टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
भाषा
पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन
प्रेषक पुष्कर ( शुक्र, ०७/११/२००८ - १८:३४) .परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले.
पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्या पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा पुरवला.
पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले. पिवळी पगडी पण पकडली. पोलिसांनी पंकजला पोलिसठाण्याकडे पिटाळले. पकडणारा पोलिस पदपथावर पाय पसरून पडला. पोलिस पडलेला पाहून पंकज पाठीवर पांघरूण पांघरून पळाला.
पंतांनी पुरंदरला पोहोचताच पगडीत पंकजचे पैशांचे पाकिट पाहिले. पाकिटातले पुष्कळ पैसे पंतांनी पनवेलला पुत्राला पोस्टाने पाठवले. पंतांच्या पाजी पुत्राने पैशांच्या प्राप्तीतून पोटात पंजाबी पदार्थ पचवले.
पंतांना परमेश्वरच पावला!
-( पटकथा - पुष्कर)
मराठी नाटक बंगालीत ..
प्रेषक अभिरत भिरभि-या ( शुक्र, ०७/०४/२००८ - १९:४९) .मराठी नाटक देश पातळीवर पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. आपल्या मराठी नाटकांचे अनुवाद, पुनर्प्रयोग इतर भाषांमधे ही होताना दिसतात.शिरिष आठवल्यांचे एक नाटक नुकतेच बंगाली रंगमंचावर सादर झाले. देश नामक एका आघाडीच्या बंगाली मासिकाने यावर नुकताच परिक्षणात्मक लेखही छापला.मि.पा. च्या वाचकांसाठी त्याचा गोषवारा
मुळ लेखक: सुब्रतो घोष .
मानुषेर समान मानुष
बंगाली नाट्यविश्वात असे कित्येक 'दल' आहेत जे भलेही डामडौलात नसले तरी मोठ्या कष्टाने बंगाली नाटक जोपासताहेत. गांधार असेच एक दल.गेल्या शेहचाळिस वर्षात त्यंनी तेवीस एक नाटके मंचस्थ केलीत.अर्थात ते केवळ नाटकांच्या संख्येलाच नव्हे तर दर्जालाही महत्व देतात हे जाणवते.यंदाचे नाटक आहे शिरिष आठवल्यांच्ये मराठी नाटक 'मित्र'; ज्याचा विजयालक्ष्मी बर्मन यांच्या सहयोगाने काछेर मानुष' ( जवळचा माणूस) या नावाने बंगाली अनुवाद केलाय कमल सान्याल यांनी.
वर्ण वा जातीच्या आधारावरची विभागणी माणसाला माणसापासुन तोडू शकत नाही हि गोष्ट हे नाटक पुन्हा सांगु पाहते. ज्या बाबी समाजाला मागे रेटु बघतात त्यात मुख्य असते ही जातीपातीची मानसिकता.याचा उत्तर व पश्चिम भारतातला चेहरा इतका भेसुर की सहज ओळखला जावा. पण या तथाकथित पुरोगामी राज्यात - प. बंगाल मधे - हा चेहरा इतका भिन्न की ओळखु येण्यास उशिर व्हावा.नाटकात शिरिष आठवल्यांचे मराठी वातावरण जरी कायम असले तरी नाटकच्या शेवटी वाटते की नाटककाराला जे सांगायचेय ते ह्या राज्याच्या राजकीय/सामाजिक किंवा आर्थिक परिस्थितीसही पुरेपुर लागु आहे.
दादासाहेब पुरोहित संस्कारांमुळे कट्टर दलितविरोधी परंतु घटनाचक्रामुळे या विधुर गृहस्थाच्या
शारिरीक पंगु अवस्थेतून सोडवणुक करण्यासाठी येते सावित्रीबाई रुपवते नावाची दलित वर्गातील बाई.ददासाहेबांची मुलेबाळे आपापल्या नोकरीधंद्याच्या जागी असतात आणि तेथुनच पित्याची विचारपुस करत असतात. प्रारम्भी जात्याभिमानी दादासाहेब सावित्रीबाईंस काही एक दाद देत नाहीत. दुसरीकडे कामावर निष्ठा असलेली ही स्वाभिमानी बाई - जी स्वत:ला मिसेस रुपवते म्हणूनच ओळखु इच्छिते - कर्तव्यात काडीमात्र कसुर न करता रोग्यास बरे करण्याच्या मागे लागते. दादासाहेब जसजसे ठीक होऊ लागतात मि. रुपवतेंवरचे त्यांचे अवलम्बन वाढत जाते.मुलगी मैत्रेयी जेव्हा दादासाहेबांच्या इच्छेविरुद्ध स्वत:जवळ परदेशी नेऊ बघते तेव्हा दादासाहेब तिला स्वत:च्या इच्छाशक्तीच्या व मि. रुपवतेंच्या सुश्रुषेच्या बळावर खडखडीत बरे होऊन सिद्ध करतात की मुलीपाशी जायचे आता कोणतेही कारण नाही. दादासाहेबांना केवळ शारिरिक जोखडातुनच नव्हे तर जातीच्या खोट्या अभिमानातुनही मुक्ती मिळते
ही कहाणी सरळ सोप्या पद्धतीने सांगितली आहे. नाटककार कोणताही आडपडदा न ठेवता मुळ विषय प्रेक्षकांसमोर ठेवला आहे. सारे नाटक घडते ते दादासाहेबांच्या दिवाणखान्यात व स्वयंपाकघरात. दादासाहेबांचे एकाकीपण यामुळे प्रेक्षकांपर्यन्त पोहचते.
लेखाच्या उर्वरित भागात नेपथ्य / अभिनय वगैरे अंगांवर टीकाटिप्पणी आहे. भाषांतर करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. अनुवाद कृत्रिम वाटल्यास जरुर सांगावे.
मायमराठी!
प्रेषक प्रमोद देव ( मंगळ, ०७/०१/२००८ - २३:१२) .मिसळपाव अथवा मराठी संकेतस्थळावर मराठीतून लेखन करताना तिथल्या अंगभूत सोयीमुळे कोणतीच अडचण येत नाही. मात्र ऑर्कुट अथवा कोणत्याही संवादकात(मेसेंजर) लिहिताना बहुसंख्य लोक रोमन लिपीचा वापर करून मराठी लिहितात;थोडक्यात मिंग्लीशमध्ये संभाषण होत असते.
माझी अशी धारणा आहे की निदान दोन मराठी भाषकांनी जिथे जिथे शक्य होईल तिथे मराठीत आणि लेखी संभाषणात देवनागरीतून संवाद साधावा. त्यासाठी मेतकूटवर आम्ही काही जणांनी मायमराठी हा समूह स्थापन केलेला आहे. आपण तिथे जरूर भेट द्या आणि मराठीचा प्रचार आणि प्रसार करा. आपल्या सूचना,शंका-कुशंका जर काही असतील तर जरूर विचारा. त्यावर विचार केला जाईल. शक्य त्या सर्व शंकांची उत्तरे दिली जातील .
या.मराठीचा झेंडा त्रिखंडात फडकवू या!
जालावरील संक्षिप्त शब्द
प्रेषक विद्याधर३१ ( बुध, ०६/२५/२००८ - २२:४५) .सध्या आपण आंतरजालावर खूप शब्दांची संक्षिप्त रूपे वापरतो.
जसे
१) व्य. नि. / विरोप = व्यक्तिगत निरोप.
२) ह. ह. पु. वा. = हसून हसून पुरे वाट
३) पु. ले. शु. = पुढील लेखनाला/स शुभेच्छा.
यातील काही शब्दांचे पूर्णार्थ माहीत नसल्यास बरेच वेळा प्रतिसादांचा अर्थे समजत नाही.
तरी आपण वापरत असलेले संक्षेप येथे नोंदवावे यासाठी हा धागा सुरु करत आहे.
प्र क टा आ म्हणजे काय?
मातृशक्ती विरुद्ध मातृभाषा.
प्रेषक कलंत्री ( बुध, ०६/२५/२००८ - २१:०३) .मे च्या सुट्टीत बऱ्याच ठिकाणी जाण्याचा योग आला. या निमित्त्याने आमच्या पुतणीच्या गावी मागच्या आठवड्यात गेलो होतो. आमचा नातू २ -१/४ वर्षाचा झाल्याअसल्या मुळे त्याला बालवाडीत ( के जी त )टाकण्याचा उत्साह त्यांच्या घरात वाहत होता. मी ही त्या गडबडीत सहभागी झालो होतो. त्याचे नवीन जोडे, नवीन गणवेश, छोटीशी पिशवी, ओळखपत्र इत्यादीचा थाट काय वर्णावा? घरात त्याच्या जाण्याचे, आवरासावरीचे आणि रडण्याचेही कौतुक होते.
तो शाळेत गेल्यावर सहजच विचारले की येथे मराठी शाळा चांगली आहे ना? म्हणजे बालवाडी ते १० वी पर्यंत परत विचार करायला नको ना. माझा या प्रश्नावर माझ्या पुतणीने माझ्याकडे अगदी कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकला. "अहो, काका, त्याला इंग्रजी शाळेत टाकण्याचा विचार आहे. पुढे मागे आता इंग्रजी माध्यमच राहणार आहे ना"!
मी प्रचंड अस्वस्थ झालो. मग माझ्या परीने आणि माझ्या सर्वोच्च वादविवादाने तिला मराठी माध्यम कसे चांगले आहे हे सांगण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. कधी तिच्या चेहऱ्यावर गोंधळ कधी नेमके खरे काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न चालू आहे हे मला समजायला लागले.
पण मला वाटत होते की त्याला परकीयाच्या माध्यमात टाकण्याचा विचार आमच्या जावयाचा असावा. त्यामुळे मी ते बाहेरुन येताच माझ्या मराठी शाळेच्या विचाराचे सूतोवाच केले. इंग्रजी माध्यम कसे खर्चीक आहे आणि मराठीची मुले कसे पुढे जात आहे हे सांगण्याचा प्रयत्न सुरू केला.
माझ्या समजुतीच्या आणि अपेक्षाच्या पलीकडे त्यांनी माझ्या पुतणीवर अगदी उघड हल्ला सुरू केला. अहो, काकाजी, मी मागच्या सहा महिन्यापासून किती समजावीत आहे पण ही ऐकेल तर शपथ? आता मराठीच्या माध्यमात काय कमी आहे? आपल्या घराचे चांगले संस्कार मराठीत होतात ना? उद्या इंग्रजी माध्यमात याने एखाद्या मुलीशी सलगी केली तर? तेथे वातावरण कसे असते हे आपण ऐकत असतोच ना? ( इंग्रजी माध्यमात मुलीशी सलगी करता येते याचाही शोध मला प्रथमच लागला. ). मीही शाहजुक पणे त्यांना अनुमोदन देत म्हटले की अहो आपल्या घराला बट्टा लागेल ना? नको ती इंग्रजी शाळा. पुतणी माझी निरुपाय पणे ऐकत होती. आता एकदा दोनदा चक्कर मारून त्याची शाळा बदलण्याचे पुण्यकृत्य बाकी आहे. आई जगदंबा यश देवो.
पण सर्वसाधारणपणे समाजात बघितले तर असे जाणवते की इंग्रजी माध्यमाचा सोस आयांना जास्त दिसतो. आपला मुलगा फाडफाड इंग्रजी बोलतो आहे याचे स्वप्न त्यांना भुरळ पाडते आहे असा माझा अनुभव आहे. आपल्या आर्थिक, बौद्धिक आणि कौटुबिंक क्षमतेच्या पलिकडे त्या इंग्रजीचे मोहजालात पडलेल्या दिसत आहे.
एकदा माझ्या मित्राची बायको आमच्याकडे आली असता तिला माझा मुलगा मराठीत शिकतो याचे नवलच वाटले. ती परत परत विचारत होती की मराठी वि़ज्ञान आणि गणित कसे असू शकते? ( हॉउ वंडरफुल ना? ). मित्राला माझे मराठी प्रेम माहित असल्यामुळे त्याची फजिती स्पष्ट दिसत होती.
माझ्या एका मित्राने मला असे सांगितले की या आयाच आपल्या भाषेला बहिष्कृत करत आहे.
मातृभाषा आणि विकृत मातृशक्तिचा लढा कोण जिंकेल काही समजत नाही.
बऱ्याच दिवसापासून माझ्या डोळ्यासमोर शंकराला पायदळी तुडवणाऱ्या काली चे चित्र दिसत आहे. शंकराच्या शिवाच्या भूमिकेत मराठी भाषा आहे आणि कालीच्या भूमिकेत सगळ्या इंग्रजीचा आग्रह धरणाऱ्या आया दिसत आहे. कालाय तस्मे नम: म्हणावे नाही तर काय?
ही विसंगती का?
प्रेषक शेणगोळा ( शुक्र, ०६/२०/२००८ - ०९:३९) .आदाब!
ही वाक्ये पाहा -
"काय रे, घरी इतकी छान बायको असताना बाहेर शेण का खातोस?"
किंवा,
"इतका साधा, सज्जन आणि चांगला नवरा असून ती ऑफिसातल्या बॉसबरोबर शेण खाते!"
किंवा,
"असं करू नकोस, लोकं तोंडात शेण घालतील!"
अशी वाक्य आपण नेहमी ऐकतो. ह्या वाक्यांतून शेण हा काहितरी वाईट, निंदनीय प्रकार आहे असा अर्थ निघतो.
आता ही वाक्ये पाहा -
"शेणाने अगदी छान सारवलेलं घर!"
किंवा,
"शेणाने अगदी छान सारवलेल्या जमिनीचा एक हवाहवासा वाटणारा वास आणि जाणवणारा तो नैसर्गिक स्पर्श!"
इथे शेण म्हणजे काहितरी एक मंगलदायी, घराचे सौंदर्य वाढवणारा प्रकार आहे असा अर्थ निघतो.
वरील दोन्ही प्रकारच्या वाक्यात 'शेण' या पदार्थाच्या अर्थाबद्दल विसंगती दिसते. ही विसंगती का? कुणी सांगू शकेल काय?
शुक्रिया!
आपल्या सर्वांचाच,
शेणगोळा.
अमराठी मुलखात अस्सल मराठी बालनाट्य
प्रेषक विसुनाना ( मंगळ, ०६/१०/२००८ - ०३:१२) .हैदराबाद:
येथील 'रंगधारा' या नाट्यसंस्थेच्या वतीने दि. १२ मे २००८ पासून बालनाट्य प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. यात भाग घेणारी सर्व मुले अमराठी शाळेत शिकतात. त्यांना मराठी नीटसे बोलताही येत नाही. कारण घराबाहेर (क्वचित घरातही) असलेले अमराठी वातावरण. (मराठी वाचण्याची तर बातच सोडा. ) परंतु तरीही ती ८ ते १३ वर्षे वयाची मुले एक अस्सल मराठी बालनाट्य सादर करणार आहेत. ते आहे -"राजकन्येची बाहुली". धमाल विनोदी असे हे बालनाट्य पूर्णपणे बालकलाकार सादर करत असून नाटकाचे नेपथ्य, वेशभूषा यातही त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
या बालनाट्याचे मराठी भाषेच्या दृष्टीने वैशिष्ट्य म्हणजे यात संस्कृतप्रचुर मराठी बोलीबरोबरच ग्रामीण मराठी बोलीतीलही संवाद आहेत. केवळ स्मरणशक्ती आणि अभिनयक्षमतेच्या जोरावर सर्व बालकलाकार हे संवाद अस्खलितपणे म्हणू शकतात. इतकेच नव्हे तर त्यांचा शाब्दिक अर्थ आणि भावार्थही त्यांना पूर्ण समजू लागला आहे हे त्यांच्या सहज अभिनयातून स्पष्ट होते.
बालनाट्य प्रशिक्षणावेळी उपस्थित असणारे एक पुणे येथून आलेले पाहुणे प्रेक्षक उद्गारले की "अरे, मला तर पुण्यात असल्याचाच भास होत आहे. " यातच या शिबिराचे यश दिसते.
रविवार दि. २२ जून २००८ रोजी सायंकाळी साडे सहा वाजता हैदराबाद येथील पोट्टी श्रीरामलू तेलुगू युनिव्हर्सिटीच्या नंदमूरी तारक (एन. टी.) रामाराव कलामंदिरात या बालनाट्याचा प्रयोग होणार आहे. आपल्यापैकी कोणी जर हैदराबादमध्ये असतील तर त्यांनी (आपल्या बालगोपाळांसह) या प्रयोगाला अगत्याने उपस्थित राहावे आणि बालकलाकारांना प्रोत्साहन द्यावे ही आग्रहाची विनंती.
याच बालनाट्याचे येथील मराठी बालप्रेक्षकांच्यात मराठी भाषा आणि मराठी नाटक यांचे आकर्षण निर्माण करण्यासाठी आणखी प्रयोग सादर कऱण्याची 'रंगधारा' संस्थेची मनिषा आहे.
राजकन्येची बाहुली
लेखक : श्री. विजय शिंदे
कलाकारः चि. यश फडके, चि. आदित्य परळीकर, कु. सुगंधा जोशी, चि. चैतन्य ठाकूर, कु. पर्णवी फडके, कु. ऐश्वर्या गोखले, कु. अक्षदा अवधूत, कु.संपदा जोशी , चि. निखील नाईक, चि. ऋषभ सोमण, चि. सोहम चौसाळकर, कु. ईशा फडके, चि. अजित जोशी
प्रयोगाच्या अधिक माहितीसाठी श्री. प्रकाश फडणीस (हैदराबाद भ्रमणध्वनी ९९४८५ ८८५१२) यांच्याशी संपर्क साधावा.
(वि. सु. : मर्यादित आसनसंख्येमुळे रसिकांची होऊ शकणारी गैरसोय टाळण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधावा ही विनंती.)
मजेशीर शब्द
प्रेषक आर्य ( शुक्र, ०५/३०/२००८ - १८:४८) .आज काल भाषाशुद्धी-शुद्धलेखन या आणि अशा बर्याच विषयांवर बराच काथ्याकुट करुन झाला आहे.
शब्दकोश हा धनकोशापेक्षा वेगळाच आहे! तो वापरल्याने मोठा होतो आणि नुसताच ठेवून दिला तर त्याचा र्ह्सा होतो, हाच धागा पकडून ऐक नविन चर्चा पुढे चालू करु.
मिपावर फक्त पश्चिम महाराष्ट्रातले नसून जगातल्या विविध भागातले सदस्य आहेत / गेलेत. चला तर मग आपला शब्द संग्रह वाढवूया. पण अट ऐकच वाद नघालता नव नविन आणि गंमतशीर शब्द सांगायचे आपल्या प्रांतातले
( तात्या अशी चर्च्या यापुर्वी झाली असल्यास लीखकाच्या संमती शिवाय विषय काढुन टाका)
सुरवात मी करतो
शासकीय कामानिमीत्य काही महिन्यांपुर्वी विधान-सौधा (बेंगळूरु) येथे जाण्याचा (जेवण्याचाच म्हणाना) योग आला. बरीच वेळ चर्चा झाल्या नंतर तत्कालीन मुख्यमंत्री कुमारस्वामी महोदय आले, तिथेच आमच्या चर्चांना पुर्णविराम मिळाला आणि त्यांच्या कन्नड भाषणाला सुरवात झाली (त्यांना ईंग्रजी येत नसावे बहुतेक)
काय बोलले राव ! अधी आदर आणि मग हसु यायला लागलं मला. शब्दच कळेनात मला आणि मी ते मराठी शब्दांना जुळवले. अगदी शाळेत करतो ना तसचं जोड्या जुळवा / गाळलेल्या जागा भरा ईत्यादी.
पण आता अर्थ लागलेत त्यांचे ते असे-
गळू - लोकहो / जनहो (आदरार्थी बहूवचनी संबोधन) ऊदा : यलार सल्लागार गळू - सर्व सल्लागार लोक
हागु - आणि / तसेच (ऊभयान्वयी शब्द)
भंगार - सोने
कुंडी - ढुंगण
सोप्पु - पालेभाजी
मेले / मेलगडे - वर , केळे / केळगडे - खाली
केळी - विचारा
हेळी - सांगा
हळ्ळी - गाव, पाळ्या - भाग (देवन हळ्ळी, कद्रेनहळ्ळी, मरीयप्पन पाळ्या, कळासी पाळ्या)
भाषाशुद्धी, जडजंबाल लेखन, मराठी भाषेचे मूळ
प्रेषक आजानुकर्ण ( बुध, ०५/२८/२००८ - २२:१८) .भाषाशुद्धीकरण आणि जडजंबाल लेखन : मंगेश विट्ठल राजाध्यक्ष यांचे निवडक उतारे.
मराठीतली भाषाशुद्धीकरणाची चळवळ या शतकाच्या चौथ्या दशकात सुरू झाली. काही काळ तिने आवाज केला. पुढे तो थंडावत गेला. दरम्यान या चळवळीला पुरस्कर्ते आणि अनुयायी लाभले ते संख्येने मर्यादितच होते. उच्च जात, आणि उच्च नसले तरी त्याच्या जवळपासचे शिक्षण, या दोन प्रमुख मर्यादा. सर्वसाधारण लोकात तिचे हसे झाले. शुद्धीकृत भाषेची विडंबने झाली. तिला अनुयायांपेक्षा पुरस्कर्तेच अधिक लाभले
म्हणजे अशा शुद्धीकरणाचा तात्त्विक पुरस्कार करणारे. 'तशा' भाषेत आपले लेखन करणारे फार थोडे होते. शेवटी आपले लेखन ज्यांच्यासाठी त्या लोकांना ते कितपत समजेल ही शंका आड आली असणार. पण भाषाशुद्धीकरणाची चळवळ थंडावली, तिचे उघड उद्योग संपले, तरी आपल्या स्वातंत्र्यचळवळीच्या भाषेत ती 'भूमिगत' झाली. परिणामी ती कीड लागल्या प्रमाणे पसरली. बर्याच लेखनाच्या मुळांना ती कीड लागली. अनेकदा त्या लेखकांच्या नकळत! आणि 'शिष्ट' लेखकांमुळे ती लागण स्वत:ला लेखक न समझणार्या वाचकांपर्यंत पोचली. कृत्रिम, अर्थहीन आणि जडजंबाल लेखन त्यांना तसे वाटेनासे झाले. आपल्या भाषेबाबतची संवेदनाच क्षीण झाली आणि ती पुढे नष्ट झाली.
या भाषाशुद्धीचळवळीचे प्रणेते त्या काळी नावामागे बॅ. हा बॅरिस्टर या इंग्रजी पदवीचा संक्षेप लावणारे आणि आता 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी लावले जाणारे वि. दा. सावरकर. या भाषाहोमात भस्म करायचा संकल्प होता तो मराठीत आलेल्या फारसी व इंग्रजी शब्दांचा. या संकल्पामागची चेतना राजकीय होती, तशीच ती धार्मिकही. पण राजकीयपेक्षा मुख्यत्वे धार्मिक. एक तर इंग्रजी शब्द लेखनात येत ते तुलनेने फारच थोडे. फारसी कुळीतलेच फार. आणि इंग्रजी शब्द जेमतेम शतकभरात आलेले तेवढेच. मात्र फारसी शब्द कित्येक शतके ठाण मांडून बसलेले. अगदी शिवशाहीपूर्वीपासून. आणि एवढे एकजीव झालेले की तीक्ष्ण नाकाचे व्युत्पत्तिशोधक सोडल्यास ते शब्द परके आहेत याचा वाचणार्यांना, लिहिणार्यांना, वापरणार्यांना संशयदेखील येऊ नये.
पण ही शुद्धीकरणाची चळवळ जोरात आल्यावर काही घ्राणेंद्रिये (म्हणजे देशी भाषेत नाके) अधिकच तिखट झाली. आणि हाय खाल्लेल्या म्लेंच्छ सैनिकांना जळीस्थळी संताजी व धनाजी दिसू लागले तशी या शुद्धीसैनिकांना म्लेंच्छ व यवनी शब्द दिसू लागले. या सर्वच सैनिकांना भाषाशास्त्राची तालीम (हा देखील एक म्लेंच्छ शब्दच) मिळालेली होती असे नाही. तिची भरपाई करायला भाषाभिमान समर्थ होता!
पुढे आपले एक मोठे कवी माधव जूलियन यामध्ये उतरले. फारसीचा
विटाळ झालेल्या अनेक कविता त्यांनी संस्कृतच्या फवार्यांनी सोवळ्या करून घेतल्या. याशिवाय भाषाशुद्धीकरणाचा प्रचारही केला. मात्र पुढे १९१७ मध्ये त्यांनी आपल्या एका पत्रात लिहिले "संस्कृत शब्दांची निष्कारण गर्दी निषेधार्ह आहे. या लोकांना संस्कृत भाषा अवगत असावी. पण स्वत:च्या मराठी भाषेशी नीट परिचय नसावा याची कीव येते! बोलीतील सुलभ शब्दांकडे आपले दुर्लक्ष होते." १९२१ साली त्यांनी "प्रत्येक मराठी शब्दाचे संस्कृतशी नाते जोडण्याचा मूर्खपणाचा प्रयत्न धिक्कारला."
अर्थात हे शुद्धीकरणाचे खूळही संपूर्णत: देशी नाही! साहेबाला त्याने आधी पछाडले होते. पहिल्या महायुद्धानंतर, इंग्रजीतील 'नेटिव' (ऍंग्लो सॅक्सन कुळातले) शब्द कटाक्षाने वापरून फ्रेंचद्वारा आलेल्या लॅटिन कुळीतल्या व तशा शब्दांना नाकारायचे अशी टूम निघाली होती.
भाषा साधी सोपी करावी हा त्यामागचा हेतू. आपले शुद्धीकरण मात्र त्याच्या अगदी उलट जाणारे.
भाषाशुद्धीचा हा आग्रह प्रामुख्याने हिंदीच्या प्रगतीलाही भोवला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीय व्यवहाराला सोयीची
म्हणून वापरल्या जाणार्या इंग्रजीचा वरचष्मा उतरवण्यासाठी तिच्याजागी कोणती भाषा आणायची असा प्रश्न पडल्यावर संख्याबळाच्या आधारावर हिंदीची वर्णी लागली. पण कोणती हिंदी? गांधीजींचा कौल पडला साध्या सोप्या 'खडीबोली'च्या बाजूने
. मात्र पंडित मालवीयांसारख्या काही पुढार्यांच्या हिंदीच्या पुनरुज्जीवनवादी संस्कृतीकरणामुळे, तापलेल्या धर्मनिष्ठेमुळे. भावी सत्तेच्या गाजरामुळे, संस्कृतचे रंगरोगण केलेल्या हिंदीची घोडदौड सुरू झाली. सत्ता आल्यावर हिंदीच्या उद्धारासाठी पैशांची लयलूट झाली. इतर भाषांच्या वाट्याला कंजूष भिक्षा आली.
डॉ. कालेलकर यांच्या 'भाषा आणि संस्कृती' या विद्वत्ता, स्पष्टवक्तेपणा आणि विषयोचित विनोद यांच्या मेळाने फार वाचनीय झालेल्या पुस्तकातील काही वाक्ये इथे देतो. "इंग्रजीपेक्षाही कठीण अशी ही शुद्ध नवमराठी कित्येकदा इतकी दुर्बोध आहे की ती कळण्यासाठी ती ज्या मूळ इंग्रजीचे भाषांतर आहे तिकडे वळल्यावाचून गत्यंतर नसते... लोकांच्या माथी एक अगदी नवी, बोजड भाषा मारण्याचा जो प्रयत्न झाला तो फसला... 'सरकार' हा शब्दच पाहा. कोट्यवधी लोक अगदी सहजपणे हा शब्द वापरतात. मात्र त्याच्या जागी संस्कृतातून आलेला 'शासन' हा शब्द! मग त्याला साथीदार म्हणून 'शासकीय' 'प्रशासनिक' हे शब्द... 'सरकारी छापखाना' असे म्हणताच अंगावर सांडपाणी पडले असे वाटणार्या लोकांनी 'शासकीय मुद्रणालय' हा शूचिर्भूत पवित्र प्रयोग चालू केला आणि मराठीपासून सामान्य जनता कशी दुरावेल याची काळजी घेतली.
भाषेच्या बाबतीत शुद्धीकरण ही शास्त्रबाह्य कल्पना आहे. धर्माभिमान, खोटा स्वाभिमान, उच्चनीचतेच्या कल्पना... स्वत:ला श्रेष्ट न समजणार्या वर्गाची भावना अशा कारणांमुळे लोक शुद्धीकरणाकडे वळतात. "
याउलट गुजरातेतील बडोदे संस्थानात एके काळी मराठी व इंग्रजी या कारभाराच्या भाषा होत्या. त्याऐवजी लोकांची भाषा गुजराती ही कारभारासाठी वापरण्याचा गायकवाडांनी निर्णय घेतला. आणि त्यातील परभाषिक फारसीसारखे शब्द काढण्याचा अडाणी खटाटोप न करता कारभार व्यवस्थितपणे चालला.
पण सयाजीरावांच्या या विचारावर एका शुद्धीकारक मराठी पंडिताने आक्षेप घेतला म्हणे: "गुजराती ही क्षुद्र भाषा! मराठीत मुखकमल, चरणकमल असे म्हणतात. पण गुजरातीत तसे काही नाही!"
मराठी भाषा 'उच्च' करण्याची केविलवाणी धडपड ज्यांनी आरंभली त्यांनी तिला घसरणीला लावले. उदा हे काही शब्द पहा: रेडिओला सांवहिक. वनस्पतिशास्त्राला: औद्भिदशास्त्र. लंबगोलाला: विवृत्ताकृति. 'अवलंबनपर्णोद्गमसूत्र हा जबडातोड शब्द कशासाठी वापरला आहे कोण जाणे! एका विदुषीने Honeysuckle या शब्दाला मधुचोष्यक हा शब्द सुचवला
मराठी भाषेचे मूळः
राजाध्यक्षांच्या मतांनंतर 'मराठी भाषेचे मूळ' आणि 'अडगुलं मडगुलं' या थोर पुस्तकांचे लेखक, ज्येष्ठ भाषातज्ज्ञ विश्वनाथ खैरे यांचा मनोगतावर वाचलेला एक प्रतिसाद येथे देतो.
... मराठी व तमिळ या भाषांचा आणि संस्कृतींचा गाढ, प्राचीन संबंध दाखवणं हे या सर्व
लेखनाचं उद्दिष्ट आहे.प्रतीकार्थानं हा संबंध मराठीच्या बाळपणापासून सुरू होतो असं दाखवणारं गाणं म्हणजे बाळाला तीट लावण्याच्या वेळी मराठी आया शतकानुशतके म्हणत
आल्या आहेत ते:
अडगुलं मडगुलं/ सोन्याचं कडगुलं/रुप्याचा वाळा/ तान्ह्या बाळा/
तीट लावू//
तमिळमध्ये अटकु (अडगु) म्हणजे ठेवीची, विनिमयाची किंवा गहाणाची वस्तू. मडक्कू म्हणजे मातीची मोठी थाळी. मट्कलम् म्हणजे मडकं. मण् म्हणजे माती आणि कलम म्हणजे भांडं यावरून तो शब्द आला आहे. 'मडकं मोल म्हणून दिलं किंवा गहाण ठेवलं' असा पहिल्या ओळीचा अर्थ आहे. सोन्नम् म्हणजे सोनं आणि कडगम् म्हणजे कडं. ' मडकं देऊन सोन्याचं कडं घेतलं.' वाळम् म्हणजे गोल किंवा वर्तुळ. इरिप्पु म्हणजे रुपं, 'रुप्याचा वाळा घेतला.' हे दागिने तान्ह्या बाळाला घातले. 'ती' म्हणजे आग, जाळ. तीत्तल म्हणजे करपवणं, काजळणं. तीट्टुतल् म्हणजे अंगाला लावणं. तीत्तु म्हणजे दुष्टावा. 'दृष्ट' लागू नये म्हणून काजळीची तीट लावताना हे सगळे अर्थ एकत्र आले आहेत. तमिळ आणि मराठी समानार्थी शब्द किती सारखे आहेत पाहा.
खैरे विचारतात, "नवतरण्या महाराष्ट्री माउलीने तान्ह्या मराठी बाळाला जी शब्दाभूषणे घातली ती तमिळाईकडून तर घेतली नव्हती?" "होय" असं आत्मविश्वासपूर्ण उत्तर देण्यापर्यंत खैर्यांचा प्रवास नजीकच्या काळातच झाला. आणि केवळ शब्दभूषणं नव्हे तर सांकृतिक आभरणंही तामिळाईकडून मिळाली असे पुरावे ते सादर करीत राहिले.ओवी, अंगाई, पोवाडा हे सर्व तमिळमधून आले. ओवीचा चौथा चरण तुटका असतो एवढ्यावरून त्या अर्थाचे संस्कृत शब्द बनवायचे आणि त्याचा अपभ्रंश म्हणून ओवी शब्द सिद्ध झाला हे दाखवायचं असा
खटाटोप प्रस्थापित भाषाशास्त्राला धरून पूर्वीच करण्यात आला होता. प्रा. वेलणकरांनी ती संज्ञा अशी व्युत्पादिली आहे:
'अर्धचतुष्पदी-अठ्ठोठवइ-अड्ढुड्ढवयी-अड्ढूहवई-ढूहवई-हूहवई-होवई-ओवाई-ओवी. डॉ. कत्रे यांनी अपपादिका-अववाइआ-ओवैया-ओवी अशी परंपरा सांगितली."संस्कृतवरून व्युत्पत्ती काढायची म्हटल्यावर असा द्राविडी प्राणायाम करावाच लागतो" अशी यावर खैरे यांची टिप्पणी आहे. सरळ द्रविड भाषेकडे गेलं तर काय दिसतं? ओवीचा चौथा चरण तुटका ना? तमिळ ओऽवाय म्हणजे दात नसलेलं तोंड, तुटक्या काठाचं भांड. शिवाय 'ओवि' म्हणजे ध्वनी, आवाज. बाळ झोपताना ओऽ ओऽ करतं. त्याच तालावर आई त्याला ओऽ ओऽ करीत पटते. आवाहन करणारा हा आईचा मराठी ओऽ आहे. आजही मराठी गुराखी ओढाळ गुरू लांब गेलं तर ओऽ ओऽ करून त्याला ओवई किंवा ववई घालतो. (हे ग्रामीण बोलीचे महत्व. अशी अनेक उदाहरणे पुढे येतात.)छे, इश्श, अय्या हे उद्गार तमिळ.खंडोबा, त्याचा येळकोट, विठ्ठल, गोंधळ, तुळजाई, बोल्हाई, काळूबाई, फिरंगाई हे सर्व तमिळ.शेंडी पासून क्रमाने डोई, डोळा, पापणी, मिशी, ओठ, मोहरा, हात, पोट, स्त्रीयोनीचा मराठी शब्द, गुडघा, नडघी, घोटा, बोट हे सर्व तमिळ. 'तात्पर्य, शरीरवर्णनात आपण मराठी भाषिक नखशिखांत तमिळ आहोत.' शरीरवर्णनाचे शब्द हे भाषेतील प्राथमिक शब्द असतात हे या संदर्भात लक्षात ठेवणं योग्य होईल.चूलमूल, नातीगोती, भाजीपाला, स्वैपाकाचे पदार्थ, शेतीची अवजारे यांच्याशी संबंधित असलेले मराठीतील शब्दही तमिळ.
महाराष्ट्रातील स्थळनामांच्या अर्थाचा उलगडा तमिळवरून होतो हे द्रविड महाराष्ट्र या पुस्तकात दाखवले आहे. मुंबई, परळ, चेंबूर, वसई, वाशी, पुणे, वानवडी, येरवडा, थेऊर, जेजुरी, खंडाळा, जुन्नर, इत्यादी. मुठा, मुळा, उल्हास या नद्याही. उल्हास नदीच्या नावात उल्ह म्हणजे 'पल्ला मासा', जो केवळ याच नदीत सापडायचा. (आता प्रदूषणमुळं सापडत नाही.)मराठी वाचकांसमोर हे पुरावे मांडत असताना, दक्षिणी भाषाभ्यसकांपुढेही त्यांना भावतील असे तमिळ-मराठी संबंधांचे पुरावे इंग्रजी निबंधांतून खैरे सादर करीत आले आहेत. निर्णायक वाटावा असा पुरावा 'टोवर्डस इंडियन फोनॉलजी अँड लिंग्विस्टिक्स' या त्यांच्या निबंधात पहायला मिळतो. दक्षिणी भाषांच्या व्युत्पत्तिकोशाच्या दोघांपैकी एक संपादक एमेनो यांनी १९७० साली द्रविडियन कंपॅरेटिव्ह फोनॉलजी-ए स्केच या नावाच्या प्रबंधात सुमारे २७५ दक्षिणी शब्दावलीच्या वर्णांची तुलना केली आहे. त्यातल्या जवळ जवळ २६० गटांमधे मराठीतल्या एक ना एक शब्दाची ओळख पटते. त्यातल्या अनेकांच्या ज्या संस्कृत व्युत्पत्ती दिलेल्या आहेत त्या नमूद करून त्यांची कृत्रिमताही उघड केली आहे. अस्सल दक्षिणी म्हणवतात त्यांचे समशब्द मराठमोळे म्हणून वावरताहेत हा केवळ योगायोग म्हणता येणार नाही.पण अगदी बिनतोड पुरावा हवा असेल तर तो पुढचा आहे. जे आपल्याला 'अस्सल मराठी' वाटतं त्याला आपण 'मराठमोळं' म्हणतो. अस्सल मराठी भाषेला आपण 'मराठमोळी' म्हणतो. तमिळ मर्रा (जो मराठीत मर्हा होतो) म्हणजे न झाकलेलं, उघडं किंवा स्पष्ट. 'मर्हाटाचि बोलु'! ज्ञानेश्वरीमधे बावीस वेळा हा शब्द आला आहे. आणि त्याचा हाच अर्थ असल्याचे खैर्यानी एका निबंधात दाखवून दिलं आहे. मोळि म्हणजे बोली, भाषा...
भाषाशुद्धी, शुद्धलेखन, मते-मतांतरे वगैरे वगैरे...
प्रेषक ॐकार ( बुध, ०५/२८/२००८ - १४:३७) .शुद्धलेखन, भाषाशुद्धी इ. इ. संदर्भात मिसळपाव वर चाललेल्या वेगवेगळ्या चर्चा लक्षात घेता बरीचशी मते पूर्वग्रहदूषित आहेत हे मला जाणवते. एकीकडे शुद्धलेखनाचा आग्रह नको म्हणताना दुसरीकडे मात्र रुळलेल्या फारसी, इंग्रजी शब्दांऐवजी मात्र सहज वापरता न येण्याजोगे शब्द सुचवणे असा विरोधाभास इथे दिसतो. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून खालील काही प्रश्न्नांची उत्तरे स्वतःशी पडताळून पहावीत.
१) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का?
२) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का?
३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का?
४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का?
५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का?
६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? )
७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय?
८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का?
९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का?
१०) तुम्ही काल घरी फोन केला होता का?
११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का?
१२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ'
उपहासात्मक प्रश्नांची सरबत्ती करायची झाल्यास अनेक प्रश्न आहेत. वव्यवहार म्हटल्यास कमी प्रश्न आहेत. कळीचा मुद्दा हा की तुम्ही मांडलेल्या मतांशी तुम्ही कितपत प्रामाणिक आहात याचा.

