मत
बीप बीप - मोबाईल फोन - शाप की वरदान?
बीप बीप - मोबाईल फोन - शाप की वरदान?
सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला मोबाईल फोन ची इतकी सवय झालेली असते कि मोबाईल आपल्याजवळ नसला किंवा आपण तो घरीच विसरलो की जणू 'हेल्पलेस' झाल्याचे फिलिंग येते. मात्र, मोबाईल ची इतकी सवय होण्या मागे तो आपल्याला कनेक्टेड ठेवतो हे तर कारण आहेच, पण त्याशिवाय त्यातील इमेल, इंटरनेट, कॅमेरा, म्युझिक प्लेयर आदी अनेक सुविधांवर आपण अवलंबून असतो.
कधी कधी मात्र मोबाईलच्या अतिरेकाने आपले नुकसान संभवते - हे नुकसान परस्पर संबंधातील गैरसमज आणि त्यातून उद्भवणारे तणाव, मोबाईलच्या अतिवापराने विनाकारण आर्थिक नुकसान आदी प्रकारचे असते, तर कधी केवळ मोबाईल असल्यामुळेच तातडीने संपर्क साधता येतो आणि कोणाचा जीव बचावतो तर कोणाची मालमत्ता संकटातून बाहेर काढता येते.
आपल्या मिपाकरांना या बाबतीत काय अनुभव आहेत? मोबाईल फोन मुळे कधी खूप नुकसान झाले तर कधी अचानक आलेल्या संकटातून बाहेर निघण्यासाठी मोबाईल चा उपयोग झाला का?
मोबाईल फोन संदर्भातले आपले अनुभव, अविस्मरणीय घटना शेअर करा...
--
इंटरनेटप्रेमी,
मुंबई, इंडिया.
कापुसकोंड्याची गोष्ट....... म्हणजे नक्की कोणती गोष्ट
.... लहानपणी आपल्यातल्या बहुतेक सगळ्यांनीच हि गोष्ट ऐकली असेल....
... जेंव्हा गोष्ट ऐकायची इच्छा व्हायची आणि घरातल्या कोणत्या तरी मामा कडे (कारण असल्या गोष्टी सांगण्यात मामा लोकांचाच उत्साह जास्त असतो) गोष्टीची फर्माईश व्हायची...तेंव्हा मामा सुरू व्हायचा...
....कापुसकोंड्याची गोष्ट सांगु का?.....मग ते पुढलं कधिही न संपणारं गुर्हाळ चालु व्हायचं...
मामा : कापुसकोंड्याची गोष्ट सांगु का?....
मी : सांग...
मामा : सांग काय म्हणतीस्....कापुसकोंड्याची गोष्ट सांगु का?
मी : सांग ना रे मामा...
मामा : मी : सांग ना रे मामा...काय म्हणतीस? .कापुसकोंड्याची गोष्ट सांगु का?
...........
.........
......
.. हे संपायचच नाही....
.....मला खरच जाणुन घ्यायची इच्छा आहे...कि कोण आहे हा कापुसकोंड्या...आणि...काय आहे त्याची ती गोष्ट?
......मि.पा.वर कोणाला माहिती असेल तर क्रुपा (हे कसं नीट लिहायचं ते ही सांगा) करा माझ्यावर..
.....नाहीतर पिंडाला कावळा शिवणार नाही हो माझ्या.....!
मिपा मोबाईलवर.?
समस्या अशी आहे की, माझ्याजवळ 'विण्डोज ६.१' मोबाईल आहे.. त्याद्वारेही मी आंतरजालाचा वापर करीत असतो.. परंतु त्यात मराठी फाँट नसल्याने मला आपली मिपाची साईट बघताच येत नाही..(सगळे चौकोन चौकोन येतात).. तरी संबंधीत तज्ञ लोकांनी मिपाची साईट ईंग्रजी फाँटमध्ये उपलब्ध आहे कि नाही याबद्द्ल मार्गदर्शन करावे..
जेम्स लेनच्या निमित्ताने उघडी पडणारी मराठी वैचारिक दिवाळखोरी
नमस्कार मिपाकरहो,
चिंतातुर जंतू यांचा हा उत्तम लेख त्यावर काही आक्षेपार्ह प्रतिसाद आल्याने आणि त्या प्रतिसादांचा त्रास मिसळपाव प्रशासनाला होऊ शकेल या शंकेतून काही काळ अप्रकाशित करण्यात आला होता. सध्या लेख प्रकाशित करून वाचनमात्र ठेवला आहे. लेखावरील आक्षेपार्ह प्रतिसाद एक एक करून अप्रकाशित केले जातील. तरीही असे प्रतिसाद राहील्यास सजग सदस्यांनी संपादकांना तसे कळवावे.
धन्यवाद,
संपादक मंडळ
जेम्स लेनच्या शिवाजीविषयीच्या पुस्तकावरची बंदी सुप्रीम कोर्टानं उठवल्यामुळे पुन्हा एकदा मराठी माध्यमं आणि जालावर त्याविषयी गदारोळ उठला आहे. या गदारोळात काही मूलभूत गोष्टींकडे सातत्यानं दुर्लक्ष होताना दिसतं आहे. हे दुर्लक्ष केवळ या एका मुद्द्यापुरतं मर्यादित नाही तर ते एका वाईट आणि अक्षम्य परंपरेच्या पायवाटेला हमरस्ता बनवणाऱ्या प्रवाहाचा भाग आहे. म्हणून सुशिक्षित समाजानं तरी त्याची दखल घेतली पाहिजे असं वाटतं. त्यासाठी हा लेखप्रपंच.
पुस्तकामागची ऐतिहासिक भूमिका:
मुळात आपल्याकडे अनेकदा असं दिसतं की एखाद्या गोष्टीवर अगदी आग्रही मतं प्रदर्शित करणाऱ्या लोकांनाही काही मुलभूत गोष्टी माहीत नसतात. असंच काहीसं या पुस्तकाच्या बाबतीत झालेलं दिसतं. इतिहास संशोधन करताना अनेक दस्तऐवजांचा वापर केला जातो. पुरावा म्हणून आधार घेतला जातो. ज्याची सत्यासत्यता अस्पष्ट आहे किंवा जी असत्यच आहेत अशी साधनंही इतिहासाचा अभ्यास करताना वापरता येतात याची जाण आपल्याकडे फारशी दिसत नाही. मिथकं आणि लोककथा यांचा वापर इतिहासात अशाच प्रकारे केला जातो. त्याची एक पध्दत आहे. त्याचे काही उपयोग आहेत. उदा. रामाविषयी उत्तरेत निर्माण झालेल्या लोककथा आणि दक्षिणेत निर्माण झालेल्या लोककथा यांचा तौलनिक अभ्यास केला तर त्यांत रामाची प्रतिमा भिन्न दिसते. रामाच्या दक्षिण विजयाविषयी जित (म्हणजे हरलेल्या) दक्षिणी लोकांचा जो विचार दिसतो, तो रामाला देव न मानता मर्त्य आणि स्खलनशील दाखवतो. किंवा, शकुंतला-दुष्यंताच्या मूळ कथेतली शकुंतला स्वाभिमानी आहे पण कालिदासाच्या नाटकात ती दुष्यंतानं आपला स्वीकार करावा यासाठी खूप झटते कारण ती कालिदासाच्या काळातल्या पुरुषप्रधान संस्कृतीनुसार वागते. अशा प्रकारे कालसापेक्ष, समाजसापेक्ष विश्लेषण करण्यासाठी लोककथांचा वापर करणं ही इतिहास संशोधनातली एक रूढ पद्धत आहे. हीच पध्दत लेन शिवाजीच्या आजूबाजूला निर्माण झालेल्या मिथकांना लावतो. या पध्दतीत काहीही गैर नाही. लेनचे निष्कर्ष चूक किंवा बरोबर ठरवण्याचं काम इतिहास संशोधकांचं आहे आणि ते त्यांना करू दिलं पाहिजे. पण त्यासाठी मुळात पुस्तक उपलब्ध होणं गरजेचं आहे.
पुस्तकातला वादग्रस्त भाग:
'शिवाजीचे खरे पिता शहाजी नसून दादोजी कोंडदेव होते, असं महाराष्ट्रात काही लोक खाजगीत (चेष्टेच्या सुरात) म्हणतात.' अशा प्रकारचं विधान लेन पुस्तकात करतो. आता दोन प्रश्न विचारावे लागतात:
१. एखादी वदंता अस्तित्वात आहे असं म्हणणं हे पुस्तकात गैरलागू आहे का? तर अजिबात नाही. कारण पुस्तकाचं स्वरूपच शिवाजीविषयीची मिथकं, आख्यायिका, लोककथा यांचा धांडोळा घेऊन त्यातून काय बोध होतो, ते पाहणं हा आहे. त्यामुळे अशा वदंतेचा उल्लेख करणं या पुस्तकाच्या एकंदर स्वरूपाशी सुसंगत आहे.
२. अशी वदंता खरंच अस्तित्वात आहे का? तर नक्कीच आहे. इतरांविषयी सांगू शकत नाही, पण पुण्यात ब्राह्मणी वातावरणात वाढलेल्या लोकांना कधीतरी असं काहीतरी कानावर येतं. उदा: दत्तो वामन पोतदार यांच्या हे (म्हणजे शिवाजीच्या पितृत्वाविषयीची कथित बाब) लक्षात आलं पण त्यांनी त्याची जाहीर वाच्यता कधी केली नाही असं माझ्या स्वत:च्या कानावर आलं होतं. त्याला आता कित्येक वर्षं लोटली. तेव्हा जेम्स लेनचं अस्तित्व आमच्या दखलपात्रही नव्हतं. त्यामुळे या वदंतेला जन्म देणारा मनुष्य लेन खचितच नाही. त्याला निव्वळ तिची वाच्यता करण्याबद्दल (आणि तेही शिवाजीविषयीच्या मिथकं/लोककथांच्या चर्चेच्या चौकटीत ती करण्याबद्दल) झोडपणं म्हणजे निरोप्याला जीवे मारण्यासारखं आहे.
लोकक्षोभ:
या पुस्तकात भावना भडकवणारं लिखाण आहे म्हणून त्यावर बंदी घालणं योग्य आहे असं एक मत दिसतं. वरचे मुद्दे वाचून हे मत पोकळ आहे असं समंजस लोकांना वाटेल अशी अशा आहे. तरीही जर भावना भडकवणाऱ्या लिखाणाचाच लेखाजोखा घ्यायचा झाला, तर सर्वप्रथम लेनला लक्ष्य बनवणार्या संभाजी ब्रिगेडची पत्रकं, पुस्तकं यांवर बंदी घालावी लागेल. कारण त्यांतलं लिखाण खूप भडक आणि प्रक्षोभक आहे. त्यात 'असं काही लोक म्हणतात' वगैरे संभ्रमाला जागा नाही. उलट अंतिम सत्य आम्हालाच कसं ठाऊक आहे असं अतिरंजित शैलीत ठणकावून सांगितलं गेलं आहे. त्या मानानं लेनचं लिखाण हे Oxford किंवा तत्सम शैक्षणिक (academic) प्रकाशनसंस्थेला पचेल असंच (म्हणजे काहींच्या भाषेत मुळमुळीत) आहे. त्याच्याशी तार्किक लढा देता येऊ शकेल कदाचित, पण त्याला रंजक वा सवंग म्हणणं कठीण आहे.
आता पुस्तकाला बाजूला ठेवून पुस्तकासंदर्भातल्या घटनांचं ऐतिहासिक विश्लेषण करायला कुणी संशोधक बसला तर त्याला काय सापडू शकेल? (हे सर्व केवळ अंदाज आहेत; हेच अंतिम सत्य आहे असा लेखकाचा अजिबात दावा नाही. मात्र, विशिष्ट काळात समाजात घडणाऱ्या काही गोष्टींना एका सुसंगत धाग्यात बांधणं शक्य होतं आहे असं जाणवतं, एवढंच.)
महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाज पुरेसा सत्ताधारी असूनही सर्वसामान्य मराठा मतदाराला त्याचा पुरेसा लाभ मिळत नसावा, कारण वरची समृद्धी तळागाळातल्या मराठा समाजापर्यंत पोहोचत नव्हती. नव्वदीच्या दशकात या काहीशा असंतुष्ट समाजाचा एक घटक काँग्रेसी पक्षांपासून दूर जाऊ लागला होता. १९९५ मध्ये भाजप-सेना युतीचा झेंडा विधान भवनावर फडकला. यामुळे काँग्रेसी मराठा नेते कदाचित असुरक्षित झाले असावेत.
अशातच एक वेगळा राजकीय प्रवाह दिसू लागला: धर्म, प्रांत, भाषा यांविषयीच्या अस्मितांना खतपाणी घालून, सर्वसामान्यांच्या भावना भडकावून त्यांद्वारे मतं मिळवता येतात याचे पुरावे नव्वदच्या दशकात अधोरेखित झाले. अशा भावना भडकलेला मतदार काही काळापुरता आपलं विदारक आर्थिक वा सामाजिक वास्तव विसरून जाऊ शकतो, हेही लक्षात येऊ लागलं.
काहीशा दुरावलेल्या मराठा मतदाराला अशीच काहीशी भूल घालून आपल्याकडे पुन्हा खेचून आणता येईल अशा आशेत मराठा नेतृत्व मराठा समाजाला भडकावता येईल अशा एखाद्या मुद्द्याच्या शोधात असावं.
एका काळापर्यंत महाराष्ट्र सरकारचे व त्या अनुषंगानं पवार यांचे लेनसारख्यांशी - म्हणजे व्यक्तिश: लेनच असं नाही, पण महाराष्ट्राविषयी काम करणाऱ्या परकीय इतिहास संशोधकांशी - चांगले घनिष्ठ संबंध होते. उदा: "House and Home in Maharashtra, New Delhi, Oxford University Press, १९९८" हे पुस्तक पाहावे. त्यात परदेशात महाराष्ट्राविषयी घडलेल्या एका चर्चासत्रातले शोधनिबंध आहेत. चर्चासत्राची सुरुवात पवारांच्या बीजभाषणानं झाली होती. म्हणजे पवार त्या चर्चासत्रात भाग घेण्यासाठी परदेशात गेले असावेत. अशा चर्चासत्रांना, यात आणि इतरत्र प्रकाशित झालेल्या अनेक संशोधकांना पवारांनी सरकारतर्फे (मुख्यमंत्री म्हणून) मदत केली होती. महाराष्ट्रावर होणाऱ्या संशोधनाशी त्यामुळे ते परिचित असावेत. लेन हा त्यांपैकी एक होता.
या पार्श्वभूमीवर भावना भडकावून राजकीय फायदा उठवता येईल असा मुद्दा म्हणून लेनचा कोलीत म्हणून वापर केला जाऊ शकतो, याची जाणीव मराठा नेतृत्वाला झाली असावी. त्यातच भांडारकर संस्था हे soft target होतं. कारण ज्याच्या भावना संस्थेवरच्या हल्ल्यानं दुखावतील आणि जो आपल्यापासून दुरावेल, असा मतदार अगदीच अल्पसंख्य होता - कारण मुळातच सुशिक्षित मतदारानं (म्हणजे आपण सर्व किंवा आपल्यापैकी बरेच जण) विचारवंतांना 'विचारजंत' म्हणून संबोधत सुशिक्षित, ज्ञानाधिष्ठित व्यवहाराला केराची टोपली दाखवली होती (हेच अजूनही चालू दिसतं).
थोडक्यात, स्वत:ला सुशिक्षित, समंजस, प्रतिष्ठित म्हणवून घेणारे आपण जेव्हा विचारवंतांना अप्रतिष्ठा दाखवतो, जगभरात रूढ असणार्या विचारपद्धतींना आणि ज्ञानशाखांना आपल्या अज्ञानापोटी कस्पटासमान मानतो, तेव्हा अशा भावना भडकावून लोकांच्या अज्ञानाचा फायदा उठवून राजकारण करणाऱ्या आणि त्यावर आपली पोळी भाजून घेणाऱ्या नेत्यांच्या हातातली आपण बाहुली बनतो. यातून आपण एक समाज म्हणून आपली वैचारिक दिवाळखोरी जगजाहीर करतो. जेम्स लेनच्या पुस्तकावरची बंदी उठवली जाण्याच्या निमित्तानं आपलंच आपल्याला जे दर्शन घडतं आहे, ते याच्याशी सुसंगतच आहे.
विदेशी दिनदर्शिकेसंबंधीत माहिती
आय टी उद्योगच नव्हे तर आजकाल सगळ्याच उद्योगांत काम करतांना बर्याचदा पाश्चात्य देशांशी संबंध येत असतो. त्या कारणाने तेथील वेळा, सण वार, सुट्या, राष्ट्रिय सण, समारंभ, स्थानिक सुट्या आदी असल्या तर त्या भारतात राहून समजत नाही. येथे अनेक सदस्य आयटी/ अन्य कारणाने भारताबाहेर वास्तव्यास आहेत. माझी एक विनंती आहे की त्यांनी त्या त्या देशातल्या वर उल्लेखिलेल्या सुट्यांचे वेळापत्रक सरकारतर्फे जाहिर झालेले वेळापत्रक म्हणा किंवा त्याशी संबंधीत संस्थळ किंवा दिनदर्शिका असेल तर ते येथे द्यावे जेणे करून येथील अनेक सदस्यांना त्याचा उपयोग होवू शकेल.
एक नेहमीचा उपयोग म्हणजे एखाद्या सदस्याला जर अमेरीकेचे संयुक्त संस्थानाशी कारभार करायचा असेल अन त्याला समजा त्या देशाचा राष्ट्रिय सण समजा परवा असेल तर तो येथे भारतात जोडून सुट्टी घेवू शकतो. त्याने त्याचे त्या दिवसाचे न केलेले कामाचा दिवस त्याच्या कार्यालयात सत्कारणी लागून कार्यालयाचे व त्याचेही वरखर्च वाचू शकतो.
मनोरंजक आकडेवारी फुटबॉल विश्वचषक (केवळ गंमत)
वेगवेगळ्या मित्रांकडून फिरत फिरत आलेली एक मेल मराठीत टंकीत करून आपल्या वाचकांसाठी देत आहे.
केवळ गंमत म्हणून या कडे पहावे.
(हा वर्ल्ड कप कुणाला द्यायचा आहे हे अगोदरच ठरले आहे का?)
===========================
विश्वचषकाचे मानकरी त्यांचे वर्ष आणि काही बेरजा
१) ब्राझील १९९४ आणि १९७० (१९७०+१९९४)=३९६४
२) अर्जेंटीना १९८६ आणि १९७८ ( १९७८+१९८६)=३९६४
३) जर्मनी १९९० आणि १९७४ (१९९०+१९७४) =३९६४
४) ब्राझील २००२ आणि १९६२ (२००२+१९६२)=३९६४
वरील आकडेवारी बघता, एक सोपी गोष्ट करा. ३९६४ मधून २०१० वजा करा. उत्तर येईल,१९५४!
१९५४ मध्ये कुणी कप घेतला होता?
जर्मनी ??????
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - ७
Reprinted with permission from EnlightenNext magazine,
© 2005 EnlightenNext, Inc. All rights reserved. www.enlightennext.org
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - १
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - २
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ३
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ४
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ५
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ६
संभाषण आणि समजणे या क्रियांचा जीवशास्त्रीय विचार ही फक्त एक सुरवात आहे. जसजसे नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होत जाईल तसतसे आपल्या मेंदूची बाकिची रहस्येपण उजेडात येतील. “Mapping of Mind” या आपल्या पुस्तकात रीटा कार्टर म्हणते “ आता काहिच वर्षांनी माणसाच्या विविध भावनांचे स्पष्टीकरण देता येईल. राग म्हणजे काय ? हिंसक म्हणजे काय ? प्रेमळ, विनोदी क्रूर, अहंकार इ. भावनांचा छडा मेंदूमधे लावणे आता शक्य होईल.”
अधुनिक तंत्रज्ञान वापरुन मेंदूच्या विविध प्रतिमा काढून त्याचा अभ्यास करून शास्त्रज्ञांना आता तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आता डोकवता येऊ शकते. कोण खोटे बोलते आहे, कोण नाटकी आहे, गुन्हा केला आहे का ? इ.इ. आणि या प्रश्नांची उत्तरे लपवता येत नाहीत कारण त्याचेही प्रतिबींब या प्रतिमांत पडते. याच मूळे बहुदा “Ethical Neuroscience” या शब्दाचा जन्म झाला असावा. एखादा माणूस वाईट वागतो किंवा चांगला वागतो असे आपण सहजच म्हणून जातो. या सगळ्या अभ्यासावरुन माणुस कसे वागायचे हे ठरवत असेल हे मानायला कठीण जाते. तो काही ठरवून करत असेल याचीच शंका आहे. जर आपल्या सर्व हालचाली, आचार विचार हे जर मेंदूमुळे होत असतील आणि मेंदूची जडणघडण ही आपले जीन्स आणि वातावरण यांच्यातील अन्योन्यक्रिया ठरवत असतील तर आपल्या इच्छेचा आणि इच्छाशक्तिचा प्रश्न येतोच कुठे? तत्वज्ञान, ज्याला हजारो वर्षांची परंपरा आहे त्याच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न मुर्खपणाचा असू शकेल. पण चेताशास्त्रामधे काम करणार्या शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की तुम्ही एखादा निर्णय जाणीवपूर्वक घेण्याअगोदरच मेंदूनी तो निर्णय घेतलेला असतो. त्यामुळे आपण निर्णय घेतो किंवा इच्छाशक्ती हाच एक मोठा भ्रम आहे हा एक वादग्रस्त विषय होण्याचा संभव नाकारता येणार नाही. कारण त्यापुढे हे सिध्द होण्याची शक्यता आहे की धर्माची आपल्या मनातली उत्पत्ती किंवा धार्मिकता ही मेंदूमधील भौतिक क्रियांचा परिणाम आहे.
मी त्या परिषदेहून परतीच्या प्रवासात घेतलेल्या टाईम्सचा अंक उघडला. तो “मन आणि शरीर” विशेषांक होता आणि त्याचा मुख्य विषय होता “आनंदाचे विज्ञानशास्त्र”. तो चाळताना जे पान मी उघडले त्यावर एका ध्यानस्थ बौध्दभिख्कूचे छायाचित्र छापले होते. त्याच्या डोक्याला अनेक विद्युताग्र लावलेले होते. ते लावत होते मानसशास्त्रज्ञ रीचर्ड डेव्हिडसन. त्यांच्या अभ्यासाचा विषय ध्यानधारणा करणार्याच्या मेंदूतील क्रिया हा आहे. नुकताच त्यांचा “आनंदाचे जीवशास्त्र” हा लेख छापून आला होता. त्या लेखात त्यांनी आध्यात्मिक अनुभव आणि मेंदू यांच्यातले नाते शोधण्याचा प्रयत्न केला आहे. याच्याही अगोदर मे २००१ मधे त्यांचा एक लेख आला होता “ परमेश्वर आणि मेंदू: आपण आध्यात्मिक अनुभवासाठी या जालामधे कसे जोडले गेलेलो आहोत” या लेखामुळेच मला यांची ओळख झाली. आता मी त्यांनाच भेटायला चाललो होतो.
न्युबर्ग, पेनसिल्वानिया मेडिकल सेंटरमधे क्ष-किरण तज्ञ म्हणून ते काम करत होते आणि त्यांनी ध्यानधारणा आणि मेंदू या विषयावर नव्वद सालात दोन पुस्तके लिहीली होती. एक होते “Mystical Mind” आणि दुसरे “Why God wont go away”. या पुस्तकामुळे त्यांना चांगलीच प्रसिध्दी मिळाली होती. या पुस्तकानंतर त्यांनी या विषयावर बरीच भाषणे दिली होती. “What the Bleep do we know” या चित्रफितीतही त्यांनी हजेरी लावली आहे. या सगळ्या भाषणांनंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि ती म्हणजे जनमानसात अध्यात्माचे मूळ आपला मेंदू आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे, तसेच ते खरे ठरेल की काय याची प्रचंड भितीही आहे.
त्यांच्या खिडकी नसलेल्या क्ष किरणांच्या प्रयोगशाळेत आम्ही प्रवेश केला तेव्हा त्यांच्या टेबलावरच्या लॅपटॉपकडे बोट दाखवून ते म्हणाले “मला तुला हे दाखवायचे होते”. त्या लॅपटॉपच्या पडद्यावर दोन मेंदूची चित्रे होती. “डावीकडची प्रतिमा ही माणूस ध्यानस्थ होण्याच्या अगोदरची आहे. उजवीकडची तो ध्यानात असतानाची आहे.” ध्यान करणारा माणूस एक अमेरीकी बौध्द होता आणि तो तिबेटच्या ध्यानपध्दतीचा अभ्यासक होता.
न्युबर्ग आणि एक्विली यांनी सुरवातीच्या संशोधनात आठ अमेरीकी बौध्दांचा आणी चर्चच्या तीन नन्सचा अभ्यास केला होता. जे बौध्द होते ते मन एकाग्र करुन ध्यान लावायच्या पध्द्तीचा अवलंब करत होते तर त्या नन्स भक्तिभावाच्या मार्गाचा अवलंब करत होत्या. या दोन्ही समूहाच्या अभ्यासाचा निष्कर्ष वेगळा असला तरी एकंदरीत तो एकाच दिशेने होता. या अभ्यासात त्यांना असे आढळून आले की ध्यान आणि प्रार्थनेच्या वेळी मेंदूच्या पुढच्या भागात बरीच हालचाल होत होती. हे त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच घडत होते. पण त्यांना अजून एक महत्वाची गोष्ट समजली. न्यबर्गने एका ठळक पिवळ्या रंगाच्या ठिपक्यावर बोट ठेवून म्हटले “ या मेंदूच्या मागच्या भागाकडे जर बघितलेस तर तुला आढळेल की ध्यानाच्या वेळी या भागात नेहमीपेक्षा कमी हालचाल दिसून आली. हा मेंदूचा भाग आपल्या स्थळकाळाच्या/स्थितीज्ञानाच्या जाणिवेचे केंद्र आहे. हे केंद्र या अवकाशातील आपल्या स्थितीबद्दल सतत माहिती घेत असते आणि आपण आणि सभोवतालचे जग यांच्यातल्या रेषा आखते. म्हणजे आपण कुठे संपतो आणि इतर जग कुठे सुरु होते याची आपल्याला सतत जाणीव करुन देत असते. ध्यानाच्या वेळी ध्यानस्थ माणसाला आपल्या व्यतीरिक्त इतर जगाचा विसर पडतो किंवा इतर जगाची त्याला जाणीव
रहात नाही ही या गोष्टीचा आणि या केंद्रामधल्या कमी हालचालींचा सबंध आपल्या अपेक्षेप्रमाणेच आहे.
थोडक्यात काय, अध्यात्मिक अनुभव किंवा साक्षात्कार इ. हे मेंदूतील त्या केंद्रातील कमी हालचालींमुळे होतो हे समजल्यावर या गोष्टींना जे अवास्तव महत्व प्राप्त झाले आहे ते आपसुकच कमी होईल. हे समजल्यावर मी त्यांना सरळच प्रश्न केला “ तुमच्या संशोधनावरुन तुम्हाला असे म्हणायचे आहे का, की आपला सगळा धार्मिक अनुभव हा मेंदूच्या एका कोपर्यातील हालचालीवर अवलंबून असतो ? हे सगळे साक्षात्कार इ. आपल्याच डोक्यात तयार होतात असे म्हणायचे आहे का तुम्हाला ?
त्यांना माझ्या या प्रश्नाची बहुतेक अपेक्षा होतीच. ते म्हणाले “असे वाटण्याचा संभव नाकारता येणार नाही. पण संशोधन आज तरी तसे म्हणते असे मी तरी म्हणणार नाही. ते एवढे सोपे नाही. हे एका सोप्या उदाहरणाने सांगायचा प्रयत्न करतो. समजा एखाद्याच्या मेंदूच्या सफरचंदाकडे बघताना प्रतिमा घेतल्या तर त्या सफरचंद पहाण्याच्या अनुभवातून जाताना मेंदूत त्या वेळेस काय घडते आहे हे मी सांगू शकतो. पण ते सफरचंद तेथे अस्तित्वात आहे किंवा नाही हे मी त्या प्रतिमांकडे बघून नाही सांगू शकत. त्याचप्रमाणे जेव्हा एखादा माणूस तो देवाच्या सानिध्यात आहे असे म्हणतो त्यावेळी त्याच्या मेंदूत कुठे काय चाललंय हे मी सांगू शकतो. पण त्या प्रतिमेकडे बघून मी तेथे खरोखर काय होतं हे मी काही सांगू शकत नाही. तो अनुभव होता, पण ज्याचा होता ते तेथे खरच होते का नाही अशा प्रश्नांची उत्तरे चेताशास्त्र देऊ शकत नाही, सध्यातरी !”
“समजा आपण पूर्णपणे भौतिक दृष्टीकोन स्विकारला आणि हे मान्य केले की आपल्याला कुठलिही जाणीव ही मेंदूमुळेच होते, म्हणजे त्याचा अर्थ, एखाद्या वस्तूचे अस्तित्व हे मेंदूच ठरवतो. पण असे गृहीत धरण्यात एक छोटाशी अडचण आहे, तो म्हणजे ज्या सर्व लोकांना गूढ अनुभव आलेले आहेत ते ठामपणे हेच सांगतात की त्यांनी जे अनुभवलेले आहे ते नेहमीच्या भौतिक सत्याएवढेच सत्य आहे. त्यांच्यावर विश्वास ठेऊन जर त्यांचे म्हणणे खरे मानले तर आपण वरती जे गृहीत धरले आहे त्याचे काय होईल?
या संभाषणाच्या ओघात न्युबर्गने हे मान्य केले की या अत्यंत महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर होय किंवा नाही असे देता येत नाही. पण त्यांनी हेही सांगितले की त्यांनी ज्या आभ्यासाचा प्रारंभ त्यांच्या तारूण्यात केला, त्या आभ्यासातच या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे. जरी त्यांच्या संशोधनातून हे सिध्द झाले की अध्यात्मिक अनुभव हा मेंदूमुळे होतो, या सिध्दांतामुळे झाली तर अध्यात्म्वाद्यांना झाली तर मदतच होईल. कारण या शोधामुळे विज्ञानाचा अध्यात्माकडे आणि तत्सम शास्त्रांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल. कदाचित असेही घडेल की अध्यात्म विज्ञालाला काही न उलगडलेली कोडी उलगडायला मदत करेल. नाहीतरी विज्ञानाच्या आत्ताच्या ज्या काही सीमा आहेत त्यात “काल्पनिक जाणीव” म्हणजे काय हा एक अनुत्तरीत प्रश्न आहेच. आपण आजही मेंदूच्या बाहेर पडून त्या पलिकडे काय आहे हे सांगू शकत नाही. अध्यात्म किंवा तत्सम शास्त्रांचे मला त्यामुळे मला अप्रूप वाटते की ते निदान त्यांच्या गूढ अनुभवातून त्याचे वर्णन करु शकतात. “त्याचे” म्हणजे चित्ताला भेदून अंतीम सत्य काय आहे या विषयी चर्चा करु शकतात. म्हणून शास्त्रज्ञांना याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. कारण सध्यातरी आपल्यापुढे हाच एक मार्ग आहे.”
“जर आपण असे समजले की सगळ्या मुळाशी वस्तू (मॅटर) आहे तर आपल्याला भौतिक जगातल्या बर्याच गोष्टींचा उलगडा होतो. पण आपले चित्त कुठून येते याचे पूर्ण उत्तर हा सिध्दांत देऊ शकत नाही. याच्या उलट आपले चित्त हेच सगळ्याच्या मुळाशी आहे ही संकल्पना स्विकारली तर मॅटरचे स्पष्टीकरण देता येणे फार कठीण आहे. मला वाटते हे दोन्ही एकाच गोष्टीकडे बघण्याचे दोन दृष्टीकोन आहेत. पण खरं सांगायचे तर आपल्याला ते अजून नीटसे माहित नाहीत.”
न्युबर्गबरोबरच्या माझ्या या मुलाखतीनंतर माझे डोळे चांगलेच उघडले. मी त्यांच्याकडे गेलो होतो ते मेंदू हाच आपल्या अनुभवांच्या मागे आहे याचे पुरावे गोळा करायला. पण झाले भलतेच. माझ्या विचारांमधे अजून एका दृष्टिकोनाची भर पडली. न्युबर्गचा या क्षेत्रातला अनुभव फार दांडगा होता. माझ्याकडे जी माहिती होती ती त्यांच्याकडे तर निश्चितच असणार, किंबहुना जास्तच असणार त्यामुळे त्यांनी जे मत व्यक्त केले त्याचा मान तर राखवाच लागणार होता. ज्याअर्थी त्यांना अध्यात्माबद्दल अजून विश्वास वाटत होता, याचाच अर्थ चेताशास्त्र म्हणते त्यापेक्षा अजून काहितरी या विश्लेषणात दडलेले आहे.
मन ही मेंदूचीच उत्पत्ती आहे हे सिध्द करण्यासाठी चेताशास्त्राने कितीही पुरावे दिले तरीही न्युबर्ग म्हणतात त्या प्रमाणे त्या शास्त्राने मेंदू ही उत्पत्ती कशी करतो याची कल्पनासुध्दा मांडलेली नाही, उत्तर तर दूरच राहिले. मन आणि शरीर यांचा प्रश्न अजून रहस्यच आहे. या क्षेत्रातल्या उर्ध्वर्यूंनी जीवशास्त्र आणि मेंदूचा अभ्यास यांच्यातल्या रिडक्शनिस्ट वृत्तीच्या विरोधात आता काम चालू केले आहे. रिडक्शनिस्ट हे एखाद्या अवघड प्रश्नाचे उत्तर शोधताना त्याचा भाग असणार्या सोप्या प्रश्नांची उत्तरे अगोदर शोधतात आणि त्याचा आधार घेत त्या अवघड प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न करतात. सोप्या केलेल्या प्रश्नांना जी तत्वे लागू पडतात ती अवघड म्हणजे मुळ प्रश्नाला लागू पडतातच असे नाही. या लोकांचे असे म्हणणे आहे की चेतनेकडे किंवा चित्ताकडे आपण ज्या नजरेने बघतो त्याचाच खरा प्रश्न आहे. या दृष्टिकोनातच मुलभूत फरक पडला तरच आपल्याला अंतीम सत्याच्या जवळपास जाता येईल. काही विचारवंत हाती असलेल्या माहितीचा उपयोग करून वेगवेगळे सिध्दांत मांडू पहात आहेत. याच वैज्ञानिक माहितीचा उपयोग करून ते प्रयोगानेच हे सिध्द करण्याच्या प्रयत्नात आहेत की वैज्ञानिकांनीच गोळा केलेल्या माहितीने हे सिध्द होत आहे की भौतिकवादाकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे नाहीत. या सगळ्या शास्त्रज्ञांमधे एक समान विचार आहे तो म्हणजे या सगळ्या यंत्रवत प्रयोगामधे आणि या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरामधे मानवाला उपयोगी असे काहितरी पाहिजे आणि दुसरे म्हणजे विज्ञानाच्या हटवादीपणाला विरोध करणे, त्यांच्यातला कर्मठपणा संपवला पाहिजे याबद्दल एक मत.
चेताशास्त्रज्ञांना सगळ्यात जास्त सकारात्मक विरोध होतो आहे तो मरणाप्रत पोहोचलेल्या अनुभवांचा अभ्यास करणार्यांकडून. इंग्रजीमधे त्याला “Near Death Experiences” असे म्हणतात. (NDE). आपणही त्याला एन्. डी. ई. असेच म्हणूया.
या क्षेत्रात काम करणार एक ख्यातनाम शास्त्रज्ञ आहेत श्री. मुडी रेमंड. पौराणीक काळापासून ते आत्तापर्यंत, आणि सर्व संस्कृतींमधे मरणाच्या वेळेस आलेल्या गूढ अनुभवांबद्दल लोक बोलत आलेले आहेत. काही ठिकाणी तर असे अनुभव लिहूनही ठेवले आहेत. माणूस मरतो म्हणजे नक्की काय होते याच्या अभ्यासात आधुनिक वैद्यकशास्त्राची फार मदत झाली आहे. कारण त्यामुळे मरणाच्या दाढेतून ओढून आणल्या गेलेल्या माणसांची संख्या वाढून अभ्यासाला ती उपलब्ध झाली. मुडी आणी त्यांच्या चमूने या क्षेत्रात ७० सालात मुहूर्तमेढ रोवली त्यानंतर बर्याच शास्त्रज्ञांनी या विषयाला वाहून घेतले आहे. सध्याच्या काळात दुरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांमुळे आपल्याला त्यांच्या मुलाखती ऐकायला मिळून त्यांच्या अनुभवांची ओळख झाली आहेच. जेव्हा जेव्हा ही माणसे मेली आहेत असे जाहीर केले जाते त्यानंतर ही माणसे असा दावा करतात की त्यांच्या शरीराच्या बाहेर पडून ते त्यांचे शरीर किंवा ती अपघाताची जागा, शस्त्रक्रियेच्या टेबलावरून बघू शकले. ज्या इतर गोष्टी ते सांगतात त्यात त्यानंतर त्यांचा प्रवास एका अंधार्या बोगद्यातून चालू झाला. त्या बोगद्याच्या शेवटी मग त्यांना त्यांचे आधीच मृत्यू पावलेले मित्र, आप्त दिसले. त्यानंतर एक दिव्य प्रकाश त्यांना त्यांच्या पूर्वायुष्याचा आढावा घ्यायला सांगतो. जवळपास सगळ्याच लोकांनी हा दिव्य प्रकाश भेटल्याचे सांगितले आहे. हा प्रकाश भेटल्यावर त्यांना आनंदाच्या, प्रेमाच्या उर्मी वर उर्मी आल्या आणि तरी सुध्दा त्यांचे मन शांत होते. त्यानंतर त्यांना शोध लागतो किंवा त्यांना त्यांच्या कानात कोणीतरी सांगते की तुमच्या मृत्यूची वेळ अजून आलेली नाही तेव्हा तुम्ही तुमच्या शरीरात परत जा. सर्वच लोकांना असा अनुभव येतो असे नाही. काही लोकांना या स्वर्गिय आनंदाऐवजी दु:खद अनुभवपण आलेले त्यांनी नमूद केलेले आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्यांना या अनुभवातून जावे लागले होते त्यांच्या व्यक्तिमत्वात फारच मुलभूत फरक पडला आणि त्यांची मृत्यूची भिती नष्ट झाली. हा फरक का पडला हे समजायला काही अवघड नाही. या असल्या अनुभवांनंतर आपल्या शरीर आणि या वास्तव जगाच्या पलिकडे आत्म्याच्या अस्तित्वाची शंका घ्यायचे काही कारण नाही असे त्यांन खात्रीपूर्वक वाटत असते. अर्थात NDEचा अभ्यास करणारे आणखी एक संशोधक श्री. फेनवीक म्हणतात “हे असले अनुभव काहीही संगत असले तरी आत्म्याचे मेंदूबाहेरील अस्तित्व त्याने सिध्द होत नाही. काय सांगावे हाही एक मेंदूचाच खेळ असू शकेल. त्याने तयार केलेला एखादा भास !” मृत्यू पावत असलेल्या मेंदूवर अभ्यास करणार्या मानसशास्त्रज्ञ श्रीमती. सुसान ब्लॅकमोर यांच्या मते हे सगळे अनुभव हे मेंदूची, तीव्र बौध्दिक ताण, टोकाची भिती आणि मेंदूला होणार्या प्राणवायूची कमतरता, यावरची प्रतिक्रिया आहे आणि प्रत्येक माणूस मरताना यातून जात असतोच."
प्राणवायूची कमतरता हे मेंदूमधे काय खेळ करू शकतात हे आपल्याला माहिती आहेच.
जयंत कुलकर्णी.
भाग ७ समाप्त.
पुढे चालू.
अवलिया को गुस्सा क्यो आता है ?
काल संध्याकाळी दुकान बंद करायला घेतले आणि तेव्हड्यात फोन वाजला. बघतो तर चौपाटीवरच्या बारच्या म्यानेजरचा फोन.
"हॅलो परा साब जल्दी आओ यार, इधर तुम्हारा दोस्त नाना राडा कर रहा है, वेटर को गालीया दे रहा है "
मी डोक्याला हात लावला आणि चौपाटीकडे धावलो. साला चौपाटीचे रंग रुपच बदलून गेले आहे आजकाल हे जाणवुन गेले. चौपाटी अजुनच झगमगायला लागली होती. ह्यावेळी चौपाटीवर तरुणाईचा उत्साह जाणवण्यागत वाढला होता, एका कडेला मोठा स्क्रीन लावुन त्यावर फुटबॉलच्या मॅचेस दाखवल्या जात होत्या. साला क्राउड एकदम खेचला गेला होता तिकडे. काही जुने चेहरे गायब होते तर काही गायब झालेले जुने चेहरे पुन्हा दिसायला लागले होते. इकडे तिकडे बघता बघता एकदाचा बार मध्ये जाउन पोचलो.
अंधारात नजर सरावली आणि एका कोपर्यात विषण्णपणे बसलेला अवलिया दिसला, बाजुलाच आमचा बारचा म्यानेजर देखील बसला होता.
"आओ सेठ, देखो ये क्या लफडा किया. वेटरने सामनेका प्लेट उठाया तो वेटर को गालिया देना लगा. बोलता है "मेरा लेख कायको उडाया?" अब गलतीसे प्लेट उठा लिया वेटरने, इतना गुस्सा कायको करनेका ? सब राडा कर दिया.
"नान्या लेका किती पेग ढोसले ? काय झालय काय तुला?" मी नाना शेजारी बसत म्हणालो. नजर खिडकी बाहेरच्या चौपाटीकडे भिरभिरतच होती.
"आपण चौपाटी सोडुन चाललो आता. आता इकडे मन नाही लागत." नाना शून्यात नजर लावुन बोलला.
"काय नाटके करतो रे नान्या ? असे झाले काय तुला ? साला इतकी वर्षे ह्या चौपाटीवर एकत्र राहिलो, दंगा केला, मजा लुटली आणि तु असा एकदम सोडून जाणार ?"
"आपली गरज नाही राहिली आता चौपाटीला परा. जरा कुठे दुकान उघडले की अतिक्रमणवाले येतात आणि सगळा माल जप्त करुन नेतात. परत का जप्त केला ते पण सांगत नाहीत. दुकान उघडायचीच चोरे झालीये आता मला."
"काय बोलतो नाना ? अरे पण इन्स्पेक्टर पाध्येंशी सेटलमेंट झाली होती ना तुझी ?"
"सोड रे ! साप म्हणावा आपला पण 'अतिक्रमणवाला' म्हणू नये आपला" नाना एका दमात पेग संपवुन मोकळा झाला.
माझी नजर अध्ये मध्ये बाहेरच भिरभिरत होती.
"पर्या भाड्या, इकडे लक्ष दे तु ! बाहेर काय फुफाटा शोधतो का आता ?" नाना वैतागला.
"नान्या यार आपला चौपाटीवरचा फुगेवाला दिसत नाही रे आजकाल ? आणि तो धनुष्यबाण विकणारा कुठे गेला?"
"खी खी खी फुगेवाला आजकाल परिस्थीतीने नाडला गेलाय. आता तो गोग्गोड म्हातारीचा कापूस विकतो." नाना डोळे मिचकावत म्हणाला.
"नान्या लेका तुझे येवढे जुने दुकान असुन माल जप्त कसे काय करतात बॉ ? मानसीक रीत्या अल्पवयीन असणार्यांची दुकाने धो धो चालतात, मग तुझ्याशी काय प्रॉब्लेम आहे ?"
"काय कळत नाही रे परा. मला म्हणतात की नाना तु चौपाटीचे वातावरण गढुळ करतोस म्हणुन" नाना अंमळ हळवा झाला असावा.
"खी खी खी मग साल्या तु तुरटी का विकायला सुरुवात करत नाही ? ते जाउदे.. तु आता सरळ जप्त न होणारा माल विकायला सुरुवात कर बरं !"
"तो काय असतो ? डिटेलमध्ये बोल."
"चल नान्या तु भी क्या याद करेगा, कागद पेन घे तुला लिस्ट देतो बनवुन !" ह्या माझ्या उच्चाराबरोबर वातावरण निवळल्याचे ओळखुन बारचा म्यानेजर टेबलावरुन ऊठला. "अबे ए, परा साब को एक कागज देनेको बोल ना जल्दी.. और साथ मै पेनभी भेज फटाफट..!" जाता जाता त्याने हुकुम सोडला.
"हा नान्या घे लिहायला..."
मालाचे नाव - मालाचा प्रकार
१) मकर राशीत शिरलेल्या शनीचा आणि कर्केत आलेल्या बुधाचा इतर राशींवर होणारा परिणाम = माहितीपुर्ण लेख.
२) अंतर्वस्त्रांचे बाह्यसौंदर्य = महितीवजा अनुभवकथन.
३) सुई-दोर्याशीवाय शर्टाला बटने कशी लावावीत = अनुभव कथन + सल्ला.
४) लवकरच लग्न होणार आहे त्यामुळे काही काळातच बायको जेंव्हा गरोदर होईल तेंव्हा तिला सरकारी दवाखान्यात अॅडमीट करावे का खाजगी ? आजकाल घरी सुईणी वगैरे येतात का ? ते कितपत सुरक्षीत असते ? = काथ्याकूट + मदत हवी आहे.
५) माझा अमेरीकेतला मित्र आणि त्याच्या बायकोचे पगारावरुन होणारे वाद = अनुभव कथन
६) माझ्या भाच्याने मला मी त्याला एक कागदी नाव करुन दाखवल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ५० कागदी पक्षी, १०० नक्षीकामे कशी करुन दाखवली, आजकालची स्मार्ट पिढी इ. इ. - अनुभवकथन + आस्वाद
७) माझ्या खोलीच्या खिडकीतुन दिसणर्या भाजीच्या स्टॉलवरील विविध रंगी आकर्षक भाज्या = कलादालन.
८) माझ्या बाथरुम मध्ये पोपडे उडालेल्या भिंतीवर पाणी पडुन निर्माण झालेले विविध मनमोहक आकार = कलादालन.
९) 'आज सकाळ मध्ये आलेली फलाना-फलाना बातमी' हि कोणी वाचली का ? अजुन किती अधोगती होणार आहे भारताची ??? = काथ्याकूट.
१०) मी संगणकाचा माऊस साफ करायला कसा शिकलो = प्रकटन + अनुभवकथन.
११) "पिपात मेले ओल्या उंदिर " ह्या कडव्यात नक्की कोणते छंद आहेत ? हि गझल आहे का कविता ? = छंदशास्त्र + काथ्याकुट.
१२) शरिराला नक्की अपायकार काय असते ? आत्ममैथुन का हस्तमैथुन ? = मदत हवी आहे.
१३) कुठल्याही चित्रपटाबद्दल १५/२० वाक्ये आणि त्याच्या अध्ये मध्ये ५/१० फोटु = चित्रपट परिक्षण.
"म्हणजे तु करतो तसे ??" नान्याचा हलकटपणा जागृत झाला...
मी काहीएक सडेतोड उत्तर देणारा येवढ्यात माझा फोन वाजला. फोनवरील संभाषण संपताच मी ताडकन उभा राहिलो.
"नान्या चल मी पळतो रे आता.."
"अरे पर्या पण लिस्ट अर्धवट राहिली ना. कुठे चालला येवढ्या घाईत ? "
"डोन्रावांचा फोन होता.. दुकानच उडवले म्हणतायत माझे....."
पाकिस्तान भारतीय ध्वज बर्याचदा उलटा लावते त्याविषयी
असे अनेकदा झालेले आहे की पाकिस्तानात काही कारणाने भारतीय ध्वज लावायचा प्रसंग आला आणि संबंधित अधिकार्यांनी तो उलटा लावला (म्हणजे हिरवा रंग वरती आणि भगवा खालती). मग माफी मागणे वगैरे होते. भारतातही ह्यावरून वितंडवाद होतो. एक बाजू म्हणते की ही एक अगदीच "किरकोळ" चूक आहे. दुसरी बाजू (उजव्या गटाचे) म्हणणार की हा देशाचा अक्षम्य अपमान आहे वगैरे वगैरे.
http://www.ndtv.com/article/india/in-minor-mistake-india-flag-upside-dow...
कुणी किती मलमपट्टी केली की केशरी रंग पावित्र्याचा, हिरवा समृद्धीचा आहे वगैरे वगैरे तरी सर्व सामान्यांना असेच वाटत आहे की भगवा हा हिंदूंचा रंग आणि हिरवा हा मुस्लिमांचा. त्यामुळे पाकच्या लोकांना आपला रंग हिंदूंच्या खाली दाखवणे पटत नाही. आणि मग अशा "किरकोळ" चुका होतच रहातात. इस्लामवर आधारित देश पाकिस्तान आपल्या धर्माच्या रंगाला दुय्यम स्थान देणे कसे स्वीकारेल? मुस्लिम धर्मात ह्याबद्दल बरेच कठोर नियम आहेत. जसे कुराणाच्या प्रतीवर इतर कुठलेही पुस्तक ठेवले तर ते पाप समजले जाते.
मला वाटते ह्याला काही उपाय नाही. भारताने ध्वज बदलला तरच ह्यावर उपाय निघेल. मुळात भारताच्या ध्वजावरील रंगांचे "अधिकृत" स्पष्टीकरण मला आजिबात पटत नाही. सगळ्या मुख्य घटकांना प्रातिनिधित्व देण्याकरताच ह्या रंगाचे पट्टे मारले आहेत असे वाटते.
तुम्हाला काय वाटते? ह्या वारंवार घडणार्या, झेंडा उलटा लावण्याच्या घटना ह्या फोपा म्हणून सोडून द्याव्यात का यावर काही उपाय संभवतो?


