user

भाषा

॥ काव्यशास्त्रविनोदा: - ३ ॥

मागील भागात म्हटल्याप्रमाणे या भागात आपण 'अन्योक्ति' आणि 'प्रहेलिका' हे काव्यप्रकार पाहू.

अन्योक्ति मराठीतही वापरली जाते. संस्कृत काव्यशास्त्रविनोदात असलेली अन्योक्तिची उदाहरणे एक निराळाच आनंद देऊन जातात. मूळ तत्व तेच. 'अन्य' वस्तू/गोष्टीच्या उक्तीने आपल्याला केलेला उपदेश किंवा 'लेकी बोले सुने लागे' असं वर्णन. प्रत्यक्ष मनुष्याचा उल्लेखही न करता, मनुष्यस्वभावाचे समर्पक विवचन करणार्‍या सुभाषितांचा रसास्वाद लुटणे किती आनंददायी आहे. काही सुभाषितांत तर केवळ चार चरणात आयुष्याचे तत्वज्ञान सामावलेले असते. खरंच हा सुभाषितांचा साठा म्हणजे एक अमूल्य ठेवा आहे. चला तर अशा काही 'अन्योक्ति' पाहूया.

अपसर मधुकर दूरं परिमलबहुलेऽपि केतकीकुसुमे।
इह न हि मधुलवलाभो भवति परं धूलिधूसरं वदनम्॥

येथे भुंगा आणि केतकीच्या फुलाच्या उदाहरणातून मनुष्यस्वभावाचं चित्रण केलेलं आहे. आधी सुभाषिताची समजण्यास सोपी अशी सुटसुटीत मांडणी करून भाषांतर करून घेऊ. 'मधुकर, दूरं अपसर, परिमलबहुलेऽपि केतकीकुसुमे' - हे भुंग्या, पुष्कळ सुगंध असणार्‍या केतकीच्या फुलापासून दूर जा. (केतकीच्या फुलात पुष्कळ सुगंध असला तरी त्यापासून दूर जा) का? तर 'इह न हि मधुलवलाभः' - खरोखर इथे मध मिळायचा नाही, 'भवति परं धूलिधूसरं वदनम्' - पण (तुझे) तोंड मात्र धुळीने माखून जाईल.
अर्थात केतकी इतकी सुगंधी की एखाद्याला भुरळ पडावी, पण मधाचा मागमूसही नाही तिच्यात. उलट जी पांढरट भुकटी* केवड्यावर असते त्याला कवि धुळीची उपमा देतो. आणि भुंग्याला उपदेश करतो की, 'हे भुंग्या तू या केतकीच्या सुगंधाला भुलू नकोस. इथे तुझा कार्यभाग तर साधला जाणार नाहीच, उलट तुझं तोंडच धुलिमय होईल!' या ठिकाणी केतकीच्या रूपकातून गुणी पण गर्विष्ठ, कद्रू स्वभावाच्या मनुष्याचे चित्रण केले आहे. ज्याप्रमाणे केतकीकडे सुगंध मुबलक आहे त्याचप्रमाणे एखाद्याकडे एखादा गुण जरी मुबलक असला, तरी त्याच्याकडे औदार्य असल्याशिवाय त्या गुणांना शोभा येत नाही. अमक्याकडे मुबलक धन आहे पण त्या धनाचा त्याला गर्व झाला आहे, अशा माणसाकडे मदत मागण्यास आलेल्या गरजूंना त्याच्याकडून काही मिळणार नाहीच उलट त्यांचा अपमान होऊ शकतो. तर अशा मनुष्याच्या श्रीमंतीची महती का बरं वर्णावी? तसेच एखादा मनुष्य विद्वान आहे पण त्याने त्याच्याकडे मोठ्या अपेक्षेने काही शिकण्यासाठी आलेल्याला आपले ज्ञान दिलेच नाही तर अशा ज्ञानाचा तरी काय उपयोग? तर नुसते गुण असून भागत नाही तर गरजूंना त्या गुणांचा फायदा होत नसेल तर त्या गुणांना शोभा येत नाही. तेव्हा सामान्य मनुष्याला भुंग्याची उपमा देऊन कवि म्हणतो, "अरे भाबड्या, अशा गुणी पण गर्विष्ठ, कद्रू मनुष्यांपासून दूर राहा रे बाबा. तू ज्या इच्छेने त्याच्याकडे चालला आहेस ती पुरी व्हायची नाहीच, पण तूच पोळून निघशील."
खरंच 'औदार्याशिवाय गुणांना शोभा नाही' हे किती समर्पकपणे भुंगा आणि केवड्याच्या उदाहरणातून सांगितले आहे.

*त्या पांढरट भुकटीला काय म्हणतात ते मला ठाऊक नाही.

अञ्जलिस्थानि पुष्पाणि वासयन्ति करद्वयम्।
अहो सुमनसां प्रीतिर्वामदक्षिणयोः समा॥

या सुभाषितात फुलांचं अतिशय सुरेख उदाहरण देवून संतांच्या 'सर्वे मानवा: समा:' या भावाचं चित्रण केलं आहे. पुन्हा, आधी सुलभ भाषांतर करून घेऊ. 'अञ्जलिस्थानि पुष्पाणि' - ओंजळीत असलेली फुले, 'वासयन्ति करद्वयम्' - दोन्ही हातांना सुगंधित करतात. 'अहो सुमनसां प्रीति:' - फुलांचं प्रेम, 'वामदक्षिणयो: समा' - डाव्या आणि उजव्या, दोन्ही हातांवर सारखंच असतं. किती सुरेख उदाहरण आहे. ओंजळीत फुलं धरली तर त्यांचा गंध दोन्ही हातांना लाभतो. फुले काही 'डावा-उजवा' असा भेद करत नाहीत, ती दोन्ही हातांना सारखीच सुगंधित करतात. येथे 'सुमनसां' या शब्दावर श्लेष आहे. सुमन म्हणजे अर्थात फूल तर 'सुमनसां' म्हणजे षष्ठी बहुवचन - फुलांचे/च्या/ची. तर दुसरा अर्थ आहे 'सु-मनसां' म्हणजेच चांगल्या मनाच्या माणसांचे/च्या/ची, अर्थात संतसज्जनांचे. अशाप्रकारे संतांना फुलांची उपमा देऊन त्यांच्या मनात असलेल्या 'सर्वजण सारखेच' या भावाचे येथे चित्रण केले आहे. येथे 'वाम' हे दुर्जनांचे तर 'दक्षिण' हे सुजनांचे रूपक आहे. संतजन डावा-उजवा असा भेदभाव करत नाहीत तर त्यांचे सज्जनांवर आणि दुर्जनांवरदेखील सारखेच प्रेम असते.

रे रे चातक सावधानमनसा मित्र क्षणं श्रूयतां
अम्भोदा: बहवो हि सन्ति गगने सर्वेऽपि नैतादृशा:।
केचिद्वृष्टिभिरार्द्रयन्ति धरणीं गर्जन्ति केचिद्वृथा
यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वच:॥

चातकाला केलेला हा उपदेश माणसांनाही तंतोतंत लागू होतो. आधी भाषांतर करू. 'रे रे मित्र चातक, क्षणं सावधानमनसा श्रूयतां' - अरे मित्रा चातका, क्षणभर सावधपणे ऐक. 'अम्भोदा: बहवो हि सन्ति गगने' - आकाशात ढग बरेच आहेत. 'सर्वेऽपि नैतादृशा' - पण सगळेच काही सारखे नाहीत. 'केचिद् वृष्टिभि: आर्द्रयन्ति धरणीं' - त्यातील काहीच ढग पावसाने जमीन भिजवतात, 'गर्जन्ति केचिद् वृथा' - तर काही उगीच गर्जना करतात. 'यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो' - ज्याला ज्याला पाहतोस त्याच्या पुढ्यात, 'मा ब्रूहि दीनं वचः' - दीनस्वरात याचना करू नकोस. इथं कवी चातकाला उपदेश करत आहे की प्रत्येक ढगासमोर पाण्यासाठी याचना करू नकोस सगळेच काही खरेच बरसणारे नाहीत. येथे मनुष्याला चातकाचे रूपक योजून कवि उपदेश करत आहे, की 'अरे मित्रा, या समाजात तुला मदत करणारी माणसं कोण आणि उगीच वल्गना करणारी माणसं कोण ते नीट ओळख. उगाच ज्याच्या त्याच्या समोर दीनवाणा होऊन हात पसरू नकोस.'

विधिरेव विशेष गर्हणीय: करट त्वं रट कस्तवापराध:।
सहकारतरौ चकार यस्ते सहवासं सरलेन कोकिलेन॥

कावळा आणि कोकिळपक्ष्याच्या उदाहरणातून मनुष्याला उपदेश. कावळ्या, सुरेल आवाजाच्या कोकिळपक्ष्याबरोबर तू आंब्याच्या झाडावर सहवास केलेला आहेस, (तरी) तू (वाईट आवाजातच) ओरड (रेक), (यात) तुझा अपराध काय? 'विधि: एव विशेष गर्हणीयः' - याला नियतीच पूर्णपणे कारणीभूत आहे. हे कावळ्याला उद्देशून केलेलं थोडंसं उपहासात्मक वचन असलं तरी मनुष्याला केलेला हा उपदेश आहे की जर एखादा गुण किंवा कला मुळातच तुमच्या अंगी नसेल तर ज्याच्याकडे ती कला आहे त्याच्या केवळ सहवासाने काही ती कला साध्य होत नाही.

आता आपण पाहू 'प्रहेलिका' हा काव्यप्रकार, अर्थात पहेली किंवा कोडी. कधीकधी साधी कोडी असतात, ज्यात प्रस्तुत स्वभाव अथवा गुणधर्मावरून ती गोष्ट कोणती हे ओळखायचे असते किंवा कधी कधी प्रहेलिकेतच उत्तर दडलेले असते. काही काही प्रहेलिका फसव्या असतात. वरकरणी दिसणार्‍या अर्थातून काहीच निष्पन्न होत नाही मात्र एक गूढ अर्थ त्यात दडलेला असतो जो उत्तराकडे निर्देश करतो. एक अत्यंत उत्कृष्ट प्रहेलिका पुढीलप्रमाणे :

य एवादि: स एवान्तः मध्ये भवतिमध्यमा।
य एतन्नाभिजानाति तृणमात्रं न वेत्ति सः॥

सर्वप्रथम नेहमीप्रमाणे सुलभ भाषांतर करू. 'य एव आदि: स एव अन्तः' - जो प्रारंभ आहे तोच अंतदेखील आहे, 'मध्ये भवतिमध्यमा' - मध्ये मध्यम आहे. 'य एतद् न अभिजानाति' - जो हेदेखील जाणत नाही, 'तृणमात्रं न वेत्ति सः' - त्याला काडीचीही जाण नाही. या भाषांतराप्रमाणे या कोड्याचं उत्तर एखादा 'देव' असं देईल. वरकरणी तसंच वाटतं देखील. पण हे अत्यंत फसवं भाषांतर आहे. वास्तविक या कोड्याचं उत्तर कोड्यातच दडलेलं आहे. पहिल्या ओळीचं नीट विचार करून भाषांतर केल्यास उत्तर पटकन कळून येईल. 'य एव आदि: - सुरूवात 'य' ने होते, 'स एव अन्तः' - आणि शेवट 'स' ने होतो, 'मध्ये भवतिमध्यमा' - मध्ये 'भवति'ची मध्यमा - अर्थात 'व' आहे. आता कळलं उत्तर? 'यवस' अर्थात गवत! पुढल्या ओळीत उत्तर दिलेलं आहे हे लक्षात आलं असेलच!

हे होतं प्रहेलिकेचं एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण! आता कोडी म्हटल्यावर कोडी घालणार्‍यानेच उत्तर दिलं तर कसं चालेल. थोडा तुम्हीही आस्वाद घ्या प्रहेलिकांचा. तेव्हा प्रस्तुत आहे एक प्रहेलिका..

अपदो दूरगामी च साक्षरो न च पण्डितः।
अमुखः स्फुटवक्ता च यो जानाति स पण्डितः॥

प्रहेलिका अशी आहे - 'अपदो दूरगामी च' - पाय नाहीत पण दूरपर्यंत जाणारा आहे, 'साक्षरो न च पण्डितः' - साक्षर आहे पण पंडित नाही, 'अमुखः स्फुटवक्ता च' - तोंड नाही पण स्फुटवक्ता आहे, 'यो जानाति स पण्डितः' - जो हे जाणतो तो विद्वान!

याचं उत्तर देता येईल? माझ्या मते फारच प्रसिद्ध प्रहेलिका असल्याने फार जड जाऊ नये.
तरीसुद्धा एक सल्ला : इथे 'साक्षर' हा शब्द येथे 'अक्षरासह' असा अभिप्रेत असू शकतो. :)

उत्तर : पत्र/खलिता/व्यनि. बरोबर उत्तर देणार्‍या श्री. नंदन यांस 'पण्डित' किताब जाहीर! ;)

पुढील प्रहेलिका :

वृक्षस्याग्रे फलं दॄष्टं, फलाग्रे वृक्षमेव च।
अकारादि सकारान्तं यो जानाति स पण्डितः॥

भाषांतर जमल्यास येथे द्यावे. अन्यथा मी देईनच!

उत्तर : अननस. पुन्हा सर्वप्रथम श्री. नंदन यांनीच उत्तर दिलेले आहे!

पुढील प्रहेलिका..

वृक्षाग्रवासी न च पक्षिराजः तृणं च शय्या न च राजयोगी।
सुवर्णकायो न च हेमधातु: पुंसश्च नाम्ना न च राजपुत्रः॥

पुन्हा .. भाषांतर जमल्यास येथे द्यावे. अन्यथा मी देईनच!

उत्तर आहे आंबा, सर्वप्रथम ओळखलंय श्री. प्रमोद_पुणे यांनी.

पुढील प्रहेलिका :

नरनारी समुत्पन्ना सा स्त्री देहविवर्जिता।
अमुखी कुरूते शब्दं जातमात्रा विनश्यति॥

पुन्हा .. भाषांतर जमल्यास येथे द्यावे. अन्यथा मी देईनच!

पुढील भागात आपण पाहू संख्यांवरची सुभाषितं - 'संख्यादशनिबोधतः' (होय तेच, दहावीला पाठ्यपुस्तकात होतं तेच!) :)

सीमालढागीतः भिऊ नको मराठी जना

सीमालढागीतः भिऊ नको मराठी जना
भिऊ नको मराठी जना, काय तूझा गुन्हा
राहीला सीमाभागी
वेळ काढ जराशी जरा, येशील महाराष्ट्री पुन्हा
चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||धृ||

दिलेत भरपूर लढे, रक्ताचे पडले सडे
विचार नको करू, नको मनामधे झुरू
समजू नको अभागी
चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||१||

आम्ही जोर जुलूम तोडू, कन्नडीगांची कंबर मोडू
अन्यायाला वाचा फोडू, सीमाभाग महाराष्ट्रा जोडू
जरी लाठ्या डोक्यास लागी
चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||२||

जय महाराष्ट्र बोलू बोल, मराठीचे उपकार अनमोल
झालो मोठे त्याच धरतीवर, पांग फेडू झेलू गोळ्या छातीवर
चाल पुढे मागे नको फिरू
पाऊल टाक वेगी
चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१३/०७/२०१०

'मिश्किली' - ई-बुक प्रकाशित

प्रस्तावना...
भावनिक प्रस्ताव मांडला की तिची प्रस्तावना होत असते. शब्दांना छेडायचं, शब्दांनाच वेढायचं अन् निकालातही काढायचं एकंदर असाच काहिसा हा मामला. मामला रंगात आला की कामला होत असते. म्हणून काही श्यामलेचे महत्व कमी होत नाही. श्यामलतेतच श्याम व लता वेलीँचा संकर घडून येत असतो...
अशा प्रकारच्या शाब्दिक कोट्यांची कोट्यावधी उड्डाणे घेण्याचा मोह आंतरजालावर कळा दाबतांना होत आलाय. कळा दिल्या तरच पुढे कुणाला तरी लळा लावता येत असतो. म्हणून जास्त कुथत किँवा थुंकत न बसता मी मूळ मुद्द्यावरच येतो...
पडद्यावर लिहिणे ही एक कलाच. ते वाचून प्रतिसाद देणे ही तर महाकला. कलेकलेने घेत गेल्याने किलोकिलोचे माप पदरात पडते. अशाच काही मिश्किल विषयांना स्पर्श करीत गेलेली ही 'मिश्किली' आपणासारख्या पडदे(स्क्रिन) व तावदाने(विँडोज) वाचणाऱ्‍या/ लिहिणाऱ्‍यांना जरूर पसंत पडेल अशी आशा आहे...
तसं पाहिलं तर मुद्रित क्षेत्रात आम्ही उणीपुरी दहा वर्षे वेचली तरी म्हणावी तशी मुद्रा उठली नसतांना जालावरच्या शब्दकुसुमांना आपल्या हवाली करणं हे एक धाडसच. परंतु 'राजे' बोलले अन् दिल हालले. 'मीम'कारांनी मनावर घेतलं अन हे शब्दचित्र पानावर ओतलं. माझं पहिलं ई-पुस्तक सादर करण्याचा पहिला मान त्यांनाच आहे असे मी मानतो. मिश्किल लेखांच्या लिंका आपणापुढे प्रकाशित झाल्याचा डंका पिटावा तितका कमीच ठरेल. आता जे काही लिहायचे उरलेय ते वाचक-लेखकांच्या हाती सोपवितो...
- डॉ.श्रीराम दिवटे.
पुस्तक 'इथे' वाचा...

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरील गीत : उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर


उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर

उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर
उचल मराठी झेंडा जावूदे वर वर ||धृ||

उचल तुझे हात नको भिऊ आता
आपूलाच जय होईल सीमेत शिरता
झेंडा मराठीचा फडके बेळगाव मनपावर
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||१||

राज्य आपले एक व्हावे मराठी भाषकांचे
वेगळे न राहू आता एक घर करू बांधवांचे
सुपीक प्रदेश ताब्यात आणू निप्पाणी कारवार
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||२||

पुर्वज आपले खपले तेथे विसरतो कशाला
महाराष्ट्र एकीकरण समिती आहे तुझ्या पाठीला
सामिल करू हलियाल,भालकी, अरूड अन बिदर*
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||३||

* महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्तीय मराठी शहरे (BCC's 2005 resolution हा परिच्छेद पहा.) (कृपया शहरांच्या नावांचे उच्चार योग्य आहेत का ते सांगा जेणेकरून बदल करता येईल.)

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०८/०७/२०१०

मास्टर मदन - जगाला पडलेले एक अद्‌भूत स्वप्न !

मास्टर मदन
मास्टर मदन (जन्म २८-१२-१९२७. मृत्यू :६-६-१९४२)

२८ डिसेंबरला परमेश्वराच्या हातून एक मोठी चूक घडली. त्या चुकीसाठी मला नाही वाटत तो स्वत:ला कधी माफ करु शकेल. या दिवशी त्याने त्याच्या विश्वातल्या एका गाणार्‍या स्वर्गिय गंधर्वाला चुकून या मर्त्य जगात पाठवले. ते साल होते १९२७.

अवघ्या १४ वर्षाच्या आयुष्यात गायनाच्या कुठल्या पातळीवर तो पोहोचला होता ते आता आपण बघुया.

हा शापीत गंधर्व पंजाबमधल्या जालंदर लिल्ह्यातल्या एका खानेखाना नावाच्या गावात एका शीख कुटूंबाच्या घरात अवतीर्ण झाला. त्याचे नाव “मास्टर मदन”. देवाने याच्या जन्मासाठी गाव सुध्दा कसे निवडले ते बघा. हे गाव सम्राट अकबराच्या दरबारी असलेल्या नवरत्नांपैकी एक, ज्याचे नाव अब्दूल रहीम खान-ई-खान, त्याने वसवले होते. हा स्वत: मुसलमान असून कृष्णभक्त होता आणि त्याने कृष्णावर बरीच पद्ये रचली होती. या माणसावर परत केव्हातरी मी लिहीनच. याची एक हकीकत सांगतात. हा दानधर्मासाठी बराच प्रसिध्द होता. पण त्याची दानधर्म करायची पध्दत विचित्र/वेगळी होती. तो दानधर्म करताना याचकाच्या नजरेस कधी नजर द्यायचा नाही. याची त्या वेळी नजर नेहमीच खाली झुकलेली असे. हे कळल्यावर कबीराने एक दोहा त्याच्यावरही लिहीला तो असा –
देनहार कोई और है, भेजत जो दिन रैन
लोग भरम हम पर करे, तासो निचे नैन.
सदासर्वकाळ देणारा खरा दुसराच कोणीतरी ( दिन रैन)
मी देतो असे वाटू नये म्हणून माझी नजर ही नेहमी झुकलेली असते. ( तासो निचे नैन).
असो. हे विषय निघाला म्हणून सांगितले.

ब्रिटीश राजवाटीत हे गाव लाकडावरील हस्तिदंताच्या कोरीव कामासाठी प्रसिध्द होते. याच गावात मदनचे आजोबा रामसींग यांनी आसरा घेतला. १९२८ साली त्या गावात त्यांनी एक छोटेसे घर बांधले त्याचे नाव त्यांनी ठेवले “मोहन निवास”. त्या गावातले बुजुर्गांच्या म्हणण्याप्रमाणे या घरात त्या गावाच्या पंचक्रोशीतले अनेक कलाकार हजेरी लावत आणी मग मैफिली रंगत. हे काही दिवसाने बंद पडले कारण मदनच्या वडिलांनी म्हणजे सरदार अमरसिंग यांनी ते गाव सोडले आणि ते सिमल्याला स्थायीक झाले. त्यांना सिमल्याला एक चांगली सरकारी नोकरी मिळाली आणि त्या कुटूंबाचा आपल्या गावाशी संपर्क तुटल्यातच जमा झाला. अमरसिंग हे स्वत: संगीताचे उत्तम जाणकार होते आणि पेटी आणि तबला उत्कृष्ट वाजवायचे. त्यांची पत्नी म्हणजे मदनची आई श्रीमती पुरणदेवी, या एक अत्यंत धार्मिक बाई होत्या आणि मदनवर झालेल्या धार्मिक संस्काराचे श्रेय त्यांनाच दिले जाते. मदनला एक मोठा भाऊही होता त्याचे नाव मोहनसिंग. या दोघात जवळ जवळ १३ वर्षाचे अंतर होते. हाही स्वत: व्हायोलीन उत्तम वाजवायचा आणि उत्तम गायचा देखील. मदनला एक मोठी बहीण होती तिचे नाव होते शांतीदेवी. ही एक उत्तम गायिका होती आणि तिनेच मदनला त्याच्या दुसर्‍या वर्षापासून गाणे शिकवायला सुरवात केली. मदनला गळ्याची आणि गाणे समजण्याची दैवी देणगी असल्यामुळे त्याने गाण्यातील बारकावे लवकरच आत्मसात केले. त्यानंतर त्याची गाणे शिकण्यासाठी पंडीत अमरनाथ यांच्याकडे रवानगी करण्यात आली. भावाबरोबर गाण्याचा रियाज़ आणि शाळेतले शिक्षण चालूच होते. जरी शाळेत तो एक हुषार मुलगा म्हणून ओळखला जायचा तरी मदन हा काहीसा अबोल, कोणात न मिसळणारा मुलगा होता. त्याचा वेष चांगला असायचा आणि अंगावर क्वचित त्या वेळेच्या प्रथेप्रमाणे दागदागीने आणि डोक्यावर चमकणारी पगडीही असायची.

याच काळात प्रसिध्द गायक सैगल हे ही सिमल्यात रेमींग्ट्न टाईपराईटर कंपनीमधे नोकरीला होते आणि ते आपली पेटी घेऊन मोहनच्या घरी बर्‍याच वेळा भेट द्यायचे आणि मदनबरोबर ते दोघे मस्त मैफिल जमवायचे. अर्थात मदन त्यावेळी फक्त ऐकायचेच काम करायचा कारण त्याचे त्या वेळेस वय होते फक्त दोन. सैगलचे या घराशी स्नेहबंध चांगलेच जुळले होते. शांतीदेवींनी त्याच्या एका काल्का ते कलकत्ता या प्रवासाची आठवण सांगितली आहे, या प्रवासभर ते गातच होते आणि सहप्रवासी त्याचा आनंद लुटत होते. सैगल यांना लहानग्या मदनबद्दल ममत्व होते आणि त्यांना त्याच्या या गाण्याच्या दैवी देणगीचे फार कौतूक होते. सैगल यांनी न्यू-थिएटर्समधे कलकत्याला नोकरी पकडली तरी पण जेव्हा जेव्हा मास्टर मदन किंवा त्यांचे कुटुंबीय कलकत्याला येत, तेव्हा त्यांची काळजी सैगलच घेत.

रेडिओ आणि चित्रपटगृहांचा नुकताच जन्म झाला होता. जाहीर कार्यक्रम हाच जनसामान्यांसाठी संगीत ऐकण्याचा मार्ग होता. त्यामुळे अशा संभांना अलोट गर्दी होत असे. खाजगी मैफिलीही होत असत पण त्या संस्थानिकांकडे. त्यातल्या त्यात उत्तरेला पतियाळा संस्थान तर दक्षिणेला म्हैसूर संस्थान हे कलाकारांचे उदार आश्रयदाते होते.

मास्टर मदनचा पहिला जाहीर कार्यक्रम १९३० सालच्या जून महिन्यात धरमपूर सॅनेटोरियम मधे झाला. त्यावेळी त्याचे वय होते अवघे साडेतीन वर्षे. जे हजर होते ते त्याच्या गायनाने अवाक्‌ झाले. त्या वेळी त्याने ध्रूपदमधे “हे शारदा नमन करू.....” हे म्हटले होते. टाळ्यांच्या कडकडाटात हजर असलेल्या इतर कलाकारांनी या आवाजाचा आणि या जगाचा काही संबंध नाही असे जाहीर केले आणि असे काही आत्तापर्यंत ऐकले नव्हते असे नमूदही केले. या कार्यक्रमाची बातमी एखाद्या वणव्यासारखी भारतात पसरली आणि या कार्यक्रमाला त्या वेळेच्या सर्व वर्तमानपत्रातही जोरदार प्रसिध्दी मिळाली. दुरवरच्या मद्रासच्या हिंदूमधे देखील त्याचे छायाचित्र छापून आले. एका रात्रीत मास्टर मदन किर्तीच्या शिखरावर पोहोचला आणि त्याला सगळीकडून कार्यक्रमासाठी बोलावणे येऊ लागले. सिमला तर त्याचे गावच होते आणि तिथल्या संस्थानिकाचा तो लाडका गायक झाला. या सगळ्याचा परिणाम असा झाला की तो एका महिन्यात सरासरी वीस कार्यक्रम करु लागला. त्या काळात त्याच्या भावाला व्हायोलीनच्या साथीसाठी ऐंशी रुपये तर त्याला २५० रुपये मिळायचे. पण मास्टर मदन हा पैशासाठी गात होता असे ना त्याचे टिकाकार म्हणत ना त्याचे मित्र म्हणत. तो गात असे कारण गाणे ही त्याची आता मानसीक गरज बनली होती. त्यातच त्याला खरा आनंद मिळायचा.

भारतातल्या घरादारात मास्टर मदनचे नाव मोठ्या आदराने घेतले जाऊ लागले. जगातले आश्चर्य म्हणून तो ओळखला जाऊ लागला. मैथिली शरण गुप्तांनी त्यांच्या भारत भारती मधेही त्याचा उल्लेखही केलेला आपल्याला आढळेल. मास्टर मदनची त्याच्या गुरूंवर (संत नंदसिंगजी महाराज) आतोनात श्रध्दा होती. या गुरूंनी म्हणे त्याच्या अकाली मृत्यूचे भाकित करुन ठेवले होते. खर खोटे माहीत नाही, एकदा या गुरुंच्या उपस्थितीत त्याने जोनपूरी राग इतका भक्तिभावाने आळवला होता की श्रोत्यांना त्या सभेत परमेश्वर हजर असल्याचा भास होऊ लागला. तो भास किंवा आभास म्हणा मास्टर मदनने भैरवी आळवल्यावरच दूर झाला. या लहान वयात त्याची धार्मिक वृत्ती इतकी वाढली की तो आता सतत गुरु नानक यांची प्रतीमा जवळ बाळगायला लागला. एवढेच नाही तर कधी कधी झोपायच्या ऐवजी तो समाधीत जायला लागला.
रेडिओवर आता त्याचे नियमित कार्यक्रम होऊ लागले. त्याची किर्ती ऐकून मुंबईहून त्याला सिनेमाता काम करण्याची विनंती करण्यासाठी माणसे येऊ लागली. पण त्याच्या आईवडिलांनी आणि नातेवाईकांनी याला स्पष्ट नकार दिला. त्यावेळेस सिनेमात काम करणे सभ्यपणाचे समजत नसत. याचा त्यांना पुढे फारच पश्चत्ताप झाला. कारण जर त्यांनी यासाठी परवानगी दिली असती तर त्याची चित्रफित असती आणि त्यात त्याची प्रतिमा अजरामर झाली असती.

१९४० साली महात्मा गांधी सिमल्याला गेले होते सभेसाठी. ती सभा ओस पडली कारण आख्खे सिमला मास्टर मदनच्या गाण्याला गेले होते.

मास्टर मदनचे शेवटचे गाणे कलकत्यात झाले. त्या कार्यक्रमात त्याने जवळ जवळ दीड तास राग बागेश्वरी आळवला. एका श्रोत्याने बक्षीस म्हणून लगेचच ५०० रुपये दिले- त्या काळात ही रक्कम फारच मोठी होती. परत येताना मदन दिल्लीला त्याच्या बहिणीकडे उतरला. तेथेदेखील दिल्लीच्या रेडिओ स्टेशनवर त्याला जावे लागायचेच. या छोट्याला त्याचा मेहूणा सायकलवर घेऊन अलिपोर रोडवर जायचा.
याच मुक्कामात मदनला ताप चढला. पण त्याने रेडिओ स्टेशनवर जायचे चालूच ठेवले होते. वैद्यकीय उपचारांनी ताप काही उतरायची लक्षणे दिसेनात तेव्हा त्याने सिमल्याला प्रस्थान ठेवले. या हवा बदलाचाही काही फायदा झाला नाही. काही दिवसांनी एक चमत्कारिक घटना घडली. त्याचे कपाळ आणि सांधे चमकायला लागले. तेव्हा त्याच्यावर पार्‍याचा विषप्रयोग झाल्याची शंका बर्‍याच जणांनी प्रदर्शित केली. किंवा त्याच्या नातेवाईकांच्या अती हव्यासाचाही हा परिणाम असावा. पण त्याची प्रकृती दिवसेंदिवस बिघडतच गेली.

या जगाचा जुन ६ रोजी त्याने निरोप घेतला. त्यावेळी साल होते १९४२.
आपल्या चुकीची दुरुस्ती “त्याने” बरोबर १४ वर्षाने केली आणी या गंधर्वाला परत बोलावून घेतले.

मास्टर मदन गेल्याला आता ७० वर्षे होऊन गेली पण त्याच्या ताकदीचा आणि संगीताची जाण असलेला गायक अजून या क्षेत्रात जन्मायाचा आहे. सागर निझामीच्या दोन गज़ला आणि काही गाणी एवढीच त्याची संपत्ती आपल्याकडे आहे. एवढी रेडिओ रेकॉर्डींग असताना त्यातले काहीही आपले सरकार मिळवू शकले नाही ही अत्यंत बेजबाबदारपणाची आणि दुर्दैवाची बाब आहे.या थोर स्वर्गिय बालगंधर्वाच्या दोन गज़ला आपण ऐकणार आहोत आणि त्याचा अर्थही समजून घेणार आहोत. सागर निझामीची ही गज़ल -

यूँ न रह रह कर हमें तरसाईये
आइये आ जाईये आ जाईये...

फिर वही दानिस्ता ठोकर खाईये..
फिर वही दानिस्ता ठोकर खाईये..
फिर मेरी आग़ोश में गिर जाईये

मेरी दुनिया मुन्तज़िर है आपकी
मेरी दुनिया मुन्तज़िर है आपकी
अपनी दुनिया छोड़ कर आ जाईये

ये हवा `सागर’ ये हल्की चाँदनी
ये हवा `सागर’ ये हल्की चाँदनी
जी में आता है यहीं मर जाये
-सागर निझामी.

दोन प्रेमी जिवांच्या मनात काय काय काय चाललेले असते हे त्यांना जन्म देणार्‍या परमेश्वरालासुध्दा कळणे मुष्कील.
कधी त्याची ओढ तर कधी त्याचा तिरस्कार. कधी अबोला तर कधी प्रेम. कधी क्षमा तर कधी नाही.
सागर काय म्हणतोय ते बघूया.

मला का सारखा तडपवतो आहेस?
ये ना ! एकदाचा ये !
मला सोडतोस, परत परत बाहेर ठोकरा खातोस, काही हरकत नाही,
माझ्या बाहूत तुझा हक्काचा आसरा आहे.

माझ्या जगात तुझी केव्हा पासून प्रतिक्षा आहे.
तुझे जग सोडून ये, माझ्या जगात ये.
नाहीतर ---
ही मदमस्त हवा, हे चांदणे,
तू नाहीस तर मला वाटते की
इथेच मरून जावे.

ही गज़ल इथे ऐका.

आता दुसरी ऐकवतो.
हैरत से तक रहा जहान\-ए\-वफ़ा मुझे
तुम ने बना दिया है मुहब्बत में क्या मुझे

हर मंज़िल\-ए\-हयात से गुम कर गया मुझे
मुड़ मुड़ के राह में वो तेरा देखना मुझे

कैफ़ ख़ुदी ने मौज को कश्ती बना दिया
होश\-ए\-ख़ुदा है अब न ग़म\-ए\-नख़ुदा मुझे

साक़ी बने हुए हैं वो `साग़र’ शब\-ए\-विसाल
इस वक़्त कोई मेरी क़सम देखता मुझे
-सागर निझामी.

माझ्या तुझ्यावरच्या प्रेमाने हे जग अवाक झाले आहे,
बघ माझ्या तुझ्यावरच्या प्रेमाने माझे काय काय झाले आहे.

माझ्या आयुष्याच्या प्रवासात माझ्या मंज़ील मधेच मी हरवलो,
या प्रवासात तुझे माझ्याकडे वळून वळून बघणे.....
किंवा - माझ्या या तुझ्यावरच्या प्रेमाने मला माझ्या अंतीम ध्येयापासून वंचित ठेवले आहे

बघ माझ्या अहंकाराने, बुध्दीने मी या लाटांचीच नाव केली होती...
पण मला आता शुध्द आली आहे आणि हे नाखव्या मला आता कसलेही दु:ख नाही.
किंवा मला आता नावाड्याला जो असतो तसला कसलाही ताण तणाव नाहीत.

सागर म्हणतो, या मिलनाच्या रात्री, ती “ते” आता साकी झाले आहेत,
यावेळी शपत, या अवस्थेत, मला कोणीतरी बघायला पाहिजे....

ही गज़ल इथे ऐका.

मास्टर मदन... एक आपल्या जगाला पडलेले स्वप्न...

हे वारिस शाह! - अमृता प्रीतमच्या काव्याचा अनुवाद

गेले कितीतरी दिवस तिची ती कविता मनात ठाण मांडून बसली आहे. त्या कवितेवर लिहिण्यासाठी अनेकदा सुरुवात केली.... पण त्या अभिजात कवयित्रीच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या त्या काव्याचा अनुवाद मांडताना ''लिहू की नको'' अशी संभ्रमावस्था व्हायची... लिहिताना माझे हात उगाचच थबकायचे! आज मनाने धीर केला आणि तो अपूर्ण अनुवाद पूर्ण केला.

ते अजरामर काव्य आहे अमृता प्रीतम यांच्या हृदयस्पर्शी लेखणीतून उतरलेलं, ''वारिस शाह नूं''......

भारत व पाकिस्तानच्या फाळणीचे दरम्यान पंजाब प्रांताचे जे विभाजन झाले त्या मानवनिर्मित चक्रीवादळात कित्येक कोवळ्या, निरागस बालिका - युवती, अश्राप महिला वासना व सूडापोटी चिरडल्या गेल्या. एकीकडे रक्ताचा चिखल तर दुसरीकडे आयाबहिणींच्या अब्रूची लक्तरे छिन्नविछिन्न होत होती. प्रत्येक युद्धात, आक्रमणात, हिंसाचारात अनादी कालापासून बळी पडत आलेली स्त्री पुन्हा एकदा वासना, हिंसा, सूड, द्वेषाच्या लचक्यांनी रक्तबंबाळ होत होती. अनेक गावांमधून आपल्या लेकी-बाळींची अब्रू पणाला लागू नये म्हणून क्रूर कसायांगत नंगी हत्यारे परजत गिधाडांप्रमाणे तुटून पडणाऱ्या नरपशूंच्या तावडीत सापडण्याअगोदरच सख्खे पिता, बंधू, चुलत्यांनी आपल्याच लेकीसुनांच्या गळ्यावरून तलवारी फिरवल्या. शेकडो मस्तके धडावेगळी झाली. अमृता आधीच निर्वासित असण्याचे, तिच्या लाडक्या पंजाबच्या जन्मभूमीपासून कायमचे तुटण्याचे दुःख अनुभवत होती. त्या वेळी तिच्या संवेदनशील कवीमनावर आजूबाजूच्या स्त्रियांचे आर्त आक्रोश, त्यांच्या वेदनांच्या ठुसठुसत्या, खोल जखमा, हंबरडे आणि आत्मसन्मानाच्या उडालेल्या चिंधड्यांचे बोचरे ओरखडे न उठले तरच नवल! अशाच अस्वस्थ जाणीवांनी विद्ध होऊन, एका असहाय क्षणी तिच्या लेखणीतून तिने फोडलेला टाहोच ''वारिस शाह नूं'' कवितेत प्रतीत होतो. १९४७ साली लिहिली गेलेली ही कविता ''हीर'' या लोकप्रिय दीर्घकाव्याच्या - हीर व रांझ्याच्या अजरामर व्यक्तिरेखांच्या रचनाकाराला, वारिस शहाला उद्देशून लिहिली आहे!

हे वारिस शाह!

आज मी करते आवाहन वारिस शहाला
आपल्या कबरीतून तू बोल
आणि प्रेमाच्या तुझ्या पुस्तकाचे आज तू
एक नवीन पान खोल
पंजाबच्या एका कन्येच्या आक्रोशानंतर
तू भले मोठे काव्य लिहिलेस
आज तर लाखो कन्या आक्रंदत आहेत
हे वारिस शाह, तुला विनवत आहेत
हे दुःखितांच्या सख्या
बघ काय स्थिती झालीय ह्या पंजाबची
चौपालात प्रेतांचा खच पडलाय
चिनाब नदीचं पाणी लाल लाल झालंय
कोणीतरी पाचही समुद्रांमध्ये विष पेरलं
आणि आता तेच पाणी ह्या धरतीत मुरतंय
आपल्या शेतांत, जमिनीत भिनून
तेच जिकडे तिकडे अंकुरतंय...
ते आकाशही आता रक्तरंजित झालंय
आणि त्या किंकाळ्या अजूनही घुमताहेत
वनातला वाराही आता विषारी झालाय
त्याच्या फूत्कारांनी जहरील्या
वेळूच्या बासरीचाही नाग झालाय
नागाने ओठांना डंख केले
आणि ते डंख पसरत, वाढतच गेले
बघता बघता पंजाबाचे
सारे अंगच काळेनिळे पडले
गळ्यांमधील गाणी भंगून गेली
सुटले तुटले धागे चरख्यांचे
मैत्रिणींची कायमची ताटातूट
चरख्यांची मैफिलही उध्वस्त झाली
नावाड्यांनी साऱ्या नावा
वाहवल्या आमच्या सेजेसोबत
पिंपळावरचे आमचे झोके
कोसळून पडले फांद्यांसमवेत
जिथे प्रेमाचे तराणे घुमायचे
ती बासरी न जाणे कोठे हरवली
आणि रांझाचे सारे बंधुभाई
बासरी वाजवायचेच विसरून गेले
जमिनीवर रक्ताचा पाऊस
कबरींना न्हाऊ घालून गेला
आणि प्रेमाच्या राजकुमारी
त्यांवर अश्रू गाळत बसल्या
आज बनलेत सगळे कैदो*
प्रेम अन सौंदर्याचे चोर
आता मी कोठून शोधून आणू
अजून एक वारिस शाह....

(* कैदो हा हीरचा काका होता, तोच तिला विष देतो! )

अनुवाद -- अरुंधती

मूळ काव्य :

(पिंजर चित्रपटात ह्या कवितेचा सुरेख वापर केला गेला आहे. )

वारिस शाह नूं

आज्ज आखां वारिस शाह नूं

कित्थे कबरां विचों बोल ते आज्ज किताबे ईश्क दा

कोई अगला वर्का फोल

इक रोई सी धी पंजाब दी तूं लिख लिख मारे वैण

आज्ज लखां धिया रोंदियां तैनूं वारिस शाह नूं कैण

उठ दर्दमंदा देया दर्दिया उठ तक्क अपना पंजाब

आज्ज वेले लाशा विछियां ते लहू दी भरी चिनाव

किसे ने पंजा पाणियां विच दित्ती जहर रला

ते उणा पाणियां धरत नूं दित्ता पानी ला

इस जरखेज जमीन दे लू लू फुटिया जहर

गिट्ठ गिट्ठ चड़ियां लालियां ते फुट फुट चड़िया कहर

उहो वलिसी वा फिर वण वण वगी जा

उहने हर इक बांस दी वंजली दित्ती नाग बना

नागां किल्ले लोक मूं, बस फिर डांग्ग ही डांग्ग,

पल्लो पल्ली पंजाब दे, नीले पै गये अंग,

गलेयों टुट्टे गीत फिर, त्रखलों टुट्टी तंद,

त्रिंझणों टुट्टियां सहेलियां, चरखरे घूकर बंद

सने सेज दे बेड़ियां, लुड्डन दित्तीयां रोड़,

सने डालियां पींग आज्ज, पिपलां दित्ती तोड़,

जित्थे वजदी सी फूक प्यार दी, ओ वंझली गयी गवाच,

रांझे दे सब वीर आज्ज भुल गये उसदी जाच्च

धरती ते लहू वसिया, कब्रां पइयां चोण,

प्रीत दिया शाहाजादियां अज्ज विच्च मजारां रोन,

आज्ज सब्बे कैदों* बन गये, हुस्न इश्क दे चोर

आज्ज कित्थों लाब्ब के लयाइये वारिस शाह इक होर

--- अमृता प्रीतम

हे काव्य अमृता प्रीतम यांच्याच आवाजात ऐकण्यासाठी यूट्यूबची ही लिंक :

विशालनेही ह्या काव्य व अनुवादाला आपल्या ब्लॉगवर akshare!
येथे टाकलंय, एका सुरेख प्रस्तावनेसह....Smile अवश्य वाचा.

-- अरुंधती

असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग ३

असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग ३

वाचकमित्रहो,

वणक्कम!! असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग १ आणि भाग २ ह्या स्फुटांस मिळालेला भरघोस प्रतिसाद, आणि त्यासह वाचकांनी पाठविलेल्या खरडी, व्यनि, आणि जीमेलावरील प्रेमळ आग्रहवजा विनंतींस मान देवून मी त्याच मालिकेतले हे तिसरे स्फुट आपणांसमोर मांडण्याचे धार्ष्ट्य करित आहे. कृपया गोड मानून घेणे!

ह्यापूर्वीच्या माझ्या स्फुटांत मी श्री. वैरमुत्तु ह्यांच्या एका कवितेविषयी लिहिले आहे. सदरील स्फुटांतदेखील त्यांच्याच दुसया एका कवितेविषयी लिहित असल्याने मूळ लेखनापूर्वी त्यांची एक औपचारिक ओळख करून देतो :- श्री. वैरमुत्तु हे तमिळभाषेमध्ये ’कविराज’ नामाभिधानाने मान्यताप्राप्त आहेत. अनेकविध पुरस्कार त्यांस प्राप्त आहेत. तमिळभाषेवर जिवापलिकडे प्रेम करणाया तमिळ जनतेच्या अभिमानांपैकी एक असे स्थान त्यांस प्राप्त आहे. मराठीभाषक वाचकांसाठी थोडक्यात सांगावयाचे झाल्यास, श्री. वैरमुत्तु हे "तमिळनाडुचे लाडके व्यक्तिमत्त्व" होत. असो.

வைரமுத்து

ह्यापूर्वीच्या भाग २ मध्ये मी श्री. वैरमुत्तुंच्या चिन्न चिन्न आसै ह्या कवितेबद्दल लिहिले होते. त्या कवितेचे रसग्रहण मराठीभाषकांस सुलभ व्हावे ह्याकरिता तमिळभाषेतील "जोपर्यंत एखाद्या वाक्यात ’नाही’ असे म्हटले जात नाही, तोपर्यंत तेथे ’आहे’ असे गृहित धरले जाते" हा नियमही उलगडून सांगितला होता. आता ह्या स्फुटांतील वैशिष्ट्यपूर्ण कवितेकडे...

---

தமிழெழுத்தில் देवनागरीमध्ये लिप्यंतरीत मराठीभाषेमध्ये शब्दार्थ
யாக்கை திரி
காதல் சுடர்
याक्कै तिरि
कादल् सुडर्
देह वात
प्रेम ज्योत
ஜீவன் நதி
காதல் கடல்
जीवऩ् नदि
कादल् कडल्
जीवन नदी
प्रेम समुद्र
பிறவி பிழை
காதல் திருத்தம்
पिऱवि पिऴै
कादल् तिरुत्तम्
जन्म चूक
प्रेम शुद्धीपत्र
இருதயம் கல்
காதல் சிற்பம்
इरुदयम् कल्
कादल् सिऱ्पम्
हृदय दगड
प्रेम शिल्प
சென்மம் விதை
காதல் பழம்
सॆऩ्मम् विदै
कादल् पऴम्
जन्म बीज
प्रेम फळ
உலகம் துவைதம்
காதல் அத்வைதம்
उलहम् तुवैदम्
कादल् अत्वैदम्
विश्व द्वैत
प्रेम अद्वैत
சருவம் சூன்யம்
காதல் பிண்டம்
सरुवम् सूऩ्यम्
कादल् पिण्डम्
सर्व शून्य
प्रेम पिण्ड
மானுட மாயம்
காதல் அமரம்
माऩुड मायम्
कादल् अमरम्
मनुष्यजात माया
प्रेम अमर

---

व्याकरणशास्त्रीयदृष्ट्या ह्या कवितेत एकही वाक्य नाही. केवळ एकासमोर एक मांडलेले शब्द आहेत. प्रत्येक शब्द हा त्याच्या पुढल्यामागल्या शब्दांत असा काही गुंफला गेला आहे की तो संपल्यानंतरदेखील कवितेमध्ये त्याचा अर्थ संपत नाही; उर्वरीतच राहतो. ह्याकारणे, रसग्रहणात नुसता एकच शब्दार्थ लक्षात घेवून चालत नाही, तर त्या शब्दाचे मागीलपुढील शब्दांच्या अर्थाशी नाते जुळवावे लागते. हे झाले ढोबळ अर्थासाठी - तमिळभाषेत एका शब्दाचे अनेक सूक्ष्मार्थ असतात. ते सारे लक्षात घेवून जुळवाजुळवी करून कविता समजावून घेणे म्हणजे एक आनंददायी कसरतच असते. असो! वाचकांस लक्षात येईल, वरील कवितेत कमीत कमी शब्दांत ’प्रेम’ ह्या संकल्पनेची जास्तीत जास्त महती वर्णन करण्याची किमया श्री. वैरमुत्तु ह्यांनी साधली आहे. असे करतांना केवळ एकासमोर एक नामे उपयोजिली आहेत. [नाम:- प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूंच्या किंवा गुणांच्या नावांना ’नाम’ असे म्हणतात.]

अशा प्रकारच्या कवितांचा सरळसरळ अनुवाद न करता त्यांचा अर्थ (interpretation) करावा लागतो. हे विधान तमिळमधून मराठीमध्ये सांगण्यासाठी म्हणून नव्हे, तर तमिळमध्येदेखील अशी कविता समजावून घेण्याकरिता तिचा अर्थ करावा लागतो. हा अर्थ बहुतांशी अर्थकर्त्यावर अवलंबून असल्याने तो नानाविध प्रकारे होऊ शकतो. जितके अर्थकर्ते, तितके वेगळे अर्थ. आणि तरीही सारे अर्थ बरोबरच!

उदा:- एखादा तत्त्वचिंतक वरील कवितेतील पहिल्या ओळीचा अर्थ ’देह म्हणजे जगतात प्रकाश पसरविणाया दिव्याची वात होय.. प्रेम म्हणजे त्या दिव्याची ज्योत होय’ असा करू शकेल, तर त्याच ओळीचा अर्थ एखादा निराशाग्रस्त मनुष्य ’देह हा दिव्याच्या वातीप्रमाणे असतो.. प्रेम हे त्यास ज्योतीप्रमाणे जाळत संपविते..’ असाही करू शकेल.. असे नानाविध प्रकारे अर्थ केले जावू शकतात. त्यातील अमुक अर्थच बरोबर - तमुक चूक असे छातीठोकपणे म्हणतां येणार नाही; कारण कोणास कोणता अर्थ लागू करवून घ्यावयाचा हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. गूढकाव्य जे म्हणतांत ते हेच काय?!

व्याकरणदृष्ट्या ही चमत्कृती भाषेच्या वैशिष्ट्यपूर्ण उपयोजनामुळे झालेली आहे. एकासमोर एक मांडलेली शुद्ध नामे सोडता ह्या कवितेत व्याकरणदृष्ट्या इतर काहीही नाही, आणि तरीही केवढा अफाट अर्थ ही कविता सामावून जाते!

---

तर प्रश्न असा, की; असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय?

---

पावसाळी विशेषांक प्रकाशन !

मंडळी, आज १७ जून. आपल्या हाती आमचा हा पावसाळी विशेषांक ऋतू हिरवा देतांना मला विशेष आनंद होत आहे. सद्द्या पावसाने चांगलाच जोर धरलाय आणि अशा कुंद-फुंद वातावरणात कॉफी अथवा मसालेदार चहाचे(आपापल्या आवडीप्रमाणे) घुटके घेता घेता आमचा हा अंक वाचतांना आपला आनंद द्विगुणित होईल ह्याची मला पूर्ण खात्री आहे. ह्या अंकात आम्ही महाजालावरील काही नामवंतांबरोबरच नवोदितांचाही समावेश केलेला आहे....तेव्हा आता करा सुरुवात वाचायला....आणि हो...अंक आवडला/नावडला तरी कृपया तुमची प्रतिक्रिया टंकायला विसरू नका बरं का.

कळावे आपला

स्नेहांकित

प्रमोद देव

एस्पेरान्तो : एक वैश्विक भाषा

''एस्पेरांतो? ही कसली भाषा? ही तर एखादी इटालियन किंवा स्पॅनिश रेसिपीच वाटते बघ!'' माझी मैत्रीण मला हसून म्हणाली. खरेच, तिचा तरी काय दोष म्हणा.... १२५ वर्षांपूर्वी निर्माण झालेली ही भाषा भारतात येऊन गेली ३० वर्षे झाली तरी अद्याप भारतातील लोकांना तिच्याबद्दल फारशी माहिती नाही. ह्या लेखाचा उद्देश एस्पेरांतो या आगळ्यावेगळ्या भाषेची तोंडओळख करून देणे हा आहे.

कधी काळी ह्या भाषेचे प्राथमिक, अगदीच जुजबी ज्ञान मिळविण्याचा योग मला प्राप्त झाला आणि एका नव्याच भाषाविश्वात प्रवेश करण्याची संधी त्याद्वारे खुली झाली. (मी ह्या भाषेचा अगदीच प्राथमिक अभ्यास केला आहे ही नोंद जाणकारांनी कृपया घ्यावी. तेव्हा चुभूदेघे )

तर ही एस्पेरांतो भाषा नक्की आहे तरी काय?

बोलायला अतिशय सोपी, सरळ व समूहासाठी निर्माण केली गेलेली ही एक कृत्रिम भाषा आहे. कृत्रिम एवढ्याचसाठी, की तिचे मूळ अनेक इंडो-जर्मॅनिक भाषांमध्ये, युरोपीय भाषांमध्ये आहे. कदाचित त्यामुळेच ज्यांना संस्कृत व लॅटीन भाषांची थोडीफार जाण व ज्ञान आहे त्यांना ही भाषा जवळची वाटते. त्यात अनेक स्पॅनिश, जर्मन, इटालियन धर्तीचे, त्यांतून घेतलेले किंवा मूळ असलेले शब्दही आहेत. थोडक्यात, युरोपियन व आशियाई भाषांच्या अभ्यासकांना ही भाषा अवगत करणे अजिबात कठीण नाही. मात्र ह्या भाषेचा उद्देश जगातील सर्व समूहाला एका सामायिक पर्यायी भाषेत एकमेकांशी संवाद साधता यावा हा आणि हाच आहे. आज जगातील लाखो लोक तरी ही भाषा आपल्या स्थानिक भाषेगत सफाईने बोलतात. पुण्यातील ह्या भाषेचे अभ्यासक व एस्पेरांतोच्या भारतातील संघाचे अध्यक्ष डॉ. अब्दुल सलाम म्हणतात त्याप्रमाणे ही काही परिषदांमध्ये, अभ्यासकांच्या मेळाव्यात काथ्याकूट करायची भाषा नव्हे; तर ही जनसमूहाची - सामान्य माणसाची भाषा आहे.

भाषेचे जनक

एल. एल. जामेनहोफ

(छायाचित्र स्रोत : विकिपीडिया)

पोलंडच्या वॉरसा प्रांतातील (तेव्हा तो रशियाचा भाग होता) जामेनहोफ या सद्गृहस्थांनी इ‌. स. १८७७ ते १८८५चे दरम्यान ह्या भाषेची निर्मिती केली. त्यांच्या काळातील राजकीय, सामाजिक व प्रांतिक भेदांचे मूळ लोकांचा आपापसात परस्पर संवाद नसण्यात आणि तो संवाद करण्यासाठी एखादी सामायिक भाषा नसण्यात आहे याबाबतीत त्यांचे ठाम मत होते. त्यांना स्वतःला रशियन, यिडिश, जर्मन, फ्रेंच, पोलिश, ग्रीक, स्पॅनिश, लॅटीन, हिब्रू, इंग्रजी, इटालियन व लिथ्वेनियन भाषा अवगत होत्या. स्थानिक लोकांच्या आपापसातील भांडणांना, प्रांतवादाला, हिंसेला आणि गैरसमजुतींना जामेनहोफ महाशय कंटाळले होते. त्यातूनच त्यांना एस्पेरांतो ही जागतिक उपभाषा निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. पुढे त्यांच्या तीन मुलांपैकी लिडिया ही एस्पेरांतो प्रशिक्षक म्हणून युरोप व अमेरिकेत बराच प्रवास करून ह्या भाषेला प्रचलित करत असे. दुर्दैवाने जामेनहोफ यांच्या तिन्ही मुलांची होलोकास्टमध्ये हत्या झाली.

भाषेच्या नावामागील इतिहास

जामेनहोफ यांनी एस्पेरांतोविषयीचे पहिले पुस्तक डोक्तोरो एस्पेरांतो (डॉक्टर एस्पेरांतो) या नावाखाली इ. स. १८८७ साली प्रकाशित केले होते. एस्पेरो शब्दाचा अर्थ ''आशा बाळगणारा'' असा होतो. ह्या भाषेचे मूळ नाव ''ल इंतरनॅशिया लिंग्वो'' (द इंटरनॅशनल लॅन्ग्वेज) असे होते. जामेनहोफ यांच्या सन्मानार्थ आज ही भाषा एस्पेरांतो नावाने ओळखली जाते.

एस्पेरांतो भाषेची वैशिष्ट्ये

१. आंतरराष्ट्रीय भाषा : जेव्हा वेगवेगळ्या मातृभाषा बोलणारे लोक एकत्र येतात तेव्हा एस्पेरांतो भाषेचा खरा उपयोग होतो. जगात ही भाषा बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंगणिक वाढतच आहे. आज एस्पेरांतो भाषा प्रामुख्याने बोलणाऱ्या कुटुंबांमध्ये वाढलेल्या व आपल्या मातृभाषेसह एस्पेरांतोला सफाईने बोलणाऱ्या मुलांची संख्या हजारांच्या वर आहे.

२. समानता : ही भाषा सर्व लोकांना एकसमान पातळीवर नेऊन ठेवते. येथे भाषेच्या जोरावर कोणी श्रेष्ठ कनिष्ठ नाही. सर्वांनीच ही भाषा शिकण्यासाठी समान परिश्रम घेतले असल्यामुळे ही समानतेची पायरी परस्परसंवादात फार कामी येते.

३. तटस्थ : ही भाषा कोण्या एका जातीचा, देशाचा वा संप्रदायाचा मक्ता नसल्यामुळे एक तटस्थ भाषा ह्या अर्थी काम करू शकते.

४. सोपेपणा: ही भाषाच मुळी सोप्यात सोप्या पद्धतीने शिकता यावी, बोलता यावी अश्या प्रकारे तयार केली गेली असल्यामुळे त्या तुलनेत ती शिकण्यासाठी कमी कष्ट पडतात.

५. जिवंत भाषा : इतर भाषांप्रमाणेच ह्याही भाषेचा कालपरत्वे विकास होत गेला आहे आणि ह्या भाषेतही आपण आपले विचार व भावना प्रभावीपणे मांडू शकतो हे तिचे वैशिष्ट्य.

आज ह्या भाषेत कित्येक हजार पुस्तके, मासिके, वृत्तपत्रे, संगीत व काही प्रमाणात चित्रपटांची निर्मिती झाली आहे. तसेच जगभरातील नामवंत साहित्यिकांचे साहित्य ह्या भाषेत रुपांतरित झाले आहे. संपूर्ण दुनियेत ह्या भाषेला आत्मसात केलेली मंडळी तिचा उपयोग जगभरात प्रवास करताना, पत्रमैत्रीसाठी तर करतातच! जगातील एस्पेरांतो बोलणारे लोक एकमेकांच्या घरी आतिथ्याचा विनामूल्य लाभ घेतात. शिवाय एकमेकांच्या भेटीगाठीत फक्त एस्पेरांतो बोलण्यावर भर, परस्पर संस्कृती-पाककला-परंपरा-विचार इत्यादींची एस्पेरांतोच्या माध्यमातून देवाणघेवाण ह्याही गोष्टी आठवणीने पाळल्या जातात. ह्या भाषेसंदर्भातील वेगवेगळ्या परिषदा, संवाद, स्नेहसंमेलनांतून निरनिराळ्या ठिकाणी एस्पेरांतो बोलणारे लोक एकत्र येऊन सांस्कृतिक आदानप्रदान करतानाच ह्या भाषेचा मूळ उद्देश जपण्याचे काम करतात.

भाषेचा उद्देश

ह्या भाषेला निर्माण करण्यामागे जगातील सर्व लोकांना आपली भाषा सोडून, परस्परांशी बोलण्यासाठी एक समान भाषा असावी... ती भाषा प्रांतमुक्त, जातिमुक्त, देशमुक्त, वर्चस्वमुक्त असावी हा उद्देश होता. त्यात स्थानिक भाषेला ही भाषा पर्याय म्हणून गणणे, भाषावैविध्यात खंड पाडणे हे उद्देश अजिबातच दिसत नाहीत. एक तटस्थ, कोणतीही विशिष्ट संस्कृती नसलेली व स्वतःची वेगळी ''वैश्विक'' संस्कृती असलेली ही भाषा तिच्या ह्या वैशिष्ट्यांमुळेच अनेक टीकाकारांचे लक्ष्य बनली आहे. तसेच ह्या भाषेतील शब्द प्रामुख्याने युरोपियन धाटणीचे असल्याचा आरोपही तिच्यावर केला जातो. मानवी इतिहासातील एक समृद्ध, विचारपूर्वक आणि ऐतिहासिक - क्रांतिकारक पाऊल म्हणून ह्या भाषेची किमान ओळख करून घेणे प्रत्येकच 'ग्लोबल' नागरिकाच्या फायद्याचे ठरणारे आहे. इ. स. १९५४ मध्ये युनेस्कोने ह्या भाषेला औपचारिक मान्यता बहाल केली आहे.

ह्या भाषेतील काही शब्द उदाहरणादाखल :

हॅलो : सालूतोन : Saluton
येस : जेस : Jes
नो : ने : Ne
गुड मॉर्निंग : बोनान मातेनोन : Bonan matenon
गुड आफ्टरनून : बोनान वेस्पेरोन : Bonan vesperon
गुड नाईट : बोनान नोक्तोन : Bonan nokton
ऑल राईट : बोने : Bone
थॅंक यू : दांखोन : Dankon
प्लीज : बोन्वोलू : Bonvolu

भाषा कशी शिकायची?

इंटरनेटच्या जमान्यात काही संकेतस्थळांच्या माध्यमातून तुम्ही ही भाषा शिकू शकता.

त्यासाठी http://www.lernu.nethttp://www.ikurso.net या संकेतस्थळांवर नजर टाका.

मराठीत ह्या भाषेवरील पुस्तकाची निर्मिती डॉ. अनिरुद्ध बनहट्टी यांनी केली आहे. मला इंटरनेटवर पुस्तक मागवण्यासाठीचा त्यांचा मिळालेला पत्ता हा असा : बी ३, कांचन नगरी, कात्रज, पुणे - ४६.
ईमेलः anibani@rediffmail.com

तसेच ह्या विषयावर तेलुगू व इंग्रजी भाषेत डॉ. रंगनायकुलू यांनी पाठ्यपुस्तकनिर्मिती केली आहे.
त्यांचा मिळालेला पत्ता असा :

P V RANGANAYAKULU
(ranganayakulu@hotmail.com , pvranga@rediffmail.com)
asista profesoro, 46 Junior Officers' Quarters, Behind TTD Admn Bldgs, KT Road, Tirupati 517 501, Andhra Pradesh.

(वरील पत्ते हे इंटरनेटवर मिळालेले असून त्यांची लेखिकेने खात्री करून घेतलेली नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी! )

चित्रफितींच्या लिंक्स

तसेच ह्या विषयावर यूट्यूबवरही काही चित्रफिती उपलब्ध आहेत. त्याही जरूर पाहाव्यात!
त्यांच्या लिंक्स पुढीलप्रमाणे :

या भाषेविषयी काही बातम्या स्थानिक वृत्तपत्रांमध्येही छापून आल्या आहेत. त्यातीलच ही एक बातमी :

http://www.thehindu.com/2008/02/13/stories/2008021359100400.htm

माझे शिक्षक

माझे शिक्षक डॉ. अब्दुल सलाम यांच्याविषयी दोन शब्द लिहिल्याखेरीज हा लेख संपवता येणार नाही. त्यांच्या माध्यमातूनच मला या भाषेची सुरेख ओळख झाली. अनेक विद्यार्थ्यांशी, समाजातील विविध स्तरांतील लोकांशी सुसंवाद साधण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. उत्साह, नैपुण्य, विनम्रता, सौहार्द आणि कार्यनिष्ठा यांचा अपूर्व संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात पाहावयास मिळतो. अनेक वर्षे समाजकल्याण खात्यातील महत्त्वपूर्ण अधिकारपद निभावल्यावर निवृत्तीनंतरही समाजहितासाठी झटणारे डॉ. अब्दुल सलाम ज्या सफाईने, सहजतेने वावरतात, बोलतात त्यावरून त्यांना दृष्टीचे सुख नाही हे कोणाला कळणारही नाही! पण कदाचित त्यामुळेच त्यांच्या कार्यातले झपाटलेपण, त्यांची तळमळ समोरच्या व्यक्तीच्या मनाचा ठाव घेते. त्यांचे मोकळे हास्य, वागण्यातील सुसंस्कृतता त्यांच्या विश्वनागरिकत्वाचीच प्रचीती देते. डॉ. सलामांना माझे ह्या लेखाद्वारे विनम्र अभिवादन!

(लेखातील बरीचशी माहिती विकिपीडियामधून साभार!
विकीपीडियाची लिंक : http://en.wikipedia.org/wiki/Esperanto)

डॉ. अब्दुल सलाम यांना आपण खालील पत्त्यावर संपर्क साधू शकता :
HELPO FOUNDATION

India Office:
5, Archana Corner, Saluke Vihar Road, Pune - 411 048, India.
Tel.: +91-20-26855632, 26855644. Fax: +91-20-26855644.

Email: helpo@vsnl.com
http://www.helpo.in/index.htm

-- अरुंधती

पाद्रीबुवांची मराठी शिकवणी

तुम्ही कधी कोणाला आपली मातृभाषा गोर्‍या साहेबाच्या भाषेतून शिकवायची कसरत केली आहे? आणि त्यातून तुमचा आधीचा अनुभव अगदीच माफक असताना व तुमचा विद्यार्थी कोणी ऐरागैरा नाही तर तो एक ख्रिश्चन मिशनरी पाद्री आहे हे माहीत असताना? मला हा अनोखा अनुभव घेण्याची मजेशीर संधी काही वर्षांपूर्वी मिळाली आणि त्या छानशा अनुभवातून एक सुंदर स्मृतिचित्र तयार होताना मलादेखील काही शिकायला मिळालं.

कॉलेजच्या सोनेरी दिवसांमधील गोष्ट. भटकंती, सहली, सिनेमा, हॉटेलिंग, वाढदिवस इत्यादींसाठी कायमच घरून हातखर्चाला दिलेले पैसे कमी पडायचे. अवाजवी पैशांची मागणी केली की घरून सांगितले जायचे, "आपापले पैसे कमावा आणि खर्च करा"! स्वावलंबनाचे व स्वकष्टाच्या कमाईचे महत्त्व समजण्यासाठी त्याचा फार उपयोग झाला. त्यामुळेच मी कधी छोटासा जॉब कर, कधी इंग्रजी वृत्तपत्रांत काहीबाही लेख पाठव तर कधी शिकवण्या घे असे नाना उद्योग करून गरजेबरहुकूम धन जोडण्याच्या कामी असे. सुदैवाने इंग्रजी व मराठी ह्या दोन्ही भाषांच्या टेकूमुळे मला अर्थार्जनाच्या संधींची कधीच कमतरता भासली नाही.

तर एक दिवस अचानक एका मित्रशिरोमणींचा फोन आला. त्यांची ओळख असलेल्या एका मिशनरी संस्थेत एका पाद्रीबुवांना गोर्‍या साहेबाच्या भाषेतून (इंग्रजीतून) मराठी शिकवण्यासाठी सुयोग्य व्यक्ती हवी होती. 'तुला ह्या जॉबमध्ये इंटरेस्ट आहे का? ' अशी पलीकडून पृच्छा झाली. काहीतरी वेगळे करायला मिळते आहे म्हणून मी लगेच होकार दिला. झाले! मिशनच्या मुख्य पाद्रींनी माझी एक अनौपचारिक मुलाखत घेतली. सौम्य, मृदू बोलणे व हसरे व्यक्तिमत्त्व असलेल्या ह्या पाद्रींनी जणू माझी बरीच जुनी ओळख असल्याप्रमाणे माझे स्वागत केले. माझ्या सोयीची वेळ, पगाराची रक्कम आणि कामाची साधारण रूपरेषा इत्यादी गोष्टींची चर्चा करून झाल्यावर त्यांनी मला त्यांच्या संस्थेच्या समृद्ध पुस्तकालयातून हवी ती संदर्भपुस्तके, शब्दकोश इ. घरी नेण्याचीही परवानगी दिली. ते सर्व घबाड पाहिल्यावर मला काय आनंद झाला म्हणून सांगू! घरी मी अक्षरशः उड्या मारीत परत आले.

त्यानंतर मी माझ्या ६८ वर्षांच्या तरुण विद्यार्थ्यालाही भेटले. छोटीशी, जेमतेम पाच फूट उंची असलेली, कमरेतून किंचित वाकलेली मूर्ती, काळासावळा वर्ण, पिकलेले आखूड केस व डोळ्यांना जाडसर भिंगांचा चष्मा! हे माझे विद्यार्थी खास दक्षिण भारताच्या किनारपट्टी प्रदेशातून पुण्याच्या मिशनशी संलग्न असलेल्या शैक्षणिक संस्थेत प्रशासकीय जबाबदारी सांभाळण्यासाठी आले होते. ह्या दाक्षिणात्य पाद्रीबुवांना तरुण अशासाठी म्हणावेसे वाटते कारण वयाच्या ६८व्या वर्षीही त्यांचा काही नवे शिकण्याचा, नवी भाषा - नवी संस्कृती जाणून घेण्याचा उत्साह केवळ अप्रतिम होता! त्यांच्या पहिल्या भेटीतच मला त्यांचे हे गुण भावले. कारण उत्साहापोटी त्यांनी ग्रंथालयातून मराठी शिकण्यासाठी त्यांना उपयुक्त वाटलेली २-३ पुस्तके मला दाखवायला आणली होती. थोडी जुजबी चर्चा करून दुसरे दिवसापासून आमची साहेबाच्या भाषेतून मराठीची शिकवणी सुरू झाली.

तीन महिन्यांच्या आमच्या ह्या शिकवणीत आम्ही दोघांनी आपापल्या भाषा- संस्कृती - तत्त्वज्ञान- विचार इत्यादींची भरपूर देवाणघेवाण केली. आमचे हे पाद्रीबुवा मराठीतून बोलायला बऱ्यापैकी तयार होत असले तरी लिखाणात खूप कच्चे होते. मी त्यांना जो गृहपाठ देत असे तोदेखील ते कसाबसा पूर्ण करीत. जमलं तर चक्क अळंटळं करीत. स्वभाव तसा थोडासा रागीटच होता. शिवाय ते वयाने एवढे मोठे होते की सुरुवातीला मला त्यांना गृहपाठ न करण्याबद्दल, टाळाटाळीबद्दल रागावायचे कसे हाच प्रश्न पडत असे. पण माझी ही अडचण संस्थाप्रमुखांनी सोडवली. "खुशाल शिक्षा करा त्यांना, " प्रमुखांनी मला खट्याळपणे हसत सांगितले. मीही पडत्या फळाची आज्ञा मानून आमच्या ह्या विद्यार्थी पाद्रीबुवांना जास्तीच्या गृहपाठाची शिक्षा देत असे. मग तेही कधी लहान मुलासारखे रुसून गाल फुगवून बसत, तर कधी गृहपाठाचा विषय निघाला की इतर गप्पा मारून माझे लक्ष दुसरीकडे वेधायचा प्रयत्न करीत. कधी माझ्यासाठी चॉकलेट आणीत तर कधी एखादी अवघड किंवा अवांतर शंका विचारून विषयांतर करता येतंय का ते पाहत. अर्थात मीही स्वतः कॉलेजमध्ये शिकत असल्यामुळे मला सर्व दिशाभूल तंत्रे तोंडपाठ होती! त्यामुळे मी त्यांच्या दोन पावले पुढेच असे. मग त्यांच्या चाळिशीच्या फ्रेमआडून माझ्या दिशेने कधी वरमलेले तर कधी मिश्किल हास्यकटाक्ष टाकण्यात येत असत!

ह्या काळात अवांतर गप्पांच्या ओघात त्यांनी मला त्यांची जीवनकहाणीही थोडक्यात सांगितली. दक्षिणेतील एका छोट्याशा गावात परिस्थितीने गरीब ख्रिश्चन कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बरीच भावंडे आणि पाचवीला पुजलेले दारिद्र्य! शाळेतही त्यांची अभ्यासात खूप प्रगती नव्हती. पण फुटबॉलमध्ये मात्र विलक्षण गती! अगदी आंतरराज्य स्तरावर खेळले ते! पण फुटबॉलमध्ये करियर करण्यासाठी घरची परिस्थिती अनुकूल नव्हती. मग त्यांनी धर्मकार्याला वाहून घेतले. त्याबदल्यात त्यांना ठराविक वेतन सुरू झाले, पोटापाण्याचा प्रश्न मिटला आणि त्या कामातच सगळी हयात गेली. जास्त शिक्षण नसल्यामुळे ह्याही क्षेत्रात अडचणी येत गेल्या. अनेक अपेक्षाभंग पचवावे लागले. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना मिशनच्या कामासाठी पुण्यासारख्या अनोळखी प्रांतात, अनोळखी लोकांमध्ये, वेगळ्या भाषा व संस्कृतीच्या प्रदेशात त्यांना धाडण्यात आले. पण तशाही अवस्थेत त्यांची शिकण्याची तयारी, नवी भाषा आत्मसात करून ती बोलायचा उत्साह खरोखरीच स्तुत्य होता. शारीरिक व्याधी, म्हातारपण, वयाबरोबर येणारी विस्मृती ह्या सर्व आव्हानांना तोंड देत ते आपल्या नव्या जबाबदारीसाठी तयारी करत होते. पण मग कधी कधी त्यांचाही धीर सुटे. संस्थेतील राजकारणाने ते अस्वस्थ होत. आपल्यावर अन्याय झालाय ही भावना त्यांचा पाठलाग करत असे. त्यातल्या त्यात सुख म्हणजे रोजच्या साध्या साध्या वाटणार्‍या गोष्टींमध्ये त्यांना मानसिक आराम मिळत असे. पण तिथेही अपेक्षाभंग झाला की ते कमालीचे अस्वस्थ होत. खास करून मिशनच्या भोजनकक्षात दिले गेलेले खाणे त्यांच्या पसंतीचे नसले की ते हमखास सायंकाळी त्याविषयी माझ्याकडे एखाद्या लहान मुलासारखी तक्रार करीत. मग खाण्यावरून त्यांचे लक्ष अभ्यासात आणण्यासाठी मला खरीखुरी कसरत करावी लागत असे.

एक दिवस आमच्यात अशीच नेहमीच्या गृहपाठाच्या विषयावरून भलतीच खडाजंगी उडाली. आज पाद्रीबुवा भलतेच घुश्शात होते! ''तू मला मुद्दामहून अवघड गृहपाठ देतेस! तुला माहीत आहे मी डायबिटीसचा पेशंट आहे, मला थोडे कमी दिसते, ऐकूही कमी येते. पण तरी तू मला कसलीही सूट देत नाहीस! हे चांगलं नाही!'' मला खरं तर त्यांचा संपूर्ण आविर्भाव पाहून मनात हसायला येत होते. पण तसे चेहर्‍यावर दिसू न देता मी अगदी मास्तरिणीच्या थाटात उत्तरले, ''हे बघा, नियम म्हणजे नियम! जर मी तुम्हाला सूट देत बसले तर तुम्हाला तीन महिन्यातच काय, तीन वर्षांमध्येही मराठी लिहिता - बोलता येणार नाही! बघा, चालणार आहे का तुम्हाला?'' त्यावर ते काही बोलले नाहीत. फक्त आपल्या हातातील वही जरा जोरात टेबलवर आपटून त्यांनी त्यांचा राग व्यक्त केला. मला काळजी होती ते त्यांचा रक्तदाब रागापायी वाढतो की काय! पण आमचा तास संपेपर्यंत त्यांचा पारा बराच खाली आला होता. मग मी निघताना ते हळूच म्हणाले, ''सॉरी हं! आज जास्तच चिडलो ना मी? तुला दुखवायचा हेतू नव्हता माझा. पण वय झालं की होतं असं कधी कधी!'' आणि मग माझ्याच पाठीवर सांत्वना दिल्यासारखे थोपटून त्यांची छोटीशी मूर्ती प्रार्थनाकक्षाच्या दिशेने दिसेनाशी झाली.

ख्रिसमस जवळ आला होता. आमच्या पाद्रीबुवांना त्यांच्या गावाची, प्रदेशाची फार आठवण येत होती. मी त्यांच्यासाठी एक छोटेसेच, स्वहस्ते बनवलेले शुभेच्छापत्र ख्रिसमस अगोदरच्या सायंकाळी घेऊन गेले. दुसर्‍या दिवसापासून मिशनला चार दिवसांची सुट्टी होती. परंतु चार दिवसाचा कालावधी त्यांच्या जन्मगावी जाऊन परत यायला अपुरा असल्यामुळे पाद्रीबुवा जरा खट्टूच होते! त्या सायंकाळी मी त्यांना ते शुभेच्छापत्र दिल्यावर मात्र त्यांचा मूड जरा सावरला. मग ते भरभरून त्यांच्या गावाविषयी बोलत राहिले. आज मी त्यांना मराठीतूनच बोलण्याची सक्ती केली नाही. अगदी निघताना त्यांनी हळूच एक खोके माझ्या हातात ठेवले. आतून मस्त खरपूस, खमंग गोड वास येत होता. औत्सुक्याने मी आत काय आहे ते विचारले तर माझा विद्यार्थी मला थांगपत्ता लागू द्यायला अजिब्बात तयार नाही. मी तिथून बाहेर पडणार इतक्यात त्यांना काय वाटले कोणास ठाऊक, त्यांनी त्यांच्या टेबलावरील ''बी हॅपी'' लिहिलेला शंखाकृती पेपरवेट उचलला व माझ्या हातात कोंबला. त्यांच्या डोळ्यांत दाटून आलेले धुके पाहून मी पण माझे शब्द गिळले. घरी आल्यावर खोके उघडून पाहिले तर आत मस्त संत्र्याचा केक होता. त्यांनी अगत्याने दिलेली ती भेट आमचा ख्रिसमस गोड करून गेली.

त्या अल्प काळात त्यांना शिकवण्यासाठी माझी जी तयारी झाली, जी तयारी मला करावी लागली, त्यामुळे माझे मराठी व इंग्रजी भाषाकौशल्य सुधारण्यास फार मदत झाली. नवनवीन पुस्तके, मिशनचे वाचनालय व निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या मिशनच्या इमारतीतील शांत प्रार्थनागृह ह्यांचाही मी लाभ घेतला. बघता बघता तीन महिने संपले. आमच्या पाद्रीबुवांना आता त्यांच्या नव्या जबाबदारीच्या पदाची सूत्रे स्वीकारायची होती. माझीही कॉलेजची परीक्षा जवळ येऊन ठेपली होती. काहीशा जड अंतःकरणानेच आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. गुरूशिष्याचे स्नेहाचे हे अनोखे नाते आता संपुष्टात येणार होते. शेवटच्या दिवशी आम्ही भरपूर गप्पा मारल्या, आणि त्याही मराठीतून! मी निघताना पाद्रीबुवांना डोळ्यांतील अश्रू लपविणे कठीण झाले होते. आणि उद्यापासून सक्तीची मराठी शिकवणी संपणार याचा आनंदही त्यांच्या चेहर्‍यावर लख्ख दिसत होता. मी त्यावरून त्यांना चिडवले देखील! त्यांची छोटीशी आठवण म्हणून त्यांनी मला एक छोटे बायबल देऊ केले व त्यांचा आवडता पायघोळ ट्रेंचकोट मी नको नको म्हणत असताना माझ्या हातांत कोंबला.

आज त्याला बरीच वर्षे लोटलीत. पुढे निवृत्ती स्वीकारल्यावर ते त्यांच्या जन्मगावी परत गेले. पाद्रीबुवा आता हयात आहेत की नाही हेही मला ठाऊक नाही. पण अजूनही मी कधी कपड्यांचे कपाट आवरायला काढले की एका कप्प्यात सारून ठेवलेला तो कोट मला पाद्रीबुवांची आठवण करून देतो! त्या तीन महिन्यांच्या काळात त्यांना शिकवण्याबरोबर मीही बरेच काही शिकले. त्यांची आठवण मनाच्या एका कोपर्‍यात सदैव राहील.

-- अरुंधती

Syndicate content
Scroll to Top