इतिहास

शिवरायांबद्दल परदेशी इतिहासकारांनी काढलेले उद्गार

शिवाजी महाराजांच्या जीवनाचा अनेक परदेशी इतिहासकारांनी आढावा घेतला.काही शिवकालीन होते तर काही नंतरचे होते.यांनी शिवरायांच्या कार्याचे कशा पध्दतीने अवलोकन केले आहे यातुन परदेशी लोक शिवाजी महाराजांबद्दल काय विचार करतात हे दिसुन येते. त्यापैकी काही उद्गारांचे भाषांतर करत आहे.

Thevenot म्हणतो-
शिवाजी राजांचे डोळे तीक्ष्ण होते,आणि त्यातुन असामान्य बुध्दिमत्ता दिसुन येत असे.राजे दिवसातुन एकदाच जेवण करतात आणि ते निरोगी आहेत.

Cosmo Da Guarda म्हणतो-
शिवाजी राजांच्या कृतीत धडाडी होतीच पण त्याचबरोबर त्यांच्या आचरणात्,चालीत एक जिवंतपणा व उत्साह होता.त्यांचा चेहरा स्वच्छ आणि गोरा होता,निसर्गाने त्यांना सर्वोत्तम गुण दिले होते मुख्य म्हणजे त्यांचे काळे डोळे ज्यातुन जणुकाही अग्निज्वाळा येत असत्,आणि याला जोड होती तीव्र्,तीक्ष्ण बुध्दिमत्तेची.

Orme म्हणतो-
शिवाजी महाराजांकडे एका यशस्वी सेनापतीचे सर्व गुण होते.सैन्याचा प्रमुख म्हणुन त्यांनी जितके जमिनीवर जितके अंतर पार केले तितके दुसर्‍या कुठल्याही सेनापतीने केले नसेल.आणीबाणीचा प्रसंग कितीही आकस्मिक अथवा मोठा असला तरीही शिवाजी राजांनी त्याचा विवेकाने व धैर्याने त्वरीत यशस्वीपणे सामना केला.

General Sullivan म्हणतो-
ज्या संत्रस्त काळात शिवाजी महाराज रहात होते त्या काळात सफल होण्यासाठी आवश्यक असलेला प्रत्येक गुण त्यांच्यामधे होता.ते सतर्क होते आणि त्यांची कृती प्रखर व धाडसी असे.त्यांच्यातील सहनशीलता,उर्जा आणि निर्णयक्षमतेमुळे कुठल्याही काळात त्यांच्याकडुन गौरवास्पद कार्य झाले असते.तो एक हिंदु राजा होता ज्याने आपल्या देशी घोड्यांच्या सहाय्याने प्रचंड मुघल घोडदळाला पाणी पाजले.त्यांचे मावळे गनिमी काव्यामुळे त्याकाळातले जगातील सर्वात चांगले पायदळ होते

J. Scott म्हणतो-
शिवाजी राजे एक योध्दा म्हणुन असामान्य होते,राज्यकर्ता म्हणुन निपुण होते तर सद्गुणी लोकांचे मित्र होते.त्यांनी हुशारीने आपली धोरणे आखली तर दृढतेने ती अमलात आणली.कोणीही कधीही त्यांच्या ध्येयाबद्दल अवगत नसे तर प्रत्येक जण त्या ध्येयाच्या पुर्तीबद्दल अवगत असे.

Douglas म्हणतो-
कुठल्याही आणीबाणीच्या समयाच्या वेळी सजग राहुन शिवरायांनी त्याला तोंड दिले.या कलेमध्ये त्यांच्या करंगळीत जेव्हढ होत तेव्हढ औरंगजेबाच्या पुर्ण शरीरात नव्हता.जणुकाही शिवाजी राजे एक डोळा उघडा ठेवुनच झोपत.त्यांनी आपल्या जादुई स्पर्षाने आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाने त्यांच्या गरीब्,आज्ञाधारक,दैववादी महाराष्ट्रातील जनतेला अलौकीक कृत्ये करण्यास प्रेरीत केले.ही जनता सर्वोत्तम सैनिक्,पक्के सरदार्,कुशल राजनिती विशारद बनली जिने शेकडो युध्दे जिंकलेल्या मुघलांचा सामना केला.

Abbe Carre म्हणतो-
शिवाजी राजे पुर्वेने पाहिलेल्या सर्वोत्तम योद्ध्यांपैकी एक आहेत.त्यांच्या धाडसीपणामुळे ,त्यांच्या युध्दातील चपळाईमुळे व इतर गुणांमुळे त्यांची तुलना स्विडनच्या महान राजा ऍडॉल्फसशी होउ शकते.त्यांच्या जलद गतीने आणि दयाशीलतेने ज्युलियस सीझरप्रमाणे त्यांनी त्यांच्या शत्रूंचीही मने जिंकली ,जे शत्रु त्यांच्या शस्त्रांमुळे दहशतीत होते.

Dr. John F. G. Careri ( 1695 A. D. ) म्हणतात-
हे शिवाजी राजे इतके बलाढ्य आहेत की ते एकाच वेळी प्रचंड मुघलांबरोबरही लढतात आणि पोर्तुगिजांबरोबरही लढतात. ते रणांगणावर ५०००० घोडे आणतात आणि त्याहुनही जास्त पायदळ आणतात.त्यांचे सैनिक मुघलांपेक्षा कितीतरी चांगले आहेत. हे सैनिक अतिशय थोड्या अन्नावर दिवस काढतात तर मुघल बायका,विविध साधनसामग्री,तंबु घेउन जातात जणुकाही ते एक चालत फिरत शहरच असत.

Daughlas म्हणतो-
शिवाजी महाराज खडकांमधे रहात.त्यांची शक्ती म्हणजे डोंगर दर्‍या होत्या.हा किल्ल्यांमधला माणुस होता ज्याचा जन्मही किल्ल्यामधे झाला होता.किल्ल्यांनी त्याला बनवल आणि त्यानी किल्ल्यांना बनवल.हे किल्ले म्हणजे भारताची दहशत होती,शिवरायांच्या राज्याचे उगमस्थल होते,त्यांच्या युध्दांचा आधार होते,त्यांच्या ध्येयांच्या पायर्‍या होते,त्यांचे घर आणि आनंद होते.त्यांनी अनेक किल्ले बांधले आणि सर्व किल्ले त्यांनी बळकट केले.ही फारच कृपेची गोष्ट होती की शिवाजी राजे दर्यावर्दी नव्हते.नाहीतर जमिनीप्रमाणे समुद्रावरही त्यांनी वर्चस्व गाजवले असते जे वर्चस्व त्यांनी जवळजवळ प्रस्थापित केले होते.त्यांना समुद्र आवडत असे पण समुद्राला ते आवडत नसत.त्यांचे खार्‍या पाण्यावर इतके प्रेम होते की असे म्हणतात की त्यांनी सिंधुदुर्ग बांधताना स्वतःच्या हातानी हातभार लावला होता.त्यांच्या पावलांचे ठसे अजुनही तिथे दाखवता येतात्,काळाच्या वाळुत नाही तर ठोस खडकात.

Da Guarda म्हणतो-
शत्रुमध्ये असा दृढ विश्वास निर्माण झाला होता की शिवाजीराजे सगळीकडे आहेत.ते एकाच वेळी अनेक ठिकाणि चढाई करत असत आणि सर्वच ठिकाणी सैन्याचे नेत्रुत्व तेच करत असत.ह्या प्रश्नाला अजुनही उत्तर मिळालेले नाही की शिवाजी राजे स्वतःच्या नावानी दुसर्‍या कुणालातरी पाठवत असत का त्यांना जादु टोना येत असे का स्वतः सैतान त्यांच्या जागी कार्यरत होता.

Sir E. Sullivan म्हणतात-
शिवाजी राजे हिंदु इतिहासातील सर्वोत्कृष्ठ राजकुमार आहेत.त्यांनी आपल्या ज्ञातीचा पुरातन गौरव वापस आणला जो अनेक शतकांच्या पराधिनतेमुळे नष्ट झाला होता.आणि मुघल साम्राज्याच्या परमोच्च बिंदुला त्यांनी आपले साम्राज्य बनवले,वाढवले जे की हिंदुस्तानातील मुळ लोकांनी काढलेले आत्तापर्यंतचे सर्वश्रेष्ठ साम्राज्य आहे.

Kincaid म्हणतो-
शिवाजी राजे हे मराठा देशाचे मुक्तिदाते होते,त्यांचे गुण विभिन्न होते,जीवन नियमीत होते,स्वभाव सहनशील होता त्यामुळे यात काही आश्चर्य नाही की त्यांचे लोक त्यांना त्यांच्यापैकी एक न मानता त्यांना देवाचा अवतार मानतात.ज्याप्रमाणे अथेन्सचे रहीवासी त्यांचे साम्राज्य लयास जाउन भरपुर कालखंड गेला असुनही भक्तीभावाने Theseus चे पुजन करतात त्याचप्रमाणे मराठे ,शिवरायांच साम्राज्य संपुन भरपुर काळ लोटला तरी अजुनही राजगड्,मालवण मधे त्यांचे पुजन करतात.

Elphinstone म्हणतो-
शिवाजी राजांसारखा प्रतिभासंपन्नच औरंगजेबाच्या चुकांचा फायदा उठवु शकतो त्यानंतर धर्मासाठी प्रेरीत करु शकतो व यातुन मराठ्यांमधे राष्ट्राभिमान जाग्रुत करु शकतो.या भावनांमुळे त्यांचे साम्राज्य अशक्त हातांमधे गेल्यानंतरही तग धरुन होते आणि अनेक अंतर्गत समस्या असुनही भारताच्या एका मोठ्या भागावर त्याने नंतर प्रभुत्व निर्माण केले.

Owen म्हणतो-
वीरता,देशाभिमान्,धर्माभिमानाची प्रभावळ त्यांच्या(जनतेच्या) कार्यवाहीत होती ज्यातुन ते प्रेरीत झाले.त्यामुळे शहाजी राजांच्या पुत्रास ते पुर्वनिश्चित,दैविक कृपापात्र मुक्तिदाता मानत होते.त्यामुळे शिवाजी राजे व त्यांचे अनुयायी असे मानु शकतात व मानत की त्यांच्या पध्दतीने मुस्लिमांबरोबर केलेल्या युध्दामुळे ते देवासाठी व मनुष्यासाठी एक चांगले कृत्य करत आहेत.ज्यामुळे त्यांचा गौरव झाला,त्यांचे फक्त स्वागतच झाले नाही तर प्रशंसनिय रीत्या प्रतिकात्मक लाभही झाला.

टिप्-मुळ इंग्रजीतील वाक्यांमधे Shivaji असा उल्लेख आहे.त्याचे शब्दशः भाषांतर केल्यास शिवाजी असा एकेरी उल्लेख येतो.वाचनकर्त्यांच्या सोईसाठी वर शिवाजी महाराज्,शिवाजी राजे व शिवराय असे शब्द वापरले आहेत.वाक्यांचे शब्दशः भाषांतर करण्याचा प्रयत्न केला आहे पण हा माझा पहीला अनुवाद असल्याने काही चुका असण्याची शक्यता आहे.त्याबद्दल क्षमस्व. सर्व परदेशी लोकांच्या उद्गारांनंतर शेवटी एक भारतीयाने काढलेले उद्गार देतो.

कविराज भूषण म्हणतो-
जंभासुरला जसा इंद्र , समुद्राला जसा वाडवाग्नी,गर्विष्ठ रावणाला ज्याप्रमाणे प्रभुराम, मेघाला ज्याप्रमाणे वादळ,मदनाला जसे शिव शंकर, सहस्रार्जुनाला ज्याप्रमाणे परशुराम,वृक्षाना ज्याप्रमाणे वणवा, हरिणांना जसा चित्ता,अंधाराला जसा प्रकाश, कंसाला ज्याप्रमाणे श्रीकृष्ण,त्याचप्रमाणे नरसिंह असणारे शिवराय म्लेंच्छांचा नाश करतात

गूगल मॅप व गूगल अर्थ मध्ये काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश विवादास्पद

गूगल मॅपवर सहज पहाताना लक्षात आले की काश्मीरचा काही भाग आणि अरुणाचल प्रदेश तुटक रेषेने दाखवले आहेत. दुसरा असा तुटक रेषेचा प्रदेश आहे तो गाझा पट्टीचा. 'गूगल अर्थ'वरपण हे प्रदेश लाल रेघेने दाखवले आहेत. ह्याचा अर्थ होतो काश्मीरचा काही भाग आणि अरुणाचल प्रदेश भारतात नाहीत.
आपण याबाबतीत काय करु शकतो? काय केले पाहिजे. केवळ राज्यकर्त्यांना शिव्याशाप देउन चालेल का?
निदान गूगल कंपनीकडे निषेध नोंदवता येइल का? जाणकारांनी आपले मत मांडावे.

गड , किल्ले ओळखायला मदत करा

गड , किल्ले हे आपल्या महाराष्ट्राचे वैभव. अंतरजालात वावरताना या गड किल्ल्यांची मिळालेली ही काही चित्रे देत आहे. काही सागरी किल्ले, गड ओळखता येत आहेत. योग्य माहिती आपले गडप्रेमी मिपाकर नक्केच देतील.

चित्र १ -

चित्र २ -



चित्र ३

चित्र ४ -



चित्र ५ -


चित्र ६
-


चित्र ७ -


चित्र ८ -

चित्र ९ -

माझ्या मते
चित्र १ -विजयदुर्ग
चित्र २- सिंधुदुर्ग
चित्र ३- ? ( मला माहित नाही )
चित्र ४- मुरुड - जंजिरा
चित्र ५- - रायगड
चित्र ६- प्रतापगड
चित्र ७- ?
चित्र ८- शिवनेरी
चित्र ९- राजगड
हे माझे मत

तुम्हाला काय वाटते?

( गडप्रेमी ) अमोल

मिसळपाव - एक व्यक्तिगत इतिहास : भाग ४

भाग ३ मध्ये आपण शिवस्थळाच्या शेवटच्या भागात आलो होतो. मराठी वाचकांसाठी मराठी चालकाने चालवलेले हे स्थळ उत्कृष्टपणे चालवताना महाराजांना स्वत:च्या व्यक्तिगत आयुष्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही. मंडळी, इतिहासातून आपण शिकायचेच जर ठरवले, तर हे असे काहीतरी शिकावे. नाहीतर उगाच महाराज, महाराज म्हणून उड्या मारण्यात काय प्वाईट आहे? राजाराम हा एक नवीन सदस्य स्वराज्यस्थळाचा नंतर चालक झाला. पण त्याने स्वराज्य स्थळावर आगमन केले, ते पालथे. त्याचे सुरुवातीचे सदस्यनाम "मराजारा" असे होते. हे असे अपशकुनी चालक स्वराज्यस्थळाला लाभतील, ह्या कुशंका मंगळ-शनी युतीचा पावसाशी संबंध जोडणाऱ्या अनेक सदस्यांनी महाराजांकडे व्यक्त केल्यात. पण शेवटी महाराज ते महाराजच. राजारामांनी "असा पालथा प्रवेश केला असल्यामुळे, हे सदस्य पदपातशाही ह्या संकेतस्थळाला पालथे घालतील, त्यांचे सर्व सदस्य हिरावून घेतील." असे म्हणून मानवी कर्तृत्वाचा ग्रहगोलादि घटनांशी संबंध जोडणाऱ्या सदस्यांचा पाडाव केला. मंडळी, महाराज नेहमी इतर स्थळांचे सदस्य, तिथले कालातीत लेख, तेथून हिरावून घेऊन तेथून ही सर्व संकेतस्थळीय संपत्ती स्वराज्यस्थळावर आणण्यास कूच करायचे, ते दसऱ्याला. त्यावेळी इतर संकेतस्थळ सदस्यांचे आफिसातले व्यक्तिगत प्रकल्प वगैरे संपलेले असायचे, आणि ह्या स्वराज्यस्थळावर पडीक असायला त्यांना खूप वेळ असायचा. त्यावेळी नेमकी ग्रहस्थिती कशी होती, वगैरे विचारात महाराज कधीच गुंतले नाहीत.

असो, तर मुख्य सांगायचे म्हणजे, स्वराज्यस्थळ नीट चालवताना, महाराजांचे कौटुंबिक आयुष्याकडे दुर्लक्ष झाले. इतिहासातून हेदेखील शिकायला हवे. की एकदा सार्वजनिक संकेतस्थळाची जबाबदारी घेतली, की चालकाने स्वत:चे इतर आयुष्य संकेतस्थळापासून दूर ठेवायला हवे. महाराजांना सदस्यांकडून कधीही "आपल्या व्यक्तिगत आयुष्यातून वेळेत वेळ काढून हे स्थलचालन आपण करताहात, ह्याबद्दल धन्यवाद. पण अष्टप्रधान मंडळात स्रियांचे प्रमाण वाढायला हवे" असे प्रतिसाद आले नाहीत. तशी गरजच नव्हती.

महाराजांनी स्वराज्य ह्या स्थळावरच्या दोन सदस्यांना स्वत:च्या भूमिकेसाठी तयार केले होते. त्यांची सदस्यनामे, संभाजी आणि राजाराम. तसे महाराजांच्या स्थळावरील सदस्यांत अनेक लोक त्याचे चालकत्व घेण्यास पात्र होते. परंतु, त्या काळाच्या संकतस्थळांमध्ये प्रचलित नियमांप्रमाणे चालकाने स्वत: ज्या सदस्यांना सदर स्थळावर आणलेले आहे, त्यांनाच सदर स्थळाचे चालकत्व धारण करण्याचा अलिखित अधिकार होता. संभाजी ह्या सदस्याला तर महाराजांनी, दिलेरडॉन ह्या पदपातशाही स्थळाचया संपादकाशी तह करून तेथे दिवसाला दोन लेख टाकण्याच्या बोलीवर गेले, तेव्हा स्वत:बरोबर त्या स्थळाचे सदस्यत्वही घ्यायला भाग पाडले होते. नंतर तिथून काडीमोड घेऊन स्वराज्यस्थळावर कायमचे परत आल्यावर देखील, संभाजी हे सदस्य त्याच स्थळावर चोरून लेखन करीत राहिले, ह्याकडे महाराजांनी काणाडोळा केला. आणि स्वत:चे नेटवर्क कनेक्षन बंद पडल्यावर संभाजीने स्वराज्यस्थळाचे चालकत्व ग्रहण करावे, ह्यात काहीच अडथळा ठेवला नाही. सोयराबाई, ह्या सदस्येने महाराजांच्या लक्षात ही बाब आणून दिली देखील, पण तोवर वेळ गेलेली होती. कलुशा कब्जी ह्या विडंबनकाराला संभाजीराजांनी आपल्या संपादक मंडळात स्थान दिले होते. सदर विडंबक राजारामाने अथवा त्याच्या सहकाऱ्यांनी लिहिलेल्या भावानांचे आविष्कार करणाऱ्या कवितांची इन्स्टंट विडंबने पाडून त्यांचा कात्रज करायचा. राजारामाचा कंपू चिडला होता, ते ह्यासाठीच. पुढे, पदपातशाहीस्थळाच्या चालकांनी संभाजीराजांना, प्रथम खरडवहीतून आणि नंतर व्यनींतून गाठून त्यांचा कात्रज केला. पण संभाजीराजांचे धैर्य एवढे, की त्या दुसऱ्या स्थळातील चालकांनी, त्यांच्या परिवारातील एकीला चांगले प्रतिसाद दिल्यास, तुझे सदस्यत्व कायम ठेवू अशी सूचना केल्यावर देखील, ते त्याला बधले नाहीत. आपले सदस्यत्व, आणि पर्यायी नेटवर्क कनेक्षन बंद पडले तरी बेहत्तर, पण दुसऱ्या स्थळावरील सदस्येला चांगले प्रतिसाद देणार नाही, ही गर्जना त्यांनी केली. आणि त्यांचा लॅपटॉप बंद पडेपर्यंत ते वाचनमात्र राहिले.

त्यानंतर स्वराज्य स्थळाचे चालक झाले राजाराम. ह्यांनी बंगळूर, जिंजी वगैरे भागातून स्वराज्यात अधिक सदस्य यावेत म्हणून खूप प्रयत्न केलेत. जिंजी भागात तर त्यांनी ठाणच मांडले, नवीन सदस्य मिळवण्यासाठी. पण त्यामुळे स्वराज्याचे आधीच्या चालकांनी, म्हणजे संभाजीराजांनी, मिळवलेल्या सदस्यांच्या कंपूंच्या आपापासातल्या व्यक्तिगत निरोपांकडे आणि खरडवह्यंातून घडवलेल्या कंपूबाजीकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. आणि स्वराज्यस्थळात दुफळी माजली. स्वराज्य-सातारा आणि स्वराज्य-कोल्हापूर अशी दोन स्थळे निर्माण झालीत. स्वराज्य-सातारा, हे स्थळ राजारामांनी स्थळावर आणलेल्या शाहू ह्या चालकाकडे गेले. तर स्वराज्य-कोल्हापूर हे स्थळ संभाजीने ह्याच स्थळावर आणलेल्या दुसऱ्या शिवाजीकडे गेले. मूळ स्वराज्य स्थळातील सदस्यांची कुतरओढ झाली. आपण कुठल्या स्थळाचे सदस्य आहोत, हे कुणालाच कळेना. पण दोन स्थळातील चालकमंडळीतला मतभेद दिसला की, सदस्यांनी आपापले स्थळ निवडावे, दोन्ही स्थळांचे एकत्रीकरण करण्याच्या भानगडीत पडू नये, हे संस्कार पाच शाही स्थळांच्या काळापासून सदस्यांवर होतेच. त्यांनी आपापली स्थळे निवडली. कुणी ह्या दोन स्थळांच्या एकत्रीकरणाविषयी 'ब्र' ही काढला नाही.

मंडळी, ह्या इतिहासातून आपल्याला बरेच शिकण्यासारखे आहे. अगदी ह्या युगातही. पहिले म्हणजे, आपण, म्हणजे ह्या युगातले संकेतस्थळचालक, आपले उत्तराधिकारी म्हणून ज्यांना नेमतो, त्यांची स्थळाविषयी निष्ठा आधी जोखावी. आपल्या स्थळावरचा सदस्य, जो दुसऱ्या स्थळावरही लेखन करतो, अथवा प्रतिसाद देतो, त्याला आपले उत्तराधिकारी म्हणून नेमू नये. नाहीतर आपल्या संकेतस्थळाची दुफळी होणे हे निश्चित. दुसरे, म्हणजे आपण एखाद्या सदस्याला आपल्या स्थळावर आणण्यास कारणीभूत होतो, म्हणून आपले चालकत्वाचे उत्तराधिकारी म्हणून त्या सदस्याला नेमावेच असे नाही. स्वराज्य स्थळावर इतरही जुने-जाणते सदस्य होते. महाराजांनी स्थळाचे चालकत्व त्यांच्यावर सोपवले असते, तर कदाचित ही दुफळीची वेळ आली नसती. तिसरे, म्हणजे आपल्या संकेतस्थळावरच्या "कोअर कॉन्स्टिट्युअंसी" ला महत्व द्यावे. उगाच बंगलोर, जिंजी भागातून अधिक सदस्य मिळतात, म्हणून त्यंाच्यावरच लक्ष केंद्रित करून महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करणे, ही सर्वात मोठी चूक.

सतराव्या शतकाच्या शेवटी, स्वराज्य-सातारा स्थळ-चालक ज्यावेळी जिंजीला नवीन सदस्यप्राप्तीसाठी जेव्हा तळ ठोकून होते, तेव्हा त्यांनी मूळ स्वराज्यस्थळाचे काम संताजी-धनाजी, ह्या दोन सदस्यांकडे सोपवण्याचा मात्र निर्णय चांगला घेतला. ह्या सदस्यांनी स्वराज्य स्थळावर पदपातशाहीस्थळावरून दंगा घालायला येणाऱ्या प्रत्येक तोतया सदस्याला काबूत ठेवले होते. असे कुणीही सदस्य कुठल्याही धर्म-जातीविषयी अनुचित प्रतिसाद द्यायला स्वराज्यस्थळावर सदस्यत्व घेते झाले, की हे संताजी-धनाजी त्यांच्यावर तुटून पडायचे. म्लेंछांचे असे अनेक घाणेरडे प्रतिसाद संताजी-धनाजीने कुठलाही व्यनि न पाठवता काढून टाकले. पुढे पुढे तर, हजर सभासदांच्या यादीत, संताजी किंवा धनाजी ही नावे दिसली, की असे आगंतुक म्लेंछ "गमन करा"वर लगेच टिचकी मारायचे.

ह्या ऐतिहासिक संकेतस्थळचालकांना योग्य वेळी उपरती झाली, आणि स्त:च्या कंपूतील सदस्यंाना आपल्या संकेतस्थळाचे चालन सोपवण्याऐवजी, जो सदस्य हे संकेतस्थळ चालवण्याची खरी पात्रता बाळगतो, त्याला संकेतस्थळ चालवायला द्यावे असा निर्णय घेण्यात आला, आणि त्यामुळे स्वराज्य हे स्थळ गेले एका कोकणस्थ सदस्याकडे. बाळाजी विश्वनाथ, हे त्याचे सदस्यनाम. अर्थात, हे स्थळ आपल्याला कंपूबाजी ह्या पद्धतीच्या अपयशामुळे चालवायला मिळालेले आहे, हे विसरून स्वत:च्या कंपूतच पुढे ह्या स्थळाचे चालकत्व ठेवण्याचा निर्णय घेतला, हे अलाहिदा. अगदी नुकत्याच घडलेल्या बदलांपासून शिकणे, हे तेव्हाही शक्य झाले नाही. हा मराठी संकेतस्थळांबाबत घडलेला दैवदुर्विलास. काय करणार, शेवटी आपण मराठी संकेतस्थळांचेच सदस्य !

(विधात्याची इच्छा असेल तर: क्रमश:)

रशियात दुमदुमला 'जय शिवाजी' चा नारा

नमस्कार .खालील लेख माझ्या ब्लॉगवर व माबोवर मार्चमधे टाकण्यात आला होता. मिसळपावच्या सदस्यांनाही आमच्या उपक्रमाबद्दल कळावे म्हणुन येथेही टाकत आहे.

निश्चयाचा महामेरु | बहुत जनांसी आधारु |
अखंडस्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी ||
या भुमंडळाचे ठायी | धर्मरक्षी ऐसा नाही |
महाराष्ट्र धर्म राहीला काही | तुम्हांकरीता ||

यशवंत,किर्तीवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत,नीतिवंत अशा जाणत्या राजा शिवछत्रपतींची ,सोमवार दिनांक २४ मार्च रोजी जयंती होती. अशा या महाराष्ट्र गौरवाच्या .. नव्हे ,नव्हे संपुर्ण भारत गौरवाच्या दिवशी आम्ही उत्सव साजरा करायचा असे ४ वर्षापुर्वीच ठरवले. आणि गेले ४ वर्ष आम्ही शिवजयंती उत्सव येथे म्हणजे सारातोव्ह,रशियात साजरा करतो. या दिवशी एक छोटासा पण माहीतीपुर्ण व मनोरंजक कार्यक्रम आम्ही गेले ४ वर्ष करत आहोत. हा कार्यक्रम फक्त शिवाजी महाराजांशीच संबंधीत असतो. दरवर्षी कार्यक्रमाचा दर्जा सुधारण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि दरवर्षी कार्यक्रमाचा दर्जा सुधारण्यात आम्हाला यश आलंय हेही मी सांगू इच्छितो.

फोटो पहाण्यास येथे क्लिक करा-
http://picasaweb.google.ru/chinya1985/Shivajayanti

शिवाजी महाराजांविषयी मराठी माणसाला माहीती असतेच. पण छोटेमोठे तपशील मात्र माहीत नसतात. शिवाय येथे मराठी पुस्तके मिळण्याचे कुठलेही साधन नसल्याने कार्यक्रमासाठी लागणारी माहीती मिळवण्यासाठी दरवर्षी तारांबळ उडते. इंटरनेटवरील बहुतेक माहीती इंग्रजीत आहे व ती फक्त वरवरचीच आहे. तपशीलवार शिवचरीत्र इंटरनेटवर सापडत नाही. त्यामुळे यावर्षी आधीच इंटरनेटवर माहीती शोधण्यास सुरुवात केली. एका शिवभक्तानी 'शिवाजी- द ग्रेट' हे बालकृष्णन यांनी १९४० साली लिहिलेले अतिशय छान पुस्तक पाठवले. पण ते विश्लेशणात्मक असल्याने त्याचा उपयोग फक्त भाषणापुरता होणार होता. संपुर्ण शिवचरित्र मिळणे आवश्यक होते.त्यासाठी शोध चालुच होता. शेवटी माझ्या मोठ्या भावाने शिवचरीत्राची लिंक भारतातुन पाठवली. बाबासाहेब पुरंदरेंनी सांगितलेले शिवचरीत्र सर्वांनी आवर्जुन ऐकावे असे आहे.आता आमच्याकडे इतिहास आणि त्याचे विश्लेषण दोन्हीही होते. त्यावरुन २-३ कथाकथन, १ नाटक,१ भाषण करायचे नक्की झाले. त्यानंतर झकासराव या मायबोलीकराने किल्ल्यांची माहीती असलेले ईपुस्तक पाठवले. त्यावरुन राजगड या किल्ल्यावर फोटो शो करायचा ठरला. शिवाय ३ गाणी म्हणायचे ठरवले.गेले ३ वर्ष आम्ही शिवाजी महाराजांवर प्रसिध्द झालेली अनेक गाणी म्हटली होती पण पोवाडा एकदाही म्हटला नव्हता. यावर्षी तो म्हणायचाच असे ठरले. त्यासाठी किशोर मुंढे या दुसर्‍या मायबोलीकराने दिलेली लिंक कामास आली. आता आमच्याकडे पोवाडे होते पण ते गाण्यासाठी लागणारी वाद्य नव्हती व पोवाडे म्हणण्याचा सराव असलेला गायकही नव्हता. कारण येथील ४०-५० मराठी विद्यार्थ्यांमधे एकानेही भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेले नाही.चित्रपट संगीत गाणारे आहेत. शेवटी त्यांनीच पोवाडा गाण्याचा प्रयत्न करायचे ठरवले.

शिवाजी महाराज जेंव्हा आग्र्यात गेले तेंव्हा औरंगजेब बादशहाच्या दरबारातील दृष्य व नंतर वेशांतर करुन राजगड वर जिजामातेंची भेट ही दोन दृष्य नाटकाद्वारे दाखवायची ठरली. तानाजी मालुसुरे यांचा कोंढाणा जिंकण्याचा प्रसंग व अफझल खानाचा वध या घटना मागच्याच वर्षी दाखवल्याने यावर्षी मोरारबाजी देशपांडे, बाजीप्रभु देशपांडे,शाहिस्तेखानावर हल्ला यांचे कथाकथन करण्याचे ठरले.

'मराठी पाउल पडते पुढे' , 'हे हिंदु नरसिंहा' व 'वेडात मराठे वीर'ही गाणी गायची ठरली.त्याचप्रमाणे खाडीलकर यांनी १९२० साली गायलेल्या एका पोवाड्याची ऑडीओ फाईल व शब्द मिळाले त्यामुळे एक पोवाडा म्हणने नक्की झाले. पण यापैकी एकही ऑडीओ स्टिरीओ नसल्याने आमच्या श्रीकांत शिंदे या संगीत तज्ञापुढे मोठे आव्हान होते.शेवटी मागे कमी आवाजात गाणे चालू करुन गायकाने गाणे म्हणायचे व जेंव्हा फक्त संगीत असेल तेंव्हा आवाज वाढवायचा असे ठरले. इतर पोवाडे खुप मोठे होते व ते पार्श्वसंगीताशिवाय म्हणनेही अवघड होते. शेवटी शरद मोहळकर या आमच्या मित्राने स्वत:च पोवाडा लिहिला. पण त्या पोवाड्यासाठी गायकही नव्हता व पार्श्वसंगीतही नव्हते.शाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या पोवाड्यांमधुन काही लुप्स पार्श्वसंगीतासाठी वापरायचे असा प्रयत्न आमचा संगीत तज्ञ २-३ दिवस करत होता पण ते जमले नाही. आदल्या रात्रीपर्यंत पोवाडा कोणी गायचा हेही ठरले नव्हते. त्याचप्रमाणे 'वेडात मराठे वीर' हे गाणे म्हणनारी गायिकाही काही कारणामुळे गाणे म्हणु शकणार नव्हती. त्यामुळे आदल्या दिवशी सांगायच्या गोष्टी जास्त व गायच्या गोष्टी कमी होतात काय अशी भिती वाटू लागली. पण गाणी नसल्यास कार्यक्रम नाही म्हटला तरी कंटाळवाणा आणि फार उपदेशात्मक होतो. त्यामुळे शेवटी पोवाडा व 'वेडात मराठे वीर' हे समुहगानाप्रमाणे म्हणायचे ठरले.

भिंतीवर लावण्यासाठी म्हणुन अभिकेष कोचले या मित्राने शिवाजी महाराजांचे एक मोठे चित्र काढले.आदल्या रात्री होस्टेलमधे मराठीमधे निमंत्रण लावण्यात आले. नाटकाचा सराव दररोज होतच असे. आमच्या नाटकामध्ये जिजामातेच काम करणारी दिव्या शेट्टी ही मुलगी आंध्र प्रदेशची होती,तिला मराठीही बोलता येत नव्हते. हे काम करण्यास काही मराठी मुलींनी नकार दिला तर काही मराठी मुली जिजामाता म्हणुन बरोबर दिसत नव्हत्या.

आणि सोमवार २४मार्चचा दिवस उजाडला. दुपारपासुनच कार्यक्रमाची तयारी सुरु झाली.प्रसाद म्हणुन बासुंदी बनवण्याचे काम कार्यक्रमात काम न करणार्‍या ५व्या कोर्समधे माझ्याबरोबर शिकणार्‍या मित्रांनी केले. कार्यक्रमासाठी लागणारे कपडे ,इतर साहित्य जमवण्यात आले. जिथे कार्यक्रम होणार होता त्या कक्षाची सजावट केली,कॉरिडॉर मधे पताका लावल्या.

कार्यक्रमाची सुरुवात शिवपुजनाने झाली.त्यानंतर मी शिवाजी महाराजांचे महत्व थोडक्यात सांगितले. शिवाजी महाराज जगातील सिकंदर,ज्युलिअस सीझर,नेपोलियन व इतर योद्ध्यांइतकेच किंवा कदाचित थोडेसे जास्तच महान होते हे सांगण्यात आले. शिवाजी महाराजांबद्दल तत्कालीन ब्रिटीश,पोर्तुगिजांनी काढलेले गौरवोद्गार ,शिवाजी महाराजांनी सुरु केलेली रयतवारी पध्दत,शिवकालीन न्यायव्यवस्था तसेच शिवपुर्व मुस्लिम अत्याचारांबद्दल विविध संतांनी काढलेले उद्गार व रामदास स्वामींनी शिवगौरवासाठी लिहिलेले 'निश्चयाचा महामेरु' इत्यादी गोष्टी सांगण्यात आल्या. त्यानंतर विक्रांत ओव्हळ या आमच्या गायकाने अतिशय अवघड असा 'ज्याच्या कबंधानं भुतळी' हा १९२० साली गाण्यात आलेला पोवाडा अतिशय सुंदर पध्दतीने गायला. पोवाडा जवळपास ९० वर्षापुर्वीचा असल्याने रेकॉर्डींग पण अतिशय खराब होते व त्यात असलेल्या खरखर आवाजामुळे एकाही वाद्याचा आवाज नीट येत नव्हता.इंग्रजी माध्यमात शालेय शिक्षण घेतलेल्या विक्रांतने खुप कष्ट घेउन तो पोवाडा जसा होता तसा गायला. त्यानंतर अजित साठे या मित्राने मुरारबाजी देशपांडे यांवर आधारीत 'पुरंदरचा वेढा' हा प्रसंग सांगितला. मुरारबाजीने अतिशय कमी सैन्यासकट दिलेरखानास दिलेली झुंज व मुरारबाजींच्या मृत्युनंतरही वेढा चालुच ठेवणार्‍या मावळ्यांचे पराक्रम सर्वांनाच प्रेरणादायी ठरतात. त्यानंतर 'मराठी पाउल पडते पुढे' हे गाणे निलेष कसबेकर व सहगायकांनी अतिशय छान रित्या म्हटले. टाळ्यांचा कडकडाट झाला.'हर हर महादेव, जय भवानी,जय शिवाजी' च्या नार्‍यांनी सभाकक्ष दुमदुमुन गेले. या गाण्याच्या तयारीला अतिशय कमी वेळ मिळाला होता. त्यानंतर विजय फुले याने पावन खिंडीत बाजीप्रभु देशपांडेंनी दिलेली लढत खुलवुन सांगितली. शिवाजी महाराजांचे आपल्या सैनिकांवर असलेले प्रेम व त्यांच्या सैनिकांनी मृत्यु समोर दिसत असतानाही मरेपर्यंत शिवरायांसाठी दिलेला लढा खुपकाही सांगुन जातो.आजच्या स्वार्थी जगात आपल्या प्रजेवर एव्हढ प्रेम करणारा नेता व त्याच्यासाठी स्वतःचा जीव काहीही विचार न करता देणारी प्रजा दोन्हीही मिळण मुश्किल. त्यानंतर आनंद रासने याने राजगड वर आधारीत फोटो शो सादर केला त्यात राजगडचा थोडक्यात इतिहास व तेथे सध्या असलेली प्रेक्षणीय स्थळे याबद्दल फोटोंच्या आधारे माहीती सांगितली. मग रुचिका या १ल्या वर्षाला शिक्षण घेणार्‍या मुलीने 'हे हिंदु नरसिंहा' हे लता मंगेशकरांनी गायलेले अतिशय अवघड गाणे म्हटले. तिची तब्येत बरी नसतानाही तिने सुरेल गाणे म्हटले. यानंतर शरद मोहोळकर याने सहगायकांबरोबर स्वत: लिहिलेला पोवाडा कुठल्याही वाद्याशिवाय सादर केला. आमच्या कार्यक्रमातील हा सर्वात छान भाग होता. प्रेक्षकांनी पोवाडा चालु असतानाच तालात टाळ्या वाजवायला सुरुवात केली. जो पोवाडा कार्यक्रमाच्या ३-४ तास आधीपर्यंत होईल का नाही अशी शंका होती तो पोवाडा कार्यक्रमानंतर सर्वांच्याच लक्षात राहीला. त्यानंतर आमचे नाटक सुरु झाले. नाटकात आनंद सराफ याने शिवाजी महाराजांची भुमिका केली त्याचबरोबर जाधव राजे श्रीकांत,रोहीत व्यवहारे,चिन्मय घोडके व इतर कलाकारांनी काम केले. आग्र्याला औरंगजेब बादशहाच्या दरबारात जेंव्हा शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानावर, सार्वभौमत्वावर जेंव्हा आघात झाला त्यानंतर ज्या दरबारात मान खाली घालुन उभे रहावे लागत असे,हळुच बोलावे लागत असे अशा दरबारात शिवाजी महाराज कडाडले व आपला अपमान झाला म्हणुन निघुन गेले यावरुन शिवाराय किती साहसी होते हे दिसुन येते. आपल्या राज्यातुन फक्त १००० सैनिकांनीशी आलेला राजा मुघलांच्या दरबारात कडाडतो आणि बादशहाच्या परवानगीशिवाय निघुन जातो यावरुनच त्याच्या शौर्‍याची कल्पना येते. मला नाही वाटत की औरंगजेब बादशाच्या दरबारात असे करण्याची दुसर्‍या कोणी हिम्मत केली असेल. त्यानंतर त्याच आग्र्यातुन सुटुन निघणेही तितकेच अद्भुत!!!डगलसनी म्हटलय की बुध्दिमत्ता व मुस्तद्देगिरी यात शिवाजी महाराजांच्या करंगळीत जितक होतं तेव्हढ औरंगजेबाच्या पुर्ण शरिरात नव्हत हे अगदी खर आहे. नाटकानंतर 'वेडात मराठे वीर' हे गाणे कार्यक्रमात भाग घेतलेल्या सर्व कलाकारांनी मिळुन म्हटले. प्रतापराव गुजरांच्या साहसाचे या गाण्यात अतिशय नेमके वर्णन केलेले आहे. यानंतर आभार प्रदर्शन झाले ज्यात सर्व कलाकारांना शिवरायांचे स्मरण म्हणुन एक एक प्रकाशचित्र देण्यात आले,प्रसादवाटपानंतर कार्यक्रम संपला.

अनेकदा अमराठी,रशियन विचारतात की तुम्ही हा सण का साजरा करता? आम्ही त्यांना सांगायचा प्रयत्न करतो की शिवाजी महाराज किती महान होते. पण या महान राज्याबद्दल अमराठी लोकांना सोडाच पण मराठी माणसालाही पुरेशी माहीती आहे का हा प्रश्नच आहे. काही शिवभक्तांनी केलेल्या पाहणीदरम्यान महाराष्ट्रातील फक्त १६% लोकांना शिवरायांबद्दल पुरेशी माहीती आहे. जर अशा महापुरुषांबद्दल आपल्याला माहीती नसेल तर स्वाभिमानी,देशाभिमानी,परोपकारी,साहसी,सुसंस्कृत,निस्वार्थी,अन्यायाविरुध्द लढणारा समाज बनण शक्य आहे का याचा विचार होणे आवश्यक आहे. स्वार्थासाठी फसवा, खोटेपणा करा,चोरा, ओरबाडा पण ते करताना सापडू नका अशी तर मुल्य बनत नाही आहेत ना???का मुल्य,संस्कृती बद्दल बोलणे म्हणजे पुराणमतवादी अशी व्याख्या होत आहे???शेतकर्‍यांच्या शेतांपासुन आपल्या सैनिकांना दुरुन जायला सांगणारे कारण घोड्यांच्या टापांनी शेत उध्वस्त झाले तर शेतकरी उध्वस्त होईल म्हणुन काळजी घेणार्‍या शिवारायांच्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतात व नेते काहीही करत नाहीत हे बघुन चिड येते. शिवकालीन न्यायव्यवस्थेपासुन आजची न्यायव्यवस्था पुढे आहे का मागे???आपले राजकीय नेते एकमेकांना शह देण्यास जी बुध्दिमत्ता आणि कुटनीती वापरतात ती ते देशाच्या निरनिराळ्या समस्या सोडविण्यास एकत्र येउन का वापरत नाहीत्???आम्ही आमच्या कार्यक्रमात दरवर्षी सांगतो की शिवाजी महाराज खुपच महान होते,आम्हाला शिवाजी महाराज बनवायचा नाहीये पण आमच्या कार्यक्रमातुन प्रेरणा घेउन एकजरी मावळा बनला तरी आम्ही आमचा प्रयत्न सफल मानु. पण मावळा बनण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती आपल्यात आहे का???

चिन्मय नंदकुमार कुलकर्णी.

रत्नपारखी शिवराय : भाग एक - बाजी पासलकर.....एक झलक.....

बाजी लढताना एक घाव त्यांच्या पाठून त्यांच्या फिरंग समशेरधारी उजव्या हातावर झाला.वेदनेने कळवळलेले बाजी त्या भ्याडाचा प्रतिकार करण्यासाठी त्याही परिश्तितीत वळले आणि तोच क्षण साधत गनिमाची तलवार त्यांच्या छातीवर उतरली.पासष्ठ वर्षांचा तरणाबांड योध्दा-बाजी पडले !
आपल्या मागे वळण्याची इतिकर्तव्यता झाली हे लक्षात येताच फत्तेखान आपल्या सैन्यासह परत वळून पळून गेला.कावजी मल्हारला हे समजताच तो तीरासारखा सासवडला धावला.आपल्या धन्याचं जखमी शरीर पाठीवर लादून वाहून नेणारी बाजींची यशवंती घोडी आणि कावजी मल्हार यांच्या दु:खाची जात एकच होती ! पुरंदर येईतो बाजींनी शरीरातली धुगधुगी फक्त आपल्या विजयी राजाला - शिवरायांना पहाण्यासाठी व दोन अखेरचे शब्द बोलण्यासाठी शिल्लक ठेवली होती.गडाच्या पायथ्यापासून बाजींची पालखी वर आली आणि वाट चुकलेलं कोकरू आपल्या आईला-गोमातेला बघताच धावत सुटतं तसे राजे पालखीकडे धावले ! पालखी उतरून त्यांनी बाजींचं जखमांनी छिन्नविच्छिन्न झालेलं शरीर तोललं आणि त्यांची मान आपल्या मांडीवर घेत टाहो फोडला,"बाजी,आम्हाला असं पोरकं करुन कुठे चाललात?"
राजांचे अश्रू बाजींच्या जखमांवर पडले.खारट पाण्याने जखमा चुरचुरल्या पण आपलं बलिदान जणू राजाने अभिषेकाने पावन केलं या जाणिवेनं मरणाच्या दारात असलेल्या बाजींच्या गलमिश्या थरथरल्या! क्षीण पण करारी आवाजात ते बोलले,"आरं मांज्या राजा,तुला भेटलो,औक्षाचं सोनं जालं रं मांज्या ल्येकरा ! मला ल्योक न्हाई पर मरताना तुंजी मांडी गावली.त्या फत्याचं मुंडकं आननार व्हतो रं , पर डांव चुकला आन् त्यो पळाला.थोरल्या रांजास्नी पकडून नेणार्‍या त्या नामर्द बाजी घोरपड्याला नागवनार व्हतो पर त्ये बी र्‍हाईलं ! पर तू नगं चिंता करू!, ह्यो मांजा नातू सर्जेराव बाजी जेधे आन् त्येचा बा कान्होजी जेधे हाईती तुंज्या सांगाती.येक डाव माफी कर राजा, म्होरला जलम घिऊन यी न पुन्यांदा सवराज्यासाटी लडाया!तुज्यासाटी द्याया येकलाच जीव गावला ह्ये वंगाळ बंग ! म्या चाललू रांजा, आपलं सवताचं सवराज्य व्हनार, जय काळकाई !....."
राजांच्या मांडीवर प्राण सोडलेल्या बाजींचे डोळे उघडेच होते, ते शिवबांनी मिटले आणि दाबून ठेवलेल्या हुंदक्यांना वाट करून दिली.....

---------------------------------------------------------------------------------
उदय गंगाधर सप्रे लिखित "रत्नपारखी शिवराय : भाग एक - बाजी पासलकर" या आगामी पुस्तकातून सप्रे

थोरांची टोपण नावे.

सखाराम_गटणेंच्या लेखावरून मला ही चर्चा सुचली. बर्‍याच थोरामोठ्यांना लोक टोपण नावाने ओळखतात. पण एकच टोपण नाव अनेकांना मिळाल्याचे दिसते. म्हणजे बघा

तात्या
तात्याराव सावरकर
तात्या टोपे
सेनापती बापट

नाना
क्रांतीसींह नाना पाटील.
नाना फडणवीस
नानासाहेब पेशवे.

बाबा
बाबा आमटे
बाबाराव सावरकर
भालजी पेंढारकर

तुम्हीही यात थोडी भर घाला.

की घेतले व्रत न हे अम्हि अंधतेने.....

रत्नागिरीस आलो असताना पतित पावन मंदिर व स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकास भेट दिली व काही अमुल्य क्षण टिपले.....
माझी सर्व मिपा करांस नम्र विनंती आहे,,जर कधी रत्नागिरीस येण्याचा योग झाला तर या ठिकाणी जरुर भेट ध्या.
(विशेष आभार :-- सौ.गीता कृ पालवणकर यांच्या कडुन त्यांच्या अंदमान भेटीतील काही फोटो इथे दिलेले आहेत.)


(सप्टेंबर १९२९ मधे आपल्या अमोघ वत्कृत्वाने सभा जिंकुन पूर्वास्पृश्याना रत्नागिरी येथील मंदिरात प्रवेश मिळवून देताना तात्याराव सावरकर )


(भारतात सर्वात प्रथम विदेशी कपड्यांची होळी पुण्यातील लकडी पुलाजवळ करताना लोकमान्य टिळकांसमवेत युवा सावरकर:--७ ऑक्टोबर १९०६ विजयादशमी)


(चाफेकर बंधुंच्या फाशीमुळे उद्विग्न होऊन भगुर येथील आपले घरातील अष्टभुजा देवीसमोर भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी मारिता मारिता मरेतो झुंजेन अशी शपथ घेताना बाल विनायक :--१८ एप्रिल १८९८ )


(अंदमानात 'कोलू' नावाच्या तेलाच्या घाण्याला जुंपून घेऊन प्रखर देशभक्तीच्या गुन्ह्यासाठी दोन जन्मठेपांचा सश्रम कारावास भोगताना स्वातंत्र्यवीर सावरकर )


(स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्या 'मोरिया' जलयानातुन उडी मारुन मार्सेलिस,फ्रान्सचा किनारा गाठला त्याची प्रतिकृती)

अंदमान :--


(येथेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ठेवण्यात आले होते.)

(स्वातंत्र्यवीर सावरकर भक्त )
मदनबाण.....

२५ जुन- १९८३

२५ जुन १९८३ भारतीय क्रिकेट इतिहासातील सोनेरी दिवस .या दिवशी भारताने कपिल देवच्या नेतॄत्वाखाली विश्वचषक जिंकला होता. आज या गोष्टीला २५ वर्ष पुर्ण झाली. सांघिक कामगिरी, अष्टपैलू -मेहनती खेळाडू यांच्या जोरावर भारतीय संघाने दैदिप्यमान यश संपादन केले.

नुकताच त्यावेळच्या भारतीय संघातील खेळाडुंना २५ लाख रु. देऊन दिल्ली येथे सत्कार करण्यात आला. (ज्यावेळी संघ भारतात कप जिंकुन आला त्यावेळी बोर्डाकडे खेळाडुंना द्यायला पैसे नव्हते. लता मंगेशकरांचा एक कार्यक्रम ठेवुन बोर्डाने कसेबसे १ लाख रु. सर्वांना दिले.)

आजच्या व्यावसायिक खेळाडुंना मिळणार्‍या रकमेपेक्षा २५ लाख ही रक्क्म फार मोठी नाही. परंतु सर्वांच्या चेहेर्‍यावरचे समाधान आणी आपण देशासाठी काही तरी करु शकलो ही भावना या पैशापेक्षा खुप मोठी होती.

कुणा मिपाकरांना त्यावेळच्या काही आठवणी सांगता येतील का?

छत्रपती शिवरायांची माणसे - यावरील पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन आणि वितरण

मिपा चे समस्त सुजाण वाचक,

सप्रे नमस्कार.
मी गेले बरेच दिवस "छत्रपती शिवरायांची माणसे" यावर क्रमशः लिहितोय्.यापैकी प्रथम भाग : बाजी पासलकर लिहून तयार आहे.या संबंधात मी अनेक प्रकाशकांशी बोललो आणि काल या सगळ्याचा गोषवारा काढला तो पुढीलप्रमाणे :

१. हे ३२ पानी पुस्तक आहे ज्याची किंमत ३५/- रुपये आहे.
२. १००० प्रती खपवायच्या झाल्यास किमान ३ वितरक नेमावे लागतील , आणि वितरकांची अपेक्षा विक्रीच्या किंमतीच्या किमान ४० % एव्हढी आहे.यासाठी इतर लोक / प्रकाशक करतात (असे मला एका प्रकाशकानेच सांगितले आहे) तसे मूळ पुस्तकाचे किंमत अव्वा च्या सव्वा मला करायची नाहिये (आणि तसे केल्यास ते विकलेही जाणार नाही !) कारण माझा मूळ उद्देश पैसे कमावणे हा नसून लोकांच्या-सुजाण वाचकांच्या मनात घर करण्यासाठी त्यांच्या घरात प्रवेश मिळविणे (पुस्तकाच्या रूपाने) असा आहे.आणि त्यांना ४० % दिले तर माझा छपाईखर्चच निघून येणार नाही.जरी पैसा कमावणे हा उद्देश नसला तरी पुढील पुस्तकाचा पाया तरी उभा रहायला हवा ना? पुढील पुस्तक : कान्होजी जेधे - ९०-९५ % लिहून झाले आहे.
३. दुसर्‍या एका प्रकाशकाची पध्दत अशी : प्रत्येक पानाला ते २५/- रुपये देतात मानधन म्हणून म्हणजे मला ८००/- देणार आणि आयुष्यभर माझ्या पुस्तकाच्या हव्या तेव्हढ्या प्रती काढून विकणार्.पण ते पुस्तक मात्र छान काढतात आणि म्हणून मी तयार होतो यासाठी पण ते काल म्हणाले की त्यांच्याकडे सध्ध्या एव्हढे लिखाण पडून आहे की मला अजून २-३ वर्षे थांबावे लागेल !
म्हणून माझी मिपा च्या तमाम वाचकांना अशी विनंती आहे की समजा मीच जर का १००० प्रती काढून खपवायच्या म्हटल्या (नुस्ती संख्या नव्हे - मिपा सारख्या वाचकांना विकल्या म्हणजे- ते पुस्तक वाचले जाईल याची खात्री राहील !) तर मिपा मला याबाबत किती सहकार्य करू शकेल? - म्हणजे मिपा चे वरिष्ठ लोक याबाबत काय सहकार्य करू शकतील?(प्रत्येकाने काही प्रती वितरीत केल्या तरी ही खूप मोठ्ठी मदत होईल मला.मागे मी याबाबत मिपा वर विचारले असता बर्‍याच लोकांनी प्रायोजक म्हणून पैसे देण्याची पण तयारी दाखवली होती !)

आपण मला माझ्या ई-मेल वर पण लिहून तसे कळवू शकता : sudayan2003@yahoo.com

कळावे , आपल्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट पहात आहे.

उदय सप्रे
भ्रमण ध्वनी : ९९६७५ ४२७०३