्याप्रमाणे हा अग्रलेख भारतातील अथवा भारताबाहेरील सामजिक अथव राजकीय विषयावर, ताज्या घडामोडींवर भाष्य करणारा असेल. प्रसंगानुरूप किंवा क्वचित प्रसंगी अर्थ, क्रीडा किंवा अन्य एखाद्या विशेष गाजत असलेल्या विषयावरही असेल.

मला खात्री आहे, दर सप्ताहाअंती किंवा पंधरवड्याअंती (जसे ठरेल तसे),

'या वेळी पाहुणा संपादक कोण आहे बरं? बघुया तरी त्याचा अग्रलेख वाचून!' अशी उत्सुकता तुम्हाआम्हा सर्व मिपाकरांना नक्कीच असेल अशी मला खात्री आहे. खूप मज येईल. काही चांगले वाचायला मिळेल! Smile

अर्थातच, दरवेळी संपादक बदलेल. म्हणजेच दरवेळी अग्रलेख लिहिणारी व्यक्ति ही त्या आठवड्यापुरती/पंधरवड्यापुरती मिपाची 'पाहुणा संपादक' असेल! Smile

अनवधानाने काही नांवे राहू शकतात परंतु,

चरुरंग, प्रियाली, चित्रा, मुक्तसुनीत, विकास, धनंजय, डॉ बिरुटे, देवकाका, विजूभाऊ, कोलबेर, नीलकांत, प्रकाश घाटपांडे, पिवळा डांबिस, इत्यादी...

या माझ्या मित्रमंडळींकडून मला खूप अपेक्षा आहेत. ताज्या सामाजिक व राजकीय विषयांवर याचं खूप चांगलं वाचन-चिंतन-मनन आहे असे माझे निरिक्षण आहे आणि म्हणूनच मी मुद्दामून या मंडळींची नांवे उद्घृत केली आहेत! यापैकी कुणालाही याबाबत व्यक्तिश: न लिहिता मी हा प्रस्ताव जाहीरपणे मांडत आहे. वरील नांवे आत्ता चटकन आठवली म्हणून मी लिहिली आहेत परंतु या मंडळींव्यतिरिक्तही जर कुणी एका सप्ताहाकरता अथवा पंधरवड्याकरता मिपाचा 'पाहुणा संपादक' होऊन छानसा अग्रलेख लिहायला तयार असेल तर त्याचेही स्वागतच आहे.

असो...

तर मंडळी, या प्रस्तावामागे मिपाकरता काहीतरी चांगलं करायचं मनात आहे, मिपा अधिकाधिक सर्वांगसुंदर बनवण्याचा विचार आहे. परंतु, हे काम अर्थातच माझ्या एकट्याचे नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. मी व्यक्तिश: व्यक्तिचित्र, खादाडी, संगीत, टवाळक्या, माफक इष्कबाजी या विषयात रंगणारा मनुष्य आहे. माझ्या सामाजिक व राजकीय जाणिवा अग्रलेख लिहिण्याइतक्या समृद्ध नाहीत. तरीदेखील दर आठवड्याला किंवा पंधरवड्याला एखाद्या पाहुणा संपादकाने छानसा अग्रलेख लिहून मिपा या संकेतस्थळाचे सौंदर्य वाढवावे असे मनापासून वाटते म्हणूनच हा चर्चाप्रस्ताव!

बोला, करणार का मला या कामात मदत? स्वत:हून आळीपाळीने घेणार का अग्रलेख लिहिणार्‍या पाहुण्या संपादकाची जबाबदारी?

ज्या मंडळींची नांवे मी उद्घृत केली आहेत त्यांच्याकडून मला खूप अपेक्षा आहेत हे इथे खुल्या दिलाने नमूद करतो....

आपला,
(काही एक चांगलं काम करू पाहणारा) तात्या.

--
Not failure, but low aim is a crime..! Smile

आणिबाणी

२५ जून १९७५ ला पंतप्रधान इंदीरा गांधी आणि केंद्रीय मंत्रीमंडळाच्या शिफारशीनुसार तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी देशांतर्गत आणिबाणी घोषित केली आणि कधी नव्हे ते प्रथमच स्वतंत्र भारताच्या इतिहासात औपचारीकरीत्या हुकूमशाही अस्तित्वात आली. त्यावेळचे अनेक किस्से खूप लहान असून देखील आठवतात - व्यक्तिगत म्हणाल तर अचानक शाळेत कुठलीतरी गाणी म्हणायची सुरवात झाली (सक्ती झाली असावी पण कळले नाही). त्या व्यतिरीक्त काहीच समजले नाही. पण एक दिवस दुर्गा भागवत आणि पुल देशपांडे हे आणिबाणीविरुद्ध कडाडल्याचे समजले. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण (त्यांना हेडमास्टर म्हणायचे) यांनी पुलंना विदूषक म्हणून हिणावले. तेव्हढ्यात जेपींबद्द्लच्या बातम्या ऐकू येऊ लागल्या मग अचानक निवडणूका जाहीर झाल्या आणि ठाण्यात अनेक सभा होऊ लागल्या. त्या सभांना लहान असून देखील घरच्यांबरोबर हजेरी लावलेली आठवते - ठळकपणे आठवतात त्या मॄणाल गोरे, सुब्रम्हण्यम स्वामी आणि जॉर्ज फर्नांडीस यांच्या सभा. त्यात सांगीतले गेलेले अत्याचार आणि दिसला कुठेतरी त्याविरुद्ध किमान मताच्या बळावर उभा राहीलेला सामान्य माणूस.

बघता बघता "गाय वासरू नका विसरू" म्हणणारी काँग्रेस काही काळ पडद्याआड गेली. अनेक ठिकाणी दिग्गज पडले त्यात राजनारायण समोर इंदिरा गांधी पडल्या तर संजय गांधी आणि चांडाळ चौकडी पण काही काळ नामशेष झाली... अर्थात दैव देते आणि कर्म नेते या उक्तिप्रमाणे जनता पार्टी आणि त्यातील सभासद उपपक्षांना लोकशाहीतील सत्ता झेपली नाही आणि बघता बघता खेळ खल्लास झाला!

नंतर परत आणिबाणी आली नाही आणि कुठेतरी दिसलेले सामान्यांचे बळ पण परत दिसले नाही. परीणामी राजकारण खराब होत गेले आणि सत्ताधारी बदलले तरी "लहरी राजा, प्रजा आंधळी.." सारखा प्रकार कायम राहीला... एकीकडे पंजाब, एलटीटीइ , काश्मिर दहशतवाद तर दुसरीकडे इंदीरा गांधी, राजीव गांधी, यांच्या हत्येचे धक्के पचवले, नाणेनिधीचे संकट दूर केले, उपग्रह उडवले आणि अणूबाँब उडवले पण सामाजीक विषमता आणि समस्या या कमी होण्या ऐवजी लोकसंख्येच्या पटीत वाढण्याऐवजी त्याहून अधीक जोरात वाढत असल्यासारखे वाटत आहे...

थोडक्यात तत्कालीन आणिबाणी ही एका नेतॄत्वाला सत्ता टिकवण्यासाठी जाहीर करावी लागली. पण आज देश टिकवणे अथवा बळकट करण्यासाठी लागणारा सामाजीक क्षमतेचा किमान वरकरणी दिसणारा अभाव पाहीला तर आजची परीस्थिती ही खरी आणिबाणीची वाटते, असे म्हणले तर ते १००% बरोबर ठरणार नाही (निदान तशी आशा करतो) पण १००% चूक पण नाही अशी भिती वाटल्यास ती खोटी आहे का?

सैतानाची बाळे

स्थळ : - सैतानाची कंट्रोलरुम.
एका भव्य ,गोलाकार ,सुसज्ज ,बंदिस्त जागेमधे सैतानाची बाळे गोलाकार बसली आहेत. प्रत्येकाच्या समोर एक संगणकाचा पडदा. प्रत्येक बाळ आपल्याला नेमून दिलेले काम अतिशय आनंदाने चित्कारत करत आहे. सैतानाची फेरी दिवसातून एकदाच होत असते. काम व्यवस्थित चालले असेल तर न बोलताच, पण एका विलक्षण जरबेच्या वातावरणात ती पार पडते. प्रत्येकाच्या वाट्याला (वाट लावायला) एकेक देश दिलेला आहे. पृथ्वीवर काही बाळे 'सिव्हिलायझेशन्स्' वा तत्सम नांवाचे गेम्स् खेळतात तसेच. पण फरक इतकाच की हे खोटे नसतात. त्या त्या देशांत, प्रत्येक खेळी प्रत्यक्षांत येत असते. दर वर्षी 'देश' बदलून मिळतो. तशी सगळ्याच खेळांत मजा येते. पण 'भारत' हा देश कधी हातांत येईल याची सगळे आतुरतेने वाट पहातात. कारण तिथल्या 'लोड' केलेल्या खेळांत जे वैविध्य आहे ते इतर कुठेच नाही यावर सर्व बाळांचे एकमत आहे. काम चालू असताना हळु आवाजांत एकमेकांशी बोलण्याची मुभा आहे. तिथे चाललेले हे कांही 'संवाद'!

बाळ १ : काय रे इतका कसला आनंद झालाय् ?, फारच आरोळ्या ठोकतो आहेस मगापासून .
बाळ २ : अरे या भारतावर खेळायला फारच मजा येतीये रे! मला तर एक कधी न संपणारा खेळ मिळाला आहे.
बाळ १ : कुठला रे ?
बाळ २ : हे बघ, आपल्या पूर्वजांच्या वेळी एवढी प्रगती झाली नव्हती. इथे बसून असं कांही करता यायचं नाही. तिथे जाऊन काम करावं लागायचं. वेळ बराच जायचा. त्यांत तेंव्हा तिथे 'देवाची माणसं फार होती, त्यामुळे सगळ्यांची मनं काबीज नाही करता यायची. हिंसाचार, दंगली चालू केल्या तरी फार काळ टिकवता यायच्या नाहीत. ती दुष्ट देवाची माणसं आपला खेळ बंद पाडायची. आता कित्ती सोपं झालंय, इथे बसून या कठपुतळ्या हलवता येतात आणि त्यांची मनं काबीज करणं किती सोप्पं झालाय्!
बाळ १ : पण ते सगळीकडेच करता येताय्, बघ नं, मला अमेरिकेत पण खूप मजा येतीये.
बाळ २ : अरे, मला तर एक न संपणारी ' गोष्टच मिळालीये! तिथे आता माणसांची इतकी गर्दी झालीये की त्या रिकामटेकड्यांच्या धार्मिक, प्रादेशिक भावनांना हात घालणं आगदीच सोपं झालाय्.
बाळ १ : ते कसं ?
बाळ २ : हे बघ, मी तो जुना दोन धर्मांचा खेळ खेळून बोअर झालो होतो, त्यापेक्षा हा नवीन जातींवरचा खेळ फारच छान आहे. एका वेळेला एका जातीला पेटवायचं, नुसतं त्यांच्या नेत्यावर 'टिचकी' मारली की ती सगळी 'कौम' स्वयंचलित' होते. मग ते आपोआप रेल्वेचे रुळ उखडतात, तोडफोड करतात, नंग्या तलवारी घेऊन फिरतात. साहेबांना मानायला पाहिजे हं, काय जबरदस्त रचलाय हा खेळ त्यांनी, आपलं कसब दाखवायला भरपूर वाव आहे. शिवाय वैविध्य किती! एका जातीला महिनाभर खेळवलं की दुसरी! महिने बारा पण जाती अगणित.
बाळ १ : पण काय रे, ते सरकारी लोक काय नुसते बघत रहातात? त्यांत पण 'देवाची माणसं असतीलच की.
बाळ २ : छे रे, तोच तर हल्ली आपल्या साहेबांना फायदा आहे. तिथे पण सगळी आपलीच 'प्यादी' आहेत, ती आपल्या साहेबांशी एकनिष्ठ आहेत. आणि त्यातून त्यांनी कांही उपाय केले की आपण इकडे नवीन 'कौम' वर टिचकी मारायची.
बाळ १ : पण तरी देवाची खूप माणसं खाली आहेत ना ?
बाळ २ : हो, पण ती आता फारसं काही करु शकत नाहीत. ती कधी ही सत्तेवर येणार नाहीत याची तजवीज आपल्या साहेबांनी आधीच करुन ठेवलीये.
बाळ १ : अरे वा, मग आपला विजय आणि देवांचा दणदणीत पराभव आता नक्कीच की!
बाळ ३ : ए, गपा रे, मला या 'पाकिस्तानात' पण तेवढीच मजा येतीये.
बाळ ४ : हं, बघू या , यावर्षीचा 'महाविध्वंसक' चा कप कोणाला मिळतोय ते !
बाळ ५ : शू s s s s, शांतता , सैतानसाहेब येताहेत !!!

**** इंडीया-दी वन नेशन आणि धार्मीक, जातीय व प्रादेशिक अस्मिता ****

गेले काही दिवस मी अविनाश धर्माधिकारींचे "अस्वस्थ दशकाची डायरी" नावाचे एक अतिशय जबरदस्त पुस्तक वाचत होतो. आज ते पुस्तक संपुर्णपणे वाचुन, समजून व पचवून पुर्ण झाले. साधरणता १९८० ते १९९० च्या दशकातल्या देशाच्या सुरक्षेला धोकादायक घटना, सामाजीक आंदोलने, राजकीय उलथापालथ व या सर्वात सामान्य माणसाचा सहभाग ह्या सर्व बाबींचा अभ्यास धर्माधिकारींनी आपल्या नजरेतुन व जवळपास स्वत: त्या घटना जवळून पाहून अतिशय समर्पक पद्धतीने केला आहे. ह्या पुस्तकातला एक मुद्दा म्हणजे "भारत हे एक राष्ट्र आहे का ?" हा मुद्दा फ़ारच मनाला भिडला. आता तसे पहायला गेलो तर त्यांनी लिहलेले त्या "काळाला" सुसंगत असे होते पण आज घडणार्य्या विविध घटना पाहिल्या तर तो प्रश्न आज पण निर्माण होऊ शकतो असे मला काही क्षण वाटले. त्यातच "प्रादेशिक अस्मितेतुन" सुरु झालेली आंदोलने हा याचा उगम होऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही.
१५ ऒगस्ट १९४७ साली मध्यरात्री १२ वाजता निम्मे जग झोपले असताना पंडीत नेहरुंनी "नियतीशी एक वायदा" केला होता तो म्हणजे " भारत हे अख्ख्या जगाला हेवा वाटेल असे एक महान राष्ट्र " बनवण्याचा. त्यासाठी त्यांच्यापासुन ते आत्तापर्यंत सत्ताधार्‍यांनी सच्च्या मनाने प्रयत्न केले असे जरी मानले तरी आजची परिस्थीती काही तरी वेगळेच सांगते आहे. मुळात एक लहान खंडा एवढा असणारा भारत हे "एक राष्ट्र" असणे ही संकल्पनाच अदभूत आहे. काश्मीरपासून कन्याकुमारी व गुजरातपासून ते ईशान्यपुर्व मिझोरम, नागालॆंड पर्यंत पसरलेला, एकंदरीत २८ सरकारमान्य भाषा व अनऑफ़ीशीयली १६०० भाषा बोलणारा, हवामानात प्रचंड विवीधता असणारा व प्रचंड सास्कॄतीक व वैचारीक विविधता असलेला भारत हे गेल्या "६० वर्षे एक राष्ट्र" म्हणून टिकून आहे हेच एक आश्चर्य मानायला हरकत नाही. भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा "ह्या राष्ट्राचा डोलारा" किती काळ टिकेल ह्याबद्दल अनेकांना शंका होती व ती भारतीय जनतेने खोटी करुन दाखवली हे भारतीय "एकात्मिकेचे" यश मानायला हरकत नाही. स्वातंत्र्याच्या वेळी जीन दिकसनने भविष्य सांगितले "भारताचे विभाजन लवकरच अनेक राज्यात होईल व भारताचे अनेक तुकडे होतील". हेंन्री किसींजर म्हणाले " सध्या भारतात राहणाया पण मनात फ़ुटीर प्रवॄत्ती ह्या देशाचे विभाजन करतील". त्यानंतर खरोखरच भारताला ह्या कसोटीला सामोरे जावे लागले. सर्वात आधी सरदार पटेलांनी "संस्थान विलीनीकरण" राबवून, १९४८ च्या रणात भारतीय सेनेने काश्मीर वाचवून व १९६२ च्या युद्धानंतर लालबहादुर शास्त्रींनी आपल्या प्राणाचे बलिदान करुन व इंदीरा गांधींनी काही कठोर निर्णय घेऊन व प्रसंगी आपल्या प्राणाचे बलिदान करुन ह्या देशाला " वन नेशन" म्हणून टिकवण्यात अनमोल योगदान दिले व भारत हा " वन नेशन " च राहिला . ह्यामागचे कारण म्हणजे ही सर्व आक्रमणे ही "परकीय" होती व भारताने त्याचा मुकाबला ह्या " वन नेशन" ने केला. पण आज आपल्याला ह्या "परकीय शक्तींची" जास्त भीती राहिली नाही अथवा फ़ारफ़ार तर जास्त काळजी करायची गरज नाही कारण "हा देश" त्यासाठी समर्थ आहे. सध्या देशासमोर मुख्य प्रश्न आहे तो नविनच उभ्या राहिलेल्या "प्रादेशिक अस्मिता , जातीय अस्मिता " ह्यासारख्या गोष्टींनी घेतली व परिस्थीती चिघळायला सुरवात झाली आहे.
आता मुळापासून अभ्यास करायचा म्हणजे बाहेरच्या शक्तींशी लढून त्यांचा यथायोग्य बंदोबस्त केल्यानंतर केल्यानंतर आपल्याला "सत्तेची पोळी भाजण्यासाठी" मुद्दे न राहिल्याने देशातील काही स्वार्थी राजकीय नेतॄत्वाने येथील काही "जातीय व धार्मीक असंतोषी" शक्तींना हाती धरुन एका नव्याच "वादाची " मुहुर्तमेढ रोवली व वेळोवेळी आपल्या "सत्तेची पोळी" भाजली. ह्या देशाची प्रमुख समस्या ही काही काळ "धार्मीक अस्मिता" ही होती. मग ती "हिंदु - मुस्लीम असो वा हिंदु - ख्रिश्चन वाद" ही असो पण ह्यामुळे ह्या देशाची एकात्मिका काही काळ धोक्यात आणली. मग हे हिंदुंचे "रामजन्मभुमी मुक्ती, रथयात्रा " आंदोलन असो वा मुस्लीमांचे "बाबरी मशीद , शहाबानो प्रकरण, समान नागरी कायदा, अल्पसंख्यक वर्गाला मिळणारे फ़ायदे असो वा शिखांचे स्वतंत्र खलिस्तान आंदोलन व त्यातुन झालेले ऒपरेशन "ब्यु स्टार" असो वा ख्रिश्चन मिशनयांची दुर्गम भागात चालणारी "धर्मांतर मोहीम" व त्याला विरोध म्हणून पडलेले काही मिशनयांचे खुन व त्यातुन निर्माण झालेली राजकीय महत्वकांक्षा असो ह्यातुन ह्या " वन नेशन" मधील जनता एकमेकांसमोर " शस्त्रे घेऊन" उभी ठाकली. ह्यामुळे भारतीय "एकात्मिकेला धोका" पोहचला. पण काहीश्या समंजस व हुशार नेतूत्वाने ह्या देशाचे तुकडे पडायची वेळ येऊ दिली नाही व ह्या सर्व घटनातुन तावून-सुलाखवून भारत राष्ट्र हे "वन नेशन" राहिले. ह्या प्रकारातील निरर्थकता लक्षात आल्यामुळे कदाचित सामन्य जनता ह्या प्रकारापासून दुर राहिल्याने आता काहिसे हे प्रश्न मिटले आहेत व त्यातुन "देश तुटण्याचा" धोका टळला आहे. आज शक्यतो सामान्य जनता अशा "धार्मीक समाजकंटकांना" आश्रय देईनाशी झाल्याने आपण समाधान मानायला हरकत नाही.
त्यानंतर काळ आला तो "जातीय आधारावर मांडल्या गेलेल्या असंतोषाचा", काही नेत्यांनी "जातीय आधारावर आरक्षण" ही कल्पना मांडून व ती राबवून आज पुन्हा देशाला यादवीच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. प्रारंभीच्या काळातील "मंडल आयोग" व त्यांनंतर झालेले दंगे, सध्या राबवू पहात असलेल्या "ओबीसी आरक्षणाची कल्पना" व त्यासाठी चालू असलेली लढाई व त्यातुन आज उभे राहिलेले " गुज्जर समाजाच्या हिंसक आंदोलन" व त्यासाठी त्यांनी वेठीस धरलेली सामान्य जनता ह्या काळजी करण्यासारख्या गोष्टी आहेत. त्याचा योग्य वेळी बिमोड केला नाही तर परिस्थीती चिघळायस वेळ लागणार नाही. सध्या "विमुक्त जाती व जमातींना" ऒलरेडी आरक्षण आहेच व आता "ओबीसी समाजाचा" प्रश्न जळता निखारा आहे व ह्यांच्या यशस्वी परिणांमांमुळे सध्या पुढारलेल्या मानल्या जाणार व उच्चवर्णीय वर्गाने म्हणजे ब्राम्हणांनी, मराठ्यांनी, ठाकुरांनी, पटेलांनी उद्या त्यांच्यासाठी "आरक्षणाची" मागणी केली तर आश्चर्य वाटायला नको. आज हे सर्व चलती नाणी आहेत हे पाहून "धार्मीक आरक्षणची" मागणी पुढे आली व ते लागू झाले तर आश्चर्यचकीत होऊ नका. सध्याच्या सरकारने आणलेला "सच्चर आयोग" ही त्याचीच नांदी आहे. ह्या सर्वांचा प्रमुख दुष्परिणाम असा की देशाच्या कल्याणासाठी एकत्र झटणाया सामान्य जनतेत ह्यामुळे एक "दुही" निर्माण होत आहे, त्यांची मने दुर जात आहेत, काही ठराविक वर्गाला चुचकारले जात आहे व काहींना उपेक्षीत ठेवले जात आहे हे भावना निर्माण होत आहे. थोडक्यात आधी "एक" असणारी मने आता "दुभंगली" जात आहेत. अशी दुभंगलेली मने जेव्हा देशाच्या विकासाठी एकत्र काम करतील तेव्हा त्यातुन निर्माण झालेला परिणाम केवळ शुन्य असेल. अशी दुभंगली मने देशाचा विकास करुन त्याला प्रगतीपदावर न्हेऊन त्याला "एक महासत्ता" बनवू शकत नाहीत हे लोकांच्या लक्षात येत नाही. समजा जरी लोक समजायला लागले तरी काही "हितशत्रू" बरोबर पुन्हा वाद निर्माण करतात ...
ह्या सर्व गोष्टींमुळे देशासाठी "विवीध पातळीवर काम" करणाया सामान्य जनतेच्या मनाच्या दोलनामय परिस्थीतीचा विचार कोणी करत नाही. ह्या देशाच्या सुरक्षेसाठी अणस्त्रे बनवणाया "अब्दुल कलामांच्या" मनात हा विचार येत नसेल का की आपण ज्या राष्ट्रासाठी झटतो आहोत त्या राष्ट्रामधील काही शक्ती आपल्याला व आपल्या जमातीला "उपरा" मानून त्यांच्या विरोधात शत्रे घेऊन त्यांच्या संहाराची भाषा बोलत आहेत, जेव्हा "युसुफ़ पठाण व इरफ़ान पठाण" हे हाती बॆट - बॊल घेऊन प्रतिस्पर्धी "पाकीस्तानी" संघावर तुटुन पडतात तेव्हा त्यांना वाटले की "अरे आपण ज्यांच्यासाठी आपल्याच जातीय भाईबंदाविरुद्ध उभे आहोत ते लोक आपल्याला उपरा मानतात" अशा परिस्थीतीत काय ? लियंडर पेस, सानिया मिर्झा ला वाटले की आपल्या धर्माबंधूंवर , धर्मगुरुंवर हल्ले होत असताना आपले ह्या देशासाठी खेळणे पटत नाही तर काय ? ह्या देशात काम करणाया हजारो मुस्लीम व ख्रीस्ती डॊक्टर्स, इंजिनीयर्सना हा देश आपला वाटला नाही तर त्यांच्या काम करण्यामागे "समर्पण" किती राहिल ? मागास आरक्षणाचा लाभ घेऊन आज देशाच्या यंत्रणेत मोठ्या पदावर काम करणाया अधिकायांना बाहेरचे "आरक्षण आंदोलन व त्यावर येणाया प्रतिक्रीया" याबद्दल काय वाटत असेल ? त्या परिस्थीतीत ते आपले काम पुर्णपणे "निष्पक्षपातीपणे" करतील का वा त्यांनी करावे का ? देशाच्या सुरक्षेसाठी सिमेवर बंदुकीच्या ट्रीगरवर बोट ठेऊन अहोरात्र उभे राहणाया विवीध जाती, जमाती मधल्या सैनीकांमध्ये दुहीची भावना वाढीस लागली तर काय ? तसे पहायला गेले तर ह्यांचा परिणाम त्यांच्या कामगिरीवर होणे अपेक्षीत नाही व मान्यही नाही. पण मी मानतो की आजूबाजूला घडणाया घटनांचा परिणाम निश्चितपणे त्यांच्या मनावर व पर्यायाने त्यांच्या "कामगिरीवर" होत असेल. अशा परिस्थीतीत आपला देश खरेच "एक वन नेशन" राहिल का ? याचा विचार आत्ताच परिस्थीती हाताबाहेर जाण्याआधी केला पाहिजे व काही तरी कठोर उपाय योजले पाहिजेत.
आता एक तिसरीच शक्ती आपले डोके वर काढू पहात आहे ती म्हणजे "प्रादेशिक अस्मितेचा" पुरस्कार करणायांची. भारतासारख्या एका मोठ्या देशात अनेक लोक राहतात, त्यांची संस्कॄती भिन्न आहे, भाषा भिन्न आहे, आचारविचार भिन्न आहेत. आपल्या जमातीची वा समुहाची ओळख टिकून रहावी यासाठी त्यांनी आपापल्या "संस्कॄती व मुल्यांची" जपणूक केली तर त्यात चुकीचे काही नाही पण पुढे जाऊन याचे परिवर्तन हे "प्रादेशिक अस्मितेत" झाले व हा प्रश्न संवेदनाशील झाला. भारताच्या विवीध भागात राहणाया "बंगाल्यांची अस्मिता, आसामी अस्मिता, मराठी अस्मिता , गुजराती अस्मिता [ हो, आता ही पण महत्वाची झाली आहे, लोकांनी निवडणूकी जिंकल्या त्याच्या जोरावर ] , दक्षिणेची वेगळी अस्मिता, युपी / बिहारची स्वता:ची वेगळी अस्मिता , वरच्या इशान्य भारताच्या जनतेची प्रादेशीक अस्मिता" असे अनेक आयाम या विषयाला मिळाले. जेव्हा व्यापार, व्यवसाय , नोकरीच्या निमीत्ताने ही लोक देशातल्या विवीध भागात पसरले व काही कारणाने तेथील लोकल अस्मिता व ह्या लोकांनी आपल्या बरोबर आणलेली स्वता:ची अस्मिता यांच्या संघर्षाची परिस्थीती निर्माण झाली व काही ठिकाणी "हिंसक आंदोलने" पहायला मिळाली. तसे पहायला गेले तर दक्षिण भारताचे पहिल्यापासून वरच्या भागात राहणाया व हिंदी बोलणाया लोकांशी पहिल्यापासून वाकडे होतेच, शक्यतो त्यांनी वरच्यांना "आपण उपरे आहोत" याची वेळोवेळी जाणीव करुन द्यायचा प्रयत्न केला. ७० च्या दशकात मराठी माणसाला त्याचे हक्क मिळवून देण्याच्या निमीत्तने उभारलेल्या आंदोलनातुन "मराठी अस्मितेची" नवी ओळख भारतला पटली व शिवसेनेसारख्या प्रादेशिक प्रश्नांवर उभ्या राहिलेल्या राजकीय पक्षांना राजकारणात चांगले दिवस येण्यास सुरवात झाली. तामिळनाडूत तर पहिल्यापासूनच "प्रादेशिक द्रमुक व अण्णाद्रमुक" ह्यांनी सत्ता आपल्याकडे ठेवली होती व कॊंग्रेस, भाजपा सारख्या राष्ट्रीय पक्षांना इथे पाय रोवायची संधी दिली नाही. त्यानंतर "आसामी अस्मितेच्या" निमीत्ताने आसामात झालेली हिंसक आंदोलने, आसु [ ऒल आसाम स्टुडंट युनियन ] सारख्या विध्यार्थी संघटना व त्यानंतर त्याचां राजकीय अवतार "आसाम गण परिषद" यासारख्यांनी पण "प्रादेशिक अस्मिता" जोपासली. सध्याच्या काळात सगळ्यात मोठ्ठी समस्या म्हणजे व्यापार व नोकरीच्या निमीत्ताने बाहेर गेलेल्या बिहारी / युपी जनतेने आपल्या बरोबर न्हेलेली आपली संस्कॄती व अस्मिता ह्यांचा तिथल्या लोकल अस्मितेशी झालेला संघर्ष. मग हे आसामात असो, महाराष्ट्रात असो वा दक्षिणेत असो ही एक राष्ट्रीय समस्या व्हायला सुरवात झाली, त्यातच त्यांच्या "नेत्यांनी" अनावश्यक विधाने व वाद निर्माण करुन ही परिस्थीती चिघळावली व ह्याचा परिणाम म्हणजे झालेली "हिंसक आंदोलने" व यासाठी वेठीस धरली गेलेली सामान्य जनता व विस्कळीत झालेले जनजीवन.प्रारंभी "मराठी माणसाचा विकास म्हणजे गुजरात्याच्या कानफ़ाडीत मारणे नव्हे" ही भुमीका मांडणाया राज ठाकर्‍यांना पण काळ बदलतोय म्हणून "बिहायांच्या थोबाडीत" मारण्याची कॄती करावी लागली व ह्या आंदोलनाला "प्रादेशिक द्वेशाची" एक वेगळी किनार मिळाली.
ह्याचा त्रास पुढे कदाचित बाहेर राहणाया "मराठी माणसाला" होऊ शकतो ही शक्यता सध्या कुणीच जमेस धरत नाही....

आज परिस्थीती अशी आहे की ह्या "प्रादेशिक वादाला" बाजूला सारुन कुठलाही पक्ष "केंद्रात सत्तेची शिडी" चढू शकत नाही व त्यांना ह्या "प्रादेशिक पक्षांना" चुचकारावेच लागेल ...
अशीच परिस्थीती कायम राहिली तर आपण "इंडीया : दी वन नेशन " म्हणू शकतो का ???

"दी वन नेशन " म्हणजे काय नक्की ? नेशन म्हणाजे येथे राहणारे लोक, ह्या भारतात राहणारी १०० करोड जनता. ही नुसती १०० करोडाची गर्दी जमवून काही होणार नाही तर तिथे पाहिजे ह्यांच्यात "ऐक्याची भावना" , आपण एका "महाशक्ती असलेल्या समुहाचा भाग" आहोत ह्याचे समाधान देणारी भावना. अशी भावना निर्माण झाली की त्यांचे "शक्तीशाली गट" बनतात व हेच गट "हाच देश" पुढे न्हेतात. पण त्याच्यासाठी गरज आहे ती लोकांनी आधी " वन वेशन" ही संकल्पना आमलात आणण्याची ...
आपण सध्या भारताच्या "मिशन २०-२०" च्या मोठ्या मोठ्या गप्पा मारत आहोत, भारताला एक विकसीत राष्ट्र बनवायचा वायदा करत आहे पण ह्या गोष्टी भारत हा " वन नेशन" झाल्याशिवाय शक्य नाहीत .... विकास म्हणजे काय ह्याचेच सध्या कंफ़्युजन [वा फ़ारफ़ार तर अद्न्यान म्हणू शकतो ] आहे. विकास भारताच्या सर्वसामान्य जनतेने विदेशी ब्रॆंडेड कपडे घालून एका विदेशी कारमधुन जाऊन एका मल्टिप्लेक्स मध्ये आपल्या "फ़ॆमीली" सोबत "बर्गर खात व कोकाकोला पित" सिनेमा बघणे नव्हे. मोठेमोठे मॊल्स उभारले, सॊफ़्टवेअर कंपन्या सुरु झाल्या, फ़ारीनच्या कार भारतात आल्या, मोबाईलचे रेट कमी झाले, पर्यटन स्वस्त झाले म्हणजे विकास झाला असे नव्हे ....विकास म्हणजे समुहातील प्रत्येक व्यक्तीच्या सर्जनशील शक्तींचा अविष्कार. ही प्रक्रीया आपल्या देशात चालू आहेच की, गेली ६०वर्षे यशस्वी पणे लोकशाही राबवून दाखवणारा, तंत्रद्न्यान व अन्नधान्याच्या बाबतील स्वयंपूर्ण, माउंट एव्हरेस्ट पासुन ते थेट अंटार्टीका व आता चांद्रस्वारी मोहीम आखणारा, एका वेळी १० उपग्रह यशस्वीपणे आकाशात सोडणारा, महापरम संगणक बनवणारा, माहिती तंत्रद्ब्यान क्षेत्रात एक महासत्ता असणारा, बाकीच्यानी नाही म्हतल्यावर स्वता:च्या दमावर अणूभट्टी उभारुन "पोखरणची अणूचाचणी" करणारा, वैश्विक शांतीचे धडे अख्ख्या जगाला देणारा, संगित आणि कलेची जगाला देणगी देणारा, देशाला "२०-२०" वर्ल्डकप जिंकून देणारा, बुद्धीबळ खेळाचा विशवविजेता असणारा असे कितीतरी चेहरे या विकासोन्मुख भारताचे आहेत. पण त्याच्याबरोबरच "जातीयतावाद, धार्मीक दुही, प्रादेशिक अस्मिता जोपासणारा", सामाजिक व आर्थीक विषमता व दुही असणारा, उपलब्ध सोईंच्या विरतणात एकांगी, दारिद्र्य, अद्न्यान, बेकारी, मुलभुत शिक्षणाची दुरावस्था , भ्रष्टाचार यांनी बुजबुजलेला, हेही भारताचे चेहरे. याला आपण "विकासोन्मुख वन नेशन" म्हणू शकतो का ?

यातील बहुतेक प्रश्न सोडवायचे असतील व भारताला "एक आंतरराष्ट्रीय महासत्ता " बनवायचे असेल तर गरज आहे ती भारतीय जनतेने " वुई, दी वन नेशन" म्हणून उभे राहण्याची !!!

मिपावरच्या मान्यवर व अभ्यासु जनांचे "इंडीया-दी वन नेशन आणि धार्मीक, जातीय व प्रादेशिक अस्मिता" याबद्दल काय मत आहे जाणून घ्यायला मला आवडेल ...

गुज्जर आंदोलन

आपण सर्व गेले ९-१० दिवस या आंदोलनाबद्दल वाचतो आहोत. एक समाज सगळ्या देशाला वेठीवर धरुन आहे, कोणी कांही करु शकत नाही. आज आठ दिवस दिल्ली -मुंबई रस्ता व रेल्वे विस्कळीत झाली आहे. अनेक लोक उत्तरेकडे अडकले आहेत. लोकांच्या हालांना पारावार राहिला नाही.
मतांसाठी सर्व लाचार पक्ष मूग गिळून बसले आहेत.
या आणि अशा प्रकारच्या हिंसक आंदोलनाचा नुसता निषेध करुन चालणार नाही. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणार्‍या प्रत्येक व्यक्तिला सरकारने 'अतिरेकी' मानून त्यानुसार कारवाई केली पाहिजे.