वावर

वीजेची गायब-जादू!

लहान असताना जादूच्या समस्त प्रयोगांनी मला जबरदस्त मोहिनी घातली होती. माणसाचे कबूतर होते, कबुतराची फुले होतात, फुलांचे रंगीबेरंगी रूमाल होतात.... आणि ह्या सगळ्या भरात मूळ कोणती वस्तू गायब झाली हेच तुम्ही विसरून जाता. जादूगार खूष, तुम्हीही खूष! पैसा वसूल!! पण गायब झालेली वस्तू मिळते का हो परत? अहो, ती जादू असते.... त्यात सर्व काही शक्य असते. जादूच्या ह्या नियमाला शिरोधार्थ मानणारी मी....
त्यामुळे एखादी वस्तू जादूने गायब झाली असे कोणी सांगितले तर त्यावर माझा लगेच विश्वास बसत असे.

आजही परिस्थिती फारशी वेगळी नाही. फक्त लहानपणीच्या कथांमधील जादूने गोष्टी गायब करणार्‍या जादूगाराची जागा आश्वासनं देणारे मंत्री, सरकार, प्रशासन यांनी घेतली आहे. लोक काहीही म्हणोत! मात्र मी त्यांच्यावर आणि त्यांनी गायब केलेल्या वस्तूंवर विश्वास ठेवायचं सोडलं नाही हां!

आमच्याकडे बाजारात बर्‍याच गोष्टी गायब होत असतात. पण आम्ही स्वतःला सवय लावली आहे. एखादी गोष्ट गायब झाली म्हणून स्वतःचे फारसे अडू द्यायचे नाही. त्या वस्तूशिवाय जगायला शिकायचे. मग पुन्हा ती वस्तू बाजारात नव्या किमतीने अवतीर्ण होते तेव्हा ठरवायचे की त्या वस्तूला पुन्हा घ्यावे की नाही? न जाणो, उद्या पुन्हा गायब झाली तर अडायला नको हो! असं आपलं आमचं साधं सोपं मानसशास्त्र!

गेली दोन-तीन वर्षे आमच्याकडे उन्हाळ्याची चाहूल लागली की वीज आणि पाणी हुतुतू, खो खो, लपंडाव सुरू करतात. आधी वीज गायब, मग पाणी गायब!! आह्हे ना ज्जादू?!! पाऊस पडो अगर न पडो, जलाशय - धरणे भरोत अगर न भरोत... गरजेपेक्षा पाण्याचा साठा कायम कमीच भरतो. पण तरीही आमचे सर्व मंत्री आश्वासने द्यायचं सोडत नाहीत बरं का!! कसले खेळकर आहेत ना आपले सर्व मंत्री?!! Tongue

वर्षभर भारनियमनमुक्तीच्या चर्चा, आश्वासने आम्ही श्रद्धेने ऐकतो. ह्याही वर्षी ऐकली. भक्तिभावाने इतरांनाही ऐकवली. पण सगळे थोडेच आमच्यासारखे सश्रद्ध! आमच्या भोळ्या भाबड्या चर्येकडे तुच्छ कटाक्ष टाकून, नाकपुड्या फेंदारून ते आमच्या भारनियमनमुक्तीच्या भावस्वप्नांना वास्तववादाची डूब देऊन भंग करण्यास आसुसलेले असतात. आमचे दादा, ताई निवडणुकांपूर्वी आणि नंतरही, आम्हाला ठासून सांगतात की ह्या वर्षापासून ते आमच्या भागाला भारनियमनमुक्त करणार म्हणजे करणार म्हणजे करणारच!!! आम्हीपण लग्गेच वर्तमानपत्रांत बातम्या छापून आणून कौतुकाचे पेढे सर्वांना भरवतो. हो, उगाच कुणाचं तोंड गोड करायचं राहिलं म्हणून त्यांनी नंतर कडूजहर मनाने आमच्या तोंडाचे पाणी (शब्दशः) पळवलं असं नको व्हायला! ह्या वर्षीचा उन्हाळा गारगार बरं का.... डोक्यावर फॅन गरगरणार, नळाला पाणी येणार, फ्रीज चालू राहणार, ए. सी. ची हवा झुळूझुळू वाहणार.... अहो, कसलं ते थंड हवेच्या ठिकाणांचं कौतुक करून राहिलात!! आमचं घर हेच आमचं थंड हवेचं ठिकाण होणार, बरं का!

उन्हाळ्याची सुरुवात तर चांगली होते. आश्वासनांच्या सुखस्वप्नांत आम्ही नेहमीप्रमाणेच गाफील असतो. वर्तमानपत्रांत कलिंगड, काकड्या, लिंबू सरबत, ऊसाच्या रसाची विक्री करणार्‍यांचे फोटो 'उन्हाळ्याची चाहूल' देत छापून यायला लागले की आम्हालाही उन्हाळ्याची चाहूल लागते. सालाबादप्रमाणे घरात ए. सी. घ्यावा की नाही ह्यावर चर्चा झडते. गेल्या दोन-तीन वर्षांप्रमाणे सर्व ए. सी. कांक्षी गृहसदस्यांच्या योजनांना अडसर बनण्याचे सोडून आम्हीही उत्साहाने ए. सी. घ्यायलाच पाहिजे इत्यादी इत्यादी चर्चेत समरसून भाग घेतो.

दुसर्‍याच दिवशी घरात सकाळपासूनच विजेने पोबारा केलेला असतो. पण आम्ही मनाची समजूत घालतो.... केबलमध्ये बिघाड असेल.... ट्रान्स्फॉर्मर उडाला असेल..... दुरुस्ती चालली असेल.... नाहीतर अशी पूर्वसूचना न देता ऐन परीक्षेच्या मोसमात वीजकपात मायबाप सरकार नक्कीच करणार नाही!

दुपारी घराजवळच्या भव्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दालनाकडे आमची पदकमले वळतात. बघतो तो काय, सारे दुकान अंधारात, दुकानातले नोकर हवा खात दुकानाच्या पायर्‍यांवर चकाट्या पिटत बसलेले आणि दुकानात मालक इमर्जन्सी दिव्याच्या प्रकाशात लुकलुकताना दिसतात.
"अहो, काय हो हे? " अस्मादिकांचा मूर्ख प्रश्न!
दुकानाचा एक आगाऊ नोकर दात विचकतो, "ह्यँ ह्यँ ह्यँ.... तुम्हाला माहीत न्हाय का ताई..... पावरकट हाय आजपासून.... आता रोज दुप्पारच्याला आसंच बसायचं.... " अस्मादिकांच्या फुग्यातली हवाच फुस्स गुल होते! अस्मादिक दाणकन भूतलावर आपटतात!
हाय रे माझ्या ए. सी. विरोधी दैवा! असा कसा तू अवसानघात केलास!! आता मी गारव्याच्या आशेने कोणाकडे पाहू? भर दुपारच्या उकाड्यात जर ए. सी. नाही चालला तर मग त्याला विकत घेऊन काय करणार कप्पाळ??!!

निराशेने घेरलेल्या मनाने मी दुसर्‍या दुकानी जाते. तिथेही तीच तर्‍हा!!! एवढ्या सुंदर, भव्य दालनात कितीतरी कंपन्यांचे ए. सी. मांडलेले असताना सर्व दुकान व दुकानमालक मात्र उकाडा व अंधाराच्या खाईत! काय हा विरोधाभास!! हा हन्त.... हा हन्त.... तेथून वीजमंडळाच्या कार्यालयात धडक मोर्चा..... तिथे तर कर्मचारी जांभया देत, हातातल्या वर्तमानपत्राने स्वतःला वारा घालत आणि आजूबाजूच्या माशा उडवत समस्त जगताकडे तुच्छ कटाक्ष टाकत बसून असतात. "वीज कधी येणार? भारनियमनाचे टाईमटेबल तरी द्या... " अशा सवालांना टेबलवर बसलेल्या माशीच्या सहजतेने उडविले जाते. मम पदरी/ ओढणीत घोर निराशा.....

वृत्तपत्राच्या कार्यालयात तरी आपल्या दु:खाला कोणीतरी वाचा फोडेल ह्या अंधुक आशेने आम्ही एका वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये डोकावतो. संपादकांसकट सर्व वार्ताहर, कर्मचारी...कोणालाच आमच्या दु:खाची कदर वाटत नाही.
"अहो ताई, तुमच्याकडे दुपारचे चार-पाच तास वीज जाते म्हणून तुम्ही डोकं धरून बसलात, मग ग्रामीण भागातील शेतकर्‍यानं काय करायचं? तिथे तर बारा - बारा तास वीज जाते.... सगळं शेतीचं काम खोळंबतं....किती नुकसान होतं माहीत आहे?" वर्तमानपत्राच्या ग्रामीण पुरवणीचे संपादक गरजतात. अस्मादिकांना उगीचच अपराधी वाटू लागतं. आम्ही वीजबिल नियमित भरतो, खाडे करत नाही, वीजचोरी करत नाही....याचा अर्थ असा होत नाही की आम्ही सरकारने दिलेल्या आश्वासनांना आपला हक्क समजावा....

घरचे लोक ह्याही वर्षी ए.सी. खरेदीचे बेत कॅन्सल करतात. शेवटी ए.सी. चालायला वीज तर हवी ना!

पण अजूनही मी आस सोडलेली नाही.... घरच्या, दारच्या अंधाराला व उकाड्याला कंटाळून जनरेटर बॅक-अप असलेल्या वातानुकूलित मॉल्स व मल्टिप्लेक्सची वाट धरलेली नाही! रोज वर्तमानपत्रांत 'आज तरी भारनियमनाची बातमी देणार का' असे पुटपुटत सर्व निवेदने, जाहिराती, श्रद्धांजल्या नीट कसून वाचणे सोडलेले नाही. न जाणो, कोठे ती बातमी छोट्या प्रिंटमध्ये छापली असली तर......!!!! मन्त्रीबोवांनी कोणत्या तरी भाषणात भारनियमनमुक्तीच्या नव्या आश्वासनांची हवा आमच्या जनतेच्या मनांत भरली असली तर?

तर अशा ह्या वीजलपंडावामुळे हैराण झालेल्या जीवांनो, असे गप्प बसू नका. खेळकर बना! आजच थंड हवेच्या स्थळांच्या सहलीचे बुकिंग करून (बे)जबाबदार अधिकार्‍यांना खो द्या. [मोर्चे, घेराव, धरणी, आंदोलने करून काहीही साध्य होत नाही... म्हणून! ] किंवा माझ्यासारखे लेखनाचे माध्यम स्वीकारून आपल्या घोर आशावादाला साजरे करा! Wink

-- अरुंधती

Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/

शब्दबंध २०१०

२००८ व २००९ या दोन्ही वर्षी 'शब्दबंध' या आंतरजालीय जालनिशीकारांच्या उपक्रमात सहभागी झालो होतो. आता या वर्षीच्या 'शब्दबंध'चे वारे वाहू लागले आहेत. त्या संबंधीची 'शब्दबंध'च्या अधिकृत जालनिशीवरील उद्घोषणा इच्छुकांच्या अधिक माहितीसाठी येथे डकवत आहे.
===========================================================================

२००८ मधे १० लोकांनी साकारलेल्या शब्दबंधने मागच्या वर्षी २९ लोकाना सामावून घेतलं! मराठी ब्लॉगर्सच्या या जागतीक ई-सभेचे आयोजन आपण याही वर्षी दिमाखात करणार आहोत. मित्रहो तारखांची नोंद करा - ५ आणि ६ जुन २०१०!
परत एकदा आपण सर्वजण या सभेत भेटायचंय. काही नवे तर काही जुने शब्दबंधी घेऊन यायचंय. जिथे आहात तिथून, थेट सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचायचंय. परत एकदा सर्व हौशी मराठी ब्लॉगर्सना त्यांचं लिखाण त्यांच्या थाटात व्यक्त करण्यासाठी हे खास व्यासपीठ सजवायचंय.

मागील वेळेसारखेच, मराठीमध्ये १०० % स्वतःचं लेखन असलेला किमान एक ब्लॉग असलेल्या कुठल्याही ब्लॉगकाराला यात सहभागी होता येईल. या सभेची व्याप्ती अधिकाधिक वाढवणे आणि अधिकाधिक मराठी ब्लॉगर्सना त्यांनी लिहिलेल्या, त्याना आवडणाऱ्या, आणि त्यांच्या लिखाणाचं वाचन करण्यासाठी ई-व्यासपीठ ऊपलब्ध करून देणे हा यावेळीही हेतू आहे. मराठीमधलं लिखाण हा एकच समान दुवा पकडून आपण सर्वजण एकत्र येणार आहोत. प्रवास वर्णनं, अनुभव, कथा, कविता, व्यक्तीचित्रं, लघुनिबंध, तंत्रज्ञान आणि अशाच कित्येक छटांनी सजलेल्या मराठी ब्लॉगविश्वाची छोटीशी झलक आपल्याला या सभेमधे साकार करायचीये. तेही अनौपचारीक पद्धतीने.
सर्वसाधारणतः या सभेचं स्वरूप असं असेल. स्काईप, किंवा तत्सम साधन वापरून, आपण वेगवेगळी सत्रं आयोजीत करू. सहभागी होणाऱ्या सर्व हौशी ब्लॉगर्सना या तंत्राची माहिती सभेच्या आधी करून देण्यात येईल. जपान-ऑस्ट्रेलियापासून ही सभा सुरू होईल. सत्रांची सूत्रं क्रमाक्रमाने पश्चिमेकडे हस्तांतरीत होऊन भारत-आफ़्रिका-युरोप-अमेरिका या क्रमाने अभिवाचनाचं सत्र सुरू राहील.

शब्दबंध-२०१० मधे सहभागी होणं सोपं आहे. सहभाग घेण्यासाठी किंवा केवळ आयोजनामधे मदत करण्यासाठीही, कृपया या फॉर्मवर नोंद करावी -https://spreadsheets.google.com/viewform?formkey=dHhIT3dWN21tYWpDVHo4UG9yMlZycWc6MA. तुमच्याबद्दलची माहिती आणि तुमच्या सहभागाचं स्वरूप आम्हाला या फॉर्मवरून कळेल. सर्व जुन्या आणि नव्या शब्दबंधीनी या फॉर्मवरून नोंद करावी ही विनंती. ईथे नाव नोंदवणाऱ्या सर्वाना आपोआप shabdabandha@googlegroups.com मधे प्रवेश दिला जाईल आणि तिथेच पुढच्या सर्व चर्चा होतील. (तुम्ही आधीपासून जरी shabdabandha@googlegroups.com चे सभासद असाल, तरीसुद्धा शब्दबंध-२०१० मध्ये सहभागासाठी, कृपया फॉर्ममधे नोंद करावी. तसदीबद्दल क्षमस्व.)

लवकरच भेटू. आपली वाट बघतोय.

- शब्दबंध स्वागतक आणि कार्यकारी मंडळ

(नमस्कार वाचकहो, आणि श्री. मनमोहन सिंग)

नमस्कार वाचकहो, आणि श्री. मनमोहन सिंग

मागील लेखनात वाचकांस आधीच अवगत केल्याप्रमाणे आपल्या महान देशातल्या रस्त्यांवर रहदारी सुरळीत चालवण्याच्या नावाखाली हुकूमशाही चालू आहे. मी गाडी चालवत असताना माझ्या पुढच्या गाडीला हिरवा सिग्नल होता व तिला तसेच पुढे जाऊ देण्यात आले. मात्र मी तिथपर्यंत पोचताच दुष्ट सिग्नल लाल झाला. मी या माझ्याविरुद्धच्या कूटनीतीला न जुमानता तसाच पुढे गेलो तर पोलिसांनी मला पकडले व दंड केला. या अत्याचाराबद्दल मी रस्तोरस्ती बोंब ठोकल्याबद्दल काही नागरिकांनीही त्यांचे कान किटल्याची तक्रार केली. मी पोलिसांकडे या अन्यायाविरुद्ध तक्रार केली तर मला तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आली आहे.

माझ्या मागील अर्जावर हि प्रतिक्रिया दिली ---

पण मला वाटत कि काही माणस विशेषत: आपले पोलिस अधिकाराचा गैर फायदा घेऊ पाहत आहेत.

"वाहतुकीचे नियम पाळणे हा इथला कायदा आहे"

असे बजावण्यात आले.

अगदी खरे! नेहमी असेच बजावण्यात येईल..

हि यांची भाषा !!

हीच भाषा यापुढेही राहील!

मला क्षमा असावी पण पोलिसांनी माझी माफी मागितल्या खेरीज

शहराचे पोलिस/नगरसेवक/मंत्री कुणाचीही माफी मागणे लागत नाहीत व कुणालाही कुठलेही स्पष्टीकरण देणे लागत नाहीत/ देणार नाहीत!

मी या पुढे सायकल चालवण्याशिवाय कुठचेही वाहन या शहरात चालवणार नाही.

इथे काय चालवायचे आणि काय नाही, ही पूर्णत: आपली मर्जी आहे!

व माझ्यावरचा अन्याय मोठ्ठ्याने कर्ण्यावर ओरडून जनतेला सांगेन.

पोलिस/नगरसेवक/मंत्री यांच्या विषयी आपले काहीही म्हणणे असल्यास ते कृपया योग्य मार्गाने मांडावे. जमल्यास उत्तर दिले जाईल..!

जर अजून दंगामस्ती करून लोकांना आवाज करून उपद्रव केलात तर, आवश्यक वाटल्यास तुमचे लायसन्स जप्त होईल अगर तुम्हाला तुरुंगात टाकले जाईल याची नोंद घ्यावी..
फौजदार

»

असो
अशा कुटनीती व अरेरावीच्या अशा असभ्य भाषेला मी यत्किंचित ही भीक घालीत नाही आणि घालणार ही नाही.
हा देश म्हणजे माझी आई आहे, आणि तो देश, त्यातील शहरं व रस्ते यावर जसा त्यांचा तसाच माझा हि हक्क आहे.
तुम्ही माझे लायसन्स जप्त केले तर मी काय गाडी चालवणे सोडून देईन का?................................................ मी दुस-या शहरात जाऊन बेदरकारपणे गाड्या हाकेन.
हे यांचे माझ्या बरोबरचे वर्तन मी लोकांच्या समोर आणणे हेच मी या वेळी करीत आहे. या साठी माझे लायसन रद्द करीत असतील तर करावे, खुशाल करावे.
तरीही माननीय श्री मनमोहन सिंग साहेब यांनी मला पुन्हा मायेने मार्गदर्शन करावे अशी विनंती मी त्यांचा वयाला मान देऊन करीत आहे. मी माझ्या मोठ्यान बरोबर सल्लामसलत करण्यास व यांची मर्जी संपाद्ण्यास सदैव तयार आहे. मी वाट पहात आहे ती तुमच्या सकारात्मक प्रतिक्रियेची
........
तुम्ही उद्धट ठरवलेला
ड्रंकेश गाडीचालनकर

बीटी पोर!

आमच्याकडे सध्या नवा वाद रंगलाय.

आमच्या ओळखीचे एक शेतकरी दादा परवा तावातावाने घरात शिरले.
त्यांच्या व माझ्या भावामधला हा संवाद!

"तुम्ही ते बीटी वांग्याचं, बीटी भाज्यांचं आमच्या बायकूकडं येवढं कवतिक का हो करून राहिला भाऊ? "

"का? काय झालं? मी तर वर्तमानपत्रातल्या बातम्या मोठ्यानं वाचत होतो!"

"अहो, तुमचं वाचन आमच्या बायकूनं आयकलं आन आमच्या 'हिच्या' डोक्यात तवापास्नं किडा वळवळाया लागलाय बघा... म्हनत्ये की भाजीत जर त्या ब्यॅक्टेरियाचा जीन टाकता येतो तर मग मानसात का नाही?"

"म्हणजे? मी नाही समजलो... "

"अहो, आता बघा, त्यो जीन घालून पिकवल्येलं वांगं म्हने कीड, रोगाला जवळ फटकू द्येत न्हाय... त्येला दवा-औषध काय लागत न्हाय असं आमचे दादा म्हनून राह्यले...म्हंजे त्ये आसं त्यांच्या भाषनात म्हनाले आसं तुमीच सांगितलं! "

"बरं... मग? "

"तर आता आमची 'ही' म्हनतिया की फुडचं प्वार बीटी प्वारच पायजेल! "

"आँ? "

"आरं भाऊ, तिचं म्हननं जर बीटी वांग्याला कीड, रोग लागत नसंल, दवापानी कराया लागत नसंल तर तसंच मानसाच्या पोराला का नको? मानसात पन घालायचा असलाच कंचा तरी जीन आन मग होऊन जाऊ द्ये पटापटा हवी त्येवढी पोरं! "

"अरे बाबा, पण त्याला कायद्यानं मान्यता हवी ना! आणि तेवढं तंत्रज्ञानही विकसित व्हायला हवं! "

" पर कायदा का म्हनून नाकारेल अशी बात? जर त्यानं समद्यांचा फायदा होत आसंल, भलं होत आसंल तर मग कायदा त्या बाजूनंच हवा की हो राव! आन तुमी ते तंत्रज्ञानाचं काय पन सांगू नकासा! फारीनला ते गोरे लोक जर डुप्लिक्येट मानूस बनवून राह्यले तर ह्ये तर येकदम सोप्पं काम हाय! मस्त चार-पाच पोरं झाली की कारभारनी माझं टकुरं खानं बंद करंल!"

"अरे, पण एवढ्या पोरांना तू खायला काय घालणार? त्यांचा कसा सांभाळ करणार? "

"आवं आसं काय बोल्तासा, हायेत की मंग आपली बीटी वांगी, बीटी धान्य आमच्या बीटी पोरास्नी पोसाया....जास्त पोरं म्हंजे शेतात कामास्नी येत्याल, आन आजारी पन पडणार न्हाय.... "

आता आमच्या ह्या शेतकरी भाऊना काय बरे उत्तर द्यावे?

त्यांना आता बीटी पोर हवे आहे. भारत सरकार त्यांना मदत करेल काय?

अरुंधती

Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/

मिसळपाव बंद होणार----

Crying मिसळपाव बंद होणार----

मग काय करणार ?
स्वयंपाक वेळीच होणार,
मुलांचा अभ्यास होणार
वेळेवर सारे झोपणार,
अन् वेळेवर उठणार,
रिकामे रिकामे वाटणार,
वेळच वेळ उरणार,
आता बाजारात जाणार,
भाजीपाला आणणार,
पिसीची सात सुटणार,
अभ्यास चांगला होणार,
सुयश पुन्हा मिळणार,
आई नाही बोलणार,
कुणी नाही टोकणार,

हे सारे खरे पण ----

नवे मित्र नाही मिळणार,
कविता कुठे टाकणार ?
व्यासपीटाला मुकणार,
दिवस मोठा वाटणार,
रात्र खायला उठणार,
मन रिते रिते होणार,
आनंदाला मुकणार,
कुठे कुठेसे जाणार !
गादया किती तुडविणार !
मग ठाण्याला गर्दी होणार,
तिथे ही रांग लागणार,
मग डाकटर संप करणार,
मोर्चे ते काढणार,
गुगल गुडघे टेकणार,

नि मिसळपाव सुरू होणार .

(आधार ======ओर्कुट )

माझे संत्रापुराण

परवा घरी आलेल्या पाहुण्यांनी चांगली केशरी जर्द, रसरशीत दिसणारी स्टीकर लावलेली संत्री 'खाऊ' म्हणून आग्रहाने हातात कोंबली. ऐन उन्हाळ्यात, पारा ३६ डिग्रीज सेल्सियस च्या आसपास असताना अशी 'खाऊभेट' म्हणजे मनपसंतच! अस्मादिक एकदम खूषच! संत्र्यांचा रंग, रूप पाहूनच खूप छान वाटत होते.

काल दुपारी उन्हाने जीव हैराण झाला असताना अचानक त्या संत्र्यांची आठवण झाली. मोठ्या अधीरतेने त्यातली दोन संत्री सोलायला घेतली. पण काय हो! हे प्रकरण जरा अजब दिसत होते! ना त्या संत्र्याला तो चिरपरिचित सुवास, ना साल काढताना अंगावर - डोळ्यांत हमखास उडणारा व चुरचुरणारा रस....आणि एरवी पटकन सोलून होणारे संत्रे सालीला अंगाभोवती घट्टमुट्ट लपेटून बसलेले. एका झटक्यात साहेबजादे सोलले जाण्याचे नावच घेत नव्हते!

कशीबशी दात ओठ खाऊन ती संत्री सोलण्यात मी यशस्वी झाले मात्र, पण खरी कसोटी तर आता पुढेच होती. एरवी संत्रे सोलले की त्याच्या पाकळ्या आपोआप विलग होत. इथेही त्यांनी असहकार धोरण स्वीकारलेले. पुन्हा एकदा शक्ती देवतेला पाचारण करून मी त्या पाकळ्यांची फारकत केली.
एका बशीत त्या ओढाताणीत रुसलेल्या संत्र्याच्या पाकळ्या रचल्या....एक पाकळी अलगद तोंडात टाकली....आणि माझा चेहरा खरेच प्रेक्षणीय झाला.....
कोणीतरी माझी घोर म्हणजे घोर चेष्टा केली होती. मी जे संत्रे म्हणून खात होते ते संत्रे नव्हतेच मुळी! त्याला ना धड संत्र्याची चव होती, ना मोसंब्याची! ना ते माधुर्य, तजेला, आंबटगोड स्वाद, ना तोंडात रेंगाळणारा ताजेपणा.... हे कसले तरी संत्र्याच्या नावाखाली खपवलेले बेचव फळ होते.
म्हणायला बिया कमी म्हणजे अगदीच क्षुल्लक होत्या आणि आंबटपणा नावालाही नव्हता. प्रत्येक फळाची खास अशी चव ठरलेली असते. संत्रे म्हटले की ते आंबटगोड हे ठरलेले! पण अहो, त्याचा आंबटपणा अपेक्षितच असतो हो! ही तर संत्रे नावाखाली केलेली शुद्ध बेचव फसवणूक होती.

आज सकाळी बाजारात मला नेहमीचा फळ विक्रेता दिसल्यावर मी मुद्दाम मोर्चा तिकडेच वळवला.
"ही स्टिकर्स वाली संत्री म्हणजे काय भानगड आहे रे भाऊ?" माझा सवाल.
समोर हारीने रंग, रूपाने गोमटी दिसणारी स्टिकर्सवाली संत्री मांडून ठेवली होती.
"घ्या ना, ताई, एकदम मस्त, नवा माल आहे. जरा महाग आहे, पण चवीची ग्यारंटी! एकपण संत्रं आंबट निघालं तर पैसे परत!"
अर्थात कालच्या अनुभवाने शहाणी झालेली मी त्याच्या भुरळथापांना बळी पडणारी नव्हते.
"काय रे, खूप खपत असेल नै हा माल?" माझा निरागस प्रश्न.
"कसचं काय ताई, तुमच्यासारखी लोकं घेऊन जात्याती ह्ये असलं फळ. बाकी लोक आपला देशी, गावरान मालच पसंत करतात. परवडत न्हाय ना त्यास्नी! "
" आमच्यासारखी??"
"म्हन्जे गाड्यांमधून फिरनारी हो ताई! तेच लोक अशी स्टिकरवाली फळं नेतात. गरीबांना परवडत न्हाय असला माल. त्यांना देशी फळपण बघा, गोड लागतंय!"
"बरं बरं, मला त्या देशी संत्र्यातली अर्धा डझन चांगली संत्री दे निवडून लवकर! बघ, आंबट निघता कामा नयेत," माझी दमदाटी.
एव्हाना फळ विक्रेता माझ्याकडे "ह्या बाईला काय येड बिड लागलंय की काय" अशा मुद्रेने पाहत असलेला. एवढा वेळ त्याने स्टिकरयुक्त फळांची केलेली भलावण फुकट जाताना बघून त्यालाही कष्ट होणारच की हो! पण 'ग्राहक देवो भव' उक्तीला जागून त्याने मुंडी हालवत, फारसे सवाल न करता मी निवडून दिलेली संत्री एका कागदी पिशवीत कोंबली आणि पैसे खिशात घालून तो इतर ग्राहकांकडे लक्ष देऊ लागला.

मीही हातातल्या पिशव्या सांभाळत, समाधानी मनाने घराचा मार्ग धरला.
कधी नव्हे ते मला आपल्या देशी फळाची महती पटली होती. संत्र्याच्या आंबटपणाला नावं ठेवणारी मी आता त्याच आंबटपणावर विलक्षण खूष होते. कारण त्या संत्र्यात कृत्रिमतेचा लवलेश नव्हता. होती ती फक्त आपल्या मातीची खुमारी आणि तोच तो, नाकाला मिरमिरणारा, मनाला उल्हसित करणारा चिरपरिचित सुगंध!

अरुंधती

--
Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/

अहो जरा पेन देता का...

काय करावे .
पेन मागायला काहिना काहिच वाट्त नाहि.
शिक्षिताला पेनाचे मह्त्त्त्व आहे.एक तर माझे पेन ह्ररवतो. त्या चा मला इतक काहि वाट्त नाहि. जितक कोनाला पेन
दिल्यानन्तर परत नाहि मिळाल्ञावर् होतो.मि कितेक वेळा असे पाहिले आहे, महागडे सुट्बुट , टाय घातलेले
माणसे मऴके कपडे असणार्याना पेन मागतात , गरज नसति तर बोलणे देखिल त्याना आवडत नाहि.तो पेन मागताना
' साहेब जरा पेन देता का ' असे म्हणतो . पेन देणार्‍याला आश्चर्य वाट्ते साहेब सारखा दिसणारा मला साहेब म्हणतो.
तो लगेच पेन देतो
(आणी पेन गमावुन बसतो.)
आपन बैंक, बीमा किवा ऑफ़िस गेल्यावर असे कधी तरी होते कि कोणी आपल्याला पेन मागितला नाहि.
कितेकदा असे होते कि माझ्या कडुन पेन घेवुन काम झाल्या नतर तो पेन घेउन जात असतो आंणी आपण कामात
असल्याने आपण पेन गमावतो.

भैया आला, भैया आला आणि येताना लोनढे घेऊन आला ....

भैया आला, भैया आला आणि येताना लोनढे घेऊन आला ....

भैया आला, भैया आला आणि येताना लोनढे घेऊन आला ....अशी जी मगां पासून आर्त चालवली आहे. पण उत्तर मुंबई मधील निग्रो आणि अवैध बांगलादेशी मध्य मुंबईतील नेपाळी,गड्वाली त्यांचाबद्दल नेते काय मिसळपाव वाले देखील सगळे मुग गिळून गप्प बसले आहेत कि काय असे वाटते...........

मंगेश पावसकर

दिल्लीकरांचे प्रायवेट न्यूज चंनेल्स................ (भाग - २)

नमस्कार मित्रानो,

सर्वप्रथम आपणास सांगू इच्छितो कि कृपया या लेखा कडे अर्थपूर्ण (प्रक्टीकल) कटाक्ष टाकावा
व नंतर आपला अभिप्राय कळवावा.

दिल्लीकरांचे हिंदी न्यूज चंनेल्स स्वत;ची मनमानी करत हवी ती टिप्पणी करतात.
मला माहित आहे कि वाचकांना उदाहरण अपेक्षित आहे. खालील निदर्शनास आणलेल्या बातम्याकडे ह्यांचे साफ त्यांना सोयीस्कर दुर्लक्ष असते.

१. उदा. रेल्वे अर्थसंकल्प, फक्त बिहार ते मुंबई व पुणे , यु.पी. ते मुंबई व पुणे , गोवाहाटी ते मुंबई व पुणे(कर्म भूमी एक्स्प्रेस परवाच लौंच झाली ), हे दिल्लीकर न्यूज चांनेल ह्या सर्व बातम्या फारच चवीने दाखवीत होते. पण मुंबई ची उपेक्षा उदा. लोकल ट्रेन्स, सेन्ट्रल, वेस्टर्न. ह्या टी आर पी ची आशा नसलेल्या बातम्या दाखवणे ह्यांच्या जीवावर येते.

२. मुंबईकर जो सर्वाधिक कर वा रेवेन्यु मिळवून देतो. त्या साठी कधीहि कुठली बातमी जी त्याला सुखावेल हे दाखवण्याची तसदी घेत नाहीत.

३. इकडे लौन्ढे भरवून पाण्याची, विजेची, वानवा किंवा लोकल मधील गर्दी वाढवण्याचे प्रकाराबद्दल कोणी आपले मुस्काट उघडत नाही.

४. मुंबई आहे मुळी सगळ्यांची पण एवढ्याशा मुंबई मध्ये संपूर्ण भारत वर्ष घुसावाल का? असा खडा सवाल हि जनविरोधात जाण्याचा भीतीने कुणी करत नाही.

५. मुंबई बद्दल कोणत्या नेत्यांनी तोंड उघडले तर त्यांची मुस्कटदाबी होते. ह्यांचा एकाच परवलीचा शब्द " फिर ### ने उगला जहर "

६. मुंबई वर झालेल्या ताज वरील हल्ल्यामध्ये मुंबई पोलीस हि शहीद झाले होते पण ह्यांचे आपले एकच " बिहारी दिल्लीकरांनी मुंबई वाचवली "

७. वेंगसरकर क्रिकेट चयन समिती चे अध्यक्ष असताना त्यांचावर मराठी लौबीचा आरोप ह्याच करंट्यांनी ठेवला.

८. बांद्रा -वरळी सी लिंक ला वीर सावरकर उड्डाणपूल नाव देण्या ऐवजी राजीव गांधी मार्ग देण्याचा पक्षपातीपणा ह्या लोकांनीच केला

९. मुंबईकरांच्या, महाराष्ट्रीयांचा हक्कांबद्दल त्यांच्या असुविधेबद्दल शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल कधी वाचा फोडण्याचा प्रयत्न केला नाही.

१०. कधी मराठी चित्रपट प्रोमोट करण्याचे कष्ट हि मंडळी घेत नसतात. पण हिंदी वा भोजपुरी चित्रपटांची धुमधडाक्यात जाहिरातबाजी चालू असते

११. दिल्लीच्या सी एम शीला दीक्षित ह्यांनी स्वत; बिहारी व यु .पी मंडळी च्या वाढत्या लौढयान बद्दल आक्षेप घेतला होता. पण ह्या तेज न्यूज चानेल्स ने त्यांचे काय केले हे आपणास सांगण्याची आवश्यकता नाहीच

१२. आसाम , सिक्कीम व तामिळनाडू व केरळ मध्ये झालेल्या बिहारी व उत्तर प्रदेशीय नागरिकांवर झालेल्या हल्ल्याबद्दल कोणी हि बोलण्यास तयार नाही

१३. सर्वात महत्वाची गोष्ट आजच्या बातमी नुसार भारत -पाक सचिव स्तरीय भेटी मध्ये पाकिस्तानने भारताच्या सर्व मागण्या अमान्य केल्या व भारतास आपल्या विफलतेचे खापर पाकिस्तानवर फोडू नये असे बजावले.
ह्या इंडो-पाक अमन कि आशा ह्या प्रोग्राम ला देखील ह्याच लोकांनी मांडीवर बसवले.

माझ्या मते पत्रकारितेस फक्त बातम्या देण्याचा हक्क वजा जवाबदारी आहे. आमचे (नागरिकांचे ) हे समजण्याचे काम आम्हा वरच सोडावे. चांगले काय वाईट काय ते आम्हास कळते.
आपले टोमणे, आपला मसाला टाकून आपली मनमानी करणाऱ्या हे आईतखाऊ आपल्याच टी आर पी च्या भिके वर जगतात. कपटनीती करून स्वतः टी आर पी. हास्य कार्यक्रम, आय पी एल, इकड तिकड च्या निरर्थक गप्पा मारून मार्केट मध्ये टिकून राहणे. हा धन्धाच या हलकट माणसांनी मांडला आहे .
कधी तरी सह्याद्री दूरदर्शन च्या बातम्या पाहून बघा किंवा बी बी सी न्यूज पहा त्यात कधीच असला आतेताईपणा दाखवला जात नाही.

त्यांचे काम फक्त एकच आपला एकही शब्द जास्त न टाकता सत्य परिस्थिती लोकांसमोर आणणे, "सबसे तेज" बनण्याचा जीवघेण्या शर्यतीत आपली नैतिक मुल्ये गमावलेल्या अशा झपाटलेल्या पिसाटांना आत्मपरीक्षण करण्याची नितांत आवश्यकता आहे.

मंगेश पावसकर

mgccmangeshpaw@gmail.com

ए देवबप्पा....

ए देवबप्पा
ऐकू येते का रे काही तुला
त्या आरतीच्या गोंगाटात
टाळ्या अन झांजेच्या खणखणाटात
लोक काय काय मागत असतात
अन गार्‍हाणी सांगत असतात
कुणाला काय हवे असते
रुपं देही धनं देही
पुत्रं देही सर्व कामांशा देही मे
गात असतात किती ते तुझे गोडवे
अन म्हणतात की जो गाईल ही आरती
मिळेल त्याला सर्व हवे ते
पण खरे सांग एकदा
खरेच ऐकु येते का रे तुला?

सांग ना.....
ए देवबप्पा
दिसते कारे काही तुला
गाभार्‍याच्या बाहेरचे
त्या चिमुकल्या दाराच्या फटीतून
किंवा त्या जाळीच्या दरवाजाच्या पलीकडचे
त्या रोषणाईच्या झगमगटात?
किती डोळे लागलेले असतात
आशेचे डोहाळे घेऊन आलेले असतात
ताटकळत उभे असतात दर्शनासाठी
तुझ्यावर केलेल्या रोषणाईने
खरेच दिसते का रे काही तुला?

सांग ना...
ए देवबप्पा
वास तरी येतो का कसला
उदबत्ती धुरात आणि अत्तराच्या घमघमाटात?
मला खात्री आहे नैवेद्याच्या सुद्धा
तुला कधी वासच येत नसेल
इतक्या आशेने लोक येतात
पेढे बर्फी लाडू अन अन काय काय ती पंचपक्वान्ने घेऊन
कंटाळलाही असशील रोज रोज तेच तेच खाऊन

दाराबाहेरची ही....गर्दी पाहून
तुलाच भीती वाट असेल बाहेर येण्याची
चेंगरून जाऊ भक्तांच्या दाटीत;
किंवा गाभार्‍या पाशी नेणार्‍या लांबलचक रांगेची.
दक्षीणा दिली नाही तर पुजारी आत येऊच देणार नाही अशीही
किंवा मग बाहेर आलो तर पहावे लागेल
ते ते सारे जे आतून दिसत नाही
ते ते सारे जे आतून ऐकू येत नाही
आणि ते जे आतून कधीच जाणवत नाही
धक्केच बसतील ...
देवळापुढचे कचर्‍याचे ढीग पाहून
नारळाची कवचले , खरकट्या पत्रावळ्या , भिकार्‍यांचे थवे
डिस्को भक्तीगीतांचा गोंगाट.....
अजून थोडा पुढे आलास तर....
................ नको तू पळूनच जाशील इथून
त्या पेक्षा आहेस तिथेच बरा आहेस
निदान तुझ्या नावामुळे
गावातली बाजारपेठ फुलून जाते दर गुरवारी
एवढे तरी समाधान असू दे त्या गावकर्‍यांसाठी
.................विजुभाऊ