साहित्यिक

औट घटकेचा पाहुणा...

मंडळी,
परवाच्या शुक्रवारी आमच्याकडे एक भन्नाट घटना घडली... सांगू?? सांगतेच.
तर झालं असं....
आमच्या कडे सकाळी सकाळी ७.०० वाजता पाणी येतं कार्पोरेशनचं. ते आलेलं होतं आणि आई अंगणात पाणी मारत होती. ते झाल्यावर तिने काही झाडांनाही पाणी घातलं. हे सगळं काम आई अंगणात आमच्या २ कुत्र्यांना सोबत घेऊन करते. म्हणजे ती कुत्री सकाळी अंगणात तिच्यासोबत हिंडत असतात. तर त्यादिवशी पाणी मारत असताना एकदम धप्प असा आवाज आला. आईने जाऊन पाहिले तर एक पिलू असलेला पोपट अंगणातल्या फरशीवर पडला होता. तो पडला, तसाच उठला आणि उडायचे सोडून चालू लागला. आमची कुत्री ताबडतोब शिकार मिळाल्याच्या आनंदात त्या पोपटावर धावून गेली. त्यात भर म्हणून की काय, सुगावा लागल्याप्रमाणे आमचं मांजरही तिथे दैत्य म्हणून हजर. झालं.... ! आईची तारांबळ उडाली. त्या पोपटाला वाचवायचं कसं? आईने मला जोरदार हाक मारली. साखर झोपेतून जागी होत मी अंगणात पळाले. झालेला प्रकार आईने गडबडीने कुत्र्यांवर ओरडत, मांजराला हुस्कावत मला सांगितला... मला पु.लं.च्या चितळे मास्तरांची आठवण झाली.
मी मोठ्या कुत्र्याला घराच्या मागच्या अंगणात पिटाळलं, लहान आहे त्याला त्याच्या घरात बंद केलं आणि मांजराला घरात हाकललं. मी हे सर्व करे पर्यंत आई त्या पोपटाच्या मागे त्याला पकडायला चालत (पळत नव्हे) होती. पण चाल हळूहळू असली तरी आईला(कोंबडी मागे पळण्याची सवय नसल्याने) तो पोपट काही पकडता येईना. शेवटी मी पुढे सरसावले (है शाब्बास... झाशीची राणी!!). आणि (कोंबडीमागे पळण्याची नाही, तरी मुलामागे पळण्याची सवय असल्याने) अलगद तो पोपट हातात उचलून घेतला. हुश्श! मात्र..... त्या पोपटाने जमेल तसे वळून, वेडेवाकडे होत... माझ्या हाताला चावायला सुरूवात केली. (इश्य! माझा हात त्याला पेरूप्रमाणे गोड वाटला की काय??) डाव्या हातचे एक बोट, उजव्या हाताची २ बोटं अगदी अनेक वेळा चावून जखमी केली. तरीही मी त्याला खाली सोडत नाही म्हंटल्यावर त्याने माझ्या बोट चावून रक्तबंबाळ केलं. मग मात्र मी त्याला खाली सोडून दिला. इतक्यात मला आमचं मांजर खिडकीतून उडी टाकून खाली आलेलं दिसलं. झालं! हा पोपट आता बहुतेक या मांजराचे भक्ष्य होणार. आईने मला पटकन टॉवेल आणून दिला. तो टॉवेल त्या पोपटावर टाकून मी त्याला अलगद उचलला. आता मात्र त्याला माझा हात खाता म्हणजे चावता येईना. आईने कांदे-बटाटे ठेव्ण्याची जाळिची झाकण असलेली बास्केट रिकामी केली आणि मला आणून दिली. मी पोपट त्यात ठेवला. टॉवेल काढण्याआधी त्यात त्याला थोडा खाऊ ठेवला. आणि मग टॉवेल काढून, पटकन झाकण लावले. आणि त्यावर जाडजूड ऑक्सफर्डची डिक्शनरी ठेवली. शुकाचर्यांचा अभ्यास होईल आणि दुसरे महत्वाचे मांजराला बास्केट खाली ढकलून पाडता येणार नाही. पोपटाचे संरक्षण...! वाह वाह... हुश्शार!
सकाळची सगळी कामे उरकून मी भर दुपारी १२.०० वाजता, जराही उन वाया न घालवता, पोपटासाठी पिंजरा आणायला बाहेर पडले. पण पिंजरा मिळतो कुठे कोणाला माहिती?? गावभागांत चौकशी केल्यावर समजले की महानगरपालिकेपाशी मिळतो पिंजरा. तिथे गेले. त्या दुकानदाराशी हुज्जत घालून २३० रू.चा पिंजरा १७५ रू. ला घेतला. स्कूटरवरून सर्कस करत तो पिंजरा ट्रॅफिकमधून घरी घेऊन आले. त्यामध्ये असणार्‍या वाट्यांच्या जागी, घरातली कोणतीही वाटी बसेना. म्हणून मग, एका १२च्या सेट मधले २ कप त्यांचे कान अगदी नीट फोडून त्या पिंजर्‍यात ठेवले. एकात पाणी आणि एकात पोळीची तुकडे घातले. माळ्यावर चढून एक तार शोधून ती त्या पिंजर्‍याला बांधली. आणि मग शुकाचर्यांना अलगद त्या पिंजर्‍यात ठेवले (पुन्हा एकदा टॉवेल). आणि पिंजरा पोर्चमध्ये वरती खुंटीला टांगला. पोपटरावांनाची ते घर आवडलं असावं कारण "ट्रॅक ट्रॅक.. किर्रर्र्..."असा आवाज काढून त्यांनी तो आनंद साजरा केला.
आम्हीही निवांतपणे जेवलो आणि पोपट पाळण्याची स्वप्नं रंगवत, त्याला बोलायला कसं शिकवायचं... वगैरे विचार करत बसलो. अधून मधून पोपटराव आपला ठेवणीतला आवाज काढून ओरडत होतेच. आम्हालाही गम्मत वाटत होती. असेच ३-४ तास निघून गेले.
आणि संध्याकाळी ६ च्या दरम्यान फाटकाबाहेर दंगा ऐकू आला. बाहेर जाऊन पाहिले तर..आमच्या घरासमोर असणार्‍या कारवानांच्या वस्ती वरची माणसं होती ती. त्यांनी सांगितले की, तो पोपट त्यांचा होता. सकाळी निघून गेला होता. त्याचे पंख कापले होते म्हणून त्याला उडता येत नव्हते. (अच्छा!! आम्हाला वाटले की, ते पिलू आहे म्हणून त्याला उडता येत नाही.) आणि गेली ९ वर्षे तो त्यांच्याकडे आहे. सकाळपासून त्या मुलाच्या वडिलांनी पोपट हरवला म्हणून जेवणही नाही केले. आणि सकाळपासून ती लोकं त्या पोपटाला शोधत आहेत. आणि त्याचा आवज ऐकून माग काढत ते आमच्या घरी आले........................ अरे परमेश्वरा!!!
आता काय???? ह्या पोपटासाठी मी / आम्ही काय काय नाही केलं??? मी त्याला पकडण्यासाठी स्वतःची बोटं जखमी करून घेतली.... श्वान, मार्जार या सारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून त्याचं रक्षण केलं.... त्याला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... भर तळपत्या उन्हांत जाऊन त्याच्यासाठी ... त्या दुकानदारशी हुज्जत घालून स्कूटरवरून कसरत करत पिंजरा आणला... त्याला खायला घालण्यासाठी चांगल्या कपांचे कान फोडले.. मी आईच्या शिव्या खाल्ल्या.... आणि इतके करून... तो शुक्रवारी आलेला शुकाचार्य त्याचदिवशी निघून गेला. ...जाताना मात्र माझ्या मनाला उगाचच उदास करून गेला..

- प्राजु.

लिटल बॉय नावाच्या एका एकांकिकेचे परीक्षण

आधी थोडक्यात जशी आठवते तशी गोष्ट लिहितो.

तीन मुलगे, दोन मुली एकाच कॊलेजातले, जर्नालिझम करणारे ... त्यातले आदि आणि ऋता प्रेमात पडलेले...ते दोघे आधी स्टेजवर दिसतात..ऋता कुठेतरी दूरगावी प्रोजेक्ट साठी निघालेली आहे... त्यांचे इतर मित्र नंतर येतात, त्यांच्या गप्पा, मोबाईल, अलेक पदमसीचे ऐकलेले लेक्चर वगैरे...त्याचे क्लिपिंग मोबाईलवरून ब्लूटूथ ऑन करून दुसर्‍याला देणे असे चालू असते.... पुढच्या दृश्यात असे कळते की आदिने त्याची आणि ऋताची एक तो तिच्यावर जबरदस्ती करत असतानाची व्हिडिओ क्लिप तिच्या नकळत मोबाईलवरती शूट केली होती आणि त्याच्या निष्काळजीपणामुळे ती क्लिप मोबाईलमधून सगळीकडे पसरलेली आहे.... लहान पोरांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण (विकृत ) आनंदात ती क्लिप पाहत आहेत...या काळात आदिचे मित्र त्याला शिव्या घालून सोडून जातात....एक मैत्रिण फ़क्त ( का कोण जाणे ) त्याला समजून घ्या असे म्हणते. मग ऋता बाहेरगावाहून येते , तिला समजते , ती धैर्याने परिस्थितीशी सामना करते, रडारड करत नाही.... फ़क्त आदिला एकदा विचारेन म्हणते की तू असे का केलेस?... मग आदि शेवटी तिच्यासमोर म्हणतो, की मी सरेंडर करेन., माझी चूक झाली...ती निघून जाते आणि हा रडत राहतो तेव्हा नाटक संपते.

ही एकांकिका मी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पाहिली....त्यानंतर २००७ सालच्या अनेक स्पर्धांमध्ये या एकांकिकेने पहिली / दुसरी पारितोषिके मिळवली..
अभिनय वगैरे करणारी मंडळी चांगली होती, प्रयोग शिस्तशीर छान होता, नेपथ्य प्रकाशयोजना मस्त.. पण पाहताना सतत अस्वस्थ वाटत होते... गोष्ट अपूर्ण राहिली आहे असे वाटत होते.

१. आता हा पोरगा आपल्या गर्लफ़्रेंडवर फ़ोर्स करणार , तिच्या नकळत त्याचे चित्रीकरण करणार आणि वर निष्काळजीपणे ते स्प्रेड होऊ देणार , आणि शेवटी सहानुभूतीची अपेक्षा करत राहणार..( रडणार, मित्र सोडून गेल्यामुळे कसा त्याच्यावर अन्याय झालाय असा अभिनय दाखवणार)
या असल्या क्रिमिनल माणसाला कसली सहानुभूती देता ? त्याची लायकी फ़टकावून काढून पोलीसात द्यायचीच आहे.....
____ म्हणजे त्यांना लग्नापूर्वी संबंध ठेवायचे आहेत की नाही, त्याचे चित्रीकरण करून दोघांनी एकत्र पहायची त्यांची सवय आहे की नाही हा त्यांच्या सेक्शुअल प्रेफ़रंसेस चा वैयक्तिक भाग झाला....

पण संवादातून असे स्पष्ट कळते की जबरदस्तीने आणि तिच्या नकळत त्याने हे सारे केले आहे. या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या .... मग हे दोन स्पष्ट मोठे गुन्हे झाले...

२. मला तर ही एका पर्वर्ट बलात्कार्‍याची गोष्ट वाटली.... जो कांगावा करतोय की चुकून क्लिप स्प्रेड झाली, मी खरंतर ती क्लिप माझ्यासाठी बनवली होती..... आता या मुख्य पात्राला सहानुभूती देणारी पुढची सगळी गोष्ट ( बिचार्‍याला सगळे मित्र बोलून सोडून चालले रे..) पाहून मला वाटत राहिले, की बाबा आम्हाला आता कळणार आहे की याने चूक केलेली नाही, काहीतरी गैरसमज होता वगैरे... तसले काही घडत नाही...
मग असल्या ट्रीट्मेंट ने आम्हाला इतका वेळ कशाला येडा बनवले?

३. मग एखाद्या बलात्कार्‍याची गोष्ट नसते का? असू शकते, पण इतक्या सहानुभूतीचे कारण काय?
उलट ऎंटी हीरो चे सिनेमे असतात त्यांचा आलेख वाईट कृत्य, कारणमीमांसा आणि शिक्षा असाच असतो... तसंही इथे कुठे दिसत नाही... उलट ती दुसरी मैत्रीण सोडून जाणार्‍या मित्रांना " अरे त्याला समजून घ्या " स्टाईलचा सूर लावते तेव्हा डोके चक्रावते.

४. जर्नालिझम शिकणारी स्ट्रॊंग मुलगी ऋता आदिला शेवटी सोडून जाते.... ती एवढी सक्षम असती तर तो संबंध ठेवायला जबरदस्ती करतो हे एवढेच कारण त्याला सोडायला पुरेसे नाही का? त्यासाठी क्लिप पसरायची वाट कशाला पहायला पाहिजे?

५. बरं एवढा नीच माणूस आहे तो तर मग त्याला त्या प्रमाणात वाईट्ट्ट्ट्ट्ट्ट्टट्ट शिक्षा तरी मिळायला हवी की नको? ते ही नाही...तो रडत राहतो आणि नाटक संपते.म्हणजे नाटकाचा प्रिमाईस / वन लाईन स्टोरी काय तर बलात्कार करा, क्लिप काढा पण स्प्रेड होऊ देऊ नका नाहीतर मित्र सोडून जातील ...

या माझ्या शंकांबद्दल मी त्या नाटकाच्या टीममध्ये असलेल्या एका मुलीशी जालावर चर्चा केली... , त्यात तिचे म्हणणे असे होते की आदिने एक छोटीशी चूक केली आहे, तो वाईट नाही..आणि ती स्वत:साठी बनवलेली क्लिप स्प्रेड झाली हे चुकले, मग त्याचा मोठा गुन्हा झाला, त्याची तो पोलिसांना सरेंडर करून शिक्षा भोगणारच आहे......
मी उडालोच..तो वाईट नाही? स्वत: एक मुलगी असूनही प्रेयसीवरती जबरदस्तीने संबंध ठेवून नकळत क्लिप काढणारा माणूस ( प्रत्यक्ष आयुष्यात आपला बॊय्फ़्रेंड असो किंवा जानी दोस्त असो), नीच प्रवृत्तीचा आहे हे तिला जाणवू नये? . तिलाच काय माझ्याबरोबर एकांकिका पाहणाया बर्‍याचशा लोकांना हे जाणवलेच नाही.... परीक्षकांनीही या एकांकिकेला भरपूर बक्षिसे दिली...
कॊलेजची पोरे तर या एकांकिकेने भारावून वगैरे गेली होती...
अहो नाही हो, लग्नपूर्व संबंध किंवा मोबाईलवरती क्लिपा काढणे यावर आमचा आक्षेप नाहीच आहे, ( हा ज्याच्या त्याच्या प्राधान्यक्रमाचा वैयक्तिक प्रश्न आहे) पण तुमच्या जोडीदाराच्या परवानगीने हे उद्योग नको का करायला? साधी गोष्ट आहे ...नाहीतर मग हा सरळ बलात्काराचा गुन्हा ( आणि सायबर क्राईम) ठरतो..

खरं सांगतो, मी ज्या ज्या कॉलेजियन्स ना या एकांकिकेबद्दल विचारले, ते लोक बॉयफ़्रेंड गर्लफ़्रेंड मंडळींनी एकमेकांच्या क्लिप्स मोबाईलवरून तयार करणे या संकल्पनेला इतके सरावलेले वाटले, की मला आधी भीती वाटली आणि मग माझे फ़ार वय झाले आहे असे वाटले.... उद्या कॊलेजच्या रंगमंचावर बलात्काराचे कौतुक करणारी आणि जस्टिफ़ाय करणारी नाटके दिसली तर नवल वाटायला नको, असा टिपिकल वय झाल्याची जाणीव करून देणारा विचार मनात आला खरा...( आजची तरूण मुले म्हणजे ना.......).. ( अरे बापरे, माझा प्रवीण दवणे झाला की काय?या विचाराने अजून भीती वाटली.. )

नाटक म्हणजे नुसते अभिनय आणि नेपथ्य प्रकाश असे असते का ? त्यातला विचार कोणापर्यंत कसा पोचतो हेही महत्त्वाचे आहे....
असो...
पुण्यातल्या लोकांपैकी इथे पाहिले का हो कोणी हे नाटक?
( ... मला जाणवते ते इतर कोणालाही आक्षेपार्ह वाटत नाही हे पाहून माझी सुरुवातीला फ़ार चिडचिड झाली , अजूनही आश्चर्य वाटते..त्यामुळेच हे एवढे लेखन..)...

पुरोगामी!(एक छोटिशी गोष्ट)

"आई-बाबा फारच मागं लागले आहेत.रोज रोज मागे लागुन नवीन नवीन स्थळं दाखवतात.
साला लग्न मला करायचय्,पण घाइ ह्यांनाच आहे. मी ही ह्यांच्या दबावाला बळी पडलो तर नावाचा सुधीर साठे नाही .
आपण आपल्या मर्जीनच पोरगी पाहणार.
साला रोज रोज तिथुन इतक्या लांबुन भारतातुन फोन करतात आणि विषय काय्,तर "काय ठरवलस्?कधी पहायची?"
छ्या. ह्यांचा फोन असा खाली ठेवला नाही ,तोच लक्ष लॅपटॉपच्या
(चल संगणक्=लॅपटॉप?) स्क्रीन कडे(स्क्रीन=पडदा?) गेलं. फुकटात ढीगभर साय मिळाल्यावर एखाद्या बोक्याला होइल,
तशा आनंदाने येक आवंढा गिळुन,मोठ्ठे डोळे करुन बसलो चटिंगला.
" सुधीर वैतागुन सांगत होता.

पण चेहर्‍यावरचे भाव आता जरा छान झाले. तो म्हणला...
" ती हां तीच स्पृहा. वर्ग सखी.,राष्ट्रिय पातळीवर ऍथलीट म्हणुन मान्यता पावलेली.
वर्गात मुलिंशी बोलायला कधिच फारसं जमलं नाही.
पण तिचं मोकळं ढाकळं वागणं,सहज मिक्स्-अप होणं जाम आवडायचं.
तिचे बर्‍याचदा वर्तमान पत्रातुन बक्षिसं घेतानाचे वगैरे फोटो येत. तेही छान वाटायचे.
शिवाय कुणशिही बोलताना ती लागलिच बोलतं व्हायची, बोलतं कराय्ची.
एखादा जोक आवडला तर पटकन टाळीहि द्याय्ची.(म्हणुन मी जोक मारायचे अनेक अयशस्वी प्रयत्न पण केले.)

आता नाही म्हटलं तरी ,तिच्या स्वभावानुसार मिळता जुळता जॉब मिळाला होता.एच आर चा,अगदि नुकतीच ऑफर आली होती.
आणि खेळणही अजुन चालुच होतं.
चॅटिंगलाही मला तिचा हाच स्वभाव आवडायचा.वेब कॅम तर सगळेच वापरतात्,पण ही अगदि मॉडेर्न स्टाइल मध्ये घरी
ज्या ड्रेस वर असायची,त्यावरच चॅटींग करायची.उगिच "काकु"बाईं सारखं नाही.
सदैव आपली ती बर्म्युडा येक असायची अंगावर आणि स्लीव लेस पांढरा शुभ्र टी-शर्ट.
आणी अंग काठी निव्वळ शिड शिडित्,ऍथलीटची,स्वभावात मोकळेपणा.तजेलदार सावळा रंग.
मी तर भारतीय "शारापोवा"च म्हणेन तिला ,तिच्या टवटवीत पणावरुन.
बर्रेच दिवस अशा ऑन लाइन गप्पा चालायच्या.
अगदि "गांगुली म्हातारा झालाय की द्रवीड " इथ पासुन ते अगदि कॉलेज मधल्या दिवसांबद्दल.
किंचित खेचाखेची चालायची आणि थोडाफार चावटपणा आणि चावटगप्पा सुद्धा.
वाटलं "अहा..काय सही आहे ही जोडीदार म्हणुन्.किती मोकळी आहे. हिच्या सोबत राहणं म्हंजे दिवस भर गप्पा,मन मोकळेपणा
आणी शिवाय कुठलीही फालतु बंधनं नाहित. " ही मिळाली तर काय होइल्,मी स्वप्नातच इमले बांधुन पाहिले,
त्या "काकु" स्टाइल वाल्या नवर्‍या सोबत फिरतानाही हातात हात घालायला घाबरतात रस्त्यावर.ही असेल तर
गळ्यात गळे घालुन हिंडेन.पण आता कुणास ठाउक आई-बाबा कुठलं लचांड पाहणारेत माझ्यासाठी."

एवढ्यात आईचा फोन आला.तिकडुन आवाजः- "अरे ऐकतोस का ,मुलगी मिळाली रे त्या शादी डॉट कॉम वर तुला हवी तशी.
फोटोत सुंदर दिसतेय, कालच बोलले तिच्याशी . तुझ्याच कॉलेजची दिसतीय. नॅशनल ऍथलीट,फोटो आणि माहिती मेल केलिये तुला.
आता तु असं कर की.."
आई एवढ बोलेपर्यंत मोबाइल झाला डिसचार्ज्,फोन झाला कट.
पण पण....
"नॅशनल ऍथलीट्,माझ्याच कॉलेजची...म्हण्जे..स्पृहा तर नै?"
डोक्यात शंका आली आणि लगेच जाउन मेल पाहिला.
तो...तोच फोटो.स्पृहाच ती.

म्हणजे आता हिच्या सोबत जन्मभर रहाय्ला मिळणार तर.
आणि तीनं मग सांगितलं का नाही चॅट वर आपल्याला की आपलच नाव तिला""स्थळ" म्हणुन आलय्,
गम्मत करायची,फिरकी घ्यायची म्हणुन असं केल तिनं?

"
पण ..पण ..एक मिनिट्..हे काय होतय?
मी तिला होकार कसा देइन?
हे हे सगळं ठरायच्या किती तरी आधि पासुन ही अशी बाह्या आणि तंगड्या उघड्या सोडुन बसते वेब कॅम समोर.
म्हण्जे, ही शहाणी,ज्याच्याशी फारशी कॉलेजातील धड पुर्ण ओळखही नाही त्याच्या समोर एवढी मोकळी राहते.
मग प्रत्यक्ष तिला भेटणार्‍या लोकांसमोर कशी असेल?
छे ..हे असलं मला मुळीच आवडणार नाही माझ्या बायकोनं केलेलं.
अस कुणाशीही एकदम सलगीनं वागलेलं.
बायको आहे, तर बायको सारखं वागावं उगिच डोक्यावर बसु नये.
मी देइन ना मोकळीक, पण एका मर्यादेतच.अस दुसर्‍या पुरुषांशी इतकं कस बोलवतं हिला...
छ्या...
असल्या कॅरेक्टरची बायको नकोच आपल्याला.
त्या पेक्षा नकारच कळवतो तिला.
"

सुधीर "नकार" कळवायला जाउ लागला फोन कडे.
त्याचे (स्वतःला पुरोगामी म्हणवणार्‍याचे)हे " सु विचार " ऐकुन मी तसाही थोडासा चकित झालो होतो.
(माझं आश्चर्य आवरुन ) त्याला मी म्हटलं "स्थळ चांगल आहे -नाही मी काहिच म्हणणार नाही.ते तुलाच माहितिए.
पण एवढं नक्की,की तु नकार दिलास तरीही तुझ्यापेक्षा कैक पट चांगली स्थळं तिला मिळतील."
तु आता फक्त ह्या विषयाबद्दल मौन धारण केलस तरी हे लग्न होणार नाही.एखाद -दोन दिवसात होकार येइलच इतर
ठिकाणंहुन तिला,मग चालेल का तुला?"

सुटकेचा नि: श्वास टाकत सुधीर खाली बसला . "मला लग्न नाहिच करायचं असल्या कॅरेक्टर वालिशी"
असं काहिसं पुट्पुट्ला आणि पुन्हा हावरट नजरेनं चॅटींग ची विंडो मोठी करुन "मोकळ्या" विचारांच्या
गप्पा मारु लागला,
इतरांच्या होणार्‍या बायकांशी!!
त्यांच्या मोकळेपणा बद्दल तो फारच आग्रही होता.!!!

बाजीरावांची टोलेबाजी :२: कोंबडी कविसंमेलन

बाजीरावांची टोलेबाजी :१: हा माझा वसंत नाही...

कोंबडी कविसंमेलन

कोंबडीला आलेल्या तापामुळे महाराष्ट्राला ताप झाला. लोकांनी कोंबड्या, अंडी खाणे बंद केले. मग या धंद्याला संरक्षण द्यायला सारेच पुढे सरसावले. मंत्र्यांनी विधानसभेत कोंबडी खाऊन दाखवली. फुकट कोंबडी महोत्सव साजरे झाले. नीळू फूले, आशा काळे वगैरे मंडळीनी खुशाल कोंबडी खावा अशी जाहिरात केली. याचसाठी एक कवीसंमेलन करावे आणि कवींच्या तोंडून कोंबडी महिमा ऐकवावा अशी आयडिया कुणाला तरी सुचली. रामदास फुटाणेंना हे कंत्राट देण्यात आले. त्यांनी दादरला शिवाजी मंदिरात कोंबडी कविसंमेलन आयोजित केले. संमेलनानंतर सर्व रसिक श्रोत्यांना फुकट कोंबडी चापायला मिळणार असल्याने इतकी गर्दी झाली की शिवाजी मंदिरातला कार्यक्रम शिवाजी पार्कवर घ्यावा लागतो कि काय असे वाटले.

वात्रटिका हे आपले पुस्तक 'मुर्गीक्लबच्या क्षुधाशील सदस्यास' अर्पण करणारे कवी मंगेश पाडगावकर यांनी सुरवात केली.
सलाम मुर्गीयो, सलाम.
कोंबड्यांच्या खात्म्याला सलाम
त्यांच्या आत्म्याला सलाम
कोंबड्या निर्मिणार्‍या परमात्म्याला सलाम.
कोंबडीच्या दोन्ही लेगांना सलाम
त्या आधीच्या पाच सात पेगांना सलाम...
पाडगावकरांची कविता रंगतच गेली.

नंतर आले मुर्गीक्लबचे सदस्य विंदा.
देणार्‍याने फुकट कोंबडी देतची जावे
खाणार्‍याने फुकट कोंबडी खातची जावे
कवितेच्या या पहिल्या ओळींनीच वन्समोअर मिळवला. पाडगावकरांनी 'खरा चित्पावन' अशी दाद दिली. शेवटी विंदा म्हणाले...
देणार्‍याने देत जावे, खाणार्‍याने खात जावे
कोंबडीला नसतात हात, म्हणून तिचे पाय घ्यावे.

विंदांनंतर आले नारायण सुर्वे. त्यांनी सर्व चाकरमान्यांना कोंबडी खायला काहीही हरकत नसल्याचे गावाकडे कळवायला सांगितले, ते या कवितेतून.
तुम्ही सुखात कोंबडी खावा, असं पत्रात लिव्हा.
भाव उतरले कधी नव्हं ते, झालीया कोंबडी स्वस्त
दोन्ही येळेला कोंबडीच खावा चानस घावलाय मस्त
रोज अंड्यांचा रतीब लावा, असं पत्रात लिव्हा...

त्यानंतर महेश केळुसकरांनी खास मालवणी चवीची कविता ऐकवली.
स्वस्तात घावली, शिजायला लावली, तिखट झनाट
तोंडात घास घातला आणि झालो झिनझिनाट...

नंतर आले फमु शिंदे. त्यांनी अत्यंत गहिवरलेल्या आवाजात कविता सादर केली..
कोंबडी म्हणजे नुसतेच एक खाणे नसते
गळ्यातून थेट पोटात शिरणारे गाणे असते.
कोंबडी असते पोल्ट्रीवाल्याची आई
हॉटेलमालकाची आई
अंडीवाल्याची कमाई
कोंबडी खाणे म्हणजे सदेह स्वर्गात जाणे असते.

नारायण सुमंतानी
चिकन झाले रांधूनी, बैस तू अन् हाणरे
बर्ड फ्लूचा गल्बला खोटारडा हे जाण रे
ही कविता सादर केली.

नायगावकरांनी आपली शाकाहारी ही कविता सादर केली. शेवटी हे काय चाललंय शाकाहारी असा प्रश्न करुन 'त्यापेक्षा कोंबडी बरी' असे उद्‍गार काढून हशा वसूल केला. कविसंमेलन रंगतच गेले. पण बाहेरून तंदुरीचे, रश्श्याचे दरवळ येताच श्रोते बाहेर धाव घेऊ लागले.

मग रामदास फुटाण्यांनी समारोपाची कविता सादर केली.
बकरा म्हणाला कोंबडीला, फार नाचलीस, पण नाही वाचलीस.
कोंबडी म्हणाली,
आधी खाण्यासाठी मारायचे, आता खाऊ नये म्हणून मारतात.
पण तुला रे आता कोण सोडवणार?
ताप आम्हाला आला, पण तुझं मरण आता खूप आधीच ओढवणार...

-बाजीराव

(दै. तरुण भारत, बेळ्गाव मध्ये ३१.०३.२००६ रोजी पूर्वप्रकाशित)

ज्येष्ठ कवयित्री सरोजिनी बाबर यांचे निधन


ज्येष्ठ कवयित्री सरोजिनी बाबर यांचे आज सकाळी पुण्यात निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. "रानजाई " या दूरदर्शनवरील मालिकेने शांता शेळके यांच्यासह सरोजिनी बाबर यांनी महाराष्ट्राच्या घराघरात स्थान मिळवले होते.
संबंधित वृत्त येथे वाचा.
सरोजिनी बाबर यांचा अल्पपरिचय

सरोजिनीबाईंना माझी विनम्र श्रद्धांजली!

बाजीरावांची टोलेबाजी :१: हा माझा वसंत नाही...

(मिपाकरांना नमस्कार. मी बेळगावहून प्रकाशित होणार्‍या दै. तरुण भारत या वृत्तपत्रात "टोलेबाजी '' या नावाचे सदर सहा महिने लिहित होतो. ही २००६ सालची गोष्ट. हे सदर तभाच्या सातही आवृत्त्यांतून संपादकीय पानावर रविवार सोडून रोज प्रसिद्ध व्हायचे. त्याला खूप मोठा वाचक वर्ग लाभला होता. मिपाचा सदस्य झाल्यानंतर इथल्या अभिजनांसाठी त्यातले काही निवडक लेख येथे प्रकाशित करावेत अशी इच्छा झाली. दै. तरुण भारतच्या संपादकांनी , तसेच मिपाच्या संचालकांनीही याला परवानगी दिली. दोघांचेही आभार.)

हा माझा वसंत नाही
पावसाळ्याची चाहूल लागते ती वृत्तपत्रातूनच. म्हणजे रेनकोट, छत्र्यांच्या जाहिरातींमुळे आणि प्रसिद्ध होणार्‍या पावसाच्या कवितांमुळे. प्रत्यक्षात पाऊस कधी वेळेवर येतो, कधी वाट पाहून दमवतो. पण कविंना त्याच्याशी काही संबंध नसतो. तसंच काहीसं वसंत ऋतूचं झालंय. गुढीपाडवा आला रे आला की लगेच मंडळी ``वसंत ऋतू आऽऽला'' असं गात सुटतात. यांना कशी आणि कुठे वसंताची चाहूल लागते कोणजाणे. शिशिर संपून वसंत येतो. सा‍र्‍या सृष्टीला म्हणे नवचैतन्याचे डोहाळे लागतात. निसर्ग मुक्तहस्ते रंगगंधांची उधळण करतो. कवी साहित्यिकांना नवसृजनाचे धुमारे फुटतात. (बाकी सगळं ठीक आहे. हा भाग जरा डेंजरस. वसंतात या मंडळींपासून जरा दूरच रहायला हवं.) तो मोहर काय, तो कोकीळ काय, तो हवेत दरवळणारा मादक गंध काय, विचारु नका. म्हणून मग मी ही ठरवलं की आपणही यंदा वसंतऋतू एंजॉय करायचा. मी लगेच एका ट्रॅव्हल कंपनीला फोन केला आणि विचारलं की तुमच्या काही वसंत ऋतू स्पेशल टूर्स वगैरे असल्या तर सांगा. तर तिथे जी कुणी सुकन्या फोनवर होती, तिला वसंत ऋतू वगैरे काही कळेना. ती सारखी इंडियात फिरण्यापेक्षा सिंगापूर, बँकॉक, पट्टायाला जा असं सांगत राहिली. मी फोन बंद केला.
आमच्या दुसर्‍या एका मित्राला फोन केला. तो ते पक्षी निरीक्षण की काय करतो. बिचारा खूप लांब लांब कुठेतरी फिरत असतो. त्याला म्हटलं की वसंत ऋतू आला असं ऐकलं. तर जरा कोकिळाचा आवाज ऐकायचा होता. कुठल्या एरियात भेटेल? तर तो म्हणाला, "अगदी खरं सांग. चिमणी पाहून किती दिवस झाले? आता शहरात झाडे नाहीत, पक्षी नाहीत. शहरात वसंताला आता नो एन्ट्री आहे. लांब कुठंतरी जंगलात गेलास तरच वसंत." त्यानं फोन बंद केला. पण ते चिमण्यांचं काही डोक्यातून जाईना. मी बायकोला विचारलं, "अगं, चिमण्या दिसत नाहीत त्या अलिकडं?" तर बायको म्हणाली, "कुठल्या काळातल्या गोष्टी करता आहात? तुमच्या लहानपणी चिमण्यांच्या उजेडात अभ्यास केल्याच्या गोष्टी सारख्या सांगत असता. आता आपण इन्व्हर्टर घेतल्यापासून कंदीलसुद्धा नाहीत घरात." तिच्या डोक्यात वेगळ्याच चिमण्या होत्या. मी नाद सोडला. एकंदर त्या वसंत ऋतूशी कुणाला काही फारसं देणंघेणंच नव्हतं.
बँकेलल्या मित्राला विचारलं तर म्हणाला, "तेव्हा नेमकं इयरएंडींग असतं रे. कुठला वसंत नी कुठलं काय. स्टेटमेंटस वगैरे अगदी वेळेवर पाठवावी लागतात. लगेच ऑडिट असतं पुन्हा." तेवढ्यात आमच्या त्या पक्षीमित्रानं मोबाईलवर कोकिळाच्या आवाजाची रिंगटोन पाठवली. अगदी बरं वाटलं. म्हटलं वसंत ऋतू संपेपर्यंत आता क्षणाक्षणाला कोकिळाचा आवाज ऐकता येईल. आपल्या नशीबी इतकाच वसंत.
या खटाटोपात एप्रिलच्या सुरवातीलाच आम्ही अगदी "फूल" झालो. वसंताचा स्पर्शही न झालेलं नापसंत फूल. सुरेश भटांच्या ओळी मला भलत्याच अर्थाने सामोर्‍या आल्या.
"कुठलेच फूल आता मजला पसंत नाही
कळले मला अरे हा माझा वसंत नाही."

-बाजीराव.

(दै. तरुण भारत, बेळ्गाव मध्ये पूर्वप्रकाशित)

बतावणी

स्थळ - विष्णुलोक

नारद (क्षीरसागरात प्रवेश करत) : "नारायण! नारायण! देवा, आहात का?"
विष्णू (शेषशय्ये वरुन गडबडीने उठत) - "अरे वा! आज रविवारी सकाळी सकाळी इकडे कुठे चरणस्पर्श मुनिवर?"
नारद : "समस्याच मोठी बिकट आहे बघा देवा!"
विष्णू : "समस्या? बिकट? आणि ती ही तुम्हाला? अहो तुमचा तर त्रिखंडात हिंडण्याचा उद्योग (स्वतःशीच - कळ लावत)! "
नारद (चमकून) : "काय म्हणालात?"
विष्णू :" नाही, तुम्हाला कशी आली समस्या? म्हणालो मी"
नारद : " असं असं. आता पहा, तीन रात्रींपूर्वी मला स्वप्न पडले की माझे सर्व ज्ञान मी विसरुन गेलोय अगदी आत्मज्ञानासकट! आणि दुसर्‍या दिवशी उठतो तर काय खरेच मला काही स्मरणच होईना! चिंतेने तीन रात्री झोप नाही!"
विष्णू : "हम्म्म्म्..वाटतोय खरा चेहरा चिंताक्रांत आणि जागरणाने ओढल्यासारखा."
नारद : "तेव्हा असं ठरवतोय की यमलोकात जाऊन यमालाच भेटेन म्हणतो. तोच देऊ शकेल ना आत्म्याचे ज्ञान?"
विष्णू : "यमलोकात? ते कशाला? आणि हातात ते जाडजूड पुस्तक कोणते आहे?"
नारद : "हो अरे खरंच हे सांगायचेच विसरलो. हे कठोपनिषद, ह्यात ते नचिकेताचे आख्यान आहे ना? त्यात वाचूनच तर मला कल्पना सुचली की आपणही असेच यमाकडे जाऊन ज्ञान का मागू नये?"
विष्णू : (मोठ्याने हसतात) "हा..हा.हा.हा...."
नारद : "काय झालं? असे हसताय का? काही चुकीचे बोललो का मी?"
विष्णू: "अहो मुनिवर चुकीचे नाही तर काय? एकदम सपशेल चुकीचे आणि निरुपयोगी!"
नारद : " देवा, आपण काय बोलता आहात आपल्याला समजते आहे का? अहो हे नचिकेताचे आख्यान आहे ह्यातून गहन आत्मज्ञानाचा मार्ग किती सोपा करुन सांगितला आहे आपल्या ऋषीमुनिंनी".
विष्णू :" थूत्..तुमच्या ते..रां**नो!!"
नारद (दचकून, हातातली पडणारी वीणा सावरत) : "देवा....देवा..अहो काय हे शिव शिव शिव..काय ही शिवराळ भाषा.."
विष्णू : "माफी असावी मुनिवर पण माझ्याचाने राहवले नाही. अहो कसले बोडक्याचे आत्मज्ञान आणि कसले काय? कुणी पाहिलाय हो आत्मा? तुम्ही पाहिलाय? नाही ना? मग काय. ते आपले मुनिवर लिहीत सुटले काहीतरी आणि तुम्ही त्यांच्या बहकाव्यात आलात म्हणजे काय! अहो साधी गोष्ट आहे, एका हातात सुरेचा प्याला असावा, समोर सुंदरशा अप्सरांचे नृत्य चालू असावे, गंधर्वांचे वीणावादन चालू असावे, आमची भाग्यलक्ष्मी आमचे चरणकमल तिच्या नाजूक करकमलांनी हलके हलके चुरुन देत असावी, समोर कल्पवृक्षाच्या पानावर क्षीरसागरातल्या लुसलुशीत कालवांचे कालवण. बस्स. अहो तेच आत्मज्ञान! बाकी दुसरं तिसरं काही नसतं! "
नारद (अचंबित होत) : "असं म्हणताय? हे तर काही मला उमगेना..सगळंच गोलगोल फिरल्यासारखं होतंय!"
विष्णू (टाळी वाजवून) : " कोण आहे रे तिकडे? अरे मुनिवरांना जरा सोमरस पाजा, आणि हो सिंगलमाल्टवालाच द्या उगीच भलतासलता नको!"
नारद : (सोमरस घेऊन तोंड पुसत) : "आहा! आत्ता कसं आल्हाददायक वाटतंय! बरं देवा मी निघतो."
विष्णू : "कुठे जायचंय"?
नारद : "आता मर्त्यलोकात एक चक्कर टाकून यावी म्हणतो."
विष्णू : " अरे वा! अहो मग चाललाच आहात तर तिथे सुध्दा आत्मज्ञान मिळेल!"
नारद : "तिथे? ते कसे बुवा?"
विष्णू : "मुनिवर आपण काळाच्या फार मागे आहात! अहो देवलोकात मिळणारे आत्मज्ञान फक्त सत्ययुगात होते. आताचे कलियुग आहे. तेव्हा सरळ ठाण्याला जा. मालवणी हॉटेलात पोहोचा. तिथे काही संतपदाला पोचलेली मंडळी सिंगलमाल्ट सोमरस घेताना दिसतील त्यांच्यासमवेत बसा, ऐसपैस गप्पा करुन समोर आलेल्या सुरमईचा यथेच्च समाचार घेत आत्मज्ञान घ्या, कसें!!"
नारद : "अरे बाप रे! माझी ऑपरेटिंग सिस्टिम एकदमच कंडम झाली म्हणायची की. इकडे विस्टा चालू आहे आणि मी आपला एम्.एस्.डॉस मधेच! अरेच्चा, आणि तो गरुड काय धरुन बसलाय ते चोचीत?"
विष्णू : "कोण तो होय? अहो मी ही परवाच भेट देऊन आलो ना ठाण्याला, तेव्हा मालवणीमधून एक अख्खी सुरमईची टोपलीच उचलून आणलीन त्याने. रोज एकेक घेऊन चघळत बसलेला असतो! आत्मज्ञानी झाल्यासारखं वाटतंय म्हणत होता!"
नारद : "छे, छे, छे. आता मला काहीच सहन होत नाहीये. जातो कसा."

चतुरंग
(डिसक्लेमर - ह्यातील घटनांशी दुसर्‍या कोणत्या लोकांत साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!) ह्.घ्या.

लोणचं..

नाही हो... मी कोणत्याही लोणच्याची रेसिपी इथे देणार नाहिये. तेव्हा लोणचं प्रेमींनी इतके आनंदी होण्याचं काहिही कारण नाही. खरंतर, लोणचं हा विषयच असा आंबट, तिखट आणि चमचमीत आहे ना की नुसतं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. लोणच्याबद्दल काही लिहिण्यासारखं असं विशेष नाही. पण तरीही लोणचं मला नेहमीच लोणच्यात म्हणजे कोड्यात टाकत आलं आहे. कारण,जर किती प्रकारची लोणची असतात असं विचारलं.. तर आंब्याचं, लिंबाचं, मिरचीचं, मिक्स भाज्यांचं.... अशा अनेक प्रकारची लोणची असतात. पण लोणच्याचे प्रकार किती असं विचारलं तर... ते ही अनेक आहेत. म्हणजे, महाराष्ट्रीयन, कर्नाटकी, पंजाबी, राजस्थानी, काश्मिरी.. आंध्राकडचे.. आणि आजकाल खाते ते पिकल...बरेच म्हणजे अगदी बरेच... हे प्रकार तोडिसतोड चवदार असतात हे महत्त्वाचे.

पंजाबी लोणच्यात कचालूचे लोणचे म्हणजे अप्रतिम. हा कचालू नक्की काय प्रकार असतो ते मला आजर्यंत समजले नाही. याची चव कैरी सारखी दिसते ही कैरी सारखे.. पण कचालू.. तसेच पंजाबी मिक्स लोणच्यामध्ये अननसाच्या कापासारखा दिसणारा (अगदी छोटा काप) एक प्रकार असतो. चवीला आंबट तिखट असतो त्याला नक्की काय म्हणतात हे ही आजपर्यंत मला समजलं नाहि. राजस्थानी लोणच्याची चव न्यारीच. भरपूर मोहरीची डाळ घातलेले, लाल-लाल तेलात आणि बडीशेपेची खमंग चव असलेले लोणचे. त्याचा रंग पाहूनच तोंडाला पाणी सुटावे. आंध्रा कडचे लोणचे म्हणजे हिंगाचा उग्र वास नाकात भरलाच पाहिजे. मोठ्या कैरीच्या फोडी, मेथीचे दाणे, मोहरीची पावडर, रंग थोडासा काळपट लाल आणि हिंगाचा दमदार वास... साधारण दक्षिण भारतीय लोणच्याचं असं वर्णन करता येईल. टोमॅटोचं लोणचं , चिंचेचं लोणचं हे ही प्रकार खासच. आंध्राकडे लाल आंबाडीचं लोणचं मिळतं . लैच झ्याक...! लाल आंबाडीची भाजी उन्हात सुकवून, त्यात बरेच मसाले घालून ते लोणचं बनवतात. आईची सख्खी मैत्रिण (बेस्ट फ्रेंन्ड हो..)आंध्राची असल्याने हे लोणचं बर्‍याचदा खाण्यास मिळायचे. गुजराथी लोणच्यांमध्ये भोकराचं लोणचं. हा भोकरं प्रकार इतका मजेदार असतो, दिसताना ते मोठ्या कच्च्या करवंदाप्रमाणे आणि आतून आंब्यासारखी कडक बाठ असते. चवीला एकदम फन्डू. तसेच कैरीचा छुंदा.. कैर्‍या खिसून केलेला प्रकार मस्तच. काश्मिरी ड्रायफ्रुट्सचं लोणचं... त्याला येणारा केसराचा सुगंध.. काश्मिरी पुलावसोबत मस्त लागतं. महाराष्ट्रीयन लोणच्यांमध्ये कैरी चे तिखट, गोडाचे, लिंबू- ते ही तिखट आणि गोडाचे, मिरची-लिंबू, कैरी-मिरची,नुसती मिरची, सिझनमध्ये फ्लॉवर, मटार, गाजर असे मिक्स भाज्यांचं लोणचं,कच्च्या करवंदाचं लोणचं..

माझी आजी (आइची आई) इतक्या प्रकारची लोणची घालायची की, काही विचारू नका. कच्ची पपई, शेन्न्या(हे फक्त मी एकदाच खाल्लं), तिला जमत होते तो पर्यंत इतक्या प्रकारची लोणची खाल्ली तिच्या हातची की त्याला मोजदादच नाही. नेहमीची लोणची तर होतंच होती पण, शिवाय (छोट्या छोट्या कैर्‍यांचं) बाळ कैरीचं लोणचं, तसेच कैर्‍या बारिक चिरून, त्यात तिखट, मीठ, गूळ घालून.. त्यावर हिंग, मोहरी, हळदीची.. खमंग फोडणी घालून केलेले २-३ दिवसांपुरते लोणचे... हे जास्ती टिकत नाही.. अर्थात टिकण्यासाठी उरतच नाही हा भाग वेगळा. माझी आईसुद्धा दर सिझन ला नवं लोणचं घालते. आणि मग तिने केलेल्या लोणच्यावर डल्ला मारून मी बाटलीभर लोणचं इकडे पळवून आणते. एकदा मी बेडेकर की केप्रचा मसाला घालून कैरीचं लोणचं केलं. ते मी सोडून कोणालाही आवडलं नाही हा भाग वेगळा.. पण मी एकदा लोणचं करायचा प्रयत्न केला. आजीला सांगताना ती म्हणाली," कसले, ते मेले बाजारचे मसाले, त्याला ना स्वाद ना रंग.. मिक्सरसारखी उपकरणं आहेत हाताशी.. दळा ना घरी लोणच्याचा मसाला." जातीवंत रेडिओ जॉकी असल्याने बोलण्यात हारणे मंजूर नाही.. मी तिला म्हणाले,"घरी आपल्याला हवा तश्या रंगाचा, हव्या तश्या चवीचा मसाला बनवून कोणीही लोणचं सुंदरच बनवेल.. खरं कौशल्य दुसर्‍यांनी बनवलेला मसाला वापरून उत्तम लोणचं बनवण्यातच आहे. ....... आणि आजी, हा मसालाही घरीच बनवलेला आहे. हां, आता माझ्या घरी नाही पण केप्र / बेडेकरांच्या तरी घरी बनवलाच असेल ना!!" माझा अवखळपणा समजून आजीने "शहाणी आहेस फार!!!" इतकीच टिप्पणी केली..

मला लोणच्याचं वेड इतकं आहे की, कुठे फिरायला म्हणून गेले तरी त्या भागात प्रसिद्ध असलेल्या दुकानात मी पहिल्यांदा नवं लोणचं आहे का कुठलं हेच बघते. सांगलीला कोठल्याशा दुकानातून मी लसणीचं लोणचं आणलं होतं. ते मात्र मला विशेष आवडलं नव्हतं. दिल्लीला गेले होते तेव्हा, रूपक या जगप्रसिद्ध लोणच्याच्या दुकानातून मी ते कचालूचं आणि त्या अननसासारख्या दिसणार्‍या प्रकारचं लोणचं मी आणलं होतं. माझ्या या वेडापायी इथे अमेरिकेत आल्यावरही दुकानातल्या आइल्समधून फिरताना पिकल्स असे लिहिलेल्या बाटलीत व्हिनेगर मध्ये उभ्या ठेवलेल्या छोट्या काकड्या, वेगेवेगळ्या रंगांच्या सिमला मिरच्या, ऍलॅपिनोज.. बघून हे नक्की कसं लागतं हे पाहण्यासाठी मी तेही घेऊन आले. आणि पोळी बरोबर खाताना पदरी जी निराशा पडली ती पचवणे कितीतरी दिवस शक्य नाही झाले. मग समजले की ही पिकल्स सँडविच मध्ये घालतात.. पण आधी पोळीसोबत खाताना, या अमेरिकनांची किव आली. या असल्या पाणचट पदार्थाला पिकल म्हणतात??? भारतीय पिकल खाल्लं तर यांची वाटच लागेल. नवर्‍याच्या ऑफिसमध्ये एकदा तो आम्ही भारतातून आणलेली चितळेंची बाकरवडी घेऊन गेला. त्याच्या फिरंगी मित्राने ती खाऊन डायरेक्ट बाथरूम गाठले. "ओह... दिस इज डायनामाईट....!!" असं म्हणाला. बरं तर बरं त्याने नवर्‍याला सू नाही केलं.. (बाथरूम मध्ये जाऊन केलं असेल कदाचित).

लोणचं घालणे हा प्रकार तसा जिकरीचाच. मला स्वतःला ती मसाल्यांची भाजा-भाजी, परता-परती.... मग दळणे... चाळणे.. हे असले प्रकार अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे केप्र्/बेडेकरांनी कष्टाने केलेली लोणचीच आणलेली बरी. त्यात आता मदर्स रेसिपी आली... मग काय (कोणाच्या तरी)आईच्या हातची लोणची. लोणचं घालणे "त्या" अनुभवावरून मी बंद केले ते बंदच.. लोणचं घालणे हा वाक्प्रचार म्हणूनच जास्ती वापरला जातो. लहान असताना एकदा मी आजोबांच्या बरोबर नदिवर गेले होते तेव्हा तिथुन बरेच पेबल्स (सागर गोटे की गारगोटे.. तेच ते) घेऊन आले होते. तेव्हा आजी म्हणाली होती, "इतकी कशाला दगडं आणलीस ही.. आत याचं काय मी लोणचं घालू?" तेव्हा पहिल्यांदा मी हा वाक्प्रचार ऐकला, आणि तो जाम आवडून गेला अगदी लोणच्या इतकाचं. त्यानंतर.. मी स्वतः लोणचं घालत नसले तरी याचा प्रयोग मात्र बोलण्यात सर्रास करू लागले. आणि कॉलेजमध्ये तरी..कोणत्याही विषयावर चर्चा करणे म्हणजे लोणचं घालणे असा प्रचलित झाला. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर, " सध्या विद्या आणि कुसुम कॉलेजच्या एलेक्शनचं लोणचं घालत बसल्या आहेत" ...

आता लोणचं या विषयावर लोणचं घालतानाही मी आज संध्याकाळी पटेल फुड्स मधून कोणतं नवं लोणचं आणावं याचं लोणचं माझ्या डोक्यात घालते आहे...Laughing))

का हो डोक्याचं लोणचं नाही ना घातलं मी तुमच्या????

- प्राजु

काही काळाच्या ओघात हरवलेले लेख/मुलाखती

खुप वर्षापूर्वी कालनिर्णय मध्ये पु.ल.देशपांडेंनी एक पाककृती (विनोदी) लिहिली होती, त्यातले केवळ एक वाक्य मला आठवतेय "वाण्याकडून आणलेल्या गुळाची आख्खी पूडी पातेल्यात टाकावी... कागद व दोर्‍यासकट". कोणाकडे हा लेख (पाककृती) आहे का?

पुलंच्या काळात पण साहित्य, संगीत ह्यांची चोरी व्हायची, असाच एकदा हा विषय निघाला आणी पुलं नी हातात पेटी घेऊन असा काही नजराणा पेश केला की सगळे गार झाले, संपल्यावर पुलं म्हणाले "पाहू या ह्याची नक्कल कोणी करु शकतो का" ह्या घटनेबद्दल कोणाला जास्त माहित आहे का?

धन्यवाद

प्रशांत

रविवार विशेष

वैदर्भी बोली खरेतर संस्कृतशी अधिक जवळीक असणारी. मात्र तिची खुमारी पाहायची असेल तर बुवा उपाध्यांची भगवत् गीता वाचावी. भगवत् गीतेशी एव्हढा लडिवाळपणा करण्याची हिंमत दुसर्‍या कोणत्या भाषेची वा बोलीची झाली असेल असे वाटत नाही.

बुवा लिहितात -

पार्थ म्हणे गा हृषीकेशी,
या युद्धाची ऐशीतैशी,
बेहत्तर आहे मेलो उपाशी,
पण लढणार नाही.

धोंड्यात जावो हि लढाई,
आपल्या बाच्याने होणार नाही,
समोर सारेच बेटे, जावाई,
बाप, दादे, काके.

अरे लढाई असते का सोपी ..
मारे चालते कापाकापी,
कित्येक लेकाचे संतापी
मुंडकी ही छाटती.

मग बायका बोंबलती घरी,
डोई बोडून करती खापरी,
चाल चाल कृष्णा माघारी,
सोड पिच्छा युद्धाचा.

ऐसे बोलून अर्जुन,
दूर फेकून धनुष्यबाण,
खेटरावाणी तोंड करून
मटकन खाली बैसला.

मग कृष्ण अर्जुनाला समजावतो -

कृष्ण म्हणे रे अर्जुना,
हा कोठला रे बायलेपणा,
पहिल्यानं तर टणटणा
उडत होतासी लढाया.

तू बेट्या मूळचाच ढिला,
पूर्वीपासून जाणतो तुला,
परि आता तुझ्या बापाला ही
सोडणार नाही बच्चमजी.

आहाहा रे भागूबाई,
म्हणे मी लढणार नाही,
बांगड्या भरा की रडूबाई
आणि बसा दळत.

वर्‍हाडी बोलीची लज्जत समजण्यासाठी एव्हढे नमुने पुरे व्हावेत.

वि. सू. - मूळ कवीची इथे लेखनास अनुमति प्राप्त, चिंतातुर जंतुंनी काळजी करू नये ही वि.वि.