प्रवास
ड्रॅगनच्या देशात.
प्रेषक चतुरंग ( शुक्र, 03/19/2010 - 07:36) .दोन मांजरं एकमेकात किंचित गुरगुरून भांडल्यासारखा आवाज डोक्यावरच्या स्पीकरमधून आला, दिवे लागलेले जाणवलं, खिडक्या उघडल्या जाऊन भस्सकन उजेड आत आला आणि मला जाग आली. पांघरुण सरकवून सीट सरळ केली. हवाईसुंदर्या (युनायटेड एअरलाईन्सच्या बाबतीत 'हवाईसुंदरी' ह्या शब्दाबद्दल तीव्र आक्षेप असू शकतात हे मान्य, पण एक पद्धत आहे म्हणून म्हणावे लागतेय!
)रांगातून हिंडत लँडिंगची तयारी करत होत्या. शिकागोहून निघालेली सलग साडेतेरा तासाची, पाय आणि पाठीचा बुकणा पाडणारी, युनायटेड एअरलाईन्सची फ्लाईट 'पू डाँग' विमानतळावर चाकं टेकती झाली आणि मी सुटकेचा निश्वास सोडला!
अनेक फाट्यांच्या चिनी अक्षरांसोबतच ठळक दिसणारी 'शांघाय वेलकम्स यू' अशी चक्क इंग्रजीमधली पाटी वाचतच मी इमिग्रेशनच्या रांगेत उभा होतो. कडक इस्त्रीच्या यूनिफॉर्ममधल्या चिनी युवतीनं सोनेरी काड्यांच्या चष्म्याआडून बघत "हेलो!" असं स्वागत केलं मी "नी हाव!" म्हणताच तिला बरं वाटलं असावं. तिनं माझ्याकडे आणि एकदा पासपोर्टातल्या फोटोवर निरखून पाहत स्टँपिंग केलं आणि माझा ड्रॅगनच्या देशात पहिला प्रवेश झाला.
सगळे सोपस्कार आटोपून माझ्या नावाची पाटी हातात असलेला ड्रायवर शोधून काढला. मंदारिन मध्ये हॉटेलचं नाव छापलेला ईमेल त्याच्या हातात ठेवला, त्यावर नजर फिरवून त्यानं समजलं अशा अर्थाचं हास्य केलं आणि मी निश्चिंत झालो. त्याच्यावर नजर ठेवतच मला त्याच्यामागे पळावं लागत होतं कारण सगळे सारखेच दिसत होते, उगाच मी 'इकडे तिकडे' कुठेतरी पहायचो आणि दुसर्याच बाबाच्या गाडीत जाऊन बसायचो! 
बाहेर पडल्यावर गार वार्याचा झोत सप्पकन आंगावर आला. लेदर कोट आणल्याचं मला बरं वाटलं. फेब्रुवारीत शांघायला जवळपास २-३ डिग्री सें. तपमान असतं.
गाडीत बसंतच मी पृच्छा केली "हाउ फार इज होटेल?"
"?" त्याला काही सुधरले नव्हते!
"हाउ मच टाइम टु रीच?"
"वाँ आव!" (म्हणजे वन अवर. हे चिनी उच्चार आता मला कित्येक टेलीकॉन्फरन्सवर बोलून ठाऊक झाले होते.)
एका बाकदार चढावर फस्क्लासपैकी वळण घेऊन गाडी रस्त्याला लागली. चार पदरी रस्ते, "80 KM" चे बोर्डस सगळं अगदी पाश्चात्य देशांशी स्पर्धा करायची म्हणूनच जणू उभारलेलं वाटत होतं. दूरवर कुठल्याशा पॉवर प्लँटची अजस्त्र धुराडी करड्या रंगाचा धूर काढत होती. कित्येक हजार वोल्टच्या पॉवरलाईन्सचे अफाट उंच मनोरे लांबवर जात दिसेनासे झाले होते. हे मनोरे मला नेहेमी त्या 'एंपाअर स्ट्राईक्स बॅक' मधल्या अजस्त्र रोबोंची आठवण करुन देतात!
आकाश मात्र जाम धुरकट वाटत होतं. प्रदूषण प्रचंड होतं. जपानी, अमेरिकन, यूरोपिअन, कोरिअन सगळ्या देशांच्या सगळ्या ब्रँड्सच्या गाड्या धावत होत्या.
एवढ्यात झुऽऽऽप्~असा आवाज करुन माझ्या उजवीकडून काहीतरी प्रचंड वेगात गेलं! रस्त्याच्या उजव्या बाजूला उंचावर एक ट्रॅक होता त्यावरुन गेलेली ही हायस्पीड ट्रेन!
ताशी २५०-३०० किमि असला अचाट वेग होता तिचा! चक्रधर महाशयांना इंग्लिशचा जेमतेम गंध आणि माझं मंदारिन "नी हाव!" पाशी संपणारं त्यामुळे बोलण्याचा प्रश्न नव्हता. मध्येच कधीतरी माझा डोळा लागला.
अचानक हॉर्नने दचकून जागा झालो (क्षणभर पुण्या-मुंबईत आलो की काय असं वाटून गेलं). एका भल्यामोठ्या चौकातल्या सिग्नलला गाडी थांबली होती.
बाजूला बघितले आणि अनेक दुचाकीधारी दिसल्यावर फार म्हणजे फार बरं वाटलं!
पुढल्या पाच मिनिटात गर्दीतून वाट काढत 'हॉटेल रमाडा प्लाझा'वर गाडी आली. माझं सामान हॉटेलच्या ट्रॉलीवर लादून, माझी सही घेऊन ड्रायवर निघून गेला!
खोलीवर येऊन पोर्यानं सामान टाकलं आणि काढता पाय घेतला.
थंडगार पाण्याच्या दोन बाटल्या तहानेनं सुकलेल्या घशाखाली लोटल्या. लॅपटॉप चालू केला. एकीकडे टबात गरम पाणी सोडून ठेवले होते.
इंटरनेट कनेक्शन मिळताच घरी बायकोला फोन करुन सांगितलं की मी सुखरुप पोचलो.
आणि लगोलग वाफाळत्या गरमा गरम पाण्याच्या टबात शिरलो!!
लांबच्या प्रवासानंतर हे असलं स्नान म्हणजे स्वर्गसुखच असतं. शांघायमधला माझा पहिला दिवस सुरु झाला होता!!
(क्रमशः)
-चतुरंग
रायरेश्वर आणि केंजळगड
प्रेषक बज्जु ( सोम, 03/15/2010 - 15:58) .ठाण्याहून रात्री १२.०० ची महाड्-पिंपळ्वाडी एस्.टी. पकड्ली. पहाटे ५.०० ला महाड्ला आलो. महाड आणि पूणे यांना जोडणार्या वरंधा घाटातून पुढे जाणार्या एस्.टी. ने हिरडोशीला आलो. साधारण ८.३० वाजले होते. ईथूनच आमच्या ट्रेकला सुरूवात होणार होती. हिरडोशी गावातून वरंधा घाटातील लांबवर दिसणारे डोंगर फारच सुरेख दिसत होते.
हिरडोशी गावातून पुढे निरा नदी ओलांडुन कुद्ळे गावात पोहोचायचं होत. निरा नदीला काही ठिकाणी बर्यापैकी पाणी होत तर काही ठिकाणी चिखल होता. त्यातल्या त्यात कमी पाणी आणि चिखल असलेल्या जागेतून नदी ओलांडायची होती. काही ठिकाणी नदीचे पात्र अगदीच कोरडे ठाक पड्ले होते. अश्या जागा हेरत, शक्यतो पाय चिखलात न जाऊ देता नदी पार आलो.
नदी पार करुन कुद्ळे गावात जाताना
![]()
कुद्ळे गाव हिरडोशी पासुन साधारण २.३० तास आहे. वाटेतील एक्-दोन वाड्या मागे टाकून कुद्ळे गावात आलो. तोपर्यंत १०.३० वाजत आले होते. कुद्ळे गावातील लोकांनी ईकडुन कशाला जाता, चांगली जवळ्ची वाट सोडून लांबची वाट कशाला धरलीत वगैरे पकाव प्रश्ण विचारले
. त्यांना काय माहित आम्हाला अंगातली रग जिरवण्यासाठी लांबुनच जायचय ते
मंदिराच्या आवारातील फणस (लाईव्ह)
![]()
मंदिरातुन समोरच कुद्ळे खिंड आणि रायरेश्वरचे टोक दिसत होते. कुद्ळे गावात पाणी भरुन घेतलं, रायरेश्वरचा रस्ता विचारुन घेतला आणि निघालो.
![]()
साधारण तास भराच्या चालीने कुद्ळे खिंड चढुन आलो. आता ऊन मी म्हणायला लागलं होत. खिंडीत झाडी अशी विशेष नव्हतीच आणि होती ती सगळी खुरटी.
कुद्ळे खिंडीतुन दिसणारे कुदळे गाव
![]()
या ठिकाणापासुन रायरेश्वर मंदिरात जाण्यासाठी पुढे किमान चार तास लागणार होते. रायरेश्वरचे पठार पुर्व्-पश्चिम १६ कि.मी. पसरलेलं आहे. आता ऊनामुळे अंगाची काहिली होत होती. पठारावर सुध्दा झाडी अशी विशेष नव्हतीच. आपण चाललोय हि वाट बरोबर आहे कि नाही हे विचारायला माणुस सुध्दा कोणी भेटत नव्ह्तं. पण सलग मळलेली वाट होती हे विशेष. साधारण दोन तास चाललो आणि एकदम झांज आल्यासारख वाट्लं. बरोबरच्या गिरीषला विचारलं त्याला सुध्दा ऊनामुळे तसचं होत होतं. तसेच एका झुड्पात घुसलो. दोघांनीही मीठ,साखर पाणी प्यायलं, थोड्सं खाल्ल आणि २०-२५ मिनीटं शांत झोपलो, थोडी तरतरी आली, घड्याळ्यात बघीतलं तर २.३० वाजून गेले होते. रायरेश्वरच्या देवळाचा, अजून किती वेळ चालायचय याचा अंदाज येत नव्हता. संपूर्ण वाटेवर एक माणूस भेटेल तर शपथं.
१६ कि.मी. पसरलेलं रायरेश्वरचे पठार
![]()
तसेच चालतं राहिलो, जवळ्च पाणी संपत आल होतं. एक्-दिड तासाने झाडीत अचानक गुरांचा आवाज ऐकू आला, जोरात आवाज दिला "ओ मामा" तसा झाडीतुन एक माणूस बाहेर आलो. त्याला विचारलं रायरेश्वरचं देऊळ किती लांब आहे हो? पाणी जवळ कुठे मिळेल? तसा तो आम्हाला त्याच्या घरातच घेऊन गेला, पाणी दिलं आणी १० मिनीटातचं तुम्ही रायरेश्वरला पोहचाल असं सांगितलं. मामाशी १५-२० मिनीट गप्पा मारल्या. पोट फुटेपर्यंत पाणी प्यायलो आणि निघालो. खरोखरच १० मिनीटात देवळापाशी पोहोचलो.
रायरेश्वरचं मंदिर - शंकराची पिंडि
रायरेश्वरचं मंदिरातील फ्रेम - महाराज शपथं घेताना -
![]()
देवळात पोचलो, साधारण ५.०० वाजत आले होते. सकाळी ८.३० ला हिरडोशीहुन निघालो होतो. जवळ जवळ ८ तासाची चाल झाली होती, ती पण मरणाच्या ऊन्हातून. तंगड्या पसरुन बसून राहिलो २०-२५ मिनीट. नंतर देवळात गेलो. शंकराच्या पिंडिचे दर्शन घेतलं आणि रायरेश्वर गडावर फेरफटका मारायला निघालो. गडावर २०-२५ घरांची वस्ती आहे. सगळ्या लोकांची आडनावं जंगम. हे सर्व लोक माळ्करी आहेत आणि त्यामुळे र्निव्यसनी सुध्दा. त्यांच्या बरोबर चहा घेतला, गप्पा मारल्या आणि पुन्हा देवळात आलो. येताना पाणी भरुन घेतलं आणि चुली करता थोड्याश्या काट्क्या जमा केल्या. घरनं निघताना पोळ्या घेतल्या होत्याच शिवाय रेडी-टू-ईट पनीर माखनवाला चं पाकीट घेतलं होतं, १० मिनीटात पनीर माखनवाला तयार. मस्तपैकी जेवलो आणि देवळातच झोपलो. दुसर्या दिवशी केंजळ्गड्ला जायच होत. दिवसभराच्या रपेटीमुळे झोप छान लागली हे सांगणे नकोच.
दुसर्या दिवशी ७.३०-८.०० ला ऊठ्लो, आवरलं. चहा प्यायला, सॅक भरली, आणि केंजळ्ला जायला निघालो. रायरेश्वर मधला एक मामा आमच्या बरोबर खिंडीपर्यंत यायला तयार झाला. त्याच्या बरोबर निघालो. २०-२५ मिनीटात केंजळचे दर्शन झाले.
रायरेश्वरहून समोर केंजळ्गड, त्यामागे कमळ्गड, त्याच्यामागील रांगेत पाचगणी व महाबळेश्वर
![]()
रायरेश्वर मधला मामा - मागे पाचगणी व महाबळेश्वर परिसर
![]()
मामाचा निरोप घेऊन निघालो, रायरेश्वरच्या शिडीहून ऊतरलो आणि केंजळ - रायरेश्वर धारेवर आलो. येथून केंजळला जाणारा रस्ता अगदी स्पष्ट दिसत होता.
तासभरातच केंजळ्च्या पायर्यांपाशी आलो. ५४ पायर्या चढुन केंजळ्च्या माथ्यावर आलो.
![]()
माथ्यावर विशेष काही नव्ह्ते. माथ्यावर एक वेगळ यंत्र होत. ते चुन्याचा घाणा असावा किंवा तोफेला ह्व्या त्या दिशेला फिरवता याव यासाठि केलेली सोय होती ते मात्र कळ्लं नाही.
![]()
केंजळ्च्या पोटातील छोटी गुहा बघीतली, थोडा आराम केला, आणि केंजळ माचीच्या दिशेने ऊतरायला सुरुवात केली.
केंजळ माचीवर पोहोचलो तर तेथील कातकरी मुलांनी आमच्या भोवती खाऊ द्या, खाऊ द्या म्हणून गलका सुरु केला. पण आमच्या जवळ त्यांना देण्यासाठी खाऊ काहीच नव्हता. परंतु त्या सग़ळ्याना एकत्र बसवून एक फोटो मात्र काढुन घेतला. त्यांच्या चेहर्यावरील निरागस भाव खरचं पहाण्यासारखे होते.
तिथून कोर्ले गावात यायला आणखी अर्धा तास लागला. कोर्ले गावात बसची वाट बघत असतान एक मजेशीर पाटी दिसली.
![]()
थोड्याच वेळात बस आली आणि आम्ही कोर्ले-भोर्-स्वारगेट्-ठाणे अशा परतीच्या प्रवासासाठी निघालो.
दीऊ - पावसाळ्यातील भटकन्ती
प्रेषक Manish Mohile ( गुरू, 03/11/2010 - 22:47) .२००९ चा ऑगस्ट महिना. आम्हाला रक्षाबन्धन, स्वातन्त्र्यदिन व त्याला लागून रविवार अशा लागोपाठ तीन सुट्ट्यान्चा दुग्धशर्करा योग जमून आला होता. त्याचा फायदा घेऊन आम्ही दीऊ ला जायचे ठरवले. अहमहदाबादपासून दीऊ साधारण ५०० कि.मी. आहे. अहमदाबाद-भावनगर-उना-दीऊ असा साधारण मार्ग आहे.
१४ तारखेला सकाळी पाच वाजता आम्ही तीन कुटुम्बे निघालो. स्वतःजवळ वाहन असल्यामुळे बस, ट्रेन पकडण्याची कुठचीही गडबड नव्हती. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे उन्हाचा तडाखा कुठेही जाणवत नव्हता. गाणी गात, ऐकत, गप्पागोष्टी करत , मध्ये दोन ठिकाणी चहा व नाश्त्यासाठी थाम्बून दुपारी साधारण दोन अडीच च्या सुमारास आम्ही आमच्या हॉटेलवर पोचलो. जेवण करून, थोडासा आराम करून आम्ही बाहेर पडलो.
सन्ध्याकाळची वेळ झाली होती. दीऊ अशी जागा आहे की कुठलयाही रस्त्यावरून थोडे अन्तर प्रवास केला की बाजूने समुद्र साथ करायला लागतो. वळणावळणान्चे रस्ते आणि साथीला सागर.
पहिल्यान्दी आम्ही गेलो गन्गेश्वर महादेव या ठिकाणी. येथे थोडेसे खाली उतरून गेले की शन्कराच्या पिन्डी आहेत. बाजूलाच आहे उफाळता सागर. भरतीच्या वेळेला तर ईथे जाताच येत नाही. आम्ही गेलो तेव्हा ओहोटी होती पण लाटा तरीही फेसाळत्याच होत्या. याचे कारण दीऊ मध्ये कुठेही गेले तरी किनार्यापासून थोडे आतमध्ये खडक आहेत. त्यामुळे सागर कायम फेसाळलेला असतो.
तिथेच एका दगडावर दिसला एक खेकडा.
मग तिथून निघालो सनसेट पॉईन्ट बघायला. पावसाळी वातावरण असल्यामुळे मधूनच ढगान्मुळे अन्धारून येत होते तर मधूनच सुर्यप्रकाश ढगान्च्या आडून दोकावत होता.
आम्ही सनसेट पॉईन्टच्या जवळ पोचलो आणि थोड्या वेळापुरता स्वच्छ सुर्यप्रकाश आला. सनसेट पॉईन्ट वरून समोर अथान्ग सागर पसरलेला दिसतो तर उजव्या बाहूला दिसतो चक्रतीर्थ बीच.
आजूबाजूचे सगळा नजारा बघता बघता सुर्यास्ताची वेळ झाली. दररोज सुर्यास्त होत असला तरी आपण निसर्गाच्या सान्निध्यात राहून तो बघण्यात काही वेगळीच मजा असते. त्यातही समुद्र किनारी तर खासच.
दुसरा दिवस उजाडला. आज दीऊचा किल्ला आणि सेन्ट पॉलचे चर्च बघण्याचे ठरले होते. प्रथम आम्ही भेट दिली चर्चला. हे सेन्ट पॉल चर्च सन १६९१ मध्ये बान्धले गेले. आतमध्ये सुरेख लाकडी कोरीव काम आहे आणि त्यामध्ये आहेतयेशू आणि मदर मेरीच्या सुन्दर मुर्ती.
तिथून आम्ही निघलो व आलो दीऊच्या किल्ल्याला भेट द्यायला. हा किल्ला पोर्तुगीज व गुजरातच्या तत्कालीन राजानी मिळून सन १५३१ ते १५४६ या कालावधीत बान्धला. याच्या तिन्ही बाजूनी अरबी समुद्र आहे . त्यामुळे सुरक्षेच्या द्रुष्टीने याचे विशेष महत्व आहे. किल्ल्यावर अजूनही चान्गल्या अवस्थेतील तोफा आहेत, तोफगोळे आहेत.
सम्पूर्ण किल्ल्यामध्ये पावसाळ्याचा परिणाम म्हणून हिरवेगार दिसत होते. किल्ल्यामध्ये असलेले दीपग्रुह त्या हिरव्यागार पार्श्वभूमीवर छन दिसत होते.
आता उन्हे चान्गलीच वर आली होती. आरामाची पिकनिक असल्यामुळे फारसे कष्ट घ्यायचे नाहीत हे ठरलेच होते. त्यामुळे हॉटेलवर परत येऊन ताणून दिली. सन्ध्याकाळी दीऊच्या प्रसिद्ध नागवा बीचवर समुद्र स्नानाचा आनन्द घेतला आणि तिसरे दिवशी सकाळी परतीच्या प्रवासाला निघालो. नजरेसमोर मात्र दिसत होता दीऊच्या सम्पूर्ण ट्रीपमध्ये आमची साथ करणारा सागर.
चंद्रगड आणि ऑर्थरसीट
प्रेषक बज्जु ( गुरू, 03/11/2010 - 17:22) .चंद्रगड आणि ऑर्थरसीट
चंद्रगड आणि ऑर्थरसीटचा ट्रेक म्हणजे महाबळेश्वर आणि जावळी खोर्यांमध्ला एक नितांत सुंदर ट्रेक. सदाहरित जंगलाचा हा प्रदेश. तर अशा या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या, आणि निर्सगरम्य परिसरातून ट्रेक करणं म्हणजे एक अविस्मरणिय अनुभवच.
थोडक्यात इतिहासः- जावळी खोर्यावर वर्चस्व असलेले सूर्यराव/चंद्रराव मोरे सहजासह्जी स्वराज्यात सामील होत नाहीत हे पाहून महाराजांनी त्यांच्याकडे असलेला रायरीचा किल्ला म्हणजे रायगड स्वारी करुन स्वराज्यात सामील करुन घेतला. जिवाच्या भितीने मोरे जावळीखोर्यात असलेल्या चंद्र्गडावर लपून राहिला. महाराजांना ही माहिती समजताच त्यानी मोर्यांना माफ करुन स्वराज्यात येण्याची विनंती केली. पण मग्रुर मोर्यांनी महाराजांनाच उलट निरोप पाठ्वला तुम्ही उद्या येणार असाल तर आजच या, आमचा प्रदेश महाभयंकर जंगलानी वेढ्लेला आहे. जावळीला येताच तुम्ही आमच्या मुठित याल, आम्ही तुमचा सपशेल पराभव करु वगैरे वगैरे. अखेर महाराजांनी मोर्यांच पूर्ण पारिपत्य केलं आणि जावळी व आजुबाजूचा परिसर स्वराज्यात सामील करुन घेतला. मुळचे "येता जावली, जाता गोवली" हे वाक्य बखरीत चंद्रराव मोरे यांच्या तोंडी आहे. असो हा झाला थोडक्यात इतिहास. आता इतिहासातुन थोडे बाहेर येउ.
शनिवारी सकाळी ६.३० ला आम्ही चौघे जण मारुती ८०० घेऊन निघालो. साधारण १०.३० पर्यंत महाड्ला आलो. तिथे यथेच्छ मिसळपाव, चहा हाद्डून पुढे पोलाद्पूर - कापडा फाटा मार्गे, ऊमरठ या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जन्म ठिकाणी आलो. ऊमरठला येईपर्यत ११.३० वाजुन गेले.
ऊमरठ
![]()
नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलारमामा यांच्या समाधीचे प्रवेश्द्वार
![]()
नरवीर तानाजी आणि शेलारमामा यांची समाधी
![]()
तानाजी आणि शेलारमामा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुढे ढवळे गावात जाण्यासाठी निघालो. ढवळे गावातुनच पुढे चंद्रगड आणि ऑर्थरसीटला जायचे होते. ढवळे गावात यायाला दुपारचे १२.३० झाले. गावातील एका घरात जेवणासाठी व रहाण्यासाठी चौकशी केली. जेवून साधारण ३.०० च्या सुमारास चंद्रगडावर जाण्यासाठी निघालो. ५-१० मिनीटातच चंद्रगडाचे पहिले दर्शन झालं.
ढवळे गावातुन जवळच असलेल्या धनगरवाड्यात पुढची वाट विचारुन घेतली आणि १५ मिनीटातच गडाच्या मुख्य चढणीला लागलो. पुढ्ची वाट दाट झाडीतून जाणारी होती. पण वाटेवर "हरी ओम" चे बोर्ड झाडाला लावलेत असं धनगरवाड्यातील लोकांनी सांगुन ठेवलं होत, त्यामुळे वाट शोधायला लागली नाही.
वाटेत एके ठीकाणी चंद्रगड दर्शन अशी पाटी दिसली. या पाटीपासुन चंद्रगडाच्या माथ्यापर्यंत सगळा अंगावरचा चढ आहे. वाटेत घसाराही भरपुर आहे.
साधारण अर्ध्यातासात चंद्रगडाच्या माथ्यावर पोहोचलो. माथ्यावर ऊघड्यावर पडलेले देव, पाण्याचे टाके व कड्याच्या पोटात लपलेली छोटीशी गुहा या व्यतिरिक्त काही नाही. माथ्यावरुन ढवळे गाव, ढवळी नदी, आजुबाजूचा रायरेश्वर पर्यंतचा परिसर आणि आमचे दुसर्या दिवशीचे टार्गेट ऑर्थरसीट फार सुरेख दिसत होते.
मागील रांगेत महाबळेश्वरचे ऑर्थरसीट
![]()
संध्याकाळी पाचच्या सुमारास चंद्रगडाहून निघालो ते पुन्हा ढवळे गावात यायला ६.३० झाले.
दुसर्या दिवशी सकाळी चहा प्यायला, पाणी भरुन घेतलं आणि मामांचा निरोप घेऊन आम्ही तिघेजणं ऑर्थरसीटकडे रवाना झालो. आमच्यापैकी एक, संदीप, गाडी घेऊन त्याच दिवशी संध्याकाळी आम्हाला ऑर्थरसीटला घ्यायला येणार होता.
चालायला सुरवात केली आणि साधारण एक तासाने लक्षात आलं कि आपण वाट चुकलो आहोत
, पुन्हा गावाच्या दिशेने मागे फिरलो, अर्ध्या वाटेत आलो तेव्हा कुठे शेतात काम करणारा एक माणूस भेटला, त्याला म्हंट्ल जरा वाटेला लावून द्या पण शेतातलं काम सोडून यायला तो तयार होईना, अगदीच हातापाया पड्लो तेव्हा तो तयार झाला पण अर्ध्या वाटेत असलेल्या सापळखिंडीपर्यंतच आपण येऊ असे त्याने सांगितले. सापळखिंडीपर्यंत त्या मामाने कुठ्ल्या वाटेने आणले ते आजपर्यंत काही लक्षात येत नाही. पण वाटेला लागलो हे नक्की. मामाला निरोप दिला, जाता जाता पुढ्ची वाट विचारुन घेतली. तोपर्यंत भरपुर वेळ निघुन गेली होती. सापळखिंडीचा चढ काही संपता संपत नव्ह्ता.
सापळखिंड - केव्हा संपणार हा चढ ?? 
![]()
दुपारी दोन वाजून गेले तेव्हा कुठे आम्ही सापळखिंडीचा चढ चढुन बहिरीच्या देवांपाशी आलो. येथून एक ते दिड तासात ऑर्थरसीटला पोहोचू असा अंदाज होता. जवळ्चे पाणी संपत आले होते पण बहिरीच्या देवांपाशी पाण्याची टाकी आहेत हे माहीत होते. पण ती टाकी काही आम्हाला कुठे दिसली नाहीत. ऑर्थरसीटला जाणारी वाट त्या टाक्यांच्या मागुनच जाते त्यामुळे पाण्यासाठि जास्त वेळ न घालवता लगेच निघायचे ठरले. पुन्हा एक दिड तास चालल्यावर लक्षात आले कि आपण चुकत आहोत, बराच वेळ निघून गेला होता. आत्ता जवळ पाणीही अगदी कमी होते आणि वाटही मिळ्त नव्ह्ती. शेवटी चारही दिशेला वाटा शोधून दमलो आणि लक्षात आलं कि आज काही आपण ऑर्थरसीटला पोहोचू शकत नाही. आज जंगलातच झोपाव लागणार, ऊद्या सकाळी ऊठून काय ते बघू. रात्र झाली, जंगलातून वेग्-वेगळे आवाज यायला सुरुवात झाली (बहुदा पक्षी आणि रातकिडे) पण त्याचे विशेष काही वाट्ले नाही. तसेच उघड्यावर झोपलो. तशी उघड्यावर झोपायची सवय होती म्हणा. पण नुकताच मलेरियातुन ऊठ्लो होतो म्हणुन जरा काळजी.
पहाटे ऊठून नव्या ऊत्साहाने पाण्याची टाकी शोधायला सुरुवात केली आणि १० व्या मिनीटाला आम्ही टाक्याला पोचलो जी आद्ल्या दिवशी २ तास प्रयत्न करुनही मिळाली नव्हती.
भरपुर पाणी पिऊन, बाट्ल्या भरुन निघालो. १५ मिनीटात पहिला चढ चढला आणि समोर एकदम दरीच आली. हेच ते सावित्रीचं खोर.
ईथून २५-३० मिनीटात ऑर्थरसीटला पोहोचणार होतो.
![]()
आता ऑर्थरसीटच्या अगदी जवळ आलो, नजरेच्या टप्प्यात. ऑर्थरसीटला ऊभे असलेले लोक कौतुक मिश्रीत आश्चर्याने आमच्याक्डे बघत होते. हे इक्डुन कुठून आले ? असेच भाव त्यांच्या चेहर्यावर होते.
![]()
आम्हाला घ्यायला आलेला संदिप रात्री ऊशिरा पर्यंत आमची वाट बघून शेवटी क्षेत्र महाबळेश्वरला जाऊन झोपला, तो दुसर्यादिवशी सकाळी पुन्हा आम्हाला घ्यायला आला. धन्य त्याची
अशातर्हेने "येता जावली, जाता गोवली" हे वाक्य वाट चुकल्यामुळे आमच्या बाबतीत खरे ठरले.
गडप्रेमी बज्जु
ता.क.: कॅमेरातील लेन्समध्ये काहीतरी तांत्रीक बिघाड झाल्याने फोटो धुरकट आलेले आहेत.
मदनगड
प्रेषक बज्जु ( सोम, 03/08/2010 - 16:36) .मदनगड
या वर्षी थर्टी फस्ट्ला मदनगडावर जाऊया असा नुसता विषय काढ्ला आणि नाक्यावरच्या काही लोकांचे चेहरे सुतकी झाले. थर्टी फस्ट्ला गडावर ? आणि ते सुध्दा मदनगडावर ??
तिथे काय ठेवलयं ?
वेड**च आहेत मस्त एन्जॉय करायचं सोडून शरीराचे हाल करुन घ्यायला चाललेत
वगैरे वगैरे चर्चा झाल्या. मन का राजा (म्हणजे आपण आप्ल्याला हवं तेच करायचं) ही आमच्या नाक्यावरची पॉलीसी असल्याने ही अशा प्रकारची बोलणी आम्ही गडप्रेमी मंड्ळींनी अर्थातच मनावर घेतली नाहीत. गडावर दारू प्यायला आमचा कट्टर विरोध असल्याने दारुकाम करणारी
आणि निव्वळ मौज मजा (धांगडधिंगा म्हणा हवं तर) करणारी मंड्ळी अर्थातच आमच्या बरोबर येणार नव्हती. आधी ऊत्साहाने आम्ही येतो आम्ही येतो म्हण्णार्यांची संख्यासुध्दा थर्टी फस्ट् जवळ जवळ येत गेला तशी गळत गेली. शेवटी ३१ तारखेला पहाटे गिरीष साठेच्या मारुती ओमनीमधुन आमची सहा जणांची स्वारी निघाली.
कसारा, ईगतपुरी, घोटी फाटा असे थांबे घेत घेत आम्ही कळ्सुबाई, अलंग, मदन, कुलंग या डोंगररांगांशी जवळीक साधणार्या आंबेवाडी या गावात आलो.
आंबेवाडीच्या वाटेवर
![]()
आंबेवाडीतील एका घराजवळ गाडी पार्क केली. चहा प्यायला, पाणी भरुन घेतलं आणि सॅक पाठीला लावल्या. साधारण तास-सव्वा तासाच्या चालीनंतर आम्ही अलंग, मदन, कुलंग यांच्या बेचक्यात आलो.
![]()
खरी चढाईला सुरवात ईथुनच होणार होती. त्यातच आमच्या जोडीला सुशील ऊर्फ तात्या ऊर्फ वोल्वोचा ट्र्क (वजन ९८ कि.) याला मदनची उंची बघुन फेफरं यायला लागलं
. त्याला सांभाळ्त-गोंजारत वरती घेऊन जायच होत. अलंग आणि मदन मधील खिंड म्हणजे भारी काम. सगळा अंगावरचा चढ.
शेवटी मजलदरमजल करीत, तात्याला सांभाळ्त दीड तास चढुन खिंडीच्या वरच्या अंगाला आलो. ईथुन डावी कडची वाट अलंगला तर उजवी कडची वाट मदनला जाते. येथून भंडारदराचे बॅक वॉटर आणि आजोबा डोंगर फार छान दिसत होते.
लगेचच मदनकडे मोर्चा वळवला. १०-१५ मि. पुढे गेलो आणि मदनच्या पायर्यांनी आमच स्वागत केलं.
![]()
पायर्यांहून मागे पहातो तर अलंगची महाकाय भिंत छातीत धड्की भरवत होती.
![]()
येथुन पुढची ५-१० मिनीटाची वाट म्हणजे पाय ठेवायला जेमतेम पाऊलभर जागा, आधाराला डाव्या बाजुच्या कातळातील खोबण्या तर ऊजव्या बाजूला सरळ १,००० फुट खोल दरी अशा स्वरुपाची होती.
या वाटेवरुन पुढे आलो तर समोरच मदनचा प्रसिध्द ४० फुटी रॉक पॅच. रॉक पॅच पाशी आलो. बोल्ट मारलेले दिसत होतेच. आमच्यातला अनुभवी क्लाईंम्बर सुजीत याने रोप फिक्स केला आणि पटापट वरती गेला सुध्दा. तात्याला हे असले प्रकार नवीनच होते. तात्याला रोप फिक्स केला, खास त्याच्यासाठी झुमार सुध्दा आणलेला होता. तो त्याला दिला आणि जा म्ह्ट्ले. दोन पावल गेला, पण ९८ किलो वजनामुळे बॉडी पुलींग जमेना, असला अच्चाट प्रकार कधी केलेला नाही, मागे १,००० फुट फॉल, आणि कुठ्ल्याही क्षणी आपण पडू ही भिती यामुळे रॉक वरचं त्याचे पाय थरथरायला लागले. वेगवेगळ्या प्रकाराने समजावुन झाले पण हा पठ्ठ्या काही वरती सरकायला तयार होईना. त्याच्या या थरथरण्याला आम्ही "हेलनचा डान्स"
असे नाव देऊन टाकले.
शेवटी कसबस तात्याला खेचून वरती घेतलं. रॉक पॅचच्या वरती काही पायर्या आणि एक छोटी गुहा होती. या गुहेतून समोर अवाढ्व्य पसरलेला अलंग सुंदर दिसत होता.
या पुढ्ची वाट देखील थोडी घसार्याचीच होती. साधारण २०-२५ मिनीटे या वाटेने चढून गेल्यावर भर दुपारच्या चांदण्यात आम्ही मदनच्या गुहेत पोचलो.
गुहेतच थोडावेळ आराम केला. झट्पट मॅगी खाल्लं. चहा वगैरे झाला, आणि मदनगडाच्या अत्युच्च्य टोकावर जाण्यासाठी निघालो. १५-२० मि.त मदनच्या टॉपवर आलो.
नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येचा सुर्यास्त
![]()
रात्री मस्तपैकी साखरभाताचा बेत केला होता. जेवून गप्पा मारत बसलो. १२.०० वाजता एकमेकांना नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि झोपलो. सकाळी चहा-पोहे खाऊन १०.०० च्या सुमारास ऊतरायला सुरुवात केली. ऊतरताना तात्याने काही त्रास दिला नाही हे विशेष.
दुपारी १.३० च्या सुमारास ऊतरुन पुन्हा अलंग, मदनच्या बेचक्यात आलो. झट्पट मॅगी केलं आणि आंबेवाडीकडे निघालो.
कर्ण कर्कश्य संगीत नाही, आजुबाजूला दारूकाम नाही असा या वर्षी चा थर्टी फस्ट् जरा वेगळ्या पध्द्तीने साजरा केला.
गड्प्रेमी बज्जु
स्वारी गोरखगडावर
प्रेषक योगेश२४ ( शनी, 03/06/2010 - 16:19) ."अरे ह्या महिन्यात तरी गोरखगडला जायचे का?" कंटाळुन शेवटी मेल माझ्याकडुन सर्व मित्रांना गेला. त्याला कारण असे होते की बर्याच दिवसांपासुन गोरखगडचा ट्रेक करायचा विचार होता. पण मुहूर्त काही सापडत नव्हता. या ना त्या कारणांमुळे हा बेत पुढेच ढकलला जात होता. पण हा ट्रेक करायचाच हा बेत मनात पक्का होता. त्यातच गडावरचा सचित्र लेख वाचनात आला आणि बस्स्स ठरविले कि ह्याच महिन्यात गोरखगड सर करायचा. हो ना हो ना करता करता आम्ही १३ जण तयार झालो त्या गोरखगडाला भेटण्यासाठी. शनिवारी आम्हा सगळ्यांना सुट्टी असल्याने २० फेब्रुवारीला जाणे नक्की केले. गोरखगड तसा मुंबईपासुन जवळच असल्याने व आमच्यापैकी बरेचजण कल्याण्-डोंबीवलीला राहणारे असल्याने बाईकनेच जाण्याचे सर्वानुमते ठरले. आम्ही १३जण आणि सात "बायका" (गैरसमज करुन घेऊ नका, "बाईकचे अनेकवचन" लिहिले आहे
) गोरखगडाकडे कूच करण्याकरीता सज्ज झालो.
सकाळी सात वाजता कल्याणला बिर्ला कॉलेजजवळ सर्वांनी भेटण्याचे ठरले. आमची पिकनिक किंवा ट्रेक काहिहि असो त्यात एकजण तरी यायला उशीर करतोच. यावेळी मात्र आमची पाळी होती
. मी, अभिजीत, वेंकट आणि किशोर फक्त पाऊण तास उशीरा आलो. तेथे आधीच पोहचलेल्या आमच्या इतर मित्रांनी काहिच तक्रार केली नाहि. अर्थात त्याला कारणहि तसेच होते "बिर्ला कॉलेज"
आणि सकाळची कॉलेजची वेळ
. आम्ही अजुन एक तास उशिरा आलो असतो तरी कोणीच काहि बोलले नसते. भेटण्याची हिच जागा जर दुसरी असती तर ???? .................. असो.............
आम्ही आल्यानंतर साधारण पावणेआठ वाजता आम्ही मुरबाडच्या दिशेने निघालो. वाटेत गोविली फाट्यावरुन (टिटवाळा) आमचा अजुन एक मित्र प्रशांत आम्हाला सामील झाला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात बाईकवरून जाताना मस्त धम्माल येत होती. कुठेही घाई किंवा अतिउत्साह नव्हता.
देहरी गावात खाण्याची काहि सोय नसल्याने आम्ही मुरबाडला नाश्ता करण्यासाठी थांबलो. हॉटेलमध्येही सगळ्यांची धम्माल चालु होती. काय ऑर्डर करायची ते किती करायची इथपासुनच चर्चा चालु झाल्या. "अरे मी तर गोड शिरा मागवतो. त्यामुळे थोडी एनर्जी येईल गड चढायला. गोड खाल्याने एनर्जी येते (????)" इति अमेय. "अरे अमेयसाठी अर्धा किलो साखर घेऊन चला रे याचे दुपारचे जेवणपण होईल :)" मध्येच एकजण ओरडला. "अरे आटपा लवकर रे उशीर होतोय" इति मी.
नाश्ता वगैरे आटपुन, दुपारच्या खाण्याकरीता काहि सामान घेऊन आम्ही परत प्रवास सुरू केला. एव्हाना सकाळचे साडेनऊ वाजले होते.
देहरी हे गाव गडाच्या पायथ्याशी वसले आहे आणि तेथुनच गोरखगडाकडे जाणारी वाट असल्याने आम्ही देहरीगावाकडे निघालो. म्हसामार्गे देहरीला जाता येते हे माहित नसल्याने आम्ही धसई मार्गे निघालो यातच अजुन अर्धा तास वाया गेला. पण बाईकवरुन जात असल्याने त्याचे काहि वाटले नाहि. पण ह्याच लाँगकटमुळे पुढे आम्हाला एक शॉर्टकट मिळाला
आणि त्याचा आम्हाला फायदाहि झाला. धसई गाव सोडल्यानंतर आम्ही देहरीच्या वाटेवर निघालो. वाटेत "खोपीवली" गावात आम्ही जात आहोत ती वाट बरोबर आहे का हे विचारण्यासाठी थांबलो असता तेथील गावकर्यांनी आम्हाला देहरीवरून न जाता त्याच गावातुन जाणार्या वाटेबद्दल सांगितले. देहरीमार्गे गोरखगडला जाणार्या वाटेपेक्षा हि वाट लवकर जाते असेही त्यांनी आवर्जुन सांगितले. मग काय! आम्ही सगळ्यांनी आमच्या "बायका" (पुन्हा "बाईकचेच अनेकवचन हां
) गावाकडे वळवल्या. गावातील एका घरासमोरील अंगणात गाड्या पार्क करुन त्या घरातील आज्जीची परवानगी घेत हेल्मेट, काहि बॅग्स घरातच ठेऊन दिल्या. एका गावकर्याकडुन गडाकडे जाणार्या वाटेची माहिती घेऊन आम्ही निघालो. एव्हाना सकाळचे अकरा वाजले होते. शेतातली वाट संपुन आता गर्द जंगलातील वाट सुरु झाली होती. गोरखगडच्या आजुबाजुचा परिसर हा हा प्रसिद्ध आहे तो तेथील घनदाट अभयारण्यामुळे. त्यामुळे उन्हाचा तडाखा जास्त जाणवत नव्हता. ह्या संपूर्ण प्रवासात आमची साथ करत होता तो मच्छिंद्रगड, पण गोरखगड काहि दिसत नव्हता.


एव्हाना दुपारचे बारा वाजत आले होते. काहिजणांनी तर मस्करीत "मला जाऊ द्या ना घरी आता वाजले कि बारा...." म्हणायला सुरूवातहि केली. साधारण एक तास चालल्यानंतर मच्छिंद्रगडाच्या मागे असलेला गोरखगडाने अचानक दर्शन दिले आणि सर्वांना परत एकदा उत्साहित केले. मात्र तो स्मितहास्य करत नव्हता तर आमच्याकडे बघत खदखदा हसत होता. दुपारचे पाऊन वाजले होते आणि कडक ऊन डोक्यावर आले होते. भर दुपारी गड चढणार्या आमच्याकडे बघुन तो हसत होता. थोडे पुढे जाताच भवानी मातेचे मंदिर दिसले. तेथे थोडावेळ आम्ही विसावलो. मंदिर जुने असुन त्यावर पत्र्याची शेड लावण्यात आली होती. दर शनिवार-रविवारी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातुन आलेल्या काहि लोकांनी आपुलकीने आमची चौकशी केली आणि थंडगार व मधुर पाणी आम्हाला आणुन दिले. त्यातल्याच एकाने आम्हाला गोरखनाथ व त्या मंदिराची कथा ऐकवली.

खरंतर तेथुन जायचे मनच होत नव्हते पण अजुन बराच पल्ला गाठायचा होता. आता कुठे आम्ही गोरखगडाच्या पायथ्याशी आलो होतो. पायथ्यापाशी अजुन एक छोटेसे मंदिर होते. त्या मंदिराच्या मागच्या बाजुने येणारी वाट हि देहरी गावाकडुन येणारी होती. मंदिराच्या आवारातच शंकराच्या पिंडीसारखा आकार असलेले होकायंत्र दिसले.


आता मात्र येथुन खड्या चढणीला सुरुवात झाले. दुपारचे कडकडीत ऊन आणी त्यात हे रॉक पॅच!!!!!! जबरदस्त आव्हान वाटत होते आणि तेच सगळ्यांचा उत्साहहि वाढवत होते. भर दुपारची वेळ असल्याने दगड तापले होते व हातांना चटके बसत होते पण आमचा उत्साह मात्र कमी होत नव्हत. थोड्या वेळात आम्ही फोटोत दिसतो आहे त्या केशरी रंगाच्या चौकटीजवळ पोहचलो.

अगदि क्षणभर विश्रांती घेतली व परत चढाईला सुरुवात केली. दुसरा टप्पा हा पहिल्यापेक्षा थोडा कठिण होता. तीहि चढाई यशस्वी करुन आम्ही एकदाचे गोरखगडाच्या गुहेजवळ पोहचलो. वरती पोहचल्यावर समोर दिसणारा निसर्ग आणि त्यात कलशात ठेवलेल्या नारळासारखा दिसणार्या मच्छिंद्रगडाचे दर्शन होताच थकवा कुठच्या कुठे पळाला. कातळात खोदलेली गुहा प्रशस्त असुन २०-२५ जण तेथे आरामात राहु शकतील. गुहेच्याच प्रांगणात असलेले व खोल दरीत झुकलेले दोन चाफ्याचे झाड लक्ष वेधुन घेत होते.
आमचे काहि मित्र शेजारीच असलेल्या पाण्याच्या टाकीतुन पाणवनस्पती बाजुला काढुन पाणी काढण्याच्या प्रयत्नाला लागले. फ्रेश झाल्यावर परत गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी निघालो. गुहेच्या उजव्या बाजुने जाणारा रस्ता पाहिला आणि काहि जणांनी वरती येण्यास साफ नकार दिला
आणि ज्यांना वरती जाऊन यायचे आहे त्यांनी जाऊन या आम्ही गुहेतच थांबतो असे फर्मान काढले.

शेवटचा टप्पा हा थोडा अधिक कठिण असुन या मार्गावर जपुनच चालावे लागते. गडाचा माथा लहान असुन तेथे केशरी रंगात रंगवलेले शंकराचे मंदिर व समोर एक नंदी आहे.

माथ्यावरून मच्छिंद्रगड, सिद्धगड, जीवधन असा रमणीय परिसर न्याहाळता येतो. गुहेचा घेरा लहान असल्याने लवकरच संपूर्ण गड पाहुन झाला आणि गुहेजवळ थोडा वेळ विसावलो. फोटोसेशन झाल्यानंतर तेथेच ठेवलेल्या झाडुने परिसर स्वच्छ करुन कचरा बॅगेत भरुन परतीच्या वाटेकडे निघालो.
गड उतरताना आता खरी कसोटी लागत होती. बाजुला खोल दरी असल्याने कातळात एक एक पाऊल जपुन टाकावे लागत होते. प्रत्येकजन एकमेकांना सांभाळुन उतरा, जपुन उतरा म्हणुन बजावत होता (अर्थात येथे काळजीपेक्षा जर आपल्या आधीचा गडगडला तर आपणपण कोसळु हि भिती जास्त होती
).
थोड्याच वेळात आम्ही सर्वजण सुखरुप पायथ्यापाशी आलो. परतीच्या प्रवासात पुन्हा भवानी देवीच्या मंदिरात थोडावेळ विसावलो. तेथील मंडळींनी आम्हाला चहाबद्दल विचारले पण त्यांना त्रास नको म्हणुन इच्छा असुनहि सगळेजण नाहि म्हणाले
. संध्याकाळचे पाच वाजले होते आणि अंधार पडण्याच्या आत त्या जंगलातुन गावात परतायचे असल्याने आभार मानुन त्यांचा निरोप घेतला. एव्हाना ती पायवाट चांगलीच परिचयाची झाली असल्याने गावात पोहचण्यास थोडा कमी वेळ लागला. ज्या घरी आम्ही गाड्या ठेवल्या होत्या त्या घरच्या आजीने मोठ्या प्रेमाने आम्हाला कलिंगड आणि काकड्या खायला दिल्या. त्यावर यथेच्छ ताव मारुन आम्ही निघालो. जाताना काहि रक्कम दिली असता ती घेण्यास आजीने नकार दिला. "तुम्ही आमच्या गावचे पाहुणे असुन तुमच्याकडुन पैसे घेणे बरं नाहि". असे त्या म्हणाल्या. शहरातल्या लोकांप्रमाणे "काहि देण्याच्या बदल्यात काहितरी मिळविणे" हि वृत्ती अजुनतरी त्या गावात आली नव्हती हे त्या घरच्या लोकांना, भवानी देवीच्या मंदिरात भेटलेल्या व्यक्तीना पाहुन वाटले. किंबहुना त्यांची हि निस्वार्थी वृत्ती व "अस्सल गावपण" असेच टिकुन रहावे हिच त्या गोरक्षनाथाचरणी प्रार्थना. त्यांचा निरोप घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. जसजसा अंधार होत होता तसतसा गोरखगड व त्याच्या पायथ्याशी विसावलेले खोपीवली गाव नजरेआड होत होते पण हा संपूर्ण ट्रेक व गावातील माणसे हि कायमची मनात घर करून राहिली होती.

अपरिचीत किल्ले: अनघई आणि म्रुगगड
प्रेषक बज्जु ( शनी, 03/06/2010 - 01:03) .सफर अपरिचीत किल्ल्यांची: अनघई आणि म्रुगगड
आमची जोडी तशी ठरलेलीच. मी आणि सुजीत साठे. एकदा ट्रेकला जायचं ठरलं कि फारसं कोणाला न विचारता बाईक काढतो आणि सुटतो. या वेळी सफर करायची होती दोन अपरिचीत किल्ल्यांची ते म्हणजे अनघई आणि म्रुगगड. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासुन थोडे वेगळे झालेले आणि नेहमीच्या हौशी ट्रेकर्सपासुन जरा दुर्लक्षिलेले असे हे किल्ले.
शनिवारी पहाटे बाईक काढ्ली. पनवेल, खालापुर मार्गे जांभुळपाड्यापासुन ५ कि.मि. असलेल्या कळंब गावात आलो. कळंब गाव तसं लहानच. ४०-५० घर असावीत जेमतेम. गावातुन समोर पहातो तर २-३ गड वजा डोंगर दिसत होते यातला नक्की अनघई कुठ्ला ? गडाची वाट दाखवायला कोणी माणुस मिळेल का अशी चौकशी केली तेव्हा बबन नावाचा एक पासष्ट वर्षाचा तरुण तयार झाला. लगेच निघालो. साधारण १५-२० मि. एका जुन्या पुलाजवळ आलो. भरपुर पाऊस झाला कि या पुलावरुन पाणी वहात असते अशी माहिती मामानी दिली.
कळंब गाव
![]()
कळंब गावातुन
![]()
जुना पुल
![]()
या पुलावरुन पुढे साधारण अर्धा तास चढुन गेलो आणि एका पठारावर आलो. वाट मधेच झाडीत आणि गवतात हरवलेली. मामाच्या मदतीने १०-१५ मि. इकडे-तिकडे शोधाशोध केल्यावर वाट मिळाली.
![]()
समोर असलेल्या दोन खिंडींपैकी डाव्या बाजुच्या खिंडीतुन जाणारी वाट अनघईला जाते. अर्धा तासाच्या खड्या चढाईनंतर खिंड चढुन आलो. या वाटेने चांगलीच वाट लावली होती. 
![]()
![]()
![]()
एक सोपा कातळट्प्पा पार करुन साधारण दीड तासाच्या वाटचालीनंतर अनघईवर पोचलो. या किल्ल्याचा वापर मुख्यतः ऊंबरखिंडीच्या टेहळणीसाठी होत असावा त्यामुळे वरती विशेष काही बांधकाम नाही. गडाचा पसाराही लहानच आहे. अनघईदेवीचे मंदिर, २-४ पाण्याची टाकी बसं आट्पला कारभार. आम्ही वरती पोहोच्ल्यावर मामाने देवीची पुजा करुन नारळ फोड्ला. तोपर्यंत आम्ही सह्याद्रीची मुख्य रांग आणि गडावरुन दिसणार्या भोवतालच्या परिसराचे निरीक्षण करत होतो.
अनघईदेवीचे मंदिर आणि बबन मामा
![]()
पाण्याची टाकी, मागील बाजुस सह्याद्रीची मुख्य रांग
![]()
![]()
![]()
झाडाच्या पारंब्या पासुन नवीन झाड
![]()
तिथेच थोडंस खाऊन घेतलं आणि ऊतरायला सुरवात केली. तासभरात खाली आलो. मामाचा निरोप घेतला. बाईक काढ्ली आणि म्रुगगडावर जाण्यासाठी म्रुगगडाच्या पायथ्याशी असलेल्या भेलीव गावात आलो. भेलीव गावातुन म्रुगगड आणि त्या मागिल रांगेत मोराडीचा लक्षवेधी सुळका छान दिसतो. मोराडीचा सुळक्यालाच शिवलींग असेही म्हणतात.
भेलीव गावात जाणारा रस्ता
![]()
म्रुगगड
![]()
मोराडीचा सुळका किंवा शिवलींग
![]()
म्रुगगडाची वाट
![]()
चिरांट्या सारखे फळ
![]()
म्रुगगडाची गुहा
![]()
गुहेच्या बाजुलाच असणार्या पायर्या आपल्याला गडाच्या सर्वोच्य माथ्यावर घेऊन जातात. या किल्ल्याचा वापरही मुख्यतः टेहळणीसाठी होत असावा त्यामुळे वरती विशेष काही बांधकाम नाही. २-४ पाण्याची टाकी. पाणी वापरण्यायोग्य.
![]()
![]()
पुन्हा थोडसं खाऊन घेतलं. एक तासात पायथ्याच्या भेलीव गावात आलो.
भेलीव गावात परतताना
![]()
बाईकला किक मारली आणि रात्री ९.०० ला घरी आलो. दोन दिवसात येतो असं सांगुन गेलेला नवरा एकच दिवसात परत आल्यामुळे बायकोही खुष आणि एकाच दिवसात दोन गड झाल्यामुळे अस्मादिकही खुष.

राजगड... गुंजवणे दरवाज्याने
प्रेषक विमुक्त ( रवी, 02/28/2010 - 19:09) .गोनीदा म्हणतात तसं "राजाचा गड आणि गडांचा राजा म्हणजे राजगड"
राजगडावर जायला वाटा अनेक...
पालीहून पाली दरवाज्याने...
वाजेघरहून पद्मावती माचीवरच्या चोर दरवाज्याने...
गुंजवण्याहून पद्मावती माचीवरच्या चोर दरवाज्याने...
गुंजवण्याहून गुंजवणे (गुंजण) दरवाज्याने...
गुंजवण्याहून सुवेळा माचीवरच्या चोरदिंडीने...
भुतोंड्याहून अळू दरवाज्याने...
पैकी पाली दरवाजा, अळू दरवाजा आणि पद्मावती माचीवरचा चोर दरवाजा ह्या वाटा आता वापरात आहेत... सुवेळा माचीवरच्या चोरदिंडीने तर आता कुणीच चढत नाही आणि गुंजवणे दरवाज्याने सुध्दा फारसं कुणी जात नाही...
रंगाची उधळण करत नारायण रोजच्या कामाला लागला आणि आम्ही चौघे राजगडाच्या वाटेला लागलो...

सकाळच्या कोवळ्या उन्हात न्हावून, गुंजवणीच्या पाण्यात स्वताचं रुप निरखत राजगड बसला होता...

हवा खूपच स्वच्छ होती... मित्राशी गप्पा मारण्यासाठी आपली रोजची जागा सोडून तोरणा राजगडाच्या अगदी जवळ येऊन बसल्याचं जाणवत होतं... डोंगररांगा आणि त्यांचे पदर फारच सुंदर दिसत होते... झाडांच्या फांद्यामधे अडकलेल्या धुरामुळे धुक्याचा भास होत होता... आपले अनेक हात पसरवून राजगड आम्हाला त्याच्या कुशीत बोलवत होता...

गुंजवण्यात पोहचलो, थोडं खाल्लं आणि गावाच्या मागे राजगडाच्या दिशेने निघालो...
"गडावर जायचयं ना?... मग वाट चुकलात... ही वाट जंगलात जाते..." गावकरी
"आम्हाला गुंजवणे दरवाज्याने गडावर जायचयं" आम्ही
"गुंजण दरवाजा! आता कुणी जात नाही त्या वाटेनं... नुसतं जंगल आहे... तुम्ही गडावर पोचणार नाही..." गावकरी
"तो काय! गुंजवणे दरवाजा दिसतोय की... जातो जंगलातून त्याच्या दिशेनं..." आम्ही
घोटवलेली वाट नसणार ह्याची कल्पना होती... काट्या-कुट्यातून वाट काढत जावं लागणार हे पण माहिती होतंच... आणि गुंजवणे दरवाज्यानेच आज गडावर पाऊल ठेवायचं हे पण मनाशी ठाम केलं होतं... मग गावकऱ्याचा निरोप घेतला आणि जंगलात शिरलो... गुंजवणे दरवाज्या पासून गडाची एक सोंड खाली जंगलात उतरली आहे... त्या दिशेने चालायला लागलो... रानात शाल्मलीची झाडं बहरली होती... झाडावर पानं नव्हती मात्र झुंबरासारख्या दिसणाऱ्या शाल्मलीच्या लाल फुलांनी झाडं सजली होती आणि त्यातला मध खाण्यासाठी पक्ष्यांनी गर्दी केली होती... झाडं, फुलं आणि पक्षी बघण्यात इतके दंग झालो की पायाखालची वाट कधी संपली हे कळालच नाही... झाडांच्या फांदोऱ्यामधून डोकावून बालेकिल्ला आम्हाला साद घालत होता...

रान खूपच दाट होतं... गुरांची वाट सुध्दा नव्हती... कारवीचं जंगल तुडवत आम्ही पुढे सरकत होतो... अंगभर काटे टोचत होते आणि कारवीच्या फळांमुळे अंग चिकट झालं होतं... चालायचे थांबलो की अंगभर खाज सुटायची... थोड्यावेळात एका ओढ्यात पोहचलो आणि ओढ्यातूनच वर चढायला लागलो... बरंच वर गेल्यावर जाणवलं की गुंजवणे दरवाजा आणि त्याची सोंड उजवी कडे आहे आणि हा ओढा सुवेळा माचीवरच्या नेढ्याकडे जातोय... मग ओढा सोडला आणि उजव्या हाताला रानात घुसलो... वाट नव्हतीच... काट्या-कुट्यातून वाट काढत चढू लागलो... सोंडेवरुन पावसात पाणी अनेक वाटांनी ओढ्यात कोसळतं, त्यापैकी एका वाटेने आम्ही वर चढत होतो... चढ खूपच जास्त होता आणि उन्हामुळे माती वाळून घसरडी झाली होती... बऱ्याचदा थोडं वर गेलं की घसरुन आधी होतो त्या पेक्षा खाली पोहचायचो... वाळलेलं गवत आणि कारवीचा आधार घेत जरा बसता येईल अश्या जागी पोहचलो... एक-मेकांकडे पाहिल्यावर कळालं की आमचे अवतार बघण्यासारखे झाले होते... सगळं अंग चिकट झालं होतं... कपड्यांमधे काटे, कुसं अडकली होती, काही जागी शर्ट-पँट फाटले होते... पण इथून खालच्या जंगलाचा फारच सुरेख देखावा दिसत होता...
(ह्या वाटेने चढलो...)



उन्हं वाढली होती आणि चढ अजून जास्त तीव्र झाला होता... आता ‘वाटच नाहिये... काटे टोचतायतं... घसरायला होतयं...’ ह्याचं काही वाटेनासं झालं होतं... गवत हातात आलं तर ठिक नाहीतर दोन्ही हात मातीत रुतायचे आणि जरा वर सरकायचं असं करत चढलो आणि शेवटी सोडेंच्या माथ्यावर पोहचलो...
(अजित, स्वानंद आणि तेजस... सोंडेच्या उतारावर...)

इथून गुंजवणे दरवाजा आणि बालेकिल्ल्यावरचा महा-दरवाजा अगदी स्पष्ट दिसत होते...

आता सोडेंच्या माथ्यावरुन गुंजवणे दरवाज्याच्या दिशेने चढायला लागलो... हा चढ अगदी छातीवर येतो, पण चढायला तेवढीच मजा पण येते... कातळात खणलेल्या काही खोबण्यांच्या मदतीने एक कातळ टप्पा पार केला आणि शेवटी काही पायऱ्या चढून गुंजवणे दरवाज्यात पाय ठेवला... एका नंतर एक अश्या ३ दरवाज्यातून गेल्यावर गडावर पोहचलो...

खरंतर गुंजवण्याहून गुंजवणे दरवाज्या पर्यंत वाट आहे... मळलेली नाही पण वाट नक्कीच आहे, पण आम्ही मात्र वाट शोधायचा प्रयत्नच नाही केला... सरळ रानातून दरवाज्याकडे चढायला लागलो, म्हणून जंगलातून वाट काढत वर पोहचायला साधारण ४ तास लागले...
गुंजवणे दरवाज्याच्या इथून सुवेळा माचीचा विस्तार छान दिसतो...

राजगडाला तीन दिशेला तीन माच्या... पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी... ह्या तीन माच्यांच्या मध्यभागी बालेकिल्ला... पद्मावती माचीवर भरपूर जागा, म्हणून ह्या माचीवर मोठ्ठ तळं, देऊळ, सदर, दारु कोठार असं बरंच बांधकाम आहे... बालेकिल्ल्या पासून निमुळत्या होत गेलेल्या सोंडावर सुवेळा आणि संजीवनी माच्या आहेत...
गुंजवणे दरवाज्याच्या इथून सदर, दारुकोठार मागे टाकून पद्मावती तलावा जवळ आलो... हातपाय धुतले, थोडंफार खाल्लं आणि थोडावेळ देवळात आराम केला...
( पद्मावती तलाव)

ह्यापूर्वी गडावर आलो तेव्हा बालेकिल्ला आणि सुवेळा माची बघितली होती... मग भर दुपारी २ वाजता संजीवनी माचीकडे निघालो... तोरण्यावर जे धन सापडलं होतं त्याचा वापर करुन राज्यानं राजगड बांधून घेतला... दुर्गनिर्मितीच्या बाबतीत राजगड खरोखरच अजोड आहे... राज्यानं फार मनापासून हा गड उभारलायं... राजगडाचे तट, बुरुज आणि माच्या बघितल्यावर आपण केवळ हरखून जातो...
(संजीवनी माची कडे जाताना...)



(संजीवनी माची)

संजीवनी माचीला दोन ते तीन माणूस खोल चिलखत आहे... ह्या चिलखतीच्या, माचीवरल्या बुरुजांच्या, चोरवाटांच्या बांधकामाला तुलना नाही... माचीवर पाऊल ठेवल्यावर झपाटल्यागत होऊन जातं... हे पाहू की ते असं होतं...
आम्ही पार संजीवनी माचीच्या टोकाला जाऊन बसलो... इथून भाटघर धरणाचं पाणी दिसतं... धरणाच्या काठावर वसलेली लहान-लहान गावं दिसतात... दूरवर वरंध घाटात उभा असलेला कावळ्या किल्ला दिसतो... तोरण्याचा संपुर्ण विस्तार दिसतो आणि त्याला प्रचंडगड का म्हणतात हे पण कळतं...
(तोरणा)

परतताना माचीच्या चिलखती मधून आलो... पुन्हा पद्मावती तलावाच्या काठावर थोडावेळ बसलो आणि साधारण ५ वाजता पद्मावती माचीवरच्या चोर दरवाज्याने उतरायला लागलो... ही वाट फारच नीट आणि सोपी आहे... साधारण दिड तासात गुंजवण्यात उतरलो...
(राजगड... संधीप्रकाशात)

"सध्या राजगडावर बऱ्याचदा गर्दी असते... लोक मुक्कामी येतात आणि पद्मावती माचीवर खूप कचरा करतात... प्लास्टीकची ताटं, पेले, पीशव्या, दारुच्या बाटल्या ह्यांचा ढीगच झालायं... पीण्याच्या पाण्याच्या टाक्यात देखील बराच कचरा टाकलाय... प्रत्येकजण थोड्या जवाबदारीने वागला तर तीर्थक्षेत्रा प्रमाणे पवित्र असणारे गड-किल्ले तरी निदान स्वच्छ राहतील"
भट्कंती फोटो
प्रेषक विनोदबाण़खेले ( शुक्र, 02/26/2010 - 14:19) .
खुप कंटाळा आला म्हणुन जरा.............
इथे फिरुन यावेसे वाट्तेय्,परत एकदा
,
हे आहे अनट्च भिमाशंकर ,थोडा पाऊस पड्ला कि असे मस्त वातावरण होते,
आपल्या कडे होळी ला पाऊस पड्तोच या होळी ला चला तर मग ..........................




















