संगीत

आमचे मधुभाई...!

काही वर्षांपूर्वी डोंबिवलीच्या सर्वेश सभागृहात मधुभाईंची एक अत्यंत रंगलेली मैफल. तबल्याच्या साथीला तालयोगी पं सुरेश तळवलकर. श्रोतृवर्गात पद्मा तळवलकर, शुभदा पराडकर, पं अरूण कशाळकर, पं उल्हास कशाळकर आणि यांसारखे अनेक उत्तम कलाकार. यमन रागाने मैफलीला सुरवात व पुढे संपूर्ण मैफलच चढत्या भाजणीने रंगत गेलेली! यमन, सावनी, बसंतबहार असे एकापेक्षा एक सुरेख राग मघुभाईंनी लीलया पेश केले व श्रोत्यांना स्वरलयीच्या आनंदात अक्षरश: न्हाऊ घातले. मी त्या मैफलीचा साक्षिदार होतो. मधुभाईंच्या काही मोजक्याच मैफली ऐकण्याचं परमभाग्य मला लाभलं आहे!

"बाजुबंद खुली खुली जाए.."

मधुभाईं अगदी रंगात येऊन भैरवीच्या सुरांची लयलूट करत होते. 'बाजुबंद...' मधल्या एकसे एक खानदानी, थेट 'दिलसे' आलेल्या जीवघेण्या जागा! जागा कसल्या, बाजुबंद, पाटल्या-तोडेच त्या! श्रोते मंडळी अक्षरश: चुकचुकत होती, हळहळत होती, रडत होती आणि त्या शापित यक्षाला दाद देत होती!

मधुकर गजानन जोशी, ऊर्फ पं मधुकर जोशी, ऊर्फ आमचे मधुभाई! गाण्यातला एक शापित यक्ष!
मुक्काम पोस्ट - डोंबिवली.

विलक्षण सांगितिक प्रतिभा लाभलेला एक गुणी कलाकार. पण लौकिक अर्थाने फारसा पुढे न आलेला, फारसा कुणाला माहीत नसलेला!

मधुभाईंना घरातनंच संगीताचं बाळकडू मिळालेलं. आजोबा पं अंतुबुवा जोशी. थोरल्या पलुसकरांच्या शिष्यपरंपरेतले ग्वाल्हेर गायकीचे एक दिग्गज गवई! वडील पं गजाननबुवा जोशी. ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर गायकी पचवलेले एक अत्यंत प्रतिभावन गवई आणि तेवढेच थोर गुरू! पं उल्हास कळाळकर, पं अरूण कशाळकर, विकास कशाळकर, पद्मा तळवलकर, शुभदा पराडकर यांसारख्या गायकांना ज्यांनी घडवलं असे गजाननबुवा! घरातच गाणं असल्यामुळे साहजिकच संगीताचे सूर मधुभाईंच्या कानावर जन्मापासूनच पडलेले.

कुशाग्र बुद्धीचा मधु भराभर गाणं उचलू लागला, टिपू लागला. भूप, यमन, मुलतानी, हमीर, छायानट, शंकरा, बिहाग, बसंत, सोहोनी आदी राग मधुभाईंच्या गळ्यावर चढू लागले आणि खास ग्वाल्हेर परंपरेचं अष्टांगप्रधान गाणं मधुभाई गाऊ लागले. गजाननबुवांना ग्वाल्हेरसोबतच आग्रा आणि जयपूरचीही अतिशय उत्तम तालीम मिळालेली, त्यामुळे मधुभाईंनाही साहजिकच या गायकींचं बाळकडू घरातच मिळालं! रायसा कानडा, ललिता गौरी, शुद्धनट, बसंतीकेदार यांसरखे एकापेक्षा एक सुरेख व दिग्गज राग मधुभाईही लीलया गाऊ लागले, मांडू लागले! सूरलयतालावर मधुभाईंची अफाट हुकुमत निर्माण झाली. बालपणीची काही वर्ष आजोबांकडूनही, म्हणजे अंतुबुवांकडूनही मधुभाईंना तालीम मिळाली. त्यानंतर वडिलांचं,म्हणजे गजाजनबुवांचं गाणं मधुभाईंनी अक्षरश: टिपलं, वेचलं! मुळात घरात गाणं, रक्तात गाणं, त्यात उत्तम तालीम आणि त्याला जोड म्हणून मधुभाईंची कुशाग्र बुद्धी! मधुभाईंमधला उत्तम गवई घडवायला या गोष्टी पुरेश्या होत्या!

गाण्याच्या सोबतीनेच व्हायोलीनचाही छंद मधुभाईना जडला आणि मधुभाई व्हायोलीनदेखील अतिशय उत्तम वाजवू लागले. गजाननबुवा स्वत:ही अगदी उत्तम व्हायोलीन वाजवायचे. लेकाने वडिलांचा हाही गूण अगदी सहीसही उचलला. पुढे काही वर्ष व्हायोलीनवादक म्हणून स्टाफ आर्टिस्ट या पदावर मधुभाईंनी मुंबई आकाशवाणीवर नोकरीही केली! मधुभाई व्हायोलीनही फार सुरेख वाजवतात!

मला मधुभाईंची मुलुंड मध्ये झालेली एक गाण्याची मैफल आठवते. मधुभाईंनी तेव्हा भूप मांडला होता. इतका अप्रतीम भूप मी त्यानंतर आजतागायत ऐकलेला नाही! ग्वाल्हेर पद्धतीने सादर केला गेलेला अगदी ऑथेन्टिक भूप! भूपासारख्या अत्यंत अवघड रागाचं शिवधनुष्य मधुभाईंनी अगदी लीलया पेललं होत! त्याच मैफलीत मधुभाईंनी तेवढ्याच सुंदरतेने ललितागौरी मांडला. 'प्रितम सैया..' ही ललितागौरीतली पारंपारिक बंदिश! ओहोहो, क्या बात है! मधुभाईंच्या ललितागौरीतल्या त्या "प्रितम सैया, दरस दिखा..."च्या त्या विलक्षण सुरांनी त्या संध्याकाळी अक्षरश: अंगावर काटा आणला. सगळी मैफलच त्या ललितागौरीने मंत्रमुग्ध होऊन गेली! आधी ग्वाल्हेर परंपरेतला भूप, ग्वाल्हेर गायकीच्या सौंदर्याची उधळण करत गाणारा हा शापित यक्ष नंतर जेव्हा त्याच ताकदीने जयपूर गायकीही तेवढ्याच समर्थपणे मांडत ललितागौरीही गाऊ लागला तेव्हा श्रोतृवर्ग अक्षरश: थक्क झाला. आजही ती मैफल मला आठवते आणि मी बेचैन होतो!

मंडळी, माझं भाग्य हे की मला मधुभाईंचा अगदी भरपूर सहवास लाभला. त्यांच्याकडून मला गाण्यातलं खूप काही शिकायला मिळालं आहे, आजही मिळतं आहे! अगदी कधीही त्यांच्या घरी जा, मधुभाई अगदी हसतमुखाने स्वागत करणार! मंडळी तुम्हाला काय सांगू, आमचे मधुभाई स्वभावानेही अगदी साधे हो! वास्तविक इतका विद्वान गवई परंतु त्या विद्वत्तेचा कुठेही गर्व नाही की शिष्टपणा नाही!

"मधुभाई, जरा ती यमनमधली "नणंदीके बचनवा सहे ना जाय.." ही बंदिश दाखवा ना!" असं नुसतं म्हणायचा अवकाश की लगेच मधुभाईंनी केलीच सुरू ती बंदिश! आणि मग ती गातांना तिचं सौंदर्य कुठे आहे, कुठे आघात द्यावा, शब्दांचा कसा कुठे उच्चार करावा, एखाद्या रागाकडे कसं बघावं, रागात काय मांडावं, कसं मांडावं, तालालयीचे हिशेब कसे साभाळावेत, कुठल्या रागाचं किती पोटेन्शियल आहे ते ओळखून कसं गावं, इत्यादी अनेक गोष्टींवर मधुभाई अगदी भरभरून बोलतात, हातचं काहीही राखून न ठेवता शिकवतात!

"अरे ताला-लयीशी खेळा रे, पण तिच्याशी मारामार्‍या नका करू! सम कशी सहज आली पाहिजे, तिला मुद्दामून ओढून-ताणून आणू नये! हां, आणि समेवर येण्यात वैविध्य पाहिजे, एकाच एक पद्धतीने समेवर येऊ नये! तुम्ही एखाद्याशी बोलताय, संवाद साधताय असं गायलं पाहिजे!"

मधुभाई सांगत असतात, शिकवत असतात, आम्ही शिकत असतो!

एका शिष्येला गाण्याची तालीम देताना मधुभाई -

आमच्या मधुभाईंचा स्वभावही अत्यंत बोलका आहे. सतत गाण्यातल्या कुठल्या ना कुठल्या विषयावर गप्पा मारतील, गजाननबुवांच्या, अंतुबुवांच्या, अन्य जुन्याजाणत्या बुजुर्गंच्या आठवणी सांगतील. मधुभाईंनी गाण्यातला खूप मोठा जमाना बघितला आहे, अनेक दिग्गज गवई अगदी भरभरून ऐकले आहेत. जगन्नाथबुवा, अण्णासाहेब रातंजनकर, मिराशीबुवा, कितीतरी गवयांची गाणी मधुभाईंनी अगदी भरभरून ऐकली आहेत! आणि घरात काय, साक्षात अंतुबुवा आणि गजाननबुवा! या सग़ळ्या मंडळींकडून मधुभाई खूप काही शिकत गेले, शिकले!

"अरे गजाननबुवांना मी फार घाबरायचो बरं का! खूप मार खाल्ला आहे मी बुवांच्या हातचा!" मधुभाई मोठ्या मिश्किलपणाने आपल्या वडिलांबद्दल बोलत असतात! Smile

"काय सांगू तुला लेका, आमच्या नानांच्या (गजाननबुवांच्या) वार्‍यालाही मी फारसा उभा रहात नसे. शिक म्हटलं की चुपचाप शिकत असे. उल्हासला, पद्माला किंवा त्यांच्या इतर शिश्यांना तालीम द्यायचे तेव्हा मीदेखील तिथे हळूच जाऊन बसत असे आणि काय गातात,कसं गातात या सगळ्या गोष्टी टिपत असे! पण मी भाग्यवान रे, मला शेवटची काही वर्ष वडिलांची सेवा करण्याचं भाग्य मिळालं! म्हातारपणी त्यांच्या हातापायांना मालिश करावं लागत असे तेव्हा त्यांना मीच लागायचो. दुसरी कुणी भावंडं गेली की म्हणायचे, तुम्ही नको, मधुला बोलवा!" तीच सेवा आज थोडीफार उपयोगी पडते आहे आणि चार स्वर गाता येत आहेत!"

खरंच मंडळी, गाण्याची अन् गाणार्‍यांची ही विलक्षणच दुनिया आहे. भाईकाकांच्या भाषेत सांगायचं तर या दुनियेतली कुळं निराळी, इथले कुळाचार निराळे! मधुभाईंसारख्या जिनियस गवयाचा उल्लेख मी काही वेळा 'शापित यक्ष' असा का केला आहे याची कारणमिमांसा मी इथे करणार नाही! पण कारणमिमांसा जरी करणार नसलो तरी तो एक शापित यक्ष आहे हे नाकारता येणार नाही व म्हणून फक्त तसा उल्लेख मात्र मला करणं भाग आहे, नव्हे तो मी मुद्दामून केला आहे! परंतु बस इतकंच! लौकिक अर्थाच्या दुनियेत या शापित यक्षाचं स्थान काय आहे, काय नाही याच्याशी मला काही एक देणंघेणं नाही! माझा मतलब आहे तो त्यांची गायकी, त्यांचे सूर आणि त्यांची लयकारी, सरगमवरची त्यांची विलक्षण हुकुमत, याच्याशी! मधुभाईंसारखे गवई कुठच्या एका अज्ञात परंतु विलक्षण अश्या तिडिकेतून गातात, कुठली एक कसक त्यांच्यात संचारते आणि ते स्वरलयींची अप्रतीम अशी शिल्प घडवतात त्या तिडिकेबद्दल, त्या अज्ञात शक्तिबद्दल मी पुन्हा केव्हातरी बोलेन! अगदी भरभरून आणि मनमोकळेपणाने! हातचं काही राखून ठेवता! एक गोष्ट मात्र खरी की मधुभाईंसारखे काही गवई, काही कलाकार, हे लौकिक अर्थांच्या चौकटीत नाही बसत आणि त्यांना तसं बसवूही नये! कारण सगळ्याच प्रश्नांची उत्तरं काही आपल्याला माहीत नसतात! करायचंच असेल तर आपण फक्त त्याच्या कलेला वंदन करावं! असो...!

आमच्या मधुभाईंना नॉनव्हेज जेवण फार प्रिय बरं का मंडळी! Smile मी कधी डोबिवलीला त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेलो की मुद्दामून म्हणतो,

"बुवा, आज जेवायला बाहेर जाऊया बरं का! सत्कार हॉटेलात मालवणी जेवण फार झकास मिळतं तिथे जाऊया!"

हे ऐकल्यावर बुवांच्या चेहेर्‍यावर एक निरागस आनंद पसरतो परंतु मला म्हणतात,

"अरे कशाला तुला उगाच खर्च? बरं चल, म्हणतोस तर जाऊया! पण पैसे मी देईन हो!"

"ते आपण बघुया बुवा! तुम्ही चला तर खरे!"

"बरं चल!"

असा आमचा संवाद होतो आणि आम्ही बाहेर जेवायला जातो. रस्त्याने एका दिग्गज गवयासोबत चालल्याची ऐट असते माझ्या चेहेर्‍यावर! Smile

तात्या आणि मधुभाई मालवणी मटणाचं जेवत आहेत! Smile

"आज सुरमई घेऊ या का रे? ताजी दिसते आहे!"

थोड्याच वेळात सुरमईची कढी आणि तळलेली तुकडी असलेली ताटं आमच्या पुढ्यात येतात!

"आणि बरं का रे, मटणसुद्धा मागव रे! आज जरा मन लावून मटणही खाईन म्हणतो!" Smile

एखाद्या लहान मुलाने ज्या निरागसतेने चॉकलेट मागावं ना, अगदी तीच निरागसता मटण मागवताना आमच्या बुवांच्या चेहेर्‍यावर असते! त्यांची मटणाची फर्माईश पुरी करायला मला अगदी मनापासून आवडतं! कारण मी त्यांना फक्त तेवढंच देऊ शकतो! त्यांनी मला आजतागायत किती भरभरून दिलं आहे त्याची काही गणतीच नाही!

-- तात्या अभ्यंकर.

अरे पावसा पावसा, तु आहेस तरी कुठं !!!

आभाळ भरुन येतंय, पण पावसाच पत्ताच नाही. १९३६, १९७२, आणि आता २००८ म्हणजे बरोबर छत्त्तीस वर्षानंतर आता पाऊस पडणारच नाही, भयंकर दुष्काळ पडणार आहे, अशी भविष्यवाणी आमच्या एका दोस्ताने केली. आणि पुन्हा आम्ही कवितेच्या पुस्तकात घुसलो. कविता वाचता...वाचता.......कवितेच्या शब्दा-शब्दावरुन. लिंकवर क्लिक केल्यावर जसे इतर दूवे उघडतात तसे मनाचे अनेक दुवे उघडत गेले ....दररोज, कडाक्याचे ऊन पडत असल्याने पावसाची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. केवळ शेतकरीच नव्हे तर सामान्य माणूसही पावसाने डोळे वटारल्याने हवालदिल झाला आहे. आषाढीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन वारकरी एकदा परतला की तो पाऊस घेऊन येतो असा एक समज आहे. बाजरी, मका, मुग, कापूस, तूर, यांची पेरणी झालेली असली की दोन पानांची रोपं पांडुरंगासारखी कर कटेवर ठेवून डोलत असतात. पण यंदा वारक-याला दर्शन करुन आला तरी त्याची नजर आभाळाकडेच. शेतक-याने खरिपाच्या पिकाची आशा सोडली आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणुन तरी पाऊस यावा इतकीच अपेक्षा उरली आहे. खरे तर य काळात रानं हिरवीगार झालेली असतात. डोंगरद-यातून खळखळत वाहणारे पाणी, गावा-गावातील अध्यात्मिक वातावरण आणि येणा-या सनासुदींमुळे वातावरण भारलेले असते. आणि आम्हाला पावसाच्या कवितेची आठवण होते, बहिणाबाई म्हणतात...

आला पह्यला पाऊस
शिपडली भुई सारी
धरत्रीची परमय
माझं मन गेलं भरी

आला पाऊस पाऊस
आता सरीवर सरी
शेतं शिवारं भिजले
नदी नाले गेले भरी....!!!

बहिणाबाईच्या कवितेतला पाऊस असा भरपूर कोसळणारा. धरित्रीचं मन ओला करणारा असा पाऊस, शिवार गच्च करणारा पाऊस, नदी नाले तुडूंब भरणारा पाऊस. पण यंदा काही त्याचे लक्षणे नीट दिसत नाही. जमीन आणि आकाशाची भेट म्हणजे जीवा-शिवाची भेट. दोघांच्या भेटीने दरवळणा-या मृदगंधाने प्रत्येकाच्या आनंदाला उधान येतं. मात्र दुष्काळामुळे भूईचेच दु:ख पेटले आहे. ते कोणीतरी विझवायला पाहिजे अशी हाक कवितेतून येत आहे. एक अज्ञात कवी म्हणतो.

ढग पांगले पांगले, हाक पावसाला द्या रे
दु:ख पेटले भुईचे, कुणी विझवाया या रे

ढगांचा पांगण्यामुळे धरित्रीचे दु:ख पेटले आहे, आणि ते दुखः केवळ पावसानेच विझणार आहे. पावासाच्या शोधात असलेला शेतक-याला वेड लागण्याची वेळ आली आहे. बेभानपणे पडणारा पाऊस दूर कुठेतरी गेलेला आहे. आणि त्याची परिणीती दु;खात होते. दिवसभर लागणारी झड, दिवस-दिवस चालत असायची, 'आता थांब रे बाबा, अशी विनवणी करण्याची वेळ आणणारा पाऊस हरवला आहे. डोहांच्या काठावर नाचणारा मोर, मना-मनातून वाहणारे पावसाचे झरे, झाडांनी अलगद टिपून घेतलेले पावसाचे थेंब, मोहरुन लाजणारे वृक्ष, काळेभोर झालेले आकाश....हे सारं स्वप्नवत वाटत आहे. सरकारने दिलेल्या पॅकेजचे पैसे, खतासाठी, बियाणांसाठी, दिले याचा विसर होऊन शेतकरी अवांतर खर्च करतोय, नवी कोरी टू-व्हीलर, घेऊन मोबाईलवर हॅलो, हॅलो, करतोय. आणि न पुरणारे पैसे संपल्यावर पुन्हा तेच दु:ख. पाण्याच्या शोधात किडे-किरकुडे शहराकडे येताहेत, रानात चारा नसल्यामुळे जणावरांचे हाल पाहवत नाही. भविष्याच्या चिंतेने मुक्या धनाला बाजाराच्या दावणीला बांधले जात आहेत.
ना.धो. महानोर म्हणतात-

पांगलेला पावसाळा, वाट भरलेली धुळीने
मोडक्या फांदीस घरटे, वाळलेली शुष्क पाने.
दूर गेल्या पायवाटा डोंगराच्या पायथ्याशी
पंख मिटल्या झोपड्यांचे दु:ख कवटाळे उराशी.

पांगलेल्या पावसाने मोडकी फांदी, वाळली पाने, दूर गेलेल्या पायवाटा आणि दु़ख; पुजलेलेच. जिथे पाण्यासाठी उन्हाला व्याकूळ होण्याची वेळ आली तिथे जीवाचे काय हाल. पावसाअभावी जीव भीतीने कासावीस झाल्याशिवाय राहत नाही.
पाऊस आलाच नाही तर.......पक्षांचे थवे मरणाचा निरोप देत इतरत्र जातील. घरातील कर्ता माणूस कुठे निघून जाईल त्याची भीती कुटूंबाला लागून राहीली आहे. आणि असा विचार करता करता माय माऊलीच्या डोळ्यांचा कडा ओलावतात. पक्षी नुसते हिरमुसले होऊन वाळलेल्या पानांकडे पाहत आहेत.सुस्तावलेल्या झाडाला ओल नाही. आणि शेतक-याच्या दुखःला कुठेच तळ नाही. पावसाचा गार झोंबणारा असा गारवा नाही. कुठे बगळ्यांचा थवा शेतात नाही. आणि पुन्हा पहिल्या पावसाची आठवण होते. मंगेश पाडगावकर म्हणतात....

पहिला पाऊस येतो आधी
आजीच्या पाठीवरच्या घामोळ्यांवर
बाजूला मी उभा भिजत,
माझा मलमलाचा इवलासा सदरा ओलाचिंब.

झाडाच्या हिरव्या गाई तहानलेल्या
पहिल्या पावसात पानांनी शहारत
उचलतात डो़ई वर, झेलतात सरी.

आपल्यालाही आठवत जातात पहिल्या पावसात ओलेचिंब झालेले आपण. घरात झटकून धुळ झटकावून काढलेल्या छत्र्या, रेनकोट, आणि आपल्याला आठवतात गोणपाटाचा केलेला रेनकोट. पोत्याचा कोपरा मुडपून भिजत चाललेले आजोबा. चिंब झालेले रान. यातले आता काहीच नसते. सा-या वाटा, वळणं मागे टाकून आयुष्य असं कधी उजाड माळरानावर येऊन विचार करायला लावते. पाणी ग्लासात ओतून प्यायला द्यावे, तसे रोपट्यांना ग्लासाने पाणी ओतणा-या स्त्रीयांना पाहिलं की आमच्या -दयात कालवाकालव होते. तेव्हा सोबतीला केवळ भन्नाट वारा असतो. पाण्यासाठी हरवलेल्या दाही दिशा, आणि डोळ्यात पूर, तेव्हा काय करावे काहीच समजत नाही. पावसळ्यात मस्त भटकंती करुन यावे असा विचार पक्का झालेला असतो.....पावसाळी दिवसात कुठे तरी घाटात भटकून यावे, प्रवास व्हावा, सुरेल पावसाच्या धारेत आपला सुर मिसळून आपल्याच गाण्यावर खू्श व्हावे. आणि पुन्हा एकदा बालकवीची कविता वाचायला हवी असा विचार तरळून जातो. विंदा म्हणतात....

वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे;
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे.

असाही एक विचार मनात डोकावतोच....तक्रार करावी तर कोणाकडे करावी. दरवळणारा मातीचा सुवास येत नाही. माणसाला माणूसपण देणार्‍या मातीला भेगा पडल्या आहेत. पाण्याअभावी ढेकळं अजून विरघळली नाहीत. शेती जीवनाला आकार देणारा पाऊस पडावा यासाठी परमेश्वराची आठवण होत आहे. सर्व भेदाभेद दूर होऊन. धोंडी-धोंडी पाणी दे असा आवाज गावात घुमतोय. निसर्ग हाच देव त्याच्या भेटीची ओढ तीव्र होत आहे, बहिणाबाई म्हणताहेत........

येता पाऊस पाऊस
पावसाची लागे झडी
आता खा रे वडे भजे
घरांमधी बसा दडी.

देवा, पाऊस पाऊस
तुझ्या डोयातले आंस
दैवा, तुझा रे हारास
जीवा, तुझी रे मिरास.

आता भरपूर पाऊस होऊ दे !!! अजून दोन महिने शिल्लक आहेत. चांगला गडगडात होऊ दे, जोरदार पावसाच्या वर्षावात भरपूर पावसाची गाणी येऊ दे, पावसाबरोबर रेंगाळणा-या आठवणी येऊ दे. तिच्या आठवणी चिंब होउन लगडत आहेत. काळ्याभोर ढगांच्या प्रवासात माझाही निरोप तिच्यापर्यंत जाऊ दे......मस्त पैकी कांदे भजे, वडे, वाफाळलेला चहा, असा बेत होऊ दे, आणि पावसाच्या गदारोळात तिच्या डोळ्यातील पावसाला मात्र थांबू दे. तरीही राहून राहून ना. धो. महानोरांच्या कवितेची आठवण होतेच.

आभाळ भरुन येते पुष्कळ
पहिल्यासारखी बरसात नाही.
नक्षत्रामागून नक्षत्र सरतात
तरीही मृदगंध दरवळत नाही.
गावाकडला गलबला पुसट
ऐकायला येतो डोंगराकडून
अंधार्‍या रात्री प्राण कासावीस होतो.
जुन्या आठवणी स्मरून.

पुर्वीसारखा पाऊस पडत नाही, ही अनेकांची त्रक्रार असते. कधी मुसळधार पावसानं गावच्या गावं पाण्याखाली जातात, तर कधी पावसाचा टीपूस नाही. जीव मेटाकुटीला आणणा-या निसर्गाच्या लहरीपुढे माणूस हतबल झाला आहे. रोहिण्या बरसल्या की मृगाच्या सरी बरसतात. त्यावर एकदा पेरण्या झाल्या की शेतक-याच्या चेह-यावरील आनंद लपत नाही. पण यंदा रोहिण्या बरसल्या नाही. मृगानं दगा दिला. आर्द्रा कोरडाच आहे. जीथं थेंबा-थेंबी झाली तिथं केलेल्या पेरण्या वाया गेल्या.

गुज बोले गुज बोले
गुज मिरोग बोलला
तेलपाणी लावा काव
आता तिफन उचला

इंद्रजीत भालेरावांची पावसापुर्वीची कविता. तिफण उचलली, पेरणी झाली, वाफधावन झाली, पावसाच्या सुकाळात गवत, धान, तरारुन आलेलं आहे. मग पाखरं राखायचेत, चोर राखायचेत, शाळेतला 'सुगीचे दिवस' नावाचा धडा आठवायचा. सुगीची कामं दिवस रात्र करुन उरकायची, मळणी, उधळणी, खळं मागायचं, आणि सर्वा उचलत उचलत पुढल्या वर्षीचा हिशोब डोळ्यासमोरुन सरकत जाईल.........पुन्हा पावसाच्या वाटेकडे डोळे लावायचे.

"गाण्यातली लय!" - तात्या उवाच! (भाग १)

राम राम मंडळी,

माझ्या "चला, गाणं शिकुया, समजून घेउया!" - भाग १ या लेखाला प्रतिसाद देताना पक्या यांनी ताल व लय यात फरक काय आहे? हा प्रश्न विचारला आहे. याचे ढोबळ मानाने उत्तर द्यायचे झाले तर प्रथम ताल म्हणजे काय हे ढोबळमानाने पाहावे लागेल. ताल म्हणजे लयीला बांधून ठेवणारी गोष्ट! एखाद्या गाण्याच्या चालीनुसार जी लय असते त्या लयीला अतिशय सुरेख रितीने व सुसुत्रततेने बांधून ठेवणारी गोष्ट म्हणजे ताल. मग तो कधी एकताल असेल, कधी त्रिताल असेल तर कधी केरवा असेल. हे सगळे तालाचे विविध प्रकार आहेत. तालात लयीनुसार काही खंड निश्चित केलेले असतात त्याला मात्रा म्हणतात. ७ मात्रा, ४ मात्रा, १२ मात्रा, १६ मात्रा असलेले तालाचे विविध प्रकार आहेत. धा, धीं, तीन, कत्, त्रक, गे, ना, ही तबल्यातील विविध अक्षरं आहेत, ज्याच्या साहय्याने तबलावादन आणि पर्यायाने तालवादन होते. तालाच वजन तेच राखून, मात्रांची संख्या तीच ठेवून काही वेळेला एकच ताल विविध प्रकारच्या बोलांनी, अक्षरांनी वाजवला जातो त्या ठेका असं म्हणतात. उदाहरणच द्यायचं झालं तर अशी अनेक गाणी आहेत की ज्यात केरवा हा ताल वापरला गेला आहे परंतु त्याचे ठेके मात्र वेगवेगळे आहेत! विविध ठेक्यांमुळे गाण्याच्या सौंदर्यात भर पडते.

असो, ही झाली तालासंबंधी अगदीच ढोबळ व प्रथमिक चर्चा. ताल, तबल्यातील घराणी, विविध बंदिशी, कायदे, रेले ही सर्व तालाची शास्त्रीय अंगं आहेत, त्यात आपण सध्या शिरणार नाही आहोत. तो खूपच मोठा विषय आहे व त्या बाबत सवडीने कधितरी एखादी लेखमालाच लिहायचा माझा विचार आहे. अर्थात, माझाही अजून त्यात अभ्यास सुरू आहे व तो जन्मभर सुरूच ठेवावा लागेल इतका अफाट तबला आपल्या हिंदुस्थानी अभिजात संगीतात आहे! आपलं तालशास्त्र अतिशय समृद्ध आहे!

या लेखात मी संगीतातल्या 'लय' या अत्यंत अवघड अश्या विषयावर प्राथमिक भाष्य करण्याचा प्रयत्न करणार आहे. लय ही जरी अत्यंत सूक्ष्म गोष्ट असली तरी तिचा आवाका प्रचंड आहे. लयविचार हा संबंध संगीतालाच व्यापून टाकणारा प्रकार आहे!

संगीतातली लय आपण नंतर पाहू. पण मुळात लय म्हणजे काय हो?

बरं आधी मला एक सांगा, की हे कुठलं चित्र आहे? Smile

हे ईसिजीचं चित्र आहे हे आपण ओळखलं असेलच! डॉक्टर कशाला काढतात हो एखाद्याचा ईसीजी? तर त्याच्या हृदयाच्या ठोक्यांची क्रिया नियमीत आहे किंवा नाही हे बघायला! म्हणजेच त्या माणसाची 'लय' कशी आहे, तो लयीत आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी! हृदयाची 'लय' बिघडली की जीवन बिघडलं आणि गाण्यातली लय बिघडली की गाणं बिघडलं असं समजावं! Smile

प्रत्येक माणसाची अशी एक स्वतंत्र लय असते. हा लेख वाचताना एखाद्याच्या नाडीचे ठोके हे मिनिटाला ७५ असू शकतील, तर एखाद्याच्या ८० असू शकतील. परंतु प्रत्येकाचं हृदय एका लयीत सुरू असतं. सांगायचा मुद्दा हा की 'लय' हा जीवनाचा प्राण आहे. वास्तविक हा अगदी छोटा शब्द! दोनच अक्षरी - लय! परंतु त्याची व्याप्ती अफाट आहे. डॉक्टर मंडळी हृदयाला स्टेथोस्कोप लावून हे हृदयाचं संगीत ऐकतात. 'लब-ढब', 'लब-ढब', 'लब-ढब'! आहाहा, काय सुंदर नाद असतो हा? आपण ऐकला आहे का कधी? नसेल ऐकला तर केव्हातरी आपल्या फ्यॅमिली डॉक्टरांकडे त्यांचा जाऊन त्यांचा स्टेथो घेऊन अवश्य ऐका! Smile

'लब-ढब', 'लब-ढब', 'लब-ढब'!

हृदयाचं काम एका छान नादमय लयीत सुरू असतं. जीवन सुरू असल्याची ती खूण आहे! हृदयाचे हे लयदार ठोके आईच्या पोटात असल्यापासून जे सुरू होतात ते अगदी शेवटचा श्वास सुरू असेपर्यंत! आमच्या गाण्याच्या भाषेत बोलायचं तर लयीची शेवटची तिहाई पडते आणि जीवनगाणं थांबतं! लय संपली, जीवन संपलं! बरं ही लय बिघडूनही चालत नाही. वर इसिजीचं जे चित्र लावलेलं आहे तो ईसीजी तेच तपसण्याकरता काढतात! पाहा मंडळी, आयुष्याचा आणि गाण्याचा किती जवळचा संबंध आहे तो. हृदयाची लय बिघडली की जगणं मुश्किल होतं आणि गाण्याची लय बिघडली की गाणं बिघडतं!

किती महत्व सांगावं हो लयीच? मला सांगा लय कशात नसते? इथे आपल्या मिपावर अनेक चित्रकार मंडळी आहेत. त्यांना विचारा की एखादं चित्र काढताना त्या चित्रातली लय किती सांभाळावी लागते ते! चित्रातही एक अदृष्य लय असते, अस्सल चित्रकार ती सांभाळूनच उत्तम चित्र साकार करत असतो. अर्थात, मी या विषयात काही जास्त बोलू शकत नाही कारण मला त्या कलेतलं काही कळत नाही, फक्त आस्वाद घेता येतो. परंतु इथे उत्तमोत्तम कवी आहेत, त्यांना विचारा की कवितेतली एखादी ओळ बांधताना लयीचं महत्व काय अन् ती किती सांभाळावी लागते! लय ही प्रत्येक कलेत असतेच, मी फक्त संगीतातल्या लयीविषयी थोडंफार बोलण्याचा प्रयत्न करणार आहे!

कुठलीही कला ही लयीशिवाय जन्मूच शकत नाही. लय ही स्वयंभू असते, कलेत अंतभूतच असते. कलेच्या अविष्कारात ती कलेपासून वेगळी काढताच येत नाही!

अहो, कलेचं एक वेळ राहू द्या, तुम्हीआम्ही तिची आपापल्या वकुबानुसार निर्मिती करतो, आस्वाद घेऊ शकतो. पण एखाद्या तान्ह्या बाळाचं काय? त्याला कळते का हो लय? Smile

एखादं अगदी तान्हं मूल जेव्हा धाय मोकलून रडत असतं तेव्हा आसपासची बरीच मंडळी त्या मुलाला जवळ घेत असतात, त्याची समजूत घालत असतात, तरीही ते गप्प होत नाही. पण जेव्हा त्या तान्हुल्याची आई त्याला हृदयाशी धरते तेव्हा ते पटकन रडायचं थांबतं, खुदकन हसतं! सांगा पाहू का बरं असं? त्या तान्ह्याला हीच आपली आई आहे, हे कसं कळतं बरं? Smile

९ महिन्यांपासून ते आईच्या पोटात असतं त्या कालावधीत ते अक्षरश: सतत म्हणजे सतत आईच्या हृदयाची ती 'लब-ढब', 'लब-ढब' ऐकत असतं! तेवढी एकच खूण असते त्याच्याजवळ. ना त्याला काही दिसत असतं, ना काही कळत असतं, ना कुणी समजून सांगायला असतं! त्याची साथ असते ती फक्त त्याच्या माउलीच्या हृदयाची एका ठराविक लयीतली नादमयता! पण तसं प्रत्येकच माणसाच्या हृदयाची धडधड सुरू असते मग ते मूल आपल्या आईच्याच हृदयाचा आवाज कसं ओळखतं? तर त्याला कारण हे की वर म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाची लय वेगळी, प्रत्येकाच्या लयीत सूक्ष्म फरक असतो आणि मंडळी आपल्याला कदाचित अतिशोयोक्ति वाटेल, परंतु विश्वास ठेवा, ते मूल एका क्षणात लयीतला तो सूक्ष्म फरक ओळखून फक्त त्याच्या आईने जवळ घेतल्यावरच एका क्षणात रडायचं थांबतं. आईच्या हृदयाजवळची ती जागा त्याच्या ओळखीची असते आणि आपल्याकरता हीच जागा सर्वात सुरक्षित आहे हा विश्वास त्या लहानग्याकडे असतो! ती ओळख असते ती त्या ठराविक लयीची, त्या माउलीच्या हृदयाच्या 'लब-ढब', 'लब-ढब' या लयदार नादमयतेची!

एक तान्हं मूल आपल्या आईचं हृदयसंगीत ओळखू शकतं, त्यातली नादमयता ओळखू शकतं! अर्थात, हे माझे विचार नव्हेत. ते मी माझ्या गुरुजींकडून शिकलो आहे. बघा बुवा तुम्हाला पटताहेत का ते! आमचे बाबूजी नेहमी म्हणायचे की कवी हा कविता लिहितांनाच त्याची लय निश्चित करत असतो. आपण फक्त ती लय ओळखाची आणि आपल्या आवडीच्या सुरात, आवडीच्या रागात, आवडीच्या धुनेमध्ये, कवितेतल्या भावानुसार ते गाणं बांधायचं! मूळ कविताच जर लयीत नसेल तर गाणं जन्माला येणं मुश्किल आहे! असो..

खरंच मंडळी, लयीचा शोध हा अनंत आहे. आपण तिचा जितका अभ्यास करू तेवढी ती अधिक सूक्ष्म होत जाते आणि पुन्हा अभ्यास करण्याकरता मुश्किल होऊन बसते. परंतु तिचा अभ्यास, तिचा शोध कधीच संपत नाही!

असो, तर मंडळी वरील विवेचन म्हणजे लयीबद्दलचे ढोबळमानाने काही जनरल विचार आहेत. मग आता संगीतातली, गाण्यातली लय म्हणजे काय हो? तिचा अनुभव कसा घ्यायचा? तिचं सौदर्य कसं अनुभवायचं? हे आपण पुढल्या भागात पाहू!

आमचे पक्याराव, 'तात्या, लय म्हणजे काय हो?' हा प्रश्न किती सहज विचारून गेले! परंतु हा प्रश्न विचारून त्यांनी माझी किती पंचाईत करून ठेवली आहे, नक्की कुठल्या परिक्षेला मला बसवलं आहे याची त्यांना तरी कल्पना आहे की नाही, देवच जाणे! Smile

-- तात्या अभ्यंकर.

गायक-संगीतकार विठ्ठल शिंदे ह्यांना भावपूर्ण आदरांजली!

मित्रहो,माझे बालपण समृद्ध करणार्‍या अनेक कलाकारांपैकी एक म्हणजे विठ्ठल शिंदे. भाळी अर्धचंद्र,माथी शुभ्र गंगा,लिंपिले सर्वांगा चिता-भस्म हे त्यांचे मी ऐकलेले पहिले गाणे. काहीसा चोरटा तरीही गोड आणि तितकाच आर्त आवाज असणार्‍या विठ्ठलरावांनी त्या गाण्याने अवघ्या महाराष्ट्राला वेडं केलं होतं. भल्या पहाटे आकाशवाणीवरून प्रसारित होणार्‍या मंगलप्रभात ह्या कार्यक्रमात दर सोमवारी हे गीत हमखास लागायचे. तसेच त्यांनी गायलेली अजून काही भक्तिगीतेही खूपच लोकप्रिय होती. १)देवा हो सख्या पांडुरंगा,दर्शन द्या मजला श्रीरंगा २) विठ्ठला, देवा आलासी माझ्या दारी,पण थांब जरासा विटेवरी ३)नित्य वाचे तुझे नाम गाऊ,पांडुरंगी सदा लीन राहू ही देखिल माझ्या आवडीची आहेत आणि आजही अधून मधून ती आकाशवाणीवरून लागत असतात.
इथेच आणि ह्या बांधावर अशीच शामल वेळ,सख्या रे किती रंगला खेळ हे माणिक वर्मांनी गायलेले सुमधुर गीत आणि मज भेटून जा हो दत्त सख्या अवधूता हे आर.एन.पराडकरांनी गायलेले दत्तगीत ; ह्या दोन्ही गाजलेल्या गीतांचे संगीत दिग्दर्शन विठ्ठलरावांचे आहे.

विठ्ठलरावांचे नाव त्रिखंडात गाजवले ते मात्र एका लावणीने. प्रतिलता रोशन सातारकरांनी गायलेली लावणी म्हणजे नेहमीच राया तुमची घाई,नका लावू गठूडं बांधायला,येऊ कशी मी नांदायला हो,येऊ कशी तशी मी नांदायला ही होय. ह्या लावणीचे संगीत आहे विठ्ठरावांचे .
विठ्ठलरावांचे संगीत आणि गायिका रोशन सातारकर ह्या जोडगोळीची ही अजून काही गाजलेली लोकगीतं!
१)माझ्या नवर्‍याने सोडलीया दारु

२)मला म्हन्त्यात पुन्याची मैना
३)डार्लिंग डार्लिंग काय म्हन्तोस
४)उद्या जाईन मी माझ्या गावा,माझ्या अंगाला हळद लावा
५)पैठणचा शालू आज मला आणा गडे पतिराज .
ही गाणी ऐकलेली नाहीत असा क्वचितच कुणी मराठी माणूस भेटेल.

विठ्ठलरावांनी बाबासाहेब आंबेडकरांवर गीत भीमायन हे महाकाव्य लिहिले आणि त्याचे हजारो कार्यक्रम त्यांनी अवघ्या महाराष्ट्रभर केलेत. अतिशय ऋजु वृत्तीच्या विठ्ठलरावांचे मराठी सुगम संगीत आणि लोकसंगीतातले कार्य अनमोल असेच आहे. महाराष्ट्रातल्या सर्व नामांकित गायक-गायिकांबरोबर काम करूनही हा लोकगायक शेवटपर्यंत तसा पडद्याआडच राहिला.

लोकगीतांमध्ये विठ्ठलरावांचे नाव धृवतार्‍याप्रमाणे अढळ आहे. काय विलक्षण योगायोग आहे पाहा. अशा ह्या लोकसंगीतातल्या महागुरुला काल दिनांक १८जुलै २००८ रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशीच देवाज्ञा झाली. मृत्युसमयी ते ७६ वर्षांचे होते. त्यांना माझी भावपूर्ण आदरांजली.

श्रद्धा॑जली: स॑गीतकार मदन मोहन

आज १४ जुलै ! १९७५ साली याच दिवशी माझ्या अत्य॑त लाडक्या स॑गीतकाराने 'मदन मोहनने' शेवटचा श्वास घेतला. ह्या लेखाद्वारे मी त्या॑ना भावपूर्ण आदरा॑जली वाहतो आहे.
ब्रिटिश अ॑कित मेसापोटेमिया (आत्ताचा इराक) मधील बगदाद शहरात दि. २५ जून १९२४ रोजी एका धनिक कुटु॑बात मदनमोहनचा जन्म झाला. त्या॑चे वडिल रायबहाद्दूर चुनिलाल कोहली हे एक वजनदार असामी होते. बगदादमधून रावळपि॑डी- चकवाल येथे काही वर्षे वास्तव्य केल्यावर कोहली कुटु॑ब मु॑बईत स्थायिक झाले. (१९३५)
रायबहाद्दूर त्यावेळच्या 'बॉम्बे टॉकिज' ह्या नामव॑त फिल्म क॑पनीत भागिदार होते. त्या॑ना स॑गितात विशेष रस नव्हता पण मदनमोहनच्या आईला मात्र गोड गळ्याची देणगी लाभली होती. मदनमोहनचे देखणे रूप आणि स॑गिताची आवड ह्या दोन्ही गोष्टी आईकडूनच आल्या होत्या. लहानपणापासूनच त्याला स॑गिताची अतोनात आवड होती. अवघा चार वर्षा॑चा मदन ग्रामोफोन लावून गाणी ऐकत बसे!
मदनमोहनचे शालेय शिक्षण भायखळ्यातल्या 'कॉन्वे॑ट ऑफ जीझस ऍन्ड मेरीत झाले. वडिला॑च्या आग्रहाखातर दुसर्‍या महायुद्धात त्याने ब्रिटिश लष्करात नोकरीही केली. पण लष्करात त्याचे मन रमत नव्हते. १९४५ मध्ये राजीनामा देऊन त्याने लखनौ येथे रेडिओ स्टेशनवर सहाय्यक स॑गीत स॑योजकाची नोकरी मिळविली.
लखनौमध्ये मदन मोहनची खरी जडणघडण झाली. त्याकाळात लखनौमध्ये कोठ्या॑वरचे जलसे व मैफिली ऐन भरात होत्या. बेगम अख्तर, सिद्धेश्वरी देवी, बरकत अली खान व इतर अनेक दिग्गजा॑चे गाणे मदनमोहनने भरभरून ऐकले. खर॑ पाहता त्याने हि॑दूस्थानी शास्त्रीय स॑गीताचे शिक्षण असे घेतलेच नव्हते पण त्याने एकलव्यासारखे श्रवणभक्तीतून खूपच ज्ञान मिळविले होते. हिराबाई बडोदेकरा॑चा त्याच्यावर प्रभाव होता व पुण्याच्या सवाई ग॑धर्वची वारीही त्याने कधी चुकविली नाही.
पुढे मु॑बईत आल्यावर मदनमोहनने सिनेमात छोटी कामेही केली (उदा. मुनिमजीमध्ये नलिनी जयव॑तच्या भावाचे काम) पण एक श्रेष्ठ स॑गीतकार बनणेच त्याच्या (व रसिका॑च्या) भाग्यात होते. काही काळ सचिनदेव बर्मन व श्यामसु॑दरकडे उमेदवारी केल्यावर १९५० मध्ये त्याने पहिल्या॑दा 'आ॑खे' या चित्रपटास स्वत॑त्रपणे स॑गीत दिले. पण एक्कावन सालच्या 'मदहोश' चे स॑गीत खूप गाजले. 'मेरी याद मे॑ तुम ना' हे तलतने अतिमुलायम आवाजात गायलेल॑ गाण॑ आजही लोकप्रिय आहे.
मधुरता व भाव-भावना॑चा उत्कृष्ट परिपोष मदनमोहनच्या स॑गितात प्रकर्षाने जाणवतो. गझल, ठुमरी हे तर त्याचे हक्काचे किल्लेच होते. हि॑दी, उर्दूवर त्याचे उत्तम प्रभूत्व होते. त्याची चाल शब्दा॑ना विस॑गत वाटत नसे.
त्यावेळच्या सर्वच गायक-गायिका॑नी मदनची गाणी गायली असली तरी लता- मदनमोहन हे मिश्रण मात्र अव्वल!
हि॑दूस्थानी वाद्या॑चा सुयोग्य वापर हे त्याच॑ आणखी एक वैशिष्ठ्य. तो सतारीचा विशेष चाहता होता. रईस खानने वाजवलेली 'आज सोचा तो आ॑सू भर आये (हॅ॑सते जख्म) मधील सतार ऐकून लतादीदी रडल्या होत्या म्हणतात. 'रस्मे उल्फत' 'वो चूप रहे॑ तो ' ' नैनो मे॑ बदरा छाये॑' इ गाण्या॑मधील सतार अ॑गावर काटा उभा करते.
भाई भाई (१९५६) मधील 'कदर जानेना' गाण॑ ऐकल्यावर साक्षात बेगम अख्तरने लखनौहून लता म॑गेशकरा॑ना मु॑बईला ट्र॑क कॉल केला होता अन फोनवर ते गाण॑ म्हणायला लावल॑ होत॑! 'नौनिहाल' (१९६७) मधील प॑. नेहरू॑च्या अ॑त्ययात्रेवर चित्रित केलेले 'मेरी आवाज सुनो' हे गाणे ऐकून इ॑दिराजी॑चे डोळेही भरून आले होते.
मदनमोहन अतिशय शिस्तप्रिय स॑गीतकार होता. लष्करात काम केल्यामुळे असेल कदाचित पण स्वच्छता, टापटिप आणि वेळेवर हजर राहणे हे त्याचे गुण होते. खवैय्या तर होताच पण स्वतः उत्तम कुकही होता. तो भे॑डी मटण उत्कृष्ट बनवून दोस्ता॑ना खिलवित असे अशी मन्ना डे॑नी आठवण सा॑गितली होती.
पण फ्लॉप चित्रपटा॑चा हिट स॑गीतकार अशी त्याची प्रतिमा झाली होती. खूप मोठ्या बॅनरचे चित्रपट त्याला कमीच मिळाले. हळव्या स्वभावाच्या मदनने अपयश मनाला लावून घेतले आणि खचून जाऊन मद्याचा आसरा घेतला. प्रकृतीवर व्हायचा तो परिणाम होऊन अवघ्या बावन्नाव्या वर्षी हा अतिशय गुणी स॑गितकार निधन पावला. त्या दिवशी आभाळही एव्हढ॑ कोसळत होत॑ की जणू सगळा आसम॑तच धाय मोकलून रडत होता.
आज मात्र मदनमोहनचे चाहते दिवसे॑दिवस वाढतच आहेत. त्याच्या स॑गिताचा अभ्यास, चर्चा होत आहेत. पण तो होता ते॑व्हा मात्र त्याला अन्नुल्लेखानेच मारले जायचे. लता म॑गेशकरा॑नी ह्यावर अचूक टिप्पणी केली आहे.. 'काही लोका॑च्या कु॑डल्या त्या॑च्या मृत्यून॑तर सुरू होतात.. मदनभैय्या त्यातला आहे..
मदन मोहनची माझी आवडती गाणी
१) आज सोचा तो -हॅ॑सते जख्म
२) आप कि नझरो॑ ने - अनपढ
३) आप क्यो॑ रोये- वो कौन थी
४) अगर मुझसे मुहोब्बत है॑- आपकी परछाईया॑
५) ऐ दिल मुझे बता दे- भाई भाई
६) बदली से निकला है चा॑द- स॑जोग
७) बेताब दिल की तमन्ना- ह॑सते जख्म
८) चला है कहा॑- स॑जोग
९) चिराग दिल का जलाओ- चिराग
१०) दिल ढू॑ढता है फिर वही- मौसम
११) दो घडी वो जो पास- गेट वे ऑफ इ॑डिया
१२) है इसी मे॑ प्यार की आबरू- अनपढ
१३) हम है॑ मता-ए-कूचा- दस्तक
१४) हम प्यार मे॑ जलने वालो॑को- जेलर
१५) जाना था हमसे दूर- अदालत
१६) कदर जाने ना- भाई भाई
१७) लग जा गले- वो कौन थी
१८) माई री मै॑ कासे कहू॑- दस्तक
१९) मेरा साया साथ होगा- मेरा साया
२०) नगमा और शेर की बारात- गझल
२१) नैना बरसे रिमझिम- वो कौन थी
२२) नैनो मे॑ बदरा छाये- मेरा साया
२३) रस्मे उल्फत को निभाये॑- दिल की राहे॑
२४) रुके रुके से कदम- मौसम
२५) शोख नझर की बिजलिया॑- वो कौन थी
२६) फिर वोही शाम- जहा॑ आरा
२७) मोरे नैना बहाये॑ नीर- बावर्ची
२८) उनको ये शिकायत है॑- अदालत
२९) वो भूली दास्ता॑- स॑जोग
३०) वो चूप रहे॑ तो- जहा॑ आरा
३१) ये दुनिया ये महफिल- हीर रा॑झा
३२) यू॑ हसरतो के दाग- अदालत
३३) झमीन से हमे आसमा पर- अदालत
३४) जरा सी आहट होती है- हकिगत
३५) तुम जो मिल गये हो- ह॑सते जख्म
३६) मेरी बीना तुम बिन रोये- देख कबिरा रोया
३७) बै॑या ना धरो- दस्तक
३८) तेरी आखो॑ के सिवा- चिराग
३९) न तुम बेवफा- एक कली मुस्कराई
४०) एक हसी॑ शाम को- दुल्हन एक रात की
४१) झुमका गिरा रे- मेरा साया
४२) आपके पेहलू मे॑- मेरा साया
४३) भूली हुई यादो॑- स॑जोग

आधार- १) 'मदनमोहन ऍन अनफर्गेटेबल कम्पोजर- व्हि.एम्.जोशी
२) गाये चला जा- शिरिष कणेकर
३) विश्वास नेरूरकर
४) मृदुला दाढे- जोशी
५) इ॑टरनेट

"रिऍलिटी'तील वास्तव स्वीकारा

"रिऍलिटी'तील वास्तव स्वीकारा
एका बंगाली दूरचित्रवाहिनीवरील नृत्यस्पर्धेत शिंजीनी नामक स्पर्धक मुलीला अपयशामुळे नैराश्याचा झटका आला. या स्पर्धेतील एक प्रसंग तिच्या जिवावर बेतला. यासंबंधीच्या बातम्या दूरचित्रवाहिनी आणि दैनिकांत झळकल्या आणि अशाप्रकारच्या सर्वच कार्यक्रमांना, निर्मात्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले. वस्तुतः ते चूक आहे. खरे तर या घटनेला शिंजीनीच्या कुटुंबीयांना जबाबदार ठरवायला हवे. आपल्या अपत्याला आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपण किती धीर देतो, यावर मुलांची मानसिकता घडत असते. केवळ अतोनात लाड करून त्यांना हवे ते, हवे तेव्हा देऊन हट्टी बनविणे किंवा अपयश काय आहे, हेच त्यांना कळू देणार नसाल, तर अशा मुलांच्या वाट्याला शिंजीनीसारखीच अवस्था येणार. पालकांनी अशा मुलांना "रिऍलिटी शो'मध्ये ढकलू नये.
कला कोणतीही असो, ती आत्मसात करण्यासाठी अपार मेहनत करावी लागते. त्यासाठी कष्टाळू वृत्ती मुलांमध्ये असायला हवी. ती काही उपजत नसते. "आई-बाबां'ना मुलांमध्ये ती निर्माण करावी लागते. कष्टाळू वृत्ती एकदा अंगी आली, की अपयश पचविण्याचा कसदारपणा मुलांमध्ये आपोआप निर्माण होतो. "प्रथम अपयश आणि नंतर यश' हे साधे सूत्र जरी मुलांच्या गळी उतरविले, तरी पुष्कळ आहे. परंतु "माझा मुलागा इतरांपेक्षा खूप हुशार आहे. यश घेऊनच तो जन्माला आलाय; अपयश त्याला माहीतच नाही, ' हे सांगण्याची चढाओढ सध्याच्या "आई-बाबां'मध्ये दिसते. मुलांकडे तटस्थ वृत्तीने पाहून त्यांच्यातील गुण-दुर्गुण ओळखण्याची "हिम्मत' पालकांकडे नसेल तर मुलेही तकलादू मनोवृत्तीची बनतील.
कार्यक्रमांना दोष नको
कोलकत्याच्या शिंजीनीला "अक्यूट डिसएमिनेटेड एन्सेफेलो मियालिटीज' रोग जडल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. तिच्या कमकुवत मनोवस्थेमुळे तिला जास्त त्रास झाला. शिंजीनीच्या या अवस्थेबद्दल तिच्या कुटुंबीयांनी कुणालाही जबाबदार धरले नाही; पण प्रसारमाध्यमांनी मात्र "रिऍलिटी शो' आणि त्यातील परीक्षकांना धारेवर धरले. "रिऍलिटी शो'चा हेतू विविध क्षेत्रातील दडलेले "हिरे' शोधून काढण्याचा आहे. त्यात स्पर्धा असणारच! या शोद्वारे अमाप पैसा कमावला जातो हेही मान्य; पण नव्या कलाकारांना इतके सशक्त व्यासपीठ कुठे मिळू शकणार आहे? आताच्या दिग्गज कलाकारांना असे व्यासपीठ क्वचितच मिळाले असेल! हे वास्तव प्रत्येकानेच स्वीकारायला हवे. आणि स्पर्धा कुठे नसते? घरात सकाळी उठल्यानंतर दादू आधी अंघोळ करणार की ताई, बाबांनी खाऊ आणला की बच्चे कंपनी आधी मला, आधी मला करायला लागतात. इथपासून स्पर्धा सुरू होते. मुले वर्षभर शाळेत जातात. या काळात शाळेत होणाऱ्या स्पर्धेत ते भाग घेतात. शेवटी वार्षिक परीक्षा असते. (ही सुद्धा एक स्पर्धाच नाही का? ) स्पर्धा, परीक्षांमध्ये कमी मार्क्स मिळाले, अपयश आले तर ते स्वीकारले जाते. त्यावेळी शाळा, शिक्षणसंस्था, शिक्षकांना दोष दिला जातो का, याचाही प्रत्येकाने विचार करावा. मग "रिऍलिटी शो'ला दोष का? हे शो म्हणजे नवकलाकारांच्या आयुष्याला दिशा देणारे आहेत, असा दृष्टिकोन प्रत्येकाने ठेवायला हवा. कारण या शोमध्ये यशस्वी झालेल्या अनेकांना आपल्या जीवनाचा मार्ग सापडला आहे.
----
भेट द्या : santshali.blogspot.com

मराठी सुगम संगीतातील नररत्ने! ५ दत्ता डावजेकर!

वैधानिक इशारा: ह्या अशा संकलीत लेखामुळे कुणाच्या प्रतिभासाधनेत व्यत्यय येणार असेल तर कृपया त्यांनी पुढे वाचण्याची तसदी घेऊ नये.


दत्ता डावजेकर! संगीतातले डाव जे सहज करतात.. ते डावजेकर ! सिनेमा क्षेत्रात ते डीडी ह्या नावाने ओळखले जातात. हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत पार्श्वगायिका म्हणून सर्वात प्रथम गानकोकिळा लता मंगेशकरांना पदार्पणाची संधी देणारा संगीतकार! हिंदी चित्रपट होता आपकी सेवामें आणि गाणे होते पा लागुं कर जोरी रे. तसेच मराठी चित्रपट होता माझं बाळ . डीडींनी त्यानंतर आशा मंगेशकर(भोसले), उषा मंगेशकर आणि सुधा मल्होत्रा ह्यांनाही पार्श्वगायिका म्हणून सर्वप्रथम संधी दिली.

डीडींचे वडील बाबुराव, तमाशात आणि उर्दु नाटकात तबला वाजवत असत. वडिलांबरोबर सदैव असणार्‍या डीडींनी तबला तर शिकून घेतलाच पण पेटी वादनही आत्मसात करून घेतले. इथनं मग सुरु झाली त्यांची संगीत यात्रा. तबला-पेटी वादना बरोबरच त्यांनी गाण्यांना चाली द्यायलाही सुरुवात केली. त्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका शांता आपटे ह्यांनी स्वतःच्या गायनाच्या मैफिलींसाठी डीडींना आपल्याबरोबर साथीला घेऊन सगळा उत्तर हिंदुस्थान हिंडवून आणले. इथे डीडींना मासिक २०रूपये पगार मिळत असे.

त्यानंतर डीडींनी काही वर्षे सी.रामचंद्र आणि चित्रगुप्त ह्यांचे सहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर १९४१ साली त्यांना स्वतंत्रपणे म्युनिसिपालिटी ह्या मराठी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची संधी मिळाली. लगेच १९४२ साली त्यांना सरकारी पाहुणे हा चित्रपट मिळाला. ह्यातले नाचे संगीत नटवर हे गीत खूप गाजले. त्यानंतर १९४३ साली माझं बाळ हा चित्रपट मिळाला. ह्यात लता मंगेशकरांनी पहिल्यांदाच पार्श्वगायन केले. त्यापाठोपाठ डीडींचा १९४७ साली आलेला हिंदी चित्रपट म्हणजे आप की सेवामें ज्यात लता दीदींनी पहिल्यांदाच पार्श्वगायन केले. म्हणजेच मराठी आणि हिंदी चित्रपटातले लताजींचे पहिले पार्श्वगायन पदार्पण हे डीडींच्या संगीत दिग्दर्शनात झाले हा एक मणिकांचन योग समजला जातो.

त्यानंतर आपकी अदालत हा वसंत जोगळेकरांचा चित्रपट आणि कैदी गोवलकोंडाका/प्रिझनर ऑफ गोवलकोंडा हा प्रेमनाथचा हिंदी-इंग्लीश चित्रपट केला. ह्यात त्यांनी सुधा मल्होत्रा ह्यांना पार्श्वगायनाची प्रथम संधी दिली.

दत्ता डावजेकरांनी साधारण ६०च्या वर चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले. राजा परांजपे, गजानन जागिरदार, मास्टर विनायक, दिनकर पाटील, दत्ता धर्माधिकारी, राजदत्त, राजा ठाकूर इत्यादि निर्माते-दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलेले आहे. रंगल्या रात्री अशा, पाठलाग, पाहू रे किती वाट, थोरातांची कमळा, पडछाया, चिमणराव-गुंड्याभाऊ, पेडगावचे शहाणे, जुनं ते सोनं, संथ वाहते कृष्णामाई, सुखाची सावली, वैशाख वणवा, मधुचंद्र, यशोदा इत्यादि चित्रपटातील त्यांचे संगीत विलक्षण गाजले.

डीडींनी १०-१२ नाटकांचेही संगीत दिग्दर्शन केलेले आहे. त्यापैकी थॅंक यू मिस्टर ग्लाड ह्या नाटकाला संगीत देण्यासाठी त्यांनी जर्मन संगीतही आत्मसात केले. डीडी हे जसे उत्तम संगीतकार होते तसे ते उत्तम गीतकारही होते. त्यांनी रचलेली आणि गाजलेली काही गीते अशी आहेत.
१)आली दिवाळी मंगलदायी, आनंद झाला घरोघरी- गायिका : लता मंगेशकर
२)कुणि बाई, गुणगुणले। गीत माझिया ह्रुदयी ठसले॥ -गायिका: आशा भोसले
३)गेला कुठे बाई कान्हा, कान्हा येईना। गेला कुठे माझा राजा, राजा येईना॥ - गायिका: लता मंगेशकर
४)थांबते मी रोज येथे, जी तुझ्यासाठी । बोलणे ना बोलणे रे, ते तुझ्या हाती ॥ - गायिका: आशा भोसले
५)तुज स्वप्नि पहिले रे, गोपाला ! गायिका: लता मंगेशकर

भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी हे गदिमांनी लिहिलेले पाहू रे किती वाट ह्या चित्रपटातले गीत, डीडींचे सर्वात गाजलेले गाणे म्हणता येईल. ह्या गाण्याने त्यावेळचे सगळे विक्रम मोडले होते. ह्या गाण्यामुळे मिळालेले सर्व उत्पन्न सैनिक कल्याण निधीला देण्यात आले.
डीडींची अजून काही गाजलेली गाणी अशी आहेत.
१)ऊठ शंकरा सोड समाधी-चित्रपट: पडछाया-गायिका : रेखा डावजेकर
२) अंगणी गुलमोहर फुलला- गायिका : माणिक वर्मा
३)आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही- चित्रपट: वैशाख वणवा- गायिका: सुमन कल्याणपूर
४)गोमू माहेरला जाते हो नाखवा-चित्रपट: वैशाख वणवा. गायक: पं.जितेंद्र अभिषेकी
५)गंगा आली रे अंगणी- चित्रपट:संथ वाहते कृष्णामाई
६)या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती- चित्रपट पाठलाग- गायिका: आशा भोसले
७)तुझे नि माझे इवले गोकुळ - चित्रपट: सुखाची सावली. गायक-गायिका: लता आणि हृदयनाथ मंगेशकर
८)संथ वाहते कृष्णामाई- चित्रपट: संथ वाहते कृष्णामाई- गायक: सुधीर फडके
९)रामा रघुनंदना,रामा रघुनंदना - चित्रपट: सुखाची सावली - गायिका: आशा भोसले
१०)बाई माझी करंगळी मोडली- चित्रपट: पडछाया- गायिका:आशा भोसले
डीडींची अजून कितीतरी श्रवणीय गाणी आहेत की ज्यांचा नुसता उल्लेख करायला गेलो तर पूर्ण पान भरून जाईल.
चित्रपटांच्या बरोबरीनेच डीडींनी बर्‍याच अनुबोधपटांचेही(डॉक्युमेंटरीज) संगीत,पार्श्वसंगीतही तयार केलेले आहे.

१९९२ साली डीडींनी शेवटचा चित्रपट केला. त्यानंतर ते जवळजवळ विजनवासातच गेले
वार्धक्याने डीडींच्या स्मरणशक्तीवर बराच परिणाम केलेला होता त्यामुळे शेवटच्या काळात मात्र डीडींचा चित्रपट सृष्टीशी म्हणावा तितका संबंध राहिला नाही. वयाच्या नव्वदाव्या वर्षी डीडींचे १९ सप्टेंबर २००७ रोजी त्यांच्या राहत्या घरी तीव्र हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.

आज डीडी आपल्यात त्यांच्या अजरामर चालींच्या स्वरुपात जीवंत आहेत.

सर्व माहिती,दुवे आणि छायाचित्र महाजालावरून साभार!

"चला, गाणं शिकुया, समजून घेउया!" - भाग १

राम राम मंडळी,

शीर्षक वाचून दचकलात ना? Smile

पण घाबरू नका, मी काही इथे आपल्याला गाणं शिकवण्याकरता आलेलो नाहीये कारण मी स्वत:च अजून एक विद्यार्थी आहे. आणि म्हणूनच माझ्या लेखाचं शीर्षक मी, 'चला गाणं शिकवतो, समजावतो!' असं न देता 'चला, गाणं शिकुया, समजून घेऊया!' असं दिलं आहे! Smile

असो..!

एक गोष्ट नमूद करू इच्छितो ती अशी की इथे मी गाण्यातल्या काव्याविषयी, त्याच्या चाली/संगीताविषयी न बोलता ते गाणं कश्या रितीने गायलं गेलं आहे या विषयावर बहुत करून बोलणार आहे. प्रत्येक गाण्याला एक गायकी असते. मी त्या गायकीविषयी बोलणार आहे. मला ती गायकी कशी दिसली, कुठे आवडली याबाबत माझं म्हणणं मी आपल्याशी शेयर करणार आहे. त्यामुळे कदाचित येथील काही वाचक मंडळींचा एखाद्या गाण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलूही शकेल, ती मंडळी ते गाणं अधिक चांगल्या प्रकारे, डोळसपणे एन्जॉय करू शकतील असं मला वाटतं म्हणून हा लेखनप्रपंच! एखाद्या गाण्याच्या गायकीविषयी काही गोष्टी समजून घेतल्या तर आपल्यालाच ते गाणं अधिक चांगल्या रितीने गाता येईल, ते ऐकतांना अधिक चांगल्या रितीने ऐकल्याचा आनंद मिळेल. कारण प्रत्येक मनुष्य जेव्हा गाणं ऐकत असतो तेव्हा तोही ते गाणं मनातल्या मनात गातच असतो. त्याकरता कुठे जाहीर गायलं पाहिजे असं नाही, ष्टेजशो वगैरे केले पाहिजेत असंही नाही. गाण्यासारखा दुसरा सोबती नाही, त्यामुळे एखादं गाणं समजून घेऊन स्वत:पुरतं गातांनाही मजा येते. त्यातला स्वानंद सर्वात महत्वाचा! सबब, गाण्यातली काही सौंदर्यस्थळे समजून घेऊन, जाणीवपूर्वक ते गाणं मनातल्या मनात का होईना, परंतु अधिक चांगल्या रितीने गाता यावं, गुणगुणता यावं असं वाटणार्‍यांकरता हा लेखनप्रपंच! Smile

एखादं गाणं आपल्याला का आवडतं? याची ढोबळमानाने उत्तरं द्यायची झाली तर त्या गाण्याची चाल/संगीत खूप छान असतं, संबंधित गायक/गायिकेचा आवाज खूप छान असतो, त्या गायक/गयिकेने ते गाणं खूप चांगल्या रितीने गायलेलं असतं, इत्यादी काही उत्तरे मिळतील. यापैकी आपण 'गायक/गायिकेने ते गाणं खूप चांगल्या तर्‍हेने गायलेलं असतं' या मुद्द्यावर आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत.

बाबूजी, दिदी, आशाताई इत्यादी मंडळी एखादं गाणं खूप छान गातात तसं मला गाता येत नाही. असं का बरं होतं? फक्त त्यांचा आवाज माझ्यापेक्षा कितीतरी अधिक छान असतो म्हणून? नाही, एवढं एकच कारण नक्कीच नाही. इतरही अनेक कारणं आहेत. ह्या मंडळींनी गायलेलं एखादं गाणं ऐकायला खूप छान वाटतं यामागे ह्या मंडळींचा आवाज, त्याचा पोत हे मुख्य क्वालिफिकेशन आहे/असतं हे मान्य! परंतु 'आवाज' हे एवढं एकच कारण नसतं! मुख्य मुद्दा असतो तो त्यांच्या गायकीचा. स्वर ठेवण्याच्या, स्वर लावण्याच्या पद्धतीचा. गाण्यातली अदृष्य लय अतिशय लीलया सांभाळण्याचा, संगीतकाराने त्या गाण्यात ठेवलेल्या खास खास जागांचा, शब्दांच्या उच्चारांचा!

आता पहिलं उदाहरण म्हणून आपण खूबसूरत सिनेमातलं पंचमदांनी संगीत दिलेलं आणि आशाताईंनी गायलेलं 'पिया बावरी' हे गाणं पाहू. हे माझ अतिशय आवडतं गाणं आहे. हे गाणं आपल्याला येथे ऐकता येईल व येथे पाहताही येईल. आज पहिलाच भाग आहे म्हणून आज आपण फक्त या गाण्याच्या अस्थाईबद्दल बोलू, त्यातली गायकी समजून घ्यायचा प्रयत्न करू. आज आपल्या सगळ्यांच्या गुरू आहेत या गाण्याच्या गायिका आशाताई! चला तर मंडळी. आशाताईंना मनोमन वंदन करून व्हा तैय्यार! गाणं समजून घेण्याचा हा पहिला धडा गिरवायचा आपण सगळेच प्रयत्न करू! आधी म्हटल्याप्रमाणे मीही एक विद्यार्थीच आहे तेव्हा माझंही काही चुकू शकतं. तसं काही चुकलं तर अवश्य सांगा, मला ती चूक कबूल करायला जराही संकोच वा कमीपणा वाटणार नाही! Smile

'निसागम निधप' या सरगमने या गाण्याची सुरवात होते. यात 'निसागम' हा आरोह आहे व 'निधप' हा अवरोह आहे. 'निसागम' या आरोहानंतर 'निधप' हा अवरोह आशाताईंनी किती सुरेख गायला आहे पाहा! 'नि' वरून किती सुरेख वळण घेऊन त्या 'धप' या अवरोहावर येतात ही माझ्या मते शिकण्यासारखी गोष्ट आहे!

हा सरगम पूर्ण करून लागलीच त्या 'पिया बावरी..' ही अध्ध्या त्रितालातली चीज गाऊ लागतात व अतिशय सुरेलतेने 'बावरी' शब्दातल्या 'री' वर सम घेतात. एका क्षणात त्यांची स्वर-ताल-लय यांच्यावरची हुकुमत दिसून येते व आशाताईंनी या गाण्याचा संपूर्ण ताबा घेतल्याचे आपल्या लक्षात येते!

पिया बावरी, पिया बावरी, पी कहा, पी कहा, पिया पिया बोले रे, पिया बावरी!

'पी कहा, पी कहा' हे शब्द कसे टाकले आहेत पाहा व त्यानंतर लगेच 'पिया पिया बोले रे' या शब्दांतलं लयीला धरून असलेलं चापल्य किती सुरेख आहे पाहा! चापल्य हा शब्द मी अश्याकरता वापरला की पुढे लगेच 'पिया बावरी' हे शब्द घेऊन सम गाठणं महत्वाचं आहे! 'पिया पिया बोले रे' या शब्दांनंतर 'पिया बावरी' हे शब्द घेऊन आशाताई इतक्या सुंदर रितीने समेवर येतात की अगदी ऐकत रहावसं वाटतं. तालास्वरालयीवर घट्ट पकड, कुठेही शब्दांची खेचाखेच नाही की मोडतोड नाही! इथे आपल्याला आशाताईंच्या गायकीचा आनंद मिळतो अन् मन प्रसन्न होतं! लगेच पुढच्या आवर्तनात त्यांनी 'बावरी' शब्दातल्या 'बा' वर इतकी जीवघेणी जागा घेतली आहे की की क्या केहेने! साला, दिल एकदम खुश होऊन जातो! Smile

असो,

तर मंडळी, आज प्रस्तावनेचा हा पहिलाच भाग आहे तेव्हा आपल्याला जास्त त्रास न देता इथेच थांबतो. पुढील प्रत्येक भागात आपण एखाद्या गाण्यातलं धृवपद व एखादा अंतरा यातलं सौंदर्य बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते मी माझ्या परिने शब्दात मांडण्याचा प्रयत्न करीन. बसंतच लग्न या मालिकेत मी मला आवडणार्‍या काही रागांचं सौंदर्य उलगडून दाखवायचा प्रयत्न केला आहे. तशी मला आवडणार्‍या काही गाण्यांबद्दल लिहिण्यासाठी मी ही लेखमाला सुरू करत आहे. आपल्याला आवडली, त्यातून काही चांगले विचार मिळाले तर चांगलंच आहे, नाय आवडली तर द्या सोडून...! Smile

<