मत
लग्नाचा वाढदिवस..कसा साजरा कराल...???
प्रेषक मोकाट वळू ( गुरू, 03/11/2010 - 23:41) .राम राम मन्डळी,
लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करन्यासाठि आपल्या भन्नाट कल्पना सुचवा...!!!
मुंबई - तिरुपती - चेन्नई - मुंबई
प्रेषक इंटरनेटप्रेमी ( गुरू, 03/11/2010 - 20:02) .या (2010) वर्षीच्या मे महिन्याच्या उत्तरार्धात ४-6 दिवसांचा मुंबई - तिरुपती - चेन्नई - मुंबई असा धार्मिक प्रवास योजिला आहे.
रेल्वेचे confirm आरक्षण झालेले आहे, मात्र अजून राहण्याच्या व फिरण्याच्या ठिकाणांबद्दल काही संशोधन केलेले नाही. सन्माननीय मिपाकरांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी, तिरुपती, चेन्नई येथे प्रवास करत असतानाच्या घ्यावयाच्या काळजी बद्दल माहिती दयावी.
अजून एक गोष्ट अशी की, जातानाचा प्रवास जरी ६ जणांना जरी समूहाने करायचा असला तरी वैयक्तिक कारणांमुळे माझा येतानाचा प्रवास एकट्यानेच आहे. त्यामुळे Two Tier AC ने एकट्याने रात्री २.०० ते दुसर्या दिवशी सकाळी ६.०० पर्यंत असा [रेनीगुंटा (तिरुपतीचे सर्वात नजीकचे रेल्वे स्थानक) - दादर] प्रवास करताना सुरक्षेची कोणती खबरदारी घ्यावी याचीही माहिती द्यावी.
'law and order' या विषयवरील आपले आवडते चित्रपट...
प्रेषक इंटरनेटप्रेमी ( गुरू, 03/11/2010 - 19:29) .नमस्कार,
नुकतेच Law Abiding Citizen (2009 ) आणि Presumed Innocent (1990) हे दोन चित्रपट पाहण्यात आले, दोन्ही चित्रपट सर्वच बाबतीत उत्तम आहेत. नकीच पाहावेत असे आहेत. अशा प्रकारच्या अजून काही चित्रपटांची नावे माहीत असल्यास ती येथे माहीत करून द्यावीत, अशी सर्व माननीय मिपाकरांना नम्र विनंती. त्याच बरोबर सदर चित्रपट कृष्णधवल आहे की रंगीत याचीही माहिती दयावी.
--
आपला नम्र,
इंटनेटप्रेमी.
सूर्याची सावली...
प्रेषक दिनेश५७ ( रवी, 03/07/2010 - 09:51) .राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक समर्पित प्रचारक, धुरंधर राजकारणी आणि ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी चित्रकूट येथे निधन झाले. अखेरच्या श्वासापर्यंत समाजासाठी आयुष्य वेचणार्या या महान आणि दुर्मिळ जीवनव्रतीचा कौटुंबिक जिव्हाळ्यातून उतरलेला एक सुंदर लेख 'लोकमत' मध्ये प्रसिद्ध झालाय. तो हा लेख :
सूर्याची सावली
गाढ झोपेत असतानाच अचानक फोन वाजला, आणि झोप चाळवली. इतक्या पहाटे किंवा रात्रीबेरात्री वाजणारे फोन घेणं अलीकडे मी टाळतो. पण त्या दिवशी फोन वाजताच मला जाग आली, आणि मी फोन कानाला लावला.
पलीकडे मुंबईहून माझा भाऊ होता...
'रमेश, नानाजी गेले'... एवढे तीनच शब्द तो बोलला, आणि दोन्ही बाजूंचं बोलणं जणू खुंटून गेलं. माझी झोप उडाली होती.
'काय?'... मी कसाबसा प्रश्न केला.
'आत्ता, तासाभरापूर्वी... मी आत्ताच चित्रकूटला फोनवर बोललो.' पलीकडून भाऊ म्हणाला, आणि फोन बंद झाला.
बरोब्बर पाच वर्षांपूर्वी, २००४ च्या जानेवारीत भारतात आलो असताना चित्रकूटला गेलो होतो. अमेरिकेत गेल्यापासून नानाजींशी फोनवर खूपदा बोलणं व्हायचं. त्यांचा स्वर, पूर्वीइतकाच टवटवीत वाटायचा... पण त्या प्रत्यक्ष भेटीत नानाजी थोडे थकलेले वाटले. त्याच्या आदल्या वर्षीही मुंबईला आल्यावर मी नानाजींच्या भेटीसाठी चित्रकूट गाठले होते. तेव्हा वयाच्या ८८ व्या वर्षीही ते उत्साही होते. चित्रकूटच्या आसपासच्या खेड्यांमध्ये सुरू असलेलं काम पाहायला मी निघालो, तेव्हा नानाजी दरवाजात उभे होते. वर उन्ह तळपत होतं. मी जीपमध्ये बसलो, आणि नानाजी अचानक म्हणाले, 'थांब, मीपण येतो तुझ्याबरोबर'...
मी काही म्हणेपर्यंत नानाजी गाडीतही बसले होते. चित्रकूटपासून २० किलोमीटरवरच्या एका गावातला प्रकल्प पाहताना नानाजींच्या डोळ्यातलं समाधान मला जाणवत होतं... पण त्याच्याच पुढच्या वर्षीच्या त्या भेटीत, नानाजींचं ८९ वर्षांचं शरीर फारशी साथ देत नसावं, असं मला उगीचच वाटून गेलं.
'नानाजी, तुम्ही थकलात'... मी अस्वस्थपणे बोलून गेलो.
गेल्या ३५ वर्षांतल्या थेट आणि अप्रत्यक्ष सहवासातली सगळी माया आपल्या संथ डोळ्यांनी पुन्हा माझ्यावर उधळली, आणि ते फक्त हसले.
'रमेश, आणखी पाच वर्षं मला काही होणार नाही... अजून दोन प्रकल्प पूर्ण व्हायचेत'... बसल्या जागेवरूनच दूरवर कुठेतरी पाहत नानाजी म्हणाले.
... आज नानाजी गेल्याच बातमी कळली, आणि मला नानाजींचं ते वाक्य स्पष्ट आठवलं.
मी सहज तारखेचा हिशेब केला. ...त्या संवादाला पाच वर्षं पूर्ण झाली होती.
...१९७७ सालच्या सत्तापरिवर्तनाच्या काळात अनपेक्षितपणे माझा नानाजींच्या विश्वात प्रवेश झाला. संगमनेरच्या कॉलेजातून बाहेर पडल्यानंतर मुंबईत दाखल होऊन इंडियन एक्स्प्रेसमध्ये रिपोर्टर म्हणून मी नोकरीला लागलो होतो. एका रात्रपाळीनंतर तिथल्याच टेबलावर झोपलो असताना कानाशेजारचा फोन वाजला, आणि बातमीदाराच्या 'पहिल्या व्रता'ची जाणीव होऊन मी तो उचलला.
'कोई रिपोर्टर है उधर?'... पलीकडून विचारलं गेलं.
मी त्रासलो होतो. पण उत्तर दिलं.
'हां, मै रिपोर्टर हूँ... आप कौन?'...
'मै रामनाथ गोयंका बोल रहा हूँ... उपर आओ. नानाजी देशमुख यहाँपर आये हुए है, उनका इंटरव्ह्यू करो'...
इंडियन एक्स्प्रेसच्या प्रत्यक्ष मालकाचाच आदेश ! पाचदहा मिनिटांतच मी तयार होऊन एक्स्प्रेस टॉवरच्या पेंट हाऊसमध्ये दाखल झालो.
आजपर्यंत केवळ बातमीत वाचलेले, फोटोत पाहिलेले नानाजी समोर बसलेले होते.
पुढच्या काही मिनिटांतच माझा नवखेपणा संपला. मुलाखत झाली, आणि दुसऱ्या दिवशीच्या इंडियन एक्स्प्रेस, लोकसत्तामध्ये ती प्रसिद्ध झाली.
मी घरी अंक चाळले, तेव्हा उगीचच धडधड वाढली होती.
संध्याकाळी पुन्हा रात्रपाळीला आलो, तेव्हा टेबलावर माझ्यासाठी एक चिठ्ठी होती- 'मुलाखतीबद्दल धन्यवाद, नाना देशमुख'...
नंतर पुन्हा महिनाभरानंतर वीरेन शहा यांचा फोन आला. नानाजी त्यांच्या ऑफिसमध्ये आले होते. मी त्यांना भेटायला नरीमन पॉईंटच्या मुकंद आयर्नच्या ऑफिसमध्ये पोहोचलो.
...आणि एक नवं वळण मला नानाजींच्या जवळ घेऊन गेलं.
त्या दिवशी नानाजींनी मला त्यांच्याबरोबर काम करावं असं सुचवलं, आणि मी गडबडलो.
वीरेन शहांकडे पाहिलं. त्यांचे डोळे कौतुकानं भरले होते...
'अभी सोचो मत... नानाजी अगर मुझे ड्राईव्हर बनाकर ले जाते, तो भी मै तैयार हूं'... वीरेन शहा म्हणाले, आणि माझी तयारी झाली.
दुसऱ्याच दिवशी मी दिल्लीत, 'दीनदयाळ रिसर्च इन्स्टिट्यूट'च्या भव्य इमारतीत सहाव्या मजल्यावर नानाजींच्या खोलीत भारतीय बैठकीवर त्यांच्यासोबत कामाची आखणी करत होतो.
त्या भेटीत नानाजी मला नीट उमगले. एक कौटुंबिक स्नेहाचा धागा तिथे सापडला, आणि आपण एका 'सूर्याच्या सावली'खाली आलो आहोत, या जाणिवेनं मला धन्य धन्य झालं... मी गोंडा जिल्ह्यातील नानाजींच्या प्रकल्पावर दाखल झालो. माझ्यासारखे आणखीही काही पदवीधर या प्रकल्पावर झोकून देऊन काम करत होते. प्रत्येकाला १५ लहान खेडी वाटून दिली होती. गांधीजींच्या स्वप्नातला स्वयंपूर्ण भारत निर्माण करण्याचा पहिला प्रयोग या खेड्यांमधून सुरू होणार होता.
नंतरच्या दिवसांत नानाजींची असंख्य रूपं मला फार जवळून पाहायला मिळाली.
चौधरी चरणसिंहांना सुनावणारे नानाजी, संस्थेच्या कामातले अडथळे केवळ एका फोनवर सहज दूर करणारे नानाजी, जेआरडी टाटांना आपल्या रचनात्मक कामाचं महत्त्व पटवून देणारे नानाजी, सत्तेतल्या भल्याभल्यांना खडे बोल सुनावून कापरं भरवणारे नानाजी, जयप्रकाशजींची सेवा करणारे नानाजी, राजकारणातले चाणक्य नानाजी, पोलादी पुरुष नानाजी, इंदिरा गांधींच्या नजरेतले खतरनाक नानाजी, संध्याकाळी प्रकल्पावरच्या एखाद्या गावातल्या शेतकऱ्याच्या घरात घोंगडीवर बसून स्नेहानं त्यांच्याशी गप्पा मारणारे नानाजी, आणि रात्री आपल्या खोलीत परतल्यावर जमिनीवरच्या लहानशा गादीवर पहुडताच निरागसतेने झोपी जाणारे नानाजी...
...एकदा नानाजी काही कामानिमित्त आठदहा दिवस बाहेर जाणार होते. त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी मला बोलावलं.
'रमेश, एक महत्त्वाचं काम आहे. हे पत्र तातडीने रामनरेश यादवांना मिळायला हवं. तू स्वत: ते त्यांना नेऊन दे'... पत्राची घडी पाकिटात बंद करून ते माझ्या हातात देऊन नानाजींनी सांगितलं, आणि मी मान हलवली. दुसऱ्या दिवशी पहाटेच नानाजी प्रवासाला निघाले होते.
मी उठलो, आणि लखनऊला जाण्यासाठी रेल्वे तिकीट किंवा विमानाचं बुकिंग मिळतं का याची चौकशी सुरू केली. पण त्या दिवशी रेल्वेचं पहिल्या वर्गाचं तिकीट मिळालंच नाही. विमानाचं तिकीटही मिळालं नाही.
तो दिवस तसाच गेला. नानाजींनी दिलेलं ते पत्र खिशात व्यवस्थित आहे ना, हे मात्र मी वारंवार पाहत होतो. महत्त्वाचं पत्र आहे, असं त्यांनीच सांगितलं होतं.
दोन दिवसांनंतरचं रेल्वेचं पहिल्या वर्गाचं तिकीट मिळालं, आणि मी लखनऊला गेलो. पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री रामनरेश यादव भेटलेच नाहीत. ते त्यांच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार बाहेर कुठे होते.
मी पत्र तसंच सांभाळत परतलो.
नानाजींनी परत आल्यानंतर पहिला प्रश्न मला त्या पत्राविषयीच केला, आणि मी जसं घडलं, तसं सांगून टाकलं.
तेव्हाही आपल्या संथ नजरेनं, आणि संयत स्वरांत नानाजींनी मला कामाचं महत्त्व पटवून दिलं होतं.
'आपल्यावर टाकलेली जबाबदारी पार पाडताना, पहिल्या वर्गाचा रेल्वे प्रवास किंवा विमानप्रवासाचा विचार करण्याऐवजी रेल्वेत उभ्याने प्रवास करून तू पोहोचला असतास, तर मला बरं वाटलं असतं.' एवढंच ते म्हणाले.
आणि तो प्रसंग माझ्या मनावर कायमचा कोरला गेला.
नानाजींच्या चित्रकूट प्रकल्पाची तेव्हा नुकतीच उभारणी सुरू होती.
पाच वर्षांपूर्वी मी तिथे गेलो, तेव्हा साहजिकच माझी नजर विस्फारली होती.
सकाळी चित्रकूटच्या रेल्वेस्थानकावर उतरलो. नानाजी नाश्त्याला माझी वाट पाहत थांबलेच होते.
जुन्या मंदिरालगतच्या एका जुन्याच घरात नानाजींचं कार्यालय आणि घर वसलं होतं. पाठीमागे मंदाकिनी नदीचा घाट आणि समोर गर्द पर्वतरांगा... आसपास मैलोन्मैल पसरलेला चित्रकूटचा हिरवागार चमत्कार... नानाजींच्या कर्तृत्वातून हे नंदनवन उभं राहिलं होतं. वास्तुकलेचा अप्रतिम नमुना ठरलेल्या देखण्या इमारती, हिरवाईनं तरारलेले बगीचे, संथ, आश्वस्त तलाव, कारंजी... नानाजींच्या कल्पकतेतून उभ्या राहिलेल्या या नंदनवनात नानाजींचं नाव, फोटो किंवा पुतळा कुठेही नव्हता...
एका बाजूला सुसज्ज असं आयुर्वेदिक आरोग्यधाम, दुसरीकडे विशाल भूभागावर उभं राहिलेलं उद्यमीता विद्यापीठ, ग्रामोद्योग विद्यालय, आश्रमशाला, गुरुकुल, दंतचिकित्सा इस्पितळ, ग्रंथालय, मातृसदन, गोशाळा आणि आधुनिक शेतीचे असंख्य प्रयोग अनुभवणारी शेकडो एकर शेतजमीन, उद्याने, नौकाविहार आणि चित्रकुटाचा उद्धार करणाऱ्या प्रभू रामचंद्रांचं जीवनमूल्यदर्शन घडविणारं राम दर्शन...
शेकडो एकर जमिनीवरची ही निर्मिती सामान्य माणसाच्या जीवनाला स्पर्श करणारी आहे. दीनदयाळ उपाध्यायांचा एकात्म मानववाद आणि महात्मा गांधींचं अंत्योदयाचं स्वप्न इथे हातात हात घालून एकत्र नांदतं आहे.
३५ वर्षांपूर्वी नानाजींच्या डोळ्यात दिसणारं स्वप्न इथे अवतरलेलं मी अनुभवत होतो...
त्यांच्या अथक आत्मविश्वासातून एक दिव्य काम उभं राहिलं होतं, आणि त्याचा साक्षीदार व्हायचं भाग्य मला मिळालं होतं.
... माझं लग्न ठरलं, तेव्हा नानाजींनी पालकत्वाची जबाबदारी घेतली. निमंत्रणपत्तिकेवर 'आरएसव्हीपी' म्हणून नानाजींनी स्वत:चं नाव घातलं होतं, आणि माझ्या वडिलांच्या बरोबरीने लग्नाला येणाऱ्यांचं ते आतिथ्य करत होते...
नानाजींसारखा एक सूर्य माझ्यावर सावली धरून वावरतोय, याचा मला गेली ३५ वर्षं अभिमान वाटत राहिला..
परवा ती सावली संपली.
-रमेश गुणे
लॉस एन्जलिस, कॅलिफोर्निया.
( http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/ManthanEdi... )
जीवनाश्यक गोष्टी..
प्रेषक विसोबा खेचर ( रवी, 02/28/2010 - 23:26) .राम राम मंडळी,
येथे आपापल्या जीवनावश्यक गोष्टींची यादी प्रत्येकाने देणे अपेक्षित आहे..
माझ्यापासून सुरवात करतो. आपणही अवश्य सांगा -
मधुबाला, लता, किशोरदा, यमन, भीमण्णा, बाबूजी, पुलं, कुसुमाग्रज, सचिनदा, पंचमदा, शोले, हृषिदा, गुलजार, मदनमोहन, मिसळ, मासळीचं जेवण, श्रीखंड, पान-चुना-तंबाखू...
या माझ्याकरता जीवनावश्यक गोष्टी आहेत..
आपल्याही अवश्य सांगा.. 
सर्वांना होलिकोत्सवाच्या शुभेच्छा!
तात्या.
हुसेन, हिंदू, त्यांच्या दुखावणार्या भावना आणि आमचं (अर्थात) शंकेखोर मन...
प्रेषक चिंतातुरजंतू ( शुक्र, 02/26/2010 - 18:32) .मकबूल फिदा हुसेन यांना कतारचे नागरिकत्व बहाल झाल्याने जो उत्स्फूर्त भावनांचा अविष्कार भवताल व्यापून राहिला आहे, त्यामुळे आमचे शंकाखोर मन पुन्हा उसळी खाऊ लागले. भावनाविष्काररूपी अमृताच्या मंथनातून उत्पन्न झालेल्या काही शंका:
- परकीय नागरिकत्व घेतल्याने अशा त्रासदायक, हरामी इसमाची आपसूकच आपल्या पवित्र देशातून मरेस्तोवर हकालपट्टी झाली, तर आम्हांस किंचितसा आनंद का बरे होत नाही? सभोवार इतका क्षोभ का?
- या प्रकाराने आपल्या पवित्र देशाची नालस्ती कशी होते? आम्हांस वाटले होते की ९५ वर्षांच्या वृध्दास कोठडीत डांबून तृतीय रत्न दाखविल्यास नालस्ती होण्याची शक्यता होती.
- 'भारतात अल्पसंख्याकांच्या जिवास धोका आहे' असा अपप्रचार करण्यास इस्लामी आणि मानवतावादी यांचे फावते. - यास इलाज काय? अखेर, हुसेन यांच्यावर हल्ले आपणच केले, १२५०खटले आपणच भरले, त्यांविषयीच्या हलाहलाने आंतरजाल आपणच भरले. मग आता त्याची फळे आपणच भोगायची. यांतले काहीच न होते, तर आपण इतरांस 'तुम्ही कांगावा करता' असे छातीठोकपणे म्हणू शकलो असतो. रणांगणावर गेल्यावर रक्तमांसाचा चिखल अंगावर उडताच गर्भगळित होणारे नेभळट तर आम्ही नव्हेत. आम्ही तर ही अभिमानाने मिरवण्याची बाब मानायला हवी.
- आणि मुळात आम्हांस पडलेला एक 'सनातन' प्रश्नः आमची पुराणे आणि त्यांवर आधारित आमचे अभिजात साहित्य तर देवादिकांच्या आणि ऋषीमुनींच्या चाळ्यांनी आणि त्यांच्या सुटलेल्या चळांच्या रसभरित वर्णनांनी ओतप्रोत भरले आहे. आमचे देव काही अनाघ्रात मेरीच्या पोटी जन्मास आलेल्या येशुबाळासारखे शामळू आणि पुळचट नव्हते. पुष्ट, मांसल शरीरांच्या स्त्रिया दाखवून याच देवादिकांचे चित्रण करणार्या राजा रविवर्म्याची चित्रे - उदा. ही आमची शकुंतलाआजी. आमच्या (दुष्यंत नसलेल्या) आजोबांचा हिच्यावर फार जीव! - तर आबालवृध्दांच्या नजरा निवळण्यासाठी अभिमानाने आपापल्या दिवाणखान्यांत एकेकाळी मिरवणारे आपण इतके का बरे त्रासलो? सारखे एवढ्या-तेवढ्यास हात कलम करणे, दगड फेकून मारणे असे रानटी आणि रासवट चाळे करणार्यांच्या रांगेत जाऊन बसण्यास आपण एवढे उतावीळ का बरे झालो?
असो. आता आम्ही आमच्या शंकेखोर मनास आलेला शीण हलका करण्यासाठी या संस्थळाच्या मुखपॄष्ठावरील पुष्ट, कायस्थ स्त्रीचे काही काळ आमच्या लोलुप नेत्रांनी अवलोकन करावे म्हणतो. अहो, त्यातून आमच्या पुणेरी बावन्नखणी संस्कृतीचे रक्षण होते! आता परस्त्री देवी असते, असे या जननी-जन्मभूमीत काही जण मानतात म्हणे. आशा आहे की आमच्या संस्कृतीरक्षक लोलुप अवलोकनाने अशा कायस्थ वा कायस्थेतरांच्या भावना दुखावणार नाहीत!
आपला स्नेह-(आणि बरेच काही) लोलुप,
चिंतातुर जंतू
एम एफ हुसेनांचे कतार नागरिकत्व
प्रेषक भास्कर केन्डे ( शुक्र, 02/26/2010 - 02:34) .एम एफ हुसेन या चित्रकाराच्या जीवाला म्हणे भारतामध्ये प्रचंड धोका असल्याने हे महाशय भारताबाहेर आश्रयास आहेत. अशातच या वादग्रस्त हुसेनांना कतारने नागरिकत्व देऊ केल्याच्या बातम्या द हिंदू सह टाईम्स वगैरे वर्तमानपत्रात झळकत आहेत.
भारतीय नागरिकाने इतर देशांचे वा परदेशी लोकांनी भारताचे नागरिकत्व घेण्याच्या शेकडो घटना दररोज घडत असतात. मात्र एखाद्या इसमावर त्याच्या मायदेशात जर काही खटले चालू असतील तर त्या देशाचा आदर म्हणून इतर देश त्या इसमाला नागरिकत्व न देण्याचा आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल आहे. या प्रोटोकॉलचे उल्लंघन म्हणजे दुसर्या देशाला दिलेला एक संदेश समजला जातो.
अरबी देशांत भारतीयांना सहसा नागरिकत्व दिले जात नाही. या समजा बाहेर जाऊन व आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलला डावलून कतारने ज्या इसमावर समाजाचा अपमान करणे, दंगल भडकवण्यासदृश साहित्य (चित्रे) प्रसिद्ध करणे, धार्मिक तेढ वाढवणे, सामाजिक तणाव वाढवणे अशा गंभीर अरोपांखाली अनेक खटले सुरु आहेत अशा इसमाला नागरिकत्व का दिले असावे?...
१. भारताला आम्ही जुमानत नाही. तसेच आमच्या अरब लॉबी मुळे भारत आमचे काही वाकडे करु शकत नाही असा माज.
२. भारतीय राज्यकर्त्यांकडे कणा नाही याची पूर्ण जाणीव.
३. आम्ही "सर्वच" भारतीयांना कनिष्ठ मानतो. पण काफिरांचा सर्व पातळीवर आपमान करणार्या भारतीय मुसलमानांना अरब देश भारताच्या कायद्यापासून वाचवतील असा संदेश देण्यासाठी.
४. 'भारतात अल्पसंख्यांकांच्या जीवाला धोका आहे' या पाकिस्तानी तसेच तथाकथित मानवतावाद्यांच्या लॉबींगला आकड्यांची मदत करण्यासाठी.
द हिंदूचे संपादक राम यांनी या घटनेवर टिपण्णी करताना असे म्हटले आहे की या महान चित्रकाराला आयुष्याच्या अंतिम कालखंडात मरण्यासाठी सुद्धा भारतात यायला जमत नसल्याने त्यांनी भारताचे नागरिकत्व सोडून कतारचे नागरिकत्व घ्यावे. का?
१. संपादक महोदयांना आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलची वा त्यायोगे भारताच्या होणार्या नाचक्कीची माहिती नसावी.
२. संपादक महाशयांना भारताच्या इभ्रतीपेक्षा आपल्या स्नेह्यावरील खटल्यांची जास्त काळजी असावी.
वा आणखी काही?
अशा प्रकरणांत आपल्या देशाच्या विदेश मंत्रालयाकडून आपण काही अपेक्षा करु शकतो काय?
संध्यानंद वर्तमानपत्र
प्रेषक क्षणाचा सोबती ( मंगळ, 02/23/2010 - 10:22) .पुणे आणि मुंबई येथून प्रकाशित होणारे, सर्वात जास्त किंमत असणारे, विशिष्ट वाचकवर्गात लोकप्रिय असणारे, संध्यानंद हे आगळेवेगळे वृत्तपत्र याबद्दल मला चर्चा करायची आहे.
एकूणच कुठेच या वर्तमानपत्राविषयी चर्चा होताना दिसत नाही. कुठे लिहून येत नाही.
विविध सर्वेक्षणाचे निकाल छापून त्याबद्दल उहापोह करणारे हे जगातील एकमेव वर्तमानपत्र असावे. तसेच पान नं. दोन वरचे यशस्वी कसे व्हायचे यासोबतच जीवनात कसे वागायचे याबद्दलचे लेख छान असतात. ते सकारात्मक विचारसरणी निर्माण करण्यास मदत करतात.
ज्योतिषशास्त्राबद्दलचे ही काही मुद्दे यात पान नं. ३ वर मांडलेले असतात.
आरोग्य विषयक, बॉलिवूड विषयक स्वतंत्र पान असते.
सेक्स या विषयावर सुद्धा उघडपणे चर्चा करणारे मराठीतले हे एकमेव बोल्ड, बिनधास्त वर्तमानपत्र आहे. त्याने समाजातल्या अनेक वाईट गोष्टीसुद्धा उघडकीस आणल्या आहेत.
न रुचणारे पण सत्य अशा बातम्या छापत असल्याने ते अनेकांच्या टिकेचे लक्ष्य बनले आहे असे वाटते.
भारतीय संस्कृतीचा आपण अभिमान बाळगत असलो तरी भारतातच छुपेपणाने घडणाऱ्या वाईट सत्य घटना आपल्याला यात कळतात. सत्य कडू असते. आणि म्हणून ते कदाचीत आवडत नाही, म्हणून टिका होते.
या वर्तमानपत्राविषयी आपल्याला काय वाटते? हे माझ्यासारख्या संध्यानंद च्या एका सामान्य वाचकाला जाणून घ्यायचे आहे.
PEGA म्हणजे काय?
प्रेषक गणा मास्तर ( शुक्र, 02/05/2010 - 15:31) .नमस्कार मंडळी,
फार फार काळानंतर मिपावर यायला फुरसत झाली. हाटेलं जोरात चालु आहे हे दिसतच आहे.
आता थोड कामाच. मागच्या वर्षात मंदाबाईनी सगळ्यांनाच काहीना काही धडे दिले. त्यामुळे सध्या आम्ही नवी नोकरी शोधत आहोत.
तर आम्हाला पुण्यातल्या एका कंपनीने PEGA नावाच्या सिस्टीमवर काम करण्याची ऑफर दिली आहे. PEGA हे Business Process Managementसाठीचे एक टूल आहे. नेटवरपण याची फारशी माहिती नाही. मला सापडलेले २ दुवे खाली दिले आहेत.
आपल्या मिपाकरांपैकी कोणी मला PEGA विषयी माहिती देउ शकतील काय? विशेषकरुन खालील २ प्रश्नांची उत्तरे मी शोधत आहे.
१. आजनंतर ४-५ वर्षांनी PEGA चे भविष्य काय?
२. PEGA ही C,C++,Java,。NET या पारंपारीक Languages पेक्षा कशा रोतीने वेगळी आहे.
धन्यवाद,
आपला गणा मास्तर,
(भोकरवाडी बुद्रुक)
नटरंग आणि आमचं शंके़खोर मन
प्रेषक चिंतातुरजंतू ( रवी, 01/31/2010 - 18:47) .आमचे शंकेखोर मन घेऊन आम्ही सहसा मराठी बोलपट पाहाण्यास जात नाही, कारण मनास फार (कु)शंका पडतात, आणि त्यामुळे आम्हांस फार तसदी होते, असा आमचा नित्य अनुभव आहे. तरीही मराठी भाषा-संस्कृतीवरील प्रेमापोटी आणि सर्वांच्या स्तुतिसुमनांमुळे आम्हांस मोह झाला आणि आम्ही ते धाडस अखेर केले. आता आम्हांस पडलेल्या या काही शंका...
टिप्पणी १: आम्ही करमणूकप्रधान बोलपट (उदा: गोविंदा वगैरे) पाहावयास जाताना मेंदू नावाचा आमचा अवयव नेमाने घरी ठेवून जातो, पण उपरनिर्देशित बोलपटाने पारितोषिके वगैरे मिळवून गोविंदाच्या बोलपटांहून उच्च दर्जा प्राप्त केलेला असावा, असा आमचा कयास होता, त्यामुळे आमच्या मेंदूस आम्ही बरोबर नेले. ही गलती असल्यास त्याची माफी आम्ही आधीच मागतो, पण हेही कबूल करतो, की मेंदू नेला नसता तर झाली असती, त्याहून तो नेल्याने अंमळ अधिक करमणूक झाली.
टिप्पणी २: आपण चित्रपट पाहिला नसल्यास चित्रपटात घडणारे काही कळीचे प्रसंग आपल्याला खालील मजकुरामधून कळू शकतात. त्यामुळे आपल्या जबाबदारीवर तो वाचावा.
- बोलपट नक्की कोणत्या काळात घडतो? एस. टी. सारखी दिसत राहाते, म्हणजे फार जुना नसावा. तसेच लोकांची भाषा, कपडे, तमाशातील अजय-अतुल यांचे संगीत वगैरे पाहताही असा समज होतो. पण पत्र, टेलिफोन, एस. टी. डी. बूथ वगैरे प्रकारांचा शोध लागला नसावा, असे दिसते. कारण बाप मेल्यावर महिनाभर गुणाचा कुटुंबाशी काही संपर्क नाही. सर्वसामान्यतः मनुष्यगणातील सजीव आपल्या जिवलगांपासून दूर गेल्यास त्यांची ख्याली-खुशाली पुसण्यास आणि आपली सांगण्यास उपरनिर्देशित साधनांचा उपयोग करतात, असा आमचा अनुभव आहे.
- अतुल कुलकर्णी नाच्या होण्यास तयार होतो आणि प्रत्यक्ष नाच्या बनतो, या दरम्यान नक्की किती काळ जातो? पैलवान गडी नंतर इतका हडकतो, की काही महिने दुष्काळ, उपोषण किंवा कुपोषण झाल्याचा भास होतो.
- घरंदाज स्त्रियांना तमाशात काम करण्याविषयी विचारल्यास मार पडेल, हे कळण्यास किती अक्कल लागते? तेवढीही अक्कल नसलेले पुरुष जो तमाशा उभा करतील, तो बक्कळ चालेल, यावर आमचा विश्वास बसणे अंमळ कठीण गेले.
- कोंकणस्थ स्त्रिया या आमच्या घरच्याच! तरीही गोरीघारी स्त्री फडावर नाचताना पाहून आम्हांस काही तसदी वगैरे होत नाही; तितके आम्ही प्रागतिक (किंवा निर्लज्ज, काय म्हणाल ते!) आहोत. परंतु अशा स्त्रीने ग्रामीण असल्याचे दाखवताना हेल, भाषा, हावभाव यांवर थोडे कष्ट घ्यावेत, एवढीच आमची माफक अपेक्षा होती. ते इतके का जड आहे?
- अतुल कुलकर्णी नाच्या होईस्तोवर घंटाभर उलटून गेला असावा. मुख्य कथानक तोवर सुरुच होत नाही. असे का? त्यानंतरच्या घंटाभरात मात्र शून्यापासून लोकप्रियतेच्या शिखरापर्यंतचा प्रवास, मग उत्कर्षबिंदू, मग पुन्हा शून्य आणि मग पुन्हा शिखर असा बोलपटाचा प्रवास होतो. त्यामुळे ते सर्व 'लवकर आटपा एकदाचे' अशा स्वरूपात होऊन जाते. असेही का? पहिला घंटाभर आम्ही मिशी कधी उतरेल आणि लावणी कधी सुरु होईल, याची वाट पाहिली. आम्हांस फार कंटाळा आला. इतरांस तो का येत नाही, याचा काही अदमास येत नाही. शून्यापासून शिखरापर्यंतचा दुसरा प्रवास तर दाखविलाच नाही. बहुधा तोवर बोलपटातले कलाकार आणि दस्तुरखुद्द दिग्दर्शक देखील कंटाळून गेले असावेत, असा कयास आम्ही काढला.
टिप्पणी ३: आम्ही सदाशिव पेठी. त्यामुळे वैचारिक मतभेदांची आम्हांस नको तेवढी आदत आहे. हिंसेची मात्र अजिबात आदत नाही. आमचा शंकेखोर मेंदू थोडा मागासलेला आहे, असे हे वाचून आपणांस वाटले, आणि आम्हांस झ, फ, भ वगैरे अक्षरे मिरवणार्या शिव्यांची लाखोली द्यावयाची मनीषा झाली, तर ती शक्यतो खाजगीत द्यावी, ही विनंती. आम्ही आपल्या भावना (आनंदाने नाही, पण) स्वीकारू. बाकी काही नाही, तरी आमच्या शंकांनी आपली किंचित करमणूक तरी झाली असेल, एवढीच गरिबाची आशा आहे.
- चिंतातुर जंतू 


