प्रकटन

शनी मंगळ युती

लोकहो,

ज्योतिष्यातील अत्यंत वाईट समजल्या गेलेल्या शनी मंगळ युतीवर आम्ही आज भाष्य करीत आहोत.

ही युती दिनांक २१ जून रोजी होणार आहे. युतीचे दिप्तांश १० अंश आहेत. म्हणजे मंगळ हा शनीजवळ १० अंश आल्यापासून ते शनीपासून १० अंश जाईपर्यंत या युतीचे परिणाम जाणवतील.

दिनांक २१ जून रोजी मंगळ कर्केत २९ अंश ४३ कलांवर असेल व त्या दिवशी शनी सिंहेत ०९ अंश ४२ कलांवर असेल. त्या दिवसापासून ही युती सुरु होईल. दिनांक १० जुलै रोजी ही युती एका अंशात म्हणजे अंशात्मक असेल. त्यानंतर मंगळ पुढे निघून जाईल व दिनांक ३१ जुलै रोजी ही युती पूर्णपणे तुटेल.

Mars- Saturn conjunction हा सर्व पद्धतीच्या ज्योतिर्विदांनी एक जबरदस्त कुयोग मानलेला आहे. अत्यंत वाईट फळे देणारी ही युती आहे. या फळात मोठे अपघात, ज्यात अनेक माणसे मृत्युमुखी पडतात अशी नैसर्गिक अरिष्टे, वादळे, घातपाती कारवाया, रक्तपात, दहशतवाद, इमारती कोसळणे, बॉम्बस्फोट, भूकंप, मोठमोठ्या आगी, रसायन आणि वायुगळती अशा प्रकारची फळे मिळतात.

तसेच व्यक्तिगत पातळीवर कुंडलीत ज्या स्थानात ही युती पडते, त्या स्थानाने दर्शविलेल्या बाबतीत एखादे जबरदस्त अशुभ फळ मिळते.

सध्या कर्क, सिंह आणि कन्या या राशी साडेसातीत आहेत. त्या राशीच्या लोकांनी फार सावध रहावे. खरे तर सर्वांनीच सतर्क रहावे.

मागील वेळी जेव्हा ही युती झाली होती तो दिवस अजूनही आम्ही विसरलेलो नाही. तेव्हा गुरूपौर्णिमेच्या दिवशी मुंबईमध्ये लोकल गाड्यात बॉम्बस्फोट झाले होते. १२ जुलै २००६.

त्या दिवशी गुरूपौर्णिमा होती. आम्ही गुहागरला होतो. दुपारी गुहागरहून गुरूपौर्णिमेनिमीत्त चिपळूणला आलो. आमच्या गुरूंच्या घरी दूरदर्शनच्या बातम्या लावल्या तेव्हा त्या भीषण बॉम्बस्फोटाची दृष्ये पाहून हबकलो.

जसजसा मंगळ शनीच्या जवळ येतो तसतसा वातावरणात फरक पडतो. ब्रह्मदेशात येऊ घातलेले चक्रीवादळ याचीच सूचना देते आहे काय?

या दिवसांत सर्वांनी सतर्क आणि सावध रहावे. कोणताही अनुचित प्रकार दिसल्यास किंवा कोणी संशयास्पद रितीने वावरतांना दिसल्यास संबंधित शासकीय अधिकार्‍यांना त्याची त्वरीत सूचना द्यावी. अफवांवर विश्वास ठेऊ नये. रात्रीचे प्रवास शक्य असल्यास टाळावेत. रेल्वे स्थानके, बस स्थानके, सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, बगीचे, चित्रपटगृहे येथे वावरतांना आजूबाजूस बारीक लक्ष ठेवावे व जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पाडावे.

आपला,
(सावध) धोंडोपंत

क्रमशः

दीर्घ लेखन मालिकेच्या स्वरूपात टाकण्याची एक पद्धत रूढ होऊन गेली आहे. क्रमशः हा त्यासाठी अगदी सोप्पा मार्ग ठरतो की काय अशी भीती वाटावी अशी स्थिती आता निर्माण झाली आहे. काही मालिका उचितच असतात; पण प्रत्येक लेखन हे मालिकेच्या साच्यात बसते असे नाही. अशा वेळी तुकड्यांमध्ये मांडले जाणारे पण कालबद्धता नसणारे लेखन आस्वादाची गंमत घालवून टाकते. लेखनाच्या सोयीसाठी लेखनाचे तुकडे करणे उचितच आहे, पण त्यासाठी आस्वादाच्या बाबीचाही विचार होणे आवश्यक नाही का? लेखनाचा आस्वाददेखील तुकड्यांमधून अधिक चांगल्या पद्धतीने वाचकाला घेऊ द्यावा याची खूणगाठ लेखकानीही मनाशी बांधलेली असावीच. त्यासाठी लेखकांना एक सूचना करतो आहे
लेखन पूर्ण करावे आणि मग त्याचे सोयीनुसार तुकडे करून भागशः एकाचवेळी प्रसिद्ध करावे. लेखमाला असेल तर ही सूचना अर्थातच लागू होणार नाही. पण त्यातही काही कालबद्धतेचे बंधन स्वतःवर घालून घ्यावे.
एक वाचक म्हणून तुम्हाला काय वाटते?
वाचनाचा आस्वाद अधिक मधूर व्हावा हाच या चर्चाप्रस्तावाचा हेतू आहे.

१० मे १८५७

१० मे १८५७ !

काही महीन्यांच्या धावपळी नंतर तात्या टोपे व इतर क्रांतीका-यांनी ३० मे चा दिवस ठरवला होता बंडाचा ! विदेशी राज्यकर्ते खदेडून बाहेर काढण्यासाठी.
पण प्रचंड सामाजिक तनाव व मंगळ पांडे मुळे कानुपुर छावणीत झालेल्या उठावामुळे तात्यांना आंदोलन ठरलेल्या दिवसापेक्षा आधीच चालू करावे लागले.. व त्याची सुरवात कानपूर तथा सुरत छावणी पासूनच झाली सर्वांनी मिळूनबहाद्दुर शहा जफर ला बादशहा मानला व तात्या टोपे ह्यांच्या हाताखाली सर्व उत्तर भारत एक होऊन इंग्रजाच्या विरुध्द पहिले स्वातंत्र्य बिगूल फुकले...

ह्या दिवसाला व त्या क्रांती कार्याला गेल्या १० मे ला १५० वर्ष पुर्ण झाली !

सर्व क्रांतीका-यांना माझे नम्र अभिवादन !

जे माहीत आहेत त्यांना व जे माहीत नाही त्यांना लाख लाख नमन !

बहाद्दुर शहा जफर च्याच शायरीने यातना काय व कश्या होत्या ह्याचे उत्तर मिळते.

"ईतना बदनसीब है जफर.
दफन के लिए,
दो गज जमीं भी ना मिली,
कु-ए-यार में "

मदर्स डे अर्थात मात्रुदिन

आज ११ मे २००८ ..मदर्स डे अर्थात मात्रुदिन. अमेरिकामध्ये मे महिन्याच्या दुसर् या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. मदर्स डे हा अमेरिकन डे असला तरी हल्ली जगभर साजरा केला जातो.

आई रोजच आपल्यासाठी खूप काही करत असते. आपल्यासाठी तिळतिळ झीजत असते. मुलं कितीही मोठी झाली आणि त्यानाहि मुलं झाली तरी तिचं आईपण कधीच संपत नाही. एखादा दिवस असा हवा की, तिच्यासाठी आपल्याला काही करता येईल. ...तिला खास वाटेल असे काहीतरी. या भावनेतून मदर्स डे साजरा केला जाऊ लागला. पाश्चांत्यांचे अन्धानुअकरण नको पण मदर्स डे मागचा उद्देश अतिशय चान्गला असल्याने आपणही तो साजरा करायला काही हरकत नाही.

सकाळी आईच्या आधी उठून आपण तिच्यासाठी तिच्या आवडीची न्याहरी बनवू शकतो. तिच्या आवडीच्या फुलांचा गुच्छ तिला भेट देऊ शकतो. आपल्या व्यस्त कामाच्या वेळापत्रकातून थोडासा वेळ काढुन तिच्याशी मस्त गप्पा मारु शकतो. तिला आवड असेल तर नाटकाला वा सिनेमाला नेऊ श़कतो. तिच्यापासून लाम्ब असलो तर तिला छानसे पत्र लिहू शकतो.

काहींना वाटेल की मात्रुदिन हा वेगळा असा का साजरा व्हायला हवा...आईवरील प्रेम , तिच्या मायेची जाणीव रोजच व्यक्त व्हायला हवी.
ते ही बरोबर आहे . पण तरीही आजच्या धकाधकीच्या , तणावाच्या ,धावपळीच्या जीवनात तिने आपल्यासाठी केलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक त्याग सहजपणे नजरेआड केला जाऊ शकतो, आईला सगळ चालतं म्हणुन काही गोष्टी ग्रुहीत धरल्या जाऊ शकतात. आईची काही ईच्छा असेल, तिला काहीतरी वेगळं करावंसं वाटत असेल हे आपल्या गावीहि नसतं. हे सर्व टाळून तिला स्पेशल फील व्हाव यासाठी आजच्या मात्रुदिनाचा उद्देश.

माझी आई माझ्यापासून हजारो मैल लाम्ब असल्याने मी तिला फोनवरूनच शुभेच्छा देणार आहे. तुम्ही काय करणार आहात किन्वा काय केले हे वाचायला जरूर आवडेल.
मीपावरील सर्व मातांना आणि समस्त मीपाकरांच्या माताना मात्रुदिनाबद्दल हार्दिक शुभेच्छा !!!

-- ईश्वरी

शाकाहार :- काही नवीन पैलु

मित्रहो,
जीवाची हत्या करणे वाइट,म्हणुन मांसाहार वाइट आणी म्हणुनच तो अयोग्य.शाकाहार तेव्हढा चांगला.
ह्यातील माझं काहीही म्हणणं नाही.
मी मानवी शरीर,प्रकृती ह्यासाठी स्वाभावीक अन्न कुठलं आहे, ते शोधतोय.
मुळात, बहुतांश सर्व सस्तन प्राणी आणी पक्षी ह्यांचे प्रामुख्याने शाकाहारी आणि मांसाहारी असे वर्गीकरण करता येते.
जे प्रामुख्याने वनस्पती खातात, ते शाकाहारी.
जे प्रामुख्याने इतर वनस्पतींशिवाय इतर सजीव(प्राणी,पक्षी )भक्ष्य म्हणुन खातात(स्वजातीतील् सुद्धा) ते मांसाहारी.

माझे काही तर्क, निरिक्षण आणि वाचनातील् काही भागानुसार मानवी शरीरा बद्दल हे विचारः-

१.एकाच प्रवर्गातील किंवा परीवारातील(स्पेसीज् किंवा फ्यामिली) प्राण्यांचा आहार समान/मिळताजुळता/साम्य असलेला असतो.
जसे घोडा आणि झेब्रा हे एकाच प्रवर्गातील प्राणी.
त्यांच्या शरीरात विलक्षण साम्य आहे.म्हणुन त्यांच्या आहारातही साम्य आहे.
दोघेही हिरवळ चरतात,त्यावर् जगु शकतात.
आता डोळ्यासमोर चित्र आणा की मांजर् उंदीर् पकडते आहे.
दुसरे चित्रः- चित्ता किंवा वाघ ससा पकडत आहेत.
काही साम्य दिसलं? दुसर्‍या चित्रात उंदीर(भक्ष्य) मोठा झाला आणि बनला ससा
तसेच भक्षक ही मोठा झाला आणि मनी मावशी चा बनला वाघोबा.
बरोबर? कारण हे दिसत की वाघ/चित्ता आणि मनी माउ हे एकाच म्हणजे मार्जार प्रवर्गातील असल्याने त्यांच्या
आहारात हे साम्य आहे.
अगदि त्याच प्रमाणे माणुस हा "ग्रेटर एप्स" ह्या प्रवर्गात मोडतो.(प्रवर्ग नामातील् चु.भु.द्या.घ्या. बायो लॉजी सोडुन काही युगे उलटली आहेत. )
त्यांतील प्राणी कोण? तर् ओरँग उटांग,चिंपांझी,गोरिला वगैरे.
ह्यांचे मुख्य अन्न ते काय? तर् काही प्रमाणात् झाडपाला आणि उरवरीत फळे, काही प्रमाणात धान्य कण सुद्धा.
ह्यानुसार, मानवाचा आहार् काय हवा?

२.मांसाहारी प्राण्यांची शरीर रचना वैशिष्ट्य म्हणजे अति तीक्ष्ण दात जबड्याच्या समोरील भागात् असतात.(थोडेफार् ड्रॅक्युलासारखेच,भयावह) उदाहरणः- कुत्रा,वाघ,लांडगा.
येथे, अन्न तोडणे हे मुख्य उद्दिष्ट् आहे, चर्वण नव्हे.
याउलट,शाकाहारी प्राण्यांकडे सहसा अशा दातांचा अभाव असतो.
त्यांचे दात असतात प्रामुख्याने "चर्वण" करण्यासाठी.जात्याच्या दोन दगडात जसे धान्य रगडले जाते,
त्याच प्रकारे अन्न हे ह्या प्राण्यांच्या रुंद पृष्ठभाग असणार्‍या दातात "रगडले" जाते.

नेमके असेच दात मानवाला आहेत,ते म्हणजे त्याच्या दाढा.
(जबड्याच्या आकारमानानुसार्, सर्वाधिक भुभागावर् हे दात पसरलेले आहेत.)
ह्यानुसार, मानवाचा आहार् काय हवा?

३.शाकाहारी प्राणी "चावुन" खातो. मांसाहारी प्राणी चावतो कमी,"गिळतो" जास्त.
("अन्न रगडण्याची " पुरेशी व्यवस्था नसल्याने)ह्या चावुन खाण्यादरम्यान, धाकाहारी प्राण्याच्या आहारात पुरेशी "लाळ"
मिसळली जाते.मांसाहारी प्राण्यात ही प्रक्रिया तेव्हढ्या प्रमाणात होत नाही.(जवल् जवळ् नगण्य.)
माणसाच्या लाळेचे अन्नात मिसळण्याशी गुणोत्तर काढले,तर् ते शाकाहारी प्राण्यांच्या अगदी निकट जाते.

४.ऍपेंडिक्स् हे नाव बर्‍याच लोकांनी(जवळपास् आपण सर्वांनीच) ऐकले असावे.
काय असते हे ऍपेंडिक्स?
तो आहे मानवी शरीरातील एक हल्ली वापर होत नसलेला भाग.
तो हिरव्या वनस्पती खाणार्‍या प्राण्यात कार्यरत् असतो.
त्याचे कार्य हेच की:- हरित वनस्पतीतील सेल्युलोज चे पचन करुन त्यातुनही उर्जा मिळवणे.
मानवी शरीरात हा भाग् कार्यरत् नसल्याने हरित भाग उर्जेसाठी वापरता येत् नाही आणि मग विष्ठेतुन बाहेर् टाकला जातो.
पण ह्या अवयवाची उपस्थिती हेच सुचित करते की मानवी शरीर तुर्तास शाकाहारास जवळचे आहे.
शाकाहारच ते प्रमुख्याने नीट पचवु शकते.

५.सहज प्रवृत्ती:-
एका (पाश्चात्त्य)विश्लेषकाचे निरिक्षण आहे ते असे........
तुम्ही एका नुकत्याच थोड्याशा मोठ्या झालेल्या वाघाच्या भुकेल्या बछड्यासमोर किंवा मांजरीच्या पिल्लासमोर एक
सफरचंद ठेवा आणि ठेवा एक छोटेसे जिवंत कोंबडीचे पिल्लु.
नैसर्गिक बुद्धिनुसार्, बछडे त्या पिलाला (भक्ष्य म्हणुन) मारुन खाइल, व सफरचंदाशी खेळत बसेल्.

आता तसेच सफरचंद आणि जिवंत कोंबडीचे पिल्लु एका निरागस , भुकेल्या ,(माणसाच्या)बालकाच्या समोर ठेवा.
बालक ते सफरचंद खाउन टाकेल आणि त्या पिलाशी खेळण्यात मग्न होइल.
बछडे सफरचंद् खायचा विचारही करणार् नाही.
बालक त्या पिलाला मारुन मग खाण्याचा विचारही करणार नाही.

ह्याचे कारण?नैसर्गिक वृत्ती,नैसर्गिक जाणीव किंवा उपजत् ज्ञान म्हणा हवं तर.

मग ह्या सगळ्या गोष्टी बर्‍याचशा हेच सुचवतात की शारिरिक दृष्ट्या मानवाला प्रामुख्याने
शाकाहार हाच सुटेबल् ठरतो.
तूम्हाला काय वाटतं?
वरील निरिक्षण,तर्क् आणि निष्कर्ष योग्य दिशेने जाताहेत, की त्यात कुठे काही विसंगती,तर्क् दोष आहे?

दुसरी संधी

परवा रात्री पडल्यापडल्या झोपायच्या काही क्षण आधी सरलेल्या वर्षांचा आढावा मनात नकळत घेतला जात होता. सतत बदलत असणार्‍या आपल्या आयुष्यातल्या चढउताराकडे पाहताना प्रश्न पडत होता : बापरे , तोच का मी हा ? हेही झाले आपल्याबाबतीत , नाही का ? "कहां कहां से गुजर गये" या सारखे विचार येत होते. सर्वच गोष्टी काही काळवंडून टाकणार्‍या नव्हत्या. काही आनंदाचे क्षण होते , काही चिमूटभर यशाचे , काही रोमांचक प्रसंगही.

झोप लागता लागता एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली : "लाईफ इज ऑल अबाऊट सेकंड चान्सेस" - अर्थात "दुसर्‍यांदा मिळणारी संधी हाच तुमच्या आमच्या आयुष्याचा स्थायिभाव आहे". "दुसरी संधी' हा प्रकार नसता तर आयुष्य वैराण झाले असते , खुंटलेच असते म्हणाना !

कॉलेजच्या एका महत्त्वाच्या परीक्षेमधे नेमके असे आणि इतके गुण मिळाले की ज्यामुळे , एका महत्त्वाच्या ठिकाणाचा प्रवेश शून्य मार्कांनी हुकला. होय, १ नव्हे , तर शून्य ! त्याचे झाले असे की, वेटींग लिस्टवरच्या दुसर्‍या मुलाला माझ्याइतकेच गुण होते आणि नेमके मला काही "अवांतर" विषयामधे कमी गुण असल्याने प्रवेश त्याला मिळाला ! त्या प्रसंगी आपल्या भविष्याबद्दल आलेली डोळ्यासमोरची अंधेरी आठवते. आणि आठवते त्यानंतरचे वर्षही, जेव्हा परत खूप अभ्यास करून , त्याच परीक्षेला बसून , पूर्वीपेक्षा खूप जास्त गुण मिळवून, प्रवेश मिळवला. परीक्षा द्यायची "दुसरी संधी" नसती तर ?

अशी आणखीही उदाहरणे आहेत. जी ए कुलकर्णींनी लिहिलेल्या एका दंतकथेमधल्या साम्राज्याचे घोषवाक्य असते : "पडेन , पण पडून रहाणार नाही !"

थोडक्यात , बर्‍याचदा आयुष्य आपल्याला रस्ते , दरवाजे बंद करते. पण तेच आयुष्य दुसर्‍यांदा प्रयत्न करायलाही संधी देतेसुद्धा !

दुर्दैवी ते, की ज्याना "सेकंड चान्स" मिळत नाही. "वन स्ट्राईक अँड दे आर आउट ! गॉन फॉरेव्हर ! " आणि करंटे ते की ज्याना दुसरी काय , डझनावारी संधी मिळतात , आणि ते काहीही न करता राहातात.

मित्रमैत्रीणींनो , तुम्हालाही आयुष्याने केव्हातरी पराभूत केले असेल, आणि "दुसरी संधी" मिळवून तुम्ही पुन्हा उठून, पुन्हा प्रयत्न करून त्यावर मात मिळवली असेल. त्याबद्दल जरूर लिहा. माझी खात्री आहे की आपल्या सर्वाना त्याबद्दल वाचायला नक्की आवडेल.

नाते ना 'ते' राहीले

माझी ही कविता जवळपास एक वर्षापूर्वी लिहीली होती. कवितेचा वरील विषय लोकसत्ताच्या 'चतुरा' या मासिकाने
दिला होता व त्यावरुन मला ही कविता सुचली होती. परंतू दिरंगाई केल्याने कविता पाठविली नाही. बिचारी माझ्या वहीत
अशीच पडुन होती. मिसळपावमुळे तिला प्रकाशात येता आले.
कविता लिहिण्याआधी तिची थोडी पार्श्वभूमी सांगणे आवश्यक वाटते. या कवितेची नायिका एक प्रेमविवाह झालेली
स्री असुन तिने आपल्या आईवडीलांच्या इच्छेविरुध्द हे लग्न्न केलेले आहे.

नाते तुझे नि माझे
असे जन्मोजन्मीचे
प्रिया तुझ्यासवेच मला
या जन्मी रमायचे

घरदार सोडुनी आले
मायेस पारखी झाले
परि तुझ्यासंगती सख्या
रममाण संसारी झाले

बोचरे बोल दुनियेचे
झेलुनी पुढे चालायचे
माता, पिता, बंधुभगिनी
आठवुनी नाही रडायचे

झाली बरीच जगती
आबाळ या जीवाची
स्फुंदुनी सांगू कशी मी
मातेस मी दुरीची

सुखदु:खाची जरी छाया
ओलांडीत मी चालले
या जन्मीच्या तव गाठीला
आज एक तप पुर्ण झाले

मज का वाटे कुणास ठावूक
का मनात माझ्या आले
तुच सांग ना प्रिया खरे का?
नाते ना 'ते' राहिले.....

Close encounters of the third kind (एक पद्यकथा)

रात्री अचानक झोप उडाली
होती प्रखर झोतात खोली
होते काय नाही समजले
शुभ्र किरणांनी घट्ट बांधले

सरसर नेले वरती ओढून
दिले एका कक्षात टाकून
बघतो अघटीत काय जाहले
सभोवती बहु लोकची दिसले

धावलो बाजुला माणूस पाहुन
विचारण्या कोठे आलो आपण
नव्ह्ती भींत तरी अडकलो
त्याच्यापाशी नाही पोहोचलो

विचारले ओरडून मी त्याला
कसला आहे विचीत्र मामला
बहुदा त्याने नाही एकले
म्हणून मी निरखूनी पाहिले

खुर्चीवरती होता बसला
प्रकाश रज्जुने बांधला
हात दोन्ही उंचावलेले
दंडामधुनी रक्त खेचले

घाबरून मी पाही सगळे
चारी दिशा मानव पसरले
कोणी धावत्या पट्ट्यावरती
कोणी होते उलट लटकती

बाब अचानक कळली सारी
प्रयोगशाळा होती न्यारी
जाणण्या संपूर्ण मानुष
होते प्रयोग सुरू अमानुष

माझे काय? घाम फुटला
प्रश्न लगेच तो ही सुटला
खेचून बसवले खुर्चीवरती
टोप आवळला डोक्यावरती

मी ओरडलो सोडा मजला
मस्तकात आवाज उमटला
नको घाबरू देऊ सोडून
प्रयोगास आधी संपवुन

काय प्रयोग, का धरले मजला?
विचारले अदॄष्य जेलरला
त्याच क्षणी माथ्यात सणक
आवाजे फटकारला चाबुक

हातपाय ते कसे चालती
तुझ्या मेंदुच्या आद्न्येवरती
जाणल्यावरी सोडू तुजला
उपयोगही नाही आम्हाला

अमानुषांनो सोडा मजला
मी आहे मानव एक भला
नाही बांधील ह्या प्रयोगाला
नाही हा अधीकार तुम्हाला

करता असले क्रोधित ताडन
मनात बोले कुणी अमानव
मार्ग मानवानेच दाखवले
उंदरावरचे प्रयोग पाहिले

विद्न्यानाच्या प्रगती साठी
इकाटीनीच्या सुयशासाठी
क्षुद्र मानव उंदीर आमुचे
वापरले संकेतच तुमचे

करू पूर्ण अमुच्या कार्याला
पिंपात बुडवून टाकू तुम्हाला
इकाटीनीच्या तळघरात ढेर
पिंपात मेले ओल्या उंदीर

तळटीप "इकाटीनी" हजारो प्रकाशवर्षे दूरवरून आलेली जमात.

पिसि जेसि चा पुढला भाग.

काही वर्षापूर्वी इब्राहिम मुल्ला या सॉलीसिटर फर्म ने कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली की त्यांच्या अशीलाचे एस्क्रो अकाउंटचे पैसे सुमारे साठ लाख अफरातफर होउन गहाळ झाले आहेत.नेहेमीच्या प्रथेप्रमाणे त्यांनी पैसे बॅंकेत एफ.डी.मध्ये गुंतवले होते.त्याच्याकडे ज्या पावत्या होत्या त्या खोट्या आहेत असा बँकेचा दावा होता.तो खरा होता. पण चेक तर जमा झाला होता.
तपासाअंती दहा लाख बँकेत बी. पी. जोशी यांच्या खात्यात जमा होउन काढून घेतलेले पोलीसांच्या निदर्शनास आले.बाकी पन्नास लाख भाईदरच्या बॅकेत जमा होउन काढून घेतलेले आढळून आले.
पोलीसांनी तपासांती पाच आरोपींचा पत्ता लावला.जोशी, मेहेता , मिश्रा याना अटक करण्यात आली .
तपास काम जसजसे पुढे गेले तसतसे गहीरे होत गेले .
त्या तपासाची ही कहाणी.

===============================================================
हसून घे .आजचा शेवटचा दिवस. आज ऍरेस्ट पक्की.
उद्या सकाळी पंधरा दिवसाचा रीमांड घेतो. नंतर तू आणि मी. कसा कुटतो बघंच.विरकर फुस्कारला.
तो पर्यन्त थोरात नी एक मेहेतर खाली जाउन आणला होता.
क्या साब अभ्भी न्हाया था. असं पुटपुटत पण काही न बोलता कामाला लागला.
थोड्या वेळाने रुम परत साफ झाली. सगळे आयो आपापल्या जागी येउन बसले. एकीकडे मिश्रा आणि मेहेताच्या ऍरेस्टचे पेपर तयार झाले होते.मिश्रा चे खिसे मोकळे करण्यात आले. पट्टा काढून घेतला.पैशाचं पाकीट ,रुमाल ,शूज काढून घेतले. अंगझडती घेतली.
लॉक अप चा फॉर्म भरला. मेमोची कॉपी बनवली.
मेहेताची झडती घेण्याचा प्रश्न नव्हताच.पण विरकरला मेहेताची काळजी वाटत होती.
याला फिरदोसच्या रुम मध्ये टाक रे.बाबा लोकाबरोबर नको. स्साला सकाळी जिंदा राहणार नाही.
(छोट्या मुलांना वेगळा लॉक अप देतात . पण डेंजरस. ब्लेडच्या पात्यानी रात्री मारामारी करतात.)
मला सारखा एकच धसका . हा मला आत्ता लगेच आत का टाकत नाहीये.
मग डोक्यात प्रकाश पडला. सेशन कोर्टाचा शिपाई अजून आला नव्हता.संदीप बहल आणि अनील सिंग दोघही अँटीसिपेटरी बेल चा अर्ज टाकून बाहेर होते. म्हणजे, कोर्टात टाईट फील्डींग लावून शिपाई वाट बघत बसले असणार. समजा बेल रीजेक्ट झाला तर दोघांना घेउन आज रात्री आमने-सामने.कनफ्रंटेशन शिवाय याची लिंक लागणार नाही. रात्र भारी पडणार.
एव्हाना मिश्रा अणि मेहेता जमा झाले होते.
त्या मेहेताच्या भैणीला बोलाव रे. ती बाहेर गॅलरीतंच उभी असावी.
तेरे भाई को नाश्टा दिया.
हा सर .
मैने भी दिया. कलसे पेटभर खाना देता मै उसको.
तिनं डोळ्याला रुमाल लावला.
माधुरी दिसायला बरीच होती पण आता रडताना आणखी लाल लाल झाली होती.
विरकर आता वेगवेगळ्या अँगलमधून तीचा अंदाज घेत होता.
पैसा किधर रखा है तेरे भाईने?
बाईने आता गळा काढला.
मेरा भाई बेकसूर है साब .
इसको पैचानती क्या तू? माझ्याकडे बोट दाखवलं. हि गूगली होती . हि हो म्हणाली तर माझा आणि मेहेताचा संबंध आहे.
मान हलवून ती नाही म्हणाली.
गूड . पण तेरी भाभी क्युं नही आयी.
वो डिलीवरी मे गयी है साब.
अभी तेरा भाईका डिलीवरी कौन करेगा रे?
आता विरकर ला माधुरी मध्ये .जास्तच इंटरेस्ट आला.
तेरी शादी हो गयी क्या?
डायवोस हो गया.
पण एक गोष्ट माझ्या ध्यानात आली विरकरचं लक्ष विच्यलीत झालंय.
माधुरीकडे बघून तो म्हणाला मेरी वएफ भी गयी डिलीवरी मे.
माधुरी काहीच बोलली नही.
साहेब सि आर ल्याहा की आता.(सि आर म्हणजे क्राईम रीपोर्ट.)
प्रधान साहेब चिवचिवले.
विरकर कान खाजवत माधुरी कडे टक लावून बघत होता. एकदम दचकून त्यानी प्रधान कडे पाहीलं.
मी जरा दूरच उभा होतो.
ए भटा इकडे ये.
हा रिपोर्ट मी लिहीला आहे तो टाइप कर.
ठिक आहे साहेब.
आयला हे मला नव्हतं माहिती . साला दुपारपासून इथेच होता. माझं मॅटर तरी टाइप केलं असतं.प्रधान परत चिवचिवला.
आज प्रधान काही तरी गडबड करणार.माझ्या मनात एक पाल चुकचुकली.काहीतरी करून सात वाजेपर्यंत हा घरी गेला पाह्यजे.
तुमचे पण ठेवा ना साहेब पेपर . अर्ध्या तासात उडवतो.
इब्राहिम मुल्ला मधून चेक उडवले तसे का?.
विरकर मोठ्याने हसला.
प्रधान साहेब , तुम्ही घ्या ना इंटरोगेशन. तोपर्यंत मी जरा ....
एक तरुण वकील आत आला .सर , मी ऍडवोकेट वागळे.
बोला. संदीप बहल आणि अनिल सिंग च्या मॅटर मध्ये..
काय झालं ..एबी मिळाला का?
नाही साहेब .
तारीख पडली.पण नो ऍरेस्ट ची ऑर्डर आहे.
हे पहा वागळे, मला चौकशी साठी दोघही उद्या पाहीजेत.
उद्या नाही , परवा येतील साहेब . वागळे हसला.
विरकर चा पेशंस संपला .
मला उद्या पाहिजेत. सकाळी .
जसा आदेश साहेब.वागळे जवळजवळ पळालाच.
माधुरी चुळबुळत तशीच बसली होती.
प्रधान पेन तोंडात धरून तिच्याकडे बघत बसला होता. विरकर कंटाळला.
मनासारखं काहीच होत नव्हतं बहुतेक.
साडेचार वाजले असावेत. व्हिजीटर यायला लागले होते. लॉकअप ला पाठवलेले शिपाई परत आले.चहावाला आला .
तुम चाय प्येगी?.
नही साब .साब मेरा भाई...
वो ऍरेस्ट मै है. मै चान्स दिया था उसको.कल घर के तलाशी का ऑर्डर लायेगा. किधर रहेता है तुम
वडाळा सर.
घरमे कौन है और?
कोई नही सर.
विरकरने ओठावरून जिभ फिरवली.
तुम जाव अभी. घरमेच रहेना . तुमारा भै को भी लायेगा.
ठिक है साब.
===============================================================
सहा वाजायला आले होते.प्रधान ने फायली गोळा करायला सुरुवात केली होती.त्याचे पेपर मी संपवले होते.
साहेब मी चलू का?
तुम्ही निघा साहेब.
आता सुरुवात. मी मनात म्हटले.
भटा इथे बस .
मी खुर्चीवर बसलो.विरकर नी पट्टा हातात घेतला.
पिठाच्या गिरणीच्या पट्ट्याचा तुकडा .
फटका जोरात बसतो.अट्टल खिलाडी पण तीन फटक्यात संपतात.
महाडीक पाठीकडून पुढे आला. माझं कोपर हातात घट्ट पकडून ठेवलं.
विरकर नी पट्टा जोरात हाणला.डाव्या डोळ्यातून घळकन पाणी आलं.
बोल , तुझ्या खात्यात चेक वटला कसा?
तळहात बधीर झाला होता.
दुसरा फटका. परत तोच प्रश्न.
महाडीक नी खुर्चीला लाथ मारली.
मी तोंडघशी टेबलाच्या कडेवर .दातातून रक्त टपकायला सुरुवात झाली.
मी टेबलाखाली वाकून थुंकलो.तोंडात आंबट चव गोळा झाली.
पाठीवर एक जोरात रट्टा.
पोटाचे पडदे एकदम कडक झाले.ठसका लागला.
हातातून विजेचे लोळ जायला लागले. डोळ्यातलं खारं पाणी, रक्त तोंडात जाउन मळमळायला लागलं.
मा****द,चेक आला कुठून ?
मनोरमा शेट्टी च्या खात्यातून .कर्ज घेतलं होत.
त्या रांडेच्या खात्यात चेक कसा आला.
मला माहीती नाही.
एक फायनल ऍसाल्ट.
अंदाज चुकला.
पोटात बसणारा गुद्दा छाती पोटाच्या मध्येच बसला.
वरचा श्वास वरचं राह्यला.
डोळ्यापुढे अंधारलं.
लाल लाल चांदण्या दिसल्या.
पुढे काही कळलंच नाही.
===============================================================
परत डोळे उघडले तेव्हा डोळ्यासमोर पंखा दिसला.
परत लाल चांदण्या.कपडे गच्च ओले.
हात बर्फामध्ये.महाडीक चा चेहेरा दिसला.
विरकरचा आवाज येत होता.
नाही साहेब . फटका चुकून बसला.
नाही साहेब.ऍरेस्ट मेमो नाही लिहीला. परत शांतता.
हो सर.
जयहिंद .
किती वेळ गेला माहिती नाही.
अचानक सगळं काही फोकस मध्ये आलं.
साहेब ,जागा झाला.इकडे या.
कोणीतरी पाठीखाली हात घालून उठवलं.
विरकर समोर उभा होता.
चेहेरा घामानी थबथबला होता.
पाण्याचा पेला घेउन पुढे आला.
पाणी.....
नको...
पाठीतली कळ थांबतच नव्हती.
हातातली बर्फाची पिशवी गळून पडली.
दुसरा शिपाई पुढे आला.
मी ओळखलं. जनरल ब्रँचचा शिर्के.
मसाज वाला.
त्यानी माझा शर्ट वर केला.
बेंबीच्या वर काहीतरी चोळायला सुरुवात केली.
परत मोबाईल वाजला.
सर, होय सर, शुद्धीवर आला सर .
नाही सर.
उलटी नाही सर .
होय सर. बघतो सर.
ऍरेस्ट करावं लागेल सर.
होम मधून फोन होता सर.
ठीक आहे सर.
जयहिंद.
खालून मानेला पण बोलाव रे.विरकरचा आवाज कापत होता.
साडेआठ वाजले होते.
कष्टाने मी उठून बसलो.
महाडीक गप्प उभा होता.
मी टेबलवरून उतरलो.
खुर्चीत बसलो.
विरकर पुढे आला. काय बोलायचं हे त्याला सुचेना.
मी मंद हसलो.
त्याचा चेहेरा उजळला.
भटा, आज नोकरी घालवली असती माझी.
मी काय ख्वाजा युनुस वाटलो का?
(मार जनरल ब्रँचचा पडला होता एकदा.)
खोलीतलं वातावरण थोडं मोकळं झालं.
चहा ?
नको.
मी महाडीकला खूण केली.
माझ्या बॅगेतून हायफिनॅकची गोळी काढली.
एका घोटात खाली घातली.
थोड्या वेळानी स्पॅझम कमी झाले.
मी उठून लादीवर आडवा झालो.
नउ चे ठोके वाजले.
===============================================================
दहाच्या ठोक्याला मी परत उठून बसलो.
विरकर समोर जाउन बसलो.
करा ऍरेस्ट साहेब.ठीक आहे आता.
क्षणभर विरकर गलबलला.
सॉरी , भटा फटका चूकून बसला.
आज हवं तर लॉकअप मध्ये टाकत नाही.
आता त्याचा चेहेरा मला लहान मुलासारखा दिसायला लागला.
मी मंद हसलो.
चलता है.आटपा लवकर.
मला मेहेताची आठवण झाली.साला आत रडत असेल.मिश्रा घोरत असेल.
मेमो लिहून तयार होताच.
साडेदहा वाजता दोन शिपायांबरोबर मी लॉकअप कडे चालायला लागलो.

आधुनिक कृष्ण

जन्माचे भोग भोगांसाठी जन्म
आईच्या दुधातुन भोगांकडे स्त्रवणे
मातेची ममता अन् बापाचा धाक
पाळणाघरातल्या कृष्णाला यशोदेची हाक
दिवसा यशोदा अन् रात्री देवकी
वसुदेव की नंद सगळाच आनंद
रंगतो रोजच कृष्ण-देवकी भेटीचा प्रयोग
सुटीच्या दिवशी यशोदेला वियोग
ना झोपेला अंगाई ना भुकेला लोणी
जन्मला कृष्ण गातो नर्सरीची गाणी
वाघीणीच्या दुधावर गोमुत्राची शिंपवणी
कृष्णाला आता नाही भेटत सांदिपनी
संस्काराशिवायच मग भौतिकीची उजळणी
कला आणि शास्त्राला आयटीची फोडणी
जग एक बाजार बाजारात कृष्ण
'अर्था' संबंधीच फक्त सारे प्रश्न
यशोदेला सोडुन कृष्ण मथुरेला येई
देवकीला विसरुन कंसाचा होई
कंस आणि कृष्ण भेद काही होईना
कृष्णाला आरशातला कंस काही भ्याईना.