व्युत्पत्ती

पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन- पार्ट २

(पंतांच्या पगडीच्या प्रवासवर्णनावरील पावमिसळकरी प्रतिभावंतांच्या प्रतिसादांनी प्रेरणा पावून पुढचा पार्ट प्रसवला.)

पार्ट २ - पंकजचं प्रेम-प्रकरण

(पूर्वसूचना- पार्श्वभूमीकरिता पहा: पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन)

पंकजला पकडण्यासाठी पंतांसोबत पुण्यात पोहोचलेली पंतांची पोरगी प्राची पंकजला पहिल्यांदा पाहताच पंकजच्या प्रेमात पडली. प्राचीने पंकज, पोलिसांची पकडा पकडी पाहिली. पंकजचा पदपथावरून पोबाराही पाहिला. पानशेतच्या पुराच्या पाण्यामुळे पुनर्वसित पंकज परत पर्णकुटीत पोहोचला.

पित्यासमवेत प्राची पुरंदरला परतली, पण पंतांनी पंकजच्या पाकिटातल्या पैशांबाबत पंक्ति-प्रपंच पाळला. पुष्कळ पैसे पुत्राला पाठवले. पंतांच्या पुन्हा पुन्हा पिडणार्‍या पुराणांच्या पोपटपंचीमुळे प्राची पेटली.

पंकजच्या प्रेमाखातर प्राची पुण्यास परतली. प्राचीनेच पंकजवरच्या पोलिसांच्या पंचनाम्याला पाने पुसली. पंकजला पहायला प्राची परत पर्णकुटीपाशी पोहोचली. पण पर्णकुटीत पहुडलेल्या पंकजचे पाय पळून पळून पांढरे पडलेले! प्राचीने पंकजच्या पायावर पिवळे पुरळही पाहिले.

पंकजची परिस्थिती पाहून प्राण पिळवटलेल्या प्राचीने पदर पाण्यात पिळून पंकजचे पाय पुसले. प्राचीचा प्रथमोपचार पाहून पंकजला पोरगी पसंत पडली. पंकजने प्राचीला पर्णकुटीतच पटवले.

पर्णकुटीतील प्रेम-प्रकरण पाहून पर्णकुटीच्या पायर्‍यांवर पत्ते पिसणारी पोरे पूर्व-पश्चिमेला पांगली. प्राचीने पंकजचे पा़किट पैशांविनाच परतवले. परंतू प्रेमात पारंगत पंकजने प्राचीस पाच पाप्या परतवल्या.

पंतांना परमेश्वर पावला, पण पंकजला पंतांची पायाळू पोर पावली.

- (पटकथा - पुष्कर)

पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन

परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले.

पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्‍या पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा पुरवला.

पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले. पिवळी पगडी पण पकडली. पोलिसांनी पंकजला पोलिसठाण्याकडे पिटाळले. पकडणारा पोलिस पदपथावर पाय पसरून पडला. पोलिस पडलेला पाहून पंकज पाठीवर पांघरूण पांघरून पळाला.

पंतांनी पुरंदरला पोहोचताच पगडीत पंकजचे पैशांचे पाकिट पाहिले. पाकिटातले पुष्कळ पैसे पंतांनी पनवेलला पुत्राला पोस्टाने पाठवले. पंतांच्या पाजी पुत्राने पैशांच्या प्राप्तीतून पोटात पंजाबी पदार्थ पचवले.

पंतांना परमेश्वरच पावला!

-( पटकथा - पुष्कर)

जालावरील संक्षिप्त शब्द

सध्या आपण आंतरजालावर खूप शब्दांची संक्षिप्त रूपे वापरतो.
जसे
१) व्य. नि. / विरोप = व्यक्तिगत निरोप.
२) ह. ह. पु. वा. = हसून हसून पुरे वाट
३) पु. ले. शु. = पुढील लेखनाला/स शुभेच्छा.

यातील काही शब्दांचे पूर्णार्थ माहीत नसल्यास बरेच वेळा प्रतिसादांचा अर्थे समजत नाही.
तरी आपण वापरत असलेले संक्षेप येथे नोंदवावे यासाठी हा धागा सुरु करत आहे.

प्र क टा आ म्हणजे काय?

मजेशीर शब्द

आज काल भाषाशुद्धी-शुद्धलेखन या आणि अशा बर्‍याच विषयांवर बराच काथ्याकुट करुन झाला आहे.
शब्दकोश हा धनकोशापेक्षा वेगळाच आहे! तो वापरल्याने मोठा होतो आणि नुसताच ठेवून दिला तर त्याचा र्‍ह्सा होतो, हाच धागा पकडून ऐक नविन चर्चा पुढे चालू करु.

मिपावर फक्त पश्चिम महाराष्ट्रातले नसून जगातल्या विविध भागातले सदस्य आहेत / गेलेत. चला तर मग आपला शब्द संग्रह वाढवूया. पण अट ऐकच वाद नघालता नव नविन आणि गंमतशीर शब्द सांगायचे आपल्या प्रांतातले
( तात्या अशी चर्च्या यापुर्वी झाली असल्यास लीखकाच्या संमती शिवाय विषय काढुन टाका)

सुरवात मी करतो
शासकीय कामानिमीत्य काही महिन्यांपुर्वी विधान-सौधा (बेंगळूरु) येथे जाण्याचा (जेवण्याचाच म्हणाना) योग आला. बरीच वेळ चर्चा झाल्या नंतर तत्कालीन मुख्यमंत्री कुमारस्वामी महोदय आले, तिथेच आमच्या चर्चांना पुर्णविराम मिळाला आणि त्यांच्या कन्नड भाषणाला सुरवात झाली (त्यांना ईंग्रजी येत नसावे बहुतेक)
काय बोलले राव ! अधी आदर आणि मग हसु यायला लागलं मला. शब्दच कळेनात मला आणि मी ते मराठी शब्दांना जुळवले. अगदी शाळेत करतो ना तसचं जोड्या जुळवा / गाळलेल्या जागा भरा ईत्यादी.
पण आता अर्थ लागलेत त्यांचे ते असे-

गळू - लोकहो / जनहो (आदरार्थी बहूवचनी संबोधन) ऊदा : यलार सल्लागार गळू - सर्व सल्लागार लोक
हागु - आणि / तसेच (ऊभयान्वयी शब्द)
भंगार - सोने
कुंडी - ढुंगण
सोप्पु - पालेभाजी
मेले / मेलगडे - वर , केळे / केळगडे - खाली
केळी - विचारा
हेळी - सांगा
हळ्ळी - गाव, पाळ्या - भाग (देवन हळ्ळी, कद्रेनहळ्ळी, मरीयप्पन पाळ्या, कळासी पाळ्या)

भाषाशुद्धी, जडजंबाल लेखन, मराठी भाषेचे मूळ

भाषाशुद्धीकरण आणि जडजंबाल लेखन : मंगेश विट्ठल राजाध्यक्ष यांचे निवडक उतारे.

मराठीतली भाषाशुद्धीकरणाची चळवळ या शतकाच्या चौथ्या दशकात सुरू झाली. काही काळ तिने आवाज केला. पुढे तो थंडावत गेला. दरम्यान या चळवळीला पुरस्कर्ते आणि अनुयायी लाभले ते संख्येने मर्यादितच होते. उच्च जात, आणि उच्च नसले तरी त्याच्या जवळपासचे शिक्षण, या दोन प्रमुख मर्यादा. सर्वसाधारण लोकात तिचे हसे झाले. शुद्धीकृत भाषेची विडंबने झाली. तिला अनुयायांपेक्षा पुरस्कर्तेच अधिक लाभले Smile म्हणजे अशा शुद्धीकरणाचा तात्त्विक पुरस्कार करणारे. 'तशा' भाषेत आपले लेखन करणारे फार थोडे होते. शेवटी आपले लेखन ज्यांच्यासाठी त्या लोकांना ते कितपत समजेल ही शंका आड आली असणार. पण भाषाशुद्धीकरणाची चळवळ थंडावली, तिचे उघड उद्योग संपले, तरी आपल्या स्वातंत्र्यचळवळीच्या भाषेत ती 'भूमिगत' झाली. परिणामी ती कीड लागल्या प्रमाणे पसरली. बर्‍याच लेखनाच्या मुळांना ती कीड लागली. अनेकदा त्या लेखकांच्या नकळत! आणि 'शिष्ट' लेखकांमुळे ती लागण स्वत:ला लेखक न समझणार्‍या वाचकांपर्यंत पोचली. कृत्रिम, अर्थहीन आणि जडजंबाल लेखन त्यांना तसे वाटेनासे झाले. आपल्या भाषेबाबतची संवेदनाच क्षीण झाली आणि ती पुढे नष्ट झाली.

या भाषाशुद्धीचळवळीचे प्रणेते त्या काळी नावामागे बॅ. हा बॅरिस्टर या इंग्रजी पदवीचा संक्षेप लावणारे आणि आता 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी लावले जाणारे वि. दा. सावरकर. या भाषाहोमात भस्म करायचा संकल्प होता तो मराठीत आलेल्या फारसी व इंग्रजी शब्दांचा. या संकल्पामागची चेतना राजकीय होती, तशीच ती धार्मिकही. पण राजकीयपेक्षा मुख्यत्वे धार्मिक. एक तर इंग्रजी शब्द लेखनात येत ते तुलनेने फारच थोडे. फारसी कुळीतलेच फार. आणि इंग्रजी शब्द जेमतेम शतकभरात आलेले तेवढेच. मात्र फारसी शब्द कित्येक शतके ठाण मांडून बसलेले. अगदी शिवशाहीपूर्वीपासून. आणि एवढे एकजीव झालेले की तीक्ष्ण नाकाचे व्युत्पत्तिशोधक सोडल्यास ते शब्द परके आहेत याचा वाचणार्‍यांना, लिहिणार्‍यांना, वापरणार्‍यांना संशयदेखील येऊ नये.

पण ही शुद्धीकरणाची चळवळ जोरात आल्यावर काही घ्राणेंद्रिये (म्हणजे देशी भाषेत नाके) अधिकच तिखट झाली. आणि हाय खाल्लेल्या म्लेंच्छ सैनिकांना जळीस्थळी संताजी व धनाजी दिसू लागले तशी या शुद्धीसैनिकांना म्लेंच्छ व यवनी शब्द दिसू लागले. या सर्वच सैनिकांना भाषाशास्त्राची तालीम (हा देखील एक म्लेंच्छ शब्दच) मिळालेली होती असे नाही. तिची भरपाई करायला भाषाभिमान समर्थ होता!

पुढे आपले एक मोठे कवी माधव जूलियन यामध्ये उतरले. फारसीचा
विटाळ झालेल्या अनेक कविता त्यांनी संस्कृतच्या फवार्‍यांनी सोवळ्या करून घेतल्या. याशिवाय भाषाशुद्धीकरणाचा प्रचारही केला. मात्र पुढे १९१७ मध्ये त्यांनी आपल्या एका पत्रात लिहिले "संस्कृत शब्दांची निष्कारण गर्दी निषेधार्ह आहे. या लोकांना संस्कृत भाषा अवगत असावी. पण स्वत:च्या मराठी भाषेशी नीट परिचय नसावा याची कीव येते! बोलीतील सुलभ शब्दांकडे आपले दुर्लक्ष होते." १९२१ साली त्यांनी "प्रत्येक मराठी शब्दाचे संस्कृतशी नाते जोडण्याचा मूर्खपणाचा प्रयत्न धिक्कारला."

अर्थात हे शुद्धीकरणाचे खूळही संपूर्णत: देशी नाही! साहेबाला त्याने आधी पछाडले होते. पहिल्या महायुद्धानंतर, इंग्रजीतील 'नेटिव' (ऍंग्लो सॅक्सन कुळातले) शब्द कटाक्षाने वापरून फ्रेंचद्वारा आलेल्या लॅटिन कुळीतल्या व तशा शब्दांना नाकारायचे अशी टूम निघाली होती.
भाषा साधी सोपी करावी हा त्यामागचा हेतू. आपले शुद्धीकरण मात्र त्याच्या अगदी उलट जाणारे.

भाषाशुद्धीचा हा आग्रह प्रामुख्याने हिंदीच्या प्रगतीलाही भोवला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीय व्यवहाराला सोयीची
म्हणून वापरल्या जाणार्‍या इंग्रजीचा वरचष्मा उतरवण्यासाठी तिच्याजागी कोणती भाषा आणायची असा प्रश्न पडल्यावर संख्याबळाच्या आधारावर हिंदीची वर्णी लागली. पण कोणती हिंदी? गांधीजींचा कौल पडला साध्या सोप्या 'खडीबोली'च्या बाजूने
. मात्र पंडित मालवीयांसारख्या काही पुढार्‍यांच्या हिंदीच्या पुनरुज्जीवनवादी संस्कृतीकरणामुळे, तापलेल्या धर्मनिष्ठेमुळे. भावी सत्तेच्या गाजरामुळे, संस्कृतचे रंगरोगण केलेल्या हिंदीची घोडदौड सुरू झाली. सत्ता आल्यावर हिंदीच्या उद्धारासाठी पैशांची लयलूट झाली. इतर भाषांच्या वाट्याला कंजूष भिक्षा आली.

डॉ. कालेलकर यांच्या 'भाषा आणि संस्कृती' या विद्वत्ता, स्पष्टवक्तेपणा आणि विषयोचित विनोद यांच्या मेळाने फार वाचनीय झालेल्या पुस्तकातील काही वाक्ये इथे देतो. "इंग्रजीपेक्षाही कठीण अशी ही शुद्ध नवमराठी कित्येकदा इतकी दुर्बोध आहे की ती कळण्यासाठी ती ज्या मूळ इंग्रजीचे भाषांतर आहे तिकडे वळल्यावाचून गत्यंतर नसते... लोकांच्या माथी एक अगदी नवी, बोजड भाषा मारण्याचा जो प्रयत्न झाला तो फसला... 'सरकार' हा शब्दच पाहा. कोट्यवधी लोक अगदी सहजपणे हा शब्द वापरतात. मात्र त्याच्या जागी संस्कृतातून आलेला 'शासन' हा शब्द! मग त्याला साथीदार म्हणून 'शासकीय' 'प्रशासनिक' हे शब्द... 'सरकारी छापखाना' असे म्हणताच अंगावर सांडपाणी पडले असे वाटणार्‍या लोकांनी 'शासकीय मुद्रणालय' हा शूचिर्भूत पवित्र प्रयोग चालू केला आणि मराठीपासून सामान्य जनता कशी दुरावेल याची काळजी घेतली.

भाषेच्या बाबतीत शुद्धीकरण ही शास्त्रबाह्य कल्पना आहे. धर्माभिमान, खोटा स्वाभिमान, उच्चनीचतेच्या कल्पना... स्वत:ला श्रेष्ट न समजणार्‍या वर्गाची भावना अशा कारणांमुळे लोक शुद्धीकरणाकडे वळतात. "

याउलट गुजरातेतील बडोदे संस्थानात एके काळी मराठी व इंग्रजी या कारभाराच्या भाषा होत्या. त्याऐवजी लोकांची भाषा गुजराती ही कारभारासाठी वापरण्याचा गायकवाडांनी निर्णय घेतला. आणि त्यातील परभाषिक फारसीसारखे शब्द काढण्याचा अडाणी खटाटोप न करता कारभार व्यवस्थितपणे चालला.

पण सयाजीरावांच्या या विचारावर एका शुद्धीकारक मराठी पंडिताने आक्षेप घेतला म्हणे: "गुजराती ही क्षुद्र भाषा! मराठीत मुखकमल, चरणकमल असे म्हणतात. पण गुजरातीत तसे काही नाही!"

मराठी भाषा 'उच्च' करण्याची केविलवाणी धडपड ज्यांनी आरंभली त्यांनी तिला घसरणीला लावले. उदा हे काही शब्द पहा: रेडिओला सांवहिक. वनस्पतिशास्त्राला: औद्भिदशास्त्र. लंबगोलाला: विवृत्ताकृति. 'अवलंबनपर्णोद्गमसूत्र हा जबडातोड शब्द कशासाठी वापरला आहे कोण जाणे! एका विदुषीने Honeysuckle या शब्दाला मधुचोष्यक हा शब्द सुचवला Big Grin

मराठी भाषेचे मूळः

राजाध्यक्षांच्या मतांनंतर 'मराठी भाषेचे मूळ' आणि 'अडगुलं मडगुलं' या थोर पुस्तकांचे लेखक, ज्येष्ठ भाषातज्ज्ञ विश्वनाथ खैरे यांचा मनोगतावर वाचलेला एक प्रतिसाद येथे देतो.

... मराठी व तमिळ या भाषांचा आणि संस्कृतींचा गाढ, प्राचीन संबंध दाखवणं हे या सर्व
लेखनाचं उद्दिष्ट आहे.प्रतीकार्थानं हा संबंध मराठीच्या बाळपणापासून सुरू होतो असं दाखवणारं गाणं म्हणजे बाळाला तीट लावण्याच्या वेळी मराठी आया शतकानुशतके म्हणत
आल्या आहेत ते:
अडगुलं मडगुलं/ सोन्याचं कडगुलं/रुप्याचा वाळा/ तान्ह्या बाळा/
तीट लावू//
तमिळमध्ये अटकु (अडगु) म्हणजे ठेवीची, विनिमयाची किंवा गहाणाची वस्तू. मडक्कू म्हणजे मातीची मोठी थाळी. मट्कलम् म्हणजे मडकं. मण् म्हणजे माती आणि कलम म्हणजे भांडं यावरून तो शब्द आला आहे. 'मडकं मोल म्हणून दिलं किंवा गहाण ठेवलं' असा पहिल्या ओळीचा अर्थ आहे. सोन्नम् म्हणजे सोनं आणि कडगम् म्हणजे कडं. ' मडकं देऊन सोन्याचं कडं घेतलं.' वाळम् म्हणजे गोल किंवा वर्तुळ. इरिप्पु म्हणजे रुपं, 'रुप्याचा वाळा घेतला.' हे दागिने तान्ह्या बाळाला घातले. 'ती' म्हणजे आग, जाळ. तीत्तल म्हणजे करपवणं, काजळणं. तीट्टुतल् म्हणजे अंगाला लावणं. तीत्तु म्हणजे दुष्टावा. 'दृष्ट' लागू नये म्हणून काजळीची तीट लावताना हे सगळे अर्थ एकत्र आले आहेत. तमिळ आणि मराठी समानार्थी शब्द किती सारखे आहेत पाहा.
खैरे विचारतात, "नवतरण्या महाराष्ट्री माउलीने तान्ह्या मराठी बाळाला जी शब्दाभूषणे घातली ती तमिळाईकडून तर घेतली नव्हती?" "होय" असं आत्मविश्वासपूर्ण उत्तर देण्यापर्यंत खैर्‍यांचा प्रवास नजीकच्या काळातच झाला. आणि केवळ शब्दभूषणं नव्हे तर सांकृतिक आभरणंही तामिळाईकडून मिळाली असे पुरावे ते सादर करीत राहिले.ओवी, अंगाई, पोवाडा हे सर्व तमिळमधून आले. ओवीचा चौथा चरण तुटका असतो एवढ्यावरून त्या अर्थाचे संस्कृत शब्द बनवायचे आणि त्याचा अपभ्रंश म्हणून ओवी शब्द सिद्ध झाला हे दाखवायचं असा
खटाटोप प्रस्थापित भाषाशास्त्राला धरून पूर्वीच करण्यात आला होता. प्रा. वेलणकरांनी ती संज्ञा अशी व्युत्पादिली आहे:
'अर्धचतुष्पदी-अठ्ठोठवइ-अड्ढुड्ढवयी-अड्ढूहवई-ढूहवई-हूहवई-होवई-ओवाई-ओवी. डॉ. कत्रे यांनी अपपादिका-अववाइआ-ओवैया-ओवी अशी परंपरा सांगितली."संस्कृतवरून व्युत्पत्ती काढायची म्हटल्यावर असा द्राविडी प्राणायाम करावाच लागतो" अशी यावर खैरे यांची टिप्पणी आहे. सरळ द्रविड भाषेकडे गेलं तर काय दिसतं? ओवीचा चौथा चरण तुटका ना? तमिळ ओऽवाय म्हणजे दात नसलेलं तोंड, तुटक्या काठाचं भांड. शिवाय 'ओवि' म्हणजे ध्वनी, आवाज. बाळ झोपताना ओऽ ओऽ करतं. त्याच तालावर आई त्याला ओऽ ओऽ करीत पटते. आवाहन करणारा हा आईचा मराठी ओऽ आहे. आजही मराठी गुराखी ओढाळ गुरू लांब गेलं तर ओऽ ओऽ करून त्याला ओवई किंवा ववई घालतो. (हे ग्रामीण बोलीचे महत्व. अशी अनेक उदाहरणे पुढे येतात.)छे, इश्श, अय्या हे उद्गार तमिळ.खंडोबा, त्याचा येळकोट, विठ्ठल, गोंधळ, तुळजाई, बोल्हाई, काळूबाई, फिरंगाई हे सर्व तमिळ.शेंडी पासून क्रमाने डोई, डोळा, पापणी, मिशी, ओठ, मोहरा, हात, पोट, स्त्रीयोनीचा मराठी शब्द, गुडघा, नडघी, घोटा, बोट हे सर्व तमिळ. 'तात्पर्य, शरीरवर्णनात आपण मराठी भाषिक नखशिखांत तमिळ आहोत.' शरीरवर्णनाचे शब्द हे भाषेतील प्राथमिक शब्द असतात हे या संदर्भात लक्षात ठेवणं योग्य होईल.चूलमूल, नातीगोती, भाजीपाला, स्वैपाकाचे पदार्थ, शेतीची अवजारे यांच्याशी संबंधित असलेले मराठीतील शब्दही तमिळ.
महाराष्ट्रातील स्थळनामांच्या अर्थाचा उलगडा तमिळवरून होतो हे द्रविड महाराष्ट्र या पुस्तकात दाखवले आहे. मुंबई, परळ, चेंबूर, वसई, वाशी, पुणे, वानवडी, येरवडा, थेऊर, जेजुरी, खंडाळा, जुन्नर, इत्यादी. मुठा, मुळा, उल्हास या नद्याही. उल्हास नदीच्या नावात उल्ह म्हणजे 'पल्ला मासा', जो केवळ याच नदीत सापडायचा. (आता प्रदूषणमुळं सापडत नाही.)मराठी वाचकांसमोर हे पुरावे मांडत असताना, दक्षिणी भाषाभ्यसकांपुढेही त्यांना भावतील असे तमिळ-मराठी संबंधांचे पुरावे इंग्रजी निबंधांतून खैरे सादर करीत आले आहेत. निर्णायक वाटावा असा पुरावा 'टोवर्डस इंडियन फोनॉलजी अँड लिंग्विस्टिक्स' या त्यांच्या निबंधात पहायला मिळतो. दक्षिणी भाषांच्या व्युत्पत्तिकोशाच्या दोघांपैकी एक संपादक एमेनो यांनी १९७० साली द्रविडियन कंपॅरेटिव्ह फोनॉलजी-ए स्केच या नावाच्या प्रबंधात सुमारे २७५ दक्षिणी शब्दावलीच्या वर्णांची तुलना केली आहे. त्यातल्या जवळ जवळ २६० गटांमधे मराठीतल्या एक ना एक शब्दाची ओळख पटते. त्यातल्या अनेकांच्या ज्या संस्कृत व्युत्पत्ती दिलेल्या आहेत त्या नमूद करून त्यांची कृत्रिमताही उघड केली आहे. अस्सल दक्षिणी म्हणवतात त्यांचे समशब्द मराठमोळे म्हणून वावरताहेत हा केवळ योगायोग म्हणता येणार नाही.पण अगदी बिनतोड पुरावा हवा असेल तर तो पुढचा आहे. जे आपल्याला 'अस्सल मराठी' वाटतं त्याला आपण 'मराठमोळं' म्हणतो. अस्सल मराठी भाषेला आपण 'मराठमोळी' म्हणतो. तमिळ मर्रा (जो मराठीत मर्‍हा होतो) म्हणजे न झाकलेलं, उघडं किंवा स्पष्ट. 'मर्‍हाटाचि बोलु'! ज्ञानेश्वरीमधे बावीस वेळा हा शब्द आला आहे. आणि त्याचा हाच अर्थ असल्याचे खैर्‍यानी एका निबंधात दाखवून दिलं आहे. मोळि म्हणजे बोली, भाषा...

भाषाशुद्धी, शुद्धलेखन, मते-मतांतरे वगैरे वगैरे...

शुद्धलेखन, भाषाशुद्धी इ. इ. संदर्भात मिसळपाव वर चाललेल्या वेगवेगळ्या चर्चा लक्षात घेता बरीचशी मते पूर्वग्रहदूषित आहेत हे मला जाणवते. एकीकडे शुद्धलेखनाचा आग्रह नको म्हणताना दुसरीकडे मात्र रुळलेल्या फारसी, इंग्रजी शब्दांऐवजी मात्र सहज वापरता न येण्याजोगे शब्द सुचवणे असा विरोधाभास इथे दिसतो. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून खालील काही प्रश्न्नांची उत्तरे स्वतःशी पडताळून पहावीत.
१) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का?
२) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का?
३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का?
४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का?
५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का?
६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? )
७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय?
८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का?
९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का?
१०) तुम्ही काल घरी फोन केला होता का?
११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का?
१२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ'

उपहासात्मक प्रश्नांची सरबत्ती करायची झाल्यास अनेक प्रश्न आहेत. वव्यवहार म्हटल्यास कमी प्रश्न आहेत. कळीचा मुद्दा हा की तुम्ही मांडलेल्या मतांशी तुम्ही कितपत प्रामाणिक आहात याचा.

म्हणी व वाकप्रचार यांचा उगम (२).

म्हणी आणि वाक्प्रचार ही मराठी भाषेतली आभुषणं आहेत. जे कधी कधी १० वाक्यांतूनही मांडता येत नाही ते एका म्हणीने वा वाक्प्रचाराने साधता येतं.काही म्हणींना ग्रामिण भाषेचा डौल आहे . बर्‍याच म्हणींत यमक जुळवलेली आसतात. तर काही इतक्या विनोदी पटकन ओठांवर हसु आणतात.
काही म्हणी अपभ्रंश होत होत बदलल्या गेल्या, आशाच एका बदलल्या म्हणीची कथा मागच्या भागात सांगितलिच आहे, आता ही दुसरी पाहा .....

काना मागून आली नि तिखट झाली. मुळ म्हण आहे पाना मागून आली नि तिखट झाली.

मिरचीच्या रोपाची जरा जास्त निगा राखावी लागेते, जरा पाणी जास्त झाल तर ती मरतात. त्यामुळे जेव्हा शेतकरी जेव्हा मिरचीचा रोप लावतो तेव्हा तो त्या रोपांची खुप काळजी घेतो. नियमित पाना फुलांची पाहणी करतो. त्यांची वाढ नीट होतेयना या कडे बरच लक्ष असतं. वास्तविक रोपाला आधी पानं फुलं नि सगळ्यात शेवटी फळं लागतात पण एकदा का फळं (मिरची) लागली कि मग त्यांचच कवतिक जास्त.... . तिला हातात घेउन तिचा रंग कसा आहे? आकार कसा आहे? तिला काही रोग नाहीना लागला? ईत्यादी......
त्यामुळे मागाहून आलेल्या या मिरची मुळे त्या पाना फुलांचा मात्र रागाने तिळपापड होतो.
मुळातच तिखटपणा हा मिरचीचा गुणधर्म त्यामुळे ही मिरची पाना मागून आली नि तिखट झाली.

घाटपांडे काकांनी मागच्या भागात एक म्हण दिली होती. ज्याच्यासाठी लुगडं त्येच उघडं.

माझ्या आजीच्या तोंडुन ही म्हण बऱ्याच वेळा ऐकली आहे. पुर्वी बायकांत नऊवाऱ्या साड्या नेसायच प्रमाण बरच होतं. नऊवारी म्हटल तर सगळ्यात लांब-लचक वस्त्र. पण बऱ्याच जणी ती नऊवारी आश्या विचित्र पणे घालत की पोटऱ्या सताड उघड्या. (सगळ्याच नऊवारी नेसणाऱ्या काही पोटऱ्या उघड्या टाकत नाही म्हणा उदा. : तमाश्यातल्या 'लावण्य'वती.) त्यामुळे कदाचीत ही म्हण पडली असावी.

कुर्‍हाडीचा दांडा गोतांस काळ. याची काही गोष्ट आहे का माहीत नाही. पण याची व्युत्पत्ती अशी असावी की कुर्‍हाडीचा दांडा हा लाकडाचा असतो. आणि झाड तोडतांना हाच दांडा आपल्याच गोतांवर (गणगोत = नातेवाईक) गदा आणतो.

अगं अगं म्हशी मला कुठ नेशी..
का कुणास ठाउक पण ही म्हण आठवली लाहानपणा पासून एक काल्पनीक चित्र डोळ्या पुढ उभ राहत. मस्त गावातला हिरवागार माळ आहे. माळावर म्हैशी मजेत चरतायत. तेवढ्यात एका उधळलेल्या म्हशीची शेपटी दादा कोंडकेंनी पकडली आहे. आणि ते हे वाक्य त्यांच्या तोंडी आहे.
असो तर या म्हणीची ही कथा.....

एकदा एक माणुस त्याच्या सासुरवाडिला गेला होता. तिकडे त्याचे बायको बरोबर जाम कडाक्याच भांडाण झाल. आख्खं गाव गोळा झालं. रागाच्या भरात नवरोबा बोलले कि मी परत या गावत पाय ठेवणार नाही. चार दिवस गेले, याला बायकोची आठवण यायला लागली. पण आख्या गावा समोर बोलून चुकलेला, त्यामुळे काही बाही कारणं शोधू लागला. मग त्याला एक कल्पनेची आयडिया सुचली. संध्याकाळी जेव्हा गाई गुरं माळावरून गावाकडे परतत होती तेव्हा एका म्हशीची शेपटी घट्ट पकडून तिच्या मागोमाग चालु लागला, जणू काही ती म्हैसच त्याला ओढतेय.. नि हा लागला बोंबलायला अगं अगं म्हशी........

खुप म्हणी झाल्या नै, आता ह्या वाक्प्रचाराची उत्पत्ती पाहू...

तागास तुर लागू न देणं. (लहान असताना मी ताकास तुर म्हणायचो कारण कानावर तसच पडायचं. पण आता कळल कि हे तागास आहे.)

आपला भारत हा शेतीप्रधान देश (होता?). शेतकरी खरिप आणि रब्बी पिकां बरोबरच आंतर-पिकही ध्यायचा (हल्ली हे माहिती तंत्रज्ञांचच पिक निधतय ती गोष्ट वेगळी) आता आंतर पिक म्हणजे जे मुख्य पिका बरोबर घेतल जात पण मुख्य पिकाला त्रास न होउ देता. आशी काही पिक आहेत कि जी जोडी जोडी ने घेतली तर जमिनिचा कस पण वाढतो. तर ताग आणि तुर ही आशीच एक जोडी. जर तागाच्या प्रत्येक २ फुटांच्या सरिंच्या मध्ये तुर नीट पेरली तर ही दोन्ही पिके चांगली येतात. एक कुशल शेतकरी ताकास तुर लागू देत नाही.

या वाक्प्रचाराचा भावार्थ आसा की इतक्या हुशारीने वागणं की बाजुच्याला जराही अंदाज न येउ देणं.

आकांड तांडव करणे.
हा वाक्प्रचार एकदम सरळ आहे . तांडव हे शिव-शंकरच नृत्य हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. बच्चा बच्चा जानता है. क्रोधिष्ट होउन शंकरान तांडवनृत्य केलं नि तिन्ही लोक हादरले हे आपण पुराणात वाचलय. तर आकांड तांडव करणे म्हणजे थैमान घालणे. घर डोक्यावर घेणं.
पण मग ह्या आकांडचा अर्थ काय बर? मला वाटत बहुदा ते अखंड आसाव. (शंकरान अखंड तांडवनृत्य केलं आणि तिन्ही लोक जेरिस आणले) जाणकार मंडळींनी कृपया यावर प्रकाश टाकावा..

ता. क. : लेको ह्ये मुद्दाम काथ्याकुट भागात टाकल है. आमालाबी तुम्च्या कडच्या ष्टोर्‍या सांगा की.....

गावांची नावं

काही गावांची नावं विचित्र असतात. ती कशी पडली असावीत असा प्रश्न पडतो. काही दिवसांपूर्वी एक फार चांगलं पुस्तक वाचनात आलं. गिरीश कुबेर यांचं 'हा तेल नावाचा इतिहास आहे' या नावाचं. त्यात इंधनाच्या तेलाच्या इतिहासापासून सध्या त्यावरून सुरू असलेले राजकारण याचे अतिशय माहितीपूर्ण आणि मुख्य म्हणजे रंजक भाषेत विवेचन केले होते. त्यात एक छान माहिती मिळाली. आसाममध्ये असलेल्या दिग्बोई या गावाचे नाव कसे पडले याविषयीची. या भागातून गेलेल्या हत्तीच्या पायाला तेल लागल्याचे ब्रिटिश अधिकार्‍याला कळले. त्याने त्या भागातील खोदकामाचे हक्क हाती घेतले. मग खोदायला सुरवात झाली. खोदायला अर्थातच स्थानिक माणसे ठेवली होती. तो अधिकारी त्यांना 'डिग बॉय, डिग बॉय' (खण अशा अर्थी) असे म्हणायचा. त्याचेच पुढे डिग्बॉय व दिग्बोई असे पडले. अशी काही माहिती तुमच्याकडे असेल तर जरूर सांगा.

भाषा आणि प्रमाण

गेल्या काही दिवसांपासून(ण) मिसळपाव वर शुद्धलेखन(ण) आणि(न) प्रमाण(न) भाषेचा जयघोष चालला आहे. काय आहे हो ही प्रमाण(न) भाषा? प्रमाण कशासाठी हवं? आणि प्रमाणा(ना)चं प्रमाण किती असावं?

'चामुंडराये करविले' श्रावणबेळगोळच्या (हे कर्नाटकात आहे) गोमटेश्वराच्या पायाशी दगडात कोरलेलं पहिलं मराठी वाक्य. त्याकाळी मराठीला प्राकृत म्हणत असत. त्यानंतर आमच्या अमृतातेही पैजा जिंकणार्‍या मराठीत 'ज्ञानेश्वरी' लिहिल्या गेली. सुरुवातीला मराठीत पद्य रचनाच लिहिल्या जायच्या. लिहायला कमी जागा, गेयता असल्यामुळे सहज मुखोद्गत होत असत आणि सहज प्रसार होई. किती तरी काळ पद्य हाच साहित्याविष्कार होता.

मराठीला गद्य स्वरूप आणि तेही ग्रंथबध्द, असं स्वरूप दिलं ते महानुभावपंथानं. अमरावतीच्या रिध्दपूर नावाच्या खेड्यातून हा मराठी साहित्याचा प्रवास सुरू झाला. आज तो एवढा फोफावला आहे की, मराठी का शिकावं तर मराठी साहित्य वाचण्यासाठी असं सुद्धा म्हणू शकतो, (भा. नेमाडे याच्याशी असहमत असतील कदाचित, अजानुकर्णा !) पण हे खरं आहे की मराठीत अतिशय उत्तम साहित्य निर्मिती झाली आहे. होते आहे.

मराठी सामान्य लोकांची भाषा आहे. तिचं खरं रूप मर्‍हाटी असं आहे. सातवाहन,राष्ट्रकुट, यादव, वाकाटाक, त्यानंतर मुघल आदी राजवटींत तिचा प्रवाह चालत राहिला आहे. सामान्य जनतेइतका तिचा वाली कुणीच नव्हता. अनेकानेक भाषेसोबत तिचा संकर झालेला आहे. कित्येक भाषेतील शब्द अगदी बेमालूमपणे मराठीत सामील झालेले आहेत.या 'बे' ला जाड करण्याचे कारण असे की असा समोर 'बे', 'बद' लावण्याचा प्रघात मराठी नाहीये हे लक्षात यावं.

पुढे मराठी राजवट आली, छत्रपती शिवाजी महाराजांना असं वाटलं की स्वराज्य सामान्य माणसाचं आहे . राज्य कारभार त्याच भाषेत व्हायला हवा. सामान्य माणसाला समजायला हवं की कारभार कसा होतो. खरोखर जाणता राजा. त्यावेळी एक राजभाषा कोश तयार करण्यात आला. मराठीला बोलीतून भाषेत आणि त्यातही सरकारी कामकाजाच्या भाषेत नेण्याचा हा सर्वात प्रभावी उपाय होता. कित्येक शतकानंतर भारतात कुठल्या स्वतंत्र छत्रपतीची राजमुद्रा फारसीत नसून संस्कृतात उमटली होती. हे सर्व करण्या मागचा उद्देश काय असेल हो? लोकांना नवी भाषा शिकवणं की लोकांना कुठल्याही मंचावर आपल्याच बोलीत व्यक्त होण्याचा आत्मविश्वास देणं? यावर थोडा विचार करू व नंतर पुढे जाऊया.

मराठे, पेशवाई खरं तर पेशवाईचा पुर्वाध आणि उत्तरार्ध असं म्हणायला हवं. पेशवाईत बखरी लिहिल्या गेल्या, आपल्या स्वामींचा पराक्रम गाण्यासोबतच आता अतिरंजित लिहिणं सुरू झालं होतं असो, पण मराठी लिहिणं सुरू झालं होतं. पुढे पेशवाई बुडली. महाराष्ट्रात इंग्रजी राज्य सुरू झालं. हे नेमकं कधी झालं असावं?

बरं मला आणि एक प्रश्न पडतो की महाराष्ट्रात इंग्रजी राज्य सुरू झालं म्हणजे कधी? १८५३ ला जेव्हा वर्‍हाड प्रांत निजामापासून काढून इंग्रजांनी कायम आपल्या कारभारात सामील केला तेव्हा? की मुंबईला जेव्हा इंग्रजांनी आपला कारभार सुरू केला तेव्हा? वसईचा तह झाला तेव्हा ? की पुण्याच्या शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकला तेव्हा?

तर याचं उत्तर असं देता येईल की सार्वभौम मराठी सत्ता १८१८ मध्ये संपली, त्यानंतर उरला तो मांडलिकांचा कारभार, संस्थानं,जी खालसा झाली ती परत मिळवण्यासाठी लढली. जी खालसा झाली नाहीत ती आहे त्यात सुख मानायला लागली.

या टप्प्यानंतर आता पर्यंत मराठीला किंवा एकूण भाषेलाच कामात येणारं असं स्वरूप होतं. भाषेतून गद्याविष्कार अजूनही तेवढा पचनी पडलेला नव्हता. पेशवाई गेल्यानंतर जे राजकारणी होते किंवा ज्यांना सत्ता केंद्रात राहायची सवय पडली होती असे, किंवा त्याही पेक्षा अचूक वाक्य असे की ज्यांना येत्या काळाची पावले ओळखता येत होती अश्यांनी ताबडतोब इंग्रजीची कास धरली. इंग्रजी वाचन सुरू झालं .

अचानक नव्या जगाची ओळख झाली. हे... हे... सारं आमच्या भाषेत यायला हवं... आमच्या लोकांना कळायला हवं. ही कळकळ वाटायला लागली. १८३२ ला मराठीतील पहिलं वृत्तपत्र सुरू झालं नावही सुंदर होतं 'दर्पन'.

यानंतरचा इतिहास सर्वज्ञात आहे. ज्याही पुढार्‍याला , समाजसुधारकाला आवश्यक वाटलं त्याने आपला विचार लोकांपर्यंत नेण्यासाठी वृत्तपत्र काढले. लोकांना समजावं, आपला विचार त्यांच्यापर्यंत पोहोचावा. त्यासाठी वृत्तपत्र काढलं. वाचक वर्ग कोण यावरून ठरायचं की भाषा कुठली असावी. 'केसरी' मराठीत होता तर 'मराठा' इंग्रजीत.

थोडं घाईत पुढे जाऊया, १९५६ ला भाषिक आधारावर राज्यनिर्मीती व्हावी असं म्हणून पोट्टी श्रीरामलु यांनी उपोषण सुरू केले. मागणी होती स्वतंत्र तेलगू भाषिक आंध्रप्रदेशाची. त्यांचा उपोषणात मृत्यू झाल्यावर आंदोलन पेटलं, अजिबात इच्छा नसताना नेहरूंनी या मागणीवर विचार करण्यासाठी 'फाजल अली आयोग' नेमला. त्यांनी काही भाषेंसाठी अनुकूल मत दिलं व त्यांची निर्मिती झाली. मराठीसाठी मात्र अशी काही योजना करण्यात आलेली नव्हती. मुंबई हे मराठी आणि गुजराती द्वैभाषिक राज्य कायम ठेवण्यात आलं होतं. म्हणजे मुंबई+कोंकण+प.महाराष्ट्र+गुजरात आदी मिळून मुंबई राज्य(इलाखा) होता. मग मराठी जनमानस पेटलं. संयुक्त महाराष्ट्र बनावा. त्यासाठी वर्‍हाड घ्यावा मध्य प्रदेशातून, मराठवाडा घ्यावा हैदराबादजवळून , खालून बेळगाव घ्यावे निपाणी - कारवार घ्यावे, मुंबई तर आपल्या हक्काची आहेच. आंदोलन पेटले आणि शेवटी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. हा निर्मिती वृत्तांत सुद्धा खूप छान आहे. 'कर्‍हेचं पाणी' वाचल्यास सविस्तर कळेल.

हा सगळा इतिहास कशासाठी? हे एवढं पल्हाड कशासाठी? तर मराठी ज्यांच्या साठी आधी पुण्याच्या एका पेठेत सुरू होऊन दुसर्‍या पेठेत संपायची आणि आज सुद्धा ज्यांचा महाराष्ट्र पुण्यात सुरू होऊन मुंबईत जाऊन संपतो त्यांना मराठी आणि महाराष्ट्राचं स्वरूप, व्याप्ती आणि थोडा इतिहास कळावा तरी.

अर्थात हा एवढासा लेख काय मराठी बद्दल सांगेल? पण काहींची उत्सुकता तर चावळल्या जाईल ना?

तर अशी ही जनसामान्यांच्या स्वाभाविक भावनाविष्कारातून बनलेली मराठी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या स्वरूपात बोलल्या जाते, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोल्हापूर, प. महाराष्ट्र आदी वेगवेगळ्या जागी बोलण्याची पद्धत , बोलण्याचा स्वर ( हेल) वेगवेगळा आहे. तुम्हाला त्या बोलीचा सराव नसेल तर बोलणे सोडा पण जे ऐकतो आहोत ते मराठीच आहे का असा प्रश्न पडावा. एवढं ते नवीन वाटू शकतो.

महाराष्ट्र व्हायच्या आधी एक ठीक होतं की आपण विखुरलेले होतो. आता मात्र आपण एकभाषक बांधव म्हणून लढा दिला होता. मराठी सारा एक आणि चांद्या पासून बांद्यांपर्यंतच्या घोषणा दिल्या होत्या , त्यामुळे सर्वांना मान्य असेल आणि लेखनाचा अर्थ सर्वांना कळावा या उद्देश्याने ह्या प्रमाण भाषेचा किंवा भाषेला प्रमाण देण्याचा प्रयत्न झाला आहे.

म्हणजे मराठीची एक बांधणी ठरवण्यात आली. सर्वांनी मिळून लिखाणात, साहित्यात, वर्तमानपत्रात तिच वापरावी असे ठरले. यामुळे लिखाणाची अर्थनिश्चिती कायम झाली. एक सारखं लिहिणं सुरू झालं.

अर्थात या प्रमाण भाषेत पुणेरी भाषेचा जास्त भरणा झाला. सुरुवातीला आणि आताही मराठी साहित्य निर्मितीचे केंद्र हे पुणे असायचे/ आहे. त्यामुळे येथे लिहिलेले प्रमाण मानले गेले आहे.

मराठीसाठी शुद्धलेखनाचे काही प्रमाणित नियम आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. त्या व्यतिरिक्त शासकीय मराठी हे प्रकरण तुम्ही आम्ही वापरतो त्या प्रमाण मराठीहून थोडेसे भिन्न आहे. मात्र हे शब्द प्रमाण आहेत आणि हे नाही असं काही प्रकरण नसावं.

मराठीला विरामचिन्हे एका इंग्रज अधिकार्‍याने दिले आहेत. ते ही बळजबरीने. सुरुवातीच्या काळात मराठी ग्रंथ हस्तलिखित असत. मराठी मुद्रणाला सुरुवात झाली ती ख्रिश्चन मिशनरी महाराष्ट्रात आल्या नंतर. त्यांनी बायबल मराठी आणण्याचा प्रयत्न केला. पहिला मराठी छाप हा असा तयार झाला. जागा श्रीरामपूर येथे ( हे कदाचित बंगाल मधील असावं असा अंदाज आहे.)

तर मराठीचं व्याकरण सुद्धा असं संस्कृतवर आणि इंग्रजीवर आधारित आहे. अश्या आपल्या मायबोलीचे आपण शुद्धलेखनाचे नियम ठरवलेले आहेत. कोल्हापूर कसे लिहावे व कोल्हापुरास कसे लिहावे? तत्सम आणि देशी शब्द कसे लिहावे , मि नको तर मी हवा आदी..

हे सगळं करण्यामागची भूमिका फार छान होती की आम्ही सगळे एक तर आमचा आविष्कार सुद्धा जवळपास सारखाच असेल ना? मग एकाचं लिखाण वाचताना त्याच्या मनातील भाव-भावना , विचार जसेच्या तसे वाचणार्‍या पर्यंत पोहोचाला हवेत. लिखित मसुद्याचे अनेक अर्थ निघायला नकोत , गोंधळ व्हायला नको हीच या प्रमाणीकरणामागे मूळ प्रेरणा. सर्वांनी हे प्रमाणीकरण मान्य करण्यामागे सुद्धा हाच तर्क.

लेखन सहज व्हावं आणि इतरांना समजावं म्हणून तयार करण्यात आलेलं हे प्रमाणीकरण मात्र आपण बोलतो त्या भाषेशी जास्त जुळतं असं काहींच्या लक्षात आलं. आणि झालं , गोंधळ सुरू झाला. मग पुढे आपल्या प्रत्येक गोष्टीचा अभिमान पाळणार्‍या लोकांचं आपली बोलीच कशी प्रमाण आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू झाला. दुर्दैवाने असाच समज पसरला की पुण्यात बोलली जाते तिच प्रमाण भाषा.

आमचे शालेय पुस्तकं, वर्तमानपत्रं, नियतकालिकं आदी प्रमाणभाषेत काढण्यास सुरुवात झाली. लोकांना सांगण्यात आलं की 'ही' म्हणजे मराठी. आणि तुम्ही बोलता ती 'बोली'. हे इतपत ठीक होतं पण पुढे हे आणखीनंच वाढलं आणि 'ही' म्हणजे 'शुद्ध' मराठी आणि तुम्ही बोलता ती 'अशुद्ध मराठी' , हे अशुद्ध जरा जड जातंय असं म्हणताच मग भाषा आणि बोलींवर लिखाण झालं. प्रमाणित असते ती भाषा आणि भाषा ही शुद्ध असावी नियमांच्या चौकटीत असावी आदी अनेक पंडिती विचार विनिमय झाले.

हळूहळू आमच्यावर असं बिंबविण्यात आलं की विदर्भातील मराठी ना? अहो तिच्यावर हिंदीचा अंमळ जास्त प्रभाव आहे ! आणि मराठवाड्याचा हैदराबादशी जास्त संबंध म्हणून हैदराबादी उर्दूचा जास्त प्रभाव. खरी मराठी पुण्यातच आणि त्यातही मी राहतो त्या पेठेत बोलल्या जाते.

हे जरा जास्तच होतंय असं नाही वाटत? आधी आमच्या भाषेला बोली म्हणायचं नंतर तिला कसं नियमांचं अधिष्ठान नाही हे सांगायचं, आणि शेवटी तर ती अशुद्ध आहे एवढं बोलण्या पर्यंत यांची मजल.

बरं आम्ही बोलतो ते अशुद्ध का? तर ते प्रमाण नाहीये. प्रमाणभाषेत 'असं' सांगितलंय आणि तुम्ही लिहीतांना 'तसं' लिहिता.

ठीक आहे, मी प्रमाण म्हणून ज्याला मान्यता आहे तसं नसेन बोलत कदाचित. पण मी अशुद्ध बोलतो हे कशावरून? मी मराठी बोलत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? तर नाही ...तसं नाही.... अहो तुम्ही हे 'असं' बोललं पाहिजे ( आमच्या सारखं !) , तुमच्या बोलण्यात अनुनासिकं नसतात, किंवा त्यांचे उच्चार पुरेसे स्पष्ट नसतात. तुम्ही वेगळाच हेल काढता. हा आमचा जो हेल आहे ना 'तो' प्रमाण आहे. तुमचं तसं आणि आमचं असं. शेवटी तुमचं कार्टं आणि....

ही अशी सुरुवात होते एखाद्या चांगल्या गोष्टीचे वाभाडे काढण्याची. प्रमाण चांगलेच. मात्र प्रमाण हाच केवळ आविष्कार असावा ही सक्ती का? ही सक्ती जेव्हा अनेकानेक (वेगवेगळ्या) उद्देशांनी केली जाते तेव्हा त्याला विरोध होतो. काही वेळा हा विरोध आपली बोली वाचवण्याच्या हेतूने होते काही वेळा ही आपल्या आविष्काराला दुय्यम म्हटल्याने होतो. आमच्या साहित्य विश्वाला ह्या असल्या वादांची नवलाई नाही. हे आणि असे अनेक वाद मराठीत आहेत.

येथे इंटरनेटवर सध्या कुठे मराठी बर्‍या स्थितीत येतेये. जरा काही मराठीतून शोधायला लागलं तर हिंदी मिश्रीत का होईना काही निकाल येतात. चार पाच मराठी चर्चासत्रे आणि काही स्थिर संकेतस्थळं अशी सध्या मराठी माणसांची 'मराठी' मिळकत. लाखोच्या संखेत मराठी लोक इंटरनेटवर आहेत. इंग्रजीत प्रवीण असल्यामुळे मराठीमुळे त्यांचं काही अडत नाही. मात्र आतलं मराठीपण त्यांना आपल्या भाषेकडे, आपल्या बोलीकडे खेचून आणतं. अश्या स्थितीत कुणाला जर का इंटरनेटवर लिहिल्या गेलेलं सगळं प्रमाण मराठीत हवं असेल तर त्याने आधी त्या विषयी लिहावं. प्रमाण का ? हे सांगावं. आणि कुणी जर का चुकीचं लिहीत असेल तर त्याला प्रमाणभाषेत लिहिणे आवश्यक का आहे ते समजावून सांगावे. त्याला पटलं तर तो ते करेन. नाही पटलं तर नाही. कृपया सांगताना प्रमाण भाषेबद्दल सांगा, शहरात किंवा पुण्यात असं बोलतात म्हणून तुम्ही असं बोला असं नका म्हणू. ते दिवस आता गेले.

प्रमाण हे सर्वांचं आहे. सर्वांसाठी आहे हे लक्षात घेऊया.

इंटरनेटवर प्रत्येकजण जे लिहितो तो त्याचा आविष्कार आहे असं समजून त्याला मान देऊया.

तुम्हाला असं वाटतं की त्यांनी प्रमाणभाषेत लिहावं यामुळे भाषेचा फायदा होईल आणि हीच माझी भाषासेवा, तर समोर या, त्यांना पटवून द्या.

उगाच याआधी कुणी खूप अट्टहासाने माझ्या मराठीला विरोध केला म्हणून आता मी मुद्दामहून अप्रमाण मराठी लिहीन असा हेका सुद्धा योग्य नाही. (मी असं न वागण्याची काळजी घेतो.)

प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत.

पण येथे महाजालावर ज्याला जे आवडते ते करण्याचं स्वातंत्र्य आहे.

मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे.

येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं.

अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच.

------------------------------------------------------------------------------
(टीप एका बैठकीत लेख लिहिलेला असल्याने काही संदर्भ अपुरे आहेत याचे भान आहे. त्याबद्दल क्षमस्व)

नीलकांत

शुद्धलेखन नियम,काय बदल केले पाहिजेत ?

मराठी शुद्धलेखनाची नवी नियमावली तयार करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी त्यांनी एक कृती आराखडा तयारही केल्याची बातमी वाचनात आली. १९६१ ला महामंडळाने शुद्धलेखनाची नियमावली तयार केली. सर्व नियम संस्कृत भाषेला आधार मानूनच करण्यात आले होते. आता आधुनिक काळात मराठी भाषेचा शुद्धपणा आणि मराठी भाषेच्या प्रगतीसाठी नवीन शुद्धलेखनाची नियमावलीची गरज वाटत असावी.संस्कृत भाषेतून आलेल्या शब्दांचा फेरविचार, इंग्रजी आणि हिंदी शब्दांचा अभ्यास आदी प्रमुख सूत्रे डोळ्यासमोर ठेवून नियमावली तयार करण्याचा विचार महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी बोलून दाखविला आहे. त्यांच्या आराखड्याप्रमाणे राज्याच्या विविध भागातील भाषातज्ञांची एक बैठकही झाली आहे. आता दुस-या टप्प्यात अभ्यासक, वाचक, तज्ञ, मुद्रितशोधक, यांच्याकडून सूचना मागविण्यात येत आहेत. -हस्व,दीर्घ, शब्दांसाठी कोणते नियम असावेत.लेखन उच्चारानुसार असावे का ? दंतमूलीय व्यंजनांसाठी एकच चिन्हे वापरावे का ? कोणत्या उच्चारासाठी कोणती चिन्ह असावीत; तसेच देवनागरी लिपीत काही बदल करावे का, याबद्दल सूचना अपेक्षित आहेत. त्यावर महामंडळाच्या बैठकांमध्ये सविस्तर चर्चा होईल. शिवाय मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथे मराठी शिक्षकांसाठी कार्यशाळा होणार आहेत. त्यानंतर नियमावली अंतिम करुन शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. तेव्हा शुद्धलेखनाबद्दल काही उत्तम चर्चा झाली तर सदरील चर्चेची प्रिन्ट काढून अध्यक्षापर्यंत पोहचविण्याचा आमचा मानस आहे.

सध्याचे शुद्धलेखनाचे नियम इथे पाहावेत.

सूचना:- वरील लेखनातील शुद्धलेखनाच्या चुका काढल्यास हरकत नाही, चुका व्य.नि. ने किंवा खरडीत लिहावे, म्हणजे आपल्या सूचनेनुसार त्यात बदल केले जातील.