कथा
रत्ना
परवा अचानक रस्त्यात ''ती'' दिसली. पाय ओढत, रेंगाळत चालणारी. कधी काळी भरगच्च दाट असलेल्या लांबसडक केसांमध्ये आता बर्याच रुपेरी छटा डोकावू लागलेल्या. चेहर्यावर एक म्लान उदासी. अंगावरची साडी तरी जरा बरी दिसत होती. मला समोर पाहून ती एकदम चमकलीच! काही क्षणांपूर्वी म्लान असलेल्या तिच्या चेहर्यावर ओळखीचे हसू फुलले. आत ओढलेले गाल रुंदावले आणि तिच्या खास शैलीत ती उद्गारली, ''ताई, आज इथं कुठं? कित्ती दिवसांनी भेटताय! '' मलाही तिला इतक्या वर्षांनी बघून खूप आनंद झाला होता. तिचा हात धरून मी म्हटलं, ''चल, भेटलीच आहेस तर तुला माझं नवं घर दाखवते! तुला परत आणून सोडते रिक्षाने हवं तर! ''
''नको नको, ताई! '' तिच्या स्वरात अजिजी होती, '' पुन्हा कधीतरी येईन ना मी! आज इथंच बोलू की! ''
रत्ना. आमच्याकडे ती पहिल्यांदा कामावर रुजू झाली तेव्हा मी आठ-नऊ वर्षांची असेन आणि ती कॉलेजच्या पहिल्या वर्षाला! किरकोळ शरीरयष्टी, सावळा वर्ण, लांबसडक केस आणि चेहर्यावर हसू असलेली तिची ती ठेंगणी मूर्ती आजही माझ्या डोळ्यांसमोर जशीच्या तशी येते. कॉलेजची फी भरायला तिच्या आई आणि भावाने नकार दिला म्हणून ताठ मानेने, मिळालेल्या पगारातून पुढे शिकायचे ह्या जिद्दीने ती आमच्या घरी माझ्या नोकरी करणार्या आईला वरकामात मदत करायला आली आणि जणू आमच्या घरचीच होऊन गेली. भल्या पहाटे उठून घरात पडेल ते काम करायचे, भावाला व आईला व्यवसायात मदत करायची, कॉलेजच्या वेळा सांभाळायच्या, आमच्या घरचे काम आणि इतर दोन घरची कामे असे सर्व उरकून उरलेल्या वेळेत अभ्यास करणारी रत्ना. मला शाळेत सोडायला - आणायला येणारी, मी तिच्या बोलण्यातल्या चुका दुरुस्त केल्यावरही राग न मानणारी हसतमुख रत्ना. कामाला वाघ असणारी, शिकून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची स्वप्ने उरी बाळगणारी अल्लड रत्ना. दिसायला काळीसावळी आणि तिच्या पायात जन्मजात व्यंग होते म्हणून तिच्या घरचे सुरुवातीपासून तिचा राग राग करायचे. मोठ्या दोन बहिणींची लग्ने होऊन त्या सासरी गेल्या आणि व्यंगामुळे रत्नाला नीट स्थळेही चालून येईनात. रत्नाची त्यांच्या जातीबाहेर लग्न करायची तयारी होती, पण तिच्या भावाला व आईला ते मान्य नव्हते. तिच्या बाजूने बोलणारे तिचे वडील अकाली निवर्तल्यानंतर ती घरात एकटीच पडत गेली. तरीही तिने घरच्यांच्या लग्न करण्याच्या आग्रहाला बळी न पडता नेटाने आपले शिक्षण सुरू ठेवले होते. आमच्या घरी सर्वांना तिच्या ह्या जिद्दीचे खूप कौतुक वाटे. त्यामुळे तिला अभ्यासात, पुस्तके मिळवण्यात किंवा फी भरायला काही अडचण आली तर ती हक्काने आमच्याकडे मदत मागायला येत असे.
कालांतराने, मजल दरमजल करीत रत्ना एकदाची बी. ए. झाली. तिच्या घरी कोणालाच त्याचे फारसे कौतुक नव्हते. ना त्यामुळे भावाला कपड्यांना इस्त्री करून देण्याच्या त्याच्या व्यवसायात मदत होणार होती, ना आईच्या फुलांच्या व्यवसायात बरकत येणार होती! पण रत्ना आपल्या निकालावर खूप खूश होती. त्या खुशीतच ती मला एकदा त्यांच्या घरी घेऊन गेली. तिचे ते चंद्रमौळी घर, त्या छोट्याशा पत्र्याच्या खोलीत सहा माणसांचा रेटलेला संसार पाहिल्यावर मला तेव्हा एवढ्या छोट्या जागेत इतकी माणसे मावतात तरी कशी ह्याचेच नवल वाटले होते. त्या घरात रत्नाकडे होणारे दुर्लक्ष पाहिल्यावर माझी आई तिला सारखी आमच्याकडे पोळीभाजी खाऊन घ्यायचा आग्रह का करते ते जाणवू लागले होते. पण रत्नाला जणू आता ह्या वातावरणाची, वागणुकीची सवयच झालेली! गेली अनेक वर्षे तिने एकच स्वप्न उराशी बाळगले होते. तिला शिक्षिका होऊन शाळेत नोकरी करायची होती. आणि त्यासाठी तिचे पुढचे ध्येय होते बी. एड. पूर्ण करणे!
पण पुन्हा समोर दोन समस्या उभ्या ठाकल्या. पहिली समस्या म्हणजे बी. एड. प्रवेशाच्या फीसाठी लागणारा पैसा आणि दुसरी म्हणजे फायनलला तिला मिळालेला काठावरचा सेकंड क्लास. शेवटी तिने बालवाडी शिक्षिकेचा कोर्स करायचे ठरवले. मुलांमध्ये काम करायची तिला जबरदस्त हौस होती. त्यांना शिकवावे, घडवावे, त्यांच्यात रमून जावे असे तिला मनापासून वाटायचे. मग काय! बालवाडी प्रशिक्षणासाठी तिने तिचे सोन्याचे कानातले विकून पैसे उभे केले. पुढचे शिक्षण चालू ठेवायचे तर तिला अर्थार्जन करणे भागच होते. शहरातील सुप्रतिष्ठित समाजकारणी व राजकारणी अप्पाजी आमच्या परिचयातील होते. त्यांच्यापाशी रत्नाला चांगली नोकरी लावून देण्याविषयी शब्द टाकल्यावर त्यांनी तिला चिठ्ठी व तिची प्रमाणपत्रे घेऊन एक दिवस भेटायला बोलावले. तिथेच तिची ओळख सुभानरावाशी, अप्पाजींच्या धाकट्या लेकाशी झाली.
अप्पाजींच्या ओळखीने रत्नाला बर्यापैकी नोकरी तर मिळाली, पण सुभानरावाच्या आणि तिच्या भेटीगाठीही वाढू लागल्या. एक दिवस अप्पाजी आमच्याकडे 'सहज'च भेटायला म्हणून आले. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर त्यांनी थेट रत्नाची चौकशी करायला सुरुवात केली. त्यांना कारण विचारले तेव्हा त्यांनी नापसंतीने सांगितले की सध्या रत्ना आणि सुभान्या एकत्र भटकत असतात म्हणून! अप्पाजींना ही जवळीक अजिबात मान्य नव्हती. त्यांना रत्ना जातीने आणि परिस्थिती, पैसा, मान इत्यादींच्या निकषावर कोणत्याच बाबतीत आपल्या लाडक्या सुभानरावासाठी लायक वाटत नव्हती. शिवाय तिच्या पायातील व्यंगही होतेच! रागावलेल्या अप्पाजींची कशीबशी समजूत घातल्यावर ते एकदाचे घरी गेले, पण ''त्या रत्नाला समजावा, ह्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, '' अशी धमकी देऊनच!
दोनच दिवसांनी रत्नाला सांगावा देऊन आमच्या घरी सुभानरावाविषयी विचारणा करण्यासाठी बोलावून घेतले गेले. रत्ना आपल्या निवडीवर व निर्णयावर ठाम होती. ''सुभानराव आणि मी लग्न करायचं ठरवलंय. त्यांनी तसं वचन दिलंय मला. मी अप्पाजींच्या धमक्यांना घाबरणार नाही! सांगा त्यांना तसं! '' खरं तर सुभानरावाची कथा वेगळीच होती. सुप्रतिष्ठित, सधन घरातील वाया जाऊ पाहत असलेला तो लाडावलेला मुलगा होता. घरच्या दुधाच्या धंद्याकडे, शेतीकडे बघायचा तसा थोडाफार! पण त्याचा जास्त वेळ बाईक उडवण्यात, चकाट्या पिटत नाक्यावर बसून टवाळक्या करण्यात आणि पैसे लावून जुगार खेळण्यात जायचा. शिक्षणही जेमतेम दहावीपर्यंत झालेलं. हां, मात्र दिसायला तसा रुबाबदार होता आणि राहायचाही झोकात. गळ्यात सोन्याचा रुंद गोफ, हातात कडं, कायम कडक इस्त्रीचे आधुनिक ढंगाचे कपडे, परफ्यूम.... रत्ना पूर्ण गुरफटून गेली होती त्याच्यात. सुभानरावात काही दोष आहेत, तो दिसतो तितका साधासुधा नाही, सरतेशेवटी तो आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर जाणार नाही, सध्या तो वडिलांनी त्याचे पंख जरा कातरलेत म्हणून बिथरलाय आणि त्यांना उचकवायला अशा हरकती करत आहे हे मानायची तिची तयारीच नव्हती! तो जे सांगेल ते ती आनंदाने करत होती. इतके, की तिचा कोर्सही अर्धवट सोडला होता तिने! अप्पाजींच्या नाकावर टिच्चून दोघंही बरोबर भटकायची! तिला समजावायला गेल्यावर तर तिने आमच्याकडे येणेच बंद करून टाकले! रस्त्यात दिसली तरी ओळख देईनाशी झाली.
आणि एक दिवस अचानक रत्ना अस्ताव्यस्त, विस्कटलेल्या अवतारात आमच्या दारात येऊन उभी राहिली. डोळे रडून रडून सुजलेले, चेहर्यावर वेडसरपणाची झाक.... तिची अशी अवस्था पाहून आम्हाला धक्काच बसला! सुभानरावाने तिला फसवून त्याच्या जातीतल्या, श्रीमंत घरातल्या दुसर्याच पोरीशी लग्न केले होते.
''मला पार लुटलं हो त्यानं! पार फशिवलंन! माझी इज्जत गेली, आब्रू गेली.... आता मी काय तोंड दाखवू? कशी घरी जाऊ? '' तिचा तो घायाळ टाहो काळीज चिरून जात होता. आईने तिला कसंबसं सावरलं. ह्यातूनही काहीतरी मार्ग निघेल असं आश्वासन दिल्यावर मग ती जरा शांत झाली. उध्वस्त अवस्थेतच तिच्या घरी परतली. एकदा रॉकेल अंगावर ओतून घेतले असेच निराशेच्या भरात! पण तिची भाचरे येऊन बिलगली तिला तसा तिचा बांध फुटला. काही महिन्यांनी परिस्थितीतून जरा सावरल्यानंतर सुभानरावावर फसवणुकीचा दावा ठोकता येईल का, ह्यासाठी ती आमच्या ओळखीच्या एका वकिलांना भेटून आली. पण त्यांनी तिला स्पष्ट शब्दात अशा दाव्यांमध्ये खर्च होणारा पैसा, वेळ व मनस्ताप -बदनामीची कल्पना दिल्यावर तिने सुभानरावावर दावा करण्याचा विचार रहित केला. शिवाय अप्पाजींचा राजकीय प्रभाव बघता अशी केस कोर्टात उभी राहील की नाही ह्याबद्दलही शंका होती.
''आता काय करणार आहेस? '' माझ्या आईने तिला विचारले.
''काय करणार वैनी! अर्धवट राहिलेला कोर्स पूर्ण करीन म्हणते. बघूयात देवाच्या मनात तरी माझ्यासाठी काय आहे ते! '' रत्नाच्या स्वरात कडवटपणा ठासून भरला होता.
एका अनामिक जिद्दीने भारलेल्या कडवटपणाने रत्नाने तो कोर्स पूर्ण केला खरा, पण मधल्या वर्षा-दोन वर्षांच्या काळात स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून तिने स्वतःची पार वाताहत करून घेतली. रोज कसलेतरी उपास करायची. खाण्यापिण्याकडे लक्षच द्यायची नाही. आधीच तिची किरकोळ शरीरयष्टी! आता तर ती अजूनच कृश दिसू लागली. डोळ्यांखाली काळी वर्तुळे आली. माझ्या आईला तिची जास्तच काळजी वाटू लागली. डॉक्टरांकडे जबरदस्तीने घेऊन गेल्यावर आणि त्यांनी तिला भले मोठे लेक्चर दिल्यावर मग कोठे ती जरा ताळ्यावर येऊन वागू लागली.
आताशा तिची आमच्याकडे पूर्वीसारखी ये-जा राहिली नव्हती. बघता बघता तिचा अल्लडपणा ओसरून चेहर्यावर, वागण्यात एक प्रकारचा पोक्तपणा आला होता. जणू मोकळेपणाने हसायचे ती विसरूनच गेली होती. अशीच एके दिवशी ती अवचित संध्याकाळी भेटायला म्हणून घरी आली. बोलता बोलता दोन गोष्टी अगदी सहज बोलल्यासारख्या सांगितल्या तिने. पहिली गोष्ट म्हणजे सुभानराव तिला भेटायला आला होता. खास तिची माफी मागायला. त्याच्या लहान बाळाला कसलासा असाध्य आजार झाला होता म्हणे! आणि सुभानरावाला वाटत होते की त्याने रत्नाला जे फसवले त्याचेच हे प्रायश्चित्त आहे! त्यामुळे तो तिची माफी मागायला आला होता.
''मग? तू काय म्हणालीस? '' आईने तिला विचारले.
तशी खांदे उडवीत रत्ना उद्गारली, ''मी काय म्हणणार वैनी!! मी काही एवढी वाईट नाही त्याच्या संसाराला शाप द्यायला. तिथंच माफ करून टाकलं मी त्याला, आणि सांगितलं, पुन्हा चेहरा दाखवू नको म्हणून, नाहीतर पायताणानं हाणून काढेन! '' तिचे ते बोल ऐकल्यावर माझ्या आईच्या तोंडावर हसू फुटल्याविना राहवले नाही.
त्या दिवशी अगदी निघायची वेळ आली तशी रत्ना हळूच म्हणाली, '' मी माझं लगीन ठरीवलंय. ''
त्या खुळ्या पोरीने सुभानराव भेटून माफी मागून गेल्यावर तिरिमिरीत एका बिजवराशी लग्न करायचे ठरविले होते. एके काळी तिचे कोणाशीही लग्न लावायला तयार असणारे तिचे आई-भाऊ ह्या लग्नाविषयी जरा साशंक होते. पण रत्नाचा निर्णय एकदा झाला की तो झालाच! त्यामुळे ठरविल्याप्रमाणे तिने त्या माणसाशी आळंदीला जाऊन लग्न केले. लग्नानंतर एकदा आम्हाला ती घरी भेटायला आली तेव्हा तिच्या चेहर्यावर पुन्हा ते सुपरिचित हसू खेळत होते. आईने तिची कौतुकाने खणानारळाने, नवी साडी देऊन ओटी भरली आणि ''एका मोठ्या अरिष्टातून पोरगी सुटली म्हणायची! '' असा सुटकेचा नि:श्वासही टाकला.
पण नियतीच्या मनात वेगळेच काहीतरी होते. लग्नानंतर आठ-दहा महिन्यांतच रत्ना नवर्याच्या जाचाला, मारहाणीला आणि व्यसनाला कंटाळून पुन्हा माघारी आली. घरी समजूत काढायला ह्या खेपेला तिची आईही नव्हती. लेकीच्या लग्नानंतर दोनच महिन्यात ती परलोकवासी झालेली. भावाच्या घरात, त्याच्या संसारात आपला अडथळा होऊ नये असा आटोकाट प्रयत्न करत, स्वतःला आक्रसून घेत पुन्हा एकदा रत्ना एका बालवाडीत ''ताई'' म्हणून रुजू झाली.
अवचितपणे तिला रस्त्यात भेटल्यावर ह्या सर्व आठवणी जाग्या झाल्या. मधल्या वर्षांमध्ये बरेच काही घडून गेले होते. त्या घटनांच्या अंगखुणा वागवत रत्ना माझ्यासमोर आज उभी होती.
''काय करतेस सध्या तू? '' ह्या माझ्या प्रश्नावर मंदसे हसत रत्ना उत्तरली, ''काय करणार ताई! तीच ती शाळेतली नोकरी. आणि बी. एड. पूर्ण करते आहे! ''
''आँ?!!! '' आता आश्चर्यचकित होण्याची माझी खेप होती.
'' तुम्हाला नवल वाटलं असेल ना ताई? आता ह्या वयात मी काय शिकणार म्हणून! पण मला सारखं वाटायचं, आपण बी. एड. करायचं स्वप्न अर्धवट सोडलं ते चांगलं नाही केलं. आता मी ते स्वप्न पूर्ण करत आहे. ''
''आणि घरी? भाऊ काय म्हणतो? '' मी हलकेच विचारले.
''भाऊ? तो काय म्हणणार? त्याची पोरं मोठी झाली आता. ती आपल्या आत्याची बाजू घेतात. त्याला म्हणतात, बाबा, तुम्ही न्हाई शिकलात तर न्हाय, पण आत्याला तर शिकू देत! ''
''वा! गुणी आहेत गं तुझी भाचरं! '' माझ्या तोंडून नकळत कौतुकाची दाद दिली गेली.
''ताई, आईगत माया केली आहे मी त्यांच्यावर! आता तीच माझी लेकरं! '' रत्नाचा स्वर पुरता कौतुकात भिजला होता.
''खरंच, चलतेस का गं घरी? '' मी पुन्हा एकदा न राहवून तिला विचारलं, ''आईला खूप बरं वाटेल तुला भेटून! ''
रत्नाचे डोळे क्षणभर पाणावले. पण मग लगेच तिने स्वतःला सावरले आणि उद्गारली, ''वैनींना माझे नमस्कार सांगा. त्यांना म्हणावं आता ही रत्ना बी. एड. झाल्याचे पेढे घेऊनच तुम्हाला भेटायला येईल! ''
तिला आमचा नवा पत्ता, फोन नंबर देऊन झाल्यावर काही क्षण दोघी तशाच उभ्या होतो. शांत, निःशब्द! मग ती पुन्हा हसली, ''निघते आता ताई! घरी उशीर होईल. '' त्या हास्यात मी उगाचच काहीतरी शोधत राहिले. माझा निरोप घेऊन ती पुन्हा पाय ओढत आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागली. तिच्या पाठमोर्या मूर्तीकडे मी कितीतरी क्षण तशीच बघत उभी होते. मनात कोठेतरी तिच्यावरच्या अन्यायाविषयीची खंतही होती आणि त्याचबरोबर परिस्थितीशी झगडत, सन्मानाने जगू पहाणार्या तिच्या संघर्षाविषयी, तिच्या जिद्दीविषयी कौतुकाची सायही होती. प्रतिकूल परिस्थितीतही आशेचा चंद्रकिरण शोधणार्या, हार न मानणार्या तिच्या त्या वृत्तीला मी मनोमन सलाम केला आणि मार्गस्थ झाले.
-- अरुंधती
(सत्यकथेवर आधारित)
मोरपीस
दहावीचा पहिला दिवस. नवी वह्या पुस्तके घेऊन सायकल दामटत शाळेत पोचलो. आमच्या शाळेत प्रत्येक यत्तेचा आणि तुकडीचा वर्ग ठरलेला असायचा, त्यामुळे वर्ग शोधण्याचा प्रश्न नव्हताच. सायकल स्टँडला अडकवून वर्गात गेलो. रिवाजाप्रमाणे भिंतीकडच्या रांगेत शेवटच्या बेंचवर भिंतीच्या कोपर्यात देव्या बसलेला होता. त्याच्यापुढे रित्या आणि आडसुळ. मुलींकडच्या रांगेत शेवटच्या बेंचवर वैभ्या आणि विक्या बसलेले आणि त्यांच्या पुढच्या बेंचवर किशोर आणि अम्या. देव्याच्या शेजारची माझी जागा. नेहमीप्रमाणे चार बेंचचं कॅसलिंग जमलेलं पाहून समाधान वाटलं. जागेवर जाऊन बसलो तेव्हा आधीच चर्चा रंगात आलेली होती. नुकत्याच आलेल्या 'मैने प्यार किया' ची सगळ्याना चांगलीच किक बसलेली होती. पुन्हा एकदा तो पिक्चर पाह्यला पाहिजे यावर एकमत होत आलेलं असताना विक्याने ती बातमी हळूच सोडली.
"इ तुकडीतनं आपल्या वर्गात एक नवीन मुलगी येणारे. भाग्यश्री नावाची. ", विक्या म्हणाला.
"काय बोलतो, कशी आहे? आणि तुला काय माहिती?", कोणीतरी विचारलं.
"अरे लय भारी ए, तिनंच मला सांगितलं. आम्ही वैद्य सरांच्या क्लासला जातो ना, तिथं".
"तिनं तुला सांगितलं?", वैभ्याने विक्याच्या खांद्यावरचा हात त्याच्या डोक्यामागे नेऊन मांजा गुंडाळल्याची अॅक्शन करत विचारलं.
"मऽऽग, आम्ही दोघं अभ्यास पण करतो एकत्र तिच्या घरी." ज्या शाळेत मुलींशी साधं बोलणं सोडा नुसतं हसणंसुद्धा अशक्यप्राय वाटायचं तिथे विक्या स्फोटावर स्फोट करत होता. सगळ्यांचीच उत्कंठा अगदी शिगेला पोचली होती पण तेवढ्यात बाई वर्गात आल्या आणि बोलणं थांबवावं लागलं.
पहिला तास संपला तरी कोणीही नवीन आलं नाही. सगळे आतुरतेनं वाट पाहात होते, पण दुसर्या आणि तिसर्या तासालाही काहीच झालं नाही. विक्या नुसतं फेकत होता असं प्रत्येकाने मनोमन ठरवलं असावं कारण मधल्या सुटीत कोणीच विषय काढला नाही. नाही म्हणायला वैभ्या आणि अम्या विक्याला घेऊन इ तुकडीत चक्कर टाकून आले पण त्याना ती दिसली नाही. दिवस संपेपर्यंत तो विषय सगळेजण पूर्णपणे विसरले होते आणि नेहमीच्याच टिवल्याबावल्या करत घराकडे चालू पडले.
दुसर्या दिवशी शाळा सुरू व्हायच्या थोडं आधी नेहमीप्रमाणे आमचा गलका चालला होता. वर्ग जवळजवळ भरलेला होता आणि बाईच तेवढ्या यायच्या रहिलेल्या होत्या. गडबड आणि आरडओरडा टिपेला पोचलेला असताना दारातून ती आली. दारातून आत येऊन मुलींच्या दोन रांगांमध्ये ती पोचेपर्यंतच्या पाच सेकंदांत वर्गात एखादा कडक मास्तर आल्यासारखी सुन्न शांतता पसरली. दोन वेण्या, गोल चेहरा, धारदार जिवणी, अपरं नाक आणि टपोरे काळे डोळे... एवढी सुंदर मुलगी आमच्या 'अ' तुकडीने गेल्या दहाहजार वर्षात कधीच पाहिली नव्हती.
"आयला पिक्चरमधल्या भाग्यश्रीसारखीच आहे रे", कोणीतरी कुजबुजलं.
त्या दिवशी विक्याचा भाव एकदम वधारला आणि वैद्य सरांच्या क्लासचाही. विक्याबरोबर तिथे जाऊन एकदातरी तिच्याशी बोलायचं असं सगळ्यानी ठरवून टाकलं आणि दुसर्या दिवसापासून आम्ही वैद्य सरांच्या क्लासला हजर झालो. विक्यामात्र रोज काही ना काही कारण सांगून टाळायला लागला. चांगलं दोन तीन वेळा समोरासमोर आल्यावरही ती त्याच्याशी बोलणं, हसणं तर सोडाच पण ढुंकुनही पाहत नाही हे आमच्या लक्षात आलं आणि त्याने आधी सोडलेल्या सगळ्या पुड्याच होत्या या निष्कर्षाप्रत आम्ही आलो. ती वर्गात येणार हे विक्याला कसं कळालं हा प्रश्न आम्ही ऑप्शनला टाकला आणि त्याला भरपेट शिव्या देऊन आपल्या नशीबात सुंदर मुलींशी बोलणं नाही अशी एकमेकांची समजूत घातली.
असेच दिवसा मागून दिवस गेले. वर्गात हळूच चोरून तिच्याकडे पाहणे आणि तिच्या नकळत शाळा सुटल्यावर तिचा पाठलाग करून तिचे घर कुठे आहे हे पाहून येणे असे आमचे टिनपाट उद्योग करून झाले पण तिच्याशी बोलण्याची अजून कोणाचीच हिंमत होत नव्हती.
साधारण महिन्याभराने कोणीतरी कान फुंकल्यामुळे माझ्या घरून मला 'नॅशनल टॅलेंट सर्च' नामक परीक्षेबद्दल शाळेत चौकशी करण्याचे फर्मान मिळाले. दुसर्या दिवशी पहिल्याच तासाला मी बाईंना भरवर्गात त्याबद्दल विचारले. त्यापुर्वी शाळा फक्त ठराविक अतिहुशार मुलानाच त्या परीक्षेला बसवत असे पण मी विचारल्यामुळे मग सगळ्यांसाठीच ऑफिसमधुन फॉर्म घेऊन येण्याचे काम मलाच मिळाले. बाईंनी सांगितल्याप्रमाणे मधल्या सुटीत फॉर्म आणायला मी ऑफिसमध्ये गेलो. फॉर्म घेऊन येताना आता हे सगळ्याना वाटायचे असा विचार करताना माझ्या लक्षात आलं की यातले अर्धे मुलींमध्येही वाटावे लागतील. व्वा! मी एकदम रोमांचित वगैरेच झालो. हाती आलेली ही सुवर्णसंधी साधून आज तिच्याशी बोलायचंच असं मी मनोमन ठरवलं. वर्गाच्या दाराशी येइपर्यंत माझी छाती धपापू लागली होती आणि माझ्या हृदयाचे ठोके माझ्या कानात मला स्पष्ट ऐकू येत होते. मी वर्गात गेलो तेव्हा ती बेंचवर बसून तिच्या मैत्रीणीसोबत डबा खात होती. त्यानंतर मी ते फॉर्म्सचे दोन गठ्ठे कसे केले, एक गठ्ठा तिच्याकडे कसा दिला, कारकूनाने दिलेल्या सूचना तिला कशा सांगितल्या, काही म्हणजे काही मला आठवत नाही. मी भानावर आलो तेव्हा पाण्याच्या टाकीजवळ बसलेलो होतो आणि माझे कान भयंकर गरम आणि लाल झाल्यासारखे वाटत होते एवढंच मला आठवतंय. तो दिवस मी असाच सुन्नपणेच घालवला. दिवसभरात परत तिच्याकडे पाहण्याची माझी हिंमत झाली नाही. घरी गेल्यावर मात्र मी सगळं विसरून गेलो.
दुसर्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेत गेलो. वर्गात गेल्यावर बेंचच्या दोन रांगांतून जाताना अभावितपणे तिच्याकडे नजर गेली. ती माझ्याकडेच पाहत होती आणि मी तिच्याकडे पाहिल्यावर तिने एक हलकंसं स्माइल दिलं. कोणीतरी मोरपीस फिरवावं तशी एक गोड शिरशिरी माझ्या सर्वांगातून लहरत गेली आणि मी तरंगू लागलो....
त्यानंतर मग तो खेळच ठरून गेला. ना तिने परत माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला ना मी तिच्याशी. पण ते पूर्ण वर्षभर आम्ही एकमेकांशी डोळ्यांतूनच हसत, बोलत राहिलो. त्याला पहिलं प्रेम म्हणता येईल का वगैरे विचार मी कधी केला नाही पण दरवेळी तिच्या नजरेस नजर देताना ते मोरपीस तेवढंच आनंद देत राहिलं.
आजही माझ्या मनाच्या पुस्तकात ते मोरपीस मी जपून ठेवलं आहे. कधी कधी लहर आली की ते पान उघडतो आणि ते मोरपीस घेऊन मी गालावर फिरवत बसतो.
(टीपः हे वर्णन काल्पनिक असून जिवंत अथवा मृत व्यक्तींशी साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
ती...
ती... कोण होती ती? तसं माझं अन् तिचं नातं नव्हतच. साधारण ६ वर्षांपूर्वी तिचं आमच्या समोर राहणार्या एका तरुणासोबत लग्न झाल्यामुळे आमच्या समोर रहावयास आलेली.. पण मोकळा स्वभाव असल्यामुळे आमच्याही घरी कायम येणे जाणे.. त्यातून उलगडत गेली ती आणि तिचं आयुष्य.. तिला सख्खा भाऊ नव्हता म्हणून मला भाऊ मानलं.. आणि आता ही नात्याची वीण एवढी घट्ट झालीये की ती मला माझ्या सख्ख्या बहीणींईतकीच प्रिय..आणि म्हणूनच 'ती'ची कथा ईथे मांडावीशी वाटली..
ती.. अक्षरशः गोरीपान, सुंदर.. सोनेरी केसांमुळे गर्दीतही सहज ओळ्खू येणारी.. तिचं ५वी पर्यंत शिक्षण गावीच तिच्या वडीलांजवळ झालं. हूशार असल्याने तिच्या मुंबईला राहणार्या काकांनी तिला पुढील शिक्षणासाठी मुंबईला नेलं. १० वी पर्यंत तिकडे मुंबईत शिक्षण घेतल्यानंतर वडीलांच्या आग्रहाखातर तिने पुन्हा गावी येऊन पुढील शिक्षण पुर्ण केलं. B.Sc.झाली.. जात्याच हुशार असल्यानं पदवीसोबतच राज्यसेवा परिक्षाही दिली. पहिल्याच प्रयत्नात अंतिम मुलाखतीपर्यंत मजल गेली.. सोबत तिच्यासाठी 'स्थळ' पाहणेही जोरात सुरू होते.. कॉलेजमधल्या काहीजणांनी प्रपोजसुद्धा केलं, पण घरचे संस्कार म्हणा अथवा वडीलांचा धाक म्हणा, तिने कुणालाच हो म्हटले नाही आणि वडील ठरवतिल त्याच मुलासोबत लग्न करायच असा निश्चय केला..तसं तिला पहायला येणार्या जवळपास प्रत्येकालाच ती पसंत पडायची. तिलाही काही मुलं पसंत पडायची, पण तिच्या वडीलांना त्यांच्या मनासारखं 'स्थळ' काही भेटत नव्हत. या सर्व प्रकारात तिचा राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास मागेच पडला होता. शेवटी एकदाचं तिच्या वडीलांना एक चांगल स्थळ सापडलं. तोच आमच्या समोरचा मुलगा.. रयतच्या शाळेत शिक्षकाची नोकरी होती. अजून 'पर्मनंट' झाला नव्हता, पण तिथे लागून ३ वर्षे झाली असल्याने लवकरचं 'पर्मनंट' होईल असे त्याने तिच्या घरच्यांना पटवलं. त्यावेळेस महिना ८०० रु. पगार आहे व 'पर्मनंट' झाल्यावर २० हजार पगार होईल असेही सांगितले..घरच्यांनीही अधिक चौकशी न करता होकार देऊन टाकला आणि तिचे त्याच्याशी लग्न झाले. ईथून पुढे सुरू झाली तिच्या आयुष्याची ससेहोलपट..
तो.. दिसायला जेमतेम.. काळासावळा वर्ण..त्याचा अन् तिचा जोडा जोडा शोभून वगैरे काही दिसत नव्हता..थोडक्यात त्यांचा जोडा विजोड वाटत होता. पण तिने त्याला स्वीकारलं होतं. पण काही गोष्टी हळुहळू समोर येऊ लागल्या तशी ती मनातून खचत गेली.. त्याला महीना ८०० रु. नव्हे तर १८० रु. मिळत होते..आज ६ वर्षांनीही (तिथे लगून एकूण ९ वर्षे) त्याला तितकाच पगार आहे. पण तो मात्र 'पर्मनंट्'च्या आशेवर तिथे अजूनही राबतोय.. १८० रुपयांत अर्थातच भागत नसल्याने नोकरी संभाळून काही पेंटीगची कामे करुन महीना हजार्-दिड हजार मिळवतो..त्यात कसेबसे दोन वेळच भागतं..
दरम्यान या ६ वर्षांत तिला २ अपत्येही झाली.. १ मुलगी व १ मुलगा.. तिच्या सुदैवाने दोन्ही मुलं तिच्यावरच..दिसायलाही अन् डोक्यानही.. मोठी मुलगी ३ वर्षाची झाल्यापासून शिक्षणासाठी आजोळी..कारण तिच्या शिक्षणाचा खर्च यांना न झेपणारा.. छोटा आता २ वर्षांचा झालाय.. त्याच्या शिक्षणाचं तरी आपण बघावं अशी तिची रास्त अपेक्षा..पण तिच्या नवर्यात धमक अशी नाहीच.. ९ वर्षे १८० रु. पगारात राबल्यानंतरही 'पर्मनंट' होण्यासाठी तिच्या नवर्याने तिला माहेरहून २ लाख आणावेत असं सांगितलं.. पण तिनं ठाम नकार दिला. तिला शारिरीक त्रास देण्याचीही धमक तिच्या नवर्यात नव्हती म्हणून त्याने तिला मानसिक त्रास द्यायला सुरूवात केली.. त्याच्या सोबतीला दीर भावजयही होतेच..तिच्या वडीलांना ह्या प्रकाराची कुणकुण लागताच मुलीला त्रास नको म्हणून लाखभर रुपये लगेच दिले..पन अजूनही तिच्या नवर्याच्या 'पर्मनंट' होण्याची शक्यता कमीच आहे. मध्यंतरी मीही त्याला नोकरी सोडून पुर्णवेळ व्यवसाय करण्याबद्द्ल सुचवले, ईतकेच काय, माझ्या ओळखीने एक पेंटींगचे मोठे कामही मिळवून दिले. पण ह्या महाशयांनी ते काम अर्धवट टाकले..
पण हि हिम्मत हरलेली नाही. एका ठीकाणी लॅब असिस्टंट म्हणून कामाला लागलीये..महीना १५०० रु. मिळतात ते ती साचवून ठेवतेय.. तिचं स्वप्न आता एकच आहे.. तिला तिच्या चिमुरड्यांना स्वतःच्या हिमतीवर शिकवायचयं.. मध्यंतरीच्या मानसिक त्रासामूळे राज्यसेवा परिक्षा पास होण्याचे कौशल्य असूनही आता ते स्वप्नच. पण आता बीएड शिकायच तिने ठरवलय.. तिची ईच्छा व ऊमेद बघून मीही तिला संपूर्ण सहकार्य करण्याचं ठरवलय.. बीएड च्या प्रवेश परीक्षेत तिला ५० पैकी ४४ गुण मिळालेत, यावरून अजूनही तिच्यात खूप काही करण्याची धमक आहे हे लक्षात येते..
मध्यंतरी तिच्या नवर्याने तिला शिवीगाळ केली तेंव्हा मीच जाऊन त्याला चांगलेच 'शांत' केले.. पण त्यानंतर माझ्या मनात सारखा एकच प्रश्न येतोय, तो म्हणजे माझ्या या ताईने का म्हणून या नालायक माणसासोबत राहावे?
तिच्या अंगभूत गुणांच्या जोरावर ती नक्कीच काहीतरी करुन दाखवेल याचा मला विश्वास आहे.. आणि तिच्या या प्रवासात मी कायम तिच्या सोबत असणार आहे..
ही काल्पनिक कथा नसल्याने कथेच्या अनुशंगाने येणारे नाट्य यात नसल्यामुळे कदाचित वाचनार्यास 'बोअर' होऊ शकते..
आजोळ
"अरे किती वेळ लावताय पोरांनो गुच्छ करायला! माझे बघा बरं सहा गुच्छ तयारही झाले." रत्नामावशीचा उत्साह अगदी सळसळून वहात होता! कॉफी घेऊन आलेल्या केतकीला तिनं लहान मुलाच्या कौतुकानं मुलांनी बनवलेले गुच्छ दाखवले. सगळी तयारी अगदी जय्यत झाली होती. आज रत्नामावशीच्या पाळणाघराचा 'आजोळ'चा पहिला वाढदिवस होता. साठीच्या घरातली रत्नामावशी अगदी लहान मूल झाली होती! तिला असं आनंदानं रसरसलेलं पहाताना केतकी खूप खूप मागे गेली.
रत्ना, केतकीच्या आईची दूरच्या नात्यातली बहीण. आठ बहिणी आणि एक भाऊ यांच्यातली सगळ्यांत धाकटी. बालपण असं तिला लाभलंच नाही. जरा कुठं समज येईतो वडील गेले, आईची आजारपणं काढण्यात, बहिण-भावाच्या लग्नकार्यात धावपळ करण्यात रत्नाचं बालपण हरवूनच गेलं. आजारी आई गेल्यावर तर रत्नाला अक्षरशः भावंडांच्या दयेवरच जगावं लागलं. लग्नकार्य, सणवार यांत अगदी हक्काची कामवाली म्हणूनच सगळ्यांनी तिचा उपयोग करून घेतला. तिचं वय उलटून गेलं लग्नाचं, तरी कुणी विषय म्हणून काढला नाही! एक तर पुढाकार कुणी घ्यावा, खर्च कुणी करावा, हा प्रश्न आणि दुसरं म्हणजे हक्काची मोलकरीण गेली असती हातातून! अखेरीस केतकीच्या आजीनं तिच्या भावंडांना अक्षरशः दटावलं, तेव्हा कुठं त्यांचे डोळे उघडले.
वय वाढल्यानं प्रथमवर मिळणं महागात पडलं असतं, म्हणून रत्नाच्या थोरल्या मेहुण्यानं आणलेलं बिजवराचं स्थळ बघायचं ठरलं. तीर्थाच्या ठिकाणी रहाणारं कुटुंब, आई, चार भाऊ, त्यांच्या बायका, लेकरं. घरात उपाध्येपण वंशपरंपरागत चालत आलेलं. येणार्या यात्रेकरूंना रहायला जागा, त्यांची पूजा-नैवेद्याची सोय करणं हा व्यवसाय. रोजचं १००-१५० पान जेवायला. पुरण-वरणाचा स्वयंपाक. घरच्याच सुना सगळं करायच्या. रत्नासाठी पाहिलेला सगळ्यात मोठा भाऊ. चाळिशी गाठलेला. त्याची पहिली बायको अपघातानं गेली म्हणे, पण तिनं आत्महत्या केली अशी गावात चर्चा. खरं-खोटं देव जाणे! त्याला एक मुलगा ५-६ वर्षांचा. असेना! त्याच्याशी काय देणं-घेणं? रत्नीला उजवली, म्हणजे झालं! तिला विचारायचाही प्रश्न नव्हताच. कसंबसं उरकायचं म्हणून लग्न उरकलं आणि रत्ना त्या खटल्यात येऊन पडली. एक दावं सोडून गरीब गाय दुसर्या दाव्याला बांधली, भावंडांचं कर्तव्य संपलं!
रत्नाच्या जावा तिच्यापेक्षा मानानं धाकट्या असल्या तरी वयानं मोठ्या असल्यानं त्यांनी अगदी साळसूदपणे सगळी कष्टाची कामं आल्याबरोबर तिच्या गळ्यात घातली. सासू तिखट, खवीस, नवरा तिरसट, पण त्याची नाटकं फक्त बायकोपुढेच चालायची. आई आणि भावांपुढे अगदी भिजल्या मांजरासारखा मुका व्हायचा तो. रत्ना लहानपणापासून फक्त सोसणं शिकली होती, त्यामुळे समोर येईल त्याचा मुकाट्यानं सामना करणं हेच तिला ठाऊक होतं. तिनं कुठल्याही गोष्टीची कधी तक्रार केली नाही, आणि चेहर्यावरचं हास्य मावळू दिलं नाही.
केतकीला लहानपणापासून रत्नामावशी सगळ्यात जास्त आवडायची. ती जेव्हा आजीकडे यायची, तेव्हा सगळी भावंडं सोडून रत्नामावशीसोबतच रहायची. तिच्याकडून खूप काही शिकण्यासारखं असायचं. रत्नामावशी पुस्तकांच्या शाळेत जरी कमी शिकली असली, तरी अनुभवाच्या शाळेत खूप शिकली होती. तिच्या लग्नानंतर केतकीचा आणि तिचा संपर्क बराच कमी झाला होता. एकदाच केव्हातरी देवीची पूजा करायला म्हणून केतकी आईबरोबर रत्नामावशीकडे गेली होती, त्यावेळी तिला पाहून केतकीला रडूच फुटलं होतं! काय बारीक झाली होती रत्नामावशी! अगदी म्हातारीच दिसायला लागली होती! तशी दिसायला ती दहाजणींत उठून दिसणारी होती, पण आता तिची पार रया गेली होती. त्या भेटीनंतर मात्र केतकी तिला कधीच भेटली नाही. बाबांच्या बदलीमुळे पार संपर्कच तुटला तिच्याशी. केतकीच्या लग्नातही रत्नामावशी येऊ शकली नव्हती. कधीतरी आईकडून तिची थोडीफार माहिती मिळत होती.
रत्नाच्या दिरांनी मोठ्या भावाला फसवून घराबाहेर काढलं, मिळकतीतला कणभरही वाटा दिला नाही. वडिलोपार्जित संपत्तीत खोट्यानाट्या कागदपत्रांच्या आधारे त्याचं नावही लावलं नाही. अचानक आलेल्या या संकटानं त्यानं हाय खाल्ली आणि तो आजारी पडला. या परिस्थितीतही डगमगून न जाता रत्नानं भावंडांची, गावकर्यांची थोडी मदत घेऊन बाजूच्या गावात चार स्वैपाकाची कामं धरली. नवर्याच्या खाण्यापिण्याची, औषधपाण्याची आबाळ होऊ नये, एवढी तरी कमाई मिळायला लागली तिला. सोबतच थोडं शिवण-टिपण, विणकाम असं जमेल तसं करून वादळातल्या नावेला किनार्यावर न्यायची तिची धडपड सुरू झाली. कशीबशी ती सावरत होती, त्यात कमी झालं म्हणून की काय, तिच्या सासूला अर्धांगाचा झटका आला, आणि दिरांनी तिला रत्नाच्या दारात आणून सोडून दिलं! तिच्या पोराला मात्र स्वतःकडे ठेवून घेतलं होतं हक्काचा नोकर म्हणून! रत्नानं कसलीही कुरकूर न करता दोन्ही आजारी जिवांची मन लावून सेवा केली. मुलाला शाळेतून काढलं, त्याला वेडीवाकडी संगत लागली, तो बिघडतोय असं तिच्या कानावर येताच शांतपणे त्याला घेऊन आली आणि भाऊ-मेहुण्यांच्या मदतीनं त्याला दूर बोर्डिंग शाळेत घातलं शिकायला. एव्हाना तिच्या गुणांची तिच्या नवर्याला आणि सासूला खात्री पटली होती, आणि आपल्या वागण्याचा पश्चातापही झाला होता. रत्नासाठी तेही कमी नव्हतं. जन्मजात असलेल्या पाककौशल्यानं तिची कामं वाढली होती आणि नवरा-सासूच्या आजाराच्या खर्चासोबत पोराच्या शिक्षणाचीही सोय झाली होती. तिनं वेळोवेळी जमवलेल्या गंगाजळीतून एक लहानशी जागाही विकत घेतली. आता कुठं तिचे बरे दिवस आले होते. पहिल्याच वर्षी पोरानं चांगले मार्क मिळवून तिच्या कष्टांचं सार्थक केलं आणि नातवाची प्रगती पाहून तृप्त मनानं तिची सासू तिला उदंड आशिर्वाद देऊन देवाघरी गेली. त्यापुढच्या वर्षी पोरानं अजून चांगली भरारी घेतली आणि सवतीचं पोर असूनही त्याच्या भलेपणासाठी झटणार्या आपल्या बायकोला धन्यवाद देत तिच्या नवर्यानं जग सोडलं. आता रत्नासाठी फक्त मुलाचं शिक्षण महत्त्वाचं होतं. आता तिला रिकामा वेळही बराच होता, दोन बायका सोबत घेऊन तिनं पापड-लोणची वगैरे करायला सुरुवात केली. पुढं तिचा मुलगा शिकून चांगल्या हुद्द्यावर नोकरीला लागला, परदेशात गेला, त्यानं आपल्यासोबत आईलाही तिकडे नेलं असं उडत उडत कळलं होतं, पण का कोण जाणे, केतकीला काही वेगळीच हुरहूर वाटत होती. तिला सतत रत्नामावशीची आठवण येत होती.
दोन वर्षांखाली रेल्वे अपघातात निरंजनचे आई-बाबा गेले, गेल्या वर्षी केतकीची आई गेली, बाबा त्यांच्या गुरूंसोबत तीर्थयात्रेला गेले तेव्हापासून लहानग्या ओंकारला सांभाळण्यासाठी केतकीनं आपली पीएचडी अर्धवटच ठेवली, निरंजनला मदत म्हणून त्याच्या फॅक्टरीत जाणं सोडलं. त्यात भर म्हणून की काय, स्वैपाकाच्या सखूबाईंनी काम सोडणार असल्याचं सांगितलं. निरंजनच्या बालपणापासून त्यांच्याकडे कामाला असलेल्या सखूबाई अगदी विश्वासाच्या, जशा काही घरच्याच होत्या. त्या काम सोडणार म्हणजे त्याचं कारणही तसंच काही महत्त्वाचं असणार!
"पोरी, अग माज्या लेकाला तिकडं मुंबैला नोकरी लागली फ्याक्टरीत. र्हायला जागा बी मिलनार हाय. मग त्याचं लगीन हुईपरेंत तरी त्याला करून खाऊ घालायला पायजेल का न्हाई कुनी? आन मी तर हितं काय करीन यकटा जीव! लेक म्हने, तू बी चल तकडंच. लई इचार करून निगाले बग. आग, त्याचा बी अर्दा जीव इतं न् अर्दा तितं र्हायचा. त्यापरास जाते आपली त्याच्यासंग. तसं इतं तरी काय हाय आपलं! ना घर, ना जमीनजजुमला. त्यो द्येव ठरीवनारा कुनी कुटं र्हायचं ते!" सखूबाईंनी काम सोडायचं कारण सांगितलं, त्याला विरोध करणंच शक्य नव्हतं.
"पण मग मला आता तुमच्यासारखी विश्वासाची बाई कुठं मिळणार? इतके दिवस मीच काय, पण हे घरच पूर्णपणे तुमच्यावर विसंबून आहे. अगदी घरच्याच एक होऊन तुम्ही या घरासाठी कष्ट केलेत. असं इतकं आपलेपण असणारं आता कोण मिळणार मला?" केतकी बोलली.
"अग पोरी, त्याची काळजी आपन कोन करनार? त्यो बसलाय न्हवं वर त्याची फिकर करनारा. आग, तुला सांगते, येक माउली हाय. भल्या घरची, चांगली बाई हाय माज्याच शेजारी र्हातीय. बिचारीच्या जल्माची चित्तरकता आइकशीला तर थक व्हशील. आशी येळ त्या इट्टलानं का आनली तिच्यावर, त्यालाच ठावं. तिला मी तुज्याकडं घिऊन येते कामाला. माज्यापरीस झ्याक काम करतीया. हाताची गोडी तर आशी हाय तिच्या की मी बी हक्कानं तिला कालवन मागून घेते जेवताना. तू बग येक डाव तिला." सखूबाईंनी दुसर्या बाईची सोय तर केली होती खरी, पण ती कोण, कुठली याची माहिती हवीच होती ना!
"कोण, कुठली आहे पण ती?" केतकीनं विचारलं.
"द्येवाघरची हाय, त्यानं धर्माची बहिन म्हून तिला वारकरी बुवाच्या ताब्यात दिली, आन वारकरी बुवानं माज्या हाती सोपवली."
सखूबाईंचा नवरा वारकरी होता. दरवर्षी पायी वारी करायचा तो पंढरीची. विठ्ठलावर त्या कुटुंबाची प्रचंड भक्ती होती.
"मला नीट सांगा बरं काय ते."
"आग, दोन वर्सापल्याड वारीला गेलते बुवा, तवाची गोस्ट हाय. येक पोरगा आन त्याची माय बुवाच्या मागं लायनीत थांबलं व्हतं दर्सनासाटी. मदीच त्यो पोरगा बुवाला बोलला, "बाबाजी, जरा माज्या आईसाटी पानी आन खायला कायतरी घिऊन येतो, तवर तिला बगा." आन त्यो जो गेला, दर्सन झालं, भजन झालं, फराल झाला तरी त्येचा पत्त्याच न्हाई! रात झाली तसं वारकरी बुवानं तिला तिचा ठावठिकाना इचारला. दोन दिवस आजून मुक्काम व्हता त्येंचा पंडरीत. तवर तिला आपल्या मंडळीतल्या बायांच्या सोबत दिऊन बुवा तिच्या गावाकडं जाऊन आले, तवा तेला समजलं की पोरानं मायला वारीत नेऊन वार्यावर सोडलं आन तिकडं तिच्या घराचा सौदा करून पैशे घिऊनशान त्यो गायब झाला! सांग आता काय म्हनावं या कर्माला!"
"बाप रे! किती विचित्र! मग पुढे काय झालं?" केतकी चक्रावूनच गेली ते ऐकून!
'पुडं काय व्हनार? बुवानं त्या माउलीला समदी हाकीकत सांगितली, आन म्हनाले, बग माय, तू मला इट्टलाच्या सोडीन तर द्येव मला कवाच मापी देनार न्हाई. तवा तू माज्यासंगट गावाकडं चल, माज्या लक्षिमीच्या झोळीत घालतो तुला. तुमी दोगी ठरवा काय कराचं ते."
सगळंच विलक्षण होतं ऐकलेलं!
सखूबाईंनी पुढं सांगायला सुरुवात केली. "बुवा तिला घिऊन आले. मला तिची समदी हाकीकत सांगितली. मला बी भरून आलं माय. चांगल्या घरची माउली ती, आन तिला आसे दिवस दावले त्या इटूनं! आसल काई गेल्या जल्माचं! म्या तिला घरातच र्हा म्हनलं. तिनं म्हटलं, मला दोन-चार कामं मिळवून दे, आसं बसून रहानं बर न्हाई. मग तिला कामं मिळवून दिली, जवळच येक खोली किरायानं घिऊन दिली. गेल्या साली बुवा वरती गेले, तवा माज्याकडून वचन घेतलं त्येनं की त्या माउलीला मरस्तोवर आंतर दिऊ नकोस. आता या पोराला नोकरी मिळाली, तर त्याला तर कसं वार्यावर सोडू? तिला तिकडं चल म्हनलं तर ती नको म्हनतीय. म्हनून तिला तुज्या वटीत घालते, तूच आता तिला संबाळ." सखूबाईंनी केतकीला विनवलं.
"उद्या रविवार आहे. उद्या निरंजनही घरीच आहे. तिला घेऊन या तुम्ही." केतकी म्हणाली. रात्री जेवतानाच केतकीनं सखूबाईच्या धर्माच्या नणंदेची चित्तरकथा निरंजनला सांगितली होती, त्यावर त्यांची दोघांची बरीच चर्चाही झाली होती. आईबाबावेड्या निरंजनला हे सगळं ऐकून अगदी गहिवरून आलं होतं आणि आपल्याकडून जितकं करता येईल तितकं करू असं त्यानं ठरवलं होतं.
...............
दुपार सरत आली होती. रविवारची सगळी जास्तीची कामं नुकतीच हातावेगळी करून झाली होती. ओंकार आणि निरंजनचं बागकाम, केतकीची साफसफाई सगळं संपवून संध्याकाळच्या कामांची तयारी सुरू होती.
"केतकीबाय" सखूबाईची हाक आली, तशी केतकी धावलीच. एक क्षण फक्त सखूबाईच्या मागे उभ्या असलेल्या व्यक्तीकडे तिनं पाहिलं आणि "रत्नामावशी............." अशी हाक घालून तिच्या गळ्यातच पडली! निरंजन, ओंकार आणि सखूबाई यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही!
रत्नामावशीसाठी सतत झुरणार्या केतकीला रत्नामावशीचा अखेरीस शोध लागला होता तो असा!
दोघी दारातच गळ्यात गळे घालून भावनांना वाट करून देत होत्या. त्यांच्या भावनांचा भर ओसरल्यावर त्या भानावर आल्या. घरात येत केतकी म्हणाली, "आता मी तुला मुळीच सोडणार नाही रत्नामावशी. तू माझ्याच घरी रहायचं!"
"अग पोरी, कष्टावर वाढलेला जीव हा. याला निवांत रहाणं कसं जमायचं आता?" रत्नामावशी बोलली.
"रत्नामावशी, तुला कामच करायचं आहे ना?" या निरंजनची कमाल आहे हं! केतकीला त्याचं अगदी कौतुक वाटलं. समोरच्या माणसाला कसं वश करावं याची विद्या त्याला चांगलीच अवगत आहे! अगदी नकळत त्यानं संवादाची सूत्रं आपल्या हातात घेतली होती.
"हो, आणि मी तुला अहो सासूबाई वगैरे म्हणणार नाही. तू माझ्यासाठीही रत्नामावशीच रहाशील. हं, तर तुला आवडतं काम जर मी दिलं, तर तुझी काही तक्रार नाही ना? हं, पण ते काम इथं या घरात राहूनच करावं लागेल. आहे का तयारी तुझी?"
"आग माय, या वयात येकली र्हान्यापरास तुजी आपली मानसं मिळाली तर त्येंच्यासोबर र्हा न. तुला सांगते माय, आग दोगबी लई ग्वाड सोबावाची हायेत ग लेकरं. मला बी आगदी घरच्यावानी वागवलंया इतके दिस त्येंनी. तू तर त्येंना आईसारकी. इचार नग करूस." सखूबाईंनी जसं काही निरंजनला अनुमोदनच दिलं!
"हे बघ मावशी, तुला मुलं खूप आवडतात ना? हो, केतकीकडून खूप खूप ऐकलंय तुझ्याबद्दल. तुला बागकाम आवडतं, तुला लहान मुलांशी खेळायला, त्यांना गोष्टी सांगायला खूप आवडतं. हो ना? चल तर मग. आता ठरलं. आपल्या मागच्या आउट हाउसमध्ये आपण पाळणाघर काढू या. अगदी ओंकारसह आणखी कितीतरी मुलं अशी आहेत, ज्यांना आजीची गरज आहे. अशी मुलं मी तुला मिळवून देतो, आपल्या वरकामाच्या सगुणाबाईंची मनिषा नुकतीच मॉंटेसरीचा कोर्स करून आलीय तिला देतो तुझ्या मदतीला आणि आम्हीही आहोतच."
"लेकरा, काय म्हणू रे तुला? बोलायला काही शिल्लकच ठेवलं नाहीस मला म्हातारीला." रत्नामावशीचा कंठ दाटून आला होता.
"अग मावशी, आई-बाबा गेल्यापासून आम्ही अगदी एकाकी झालो होतो ग! आम्हालाही तर कुणीतरी आपलं, हक्काचं मोठं माणूस हवंच होतं. तू आलीस आणि आम्ही निवांत झालो. आता केतकीला तिची पीएचडी पूर्ण करता येईल, मला मदत करता येईल आणि महत्त्वाचं म्हणजे ओंकारला आजी मिळेल."
केतकीनं सगळ्यांसाठी कॉफी आणली. सखूबाई जायला निघाल्या, तशी केतकी त्यांच्या पायाला बिलगली आणि भरल्या गळ्यानं बोलली, "आज माझं हरवलेलं बालपण मला दिलंत तुम्ही सखूबाई! आयुष्यभर तुमच्या ऋणात राहीन मी!"
"तिला नीट संबाळ पोरी. लई लई कष्ट भोगले ग त्या माउलीनं. आता तरी तिला सुकात र्हाऊ दे!" सखूबाई पण भावनाविवश होऊन बोलली.
.....................
जवळजवळ पन्नास मुलं यायला लागली होती पाळणाघरात. पाळणाघर कसलं, ते तर आजोळच झालं होतं मुलांचं. सुटीदिवशी पण त्यांना घरात बसवत नव्हतं, इतका रत्नाआजीचा लळा लागला होता. संध्याकाळी जाण्याआधी शुभंकरोती, पाढे, कधी बागकाम तर कधी कागदकाम, वेगवेगळे खेळ अगदी मजेत रहायची मुलं तिथं. रत्नामावशीच्या आग्रहास्तव निरंजनच्या घराण्यातली जवळजवळ बंद पडलेली वारकर्यांना जेवण द्यायची परंपराही पुन्हा सुरू झाली होती. रत्नामावशीच्या येण्यानं भरभराट झाली होती. पहाता पहाता वर्ष झालं होतं त्या घटनेला. आज त्याच आजोळाचा पहिला वाढदिवस होता. फुगे फुगवून झाले होते, फुलांचे गुच्छ बनवून झाले होते, रांगोळ्या काढून झाल्या होत्या. मुंबईहून खास पाहुणे सखूबाई आणि त्यांचा मुलगा येणार होते सोहळ्याला.
"अग ए, पाहुणे आले ना बाई, कुठं आहे तुझं लक्ष?" खूप खूप मागे गेलेल्या केतकीला निरंजनच्या शब्दांनी भानावर आणलं. सगळी मुलं, त्यांचे पालक अगदी घरचं कार्य असावं तसे झटत होते. दृष्ट लागेल असा मस्त सोहळा झाला वाढदिवसाचा. सखूबाई अगदी खूश होत्या सगळं पाहून. रात्रभर दोघी जिवाभावाच्या नणंदभावजया [की मैत्रिणी?] गप्पा मारत बसल्या होत्या. सकाळी निघताना केतकीनं सखूबाईला भरगच्च आहेर केला. भारावलेली सखूबाई आभाळाकडं पहात इतकंच बोलली, "वारकरी बुवा, तुमच्या धर्माच्या बहिनीला सुकात बगताय न्हवं? आज मी तुमाला दिलेल्या वचनातुन मोकळी झाले बगा!"
मराठा लाईट इनफंट्री - भाग - २
दुसर्या महायुध्दातील मराठ्यांचा पराक्रम/शौर्य. भाग- २
या अगोदर या रेजिमेंटची अजून थोडिशी माहिती घेऊयात. अर्थात ही आपल्याला माहीती आहेच कारण महाराष्ट्रातील प्रत्येक लहान मुलगा वा मुलगी लहानपणी खेळताना ही घोषणा देतेच.
या रेजिमेंटची युध्दघोषणा आहे -
“छत्रपती शिवाजी महाराज / की जय !
हर हर / महादेव”.
प्रमूख पहिला जयजयकार करतो आणि बाकीचे त्याला जय ! आणि महादेव म्हणून साथ देतात.
असो.
जर्मनी आणि इंग्लंडपासून भारत बराच दूर असला तरी जशी जशी युध्दाची धग वाढू लागली तसे तसे हे अंतर कमी होऊ लागले. सर्वच जगाला या युध्दाने ग्रासले आणि जवळ जवळ सगळ्याच देशांना कुठली ना कुठली तरी बाजू घेणे भाग पडू लागले. भारत तर इंग्लंडचाच भाग असल्यामुळे भारतीय सैन्याला या युध्दात भाग घ्यायलाच लागला. त्यामुळे या नवीन प्रकारच्या युध्दाची भारतीयांना माहीती झाली आणि अर्थातच त्याचा फायदा आपण अजूनही बघतोच आहोत.
भारतीय फौजांना पहिली कामगिरी मिळाली ती इजिप्तचे इटलीच्या सैन्यापासून संरक्षण करणे आणि सुदानच्या पट्यात संरक्षक फळी मजबूत करणे. मुसोलीनीच्या पूर्व आफ्रिकेच्या साम्राज्याला जो सुरूंग लागला त्यात मराठा लाईट इनफन्ट्रीचा मोठा सहभाग होता.
२ बटॅलियन जी एडनमधेच होती तिच्या सोबतीला भारतातून ३री बटॅलियन पाठवण्यात आली. या दोन्ही बटॅलियन्सचे लक्ष होते इटलीची एरिट्रियाची वसाहत. या युध्दात आपली शौर्याच्या परंपरेला जागून या सैन्याने केरेनचा डोंगरी किल्ला काबीज करताना अतुलनीय शौर्य गाजवून आपले नाव इतिहासात नोंदवले. या रक्तरंजीत युध्दाची हकिकत आपण आता बघू.
साल होते १९४० –
हा किल्ला एका डोंगरावर होता आणी त्या डोंगराच्या उतारावर दोन चांगली मोठी टेकाडे होती. एकाचे नाव होते पिनॅकल आणि दुसर्याचे पिंपल. हा सगळा डोंगर मोठमोठ्या दगडांनी भरलेला होता आणि त्याच्या आडोश्याने शत्रूला येणार्या दोस्तराष्ट्रांच्या सैन्यावर अचूक हल्ला करता येत होता. इटालियन सैन्याकडे भरपूर तोफा आणि त्याचा दारूगोळ्याचा साठा होताच. केरेन काबीज करण्यासाठी ४ थ्या इंडियन डिव्हिजनची नेमणूक करण्यात आली होती. पण आपण ही जी दोन टेकाडे काबीज करण्यासाठी झालेल्या युध्दात, मराठा लाईट इनफंट्रीने भाग घेतला त्याचकडे प्रामुख्याने बघणार आहोत, कारण नाहीतर हा लेख फार मोठा होईल.
१५ मार्च रोजी हायलॅंड लाईट इनफंट्रीने ले. कर्नल पर्सीवल यांच्या आधिपत्याखाली डोलोगोरोडॉक किल्यावरच्या पहिल्या टेकाडावर हल्ला करण्यासाठी कूच केले. त्यांच्या वर लगेचच मशीनगनचा तिखट मारा करण्यात आला. गोळ्यांच्या वर्षावात हे सैनिक त्या टेकाडाच्या पायथ्याला पोहोचले. हा आख्खा दिवस वरून होणार्या गोळीबारामुळे या सैनिकांना वर तोंड काढता आले नाही. वरून तळपता सुर्य आणि गोळ्यांचा व तोफगोळ्यांचा वर्षाव यामुळे या सैनिकांची दिवसभर फारच दमछाक झाली. श्वास घेणे सुध्दा अवघड झाले होते. प्यायचे पाणी संपल्यामुळे त्यांच्या हालात अजूनच भर पडली. इटालियन सैनिकांना वरून यांची बारिकशी हालचाल सुध्दा टिपता येत होती. जराशी हालचाल झाली की वरून गोळीबार होत होता. हे बघता दिवसा ढवळ्या पिनॅकल वर हल्ला करणे अशक्य आहे असे ठरवण्यात आले. खरे तर पुढे गेलेल्या सैन्यालाच मागे कसे आणावे हाच मोठा प्रश्न होऊन बसला होता. शेवटी अंधार पडल्यावर HLI ने यशस्वी माघार घेतली.
तो पर्यंत जनरल हिथ आणि मेसर्व्ही यांनी एक दुसरीच योजना आखली. अंधाराचा फायदा घेऊन मधली छोटीशी दरी पार करून पिनॅकलवर हल्ला करायची ती योजना होती आणि या करता आक्रमक ३/५मराठा लाईट इनफंट्रीची निवड करण्यात आली. कमांडर होते कर्नल रीड. कव्हरींग फायर देण्यासाठी तोफखाना होताच पण तो काही काळच चालू ठेवता येतो – आपली स्वत:ची हानी टाळण्यासाठी. हल्ला चालू झाला पण त्या अगोदर एक इंग्लीश आधिकारी जो पहिल्यांदीच मराठ्यांबरोबर लढाईत भाग घेत होता तो काय म्हणाला ते बघूया, त्याच्या शब्दात –
“हे मराठे हिरव्या रंगाची बेरेट घालतात. जेंव्हा ते हेल्मेट घालत नाहीत तेव्हा त्या टोपीवर एक हिरव्या आणि लाल रंगाचा तुरा फडकत असतो. पहिल्यांदा बघितल्यावर हे कसे लढणार असे वाटते खरे, पण यांनी कपडे काढल्यावर त्यांचे पिळदार शरीर आपल्या नजरेस पडते आणि ही शंका दूर होते. हे भारतातल्या दख्खन नावाच्या प्रांतातले सैनिक असून उत्तम कुस्ती करतात. हे अत्यंत शांत वृत्तीचे सैनिक कोणाच्याही वाटे जात नाहीत पण राग आल्यावर यांच्या डोळ्यात रक्त उतरते. डोळे लालबूंद होतात आणि मग आसपासचे सगळे चित्रच बदलू लागते. कितीही थंडी असो किंवा उष्णता असो, हे कुठल्याही हिंदीसेनेपेक्षा जास्त तडफेने युध्द करू शकतात.”
अंधार पडल्यावर मराठा लाईट्ने आपला हल्ला चालू केला. ज्या खडबडीत व दगडाधोंड्यांनी भरलेल्या, मोठमोठे दगड पडलेल्या डोंगराच्या उतारावर जेथे दिवसा ढवळ्यासुध्दा दोन्ही हाताचा आधार ने घेता चढणे मुष्कील होत, तेथे जिद्दीने हे सैनिक चढत होते, केवळ युध्दात शत्रुला पाणी पाजण्यासाठी. हे शब्द माझे नाहीत. वरील आधिकायाचे आहेत. सगळ्यात पुढे होते B कंपनीचे प्रमूख सुभेदार श्रीरंग लावंड. मागे कष्टाने C आणि D कंपन्या मार्ग आक्रमत होत्या. त्यांचे प्रमूख होते – बूमगार्ड्ट आणि सेमूर. इटालियन सैन्याने यांना कडवा प्रतिकार केला. लाल रंगाच्या बॉंबचा अखंड वर्षाव ते खालून येत असलेल्या मराठ्यांवर करत होते. त्या बॉंबच्या आणि मशीनगनच्या आवाजात मराठ्यांच्या युध्दघोषणांचा “शिवाजी महाराज की जय ! हर हर महादेव” आवाज वरच्या टिपेला पोहोचला होता आणि खाली जेथे त्यांचे कर्नल रीड बसले होते त्यांना त्या स्पष्ट ऐकू येत होत्या. मेजर मून, जे त्या वेळी कर्नल रीड बरोबर बसले होते त्यांनी अशी आठवण लिहून ठेवली आहे की कर्नल रीड्ची छाती त्यांच्या फौजेच्या या पराक्रमाने फुगली होती आणि ते मराठ्यांविषयी अखंड बोलत होते. रात्रीतल्या घनघोर युध्दानंतर मराठा लाईटने पिनॅकलच्या पायथ्यापाशी जो छोटीशी सपाट जागा होती ती काबीज केली व तिथे मोर्चे बांधणी केली. सकाळी जेव्हा या मोर्च्यावर मेसर्व्ही गेला तेंव्हा त्याने तोंडात बोटे घातली. त्याच्या सहाय्यकाने लिहून ठेवले आहे की “ज्या रस्त्यावरून मला कुठलेही सामान न घेता चढता येत नव्हते त्या रस्त्याने अंधारात एवढे अवजड सामान घेऊन तोफांच्या मार्यात हे रीडचे मराठे कसे चढले असतील ? याची कल्पना करूनच मेसर्व्हीच्या निळ्याशार डोळ्यात पाणी आले.”
पिनॅकल सर झाल्यावर इटालियन सैन्य काही गप्प बसले नव्हते. त्यांनी त्या टेकाडावर प्रतिहल्ले चढवण्यास सुरवात केली. त्यांच्या विरूध्द आता संरंक्षणाचे काम करावे लागले. सगळ्या सैनिकांना एकत्र जमवून कामे वाटून देत पर्यंत पहाटेचे चार वाजले व इटालीयन सैन्याचे हल्ले चालू झाले. त्यांना मागे रेटेतोपर्यंत सकाळ उजाडली आणि काही इटालीयन सैनिकांना मराठ्य़ांनी पकडले. कर्नल रीडला एका युध्दज्वर चढलेल्या मराठी जवानाला धक्का मारून जमिनीवर पाडावे लागले. त्याच्या हातून मशीनगनच सुटत नव्हती.
दुसर्या दिवशी हे युध्द संपले आणि मराठा लाईट्ची तेथून सुटका झाली. या युध्दात स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता, तोफगोळ्यांच्या व मशीनगनच्या गोळ्यांच्या वर्षावात सुभेदार लावंड यांनी जे न डगमगता आपल्या कंपनीच्या पुढे राहून मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांना मिलीटरी क्रॉस बहाल करण्यात आला.
पुढच्याच एका दिवसात मुख्य किल्लापण सर करण्यात आला. हा किल्ला हातातून गेल्यामुळे व तो परत न जिंकता आल्यामुळे इटलीची आफ्रिकेमधली सत्ता मोडकळीस आली आणि लवकरच नष्ट झाली. या सगळ्यात मराठा लाईट इनफंट्रीचा फार मोठा सहभाग होता असे तज्ञांचे मत आहे.
जेव्हा युध्द चालू असते, तेव्हा अशा पराक्रमांना तोटा नसतो व कोणालाही त्या बद्दल विशेष वाटत नाही. पण केरेनेच्या युध्दाबद्दल ले. कर्नल करसे यांना ११व्या इंडियन इंनफंट्री ब्रिगेडच्या कमांडर कडून एक पत्र आले
“I wish in particular to thank your Battalion for the great dash it displayed in capturing and holding Flat Top Hill, in spite of very severe casualties. It has been a magnificent effort. Will you please tell your officers and men that I am now more proud than ever to have them in my Brigade.”..............
जयंत कुलकर्णी
भाग दोन समाप्त.
पुढे चालू......
आषाढी एकादशी काही कथा
आषाढी एकादशी:-
म्रुदुमान्य नावाच्या एका दैत्याने शंकराची आराधना करुन त्याला प्रसन्न करुन घेतले आणि त्याच्याकडून वर मिळवीला की त्याला कोणत्याही प्राण्याकडून मरण प्राप्त होणार नाही, फ़क्त एका स्त्रीच्या हातून तो मरेल. या म्रुदुमान्याने या वराच्या जोरावर सर्व देवांना जिंकले आणि श्रीविष्णूस जिंकण्यासाठी तो वैकुंठास गेला, उभयतांच्या लढाईत श्रीविष्णूचा पराभव होऊन तो शंकराकडे गेला पण शंकरही आपल्या वरामुळे हताश झाला होता. नंतर ब्रम्हा - विष्णू - महेश व सर्व देव एका पर्वताच्या गुहेत लपुन राहिले. तिथे काही दिवसानी ब्रम्हा - विष्णू - महेश या तीघांच्या श्वासाने एक देवी उत्पन्न झाली. तीच एकादशी देवी होय. तिने नंतर देवांना अभय देऊन म्रुदुमान्याला ठार मारले. देवांनी तीची स्तुती केली आणि तीनेही सांगितले की माझे एकादशीचे व्रत जे लोक करतील ते सर्व पापांपासून मुक्त होतील.
तर अशी ही एक एकादशीची कथा.
आषाढ शुक्ल ११ व कार्तिक शुक्ल ११ या दोन एकादशांना महाएकादशी असे म्हणतात. त्यातील आषाढी एकादशीला शयनी एकादशी तर कार्तिकी एकादशीला प्रबोधीनी एकादशी असेही म्हट्ले जाते.
आषाढी एकादशीच्या दिवशी शेषशायी भगवान श्रीविष्णु शयन करतात (झोपतात) ते कार्तिकी एकादशी पर्यंत झोपलेलेच असतात अशी समजुत आहे. म्हणुनच चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल ११ ला होतो व कार्तिक शुक्ल ११ ला संपतो. हे चार महिने व्रतस्थ रहायचे असुन सणासुदीनी भरलेले आहेत.
फ़ार पुर्वि आर्य लोक ऊत्तर ध्रुव प्रदेशी किंवा त्याच्या जरा खाली वसति करुन रहात होते. तेव्हा याच दिवसात चार महिने त्यांना सूर्यदर्शन होत नसे. त्यामुळे सूर्यरुपी विष्णू झोपलेला आहे अशी कल्पना त्यांनी केली असावी व नंतर पुराणकारांनी त्या घटनेवर कथा रचल्या असाव्यात असे काही जणांचे मत आहे.
महाराष्ट्रातील विशेषत: भागवतधर्मीय किंवा पंथीय म्हणवणारे लोक या दिवशी उपवास तर करतातच पण शक्य तर पंढरीची वारी करुन श्रीविठ्ठ्ल दर्शन घेतात नच जमले तर गावातल्या एखाद्या देवळात जाऊन अभंग गाऊन ती रात्र नामसंकीर्तन, भजन, पूजनात घालवितात.
उपवास या शब्दाचा अर्थ केवळ उपास करणे किंवा दिवसभर उपासाचे खाणे असा नसुन थोडा वेगळा आहे. उपवास याचा मुळ अर्थ जवळ जाणे (उप + वास) असा आहे. म्हणजेच परमेश्वराच्या जवळ जाणे, त्याची आराधना करणे. परमात्म्याचे स्मरण करणे, त्याचा निकटवास अनुभवणे म्हणजे उपवास. उपासकाला आहार कमी करण्यावाचुन गत्यंतर नाही असे पाहुन धार्मिक साधनेप्रीत्यर्थ केलेल्या अन्नत्यागाला पुढे उपवास म्हणण्याची प्रथा पडली असावी. उपवासाने मन अंतर्मुख होते, द्रुष्टि निर्मळ होते, शरीर हलके रहाते, वासना शुध्द होते, संकल्प शक्ति वाढते.
आषाढी एकादशीच्या या व्रताला विष्णूशयनोस्तव असेही म्हणतात. चातुर्मास व्रतारंभ याच दिवशी करतात. यापुढील चार महिन्यात अनेक व्रते पाळायची असतात ती पाळण्यासाठी सामर्थ्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना या दिवशी करतात.
आपल्याकडील नव्या पिढीतील लोकांना तसेच परदेशी स्थायीक झालेल्या लोकांना धार्मिक सण, व्रते, आपल्या परंपरा याची थोडीशी माहिती असावी या उद्देशाने हे लिखाण केले आहे. आणखी काही माहिती उपलब्ध असल्यास ती इथे अवश्य द्यावी. पुढील चातुर्मास काळात येणा-या व्रत आणि सणांची थोड्क्यात माहिती देण्याचा देखील विचार आहे.
बज्जु गुरुजी
टणत्कार (खुलाशासह )
किर्र किर्र रातकिड्यांचा आवाज चालु होता. गेल्या दोन दिवसांपासुन पावसाचा जोर कमी झाला म्हणुन पर्णकुटीच्या बाहेरच गवताची शय्या केली होती. तिच्यावर पडल्या पडल्या आभाळात नजर टाकता टाकता कधी डोळा लागला ते कळलंच नाही. गार हवेने आता जाग आली. मधुनच दोन चार चुकार ढग हळुच चालले आहेत. पुर्वेकडे चंद्रकोर दिसत आहे म्हणजे पहाट व्हायला आली असावी. कृष्ण पक्ष चालु आहे. बोलता बोलता चार महीने झाले ह्या पर्णकुटीत राहुन. येवढा पावसाळा संपला की आपण कामाला लागु हे आश्वासन मिळाले अन त्या आश्वासनावर मनातले दुःख कसं बसं सावरुन धरलं आहे.
पण असं तर नाही ना की माझे काम तो विसरुन गेला असेल? अनेक दिवसांच्या रानावनातल्या खडतर आयुष्यानंतर मिळालेले विलासी सुख त्याला कर्तव्याचा विसर तर देत नसेल? राजकारणातला एक मोहरा म्हणुन मला पुढे करुन कार्यभाग साधुन मला दुर्लक्षाने अपमानित तर करत नसेल? काळ सर्व दुःखांवर औषध आहे, हे जाणुन मुद्दाम कालक्रमणा होउ देउन माझ्याचकडुन जाउ दे आता असे तर त्याला ऐकायचे नसेल?
खरोखर अनोळखी प्रदेशात अनाहुतासारखा असलेला मी एकटा काही करु शकत नाही. पण त्याला मदत तर मी एकट्यानेच केली. कोण होते मदतीला ? मीच मदत केली. मग हे काम मी एकटा का नाही करु शकत. फक्त कोणत्या दिशेला जायचे ते समजले पाहिजे. एकदा ती दिशा समजली की मी नक्की एकटाच सर्व काम करेल? पण सर्व पृथ्वी तर मी एकटा शोधुन काढु शकत नाही.
विचारांच्या आवर्तात सापडलं की वेळ कसा निघुन जातो ते समजतच नाही. आज काही करुन निर्णय घेवुन टाकु. तो मदत करत असेल तर ठिक नाहीतर आपण पुढे चालायला लागायचं.
असा विचार करुन रामाने पलिकडे शांत झोपलेल्या लक्ष्मणाकडे एक नजर टाकली. हलकेच उठुन धनुष्य उचलले. पुन्हा एकदा प्रत्यंचा ढिली करुन ताणली. सरळ रेषेत धनुष्य धरुन दोरी खांद्यापर्यंत ओढुन एक बाण दरीच्या दिशेने सोडला. सपकन झालेल्या आवाजाने लक्ष्मण जागा होवुन पाहु लागला. जवळ जाउन रामाने बाण सोडलेल्या दिशेने पहायला लागला.
रामाचा चेहरा संतापाने फुलला होता. कपाळावरची शीर ताड ताड उडत होती. दरीमधे असलेल्या सुग्रीवाच्या निवासस्थानाकडे पाहुन राम म्हणाला..लक्ष्मणा ! जा !! त्या सुग्रीवाला विचार... तुला कर्तव्याचा विसर तर पडला नाही? सुंदर ललनांच्या बाहुपाशामधे गर्क होवुन मित्रांना विसरुन तर गेला नाही? कि राज्यपद मिळाल्यावर मित्रद्रोहाचे पातक कसेही धुवुन काढता येईल असे तर तुला वाटत नाही? विसरु नकोस ज्याच्या भयाने तु रानावनात फिरत होतास तो वाली या रामाच्या एका बाणाने मेला ! जा लक्ष्मणा सांग...सांग त्या सुग्रीवाला... वाली ज्या मार्गाने गेला तो मार्ग अजुनही बंद झालेला नाही... ! आणि पुन्हा एकदा रामाने धनुष्याचा टणत्कार केला.
खुलासा - पावसाळा संपल्यावर सीताशोध घेउ असे सुग्रीवाने वालीला मारल्यावर रामाला आश्वासन दिले होते. पावसाळा संपला पण अजुन सुग्रीवाकडुन काही हालचाल नाही हे पाहुन राम बेचैन होउन लक्ष्मणाला सुग्रीवाकडे पाठवतो असा प्रसंग आहे. तेवढेच फक्त कथेत घेतले आहे. मुद्दाम मागचा पुढचा संदर्भ दिला नाही, म्हटले बघु.. कसे जमते आहे ते. काही जणांनी आंतरजालाशी संदर्भ लावला. काही जणांनी अजुन कशाशी लावला, ते व्यनीतुन कळवले. असो. धन्यवाद.
गाढव, रानडुक्कर, घुबड, कोल्हा आणि सिंह
पंचतंत्रात प्राणीजगतातली पात्रे घेऊन अगदी सोप्या भाषेत जीवनाचे तत्वज्ञान सांगणार्या नितीकथा आहेत. आजच्या औद्योगीक (कॉर्पोरेट) जगातले प्राणी कसल्या कथा सांगत असतील? माझ्या कल्पनेतून काही कथांची भर घालण्याचे ठरवले. आणि काही नवयुगाच्या औद्योगीक पंचतंत्र कथा जन्माला आल्या.
मी या आधी ही कथा मिपावर टाकली होती. पण काही वाचकांनी ती संस्थळावरील घडामोडींच्या संदर्भात वाचली. त्यामुळे गैरसमज नको, म्हणून आणखी जास्त दंगा होण्याआधी ती काढून टाकली. मग नीट विचारांती ह्या टिपणी सह द्यायचे ठरवले.
ह्या कथा स्वरचित आहेत. औद्योगीक जगातले अनुभव प्राण्यांच्या मुखवट्यामधून दाखवून रुपके रचली आहेत.
मी पुर्वी काम करीत असलेल्या भारतातल्या (सरकारी) कंपनितील लोकांकडून जो उपदेश ऐकायला मिळायचा, त्यावरून ह्या कथेतला बोध लिहीला आहे. त्या बोधावर ही कथा नंतर रचली.
डिसक्लेमर- ह्या पंचतंत्र कथा वाचतांना संस्थळाच्या स्थानिक घडामोडींशी संबंध लावल्यामुळे जर कोणाला त्रास झाला, तर त्यासाठी लेखक जबाबदार नाही.
गाढव, रानडुक्कर, घुबड, कोल्हा आणि सिंह
एका जंगलात एक सिंह आपल्या कळपाबरोबर रहात होता. कळपातील सिंहीणी रोज त्याच्यासाठी शिकार करून आणत. एक दिवस दुसर्या एका सिंहाने त्याला कळपातून हुसकावून लावले. तेव्हा तो सिंह रानामधे एकटाच राहू लागला. शिकार आणण्यासाठी त्याने एक गाढव, एक रानडूक्कर, एक घुबड आणि एक कोल्हा असे चार मदतनीस कामास लावले. तेही राजाकडे काम मिळते आहे म्हणून तयार झाले. सिंहाला वाटले की या प्रत्येकाची वैशिष्टे एकत्रित काम करून भरपूर शिकार मिळवून देतील.
गाढव दिवसभर रानात चरत फिरायचे. चरायचा कंटाळा आला की लोळत पडायचे. खुशीत आले की दोनचार तानाबिना मारून सर्वांची करमणूक करायचे. सिंह त्याच्याकडे एक आळशी पण गमतीदार प्राणी म्हणून बघायचा. चमूला मनोरंजन येवढाच त्याचा उपयोग होता.
रानडुक्कर शिकार दिसली रे दिसली की तिच्यामागे सुसाट धावत सुटे. त्याला फक्त सरळ रेषेत धावणे जमायचे. गरज पडलीच तर अचानक पावित्रा बदलून शिकार पकडण्याची कला त्याला माहीत नव्हती. जर शिकार यदाकदाचित तावडीत आलीच, तर धडाधड धडका देउन तिला पाडणे येवधेच त्याला माहीत होते. ह्या धकाधकीत रनडुक्कर खूप काम करून थकून जायचे. हा मूर्ख प्राणी सतत काही उपयोगी, काही निरूपयोगी उद्योगात असतो येवढीच माफक माहिती सिंहाला त्याच्याविषयी होती.
घुबड आपले सतत चिंतामग्न बसून असायचे. त्याला उडतांना किंवा काम करतांना कोणीच पाहिले नसावे. चुपचाप एका जागी बसून, डोळे शुन्यात लावून विचार करीत असायचे. कामाच्या चिंतेने रात्रभर झोपायचे नाही. सिंहाला त्याचा एकूण थाट एखाद्या अभ्यासू विचारवंताचा वाटायचा.
सिंहाचा सर्वात विश्वासू मात्र कोल्हाच होता. त्याच्या समयोचित सल्ल्यावर सिंह अवलंबून रहायचा. कोल्हा नेहमीच सिंहाच्या कानाशी लागलेला असायचा. आपल्याला सिंहाची कसी काळजी वाटते, त्याचा पुर्वीचा कळप परत कसा मिळवता येईल वगैरे गुजगोष्टी सिंहाशी बोलत रहायचा. हा काय सारखी कानाफुसी करत असतो हे कोणालाच कळायचे नाही. पण सिंहाचा विश्वासू म्हणून दबदबा असल्याने बाकी चमू त्याला घाबरून होती.
एकदा जंगलामधे वणवा पेटला. जंगल सोडून जायची वेळ आली. त्यावेळी आळशी गाढव व मूर्ख रानडूक्कराला पेटलेल्या जंगलात सोडून, विचारी घुबड आणि विश्वासू कोल्हा या दोघांना घेऊन सिंह दुसर्या जंगलात निघून गेला.
बोध-
आराम नव्हे, काम कर.
काम नव्हे, कामाची फिक्र कर.
फिक्र देखील नव्हे, फिक्रची जिक्र कर.
कॉलेज कट्टा भाग - अंतिम
---भाग - १ ---
---भाग - २ ---
---भाग - ३ ---
---भाग - ४ ---
---भाग - ५ ---
"ज्या पोरी पोरांवर जाळं टाकायला सुरुवात करतात, त्त्यांच्यावर नजर ठेवुन मोका मिळताच त्यांना खलास करायचं" - रुपेश
सगळ्यांचे रक्ताळलेले सैतानी डोळे एकमेकाकडे बघत होते. आतल्या ज्वालामुखीला वाट मिळाली होती. सैतान जागा झाला होता.
चोवीस तास नशेत असल्यावर कुणी माणुस थोडीच राहतो. आता आयुष्याचं एकच ध्येय होतं, आणी ते म्हणजे इतकी दहशत पसरवायची की प्रेमाचं कुणी नाव जरी घेतल तरी त्याचा थरकाप उडावा. वैभवला आम्ही रुम सोडण्यास भाग पाडले होते, कारण आम्हाला कुणीच साक्षीदार नको होता. खुप रडला बिचारा आम्हाला सोडुन जाताना. अधुन मधुन तरी तो आमच्याकडे येई आणी आम्हाला सुधारण्याचा असफल प्रयत्न करी. आम्ही त्याला शिव्या देऊन हाकलुन देत असु.
आम्हाला या कामासाठी भरपुर पैसे हवे होते. रुपेशने त्याच्या नावावर असलेला एक प्लॉट कुणाच्याही नकळत विकला, आणी पुष्कळ पैसा आमच्या हाती आला.
आता आम्हाला अफेअर असणार्या मुलींची माहिती होती. ओळखीतल्या कुणालाही सुरुवातीला हात लावायचा नाही असं ठरलं होतं कारण त्यात पकडले जाण्याची शक्यता जास्त होती, पण वेळ आली की त्यांना पण संपवायचं होतं. सचिन कंप्युटर, पासवर्ड हॅकींग आणी ईंटरनेट यात खुपच हुशार असल्यानं त्याला मुलींचे ए-मेल/सोशल नेटवर्कींग अकाउंट्स हॅक करुन त्यांची माहिती मिळवायची जबाबदारी मिळाली. मी आणी रुपेश त्यांच्यावर पाळत ठेवणार आणी ज्या दिवशी काम करायचे असेल त्या दिवशी तुषार चारचाकी गाडी चोरणार आणी चालवणार असा प्लॅन झाला. एक महिना सर्व माहिती मिळवणे, पाळत ठेवणे, जास्त वापरात नसलेल्या चारचाकी हेरुन ठेवणे ही कामे करत होतो. या कामासाठी हत्यारे लागणार होती, पनवेलला सज्जाद नावाचा कुणी व्यक्ती अवैध रित्या हत्यारे विकतो अशी आम्हाला माहिती होती, त्यानुसार आम्ही त्याला शोधुन बरीचशी हत्यारे जमा केली. सुरे, चॉपर, गावठी कट्टे जवळ आल्यावर वेगळाच रानटी, असुरी आत्मविश्वास जाणवायला लागला होता.
सचिनने त्याची कामगिरी चोख बजावली होती. पाच मुलींची इत्यंभुत माहिती नेटवरुन मिळवली होती. मी आणी रुपेशने त्यातील तीन जणींवर पाळत ठेवुन शेवटी सर्वांनी मिळुन एक टारगेट फिक्स केलं.
"पद्मिनी केळकर. वय २१ वर्षे, उंची ५'३", पोस्ट ऑफिसजवळ सदानंद सोसायटीमधे चौथ्या मजल्यावर राहते. रोज मैत्रीणीकडे अभ्यासाच्या नावाखाली बॉयफ्रेंडला चौपाटीवर भेटते आणी रात्री उशीरा स्कुटीवर घरी जाते. घरी जाताना एका निर्जन अंधार्या गल्लीतुन शॉर्टकट घेते. गल्लीच्या दोन्ही बाजुला सरकारी कार्यालये आहेत आणी उंच भिंती आहेत." - मी एका ड्रॉइंग शीटवर रस्ता काढुन दाखवत बोलत होतो. मान वर करुन पाहिलं, कुणाच्याच डोळ्यात जराही भिती दिसत नव्हती.
"१ एप्रिल ला हिला संपवायचं. आणी प्रत्येक वेळी "Love is Death" ची चीट ठेवायची, म्हणजे आपला मॅसेज सर्वांना लवकर पोहोचेल." - रुपेश म्हणाला.
पुन्हा सगळा विचार करुन १ एप्रिल तारीख अंतिम झाली. ती चौपाटी कडुन निघाली की रुपेश ने मला फोन करायचा आणी तिच्या मागे यायचं. त्या निर्जन अंधार्या गल्लीत सचिन आणी तुषार एक तार घेऊन उभे राहतील. ती गाडीवरुन पडली की तिला खलास करायचं आणी तिथुन दोघा दोघांच्या ग्रुपने वेगवेगळ्या दिशेला निघुन जायचं आणी मग रुमवर जमायचं असा प्लॅन ठरला.
एक एप्रिल. आम्ही दुपारपासुनच दारु आणी गांजा पीत होतो. एक एप्रिलची रात्र. सगळीकडे भयाण शांतता, भुंकणारे कुत्रे, रातकिडे आणी अधुन मधुन जाणार्या एखाद्या ट्रकचा दुरुन येणारा आवाज यापलिकडे काहीही नव्हतं. रात्रीचा एक वाजला. माझा मोबईल वाजला आणी माझे हात थरथरु लागले.
"ती निघालीये" - एवढे बोलुन रुपेशने फोन ठेवला. ठरल्याप्रमाणे मी कुणी येउ नये म्हणुन लक्ष ठेवण्यासाठीगल्लीच्या दुसर्या बाजुला थांबलो, सचिन आणी वैभव तार घेवुन गल्लीच्या मध्यावर थांबले. दुरुनच मला स्कुटी येण्याचा आणी त्यापाठोपाठ पडल्याचा आवाज आला. गल्लीपासुन दुरदुर पर्यंत कुणी नाही पाहुन मी गल्ली मधे आलो. एका बाजुला पडलेली स्कुटी, दुसर्या बाजुला पद्मिनी आणी तिच्याबाजुला रुपेश्,सचिन आणी तुषार दिसले. ती आम्हाला मदत मागण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती. तिला तडफडताना पाहुन मला एक असुरी आनंद मिळत होता.
"अरे बघताय काय हरामखोरांनो, काढा सुरे आणी संपवा खेळ" - रुपेश खवळला. तिने ओरडायच्या आत त्याने सुरा काढला आणी सर्रकन तिच्या गळ्यावरुन फिरवला. रक्ताचे कारंजे उडाले, सर्वांनी जमेल तेवढ्या वेळा तिच्यावर सुरे, चॉपरने वार केले आणी सर्व हत्यारं एका बॅगेत भरुन तिथुन पळालो. चीट ठेवायची राहिली म्हणुन मी पुन्हा मागे फिरलो, चीट ठेवली आणी तिच्याकडे पाहुन असुरी हसलो.
दुसर्या दिवशी पेपरात बातमी होती - '२१ वर्षाच्या तरुणीची निर्घृण हत्या. पोलिसांचा प्रियकरावर संशय'
"म्हणजे आपली चीट मिळाली नाही की कुणी पाहिली नाही, साला तिचा बॉयफ्रेंड आपलं क्रेडीट घेऊन नको जायला" - मी
"मिळेल मिळेल, नक्की मिळेल. या वेळी नाहीतर पुढच्या वेळी" - तुषार. सर्वजण पुन्हा राक्षसी हसले.
सचिनने पुढची तारीख एका सुत्रावर काढायची आयडीया दिली. ज्या तारखेला खुन केला त्या तारखेची आणी महिन्याची बेरीज करायची आणी जी टोटल येईल त्या तारखेला पुढचा खुन करायचा. १ एप्रिल च्या पुढची तारीख होती ५. ५ मे, टारगेट - विशाखा नाईक, वय २६ वर्षे, कॉल सेंटरमधे नोकरी करते, टॉप फ्लोरच्या फ्लॅटमधे एकटीच राहते, वीकेंडला बॉयफ्रेंड मुंबईवरुन येतो. पाच तारखेला नाईट शिफ्टला आहे, पहाटे पाच वाजेपर्यंत घरी येईल. गॅलरीचं दार कधीच बंद नसतं. ती घरी यायच्या आधी टेरेसवरुन फ्लॅटच्या गॅलरीत उतरायचं आणी तिच्या घरात लपुन बसायचं. बेशुद्ध करण्यासाठी लागणारं क्लोरोफॉर्म आम्ही एका सरकारी हॉस्पिटलच्या बेवड्या वॉर्डबॉयकडून मिळवलं होतं.
सव्वा पाच वाजता ती दरवाजा उघडुन आत आली. मी बेडरुमच्या दरवाज्याआड क्लोरोफॉर्म लावलेला टॉवेल घेऊन उभा होतो. ती आत येताच मी तिच्यावर झडप घातली आणी रुमाल तिच्या तोंडावर दाबुन ठेवला. क्लोरोफॉर्मची मात्रा कमी पडली होती त्यामुळे ती अर्धवट बेशुद्ध झाली होती पण काही करण्या इतपत नक्कीच शुद्धीत नव्हती. ती बेडवर पडली होती आणी आम्ही बेडच्या बाजुला उभे होतो.
"मला हिला आणखी एक शिक्षा द्यायचीये" - तुषार म्हणाला आणी त्याने तिचा बलात्कार केला, ते पाहुन सर्वच जणांनी हा प्रकार केला आणी तिचाही खेळ संपवला.
७ खुन केल्यावर आम्ही भलतेच सराईत झालो होतो. खुन झालेल्या व्यक्तीशी आमचा काहीही संबंध नसल्याने आणी कॉलेज स्टुडंट अशी ओळख असल्याने आमच्यापर्यंत पोहोचणे पोलिसांना अवघड होते. पण "Love is Death" मुळे सिरीयल किलर्स हा प्रकार करताहेत हे सिद्ध झाल्यावर पोलिसही सतर्क झाले होते आणी आम्हीही. पेपरातल्या बातम्या वाचुन आम्हाला खुप आनंद होत होता. आपल्याला कुणीही पकडु शकणार नाही असा आत्मविश्वास वाढु लागला होता. सर्वजण विक्षिप्त बुद्धीचे झाले होते. दरम्यान तुषारचे स्केच प्रसिद्ध झाले म्हणुन तो थोडे दिवस मुंबईला निघुन गेला.
"माणसाला मरताना पण मजा येत असणार, आपण खुन केला तेव्हा पोरी कशा उगाच ओरडायच्या, पण मग शांतता, कायमची गाढ झोप. मग काहीच दुखत नाही." - मी. रुपेश, सचिन आणी मी एका निर्जन टेकडीवर बसलो होतो.
"ए सचिन. आम्ही तुला मारतो आणी मग तु कसं वाटत ते आम्हाला सांग हा" - रुपेश.
आम्ही सचिनला धरुन आडवा केला, मी त्याच्या छातीवर बसलो, रुपेशने त्याचे हात धरले.
"शशSSSSSSSSSSSSSSशश, तुला काहीही त्रास होणार नाही, तु शांत पडुन रहा" - असे म्हणुन मी दोन्ही हातात सुरा धरला आणी त्याच्या छातीवर टेकवला.
"बघ तुला काही त्रास होणार नाही" - असे म्हणत मी हळुहळु सुरा त्याच्या छातीत रोवत गेलो. सचिन शेवटचं कण्हला आणी त्याने डोळे मिटले.
"बघ. कसा शांत झोपलाय ते. लोकं उगाच मरायला घाबरतात." - रुपेश.
सचिनच्या पायाला दोरी बांधुन दोघांनी त्याला ओढत टेकडीच्या खालपर्यंत आणला. समोर पोलिस उभे होते. आम्ही दोघे पुन्हा टेकडीकडे पळत सुटलो. पोलिस आमच्या मागे होते. पळता पळता ठेच लागुन मी पडलो, कुणीतरी डोक्यावर हतोडा मारल्यासारख वाटलं.
सचिनने कायमचे डोळे मिटले होते. तुषार मुंबईवरुन कधी परतलाच नाही. बापाने खुप सारा पैसा ओतल्यावर रुपेश केसमधुन सुटला. आता निवडणुक लढवण्याची तयारी करतोय.
आणी मी, मी अजुनही कॉलेजात जातो, सगळे लेक्चर पुर्ण अॅटेंड करतो, अभ्यास करतो. प्रेरणा कॉलेजला येण्याची वाट बघतो.
इथले लोकं वेडेच आहेत. मला म्हणतात हे कॉलेज नाही, वेड्यांच ईस्पितळ आहे.
समाप्त.
टीप: कथेतील सर्व पात्र, घटना व नावे काल्पनिक आहेत.
( निवेदनः वेळेच्या अभावी कथेची मांडणी आणी लेखनशैली याकडे लक्ष कमी दिले गेले आहे, मनात आलं तसं लिहित गेलो. कथेत काही चुका असल्यास निदर्शनास आणुन देणे.)
आपला,
मराठमोळा
कस्टोडियल डेथ -भाग १ (प्रांतांच्या गोष्टी – ३)
रात्री साडेआठ वाजता एस्डीपीओंचा प्रांतांना फोन आला.
“सर रारुआं थानारे जणे सुइसाइड अटेम्प्ट करिछि, मु सेआडे जाउछि. सरंक इन्फर्मेशनपाई जणाइली.” प्रांतांना चटकन काही लक्षात आले नाही. त्यांनी एवढंच विचारलं, जिवंत आहे का?
“हां सर. व्यस्त होअन्तु नाही. मु खबर देइ देबि. रहिली सर, नमस्कार.” एस्डीपीओंनी प्रांतांना अधिक संधी न देता फोन कट केला.
प्रांतांनी एस्पींना फोन लावला. फोन स्वीच ऑफ. प्रांतांना काही सुचेना. पहिलंच पोस्टिंग. जेमतेम सहा महिने झालेले. पोलीस कस्टडीत मृत्यु हे पोलीसांना भलतंच महाग पडणारं प्रकरण असतं हे त्यांना माहीत होतं. खरंतर तेवढंच माहीत होतं. कायद्याच्या आणि नियमांच्या पुस्तकात वाचून त्यांना तशी माहिती बरीच होती. पण प्रत्यक्षात अशी परिस्थिती आली तर काय करावे हे फक्त अनुभव नावाच्या पुस्तकातच वाचायला मिळत असल्यामुळे आणि हेच पुस्तक जवळ नसल्यामुळे प्रांत बेचैन झाले. एवढ्यात कलेक्टरांचा फोन आला.
“अजित, अरे एक प्रॉब्लेम झालाय. रारुआं ठाण्यात एकानं फास लाऊन घेतलाय.”
“हो मॅडम, आत्ताच समजलं. मी जाऊ काय तिथं?”
“नाही. तू जायची गरज नाही. पण सावध रहा. बातम्या घेत रहा. एस्पी राऊरकेला ला आय जीं कडे गेलेत. मला एकच काळजी आहे, हा माणूस मेला नाही पाहिजे. निदान हॉस्पीटलमध्ये आणेपर्यंत तरी जगला पाहिजे. तू असं कर, मेडीकल ऑफिसरशी बोल. किमान दोन डॉक्टर हजर हवेत जेंव्हा केंव्हा त्याला सबडिव्हिजन हॉस्पीटलमध्ये आणतील तेंव्हा. माणूस मेला तर हॉस्पीटलमध्ये आणि गावामध्ये फोर्स राहिला पाहिजे. दंगा होऊ शकतो.”
“काळजी करू नका मॅडम. मी बघतो. गरज वाटलीच तर तुमच्याशी बोलीनच.”
प्रांतांनी लगोलग मेडीकल ऑफिसरना फोन लावला आणि सगळे डॉक्टर जाग्यावर असल्याची खात्री करून घेतली. हेडक्वार्टर इन्स्पेक्टरला फोन करून दोन कॉन्स्टेबल दवाखान्यात पाठवून दिले. परत एस्डीपीओंना फोन लावला.
“सर मी इथं पोचलोय. त्याला आम्ही उखुंडाला प्रायमरी हेल्थ क्लिनिकमध्ये घेऊन चाललोय. मी परत लावतो तुम्हाला फोन.” एस्डीपीओंनी पुन्हा प्रांतांना काही संधी न देता फोन कट केला. प्रांत वैतागले. पण एस्डीपीओ कामात असेल, घाईत असेल अशी मनाची समजूत घातली.
रारुआं प्रांतांच्या हेडक्वार्टरपासून साधारण तीस किलोमीटरवर. म्हणजे पाऊण तास. उखुंडा रारुआंपासून पाच किमी. म्हणजे दहा मिनिटं. प्रांतांनी हिशेब केला. आत्ता नऊ वाजलेत. उखुंडातून निघायला साडेनऊ ते दहा वाजतील. म्हणजे इथे यायला कमीत कमी अकरा वाजणार. त्यांनी मेडीकल ऑफिसरला पुन्हा फोन लाऊन कल्पना दिली, की त्यावेळेत ड्यूटी शिफ्ट होणार असेल तर पुढचे डॉक्टर येईपर्यंत अगोदरचे डॉक्टर थांबले पाहिजेत. एवढा वेळ तो दुर्दैवी माणूस जिवंत राहणार का अशी शंका प्रांतांना वाटून गेली. त्यांनी परत एस्डीपीओंना फोन लावला. यावेळी त्यांना काही न विचारता प्रांत म्हणाले, “दासबाबू, तुम्ही त्याला उखुंडाला नेऊन पुन्हा एक तास कशाला वाया घालवताय? सरळ इकडे घेऊन या.”
“नाही सर. तुम्ही काळजी करू नका. मी आहे इथं.”
“तुम्ही डॉक्टर आहात का?”
“तसं नाही सर, आम्हाला त्याला जवळच्या दवाखान्यात लगेच नेलं असं दाखवणं भाग आहे.”
प्रांतांची ट्यूब पेटली. म्हणजे जीव वाचवणे हा मुद्दाच नाही; गाडी प्रोसीजरच्या रस्त्याला लागलेली आहे.
“कुठे मेला? कस्टडीत की उखुंडाला?” प्रांतांनी पॉइंट ब्लॅंक शूट केलं.
“सर आम्ही त्याला उखुंडाला लगेच हलवलं. तिथल्या डॉक्टरांनी सबडिव्हिजन हॉस्पीटलला हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आम्ही तिकडे घेऊन येणार. तिथे पोचल्यावर तो मरेल.”
पोलीसांच्या त्या प्रोफेशनल उत्तरानं प्रांत अचंबित झाले. आपली कातडी अशी टणक व्हायला किती दिवस लागतील असा एक विचार त्यांचा मनात चमकून गेला. प्रांत त्यांना इतकेच म्हणाले, जी काही प्रोसीजर असेल ती काळजीपूर्वक करा, गॅप ठेऊ नका. नंतर मी काहीच मदत करू शकणार नाही. प्रांतांनी कलेक्टरांना फोन लावला.
“मॅडम, तो मेलाय. एस्डीपीओ काही नीट सांगत नाहीये.”
“तो नाहीच सांगणार. कारण इन्क्वायरी तुलाच करायची आहे. असो. शक्य ती मदत आपण करायची आहे. लॉ ऍण्ड ऑर्डर आपल्यालाच सांभाळायची आहे.”
प्रांतांनी एस्पींना पुन्हा फोन लावला. ते रस्त्यात होते. सहा तासांचं अंतर होतं. रात्रभर प्रवास करून हा बाबा सकाळपर्यंत पोचला असता. एस्पी उत्तर प्रदेशातले होते. पण त्यांच्यात गुण शिवाजीच्या मावळ्यांचे होते. कुणालाही कल्पना न देता जिल्ह्यात कुठेही ते अकस्मात अवतीर्ण होत असत. यापूर्वी एका नक्षलग्रस्त भागात काम करून त्यांनी तिथे बर्याच शरणागती घडवून आणून चांगलं नाव कमावलं होतं. नक्षल्यांच्या हिट लिस्टवर होते. तरीही केवळ दोन साध्या वेषातल्या पीएसओंना सोबत घेऊन ते रात्री बेरात्री बिनदिव्याच्या गाडीतून फिरत असत. काही वेळा मोटरसायकलनेही आठ-दहाजणांचा गट करून फिरत असत. हा माणूस मध्यरात्रीदेखील इथं पोहोचू शकतो असं वाटून प्रांतांनी पीडब्ल्यूडी च्या आयबी मधली एकमेव ठीक खोली त्यांना फ्रेश व्हायला तयार ठेवली.
हॉस्पीटलमध्ये चक्कर मारावी का – प्रांतांना वाटलं. पण त्यांनी न जायचं ठरवलं. त्यांनी तहसीलदारांना सांगीतलं तिथं जाऊन थांबायला. त्यांनी स्वत: जाणं ठीक वाटलं नाही. नंतरची चौकशी बहुतेक त्यांनाच करावी लागणार होती. अशावेळी पोलीसांनी या प्रकरणात काहीतरी बनवाबनवी केली असलीच तर आपल्या तिथं हजर राहिल्यानं आपण त्यांना सामील आहोत असा आरोप होऊ शकतो. शिवाय रात्रीच्या वेळेत तसेच सकाळीदेखील इथं सबडिव्हिजनमध्ये काही गोंधळ होण्याची शक्यता फारच कमी होती. गोंधळ घालणार्यांना इथं येण्यापेक्षा जवळच्याच रारुआं ठाण्यात जाणं सोपं होतं.
रस्त्यातच गाडीमधून फोनाफोनी करून एस्पींनी फोर्स मोबिलाइज करुन रातोरात रारुआं ठाण्याला गढीचं रूप द्यायचा एक अयशस्वी प्रयत्न केला. राज्यामध्ये पोलीसांचे कमालीचे दयनीय संख्याबळ होते. त्यातही रारुआंसारख्या तुलनेनं शांत भागांमध्ये तर पोलीस ठाण्यांमध्ये दहापेक्षा कमी माणसं असत. कारकून, प्यून यांचा तर प्रश्नच नव्हता. यात तीन पाळ्या, आणि रजेवर जाणारी माणसं धरायची. म्हणजे कोणत्याही वेळी ठाण्यात दोन शिपाई असणार. यांनी चाळीस पन्नास गावांकडं बघणं अपेक्षित होतं. होमगार्ड गोळा करून खाकी कपड्यांचं अस्तित्त्व दाखवत राहणे आणि एखाद-दुसर्या बदमाशाला धाक बसण्यासाठी केसेस करणे एवढाच काय तो अशा पोलीस ठाण्यांचा उपयोग. लोक गरीब होते. अल्पसंतुष्ट होते. गुन्हेगारी नसल्यात जमा होती म्हणून इतके दिवस रेटून नेलं गेलं होतं. पण हळूहळू परिस्थिती बदलत होती. लोकांनी पोलीसांची ताकद जोखायला सुरुवात केली होती. कुठे गोंधळ झाला तर काठ्या बसत नाहीत, उलट समजावणीच केली जाते हे लोकांना कळून चुकले होते. त्यामुळे कुठेही परिस्थिती आजिबात हाताबाहेर जाऊ न देणे हीच प्रशासनाची पहिली कमांडमेंट होती. गेलीच तर ताकदीच्या अभावामुळे माघार घ्यावी लागणं निश्चित होतं. अशा परिस्थितीमध्ये उद्या रारुआंला गोंधळ झाला तर आपल्याला आणि तहसीलदाराला तिथं उभं राहून झटावं लागणार हे प्रांतांना ठाऊक होतं.
एका सीनियर IPS मित्राचा सल्ला प्रांतांना आठवला, ‘कस्टडियल डेथची चौकशी करणार असशील तर, पोलीसांशी तुझे कितीही चांगले संबंध असले तरीही त्यांना मुद्दामहून वाचवण्याचा प्रयत्न आजिबात करू नकोस. तुझ्या करियरची वाट लागेल, काही गोष्टी लपवल्यास किंवा बदलल्यास तर.’
रात्री पावणेबाराच्या सुमाराला बॉडी सबडिव्हिजन हॉस्पीटलमध्ये आली. तहसीलदारांनी तसं प्रांतांना कळवलं. पहाटे तीनच्या सुमाराला एस्पी तिथं पोचले. हॉस्पीटलमध्ये जाऊन स्थिती पाहिली आणि प्रांतांना डिस्टर्ब न करता तसेच जिल्ह्याला निघून गेले.
दुसर्या दिवशी सकाळी सात साडेसात वाजता प्रांत हॉस्पीटलमध्ये गेले. तहसीलदारांना रारुआंला पाठवून दिलं. रेव्हेन्यू ऑफिसरना इन्क्वेस्ट करण्यासाठी डेप्यूट केलं. बीडीओ देखील एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट होते. त्यांना हॉस्पीटलसाठी नेमलेल्या फोर्ससोबत डेप्यूट केले. मेडीकल ऑफिसरांच्या चेंबरमध्ये जाऊन प्रांत बसले. प्रेसवाले गोळा झाले होते. व्हिडीओ कॅमेरे चालू होते. प्रांत ‘बाइट’ देत नाहीत हे माहीत असूनही चिकाटी न सोडता प्रश्नांची सरबत्ती चालूच होती. साडेनऊ वाजत आले तरी इन्क्वेस्ट सुरू होईना. आता केंव्हा इन्क्वेस्ट संपणार, मग केंव्हा पोस्टमार्टेम होणार, केंव्हा नातलग बॉडी ताब्यात घेणार…प्रांत बेचैन झाले. उशीर परवडणारा नव्हता. हॉस्पीटलमध्ये लोकांची गर्दी होऊ देणं योग्य नव्हतं. शिवाय ही कामं आटपेपर्यंत फोर्स इथे अडकून पडणार होता. उशीर होईल तसं टाउटर लोकांना नातलगांना भडकावणं शक्य होणार होतं. याच कारणासाठी एस्पीसुद्धा बेचैन झाले होते. एस्डीपीओ प्रांतांना म्हणत होते, “सर मयताचा कुणीतरी नातलग तर आला पाहिजे. त्याच्या मेव्हण्याला आम्ही रात्री घेऊन आलो होतो. आता बघतो तर पसार झालाय.” प्रांत सावध झाले. टाउटर मंडळींनी आपले काम सुरू केलेले दिसते. एस्डीपीओंना म्हणाले, “त्याच्या गावातलं कुणीही बघा. बाजूला घ्या आणि काम उरकून टाका. आजिबात वेळ घालवू नका. आणि तो मेव्हणासुद्धा इथेच चहा घ्यायला गेला असेल. शोधा त्याला.” एस्पी रारुआं ठाण्यात जाऊन बसले होते आणि प्रकरण लवकर संपवण्याच्या नादात होते. त्यांना हे समजताच एस्डीपीओला त्यांनी फोनवरून लाखोली वहायला सुरुवात केली.
दहा वाजता कसेबसे इन्क्वेस्ट सुरु झाले आणि प्रांत आपल्या कोर्टात येऊन बसले. तहसीलदार एव्हांना रारुआंला पोचले होते आणि प्रांतांना त्यांनी कल्पना दिली होती की सगळा गाव ठाण्याच्या समोर जमा झाला आहे. पोलीसांची एक जीप जमावाने दगडफेक करून फोडली आहे, आणि ड्रायव्हर व फौजदाराला जमावाने मारहाणही केलेली आहे. प्रांत एस्पींशी बोलले. एस्पी म्हणाले, “काळजीचं फार कारण नाही, मी इथे आता पुरेसा फोर्स गोळा केला आहे. दगडफेक करणारी माणसं पांगली आहेत. आम्ही केसेस बुक केल्या आहेत. फक्त इथे आता प्रोसीजर निस्तरायची आहे. ” म्हणजे घरातल्यांनी बॉडी ताब्यात घेतली पाहिजे. प्रांतांना आणि एस्पींना याच गोष्टीची चिंता होती. रस्त्यात अपघात झाला आणि माणूस मेला तर लोक नातेवाइकांना जवळ जाऊ देत नसत आणि पोलीस/ प्रशासन जोपर्यंत रेडक्रॉसमधून किंवा कसेही करून पाच-दहा हजार जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत शव रस्त्यातच पडून रहात असे. प्रांतांना लोकांच्या या पशुवत वागण्याची चीड येत असे आणि लोक असे रस्ता अडवून बसले तर नाईलाजाने पैसे तर देत, पण पुढे पुढे होऊन बाता मारणारांच्यावर केस बुक होईल हे पहात असत. प्रशासनाचा तसेच पोलीसांचा धाक कमी झाल्याची ही लक्षणे होती. गावपातळीवर नेतृत्व नसल्याचाही हा परिणाम होता. गर्दी जमा झाली की संपलं. कुणाचंच कसलंच नियंत्रण रहात नसे. काठ्या मारण्याची पण सोय नव्हती. इथे तर पैसे मागणार्यांच्या हातात चांगलेच कोलीत मिळाले होते. पोलीसांच्या ताब्यात असताना माणूस मेला होता. पोलीस अजूनच डिफेन्सिव्ह झालेले होते. काठ्या बसण्याची शक्यता आजिबातच नव्हती.
साडेअकराच्या सुमाराला एस्पींचा फोन आला.
“अजित, रेडक्रॉसमधून किती पैसे देऊ शकतोस?”
“मी पाच हजार. कलेक्टर दहा.”
“मग मी इथे दहा कबूल करू का?”
“हो सर. मी मॅडमशी बोलतो. लोक काय म्हणतायत?”
“लोक! अरे ते पन्नास लाख मागतायत!”
प्रांतांना हसू आवरले नाही. पन्नास लाख म्हणजे किती हे रारुआंतल्या किती जणांना ठाऊक असेल?
“मॅडम, आम्ही रेडक्रॉसमधून दहा हजार देतोय.”
“कशासाठी?”
“तिथं दंगा सुरू आहे. थोडं तातडीनं कॉम्पेन्सेशन दिलं तर वातावरण निवळेल.”
“अजित, वेडा आहेस काय? रेडक्रॉसला हातही लावायचा नाही. त्या माणसाला पोलीसांनी अटक केली होती. तो नशेत होता. त्यानं आत्महत्या केली आहे. त्याला कोण जबाबदार आहे हे अजून समजलेले नाही. कॉम्पेन्सेशन म्हणून रेडक्रॉसमधून मदत केली तर पोलीस जबाबदार आहेत हे आपण स्वीकारल्यासारखं होतं. एस्पी आहेत तिथं. त्यांच्याकडेही निरनिराळे फंड असतात. शिवाय तू तुझ्या कपॅसिटीत एनएफबीएस मधून त्याच्या पत्नीला दहा हजार देऊ शकतोस. शिवाय विधवा पेन्शन सुरू करू शकतोस. पण नो रेडक्रॉस. मेसेज बरोबर गेला पाहिजे. चुकुनही कॉम्पेन्सेशन हा शब्द वापरायचा नाही. समजलं?”
“सर, मी दहा हजार देऊ शकतो. पण लगेच नाही. थोडी प्रोसीजर आहे. रेडक्रॉसला परवानगी नाही.”
“हं. ठीक आहे. पैशाचा फार मोठा प्रश्न नाहीये. मी करीन ऍरेंज. हे वाढू नये एवढीच मला चिंता आहे.
(क्रमश:)



