कथा
अगस्त्य जीव नाडी भाग ४...
प्रेषक शशिकांत ओक ( बुध, 03/10/2010 - 19:18) .अगस्त्य जीव नाडी भाग ४...
महर्षी म्हणाले, ‘थांब थोडे. गंमत पहा.’
....
‘महर्षी म्हणतात, इतके सांगतो की तू त्याच्या शोधाचे पहिले पाऊल उचललेस की तुला सर्व काही सापडेल.’
आलेले संकट अगस्त्य जीवनाडीच्या पॅकेटच्या बंदुकीच्या सदृश दिसणाऱ्या आकारामुळे टळले होते!.... पुढे वाचा...
....एक गाडी अशी एकाकी का थांबलेली आहे असे पाहून आन्ध्रप्रदेश राज्य परिवहनमंडळाची बस थांबली. त्या पाठोपाठ एक पोलिसांची गाडी येऊन थडकली. त्यांना सांगितले गेले काय काय झाले ते, ते ऐकून त्यातील पोलिस प्रमुखाला जीवनाडीबद्दल उत्सुकता वाटली. घटनेची पोलिस कंप्लेंट करायला लक्षाधीश लागले. इकडे पोलिस गाडीत बसून जीवनाडी वाचायला दासन यांनी सुरवात केली. ते म्हणाले की तुझा एक भाऊ लहानपणीच हरवला व वारला असा समज आहे. पण तसे नाही. तो जीवंत आहे. काही वाईट लोकाच्या संगतीत राहून तो चोऱायला, डाके घालण्यास लागला व नंतर दहशतवादी कृत्ये करू लागला. नक्षली बनून टोळ्याकरून डाके घालू लागला. त्याने आपले नावही बदलले आहे. तो आता ‘नागी रेड्डी’ म्हणवतो. ते सर्व ऐकून त्या पोलिस अधिकाऱ्याला आपल्या धाकट्या भावाबद्दल फारच आश्चर्य वाटले. त्याची चिंता वाटून ‘आता तो कुठे असेल?’ असे त्याने अगस्त्यांना विचारले. हनुमत दासनी त्याच्या काळजीचे कारण लक्षात घेऊन पट्टी पुढे वाचून सांगितले की ‘महर्षी म्हणतात, आत्ता तुला तुझे लक्ष्य दाखवले आहे. यानंतरचे शोधायचे काम तुला करायचे आहे. मात्र इतके सांगतो की तू त्याच्या शोधाचे पहिले पाऊल उचललेस की तुला सर्व काही सापडेल.’
ते वाचन संपले व ताडपट्ट्या गुंडाळता गुंडाळता दासनना वाटले की पूरग्रस्त परिस्थती, नंतर ही नक्षली लोकांची धाड, त्यांच्याकडून पट्ट्या पळवल्या जाण्याची व सर्वकाही लुटले जाण्याची शक्यता, या सारख्या सध्याच्या भीषण परिस्थितीला ते तर जबाबदार नाहीत? माझ्याकडून काही आगळीक तर झाली नाही? त्यांनी आपल्यासाठी पुन्हा पट्ट्या उघडल्या. त्यात त्यांनी वाचले की हे सर्व होण्याला त्या लक्षाधीशाच्या आणखी एका अंबॅसेडरकारमधील एक स्त्री कारणीभूत आहे. तिला धडा शिकवण्यासाठी हे घडले आहे. महर्षी म्हणाले, ‘तिने नजरचुकवून या पट्ट्यांतील दोन ताडपट्ट्याची पाने पळवली आहेत. ती तिने आपल्या साडीत लपवली आहेत. त्यातच तिची मासिक पाळी चालू असल्याचे तिने इतरांपासून लपवून ठेवले आहे. तिचा उद्देश चोरी करण्याचा नाही पण उत्सुकते पोटी तिने ते केले आहे. तिला तिच्या कृत्याचा धसका बसावा व अद्दल घडावी म्हणून नक्षली लोकांच्या धाडीचा उपद्रव वाटेत घडवला गेला.’ ते ऐकून दासन विचारात पडले. त्या पट्ट्या तिच्याकडून परत कशा मिळवायच्या? महर्षींना म्हणाले, ‘आता मी काय कराय़चे? महर्षी म्हणाले, ‘तू काही करु नकोस. त्या बाईकडून मिळवल्या तरी त्या आता काही कामाच्या नाहीत. कारण त्या चोंबाळून दुमडून खराब झाल्या आहेत. त्यात मी नाही आहे.’ ते सर्व ऐकून हनुमत दासन सर्द झाले. त्यांना वाटू लागले की असे वारंवार घडले तर पट्यांची निगराणी व संरक्षण करायचे तरी कसे? त्या वाचनात त्यांना या बाबत सांगण्यात आले. ‘त्याची काळजी करायची तुला गरज नाही. मात्र या घटनेमुळे गंगेच्या किनारी गोमुख नावाचे स्थान आहे. तेथे जाऊन तुला एक पूजा करावी लागेल. त्यापुजेत तुला एका आर्मीतील अधिकाऱ्याची मदत मिळेल. त्याच दरम्यान त्याला मोठ्या कौटुंबिक संकटातून मी सोडवेन. त्यावेळी वाटेत तु जीवनाडीपट्ट्यांना घेऊन प्रत्येक ठिकाणी गंगेच्या पवित्र जलाने पुजा करत करत हरिद्वार, ऋषिकेश, बद्रीनाथ, केदारनाथ करत गोमुखला न्यावेस. पुजा करून परतल्यावर त्यानंतर या नाडीपट्ट्यांचे समसमान दोन भाग करायचे. त्यातील तू एक ठेवायची व उरलेली पाने कोणाला द्यायची ते मी ठरवेन. तुझ्य़ाकडील पानातून मी गरजूंच्या समस्यांनाना पौर्णिमा ते अमावास्या या काळात व अश्विनी व रेवती या नक्षत्रांच्या दिवशी उत्तरे व उपाय सांगेन.’
दासन यांच्या मनांत दोन गोष्टींची रुखरुख होती. ‘एक त्या बाईने घेतलेल्या पट्ट्यांची तिला सजा होणार की तिला माफ केले जाणार? व दुसरे असे की या जीवनाडीच्या पट्यांचे असे दोन भाग करायची अगदीच गरज आहे काय? त्या संपुर्ण माझ्याकडेच का नकोत? महर्षी म्हणाले, ‘थांब थोडे. गंमत पहा.’
असे म्हणेपर्यंत करकचून ब्रेक लावून गाडी थांबल्याच्या आवाजाने दासन यांचे भान तुटले. ती गाडी होती ज्यात त्या बाई बसलेल्या होत्या त्या गाडीची! ती गाडी मागून आली होती. ‘त्यातील मागे बसलेल्या एका व्यक्तीचे जोरजोरात विव्हळणे ऐकू येऊ लागले. ते पाहून दासनांच्या सह सर्व तेथे धावले. त्या बाईच्या पोटात अत्यंत जोरात कळा येत होत्या. ती वेदनेने कळवळत होती. तिच्या त्या भयानक पोटदुखीचे कारण दासनांच्या ताबडतोब लक्षात आले. ते त्या लक्षाधीश व्यक्तीच्या कानावर घातल्यावर त्यांनी त्या बाईला साडीत लपवलेली नाडीग्रंथाची पाने परत करायला सांगितले.
‘ती म्हणाली मला त्या चोरायच्या नव्हत्या. पण आपल्याजवळ असाव्यात असे वाटून मी त्या लपवल्या होत्या. आधीच माझे पोट दुखत होते. ते यापट्ट्या लपवल्या पासून अतिशय तीव्र झाले. आता मला सहन न होण्यापलिकडे गेले आहे.’ असे म्हणून तिने त्या लपवलेल्या पट्ट्या दूर फेकल्या. त्यानंतर तिची व्यथा एकदम कमी झाली. त्यावर त्याकुटुंबाने घडलेल्या घटनेबद्दल माफी मागून दासनांचे व महर्षी अगस्त्यांचे आभार मानले.
पुढला प्रवास दासनांनी त्यांच्या कारमधून न करता पोलिसांच्या गाडीतून करायचे ठरवले. पोलिसांची गाडी रेल्वे स्टेशनचा 20 किमीचा रस्ता कापू लागली. ते चेन्नईचे तिकिट काढून ते पोलिसांसह प्लॅटफॉर्मवर येऊन बसले. पुढची ट्रेन रात्री 1 नंतर येणार असे कळले. त्यामुळे मधे खूप वेळ होता. काही वेळ गेला असेल, तेवढ्यात हातात शस्त्रे परजत कोणी लुटारू लोक आलेले पाहून तिकिटविक्रीची खिडकी व तेथील दिवे घाईने बंद केल्यामुळे अंधारगुडुप्प झाला. रात्रीच्यावेळचा चंद्रप्रकाश व दूरवर मिणमिणते लाईट फक्त होते. त्यांनी लोकांना वेढा घातला. मात्र ते पोलीस असल्याचे लक्षात आल्यावर ते पळून जाऊ लागले. त्यांचा पाठलाग पोलीस करू लागले. अंधाराचा फायदा घेऊन काही जण पसार झाले. काही वेळाने एकाला पोलिसांनी पकडून आणलेला दासनांनी पाहिला. ज्या पोलिसाला दासनांनी अगस्त्य नाडीचे वाचन पोलिसांच्या लॉरीत केले होते त्याला विचारता कळले की पकडला गेलेला माणूसही त्या आधीच्या नक्षली टोळीपैकी होता. हा पकडला गेला. बाकीचे पसार झाले. ते त्याला घेऊन कारवाई करायला निघुन गेले. नंतर गाडी आली. घडलेल्या घटनेची गाडी थांबल्यावर प्लॅटफॉर्मवर चर्चा झाली. दासननी जनरल डब्यात प्रवेश केला नंतर त्यांना टीटीईने कनफर्म्ड बर्थ दिला. त्यांच्या आपापसातील बोलण्यातून त्यांना कळले की पकडला गेलेल्या माणसाचे नाव ‘नागीरेड्डी’ होते. ते नाव त्यांच्या कानावर पडताच तो त्या पोलिसाचा लहानपणी हरवला भाऊ तर नव्हे? असे वाटून ते महर्षींकडून जाणून घ्यायची उत्सुकता त्यांना लागली. यथावकाश त्यांना वाचनातून नागीरेड्डी तोच होता असे महर्षींनीही सांगून खात्री केली! ... क्रमशः
(अशीच एक जीव नाडी सध्या पुण्यात उपलब्ध आहे. इच्छुकांनी लेखकाशी रात्री ९ ते १०च्या दरम्यान संपर्क करावा)
संकलक – विंग कमांडर शशिकांत ओक . मो - 9881901049,
अगस्त्य जीव नाडी कथा भाग ३...अगस्त्य महर्षी निघाले भद्राचलमला!
प्रेषक शशिकांत ओक ( मंगळ, 03/09/2010 - 23:45) .अगस्त्य जीव नाडीच्या कथा भाग ३...
‘गन काढलेली आहे. चला पळा.’ ती नक्षली टोळी लगेच अंधारात नाहीशी झाली.
एकदा अगस्त्य जीव नाडीमधील रामदर्शनाच्या आदेशावरून त्याचे वाचक श्री. हनुमत दासन चेन्नईहून भद्राचलमच्या प्रवासाला निघाले त्यावेळी घडलेल्या कथा ते सांगतायत.
एकदा एकांचे भविष्य कथन करत असताना दासनना अगस्त्य महर्षी सांगते झाले की त्या व्यक्तीच्या उपाययोजनेसाठी तुला आन्ध्र प्रदेशातील भद्राचलम या गावी जाऊन प्रभू रामचंद्राचे दर्शन घ्यावे लागेल. आता महर्षींच्या आदेशाने प्रभू रामचंद्रांचे दर्शन होणार म्हटल्यावर दासन जायला तात्काळ तयार झाले. प्रवास सुरु झाला. मजल दरमजल करत ते भद्राचलमला पोचले. मात्र तिथे गोदावरी नदीला मोठा पुर आलेला. ते मंदीर नदीच्या काठावर असल्याने तेथे ही प्रचंड पाणी आलेले पाहून त्यांची निराशा झाली. मंदिरात पाणी शिरलेले. मूर्ती बुडालेल्या. पुजारी व पुजासाहित्य विकणारे सर्वजण पाण्याच्या भितीने तो भाग सोडून गेलेले. आपण नेमके चुकीच्या वेळी आलोय असे त्यांना वाटू लागले. यावर आता काय करायचे असे वाटून त्यांनी जीव नाडी काढून त्यातून महर्षींचा काय आदेश आहे असे विचारावे असे म्हणून जीव नाडीची ताडपत्रे उलगडली. त्यात महर्षींनी सांगितले की पाण्याला आलेल्या पुरामुळेच मी तुला इथे यायला सांगितले होते. कारण थोड्यावेळात नदीचे पाणी ओसरायला लागेल. त्यावेळी तुला एक अदभूत दर्शन होईल की प्रभू रामचंद्र गोदावरीच्या प्रवाहाचे पूजन करायला उपस्थित आहेत. तो सोहळा फक्त तूच पहावास अशी जुळवणी करण्यासाठी तुला मी उपस्थित केले आहे. आता इथेच मनांत ध्यान कर व रामनामाचा जप कर. ध्यानातच तुला सर्वगोष्टींचे ज्ञान होईल.
आता दासनना ध्यानासाठी जागा शोधणे आले. त्या वेळी त्या मंदिरात काम करणारा एक जण त्यांना भेटला. त्याचे काम मंदिरातील दागदागिने व अन्य मौल्यवान वस्तूंचा संरक्षक म्हणून काम करत होता, असे त्यांना नंतर कळले. कोण, कुठून आले आदी चौकशी करता त्याला जीव नाडी पहायची उत्सुकता जाग्रृत झाली. मला जीव नाडीतून भविष्य सांगणार असाल तर मी तुम्हाला ध्यानासाठी जागा देईन म्हणून त्याने पेच टाकलान. म्हणून त्या आणीबाणीच्या काळातही दासननी वाचनाला सुरवात केली. त्यात अगस्त्य महर्षींनी त्याच्या पूर्वजन्माचे वर्णन करून सध्याच्या त्याच्या कामाबद्दल सांगायला सुरवात केली.
ते म्हणाले, ‘अरे, तू अनेक अपराध केले आहेस. मंदिरातील ट्रस्टचे दागिने चोरून तू तुझ्या घरातील तांदुळाचा शिधा ठेवायच्या खोलीत ते दडवून ठेवले आहेस की नाही? एका स्त्री बरोबर पत्नीच्या अपरोक्ष तुझे अनैतिक संबंध आहेत? तुला ‘पॅरालसिस’ नावाचा रोग होणार आहे.’ ते सर्व ऐकून तो पेचात पडला.
कुठून विचारले असे त्याला झाले. मानावे का नाही याचा संभ्रम झाला. चोरी व स्त्रीसंबंध लपवता येतील पण आपल्याला रोग होणार म्हटल्यावर त्याचे धाबे दणाणले. ‘बर, पण यावर काही उपाय आहे का?’ असे विचारून त्याने तोड काढली. ‘एक तर मंदिराच् सर्व दागदागिने व रोकड तू प्रामाणिकपणे परत कर व आपल्या अंगवस्त्राला दुसऱ्या पत्नीचा दर्जा द्यायचे सर्वांसमक्ष मान्य कर’. असा आदेश आला. ते ऐकू तो सर्द झाला. म्हणाला, ‘अहो मी जर तसे केले तर माझी नोकरी नक्की जाईल. माझ्यापेक्षा भयानक खोटेपणे व अक्षम्य अपराध करणारे ही आहेत, मग मलाच का असा ‘चोरलेले धन परत कर’ असा आदेश तुम्ही द्यावा. इतरांना ही शिक्षा व्हायला हवी’. त्याने आपले डोके लढवून तर्क केला. त्यावर दासन काहीच बोलले नाहीत. त्यांना ध्यानाला बसायची सोय करून तो तेथून गेला. मधे दोन तासाचा काळ उलटला. पाणी कमी होऊ लागले.
अगस्त्य महर्षींनी म्हटल्याप्रमाणे दासनना अत्यंतिक अनूभूतिचा प्रसाद मिळाला. इतकेच ते त्या प्रसंगाबद्दल सांगतात. ध्यानातून उतरल्यावर दासननी तो जामदारखान्याचा रक्षक येताना पाहिला. त्याने त्यांना एका कोंदट खोलीत नेले व बरोबर आणलेले बोचके उघडून त्यातून दागदागिने, मौल्यवान वस्तू व रोकड ऐवज दाखवला. ते पाहून दासनांचे डोळे दिपले. काही क्षणांतच त्या बलदंड दिसणाऱ्या व्यक्तीच्या हातापायातील त्राण नाहीसा झाला व तो पहाता पहाता कोसळला. तो काही सांगू पहात होता. दासनांच्या लक्षात आले की त्याच्यावरून वारे गेल्याने त्याची वाचा गेली होती. अगस्त्यांचा कथन खरे ठरले होते!
त्या तिथून बाहेर पडल्यावर त्यांची भेट एका लक्षाधीशाशी झाली. त्यांनी त्यांना आपल्या घरी नेले. पुर परिस्थितीमुळे ते ही कारने भद्राचलम रेल्वे स्टेशनवर त्यांना बरोबर घेऊन जायला तयारीला लागले. एका कारमधे त्यांची घरची मंडळी व दासन निघाले. बाकीचे अन्य कारमधे होते. वाटेत नक्षली लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. अंधारात त्यापैकी म्होरक्याने बॅटरीच्या प्रकाशात ड्रायव्हरला खाली उतरवले व इतरांचा पैसाअडका व दागिने लुटायचा प्रयत्न केला. त्यांच्याशी बोलून उपयोग नव्हता. त्यांच्या उद्धट धमक्यांमुळे सर्व काही त्यांच्या स्वाधीन करणे शहाणपणाचे होते. मागील सीटवर बसलेल्या हनुमत दासनांनी परिस्थितीचे गांभिर्य ओळखले. मागचा दरवाजा व काचेच्या खिडक्या आतून लॉक होत्या त्यामुळे चोरट्य़ांना त्या बाहेरून उघडता आल्या नाहीत. लक्षाधीशाच्या तरुण मुली, त्यांच्याकडील दागदागिने व खुद्द त्यांच्याकडील जीव नाडीच्या पट्यांचे पॅकेट या सर्वांचे कसे रक्षण करावे असा पेच पडला होता. त्यांनी जीवनाडीच्या पॅकेटला एका रेशमी कापडात गुंडाळून ठेवले होते. त्याला काही व्हायला नको या विचाराने त्यांनी ते हातात घ्यायला उचलले. त्याच वेळी त्या म्होरक्याची नजर पडली. त्याला वाटले की मागच्या बाजूला बसलेल्याने कदाचित आत्मरक्षणासाठी बंदूक काढला असावी. असे वाटून तो ओरडला, ‘ ‘गन काढलेली आहे. चला पळा.’ ती नक्षली टोळी लगेच अंधारात नाहीशी झाली. आलेले संकट अगस्त्य जीवनाडीच्या पॅकेटच्या बंदुकीच्या सदृश दिसणाऱ्या आकारामुळे टळले होते! ... भाग -३- समाप्त. भाग - ४ पुढे चालू....
इमर्जन्सी! -१
प्रेषक प्राजु ( रवी, 03/07/2010 - 23:10) .इमर्जन्सी..
दि. मार्च १, २०१०. सकाळपासून चहाशिवाय चालत नाही या सबबी खाली टमरेल भरून चहा, आणि सोबत बरंच सटरफ़टर खाऊन झालं होतं. वेळ जात नव्हता म्हणून की काय अधे मध्ये (खाण्यातून ) वेळ मिळेल तेव्हा, इमेल चेक करणे, त्यांना उत्तरे देणे, आणि घरातलं काम हे ही करत होते. आदल्या दिवशी होळीरे होळी पुरणाची पोळी असा शंख करत पुरणाच्या पोळ्या हादडल्या होत्याच. पुरणाची पोळी दुसरे दिवशी सुंदर लागते, त्यामुळे ती खायला हवीच, अशी मनाची समजूत घालून भरपेट नाष्टा केल्यावर , दुपारचं जेवणंही तितकंच व्यवस्थित केलं होतं. एकूण काय "पोटाला विश्रांतीची गरज नसते" असा समज करून घेऊन पोटाची व्यवस्थित काळजी घेतली जात होती.
आणि अचानक दुपारनंतर लक्षात आलं, की आपल्याला छातीमध्ये दुखते आहे. छातीमध्ये थोडंसं डाव्याबाजूला सतत दुखते आहे. कशामुळे असेल असा अंदाज बांधायचा प्रयत्न केला.. तर समोर फ़क्त माझ्या पुरणपोळ्याच आल्या.
गॅसेस!! हम्म!. संध्याकाळपर्यंत हे दुखणं जरा जास्तीच दुणावलं. (कशाला खाव्यात इतक्या पुरणपोळ्या!!) असो. हे जेव्हा असह्य झालं तेव्हा मात्र मी, आमच्या इथल्या हार्टफ़र्ड मेडिकल सेंटरला फोन केला आणि अपॉइंट्मेंट मागितली. पण ७ वाजून गेले असल्याने अपॉइंटमेंट ची वेळ निघून गेली होती. त्या अटेंडंटने काय होतंय असं विचारल्यावर , "आय हॅव अ चेस्ट पेन" असं दाबात उत्तर दिलं मी. घाबरून तिने नर्सला निरोप दिला. आणी थोड्याच वेळात नर्सचा फ़ोन आला. तिने काही लक्षणे फ़ोन वर विचारली. "छातीत डाव्या बाजूला दुखते आहे, ते कोणीतरी छातीवर बसून राहिल्यासारखे दुखते आहे का?" मी,"हो." ती," पाठीमध्येही दुखते आहे का? " मी, "हो". ती," श्वास घ्यायला त्रास होतो आहे का? मी, "नाही." ती,"दीज आर द सिम्पट्म्स ऑफ़ अर्ली हार्ट अॅटॅक. आणि तू ३० प्लस आहेस ना?" मी (जरा रागातच) "हो." मनातंतल्या मनांत "तुला काय करायचंय माझ्या वयाशी??" ती," तू एकदा तुझा इ सी जी करून घे. आजच्या आज इमर्जन्सी ला जाऊन सगळे चेकप करून घे." झालं!! माझं धाबं दणाणलं. मला हार्ट अॅटॅक!! माझ्या मुलाचं काय होईल?? माझ्या नवर्याचं काय होईल??
आता इ सी जी करायला इमर्जन्सी मध्ये जायचं म्हणजे काय होइल काही सांगता नाही येत. म्हणून अतिशय जड अंत:करणाने मुलाला, नवर्याला जेवायला वाढलं. मनात म्हंटलं,"खाउन घ्या आज भरपूर, उद्यापासून माझ्याहातचं खायला मिळेल कि नाही माहिती नाही." डोळे भरून आले माझे. नवरा म्हणाला "तू ही जेवून घे." पुन्हा मनांत म्हंटलं,"हो रे.. आता पुन्हा तुम्हा दोघांबरोबर जेवायला मिळेल की नाही माहिती नाही." आणि डोळे टिपत जेवायला बसले. माझ्या डोळ्यांत पाणी बघून नवरा म्हणाला ,"खूप दुखते आहे का? थांबेल , तू जेवून घे." त्याला बिचार्याला काय माहिती माझ्या डोळ्यांत पाणी कशामुळे आले ते!!
जेवणं आटोपली आणि आम्ही एमर्जन्सीला जायला निघालो. मुलाला मैत्रीणीकडे ठेवूया असा विचार आला मनांत, पण नको!! राहुदे, तो माझ्या नजरेसमोर असलेला बरा. काय माहिती मी आलेच नाही हॉस्पिटलमधून घरी तर!!... मी माझ्या पर्स मध्ये मला लागणार्या वस्तू घेतल्या. इन्शुरन्सच कार्ड घेतलं. पाण्याची बाटली घेतली (शेवटच्या वेळी उपयोगी पडेल कदाचित!! जाता जाता हॉस्पिटलचं पाणी नको तोंडात पडायला). शेवटी कपडे भरायला लागले तेव्हा मात्र नवर्याचे पेशंस संपले. त्याचा चेहरा बघून मी कपडे भरायचा विचार रद्द केला. इमर्जन्सी ला गेलो. तिथे गेल्या गेल्या मला जाणवलं आपला डावा हातही दुखतो आहे... म्हणजे हे नक्कीच हार्ट अॅटॅकचे लक्षण आहे. तिथे प्रायमरी चेकप मध्ये माझं बीपी पाहिलं गेलं आणि नाव नोंदवून घेऊन आम्हाला वेटिंग रूम मध्ये बसवलं. वाटलं, साधारण अर्ध्या तासात आत घेऊन जातील. घड्याळात पाहिलं ८.३० वाजले होते रात्रीचे. आमच्या सारखेच तातडीची सेवा हवे असलेले खूप लोक त्या वेटिंग रूम मध्ये होते.
समोर टिव्हीवर एकापाठोपाठ एक विनोदी मालिका सुरू होत्या. एक बाई व्हिलचेअर बसून पोट धरून कण्ह्त होती. हम्म.. अपचन झालं असणार हिला. एक सधारण २४-२५ वर्षाची मुलगी तिच्या तान्ह्या मुलीला घेऊन आली होती. तिच्यासोबत साधारण एक ४५ वर्षाची बाई होती , तिची आई असावी. नक्की कोणासाठी आले असावेत? मी विचार करत होते.. कारण त्या तिघिंपैकी कोणीही आजारी दिसत नव्हतं. आणि मग बघता बघता ४-५ बायका आलटून पालटून त्या तिघिंना तिथे येऊन भेटून गेल्या.. नक्की काय चालं होतं कहीच कळलं नाही. पण प्रत्येकीच्या अतिप्रचंड घेरामुळे जागा व्यापली गेली तिथली आणि अचानक फ़ारच गर्दि झाल्यासारखे वाटू लागले. असेच आजूबाजूचे निरिक्षण करण्यात तास भर निघून गेला. आता छातीतले दुखणे वाढू लागले आहे असे जाणवले. पाठितही ठणका वाढला. मी रिसेप्शन ला जाऊन विचारले ती म्हणाली "तुझ्या आधी अजून ३ नंबर आहेत.. मग तुला आत बोलावतील." अरेच्च्या!! मला इथे हार्ट अॅटॅक होऊ घातलाय आणि ही मला माझ्या आधी ३ नंबर आहेत असे सांगते आहे!! रागच आला. पण काहीही न बोलता पुन्हा जागेवर येऊन बसले. दरम्यान नवर्याच्या मांडिवर लेक झोपी गेला. पुन्हा आजूबाजूचे परिक्षण निरिक्षण करण्यात दिड तास निघून गेला. मनांत आलं, "आता इथे बसल्या बसल्या मला हार्ट अॅटॅक येईल मग कळेल या इथल्या रिसेप्शनवालीला.." शेवटी रात्री १२ वाजता मला आत बोलावले. आणि अतिशय जड आंत:करणाने आजूबाजूच्या लोकांकडे मी पाहून घेतलं. लेकाच्या डोक्यावरून मायेने हत फ़िरवला.. त्याला जवळ घेतलं आणि नवर्याकडे असहाय्य पण दु:खी मनाने पाहिलं. तो लेकाला खांद्यावर सावरत माझ्याकडे हसत हसत बघत.. "चल आत जाऊया" असं म्हणाला. जाऊदे ...त्याला काय कळणार ! आम्ही आतमध्ये गेलो.
क्रमश:
(वरील 'छातीत दुखणे आणि इमर्जन्सीला जाणे' ही घटना जरी सत्य असली तरी बाकी माझा कल्पना विस्तार आहे. )
कोलाज
प्रेषक क्रान्ति ( रवी, 03/07/2010 - 13:13) .चिऊताईला काल नुकतंच तिसरं संपून चौथं लागलं होतं. आज चिऊताईची झोप नेहमीपेक्षा लौकरच उघडली. खरं तर काल रात्री वाढदिवसाच्या भेटी उघडून पहाता पहाता झोपायला बराच उशीर झाला होता. पण स्वप्नात भेटीत आलेल्या वेगवेगळ्या रंगपेट्या, चित्रांच्या वह्या, स्केच पेन यांनी धमाल केली होती, सकाळी उठून कितीतरी चित्रं काढायची ठरली होती. मग वेळ नको पुरायला?
चित्रांच्या नादात आज अगदी शहाण्या मुलीसारखं आईला त्रास न देता दात घासून, दूध पिऊन झालं, बाबाच्या आधीच आवरूनही झालं. एरवी जबरदस्तीनं भरवावी लागणारी पालकाची नावडती भाजी पण आज विनासायास पोटात गेली.
"मग आज काय, मस्त मस्त चित्रं काढणार तर?" बाबानं विचारलं. "हो, तू ऑफिसमधून येशील तेव्हा बघच मी किती छान छान गंमत करते चित्रांची." चिऊताईनं बाबाला प्रॉमिस केलं. त्याला हसून दुजोरा देऊन बाबा ऑफिसला गेला, आईचंही सगळं आवरून झालं आणि मग मायलेकीचं राज्य!
आत्यानं आणलेली मोठी स्केच बुक, मावशी, काका, आजी यांनी दिलेल्या रंगीत पेन्सिली, खडूच्या पेट्या, स्केच पेन, बाबाच्या मित्रानं दिलेली गोल गोल वड्यावाली वॉटरकलरची छानशी रंगपेटी, आईच्या मैत्रिणीनं दिलेलं सुंदर चित्रांचं पुस्तक सगळी मंडळी हॉलमध्ये गोळा झाली. कार्पेटवर फतकल मारून चिऊताईची रंगसाधना सुरू झाली.
कुठंतरी गरगट्टा, कुठं दोनच फराटे, एका पानावर दोनचार टिकल्या, आकार ना उकार अशा आगळ्यावेगळ्या कलेनं अख्खी वही भरूनही गेली अर्ध्या तासात! मग ती आईला दाखवून झाली. "हा किनई, हत्ती आहे, तो ढगातून उडतोय. आणि हे आहेत टॉम आणि जेरी. ती जेरी टॉमला मारतेय. ही सोनपरी. तिच्या हातात जादूची कांडी आहे. ती फिरवली की दुष्ट राक्षसाचं कबुतर होतं. आणि हा बघ तो राक्षस. हा आहे डोनाल्ड डक आणि आणि हा मिकी." एक एक करत सगळ्या चित्रांचं वर्णन करून झालं. आईच्या चेहर्यावर कौतुक ओसंडून वहात होतं. मध्येच स्वारी पहिल्या पानावर गेली. "ए आई, हे काय आहे ग?"
"अग, हा तर हत्ती आहे ना ढगातून उडणारा?"
"हट् मुळी! तो हत्ती नाही दिसत. तो तर भोपळा झालाय! आणि त्या जेरीला तर शेपटीच नाहीय! सोनपरी नकटी दिसतीय." गाल फुगवून चिऊताई बोलली. हळू हळू सगळ्या चित्रांमधल्या चुका शोधून झाल्या. चिऊताई जाम वैतागली. "हूं, मला मुळी चित्रच नाही काढता येत. सगळा नुस्ता कचरा झालाय. मला नाय आवडली ही चित्रं." त्राग्यानं तिनं उरलासुरला रंग प्रत्येक चित्रावर अक्षरशः फासला, आणि अख्ख्या वहीचे तुकडे तुकडे केले. रात्रीची उरलीसुरली झोप डोळ्यांत दाटून आली होती. फुरंगटून, हिरमुसून चिऊताई तिथंच झोपून गेली.
तासाभरानं चिऊताई उठली, तेव्हा आईनं सगळा पसारा आवरून ठेवलेला होता. वाटीत डाळिंबाचे लालचुटूक दाणे घेऊन आई चिऊताईची वाट पहात होती. पण तिचा रुसवा अजून गेलाच नव्हता. "तुझ्या सोनपरीनं तुझ्यासाठी एक गंमत ठेवलीय. तू एवढे दाणे खाल्लेस, की ती तुला मिळेल." आईनं समजूत काढली. "मी नाई इतके सगळे खाणार. एक्कच घास खाईन!" रुसुबाई चिऊताई अजूनही घुश्शातच होती. "ठीक आहे राणी. एक्कच घास खा, मग तुला ती गंमत देते." कसेबसे चार दाणे खाऊन चिऊताई आईच्या मागे गेली, तर एका मोठ्या पांढर्या कागदावर ढगात उडणारा हत्ती होता, तिच्याच रंगांचा! "वॉव! हा तर खराच उडणारा हत्ती! ए आई, हा कसा आला ग?"
चिऊताईच्या या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी आईनं एक-एक कागद तिच्यापुढं ठेवायला सुरुवात केली. सोनपरी, दुष्ट राक्षस, टॉमला मारणारी जेरी, मिकी, अगदी चिऊताईला हव्या असणार्या मित्रांची सगळी चित्रं त्यात होती, फक्त रंग नव्हते. "आई, पण सोनपरी यात रंग भरायला विसरली का ग?" बघता बघता चिऊताई खुलली होती. "नाही, ते तुला भरायचे आहेत, आणि तेही रंगपेटीतून नाही." आईनं रिकामी झालेली डाळिंबाच्या दाण्यांची वाटी ओट्यावर ठेवली. चित्रं पहाता पहाता आपण सगळे दाणे फस्त केलेत, हे चिऊताईला कळलंही नाही! "मग सांग ना कसे भरायचे?" ही तर एक नवीनच गंमत होती!
आईनं चिऊताईच्या चित्रकलेच्या वहीचे फाटके कागद, कात्री, फेविकॉलची ट्यूब घेतली. त्या वेड्यावाकड्या कागदांचे छानसे आकार कापले आणि एका चित्रात ते आकार चिकटवले. चिऊताई मन लावून पहात होती. बघता बघता सोनपरी हातात जादूची कांडी घेऊन त्या कागदावर उतरली! "काय मस्त! ए आई, हे मी करू?" चिऊताईला हे नवं काम आवडलं. "हो, हे तुलाच तर करायचं आहे!" आणि हे चिकटकाम आईनं चिऊताईला दिलं करायला. मग ते झाल्यावर स्केच पेननं डोळे, नाक, कान काढून झाले. बघता बघता सगळी चित्रं हवी तश्शी तयार झाली! चिऊताई मनापासून खूश झाली. मनासारख्या जमलेल्या त्या कलाकृती पहाताना तिचा आनंद डोळ्यांतून ओसंडून वहात होता!
बिघडलेल्या चित्रांच्या कपट्यांमधून मनासारखं कोलाज घडवण्याची कला किती सहजपणे शिकली होती ती!
निरोप - अंतिम
प्रेषक श्रावण मोडक ( शुक्र, 03/05/2010 - 15:52) .नदी गावाच्या दक्षिणेकडून यायची आणि गाव वसलेला तिनसाचा डोंगर संपला की किंचित डावीकडं वळून निघायची. नदीच्या पूर्वेकडच्या किनार्याकडं जाण्यासाठी हिर्या डुंगीतून निघाला तेव्हा स्वच्छ चंद्रप्रकाश पसरला होता. नदीच्या पात्रात आपण दिसू अशी त्याला भीती होती आणि ती साधार होती. पात्र साधारण पन्नासेक मीटर रुंदीचं. तो ते सरळ ओलांडू लागला असता तर पंचाईत नक्कीच होती. त्यामुळं त्यानं नदीच्या प्रवाहात आधी डुंगी टाकली. साधारण मैलभर खाली जाऊन तिथून त्यानं पात्र ओलांडलं आणि समोरच्या बाजूनं तो पुन्हा वर आला. त्या किनार्यावर पुढं आत जायचं आणि जाताना इकडच्या किनार्यावरच्या रात्रीच्या स्तब्धतेवर नजर ठेवायची. स्तब्धता थोडीजरी विचलीत झाली की काम सुरू. झोप येऊ नये म्हणून बिडी ओढायची. बिडीचा निखारा दिसू नये याची दक्षता घेण्यासाठी उभी ओंजळ बिडीभोवती.
चंद्र डोक्याला तिरपा झाला तेव्हा आपल्याला भूक लागल्याची जाणीव हिर्याला झाली. त्यानं डुंगी तिरावर घेतली. बाहेर उडी मारली. डुंगीचा दोर ओढून घेतला आणि काठावरच्या एका बुंध्याला ती बांधली. तो जंगलात शिरला. दहा मिनिटांनी तो पुन्हा डुंगीवर आला तेव्हा त्याचं पोट भरलं होतं. किनार्यावर या बाजूला किती वेळ थांबायचं उगाच, असा विचार करून त्यानं डुंगीला थोडी गती दिली. दक्षिणेकडं तो डुंगी हाकू लागला. फर्लांगभर अंतर त्यानं कापलं असेल. नदीच्या पश्चिमेला पठारी भाग सुरू होण्याची चिन्हं होती. कोणत्याही परिस्थितीत डुंगी पश्चिमेच्या तिराला न्यायची नाही असं त्याला भाईनं सांगितलं होतं. त्यामुळं त्यानं डुंगी पूर्वेकडंच ठेवली होती.
डावीकडच्या डोंगरातून एक आवाज हिर्याला ऐकू आला. हुंकारासारखा. कोणता तरी प्राणी. अर्थात, हिर्याला त्याची भीती नव्हती. तो नदीत होता. पण जिथं हा आवाज ऐकू आला तिथंच त्याला थांबणं भाग होतं. थोडं पुढं मगरींचा टापू. वेळ रात्रीची. त्यामुळं सावधानता अधिक गरजेची. एरवी दिवसा जिथंपर्यंत माणसं जातात, त्याच्या अलीकडंच तो थांबला. त्यानं दूरवर नजर टाकली. अंधारात झाडांच्या फक्त सावल्या दिसत होत्या. हालचाल काहीही नव्हती.
रात्रीच्या वेळी एकट्यानं अशी कामगिरी करण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. त्यामुळं हिर्या निवांत होता. एकच अडचण होती, आज त्याला पावा वाजवता येत नव्हता. एरवी अशा वेळी तो निवांत पावा वाजवत असायचा. आज पोलिसांना त्याचं अस्तित्व कळण्याची भीती होती. त्यामुळं फक्त बिडीवर काम भागवावं लागत होतं.
कंटाळा उडवण्यासाठी हिर्यानं तोंडावर पाणी मारलं. टॉवेलनं तोंड पुसलं आणि पुन्हा एक बिडी पेटवली. एक दीर्घ झुरका घेतला. धूर सोडत त्यानं समोर दूरवर नजर फेकली आणि तो सावध झाला. दूरवर काही हालचाल दिसू लागली होती. नेमकी कशाची हे कळत नव्हतं. पण हालचाल होती. हिर्या टक लावून पाहू लागला. पाचेक मिनिटांत चित्र स्पष्ट झालं. ओळीनं काही माणसं चालत येत होती इतकं त्या सावल्यावरून कळत होतं.
हिर्यानं डुंगी वल्हवायला सुरवात केली. लगेच गावात जाणं गरजेचं होतं. ठरवून त्यानं डुंगी पात्रात मध्यावर टाकली आणि तो भराभरा काठीनं पाणी मागं लोटू लागला.
***
डामखेड्यात नैऋत्येला असलेल्या उतारावर दामाचं घर होतं. तिथंच बातमीदारांना थांबवलं होतं. ते पोचले तेव्हा रात्रीचे साडेअकरा झाले होते.
दामाच्या घरापासून पूर्वेला नदी दिसायची. नदीच्या काठाला लागून असणारं जंगल दिसायचं. दक्षिणेला अरवलीहून येणारा रस्ता. त्या रस्त्याच्या अलीकडं असणारंही जंगल दिसायचं. ही मंडळी पोचली तेव्हा मात्र फक्त छाया आणि अंधुक प्रकाशाचा खेळ. त्यावरून अर्थ लावायचा. अरवलीचा रस्ता तिथून जवळ, तर नदीकिनारची वाट लांब. हे ठिकाणच सुरक्षीत आहे, असं बरोबरच्या दादानं सांगितलं होतं आणि त्यांच्या सांगण्यापलीकडं जाण्याची हिंमत कोणाचीच नव्हती.
मध्यरात्रीचे साडेतीन झाले होते. फोटोग्राफरनी सरळ ताणून दिली होती. अंधारात आणि इतक्या अंतरावरून आपला काहीही उपयोग नाही हे त्यांना ठाऊक होतं. 'अग्निहोत्रीं'च्या गप्पा सुरू झाल्या होत्या. नेहमीच्याच, राजकारणाविषयी. चहाचा, बिनदुधाच्या, एक राऊंड आल्या-आल्या झाला होता. आता दुसरा व्हावा अशी काहींची इच्छा होती. पण तिथली एकूण परिस्थिती पाहता तशी इच्छा व्यक्त करणं मुश्कीलच. एक दोघा अनुभवी मंडळींनी आपल्यासमवेत प्रथमच आलेल्या दोघांचा 'पाठ घेणं' सुरू केलं होतं. गंमतीगंमतीत या अशा अनभिज्ञ भागाविषयी, माणसांविषयी काही असे ग्रह करून द्यायचे की हे नवागत काही काळ तरी त्या 'प्रभावा'तून बाहेर येत नाहीत.
तासभर असाच गेला तेव्हा आत्तापर्यंत डोळे ताणून बसलेल्यांना थोडा पश्चाताप होऊ लागला होता. डोळे ताणण्याऐवजी आल्या-आल्या ताणून दिली असती तर बरं झालं असतं वगैरे त्यांना वाटू लागलं. पण असं करून चालत नसतं हे त्यांना पक्कं ठाऊक होतं. पोलीस केव्हाही जंगलापलीकडं आणि नदीच्या मधल्या टापूत जमतील आणि त्याचवेळी कदाचित ठिणगी पडेल.
प्रवासात प्रत्येक बातमीदाराला काही गोष्टींची कल्पना समितीकडून स्पष्ट दिली गेली होती. पहिली म्हणजे ते सारे त्यांच्याच जबाबदारीवर तिथं आले आहेत, त्यांना समितीनं आणलेलं नाही. फक्त त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं समितीनं सुरक्षीत रस्त्यावरून त्यांना इथंपर्यंत आणलं आहे. समितीनं हीही दक्षता घेतली होती की, आपल्याकडून त्यांच्या हाती काहीही दिलं जाणार नाही. त्यांची तटस्थता शक्य त्या मार्गानं एस्टॅब्लीश होणं महत्त्वाचं.
सव्वापाचच्या सुमारास उतारावर काही हालचालीची चाहूल लागली. आवाज येऊ लागले. एक हत्यारधारी आधीच त्या दिशेनं गेला होता. आवाजांपाठोपाठ तो धावत आला निरोप घेऊन: "घुसतायेत साले..."
***
हिर्या गावात काही मिनिटं थांबला आणि लगेच अरवलीच्या वाटेवर धावत सुटला. साठेक जवान जंगलातच होते. त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे लगेचच.
गावातून त्याचवेळी मेगाफोनवरून एक आवाज आसमंतात घुमला. समितीच्या विजयाचा नारा होता तो. पाठोपाठ दुसरा नारा झाला, "हमारे गावमें हमारा राज"! नारा दिला अनीश रेगेनं, अनुभवी मंडळींनी आवाज ओळखला होता. त्यानंतर अनीशचाच आवाज घुमू लागला.
"सर्वेला सहकार्य केलं जाणार नाही. ताकदीच्या बळावर गावांत घुसण्याचा प्रयत्न पोलिसांनी करू नये. डेप्युटी कलेक्टर आणि प्रांताधिकार्यांनी नोंद घ्यावी की हे प्रकरण हायकोर्टात गेलेलं आहे. तिथं सुनावणी सुरू आहे. अशा स्थितीत सर्वे करण्याचा प्रयत्न म्हणजे कण्टेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकतो..."
मेगाफोन गावात वरच कुठं तरी होता. अंधारात दिसणं शक्य नव्हतं. दहा-पंधरा मिनिटांत झुंजुमुंजू झालं की सारंच स्पष्ट होईल अशा बातमीदार मंडळी होती. बरोबर असणारे दोन्ही तरुण निघून गेले होते. हालचाल करायची तरी कशी हा प्रश्न होता. त्यामुळं तिथंच थांबून राहणं त्यांनी पत्करलं.
सुरवात कशी झाली, काय झालं हे कोणालाही सांगता येणं शक्य नाही. गोंधळ सुरू झाला खाली जंगलापाशी. काही गडबड आहे इतकंच कळत होतं. उजाडलं तेव्हा नदीतीराच्या दिसणार्या भागात पोलिसांचीच धावपळ दिसत होती. तिथून अलीकडं फक्त जंगल. पोलिसांकडंही मेगाफोन होता, त्यांचे इशारे समितीच्या पहिल्या घोषणेबरोबरच सुरू झाले होते. त्यामुळं आधी सारंच मेगाफोनचं युद्ध वाटत होतं. आणि त्या युद्धातच केव्हातरी आलेला गोळीचा आवाज विरून गेला. त्यामुळं ती कुठून सुटली, जंगलातून की पठारावरून हे आता कोणालाही सांगता येणं शक्य नव्हतं. एका गोळीनंतर हे आवाज वाढले. पुढं मग फारसं काही कळेनासं झालं. आवाज कानी येत होते. काही कळत नव्हतं, पण त्यांचा अर्थ इतकाच होता की चकमक सुरू आहे.
अंदाज घेत फोटोग्राफर आणि बातमीदार दामाच्या घरापासून खाली उतरू लागले. निघताना त्यांच्यातल्या अनुभवींपैकी कोणी एकानं ओरडून सांगितलं, "काही झालं, एकमेकांना चुकलो तरी ठीक दीड तासानं आहे त्या स्थितीत सगळ्यांनी दामाच्या घरी यायचं. धुमश्चक्री त्याआधी संपली तर आधीच." किती जणांच्या ते डोक्यात शिरलं हे तपासत बसण्यात अर्थ नव्हता.
खाली उतरता-उतरताच गोळ्यांचा आवाज कानात साठवत कुणी पुढं, कुणी मागं असं करता-करता ते कधी विखुरले गेले ते त्यांनाही कळलं नाही.
***
"सर्वेला विरोध करणार्या नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर हल्ला केला. झाडं आडवी टाकून पोलिसांचा रस्ता रोखला होता. पोलिसांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करताच आधी तुफान दगडफेक करण्यात आली, मग जंगलातून गोळीबार झाला. दीड तासांहून अधिक काळ चकमक सुरू होती. तीन पोलीस मारले गेले. सहा जण जखमी झाले. पथकाला अर्ध्या रस्त्यातूनच माघार घेणं भाग पडलं, कारण सुरक्षीत वाट नक्षलींनी बंद केली होती. मगरींचा संचार होता तिकडून वळून पुढं गावात जाणं शक्य नव्हतं..."
एसपी सांगत होते. घाई दिसत होतीच बोलण्यात, कारण प्राथमिक माहिती देऊन मी घटनास्थळी जाणार आहे असं ते म्हणाले होते. घटनास्थळी म्हणजे अरवली कॅम्पपर्यंत तर नक्की. ब्रीफिंग करताना एसपींनी काहीही मागं ठेवलं नाही. पोलिसी कारवाई फसते आहे हे त्यांनी शांतपणे कबूल केलं. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात समितीचीही हानी झाली आहे इतकंच त्यांना सांगता आलं. प्रत्यक्षात किती आणि काय हे मात्र सांगणं शक्य नव्हतं, कारण ती माहिती गोळा करण्यासाठी सरकारला गावात शिरताच आलं नव्हतं. इंडियन मेडिकल असोसिएशनचंच पथक फक्त आत येऊ शकेल असे फलक समितीनं लावले होते. त्याहीपलीकडं, त्या जंगलात अद्याप किमान पंचवीसेक शस्त्रधारी तरी होतेच.
आयएमएचं पथक तिथं पोचेपर्यंत दुपार उजाडणार होती.
***
खडकी, निमखेडामार्गे दिवा एकटाच मोटरसायकलवर आला. रुपसिंगच्या शेतावरच थांबला. किशोर, धनजीसेठ तिथंच होते. निरोप स्वच्छ होता: समितीचा डामखेड्याचा कार्यकारी मंडळ सदस्य वेस्ता आणि सायगावचा सिक्का हे दोघं 'शहीद' झाले होते. भाईच्या दंडात आणि मांडीत गोळी घुसली होती. आणखी तिघं जखमी झाले होते. सर्वांना डोली करून निमखेड्याला नेलं होतं. तिथल्या दवाखान्यात उपचार सुरू झाले होते. पोलिसांनी गोळीबार थांबवून मागं जाण्यास सुरवात केली, तसा जंगलातून गावकर्यांनीही गोळीबार थांबवला होता. दोन तासांपूर्वीपर्यंत पुढं आलेले सगळे पोलीस अरवली कँपला गेले होते. बातमीदार आणि फोटोग्राफरचं पथकही परस्पर अरवलीला गेलं होतं.
वेस्ता आणि सिक्का यांच्यावर दोन्ही गावांच्या मध्ये जंगलात अंत्यसंस्कार करायचा निर्णय झाला होता.
अंत्यसंस्काराचा निरोप घेऊन समितीचे कार्यकर्ते गावागावांत पोचत होते तेव्हा त्या दोघांच्याही बायका आपले बछडे आणि इतर काहींसमवेत डामखेड्यातच होत्या. दुःखासाठीची उसंत त्यांना अंत्यसंस्कारानंतर मिळणार होती. घरी पोचल्यावरच. ते त्यांनी पत्करलेलं होतं. जमिनीसाठी, कारण एरवीही काही पर्याय नव्हताच, ही त्यांची धारणा होती!
***
कलेक्टर ऑफिसात एकूण रिपोर्ट तयार व्हायला दुसर्या दिवसाची दुपार उजाडली. स्वतः कलेक्टर अरवलीपर्यंत जाऊन आले. एसपीही गेले होते. त्यांच्या पाठोपाठ स्पेशल आयजी. नंतरची रिव्ह्यू मिटिंग कलेक्टर ऑफिसलाच झाली. पालकमंत्री दुपारी साडेतीन वाजता तिथं पोचणार होते, नेहमीप्रमाणे त्यांना उशीर झालाच. चार वाजता ते आले तेव्हा स्पेशल आयजींसमवेत कलेक्टर, एसपी अँटे चेंबरमध्ये बसले होते. पालकमंत्री थेट तिथंच गेले.
"नमस्कार. काय परिस्थिती आहे आत्ता?" आत शिरताच पालकमंत्र्यांचा पहिला प्रश्न. कलेक्टर बोलू लागले. मोजक्या पंधरा-वीस वाक्यांत त्यांनी आढावा घेतला.
"पुढं काय? सर्वेला किती दिवसांची स्थगिती आहे?"
"स्थगितीची मुदत नाही. मी आपल्याकडून पुढच्या सूचनांची वाट पाहतोय." कलेक्टरांचा खुलासा.
"आत्ता घाई नको. सुप्रीम कोर्टच काय ते सांगेल..." पालकमंत्री म्हणाले. कलेक्टरांनी मान डोलावली.
काही औपचारिक चर्चा करून पालकमंत्र्यांनी आतला फोन उचलून सूचना दिली, "रेव्हेन्यू सेक्रेटरींना लाईनवर घ्या." त्यांचं खातं तेच.
काही क्षणातच फोन लागला. पालकमंत्री इकडून बोलू लागले. पलीकडचं बोलणं ऐकू येणं शक्यच नव्हतं. "तुमच्याकडं प्राथमिक माहिती असेल... कलेक्टरांचा रिपोर्ट येईलच. काय आहे, या कोर्टाच्या 'जैसे थे' वगैरे आदेशांनी त्यांना जोर दिला. नाही तर त्यांची ही हिंमत झाली नसती. आता जे झालं ते उत्तम झालं. आय सजेस्ट, वी मस्ट टेक द रिपोर्ट डायरेक्टली टू दिल्ली... सुप्रीम कोर्ट. एकदाचं हायकोर्टातलं लफडंही तिकडं दिल्लीत जाणं गरजेचं आहे. मग या सगळ्यांवर सुप्रीम कोर्ट ऑर्डर देईल. ती काही भूसंपादन करू नका अशी असणार नाही. आत्ता घडलेल्या घटनेतून कोर्टातही गांभीर्य मांडता येईल..."
एसपींना त्याक्षणी मारल्या गेलेल्या तीन पोलिसांची आणि त्यातून एकूण पोलीस दलामध्ये निर्माण होणार्या प्रतिक्रियेची चिंता होती. समितीविरुद्ध त्या दुर्गम प्रदेशात झुंजणं सोपं नव्हतं. वर्षभरात बळी पडलेल्या पोलिसांची संख्या आता १२ वर गेली होती.
कलेक्टरांना सर्वे आणखी लांबवता येईल का याची चिंता भेडसावत होती. त्यांना ठाऊक होतं की सर्वे होईलही, पण भूसंपादन शक्य नाही सध्याच्या स्थितीत. पुनर्वसनाचा प्लॅन पक्का नसताना 'जिओरिसोर्सेस'नं कितीही मोठ्या कल्पना मांडल्या तरी त्या या प्रदेशात प्रत्यक्षात आणणं नेहमीच्या चौपट कामाइतकं होतं.
स्पेशल आयजींचा विचार सुरू होता तो समितीचं कंबरडं कसं मोडायचा याविषयी. जिओरिसोर्सेसच्या एम.डीं.ना दिलेला तो शब्द होता. त्या शब्दावरच पुढं हरिप्रसाद महाराजांचं समाधान अवलंबून होतं. महाराज समाधानी झाले तरच सीबीआयमध्ये जाण्याची संधी, एरवी इथंच राज्यात सडत रहावं लागेल.
"या तीन पोलिसांची नावं काय आहेत?" पालकमंत्र्यांचा अचानक प्रश्न आला एसपींना.
"हेड कॉन्स्टेबल रावण पाटोळे, कॉन्स्टेबल रफीक मुकादम आणि प्रभाकर चव्हाण. तिघंही मुख्यालयातच नेमणुकीला होते." एसपींनी माहिती पुरवली. पालकमंत्र्यांना नावात काय इंटरेस्ट आहे हे त्यांच्या ध्यानी आलं नाही.
"आपण त्यांच्या घरी जाऊया. भरपाईसाठी मी सीएमसायबांशी बोललो आहे. त्याशिवाय कंपनीही मदत करणार आहे. मुलं केवढी आहेत?"
"तिघंही तरूण होते. मुकादमचा मुलगा आणि चव्हाणची मुलगी बालवाडीत वगैरे आहे. पाटोळ्यांचा मुलगा पुढच्या वर्षी दहावीला जातोय." एसपी.
"ठीक आहे, त्यांची व्यवस्था करू. जरा डीआयओंना बोलवण्याची व्यवस्था करा..." पालकमंत्र्यांनी जिल्हा माहिती अधिकार्यांना बोलावण्याची सूचना केली. उद्याच्या बातम्यांची सोय. चौघंही बाहेर आले.
छोट्याशा औपचारिक बैठकीनंतर मंत्री पुन्हा अँटे चेंबरमध्ये गेले. यावेळी सोबत फक्त कलेक्टर आणि मंत्र्यांचे सचिव व दोन सहायक होते. पाऊण तासानं सारेच बाहेर आले. "चला, आधी पोलिसांच्या कुटुंबियांना भेटून येऊ..." मंत्री म्हणाले.
पत्रकारांना निरोप देण्यासाठी डीआयओंच्या सहायकांची पळापळ सुरू झाली.
***
सचिवालयात महसूल सचिवांच्या दालनांमध्ये नेहमीच्या वेळेनंतरही जाग होती. सुप्रीम कोर्टात सादर करण्याचे प्रतिज्ञापत्र तयार होत होतं. भूसंपादनाला गावकर्यांचा विरोध नाही. विरोध आहे तो फक्त समितीचा. समितीच्या शस्त्रांच्या धाकदपटशामुळं गावकरीही दबलेले आहेत. त्यामुळं सर्वंकष कारवाईची गरज आहे असा मुद्दा मांडण्याची सूचना सरकारच्या विशेष वकिलांसाठी त्या प्रतिज्ञापत्रासोबतच्या नोटमध्ये लिहिली गेली होती.
घटनास्थळापाशी केलेल्या व्हिडिओची एक प्रत घेऊन पालकमंत्र्यांचे एक सहायक तिथं पोचण्यास निघाले होते. महसूल सचिवांसाठी निरोप होता, या व्हिडिओवरून 'आँखो देखा हाल' तयार करून तो सुप्रीम कोर्टात देण्यासाठी सज्ज ठेवायचा.
***
पालकमंत्र्यांचा ताफा पोलीस लायनीत शिरला. पाटोळे, चव्हाण आणि मुकादमच्या घरांसमोर शोकाकूल मंडळी होती.
विचारपूस करून पालकमंत्री पत्रकारांशी बोलू लागले. दरम्यान मुख्यमंत्र्यांकडून विशेष घोषणेची अनुमती त्यांना मिळाली होती. तिन्ही पोलिसांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारकडून नियमित मदतीव्यतिरिक्त प्रत्येकी एक लाखाची मदत. तिघांच्या पत्नींना सरकारी नोकरी. तिघांचीही पहिली नावं घेत पालकमंत्री आपुलकीनं बोलले. त्यांचे डोळे पाणावले होते. कॅमेराचे फ्लॅश उडत तेव्हा ते चकाकत!
तिन्ही पोलिसांना श्रद्धांजली वाहून पालकमंत्र्यांनी रेस्टहाऊसकडं कूच केलं.
***
सूर्य मावळतीला निघाला होता तेव्हा पोलीस लायनीपासून साधारण अर्धा फर्लांगभर अंतरावर असलेल्या संस्कार केंद्रातील मुलांना तिथली शिक्षिका प्रार्थना शिकवत होती. तिची आणि त्या मुलांचीही आवडती प्रार्थना,
इतनी शक्ती हमें देना दाता
मनका विश्वास कमजोर हो ना
हम चले नेक रस्तेपे हमसे
भूलकर भी कोई भूल हो ना...
केंद्रातून बाहेर येणारे शब्द आसमंतात विरून जात होते.
शिक्षिकेच्या आवाजातच दोन चिमुकले आवाजही मिळालेले होते - रोशन मुकादम आणि रेवा चव्हाणचा आवाज!
बापाच्या मृत्यूचा 'निरोप' त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी आणखी काळ जाऊ द्यावा लागणार होता.
पूर्ण
गीत सरगम
प्रेषक शुचि ( शुक्र, 03/05/2010 - 14:15) .रविवारी सकाळी डोळे उघडल्यावर एका क्षणात एका गोड जाणीवेनी रमाचा ताबा घेतला, तो म्हणजे कित्येक दिवसंनी आज संध्याकाळी अमीतबरोबर बाहेर जाता येणार होतं. नुसत्या एखाद्या हॉटेलात अथवा सिनेमाला नाही तर हिन्दी गाण्यांच्या कर्यक्रमाला. किती तरी वर्षांनी हा योग जोळून आला होता. ६ महीन्यांपूर्वी शोअर जॉब घेतल्यापासून, अमीत कचेरीच्या कमात तरी गुंतलेला असे अथवा दोघं बाहेर गेले तर नुसत हॉटेल, सिनेमा होत असे. रमा त्यामुळे न आळ सावता आज चटकन उठली, चहा करून तिनी अमीतला हलकेच उठवले.
"ए राजा उठ ना. आज आपल्याल गीत सरगम ला जायचय. मज्जा आहे एका माणसाची. "
अमीतही उठल्याउठल्या कार्यक्रम आठवल्यामुळे टवटवीत जागा झाला. दिवसही चटकन निघून गेला संध्याकाळची वाट पहाण्यात, तयारी करण्यात.
पावणेसात वाजता दोघं टिळक स्मारक मंदीरात पोचली. एव्हाना बरीच गर्दी जमली होती. रमाला पुण्याची ती सुसंस्कृत गर्दी अतिशय आवडत असे. मोगरा, केवडा आणि काही अनमिक अत्तरे यांचा सुगंध, टेस्ट्फुली नटलेल्या स्त्रिया, सभ्य वर्ग. नजरेस नजर दिली असता कोणीही पटकन हसतात अशा ठिकाणी. वातावरण कसं प्रसन्न आणि लगबगीचं असतं. खरोखर अखिल विश्वात सारं काही आलबेल आहे असं वाटावं इतकं छान.
घंटा झाली.
निवेदकानी कार्यक्रमाला सुरुवात तर मस्त केली.
पहीलच गाणं होतं तिचं तूफान लाडकं हेमंत कुमारचं, कोहरा सिनेमातलं "येह नयन डरे डरे, येह जाम भरे भरे जरा पीने दो"..................... "रात हसीन येह चान्द हसीन, तू सबसे हसीन मेरे दिलबर , इन सबसे हसी तेरा प्यार, तू माने ना..." अहाहा ते दैवी सूर तिला कधी जादूभर्या दुनियेत घेऊन गेले तिला कळलं सुद्धा नाही. अमीतच्या हातात हात गुंफून गाणं ऐकणं खरच फार सुखावह होतं.
पुढे हेमंत कुमारची २ सलग गाणी होती - "बेकरार करके हमे युं ना जाइये , आपको हमारी कसम लौट आइये" आणि एक दर्दभरं प्यासा मधलं "जाने वोह कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला" दोन्ही गणी रसिकांची दाद मिळवून गेली विशेषतः लागोपाठ्च्या विरोधाभासामुळे. गायकाने छान पेलली होती दोन्ही गाणी.
मग आलं एक अल्लड, शोख गाणं, प्यासा सिनेमातलंच पण गीता दत्त नी गायलेलं -"जाने क्या तूने कही, जाने क्या मैने सुनी, बात कुछ बन ही गयी" .......... सभागृहात जणू मोगर्याच्या फुलांचा शिडकावा होत होता आणि श्रोते न्हाऊन निघत होते......"नैन झुकझुक के उठे, पांव रुक रुक के उठे, आ गई चाल नई.... बात कुछ बन ही गई" . रमाच्या पायांनी एव्हाना ठेका धरला होता.
हे कमी होतं की काय म्हणून लोकांना धुंद करून टाकायला लागोपाठ गीता दत्तचच शृंगार रसात ओथंबलेलं सुरेख "साहेब बिबी" मधील गाणं लागलं - "पिया ऐसो जिया मे समाइ गयो रे के मै तन मन की सुध बुध गवान बैठी"....... प्रेक्षक जग आणि स्वत:ला विसरले होते पार ....... "मोरे आंगनमे जब पुरवैयां चली मोरे द्वारे की खुल गइ किवडीया मैने जाना के आ गये सावरीया मोरे झट फूलनकी सजियापे जा बैठी"
त्यानंतर देवच्या आर्जवी "अभी ना जाओ छोड्कर के दिल अभी भरा नही" नी सभागृह भारून गेलं.
मग लयलूट झाली-
दिल तडप तडप के केह रहा है आ भी जा"
"छोड दो आन्चल जमाना क्या कहेगा"
"हाल कैसा है जनाब का"
"उडे जब जब जुल्फे तेरी"
"आइये मेहेरबान"
"येह कैसी अजब दास्तान हो गयी है"
सारख्या मदभर्या, सदाबहार गाण्यांनी.
शेवटचं गाणं अतिशय आर्जवी स्वरांच , व्याकुळ करणारं ... एस. डी बर्मन यांच "मेरे साजन है उस पार मै मन्मार हूं इस पार" ..... जेव्हा जेव्हा अमित जहाजावर असायचा रमा हे गाणं ऐकायची . आजही ऐकताना तिला ते जुने दिवस आठवले , अमित ने शोर जॉब घेण्या पूर्वीचे..... बोटीवरचे.........."मत खेल जल जायेगी केहेती आग मेरे मनकी, मै बंदीनी पियाकी मै संगीनी हूं साजन की..... मेरा खीन्चती है आन्चल मनमीत तेरी हर पुकार"
आणि तिला जुन्या दिवसांच्या अनामिक हुरहूरीने दाटून आलं.
सभागृहात लख्ख दिवे लागले. सगळे प्रेक्षक उठले. अमित रमाला विचारत होता "कुठे हरवलीस? आवडला की नाही कार्यक्रम?"
रमानी होकरार्थी मान हलवली आणि अमितला घट्ट पकडून ती सुरांवर तरंगत , थोडी हुरहूर लागलेली पण खूपशी समाधानी अशी गर्दीतून वाट काढू लागली. शेवटी अमित तिच्याबरोबर होता, तिचा होता. कधीच परत जहाजावर जाणार नव्हता.
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
निरोप - ३
प्रेषक श्रावण मोडक ( गुरू, 03/04/2010 - 19:04) .निरोप - १ - http://www.misalpav.com/node/11221
निरोप - २ - http://www.misalpav.com/node/11236
नदीच्या किनार्यावरून वर चढू लागलो की, साधारण दोनशे फुटांवर शेताचा बांध. ते शेत ओलांडलं की गावातलं पहिलं घर. जिवा कारभार्याचं. एरवी त्याचं वर्णन झोपडी म्हणूनच होत आलं होतं. बातम्यांमध्ये आणि सरकारी दस्तावेजांमध्ये. पण या घराचं सरकारी कागदपत्रांतील, मोजणी न करताच नोंदलेलं, क्षेत्रफळ सहाशे चौरस फुटांचं. सागाचा वापर. म्हणजे मोल काही लाखांमध्ये जाणारं. नदीकडून वर चढून आलं की घरात प्रवेश करण्याची लाकडी चौकट. सहा फूट रुंदी, आठेक फूट उंची. आत डाव्या हाताला गुरांची जागा. तिच्या पाठच्या बाजूला बहुदा न्हाणीघरासदृष्य सोय असावी. कारण ओल दिसायची. उजव्या बाजूनं घराचा मुख्य भाग. पहिली मोठी खोली. बैठकीची खोली म्हणतो तशी. आत गेलं की कळायचं ही खोली काही स्वतंत्र नाही. सार्या घराचीच एक खोली आहे. बाकीच्या सोयी केवळ आडोसा उभा करून आखलेल्या.
रात्री बाराच्या सुमारासही या घराच्या नदीच्या बाजूच्या अंगणात किमान वीसेक डोकी होती. तिघं एका बाजूला होते आणि बाकी सारे त्यांच्यासमोर त्यांचं बोलणं ऐकत असल्यासारखं घोळ करून बसलेले. बाटलीतून काढलेल्या वातीच्या चार ज्योती गरजेपुरता प्रकाश देत होत्या. त्यापैकी दोन या तिघांच्यासमोर ठेवलेल्या. इतर दोन त्या घोळाच्या दोन्ही बाजूंना. हळू आवाजात तिघांचं काही बोलणं सुरू होतं. समोरचे गप्प होते. काही जण हातातील बिड्यांमध्ये गर्क होते. बसलेल्या प्रत्येकाच्या शेजारी त्याचं-त्याचं हत्यार होतं. बहुतेक शस्त्रं बहुदा पोलीसांवर केलेल्या हल्ल्यातून मिळवलेली. 'मसाला' नंतर मिळवलेला. शस्त्र आहे म्हणजे नदीच्या पल्याड 'वर्दीवाला' म्हणून आणि इकडच्या बाजूला 'दादा' म्हणून मिळतो तो मान. घोळक्यापासून सुमारे पन्नास फूट अंतरावर नदीच्या विरुद्ध दिशेला दाट झाडोरा होता हे त्यावेळच्या चांदणप्रकाशातही दिसून येत होतं. त्याच बाजूला आणखी दोन जण होते. गस्तीवर. हातात बंदुका.
पाच-सात मिनिटं कुजबुजीतच गेली आणि त्या तिघांपैकी एकानं तोंड उघडलं.
"रामराम," समोरच्या घोळक्यातील काही जण नव्यानं आले असावेत. "आत्ताच दिवा आणि रामदास आलेत. एवढ्या रात्री जंगलातला रस्ता कापत आले दोघंही. आपल्यासाठीच. आपलेच आहेत..." आवाज जरबेचा होता. समोर शांतता होती. बसलेल्यांमध्ये काहीही हालचाल नव्हती.
"उद्या, खरं म्हणजे आजच, रात्रीपासून अॅक्शन घ्यायचं पोलिसांचं ठरलं आहे. डामखेड्यात घुसून मोजणी करणार आहेत. परवा मोजणी पूर्ण करून रिपोर्ट जाईल. त्यानंतर दोनच दिवसांनी कोर्टात केस आहे. तिथं तो सादर केला जाईल..."
बोलता-बोलता तो उठून उभा राहिला. त्याचे हात फिरू लागले. आवाज तापू लागला.
"महिनाभर ठेवलेली शांतता स्वतःच मोडायचं सरकारनं ठरवलंय. आपल्याला उत्तर द्यावं लागेल. उद्याच्या सर्वेतून एका गावाची माहिती सरकार देऊ शकलं तर आपला मुद्दा संपला. काहीही करून उद्या गावात घुसायचं हे त्यांचं ठरलंय. मोजणीसाठी माणसं असतील. हजाराहून जादा पोलीसच आहेत. एसआरपी आहे त्यात. एक डेप्युटी कलेक्टर आहे. फायरिंगची ऑर्डर देण्यासाठी. रात्री घुसायचं आणि परवा सर्वे करून घ्यायचा. हा डाव हाणून पाडावा लागेल..."
जमीन जाऊ द्यायची नाही हे गावकर्यांचं पक्कं होतंच. त्यामुळं त्याविषयी फारसं बोलण्याची गरज नव्हती. घर-घर उलथून माती खोदून त्यातून धातू काढण्याचा, म्हणजेच तिथं खाणी काढण्याचा सरकारचा डाव आहे खासगी कंपनीसाठी वगैरे त्यानं काही वाक्यांतच संपवलं. जिओरिसोर्सेस लिमिटेड हे कंपनीचं नाव घेऊन झालं. जिव घेणारी कंपनी असाही उल्लेख झाला. पण ते काही वाक्यांपुरतंच. समितीचं काम आता त्यापुढं आलं होतं याची त्याला जाण होती. नव्हे, परिस्थितीवर त्याचीच मांड पक्की होती. मग चर्चा सुरू झाली. चर्चा एकाच मुद्याची - एकूण किती माणसं डामखेड्यात न्यायची?
अरवलीतून डामखेड्याकडं येताना रस्ता सुटला की सहा मैलांची पायपीट. त्यातल्या मैलभर आधी उजवीकडं वळलं की नदीच्या दिशेनं माणूस जातो. नदीच्या काठावरून एक रस्ता आहे गावात येण्यासाठी. पण ही नदी मगरींची. त्यामुळं तो रस्ता बाद. अरवलीतून मुख्य रस्त्यानंच गावात येणं-जाणं. गाव पहाडात उंचावर आहे. गावात शिरायचं तर तीनेकशे फुटांची चढ आहे. तीनेकशे फूट म्हणजे उंची. अंतर मैलभराचं. ही चढ गाठण्याआधी सखल पठारी भाग. त्यातूनच वाटचाल करत यायचं. या पठारात जंगल नाही. चढ, म्हणजेच डोंगर सुरू होतो तिथं पुन्हा जंगल. त्यामुळं पोलिसांना गाठायचं तर त्या सखल पठारासारखी खिंड नाही. हा प्लॅन पक्का झाला.
डामखेड्यातील वीस जण पक्के होते. आणखी ऐंशी जणांची जुळणी करायची. आजूबाजूच्या गावांतून. शंभर जणांची फौज पुरेशी आहे असं सगळ्याच प्रमुखांना वाटत होतं. त्याच्याशी बाकी सहमत होते. कारण पोलिसांना परतून लावण्याचा फक्त मुद्दा होता आणि आजवरच्या अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट होती. थोडी जोमाची चढाई केली तर ते ठिकाणच असं आहे की पोलिसांना माघार घ्यावीच लागणार. एकदा का पोलीस इकडं-तिकडं विखुरले गेले की मग विषय संपतो.
"भाई, गोळ्यांचं काय?" एकानं मुद्दा काढला. भाईनं त्याची नोंद केल्याची खूण केली.
बैठकीतूनच जाऊन काही जणांनी जंगलाच्या सीमेवर काही झाडं पाडून रस्ता अडवायचं काम सुरू केलं. जिल्हा कोर्टात जाऊन पोलीस अॅक्शनला मनाई मिळवण्याचा प्रयत्न करण्याचं ठरलं. हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टातही केस सुरू असताना सर्वे करण्याचा सरकारला अधिकार नाही, कारण त्या सर्वेचा अर्थ आमचा मालकी हक्कच नाकारण्याच्या प्रक्रियेची सुरवात वगैरे युक्तिवाद आहे खरा. तरीही मनाई मिळेलच असं नाही, पण कोर्टात गेल्याच्या निमित्तानं बोंबाबोंब करता येणार होती हे नक्की.
शेजारच्या सहा गावांत फौजफाट्यासाठी निरोप रवाना झाले. निरोपे चालतच गेले. चालतच ते थेट डामगावांत येतील.
दिवा व रामदासनं मोटरसायकलला किक मारली तेव्हा पहाटेचे अडीच वाजले होते. जिल्ह्याकडं जायचं होतं - सकाळीच कोर्टात मनाईसाठी अर्ज जावा हा निरोप घेऊन. सोबत काही चिठ्ठ्या होत्याच.
---
जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या समोरचा एसटीडी बूथ शंकरनं उघडला तेव्हा साडेनऊ झाले होते. दुकानाच्या दारात दिवा आणि रामदास थांबले होते. रामदासचा चेहरा ओळखू येत नव्हता. सरदारफेटा डोक्यावर. अंगात टीशर्ट. दिवाच्या डोक्यावर कॅप. त्या दोघांना घेऊन शंकर आतल्या खोलीत गेला. पाचेक मिनिटांतच तो बाहेर आला आणि त्यानं फोन फिरवण्यास सुरवात केली.
सव्वा अकराच्या सुमारास शंकरनं आत जाऊन दिवा आणि रामदासला जागं केलं. कोर्टातली सुनावणी दुपारी होती. त्या दोघांसाठी शंकरनं जेवण मागवलं. जेवून दोघांनीही पुन्हा अंग टाकलं. आधीचा दीड तास आणि आता आणखी अडीचेक तासांची झोप निश्चित होती आणि गरजेचीही होती.
दुकान नोकरावर सोपवून शंकर बाहेर पडला. आज त्याची पायपीट नव्हती. रामदासकडून मोटरसायकलची चावी त्याच्या हाती आली होती. परतताना टाकी फुल्ल करून आणायची होती इतकीच प्रेमाची 'अट'.
शंकरनं आधी मुख्यालयातच फेरी मारली. एका खोलीत तो शिरला आणि अर्ध्या तासानं बाहेर आला. मग त्यानं गाडीला किक मारली आणि त्यानं नवागावचा रस्ता पकडला. खडबडाटी रस्त्यांवरून आरामात गाडी हाकत तो पोलीस लायनीत एका घरात शिरला. तासाभरानं तेथून तो बाहेर पडला तेव्हा संध्याकाळी पाचनंतर त्याच्या बूथवर येण्याचं त्याच्या मित्राचं आश्वासन त्याच्या हाती होतं.
शंकरनं मग टाकी फुल्ल केली. बूथवर येऊन त्यानं एक फोन आतल्या खोलीत घेतला आणि आतल्या कपाटातून एक डायरी काढली. प्रमुख वृत्तपत्रांतील प्रतिनिधींना निरोप देण्याचं काम त्यानं सुरू केलं.
---
सकाळी सहा वाजता किशोरचा गावात फेरफटका झाला होता तेव्हा एकही व्हॅन त्याला दिसली नाही. याचा अर्थ फौजफाटा अरवलीला गेला होता.
नदीच्या किनारी किशोर भेटला तेव्हा देवरामनं बरोबर दहा मिनिटं पवारनं आदल्या रात्री जे काही सांगितलं होतं त्याची उजळणी केली. त्यानुसार डामखेड्यानंतर राळखेड्याचा नंबर होता. डामखेड्याच्या पश्चिमेला. रेस्टहाऊसवर किशोरनं बारा वाजता चक्कर मारावी असं ठरलं आणि देवराम निघाला तेव्हा साडेसात झाले होते, रेस्ट हाऊसवर एसआरपीचे अधिकारी चहाच्या प्रतीक्षेत होते.
दुपारी बाराच्या सुमारास डीवायएसपींना जिल्हा कोर्टातील अर्जफाट्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीनं तिकडं धाव घेतली. सुनावणी साडेतीनला होती. त्याच निमित्तानं त्यांनी चौकशी केली तेव्हा समितीनं कोर्ट आणि समर्थकांकडून आवाज उठवणे यावर सारा भर ठेवला असल्याचं त्यांना कळलं. अर्थात, त्यावर त्यांनीही विश्वास ठेवला नाही. तयारी पूर्ण करायचीच होती.
प्रांताधिकार्यांनी डेप्युटी कलेक्टरच्या कार्यालयात तीस जणांचं मोजणी पथक हजर केलं तेव्हा अडीच वाजले होते. निघण्यास केवळ दीड तासांचा अवधी होता आणि तेवढाच वेळ कलेक्टरांकडून आलेल्या सूचना अधिक डेप्युटींच्या सूचना यासाठी होता.
रुपसिंग आणि धनजीसेठच्या मागं जिल्ह्यातून आलेल्या पत्रकारांचं पथक रातंब्रीच्या दिशेनं चालू लागलं तेव्हा साडेतीन झाले होते. रातंब्रीमार्गे त्यांना डामखेडा गाठायचं होतं. रातंब्रीच्या पुढं बारा मैलांचं अंतर होतं. काही अंतरावर जीप होती, तिथून ती रातंब्रीच्या थोडं पुढं वेगळ्या वाटेवर नेऊन सोडणार होती. त्यानंतर पायपाटी. ती सारी अंधारात करावयाची होती. काहींच्या पोटात आत्ताच गोळा आला होता. रातंब्रीपासून धनजी आणि रुपसिंग मागं येणार होते, तिथून पुढं समितीच्या हत्यारींच्या ताब्यात पत्रकार जाणार होते.
"पोलिसांचा कोणताही वावगा इरादा नाही, महसूल यंत्रणेचं संरक्षण यासाठीच आम्ही तिथं जाऊ," पोलिसांचं प्रतिज्ञापत्र मान्य करून, आणि समितीकडून काहीही ठोस पुरावा नसल्यानं, न्यायालयानं सर्वेच्या कारवाईला मनाई हुकूम देण्यास नकार दिला आणि दिवा व रामदास यांनी जिल्ह्याच्या ठिकाणाहून मोटरसायकलला किक मारली. तालुक्यापर्यंत दीड तास आणि त्यानंतर पुढचा वेळ. काहीही झालं तरी मावळतीला अरवली ओलांडलेलं असलं पाहिजे. रामदासनं गाडी सुसाट सोडली तेव्हा सव्वाचार झाले होते.
डेप्युटी आणि प्रांतांच्या पथकासोबत पोलिसांच्या व्हॅन अरवलीच्या दिशेनं निघाल्या तेव्हा पाच वाजले होते.
साडेपाचला किशोरला अड्ड्यावर फोन आला तेव्हा तो नुकताच तिथं पोचला होता. पोचेपर्यंत फोन कट झाला, पण लगेचच पुन्हा रिंग झाली. किशोरनंच फोन उचलला. शंकरचा आवाज. माहिती तीच, 'डामखेड्यानंतर पश्चिमेकडं. नदीकाठच्या रस्त्यानं; सोबत रस्ता दाखवण्यासाठी फुटके मोती आहेत. फुटके मोती म्हणजे अरवलीचा माजी सरपंच आणि पाटील. समितीतून फुटलेल्यांपैकी दोघं. पश्चिमेकडं म्हणजे राळखेडा हे कन्फर्म.
रेस्टहाऊसच्या मागं नदीच्या किनारी झाडोर्यात दिवा आणि रामदास पोचले तेव्हा पावणेसहा झाले होते. सहापर्यंत त्यांनी तिथं थांबायचं होतं. त्यानंतर ते अरवलीच्या दिशेनं जाणार होते.
अस्वस्थ दिवा सारखा घड्याळाकडं पहात होता. सहाला पाच मिनिटं कमी होती. किशोरच्या भेटीशिवाय निघायचं म्हणजे काही घोळ तर नाही? त्याच्या डोक्यात गुंता होऊ लागला होता, पण फार काळ नाही. रेस्ट हाऊसच्या मागून भराभरा चालत येणारी किशोरची मूर्ती दिसली तसा तो स्वस्थ झाला. डामखेड्यानंतर पश्चिमेकडं, हा निरोप सकाळीच गावांत गेला होता. पण अपुरा. आता सविस्तर. पश्चिमेकडंही मोर्चेबांधणी करावी लागणार होती.
नवं आव्हान होतं. पोलिसांनी अरवलीहून कूच करण्याच्या वेळेसच डामखेड्याला पोचण्याचं. कारण तसं झालं तरच पोलिसांच्या 'स्वागता'ची पश्चिमेच्या गावांतील मोर्चेबांधणी करता येणार होती. अंदाज असा होता की, पहाटे अडीचच्या सुमारास पोलिसांची पहिली तुकडी आली असेल. गाव वाचवायचं असेल तर दहाच्या आधी गावकर्यांची हालचाल सुरू झालेली असली पाहिजे. अशी स्थिती आली की दिवाच्या अंगात यायचं. आत्ताही तेच झालं. गावात निरोप पोचवायचा म्हणजे पोचवायचाच. दहाच्या आतच. त्यानं मोटरसायकलला किक मारली आणि पाहता-पाहता ते तिठ्याच्या पलीकडं दिसेनासे झाले.
क्रमशः
निरोप - २
प्रेषक श्रावण मोडक ( बुध, 03/03/2010 - 18:54) .रातंब्रीच्या पुढं दोन रस्ते फुटतात. एक खाली उतरतो. खोल खाली. सूर्य मावळण्याच्या साधारण तासभर आधी त्या रस्त्यावरून वाहतूक बंद होते. कुणाचीही. दुसरा रस्ता डावीकडे वळून पुन्हा पहाडात चढतो. घाटाची वळणं घेत चढण संपवतो आणि पठाराला लागतो. तीन गावं ओलांडली की पुन्हा उजवीकडं वळण. एक घाट उतरून तासाभरानंतर तालुक्याचं ठिकाण. आधीच्या फाट्यावरून खाली उतरलेल्या रस्त्यानं मात्र तालुक्याचं ठिकाण गाठायला फक्त वीस मिनिटं लागतात. कारण तो खाली उतरताना पाचेक मैलातच डोंगर संपतो आणि तिथून डावीकडं वळलं की सपाटीचा रस्ता आणि पुढं तालुक्याचंच ठिकाण. पण ते पाचेक मैलांचं अंतर जीवघेणं, अशी त्याची ख्याती. तरसं आणि एखादा बिबटा यांचं क्षेत्र, अशी चर्चा. त्यामुळं मावळतीनंतर कोणीही तिकडून जात नाही. अपवाद दिवा आणि त्याच्या साथीदारांचा. त्यांची खुशाल जा-ये सुरू असते. त्यामुळं, त्यांनीच ती तरस आणि बिबट्याची चर्चा उठवून दिली असावी असं सरकारी लोक नेहमी बोलतात, पण ती चर्चा खोटी ठरवण्यासाठी त्या रस्त्यानं मावळतीनंतर जाण्याचं धाडस दाखवत नाहीत हेही लोकांना पक्कं ठाऊक आहे. अर्थात, लोक या गोष्टींवर अवलंबून नसतात. ते त्यांच्या गतीनं चालत असतात.
दिवा संध्याकाळी सूर्य मावळला की त्याच रस्त्यानं निघतो आणि साडेसातला तालुक्याला पोचतो. आजही तेच. दुपारी तो रातंब्रीच्या पुढं निमखेड्याला गेला होता. तो आणि रामदास. रामदासला मोटरसायकल चालवता येते, पण रस्त्यावर. रातंब्री ते निमखेडा म्हणजे केवळ पायवाट. पायवाट म्हणजे नेहमीच्या पायवाटेपेक्षा रुंद. वाटेत तीन ठिकाणी ओढे ओलांडून जावं लागतं. अंतर सहा मैलांचं. गाडी पहिल्या आणि दुसर्या गियरवरच चालवता येते. हे अंतर दिवा कापतो तीस मिनिटांत. मागं बसणार्याची तयारी हवी. रामदासची ती आहे. तो नुसता बसत नाही. निमखेडा आणि पुढच्या गावांना न्यायची सामग्री घेऊनच जातो प्रत्येकवेळी. त्यात अगदी वह्या-पुस्तकांपासून काहीही असतं. 'मसाला' तर असतोच असतो. अर्थात, 'मसाला' असेल त्यावेळी प्रवास रात्रीचा. मोहीमेतील ठिकाणाच्या आधी मैलभर अंतरावर थांबायचं आणि तिथून चालत पुढची वाटचाल.
रातंब्रीच्या फाट्यावरून खाली उतरणार्या रस्त्यावरून दिवानं मोटरसायकल काढली आणि रामदासनं काही मिनिटांसाठी दोन्ही बाजूंनी मिळणार्या आडोशाचा फायदा घेत बिडी पेटवली.
"अंडी न्यायची का जाताना?" रामदासनं एक झुरका मारून दिवाला विचारलं. तालुक्यालाच मुक्काम करण्याचा त्यांचा विचार होता. दिवानं मान डोलावली. भाकरी आणि अंड्याची भाजी हा बेत रामदासचा आवडता. त्यामुळं स्वारी खुश झाली.
साडेसातला दहा मिनिटं कमी असताना मोटरसायकलनं मधल्या नाल्यावरचा पूल ओलांडला आणि ती डावीकडं गावाच्या दिशेनं वळली. फर्लांगभर अंतर कापलं असेल - नसेल तेवढ्यात दिवाचं लक्ष वेधून घेतलं ते रुपसिंगच्या दुकानावरच्या झेंड्यानं. समितीचा झेंडा. तो त्यावेळी तिथं फडकतोय याचा अर्थ होता की दिवानं तिथंच थांबायचं आहे. किशोरनं आखून दिलेली शिस्त होती ती. दिवानं ब्रेक दाबला. गती कमी झाल्यावर रुपसिंगच्या दुकानाशेजारी असलेल्या बोळात गाडी वळवली, थांबवली आणि तो व रामदास उतरले. दहा एक पावलं चालले आणि रुपसिंगच्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या शेतात शिरले. शेत मोठं होतं. डावीकडून चालत ते नाल्याच्या दिशेनं जाऊ लागले. उतार सुरू होतो तिथं चार दांडकी जमिनीत ठोकून चौरस आडोसा तयार केला होता. आतून प्रकाश पाझरत होता याचा अर्थ किशोरभाई आत्ता तिथंच असणार.
"सलाम, किशोरभाई." दोघंही एकाचवेळी दरवाजातून आत शिरतानाच म्हणाले. किशोरनं हात कपाळापाशी नेला.
औषधाच्या बाटलीतून बाहेर आलेल्या वातीची भगभग सुरू होती. त्या उजेडात तो चिठ्ठी लिहित होता. दोन चिठ्ठ्या लिहून झाल्या होत्या. त्यांच्या घड्या समोर होत्या. दिवा विचारात पडला, किती ठिकाणी जावं लागणार आहे? त्याची ना नव्हती; प्रश्न वेळेचाच असायचा. रात्री किती फिरायचं याला मर्यादा होतीच नाही तरी. साधारण वीसेक मैलांच्या टापूत चार ठिकाणी पोलिसांचे कॅम्प वाटेत लागायचे. तो धोका होता म्हणून. पूर्वी तो रात्रीच्या रात्रीच फिरायचा.
"दिवार्या," किशोर हाच एकटा असा की जो दिवाला त्याच्या पूर्ण नावानं हाक मारायचा, "आज कुठल्याही परिस्थितीत सायगावला जावं लागेल..." किशोर बोलू लागला. दिवानं चमकून त्याच्याकडं पाहिलं. सायगाव म्हणजे डामखेड्याच्या पुढं. जायचं म्हणजे आले त्याच्या विरुद्ध दिशेला. रस्ता ठीक, पण वाटेत सर्वांत मोठा पोलीस कॅम्प. अरवलीचा.
"पर्याय नाही. भाई तिथंच आहे. तो उद्यापर्यंत काही डामखेड्यात येणार नाहीये. उद्या अॅक्शन सुरू होतीय डामखेड्यातून..." भाई म्हणजे समितीचा सरचिटणीस अनीश रेगे. सध्याचं नाव भाई.
थोडा वेळ सारेच गप्प होते. चर्चा करण्याची गरज नव्हती. भाईपर्यंत निरोप पोचवायचा इतकं पुरे होतं कृती करण्यासाठी. पंधरा मिनिटांनी किशोरनं दिवाच्या हाती तिन्ही चिठ्ठ्या ठेवल्या. एक डामखेड्यात रतीलालला द्यायची होती. ती पूर्वतयारीसाठी असणार. उरलेल्या दोन्ही पुढं सायगावला भाईसाठी. वेगळे विषय असतील तर एकच चिठ्ठी लिहायची नाही; दोन चिठ्ठ्या त्या नियमानुसार.
"आता इथं थांबू नका. आज फौजफाटा आहे इथं. आठनंतर गावांत गाड्या येऊ लागतील. आत्ता बाहेर थांबल्या आहेत..." किशोरनं थांबलेल्या गाड्यांचा उल्लेख केला. गांभीर्य लक्षात येण्यास तेवढं पुरेसं होतं.
किशोरनं गरजेपुरती माहिती त्या दोघांनाही दिली. डामखेड्यात उद्या हजार पोलीस घुसतील. एसआरपीसह. सोबत महसूलची पथकं. तीनशे लोकसंख्येच्या गावाच्या तिप्पट बंदोबस्त. म्हणजे काहीही करून परवा दुपारी मोजणीचा पहिला रिपोर्ट पाठवायचा असणार सरकारला. सुप्रीम कोर्टात चार दिवसांनी सुनावणी. रात्रीच्या सुमारास पोलीस घुसतील. गावात शिरल्यानंतर प्रत्येक घरामागं पोलीस असतील. सोबत एक डेप्युटी कलेक्टर. फायरिंगची ऑर्डर काढणं सोपं. रात्रीतून मोर्चेबांधणी पक्की. सकाळी सगळ्या शेतांची मोजणी सुरू. व्हीडीओ शुटिंग होईल. दुपारपर्यंत डामखेडा पूर्ण करून रिपोर्ट येईल.
दिवा आणि रामदासनं स्वाभाविकच विचारलं, "परत येणार माघारी की...?"
"परत कशाला येतील? पुढचं गाव कळलेलं नाही. पूर्व की पश्चिम इतकाच प्रश्न आहे. उद्या कळेल. निरोप पोचवून तुम्ही दोघंही माघारी या. येताना रस्ता कुठला घ्यायचा हे जाताना परिस्थिती पाहून ठरवा. अरवलीच्या कॅम्पवर हालचाल असेल. त्यातून अंदाज येईल. जमलं तर आरवलीत रामदासला उतरून आत जाऊदे. तासाभरात तो गाव ओलांडून येईल. मग त्याला घे सोबत. तू बाहेरूनच जा..." किशोरच्या सूचना सुरू होत्या.
मोटरसायकल सव्वाआठला तिठ्यावर आली आणि डावीकडं वळून अरवली-डामखेड्याच्या दिशेला लागली.
---
संध्याकाळी साडेसातनंतर स्टँडवर कोणीही असत नाही. शेवटची बस साडेसहालाच गेलेली असते. सात ते सव्वासातच्या दरम्यान दोन गाड्या परत यायच्या असतात. त्या आल्या की सारं सुनसान. पोलीस ठाण्यापासून पाच मिनिटांच्या अंतरावर स्टँड, पण या दिवसांत रोज संध्याकाळी सहानंतर रात्री साडेआठपर्यंत कॉन्स्टेबल पवारची नेमणूक. काम काहीच नाही. चोहीकडं नजर ठेवून रहायचं. कोण येतंय, कोण जातंय हे पहायचं. स्टँडवर फक्त बसायचं नाही. स्टँडच्या समोरून जाणारा रस्ता ते तिठा, तिठ्यावरून माघारी परत स्टँड ते बाजार हा रस्ता आणि त्याला तिथंच डावी-उजवीकडं फुटणारे दोन रस्ते. डावीकडच्या रस्त्यानं नदीकडं जाता येतं. उजवीकडचा रस्ता वसाहतीत. तिथं सरकारी अधिकारी-कर्मचार्यांचं वास्तव्य. मुख्य रस्त्यावर स्टँड आणि तिठा यांच्या मध्ये नदीच्या दिशेला एक रस्ता फुटला आहे, तिथं रेस्टहाऊस. तिथंही नजर ठेवायची. बाहेरगावचे पत्रकार रात्रीच गावात पोचतात आणि मुक्कामासाठी रेस्टहाऊसच गाठतात म्हणून.
ठरल्याप्रमाणे बाजार रस्ता, आतले दोन्ही रस्ते करून तो स्टँडवर आला तेव्हा सातचा ठोका झाला. एकटा कंट्रोलर - कंट्रोलर म्हणजे क्लार्कच - होता बसून. त्याच्या शेजारची खुर्ची पवारनं गाठली. खिशातून पुडी काढली. तो तंबाखू मळू लागला. तशी हालचाल नव्हती. त्यामुळं पवार निश्चिंत होता.
पहिली बस यायला दहा मिनिटं लागली. जागेवरूनच पवारला कळलं की बसमध्ये खच्चून सहा-सात जण आहेत. त्यामुळं त्याला उठण्याचीही गरज नव्हती. त्यानं फक्त नजर लावून बारकाईनं पाहिलं. सरपंचाची बायको आणि मेहुणी होती. त्या मेहुणीला पाहताना पवारचा काटा किंचित हलला, पण त्यानं आवरलं. रुपसिंगचा पोरगा होता. तो बहुदा माल घेऊन आला असणार. इतरांमध्ये दोघं तर मास्तरच होते. आज त्यांची मिटिंग असणार झेडपीत. ती उरकून येत असावेत. बाकी एक-दोघं गावकरी. दुसरी बस पाठोपाठच आली. तिच्यातून तर केवळ कंपौंडर उतरला. बस थेट आतमध्ये गेली.
पवारनं हातातल्या कागदावर काही लिहिलं. कंट्रोलरनं पाहिलं पण काही विचारलं नाही. हे आता सवयीचंच होतं. आपला गाशा गुंडाळून तो निघाला.
"ये लवकर उरकलं तर. मी आहे बसलेलो." कंट्रोलरनं बसलेलो या शब्दावर जोर दिला. अर्थ स्पष्ट होता. गावातल्या एकमेव बारमध्ये. पवारनं मान डोलावली. आणि तोही निघाला.
पवारनं रेस्ट हाऊसचा राऊंड केला. तिथं कोणी आलेलं नव्हतं. एसआरपीचे दोन डेप्युटी कमांडंट सोडले तर. ते सकाळपासूनच होते. देवराम मागं स्वयंपाकाच्या तयारीत होता. आज त्या दोघा कमांडंटच्या जेवणात त्याचं जेवण निघून जाईल. सहजच पवारनं चौकशी केली. कोंबडी होती. देवराम त्याच्याकडं अपेक्षेनं पहात होताच, पण पवारनं स्वतःला आवरलं. बारमध्ये जायचं आहे, हे त्याला आठवलं. तरी देवरामनं आग्रह केलाच. "ये की तिकडून, मी नाही तरी अर्धा किलो जादा आणलंच आहे. तू येशील म्हणून." देवरामला पक्कं ठाऊक होतं. बारमधून आल्यानं पवार थोडा ढिला होईलच. पुढची कामं मार्गी लावता येतील हा त्याचा विचार.
तिठ्याच्या पलीकडं थोडा उंचवटा आहे. तिथं पोचल्यावर पवार मागं वळला. पंधरा एक पावलं त्यानं कापली असावीत आणि त्याचे डोळे चकाकले. समोरून प्रकाशाचा झोत आला. काही क्षणात मोटरसायकल दिसली आणि ती अरवलीच्या दिशेनं वळली. पवारनं शेजारी शेतात उडी घेतली आणि मधनं धावत त्यानं अरवली रस्ता गाठला. कुंपणाच्या आड असतानाच त्याला चेहरे अर्धवट दिसले - दिवा आणि रामदास! मोटरसायकल निघून गेली आणि पवार वळला. त्यानं पुन्हा आठवून खात्री केली. मोटरसायकलला नंबरप्लेट नव्हती. म्हणजे दिवा आणि रामदासच. आजचं काम संपलं होतं.
रात्रीच्या सुरवातीला दिवा आणि रामदास अरवलीच्या दिशेनं? कुठं निघाले असावेत? ही काही वेळ नाही पहाडात शिरण्याची. अर्थात, समितीच्या लोकांचं काही सांगता येत नाही. ते केव्हाही, कुठूनही उगवतात. हत्यारं असतातच. वेळ आला तर मारायची तयारीही असतेच. पण तरीही...
पवारचं विचारचक्र सुरू होतं. दिवा आणि रामदास हे कधीही सापडत नाहीत. दिसतात सर्वत्र. असतात सर्वत्र. सारी निरोपानिरोपी आणि पोचवापोचवी तेच करतात. या भागांत तरी. आत्ता यावेळी हे दोघं त्या दिशेनं कसे? पवारला आठवलं, दोनेक महिन्यांपूर्वी या दोघांना त्यानं रातंब्रीच्या रस्त्यावर रात्री असंच पाहिलं होतं. ठाण्यात येऊन त्यानं रिपोर्ट केला आणि तो खोलीवर गेला. सकाळी आठ वाजता त्याला कळलं होतं ते इतकंच की रातंब्रीच्या पुढं समितीच्या लोकांनी समरी गावाकडून येणार्या पोलीस पार्टीवर हल्ला केला. तिघं मारले गेले. ती पोलीस पार्टी येणार असल्याची खबर दिवा आणि रामदासच घेऊन गेले होते इकडून. पण पुरावा नाही. तेव्हापासून दिवा आणि रामदास यांच्याकडं सारं लक्ष केंद्रित झालं.
डीवायएसपी ऑफीस आणि कंट्रोल रूम. दोन ठिकाणं अशी होती की जिथं दिवा आणि रामदासच्याबाबतीतील निरोप जाणं गरजेचं होतं.
विचारांच्या चक्रातच पवार ठाण्यावर आला. पीआय गुर्जर अद्याप होते. त्यांनाच जाऊन सांगावं, पवारनं ठरवलं.
"सर, दिवा आणि रामदास आत्ता अरवलीकडं गेले. मोटरसायकलवर."
गुर्जरांनी डोकं वर केलं आणि नजर प्रश्नार्थक केली.
"बाकी काही माहिती नाही. मी तिठ्यावरून परतताना ते वळले तिकडं."
गुर्जरांनी पुन्हा मान डोलावली. पवार ताठ झाला आणि त्यानं पाऊल मागं टाकलं.
पंधरा मिनिटांत डीवायएसपी, होम डीवायएसपी आणि एसपी या तिघांशीही गुर्जरांचं बोलणं झालं. उद्याची दुपार ही डेडलाईन ठरली, समितीची काय तयारी असेल याची माहिती काढण्याची. अर्थात अॅक्शन प्रोग्राममध्ये काहीही बदल नाही.
अर्ध्या तासानं गावाबाहेर थांबलेल्या व्हॅन्स गावाच्या दिशेनं सरकू लागल्या.
क्रमशः
निरोप - १
प्रेषक श्रावण मोडक ( मंगळ, 03/02/2010 - 23:12) .रेस्ट हाऊसवरून स्पेशल आयजींची गाडी बाहेर पडली आणि त्यापाठोपाठ पत्रकारांचा जत्था बाहेर पडला. डावीकडच्या गेटमधून सारे बाहेर आले. त्या क्षणी त्यांच्यापैकी कोणाच्याही हाती काहीही बातमी नव्हती.
स्पेशल आयजींची बैठक सुमारे सव्वादोन तास सुरू होती. बैठकीत एकूण परिस्थितीचा आढावा घेतल्याचं फक्त स्पेशल आयजींनी सांगितलं होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार परिस्थिती नियंत्रणात होती. वाटाघाटींचा प्रयत्न सुरू असला तरी, जन संघर्ष समितीकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद आलेला नव्हता; मात्र समितीच्या कारवायाही थांबल्या असल्यानं कोंडी फुटण्याची चिन्हं होती.
अर्थात, स्पेशल आयजींनी हे जे काही सांगितलं ते पत्रकारांच्या समोर. मागं बरंच काही घडलं असणार याची किशोरला खात्री होती. किशोरचं काम तेच होतं. मागं जे काही घडलं असेल ते बाहेर काढायचं. तालुक्याच्या ठिकाणी, तेही प्रत्यक्ष संघर्षग्रस्त क्षेत्रात, स्पेशल आयजी येतो, सव्वादोन तास बैठक घेतो आणि फक्त परिस्थितीचा आढावा घेतो यावर त्याचा विश्वास नव्हता. बैठकीला त्यानं एसआरपीही बोलावली होती. एसआरपीचा कमांडंट बैठकीला येण्याची ही पहिलीच वेळ होती, पण ज्याअर्थी तो होता, त्याअर्थी स्पेशल आयजीच्या वरही काही घडलं असलं पाहिजे इतकं त्याला कळत होतं.
साडेचार झाले होते. अंधार पडायला दोन तास बाकी. म्हणजे हाती असलेला वेळ फक्त एका तासाचाच. किशोर रेस्ट हाऊसमधून बाहेर आला आणि त्यानं डावीकडचा रस्ता धरला. फॉरेस्टचं ऑफीस तिथून मैलावर. अर्थात, तिथंपर्यंत जाण्याची गरज नव्हती. अर्ध्या मैलाच्या अंतरावर रस्त्याच्या डावीकडं त्यांचा अड्डा होता. जमणारे सारेच बातमीदार. तिथं बसून बातम्या लिहायच्या. शेजारच्या पीसीओवरून फॅक्सनं पाठवायच्या. पूर्वी फॅक्सच्या आधी एसटीडी करायचे तिथूनच. एका बाजूला पीसीओ. दुसर्या बाजूला चहा-भजीची टपरी. दोन्हीच्या मध्ये तीन फूट बाय दहा फुटांची मोकळी जागा. त्या जागेचाच हा अड्डा. सगळ्यांनी मिळून पंचायत सभापती आणि इतरांनाही दमात घेऊन छत टाकून घेतलं. तिथं सगळ्यांना बसण्यासाठी शाळेतल्या बेंचसारखी लांबसडक सोय केली होती. सोपं जायचं. शेजारून चहा यायचा. एकत्र गप्पा करत बातम्याही कळायच्या. आणि मुख्य म्हणजे पीसीओ असल्यानं फोनचा फायदा.
स्पेशल आयजीनं जे सांगितलं होतं, त्याची बातमी किशोरनं सव्वापाचपर्यंतच तयार करून टाकली. त्याच्याकडं ती फार तर दुकॉलमी गेली असती. त्यापलीकडं नाही. त्यामुळं एका पानात त्यानं बातमी संपवली आणि ती पीसीओवर द्यायला तो निघाला तेव्हा तिथूनच बारक्या हाक मारत आला. "फोन आलाय..."किशोर धावत गेला.
"उद्या रात्रीनंतर केव्हाही डामखेड्यापासून सुरवात." किशोरच्या 'हॅलो'वर एवढं एक वाक्य उच्चारून फोन बंद झाला.
---
साला... देवरामनं मनातल्या मनातच शिवी हासडून घेतली. जवळपास सव्वापाच होत आले होते. सकाळपास्नं मिटिंगच्या नावाखाली पिट्टा पडला होता. मिटिंगमध्ये आतही शिरता येत नव्हतं. त्यामुळं आधीच आलेला वैताग, आता मिटिंग संपल्यानंतर तास होत आला तरी ही सारी मंडळी रेस्टहाऊसमधून जाण्याचं नाव घेत नसल्यानं, वाढू लागला होता. परिणामी ती शिवी.
दुपारी एकच्या सुमारास जेवणासाठी मंडळी उठली तेव्हा देवरामला मिटिंगच्या खोलीत घुसण्याची संधी थोडीशी मिळाली होती. त्यावेळी त्याच्या कानावर फक्त डीवायएसपींचं एकच वाक्य पडलं होतं, "सर, डामखेडा जर झालं तर पुढं फारशी अडचण येणार नाही."
पण त्याचा अर्थ नेमका काय घ्यायचा हे मात्र त्याला समजलं नव्हतं. त्यामुळं आतलं काही तरी ऐकणं गरजेचंच होतं. पण ती संधी मिळत नव्हती. मिटिंगच्या हॉलला एकूण तीन दारं. त्यापैकी एक मुख्य प्रवेशद्वारानंतरच्या व्हरांड्यातील. दुसरं दार होतं ते रेस्टहाऊसकडं तोंड करून उभं राहिल्यानंतर उजव्या हाताला असलेल्या व्हीआयपी स्यूटमध्ये उघडणारं. तिसरं दार मागच्या बाजूला. तिन्ही दारं आतून बंद होतीच. शिवाय पुढचा सज्जा आणि मागल्या बाजूला कोठीपर्यंतच्या मोकळ्या जागेत पोलीस होते. तिथं ते कुणालाही फिरकू देत नव्हते. त्यामुळं काही ऐकू येणं मुश्कीलच होतं. जेवणानंतरच्या सत्रात काहीही करून माहिती लागली पाहिजे... देवराम मनाशीच ठरवत होता.
अडीच वाजता देवरामला एका पोलिसानं बोलावलं आणि चहा सांगितला. देवरामच्या वैतागात भर पडली. तीस कप चहा. माणसं तीस, रेस्ट हाऊसवर कप मात्र फक्त बारा. म्हणजे तीन फेर्या तर नक्कीच. हा वैताग असायचा. कारण मधल्या काळात चहा गार होणं, एकाचवेळी सारे कप न मिळणं, एखाद-दुसर्याची नाराजी... पन्नास भानगडी.
चहाचं आधण टाकून देवराम वळला. कपाटातून त्यानं कप काढले. ट्रे काढला. सिंकवर जाऊन त्यानं कप विसळून घेतले आणि ट्रे घेऊन तो ओट्याकडे येऊ लागला. काय झालं ते त्याला कळलं नाही, पण त्याचा पाय निसटला आणि तोल सावरण्याच्या नादात ट्रेच्या हातात, ट्रेखाली अंगठ्याला अडकवून ठेवलेला कप निसटला, पडला आणि फुटला. क्षणात देवरामनं स्वतःलाच एक सणसणीत शिवी घालून घेतली आणि पुढच्याच क्षणी तो सावध झाला. त्याच्या डोक्यात काही तरी चमकलं आणि चेहरा सैल झाला. देवरामनं स्वतःला सावरलं आणि तो ओट्याकडं सरकला.
चहाचा तिसरा राऊंड होता तो फक्त पुढच्या-पाठीमागच्या बंदोबस्ताच्या पोलिसांसाठी. त्यापैकी पुढं जे तिघे होते, त्यांच्यापैकी एक जण येऊन तीन कप घेऊन गेला. मागचे तिघेच बाकी होते. देवराम त्यांच्यासाठी हातातच कप घेऊन गेला.
देसले हा हवालदार डांबरट आहे हे देवरामला ठाऊक होतं. त्यानं आधी त्याच्याच हाती कप ठेवला. मग तो दोघा कॉन्स्टेबलच्या दिशेनं वळला. आशेनं ते दोघं एकेक पाऊल पुढं आले आणि काही कळायच्या आत देवराम कडमडला आणि पडला. एका कॉन्स्टेबलला दिसलं ते इतकंच - डावीकडून पाठीमागं वळताना देवरामनं फक्त डावा पाय फिरवला असावा आणि उजवा पाय पुढं घेताना तो डाव्या पायाला अडला आणि त्याचा तोल गेला. दोन्ही कप पडले, फुटले. चहा देवरामच्या अंगावर सांडला. दोघांपैकी एक जण आधी पाणी आणायला पळाला. कप पडल्याचा झाला तितकाच आवाज. त्यानंतरच्या हालचाली निःशब्दच. कारण आत मिटिंग सुरू होती. दरवाजा फार काही भक्कम नव्हता. पाणी आलं, कॉन्स्टेबलनं देवरामला उठवलं, दंडाला थोडा चटका बसला होता. पाठीमागंच मिटिंग कक्षाच्या भिंतीला लागून असलेल्या खुर्चीवर त्याला बसवून दुसरा कॉ़न्स्टेबल चहा आणायला निघाला. देवरामनं हळू आवाजात सांगितलं, "काही नाही राव, पाय सटकला. बसतो थोडा वेळ इथंच. चहा घेतला की ठीक."
देवरामनं डोळे मिटून घेतले होते. त्याचे कान मात्र पूर्ण जागे होते. ज्या खुर्चीवर तो बसला होता, ती खुर्ची बरोबर मिटिंग कक्षात उघडणार्या खिडकीपाशी होती आणि खिडकीचं एक दार पूर्ण लागत नव्हतं हे त्याला ठाऊक होतं. त्याला तेवढंच हवं होतं. एकेक शब्द तो टिपत राहिला. त्याच्या गावाची लढाई होती अखेर. त्याच्याच गावाची नव्हे तर त्याच्या पंचक्रोशीची. एकदा जमीन गमवावी लागल्यानंतर आलेल्या शहाणपणाला आता समितीच्या कामाची जोड मिळाली होती. पुरेसं होतं देवरामसाठी, त्याच्या गावासाठी काम करण्याकरता.
अर्ध्या तासानं देवराम तिथून उठला. आता ठीक आहे म्हणत त्यानं किचन गाठलं आणि कप धुवायला सुरवात केली.
मिटिंग संपल्यानंतर केव्हा एकदा आपण फोन गाठतो असं देवरामला झालं होतं, पण सव्वापाचपर्यंत ती संधी त्याला मिळाली नाही. डीवायएसपींनी त्याला पुन्हा चहा टाकायला सांगितला होता. चहा घेऊन देवराम मिटिंग कक्षात गेला तेव्हा डीवायएसपींसह सारेच व्हीआयपी स्यूटमध्ये होते. तिथंच त्यानं सार्यांना चहा दिला. दार लावलं गेलं, देवराम मिटिंग कक्षात आला. दोनेक मिनिटं तो दाराच्या पुढं दोन पावलं येऊन थांबला आणि ते आता इतक्यात उघडणार नाही याची खात्री झाल्यावर त्याच कक्षात मागल्या खिडकीपाशी असलेल्या फोनकडं वळला.
"किशोरभाईला द्या. मी नरसापूरहून जिवाल्या बोलतोय..." देवरामनं सांगितलं. किशोरला कधीही कोणाचा फोन आहे हे सांगावं लागत नाही हे ठाऊक असूनही त्यानं आपलं 'नाव' सांगितलं.
किशोरचा हॅलो ऐकल्यानंतर देवराम बोलू लागला, "उद्या रात्रीनंतर केव्हाही..."
---
जबाबदारी किशोरवर होती. डामखेडा हे समितीचं पक्कं गाव. या गावानंच भूसंपादन रोखून धरलं होतं. सर्वेच होऊ दिला नव्हता. तिथूनच सर्वेची सुरवात सरकार करणार होतं हा त्या खबरीचा अर्थ होता. देवरामनं बाकी काहीही विचारण्याची संधी त्याला दिली नव्हती. ज्या अर्थी त्यानं झटकन फोन बंद केला त्याअर्थी तो रेस्टहाऊसमध्येच होता आणि अद्याप त्यानं तिथून फारसं काही बोलण्याजोगी परिस्थिती नसावी. म्हणजे, पोलीस आणि इतर मंडळी अद्याप तिथंच असावीत. त्यांच्या चहा-पाण्यातून मिळालेल्या सवडीचा देवरामनं निरोप दिला होता हेच महत्त्वाचं. आणि ज्याअर्थी त्यानं संध्याकाळी भेट वगैरे काही सांगितलेलं नव्हतं त्याचा अर्थ इतकाच की त्याच्याकडं तेवढीच माहिती होती.
पोलिसांची पहिली माघार झाली तेव्हाच खरं तर किशोरला संशय आला होता की सरकार गप्प बसणार नाही. ती माघार म्हणजे समितीची जित नव्हतीच. ती त्यांची तात्पुरती माघार होती. पोलीस तिथं असेपर्यंत त्यांना म्हणावे तसे हात-पाय हलवता आले नव्हते. गावात प्रवेशही करणं मुश्कील होतं. कॅप उभे होते आणि उभेच होते. पोलिसांच्या त्या माघारीनंतर प्रेशर वाढवायला हवं होतं. किशोरनं ते बोलूनही दाखवलं होतं, पण... असो. आत्ता गरजेचं होतं माहिती काढणं.
बातमी गेली होती. किशोर पीसीओतून बाहेर पडला. पोलिसांत दोन पर्याय होते. इन्स्पेक्टर गुर्जर किंवा डीवायएसपी जाधव. दोघंही पक्के. ताकास तूर लागू न देणारे. तिसरा पर्याय होता प्रांताधिकारी यंत्रणा. पण तिथंही पंचाईतच. शेवटचा पर्याय होता तो म्हणजे थेट अरवली गाठणं. अरवलीत पोलिसांचा आणि एसआरपीचा एकेक कॅप होता. तिथं हालचाली असणार. उद्यापासूनच काही होणार असेल तर नक्कीच. पण अरवली म्हणजे किशोरलाच परतायला रात्रीचे नऊ वाजणार. त्यानंतर निरोप जायचा कसा पुढं?
थोड्या विमनस्क स्थितीतच तो चालू लागला. स्टँडपर्यंत पोचायला पाचेक मिनिटं लागतात. पलीकडं तिठा. एक रस्ता सरळ अरवली आणि पुढं डामखेड्याकडं जाणारा. डोंगरांमध्ये घेऊन जाणारा. पुढं रस्ता म्हणायचा म्हणूनच. कारण डामखेडा गाठायचं झालं तर किमान सहा मैलांची पायपीट नक्कीच. मोटरसायकल जाऊ शकते, पण सराईतांनाच ते शक्य. तिठ्यावरून दुसरा रस्ता जिल्ह्याकडं. डोंगरांतून बाहेर नेणारा. स्टँडच्या गेटबाहेरच तीन जीप ओळीनं उभ्या होत्या. माल भरला जात होता. किशोरनं स्टँडकडं वळून पाहिलं. जिल्ह्याहून आलेल्या एसटीच्या टपावरून बॉक्स उतरवले जात होते. एक पोलीस व्हॅनही पलीकडं उभी होती. उजवीकडं दूरवर टेकडीच्या बाजूनं जिल्ह्याकडं जाणारा रस्ता दिसत होता. पाचेक मिनिटं तो तिथंच उभा होता. पोलिसांच्या जीपमध्ये सामग्री भरली जात होती. काय करायचं याचा निर्णय होत नव्हता. पण हिय्या करून त्यानं एका ड्रायव्हरला गाठलं.
"काय धावपळ इतकी?"
"आपल्याला काही कळत नाही." त्याचं तोडून टाकणारं उत्तर.
किशोर इतक्यात हार खाणारा नव्हता. "अरवली का? मला जायचंय तिकडं म्हणून विचारतो." त्यानं सूर बदलला.
"हो. पण सायबांना विचारा." या भागात असं अनेकदा जाता येतं एखाद्या सरकारी गाडीतून. त्याचाच फायदा घेण्याचा आपला प्रयत्न आहे असं किशोरनं दाखवलं. ड्रायव्हर किशोरला ओळखत नव्हता.
"उद्या परत येता येईल का? दुपारी दोननंतर बस नाहीये तिथून," किशोर.
"आता काय सांगावं? उद्या की परवा? मला नाही वाटत..." तो बोलू लागला. किशोरनं त्याला बोलू दिलं. पाच मिनिटांनी तो तिथून निघाला आणि स्टँडच्या दिशेनं वळला. वळतानाच त्याचं लक्ष गेलं जिल्ह्याच्या रस्त्याकडं. ओळीनं व्हॅन्स थांबलेल्या दिसत होत्या. म्हणजे ड्रायव्हरनं दिलेली माहिती नक्की होती. देवरामची माहितीही नक्की होती. आज निरोप पुढं जावाच लागेल. त्याच्या पायांना गती आली. किमान तिघांना भेटावं लागणार होतं.
अड्ड्यावर येताच किशोरनं बारक्याला बोलावलं. एका कागदाचे तीन तुकडे केले. प्रत्येकावर फक्त दुसर्या दिवसाची तारीख लिहिली. वकीलांकडं आधी, तिथून त्याच्या दोन खास माणसांकडं - रुपसिंग दुकानदार आणि धनजीसेठ - ही माहिती जाणं गरजेचं होतं. पैसाही महत्त्वाचा आता अशा वेळी; शिवाय धनजीकडून इतर माहितीही मिळणार हे नक्की. चिठ्ठ्या देऊन त्यानं बारक्याला पिटाळलं.
क्रमशः
भिंत
प्रेषक राजेश घासकडवी ( सोम, 03/01/2010 - 11:13) .सूर्य आता हातभर वर आला होता. हवेतला गारवा केव्हाच निघून गेला होता. आणि सावकाशपणे विटा ठेवून त्यावर चुना लिंपणाऱ्या चंद्र्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमलेले मला दिसत होते.
'गावली गं, माज्या जाल्याला मासोली गावली गं.' चंद्र्याचं गाणं उजाडल्यापासनं चालू होतं. भाड्या येऊन गेला तेव्हा थोडा खंड पडला होता तेवढंच. पण आता त्याच्या गाण्यालाही थोड्या कंटाळ्याची झाक आली होती. घोल्याला बहुतेक इतकी वर्षं त्याच्याबरोबर काम करून त्याची सवय झाली असावी. मधनंच चंद्र्या आपल्याला झेपणार नाही एवढी तान घ्यायला गेला की क्षणभर आठी यायची आणि मान थोडीशी हलायची इतकंच. अशाच एका तानेनंतर घोल्या वैतागून म्हणाला.
"आरं जरा भराभर हात मार की. किती नाजूक साजूक काम करतुया! ही काय द्येवळाची भिंत हाय व्हय? आरं ही मुतारी हाय समज मुतारी. म्हयन्याभरान् काम संपलं की पाडून बी टाकायची. चल. आटप.
घोल्या असा करदावलेला बघून चंद्र्याच्या कामात जरा घाई आली. गाणं थोडं मागे पडलं.
"दुपारच्याला कोदंडशेटकडे जायचंय. मगाशी भाड्या काय बोलून गेला आयकलं न्हायस का? काय पण प्रेमाने गिलावा करतुया. अगदी गुलगुलीत. तुझ्या बायकोच्या थानांवरनं तरी इतक्या प्रेमाने हात फिरवत्योस का कदी?" घोल्याचं आपलं चालूच होतं.
भाड्या त्यांचा मुकादम. वाढलेल्या पोटावर घट्ट कंबरपट्टा गुंडाळून तो डुलत डुलत आला होता. कामगारांतूनच नुकतीच बढती मिळालेल्याप्रमाणे त्याने दोघांशीही खेळीमेळीच्या गप्पा करून आपण अजून त्यांच्यातलेच आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. तंबाखूची फक्की दिली. मात्र त्याचा हात मधून मधून कंबरपट्ट्यात खोचलेल्या चाबकावर फिरत होता हे माझ्या लक्षात आल्यावाचून राह्यलं नव्हतं. त्याच्यापुढे तेही शक्य तितकी नम्रता दाखवून त्याच्या विनोदांना माफक हसत होते. पण तो गेल्यावर "गेला एकदाचा भाड्या" असं म्हणून घोल्या जरा सैलावला होता. मी हे सगळं पाहातोय याची त्यांना फिकीर नव्हती.
सूर्य हळुहळू अव्याहतपणे वर चढत होता. तशीच त्यांची भिंतदेखील हळूहळू वर येत होती, जमिनीतून उगवून बाहेर आल्यासारखी वाढत होती. काम अर्धं झाल्यावर दोघे थोडावेळ निवांत बसले. आपल्या पोतडीतनं पाणी प्यायलं, चकमक झाडून जाळ केला व विड्या शिलगावल्या. मलासुद्धा तलफ आली. माझ्या कमरबंदात नेहेमीचा तंबाखू नव्हता की हस्तीदंती नळी नव्हती. परागंदा माणसाकडे काय असणार? लागला ठसका तर लागला, आत्ता विडीसुद्धा चालेल. मी हाक मारली.
"ओ, चंद्राशेठ... जरा एक विडी मिळेल का?" माझा प्रश्न ऐकून चंद्र्या फिस्स करून हसला. मासोळी क्षणभर जाळ्यातनं सटकली.
"आलाय मोठा इडी मागणारा. अशा सगल्यांना इड्या देन्यासाठी भाड्या द्येतो ना आमाला धा रुप्ये ज्यादा दर म्हयन्याला! इडी पायजे म्हनं."
"आरं असं काय करतुया. सगलेच मागत्यात. वाटतं..." घोल्याने समजुतीने कानावरची विडी काढली आणि आपल्या विडीवरच शिलगवून मला दिली. माझ्या नजरेला त्याची शहाणी नजर दिली, क्षणभर विचार केल्यासारखं केलं, आणि माझ्या हातात दिली. दोनतीन झुरक्यांनतर तो धूर शरीरात भिनला, आणि खूप दिवसांच्या धुमसत्या निखाऱ्यांवर पाणी टाकून गेला.
चंद्र्याला आपल्या साथीदाराच्या औदार्याचं आश्चर्य वाटलेलं दिसलं. घोल्याने त्याच्या कानात कुजबुजून काहीतरी सांगितलं. आणि समोरच्या गढीकडे बोट दाखवलं. चंद्र्याने माझ्याकडे बघितलं, एक वेळ त्या देखण्या पण बलात्कारित वास्तूकडे बघितलं. पुन्हा डोळे मोठे करून आणि जबडा सैलावून माझ्याकडे बघितलं. "आणि हितंच..." असं काहीतरी तो म्हणाला असावा. घोल्याने मान डोलावली. चंद्र्याने काहीतरी अगाध ज्ञान झाल्यासारखी मान हलवली, माझ्यावरची नजर न काढताच. मी शांतपणे विडी ओढत होतो. इतका वेळ माझी फिकीर न करणाऱ्या घोल्याने या बाबतीत तरी माझ्या भावनांची कदर केली हा विचार सुखावून गेल्याशिवाय राहिला नाही. घोल्याने काय सांगितलं हे अर्थातच मला समजलं होतं. ती गढी माझीच आहे...होती. विडी ओढून झाल्यावर मी थोटूक खांबावर ठेवलं.
सूर्य अजून डोक्यावर आलेला नव्हता. तरी अंगाला चटके जाणवत होते. मला त्यांचं आता काही वाटेनासं झालं होतं. वरून एक घार उडत गेली. इतक्या खालून घारीला जाताना मी कधी बघितलं नव्हतं. तिची डौलदार भरारी बघून एखाद्या राजाधिराजाचं स्मृतिचिह्न म्हणून शोभेल अशी वाटली. ती दिसेनाशी होईपर्यंत मी तिच्याकडे पाहात राहिलो. मग लक्ष पुन्हा गढीकडे गेलंच. भव्य प्रवेशद्वार होतं तसंच दिमाखात उभं होतं. बाजूच्या भिंती फुटल्या होत्या. आघाताचे व्रण दिसत होते. समोरच्या उत्तुंग माळाकडे, उंचावरून अभिमानाने बघत असताना तिच्यावर बाजूने, अगदी अनपेक्षित दिशेने हल्ला झाला होता. अजून ती कणखरपणे उभी असली तरी तिच्या भावना मात्र विश्वासघाताने दुखावल्या होत्या. तिचे आतले भव्य शिसवी खांब अचानक खचल्यासारखे झाले होते. शुंभकेतूसारखा तिचा इतक्या वर्षाचा लाडाचा पाहुणा गद्दारी करेल असं तिला वाटलंसुद्धा नव्हतं.
सरदारकी मिळाल्यावर पहिल्याच वर्षात मी ही गढी बांधायला घेतली. या भागात सुमेर राहायचा. इथला आधीचा सरदार. त्याचा वाडा म्हणजे एक आरसेमहाल होते. आक्रमणात त्यातले किती फुटले किती शिपाईगड्यांनी पळवून नेले, महालातल्याच त्याच्या बायकांबरोबर, याची गणती नाही. सुखरूप असता तरी त्याच्या महालात राहायला मला आवडलं नसतंच. इतका गोंडस गुलछबू वाडा मला माझा वाटलाच नसता. मला हवा होता शक्तीशाली, बळकट किल्ला. वेळ पडली तर दोन महिने शत्रूला थोपवून धरेल असा. भोवताली छोटा का होईना पण खंदक हवा. भक्कम बुरूज हवे, आणि बुरजांवर सतत जागत्या तोफांची दूरगामी धाकाची नजर. बांधकाम वर्षभर चाललं. पैसा पाण्यासारखा वाहावला. शेकडो गवंडी, मजूर अहोरात्र काम करत होते. कदाचित हा घोल्या आणि त्याच्याबरोबर नुकताच मिसरूड फुटलेला चंद्र्यासुद्धा त्यांच्यात असेल, कोणास ठाऊक. आठ वर्षांपूर्वी बांधकाम पुरं झालं तेव्हा बाबांना मी दाखवायला घेऊन आलो तेव्हा त्यांना भरून आलं होतं. मला मिठीत घेतल्यावर मात्र त्यांचा बांध फुटला होता. त्यांचं गेलेलं वैभव मी दसपटीने परत आणलं होतं. त्यांच्या आयुष्यातला इतक्या वर्षांचा कलंक पुसून टाकला होता. मोडलेला कणा थोडा पुन्हा सांधला होता. तोसुद्धा मी. संभद्राने नाही की सुधांशूने नाही. मी. त्यावेळी मला जो अभिमान वाटला होता, त्याची धुगधुगी अजून शिल्लक आहे. कालच्या रात्रीच्या थंडीत तिनेच माझी साथ दिली.
मी शिपाईगिरीला सुरूवात केली तेव्हा त्यांचं मन द्विधा होतं. दुसऱ्या आईचं मात्र नव्हतं. तिचा ठाम विरोध होता. व्यापारी घरातली असल्याने तिला आमच्या परंपरांविषयी फारशी कदर नव्हती. आई मात्र जुन्या मान्यवर सरदार घराण्यातली होती. तिने खस्ता खाल्ल्या होत्या, शत्रूंपासून लपून गुहांमध्ये जगली होती, ऐन जवानीतला एक मुलगा युद्धात घालवला होता. तिने मला पाठिंबाच दिला असता याची खात्री होती. दुसऱ्या आईचं तसं नव्हतं. इतका बक्कळ पैसा असताना मैदानं मारण्याची काय हौस आलीय, असं म्हणायची. तिच्या माहेरची गलबतं पूर्वेकडच्या देशात व्यापाराला जायची. हिरे, जडजवाहीर, मसाले, सुवासिक द्रव्यं भरून न्यायची आणि तिकडून शेतात राबायला गुलाम आणि श्रीमंतांचे चोचले पुरवायला पौर्वात्य बायका घेऊन यायची. संभद्राला ती व्यापारात गुंतवत्ये हे आईला आवडलेलं नव्हतं. पण नवा जमाना होता, मुलांना आपण काय करावं याचे विचार होते. आणि तोपर्यंत आईची तब्येतही खालावली होती. तिची घरातली सत्ता संपत आली होती. पण संभद्रासारखं पुष्ट आयुष्य जगण्यापेक्षा हरहरासारखं, तिच्या मोठ्या मुलासारखं मर्दुमकीने मरावं असं तिला वाटायचं. तिने ते कधी बोलून दाखवलं नव्हतं. तेवढे संस्कार होते तिचे. पण संभद्र ज्या लोकांत वावरायचा त्यांच्याविषयी जुजबी चांगलं बोलताना नजरेतून आणि तोललेल्या शब्दांतून खूप काही सांगायची. हरहराचे जुने मित्र आले की त्यांना मात्र मुलांसारखं वागवायची. मंचकावर पडल्या पडल्यासुद्धा त्यांच्याशी बोलताना, त्यांच्या मोहिमांविषयी ऐकताना तिचे डोळे उजळून उठायचे. हरहराकडून अशाच गोष्टी ऐकायला तिला नक्की आवडलं असतं. बाबांना मात्र तिने कधीच माफ केलेलं नव्हतं. जीव वाचवून पळून आल्यापासून त्यांच्यामध्ये एक भिंत निर्माण झाली होती.
दुरून घोड्यांच्या टापा ऐकू आल्या, चंद्र्या आणि घोल्या दोघेही कोण येतंय म्हणून बघायला आले. मला थोडीफार कल्पना होतीच पण अग्रस्वारांच्या हातात तोलून धरलेला फडकता झेंडा पाहिला आणि खात्रीच झाली. टापा जवळ आल्या, आणि जणू काही गढीत जात असताना विचार बदलल्याप्रमाणे घोडे वळले, आणि शुंभकेतू खाली उतरला.
"तुला इथे बघून आश्चर्य वाटलं" छद्मी टोचून बोलत तो म्हणाला. मी काही बोललो नाही हे बघून तोच पुढे म्हणाला.
"आवडली माझी नवीन गढी? थोडी डागडुजी करून घ्यावी लागेल. काम चालू आहे. दोन आठवड्यांनी कर्तार यायचे आहेत - त्याच्या स्वागतासाठी ही नवीन बांधकामं पण चालू आहेत...." चंद्र्या आणि घोल्याच्या कलाकृतीकडे बोट दाखवत तो पुन्हा हसला.
"तू इतका हरामखोर असशील असं वाटलं नव्हतं." या क्षणी मला त्याच्यावर तुटून पडावं असं वाटत होतं. पण ते शक्य नव्हतं. शुंभकेतूच्या मागे बल्लव आपली नंगी तलवार घेऊन उभा होता. बल्लवाला मीच हुडकून शिक्षण दिलं होतं. शुंभकेतूकडे कामाला मीच लावलं होतं. तो खाल्ल्या मिठाला जागणारा होता. एका घावात तिघांची खांडोळी करताना पाह्यलं होतं, शाबासकीही दिली होती. त्याचा निर्वकार चेहेऱ्यावरून आत काही वादळ चाललं होतं की नाही याची कल्पना येत नव्हती.
"मी हरामखोर? महाराज, मी तुमच्या बाजूला होतो तेव्हा तुम्ही असं कधी म्हणाल्याचं आठवत नाही."
ते खरं होतं. आमची जोडी होती. मी सरदार, तलवारबहाद्दर तर तो मुत्सद्दी, राजकारणी. मी युद्धं खेळावीत व त्याने तह करावे. माझ्या छोट्याश्या राज्याचा तो प्रधान होता. माझा उजवा हात होता. कोणाला सहकार्य करायचं, कोणाला कोणाविरुद्ध खेळवायचं यात वाकबगार होता. त्याच्याशिवाय मी इथपर्यंत पोचलो नसतो. पण आता त्याच्यामुळेच मी या अवस्थेला पोचलो होतो.
"तू जो काही आहेस तो माझ्यामुळे, केतू." मी म्हणालो. तेही खरंच होतं. शुंभकेतु श्रीमंत बापाचा वाया गेलेला पोरगा. त्याला मी हाताशी धरला तेव्हा तो फक्त वीस वर्षांचा होता. माझ्या सगळ्यात फायद्याचा गुण म्हणजे त्याचे बऱ्याच सरदार घराण्यांशी घनिष्ठ संबंध होते - काही बापाच्या पुण्याईने आलेले तर काही त्याने स्वत: सरदार स्त्रिया व त्यांच्या मुलींशी जोडलेले, मजबूत केलेले. अनेक मोहिमांमध्ये त्याच्या साथीमुळे मला फायदा झाला होता. पण एक गुलछबू ऐशोआरामात राहाणारा तरुण यापलिकडे राजकारणात त्याला काही स्थान नव्हतं. कर्तारासारख्याने त्याला दारापुढेही उभं केलं नसतं. कर्तारशी टक्कर द्यायची माझी आकांक्षा जुन्या काळपासून होती. शुंभकेतूसारखे साथीदार वाढवूनच ते मला शक्य होतं.
"त्याने काही फरक पडत नाही." काहीतरी आठवल्यासारखं तो म्हणाला "या गढीचं मी काय करणार आहे माहित्ये?"
"काय?"
"अर्थातच तुम्हाला काही फरक पडणार नाही म्हणा, तुम्ही उद्यापासून या शहराच्या वेशीत दिसणार नाही याची सोय मी केलेली आहे." तो पुन्हा स्वत:शी हसला आणि म्हणाला, "मी इथे राज्यातलं सर्वात मोठं गणिकागृह करणार आहे. विशेष ग्राहकांसाठी. फार सुंदर शय्यागृहं आहेत, आणि तळघरं सुद्धा आहेत...."
"तुझ्यासारखा हलकट माणूस शोधून सापडायचा नाही."
"हलकट? तुम्ही माझ्यापेक्षा वेगळं काय केलं? तुम्ही सरदारकी केली, इतकी माणसं मारली - बुद्धीबळातल्या पटाप्रमाणे युद्धाच्या चाली रचून. आणि मला हलकट म्हणता?"
"मी माझ्या मित्राच्या पाठीत सुरा खुपसत नाही."
"महाराज, हा धंदा आहे. इथे कोणी मित्र नसतो की शत्रू नसतो. फक्त फायदा आणि तोटा असतो. मला शिव्या देण्याआधी तुम्ही चंद्रवर्म्याला काय सांगितलं होतं ते आठवा. असो. मला निघायला हवं." धूळ उडवत घोड्यांचा ताफा निघून देखील गेला. घोडे वळले तरी बल्लवाची नजर माझ्यावर काही काळ स्थिर होती. त्याने आवंढा गिळून हताश मान हलवली की मला भास झाला हे कळलं नाही. त्याचा निर्विकार चेहेरा पुन्हा घोड्यांच्या मार्गाकडे करत, टाच मारून इतरांना गाठायला तोही निघून गेला. चंद्र्या व घोल्या पुन्हा कामाला लागले.
चंद्रवर्मांचा उल्लेख कुठेतरी आत लागला. ते बाबांच्या जुन्या मित्रांपैकी. सरदारी शान व इभ्रतीचा नमुना. त्यांचा परगणा लुटला हे बाबांना आवडलं नव्हतं. चंद्रवर्मांना जिवंत सोडलं हे त्यांच्या दृष्टीने पुरेसं नव्हतं. पण माझाही इलाज नव्हता. कर्तारशी टक्कर द्यायची तर मला नव्या मैत्र्या जोडून ठेवणं भाग होतं. चंद्रवर्मांनी मला जखमी आवाजात प्रश्न विचारल्यावर मी शिपाईगिरी, सरदारी विषयी ज्ञानाचे डोस पाजले हे तर त्यांना बिलकुल आवडलेलं नव्हतं. थरथरत्या हातात चषक धरून तितक्याच थरथरत्या आवाजात त्यांनी मला बोल लावला होता. "मीही राजकारणं खेळलेली आहेत. पण काही मित्र हे शेवटी मित्र असतात. या सगळ्याच्या पलिकडे असतात." मी मुकाट्याने ऐकून घेतलं. पण तेव्हाच लक्षात आलं बाबा पळून का आले ते. त्यांना लोकांनी केलेले मुजरे आवडत होते पण त्याची खरी किंमत द्यायची त्यांची तयारी नव्हती. रात्रीच्या वेळी खूप वेळा मी त्यांना मेजावर जुना नकाशा उलगडून बसलेलं पाह्यलं होतं. मद्याचे चषक एकामागोमाग एक संपवत ते लाकडी घोडे, सैनिक त्यावर ठेवत. जास्त प्यायलेले असले की स्वत:शीच बरळायचे "अरे, ही रंगसेनाची तुकडी मी नंतर पाठवली. जरा दोन तास आधी पोचले असते तर इथे तुळंगेच्या खोऱ्यात आख्खी सुलतानी फौज खाली सापडली असती." मग लाकडी घोड्याने सैनिक पाडत त्यांचं केवळ दोन तासांनी हरलेलं युद्ध पुन्हा पुन्हा लढत. युद्ध रणांगणांत जिंकतात तितकीच मैत्री जोडण्याने जिंकली जातात हे त्यांना कळलेलंच नव्हतं. सुलतान त्यांच्याविरुद्ध उभा राहाण्याचीच मुळात गरज नव्हती. पण मित्राचा अपमान सहन न होऊन त्यांनी सुलतानाचाही अपमान केला होता. सुलतान ते विसरला नव्हता. आणि इतर वेळी या भानगडीत न पडता आपण बरं की आपला परगणा करणारा सुलतान शत्रूला मिळाला. एकदा मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना ते पटलं नव्हतं. त्यांचं स्वत:चं युद्धकौशल्यही फारसं वाखाणण्यासारखं नव्हतं हे मात्र मी त्यांना सांगितलं नव्हतं. माझ्यात बहुधा माझ्या आजोबांचं रक्त आलं होतं. त्यांचा गरीबीतला जन्म. फक्त लूटमार करून पैसा कमवणं आणि हव्या तितक्या बायका भोगणं यासाठी शिपाईगिरी पत्करली. त्यांची मजल हजार स्वारांच्या प्रमुखापर्यंत गेली होती. आपल्या मुलाने जास्त काही करावं अशी खूप इच्छा होती. पण आमच्या बाबांनी जेमतेम त्यांना मिळालं ते टिकवलं. आजोबांचा उजवा हात कोपरापासून गेला होता, तरी शेवटपर्यंत त्यांची खुमखुमी गेली नव्हती. मृत्यूशय्येला खिळलेले असताना वातात बडबडायचे, मला उद्देशून म्हणायचे "अरे मोहीम मारली की मजा असते. महिनाभर दुष्काळ, पण नंतर हव्या तितक्या बायका हव्या तिथून घेता येतात. पण या बायकांच्या बाबतीत सांभाळून हं... मी सांगतो तुला मजा कर, पण फक्त कुलीन पोरी पकड. बाकीच्यांपासून उगाच रोगबिग व्हायचा. आणि अगदी तरुण - आजकाल कुलीन पोरींचा पण भरवसा नाही...हा बघ माझा हात ... दिसत नाही, पण अजून शिवशिवतो मांसात रुतायला...तुला काही व्यवस्था करता येईल काय रे?... हात गेला रे, नाही तर पंचहजारी झालो असतो" त्यांचं आयुष्य सोपं होतं, काय हवं ते माहीत होतं. किंमत द्यायची तयारी होती. दिलेलीही होती. बाबांचं तसं नव्हतं. त्यांची झेप छोटीशीच होती, स्वप्नं मोठी होती - आणि किंमत द्यायची मात्र तयारी नव्हती. हरहराने किंमत दिली ती आपल्या प्राणाची. बाबांना प्राण व मित्र दोन्ही प्रिय होतं. अशाने सरदारकी कशी होणार? पण चंद्रवर्मांच्या प्रकाराने आमच्यात भिंत उभी राहिली ती कायमचीच. गढी पहिल्यांदा बघताना आलेल्या अश्रूंना तिने चोख बांध घातला होता.
चंद्र्याचं गाणं आता उन्हाने विरघळत चाललं होतं. आणि मुकाट्याने तो भराभर विटा चढवत होता. सूर्य आता जवळपास डोक्यावर आला होता, चार अंगुळं खाली. आता त्याच्याकडे बघवत नव्हतं - पण त्याच्याभोवती मंडलं घालणारी घार मात्र दिसली. डोळे दिपून मी समोर बघितलं. माझी गढी - सहज दिसणाऱ्या तिच्या शिखराकडे लक्ष केंद्रित केलं. झेंडा तोच होता, फक्त शुंभकेतूच्या नावे तो फडकत होता. आता काय राहिलं गढीचं? ते विस्तीर्ण आवार, त्यातली झाडं, राजेशाही हिरवळ - सगळं आता नाहीसं झालं होतं. आपलं आता काय आहे?...सुलेखा आणि संजय संभद्राकडे सुरक्षित आहेत एवढंच समाधान मानायचं. संजयला तलवारीचे धडे दिलेले होते - पण ते त्याच्या रक्तात नाही असं लवकरच जाणवलं. आपल्या काकावर - सुधांशूवर गेलाय तो. कविता करतो, कळणार नाही अशा भाषेत आणि कशालाच काही अर्थ नाही असं तत्वज्ञान सांगतो. तिकडे आणखीन एक भिंत. सुधांशूबरोबर होती, हुबेहुब तशीच. बाबांनी बोलणं टाकण्यापर्यंत त्यांची भिंत माजली. सुलेखाच्या बाबतीत तर ती मुळातची कधी तुटली नाही. हरहर मला त्याच्या तैलचित्रातूनच दिसला. आईचा सहवास फार थोडा घडला. तिने काय संस्कार केले लक्षात नाही. मी जो काय झालो तो तिच्यामुळेच याची खात्री आहे, पण काही तुटक चित्रांपलिकडे हातात काही नाही. ती गेल्यानंतर या आठवणींना पुन्हा बांधच आले. या सर्व भिंती मला घेराव घालताहेत. माझा श्वास कोंडताहेत. मला चिणताहेत.
पण पराभवच कशाला उगाळत बसायचं? हा चंद्र्या शिपाईगिरी न करता बारा तास राबून दोन तास जगतो. मी गेली वीस वर्षं झंझावात जगलो. अनेक बायका भोगल्या, उंची मद्यं प्यायली, युद्धांत पराक्रम केले, हजारो लोकांवर हुकूमत गाजवली, माझ्यासाठी प्राण द्यायला ते तयार झाले, मी ज्यांच्यासाठी प्राण देईन असे मित्र मिळाले, काही हरवले.... या चंद्र्याच्या शंभर पट मी जगलो. मग या भिंतींची चिंता का?
आता त्या दोघांचं बांधकाम पूर्ण झालं होतं. इतका वेळ बांधत असलेली चौथी भिंत बांधून झाल्यावर त्यांनी त्या दोन हात रुंद सहा हात लांब विटाळ चौकोनावर लाकडी फळीची तुळई टाकून तो बंद केला. आतमध्ये अंधार झाला. दोघेही जेवायला लांब गेले असावे. चंद्र्याचं गाणं आता विरलं होतं. तुळईवर कसला तरी आवाज झाला - ती घार तर बसली नसेल? तुळईला मध्यभागी भोक होतं, श्वास घेता यावा, मरण लांबावं म्हणून ठेवतात. तितून डोक्यावर आलेल्या सूर्याच्या प्रकाशाचा एक किरण भाल्यासारखा शिरून, माझे हात साखळदंडाने ज्या खांबाला बांधले होते त्यावर ठेवलेल्या विडीच्या थोटकाला विद्ध करत होता.



