कथा
रान...
प्रेषक विमुक्त ( मंगळ, 03/16/2010 - 16:44) ."अरं ये अंत्या! कसली धावपळ चाल्लीय इतक्या रातच्याला?" राम्या
"अरं, आपला गण्या सकाळी गुरं चरायला घेऊन गेलता रानात... समंधी गुरं आली, पर गण्याचा काय पत्याच न्हाय अजून... आम्ही चार-पाचजण जरा बघून येतो रानात..." अंत्या
जांभळी गाव जवळच्या शहरापासून किमान १६ मैल दूर... ३०-४० घरांची वस्ती... पावसाळ्यात पोटापुरता भात पीकतो आणि दुध, तुप, रानातला मध असं काहीतरी शहरात विकून गावकरी तिकट-मिठाची सोय करतात... गुरांना चरायला अख्खं रान आहेच... गावाच्या जवळपास लाकुडतोडी मुळं रान जरा कमी झालयं, पण जरा आत शिरलं की एकदम दाट रान लागतं... रानातुन वाहणारी कुकडी नदी म्हणजे रानाची नस... कातळ चिरत कुकडी डोंगरावरुन उडी घेते... कुकडीची दरी खूप खोल... सरळसोट तुटलेले कडे... दरीत डोकवावं तर नजर तळापर्यंत पोहचतच नाही... एकदम दाट झाडी, हे उंच उंच रुख... त्यावर मनगटा एवढ्या जाड वेलींच जणू जाळंच पसरलयं रानभर... दिवसा-उजेडी सुध्दा प्रकाश किरण जमीनीला शिवत नाही, जणू ह्या रानात दिवस उजेडतच नाही... रान एकदम जिवंत... ससे, भेकरं, डुकरं, साप, अस्वल, तरस अशी सगळी जनावरं आहेत... वाघाचा पण वावर आहे... गेली कित्येक युगं हे रान असंच आहे... गावतलं कुणी ह्या रानात अजिबात फिरकत नाही...
सकाळी उठल्यावर राम्याला कळालं, की गण्या अजून सापडला नाही... हात-तोंड धुवून राम्या अंत्याच्या घरी पोहचला...
"अंत्या, काय रं... काय झालं रातच्याला?..."
"लय हुडकलं... पण गण्याचा काय मागमुसच न्हायी... कुठं गेलं काय म्हाईत..."
"आता! रान काय त्याला नवं न्हाय, रोजचच हाये... असं कुठं जाईल?... जनीला काय सांगून गेलता का?"
"हां! जनी म्हनली की पार रानात जानार हुता... अळंबी शोधाया... म्या म्हंतो, आपल्या हीरीच्या मागं आहे की बख्खळ अळंबी!... कश्यापाई जायाचं इतक्या रानात?..."
"म्हंजी पार आत रानात गेलता तर... मग वाघरु तर नसंल?..."
"काय सांगावं आता... पण जंगली जनावरं सोडून मानुस कश्यापाई?..."
"जखमी असंल वाघरु... माणुस म्हणजे आयती शिकार, मग कश्याला जनावरांच्या मागं पळतय वाघरु... नाहीतरी गण्या एकटाच व्हता... साधला असंल डाव त्यानं तवा..."
"असंल बी... आता परत चाल्लोय आम्ही सम्दी... तु पण चल ह्या खेपंला..."
पार अंधार पडे पर्यंत गावकऱ्यांनी रान पालथं घातलं, पण गण्याचा काहीच पत्ता नव्हता... कुठं कुठं म्हणून शोधणार?... आत पार रानात दरी जवळ जायला कुणी तयार होईना... अजून पुढचे दोन दिवस प्रयत्न करुन पण काही कळेना म्हंटल्यावर गावकऱ्यांनी शोध थांबवला... कुणी म्हणालं "कुठं दरीत पडला असणार..." तर कुणी "वाघानं खाल्ला असणार..." पण नक्की काय झालं हे कुणालाच कळेना... एक-दोन दिवस गावात चर्चा झाली आणि मग सगळे रोजच्या कामात व्यस्त झाले... पण वाघाचा विचार काय राम्याच्या डोक्यातून जात नव्हता...
‘राम गणपत वरे’ म्हणजे राम्या... अजिबात कश्याची डर नाही गड्याला... रानाची तर नाहीच... घरी म्हातारा-म्हातारी आणि हा, असे तिघेच... रानावर, झांडांवर, जनावरांवर त्याचा फार जीव... आपल्या पेक्षा हे सगळं वेगळं असं त्याला कधी वाटलंच नाही... खळखळणारे ओढे, वाऱ्यावर डुलणारी झाडं, पक्षी, जनावरं असं सारं रान आपल्याशी बोलतयं असंच त्याला वाटे... राम्याला रानाचं अभय आहे असं सारं गाव म्हणतं...
गावाच्या मागच्या बाजूला हनुमानाचं देऊळ... तिथून जवळच विहिर, मग जरा चढ आणि पुढे सगळं जंगल... पाण्यासाठी अंत्याची बायको सगुणा, तीची शेजारणींन रमा आणि गावच्या पाटलाची पोर राणी अश्या तिघी संध्याकाळी विहिरीवर आल्या... पाणी भरुन हांडे-कळश्या सावरीत गप्पा मारीत सगुणा आणि रमा घराकडे वळल्या... राणी अजून विहिरी जवळच होती... खाली वाकून कळशीत पाणी भरत होती आणि तितक्यात राणीच्या किंचाळण्याचा आवाज आला... सगुणा आणि रमानं मागे वळून पाहिलं तर ढाण्या वाघ राणीला ओरफडत जंगलात घुसत होता... "वाचवा! वाघ वाचवा!" ओरडत सगुणा आणि रमा गावात शिरल्या... लगेचच कोयते, कुह्राडी घेऊन राम्या आणि इतर गावकरी जंगला कडे धावले... विहिरीच्या मागे जंगलात शिरले... गावकऱ्यांच्या ओरडण्यानं सारं जंगल दणाणलं... खुणांच्या मागे धावत गावकरी झुडपात शिरले... तर झुडपात साधारण ३०-४० हात दुर राणीच शरीरं आणि त्याच्या बाजूला बसलेला वाघ दिसला... जिभलीनं मिश्या चाटीत वाघ रागात डुरकत होता... कसलाच विचार न करता राम्यानं कोयता उगारला आणि वाघाकडे झेप घेतली... राम्याच्या मागे गावकरी पण वाघाच्या अंगावर धावले... वाघ अजूनच जोरात गरजला... पण कुणी गावकरी माघार घेईना... मग वाघानेच माघार घेतली आणि लंगडत झुडपाच्या मागे नाहिसा झाला... राणी शुध्दीवर नव्हती पण श्वास मात्र चालू होता... डाव्या खांद्याच्या इथे वाघानं धरलं होतं... खांद्या ऐवजी मानगुट धरलं असतं तर राणी जगली नसती...
"माजलयं जणू!... सारं जंगल कमी पडलं व्हय चरायां?... माझ्या लेकीवर कश्यापाई त्याचा डोळा?..." पाटील
"पाटील, वाघरु जखमी हाये... लंगडत व्हतं... शिकार मिळत नसंल म्हणून गावाकडं फिरकलय..." अंत्या
"गण्याला जावून झालं ना ४-५ दिस?... परत भुक लागली आणि वाघरु गावाकडं वळालं..." राम्या
"आता आजच जातो तालुक्याला आणि साहेबाशी बोलतो... एखादा शिकारी येईल बंदुक घेऊन आणि लांवल त्याचा निकाल..." पाटील
"तालुक्याहून शिकारी येणार आणि सगळ हुणार म्हंजी अजून १०-१५ दिस जाणार... वाघरु भुकेलेलं हाये... इतके दिस थांबून जमायचं न्हाय... आपणच काय ते केलं पाहिजे..." असं राम्या अंत्याला सांगत होता...
दुसऱ्या दिवशी दुपार नंतर एक बकरु घेऊन राम्या आणि अंत्या रानात पोहचले... मोक्याची जागा निवडली... पठार संपून झाडी सुरु होते अशा जागी एका झाडाखाली बकरी बांधून ठेवली... राम्या त्याच झाडावर भाला घेऊन वाघाची वाट बघणार आणि अंत्या शेजारच्या झाडावर... वाघाने बकरीवर झडप घालताच राम्या वरुन भाला घेऊन वाघाच्या मानगुटीवर झेप घेणार... तोपर्यंत अंत्या शेजारच्या झाडावरुन वाघावर मागून वार करणार... असा बेत होता...
"पण माणसाचा वास लागल्यावर वाघरु जवळ येईल का?.." अंत्या.
"तं काय झालं... गावकडं नाही का फिरकलं?... सोपी शिकार नाही सोडणार त्यो..." राम्या
राम्या आणि अंत्या आपापल्या जागेवर तयार होते... हळूहळू सुर्य कलू लागला... जंगलात फार लवकर अंधारुन येतं... सुर्य मावळताच पक्ष्यांचे आवज बंद झाले आणि रातकिड्यांच्या आवाजानं रान घुमु लागलं... काळोख पडताच बकरीचं मेमणं वाढलं... जमीनीवर साप-सरड्यांची हालचाल सुरु झाली... राम्याचं सारं ध्यान भवतालच्या हालचालींवर होतं... जरा जरी कुठं आवाज झाला की राम्याच्या छातीची धडधड वाढत होती... भाल्यावरची पकड घट्ट होत होती... उडी घ्यायला राम्या सज्ज होत होता...
मग अचानक झाडाच्या मागे झुडपात थोडी हालचाल झाली... राम्याचं ध्यान तिथं गेलं... हालचाल जरा वाढली आणि लगेचच फडफड असा पंखाचा आवाज झाला... घरटं सोडून शिकारी साठी रातवा बाहेर पडला होता...
मधूनच कुठूनतरी तरस, भेकरं, कोल्ह्यांचा आवाज होत होता... तेवढ्या पुरता आवाज व्हायचा आणि मग परत किर्रर्र्र शांतता... मध्य रात्र उलटून गेली... बराच वेळ झाला तरी काहीच हालचाल नव्हती... आणि एकदमच बकरीच मेमणं वाढलं... सारं लक्ष एकवटून राम्या भवतालचा अंदाज घेऊ लागला... थोड्या दूर झाडीत हालचाल झाली... दोन डोळे चमकू लागले... राम्याच्या कपाळावर घाम साठलां, आठ्या पडल्या आणि घामाचे थेंब नाकावरुन खाली टपकू लागले... हलक्या पावलांनी ते दोन डोळे पुढे सरकले... बकरु धडपडू लागलं जिवाच्या आकांतानी ओरडू लागलं... राम्याच अंग जरा कापू लागलं... त्याला काहीच ऐकू येईना झालं, सारं ध्यान त्या दोन डोळ्यांवर एकवटलं होतं... पुढच्याच क्षणी वाघानं बकरीवर विजेप्रमाणं झेप घेतली... वाघाच्या जबड्यातून निसटण्यासाठी बकरीनं शेवटची धडपड केली आणि तितक्यात राम्यानं वाघाच्या मानगुटीवर उडी घेतली... वाघानं प्रचंड मोठी डरकाळी फोडली... वार एकदम अचूक बसला... भाला वाघाच्या मानेतून आरपार गेला, रक्ताच्या धारा वाहू लागल्या... वाघ वेदनेमुळे केवीलवाण्या आवाजात डुरकू लागला... जखमी अवस्थेत पुढच्या पंजांनी वाघ राम्यावर झेपावला... राम्या भाल्यानं वाघावर वार करतच होता आणि तेवढ्यात अंत्या पण वाघावर वार करु लागला... राम्याच्या छातीतून, दंडातून रक्त ओघळू लागलं... राम्याचं आणि वाघाचं रक्त मिसळू लागलं... वाघ आणि राम्या झगडत होते... वाघाच्या पंजानी राम्याच्या मनगटाचे, खांद्याचे पार चिंध्या केल्या तरीपण राम्या वाघावर वार करत होता आणि तेवढ्यात अंत्यानं पुन्हा एकदा वाघाच्या मानेतून भाला आरपार केला... वाघानं शेवटची डरकाळी फोडली आणि शरीर जमीनीवर भिरकावलं... तडफडला आणि शेवटचा श्वास सोडला... राम्या त्याच्या बाजूलाच पडला होता... वाघरासाठी राम्याच्या डोळ्यातून आसवं वाहू लागली... ‘जनावरांवर राम्याचा भलता जीव... हा तर जंगलाचा राजा... जखमी झाला आणि गावाकडं फिरकला... गावतल्या लहानग्यांवर हल्ला केला... मारला नसता तर गावकऱ्यांच्या जिवाला धोका होता...’
राणीवर हल्ला करणारा वाघ मारला गेला म्हणून गावकरी जरा निर्धास्त झाले... पण गण्याला ह्या वाघानंच मारलं का?...
एका आठवड्यात राम्याच्या जखमा भरु लागल्या... एका दुपारी राम्या घराच्या पडवीवर निजला होता... राम्याचा म्हातारा सकाळीच गुरं चरायला घेऊन जंगलात गेलता... गुरं चरायला लावून म्हातारा झाडाखाली थोडावेळ आडवा झाला... उठल्यावर आवाज देऊन गुरं जमवली तर एक कालवड दिसेना... आवाज देत रानात शिरला... बरंच आत गेल्यावर कालवड दिसली... रानात गोंधळल्या मुळं केवीलवाण्या आवाजात हंबरत होती... तीला हाकत परतताना म्हाताऱ्यांन काहीतरी ऐकलं... तो दचकला आणि भलत्या घाईनं सगळी गुरं घेऊन घरी पोहचला... म्हाताऱ्याला अस्वस्थ बघून राम्यानं विचारलं...
"काय रं बा... काय झालं?... इतका कश्यापाई दचकलाईस्?..."
घडलेल्या घटने बद्दल म्हाताऱ्यानं राम्याला सांगीतलं, पण म्हातारा खूपच अस्वस्थ वाटत होता...
"कसला आवाज?... इतका का घाबरलाईस्?..." असं बरच काही राम्या विचारु लागला...
म्हातारा काही बोलला नाही... नुसती नकारार्थी मान हलवून पडवीच्या कोपऱ्यात जावून बसला... राम्यानं पुन्हा-पुन्हा विचारलं तरी म्हातारा काही बोलेना... ह्यापुर्वी देखील असंच काहीतरी घडलं होतं... त्यावेळी सुध्दा तो काहीच बोलला नव्हता... ‘असं काय आपल्या बानं ऐकलं की त्यो इतका घाबरलाय’ हे राम्याला जाणून घ्यायचं होतं...
दुसऱ्या दिवशी सकाळीच कोयती कंबरेला अडकवून राम्या रानाकडं निघाला... पाच-सहा तास चालल्यावर तो दरी जवळ पोहचला... दरी भोवतीच्या रानात गच्च झाडी, वेली, काटेकुटे, पालापाचोळा ह्यामुळं एक-एक पाऊल मोठ्या जिद्दीनं टाकावं लागत होतं... पावलोपावली अंग खरचडत होतं... रानाशी झगडत राम्या भटकत होता... मधेच विचार आला की दरीत उतरुन बघायला हवं, पण ते शक्य नव्हतं... कारण दरीत उतरायला वाट नव्हती... असणार तरी कशी? अजून पर्यंत कुणीच दरीत उतरलं नव्हतं... जंगली जनावरांचे वेगवेगळे आवाज रानभर घुमत होते... बरेचसे आवाज राम्याला देखील नविन होते... कोयतीनं वेली, झुडपं छाटीत राम्या पुढं सरकत होता... वेगळीच शांतता राम्याला जाणवू लागली... तिथल्या रानव्यानं त्याला भुल घातली... वेळेचं भान त्याला राहिलं नाही... काळोख पडू लागलां तसं तो भानावर आला आणि झपाझप रान कापीत गावाच्या दिशेने चालू लागला... तसं पाहिलं तर राम्या म्हणजे रानातलंच पाखरु पण हे रान निराळं आणि अंधारल्यामुळे जणू सारं रान खायला उठलं होतं... रान तुडवीत राम्या गावाकडं सरकत होता आणि तितक्यात एकदमच त्याला शीळ ऐकू आली... राम्या जागीच घट्ट झाला, शीळेच्या दिशेने पाहू लागला, पण काहीच हालचाल दिसेना... शीळ खूप दिर्घ आणि खोल होती... कोण्या पक्ष्याची असणं शक्यच नव्हतं... पुन्हा तशीच शीळ राम्याच्या कानी पडली... अंधारल्यामुळे राम्याला स्पष्ट दिसेना तरी तो शीळ येत होती त्या दिशेने चालू लागला... परत शीळ ऐकू आली... ह्या वेळेस फारच जवळून कुणीतरी शीळ घालत होतं... तेवढ्यात राम्याला पायाजवळ हालचाल जाणवली... काही कळायच्या आतच राम्याचे पाय वेटोळ्यात अडकले... राम्याची धडपड सुरु झाली, पण काहीच फायदा झाला नाही... विजेच्या गतीनं वेटोळ्यांनी राम्याला छाती पर्यंत जखडलं... राम्याला श्वास घेता येईना, त्याची शुध्द हरपू लागली आणि तेवढ्यात राम्याला त्याचं प्रतीबिंब समोरच्या दोन डोळ्यात दिसलं... वेटोळ्यांची पकड वाढली... ते दोन डोळे राम्याच्या डोक्यावर स्थीरावले आणि तोंड संपुर्ण फाकवून नागीणीनं राम्याला गीळायला सुरुवात केली... राम्याचं डोकं नागीणीच्या जबड्यात होतं आणि हळूहळू राम्याच अख्खं शरीर नागीणीनं गीळलं आणि नागीण तिथंच पडून राहिली...
घरी राम्याची म्हातारी वाट बघत होती... रात्र उलटून गेली तरी लेकरु आलं नाही म्हंटल्यावर म्हातारा-म्हातारीचा जीव कासावीस झाला... म्हातारीचं रडणं सुरु झालं कारण आज पर्यंत त्या जंगलात रात्र काढून कुणीच परत आलं नव्हतं... म्हातारा स्वतालाच शिव्या देऊ लागला...
"म्या त्याला समंद सांगाया हवं होतं... आता रातीच्या येळी त्या वंगाळ रानात त्याचा निभाव कसा लागायचा... म्या काल शीळ ऐकली... ती नागीणीचीच व्हती... हा त्यांचा विणीचा काळ... विणीच्या काळात नर-माद्या शीळ घालून एकमेकांना शोधीत्यात... ह्या काळात त्यांची भुक पण वाढते... पण हे समंद त्याला सांगीतलं असतं तर त्यो रानात गेला असता... त्यानं रानात जाऊ नये अन् काई घडू नये म्हणून म्या गप्प व्हतो... तर समंद इपरीतच घडलं..."
पहाट होताच जंगलात ऊब वाढली आणि पक्ष्यांचा चिवचिवाट सुरु झाला... हळुहळू राम्या शुध्दीवर येऊ लागला... सारं अंग चिकट झालं होतं... त्यातुन फारच उग्र वास येत होता... भानावर येताच राम्याला जाणवलं की पोट चिरुन मेलेल्या नागीणीच्या देहावर तो पडलाय... कालच्या रात्रीचं त्याला आठवलं, पण आपण जिवतं कसे हे त्याला उमगेना आणि ह्या नागीणीला कुणी मारलं? हे ही कळेना... जरा जमीनीचा आधार घेत राम्या उभा राहिला... त्याचं लक्ष कमरेवरच्या कोयती कडे गेलं आणि आपण का जगलो हे त्याला उमगलं... नागीण राम्याला गीळत असताना कमरेला अडकवलेल्या कोयतीनं नागीणीच पोट चिरत गेलं आणि राम्या वाचला... राम्याला रानाचं खरच अभय होतं...
गावाच्या दिशेने राम्या चालू लागला... घडल्या प्रकारा बद्दल तो फारच अचंबित होता, पण ‘नागीण शीळ घालते?... म्हाताऱ्यानं हीच शीळ ऐकली होती का?... ह्या रानात अजून काय काय असेल?... गण्याचं काय झालं?... वाघनं खाल्लं की नागीणीनं गीळलं?...’ अश्या अनेक प्रश्नांनी त्याच्या डोक्यात जन्म घेतला...
समाप्त
सव्यसाचि (भाग-२)
प्रेषक परिकथेतील राजकुमार ( शनी, 03/13/2010 - 19:03) .मी अवाकच झालो...
काय होतय हे ? माझ्या संगणकात कोणीतरी शिरले होते हे नक्की ! मी ताबडतोब नेट डिस्कनेक्ट केले. साला इन बिल्ट फायरवॉल / झोन-अर्लाम सारख्या माझ्या संरक्षकांना गुंगारा देउन हे आत शिरलय तरी कोण ? आणी कसे ?
काही वेळाने मी पुन्हा इंटरनेटशी कनेक्ट झालो, ह्यावेळी वेगळ्याच आयडीने याहु रुम मध्ये शिरण्याची मी खबरदारी घेतली होती. मॉडेम रिसेट केल्यामुळे आयपी देखील बदललेला असणारच होता. काही वेळ तिथे बागडलो आणी पुन्हा एकदा आमचे नोटपॅड ओपन झाले... "Welcome BACK KID". K|nG
च्यायला अरे हा कोण आहे कोण हा किंग ?? साला माणुस आहे का भुत ? मी पुन्हा एकदा नेट डिसकनेक्ट करुन स्वत:ची सुटका करुन घेतली. डोक्याला हात लावुन सुन्न अवस्थेत मी नोटपॅड वरचा मजकुर पुन्हा पुन्हा बघत होतो. अचानक काहितरी क्लिक झाले, काहितरी वेगळे विचित्र जाणवले. त्या नावात काहितरी वेगळे, काहितरी खास होते. मी मेंदूला ताण द्यायला सुरुवात केली...
युरेका युरेका ! मी पुन्हा एकदा K|nG चे स्पेलींग तपासुन पाहिले, "K|nG".. शंकाच नाही, हा तोच होता.. माझ्या मोजक्याच हॅकर आयडॉल्स पैकी एक असलेला, चीनच्या संरक्षण दलाच्या वेबसाईटला २ तास हॅक करुन ठेवणारा आणी भारताच्या खास खास वेबसाईटसना अध्ये मध्ये पाणी पाजणारा "शफी द किंग" !!
हि संधी गमावुन चालणारच न्हवती. 'किड' म्हणुन का होईना पण त्यानी माझ्याशी संवाद साधला होता, त्याला माझ्यात एखादा स्पार्क दिसला असेल ?? मी ताबडतोब याहु रुम मध्ये धाव घेतली. "Hay K|nG" येवढे दोनच शब्द भल्या मोठ्या लाल अक्षरात मेन्स वर टाकुन दिले. काही मिनिटातच माझी प्रायव्हेट चाट विंडो ओपन झाली. त्या दिवशी चाट विंडोच नाही तर माझ्या आयुष्याची नवि दिशाच ओपन झाली.
K|nG786N :- क्यु चिल्ला रहे हो बच्चा ??
मी :- आप शफी है ना ? शफी द किंग ??
K|nG786N :- 
मी :- प्लीज बाताईये ना. आय एम ग्रेट फॅन ऑफ युवर्स सर !
K|nG786N :- हा हा अभि भी ? अब तो मै बुढ्ढा हो गया ! आय एम आऊट ऑफ एव्हरीथींग 
मी :- बट स्टिल यु आर लेजंड 
K|nG786N :- हा हा हा ! खुदा की मेहरबानी.
मी :- सर मुझे बहोत कुछ सिखना है आपसे.
K|nG786N :- क्युं ? पाकिस्तान इंटरनेट को बरबाद करना है ? 
मी :- नही नही, ऐसा कुछ नही
बस खुदको किसी मुकाम पे देखना चाहता हुं.
K|nG786N :- बाते अच्छी कर लेतो हो
मी :- सर, सिखायेंगे ना ?
K|nG786N :- लेकीन मै तो आपका जानता भी नही, ऐसे कैसे गले पडने दू ?
K|nG786N :- सर 'अपने दुनिया' का मेरा नाम पॅपीलॉन है.
K|nG786N :- ओ हो हो साला ! वो याहु बॉट वाला तु है क्या ?
मी :- जी सर !
K|nG786N :- हा हा मै खालिद को बोला भी था के ये लडका पक्का हिंदुस्तानी होगा. हमारा लडका होता तो और सफाईसे याहु वालोंकी निंद उडा देता.
(खरतर हि सरळ सरळ माझी चेष्टा होती, पण ती आत कुठेतरी मला देखील मान्य होती. चिकाटी सोडून उपयोग न्हवता)
मी :- वही सफाई तो सिखनी है सर आपसे 
K|nG786N :- ये अभी मेन्स पे बॅंक की क्या बाते हो रही थी ??
मी :- वो सर महाराष्ट्र बॅंक के एग्झाम्स है अगले हप्ते से. उसके ऑनलाईन फॉर्म की बाते हो रही थी.
K|nG786N :- महाराष्ट्र बोले तो तुम्हारा स्टेट क्या ?
मी :- जी सर जी.
K|nG786N :- हमारे दुनियामे आनेसे पहेले नाम / देश और धर्म दोनो छोडना पडता है
ये बात १०० बार पहले अपने दिमाग मे टाईप करलो.. तो चलो मेरे चेले कल मिलेंगे और इसी बॅंक का सर्व्हर हॅक करके तुम्हारी पढाई-लिखाई चालु करेंगे 
मी :- व्हॉट ????
(क्रमशः)
अढळपद
प्रेषक JAGOMOHANPYARE ( शुक्र, 03/12/2010 - 19:04) .************* अढळपद ************
'अहो, जरा माझी धापेची गोळी आणि पाणी देता काय?'
हाक ऐकू आली आणि शांताबाई तंद्रीतून जाग्या झाल्या. 'आले, हं' त्या म्हणाल्या आणि लगबगीने सावरून उठून बसल्या. नाकाच्या शेंड्यापर्यंत ओघळलेला चश्मा त्यानी व्यवस्थीत डोळ्यावर सरकवला. मांडीवरचं पुस्तक त्यानी बाजूला ठेवलं.
पाणी आणि गोळी घेऊन त्या शामरावांच्या जवळ गेल्या. आलेली खोकल्याची उबळ तशीच दाबून शामरावानी गोळी घेतली. धापेचा पंप तोंडात धरून त्याचे दोन स्प्रे घेतले. थोडं बरं वाटताच हाश हुश करत ते म्हणाले, ' काय करत होता आत?'
'गोष्टी वाचत बसले होते. रात्री सायली जेवणापूर्वी गोष्टीचा हट्ट धरणारच. तिचे आई वडील दिवसभराच्या लगबगीने दमलेले असणार. तुम्ही इथे कॉटवर आडवे. मग गोष्ट सांगणार कोण माझ्याशिवाय? सांगते बापडी- येईल तशी- वेडीवाकडी.'
'वेडीवाकडी?' शामराव हसत म्हणाले, 'तुमची गोष्ट, आणि वेडीवाकडी?' अहो, सायलीच काय आम्हीसुद्धा सगळे ऐकत असतो. तुम्ही खरंच गोष्ट छान सांगता. रामाची असू दे- कृष्णाची असू दे- टिळकांची किंवा इंदिरा गांधींची असू दे- मला जर आधीच माहीत असतं, तुम्ही गोष्ट एवढी छान सांगता, तर मीसुद्धा रोज रात्री हट्ट केला असता- गोष्ट ऐकण्यासाठी..'
'इश्श! काहीतरीच तुमचं आपलं!'
'नाही हो. खरंच सांगतोय. तुम्ही गोष्ट सांगता ना तेंव्हा सगळं विसरायला होतं. हा दमा -घरच्या कटकटी-हे परावलंबी जीणं... सगळंसगळं विसरायला होतं बघा.... ' खोकल्याची उबळ पुन्हा आल्यामुळे शामराव बोलायचे थांबले. शांताबाईंनी त्याना पाणी प्यायला दिलं. खोकला थांबल्याचं दिसताच त्या उठल्या.
'चहा आणते तुमच्यासाठी,' त्या उठल्या.
'आणा थोडासा. पण दूध मात्र जपून वापरा बरं. संध्याकाळ आता होईलच. ते दोघे आल्यावर परत काही गोंधळ नको व्हायला.'
शांताबाई किचनकडे वळल्या. गेल्या आठवड्यातील ती घटना आठवून त्या थोड्या अस्वस्थ झाल्या. गेल्या आठवड्यात एक दिवस संध्याकाळी त्यांनी शामरावांना असाच चहा करुन दिला होता. नेमकं त्याच दिवशी सुरेश ऑफिसमधून येताना चार मित्राना घेऊन आला. थोड्या वेळाने सुनितापण आली. कॉफी करायला म्हणून किचनमध्ये गेली , तर दूध कुठे होतं? आयत्यावेळी शांताबाईनाच पळापळ करुन खालून बेकरीमधून दूध आणावं लागलं. एवढ्याश्या दुधाचं प्रकरण- पण नंतर घरात गोंधळ व्हायचा तो झालाच.
'किती परावलंबी जीणं झालंय आपलं. छोट्या छोट्या गोष्टींवरसुद्धा आपली सत्ता राहिलेली नाही. ' शांताबाई चहा करता करता विचार करत होत्या. त्यानी चहा केला. शामरावाना दिला. चहा घेताच त्यना जरा बरं वाटलं. 'अहो, किती करताय माझ्यासाठी.' ते शांताबाईना म्हणाले. ' माझं आजारपण, मुलाचा अलिप्तपणा, सुनेची धुसफूस कसं सोसता हे सगळं?' शांताबाई गप्पच होत्या. पण मनात खोल्वर ढवळाढवळ व्हायला सुरुवात झालेली होती...
'तुम्ही आहात म्हणून मी....'
'आता काही बोलू नका. शांतपणाने विश्रांती घ्या.' शांताबाई शामरावाना म्हणाल्या,'संध्याकाळ होईलच इतक्यात. मी जरा बाहेर जाऊन येते. देवळात जायचं आहे. तुमची औषधेपण आणायची आहेत.'
सगळं आवरून शांताबाई बाहेर पडल्या. संध्याकाळी पाय मोकळे केले की त्यांना थोडं बरं वाटायचं. पण आज मात्र त्यांना खूप अस्वस्थ वाटत होतं. मनात काहीतरी सलत होतं. पण नेमकं काय सलतय हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं.
कॉर्नरवरच्या फोनबूथजवळ त्या पोहोचल्या आणि थबकल्याच. बूथशेजारचा गाळा गेले कित्येक दिवस बंदच होता. पण आज तो उघडलेला दिसत होता. आत नवं कोरं काउंटर होतं. त्याच्या आत मोठ्ठाली कपाटं. दारासमोर थोडी गर्दी होती. समोरच्या बाजूला तोरणं आणि फुलांच्या माळा लटकलेल्या होत्या.
नवीनच निघालं वाटतं हे! चष्मा सावरत शांताबाई दुकानावरचा बोर्ड वाचू लागल्या. 'अभिनव मेडिकल्स'
'बरं झालं. घराजवळ नवीन मेडिकल निघालं ते..'
'ओ आज्जीबाई! मध्येच कुठे उभ्या राहिलात? सरका बाजूला. तिथं खुर्च्या मांडायच्या आहेत.' एक मुलगा शांताबाईंवर खेकसला. शांताबाई ओशाळत बाजूला झाल्या. तो मुलगा त्यांच्याजवळ आला. तिथं मध्येच एक मोठा दगड पडलेला होता. पायाने ढकलत तो मुलगा तो दगड बाजूला करु लागला. पायानं ढकलला जाणारा दगड शांताबाईनी पाहिला आणि त्यांच्या मनात कच्चकन काटा रुतला.
रस्त्यावर धुळीत पडलेला दगड- सर्वांच्याकडून लाथाडला जातो. त्याला ना स्वतंचं स्वतंत्र आस्तित्व असतं- ना स्वतःची एक जागा. आपलं तरी कुठं वेगळं आहे? मुलगा-सून्-परिस्थिती-सगळ्यांच्याकडून लाथा खाणं सुरु आहे... मनातला नेमका सल त्यांच्या लक्षात आला आणि त्या अधिकच अस्वस्थ झाल्या.
ना घरामध्ये आपल्याला स्वतंत्र आस्तित्व.. ना समाजामध्ये एक स्थान...
उदघाटनासाठी सजवलेलं नवं कोरं दुकान्-नटून थटून आलेले निमंत्रित.. या भाऊगर्दीत त्यांना एकदम परक्यासारखं वाटू लागलं आणि त्या झपाझप देवळाच्या दिशेने चालू लागल्या. चालत चालत त्या देवळापर्यंत पोहोचल्या. बागेतल्या कृष्णाचं देऊळ्-हे त्यांचं नेहमीचं ठिकाण होतं. देऊळ तसं फार मोठ्ठं नव्हतं. लहानसं पण सुबक होतं- नव्या पद्धतीचं. एक छोटासा मंडप. -त्याच्यासमोर बंदिस्त गाभारा. गाभार्यात मुरलीधर श्रीकृष्णाची काळ्या पाषाणाची मूर्ती होती. मूर्तीच्या पायाजवळ भाविकानी टाकलेल्या फुलांचा ढीग असायचा. मूर्तीच्या सौंदर्यासमोर आपली हार मानून फुलानीच मूर्तीच्या पायाजवळ रहाणं मान्य केलं असावं- असंच प्रत्येकाला वाटायचं.
शांताबाई देवासमोर उभ्या राहिल्या. डोळे मिटले. मनोभावे हात जोडले. क्षणभर मनात विचारांचा उद्रेक झाला. अशांत अस्वस्थ विचार मनाच्या खोल डोहातून वर येऊन उसळी मारू लागले. दु:ख वेदनांचे आवेग गरगरू लागले. हृदय धडधडू लागलं. कृष्णा... केशवा.. नारायणा... अंतर्मन आर्तपणे साद घालू लागलं आणि गढूळ पाण्यात तुरटीचा स्फटिक फिरावा तसा चमत्कार झाला. विचारांचा एकेक कण तळाशी बसू लागला. अंतर्मनाचं पाणी स्वच्छ आणि नितळ होऊ लागलं. आनंदमय लहरींचा मनोहारी नृत्यखेळ सुरु झाला.
ठण्ण!
घंटचा नाद कानात घुमला आणि शांताबाई भानावर आल्या. त्यांनी मागं पाहिलं. कुणीतरी एक भाविक उभा होता. शांताबाई मंडपाच्या बाहेर आल्या. देवळासमोर एक छोटीशी बाग होती. सभोवती हिरवंगार गवत. लहानमोठी झुडपं आणि फुलझाडं. बागेतल्या एका बाकावर शांताबाई विसावल्या. संध्याकाळी देवळात भक्तीगीतं लागायची. एखाददुसरं गाणं ऐकलं की त्याना बरं वाटायचं. रात्र पडू लागली की गाणी बंद व्हायची. आरती व्हायची. पण आरतीसाठी शांताबाई बहुधा थांबत नसायच्या. एखादं भक्तीगीत ऐकून त्या नेहमी उठायच्या. पण आज त्यांचं कशाकडेच लक्ष लागत नव्हतं. मधाशी-क्षणभरासाठी अनुभवलं, ते काय होतं? त्या विचार करत होत्या. स्वच्छ निळाशार समुद्र- त्या आनंदलहरी - हे सगळं कुठं आहे? आपल्या डोळ्यात?
अं हं. मग आपल्या मनात?
मग इतके दिवस हे का दिसलं नाही? तो निळाशार रंग त्यांना आठवला आणि त्या भावविभोर झाल्या. वार्याची एक मंद झुळुक आली आणि अंगावरती मोरपीस फिरावं तसं त्यांना वाटलं. नजरेमध्ये पंचप्राण आणि पंचेन्द्रिये गोळा झाली. शरीराचं धुकंधुकं होऊ लागलं. केशवा.. नारायणा.. एक साद मनामध्ये घुमली . ज्योतीनं तेजाकडे आकर्षित व्हावं, निर्झरानं समुद्रात समर्पित व्हावं-तशी दिव्य भावना त्यांच्या मनात जागी होऊ लागली. निर्झर आणि समुद्र यांचा संवाद सुरु झाला, संवाद्-पण नि:शब्द.
शब्देविण संवादु/दुजेवीण अनुवादू//
हे तव कैसे निगमे/परेही परते//
बोलणे खुंटले/विखरी कैसेनी सांगे//
शब्द मुके झाले. उरल्या फक्त आनंदलहरी. निळ्याशार पाण्यामधून तेजाचा एक प्रचंड लोळ बाहेर आला. सूर्यासारखा तेजस्वी तरीही चंद्रासारखा शीतल. शांताबाई भान हरपून पहात होत्या. चंदनाचा मंद गंध सगळीकडे दरवळला . मुरलीचे स्वर कानात घुमले आणि शांताबाईंचं भान हरपलं. अतीव आनंदाने त्यानी डोळे मिटले.
डोळे उघडले. समोर पाहिलं. आणि त्याना आश्चर्याचा धक्का बसला. समोर साक्षात विष्णु भगवान्-नारायण उभे होते. शांताबाईंच्या तोंडून क्षणभर शब्द फुटले नाहीत. मग अस्फुटपणे त्या म्हणाल्या..'देवा, तुम्ही!' नारायण मंदपणे हसले. 'होय, तुमची आर्त हाक ऐकली आणि राहवलं नाही. बोला, काय हवंय?' शांताबाई गोंधळल्या. काय मागायचं? दीर्घायुष्य्-संपत्ती-अपार वैभव.... काय मागायचं? त्याना प्रश्न पडला. घरातलं परावलंबी जीणं-लाथा खाणारा दगड्-सगळं गर्रकन त्यांच्या नजरेसमोर फिरलं. भांबावलेल्या नजरेनं त्यांनी वर पाहिलं. अढळ-निश्चळ ध्रुवतारा-त्यानी पाहिला आणि त्या उद्गारल्या. 'देवा, मला अढळपद दे. अशी जागा - जिथून मला कुणीही हलवू शकणार नाही. तिथं वर ...आकाशात.'
वर पहात नारायण प्रश्नार्थक मुद्रेनं म्हणाले..'तिथं? वर? आकाशात?'
'होय. सगळ्या विवंचनेतून, जाचातून सुटका तरी होईल.'
'जाच विवंचना या तर सगळ्यांच्याच आयुष्यात असतात. त्याला क्म्टाळून प्रत्येकजण जर आभाळात तारा होऊन बसायला लागला तर सगळं आभाळ चांदण्यांनीच गच्च भरून जाईल आणि सगळी पृथ्वी ओस पडेल.'
'मग-धृवाला कसं अढळपद दिलं..आकाशात?' शांताबाईंनी विचारलं. नारायण मंदपणे हसले आणि म्हणाले,'मी धृवाला अढळपद दिलंय ते माझ्या मनात..लोकांच्या मनात . इथं आकाशात नव्हे. आपली निरागसता-जिद्द्-तपश्चर्या यांच्या बळावर धृवानं अढळपद मिळवलय ते आपल्या सर्वांच्या मनात. तेच खरं अढळपद.' शांताबाईंना ते पटलं. पण तरीही ते स्वीकारणं त्यांना जड जात होतं. निराश स्वरात त्या म्हणाल्या,' मग माझं अढळपद कुठं आहे?' त्यांचा प्रश्न तसाच राहिला. भगवंतांच्या चेहर्यावर मंद स्मित तरळत होतं. रामाचं गूढ , पावक हास्य आणि कृष्णाचं खट्याळ हसणं या दोघांचं मिश्रण त्या हास्यात होतं. शांताबाई त्या हसण्याचा अर्थ लावू पहात होत्या आणि अचानक सगळं धूसर झालं. भगवंतांचा निळा रंग-निळंशार पाणी-आकाशाची निळाई सगळं एकरूप होऊन गेलं.
आता कोठे धावे मन/
तुज चरण देखिलिया//
देवळातून अभंगवाणीचे स्वर कानात पडले आणि शांताबाई भानावर आल्या. भगवंतांचं दर्शन झालं- या आननंदात पं. भीमसेन स्वर आळवत होते. पण शांताबाई बेचैन झाल्या होत्या. आयुष्याचं सार हातात येता येता अचानक हातून निसटून जावं, तसं त्याना वाटत होतं. संध्याकाळ काजळू लागलेली होती. शांताबाई अस्वस्थपणे घरी निघाल्या.
चालत्चालत कॉर्नरच्या बूथपर्यंत त्या आल्या. नवीन दुकान प्रकाशानं उजळून निघालेलं होतं. मघासचा प्रसंग त्याना आठवला आणि त्या दुर्लक्ष करुन घराकडे निघाल्या. तेवढ्यात फोनबूथवाल्या माणसानं त्याना हाक मारली,' आज्जी, पलीकडच्या दुकानाचं आताच उद्घाटन झालंय. तीर्थप्रसाद घेऊन जा.'
मनार थोडं दडपण घेऊनच शांताबाई दुकानात गेल्या. त्यांनी देवदर्शन घेतलं. तीर्थप्रसाद घेतला. जवळच्या कोपर्यात त्यांचं लक्ष गेलं आणि त्या क्षणभर हसल्या. तोच दगड. शूचिर्भूत होऊन, हळद कुंकवाचे टिळे लेवून तो दगड कोपर्यात विसावलेला होता. बहुधा नारळ फोडण्यासाठी त्याचा वापर झाला असावा. त्याच-संध्याकाळच्या मुलानं- त्यांना सरबत दिलं. सरबत पिऊन झाल्यावर शांताबाईंनी पर्स उघडली. एक चिठ्ठी बाहेर काढली आणि मालकाला दाखवत त्या म्हणाल्या,' ही औषधं हवी होती. द्याल काय?' त्यानं चिठ्ठी पाहिली. त्याप्रमाणे औषधे काउंटरवर ठेवली. शांताबाईंना नाव विचारलं आणि बिल करताना तो म्हणाला,'दुकानाचं औपचारिक उद्घाटन मघाशी झालं. पण तुम्ही 'खर्या' उद्घाटक. पहिल्या ग्राहक.' आजूबाजूची माणसं शांताबाईंकडे कौतुकाने बघत होती. त्यांनी बिल दिलं, कॅरीबॅग घेतली आणि औषधं घेऊन त्या बाहेर पडल्या.
घराकडे निघाल्या. अंधार पडायला लागला. जायला हवं. याना औषधं द्यायला हवीत. सायलीला गोष्टपण सांगायची आहे.. आज्जीची गोष्ट ऐकल्याशिवाय पोर जेवणार नाही... आणि, अचानक त्या थबकल्या.
'तुम्ही आहात म्हणून मी आहे.' शामरावांचा चेहरा त्यांच्या कानात गुणगुणला. 'गोष्ट सांगायची तर आज्जीनंच!' सायलीचे चिमणे पण हट्टी बोल त्यांच्या कानात शिरले आणि शांताबाईंना गहिवरून आलं.
;ह्यांच्या' मनात असलेलं आपलं स्थान... सायलीच्या चिमुकल्या मनात असणारं गोष्ट सांगणार्या आज्जीचं स्थान... हे काय? अढळपदच की! शांताबाईंच्या मनात लख्ख उजेड पडला. भराभरा चालत त्या अपार्टमेंटच्याजवळ आल्या. खाली जिन्याजवळ जोश्यांचा अमित खेळत बसलेला होता. त्यांच्याकडे बघून तो हसला. त्याचं गोड हसणं....
कुठं बरं हे गोड हसणं पाहिलं आपण? शांताबाई विचार करत होत्या, तेवढ्यात तो म्हणाला... 'सायलीच्या आज्जी , उद्या संध्याकाळी आमच्या घरी याल काय? उद्या माझा वाढदिवस आहे. माझे सगळे मित्र येणार आहेत आणि आम्हाला तुमची गोष्ट ऐकायची आहे.. सायली सारखी ऐकत असते तुमच्याबद्दल... याल ना?'
शांताबाईंनी मानेनेचं होय म्हणून सांगितलं. अमित पुन्हा हसला. तेच निरागस हास्य.. आपण कुठं पाहिलं होतं, ते शांताबाईंना आठवलं आणि त्या एकेक पायरी चढू लागल्या.
त्यांच्या मनावर अतीव सुखाचं प्रचंड ओझं होतं. पण तरीसुद्धा त्यांना मोरपिसासारखं हलकंहलकं वाटत होतं. आनंदसोपानाच्या एकेक पायर्या चढत त्या वरवर जात होत्या. आज त्या खूपच आनंदात होत्या. कारण सायलीला आज त्या धृवबाळाची गोष्ट सांगणार होत्या!
**********************************************
उत्तमकथा, २००३ मधील एका अंकात पूर्वप्रसिद्धी.
सव्यसाचि
प्रेषक परिकथेतील राजकुमार ( शुक्र, 03/12/2010 - 11:27) .डॉन का इंतजार तो ११ मुल्को की पोलिस कर रही है, पर डॉन को पकडना मुष्कील हि नही नामुंकीन है !!
पडद्यावर शाहरुख खान घसा ताणुन बोलत होता आणी मी इकडे खदखदुन हसत होतो. च्यायला हसु नको तर काय करु ? निदान ११ मुल्कोकी पुलिसला आपण शाहरुखच्या मागे आहोत हे तरी माहिती होते .... इथे सी आय ए पासुन एफ बी आय आणी मोसाद पर्यंतच्या माणसांना 'लिट (l33t)' नक्की कोण आहे ह्याचा थांगपत्ता देखील न लागु देणारा मी, मस्तपैक्की शेरिफ रॉजर बरोबर शाहरुखच्या डब चित्रपटाचा अनंद घेत होतो.
येस... आय एम l33t. महाराष्ट्र बॅंकेच्या सर्वर हॅकींग पासून सुरुवात करुन फेडरल बॅंकेच्या सर्वर पर्यंत पोचलेला. एफ बि आय च्या स्पाय कॅमेर्यांना १८० डिग्रीमध्ये वळवुन बंद पाडणारा, नासाच्या लॅब मध्ये इमर्जन्सी सायरन वाजवणारा आणी कधीही केंव्हाही कुठेही बसुन कोणाच्या खात्यातले पैसे जादुने गायब करणारा सध्याचा बहुचर्चित हॅकर आणी डिस्ट्रॉयर. पापांची यादी करावी तेवढी कमी, लुटमारीचा हिशोब लावावा तेवढा थोडा. खरच गंमत वाटते सगळ्याची, अगदी "कोण होतास तु काय झालास तु.." अशीच कहाणी आहे माझी. एका साध्या मध्यमवर्गीय घरात माझा जन्म झाला. घरात आई-वडील दोघेही सुशिक्षीत, त्यांच्या काळत त्यांना जे जे मिळु शकले नाही ते ते मला द्यायचा त्यांनी प्रामाणीकपणे प्रयत्न केला. पुस्तक, वही, सायकल ह्या सारख्या गोष्टींसाठी कधिच हट्ट करावा लागला नाही, न मागताच (पण योग्य वेळी) सर्व काही मिळत गेले.
साधारण अकरावीला असतानाच मला संगणकाने झपाटुन टाकले. २ दिवसातुन एकदा तरी सायबर कॅफेत गेल्याशिवाय जीवाला चैन पडेनासे झाले. पॉर्न साईट्स आणी गेमस साठी कॅफेच्या वार्या करणारी पावले बारावीच्या मध्यापर्यंत इ-मेल, ट्युटोरीयल्स आणी कोडींग साठी कॅफे वार्या करायला लागली. बारावीच्या सुट्टीमध्ये जगात अनेक उपयोगी सॉफ्टवेअर्स उपल्ब्ध आहेत पण ती सर्व विकत घ्यावी लागतात ह्या माहितीची भर माझ्या ज्ञानात पडली. बारावीचा निकाल लागेपर्यंत हि विकतची सॉफ्टवेअर्स थोडे परिश्रम घेउन फुकटची बनवता येतात ह्या अमुल्य ज्ञानाची देखील भर पडली. बरोब्बर, मी सॉफ्टवेअर क्रॅकिंगबद्दलच बोलत आहे.
बारावीचा निकाल लागला आणी आमच्या इच्छेनुसार तिर्थरुपांनी इंजिनिअरींगला प्रवेश घ्यायचे परवानगी दिली. 'आंधळा मागतो एक' अशी अगदी अवस्था झाली माझी. अलिबाबाची गुहा आता ऑफिशियली माझ्यासाठी उघडी झाली होती. दिवसाचे १२/१२ तास आता मी अभ्यासाच्या नावाखाली संगणकावर घालवु लागलो. जावा, सी, सी प्लस प्लस च्या जोडीला हॅकींग , स्पॅमींग आणी कोडींगनी मला खुळावुन सोडले.
साधारण इंजिनिअरींगच्या पहिल्या वर्षाच्या मध्यापर्यंत प्रिन्स, अल्लादीन सारख्या गेमसचे कोडींग बदलणे, न खेळताच लेव्हल अप करणे आणी थोड्या वाढीव कष्टानी मेल फ्लड करण्यापर्यंत माझी प्रगती झाली. ह्याच काळात माझी IRC CHAT शी ओळख झाली आणी माझ्यासाठी डी-डॉस, बॉट नेट, सर्व्हर पिंगींग, प्रॉक्सी, प्रॉक्सी-फ्लड सारखी दालने खुली झाली. काय करु आणी काय नको असे होउन गेले होते. टप्प्याटप्प्यानी ह्या एकेका गोष्टीवर मी माझे प्रभुत्व मिळवायला सुरुवात केली. काम येवढे सोपे न्हवते पण मी जिद्दीला पेटलो होतो. हि जिद्द मी वाईट मार्गासाठी खर्च केली असे मला आजही वाटत नाही.
इंजिनिअरींगचे दुसरे वर्ष संपेतो मी एक फ्लडर म्हणुन बरीच प्रगती केली होती. चांगले चांगले चाट सर्वर झोपवण्यापर्यंत आता मजल जाउ लागली होती. ह्याच काळात मी माझा स्वत:चा पहिला याहु चाट बॉट बनवला. काही काळ ह्या माझ्या बॉटनी याहु रुम्स मध्ये चांगलाच हाहाकार माजवला होता. यथावकाश ह्या बॉटला बॅनचे तोंड पहावे लागले. पण ह्या सगळ्या काळात माझ्या बॉटला मिळालेली प्रसिद्धी, बॉटच्या निर्मात्या विषयी उठलेल्या अफवा माझी मस्त करमणुक करुन गेल्या. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे मी आता वेबसाइट क्रॅश करणे, इ-मेल हॅकींग ह्याकडे आकृष्ट झालो.
१ एप्रिल २००३, हा दिवस मला आजही चांगला आठवतो. ह्याच दिवसानी माझ्या आयुष्याला एक वेगळेच वळण लावले. याहु रुम मध्ये 'एप्रिल व्हायरस' स्प्रेड करत असतानाच माझ्या संगणकावरचे नोटपॅड आपोआप ओपन झाले, आणी छान पैकी लिहुन आले "Stop Playing ARound KID". KING.
(क्रमशः)
अगस्त्य जीव नाडी भाग ४...
प्रेषक शशिकांत ओक ( बुध, 03/10/2010 - 19:18) .अगस्त्य जीव नाडी भाग ४...
महर्षी म्हणाले, ‘थांब थोडे. गंमत पहा.’
....
‘महर्षी म्हणतात, इतके सांगतो की तू त्याच्या शोधाचे पहिले पाऊल उचललेस की तुला सर्व काही सापडेल.’
आलेले संकट अगस्त्य जीवनाडीच्या पॅकेटच्या बंदुकीच्या सदृश दिसणाऱ्या आकारामुळे टळले होते!.... पुढे वाचा...
....एक गाडी अशी एकाकी का थांबलेली आहे असे पाहून आन्ध्रप्रदेश राज्य परिवहनमंडळाची बस थांबली. त्या पाठोपाठ एक पोलिसांची गाडी येऊन थडकली. त्यांना सांगितले गेले काय काय झाले ते, ते ऐकून त्यातील पोलिस प्रमुखाला जीवनाडीबद्दल उत्सुकता वाटली. घटनेची पोलिस कंप्लेंट करायला लक्षाधीश लागले. इकडे पोलिस गाडीत बसून जीवनाडी वाचायला दासन यांनी सुरवात केली. ते म्हणाले की तुझा एक भाऊ लहानपणीच हरवला व वारला असा समज आहे. पण तसे नाही. तो जीवंत आहे. काही वाईट लोकाच्या संगतीत राहून तो चोऱायला, डाके घालण्यास लागला व नंतर दहशतवादी कृत्ये करू लागला. नक्षली बनून टोळ्याकरून डाके घालू लागला. त्याने आपले नावही बदलले आहे. तो आता ‘नागी रेड्डी’ म्हणवतो. ते सर्व ऐकून त्या पोलिस अधिकाऱ्याला आपल्या धाकट्या भावाबद्दल फारच आश्चर्य वाटले. त्याची चिंता वाटून ‘आता तो कुठे असेल?’ असे त्याने अगस्त्यांना विचारले. हनुमत दासनी त्याच्या काळजीचे कारण लक्षात घेऊन पट्टी पुढे वाचून सांगितले की ‘महर्षी म्हणतात, आत्ता तुला तुझे लक्ष्य दाखवले आहे. यानंतरचे शोधायचे काम तुला करायचे आहे. मात्र इतके सांगतो की तू त्याच्या शोधाचे पहिले पाऊल उचललेस की तुला सर्व काही सापडेल.’
ते वाचन संपले व ताडपट्ट्या गुंडाळता गुंडाळता दासनना वाटले की पूरग्रस्त परिस्थती, नंतर ही नक्षली लोकांची धाड, त्यांच्याकडून पट्ट्या पळवल्या जाण्याची व सर्वकाही लुटले जाण्याची शक्यता, या सारख्या सध्याच्या भीषण परिस्थितीला ते तर जबाबदार नाहीत? माझ्याकडून काही आगळीक तर झाली नाही? त्यांनी आपल्यासाठी पुन्हा पट्ट्या उघडल्या. त्यात त्यांनी वाचले की हे सर्व होण्याला त्या लक्षाधीशाच्या आणखी एका अंबॅसेडरकारमधील एक स्त्री कारणीभूत आहे. तिला धडा शिकवण्यासाठी हे घडले आहे. महर्षी म्हणाले, ‘तिने नजरचुकवून या पट्ट्यांतील दोन ताडपट्ट्याची पाने पळवली आहेत. ती तिने आपल्या साडीत लपवली आहेत. त्यातच तिची मासिक पाळी चालू असल्याचे तिने इतरांपासून लपवून ठेवले आहे. तिचा उद्देश चोरी करण्याचा नाही पण उत्सुकते पोटी तिने ते केले आहे. तिला तिच्या कृत्याचा धसका बसावा व अद्दल घडावी म्हणून नक्षली लोकांच्या धाडीचा उपद्रव वाटेत घडवला गेला.’ ते ऐकून दासन विचारात पडले. त्या पट्ट्या तिच्याकडून परत कशा मिळवायच्या? महर्षींना म्हणाले, ‘आता मी काय कराय़चे? महर्षी म्हणाले, ‘तू काही करु नकोस. त्या बाईकडून मिळवल्या तरी त्या आता काही कामाच्या नाहीत. कारण त्या चोंबाळून दुमडून खराब झाल्या आहेत. त्यात मी नाही आहे.’ ते सर्व ऐकून हनुमत दासन सर्द झाले. त्यांना वाटू लागले की असे वारंवार घडले तर पट्यांची निगराणी व संरक्षण करायचे तरी कसे? त्या वाचनात त्यांना या बाबत सांगण्यात आले. ‘त्याची काळजी करायची तुला गरज नाही. मात्र या घटनेमुळे गंगेच्या किनारी गोमुख नावाचे स्थान आहे. तेथे जाऊन तुला एक पूजा करावी लागेल. त्यापुजेत तुला एका आर्मीतील अधिकाऱ्याची मदत मिळेल. त्याच दरम्यान त्याला मोठ्या कौटुंबिक संकटातून मी सोडवेन. त्यावेळी वाटेत तु जीवनाडीपट्ट्यांना घेऊन प्रत्येक ठिकाणी गंगेच्या पवित्र जलाने पुजा करत करत हरिद्वार, ऋषिकेश, बद्रीनाथ, केदारनाथ करत गोमुखला न्यावेस. पुजा करून परतल्यावर त्यानंतर या नाडीपट्ट्यांचे समसमान दोन भाग करायचे. त्यातील तू एक ठेवायची व उरलेली पाने कोणाला द्यायची ते मी ठरवेन. तुझ्य़ाकडील पानातून मी गरजूंच्या समस्यांनाना पौर्णिमा ते अमावास्या या काळात व अश्विनी व रेवती या नक्षत्रांच्या दिवशी उत्तरे व उपाय सांगेन.’
दासन यांच्या मनांत दोन गोष्टींची रुखरुख होती. ‘एक त्या बाईने घेतलेल्या पट्ट्यांची तिला सजा होणार की तिला माफ केले जाणार? व दुसरे असे की या जीवनाडीच्या पट्यांचे असे दोन भाग करायची अगदीच गरज आहे काय? त्या संपुर्ण माझ्याकडेच का नकोत? महर्षी म्हणाले, ‘थांब थोडे. गंमत पहा.’
असे म्हणेपर्यंत करकचून ब्रेक लावून गाडी थांबल्याच्या आवाजाने दासन यांचे भान तुटले. ती गाडी होती ज्यात त्या बाई बसलेल्या होत्या त्या गाडीची! ती गाडी मागून आली होती. ‘त्यातील मागे बसलेल्या एका व्यक्तीचे जोरजोरात विव्हळणे ऐकू येऊ लागले. ते पाहून दासनांच्या सह सर्व तेथे धावले. त्या बाईच्या पोटात अत्यंत जोरात कळा येत होत्या. ती वेदनेने कळवळत होती. तिच्या त्या भयानक पोटदुखीचे कारण दासनांच्या ताबडतोब लक्षात आले. ते त्या लक्षाधीश व्यक्तीच्या कानावर घातल्यावर त्यांनी त्या बाईला साडीत लपवलेली नाडीग्रंथाची पाने परत करायला सांगितले.
‘ती म्हणाली मला त्या चोरायच्या नव्हत्या. पण आपल्याजवळ असाव्यात असे वाटून मी त्या लपवल्या होत्या. आधीच माझे पोट दुखत होते. ते यापट्ट्या लपवल्या पासून अतिशय तीव्र झाले. आता मला सहन न होण्यापलिकडे गेले आहे.’ असे म्हणून तिने त्या लपवलेल्या पट्ट्या दूर फेकल्या. त्यानंतर तिची व्यथा एकदम कमी झाली. त्यावर त्याकुटुंबाने घडलेल्या घटनेबद्दल माफी मागून दासनांचे व महर्षी अगस्त्यांचे आभार मानले.
पुढला प्रवास दासनांनी त्यांच्या कारमधून न करता पोलिसांच्या गाडीतून करायचे ठरवले. पोलिसांची गाडी रेल्वे स्टेशनचा 20 किमीचा रस्ता कापू लागली. ते चेन्नईचे तिकिट काढून ते पोलिसांसह प्लॅटफॉर्मवर येऊन बसले. पुढची ट्रेन रात्री 1 नंतर येणार असे कळले. त्यामुळे मधे खूप वेळ होता. काही वेळ गेला असेल, तेवढ्यात हातात शस्त्रे परजत कोणी लुटारू लोक आलेले पाहून तिकिटविक्रीची खिडकी व तेथील दिवे घाईने बंद केल्यामुळे अंधारगुडुप्प झाला. रात्रीच्यावेळचा चंद्रप्रकाश व दूरवर मिणमिणते लाईट फक्त होते. त्यांनी लोकांना वेढा घातला. मात्र ते पोलीस असल्याचे लक्षात आल्यावर ते पळून जाऊ लागले. त्यांचा पाठलाग पोलीस करू लागले. अंधाराचा फायदा घेऊन काही जण पसार झाले. काही वेळाने एकाला पोलिसांनी पकडून आणलेला दासनांनी पाहिला. ज्या पोलिसाला दासनांनी अगस्त्य नाडीचे वाचन पोलिसांच्या लॉरीत केले होते त्याला विचारता कळले की पकडला गेलेला माणूसही त्या आधीच्या नक्षली टोळीपैकी होता. हा पकडला गेला. बाकीचे पसार झाले. ते त्याला घेऊन कारवाई करायला निघुन गेले. नंतर गाडी आली. घडलेल्या घटनेची गाडी थांबल्यावर प्लॅटफॉर्मवर चर्चा झाली. दासननी जनरल डब्यात प्रवेश केला नंतर त्यांना टीटीईने कनफर्म्ड बर्थ दिला. त्यांच्या आपापसातील बोलण्यातून त्यांना कळले की पकडला गेलेल्या माणसाचे नाव ‘नागीरेड्डी’ होते. ते नाव त्यांच्या कानावर पडताच तो त्या पोलिसाचा लहानपणी हरवला भाऊ तर नव्हे? असे वाटून ते महर्षींकडून जाणून घ्यायची उत्सुकता त्यांना लागली. यथावकाश त्यांना वाचनातून नागीरेड्डी तोच होता असे महर्षींनीही सांगून खात्री केली! ... क्रमशः
(अशीच एक जीव नाडी सध्या पुण्यात उपलब्ध आहे. इच्छुकांनी लेखकाशी रात्री ९ ते १०च्या दरम्यान संपर्क करावा)
संकलक – विंग कमांडर शशिकांत ओक . मो - 9881901049,
अगस्त्य जीव नाडी कथा भाग ३...अगस्त्य महर्षी निघाले भद्राचलमला!
प्रेषक शशिकांत ओक ( मंगळ, 03/09/2010 - 23:45) .अगस्त्य जीव नाडीच्या कथा भाग ३...
‘गन काढलेली आहे. चला पळा.’ ती नक्षली टोळी लगेच अंधारात नाहीशी झाली.
एकदा अगस्त्य जीव नाडीमधील रामदर्शनाच्या आदेशावरून त्याचे वाचक श्री. हनुमत दासन चेन्नईहून भद्राचलमच्या प्रवासाला निघाले त्यावेळी घडलेल्या कथा ते सांगतायत.
एकदा एकांचे भविष्य कथन करत असताना दासनना अगस्त्य महर्षी सांगते झाले की त्या व्यक्तीच्या उपाययोजनेसाठी तुला आन्ध्र प्रदेशातील भद्राचलम या गावी जाऊन प्रभू रामचंद्राचे दर्शन घ्यावे लागेल. आता महर्षींच्या आदेशाने प्रभू रामचंद्रांचे दर्शन होणार म्हटल्यावर दासन जायला तात्काळ तयार झाले. प्रवास सुरु झाला. मजल दरमजल करत ते भद्राचलमला पोचले. मात्र तिथे गोदावरी नदीला मोठा पुर आलेला. ते मंदीर नदीच्या काठावर असल्याने तेथे ही प्रचंड पाणी आलेले पाहून त्यांची निराशा झाली. मंदिरात पाणी शिरलेले. मूर्ती बुडालेल्या. पुजारी व पुजासाहित्य विकणारे सर्वजण पाण्याच्या भितीने तो भाग सोडून गेलेले. आपण नेमके चुकीच्या वेळी आलोय असे त्यांना वाटू लागले. यावर आता काय करायचे असे वाटून त्यांनी जीव नाडी काढून त्यातून महर्षींचा काय आदेश आहे असे विचारावे असे म्हणून जीव नाडीची ताडपत्रे उलगडली. त्यात महर्षींनी सांगितले की पाण्याला आलेल्या पुरामुळेच मी तुला इथे यायला सांगितले होते. कारण थोड्यावेळात नदीचे पाणी ओसरायला लागेल. त्यावेळी तुला एक अदभूत दर्शन होईल की प्रभू रामचंद्र गोदावरीच्या प्रवाहाचे पूजन करायला उपस्थित आहेत. तो सोहळा फक्त तूच पहावास अशी जुळवणी करण्यासाठी तुला मी उपस्थित केले आहे. आता इथेच मनांत ध्यान कर व रामनामाचा जप कर. ध्यानातच तुला सर्वगोष्टींचे ज्ञान होईल.
आता दासनना ध्यानासाठी जागा शोधणे आले. त्या वेळी त्या मंदिरात काम करणारा एक जण त्यांना भेटला. त्याचे काम मंदिरातील दागदागिने व अन्य मौल्यवान वस्तूंचा संरक्षक म्हणून काम करत होता, असे त्यांना नंतर कळले. कोण, कुठून आले आदी चौकशी करता त्याला जीव नाडी पहायची उत्सुकता जाग्रृत झाली. मला जीव नाडीतून भविष्य सांगणार असाल तर मी तुम्हाला ध्यानासाठी जागा देईन म्हणून त्याने पेच टाकलान. म्हणून त्या आणीबाणीच्या काळातही दासननी वाचनाला सुरवात केली. त्यात अगस्त्य महर्षींनी त्याच्या पूर्वजन्माचे वर्णन करून सध्याच्या त्याच्या कामाबद्दल सांगायला सुरवात केली.
ते म्हणाले, ‘अरे, तू अनेक अपराध केले आहेस. मंदिरातील ट्रस्टचे दागिने चोरून तू तुझ्या घरातील तांदुळाचा शिधा ठेवायच्या खोलीत ते दडवून ठेवले आहेस की नाही? एका स्त्री बरोबर पत्नीच्या अपरोक्ष तुझे अनैतिक संबंध आहेत? तुला ‘पॅरालसिस’ नावाचा रोग होणार आहे.’ ते सर्व ऐकून तो पेचात पडला.
कुठून विचारले असे त्याला झाले. मानावे का नाही याचा संभ्रम झाला. चोरी व स्त्रीसंबंध लपवता येतील पण आपल्याला रोग होणार म्हटल्यावर त्याचे धाबे दणाणले. ‘बर, पण यावर काही उपाय आहे का?’ असे विचारून त्याने तोड काढली. ‘एक तर मंदिराच् सर्व दागदागिने व रोकड तू प्रामाणिकपणे परत कर व आपल्या अंगवस्त्राला दुसऱ्या पत्नीचा दर्जा द्यायचे सर्वांसमक्ष मान्य कर’. असा आदेश आला. ते ऐकू तो सर्द झाला. म्हणाला, ‘अहो मी जर तसे केले तर माझी नोकरी नक्की जाईल. माझ्यापेक्षा भयानक खोटेपणे व अक्षम्य अपराध करणारे ही आहेत, मग मलाच का असा ‘चोरलेले धन परत कर’ असा आदेश तुम्ही द्यावा. इतरांना ही शिक्षा व्हायला हवी’. त्याने आपले डोके लढवून तर्क केला. त्यावर दासन काहीच बोलले नाहीत. त्यांना ध्यानाला बसायची सोय करून तो तेथून गेला. मधे दोन तासाचा काळ उलटला. पाणी कमी होऊ लागले.
अगस्त्य महर्षींनी म्हटल्याप्रमाणे दासनना अत्यंतिक अनूभूतिचा प्रसाद मिळाला. इतकेच ते त्या प्रसंगाबद्दल सांगतात. ध्यानातून उतरल्यावर दासननी तो जामदारखान्याचा रक्षक येताना पाहिला. त्याने त्यांना एका कोंदट खोलीत नेले व बरोबर आणलेले बोचके उघडून त्यातून दागदागिने, मौल्यवान वस्तू व रोकड ऐवज दाखवला. ते पाहून दासनांचे डोळे दिपले. काही क्षणांतच त्या बलदंड दिसणाऱ्या व्यक्तीच्या हातापायातील त्राण नाहीसा झाला व तो पहाता पहाता कोसळला. तो काही सांगू पहात होता. दासनांच्या लक्षात आले की त्याच्यावरून वारे गेल्याने त्याची वाचा गेली होती. अगस्त्यांचा कथन खरे ठरले होते!
त्या तिथून बाहेर पडल्यावर त्यांची भेट एका लक्षाधीशाशी झाली. त्यांनी त्यांना आपल्या घरी नेले. पुर परिस्थितीमुळे ते ही कारने भद्राचलम रेल्वे स्टेशनवर त्यांना बरोबर घेऊन जायला तयारीला लागले. एका कारमधे त्यांची घरची मंडळी व दासन निघाले. बाकीचे अन्य कारमधे होते. वाटेत नक्षली लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. अंधारात त्यापैकी म्होरक्याने बॅटरीच्या प्रकाशात ड्रायव्हरला खाली उतरवले व इतरांचा पैसाअडका व दागिने लुटायचा प्रयत्न केला. त्यांच्याशी बोलून उपयोग नव्हता. त्यांच्या उद्धट धमक्यांमुळे सर्व काही त्यांच्या स्वाधीन करणे शहाणपणाचे होते. मागील सीटवर बसलेल्या हनुमत दासनांनी परिस्थितीचे गांभिर्य ओळखले. मागचा दरवाजा व काचेच्या खिडक्या आतून लॉक होत्या त्यामुळे चोरट्य़ांना त्या बाहेरून उघडता आल्या नाहीत. लक्षाधीशाच्या तरुण मुली, त्यांच्याकडील दागदागिने व खुद्द त्यांच्याकडील जीव नाडीच्या पट्यांचे पॅकेट या सर्वांचे कसे रक्षण करावे असा पेच पडला होता. त्यांनी जीवनाडीच्या पॅकेटला एका रेशमी कापडात गुंडाळून ठेवले होते. त्याला काही व्हायला नको या विचाराने त्यांनी ते हातात घ्यायला उचलले. त्याच वेळी त्या म्होरक्याची नजर पडली. त्याला वाटले की मागच्या बाजूला बसलेल्याने कदाचित आत्मरक्षणासाठी बंदूक काढला असावी. असे वाटून तो ओरडला, ‘ ‘गन काढलेली आहे. चला पळा.’ ती नक्षली टोळी लगेच अंधारात नाहीशी झाली. आलेले संकट अगस्त्य जीवनाडीच्या पॅकेटच्या बंदुकीच्या सदृश दिसणाऱ्या आकारामुळे टळले होते! ... भाग -३- समाप्त. भाग - ४ पुढे चालू....
इमर्जन्सी! -१
प्रेषक प्राजु ( रवी, 03/07/2010 - 23:10) .इमर्जन्सी..
दि. मार्च १, २०१०. सकाळपासून चहाशिवाय चालत नाही या सबबी खाली टमरेल भरून चहा, आणि सोबत बरंच सटरफ़टर खाऊन झालं होतं. वेळ जात नव्हता म्हणून की काय अधे मध्ये (खाण्यातून ) वेळ मिळेल तेव्हा, इमेल चेक करणे, त्यांना उत्तरे देणे, आणि घरातलं काम हे ही करत होते. आदल्या दिवशी होळीरे होळी पुरणाची पोळी असा शंख करत पुरणाच्या पोळ्या हादडल्या होत्याच. पुरणाची पोळी दुसरे दिवशी सुंदर लागते, त्यामुळे ती खायला हवीच, अशी मनाची समजूत घालून भरपेट नाष्टा केल्यावर , दुपारचं जेवणंही तितकंच व्यवस्थित केलं होतं. एकूण काय "पोटाला विश्रांतीची गरज नसते" असा समज करून घेऊन पोटाची व्यवस्थित काळजी घेतली जात होती.
आणि अचानक दुपारनंतर लक्षात आलं, की आपल्याला छातीमध्ये दुखते आहे. छातीमध्ये थोडंसं डाव्याबाजूला सतत दुखते आहे. कशामुळे असेल असा अंदाज बांधायचा प्रयत्न केला.. तर समोर फ़क्त माझ्या पुरणपोळ्याच आल्या.
गॅसेस!! हम्म!. संध्याकाळपर्यंत हे दुखणं जरा जास्तीच दुणावलं. (कशाला खाव्यात इतक्या पुरणपोळ्या!!) असो. हे जेव्हा असह्य झालं तेव्हा मात्र मी, आमच्या इथल्या हार्टफ़र्ड मेडिकल सेंटरला फोन केला आणि अपॉइंट्मेंट मागितली. पण ७ वाजून गेले असल्याने अपॉइंटमेंट ची वेळ निघून गेली होती. त्या अटेंडंटने काय होतंय असं विचारल्यावर , "आय हॅव अ चेस्ट पेन" असं दाबात उत्तर दिलं मी. घाबरून तिने नर्सला निरोप दिला. आणी थोड्याच वेळात नर्सचा फ़ोन आला. तिने काही लक्षणे फ़ोन वर विचारली. "छातीत डाव्या बाजूला दुखते आहे, ते कोणीतरी छातीवर बसून राहिल्यासारखे दुखते आहे का?" मी,"हो." ती," पाठीमध्येही दुखते आहे का? " मी, "हो". ती," श्वास घ्यायला त्रास होतो आहे का? मी, "नाही." ती,"दीज आर द सिम्पट्म्स ऑफ़ अर्ली हार्ट अॅटॅक. आणि तू ३० प्लस आहेस ना?" मी (जरा रागातच) "हो." मनातंतल्या मनांत "तुला काय करायचंय माझ्या वयाशी??" ती," तू एकदा तुझा इ सी जी करून घे. आजच्या आज इमर्जन्सी ला जाऊन सगळे चेकप करून घे." झालं!! माझं धाबं दणाणलं. मला हार्ट अॅटॅक!! माझ्या मुलाचं काय होईल?? माझ्या नवर्याचं काय होईल??
आता इ सी जी करायला इमर्जन्सी मध्ये जायचं म्हणजे काय होइल काही सांगता नाही येत. म्हणून अतिशय जड अंत:करणाने मुलाला, नवर्याला जेवायला वाढलं. मनात म्हंटलं,"खाउन घ्या आज भरपूर, उद्यापासून माझ्याहातचं खायला मिळेल कि नाही माहिती नाही." डोळे भरून आले माझे. नवरा म्हणाला "तू ही जेवून घे." पुन्हा मनांत म्हंटलं,"हो रे.. आता पुन्हा तुम्हा दोघांबरोबर जेवायला मिळेल की नाही माहिती नाही." आणि डोळे टिपत जेवायला बसले. माझ्या डोळ्यांत पाणी बघून नवरा म्हणाला ,"खूप दुखते आहे का? थांबेल , तू जेवून घे." त्याला बिचार्याला काय माहिती माझ्या डोळ्यांत पाणी कशामुळे आले ते!!
जेवणं आटोपली आणि आम्ही एमर्जन्सीला जायला निघालो. मुलाला मैत्रीणीकडे ठेवूया असा विचार आला मनांत, पण नको!! राहुदे, तो माझ्या नजरेसमोर असलेला बरा. काय माहिती मी आलेच नाही हॉस्पिटलमधून घरी तर!!... मी माझ्या पर्स मध्ये मला लागणार्या वस्तू घेतल्या. इन्शुरन्सच कार्ड घेतलं. पाण्याची बाटली घेतली (शेवटच्या वेळी उपयोगी पडेल कदाचित!! जाता जाता हॉस्पिटलचं पाणी नको तोंडात पडायला). शेवटी कपडे भरायला लागले तेव्हा मात्र नवर्याचे पेशंस संपले. त्याचा चेहरा बघून मी कपडे भरायचा विचार रद्द केला. इमर्जन्सी ला गेलो. तिथे गेल्या गेल्या मला जाणवलं आपला डावा हातही दुखतो आहे... म्हणजे हे नक्कीच हार्ट अॅटॅकचे लक्षण आहे. तिथे प्रायमरी चेकप मध्ये माझं बीपी पाहिलं गेलं आणि नाव नोंदवून घेऊन आम्हाला वेटिंग रूम मध्ये बसवलं. वाटलं, साधारण अर्ध्या तासात आत घेऊन जातील. घड्याळात पाहिलं ८.३० वाजले होते रात्रीचे. आमच्या सारखेच तातडीची सेवा हवे असलेले खूप लोक त्या वेटिंग रूम मध्ये होते.
समोर टिव्हीवर एकापाठोपाठ एक विनोदी मालिका सुरू होत्या. एक बाई व्हिलचेअर बसून पोट धरून कण्ह्त होती. हम्म.. अपचन झालं असणार हिला. एक सधारण २४-२५ वर्षाची मुलगी तिच्या तान्ह्या मुलीला घेऊन आली होती. तिच्यासोबत साधारण एक ४५ वर्षाची बाई होती , तिची आई असावी. नक्की कोणासाठी आले असावेत? मी विचार करत होते.. कारण त्या तिघिंपैकी कोणीही आजारी दिसत नव्हतं. आणि मग बघता बघता ४-५ बायका आलटून पालटून त्या तिघिंना तिथे येऊन भेटून गेल्या.. नक्की काय चालं होतं कहीच कळलं नाही. पण प्रत्येकीच्या अतिप्रचंड घेरामुळे जागा व्यापली गेली तिथली आणि अचानक फ़ारच गर्दि झाल्यासारखे वाटू लागले. असेच आजूबाजूचे निरिक्षण करण्यात तास भर निघून गेला. आता छातीतले दुखणे वाढू लागले आहे असे जाणवले. पाठितही ठणका वाढला. मी रिसेप्शन ला जाऊन विचारले ती म्हणाली "तुझ्या आधी अजून ३ नंबर आहेत.. मग तुला आत बोलावतील." अरेच्च्या!! मला इथे हार्ट अॅटॅक होऊ घातलाय आणि ही मला माझ्या आधी ३ नंबर आहेत असे सांगते आहे!! रागच आला. पण काहीही न बोलता पुन्हा जागेवर येऊन बसले. दरम्यान नवर्याच्या मांडिवर लेक झोपी गेला. पुन्हा आजूबाजूचे परिक्षण निरिक्षण करण्यात दिड तास निघून गेला. मनांत आलं, "आता इथे बसल्या बसल्या मला हार्ट अॅटॅक येईल मग कळेल या इथल्या रिसेप्शनवालीला.." शेवटी रात्री १२ वाजता मला आत बोलावले. आणि अतिशय जड आंत:करणाने आजूबाजूच्या लोकांकडे मी पाहून घेतलं. लेकाच्या डोक्यावरून मायेने हत फ़िरवला.. त्याला जवळ घेतलं आणि नवर्याकडे असहाय्य पण दु:खी मनाने पाहिलं. तो लेकाला खांद्यावर सावरत माझ्याकडे हसत हसत बघत.. "चल आत जाऊया" असं म्हणाला. जाऊदे ...त्याला काय कळणार ! आम्ही आतमध्ये गेलो.
क्रमश:
(वरील 'छातीत दुखणे आणि इमर्जन्सीला जाणे' ही घटना जरी सत्य असली तरी बाकी माझा कल्पना विस्तार आहे. )
कोलाज
प्रेषक क्रान्ति ( रवी, 03/07/2010 - 13:13) .चिऊताईला काल नुकतंच तिसरं संपून चौथं लागलं होतं. आज चिऊताईची झोप नेहमीपेक्षा लौकरच उघडली. खरं तर काल रात्री वाढदिवसाच्या भेटी उघडून पहाता पहाता झोपायला बराच उशीर झाला होता. पण स्वप्नात भेटीत आलेल्या वेगवेगळ्या रंगपेट्या, चित्रांच्या वह्या, स्केच पेन यांनी धमाल केली होती, सकाळी उठून कितीतरी चित्रं काढायची ठरली होती. मग वेळ नको पुरायला?
चित्रांच्या नादात आज अगदी शहाण्या मुलीसारखं आईला त्रास न देता दात घासून, दूध पिऊन झालं, बाबाच्या आधीच आवरूनही झालं. एरवी जबरदस्तीनं भरवावी लागणारी पालकाची नावडती भाजी पण आज विनासायास पोटात गेली.
"मग आज काय, मस्त मस्त चित्रं काढणार तर?" बाबानं विचारलं. "हो, तू ऑफिसमधून येशील तेव्हा बघच मी किती छान छान गंमत करते चित्रांची." चिऊताईनं बाबाला प्रॉमिस केलं. त्याला हसून दुजोरा देऊन बाबा ऑफिसला गेला, आईचंही सगळं आवरून झालं आणि मग मायलेकीचं राज्य!
आत्यानं आणलेली मोठी स्केच बुक, मावशी, काका, आजी यांनी दिलेल्या रंगीत पेन्सिली, खडूच्या पेट्या, स्केच पेन, बाबाच्या मित्रानं दिलेली गोल गोल वड्यावाली वॉटरकलरची छानशी रंगपेटी, आईच्या मैत्रिणीनं दिलेलं सुंदर चित्रांचं पुस्तक सगळी मंडळी हॉलमध्ये गोळा झाली. कार्पेटवर फतकल मारून चिऊताईची रंगसाधना सुरू झाली.
कुठंतरी गरगट्टा, कुठं दोनच फराटे, एका पानावर दोनचार टिकल्या, आकार ना उकार अशा आगळ्यावेगळ्या कलेनं अख्खी वही भरूनही गेली अर्ध्या तासात! मग ती आईला दाखवून झाली. "हा किनई, हत्ती आहे, तो ढगातून उडतोय. आणि हे आहेत टॉम आणि जेरी. ती जेरी टॉमला मारतेय. ही सोनपरी. तिच्या हातात जादूची कांडी आहे. ती फिरवली की दुष्ट राक्षसाचं कबुतर होतं. आणि हा बघ तो राक्षस. हा आहे डोनाल्ड डक आणि आणि हा मिकी." एक एक करत सगळ्या चित्रांचं वर्णन करून झालं. आईच्या चेहर्यावर कौतुक ओसंडून वहात होतं. मध्येच स्वारी पहिल्या पानावर गेली. "ए आई, हे काय आहे ग?"
"अग, हा तर हत्ती आहे ना ढगातून उडणारा?"
"हट् मुळी! तो हत्ती नाही दिसत. तो तर भोपळा झालाय! आणि त्या जेरीला तर शेपटीच नाहीय! सोनपरी नकटी दिसतीय." गाल फुगवून चिऊताई बोलली. हळू हळू सगळ्या चित्रांमधल्या चुका शोधून झाल्या. चिऊताई जाम वैतागली. "हूं, मला मुळी चित्रच नाही काढता येत. सगळा नुस्ता कचरा झालाय. मला नाय आवडली ही चित्रं." त्राग्यानं तिनं उरलासुरला रंग प्रत्येक चित्रावर अक्षरशः फासला, आणि अख्ख्या वहीचे तुकडे तुकडे केले. रात्रीची उरलीसुरली झोप डोळ्यांत दाटून आली होती. फुरंगटून, हिरमुसून चिऊताई तिथंच झोपून गेली.
तासाभरानं चिऊताई उठली, तेव्हा आईनं सगळा पसारा आवरून ठेवलेला होता. वाटीत डाळिंबाचे लालचुटूक दाणे घेऊन आई चिऊताईची वाट पहात होती. पण तिचा रुसवा अजून गेलाच नव्हता. "तुझ्या सोनपरीनं तुझ्यासाठी एक गंमत ठेवलीय. तू एवढे दाणे खाल्लेस, की ती तुला मिळेल." आईनं समजूत काढली. "मी नाई इतके सगळे खाणार. एक्कच घास खाईन!" रुसुबाई चिऊताई अजूनही घुश्शातच होती. "ठीक आहे राणी. एक्कच घास खा, मग तुला ती गंमत देते." कसेबसे चार दाणे खाऊन चिऊताई आईच्या मागे गेली, तर एका मोठ्या पांढर्या कागदावर ढगात उडणारा हत्ती होता, तिच्याच रंगांचा! "वॉव! हा तर खराच उडणारा हत्ती! ए आई, हा कसा आला ग?"
चिऊताईच्या या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी आईनं एक-एक कागद तिच्यापुढं ठेवायला सुरुवात केली. सोनपरी, दुष्ट राक्षस, टॉमला मारणारी जेरी, मिकी, अगदी चिऊताईला हव्या असणार्या मित्रांची सगळी चित्रं त्यात होती, फक्त रंग नव्हते. "आई, पण सोनपरी यात रंग भरायला विसरली का ग?" बघता बघता चिऊताई खुलली होती. "नाही, ते तुला भरायचे आहेत, आणि तेही रंगपेटीतून नाही." आईनं रिकामी झालेली डाळिंबाच्या दाण्यांची वाटी ओट्यावर ठेवली. चित्रं पहाता पहाता आपण सगळे दाणे फस्त केलेत, हे चिऊताईला कळलंही नाही! "मग सांग ना कसे भरायचे?" ही तर एक नवीनच गंमत होती!
आईनं चिऊताईच्या चित्रकलेच्या वहीचे फाटके कागद, कात्री, फेविकॉलची ट्यूब घेतली. त्या वेड्यावाकड्या कागदांचे छानसे आकार कापले आणि एका चित्रात ते आकार चिकटवले. चिऊताई मन लावून पहात होती. बघता बघता सोनपरी हातात जादूची कांडी घेऊन त्या कागदावर उतरली! "काय मस्त! ए आई, हे मी करू?" चिऊताईला हे नवं काम आवडलं. "हो, हे तुलाच तर करायचं आहे!" आणि हे चिकटकाम आईनं चिऊताईला दिलं करायला. मग ते झाल्यावर स्केच पेननं डोळे, नाक, कान काढून झाले. बघता बघता सगळी चित्रं हवी तश्शी तयार झाली! चिऊताई मनापासून खूश झाली. मनासारख्या जमलेल्या त्या कलाकृती पहाताना तिचा आनंद डोळ्यांतून ओसंडून वहात होता!
बिघडलेल्या चित्रांच्या कपट्यांमधून मनासारखं कोलाज घडवण्याची कला किती सहजपणे शिकली होती ती!
निरोप - अंतिम
प्रेषक श्रावण मोडक ( शुक्र, 03/05/2010 - 15:52) .नदी गावाच्या दक्षिणेकडून यायची आणि गाव वसलेला तिनसाचा डोंगर संपला की किंचित डावीकडं वळून निघायची. नदीच्या पूर्वेकडच्या किनार्याकडं जाण्यासाठी हिर्या डुंगीतून निघाला तेव्हा स्वच्छ चंद्रप्रकाश पसरला होता. नदीच्या पात्रात आपण दिसू अशी त्याला भीती होती आणि ती साधार होती. पात्र साधारण पन्नासेक मीटर रुंदीचं. तो ते सरळ ओलांडू लागला असता तर पंचाईत नक्कीच होती. त्यामुळं त्यानं नदीच्या प्रवाहात आधी डुंगी टाकली. साधारण मैलभर खाली जाऊन तिथून त्यानं पात्र ओलांडलं आणि समोरच्या बाजूनं तो पुन्हा वर आला. त्या किनार्यावर पुढं आत जायचं आणि जाताना इकडच्या किनार्यावरच्या रात्रीच्या स्तब्धतेवर नजर ठेवायची. स्तब्धता थोडीजरी विचलीत झाली की काम सुरू. झोप येऊ नये म्हणून बिडी ओढायची. बिडीचा निखारा दिसू नये याची दक्षता घेण्यासाठी उभी ओंजळ बिडीभोवती.
चंद्र डोक्याला तिरपा झाला तेव्हा आपल्याला भूक लागल्याची जाणीव हिर्याला झाली. त्यानं डुंगी तिरावर घेतली. बाहेर उडी मारली. डुंगीचा दोर ओढून घेतला आणि काठावरच्या एका बुंध्याला ती बांधली. तो जंगलात शिरला. दहा मिनिटांनी तो पुन्हा डुंगीवर आला तेव्हा त्याचं पोट भरलं होतं. किनार्यावर या बाजूला किती वेळ थांबायचं उगाच, असा विचार करून त्यानं डुंगीला थोडी गती दिली. दक्षिणेकडं तो डुंगी हाकू लागला. फर्लांगभर अंतर त्यानं कापलं असेल. नदीच्या पश्चिमेला पठारी भाग सुरू होण्याची चिन्हं होती. कोणत्याही परिस्थितीत डुंगी पश्चिमेच्या तिराला न्यायची नाही असं त्याला भाईनं सांगितलं होतं. त्यामुळं त्यानं डुंगी पूर्वेकडंच ठेवली होती.
डावीकडच्या डोंगरातून एक आवाज हिर्याला ऐकू आला. हुंकारासारखा. कोणता तरी प्राणी. अर्थात, हिर्याला त्याची भीती नव्हती. तो नदीत होता. पण जिथं हा आवाज ऐकू आला तिथंच त्याला थांबणं भाग होतं. थोडं पुढं मगरींचा टापू. वेळ रात्रीची. त्यामुळं सावधानता अधिक गरजेची. एरवी दिवसा जिथंपर्यंत माणसं जातात, त्याच्या अलीकडंच तो थांबला. त्यानं दूरवर नजर टाकली. अंधारात झाडांच्या फक्त सावल्या दिसत होत्या. हालचाल काहीही नव्हती.
रात्रीच्या वेळी एकट्यानं अशी कामगिरी करण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. त्यामुळं हिर्या निवांत होता. एकच अडचण होती, आज त्याला पावा वाजवता येत नव्हता. एरवी अशा वेळी तो निवांत पावा वाजवत असायचा. आज पोलिसांना त्याचं अस्तित्व कळण्याची भीती होती. त्यामुळं फक्त बिडीवर काम भागवावं लागत होतं.
कंटाळा उडवण्यासाठी हिर्यानं तोंडावर पाणी मारलं. टॉवेलनं तोंड पुसलं आणि पुन्हा एक बिडी पेटवली. एक दीर्घ झुरका घेतला. धूर सोडत त्यानं समोर दूरवर नजर फेकली आणि तो सावध झाला. दूरवर काही हालचाल दिसू लागली होती. नेमकी कशाची हे कळत नव्हतं. पण हालचाल होती. हिर्या टक लावून पाहू लागला. पाचेक मिनिटांत चित्र स्पष्ट झालं. ओळीनं काही माणसं चालत येत होती इतकं त्या सावल्यावरून कळत होतं.
हिर्यानं डुंगी वल्हवायला सुरवात केली. लगेच गावात जाणं गरजेचं होतं. ठरवून त्यानं डुंगी पात्रात मध्यावर टाकली आणि तो भराभरा काठीनं पाणी मागं लोटू लागला.
***
डामखेड्यात नैऋत्येला असलेल्या उतारावर दामाचं घर होतं. तिथंच बातमीदारांना थांबवलं होतं. ते पोचले तेव्हा रात्रीचे साडेअकरा झाले होते.
दामाच्या घरापासून पूर्वेला नदी दिसायची. नदीच्या काठाला लागून असणारं जंगल दिसायचं. दक्षिणेला अरवलीहून येणारा रस्ता. त्या रस्त्याच्या अलीकडं असणारंही जंगल दिसायचं. ही मंडळी पोचली तेव्हा मात्र फक्त छाया आणि अंधुक प्रकाशाचा खेळ. त्यावरून अर्थ लावायचा. अरवलीचा रस्ता तिथून जवळ, तर नदीकिनारची वाट लांब. हे ठिकाणच सुरक्षीत आहे, असं बरोबरच्या दादानं सांगितलं होतं आणि त्यांच्या सांगण्यापलीकडं जाण्याची हिंमत कोणाचीच नव्हती.
मध्यरात्रीचे साडेतीन झाले होते. फोटोग्राफरनी सरळ ताणून दिली होती. अंधारात आणि इतक्या अंतरावरून आपला काहीही उपयोग नाही हे त्यांना ठाऊक होतं. 'अग्निहोत्रीं'च्या गप्पा सुरू झाल्या होत्या. नेहमीच्याच, राजकारणाविषयी. चहाचा, बिनदुधाच्या, एक राऊंड आल्या-आल्या झाला होता. आता दुसरा व्हावा अशी काहींची इच्छा होती. पण तिथली एकूण परिस्थिती पाहता तशी इच्छा व्यक्त करणं मुश्कीलच. एक दोघा अनुभवी मंडळींनी आपल्यासमवेत प्रथमच आलेल्या दोघांचा 'पाठ घेणं' सुरू केलं होतं. गंमतीगंमतीत या अशा अनभिज्ञ भागाविषयी, माणसांविषयी काही असे ग्रह करून द्यायचे की हे नवागत काही काळ तरी त्या 'प्रभावा'तून बाहेर येत नाहीत.
तासभर असाच गेला तेव्हा आत्तापर्यंत डोळे ताणून बसलेल्यांना थोडा पश्चाताप होऊ लागला होता. डोळे ताणण्याऐवजी आल्या-आल्या ताणून दिली असती तर बरं झालं असतं वगैरे त्यांना वाटू लागलं. पण असं करून चालत नसतं हे त्यांना पक्कं ठाऊक होतं. पोलीस केव्हाही जंगलापलीकडं आणि नदीच्या मधल्या टापूत जमतील आणि त्याचवेळी कदाचित ठिणगी पडेल.
प्रवासात प्रत्येक बातमीदाराला काही गोष्टींची कल्पना समितीकडून स्पष्ट दिली गेली होती. पहिली म्हणजे ते सारे त्यांच्याच जबाबदारीवर तिथं आले आहेत, त्यांना समितीनं आणलेलं नाही. फक्त त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं समितीनं सुरक्षीत रस्त्यावरून त्यांना इथंपर्यंत आणलं आहे. समितीनं हीही दक्षता घेतली होती की, आपल्याकडून त्यांच्या हाती काहीही दिलं जाणार नाही. त्यांची तटस्थता शक्य त्या मार्गानं एस्टॅब्लीश होणं महत्त्वाचं.
सव्वापाचच्या सुमारास उतारावर काही हालचालीची चाहूल लागली. आवाज येऊ लागले. एक हत्यारधारी आधीच त्या दिशेनं गेला होता. आवाजांपाठोपाठ तो धावत आला निरोप घेऊन: "घुसतायेत साले..."
***
हिर्या गावात काही मिनिटं थांबला आणि लगेच अरवलीच्या वाटेवर धावत सुटला. साठेक जवान जंगलातच होते. त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे लगेचच.
गावातून त्याचवेळी मेगाफोनवरून एक आवाज आसमंतात घुमला. समितीच्या विजयाचा नारा होता तो. पाठोपाठ दुसरा नारा झाला, "हमारे गावमें हमारा राज"! नारा दिला अनीश रेगेनं, अनुभवी मंडळींनी आवाज ओळखला होता. त्यानंतर अनीशचाच आवाज घुमू लागला.
"सर्वेला सहकार्य केलं जाणार नाही. ताकदीच्या बळावर गावांत घुसण्याचा प्रयत्न पोलिसांनी करू नये. डेप्युटी कलेक्टर आणि प्रांताधिकार्यांनी नोंद घ्यावी की हे प्रकरण हायकोर्टात गेलेलं आहे. तिथं सुनावणी सुरू आहे. अशा स्थितीत सर्वे करण्याचा प्रयत्न म्हणजे कण्टेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकतो..."
मेगाफोन गावात वरच कुठं तरी होता. अंधारात दिसणं शक्य नव्हतं. दहा-पंधरा मिनिटांत झुंजुमुंजू झालं की सारंच स्पष्ट होईल अशा बातमीदार मंडळी होती. बरोबर असणारे दोन्ही तरुण निघून गेले होते. हालचाल करायची तरी कशी हा प्रश्न होता. त्यामुळं तिथंच थांबून राहणं त्यांनी पत्करलं.
सुरवात कशी झाली, काय झालं हे कोणालाही सांगता येणं शक्य नाही. गोंधळ सुरू झाला खाली जंगलापाशी. काही गडबड आहे इतकंच कळत होतं. उजाडलं तेव्हा नदीतीराच्या दिसणार्या भागात पोलिसांचीच धावपळ दिसत होती. तिथून अलीकडं फक्त जंगल. पोलिसांकडंही मेगाफोन होता, त्यांचे इशारे समितीच्या पहिल्या घोषणेबरोबरच सुरू झाले होते. त्यामुळं आधी सारंच मेगाफोनचं युद्ध वाटत होतं. आणि त्या युद्धातच केव्हातरी आलेला गोळीचा आवाज विरून गेला. त्यामुळं ती कुठून सुटली, जंगलातून की पठारावरून हे आता कोणालाही सांगता येणं शक्य नव्हतं. एका गोळीनंतर हे आवाज वाढले. पुढं मग फारसं काही कळेनासं झालं. आवाज कानी येत होते. काही कळत नव्हतं, पण त्यांचा अर्थ इतकाच होता की चकमक सुरू आहे.
अंदाज घेत फोटोग्राफर आणि बातमीदार दामाच्या घरापासून खाली उतरू लागले. निघताना त्यांच्यातल्या अनुभवींपैकी कोणी एकानं ओरडून सांगितलं, "काही झालं, एकमेकांना चुकलो तरी ठीक दीड तासानं आहे त्या स्थितीत सगळ्यांनी दामाच्या घरी यायचं. धुमश्चक्री त्याआधी संपली तर आधीच." किती जणांच्या ते डोक्यात शिरलं हे तपासत बसण्यात अर्थ नव्हता.
खाली उतरता-उतरताच गोळ्यांचा आवाज कानात साठवत कुणी पुढं, कुणी मागं असं करता-करता ते कधी विखुरले गेले ते त्यांनाही कळलं नाही.
***
"सर्वेला विरोध करणार्या नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर हल्ला केला. झाडं आडवी टाकून पोलिसांचा रस्ता रोखला होता. पोलिसांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करताच आधी तुफान दगडफेक करण्यात आली, मग जंगलातून गोळीबार झाला. दीड तासांहून अधिक काळ चकमक सुरू होती. तीन पोलीस मारले गेले. सहा जण जखमी झाले. पथकाला अर्ध्या रस्त्यातूनच माघार घेणं भाग पडलं, कारण सुरक्षीत वाट नक्षलींनी बंद केली होती. मगरींचा संचार होता तिकडून वळून पुढं गावात जाणं शक्य नव्हतं..."
एसपी सांगत होते. घाई दिसत होतीच बोलण्यात, कारण प्राथमिक माहिती देऊन मी घटनास्थळी जाणार आहे असं ते म्हणाले होते. घटनास्थळी म्हणजे अरवली कॅम्पपर्यंत तर नक्की. ब्रीफिंग करताना एसपींनी काहीही मागं ठेवलं नाही. पोलिसी कारवाई फसते आहे हे त्यांनी शांतपणे कबूल केलं. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात समितीचीही हानी झाली आहे इतकंच त्यांना सांगता आलं. प्रत्यक्षात किती आणि काय हे मात्र सांगणं शक्य नव्हतं, कारण ती माहिती गोळा करण्यासाठी सरकारला गावात शिरताच आलं नव्हतं. इंडियन मेडिकल असोसिएशनचंच पथक फक्त आत येऊ शकेल असे फलक समितीनं लावले होते. त्याहीपलीकडं, त्या जंगलात अद्याप किमान पंचवीसेक शस्त्रधारी तरी होतेच.
आयएमएचं पथक तिथं पोचेपर्यंत दुपार उजाडणार होती.
***
खडकी, निमखेडामार्गे दिवा एकटाच मोटरसायकलवर आला. रुपसिंगच्या शेतावरच थांबला. किशोर, धनजीसेठ तिथंच होते. निरोप स्वच्छ होता: समितीचा डामखेड्याचा कार्यकारी मंडळ सदस्य वेस्ता आणि सायगावचा सिक्का हे दोघं 'शहीद' झाले होते. भाईच्या दंडात आणि मांडीत गोळी घुसली होती. आणखी तिघं जखमी झाले होते. सर्वांना डोली करून निमखेड्याला नेलं होतं. तिथल्या दवाखान्यात उपचार सुरू झाले होते. पोलिसांनी गोळीबार थांबवून मागं जाण्यास सुरवात केली, तसा जंगलातून गावकर्यांनीही गोळीबार थांबवला होता. दोन तासांपूर्वीपर्यंत पुढं आलेले सगळे पोलीस अरवली कँपला गेले होते. बातमीदार आणि फोटोग्राफरचं पथकही परस्पर अरवलीला गेलं होतं.
वेस्ता आणि सिक्का यांच्यावर दोन्ही गावांच्या मध्ये जंगलात अंत्यसंस्कार करायचा निर्णय झाला होता.
अंत्यसंस्काराचा निरोप घेऊन समितीचे कार्यकर्ते गावागावांत पोचत होते तेव्हा त्या दोघांच्याही बायका आपले बछडे आणि इतर काहींसमवेत डामखेड्यातच होत्या. दुःखासाठीची उसंत त्यांना अंत्यसंस्कारानंतर मिळणार होती. घरी पोचल्यावरच. ते त्यांनी पत्करलेलं होतं. जमिनीसाठी, कारण एरवीही काही पर्याय नव्हताच, ही त्यांची धारणा होती!
***
कलेक्टर ऑफिसात एकूण रिपोर्ट तयार व्हायला दुसर्या दिवसाची दुपार उजाडली. स्वतः कलेक्टर अरवलीपर्यंत जाऊन आले. एसपीही गेले होते. त्यांच्या पाठोपाठ स्पेशल आयजी. नंतरची रिव्ह्यू मिटिंग कलेक्टर ऑफिसलाच झाली. पालकमंत्री दुपारी साडेतीन वाजता तिथं पोचणार होते, नेहमीप्रमाणे त्यांना उशीर झालाच. चार वाजता ते आले तेव्हा स्पेशल आयजींसमवेत कलेक्टर, एसपी अँटे चेंबरमध्ये बसले होते. पालकमंत्री थेट तिथंच गेले.
"नमस्कार. काय परिस्थिती आहे आत्ता?" आत शिरताच पालकमंत्र्यांचा पहिला प्रश्न. कलेक्टर बोलू लागले. मोजक्या पंधरा-वीस वाक्यांत त्यांनी आढावा घेतला.
"पुढं काय? सर्वेला किती दिवसांची स्थगिती आहे?"
"स्थगितीची मुदत नाही. मी आपल्याकडून पुढच्या सूचनांची वाट पाहतोय." कलेक्टरांचा खुलासा.
"आत्ता घाई नको. सुप्रीम कोर्टच काय ते सांगेल..." पालकमंत्री म्हणाले. कलेक्टरांनी मान डोलावली.
काही औपचारिक चर्चा करून पालकमंत्र्यांनी आतला फोन उचलून सूचना दिली, "रेव्हेन्यू सेक्रेटरींना लाईनवर घ्या." त्यांचं खातं तेच.
काही क्षणातच फोन लागला. पालकमंत्री इकडून बोलू लागले. पलीकडचं बोलणं ऐकू येणं शक्यच नव्हतं. "तुमच्याकडं प्राथमिक माहिती असेल... कलेक्टरांचा रिपोर्ट येईलच. काय आहे, या कोर्टाच्या 'जैसे थे' वगैरे आदेशांनी त्यांना जोर दिला. नाही तर त्यांची ही हिंमत झाली नसती. आता जे झालं ते उत्तम झालं. आय सजेस्ट, वी मस्ट टेक द रिपोर्ट डायरेक्टली टू दिल्ली... सुप्रीम कोर्ट. एकदाचं हायकोर्टातलं लफडंही तिकडं दिल्लीत जाणं गरजेचं आहे. मग या सगळ्यांवर सुप्रीम कोर्ट ऑर्डर देईल. ती काही भूसंपादन करू नका अशी असणार नाही. आत्ता घडलेल्या घटनेतून कोर्टातही गांभीर्य मांडता येईल..."
एसपींना त्याक्षणी मारल्या गेलेल्या तीन पोलिसांची आणि त्यातून एकूण पोलीस दलामध्ये निर्माण होणार्या प्रतिक्रियेची चिंता होती. समितीविरुद्ध त्या दुर्गम प्रदेशात झुंजणं सोपं नव्हतं. वर्षभरात बळी पडलेल्या पोलिसांची संख्या आता १२ वर गेली होती.
कलेक्टरांना सर्वे आणखी लांबवता येईल का याची चिंता भेडसावत होती. त्यांना ठाऊक होतं की सर्वे होईलही, पण भूसंपादन शक्य नाही सध्याच्या स्थितीत. पुनर्वसनाचा प्लॅन पक्का नसताना 'जिओरिसोर्सेस'नं कितीही मोठ्या कल्पना मांडल्या तरी त्या या प्रदेशात प्रत्यक्षात आणणं नेहमीच्या चौपट कामाइतकं होतं.
स्पेशल आयजींचा विचार सुरू होता तो समितीचं कंबरडं कसं मोडायचा याविषयी. जिओरिसोर्सेसच्या एम.डीं.ना दिलेला तो शब्द होता. त्या शब्दावरच पुढं हरिप्रसाद महाराजांचं समाधान अवलंबून होतं. महाराज समाधानी झाले तरच सीबीआयमध्ये जाण्याची संधी, एरवी इथंच राज्यात सडत रहावं लागेल.
"या तीन पोलिसांची नावं काय आहेत?" पालकमंत्र्यांचा अचानक प्रश्न आला एसपींना.
"हेड कॉन्स्टेबल रावण पाटोळे, कॉन्स्टेबल रफीक मुकादम आणि प्रभाकर चव्हाण. तिघंही मुख्यालयातच नेमणुकीला होते." एसपींनी माहिती पुरवली. पालकमंत्र्यांना नावात काय इंटरेस्ट आहे हे त्यांच्या ध्यानी आलं नाही.
"आपण त्यांच्या घरी जाऊया. भरपाईसाठी मी सीएमसायबांशी बोललो आहे. त्याशिवाय कंपनीही मदत करणार आहे. मुलं केवढी आहेत?"
"तिघंही तरूण होते. मुकादमचा मुलगा आणि चव्हाणची मुलगी बालवाडीत वगैरे आहे. पाटोळ्यांचा मुलगा पुढच्या वर्षी दहावीला जातोय." एसपी.
"ठीक आहे, त्यांची व्यवस्था करू. जरा डीआयओंना बोलवण्याची व्यवस्था करा..." पालकमंत्र्यांनी जिल्हा माहिती अधिकार्यांना बोलावण्याची सूचना केली. उद्याच्या बातम्यांची सोय. चौघंही बाहेर आले.
छोट्याशा औपचारिक बैठकीनंतर मंत्री पुन्हा अँटे चेंबरमध्ये गेले. यावेळी सोबत फक्त कलेक्टर आणि मंत्र्यांचे सचिव व दोन सहायक होते. पाऊण तासानं सारेच बाहेर आले. "चला, आधी पोलिसांच्या कुटुंबियांना भेटून येऊ..." मंत्री म्हणाले.
पत्रकारांना निरोप देण्यासाठी डीआयओंच्या सहायकांची पळापळ सुरू झाली.
***
सचिवालयात महसूल सचिवांच्या दालनांमध्ये नेहमीच्या वेळेनंतरही जाग होती. सुप्रीम कोर्टात सादर करण्याचे प्रतिज्ञापत्र तयार होत होतं. भूसंपादनाला गावकर्यांचा विरोध नाही. विरोध आहे तो फक्त समितीचा. समितीच्या शस्त्रांच्या धाकदपटशामुळं गावकरीही दबलेले आहेत. त्यामुळं सर्वंकष कारवाईची गरज आहे असा मुद्दा मांडण्याची सूचना सरकारच्या विशेष वकिलांसाठी त्या प्रतिज्ञापत्रासोबतच्या नोटमध्ये लिहिली गेली होती.
घटनास्थळापाशी केलेल्या व्हिडिओची एक प्रत घेऊन पालकमंत्र्यांचे एक सहायक तिथं पोचण्यास निघाले होते. महसूल सचिवांसाठी निरोप होता, या व्हिडिओवरून 'आँखो देखा हाल' तयार करून तो सुप्रीम कोर्टात देण्यासाठी सज्ज ठेवायचा.
***
पालकमंत्र्यांचा ताफा पोलीस लायनीत शिरला. पाटोळे, चव्हाण आणि मुकादमच्या घरांसमोर शोकाकूल मंडळी होती.
विचारपूस करून पालकमंत्री पत्रकारांशी बोलू लागले. दरम्यान मुख्यमंत्र्यांकडून विशेष घोषणेची अनुमती त्यांना मिळाली होती. तिन्ही पोलिसांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारकडून नियमित मदतीव्यतिरिक्त प्रत्येकी एक लाखाची मदत. तिघांच्या पत्नींना सरकारी नोकरी. तिघांचीही पहिली नावं घेत पालकमंत्री आपुलकीनं बोलले. त्यांचे डोळे पाणावले होते. कॅमेराचे फ्लॅश उडत तेव्हा ते चकाकत!
तिन्ही पोलिसांना श्रद्धांजली वाहून पालकमंत्र्यांनी रेस्टहाऊसकडं कूच केलं.
***
सूर्य मावळतीला निघाला होता तेव्हा पोलीस लायनीपासून साधारण अर्धा फर्लांगभर अंतरावर असलेल्या संस्कार केंद्रातील मुलांना तिथली शिक्षिका प्रार्थना शिकवत होती. तिची आणि त्या मुलांचीही आवडती प्रार्थना,
इतनी शक्ती हमें देना दाता
मनका विश्वास कमजोर हो ना
हम चले नेक रस्तेपे हमसे
भूलकर भी कोई भूल हो ना...
केंद्रातून बाहेर येणारे शब्द आसमंतात विरून जात होते.
शिक्षिकेच्या आवाजातच दोन चिमुकले आवाजही मिळालेले होते - रोशन मुकादम आणि रेवा चव्हाणचा आवाज!
बापाच्या मृत्यूचा 'निरोप' त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी आणखी काळ जाऊ द्यावा लागणार होता.
पूर्ण
गीत सरगम
प्रेषक शुचि ( शुक्र, 03/05/2010 - 14:15) .रविवारी सकाळी डोळे उघडल्यावर एका क्षणात एका गोड जाणीवेनी रमाचा ताबा घेतला, तो म्हणजे कित्येक दिवसंनी आज संध्याकाळी अमीतबरोबर बाहेर जाता येणार होतं. नुसत्या एखाद्या हॉटेलात अथवा सिनेमाला नाही तर हिन्दी गाण्यांच्या कर्यक्रमाला. किती तरी वर्षांनी हा योग जोळून आला होता. ६ महीन्यांपूर्वी शोअर जॉब घेतल्यापासून, अमीत कचेरीच्या कमात तरी गुंतलेला असे अथवा दोघं बाहेर गेले तर नुसत हॉटेल, सिनेमा होत असे. रमा त्यामुळे न आळ सावता आज चटकन उठली, चहा करून तिनी अमीतला हलकेच उठवले.
"ए राजा उठ ना. आज आपल्याल गीत सरगम ला जायचय. मज्जा आहे एका माणसाची. "
अमीतही उठल्याउठल्या कार्यक्रम आठवल्यामुळे टवटवीत जागा झाला. दिवसही चटकन निघून गेला संध्याकाळची वाट पहाण्यात, तयारी करण्यात.
पावणेसात वाजता दोघं टिळक स्मारक मंदीरात पोचली. एव्हाना बरीच गर्दी जमली होती. रमाला पुण्याची ती सुसंस्कृत गर्दी अतिशय आवडत असे. मोगरा, केवडा आणि काही अनमिक अत्तरे यांचा सुगंध, टेस्ट्फुली नटलेल्या स्त्रिया, सभ्य वर्ग. नजरेस नजर दिली असता कोणीही पटकन हसतात अशा ठिकाणी. वातावरण कसं प्रसन्न आणि लगबगीचं असतं. खरोखर अखिल विश्वात सारं काही आलबेल आहे असं वाटावं इतकं छान.
घंटा झाली.
निवेदकानी कार्यक्रमाला सुरुवात तर मस्त केली.
पहीलच गाणं होतं तिचं तूफान लाडकं हेमंत कुमारचं, कोहरा सिनेमातलं "येह नयन डरे डरे, येह जाम भरे भरे जरा पीने दो"..................... "रात हसीन येह चान्द हसीन, तू सबसे हसीन मेरे दिलबर , इन सबसे हसी तेरा प्यार, तू माने ना..." अहाहा ते दैवी सूर तिला कधी जादूभर्या दुनियेत घेऊन गेले तिला कळलं सुद्धा नाही. अमीतच्या हातात हात गुंफून गाणं ऐकणं खरच फार सुखावह होतं.
पुढे हेमंत कुमारची २ सलग गाणी होती - "बेकरार करके हमे युं ना जाइये , आपको हमारी कसम लौट आइये" आणि एक दर्दभरं प्यासा मधलं "जाने वोह कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला" दोन्ही गणी रसिकांची दाद मिळवून गेली विशेषतः लागोपाठ्च्या विरोधाभासामुळे. गायकाने छान पेलली होती दोन्ही गाणी.
मग आलं एक अल्लड, शोख गाणं, प्यासा सिनेमातलंच पण गीता दत्त नी गायलेलं -"जाने क्या तूने कही, जाने क्या मैने सुनी, बात कुछ बन ही गयी" .......... सभागृहात जणू मोगर्याच्या फुलांचा शिडकावा होत होता आणि श्रोते न्हाऊन निघत होते......"नैन झुकझुक के उठे, पांव रुक रुक के उठे, आ गई चाल नई.... बात कुछ बन ही गई" . रमाच्या पायांनी एव्हाना ठेका धरला होता.
हे कमी होतं की काय म्हणून लोकांना धुंद करून टाकायला लागोपाठ गीता दत्तचच शृंगार रसात ओथंबलेलं सुरेख "साहेब बिबी" मधील गाणं लागलं - "पिया ऐसो जिया मे समाइ गयो रे के मै तन मन की सुध बुध गवान बैठी"....... प्रेक्षक जग आणि स्वत:ला विसरले होते पार ....... "मोरे आंगनमे जब पुरवैयां चली मोरे द्वारे की खुल गइ किवडीया मैने जाना के आ गये सावरीया मोरे झट फूलनकी सजियापे जा बैठी"
त्यानंतर देवच्या आर्जवी "अभी ना जाओ छोड्कर के दिल अभी भरा नही" नी सभागृह भारून गेलं.
मग लयलूट झाली-
दिल तडप तडप के केह रहा है आ भी जा"
"छोड दो आन्चल जमाना क्या कहेगा"
"हाल कैसा है जनाब का"
"उडे जब जब जुल्फे तेरी"
"आइये मेहेरबान"
"येह कैसी अजब दास्तान हो गयी है"
सारख्या मदभर्या, सदाबहार गाण्यांनी.
शेवटचं गाणं अतिशय आर्जवी स्वरांच , व्याकुळ करणारं ... एस. डी बर्मन यांच "मेरे साजन है उस पार मै मन्मार हूं इस पार" ..... जेव्हा जेव्हा अमित जहाजावर असायचा रमा हे गाणं ऐकायची . आजही ऐकताना तिला ते जुने दिवस आठवले , अमित ने शोर जॉब घेण्या पूर्वीचे..... बोटीवरचे.........."मत खेल जल जायेगी केहेती आग मेरे मनकी, मै बंदीनी पियाकी मै संगीनी हूं साजन की..... मेरा खीन्चती है आन्चल मनमीत तेरी हर पुकार"
आणि तिला जुन्या दिवसांच्या अनामिक हुरहूरीने दाटून आलं.
सभागृहात लख्ख दिवे लागले. सगळे प्रेक्षक उठले. अमित रमाला विचारत होता "कुठे हरवलीस? आवडला की नाही कार्यक्रम?"
रमानी होकरार्थी मान हलवली आणि अमितला घट्ट पकडून ती सुरांवर तरंगत , थोडी हुरहूर लागलेली पण खूपशी समाधानी अशी गर्दीतून वाट काढू लागली. शेवटी अमित तिच्याबरोबर होता, तिचा होता. कधीच परत जहाजावर जाणार नव्हता.
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.



