म्हणी

खाना खजाना

खाना खजाना
आजकाल टी व्ही वर कुठलीही चॅनेल लावली की हटकून कोणी एक बाबा किंवा बाबी झटपट स्वयंपाकाचे धडे धडाधड देतांना दिसतात. हे सारे पदार्थ सारखे सारखे पाहून काय होते, की आमच्या बीबीला बरेच इन्स्पीरेशन मिळते. तुम्ही म्हणाल, खुषनसीब आहात! वेगवेगळे पदार्थ खायला मिळत असतील!. तुमचा काही गैरसमज होण्याआधीच सांगून टाकतो. चमचमीत पदार्थ तर राहीले दूरच, पण नुसता डाळभात जरी मिळाला तरी खूप अशी स्थिती असते. (मिपावर चमचमीत पाककृतींचे फोटो असतात हे एक बरे आहे!)

टी व्ही वर इतक्या पाककृती दाखवतात, त्यातली नेमकी कोणती करायची ह्याचेच डीसीजन बीबीला घेता येत नाही. बीबीला सल्ला देण्यासाठी बाबा, बेबी सारेच पुढे सरसावतात. आणि मग काय विचारता राव! पार्लमेन्टरी गोंधळ बरा! हे करा, ते करा. ओरडाओरडी. शेवटी करायचे काहीच नाही. चूल आणि सर्वांची पोटे थंडच रहातात. आम्ही सगळे मात्र गरम होतो.

हे असे रोज चालते. एक दिवस विचार केला... नाहीतरी रोज बोलता बोलता आपण कल्पनेतच सारे पदार्थ खात असतो. तर मग बाकायदा बोलीभाषेतील पाककृतींचे धडेच का करू नये? मायबोली मराठी आणि हिन्दी पण एक समृद्ध भाषा आहे. म्हणींचा मोठा साठाच हिंदी मराठीत आहे. हा साठा वापरून मग मी एक खाना खजानाच तयार केला. माझा हा खजाना जर तुम्ही वापरलात, तर मूग गीळून गप्प बसण्याची पाळी तुमच्यावर कधीच येणार नाही. दाने दानेपे लिखा है खानेवाले का नाम ह्या न्यायाने तुमची सारी पोटपूजा यथासांग होईल. चला तर लुटू हा खाना खजाना.

काय आहे, की कुठलेही काम एकट्याने कधी करू नाही. खाना बनवण्याच्या कामात देखील एक चांगली, तरतरीत असीस्टंट हवीच. आता एक तरतरीत चवळीची शेंग अशी असीस्टंट निवडा. रेसीपी चांगली होण्यासाठी तिला आधी हरभर्‍याच्या झाडावर चढवा. जर जास्त उंचावर गेली, तर Too many cooks spoil the dinner म्हणून काहीतरी निमीत्य काढून तिला कटवा. सांगा, "जा, पी हळद आणि हो गोरी." आता ती परत येण्या आधी आपण काही रेसिपी पाहू या.

आधी मेन डीश. आपण बनवणार आहोत बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. धुतल्या तांदळासारखे चरीत्र असलेले तांदूळ घ्या. पाणी सगळ्यात चांगले म्हणजे इश्वराची करणी आणि नारळात पाणी. एका नारळातील करणी.. ओह.. पाणी काढून तांदळात टाका व खदखदा शिजवा. फ्रीज मधील शिळ्या कढीला ऊत येईपर्यंत उकळा. भाताचे छोटे छोटे गोळे करून हा बोलाचाच भात आणि मोठ्या वाडग्यात बोलाचीच कढी वाढा.

हा भात कमी पडेल असे वाटले तर भरीला करा बिरबलाची खिचडी. बाजारात तुरी आल्या असतील तर भट भटीणीला मारायच्या आधीच त्या घेऊन या. पाव किलो ये मूंग और मसूर की दाल त्यात टाका. दालमे कुछ काला असेल तर फारच छान. बिरबलाची खिचडी रंगी बेरंगी दिसेल आणि रंगाचा बेरंग होणार नाही. खिचडीला फोडणी साठी तेल कमीच लागते. म्हणून प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे पैकी दोन चमचे तेलाची बिनबुडाचे भांडे घेऊन तांदूळ, डाळ वगैरे मिश्रणाला फोडणी करा. काल खालेल्या मिठाला जागून चवीनुसार तेही घाला. शिजत असतांना उथळ पाण्याला खळखळाट फार होतो. तेव्हा अधून मधून जमीनीवर लाथ मारेन तेथून पाणी काढून पाणी घालून वाढवावे. बिरबलाची खिचडी सुर्यचुलीवर आभाळ अभ्राच्छादित असतांना शिजवली तर अप्रतीम बनते. लोक सहसा आवडीने खातात. पण कोणी खळखळ केलीच तर त्याची डाळ शिजू देऊ नका.

आता भाजी करू. एक मधम आकाराचा भ्रमाचा भोपळा घ्या. विळ्या भोपळ्याचे सख्य असल्याने, तो कापण्याच्या भानगडीत न पडता, सरळ तो भ्रमाचा भोपळा फोडा. नंतर तो अर्ध्या हळकुंडाने पिवळा करा. बायकोचे रोजचे सासुच्या डोक्यावर मिरे वाटणे झाले असेल तर ती पेस्ट बाजूला काढून ठेवा. तळण्या करता टेढी उंगलीसे घी निकालकर कढाइत टाका. एक कडू कारले साखरेत घोळा, तुपात तळा, व काप करून ठेवा. मात्र तळतांना सांभाळून! चुकून चारो उंगलीयां घीमे और सर कढाइमे टाकू नका. उगाच कारल्याची चव जाऊन भेजा खायची पाळी येईल. दोन लवंगी मिरची कोल्हापूरची घ्या. त्या चिरतांना आपले नाक वर ठेवा. नाहीतर नाकाला मिरची झोंबेल.

दोन अकलेचे कांदे घ्या. मात्र ते कादे नाकाने सोलायचे बर का! हे काम बायकांनाच चांगले जमते म्हणे. तेव्हा चवळीची शेंग असीस्टंट असली तर उत्तम, नाहीतर तुम्हालाच करावे लागेल. कांद्याचे काप करून ठेवा. सध्या जालावर खसखशीचे पीक फार आले आहे. त्याचीच फोडणी करा. फोडणी साठी थोडे वड्याचे तेल वांग्यावर टाकून घ्या. चवदार लागते. ही भाजी रटारटा शिजल्यावर चवीनुसार नावडतीचे मीठ अळणी टाका. ही झाली भ्रमाच्या भोपळ्याची भाजी तय्यार.

आता बनवू आंधळी कोशींबीर. हा पदार्थ करण्याच्या आदल्या रात्री रात्रभर जागून टीव्ही सिरीयल पाहून झोपेचे खोबरे करा व एका वाटीत काढून ठेवा. दोन मोठी गाजरे घ्या. त्यांची गाजराची पुंगी करा. ती वाजवण्याच्या भानगडीत न पडता, नुसती हाताने मोडा. नंतर लॅरी कींग स्टाईलने त्यांचा पूर्ण कीस काढा. रात्रीचे झोपेचे खोबरे त्यात मिसळा. एक कच्चे लिंबू घेऊन त्याचा रस डोळे बंद करून ह्या मिश्रणात टाकला की झाली आंधळी कोशींबीर.

आता एक नॉन व्हेज पदार्थ करून पाहूया. घरचीच सोने की अंडे देनेवाली मुर्गी घ्या. तिची सारी अंडी पिल्ली बाहेर पडण्याच्या आतच तिला सोडून द्या. कारण घरची मुर्गी दाल बराबर. म्हणून "जादा आवाज किया तर डाल दुंगा" म्हणणार्‍या भाईकडे जाऊन डाल घेऊन या. पण जपून. नाहीतर तो तुमचेच नॉन व्हेज बनवेल.

तसे तर आणखीन बरेच पदार्थ आहेत. पुणेकर करतात ती स्पेशालीटी, म्हणजे पचका वडा. झालेच तर मारक्या आयांच्या आवडीचे पाठीचे धिरडे. ते राहूच दे. ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये.

जाता जाता एक सल्ला देतो. तापल्या तव्यावर पोळ्या भाजून घ्या. भाजतांना, बॉस साठी राखून ठेवलेले लोणी लावायचे. म्हणजे तुमची पोळी पिकेल.

डिझर्ट करायचे असेल तर, शिंक्यातली फळे खाली पाडा. मग पडत्या फळांची आज्ञा घेऊन त्यांचे छोटे तुकडे कापून एका बाऊल मधे ठेवा. थोडि कोल्ह्याची द्राक्षे आंबट त्यात टाका. ह्या सगळ्या अजब पाककृती पाहून मंडळी अवाक झाली असतीलच. तेव्हा खूप बडबड करून Ice break करा आणि फळांवर पसरा. फळे जरी नाही झाली थंड तरी मंडळी नक्कीच थंड होतील.

असे हे जेवण तर मस्तच झाले. आता हे सर्व ताटात पडले काय अन वाटीत पडले काय, काहीच फरक पडत नाही. एक लक्षात ठेवा. हे सारे खातांना pinch of salt बरोबर खायचे. हो, आणि दाखवायचे वेगळे दात न वापरता, खायचे वेगळे दात वापरा. नाही तर खाई त्याला खवखवे. जेवणा नंतर मुखशुद्धीसाठी भाई कडची सुपारी वापरू नका. उगाच दुधात मिठाचा खडा पडायचा.

खवय्यांनो, हा खाना खजाना खाऊन तुमचे पोट भरले नसेल दात कोरून पोट भरण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही ह्याची खात्री आहे. मिसळपाव वर चमचमीत भंडार उघडले आहे. तिथे जा. भरपेट आस्वाद घ्या!

पुर्वप्रकाशीत, पण नंतर संपादीत.
**********************

म्हणी व वाकप्रचार यांचा उगम (२).

म्हणी आणि वाक्प्रचार ही मराठी भाषेतली आभुषणं आहेत. जे कधी कधी १० वाक्यांतूनही मांडता येत नाही ते एका म्हणीने वा वाक्प्रचाराने साधता येतं.काही म्हणींना ग्रामिण भाषेचा डौल आहे . बर्‍याच म्हणींत यमक जुळवलेली आसतात. तर काही इतक्या विनोदी पटकन ओठांवर हसु आणतात.
काही म्हणी अपभ्रंश होत होत बदलल्या गेल्या, आशाच एका बदलल्या म्हणीची कथा मागच्या भागात सांगितलिच आहे, आता ही दुसरी पाहा .....

काना मागून आली नि तिखट झाली. मुळ म्हण आहे पाना मागून आली नि तिखट झाली.

मिरचीच्या रोपाची जरा जास्त निगा राखावी लागेते, जरा पाणी जास्त झाल तर ती मरतात. त्यामुळे जेव्हा शेतकरी जेव्हा मिरचीचा रोप लावतो तेव्हा तो त्या रोपांची खुप काळजी घेतो. नियमित पाना फुलांची पाहणी करतो. त्यांची वाढ नीट होतेयना या कडे बरच लक्ष असतं. वास्तविक रोपाला आधी पानं फुलं नि सगळ्यात शेवटी फळं लागतात पण एकदा का फळं (मिरची) लागली कि मग त्यांचच कवतिक जास्त.... . तिला हातात घेउन तिचा रंग कसा आहे? आकार कसा आहे? तिला काही रोग नाहीना लागला? ईत्यादी......
त्यामुळे मागाहून आलेल्या या मिरची मुळे त्या पाना फुलांचा मात्र रागाने तिळपापड होतो.
मुळातच तिखटपणा हा मिरचीचा गुणधर्म त्यामुळे ही मिरची पाना मागून आली नि तिखट झाली.

घाटपांडे काकांनी मागच्या भागात एक म्हण दिली होती. ज्याच्यासाठी लुगडं त्येच उघडं.

माझ्या आजीच्या तोंडुन ही म्हण बऱ्याच वेळा ऐकली आहे. पुर्वी बायकांत नऊवाऱ्या साड्या नेसायच प्रमाण बरच होतं. नऊवारी म्हटल तर सगळ्यात लांब-लचक वस्त्र. पण बऱ्याच जणी ती नऊवारी आश्या विचित्र पणे घालत की पोटऱ्या सताड उघड्या. (सगळ्याच नऊवारी नेसणाऱ्या काही पोटऱ्या उघड्या टाकत नाही म्हणा उदा. : तमाश्यातल्या 'लावण्य'वती.) त्यामुळे कदाचीत ही म्हण पडली असावी.

कुर्‍हाडीचा दांडा गोतांस काळ. याची काही गोष्ट आहे का माहीत नाही. पण याची व्युत्पत्ती अशी असावी की कुर्‍हाडीचा दांडा हा लाकडाचा असतो. आणि झाड तोडतांना हाच दांडा आपल्याच गोतांवर (गणगोत = नातेवाईक) गदा आणतो.

अगं अगं म्हशी मला कुठ नेशी..
का कुणास ठाउक पण ही म्हण आठवली लाहानपणा पासून एक काल्पनीक चित्र डोळ्या पुढ उभ राहत. मस्त गावातला हिरवागार माळ आहे. माळावर म्हैशी मजेत चरतायत. तेवढ्यात एका उधळलेल्या म्हशीची शेपटी दादा कोंडकेंनी पकडली आहे. आणि ते हे वाक्य त्यांच्या तोंडी आहे.
असो तर या म्हणीची ही कथा.....

एकदा एक माणुस त्याच्या सासुरवाडिला गेला होता. तिकडे त्याचे बायको बरोबर जाम कडाक्याच भांडाण झाल. आख्खं गाव गोळा झालं. रागाच्या भरात नवरोबा बोलले कि मी परत या गावत पाय ठेवणार नाही. चार दिवस गेले, याला बायकोची आठवण यायला लागली. पण आख्या गावा समोर बोलून चुकलेला, त्यामुळे काही बाही कारणं शोधू लागला. मग त्याला एक कल्पनेची आयडिया सुचली. संध्याकाळी जेव्हा गाई गुरं माळावरून गावाकडे परतत होती तेव्हा एका म्हशीची शेपटी घट्ट पकडून तिच्या मागोमाग चालु लागला, जणू काही ती म्हैसच त्याला ओढतेय.. नि हा लागला बोंबलायला अगं अगं म्हशी........

खुप म्हणी झाल्या नै, आता ह्या वाक्प्रचाराची उत्पत्ती पाहू...

तागास तुर लागू न देणं. (लहान असताना मी ताकास तुर म्हणायचो कारण कानावर तसच पडायचं. पण आता कळल कि हे तागास आहे.)

आपला भारत हा शेतीप्रधान देश (होता?). शेतकरी खरिप आणि रब्बी पिकां बरोबरच आंतर-पिकही ध्यायचा (हल्ली हे माहिती तंत्रज्ञांचच पिक निधतय ती गोष्ट वेगळी) आता आंतर पिक म्हणजे जे मुख्य पिका बरोबर घेतल जात पण मुख्य पिकाला त्रास न होउ देता. आशी काही पिक आहेत कि जी जोडी जोडी ने घेतली तर जमिनिचा कस पण वाढतो. तर ताग आणि तुर ही आशीच एक जोडी. जर तागाच्या प्रत्येक २ फुटांच्या सरिंच्या मध्ये तुर नीट पेरली तर ही दोन्ही पिके चांगली येतात. एक कुशल शेतकरी ताकास तुर लागू देत नाही.

या वाक्प्रचाराचा भावार्थ आसा की इतक्या हुशारीने वागणं की बाजुच्याला जराही अंदाज न येउ देणं.

आकांड तांडव करणे.
हा वाक्प्रचार एकदम सरळ आहे . तांडव हे शिव-शंकरच नृत्य हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. बच्चा बच्चा जानता है. क्रोधिष्ट होउन शंकरान तांडवनृत्य केलं नि तिन्ही लोक हादरले हे आपण पुराणात वाचलय. तर आकांड तांडव करणे म्हणजे थैमान घालणे. घर डोक्यावर घेणं.
पण मग ह्या आकांडचा अर्थ काय बर? मला वाटत बहुदा ते अखंड आसाव. (शंकरान अखंड तांडवनृत्य केलं आणि तिन्ही लोक जेरिस आणले) जाणकार मंडळींनी कृपया यावर प्रकाश टाकावा..

ता. क. : लेको ह्ये मुद्दाम काथ्याकुट भागात टाकल है. आमालाबी तुम्च्या कडच्या ष्टोर्‍या सांगा की.....

शुद्धलेखन नियम,काय बदल केले पाहिजेत ?

मराठी शुद्धलेखनाची नवी नियमावली तयार करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी त्यांनी एक कृती आराखडा तयारही केल्याची बातमी वाचनात आली. १९६१ ला महामंडळाने शुद्धलेखनाची नियमावली तयार केली. सर्व नियम संस्कृत भाषेला आधार मानूनच करण्यात आले होते. आता आधुनिक काळात मराठी भाषेचा शुद्धपणा आणि मराठी भाषेच्या प्रगतीसाठी नवीन शुद्धलेखनाची नियमावलीची गरज वाटत असावी.संस्कृत भाषेतून आलेल्या शब्दांचा फेरविचार, इंग्रजी आणि हिंदी शब्दांचा अभ्यास आदी प्रमुख सूत्रे डोळ्यासमोर ठेवून नियमावली तयार करण्याचा विचार महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी बोलून दाखविला आहे. त्यांच्या आराखड्याप्रमाणे राज्याच्या विविध भागातील भाषातज्ञांची एक बैठकही झाली आहे. आता दुस-या टप्प्यात अभ्यासक, वाचक, तज्ञ, मुद्रितशोधक, यांच्याकडून सूचना मागविण्यात येत आहेत. -हस्व,दीर्घ, शब्दांसाठी कोणते नियम असावेत.लेखन उच्चारानुसार असावे का ? दंतमूलीय व्यंजनांसाठी एकच चिन्हे वापरावे का ? कोणत्या उच्चारासाठी कोणती चिन्ह असावीत; तसेच देवनागरी लिपीत काही बदल करावे का, याबद्दल सूचना अपेक्षित आहेत. त्यावर महामंडळाच्या बैठकांमध्ये सविस्तर चर्चा होईल. शिवाय मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथे मराठी शिक्षकांसाठी कार्यशाळा होणार आहेत. त्यानंतर नियमावली अंतिम करुन शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. तेव्हा शुद्धलेखनाबद्दल काही उत्तम चर्चा झाली तर सदरील चर्चेची प्रिन्ट काढून अध्यक्षापर्यंत पोहचविण्याचा आमचा मानस आहे.

सध्याचे शुद्धलेखनाचे नियम इथे पाहावेत.

सूचना:- वरील लेखनातील शुद्धलेखनाच्या चुका काढल्यास हरकत नाही, चुका व्य.नि. ने किंवा खरडीत लिहावे, म्हणजे आपल्या सूचनेनुसार त्यात बदल केले जातील.

हस्ताक्षरावरुन स्वभाव

तात्या रोशनी -४ आले

आता "हस्ताक्षरावरुन स्वभाव" याचे काय?

आपला
एक साधारण सदस्य!

रोशनी ४

तात्या रोशनी ४ भाग प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद!

तात्या रौशनी.. ..... चे काय?

तात्या रौशनी.. ..... चे काय?

तात्या रौशनी.. ..... चे काय?

तात्या रौशनी.. ..... चे काय?

तात्या रौशनी.. ..... चे काय?

तात्या रौशनी.. ..... चे काय?

अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)

ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल.

शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक.

नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच!

पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा. पण डुकरांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून त्याला आपण वराहगंधर्व म्हणूयात. कसें?

नारदमुनी म्हणाले, "नारायण, नारायण! हे वराहकुलभूषणा, इथे पृथ्वीवर काय करतोयेस?"
वराहगंधर्व: "हँ हँ, काही नाही, आपले नेहमीचेच"
नारदमुनी: "अरे पण तुझी जागा तर स्वर्गात आहे."
वराहगंधर्व: "का? स्वर्गात काय आहे?"
नारदमुनी: "अरे स्वर्गात अमृतफळे लागणारी झाडे, दुधातुपाच्या नद्या, मधूर कूजन करणारे पक्षी आहेत."
वराहगंधर्वः "मग?"
नारदमुनी: "मग तू स्वर्गात चल. यू डिझर्व बेटर."
वराहगंधर्वः "पण तिथे रस्त्याच्या कडेने वाहणारे सांडपाणी, ताजी स्वच्छ घाण मिळेल ना?"
नारदमुनी: "अरे वेड्या, स्वर्गात हे कुठे मिळणार? आणि तुला ते हवे तरी कशाला?"
वराहगंधर्वः "छे छे, मग मी स्वर्गात येऊन काय करू. मला याच गोष्टी अतिप्रिय आहेत. मला स्वर्गात यायचे नाही. लई बिल झाले. मारा डबल आणि निघा."

असो.

आपला,
(स्वर्गवासी नारदमुनी) आजानुकर्ण