कला
घारापुरी
प्रेषक प्रशु ( शनी, 03/20/2010 - 15:51) .गो नी दांचे 'कादंबरीमय शिवकाल' वाचत होतो. त्यात 'दर्या भवानी ' मध्ये उल्लेख आला 'घारापुरी' ...
द्वारकापुरी, शुर्पारक, घारापुरी, दाल्भ्य्पुरी ह्या प्राचीन सागर प्रवास मार्गातील एक...
'घारापुरी' ... मुंबईच्या इतके जवळ असुन हे ठीकाण पाहिला नाही ह्याची खंत वाटली आणि गोनींच्या शिल्प वर्णनांनी कुतुहल देखील चाळावले. लगेचच लोकसत्ते 'सीटी वाक'
च्या विनायक परबांच्या घारापुरी बद्द्ल लेख वाचला आणी ठरवले घारापुरी दर्शन करायचेच. प्र. के घाणेकरांचे 'इये महाराष्ट्र देशी' मधुन 'घारापुरीची माहिती मिळाली. मिपाकर स्वानंद ला बरोबर घेतले आणी निघालो घारापुरी बघायला. भारताच्या प्रवेशद्वाराहुन घारापुरीला जाणारी नाव पकडली, १०० रु. परतीच्या प्रवासासहित.
घारापुरीत उतरलो, १० रु देऊन छोट्या झुकझुक गाडीतुन लेण्याण्च्या पायथ्याशी पोहोचलो. खंर तर झुकझुक गाडीची काही गरजच नाही. चालत सुद्धा जाऊ शकतो आपण. दुतर्फा असलेली शोभेच्या वस्तुंची दुकाने पार करत वर लेण्यां पाशी पोहोचलो. चार पाच लेण्यांचा समुह असला तरी मुख्य शे॑व लेणंच बघण्या सारखं आहे.
हे पहा के॑लासरोहण.
शंकर पार्वती सारीपाट.
अर्धनारीनटेश्वर.
त्रिमुर्ती.. (हि ब्रम्हा, विष्णु आणि महेश नसुन, महेशाच्याच तीन रुपांची आहे.
गंगावतरण
नटराज
अश्या प्रकारे आमचे घारापुरी दर्शन सफळ संपुर्ण झाले....
मला मेघदुताचा पुढील दुवा हवा आहे.....विदग्ध वरील .
प्रेषक लालसा ( शनी, 03/20/2010 - 11:50) .http://vidagdha.wordpress.com/meghadoot_purna/
प्रस्तुत दुव्यावर मेघदुत आहे मराठी रसग्रहणासहित पण क्रमशः आहे ....
तरि यापुढिल दुवा अथवा सम्पुर्ण मेघदुतचे मराठी रसग्रहण कोणाकडे उपलब्ध असल्यास देण्याचे करावे .......
धन्यवाद!!
माझे श्रद्धास्थान.....माझ्या कुन्चल्यातुन!!![नविन ६ चित्रक्रुती : फ्रेमसह]
प्रेषक लालसा ( बुध, 03/17/2010 - 00:52) .जे जे च्या वस्तिग्रुहतील......
स्व निर्मित गणेशाचि विविध लोभस रुपे.......
विंदांकडून काय घ्यावे?
प्रेषक चिंतातुरजंतू ( सोम, 03/15/2010 - 13:54) .वक्रतुंड महाकाय गणपतीच्या
सोंडेकडे पाहून (अश्लील वाङ्मय
चोरून वाचणार्या) एका प्रमदेला
कामेच्छा झाली
तिचे दोन्ही मोदक स्तन
चट्टदिशी घट्ट धरून
वक्रतुंड महाकाय गणपतीने
तिला एकवीस वेळा आकाशात गरगर
फिरवली
आणि जेहेत्तेकालाचेठायी
श्लील नामक घोर नरकामध्ये
फेकून दिली.
दचकलात? संपादित करायला हात शिवशिवू लागले? दुखावण्यास भावना सरसावल्या? थोडे थांबा. ज्यांना श्रध्दांजली वाहायला गेल्या चोवीस तासांत शेकडो धावले असे गूगल सांगते, त्या विंदांच्या लेखणीतून ही विरुपिका उतरली आहे. विरुपाचे रूप दाखवणार्या या विरुपिकेस १९७३ साली प्रसिध्दी मिळाली आणि त्याविषयी वादही झाले. तेव्हा खुद्द विंदांनी त्याविषयी जे निरुपण केले, ते असे (अधोरेखिते आमची):
‘सत्यकथे’च्या ऑगस्ट १९७३च्या अंकात माझ्या पंधरा कविता प्रसिद्ध झाल्या. त्यातल्या काही ‘विरूपिका’ होत्या. त्यातील ‘वक्रतुंड महाकाय’ या शब्दांनी सुरू होणार्या विरूपिकेसंबंधी आपल्या समाजातील काही लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपांत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आढळल्या. प्रथम पुण्याच्या वर्तमानपत्रांत तिच्याविरुद्ध पत्रे व लेख येऊ लागले. नंतर काही जिल्हापत्रांनी तिच्याविरुद्ध अग्रलेख लिहिले. पाठोपाठ सांगली व बार्शीसारख्या शहरांतून कवीचा व संपादकांचा निषेध करणार्या सभा व मोर्चे झाले. एका नगरपालिकेने व काही महिला मंडळांनी निर्भर्त्सना करणारे ठराव पाठवले. भावे-माडगूळकरांनी अध्यक्षस्थानावरून प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त केल्या. वैयक्तिक धमकावण्या आल्या.
माझ्या पुस्तकांची होळी करण्यात आली. हे सर्व इतके जलद व पद्धतशीरपणे होत गेले की, त्या माझ्या दहा ओळींच्या कवितेतील विशिष्ट मजकुरामुळेच हे घडत आहे, यावर विश्वास ठेवणे कठीण वाटावे. या सर्व प्रकारांत प्रतिगामी राजकीय पक्षांनी पुढाकार घेतलेला आढळला. या संधीचा फायदा उठवून जनतेपासून अलग पडलेल्या प्रतिगाम्यांचा भक्तिभावनेच्या आधाराने पुन्हा एकदा जनतेशी जवळीक साधण्याचा हा एक प्रयत्न तर नव्हे?
काही असले तरी त्या कवितेच्या रूपाविषयी, तिच्यातील आशयाविषयी व तिच्या लेखामागील माझ्या हेतूविषयी काही लोकांच्या मनात गैरसमज निर्माण झाला आहे किंवा तो करून दिला जात आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्या कवितेसंबंधी माझी भूमिका संबंधित लोकांनी शांतपणे समजून घेतली तर हा सर्व विरोध अनाठायी आहे, ही गोष्ट त्यांच्या लक्षात येईल.
पहिली गोष्ट म्हणजे ‘वक्रतुंड महाकाय’ ही विरूपिका आहे; रूढ चाकोरीतील कविता नव्हे. अभिव्यक्तीचा एक नवा प्रकार शोधण्याचा हा प्रयत्न आहे. अर्वाचीन चित्रकलेत प्ररूपीकरण (अॅब्स्ट्रॅक्शन), प्रवाहीकरण (सर्रिअॅलिझम) व प्रकल्प (फँटसी) या प्रक्रिया वेगवेगळय़ा पद्धतीने प्रकट होताना आढळतात. तशाच स्वरूपाच्या बंदिश शब्दांच्या साहाय्याने निर्माण करता आली तर पाहावी, ही त्या अंगातील अनेक विरूपिका लिहिण्यामागील माझी प्रमुख प्रेरणा होती. प्रस्तुत विरूपिका ही अल्प प्रमाणात प्ररूपीकरणावर व मुख्यत: प्रकल्पावर आधारलेली आहे. वास्तवाच्या अंगाने- म्हणजे गणपती प्रत्यक्षात जसा दिसतो तशा अंगाने- तिच्याकडे पाहणे चुकीचे आहे. माझा हेतू गणपती किंवा प्रमदा यांचे यथातथ्य चित्रण करणे हा नसून, विशिष्ट प्रकारच्या प्रकल्पनातून एका व्यापक आशयाला भिडण्याचा, निदान त्या व्यापक आशयाकडे झेपावण्याचा आहे.
तो व्यापक आशय असा : जीवनाचे अंशदर्शन घेऊन त्यात रमणे हीच खरी विकृती आहे. अश्लील आणि श्लील असे द्वैत कल्पिणे म्हणजे जीवनाच्या व्यापक व एकात्म साक्षात्काराला पारखे होणे, शरीराचे अवयव सुटे-सुटे पाहिले की अभद्रता जाणवते, पण एकात्मतेने पाहिले की सौंदर्याचा प्रत्यय येतो; तसेच
जीवनाचे व कलेचेही आहे. जीवनाच्या एकात्म साक्षात्कारात अश्लील व श्लील या सुट्या कल्पनांचा कायाकल्प होतो. ही साकल्यवादी दृष्टी निकोप प्रकृतीच्या माणसामध्ये व पर्यायाने श्रेष्ठ कलाकृतीमध्ये
अभिप्रेत असते. या विरूपिकेतील ‘प्रमदा’ ही ‘अश्लील वाङ्मय चोरून वाचणारी’ आहे; त्यामुळे तिचे मन विकृत झाले आहे आणि तिचे मन विकृत आहे म्हणूनच मंगलाचे दर्शन घेत असताना ती अमंगल वासनेच्या आहारी जाते. अश्लील वाङ्मयाचा चोरटा आस्वाद घेणार्या सर्वच विकृत स्त्री-पुरुषांची ती
प्रतिनिधी आहे. अशा लोकांचे स्थित्यंतर झाले तरी अश्लीलाच्या नरकातून निघून श्लीलाच्या नरकात जाऊन
पोहोचतात : एका प्रकारच्या अंशदर्शनातून दुसर्या प्रकारच्या अंशदर्शनाकडे. फक्त निकोप वृत्तीची माणसेच
जीवनाचा व कलेचा साकल्याने व एकात्मवृत्तीने वेध घेऊ शकतात. मंगलाच्या दर्शनात अमंगल वासनेच्या आहारी जाणार्या त्या प्रमदेला गणपती शिक्षा करतो. तिला श्लीलाच्या नरकात फेकतो. ते करीत असताना त्याच्या मनात तिच्या स्तनांविषयी कोणतीही अमंगल भावना नसते. हे सूचित करण्यासाठीच ‘मोदक’ हा शब्द स्तनांच्या उल्लेखामागे आहे. या मोदकाशी संबंधित असलेली भावनेची छटा पावित्र्याची आहे, नैवेद्याची आहे. हे सूचित व्हावे, यासाठी पुढे वेगळ्या संबंधांत ‘एकवीस’ हा शब्द
मुद्दाम योजलेला आहे. कारण नैवेद्य एकवीस मोदकांचा असतो. ‘जेहेत्तेकालाचेठायी’ या शब्दांनी हे सर्व चित्रण प्रकल्पनाच्या पातळीवरचे आहे, वास्तवाच्या पातळीवरचे नाही, ही गोष्ट पुन्हा एकदा सूचित केली आहे. कारण हरदासी कथेमध्ये अशक्यप्राय घटनांना त्या शब्दांनी उठाव दिलेला असतो. सारांश, या विरूपिकेचा आशय विकृतीचे खंडन करणारा आहे; विकृतीचे मंडन करणारा नाही व तिच्या लेखनामागील हेतू कोणत्याही प्रकारे गणपतीची (अप्रतिष्ठा करणे नसून - आमचा अंदाज; मूळ शब्द उपलब्ध नाहीत) नेमका उलट आहे : गणपतीचे मंगल स्वरूप गृहीत धरल्यामुळे कवीने त्याला अमंगलाचा निखंदक म्हणून उभा केला आहे.
पण मी गणपतीच का निवडला? गणपतीची बीजकथा (मिथ) ही विरूपिकेतील आशयाच्या दृष्टीने अधिक अर्थपूर्ण वाटली म्हणून. या विशिष्ट काव्यप्रकाराला मी विरूपिका म्हणत होतो आणि गणपतीला आपल्या परंपरेत कुठे तरी ‘विरूपांचा विरूप’ म्हटले गेल्याचे स्मरत होते. शिवाय या लिखाणात अर्थाचे उलटसुलट पलटे होते; म्हणून परस्परविरुद्ध अर्थाच्या कक्षा सूचित करील अशी बीजकथा मला हवी होती. गणपतीची बीजकथा त्या अर्थाने संदर्भ-श्रीमंत होती. गणपती हा आर्यांचा होता, तसाच अनार्यांचा होता; वैदिकांचा होता, तसाच व्रात्यांचा होता. ऋग्वेदातील अभ्युदयेच्छू ऋषी त्याला ‘गणनांत्त्र गणपती’ व ‘कवि कवींनां’ म्हणत होते, तर यजुर्वेदातील गमेंच्छु स्त्रिया त्याला ‘आत्वं अजासि गर्भधं’ असे आवाहन करीत होत्या. एका बाजूने तो कुलप्रतिकाशी (टोटम) संबंधित, तर दुस-या बाजूने आदिम साम्यवादी गणराज्याशी, स्मृतिकारांचा गणपती बुद्धिहर्ता व विघ्नकर्ता तर पुराणांचा गणपती बुद्धिदाता व विघ्नहर्ता. तांत्रिकांचा वामाचारी, तर संतांचा मूर्तिमंत मांगल्य. पार्वतीने आपल्या अंगावरील मळातून या मंगलमूर्तीची निर्मिती केली. या एका आख्यायिकेतच जणू काय गणपतीच्या आयुष्यातील सर्व संक्रमणे सूचित होऊन जातात. शिवाय गणपतीची बीजकथा अजून पूर्णपणे गोठलेली नाही; सार्वजनिक गणपती अजूनही वाटल्यास गांधी टोपी घालू शकतो! म्हणूनच या गणपतीच्या आधारे काव्यात्म प्रकल्पनाचे आवश्यक ते स्वातंत्र्य व श्लील-अश्लीलाला छेद देणारे मांगल्याचे तत्त्वसूचन ही दोन्हीही मला साधता आली. शिवाय, अशी गोष्ट मी या कवितेत प्रथमच केली असेही नव्हे. विनोदी अंगाने माझ्या काही बालगीतांत व गंभीर अंगाने
‘हिमयोग’सारख्या माझ्या कवितेत हा गणपती पूर्वीही आलेला आहे. नवकाव्याला समृद्ध करणार्या अनेक मार्गांपैकी प्राचीन बीजकथांचा व प्रतीकांचा सृजनशील उपयोग हा एक प्रभावी मार्ग आहे, असे मी नेहमीच मानीत आलो आहे. या बीजकथांतील शब्दांचा वेध रूढ चाकोरीतून घेतल्यास ज्या गफलती होतात, त्याचेच हे प्रकरण म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे.
काव्याचा सूक्ष्म विचार करण्याची सवय व सवड नसलेल्या सामान्य नागरिकाला या वेगळ्या रीतीने शब्दवेध घेणे थोडेफार कठीण जात असेल, याची मला कल्पना आहे. त्यामुळेच प्रतिगाम्यांना माझ्याविषयी, संपादकांविषयी व त्या कवितेविषयी गैरसमज पसरविणे शक्य झाले असावे. ते गैरसमज दूर व्हावेत, या हेतूनेच हे सर्व लिहीत आहे. गणपती हा माझ्याही सांस्कृतिक वारशाचा एक अभिन्न भाग आहे; गणपतीच्या परंपराप्राप्त कथा, अष्टविनायकांच्या व इतर शिल्पांमधून त्याचा आढळणारा रूपविलास व त्याच्या वास्तव रूपाशी संबंध असलेली प्रतीकात्मकता, ही सर्व मलाही इतर भारतीयांइतकीच प्रिय आहेत. ‘वक्रतुंड महाकाय’ ही विरूपिका लिहिताना माझ्या मनात गणपतीची अप्रतिष्ठा करावी किंवा सश्रद्ध माणसांच्या भावना दुखवाव्या, असा पोरकट हेतू बिलकूल नव्हता; माझा हेतू, व्यापक व एकात्म अशा गंभीर जीवनदृष्टीकडे अंगुलिनिर्देश करणारा एक गमतीचा व वेगळा आकृतिबंध निर्माण करावा, एवढाच होता.
विरूपिकेची व्याख्या काय असे कुणी विचारले तर त्याचे उत्तर सध्या तरी माझ्याजवळ नाही. कोणताही नवा काव्यप्रकार आपली व्याख्या ठरवून जन्माला येत नाही; ते एक स्फुरण असते. विकसनाच्या व बहुरूपत्वाच्या अनेक शक्यता त्यात सामावलेल्या असतात. हळूहळू त्या प्रगट होत जातात आणि त्यानंतर समीक्षेच्या दृष्टीने सोयीची वाटणारी अशी त्याची व्याख्याही घडविली जाऊ लागते; पण ती व्याख्यासुद्धा कामचलावू, कार्यकारी व्याख्याच असते, हे विसरता कामा नये. ती अपरिवर्तनीय नसते. कोणत्याही काव्यप्रकाराची तर्कशुद्ध व्याख्या ही गोष्ट तर्कदृष्ट्याच असंभवनीय आहे. कारण स्वत:ची ओळख पटविण्याइतपत साकल्याधिष्ठित स्वत्व (आयडेंटिटी) त्याच्याजवळ कमी-जास्त प्रमाणात असले, तरी एखदा प्राणभूत गुणधर्म अथवा सत्त्व (इसेन्स) किंवा फक्त त्याचे असे व्यवच्छेदक लक्षण (डिफट्रिया) त्याच्याजवळ नसते.
(गो. वि. ऊर्फ विंदा करंदीकर यांच्या, ‘परंपरा आणि नवता’ या ग्रंथातून साभार)
आता वाचकांनी यातून काय बोध घ्यावा? अनेक शक्यता आहेत, जसे:
- थोडे आधी सांगायचे; यांनाही कतारला पाठवले असते.
- शेवटी यांचेही पाय (कोंकणांतल्या फोकलिच्यांनी कुले असे वाचावे) मातीचेच निघाले. (कडवे डावे) विचारवंत कडू ते कडूच, ज्ञानपीठात तळा किंवा लोकप्रियतेत घोळवा.
- ते हिंदू आहेत; त्यांना असे म्हणण्याचा हक्क आहे. (नास्तिक असले म्हणून काय झाले?)
- आम्हांस ऋषितुल्य असलेल्या विंदांविषयी ते मेल्यावर असे वाईटसाईट पसरवणार्यासच चोपला पाहिजे. सूचना: आम्ही हे प्रहारमधून उचलले, त्यामुळे आधी नारायण राण्यांस चोपा. आम्हांस आनंदच होईल
- विंदा काय बोलले काही कळत नाही ब्वॉ. जाऊदेत आपण आपले मेलेल्यास नमस्कार करून मोकळे व्हावे, हे बरे.
'law and order' या विषयवरील आपले आवडते चित्रपट...
प्रेषक इंटरनेटप्रेमी ( गुरू, 03/11/2010 - 19:29) .नमस्कार,
नुकतेच Law Abiding Citizen (2009 ) आणि Presumed Innocent (1990) हे दोन चित्रपट पाहण्यात आले, दोन्ही चित्रपट सर्वच बाबतीत उत्तम आहेत. नकीच पाहावेत असे आहेत. अशा प्रकारच्या अजून काही चित्रपटांची नावे माहीत असल्यास ती येथे माहीत करून द्यावीत, अशी सर्व माननीय मिपाकरांना नम्र विनंती. त्याच बरोबर सदर चित्रपट कृष्णधवल आहे की रंगीत याचीही माहिती दयावी.
--
आपला नम्र,
इंटनेटप्रेमी.
शब्दबंध २०१०
प्रेषक बेसनलाडू ( बुध, 03/10/2010 - 10:21) .२००८ व २००९ या दोन्ही वर्षी 'शब्दबंध' या आंतरजालीय जालनिशीकारांच्या उपक्रमात सहभागी झालो होतो. आता या वर्षीच्या 'शब्दबंध'चे वारे वाहू लागले आहेत. त्या संबंधीची 'शब्दबंध'च्या अधिकृत जालनिशीवरील उद्घोषणा इच्छुकांच्या अधिक माहितीसाठी येथे डकवत आहे.
===========================================================================
२००८ मधे १० लोकांनी साकारलेल्या शब्दबंधने मागच्या वर्षी २९ लोकाना सामावून घेतलं! मराठी ब्लॉगर्सच्या या जागतीक ई-सभेचे आयोजन आपण याही वर्षी दिमाखात करणार आहोत. मित्रहो तारखांची नोंद करा - ५ आणि ६ जुन २०१०!
परत एकदा आपण सर्वजण या सभेत भेटायचंय. काही नवे तर काही जुने शब्दबंधी घेऊन यायचंय. जिथे आहात तिथून, थेट सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचायचंय. परत एकदा सर्व हौशी मराठी ब्लॉगर्सना त्यांचं लिखाण त्यांच्या थाटात व्यक्त करण्यासाठी हे खास व्यासपीठ सजवायचंय.
मागील वेळेसारखेच, मराठीमध्ये १०० % स्वतःचं लेखन असलेला किमान एक ब्लॉग असलेल्या कुठल्याही ब्लॉगकाराला यात सहभागी होता येईल. या सभेची व्याप्ती अधिकाधिक वाढवणे आणि अधिकाधिक मराठी ब्लॉगर्सना त्यांनी लिहिलेल्या, त्याना आवडणाऱ्या, आणि त्यांच्या लिखाणाचं वाचन करण्यासाठी ई-व्यासपीठ ऊपलब्ध करून देणे हा यावेळीही हेतू आहे. मराठीमधलं लिखाण हा एकच समान दुवा पकडून आपण सर्वजण एकत्र येणार आहोत. प्रवास वर्णनं, अनुभव, कथा, कविता, व्यक्तीचित्रं, लघुनिबंध, तंत्रज्ञान आणि अशाच कित्येक छटांनी सजलेल्या मराठी ब्लॉगविश्वाची छोटीशी झलक आपल्याला या सभेमधे साकार करायचीये. तेही अनौपचारीक पद्धतीने.
सर्वसाधारणतः या सभेचं स्वरूप असं असेल. स्काईप, किंवा तत्सम साधन वापरून, आपण वेगवेगळी सत्रं आयोजीत करू. सहभागी होणाऱ्या सर्व हौशी ब्लॉगर्सना या तंत्राची माहिती सभेच्या आधी करून देण्यात येईल. जपान-ऑस्ट्रेलियापासून ही सभा सुरू होईल. सत्रांची सूत्रं क्रमाक्रमाने पश्चिमेकडे हस्तांतरीत होऊन भारत-आफ़्रिका-युरोप-अमेरिका या क्रमाने अभिवाचनाचं सत्र सुरू राहील.
शब्दबंध-२०१० मधे सहभागी होणं सोपं आहे. सहभाग घेण्यासाठी किंवा केवळ आयोजनामधे मदत करण्यासाठीही, कृपया या फॉर्मवर नोंद करावी -https://spreadsheets.google.com/viewform?formkey=dHhIT3dWN21tYWpDVHo4UG9yMlZycWc6MA. तुमच्याबद्दलची माहिती आणि तुमच्या सहभागाचं स्वरूप आम्हाला या फॉर्मवरून कळेल. सर्व जुन्या आणि नव्या शब्दबंधीनी या फॉर्मवरून नोंद करावी ही विनंती. ईथे नाव नोंदवणाऱ्या सर्वाना आपोआप shabdabandha@googlegroups.com मधे प्रवेश दिला जाईल आणि तिथेच पुढच्या सर्व चर्चा होतील. (तुम्ही आधीपासून जरी shabdabandha@googlegroups.com चे सभासद असाल, तरीसुद्धा शब्दबंध-२०१० मध्ये सहभागासाठी, कृपया फॉर्ममधे नोंद करावी. तसदीबद्दल क्षमस्व.)
लवकरच भेटू. आपली वाट बघतोय.
- शब्दबंध स्वागतक आणि कार्यकारी मंडळ
हुसेन, हिंदू, त्यांच्या दुखावणार्या भावना आणि आमचं (अर्थात) शंकेखोर मन...
प्रेषक चिंतातुरजंतू ( शुक्र, 02/26/2010 - 18:32) .मकबूल फिदा हुसेन यांना कतारचे नागरिकत्व बहाल झाल्याने जो उत्स्फूर्त भावनांचा अविष्कार भवताल व्यापून राहिला आहे, त्यामुळे आमचे शंकाखोर मन पुन्हा उसळी खाऊ लागले. भावनाविष्काररूपी अमृताच्या मंथनातून उत्पन्न झालेल्या काही शंका:
- परकीय नागरिकत्व घेतल्याने अशा त्रासदायक, हरामी इसमाची आपसूकच आपल्या पवित्र देशातून मरेस्तोवर हकालपट्टी झाली, तर आम्हांस किंचितसा आनंद का बरे होत नाही? सभोवार इतका क्षोभ का?
- या प्रकाराने आपल्या पवित्र देशाची नालस्ती कशी होते? आम्हांस वाटले होते की ९५ वर्षांच्या वृध्दास कोठडीत डांबून तृतीय रत्न दाखविल्यास नालस्ती होण्याची शक्यता होती.
- 'भारतात अल्पसंख्याकांच्या जिवास धोका आहे' असा अपप्रचार करण्यास इस्लामी आणि मानवतावादी यांचे फावते. - यास इलाज काय? अखेर, हुसेन यांच्यावर हल्ले आपणच केले, १२५०खटले आपणच भरले, त्यांविषयीच्या हलाहलाने आंतरजाल आपणच भरले. मग आता त्याची फळे आपणच भोगायची. यांतले काहीच न होते, तर आपण इतरांस 'तुम्ही कांगावा करता' असे छातीठोकपणे म्हणू शकलो असतो. रणांगणावर गेल्यावर रक्तमांसाचा चिखल अंगावर उडताच गर्भगळित होणारे नेभळट तर आम्ही नव्हेत. आम्ही तर ही अभिमानाने मिरवण्याची बाब मानायला हवी.
- आणि मुळात आम्हांस पडलेला एक 'सनातन' प्रश्नः आमची पुराणे आणि त्यांवर आधारित आमचे अभिजात साहित्य तर देवादिकांच्या आणि ऋषीमुनींच्या चाळ्यांनी आणि त्यांच्या सुटलेल्या चळांच्या रसभरित वर्णनांनी ओतप्रोत भरले आहे. आमचे देव काही अनाघ्रात मेरीच्या पोटी जन्मास आलेल्या येशुबाळासारखे शामळू आणि पुळचट नव्हते. पुष्ट, मांसल शरीरांच्या स्त्रिया दाखवून याच देवादिकांचे चित्रण करणार्या राजा रविवर्म्याची चित्रे - उदा. ही आमची शकुंतलाआजी. आमच्या (दुष्यंत नसलेल्या) आजोबांचा हिच्यावर फार जीव! - तर आबालवृध्दांच्या नजरा निवळण्यासाठी अभिमानाने आपापल्या दिवाणखान्यांत एकेकाळी मिरवणारे आपण इतके का बरे त्रासलो? सारखे एवढ्या-तेवढ्यास हात कलम करणे, दगड फेकून मारणे असे रानटी आणि रासवट चाळे करणार्यांच्या रांगेत जाऊन बसण्यास आपण एवढे उतावीळ का बरे झालो?
असो. आता आम्ही आमच्या शंकेखोर मनास आलेला शीण हलका करण्यासाठी या संस्थळाच्या मुखपॄष्ठावरील पुष्ट, कायस्थ स्त्रीचे काही काळ आमच्या लोलुप नेत्रांनी अवलोकन करावे म्हणतो. अहो, त्यातून आमच्या पुणेरी बावन्नखणी संस्कृतीचे रक्षण होते! आता परस्त्री देवी असते, असे या जननी-जन्मभूमीत काही जण मानतात म्हणे. आशा आहे की आमच्या संस्कृतीरक्षक लोलुप अवलोकनाने अशा कायस्थ वा कायस्थेतरांच्या भावना दुखावणार नाहीत!
आपला स्नेह-(आणि बरेच काही) लोलुप,
चिंतातुर जंतू


