टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
समीक्षा
माझं आवडतं नाटक : फ़ायनल ड्राफ़्ट
प्रेषक भडकमकर मास्तर ( रवी, ०७/२०/२००८ - २१:३०) .नाटक : फ़ायनल ड्राफ़्ट
लेखक आणि दिग्दर्शक : गिरीश जोशी
कलाकार : मुक्ता बर्वे
गिरीश जोशी
निर्मिती : महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे
जसे नाट्यलेखनाच्या मूलभूत नियमांबद्दल लिहिले, तसेच लेखनाच्या ठराविक आडाख्यांपासून दूर जाणारे, नियमांच्या साचेबद्ध चौकटी तोडणारे नाट्यलेखन यावरही लिहित आहेच..... चाहूल, साठेचं काय करायचं, लूज कंट्रोल यावर पूर्वी लिहिलं आहेच... तसंच थोडंसं वेगळं हे दोन अंकी नाटक ...
कथासार :
पूर्वी सिनेमा नाटक किंवा टीव्ही या माध्यमासाठी अभिनय आणि इतर तांत्रिक प्रशिक्षण देणार्या संस्था कमी होत्या..आता जसे जसे टीव्ही चॆनल वाढले आहेत, तशी त्या संस्थांची गरज वाढतेय आणि आपण अशा अनेक संस्था आजूबाजूला पाहत आहोत.त्यातून नवनवीन अभिनेते, लेखक , दिग्दर्शक घडत आहेत.ही गोष्ट आहे, अशाच एका संस्थेत लेखन शिकवणार्या प्राध्यापकाची आणि त्याच्या विद्यार्थिनीची... ती ऎकेडमीमध्ये लेखन शिकायला आलीय खरी पण तिचं अभ्यासात लक्ष नाही, शिकवलेलं कळत नाही म्हणून सर तिला शिकवणीसाठी घरी बोलावतात...त्यात सर सुरुवातीला तिला एक संपूर्णपणे कल्पनेतली गोष्ट लिहून आणायला सांगतात. पण ती स्वत:च्या आयुष्यातल्या गोष्टीच त्यात फ़िरवून फ़िरवून लिहून आणत राहते...मग सर तिच्यावर वैतागतात , त्यात दोघांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी समोर येतात.

मुलगी एका छोट्या गावातून आलेली आहे, ती गोंधळलेली आहे आणि ध्येयहीन आयुष्य जगत आहे, तिला लेखक व्हायचंय पण ती त्यासाठी तितके कष्ट घेत नाहीये कारण कदाचित तिने स्वत:च सरांचे ऎकेडमीमध्ये येण्यापूर्वीचे लेखन वाचलेले आहे, आणि तिला त्यांचे पूर्वीचे लेखन खूप आवडले आहे, मात्र ती ऎकेडमीमध्ये त्यांच्या पहिल्या तासाला ते जे सांगतात त्याने प्रचंड व्यथित झालेली आहे, तिला जाणवलेले आहे की आता लोकांना आवडतं तेच मोजून मापून लिहायला सांगणारा हा पूर्वीचा आपला आवडता लेखक नव्हे... या विरोधाभासाने ती खचलेली आहे.आणि ती सरांना विचारते की तुम्ही असं का केलंत सर? या साध्या प्रश्नाचं उत्तर सर देऊ शकत नाहीत आणि त्यांचा स्वाभिमान दुखावतो....

पंधरा वर्षांपूर्वी सरांनी थोडेफ़ार नाव कमावलेले आहे आणि आता ते एक नाटक लिहू पाहत आहेत पण गेली तीन वर्षे त्यांना ते जमत नाहीये... वैयक्तिक आयुष्यात त्यांचे बायकोबरोबरचे संबंध दुरावलेले आहेत.. एक दोन फ़ोनमधून ते उत्तम व्यक्त होतात...
सर आणि विद्यार्थिनी दोन्ही पात्रे दुखावलेली आहेत आणि आतून घाबरलेलीसुद्धा....दोघे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात....
लेखन राहते बाजूला आणि ते एकमेकांची वैयक्तिक आयुष्यातली उणीदुणी काढत राहतात. स्व टिकवण्यासाठी दुसर्याला दुखवण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही जणू त्यांच्याकडे....पण यातून काहीतरी चांगलं घडतं.. या सार्यातून ते आपापल्या चुका शोधतात, उणीवा सुधारायचा प्रयत्न करतात......त्याचे अडलेले नाट्यलेखन पूर्ण होते, तिला एक मोठी सीरियल मिळते. पण त्यांच्यात काही नाजूक बंध निर्माण व्हायची जी काही थोडी शक्यता असते तीही बारगळते आणि ते दोघे समंजसपणे दूर होतात.
_____________
या संपूर्ण नाटकाचे बलस्थान आहे, संवाद....या नाटकाचे नुसते मोठ्याने वाचन करायलासुद्धा फ़ार मजा येते असा माझा अनुभव आहे.......(याची मॅजेस्टिकने छापलेली संहितासुद्धा उपलब्ध आहे.).

गिरीशने लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता अशी मोठी जबाबदारी पेलेली आहे... तो स्वत: एका संस्थेमध्ये लेखन शिकवत असल्याने अशा स्वत:च्या आयुष्यातल्या घटनावर लिहिणार्या विद्यार्थ्यांचा अनुभव त्याला नेहमी येत असे असे त्याने एका मुलाखतीत सांगितल्याचे आठवते...शिक्षकाच्या भूमिकेतला लेखन शिकवतानाचा बराचसा तांत्रिक भाग मी त्याच्या कार्यशाळेतसुद्धा त्याच्याच तोंडून जसाच्या तसा ऐकला आहे.. विद्यार्थिनीच्या चमत्कारिक वागण्याने गोंधळलेला, तिच्यात कळत नकळत पणे थोडासा गुंतत जाणारा पण वेळीच दूर जाणारा शिक्षक त्याने चांगला दाखवलेला आहे...मुक्ता बर्वेने सुरुवातीला अभ्यासात लक्ष नसणारी, मठ्ठ वाटणारी पण नंतरची दुखावलेली विद्यार्थिनी उत्तम सादर केली आहे...
दोनच पात्रांचे दोन अंकी व्यावसायिक नाटक पण यात नाट्यपूर्ण घटना नाहीत, प्रेमकथा नाही, रूढ खलनायक नाही,मेलोड्रामा नाही, विषय आहे नाट्यलेखनासारखा रूक्ष ( यावर काय नाटक लिहिणार ?असेही काहींना वाटू शकते )
रंगमंचावर काहीही विशेष घडत नसताना प्रेक्षकाला बंधून ठेवणे अवघडच.... पण हे नाटक ते लीलया करते..
या नाटकाचे अजून एक विशेष म्हणजे हे नाटक सुदर्शनच्या प्रायोगिक रंगमंचावर जितके रंगते तसेच ते व्यावसायिक मंचावरही प्रेक्षकांनी उचलून धरले..
( मी हे नाटक दोन्ही मंचावर पाहिले आहे आणि ते दोन्हीकडे तसेच रंगते असे मला वाटते).
प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांच्या (तथाकथित) रूढ सीमारेषा या नाटकाने अजून धूसर केल्या...
या नाटकाने २००७ मध्ये अमेरिका दौराही केला तेव्हा मिपावरच्या काही तिकडल्या सदस्यांनीही हे नाटक पहिले असेल...
त्यांनीही त्या अनुभवावर जरूर लिहावे ...
मिसळ
प्रेषक अनिकेत केदारी ( मंगळ, ०७/१५/२००८ - ०९:५१) .ही मी पुणे नाशिक महामार्गावर मंचरजवळ कळंबगावी खाल्लेली मिसळ. चव अफाट होती.देव करो आणि मला परत लवकरात लवकर ही मिसळ खायला मिळो.
अणु करार भारतास अनुकुल की घातक ?
प्रेषक गमत्या ( सोम, ०७/१४/२००८ - १९:२६) .अणु करार भारतास अनुकुल की घातक?
आज काल आपण सर्वजण वरील विषयावर काही ना काही वाचतो किंवा एकतो आहे.
तर मित्रांनो चला तर आपण आपले मत ह्या विषयावर मांडु या जेणे करुन आपल्या सर्वांच्या माहीति मध्ये भर पडण्यास मदत होईल.
मि मा. तात्यांनाही विनंती करतो कि त्यांनी ही आपले अमुल्य मत मांडावे.
धन्यवाद.
देश हिताचा विचार करणारा (गमत्या)
पौराणिक कथांवरील नवीन मालिकांविषयी थोडंसं...
प्रेषक देवदत्त ( मंगळ, ०७/०८/२००८ - ०२:०७) .सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांची पौराणिक कथांवर मालिका दाखविण्याची स्पर्धा सुरू आहे असे दिसते. साईबाबा, वैष्णोदेवी, हनुमान, रामायण ह्या मालिका (आणि इतर भरपूर) सुरू आहेत. पुर्वी ह्या सर्व मालिकांची वेळ रविवार सकाळ असायची. त्याला पहिले कारण म्हणजे रविवारी सर्वांना सुट्टी असते आणि सकाळपासून लोक टीव्ही बघत असतात. तसेच दुसरे कारण म्हणजे आधी दाखविलेल्या रामायण, महाभारत, श्रीकृष्ण ह्या मालिकांचे यश असेल. असो, सध्या तरी त्या मालिका इतरवेळीही पुन्हा दाखविणे चालू होते.
मग एन डी टी व्ही इमॅजिन ने नवीन ’रामायण’ आणले. निर्माते जुन्या रामायणचेच. सागर आर्ट्स. त्यामुळे लोकांच्या थोडाफार अपेक्षा असतीलच. त्यात त्यांनी वेळ निवडली प्राईम टाईमची. नक्की माहित नाही पण एका ठिकाणी वाचल्याप्रमाणे, एनडीटीव्ही ला त्याचा फायदा झाला. (जरी लोक आय़ पी एलचे सामने जास्त बघत होते तरी त्यांना तेवढे नुकसान झाले नाही.)
आमच्या घरी रामायण पाहणे सुरू असते. सुरूवातीला तसे बरे वाटले. अजूनही बरेच चांगले सूरू आहे. तरीही जुन्या रामायण मालिकेसोबत तुलना होणे स्वाभाविकच आहे. त्यात स्टार उत्सव वर ती जुनी मालिका दाखवित आहेत. मग तर काय संध्याकाळी जुने रामायण, रात्री नवीन रामायण. आता ह्यात जास्त तुलना होते ती कलाकारांच्या अभिनयाची, सादरीकरणाची. नवीन रामायणात मला सुरूवातीला तरी थोडा तजेलदारपणा वाटला. नवीन वाहिनी, नवीन कलाकार, नवीन तंत्रज्ञान. ह्याचा फरक तर दिसणारच. पण ह्यात राण्यांचा पेहराव, त्यांचे थोडेफार वागणे ह्यात सांस बहू मालिकांचा प्रभाव दिसत होता. मग पुढे दिसू लागला संगणकीय प्रभाव. हे मान्य आहे की ह्यात राक्षस, बाणांचा वर्षाव वगैरे आणि भरपूर गोष्टी प्रत्यक्षात दाखवू शकत नाही, तेव्हा त्यामागे स्पेशल इफ़ेक्ट्स वापरावे लागतात. पण इतर ठिकाणी तो जिवंतपणा वाटत नाही आहे. राजा दशरथाचा महाल बाहेरून दाखविण्यात संगणकाचा वापर जास्त केला असे दिसून येते. संध्याकाळचे राजमहालाचे दृष्य पाहताना त्याची जाणीव होते. इतरही वेळा वाटते की काहीतरी कृत्रिम दाखवण्यात येत आहे.
मग सुरू झाले 9x वाहिनीवर महाभारत सुरू होण्याचे वारे. गेले २ महिने रणभूमी, गदा, धनुष्य वगैरे दाखवून महाभारतातील एक एक गोष्टी समोर आणत त्याची जाहिरात दाखवत होते. त्या जाहिराती बघतानाही जाणवत होते की ह्यात थोडी अंधाराची छटा आहे. इथेही कृत्रिमतेचा भास होत होता. म्हटले पाहूया ह्यात काय आहे ते? काल परवा ह्याची नवीन जाहिरात पाहिली तेव्हा वाटले की हे पूर्ण फिल्मी प्रकारात चित्रीत केले आहे. आज कालचे नायक/खलनायक ज्याप्रमाणे दिसतात त्याप्रमाणे ती पात्रे दिसत होती.
मग आज रात्री ९ वाजता महाभारत दाखविणे सुरू झाले. सुरूवातीलाच धर्मराज खेळात हरलेला दाखविला. दुर्योधन सांगतो की द्रौपदीला घेउन ये. हे सर्व पाहत असताना मला वाटले की मी संगणकावर एखादा नवीन गेम बघत आहे. तेच स्पेशल इफेक्ट्स. ह्यात प्रजा दाखविली ती पूर्णत: संगणक निर्मित. मागील महालही तसाच वाटला. मग दुशासन द्रौपदीला आणायला जाताना दाखविला. पूर्णत: कृत्रिम माणूस. चेहयावरील भाव काहीच प्रभाव पाडत नाहीत. महालातील दासी तशाच. त्याआधी बाहेर युधिष्ठिर दाखवला होता. त्याला पाहताना मला राम गोपाल वर्माच्या ’कंपनी ’ मधील चंदू (विवेक ओबेराय)ची झलक दिसली. त्यात भर पाडली ती पार्श्वसंगीताने. ’सरकार’ मधील पार्श्वसंगीत जसे आहे तसेच. मला वाटले थोड्या वेळाने ’गोविंदा गोविंदा’ही सुरू होईल व द्रौपदीला वाचवायला कृष्ण आला आहे असे दाखवतील. पण आमच्या मातोश्रींना दुसरी मालिका पहायची होती म्हणून मग वाहिनी बदलण्यात आली.
तर हे सांगण्याचा उद्देश हाच की आता पौराणिक कथा पुन्हा तयार करून दाखवत आहेत हे कौतुकास्पद आहे. पण ते पाहताना आपण रामायण/महाभारत, राम/कृष्ण पाहत आहोत हे जाणविले पाहिजे. सध्या तरी रामायणामध्ये ते थोडेभार दिसते. पण नवीन महाभारताच्या पहिल्या दहा मिनिटांतच मला वाटले की ह्यात काहीतरी कमी आहे. कितपत चांगले वाटते ते बघू.
जमल्यास थोडी आणखी वाट पाहूया. २१ जुलै पासून नवीन वाहिनी ’कलर्स’ वर श्रीकृष्णावर (की बालकृष्णावर) मालिका येत आहे. ह्याच्या जाहिरातीही सुरू आहेत. त्यात तरी हा कृत्रिमपणा जाणवत नाही. खरं काय ते मालिका सुरू झाल्यावरच कळेल.
(हाच लेख माझ्या अनुदिनीवरही वाचता येईल)
वळु
प्रेषक राजस ( शुक्र, ०६/२७/२००८ - २२:१५) .वळु
बर्याच दिवसांनी मराठी चित्रपट बघण्याचा योग आला. खरे तर मराठी चित्रपट बघायला मला आवडते. मध्यंतरीच्या काळात सचिन व महेश कोठारे चे चित्रपट छान असायचे. परंतु त्यानंतर मराठी चित्रपट एकाच साच्यात अडकला तेंव्हापासुन तो नकोसा व्हायला लागला होता. श्वास पासुन ही परिस्थीती बदलायला लागली आहे.
तर बरेच दिवसांनी चित्रपट बघितला, वळु. कथानक सर्वांना माहीत झालेच असेल. एका गावात वळुने उच्छाद मांडलेला असतो त्यामुळे फॉरेस्ट ऑफीसरला बोलावणे पाठवले जाते. त्याबरोबर त्याचा भाऊ डॉक्युमेंटरी करण्यासाठी येतो. गावकर्यांना एकत्र जमवुन डॉक्युमेंटरी करताना कथानक उलगडत जाते. त्यात संगीची प्रेमकथा असे उपकथानक सुद्धा आहे. डॉक्यमेंटरी करुन संपते आणि त्यानंतरच्या एक-दोन प्रयत्नांमधे वळु पकडला जातो, व चित्रपट संपतो.
मला चित्रपट आवडला नाही. कथानकात तस काही दम नाही. अगदीच साधे आहे. म्हणुन मग त्यात गावातल्या तरुण नेत्याची कुरघोडी करण्याची धडपड. भटजीबुवांचे (दिलीप प्रभावळकर) विनोद आणि संगीचे (अमृता सुभाष) प्रेमप्रकरण त्यात आले आहे. वळु बघितल्यानंतर त्याला पकडण्यासाठी फॉरेस्ट ऑफीसरची नेमणुक विचीत्र वाटते. वळु बिचारा एकदमच शांत आहे. चित्रपटात तो नुसताच इकडुन तिकडे जातो. तर त्याला लोक एवढे घाबरतात का हे काही समजत नाही. वळुचे पुर्ण दर्शन अगदी शेवटी घडते. तोपर्यंत त्याचा त्याला अर्धवट दाखवुन बॅकग्राउंडला त्याचा जोरात उच्छवास ऐकवण्यात आला आहे. त्यावरुन तो हिंसक झाला आहे असे आपण समजायचे. वळु पकडण्यासाठी गेलेला फॉरेस्ट ऑफीसर डॉक्युमेंटरी बनवण्यात मध्यांतरापर्यंत वेळ घालवतो. त्यानंतर त्याने केलेले प्रयत्न एका अननुभवी माणसाने केलेले प्रयत्न वाटत रहातात. शेवटी वळु पकडला जातो परंतु त्या प्रसंगात काही थ्रिल नाही.
अतुल कुलकर्णी हा एक चांगला अभिनेता आहे हे हा चित्रपट बघुन कोणीही म्हणणार नाही.काही मनाविरुद्ध घडले तर 'शिट शिट शिट' आणि मनासारखे घडले तर 'येस येस येस' असे संवाद त्याच्या तोंडी आहेत. वळु पकडण्यासाठी फॉरेस्ट ऑफिसरला आवश्यक असलेली लीडरशीप कुठेही जाणवत नाही. त्याच्यासारख्या अभिनेत्याला वाया घालवलेले आहे एवढेच म्हणता येइल.
दिलीप प्रभावळकरांनी ही भुमिका का स्वीकारली असावी असा प्रश्न पडतो. दिवस/रात्री कोणत्याही वेळेस परसाकडला जाणे य पलिकडे या भुमिकेत काहीच नाही. विनोद निर्मीती साठी हे पात्र असावे असे म्हटले तर सारखे 'लागली आहे' असा अभिनय करत इकडुन तिकडे जाणार््या पात्रात कसली आली आहे विनोदनिर्मीती. त्यात सरकार राज मधली दिलीप प्रभावळकरांची भुमिका बघितल्यानंतर त्यांना या भुमिकेत बघायचे म्हणजे एक शिक्षा आहे.
चित्रपटात काही प्रसंग उगाच घुसडल्यासारखे वाटतात. आता छोट्या मुलाला त्याची आई देवळाबाहेरच शु करायला लावते. यात दिग्दर्शकाला काय म्हणायचे आहे? विनोदनिर्मीतीसाठी असेल तर यात विनोद काय आहे. त्यात बाकी चित्रपट विनोदी अंगाने जात नाही. मला तर एकाही ठिकाणी खळखळुन हसु आले नाही.
चित्रपटात सगळेच काही निगेटिव्ह नाही. गावाची वातावरण निर्मिती उत्तम झाली आहे. जीवन्याची भुमिका करणार्या नटाने (गिरिश कुलकर्णी) उत्तम अभिनय केला आहे. फॉरेस्ट ऑफीसरला सगळी मदत केल्यानंतर ऑफीसर निघुन जाताना एकदम हळुवार होणे हे त्याने मस्त दाखवले आहे. चित्रपट तांत्रिक दृष्ट्या चांगला वाटतो.
हे चित्रपट परिक्षण नाही, तर नुसतेच माझे मत आहे. या वरुन चित्रपट पहायचे की नाही हे ठरवु नका. पण मराठी चित्रपटात सुधारणा व्हावी. किंबहुना मराठीत आंतरराष्टीय दर्जाचे चित्रपट निघावेत असे वाटते. त्यामुळे 'वळु' खरोखरच चांगला असता तर किती छान झाले असते असे चित्रपट बघितल्यानंतर वाटत राहीले म्हणुन चार ओळी खरडल्या एवढेच.
- - राजस
काबूल ब्युटी स्कूल... डेबोरा रॉड्रिग्ज.
प्रेषक प्राजु ( रवी, ०६/२२/२००८ - १९:२७) .काबूल ब्युटी स्कूल , एका अमेरिकन स्त्रीने बुरख्या आडून घेतलेला शोध.
लेखिका : डेबोरा रॉड्रिग्ज.
अनुवाद : उषा तांबे.
प्रकाशक : कॉनसेप्ट बुक्स, पुणे.
मूल्य : १९५ रू.
मंडळी, काबूल ब्यूटी स्कूल हे पुस्तक नुकतंच माझ्या वाचनात आलं. मला मिळालं, आणि सहज चाळता चाळता मी ते झपाटल्यासारखं ४-५ दिवसांत वाचून काढलं. अफगाणिस्तानातल्या स्त्रियांच्यावर बरंच वाचलं आणि ऐकलं होतं. एस्केप फ्रॉम तालिबान या आणि अशा पुस्तकातून अफगाणी स्त्रीचं आयुष्य किती खडतर आहे हे थोडं समजलं होतं. पण काबूल ब्यूटी... या पुस्तकातून ९/११ नंतर अमेरिकेने बॉम्ब हल्ले केल्यानंतर, तालिबानी राजवट उलथून टाकल्या नंतरही तिथे एक स्त्री होऊन जगणं म्हणजे शाप असण्यासारखं आहे हे पदोपदी जाणवतं. पुस्तकाचा काळ २००२ नंतरचा आहे. म्हणजे नुकत्यात घडलेल्या घटनांची लेखिका साक्षिदार आहे.
थोडंसं लेखिकेबद्दल .. डेबोरा उर्फ डेबी, अमेरिकेमध्ये मिशिगन या राज्यात राहणारी. आई ब्युटीशियन म्हणून घरच्याच पार्लरमध्ये आईला मदत्र करता करता स्वतः उत्तम हेअर ड्रेसर बनली. पहिल्या लग्नाच्या अपयशानंतर, दुसर्या पतीशी भांडत रखड्त चाललेला संसार करत पार्लर चालवणारी..९/११ च्या दुर्घटने पूर्वी 'केअर फॉर ऑल फाऊंडेशन' या संस्थेच्या वतीने आपत्कालीन आणि दुर्घटनाकालीन मदतीचं प्रशिक्षण घेतलेलं होतं. त्यामुळे ९/११ नंतर या संस्थेनं अफगाणिस्तानात मदत कार्यासाठी पाठवलेल्या पहिल्या टिममध्ये, दुसर्या पतीकडून सुटका करून घेण्याच्या उद्देशाने, लेखिकेने स्वतःची वर्णी लावून घेतली. ग्रुपलिडरने ओळख करून देताना हेअर ड्रेसर अशी ओळख करून देताना तिथल्या परदेशी लोकांच्या चेहर्यावर अतिशय आनंद पसरला असे लेखिका लिहिते. कारण तिथे मदत कार्यासाठी आल्यापासून त्यांना चांगले पार्लर मिळाले नव्हते. हळू हळू डेबी कडे भरपूर स्त्रीया येऊ लागल्या त्यात अफगाणी स्त्रियांची संख्याही खूप होती. तिथे येणार्या स्त्रियांकडून त्यांच्यावर होणार्या अत्याचाराबद्दल, त्यांच्या परावलंबनाबद्दल समजू लागले. आणि त्यातून 'आपण ब्युटीस्कूल चालू करून इथल्या स्त्रीयांना स्वावलंबी बनवायचे या उद्देशाने लेखिकेने स्कूल चालू केले. त्यासाठी अमेरिकेतल्या कोणकोणत्या कॉस्मेटीक्स कंपन्यांनी मदत केली ... त्यांनी पाठवलेले कॉस्मेटीक्स चे बॉक्सेस अफगाण पर्यंत नेण्यासाठी काय दिव्य करावी लागली, त्यातच दुसर्या नवर्याने दिलेला त्रास.. त्यानंतर झालेला घटस्फोट..ह्यासगळ्याबरोबरच मुलांना आपल्या आईकडे सोडून येताना काळजात झालेली कालवाकालव.. याचं वर्णन या पुस्तकांत पहायला मिळतं.
काबूल मध्ये डेबीला भेटलेली पहिली मैत्रीण म्हणजे रोशना.. १९-२० वर्षीय रोशना आपल्या आईच्या वयाच्या डेबीशी अतिशय मित्रत्वाने वागते. पुस्तकाची सुरूवातच रोशनाच्या लग्नाच्या प्रसंगाने होते. तिच्या लग्नातल्या नृत्याचं वर्णन करताना लेखिका म्हणते, "ज्या तर्हेचा नाच इथे चाललेला असतो त्याची मी स्वप्नात्सुद्धा कल्पना केली नसती. या बायका एरवी फारशा घराबाहेर पडत नाहीत. पडल्याच तर नखशिखांत झाकलेल्या असतात. इथं मात्र त्या जो नाच करताहेत त्याला केवळ अश्लिल असंच म्हणावं लागेल - काबुली पद्धतीचा अश्लिल नाच. त्या सगळ्या अंगाला झतके देतात, पाठ वाकवतात...पाठीमागे , बाजूला, डोक्यावर हात असे हलवतात की, जणू काही प्रियकराला कुरवाळत आहेत....पुरूषांच्या हॉलमध्येही अशाच प्रकारचा नाच चालू असतो... मी तो नाच बघू शकत नाही."
त्यानंतर ब्यूटीस्कूलच्या माध्यमातू डेबीशी संपर्कात आलेल्या, बहार, बसीरा , टोपेकाई, नाहीदा, शाझ.. अशा स्त्रीयांची कहाणी आपल्याला समजू लागते आणि त्यावर कळस होतो हमा या १४ वर्षीय मुलीचं डेबीच्या देखत एका वेश्येमध्ये झालेलं रूपांतर वाचताना. डेबीच्या अटोकाट प्रयत्नांना आलेलं अपयश वाचताना.. मन खिन्न होतं. डेबीच्या अफगाणी नवर्याची तिला या स्कूलच्या उभारणीमध्ये मिळणारी साथ सुखाऊन जाते. तो सौदीमध्ये राहिलेला बराच सुधारीत विचारांचा अफगाणी आहे. .. त्याच्या मदतीमुळेच ती स्कूलचे काम करू शकली असे डेबी नमूद करते. स्कूलच्या सत्रांसाठी पैसा उभा करताना कोणकोणती दिव्यं पार करावि लागली .. तिथल्या रस्त्यांवरून वावरताना लोकांचे आलेले अनुभव.. तिथले दुकानदार, तिथला नोकरवर्ग, सरकारी कामकाज, पोलिस या सगळ्यांचे अनुभव वाचायला मिळतात. सगळ्यात शेवटी तिचा अफगाणी सासरा सौदीहून् तिच्याकडे येतो आणि तिच्याही नकळत तिला आपलंस करतो .. डेबीने याचं वर्णन खूप छान केलं आहे. सध्या डेबी तिच्या या अफगाणी नवर्यासोबत काबूल मध्ये राहते आहे आणि काबूल ब्यूटीस्कूल, ओऍसिस सलून.. यांचे काम जोरात आणि झोक्कात करते आहे.
स्त्रीबद्दल आदर असलेल्या कोणालाही विचार करायला लावेल अशीच आहे ही कादंबरी/ पुस्तक.. .काबूल ब्यूटी स्कूल...
-प्राजु.
पुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस
प्रेषक नरेंद्र गोळे ( रवी, ०६/२२/२००८ - ०८:४५) .पुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस
नुकतेच प्रा. प्रवीण दवणे यांचे "सूर्य पेरणारा माणूस" नावाचे पुस्तक वाचनात आले. प्रकाशक: साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशनसंस्था), प्रथमावृत्तीः ८ मे २००८, मूल्यः रु. १००/- फक्त. विस्मयकारक नावाच्या, या पुस्तकात विस्मयचकित करणाऱ्या एका आयुष्याचा आलेख साकारला आहे. उण्यापुऱ्या एका दशकाच्या कालावधीत नव्या मुंबईतील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक म्हणून नावारूपास आलेल्या "हावरे बिल्डर्स" चे संस्थापक कै. सतीश काशिनाथ हावरे यांचे ते चरित्र आहे. आजमितीस 'हावरे बिल्डर्स' दररोज दहा-बारा घरे आणि दुकानांचा ताबा ग्राहकास सुपूर्त करत आहेत. नव्या मुंबईच्या क्षितिजरेषेवरच त्यांनी 'हावरे' नाव कोरले आहे. बांधकामक्षेत्रात सर्वात गतिमान आणि विश्वासार्ह व्यवसाय समर्थपणे प्रस्थापित करून ग्राहकांच्या पसंतीस पोहोचवणाऱ्या मराठी मातीतल्या उद्योजकाची ही यशोगाथा आहे. उद्योजकतेची आस मनात धरून समोर येणाऱ्या होतकरू मराठी तरुणांना, आयुष्य घडवावे कसे ह्याचा वस्तुपाठ म्हणून ते उपयोगी ठरू शकेल याचा विश्वास वाटतो.
दुवा क्र. १: हावरे डॉट कॉम या त्यांच्या संकेतस्थळावर आता या पुस्तकाचे 'वि-पुस्तक (e-book)' आविष्करण निःशुल्क उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. वाचकांनी ते अवश्य वाचावे आणि उद्योजकतेचा मार्ग गवसतो का ह्याची चाचपणी करावी. मार्ग नाही तरी दिशा अवश्य मिळू शकेल. किमान प्रेरणा तर खासच.
दुवा क्र. २: 'सूर्य पेरणारा माणूस' http://www.haware.com/Surya-Peranara-Manus-Pravin-Davane.pdf
दवणे म्हणतात, "जिद्दीच्या बिया घेऊन सतीश हावरे नावाचा 'सूर्य पेरणारा माणूस' आकाशावर आपली नाममुद्रा कोरून गेला. महाराष्ट्रातल्या प्रत्येक धडपडणाऱ्या युवकाला जिद्दीच्या बिया देण्याचे मोलाचे काम सतीश हावरे यांच्या आयुष्याने केलेले आहे. इमारती उभ्या करतांना, हजारो उपेक्षितांची, आयुष्ये उभी करणाऱ्या सतीश हावरे यांचे अजिंक्य जीवन नियतीलाही पुसता आले नाही. विदर्भातील पथ्रोट या छोट्या गावातून नव्या मुंबईतील 'हावरे बिल्डर्स'पर्यंतचा हा गगनचुंबी प्रवास. प्रत्येक पालकासाठी! प्रत्येक शिक्षकासाठी! जिंकू इच्छिणाऱ्या प्रत्येक कोवळ्या मनासाठी! "
'हाल ए दिल'ः हालच हाल
प्रेषक विकीपियु ( शनी, ०६/२१/२००८ - १२:०७) .आपल्या चित्रसृष्टीवर नेहमीच असा आरोप केला जातो की आपले दिग्दर्शक हॉलिवूडपटांमधून उचलेगिरी करत असतात.
मात्र त्यांनी तो खोटा ठरविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आता हॉलिवूडपटांमधून नव्हे तर हिंदी चित्रपटांतूनच चोरी
केली जाऊ लागली आहे. या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या 'हाल-ए-दिल'चे हाल यापेक्षा वेगळे नाहीतच. दिग्दर्शकाने
'जब वी मेट' या चित्रपटाची कथा अगदी सराईतपणे चोरली आहे.
शेखर सुमनाचा मुलगा अध्ययन सुमन या चित्रपटातून इंडस्ट्रीमध्ये करिअरची सुरुवात करीत आहे. या व्यतिरिक्त
चित्रपटात काहीही नवीन नाही. चित्रपटाची कथा आहे, संजनाची (अमिता पाठक) जी रोहितवर (अध्ययन सुमन) प्रचंड
प्रेम करते. आणि अचानक तिच्या आयुष्यात शेखर (नकुल मेहता) येतो. चित्रपटाची अर्धीअधिक कथा शेखर आणि
संजना यांच्या ट्रेनमधील प्रवासाभोवतीच फिरते. दोघांसोबतच प्रेक्षकांनाही तो असह़य होतो. कथेच काहीही नावीन्य
नाही. संगीत बरे आहे मात्र ढिसाळ कथेमुळे ते देखिल तग धरू शकणार नाही.
कुमार मंगत यांची निर्मिती असलेला हा चित्रपट बिग स्क्रीन बॅनर अंतर्गत बनला आहे. अजय देवगण आणि काजोल
चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत काहीवेळ दिसतात. हाल मात्र कथेच्या पात्रांचे होण्यापेक्षा प्रेक्षकांचेच जास्त
होतात.
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
संगीतकाराचा तुम्हाला आवडलेला चित्रपट !
प्रेषक सचीन जी ( गुरू, ०६/१९/२००८ - १४:३४) .नमस्कार मंडळी,
काथ्याकूट करण्यासाठी नवीन विषय हाजीर आहे.
कोणत्याही संगीतकाराचा तुम्हाला आवडलेला चित्रपट !
सुरवात नवीन संगीतकारांपासुन करुयात. नंतर ओघात जुने संगीतकाराही येतीलच.
१. हिमेश - तेरे नाम - ( तुमसे मिलना, तेरे नाम, लगन लगी , ओ जाना ही गाणी श्रवणीय होती. आपण अभिनेता आणि गायक आहोत हा साक्षात्कार होण्याआधी हिमेश तसा बरा होता)
२. विशाल शेखर - मुसाफिर - (कोणि काही म्हणो, मुसाफिरची गाणी ट्रेंड सेटर होती. ईलेक्ट्रॉनिक संगित आणि क्लब मिक्स ताजे होते. एकाच गाण्याचे २ /३ वर्जन हा प्रकारही बराच चांगला वठला होता. सु सु सुनियो ऐकयला (आणि पहायलाही ) मस्त !
३. प्रितम - चॉकलेट - ( हल्का हल्कासे ये नशा, मम्मीसे ना कहना ठेका धरायला लावणारी. पण रॉक - खलीशसी है अप्रतिमच.
४. शंकर, एहसान, लॉय - दिल चाहता है
५. अनु मलिक - जानम - ( राहुल रॉय, महेश भट्टच्या या पडिक चित्रपटातली गाणी मात्र जमली होती. एकाच चित्रपटातली सगळी गाणी जमून येणं ही तशी दुर्मीळ गोष्ट. पण जानमच्या सगळ्या गाण्यावर एक अलग अशी छाप होती.)
६. जतीन ललित - खामोशि द म्युझिकल - ( संजय लीला भंसाली बिघडण्याच्या आधीचा, म्हणजेच त्याचा पहीला चित्रपट. ये दिल सुन रहा है सारखी अनेक श्रवणीय गाणी यात आहेत.
७. बप्पि लाहिरी - जिंदगी एक जुवा - ( प्रकाश मेहराचा महत्वकांक्षी पडेल सिनेमा. आशा़जींच्या मधाळ आवाजातले ये जिंदगी है एक जुवा आणि दिल तो दिल है एकदम क्लास.)
चला तर मग मंडळी, अजून बरीच नावं बाकी आहेत. पंचमदा, ए. आर. तुमच्या साठी सोडलेत.
प्रचंड मारामारी होणार आहे, हे मला माहीती आहे.
हिंदी चित्रपटांचा पंखा,
सचीन जी
पुस्तकाची ओळख... "असे पेशंट , अशी प्रॅक्टीस...".. लेखक : डॉ : प्रफुल्ल दाढे
प्रेषक भडकमकर मास्तर ( रवी, ०६/१५/२००८ - ०२:१४) .पुस्तकाचे नाव... : असे पेशंट, अशी प्रॅक्टिस आणि ऍलर्जी एक इष्टापत्ती
प्रकाशक : अक्षयविद्या प्रकाशन
पृष्ठे : १६०
मूल्य : १२५ रु.
लेखक डॉ : प्रफुल्ल दाढे
लेखक एम.बी.बी.एस. आहेत ...ते अडतीस वर्षे वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित असून त्यांनी दोन वर्षे सरकारी नोकरी केली आणि नंतर स्वतंत्र व्यवसाय चालू केला.
हे पुस्तक म्हणजे व्यवसाय करताना डॉक्टरांना आलेल्या पेशंटची स्वभाववैशिष्ट्ये दाखवणारं अनेक भल्याबुर्या काही विनोदी अनुभवांचे एकत्रीकरण आहे... हे पुस्तक अत्यंत सरळ मनाने लिहिले आहे, कोणताही अभिनिवेश नाही..त्यांना कोणालाही चुकीचे किंवा बरोबर ठरवायचे नाही,आरोप प्रत्यारोप करायचे नाहीत... डॉक्टर तेवढे चांगले आणि पेशंट वाईट असा कोणताही (ओव्हर जनरलायझेशन करणारा) पवित्रा नाही..
सुरुवातीच्या दोन वर्षांच्या काळात डॉक्टरांनी छोट्या गावामध्ये नोकरी केली.. तिथे पिण्याच्या पाण्याची कमतरता, अस्वच्छ पाणी ( त्यातून नारूची भीती),गरीबी , ( गावात अजिबात दूध न मिळणे),अन्धश्रद्धा, ( भगत मंडळींचा सर्पदंशावर उपयोग)... ... गावात स्वच्छतागृह नसल्या्ने प्रातर्विधीला डॉक्टरांबरोबर पहाटे पाचच्या बॅचला (!!!) जाऊन शेजारीच बसून कन्सल्टिंग (!!!!) मागणार्या पेशंटचे किस्से अफ़लातून ..
रूरल हॊस्पिटलमधून अंथरूण- पांघरूणासकट पळून गेलेले विषबाधेचे पेशंट किंवा नसबंदीच्या गाडीला पाहून पळून जाणारे पेशंट असले अनेक किस्से आहेत..... कोटा पूर्ण करायच्या नादात निष्काळजीपणे नसबंदी केलेल्या केसेस फ़ेल गेल्यानंतर नवर्याने संशय घेतल्याने सार्या कुटुंबाची वाताहत होण्याची गोष्ट ऐकून फ़ार वाईटही वाटले..
पुढे स्वतंत्र व्यवसाय चालू केल्यानंतर त्यांना शहरी नमुने भेटले...यात मद्रासी, गुजराती,कच्छी, यूपीवाले भैये यांची निरनिराळी स्वभाववैशिष्ट्ये दर्शवणार्यागोष्टी आहेत. इंग्रजी शब्द पेरून अर्थाचा अनर्थ करणारे पेशंट, स्थळाच्या चौकशीच्या नसत्या कटकटीत अडकवणारे पेशंट, नंबर चुकवून मध्ये घुसणारे, खोटे कौतुक करून उधारी मागणारे, व्हिजिटला पळवणारे आणि फ़ी बुडवणारे पशंट, न्हाव्याने डॉक्टरांनी माझी दाढी केली असे अभिमानाने सांगणे असे अनेक किस्से आहेत..
त्यातल्या काही गोष्टी अगदी मनाला भिडणार्या आहेत. स्वत:च्या नवर्याच्या शून्य स्पर्म काउंटची गोष्ट वृद्ध सासू सासर्यांना कळून त्यांच्यावर मानसिक आघात होऊ नये म्हणून नवर्याला विश्वासात घेऊन प्रेग्नन्सी फ़ेक करून माहेरी जाऊन मूल ऍडॉप्ट करून आणणार्या जिद्दी स्त्रीची एक गोष्ट आहे...
त्यांचा दवाखाना रस्ता रुंदीकरणात जात असताना समोरच जागा घेण्यासाठी डिपॊझिटसाठी आर्थिक मदत देणार्या व्यापारी शेजार्यांची कथा आहे. (अजून माणुसकी आहे हे खरं..)
एकूणच बदललेला जमाना, बदलता डॉक्टरी व्यवसाय , अस्ताला गेलेली फ़ॆमिली डॉक्टर ही संकल्पना, फ़ास्टमफास्ट रिझ्ल्ट्सचा पेशंट्सचा आग्रह, त्यातून अधिकाधिक हायर ऎन्टिबायोटिक्स्चा वाढता वापर, त्यातून उद्भवलेला रेझिस्टन्सचा प्रॊब्लेम, CPA आणि डोक्टर आणि पेशंट यांचा एकमेकांवरचा वाढता संशय मग त्यामुळे अधिकाधिक टेस्ट्स करून घेणे यावर डोक्टरांचे चांगले भाष्य आहे..
शेवटच्या प्रकरणात त्यांना पुण्यात झालेला गाजरगवताच्या सीव्हिअर ऍलर्जीचा त्रास आणि त्यामुळे चांगली चालणारी प्रॅक्टीस सोडून डोंबिवलीला स्थलांतर करावे लागले परंतु ही घटना नंतर कशी इष्टापत्ती ठरली याचे वर्णन आहे... एकूणच पुस्तक वाचनीय आहे.. विविध किस्से असे पुस्तकाचे स्वरूप असल्याने कुठूनही पान उघडून वाचता येते... (सतत प्रश्न विचारणार्या पेशंटला डॉक्टरांनी दिलेली कंटाळून दिलेली उत्तरे आणि त्यातून निर्माण झालेला एक विनोद या पुस्तकात लिहिलेला आहे, तो अगदी एक नंबर आहे... मी तो वाचून बराच काळ हसत होतो..)...पुस्तकातील रेखाटने, छपाईचा दर्जा छान आहे...पुस्तक जरूर वाचा...
( एक सांगायचे राहिले, या पुस्तकाचे लेखक डॉ : प्रफुल्ल दाढे हे आपले मिपाकर डॉ. प्रसाद दाढे यांचे वडील आहेत.)...
