प्रवास
दुबई ला जाताय..जरा जपून
काल एक ढकलपत्रातून अस कळल की कोणाच्या तरि मित्राला खसखस बाळगल्या बद्दल दुबई मध्ये २० वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली.
लहानपणी आम्ही चार आण्याची खसखस...................फसफस...अस काहितरी गाण म्हणायचो. खसखस अनारश्यात खाल्ल्याचे आठवते. म्हणजे आता दिवाळी ला फराळ करुन प्रवास केला तर तुरुंगाची हवा खावी लागेल. ही बातमी बघा http://www.boddunan.com/forums/11-general-discussions/70531-a-very-very-...
थोड गुगल करुन पाहील, बातमी मध्ये तथ्य आहे असे वाटते. http://news.bbc.co.uk/2/hi/uk_news/7234786.stm . बहुतेक ढकलपत्र जुनं असाव. आत्ता पुन्हा फिरू लागल आहे.
खसखस ने जेट लॉग जातो हे नवीनच कळल. त्यापासून अफीम कशी बनवतात तेही पाहिल पाहिजे.
खरतर परदेशात प्रवास करताना कोणताही खाद्यपदार्थ बाळगु नये. देशी लोक कधी सुधारणार माहीत नाही. खसखस नाही खाल्ली तर काय फरक पडणार आहे काय माहित. हेच कडिपत्ता, ओवा, ई. ना लागु होत.
धिस टाईम फॉर आफ्रिका. - चित्रसफर.
थांबा... शिर्षक वाचुन घाबरू नका, अजुन एक भाग पाणी घालून वाढवत नाहिये. पण प्रवासातल्या गडबडीमुळे शेवटच्या काही भागात फोटो टाकायला जमलं नव्हतं. भरपाई म्हणुन या भागात केवळ फोटोच टाकतोय. शिर्षकंही देत नाहिये सगळ्या फोटोंना
नीट वर्गवारी केलेले नाहियेत आणि माझ्या फोटोग्राफीच्या कलेचा केव्हाच बालमृत्यू झालाय तेव्हा सांभाळुन घ्या..
दंगल-ए-खास
''ए बच्ची, अंदर जा, अंदर जा....''
माझ्या बालमूर्तीला उद्देशून लॉजचा मॅनेजर खेकसला तशी मी घाबरून त्या जुनाट लॉजच्या लाकडी दरवाज्यातून आत स्वागतकक्षात गेले आणि आईला घट्ट बिलगून बसले. बाहेर जोरजोरात कानडी भाषेतील घोषणा ऐकू येत होत्या. सकाळच्या रम्य, शांत प्रहरी त्या घोषणांचा असंतुष्ट सूर वातावरण ढवळून काढत होता.
गणपतीच्या सुट्टीतले ते सुंदर, सोनेरी दिवस. शाळेच्या सुट्ट्यांचा फायदा घेऊन माझे व धाकट्या बहिणीचे गाठोडे बांधून आई-वडील आम्हाला दक्षिण भारताच्या सफरीसाठी घेऊन गेले होते. मी होते जेमतेम दहा - अकरा वर्षांची तर बहीण आठ वर्षांची! नाहीतरी आमच्या घरी गणपती नसतात, त्यामुळे सुट्टीतील ही मनसोक्त भटकंती आमच्या खास पसंतीची होती. माझ्या वडिलांची प्रवास करतानाची खासियत म्हणजे कोणतीही आगाऊ आरक्षणे न करता सरकारी लाल डब्यातून प्रवास करणे! त्यांच्या मते त्यामुळे जास्त सुटसुटीतपणे आणि आरामात प्रवास करता येतो! कर्नाटकात तेथील सरकारी बसेसमधून प्रवास करत करत आम्ही आता बेळगावात, माझ्या लाडक्या गावात पोचलो होतो. संध्याकाळची वेळ असल्यामुळे लवकरात लवकर मुक्कामाला आमच्या नेहमीच्या पै लॉजला जायचे, फ्रेश होऊन, खाऊन-पिऊन मस्तपैकी तण्णावून द्यायची आणि दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा पुण्याला परतीच्या प्रवासाला निघायचे असा साधारण बेत होता.
पहिली माशी शिंकली ते पै हॉटेलच्या आवारातच! तेथील मॅनेजरने नम्रपणे सांगितले की हॉटेलच्या सुशोभीकरणाचे काम चालू असल्यामुळे तिथे राहण्यास जागा उपलब्ध नव्हती. आता आली का पंचाईत! एवढ्या वर्षांच्या बेळगावाच्या सफरींमध्ये आम्ही पै एके पै करत राहायचो. इतर कोणती चांगली हॉटेल्स, लॉज वगैरेही ठाऊक नव्हती. गणपतीच्या सुट्ट्या असल्यामुळे असेल कदाचित, पण इतर दोन-तीन ठिकाणीही चौकशी केल्यावर सर्व रूम्स फुल असल्याचे कळाले.
मी व बहीण एव्हाना दमून कुरकुरायला लागलो होतो. विना- आरक्षणाच्या प्रवासाचा शीण तर होताच, शिवाय कडकडून भूकही लागली होती. शेवटी आमची अवस्था बघून तेथील बस स्टॅन्डपासून दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका गल्लीतील जुनाट लॉजमध्ये जागा उपलब्ध आहे असे कळल्यावर वडिलांनी त्या रात्रीचा मुक्काम तिथेच करायचे निश्चित केले. शेवटी एका रात्रीचा तर प्रश्न होता! मुक्कामी पोचून अंघोळी वगैरे उरकेपर्यंतच मी व बहीण जाम पेंगुळलो होतो. जुन्या पध्दतीच्या वाड्याचेच लॉजमध्ये रूपांतर केले असल्यामुळे स्वच्छता, सोयी इत्यादींबाबत सगळाच आनंदीआनंद होता. पण इथे भूक आणि झोप ह्यांपलीकडे पर्वा होती कोणाला? कसेबसे पुढ्यात आलेले अन्न खाल्ले आणि थकलेले देह बिछान्यावर लोटून दिले.
दुसर्या दिवशी सकाळी उठायला जरा उशीरच झाला! प्रवासाचा शीण चांगलाच बोलत होता! शेवटी पोटात कोकलणार्या कावळ्यांच्या जाणीवेने जाग आली. आठ वाजत आले होते. आदल्या दिवशी केलेल्या चौकशीनुसार सकाळी साडेनवाला पुण्याला जाणारी एक एस. टी. बेळगाव स्टॅन्डवरून सुटते असे कळले होते. बस पकडायच्या उद्देशाने घाईघाईतच आवरले आणि सामान बांधून तयार झालो. खालच्या स्वागतकक्षात आमच्या बॅगा, पिशव्या इत्यादी आणून वडिलांनी तिथेच काउंटरजवळ झोपलेल्या मुलाला उठवून चेक- आऊट केले. आम्हाला तिथेच थांबण्याची सूचना करून ते रिक्षा बघण्यासाठी बाहेर गेले.
वस्तुतः एस्. टी. स्टॅन्डच्या जवळची जागा म्हणजे रिक्षांचा सुळसुळाट हवा. पण त्या सकाळी ना रस्त्याने रिक्षा फिरत होत्या, ना नेहमीची वर्दळ होती. लॉजच्या तिरसट मॅनेजरला विचारल्यावर त्याने कन्नडमध्ये काहीतरी अगम्य बडबड केली, जी आम्हाला काहीही झेपली नाही. वडिलांना बाहेर जाऊन दहा मिनिटे कधीच होऊन गेली होती. काहीशा अर्धवट झोपेत, अस्वस्थपणे आम्ही त्यांची स्वागतकक्षातील बाकड्यावर बसून वाट बघत असतानाच बाहेरून घोषणांचे आवाज येऊ लागले. माझी उत्सुकता मला स्वस्थ बसू देईना! चुळबुळत, ऊठ-बस करत शेवटी मी आईच्या तीक्ष्ण नजरेतून हळूच सटकले आणि बाहेर रस्त्यावर डोकावले.
लाल झेंडे घेतलेली बरीच माणसे संचलनात जातो तशी समोरच्या रस्त्यावरून ओळीने घोषणा देत चालत होती. गळ्यात कसल्यातरी पट्ट्या, मळकट कळकट वेष, हातात फलक.... त्यांच्या घोषणा कानडीत असल्यामुळे माझ्या डोक्यावरून जात होत्या. पण हा काही साधासुधा मोर्चा नव्हता, एवढे मात्र त्या लोकांच्या त्वेषावरून कळत होते. तेवढ्यात त्या लॉजच्या मॅनेजरने मला हटकले आणि माझी रवानगी आत झाली.
मी आत येऊन आईला घाबरलेल्या अवस्थेत बाहेरच्या प्रसंगाचे वर्णन करत होते तोच माझे वडील धापा टाकत आत आले.
''रिक्षा मिळाली?'' आईने विचारले. त्यावर वडिलांनी नकारार्थी मान हालवली व धपापत्या स्वरात म्हणाले, ''रिक्षा चालू नाहीएत आज! लवकर चला, आपल्याला एस्. टी. स्टॅन्ड्ला चालत जावं लागणार आहे!'' त्यांच्या स्वरातली काळजी मला तेव्हा उमगली नाही.
आमच्याकडे दोन सूटकेसेस आणि तीन शोल्डर बॅग्ज होत्या. सामानाने ठासून भरलेल्या. वडिलांनी दोन सूटकेसेस दोन्ही हातात घेतल्या, आईने जड असणारी शोल्डर बॅग घेतली आणि आम्हा दोघी बहिणींकडे वजनाने तशा हलक्या, पण सामानाने भरलेल्या शोल्डर बॅग्ज सांभाळायला दिल्या. आता दहा मिनिटे लेफ्ट राईट करत हा अवजड डोलारा सांभाळत जायला लागणार होते!! त्याला इलाज नव्हता!
आम्ही लॉजच्या बाहेर पडतो न् पडतो तोच एकदम जोरात आरडाओरडा झाला..... बघतो तो काय, गल्लीच्या एका टोकाला अजून एक लाल झेंडेधारी लोकांचा घोळका जोरजोरात घोषणा देत, हातात दगडधोंडे आणि अजून काय काय घेऊन आमच्याच दिशेने पळत येत होता. आम्ही घाबरून लॉजच्या दिशेने पाहिले तर लॉजचा मॅनेजर दारावरची पत्र्याची शटर्स खाली ओढत होता. आजूबाजूची दुकाने धडाधड बंद होत होती. संकटाचा वास आल्यागत गल्लीतील कुत्रीदेखील माणसांबरोबरच लपायला जागा शोधत होती. काही सेकंदांचाच खेळ, पण बघता बघता दगड भिरभिरू लागले. ''पळा......'' वडील जोरात ओरडले! आमच्या हातातल्या अवजड बॅगा पेलत आम्ही बस स्टॅन्डच्या दिशेने पळू लागलो. आम्ही पुढे, मागे आक्रमक जमाव असा तो सीन होता. दगड भिरभिरत होते, माझे काळीज सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या गतीने धडधडत होते, डोक्यात काहीच शिरत नव्हते, फक्त जीव वाचवून पळायचे आहे एवढेच कळत होते!! पळता पळता बॅगेच्या बंदात पाय अडकून माझी बहीण थोडी धडपडली. तिला सावरून पुन्हा पळायला लागेस्तोवर तो चिडलेला जमाव अजूनच जवळ आला होता. एक दगड तर बॅगेला चाटूनही गेला. खाकी गणवेशातील, हेल्मेट घातलेले पोलिसही आता त्या जमावाच्या पाठीमागे हातातले दंडुके परजत पळत येत होते.
माझे वडील पुन्हा एकदा गरजले, ''पळा सांगतोय ना, जोरात पळा!!''
अंगाला घामाच्या धारा लागलेल्या..... कानशिले गरम झाली होती.... छाती थाडथाड उडत होती.... पायात गोळे येत होते.....चपला घासून पायाचे तळवे जळत होते.... अंतर संपता संपत नव्हते.... डोळ्यांना समोरचे नीट दिसतही नव्हते! पण आता पळालो नाही तर आपली धडगत नाही ह्याचीही खात्री होती! आमच्या पुढ्यात आमच्यासारखीच काही सैरावैरा धावणारी माणसे होती. बस स्टॅन्डकडे जाणारा तो एकमेव रस्ता असल्यामुळे बाजूच्या गल्लीत वगैरे जाण्याचा प्रश्नच येत नव्हता!
पळत असतानाच समोर एक टोकदार शिंगे असलेली, जमावामुळे बिथरलेली म्हैस आली! तिला चुकवता चुकवता पुन्हा एकदा दगडफेक करणारी माणसे आमच्यापासून काही पावलांच्या अंतरावर....
असे म्हणतात की संतप्त जमावाला माणुसकी नसते! त्यांना फक्त राग, सूड, हिंसा कळते. त्याचे मूर्तिमंत प्रत्यंतर ह्या जमावाकडे बघून येत होते. मागच्या पोलिसांनी लाठीमार चालू केल्यामुळे ते अजूनच बिथरले होते. त्यांच्यापासून दूर पळतानाही मला मागे वळून ते किती अंतरावर आहेत हे बघण्याचा मोह आवरत नव्हता.... तर, मला मागे वळून बघत वेळ व्यर्थ घालवताना पाहून वडील चिडून ''पुढे बघ,'' असे ओरडत होते! सगळा कोलाहल नुसता!!
एस. टी. स्टॅन्ड नजरेच्या टप्प्यात आला मात्र, आणि थकलेल्या पायांची गती आपसूक वाढली. अजून काही पावले, आणि आमची दगडफेकीतून तात्पुरती का होईना, सुटका होणार होती! हातातले सामान कसेबसे सावरत, ठेचकाळत, धडपडत आम्ही एकदाचे एस टी स्टॅन्डच्या आत घुसलो तेव्हा दगडफेक करणारा जमाव बर्यापैकी मागे पडला होता. आता पुढची काही मिनिटे तरी धोका नव्हता. काही क्षण त्या सुटकेच्या भावनेत सुन्न मनाने उभे असतानाच वडील पुन्हा एकदा ओरडले, ''तिसऱ्या नंबरची बस..... धावा!! ''
आगारात समोरच उभी असलेली ती बस आटोकाट भरून ड्रायव्हरच्या प्रतीक्षेत उभी होती. टपावर सामानाची आणि बसमध्ये प्रवाशांची एकच गर्दी होती! पण ती बस व्हाया पुणे जाणारी होती. अधेमधे एखादा-दुसरा थांबा, आरक्षण नसल्यामुळे उभ्याने करायला लागणारा गर्दीतला प्रवास ह्या कशाकशाचा विचार न करता आम्ही तिरासारखे गाडीत घुसलो! मिळेल त्या जागेवर बॅगा ठेवल्या आणि धापा टाकत, श्वास सावरत, घाम पुसत बस सुरू व्हायची वाट पाहू लागलो. दोनच मिनिटांत बसचालक आला आणि प्रवाशांनी दुथडी भरून वाहत असलेली ती बस डचमळत एकदाची रस्त्याला लागली.
पुढचा अर्धा तास आम्ही कोणीही एकमेकांशी बोललो नाही. कधी नव्हे ते इतके जीव खाऊन पळाल्यामुळे पोटात प्रचंड दुखत होते..... छातीची धडधड अजून थांबली नव्हती.... पळताना उशीर झाला असता तर त्या संतप्त जमावाच्या हाती आपले काय झाले असते ही कल्पनाच करवत नव्हती..... त्या संकटाच्या तुलनेत त्यानंतर उभ्याने करायला लागलेला बसचा प्रवास कस्पटासमान होता. बसच्या खिडकीतून आत येणारी अस्पष्ट वाऱ्याची झुळूक घामट हवेतही शरीराला आणि मनाला आल्हाद देत होती. आपण सुरक्षित आहोत, हातीपायी धड आहोत आणि एका जीवघेण्या परिस्थितीतून सुटून आपल्या घरी परत चाललो आहोत ह्याचेच मनाला हायसे वाटत होते!
दंगल, दंगल म्हणजे काय असते ह्याचा माझ्या आयुष्यातील तो एक अविस्मरणीय अनुभव होता! संतप्त, चिडलेला, आक्रमक जमाव इतक्या जवळून बघायला मिळेल, दगडफेकीचा -लाठीमारीचा असा अनुभव मिळेल असे आयुष्यात वाटले नव्हते! आणि हे सगळे अनुभवूनही आम्ही सर्वजण हातीपायी धड, सुरक्षित होतो हेच एक नवल होते! त्या विस्मयाला उराशी बाळगत आणि दंगलीच्या त्या जीवघेण्या आठवणीला मनातून दूर झटकतच आम्ही पुण्याला घरी परतलो.
-- अरुंधती
भंभागिरी
'सकाळी सहाऐवजी साडेसहाला हुतात्मा स्मारकाबाहेर जमायचे आहे' राहुलचा रात्री मेसेज मिळाल्यावर सुट्टीची साखरझोप अजून अर्ध्या तासाने वाढली. पहाटे खुडबुडत सॅक भरून अशोकस्तंभावर गाडी लावली. दिवाळी, गुढीपाडवा, दसरा, २६ जाने. यादिवशींच्या पहाटवेळांत खूप वेगळं चैतन्य असतं, त्यापैकीच एक १५ ऑगस्टचीही असते. एरवी दिसतात ते पोटार्थी (म्हणजे पोटासाठी कामाला लागलेले आणि पोट कमी करण्यासाठी नाईलाजाने चालणारे/ धावणारे). लहान मुलांची झेंडावंदनासाठी कडक कपड्यांत शाळेत जाण्याची लगबग सुरू होती. आमचंही, नाशिकच्या वैनतेय गिर्यारोहण-गिरीभ्रमण संस्था आणि यंदाच्या गिरीमित्र संमेलनावेळी स्थापन झालेल्या दुर्गभरारी संस्थेतर्फे झेंडावंदन ठरलं होतं ते आडबाजुला असलेल्या धुळे जिल्ह्यातल्या भामेर दुर्गावर. ७ वा. ७ भिडू घेऊन आमची टवेरा एकदाची निघाली. वाटेत वडाळीभोईला जैन हॉटेलात मिसळ, भजी, पेढे आणि चहाचं पेट्रोल भरून निघालो तोवर साडेआठ वाजत आले होते.
आता कुठेही टीपी न करता थेट साक्रीला पोहोचणे होते. वाटेत चौल्हेर, डोलबारी रांग, पुढे मांगी- तुंगीची सेलबारी रांग, उजवीकडे पिसोळ- डेरमाळ दुर्गांची रांग डोंगरटोके उंचावत साद घालत होती.साक्री- नंदुरबार रस्त्यावर भामेर किल्ल्याकडे जायचा फाटा लागतो. नाशिक ते भामेर गांव १८० किमी. अंतर आहे. गांवात शिरल्याबरोबर प्रवेशद्वाराचं गतवैभव दाखवणार्या कमानीने लक्ष वेधून घेतलं. या कमानीच्या बाजूलाच बारव आहे. बाजूलाच भल्या थोरल्या डोणी आहेत आणि अजूनही वापरात आहेत.
भग्न प्रवेशद्वारामागील नक्षी कोरलेले ८-९ फूट उंच खांब देखणे आहेत. पैकी एका खांबाचं फिनिशिंग एक्दम ग्रॅनाईटप्रमाणे गुळगुळीत आहे. जवळच एका जुन्या मशिदीचेही पडके अवशेष दिसतात.
एका मुलाने गाडी किल्ल्याच्या पायथ्याकडे असलेल्या शिवमंदिरापर्यंत जाईल असं सांगितल्यामुळे गांवातले अवशेष नंतर बघायचं ठरवून गाडी अरूंद बोळांतून शेवटपर्यंत दामटवली. साडेअकरा वाजत आले होते. दोघेजण बरोबर घेतले आणि चढाईला निघालो. भामेर दुर्गाच्या डोंगराचे ३ भाग आहेत. गांवात घुसलेल्या डोंगरसोंडेवर पांढरा रंग दिलेली पिराची घुमटी आहे. या पीराला पांढर्या कापडाचे बैल वाहिलेले दिसतात. मधल्या टेकडीच्या पोटाच्या घेराशी खोदलेल्या गुहा-टाकींचा पट्टा आवळलेला आहे. तिसरा सगळ्यांत उंच असलेला तो बालेकिल्ल्याचा डोंगर आहे. पायथ्याशी असलेला खंदकाचा बुजत आलेला खड्डा ओलांडून १५ मिनिटांत पिराची टेकडी व मधल्या डोंगराच्या खिंडीत पोहोचलो. येथील प्रवेशद्वार ढासळलेलं असलं तरी दुतर्फा उभे असलेले उंच दगडी खांब व बुरुज गतवैभवाची साक्ष देतात.
डावीकडे वळून पायर्या चढून वर आल्यावर शिलालेख कोरलेल्या भग्न कमानीचा आडवा झालेला तुकडा दिसला. इथून उजवीकडे जाणारी वाट गुहा कोरलेल्या टेकडीकडे जाते. या टेकडीच्या पोटांत रांगेने ही पाण्याची गुहा टाकी मोठ्या संख्येने खोदलेली आहेत. अरूंद पायवाटेने जात ती सगळी टाकी बघता येतात.
टेकडीला प्रदक्षिणा घालत सगळी टाकी बघून वर आलो आणि बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो. इतक्या प्रचंड संख्येने गुहाटाकी दुसर्या कुठल्याही किल्ल्यावर नसतील. बालेकिल्ल्याकडे जातांना मध्येच कातळ कापून खाच पाडल्याने हा भाग थोडा विलग झाला आहे. या खिंडीत पायर्या आहेत. इथून पुढे पायर्यांच्या वाटेने चढतांना आणखी एक प्रवेशद्वार लागलं. इथे डावीकडे रचीव दगडांचा बुरूज आणि उजवीकडे रचीव तटबंदी दिसली. वर आल्यावर सतीमातेच्या छोट्याशा मंदिराच्या डावीकडे वळून टोकाकडे जाऊन पलिकडचा देऊरचा डोंगर पाहून परत फिरलो.
या डोंगरावरही काही लेणी आहेत. पूर्वेला जुळे सुळके दिसतात, ते रवळ्या- जवळ्या नांवाने ओळखले जातात. (रवळ्या-जवळ्या हे सातमाळा रांगेतले २ किल्ले वेगळे).मंदिराची जागा झेंडावंदनाला योग्य होती. मंदिराच्या शेजारी खोदीव टाके आहे. झेंडावंदन व राष्ट्रगीत झाल्यानंतर उतरतांना मधल्या डोंगराच्या पोटात असलेली लेणी वाटेतच दिसली.
तिनही द्वारांच्या चौकटींवर नक्षी आहे. पहिल्या द्वाराच्या उंबर्याकडे दोन्ही बाजूंना द्वारपाल आहेत. शेजारीच भली मोठी कोठाराप्रमाणे वापरली जात असावी अशी गुहा खोदलेली आहे. सध्या त्यांत पाणीच साठलेलं आहे. इथून खाली गांवाकडे पाहिल्यावर किल्ला व गावांच्या मध्ये असलेली खंदकरेषा स्पष्ट दिसते. उतरायला लागून वीसेक मिनिटांत परत गाडीकडे पोहोचलोसुद्धा. गांवातच दक्षिण भारतीय घडण वाटावी अशा एका मोठ्या नंदीची भग्न मुर्ती दिसली. त्याला लागूनच नक्षी असलेला खांबही आडवा झालेला आहे.
पूर्वी इथे मंदिर असावं. गांवात ठिकठिकाणी तटबंदीचे, विविध नक्षीं कोरलेल्या भग्न दगडांचे अवशेष दिसतात.
महाभारत काळांत भामेरचं नांव भंभागिरी असावं. त्या काळांत इथे युवनाश्व राजा राज्य करीत होता. पांडवांनी सोडलेला यज्ञाचा घोडा या राजाने भामेरला अडवला. पांडवांनी युद्ध करून तो घोडा परत नेला. महाभारत युद्धावेळी हा राजा पांडवांच्या बाजूने लढला, अशी दंतकथा.गडावरील लेणी- गुहांवरून हा किल्ला सातवाहन काळात अस्तित्वात असावा. लेणी असल्यामुळे भामेरजवळून प्राचिन राजमार्ग जात असावा. १२ व्या शतकांत अहिर कुळांतील लक्ष्मीदेव हा राजा भामेरला राज्य करीत होता. देवगिरीच्या सिंधण यादवाच्या सेनापतीने लक्ष्मीदेवाचा पराभव केला. इकडे यादव राजांना गवळी राजेही म्हटले जाते. भामेर बहामनींच्या काळापासून १८ व्या शतकापर्यंत इस्लामी सत्तेच्या वर्चस्वाखाली होता. १८ व्या शतकाच्या सुरूवातीला दाभाडे घराण्याकडे भामेर प्रांताची व्यवस्था आली पण भामेर मराठ्यांच्या ताब्यात सन १७५२ मध्ये आला. त्यानंतर भामेर मुलुखाचा सरंजाम विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांच्या नातवाकडे देण्यात आला होता. इंग्रजांनी सन १८१८ मध्ये सगळे किल्ले ताब्यात घेतल्यानंतरही सन १८२० मध्ये कालेखान या पेंढार्यांच्या सरदाराने बंड करून भामेर ताब्यात घेतला पण कॅ. ब्रिग्जने हे बंड मोडून काढतांना इथल्या इमारती व तट नष्ट केले. गांवाबाहेर एका वडाच्या झाडाखाली पोटपुजा केली आणि जवळच असलेल्या आणि अचानकपणे गवसलेल्या, प्राचिन ठेवा असलेल्या गांवाकडे गाडी वळवली.... (क्रमशः)
बीजिंग/हाँगकाँग मध्ये शाकाहारी जेवणाची सोय ?
बीजिंग / हाँगकाँगमध्ये शाकाहारी व्यक्ती साठी जेवणाचे काय पर्याय आहेत ?
दहा दिवस फक्त कोर्या नूडल्स खाऊन जगणे मला तरी अशक्य आहे.
भारतीय (उत्तर / दक्षिण) जेवण मिळाले तर उत्तम ! (त्यासाठी रोज १०-१२ मैल टॅक्सीने जाण्याची देखील तयारी आहे; पैसे मला भरावे लागणार नाहीत, त्यामुळे
)
कृपया, माहिती असल्यास तातडीने सुचवा.
धन्यवाद.
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ८
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग १
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग २
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ३
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ४
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ५
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ६
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ७
इथे येण्याआधी आंतरजालावर खोदकाम करताना इथल्या गुन्हेगारीविषयी माहिती वाचली होती. पोलिसांच खोटं आयकार्ड दाखवून पर्यटकांना लुटण्याचे दोनतीन किस्सेही ऐकुन होतो. मागच्या सफारीच्या वेळचा किस्सा तुम्हाला सांगायचाच राहिला.
त्या अभयरण्यातुन बसनेच परत येत होतो. त्या सकाळच्याच उबुंगो बसस्थानकावर उतरलो तेव्हा संध्याकाळचे आठ-साडेआठ वाजले असावेत. दमलो होतो खुप. सामान काही नव्हतंच बरोबर. एक सॅक होती पाठीला फक्त. त्या स्थानकाचं रूप वेगळंच भासत होतं रात्री. इकडे सात वाजताच सगळी दुकानं बंद होतात. आठपर्यंत सगळा शुकशुकाट होतो. रस्त्यावर तुरळक येजा होती. एक टॅक्सी बघितली. त्या ड्रायवरशी पैसे ठरवले आणि त्यानं थोडं दुर एका कोपर्यात टॅक्सी उभी केली होती तिथपर्यंत चालत निघालो.
जवळ पोचलो न पोचलो तेवढ्यात एक माणुस आडवा आला. त्यानं हात आडवा करुन मला थांबवलं. खिशातुन आयकार्ड काढुन 'मी पोलीस आहे' असं सांगीतलं. त्यानं मला अडवताच मी एकदम अलर्ट झालो होतो. दिसायला साधा वाटत होता. कपडेही ठिकठाक पण गणवेष नव्हता. मी आयकार्ड बघितल्यासारखं करुन त्याला परत दिलं. त्या कार्डला असंही त्या ठिकाणी किंमत नव्हतीच. ते खरं की खोटं मला अजिबात कळणार नव्हतं. तो तोडक्यामोडक्या इंग्रजीत मला बरंच काही सांगायला लागला.
त्याच्या मागुन त्याचे अजुन दोनतीन साथीदार आले. सगळेजण काहीतरी आपापसात बोलु लागले. मी नजरेनं एकवार परिस्थीतीचा अंदाज घेतला. अंधारा, अनोळखी रस्ता जवळजवळ निर्मनुष्य. सगळी आवष्यक कागदपत्रे, पासपोर्ट अर्थात माझ्या सॅकमधेच होते. त्या चारपाच जणांच समाधान व्हावं एवढे पैसे स्थानीक चलनातही होते आणि डॉलरमधेही. प्रश्न होता तो फक्त ते खरे पोलीस आहेत की नाहित याचा. आणि हे प्रकरण केवढ्यावर संपणार याचा...
अर्थात अशा वाटाघाटींची माझी पहिलीच वेळ होती असं नाही. असल्या प्रसंगातुन याआधीही गेलो होतोच. त्यानं मला पहिल्यांदा हटकलं तेव्हाच वेगानं विचारप्रक्रिया चालू झाली होती. सावध पवित्रे आपोआपच पडले होते. त्याच्याशी पहिलं वाक्य बोलतानाच, मी टॅक्सीला पाठ चिकटवुन, त्या सर्वांकडे तोंड करुन, सॅक खांद्याला लावुन, दोन्ही हात मोकळे ठेउन, पण कुठेही आक्रमकता न दाखवता उभा होतो. करु काहीच शकणार नव्हतो. ते चौघे होते, मी एकटा. फक्त काही हालचाल करायला पुरेसा वेळ मिळाला असता एवढंच.
त्यानं माझा पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे मागितली होती. मी त्यांना सांगितलं की मला एक मित्र न्यायला येणार आहे तो आला की मी सगळी कागदपत्रं दाखवतो कारण ती घरी आहेत. तो लगेच म्हणाला मग टॅक्सी कशाला थांबवलिये. मी सांगितलं की त्याला यायला उशीर झाला म्हणुन मी कंटाळुन टॅक्सी केलिये. माझे सगळे कागद आणि पैसे त्याच्याकडे घरी आहेत असं सांगितल्यावर थोड्या वाटाघाटीनंतर तो मला फोन करू द्यायला तयार झाला. मी लगेच माझ्या मोबाइलवरुन माझ्यासाठी युनिवर्सीटीनें जो अधिकारी नेमुन दिला होता (इमॅन्युअल त्याचं नाव) त्याला फोन केला. त्याला सगळी परिस्थीती समजावुन सांगितली. हेही स्पष्ट सांगितलं की मी माझा पासपोर्ट तो येइपर्यंत कोणाकडेही देणार नाहिये. आणि त्याला लगेच त्याठिकाणी येण्याची सूचना केली. तो ही लगेच निघतो म्हणाला. आता फक्त तो इथे येइपर्यंत वेळ काढायचा होता.
तेवढ्यात टॅक्सीवाला धंदा बुडतोय म्हणुन गडबड करायला लागला. त्याला मी तुझा वेटींग चार्ज देतो तु चिंता करू नको म्हणुन समजावुन सांगितलं. इमॅन्युअल यायला जसाजसा वेळ लागत होता तसेतसे ते तथाकथीत पोलीस गडबड करायला लागले. मी 'प्लॅन बी' मघाशीच बनवून ठेवला होता. त्यांना सांगितलं की कुठलेही कागद आणि पासपोर्ट माझ्याकडे आत्ता नाहित हवंतर आपण पोलीस स्टेशनला जाउया. तिथे मी सगळे कागद मागवुन घेतो.
पुन्हा थोडं समजावल्यावर ते तयार झाले. त्यांच्या गाडीकडे बोट करू लागले. पण मी आग्रह करून टॅक्सीवाल्यालाच त्या पोलीसस्टेशनला न्यायला सांगितलं. शेवटी त्यातला एक अधिकारी पुढच्या सीटवर आणि मी मागच्या सीटवर बसलो आणि पाचच मिनिटात गाडी तिथल्या पोलीसस्टेशनच्या आवारात शिरली. मी आधीच तसा मेसेज इमॅन्युअलला केला होता. पोलीसस्टेशनचा बोर्ड वाचुन माझी चिंता अर्धी कमी झाली होती.
गाडितुन उतरलो आणि समोर पाहिलं तर इमॅन्युअल तिथल्या गणवेषवाल्या पोलिसांबरोबर बसुन हसत गप्पा मारत होता. मग मी पुर्ण निश्चींत झालो.
माझा पासपोर्ट आणि इतर कागद सॅकमधुन काढुन इमॅन्युअलच्या हातात दिले तेव्हा माझ्याबरोबरचा पोलीस खाउ का गिळु अशा नजरेनं पाहात होता माझ्याकडं. बाकी काही प्रॉब्लेम नव्हताच कागद सगळे पुर्ण होतेच. तरीही इमॅन्युअल ला जास्त वाद घालावा लागला. एकतर मी त्या पोलीसांच्या पोलीसपणावर विश्वास न ठेवल्यामुळे ते जास्त चिडले होते आणी त्यांची त्या रात्रीची वरकमाई पण मी बुडवली होती.
इमॅन्युअलच्या गाडीतुनच घरी आलो व त्याला लैवेळा धन्यवाद म्हणुन मॅगी खाउन शांत झोपलो.
माझ्या अदमासे एक महिन्याच्या वास्तव्यात ह्या इमॅन्युअलने कुठलंही काम वेळेवर आणि अचुक केल्याचा हा पहिलाच आणि शेवटचा प्रसंग. पण त्यानंतर मी बाकी सगळे प्रसंग अजिबात आरडाओरडा न करता त्याला सपशेल माफ करून टाकले हे वेगळं सांगायला नकोच.
आपण नेहेमी खूप 'प्रोटेक्टेड चॅनल' मधुन सगळीकडे प्रवास करतो म्हणुन कदाचित आपल्याला या स्थानीक समस्यांची म्हणावी तेवढी कल्पना येत नसेल. पण कधितरी एखाद्या प्रसंगी ते सगळं वास्तव त्या क्षणिक प्रकाशात लख्ख दिसुन जातं.
ता.क. - परत येताना माझ्या फ्लाइट मधे एक पुण्याचा तरुण होता. तो झांजीबार येथे एका हॉटेल मधे बल्लवाचार्य म्हणुन नोकरीला आला होता काही महिन्यांपुर्वीच. त्याच्या शेजारच्याच खोलीत दिवसाढवळ्या एकाचा खून झाला. ह्यानं तो प्रकार स्वतःच्या कानानं ऐकला होता दुपारी जेवताजेवता. हा बिचारा घाबरून परत निघाला होता. "साब, मै कैसा तो दो दिन रूका उधर, लेकिन नौकरी छोडके आया हू अभी. जान बची तो पैसा किधरबी मिलेगा, साब"
.
.
अवांतर - या भागात ही लेखमाला संपवायचा विचार होता, परंतु हा प्रसंग सांगायचा राहिला होता म्हणुन आज टाकलाय. माझे टुकार लेख वाचायला लावुन तुमचा अधिक अंत पहात नाही, पुढच्या भागात संपवतो. 
माझा बसप्रवास
तुमच्यापैकी जे मुंबईकर असतील, ते म्हणतील, “हॅः बसचा प्रवास ही काय लिहिण्यासारखी गोष्ट आहे? एकदा विरार फास्ट लोकलने जाऊन दाखवा. पुणेकर म्हणतील, “आमची पी.एम. टी. लै भारी. बसमधून सगळ्या हाडांसहित नीट चढून किंवा उतरून दाखवा.” पण माझ्या मित्रांनो, तुम्ही कधीच आमच्या गोवेकर खाजगी बसमध्ये बसले नसणार. मुंबैहून बदली होऊन आलेल्या साहेबलोकांनीसुद्धा शरणागती लिहून दिल्ये की “तुमच्या गोव्याच्या बसमधून प्रवास करणे हे येरागबाळ्याचे काम नोहे.”
तुम्हाला थोडी पार्श्वभूमी सांगणं आवश्यक आहे नाही का? कारण असं की, तुम्ही गोव्यात येता, २ दिवसांची टूर करता आणि परत जाता. आम्ही नेहमी इथे रहाणारे लोक खाजगी बसवाल्यांच्या तावडीत सापडलेले असतो, कारण सरकारी मालकीच्या कदंबा बस फारच कमी आहेत. त्यात अनेक पुढार्यांच्या मालकीच्या बस आहेत, ते येन केन प्रकारेण कदंबाच्या बसेस धड चालूच देत नाहीत! ते असो.
हे खाजगी बसवाले म्हणजे परमेश्वरासारखेच असतात, अवर्णनीय! कंडक्टरने गणवेष घातला पाहिजे वगैरे नियम आहेत, पण ते कागदावरच. तिकिट मागितलंत, तर “कोणत्या झूमधून आलंय हे?” अशा नजरेनं बघतील. उर्मटपणे वागता येणे हे कंडक्टर होण्यासाठीचं एकमेव क्वालिफिकेशन आहे. ड्रायव्हर ही आणखीच वेगळी जमात आहे. “आपण खरे म्हणजे जेट पायलट असायचे” असा काहीतरी त्यांचा गैरसमज असतो. ८०/९० च्या स्पीडने गाडी चालवणे, अचानक ब्रेक मारून उभी करणे इ. गोष्टीत यांची कर्तबगारी दिसते. महाराष्टृ एस. टी. ला “हात दाखवा, गाडी थांबवा” इ. नवीन घोषणांचा अभिमान असेल, पण गोव्यात ही भानगड नाहीच, कारण हात दाखवताच बस थांबतेच, भले 20 फूट आधी थांबलेली का असेना! त्यामुळे, जेव्हा गोव्यात कोकण रेल्वे सुरू झाली तेव्हा सुरूवातीला हात दाखवताच तीपण थांबेल की काय असा बर्याच लोकांना संशय होता.
गोव्यातल्या या खाजगी बसमध्ये, “२३ बसणारे, ९ उभे राहाणारे” असा बोर्ड असतो, पण उभे रहाणारे निदान ३५ तरी असलेच पाहिजेत, असा या बसवाल्यांचा समज असतो. बस कितीही भरलेली असली, तरी आणखी थोडी जागा आत आहे असा कंडक्टरचा समज असतो, आणि तो आतल्या सर्वांना “जरा दुसर्याच्या आणखी जवळ उभा रहा” असा प्रेमळ आग्रह करत असतो. गोव्यातले लोक बिचारे हाडाचे गरीब. ते शक्यतः भांडणं टाळतात. पण मराठी बाणा माझ्या रक्तात मुरलेला. या बस कंडक्टरला उत्तर देतेच, “काय रे, तुझ्या बहिणीला असंच सांगशील का?” यावर न चुकता, प्रतिउत्तर येतेच, “तुला बसमधून यायला कोणी सांगितलं होतं?”
मंडळी, गोव्यात लोकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या जास्त आहे, कारण प्रत्येक घरात एक तरी कार असलीच पाहिजे असा अलिखित नियम आहे. अगदी आमच्या बॅंकेतले शिपाईसुद्धा कार बाळगून आहेत. त्याव्यतिरिक्त घरात जेवढे लोक लायसेंस मिळवू शकतात, तेवढ्यांच्या दुचाक्या असल्याच पाहिजेत असा दुसरा नियम आहे. शिवाय शाळेत जाणार्या मुलांच्या सायकली असल्याच पाहिजेत, हा जागतिक नियम आहेच. मात्र मला अशी शंका आहे, की या बसवाल्यांच्या जाचाला कंटाळूनच लोक एवढ्या गाड्या बाळगत असावेत. खरा गोंयकार गोव्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत स्कूटर/मोटरसायकलने जातो पण बसने जायचं टाळतो, पण मी काही खरी गोवेकर नव्हे, आणि त्यातून निश्चय केलेला, “न धरी चक्र करी मी” आता नोकरीसाठी रोज फोंड्याहून पणजीला जाणे तर भाग आहे. हे अंतर आहे फक्त ३० कि.मी. म्हणजे गाडीने गेलं तर ३५ मिनिटं. पण खाजगी बसला एक ते दीड तास कितीही वेळ लागू शकतो.
म्हणजे असं बघा, मी बसस्टॅंडवर येते. एक बस पणजीला जाणारी उभी असते. कंडक्टर “पणजी, डायरेक पणजी” असं ओरडत असतो. ड्रायव्हर जागच्या जागीच बस पुढे मागे करत असतो. मी बसमध्ये खडकीशेजारची जागा पक़डून एक झोप काढते. हे चित्र १५ मिनिटे असंच रहातं. फक्त मधेच पाठीमागे दुसरी बस आली की दोन्ही कंडक्टरांचं भांडण पेटतं, अगदी हमरीतुमरीवर येऊन. थोड्या वेळात नवीन बसचा कंडक्टरसुद्धा आधीच्या बससाठी प्यासिंजर गोळा करू लागतो! मग बस फुल्ल भरली की पणजीच्या दिशेने रवाना होते. आणखी एक पेश्यालिटी म्हणजे कंडक्टर काही ठराविक ठिकाणी, जसं की रोड जंशन, औद्योगिक वसाहती इ.इ. च्या बस स्टॉपवर बसमधून खाली उतरून प्यासिंजर गोळा करतो! वाटेत थांबत थांबत बस सुशेगाद पणजीला पोचतेदेखील. याला साधारण एक ते सव्वा तास लागतो. आता हे सगळं रोजच घडतं.
पण कधी कधी अगदी रोमहर्षक(!!??) प्रसंग घडतात. गेल्याच आठवड्यातली गोष्ट. मी सकाळी साडेनऊच्या सुमारास बसस्टॅंडवर पोचले. सुरूवातीचे सगळे सोपस्कार पार पडून बस पणजीच्या दिशेने कूर्मगतीने चालू लागली. फोंड्याहून साधारण १० एक किलोमीटर्स अंतरावर कुंडई नावाचं गाव आहे. तिथे दुसर्या गावाहून येणार्या रस्त्याचं जंक्शन आहे. झालं. आमच्या बसचा कंडक्टर तिथे खाली उतरून प्यासिंजरं शोधू लागला. एकीकडे तोंडाने “पणजी, पणजी” चा गजर सुरू होताच. एवढ्यात त्याची नजर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका माणसाकडे गेली. त्याच्या हातात जिवंत खेकड्यांची माळ होती. कंडक्टरच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याने ड्रायव्हरबरोबर काहीतरी कानगोष्ट केली, आणि खेकडेवाल्याबरोबर भाव करायला सुरुवात केली. पाचेक मिनिटं झाली, त्यांची बोलणी काही संपेनात. गोव्यात हे भाव करण्याचं प्रकरण् जबरदस्त आहे. देणारा सांगतो,” शंभर”. घेणारा सांगतो, “दहा” शेवटी ३०/४० ला सौदा ठरतो. हे अगदी मोठ्या मोठ्या दिसणार्या दुकानांतसुद्धा चालतं. इथे तर काय दोघेही रस्त्यावरचे पटाईत सौदेबाज!
मधेच कंडक्टरसाहेब बाजूला फेरी मारून “पणजी, पणजी” ओरडायचं काम करून आले. परत खेकड्यांचा सौदा सुरू झाला. एव्हाना बसमधे उभे असलेले दुर्दैवी जीव चुळबुळ करू लागले. कोणी दबलेल्या स्वरात कंडक्टरच्या आई माईचा उद्धार करू लागले. मी खिडकीतून बाहेर डोकं काढून, कंसक्टरला विचारण्याचा एक क्षीण प्रयत्न केला, ”बाबा आम्ही अकरा वाजेपर्यंत पोहचू ना?” तो कुठला लक्ष देतोय! मी मनाशी विचार करतेय, ही बस आता इथून निघणार कधी? पणजीला पोचणार कधी? त्यात सध्या पाऊसपाण्याचे दिवस! पणजीला बसस्टॅंडसमोर पाण्याचं हे तळं साचलेलं असणार. त्यामुळे सॉलिड ट्राफिक जाम झालेला असणार. वाहतुक पोलीस त्या जामचा अगदी पक्का मुरांबा करण्याच आपलं काम चोख बजावत असणार. या सगळ्या अडचणीमधून बाहेर पडणं आपल्यासारख्या मर्त्य माणसाला काही शक्य नाही. तेव्हा मला ऑफिसात वेळेवर पोचवण्याची जबाबदारी मी “आकाशातल्या बापावर” सोपवून दिली आणि आपण निदान राहिलेली झोप तरी पुरी करावी अशा उद्देशाने आपले डोळे मिटून घेतले!
उटी - कुन्नूर
सुहाना सफर और ये मौसम हसी ............ हे गीत शैलेंद्रने उटी - कुन्नूर प्रवासात लिहिले असावे अशी मला दाट शंका आहे. का कोण जाणे पण कुन्नूर मध्ये हे गाणे सारखे गुणगुणावेसे वाटते.
ऊटीमध्ये २ दिवस फिरल्यावर कुन्नूरला जायचे ठरले. बराच उहापोह केल्यावर जाताना टॉय ट्रेनने जावे आणि येताना कारने यावे हा सर्वमान्य तोडगा निघाला.
हीच ती युनेस्को ने वर्ल्ड हेरीटेज साईट म्हणुन घोषित केलेली उटी ते कुन्नूर धावणारी आगगाडी.
ही फुलराणी निलगिरीच्या रांगा चढताना समुद्रसपाटीपासुन ७७०० फूटांचे अंतर पण लीलया चढते आणि निलगिरीतल्या डोंगररांगांचे चढउतार पार करताना अशी काही दिलखेचक दृष्ये आपल्यासमोर सादर करते की त्याला केवळ नजरेच्या कॅमेर्यामधुन टिपुन केवळ मेंदुच्या मेमरी मध्येच साठवावे लागते. कुठलेही यंत्र ही दृष्ये परिणामकारकरीत्या टीपण्यास असमर्थ आहे. १९०८ साली गोर्या साहेबाने सुरु केलेल्या या फुलराणीला चालवण्यासाठी तामिळनाडु सरकारला दरवर्षी ४ कोटीचा तोटा होतो म्हणे. पण निलगिरीच्या डोंगररांगांतील अवर्णनीय निसर्गापुढे हा खर्च देखील फारसा काहीच नाही असे वाटत राहते. ट्रेनमधुन काढलेली ही काही छायाचित्रे. पण असे आवर्जुन नमूद करावे लागेल की कुठलाही कॅमेरा या प्रवासाला योग्य न्याय नाही देउ शकत. हा प्रवास डोळ्यातच साठवावा:
या प्रवासात काही क्षण असे येतात की तुम्हाला अक्षरशः विमानात बसल्यासारखे वाटते. दोन्ही बाजुला खोल खोल जाणारी दरी आणि जणु काही आकाशातुन जाणारी आगगाडी. हे क्षण आम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी पिऊन काढले. छायाचित्रे घ्यायचे देखील भान कोणाला उरले नाही. खालील छायाचित्र काढले तोपर्यंत तो सर्वोच्च उंचीचा पट्टा निघुन गेला होता:
टॉय ट्रेनची ही सफर साधारण तासाभरात संपते. त्यानंतर सुरु होते ती निसर्गाच्या सान्निध्यातील एक प्रदुषणमुक्त आठवण. ट्रेनमधुन उतरल्या उतरल्या घडलेले कुन्नूरचे हे पहिले दर्शनः
कुन्नूर हे अश्या काही निवडक पर्यटनस्थळांपैकी काही आहे की जिथे जाउन आल्यावर कोणी विचारले की काय काय पाहिले की तुम्ही आपसुक सांगाल की निसर्ग सोडुन काहीच नाही. इतर कुठल्याही पर्यटनस्थळासारखे इथेही "दाखवायला" काही पॉईंट्स तयार केले गेले आहेत. परंतु ते बघितले नाहीत तरी तसा फारसा काही फरक पडत नाही. निसर्गसौंदर्य तिथे ठायीठायी भरलेले आहे. त्यासाठी वेगळ्या पोईंट्सची गरजच नाही आहे मुळात.
ट्रेनमधुन उतरल्या उतरल्या धुक्याने वेढलेल्या कून्नूरचे जे दर्शन घडले होते तेच रूप मनात भरुन राहिले आहे. कुन्नूर हे धुक्याने वेढलेले आहे असे म्हणण्यापेक्षा ते धुक्याने ग्रासलेले आहे असे म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल इतके धुके आहे तिथे. हे काही पुरावे:
धुके, थंडी (परत गुलाबी - उटीसारखीच. किंबहुना थोडीशी जास्तच), नजर जाइल तिथे हिरव्या पाचुने नटलेल्या दर्या आणि चहाच्या बागा म्हणजे कुन्नूर. किंबहुना कुन्नूर म्हणजे एक मोठी चहाची बागच आहे असे म्हणता येइल. इथल्या गाईड्सना का कोण जाणे पण इथे मुमताजच्या (शहाजहानची नाही. अपराध मधली मुमताज किंवा गोरे रंग पे ना इतना गुमान कर फेम रोटीमधली) चहाच्या बागा आहेत याचे कोण मोठे अप्रुप आहे. कुन्नूरच्या चहाच्या बागांचे हे काही फोटो:
" alt=""
आम्ही कुन्नूरच्या एकुण वातावरणानेच इतके भारावुन गेलो होतो की विशेष काही वेगळे पोइंट्स बघण्यात आम्हाला फारसा रस नव्हता. उगाच इकडेतिकडे भटकण्यात आणि निसर्गाचा पुर्ण आस्वाद घेण्यात आम्हाला जास्त मजा वाटत होती. त्यात वर आमच्या ड्रायवर कम गाईडला आम्ही जेव्हा जेव्हा कुन्नूरला काय बघण्यासारखे आहे हे विचारले तेव्हा त्याने न चुकता आम्हाला "सुसाइड पॉईंट" असे उत्तर दिले होते. हे ऐकुन आम्ही एवढे वैतागलो होतो की शोले मधला "लेकीन ये अंग्रेज लोक सुसाट क्यो करते है" हा एक लाखमोलाचा प्रश्न आहे यावर माझा पुर्ण विश्वास बसला होता. शेवटी या सुसाईड पायी या मरगठ्यांनी आपला जीव घेउ नये असा सुज्ञ विचार करुन आमच्या ड्रायवरने आम्हाला डॉल्फिन नोज आणि लॅम्ब रॉक अशी विचित्र नावे असलेल्या आणि अपेक्षेप्रमाणे जिथुन डोल्फिन नोज किंवा मेढा असे काहीच दिसत नाही अश्या पॉइंटसवर नेले. आम्हीदेखील कुठलेच पोइंट्स न बघता परत आलो असे कोणाला सांगुन त्यांच्या कुत्सित नजरांना सामोरे जायला लागु नये म्हणुन निमुटपणे त्याच्या मागोमाग गेलो. इथुन जे नजारे दिसले ते इतर कुठल्याही हिल स्टेशनवर दिसतील असेच होते. पण तरीही नेटाने आम्ही काही छायाचित्रे काढलीच. फरक काय तो इतकाच की इथे कुठेही नजर टाकली तरीही चहाच्या बागा हमखास दिसतात
मी आधीच म्हटल्याप्रमाणे शैलेंद्रने सुहाना सफर इथेच लिहिले असणार. बघा "ये आसमा झुक रहा है जमीं पे" याचा प्रत्यय देखील इथे वारंवार येतो:
अश्या या अतिरम्य गावात असेच एक सुंदरसे टुमदार घर बांधुन कायमचे वास्तव्य करावे असे राहुन राहुन सारखे वाटते आहे.
कुन्नूर खुणावते आहे. पण इलाज नाही. पापी पेट का सवाल है. इथेच काम करावे लागणार. त्यामुळे आता थांबतो.
इति मैसूर - उटी - कुन्नूर पुराण संपुर्णम.
सफर - किल्ले तोरणा
नमस्कार मित्रहो,
गेल्या शनिवारी मी किल्ले तोरणा येथे जाऊन आलो. एकदम मस्त ट्रेक झाला माझ्या जुन्या मित्राबरोबर..
तोरण्याची माहिती सर्वांना असेलच तरीही जुजबी ओळख करून देतो. शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी हा गड घेतला. कानद खोर्यातला हा सर्वात उंच किल्ला. ( आणि कदाचित पुणे जिल्ह्यातला सुद्धा..चू.भू.देणे घेणे ) पूर्वी हा किल्ला आदिलशाही अंमलाखाली होता आणि अगदीच दुर्लक्षित अवस्थेत होता. म्हणजे राजांच्या ताब्यात आल्यावरच याचं भाग्य उजळलं असं समजायला काही हरकत नाही. अतिशय उंच आणि बेलाग किल्ला आहे हा. याचं दुसरं नाव प्रचंडगड.
आम्ही सकाळी सात वाजता पुण्याहून निघालो. सिंहगड रस्त्यावरून तसेच पुढे पाबे खिंडीत गेलो. तोरणा/राजगडला जायला नसरापूर मार्गे जाण्यापेक्षा हा रस्ता अजून जवळचा आहे. पाबे खिंडीत थोडा वेळ थांबून आम्ही सिंहगड, राजगड आणि तोरण्याचं दर्शन घेतलं. आणि मग तिथून पुढे थेट वेल्हा. खाली जास्त गाड्या दिसत नव्ह्त्या त्यामुळे मनापासून खुश झालो. नाहीतर आजकाल गडांवर पण गर्दी व्हायला लागली आहे. सिंहगड, लोहगड हे शनिवार-रविवार सुट्टिच्या दिवशी करायचे गड आता राहिले नाहियेत. तोरणा चढताना जरा फाटते या हौशी लोकांची...त्यामुळे जरा गर्दी कमी. तरीपण राजगड ला ही आजकाल बाजार भरायला लागला आहे. असो...तो एक अजून वेगळाच विषय होईल.
चढायला सुरवात केली आणि पहिलाच धक्का बसला. दोन वर्षांपूर्वी चा हा फोटो पहा आणि आत्ताचा. काही बोलायची गरजच नाही. पूर्वी ओढ्याला किती पाणी होतं ...
आत्ताचा.....
थोडेसे खिन्न होऊन चढ चढू लागलो. तोरण्याचा पहिल्याच सोंडेवरचा चढ पेकाट मोडतो...निदान माझं तरी..त्यामुळे माझा वेग जरा कमी होता आणि त्यात भर म्हणून चक्क ऊन पडलं होतं.
पण तो पार केल्यानंतर फारशी चढाई नाही.
नंतर वाटेत जाताना ऊन गायब झालं आणि जसं जसं वर गेलो तशी तशी हवा थंड होऊ लागली. पलीकडल्या तलावाचं पाणी अगदी निळंशार दिसत होतं आणि तिकडे ढग सुद्धा खाली उतरले होते. त्यामुळे थोडी फोटोग्राफीची हौस भागवून घेतली. जरा पाऊस येतो कि काय असं वाटलं म्हणून लवकरच पुढे निघालो. पण छे! कसलं काय...आलाच नाही बेटा..
नंतर मात्र इकडे तिकडे न करता सरळ बिनी दरवाजा गाठला.
वाटेत सुद्धा जो एक छोटा धबधबा लागतो, त्याला फारच कमी पाणी होतं. आता वर अगदी ढगांमधूनच चालत होतो. पहिली जाऊन गाठली ती झुंजार माची...काही वेळ खाली नुसतेच ढग होते त्यामुळे थोडा वेळ तिथे बसायला लागलं. नंतर मात्र ती कसर भरून निघाली.
नंतर मेंगाई देवीचं दर्शन घेऊन पुढे निघालो. या वेळेपर्यंत दर वर्षी तोरण्याला निळी छोटी फुलं फुललेली दिसतात पण या वेळी जास्त दिसली नाहीत. आम्ही आता बुधला माची कडे निघालो होतो. हे अंतर जरा जास्त आहे म्हणून थोडी घाई..
वाटेत एक गुप्त दरवाजा आहे. त्यातून रांगत गेलं की बुरूज आहे. अर्थात त्या बुरूजाचा भाग वरूनही दिसतोच. अगदी सुबक रचना आहे. तिथे थोडा वेळ घालवला...
आणि कोकण दरवाज्याकडे निघालो. हा आहे कोकण दरवाजा.
अजून सुद्धा बुधला लांबच दिसत होता
आता झपाझप चालायला सुरूवात केली आणि थांबायचं नाही असं ठरवलं...पण हा आला आडवा...
खूपच छोटा होता...मस्त दगडावर बसला होता. पण आमची चाहूल लागली आणि तो नाराज झाला. माझा मित्र शेजारच्या पायवाटेनी पुढे गेला तर यानं डंख मारल्यासारखं करून माझी पंचाईत केली. खरं तर हा विषारी का बिनविषारी हे माहित नव्हतं आणि भितीही इतकी वाटत नव्हती. गेलो आम्ही तसेच पुढे. च्यायला इथे कारवी आणि बाकीचं गवत चांगलं खांद्या पर्यंत वाढलं होतं. आता मला भिती वाटायला लागली. इथे दोन चार साप खिशात, गळ्यात आले असते तरी कळलं नसतं. मध्येच चालताना पायात काही वेल आली...काही अडकलं तरी आम्हाला सापच आठवत होता. हा हा हा..
शेवटी बुधल्याला पोचलो. सकाळपासून काहीही खाल्लं नव्ह्तं ते इथेच खाल्लं. इथून कळतं तोरण्याला प्रचंडगड का म्हणतात ते
इथून राजगड ला जायचा रस्ता आहे. राजगड - तोरणा किंवा तोरणा - राजगड हा एक मस्त ट्रेक आहे पण शक्यतो नवख्यांसाठी नाही. कारण मजबूत चालायचं आहे आणि राजगडवरून येताना एक मस्त अवघड पॅच आहे. खाली अगदी डावीकडॆ अवघड वाट दिसतिये का? शिडी लावली आहे तिथे. तिथून खाली उतरायचं आणि पुढे एका ठिकाणीही थोडं अवघड आहे.
दर वेळी ट्रेक ला आम्ही एके ठिकाणी शांत बसतो. घड्याळ, मोबाईल, कॅमेरा हे सगळं बाजूला ठेवतो. कामाचे, जबाबदार्यांचे, कर्मकट्कटींचे विचार बाजूला सारतो आणि अगदी शांत शांत बसतो. बाजूची हिरवाई , मोकळा वारा, गूढ शांतता अगदी आत झिरपत जाते. तेच आत्ता आम्ही केलं. खरं तर उठून जायचं अगदी जिवावर आलं होतं पण खूप चालून अजून गड उतरायचा होता म्हणून परत निघालो.
परतीच्या वाटेवर अजूनही तो साप त्या दगडावर बसला होता. मला वाटलं मेला बिला कि काय..किंवा कोणी मारलं का काय? कारण काही असतात असे वीर..उगाच एखाद्या जीवाला मारून मर्दुमकी दाखवणारे..पण नाही. बहुतेक तो कात टाकणार होता लवकरच. मघाशी लक्षात नव्ह्तं आलं.
आता पुन्हा कोकण दरवाजा, मेंगाई देवीचं देऊळ, बिनी दरवाजा गाठला. आणि उतरायला सुरूवात केली. अगदी निवांत उतरलो. खालच्या ओढ्यामधे थोडा वेळ पाय टाकून निवांत बसलो. पुन्हा एकदा तोरणा डोळ्यात साठवून घेतला आणि पाबे खिंडीतून पुण्याकडे निघालो...


















