चित्रपट

कुंग फु पांडा

आज विमुक्तचा हा धागा बघताना कुंग फु पांडाची आठवण झाली आणी मी लिहिता झालो.

--

बरेच दिवस मित्रांनी "साल्या तु कुंग फु पांडा बघच !" असा घोषा लावला होता. काही दिवसांपुर्वी बिका आणी मकीच्या कृपेने हा अप्रतिम अ‍ॅनीमेशनपट पाहायाला मिळाला. साधी सरळ गोष्ट पण आयुष्याची छान छान सुत्रे शिकवुन जाणारी.

'पो' हा खरेतर पिस व्हॅली मध्ये राहणारा एक पांडा, पण तो आपल्या पालनकर्त्या वडलांबरोबर (गुज पक्षी) राहात असतो. पुढे जाउन पो ने आपले न्युडल्स शॉप समर्थपणे सांभाळावे हि त्याच्या वडिलांची अपेक्षा असते तर ह्याच्या अगदी उलट म्हणजे एक विख्यात कुंग फु मास्टर बनण्याचे पो चे स्वप्न असते. गंमत म्हणजे तो झोपेत देखील तो एक कुंग फु मास्टर बनल्याची स्वप्ने पाहात असतो.

पिस व्हॅलीचे संरक्षक आणी मास्टर शिफुचे पाच शिष्य 'मंकी, टायग्रेस, मांटीस, व्हायपर आणी क्रेन हे पो चे आदर्श असतात. त्यांच्यासारखेच मास्टर बनायचे हा पो चा ध्यास असतो.

.

टोर्टोइज मास्टर उग्वे ह्याला कधीकाळी मास्टर शिफुचा शिष्य असलेला पण आपल्या गुंड आणी विनाशक प्रवृत्तीमुळे सध्या बंदीवासात असलेला लिओपार्ड मास्टर 'ताय लंग' हा कधितरी स्वत:ची सुटका करुन घेउन पुन्हा एकदा पिस व्हॅलीची शांतता भंग करणार ह्याची खात्री असते, त्यामुळे त्याला रोकण्यासाठी तो ड्रॅगन वॉरीअर' ह्या सर्वोच्च मास्टरची निवड करण्याचे ठरवतो. 'फ्युरियस फाईव्ह' पैकी कोणीतरी एकजण ह्या पदाचा मानकरी ठरणार हे निश्चीतच असते. अशावेळी हि स्पर्धा आणी त्यात लढणार्‍या आपल्या आदर्शांना पाहण्याच्या प्रयत्नात पो स्वत: त्या आखाड्यात येउन पडतो. गंमतीचा भाग म्हणजे अचानक आकाशातुन पडलेल्या ह्या पो ला टोर्टोइज मास्टर नवा 'ड्रॅगन वॉरिअर' म्हणून घोषीत देखिल करुन टाकतो.

.

आता मात्र पो ची चांगलीच गंमत उडते. एका बाजुला खडतर प्रशिक्षण आणी दुसर्‍या बाजुला 'फ्युरिअस फाइव्ह' समोर आपण काहिच नसल्याची सतत होणारी जाणीव पो ला हताश करुन टाकते. एके रात्री टॉर्टोइज मास्टरची चार वाक्यातली शिकवणी पो ला बरेच मानसिक बळ देउन जाते. त्याचवेळी बातमी येते ती 'ताय लंग' तुरुंगातुन पळाल्याची आणी त्या बरोबरीने टोर्टोइज मास्टरनी' आपला अवतार संपवल्याची.

.

'ताय लंग' ला रोकण्यासाठी 'फ्युरीअस फाइव्ह' त्याच्यावर एकत्र चाल करुन जातात, मात्र ह्या सर्वांना निष्प्रभ ठरवत 'ताय लंग' पिस व्हॅली मध्ये येउन पोचतो. पो त्याच्या समोर धैर्याने उभा राहु शकतो ? मास्टर शिफुची शिकवणी पो ला खराखुरा 'ड्रॅगन वॉरियर' बनवु शकलेली असते? ज्या पवित्र ड्रॅगन स्क्रॉलसाठी हा लढा चालु असतो, त्यात नक्की असते काय ? पो आपल्या सर्वात मोठ्या कमकुवतापणाचे सर्वात मोठ्या ताकादित रुपांतर करण्यात यशस्वी होतो का? ह्या सगळ्याची उत्तरे प्रत्यक्ष हा चित्रपट पाहुन मिळवण्यातच जास्ती आनंद आहे.

.

'ताय लंग'ने स्वत:ची करुन घेतलेली सुटका, 'फ्युरीअस फाइव्ह' बरोबर त्याची झालेली लढत अथवा शिफुने अगदी सोप्या पद्धतीने पो ला दिलेले ट्रेनींग हि सर्व दृष्ये खरोखरच दाद देण्याजोगी. २००८ साली निर्माण झालेला ह चित्रपट तंत्रज्ञान आणी सफाईत कुठेही कमी पडलेला नाही. ह्या चित्रपटाचे संगीत देखील चित्रपटाच्या वातावरणाला अगदी साजेसे. पो आणी त्याच्या 'फ्युरीअस फाइव्ह' मित्रांच्या ह्या पिस व्हॅलीला भेट देणे प्रत्येक चित्रपट रसिकासाठी अत्यंत आवश्यकच म्हणाना.

'law and order' या विषयवरील आपले आवडते चित्रपट...

नमस्कार,

नुकतेच Law Abiding Citizen (2009 ) आणि Presumed Innocent (1990) हे दोन चित्रपट पाहण्यात आले, दोन्ही चित्रपट सर्वच बाबतीत उत्तम आहेत. नकीच पाहावेत असे आहेत. अशा प्रकारच्या अजून काही चित्रपटांची नावे माहीत असल्यास ती येथे माहीत करून द्यावीत, अशी सर्व माननीय मिपाकरांना नम्र विनंती. त्याच बरोबर सदर चित्रपट कृष्णधवल आहे की रंगीत याचीही माहिती दयावी.

--
आपला नम्र,
इंटनेटप्रेमी.

२२ जून १८९७

काही दिवसांपूर्वी मी २२ जून १८९७ हा सिनेमा "राजश्रीमराठी.कॉम" वर पहिला. चाफेवर बंधूंवर बनवलेला खरं म्हणजे बराच जुना सिनेमा आहे पण मी आधी कधीही ह्याचं नाव कधी ऐकलं नव्हतं. चाफेकर बंधूविषयी मला माझ्या दुर्दैवाने फार माहिती नव्हती.

ह्या सिनेमात तत्कालीन सामाजिक परिस्थिती मात्र छान रंगवलेय. विशेषत: ब्राह्मण समाजाविषयी गैर ब्राह्मण लोकांचा दृष्टीकोन कसा होता हे सुध्धा चांगल्या पद्धतीने सांगितलेय. सिनामात विखुरलेली गाणी पण खूप चांगली आहेत. (खरं म्हणजे त्या ओव्या आणि तत्सम घरगुती गाणी आहेत. पार्श्व संगीत असं नाहीच आहे.)

पण माझं प्रामाणिक मत सांगायचं तर मला हा सिनेमा पाहून थोडा विरसच झाला. चित्रपटाच्या शेवटी अपेक्षित परिणाम साधला गेला नाही असं मला वाटतं. त्यावेळचे "क्रांतिकारक" आणि आजकालचे "अतिरेकी" ह्यात उगाचच साम्य वाटत होतं. कदाचित त्यामुळेच आपल्या मनातील चाफेकर बंधूंची आणि लो. टिळकांची प्रतिमा आणि सिनेमात दाखवलेली प्रतिमा ह्यांचं समीकरण फारसं जुळलं नाही.

तुमच्या पैकी कोणी हा चित्रपट पाहिलंय का? तुमची मतं ऐकायला आवडतील.

एक कप च्या - परीक्षण

'कला' या संस्थेने ६ फेब्रुवारी ला बे एरियात याचा खेळ ठेवला होता. त्याच बरोबर 'एक साधा प्रश्न' ही एक आणि डॉ जगन्नाथ वाणी यांच्या सामाजिक कार्याबद्दल एक अशा दोन छोट्या फिल्म्स ही बघायला मिळाल्या. दोन्ही छान आहेत.

'एक कप च्या' मला अतिशय आवडला. ज्यांना थिएटर मधे मिळणार नाही त्यांनी डीव्हीडी आणून जरूर पाहा. एकदम हलका फुलका, साधी कथा, सहज सोपे विनोद असलेला चित्रपट आहे.

चित्रपटाच्या सुरूवातीलाच वातावरण निर्मिती सुरेख केलेली आहे. किशोर कदम च्या कुटुंबातील वातावरण फारच मस्त घेतले आहे. कसलेही स्टीरीओटाईप न दाखवता, कसलीही अतिशयोक्ती न दाखवता आप आपल्या वयाप्रमाणे वागणारे या कुटुंबातील सर्वजण आपल्याला एका मिनीटात आवडतात. इतके प्रातिनिधिक कुटुंब मराठी चित्रपटात क्वचित दिसते, त्यामुळे पुढे दाखवले जाणारे प्रश्न आणि ते ते कसे सोडवतात या कथेला एकदम 'मास अपील' मिळतो. हा चित्रपट नेहमीसारखा रिलीज होउन चालला नाहीतर खूप आश्चर्य वाटेल.

कोकणातील एका खेड्यातील ही कथा. नायक किशोर कदम हा एस टी मधे बस कंडक्टर असतो, घरी बायको, चार मुले आणि म्हातारी आई. मुख्य कथा ही की या एका साध्या कुटुंबाला विजेचे बिल एकदम बरेच मोठे येते आणि नायकाला आपले काम सांभाळून वीज मंडळाकडून ते दुरूस्त करून घेताना काय अडचणी येतात आणि त्यावर ते सगळे कसा मार्ग काढतात याचे चित्रण आहे. या प्रयत्नात असताना त्याला गेल्या काही वर्षांत नवीनच लागू झालेल्या माहितीच्या अधिकाराच्या कायद्याची माहिती होते. यात नायकाने त्याचा उपयोग करणे आणि त्यायोगे प्रेक्षकांना त्याची माहिती करून देणे हाही आणखी एक उद्देश असावा.

कोकणाचे अतिशय सुंदर चित्रीकरण आहे यात. एस टी तील त्याच्या नेहमीच्या दिनक्रमाचे शूटिंग आणि त्यात दाखवले गेलेले 'डिटेल्स' हे सुद्ध खूप आवडले. असे डिटेल्स सहसा फक्त इंग्रजी चित्रपटात दाखवतात. म्हणजे कंडक्टर्स, बस कंट्रोलर एकत्र उभे राहून कोणी कोणती बस घ्यायची ते ठरवतात, मग हा जाउन रोजची तिकीटे, नाणी वगैरे घेउन ड्यूटीवर जातो ते दाखवणे आणि त्यातील संवादातून नायकाची व्यक्तिरेखा उभी करणे हे ही खूप छान घेतले आहे. मराठी/हिन्दी चित्रपटात हे अपवादानेच दिसत असल्याने मुद्दाम उल्लेख करावासा वाटला. तेथील भाषा किती अस्सल आहे ते मला माहीत नाही पण बहुधा असावी.

कलाकारांमधे सर्वांचेच काम सुंदर झाले आहे. सर्वात चांगले अश्विनी गिरीचे (किशोर कदम च्या बायकोचा रोल), त्यांच्या घरातील वातावरण तिच्यामुळे आहे असेच नेहमी वाटते. किशोर कदम ने ही मस्त रंगवला आहे नायक. आपण भ्रष्टाचार करायचा नाही आणि कोणाला पैसे देउन काम करून घ्यायचे नाही असे ठाम मत असलेला नायक दाखवताना उगाचच "मै अपने आदर्शोंपे..." छाप भाषा नाही, उलट असेच वागणे नैसर्गिक आहे असे दाखवलेले आवडले. त्याचा मित्र मुस्लिम आहे, पण तो ही सामान्य माणूसच. तो चित्रपटभर "मित्र" या रूपातच वावरताना दाखवला आहे, तेथेही उगाचच हिरवे कपडे, अब्बूजान वगैरे प्रकार नाहीत, कारण त्याची येथे काही गरज नाही. किशोर कदमच्या चारही (!) मुलांची कामे मस्त. तो मित्र, म्हातारी आई, सरकारी कर्मचारी, एसटीतील इतर कर्मचारी, "फलाट" आणि कॅन्टीन चे वातावरण सगळे छान घेतले आहे. देविका दफ्तरदार चा ही रोल सुंदर आहे. अगदी दोष काढायचाच झाला तर त्या धाकट्या मुलीचा उत्साह जरा काकणभर जास्त वाटला. त्याचा मोठा मुलगा एक नाटकातील पत्रकाराची भूमिका करण्यासाठी त्याचे संवाद सतत पाठ करत असताना दाखवला आहे - काही शॉट्स मधे त्याचे संवाद आणि कथेतील शॉट यातून काहीतरी सांगायचा प्रयत्न असावा पण नीट कळाला नाही. फक्त एकदा तो घटनेने भारतीय नागरिकाला दिलेले अधिकार सांगताना वीज मंडळात यांची फाईल फिरताना/बंद होताना दाखवलेले आवडले.

वीज मंडळात मात्र काय चाललेले असते ते जरा आणखी खोलात दाखवले असते तर आवडले असते. हजारो लोक ज्यात काम करत असतात अशा ऑफिसेस मधे काही पद्धती/सिस्टीम्स असाव्या लागतात. त्यात काय दोष आहेत (कशामुळे हा प्रश्न सुटायला एवढा वेळ लागतो) वगैरेचे चित्रण जरा जड/कंटाळवाणे झाले असते म्हणून टाळले असेल.

मी हरिश्चन्द्राची फॅक्टरी पाहिला नाही, त्यामुळे तो किती चांगला आहे मला माहीत नाही, पण एका मोठ्या लोकशाहीत एका सामान्य नागरिकाला आपल्या अधिकारांची जाणीव होउन तो त्याचा कसा वापर करतो हे इतक्या मनोरंजक पद्धतीने दाखवणारा चित्रपट हॉलीवूड मधल्या लोकांना नक्कीच आवडला असता असे वाटते. अमिताभने एका ठिकाणी म्हंटल्याप्रमाणे ऑस्कर म्हणजे ऑलिम्पिक सारखी सर्वोच्च स्पर्धा नव्हे, ती केवळ एका वेगळ्या वातावरणातील वेगळ्या चवीच्या लोकांनी घेतलेली स्पर्धा आहे, पण जर आपण दरवर्षी पाठवत आहोत, तर त्यांना आवडू शकणारा असा चित्रपट पाठवायला हरकत नव्हती.

एकूण अतिशय सुंदर आणि हलका फुलका चित्रपट आहे, जरूर बघा!

नंतर एक आठवले - "कंडक्टर" (वीजवाहक या अर्थाने) चा वीज प्रवाह काढून घेणे यात लेखक-दिग्दर्शकांना काही श्लेष दाखवायचा होता की काय कोणास ठाउक Smile

पण शाहरूख खान ने एक चूक केली

शाहरूख खानने आय पी एल च्या खेळाडूंच्या लिलावानंतर पाकिस्तानी (म्हणत आहेत त्याप्रमाणे तर सर्वच देशांच्या) खेळाडूंना समर्थन दिले. शिवसेनेने त्याविरोधात दंड थोपटले आणि 'माय नेम इज खान' वर बहिष्कार टाकण्यास सांगितले. शाहरूख खान म्हणतो, " मला भारताबद्दल देशप्रेम आहेच. मी त्याविरोधात काही बोललो नाही." (नेमकी त्याची वाक्ये नाहीत पण आशय तोच).

गेले आठवडाभर हो नाही चालत, पुन्हा 'माय नेम इज खान' चा विरोध समोर आला. काँग्रेस सरकारने दुटप्पीपणा करत लगेच ह्या सिनेमाला सुरक्षा देण्याचे ठरवले. इतर वेळी ' सुरक्षा मागाल तर देऊ' ही भूमिका. शाहरूख खानने काही चर्चा करण्यास नकार दिला. आणि आता सिनेमाच्या प्रिमिअरकरिता थेट दुबईला गेलाय.

सर्व वादात शिवसेना, काँग्रेस, शाहरूख खान ह्यात कोण चूक, कोण बरोबर हे नेमके कोणालाच कळत नाही आहे. पण सध्या तरी शाहरूख खान ने एक चूक केली असे वाटते. त्याने म्हटलेल्या वाक्यावर रण माजले आहे. भले तो बरोबर असेल, पण त्याच्या सिनेमाच्या नावावर इथे सुरक्षेला धोका पोहोचत आहे आणि त्याची पर्वा न करता तो त्याच्या 'चाहत्यांना' अशा स्थितीत टाकून देशाबाहेर जाऊन बसलाय आणि सिनेमाची जाहिरात, प्रदर्शन करत आहे हे मला तरी पटत नाही. तो म्हटला त्याप्रमाणे हे देशप्रेम नाही.

(हेच विचार माझ्या अनुदिनीवरही)

नटरंग आणि आमचं शंके़खोर मन

आमचे शंकेखोर मन घेऊन आम्ही सहसा मराठी बोलपट पाहाण्यास जात नाही, कारण मनास फार (कु)शंका पडतात, आणि त्यामुळे आम्हांस फार तसदी होते, असा आमचा नित्य अनुभव आहे. तरीही मराठी भाषा-संस्कृतीवरील प्रेमापोटी आणि सर्वांच्या स्तुतिसुमनांमुळे आम्हांस मोह झाला आणि आम्ही ते धाडस अखेर केले. आता आम्हांस पडलेल्या या काही शंका...

टिप्पणी १: आम्ही करमणूकप्रधान बोलपट (उदा: गोविंदा वगैरे) पाहावयास जाताना मेंदू नावाचा आमचा अवयव नेमाने घरी ठेवून जातो, पण उपरनिर्देशित बोलपटाने पारितोषिके वगैरे मिळवून गोविंदाच्या बोलपटांहून उच्च दर्जा प्राप्त केलेला असावा, असा आमचा कयास होता, त्यामुळे आमच्या मेंदूस आम्ही बरोबर नेले. ही गलती असल्यास त्याची माफी आम्ही आधीच मागतो, पण हेही कबूल करतो, की मेंदू नेला नसता तर झाली असती, त्याहून तो नेल्याने अंमळ अधिक करमणूक झाली.

टिप्पणी २: आपण चित्रपट पाहिला नसल्यास चित्रपटात घडणारे काही कळीचे प्रसंग आपल्याला खालील मजकुरामधून कळू शकतात. त्यामुळे आपल्या जबाबदारीवर तो वाचावा.

  1. बोलपट नक्की कोणत्या काळात घडतो? एस. टी. सारखी दिसत राहाते, म्हणजे फार जुना नसावा. तसेच लोकांची भाषा, कपडे, तमाशातील अजय-अतुल यांचे संगीत वगैरे पाहताही असा समज होतो. पण पत्र, टेलिफोन, एस. टी. डी. बूथ वगैरे प्रकारांचा शोध लागला नसावा, असे दिसते. कारण बाप मेल्यावर महिनाभर गुणाचा कुटुंबाशी काही संपर्क नाही. सर्वसामान्यतः मनुष्यगणातील सजीव आपल्या जिवलगांपासून दूर गेल्यास त्यांची ख्याली-खुशाली पुसण्यास आणि आपली सांगण्यास उपरनिर्देशित साधनांचा उपयोग करतात, असा आमचा अनुभव आहे.
  2. अतुल कुलकर्णी नाच्या होण्यास तयार होतो आणि प्रत्यक्ष नाच्या बनतो, या दरम्यान नक्की किती काळ जातो? पैलवान गडी नंतर इतका हडकतो, की काही महिने दुष्काळ, उपोषण किंवा कुपोषण झाल्याचा भास होतो.
  3. घरंदाज स्त्रियांना तमाशात काम करण्याविषयी विचारल्यास मार पडेल, हे कळण्यास किती अक्कल लागते? तेवढीही अक्कल नसलेले पुरुष जो तमाशा उभा करतील, तो बक्कळ चालेल, यावर आमचा विश्वास बसणे अंमळ कठीण गेले.
  4. कोंकणस्थ स्त्रिया या आमच्या घरच्याच! तरीही गोरीघारी स्त्री फडावर नाचताना पाहून आम्हांस काही तसदी वगैरे होत नाही; तितके आम्ही प्रागतिक (किंवा निर्लज्ज, काय म्हणाल ते!) आहोत. परंतु अशा स्त्रीने ग्रामीण असल्याचे दाखवताना हेल, भाषा, हावभाव यांवर थोडे कष्ट घ्यावेत, एवढीच आमची माफक अपेक्षा होती. ते इतके का जड आहे?
  5. अतुल कुलकर्णी नाच्या होईस्तोवर घंटाभर उलटून गेला असावा. मुख्य कथानक तोवर सुरुच होत नाही. असे का? त्यानंतरच्या घंटाभरात मात्र शून्यापासून लोकप्रियतेच्या शिखरापर्यंतचा प्रवास, मग उत्कर्षबिंदू, मग पुन्हा शून्य आणि मग पुन्हा शिखर असा बोलपटाचा प्रवास होतो. त्यामुळे ते सर्व 'लवकर आटपा एकदाचे' अशा स्वरूपात होऊन जाते. असेही का? पहिला घंटाभर आम्ही मिशी कधी उतरेल आणि लावणी कधी सुरु होईल, याची वाट पाहिली. आम्हांस फार कंटाळा आला. इतरांस तो का येत नाही, याचा काही अदमास येत नाही. शून्यापासून शिखरापर्यंतचा दुसरा प्रवास तर दाखविलाच नाही. बहुधा तोवर बोलपटातले कलाकार आणि दस्तुरखुद्द दिग्दर्शक देखील कंटाळून गेले असावेत, असा कयास आम्ही काढला.

टिप्पणी ३: आम्ही सदाशिव पेठी. त्यामुळे वैचारिक मतभेदांची आम्हांस नको तेवढी आदत आहे. हिंसेची मात्र अजिबात आदत नाही. आमचा शंकेखोर मेंदू थोडा मागासलेला आहे, असे हे वाचून आपणांस वाटले, आणि आम्हांस झ, फ, भ वगैरे अक्षरे मिरवणार्‍या शिव्यांची लाखोली द्यावयाची मनीषा झाली, तर ती शक्यतो खाजगीत द्यावी, ही विनंती. आम्ही आपल्या भावना (आनंदाने नाही, पण) स्वीकारू. बाकी काही नाही, तरी आमच्या शंकांनी आपली किंचित करमणूक तरी झाली असेल, एवढीच गरिबाची आशा आहे.

- चिंतातुर जंतू Worried

कन्नथिल मुथ्थुमित्ताल ( २००२) ... राष्ट्रीय पुरस्कारविजेता चित्रपट

कथा पटकथा आणि दिग्दर्शन मणिरत्नम....
हम्म्म....
दहशतवादाच्या आणि हिंसेच्या पार्श्वभूमीवरच्या प्रेमकथा मणिरत्नमने यापूर्वी रोजा ( १९९३) , बॊम्बे ( १९९५) आणि दिल से ( १९९८) बनवल्या होत्या. त्यातला रोजा आवडला होता ( अगदी डायरीत मणिरत्नमची नोंद करून ठेवली होती.. मॆन टू बी वॊच्ड Smile म्हणून ) आणि दिलसे ठीकठाक वाटला होता... शेवट भलताच गुंडाळल्यासारखा वाटला होता..

बर्‍याच वर्षांपूर्वी एका मित्राने मला या "कन्नथिल मुथ्थुमित्ताल" सिनेमाबद्दल सांगितल होते, कोणत्यातरी फेस्टिवलमध्ये त्याने पाहिला आणि बघच म्हणाला होता....
मणिरत्नम आणि तामिळ दहशतवाद वगैरे म्हटल्यावर मी तोंडदेखले बरं बरं असे म्हटले होते... आता टेररिस्ट मंडळी , त्यांच्यात अडकलेला सामान्य माणूस किती निराळ्या पद्धतीने दाखवणार असं आपलं मला वाटत होतं.... पण काल चित्रपट पाहिल्यावरती आपली तर बोलतीच बंद झाली... अप्रतिम सिनेमा आहे...
( ... टाईम मासिकात आलेल्या सत्यघटनेवरून या सिनेमाची प्रेरणा घेतली आहे... एका अमेरिकन कुटुंबाने त्यांच्या दत्तक मुलीची खरी आई शोधण्यासाठी फिलिपाईन्सपर्यंत प्रवास केला, अशी काहीशी ती कथा होती)

थोडक्यात कथा अशी...
चेन्नईमध्ये राहणार्‍या एका लेखकाला (आर. माधवन)आणि त्याच्या बायकोला ( सिम्रन) तीन मुले , त्यतली अमुधा ( कीर्तना) ही नऊ वर्षांची.... तिच्या नवव्या वाढदिवसाला तिचे वडील तिला सांगतात की ती त्याची मुलगी नाही, तिला दत्तक घेतले आहे. मुलीचे भावविश्व टोटल गंडते. आपली खरी आई कोण? आपल्या आईने आपल्याला का सोडून दिले असेल असे प्रश्न तिला सतावायला लागतात... आई शोधण्यासाठी मुलगी स्वत:च प्रयत्नाला लागते , ते पाहून मुलीसाठी तिचे दत्तक आईवडील तिची खरी आई शोधायचे मान्य करतात... त्यांना अर्थात खर्‍या आईचे नाव आणि श्रीलंकेतले एक गाव इतकेच ठाऊक असते. पुढे सुरू होतो, तुटपुंज्या माहितीवरचा श्रीलंकेतला प्रवास.....

हा सिनेमा दहशतवादावर काहीच स्टँड घेत नाही असा काहींचा आक्षेप आहे.. ( मला काही असे वाटले नाही... गोष्ट एका नऊ वर्षे वयाच्या मुलीची आहे, तिच्या आईला शोधण्यासाठी केला गेलेला प्रयत्न आणि त्यांची होणारी भेट इतकाच आहे...

२००२ च्या या सिनेमाला ६ राष्ट्रीय पारितोषिके मिळाली.
रजत कमळ उत्कृष्ट प्रादेशिक सिनेमा, संगीत ( रहमान) , गीत ( वैरामुथु), बालकलाकार ( कीर्तना) , सिनेमॅटोग्राफी ( रवि के चंद्रन).......


हॅप्पी फ्यामिली




माझी आई कुठाय?


मी तुला तुझ्या आईकडे घेऊन जाईन


प्रवास

आई सापडली??

ल्यापटापावर पाहतानाही सिनेमेटोग्राफी भारी वाटत होती, थिएट्रात तर काय होत असेल? बालकलाकार कीर्तना अप्रतिम.... मणिभाऊ पोरांकडून मस्त काम करून घेतात...
आप्ली सिम्रन ( पूर्वी फ़क्त हिच्यावर आम्चा फ़ार जीव ..टायपातली कामं करताना पाहिली होती...इथे ती चक्क उत्तम अभिनय करते)... रहमानचं संगीत नेहमीप्रमाणेच मस्त..... शिवाय या सिनेमात दलपती, रोजा,गुरू सारखं म्हातार्‍या खेडुत बायांचा नाच नाहीये ते एक बरं आहे....... दोन तीन गाणी अजिबात अनावश्यक... आम्ही पुढे ढकलून पाहिली... जालावर एका पाश्चात्य मानवाचे परीक्षण वाचले... तो म्हणतो ,'सिनेमा आवडला पण मध्ये मध्ये म्यूझिक व्हिडिओसाठी इतका वेळ थांबतात का देव जाणे..." Smile

हा पिक्चर सोडून आपण ऑस्करसाठी २००२ साली देवदासला पाठवले हे समजल्यावर मन भरून आले.... ( ०१ साली लगानला बक्षीस न दिल्यामुळेच ज्यूरी मंडळींची खोड मोडण्यासाठी असा लांबुळका सिनेमा पाठवला असावा , असे एक मत वाचले. Smile मज्जा आली.. )

या सिनेमावर एका दत्तक मुलांसाठी काम करणार्‍या एन्जीओमधल्या एका ताईंनी प्रचंड शिव्या घातलेल्याही वाचल्या... ( हा सिनेमा पाहून आईवडील मुले दत्तक घ्यायला घाबरतील , यात दत्तक कोणाला घता येते यासंबंधी अपूर्ण माहिती आहे , वगैरेवगैरे त्यांचे आक्षेप होते...... चित्रपट पाहताना काही असे वाटले नाही, हे खरे...

चुकवू नये असा हा सिनमा आहे...

जरूर बघा...

एक मुलाकात... संदीप कुलकर्णीशी.

नोव्हेंबर महिन्यातील एक शुक्रवार, स्थळ- ग्रँड सिनेप्लेक्स दुबई. दुबईत प्रथमच एका मराठी चित्रपटाचा प्रिमियर शो होत होता. 'गैर' हे त्या चित्रपटाचे नाव. दुबईतल्या एका प्रतिष्ठीत मल्टीप्लेक्स मधे हिंदी आणि इंग्लिश चित्रपटाच्या बरोबरीने एक मराठी चित्रपट दिमाखाने झळकत होता. हजारोंच्या संख्येने उपस्थित राहीलेल्या मराठी माणसाचे उर अभिमानाने भरुन येत होते आणि कारण हि तसेच होते की. ३ हॉल्समधे एकाच वेळी ह्या चित्रपटाचे स्क्रीनींग होत होते.

एकुण वातावरण प्रचंड उत्साही होते आणि त्याला एका उत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले होते. आणि ह्या प्रसंगाला चार चांद लावले ते सिनेमातील प्रमुख कलाकार आणि दिग्दर्शक ह्यांच्या उपस्थितीने. दिग्दर्शक सतिश राजवाडे, आणि प्रमुख कलाकार संदीप कुलकर्णी, अंकुश चौधरी, अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडीत हे स्वतः ह्या शो साठी जातीने उपस्थित होते. मराठी चित्रपटाला देखिल इतके ग्लॅमर असु शकते हे 'गैर' ह्या चित्रपटाने दाखवुन दिले.


संदीप कुलकर्णी एक कलाकार म्हणुन मला नेहमीच आवडतात. ते एक गुणी, अभ्यासु आणि हुषार कलाकार आहेत, ज्या कन्व्हिक्शन नी ते काम करतात ते खरंच मानण्याजोगं आहे. अगदी अवंतिकेपासुन ते डोंबिवली फास्ट, श्वास आणि इतर अनेक चित्रपटातून त्यांचा अभिनय आपण बघितलेला आहे. त्यांनी अनेक जॉनरच्या आणि वैविध्यपुर्ण भुमिका आत्तापर्यन्त केल्या. प्रत्येक भुमिकेला ते योग्य तो न्याय देतात.

गैर मधिल त्यांची भुमिका इतकी वेगळी आहे, एकदम ग्लॅमरस आणि स्टाईलीश रोल आहे, पण आपल्या समर्थ अभिनयाने त्यांनी ती भुमिका अगदी बखुबी निभावली आहे. खरंतर रुढार्थाने एका हिरोला लागणारे लुक्स किंवा चेहेरा संदीप कुलकर्णीकडे नाही, पण शेवटी समर्थ अभिनयापुढे ह्या सर्व गोष्टी फोल आहेत हेच खरं. केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी 'गैर' चित्रपटातील एका ग्लॅमरस हिरोची भुमिका अगदी ताकदईने पेलली आहे.

चित्रपट संपल्यानंतर सर्व कलाकार बाहेर उभे होते. मी प्रत्येकाशी एक-दोन वाक्ये बोलली. तेव्हाच मनात आले अरे जर संदीप कुलकर्णींचा इंटरव्ह्यु घेता आला तर? माझ्या मनातील विचार मी लगेच संदीपना बोलुन दाखविला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता लगेच होकार दिला.

दुसर्‍या दिवशी मी सकाळी त्यांना भेटायला पतीसह गेले. हॉटेलच्या लॉबीत ते आले. त्यांचा ब्रेकफास्ट झालेला नव्हता त्यामुळे आपण ब्रेकफास्ट रुममधेच बसायचे का असे त्यांनी मला विचारले. मी अर्थात 'हो' म्हणाले. मग ब्रेकफास्ट करता करता आम्ही अगदी इन्फॉर्मल गप्पा मारल्या. मला खरेतर थोडी मनातुन धाकधुक वाटत होती पण संदीपशी बोलल्यानंतर ती भीती कुठल्याकुठे पळाली. कारण मला त्यांच्यात कुठलीही आढ्यता, गर्व असल्या गोष्टींचा लवलेशही नाही सापडला. हि वॉज सो डाउन टु अर्थ अँड सिंपल.

मी त्यांच्याशी ज्या गप्पा मारल्या त्याच आपल्या समोर मांडत आहे. त्यांनी बोलतांना जे जे इंग्रजी शब्द वापरले ते तसेच ठेवले आहेत. त्यांची वाक्ये जशीच्या तशी आपल्या समोर मांडत आहे. त्यामुळे जर खुप जास्त इंग्रजी शब्दांमुळे रसभंग होत असेल तर क्षमस्व.

तुम्ही मुळचे कुठले आणि अभिनय क्षेत्रात कसा प्रवेश झाला?

मी मुळचा मुंबईचाच. माझी आई पुण्याची आहे, जन्म पुण्याचा पण माझे सर्व शिक्षण हे मुंबईतच झाले. माझी कर्मभुमी हि मुंबईच आहे.

मी अ‍ॅक्चुअली जे.जे. स्कुल ऑफ आर्टस चा विद्यार्थी आहे. कॉलेजातून मी नाटकात वैगरे कामं करायचो. इंटर कॉलेज एकांकिका-नाटकांमधुन मी कामं केली. त्यात बक्षिसेही मिळाली. त्याच वेळेला सई परांजपेंची छोटे-बडे हि दूरदर्शन मालिका चालु होती त्यात मी गंमत म्हणुन काम केले. कारण ती मालिका आर्ट कॉलेजवरच होती. तिथुनच अ‍ॅक्टींगची आणि ह्या क्षेत्राची आवड निर्माण झाली.

मग मी एन्.एस्.डी (नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा) जॉईन करायचा विचार केला. माझी एन्.एस्.डी ची अ‍ॅडमिशन प्रोसिजर चालु असतांनाच माझी ओळख सत्यदेव दुबेजींशी झाली. दुबेजी स्वतःच एक इंस्टीट्युट आहेत. त्यांच्याबरोबर काम करणं हे कुठल्याही अ‍ॅक्टींग स्कुलमधे शिक्षण घेण्यासारखच आहे किंबुहना दुबेजींबरोबर जास्त शिकायला मिळतं कारण त्यांचे प्रत्येकाकडे वैयक्तीक लक्ष असतं. त्यामुळे मी ३ वर्षे दुबेजींबरोबर काम केले. वेगवेगळ्या भाषांमधे थिएटर केले, म्हणजे हिंदी, इंग्लिश, मराठी आणि इतर काही भाषा. तेंडुलकर, एलकुंचवारांपासुन ते अतिशय यंग अशा लेखकांच्या नाटकात कामे केली. तीथे ३ वर्षात मला खुप काही शिकायला मिळाले. त्यामुळे मला आजही वाटत माझे एन्.एस्.डी मधे अ‍ॅडमिशन न घेता दुबेजींबरोबर ३-४ वर्षे काम करण्याचे डिसिजन योग्यच होते. आणि हे माझे फांउडेशन होते. ह्या काळात इतके वाचन आणि रिगरसली काम केले कि माझे एक अँक्टींग क्षेत्रात स्ट्राँग फांउडेशन तयार झाले आणि त्याचा मला आत्ता खुप फायदा होतो आहे.

तुम्ही खरे घराघरांत जे पोहोचला ते अवंतिका ह्या मालीकेमुळे. ह्या मालिकेविषयी काही आठवणी सांगाल का?

तसं बघायला गेलं तर मला टेलिव्हिजन कधिच फारसं एक्साईट करायचे नाही. मी व्हिज्युअल आर्टस चा विद्यार्थी असल्याने मला सिनेमा जास्त आवडतो. मी कॉलेजमधे असल्यापासुन वर्ल्ड सिनेमा पाहीला होता. त्यामुळे सिनेमा किती पॉवर्फुल असतो ते मला माहीत आहे. टेलिव्हिजन हे जस्ट एक वेहिकल म्हणुन मी बघतो. जेव्हा हातात सिनेमाचे काम कमी असेल तेव्हा मग मी टेलिव्हिजन वरच्या मालिका स्विकारतो.

आणि श्वास नसता झाला तर मी मराठी सिनेमात कधीच दिसलो नसतो. कारण त्या आधिचा मराठी सिनेमामधे म्हणजे जास्त करुन कॉमेडी आणि त्या प्रकारच्या सिनेमात मी स्वतःला कुठेही प्लेस करु शकलो नसतो.

मी श्वासच्या आधी बर्‍याच हिंदी सिनेमातुन कामे केली. जसे मम्मो, शूल, हजार चौरासीकी माँ, इस रात कि सुबह नही. चांगल्या दिग्दर्शकांबरोबर मी कामे केली. कारण हे सगळे लोकं पृथ्वी थिएटरला नाटक बघायला येयची ज्यात मी काम करायचो. तिथुनच त्यांनी मला स्पॉट केले आणि त्यांच्या सिनेमात काम करण्याची ऑफर दिली. त्याचवेळी टेलिव्हजन पण पॉप्युलर होत होतं, डेली सोपची कन्सेप्ट आपल्याकडे रुजु लागली होती. मग मी बर्‍याच हिंदी मालिकांमधुन कामं केली. जसे ९ मलबार हिल, स्वाभिमान वैगरे. सहारा वर क्षितिज अशा अनेक हिंदी मालीकांमधुन मी कामे केली. पण नंतर ह्या डेली सोप्सचा पण कंटाळा येउ लागला कारण तेच तेच काम किती दिवस करणार?

पण त्याच दरम्यान मराठी चॅनेल्स सुरु झाले. अल्फा मराठी आले आणि अवंतिका देखिल त्याच दरम्यान आली. अवंतिका करतांना मला वाटले नव्हते कि ती इतकी पॉप्युलर होईल. पण अवंतिकेच्या बाबतीत एक म्हणता येईल कि त्याची सगळी टिमच उत्कृष्ट होती. जसे दिग्दर्शक संजय सुरकर, स्मिता तळवलकरचे प्रॉडक्शन आणि प्रत्येक पात्र जसे मॄणाल देव, सुबोध, श्रेयस, दिपा लागु आणि इतर सर्वच कलाकार हे त्या त्या भुमिकेमधे इतके चपखल बसले. असं म्हणतात कि कास्टींग बरोबर केले कि मोअर दॅन हाफ जॉब इज डन. शिवाय त्याचे लिखाण, दिग्दर्शन सर्वच चांगले असल्याने ती एव्हडी लोकप्रिय झाली असावी. ती मालीका शेवटी इतकी पॉप्युलर झाली कि ती बंगाली, गुजराथी आणि इतर अनेक भाषांत डब झाली.
त्यामुळे माझ्या आयुष्यातील तो एक महत्वाचा माईलस्टोन ठरला.

आणि ते होताहोताच श्वास झाला. आम्हाला कुणालाच वाटलं नव्हतं कि श्वास इतका मोठा होईल पण श्वासच्या बाबतीत सुद्धा कुठेतरी ती कथा ऐकतांना किंवा एकुणच त्याची निर्मिती चालु असतांना कुठेतरी मला एक गट फिलींग येत होतं कि हा वेगळा आणि छान सिनेमा होणार आहे. श्याम बेनेगल वैगरें सारख्या दिग्गजांबरोबर कामं मी केलं होतं, वर्ल्ड सिनेमा पाहीला होता त्यामुळे त्याची निर्मितीची प्रोसेस जेव्हा सुरु झाली तेव्हा कुठेतरी माहीत होतं कि हा सिनेमा वेगळा आणि चांगला होणार आहे.
कुठलीही भुमिका स्विकारण्याच्या आधी मी त्याचे स्क्रीप्ट वाचतो. स्क्रिनप्ले आणि स्क्रिप्ट आवडले तरच मी भुमिका स्विकारतो. श्वासच्या बाबतीत तेच घडलं संदिप सावंतचे फोकस आणि व्हिजन खुप चांगले होते. इन्फॅक्ट त्याच्या व्हिजन मुळेच श्वास इतक्या उंचीवर गेला.

श्वासमुळे मराठी चित्रपटाला एक वेगळी दिशा मिळाली. त्यानंतर बरेच चांगले मराठी चित्रपट येयला लागले पण दॅट क्रेडीट गोज टु श्वास. परत मराठी मधे चांगले चित्रपट येयला लागले. श्वास वॉज द टर्निंग पॉईंट. आफ्टर दॅट एव्हरीबडी कुड डेअर टु मेक सच फिल्मस.

तुम्ही श्याम बेनेगल, गोविंद निहलानी सारख्या दिग्गज दिग्दर्शकांबरोबर काम केलत, तर तुमचे त्यांच्याबरोबर काम करतांनाचे काही अनुभव आमच्या बरोबर शेअर कराल? प्रत्येकाची काही खासियत सांगु शकाल?

खरं सांगु का, हे माझे वैयक्तीक मत असेल, अनुभव असेल, ह्या मोठ्या दिग्दर्शकांबरोबर काम करतांना खुप शिकायला मिळाले, एकतर त्यांचा अनुभव इतका मोठा असतो, पण त्यांबरोबर काम करतांना एक दडपण देखिल असते. आपण जास्त सजेशन्स वैगरे देउ शकत नाही. व्हेअर अ‍ॅज ह्या आताच्या यंग दिग्दर्शकांबरोबर उदा. संदिप सावंत, मधुर भांडारकर, सतिश राजवाडे, निशिकांत कामत वैगरे. ह्यांबरोबर काम करतांना जास्त मजा येते. एकतर त्यांच्यात जी नविन काहीतरी करण्याची जिद्द, एनर्जी असते, शिवाय पहिले प्रोजेक्ट असेल तर खुप सारा उत्साह आणि डेडिकेशन, नविन आयडीयाज, नविन एक्सपरिमेंट करण्याची तयारी ह्या सार्‍या गोष्टी असतात ज्या एका नविन निर्मितीसाठी, प्रोजेक्टसाठी खुप आवश्यक असतात. दॅट मेक्स द फिल्म.
खुप सिनियर दिग्दर्शक असेल तर तो म्हणेल तसेच करायला लागते. यु कॅनॉट इव्हन गिव्ह काउंटर ओपीनियन, दॅट इज माय एक्स्पिरियन्स.

तुम्ही भुमिका साकारण्याच्या आधी त्या कॅरॅक्टरचा काही विशेष अभ्यास करता? डायरेक्टर त्या कॅरॅक्टर विषयी किती इनपुट देतात?

कुठल्याही चित्रपटामधे प्रि वर्क इज व्हेरी इम्पॉरटंट. कारण वन्स इट इज प्रिंटेड यु कॅनॉट डु एनीथींग अबाउट इट. एखादी भुमिका स्विकारल्यानंतर डायरेक्टर तुम्हाला त्या पात्राचा गेट-अप काय असेल, त्याचा स्वभाव काय आहे, किंवा त्या कॅरॅक्टरची रुपरेषा समजवून सांगतात. सगळे चांगले डयरेक्टर्सचे प्रि वर्क परफेक्ट झालेले असते. आणि तरच फिल्म चांगली बनते.

आणि कॅरॅक्टरचा अभ्यास म्हणाल तर ह्या मधे बर्‍याच गोष्टी असतात. मी व्हिज्युअल आर्टसचा विद्यार्थी असल्याने माझी व्हिज्युअल मेमरी खुप चांगली आहे. मी जेव्हा एखाद्या व्यक्तीला भेटतो, तीच्याशी बोलतो तेव्हा तीचे एक व्हिज्युअल इम्प्रेशन माझ्या मनावर तयार होते. आणि त्याचा उपयोग मला एखादी भुमिका साकरतांना खुप होतो.
जसे मी श्वास करतांना डॉक्टर पुणतांबेकरांना भेटलो, कारण त्यांचीच ती केस होती. त्यांच्या बरोबर फक्त ३ मिटींग्ज केल्या, एकदा त्यांना त्यांच्या कंसल्टींग रुममधे भेटलो, एकदा त्यांच्याबरोबर ऑपरेशन थिएटरमधे गेलो होतो. त्यांना बघुन एक कळलं की अत्यंत बिझी असुनही कॉलीटेटीव्ह वर्क कसं करतात ते. ह्या ३ मिटींग्जमधे मला ते कॅरॅक्टर मिळालं. म्हणजे काय की कॅरॅक्टरचे इतके डिटेलींग स्क्रीप्टमधे नसते. इथे अ‍ॅक्टरची स्वतःची आकलनशक्ती आणि त्याचे अ‍ॅक्टींग स्कील कामाला येते. त्याला जितके ते कॅरॅक्टर जास्त समजते तितका तो रोल जास्त उठावदार होतो.
जसं डोंबीवली फास्ट मधिल माधव आपटे हे पात्र, ह्याच्याशी रिलेट करणं खुप सोपं गेलं, कारण मी मुंबईत वाढल्याने, लोकल ट्रेन्सचा प्रवास हे काय दिव्य असतं ते अनुभवलेलं आहे. त्यामुळे त्यातिल कॅरॅक्टरशी रिलेट करणं खुपच सोप गेल.

डोंबिवली फास्ट हा चित्रपट खुप गाजला. त्याविषयी काही अनुभव सांगु शकाल, म्हणजे चित्रिकरणा दरम्यान आलेले किंवा चित्रपटाला एव्हडे सक्सेस मिळाले तेव्हा त्याविषयी काही....

श्वासनंतर डोंबिवली फास्ट वॉज अ डेलिबरेट अटेंप्ट. म्हणजे आम्हाला कुठेतरी हे सिद्ध करायचं होतं की श्वासनंतर मराठी चित्रपटाला पुन्हा एक नवी आणि योग्य दिशा मिळाली आहे. आणि आता असे चित्रपट अजुन मराठीत येयला पाहिजेत. त्यामुळे डोंबिवली फास्टचे स्क्रिप्ट घेउन आम्ही जवळ जवळ एक-दिड वर्ष वेगवेगळ्या प्रोड्युसर्सकडे फिरत होतो. आमचे ते ड्रिम प्रोजेक्ट होते. आणि जेव्हा आम्हाला योग्य प्रोड्युसर मिळाला तेव्हा आमचे व्हिजन आणि गोल ठरलेले होते. आम्हाला तो आंतरराष्ट्रीय पातळीवर कसा जाईल आणि त्याची इंटर नॅशनल सिनेमाला योग्य अशी कॉलीटी असली पाहीजे हे आमचे अगदी ठरलेले होते. शेवटी व्हॉट इज इंटर नॅशनल सिनेमा? लॅग्वेज इज नॉट द बॅरियर फॉर सिनेमा. म्हणुनच इरानियन मुव्हिज आज किती पॉप्युलर आहेत. शेवटी इंटरनॅशनल मुव्हीज म्हणजे तुमचे जग त्यांच्या पर्यन्त पोहोचवणे. आणि खरेखुरे जग. हे सर्व डोंबिवली फास्टच्या बाबतीत घडत गेलं
आणि त्या प्रोसेसमधे खुप वेगवेगळे अनुभव आले. गर्दीचे शुटींग करणे, गर्दी असलेल्या लोकल मधे चढणे आणि कॅमेरा घेवून त्याची शुटींग करणे आणि ते सुद्धा लोकांचे लक्ष न जाउ देता, हि अतिशय अवघड टास्क आमच्या समोर होती. म्हणजे योग्य ते शॉट्स मिळवणं हि अतिशय अवघड कामगिरी होती. आम्ही दिवस-रात्र शुटींग करत होतो. ह्या चित्रपटात एक असा प्रसंग आहे की माधव आपटे एका संध्याकाळी जे घराबाहेर पडतो ते डायरेक्ट ३ दिवस तो सतत घराबाहेर रहातो. त्या ३ दिवसांचे आम्ही देखिल सलग चित्रिकरण केले. मेहनत बरिच घेतली. पण चित्रपट करतांनाच आम्हाला हे कुठेतरी ठाउक होते कि हा सिनेमा चांगला आणि आमच्या एक्स्पेक्टेशन प्रमाणे होणार आहे, तसं आम्हाला श्वासच्या वेळेला माहीत नव्हते कि श्वास हा इतक्या उंचीला पोहोचणार आहे.

आणि आमच्या अपेक्षेप्रमाणेच डोंबिवली फास्ट हा एक आंतराष्र्टीय पातळीवरचा सिनेमा बनला. त्याला बरीच रिजनल, नॅशनल आणि इंटर्नॅशनल अशी बेस्ट फिल्मची पारितोषिके मिळाली. त्यावर्षी त्याला लॉस एंजलीस फिल्म फेस्टीव्हलला बेस्ट फिल्मचे पारितोषिक मिळालं आणि त्याचवेळी इतर अनेक चित्रपट काँपिटिशनमधे होते जसे परिणीता आणि इतर अनेक हिंदी चित्रपट काँपिटीशन मधे होते. सिंगापुर फिल्म फेस्टीव्हलला सुद्धा ह्या सिनेमाला बेस्ट फिल्मचे अवॉर्ड मिळाले.

तुम्ही आत्तापर्यंत जे रोल्स केले त्यातिल तुमचा सर्वात आवडता रोल कोणता?

कसं आहे माहीत आहे का कि एखादा प्रोजेक्ट पुर्ण झाला कि एक डिटॅचमेंटची गरज असते. म्हणजे त्यानंतर त्या रोलमधिल इन्व्हॉलमेंट संपायला पाहीजे त्याच्याशिवाय मग तुम्ही पुढे दुसरे अजुन एक्सायटींग रोल कसे करु शकणार? जर तुम्ही पहील्या रोल मधुनच बाहेर पडला नसाल तर? आता डोंबिवली फास्ट झाल्यानंतर मला लोकं विचारायला लागले कि पुढे काय? आता ह्या ताकदीचा रोल केल्यानंतर पुढे अजुन काय वेगळं करायला उरलं आहे? म्हणजे एका अ‍ॅक्टरला पहिल्या फ्रेमपासुन शेवटच्या फ्रेमपर्यंत असा रोल मिळणं आणि ते सुद्धा इतके पॉवरफुल शॉट्स मिळणं हे प्रत्येक अ‍ॅक्टरचे ड्रिम असते, आणि ते माझ्या बाबतीत घडलं होतं. त्यामुळे शेवटी मलाच मला कन्व्हिन्स करायला लागलं कि नाही धिस इज नॉट द एन्ड, मला अजुनही बरंच काही करण्यासारखं आहे. आणि त्यामुळेच आम्ही 'गैर' हा अत्यंत वेगळ्या धाटणीचा, जॉनरचा पिक्चर बनवायचं ठरविलं. डोंबिवली फास्टनंतर हा सिनेमा पुन्हा एक असाच ड्रीम प्रोजेक्ट होता.
आणि शेवटी अ‍ॅक्टर कॅन ओनली विश, पण शेवटी इट इज अ डायरेक्टर्स व्हिजन अ‍ॅन्ड इट इज हिज बेबी.

तुमचा ड्रीम रोल कुठला आहे? म्हणजे कुठली भुमिका तुम्हाला करायला आवडेल? किंवा एखादा कुठला रोल जो तुम्हाला मिळाला नाही पण तो तुम्हाला करायला आवडला असता?
(ह्या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांनी शिताफीने टाळले.)

आय रिअली डोंट बिलीव्ह इन द ड्रीम रोल्स. मला वेगवेगळ्या जॉनरचे पिक्चर करायला आवडतात. आणि हिंदी-मराठीत असा कुठलाही रोल मला नाही सांगता येत जो मला मिळाला नाही पण मला करायला आवडला असता. हो येस, हॉलीवुडमधिल असे बरेचसे रोल्स मी सांगु शकतो जे मला करायला आवडतील, आवडले असते. मी मराठीत तसे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे रोल्स केले आहेत जे एकमेकांपासुन बरेच वेगळे होते. जसे साने गुरुजींचा रोल मी केला, तसं माझ्याकडे पाहुन कुणालाही वाटलं नसतं कि मी त्या रोल साठी योग्य आहे, पण डायरेक्टरला तसा विश्वास वाटला आणि मग मी देखिल साने गुरुजींसारखे दिसण्यासाठी बरंच वजन कमी केलं, टॅन झालो कारण ते खानदेशचे असल्याने सावळे होते आणि इतरही मेहनत घेतली.

म्हणजे एखादा रोल करण्यसाठी बरीच मेहनत घ्यावी लागते तर?

हो हो म्हणजे काय? कारण एकदा सिनेमा प्रींट झाला कि तुम्ही काहीच करु शकत नाही आणि सिनेमा हा काही सिरियल्स सारखा नसतो कि एपिसोड एकदा टेलिकास्ट झाला कि तुम्ही विसरुन देखिल जाता. पण सिनेमाचे तसे नसते. तुम्ही जे काम कराल त्याचा रेकॉर्ड रहातो. त्यामुळे जेव्हा एखादा रोल तुम्ही साकारता तेव्हा त्याचा पुर्ण अभ्यास आणि त्याच्यावर मेहेनत हि घ्यावीच लागते.

तुमचे आवडते अ‍ॅक्टर्स कोणते?

बरेच आहेत. ज्यांचे अ‍ॅक्टींग बघुन मला खुप मिळालं आहे आणि ज्यांना बघुन मी खुप शिकलो आहे असे बरेच अ‍ॅक्टर्स आहेत. जसे नसिरुद्दीन शहा, नीळु फुले, अमिताभ बच्चन, वेस्ट मधिल बरेच अ‍ॅक्टर्स आहेत जसे डस्टीन हॉफमन, अल पचिनो, रॉबर्ट डिनेरो.

'गैर' हा चित्रपट हा एक अत्यंत वेगळ्या जॉनरचा पिक्चर आहे, मराठीत पहिल्यांदीच इतका ग्लॅमरस आणि स्टाईलीश पिक्चर बनविला आहे. तर त्यात काम करतांना कसं वाटलं? काही अनुभव सांगाल?

जसं मी पहिले पण सांगितले कि मला वेगवेगळ्या जॉनरचे पिक्चर करायला आवडतात. आत्तापर्यन्त जो रोल केला नाही तो करायला आवातो. गैर मधे पुन्हा एक असाच सरप्राइज देणारा फॅक्टर होता. म्हणुन मी तो रोल स्विकारला. बरं त्यात मला डान्स वैगरे पण करायचा होता. मी काही एक चांगला डान्सर नाही. आय अ‍ॅम बेसिकली अ ट्रेन्ड अ‍ॅक्टर. त्यामुळे डान्स करायचा आणि तो देखिल प्रेक्षकांना कन्व्हिन्सिंग वाटेल असा करायचा हे माझ्यासाठी अवघड होते. शिवाय अमृता हि तर स्वतः डान्स शिकलेली असल्याने मला अजुन टेन्शन होते तीच्याबरोबर डन्स करतांना. त्यामुळे मला डान्सच्या आधी बर्‍याच रिहल्सल्स कराव्या लागल्या.

मराठीत आता कुठल्या प्रकारचे चित्रपट येयला हवे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे 'श्वास', 'डोंबिवली फास्ट' सारखे कि 'गैर' सारखे ग्लॅमरस, नविन पीढीला आकर्षित करणारे?

नाही असं काही नसतं. सिनेमाला तसं म्हंटल तर टाईप असा काही ठरलेला नसतो. व्हॉट यु मेक बिकम्स द टाईप. सगळ्या प्रकारचे चित्रपट बनायला हवे. वेस्टमधे ते वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट बनवत गेले म्हणुनच तो वाढत गेला. आपल्याकडे म्हणजे एकदा एका प्रकारचा चित्रपट आला कि लगेच तसे १० चित्रपट येतात. वेस्टमधे तसे नसते. ते लगेच अजुन वेगळ्या टाईपचा चित्रपट कुठला बनविता येईल ते बघतात.

पण सध्या मराठीत सुद्धा वेगवेगळ्या विषयावरचे खुप चांगले चांगले चित्रपट येत आहेत. उदा. गाभ्रीचा पाउस, हरिश्चंद्रची फॅक्टरी आणि इतर अनेक. आत्ता मराठी चित्रपटात जितके वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत तितके माझ्यामते सध्या कुठल्याच इन्डियन फिल्म्स मधे हाताळले जात नाही आहेत.
अर्थात चित्रपटाचे सिक्वेल्स बनविण्यात काही गैर नाही. पण ती एक चॅलेंजींग टास्क असते. कारण त्याचा सिक्वेल हा त्यापेक्षा अधिक चांगला बनला गेला पाहीजे. जसं गैरचा सिक्वेल बनणं शक्य आहे. त्याच्या स्टोरीमधे एक ओपन एन्ड आहे.

मराठीत इतके टॅलेंटेड अ‍ॅक्टर्स आणि डायरेक्टर्स आहेत तरीही मराठी चित्रपट हा महाराष्ट्रात इतका चालत नाही जेव्हडा हिंदी चालतो किंवा इतर राज्यांमधे जितका त्यांचा रिजनल पिक्चर चालतो. तर असे का ?

ह्याला बरीच कारणे आहेत, एकतर महाराष्ट्रात मराठी बरोबरच हिंदी हि भाषा बहुतांशी बर्‍याच लोकांना समजते आणि त्यामुळे मराठीचा जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांना हिंदी सिनेमाचे पण ऑप्शन ओपन असल्याने ते हिंदी चित्रपट अधिक बघतात. शिवाय बाकीच्या राज्यांमधे त्यांचा ऑडियन्स हा कमिटेड आहे त्यांच्या चित्रपटांसाठी. म्हणजे साउथ मधे जसा अंधविश्वास असतो तिथल्या स्टार्सबद्दल, म्हणजे ते त्यांची मंदीरं बांधतात, अगदी तितका अंधविश्वास जरी नाही ठेवला तरी एक आपला चित्रपट पुढे आणण्यासाठी मराठी प्रेक्षकांनी कमिटमेंट दाखविली पाहीजे. म्हणजे मी तर म्हणेन आता इतका चांगला मराठी सिनेमा बनत आहे तर प्रेक्षकांनी सुद्धा त्याला साथ दिली पाहीजे. म्हणजे महिन्यातुन एक तरी मी मराठी चित्रपट थिएटरमधे जाउन बघिन असं ठरविलं पाहीजे. त्या शिवाय मराठी चित्रपट पुढे जाणार नाही.
आणि मराठीतली जी तरुण पिढी आहे त्यांना आकर्षित करेल असा मराठी सिनेमा बनला पाहीजे. गैर हा त्याचदॄष्टीने एक प्रयत्न आहे. आणि मी सुद्धा प्रयत्न करणार आहे कि नविन पिढीला आवडेल असा मराठी चित्रपट बनविला पाहीजे.

तुमचे आगामी प्रोजेक्टस काय आहेत?

माझा आगामी चित्रपट आहे 'अंकगणित आनंदाचे' . हा एक गंभिर विषयावरील चित्रपट आहे. रिसेशनचा बॅकड्रॉप ह्या कथेला आहे. म्हणजे रिसेशनमुळे नायकाचा जॉब जातो आणि त्यामुळे त्याची बायको देखिल त्याला सोडुन जाते. आणि मग नायक आणि त्याचा ४ वर्षांचा मुलगा कसे त्या परिस्थितीशी लढतात ते ह्या चित्रपटात दाखविले आहे.
हिंदीमधे आगामी चित्रपट आहे 'वेटींग रुम' हि एक १ नाईट मर्डर मिस्ट्री आहे. ज्यात ४ प्रमुख पात्रे आहेत. हे एक सायकॉलॉजीकल थ्रिलर आहे. आणि हि फिल्म तयार आहे.

खरंतर गप्पा मारता मारता त्यांचा ब्रेकफास्ट तसाच अर्धवट राहीला होता, बोलण्यामधे ते इतके मश्गुल झाले होते. अजुन विचारण्यासारखं बरंच होतं पण वेळेच बंधन देखिल होते त्यांना शॉपिंग करायला , दुबई भटकायला देखिल जायचे होते. त्यामुळे मी मग मुलाखत आवरती घेतली.

त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर माझा त्यांच्याविषयीचा एक कलाकार म्हणुन असलेला आदर अजुन वाढला, आणि एका अतिशय गुणी, हुशार आणि विचारी कलावंताबरोबर आपल्याला गप्पा मारता आल्या ह्याबद्दल आनंद झाला.

नटरंग ने किति पैसे कमवले ?

नटरंग ने किति पैसे कमवले ? कोणाला काही अंदाज ?
"३ मुर्खांनी" ५०० करोड कमवले म्हणतात ..

अधिक्रुत माहिती असेल तर डाकवावी.
किंवा अंदाज बांधावा ...

चालू करा तुमचे इंजन

सिचूयेशन: आप्ल्या पिच्चरचा बागाईतदार नायक निसता उंडारेल हाये. त्यो नुसता इकडतिकड पुढारपन करत फिरत आसतूया. त्येच्यावाली हिरवीन बायकू लय आंग मोडून शेतात कामं करतीया. आप्ला हिरो शेतात फिरकना झालाय. तवा काय व्हत त्ये हिरवीन गानं म्हनूनशान सांगती. ऐका:

लावनीच्या आधी आसतं तसं चालीमधलं गद्य:

{शेत आपलं मोठ भारी, निगरानी त्याची व्ह्याया हवी,
तुमी तर काय कामच करीना, फिरत्यात निसतं पुढार्‍यावानी
पाउस पडला, विहीर बी भरली, हिरव्या रानी हिरवी मखमल आली }

अहोss..सजनाs..

(चाल सुरू)

बघून काय राह्यले नुसतं तुम्ही, पिक जाईल ना वाया
अहो राया,
मग भरा हे इंधन अन चालू करा तुमचे इंजन ||घृ ||

औंदाच्या हो सालाला लावल उसाचं हो बेनं
उभ्या आडव्या वाफ्यातून हातान काढल तण
पर काय अक्रीत घडलं, विजमंडळ हे नडलं
सुरू केलया त्याने भारनियमन ||१||

तेव्हा बघून काय राह्यले राया, पिक जाईल ना वाया
अहो राया,
मग भरा हे इंधन अन चालू करा तुमचे इंजन ||घृ ||

पिक आल हाताशी हो नका त्यात घुसू देवू
जनावर ही माजलीत सारी एकेकाला हाकलून लावू
दांडक्यान रट्टा द्या हो, पहारा करा डोळ्यात टाकून अंजन ||२||

बघून काय राह्यले राया, पिक जाईल ना वाया
अहो राया,
मग भरा हे इंधन अन चालू करा तुमचे इंजन ||घृ ||

आडसाली उस झाला, तोडणी केली, उतारा वाढला
कारखान्यान दिलानं हप्ता, सपनात आल सोनं
गंजलं का इंजन? जरा चालना!
मग चोळा की बेरींगांना वंगन ||३ ||

अहो राया,
बघून काय राह्यले राया, पिक जाईल ना वाया
मग भरा हे इंधन अन चालू करा तुमचे इंजन ||घृ ||

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक- ITI-डिझल)