विचार
अढळपद
प्रेषक JAGOMOHANPYARE ( शुक्र, 03/12/2010 - 19:04) .************* अढळपद ************
'अहो, जरा माझी धापेची गोळी आणि पाणी देता काय?'
हाक ऐकू आली आणि शांताबाई तंद्रीतून जाग्या झाल्या. 'आले, हं' त्या म्हणाल्या आणि लगबगीने सावरून उठून बसल्या. नाकाच्या शेंड्यापर्यंत ओघळलेला चश्मा त्यानी व्यवस्थीत डोळ्यावर सरकवला. मांडीवरचं पुस्तक त्यानी बाजूला ठेवलं.
पाणी आणि गोळी घेऊन त्या शामरावांच्या जवळ गेल्या. आलेली खोकल्याची उबळ तशीच दाबून शामरावानी गोळी घेतली. धापेचा पंप तोंडात धरून त्याचे दोन स्प्रे घेतले. थोडं बरं वाटताच हाश हुश करत ते म्हणाले, ' काय करत होता आत?'
'गोष्टी वाचत बसले होते. रात्री सायली जेवणापूर्वी गोष्टीचा हट्ट धरणारच. तिचे आई वडील दिवसभराच्या लगबगीने दमलेले असणार. तुम्ही इथे कॉटवर आडवे. मग गोष्ट सांगणार कोण माझ्याशिवाय? सांगते बापडी- येईल तशी- वेडीवाकडी.'
'वेडीवाकडी?' शामराव हसत म्हणाले, 'तुमची गोष्ट, आणि वेडीवाकडी?' अहो, सायलीच काय आम्हीसुद्धा सगळे ऐकत असतो. तुम्ही खरंच गोष्ट छान सांगता. रामाची असू दे- कृष्णाची असू दे- टिळकांची किंवा इंदिरा गांधींची असू दे- मला जर आधीच माहीत असतं, तुम्ही गोष्ट एवढी छान सांगता, तर मीसुद्धा रोज रात्री हट्ट केला असता- गोष्ट ऐकण्यासाठी..'
'इश्श! काहीतरीच तुमचं आपलं!'
'नाही हो. खरंच सांगतोय. तुम्ही गोष्ट सांगता ना तेंव्हा सगळं विसरायला होतं. हा दमा -घरच्या कटकटी-हे परावलंबी जीणं... सगळंसगळं विसरायला होतं बघा.... ' खोकल्याची उबळ पुन्हा आल्यामुळे शामराव बोलायचे थांबले. शांताबाईंनी त्याना पाणी प्यायला दिलं. खोकला थांबल्याचं दिसताच त्या उठल्या.
'चहा आणते तुमच्यासाठी,' त्या उठल्या.
'आणा थोडासा. पण दूध मात्र जपून वापरा बरं. संध्याकाळ आता होईलच. ते दोघे आल्यावर परत काही गोंधळ नको व्हायला.'
शांताबाई किचनकडे वळल्या. गेल्या आठवड्यातील ती घटना आठवून त्या थोड्या अस्वस्थ झाल्या. गेल्या आठवड्यात एक दिवस संध्याकाळी त्यांनी शामरावांना असाच चहा करुन दिला होता. नेमकं त्याच दिवशी सुरेश ऑफिसमधून येताना चार मित्राना घेऊन आला. थोड्या वेळाने सुनितापण आली. कॉफी करायला म्हणून किचनमध्ये गेली , तर दूध कुठे होतं? आयत्यावेळी शांताबाईनाच पळापळ करुन खालून बेकरीमधून दूध आणावं लागलं. एवढ्याश्या दुधाचं प्रकरण- पण नंतर घरात गोंधळ व्हायचा तो झालाच.
'किती परावलंबी जीणं झालंय आपलं. छोट्या छोट्या गोष्टींवरसुद्धा आपली सत्ता राहिलेली नाही. ' शांताबाई चहा करता करता विचार करत होत्या. त्यानी चहा केला. शामरावाना दिला. चहा घेताच त्यना जरा बरं वाटलं. 'अहो, किती करताय माझ्यासाठी.' ते शांताबाईना म्हणाले. ' माझं आजारपण, मुलाचा अलिप्तपणा, सुनेची धुसफूस कसं सोसता हे सगळं?' शांताबाई गप्पच होत्या. पण मनात खोल्वर ढवळाढवळ व्हायला सुरुवात झालेली होती...
'तुम्ही आहात म्हणून मी....'
'आता काही बोलू नका. शांतपणाने विश्रांती घ्या.' शांताबाई शामरावाना म्हणाल्या,'संध्याकाळ होईलच इतक्यात. मी जरा बाहेर जाऊन येते. देवळात जायचं आहे. तुमची औषधेपण आणायची आहेत.'
सगळं आवरून शांताबाई बाहेर पडल्या. संध्याकाळी पाय मोकळे केले की त्यांना थोडं बरं वाटायचं. पण आज मात्र त्यांना खूप अस्वस्थ वाटत होतं. मनात काहीतरी सलत होतं. पण नेमकं काय सलतय हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं.
कॉर्नरवरच्या फोनबूथजवळ त्या पोहोचल्या आणि थबकल्याच. बूथशेजारचा गाळा गेले कित्येक दिवस बंदच होता. पण आज तो उघडलेला दिसत होता. आत नवं कोरं काउंटर होतं. त्याच्या आत मोठ्ठाली कपाटं. दारासमोर थोडी गर्दी होती. समोरच्या बाजूला तोरणं आणि फुलांच्या माळा लटकलेल्या होत्या.
नवीनच निघालं वाटतं हे! चष्मा सावरत शांताबाई दुकानावरचा बोर्ड वाचू लागल्या. 'अभिनव मेडिकल्स'
'बरं झालं. घराजवळ नवीन मेडिकल निघालं ते..'
'ओ आज्जीबाई! मध्येच कुठे उभ्या राहिलात? सरका बाजूला. तिथं खुर्च्या मांडायच्या आहेत.' एक मुलगा शांताबाईंवर खेकसला. शांताबाई ओशाळत बाजूला झाल्या. तो मुलगा त्यांच्याजवळ आला. तिथं मध्येच एक मोठा दगड पडलेला होता. पायाने ढकलत तो मुलगा तो दगड बाजूला करु लागला. पायानं ढकलला जाणारा दगड शांताबाईनी पाहिला आणि त्यांच्या मनात कच्चकन काटा रुतला.
रस्त्यावर धुळीत पडलेला दगड- सर्वांच्याकडून लाथाडला जातो. त्याला ना स्वतंचं स्वतंत्र आस्तित्व असतं- ना स्वतःची एक जागा. आपलं तरी कुठं वेगळं आहे? मुलगा-सून्-परिस्थिती-सगळ्यांच्याकडून लाथा खाणं सुरु आहे... मनातला नेमका सल त्यांच्या लक्षात आला आणि त्या अधिकच अस्वस्थ झाल्या.
ना घरामध्ये आपल्याला स्वतंत्र आस्तित्व.. ना समाजामध्ये एक स्थान...
उदघाटनासाठी सजवलेलं नवं कोरं दुकान्-नटून थटून आलेले निमंत्रित.. या भाऊगर्दीत त्यांना एकदम परक्यासारखं वाटू लागलं आणि त्या झपाझप देवळाच्या दिशेने चालू लागल्या. चालत चालत त्या देवळापर्यंत पोहोचल्या. बागेतल्या कृष्णाचं देऊळ्-हे त्यांचं नेहमीचं ठिकाण होतं. देऊळ तसं फार मोठ्ठं नव्हतं. लहानसं पण सुबक होतं- नव्या पद्धतीचं. एक छोटासा मंडप. -त्याच्यासमोर बंदिस्त गाभारा. गाभार्यात मुरलीधर श्रीकृष्णाची काळ्या पाषाणाची मूर्ती होती. मूर्तीच्या पायाजवळ भाविकानी टाकलेल्या फुलांचा ढीग असायचा. मूर्तीच्या सौंदर्यासमोर आपली हार मानून फुलानीच मूर्तीच्या पायाजवळ रहाणं मान्य केलं असावं- असंच प्रत्येकाला वाटायचं.
शांताबाई देवासमोर उभ्या राहिल्या. डोळे मिटले. मनोभावे हात जोडले. क्षणभर मनात विचारांचा उद्रेक झाला. अशांत अस्वस्थ विचार मनाच्या खोल डोहातून वर येऊन उसळी मारू लागले. दु:ख वेदनांचे आवेग गरगरू लागले. हृदय धडधडू लागलं. कृष्णा... केशवा.. नारायणा... अंतर्मन आर्तपणे साद घालू लागलं आणि गढूळ पाण्यात तुरटीचा स्फटिक फिरावा तसा चमत्कार झाला. विचारांचा एकेक कण तळाशी बसू लागला. अंतर्मनाचं पाणी स्वच्छ आणि नितळ होऊ लागलं. आनंदमय लहरींचा मनोहारी नृत्यखेळ सुरु झाला.
ठण्ण!
घंटचा नाद कानात घुमला आणि शांताबाई भानावर आल्या. त्यांनी मागं पाहिलं. कुणीतरी एक भाविक उभा होता. शांताबाई मंडपाच्या बाहेर आल्या. देवळासमोर एक छोटीशी बाग होती. सभोवती हिरवंगार गवत. लहानमोठी झुडपं आणि फुलझाडं. बागेतल्या एका बाकावर शांताबाई विसावल्या. संध्याकाळी देवळात भक्तीगीतं लागायची. एखाददुसरं गाणं ऐकलं की त्याना बरं वाटायचं. रात्र पडू लागली की गाणी बंद व्हायची. आरती व्हायची. पण आरतीसाठी शांताबाई बहुधा थांबत नसायच्या. एखादं भक्तीगीत ऐकून त्या नेहमी उठायच्या. पण आज त्यांचं कशाकडेच लक्ष लागत नव्हतं. मधाशी-क्षणभरासाठी अनुभवलं, ते काय होतं? त्या विचार करत होत्या. स्वच्छ निळाशार समुद्र- त्या आनंदलहरी - हे सगळं कुठं आहे? आपल्या डोळ्यात?
अं हं. मग आपल्या मनात?
मग इतके दिवस हे का दिसलं नाही? तो निळाशार रंग त्यांना आठवला आणि त्या भावविभोर झाल्या. वार्याची एक मंद झुळुक आली आणि अंगावरती मोरपीस फिरावं तसं त्यांना वाटलं. नजरेमध्ये पंचप्राण आणि पंचेन्द्रिये गोळा झाली. शरीराचं धुकंधुकं होऊ लागलं. केशवा.. नारायणा.. एक साद मनामध्ये घुमली . ज्योतीनं तेजाकडे आकर्षित व्हावं, निर्झरानं समुद्रात समर्पित व्हावं-तशी दिव्य भावना त्यांच्या मनात जागी होऊ लागली. निर्झर आणि समुद्र यांचा संवाद सुरु झाला, संवाद्-पण नि:शब्द.
शब्देविण संवादु/दुजेवीण अनुवादू//
हे तव कैसे निगमे/परेही परते//
बोलणे खुंटले/विखरी कैसेनी सांगे//
शब्द मुके झाले. उरल्या फक्त आनंदलहरी. निळ्याशार पाण्यामधून तेजाचा एक प्रचंड लोळ बाहेर आला. सूर्यासारखा तेजस्वी तरीही चंद्रासारखा शीतल. शांताबाई भान हरपून पहात होत्या. चंदनाचा मंद गंध सगळीकडे दरवळला . मुरलीचे स्वर कानात घुमले आणि शांताबाईंचं भान हरपलं. अतीव आनंदाने त्यानी डोळे मिटले.
डोळे उघडले. समोर पाहिलं. आणि त्याना आश्चर्याचा धक्का बसला. समोर साक्षात विष्णु भगवान्-नारायण उभे होते. शांताबाईंच्या तोंडून क्षणभर शब्द फुटले नाहीत. मग अस्फुटपणे त्या म्हणाल्या..'देवा, तुम्ही!' नारायण मंदपणे हसले. 'होय, तुमची आर्त हाक ऐकली आणि राहवलं नाही. बोला, काय हवंय?' शांताबाई गोंधळल्या. काय मागायचं? दीर्घायुष्य्-संपत्ती-अपार वैभव.... काय मागायचं? त्याना प्रश्न पडला. घरातलं परावलंबी जीणं-लाथा खाणारा दगड्-सगळं गर्रकन त्यांच्या नजरेसमोर फिरलं. भांबावलेल्या नजरेनं त्यांनी वर पाहिलं. अढळ-निश्चळ ध्रुवतारा-त्यानी पाहिला आणि त्या उद्गारल्या. 'देवा, मला अढळपद दे. अशी जागा - जिथून मला कुणीही हलवू शकणार नाही. तिथं वर ...आकाशात.'
वर पहात नारायण प्रश्नार्थक मुद्रेनं म्हणाले..'तिथं? वर? आकाशात?'
'होय. सगळ्या विवंचनेतून, जाचातून सुटका तरी होईल.'
'जाच विवंचना या तर सगळ्यांच्याच आयुष्यात असतात. त्याला क्म्टाळून प्रत्येकजण जर आभाळात तारा होऊन बसायला लागला तर सगळं आभाळ चांदण्यांनीच गच्च भरून जाईल आणि सगळी पृथ्वी ओस पडेल.'
'मग-धृवाला कसं अढळपद दिलं..आकाशात?' शांताबाईंनी विचारलं. नारायण मंदपणे हसले आणि म्हणाले,'मी धृवाला अढळपद दिलंय ते माझ्या मनात..लोकांच्या मनात . इथं आकाशात नव्हे. आपली निरागसता-जिद्द्-तपश्चर्या यांच्या बळावर धृवानं अढळपद मिळवलय ते आपल्या सर्वांच्या मनात. तेच खरं अढळपद.' शांताबाईंना ते पटलं. पण तरीही ते स्वीकारणं त्यांना जड जात होतं. निराश स्वरात त्या म्हणाल्या,' मग माझं अढळपद कुठं आहे?' त्यांचा प्रश्न तसाच राहिला. भगवंतांच्या चेहर्यावर मंद स्मित तरळत होतं. रामाचं गूढ , पावक हास्य आणि कृष्णाचं खट्याळ हसणं या दोघांचं मिश्रण त्या हास्यात होतं. शांताबाई त्या हसण्याचा अर्थ लावू पहात होत्या आणि अचानक सगळं धूसर झालं. भगवंतांचा निळा रंग-निळंशार पाणी-आकाशाची निळाई सगळं एकरूप होऊन गेलं.
आता कोठे धावे मन/
तुज चरण देखिलिया//
देवळातून अभंगवाणीचे स्वर कानात पडले आणि शांताबाई भानावर आल्या. भगवंतांचं दर्शन झालं- या आननंदात पं. भीमसेन स्वर आळवत होते. पण शांताबाई बेचैन झाल्या होत्या. आयुष्याचं सार हातात येता येता अचानक हातून निसटून जावं, तसं त्याना वाटत होतं. संध्याकाळ काजळू लागलेली होती. शांताबाई अस्वस्थपणे घरी निघाल्या.
चालत्चालत कॉर्नरच्या बूथपर्यंत त्या आल्या. नवीन दुकान प्रकाशानं उजळून निघालेलं होतं. मघासचा प्रसंग त्याना आठवला आणि त्या दुर्लक्ष करुन घराकडे निघाल्या. तेवढ्यात फोनबूथवाल्या माणसानं त्याना हाक मारली,' आज्जी, पलीकडच्या दुकानाचं आताच उद्घाटन झालंय. तीर्थप्रसाद घेऊन जा.'
मनार थोडं दडपण घेऊनच शांताबाई दुकानात गेल्या. त्यांनी देवदर्शन घेतलं. तीर्थप्रसाद घेतला. जवळच्या कोपर्यात त्यांचं लक्ष गेलं आणि त्या क्षणभर हसल्या. तोच दगड. शूचिर्भूत होऊन, हळद कुंकवाचे टिळे लेवून तो दगड कोपर्यात विसावलेला होता. बहुधा नारळ फोडण्यासाठी त्याचा वापर झाला असावा. त्याच-संध्याकाळच्या मुलानं- त्यांना सरबत दिलं. सरबत पिऊन झाल्यावर शांताबाईंनी पर्स उघडली. एक चिठ्ठी बाहेर काढली आणि मालकाला दाखवत त्या म्हणाल्या,' ही औषधं हवी होती. द्याल काय?' त्यानं चिठ्ठी पाहिली. त्याप्रमाणे औषधे काउंटरवर ठेवली. शांताबाईंना नाव विचारलं आणि बिल करताना तो म्हणाला,'दुकानाचं औपचारिक उद्घाटन मघाशी झालं. पण तुम्ही 'खर्या' उद्घाटक. पहिल्या ग्राहक.' आजूबाजूची माणसं शांताबाईंकडे कौतुकाने बघत होती. त्यांनी बिल दिलं, कॅरीबॅग घेतली आणि औषधं घेऊन त्या बाहेर पडल्या.
घराकडे निघाल्या. अंधार पडायला लागला. जायला हवं. याना औषधं द्यायला हवीत. सायलीला गोष्टपण सांगायची आहे.. आज्जीची गोष्ट ऐकल्याशिवाय पोर जेवणार नाही... आणि, अचानक त्या थबकल्या.
'तुम्ही आहात म्हणून मी आहे.' शामरावांचा चेहरा त्यांच्या कानात गुणगुणला. 'गोष्ट सांगायची तर आज्जीनंच!' सायलीचे चिमणे पण हट्टी बोल त्यांच्या कानात शिरले आणि शांताबाईंना गहिवरून आलं.
;ह्यांच्या' मनात असलेलं आपलं स्थान... सायलीच्या चिमुकल्या मनात असणारं गोष्ट सांगणार्या आज्जीचं स्थान... हे काय? अढळपदच की! शांताबाईंच्या मनात लख्ख उजेड पडला. भराभरा चालत त्या अपार्टमेंटच्याजवळ आल्या. खाली जिन्याजवळ जोश्यांचा अमित खेळत बसलेला होता. त्यांच्याकडे बघून तो हसला. त्याचं गोड हसणं....
कुठं बरं हे गोड हसणं पाहिलं आपण? शांताबाई विचार करत होत्या, तेवढ्यात तो म्हणाला... 'सायलीच्या आज्जी , उद्या संध्याकाळी आमच्या घरी याल काय? उद्या माझा वाढदिवस आहे. माझे सगळे मित्र येणार आहेत आणि आम्हाला तुमची गोष्ट ऐकायची आहे.. सायली सारखी ऐकत असते तुमच्याबद्दल... याल ना?'
शांताबाईंनी मानेनेचं होय म्हणून सांगितलं. अमित पुन्हा हसला. तेच निरागस हास्य.. आपण कुठं पाहिलं होतं, ते शांताबाईंना आठवलं आणि त्या एकेक पायरी चढू लागल्या.
त्यांच्या मनावर अतीव सुखाचं प्रचंड ओझं होतं. पण तरीसुद्धा त्यांना मोरपिसासारखं हलकंहलकं वाटत होतं. आनंदसोपानाच्या एकेक पायर्या चढत त्या वरवर जात होत्या. आज त्या खूपच आनंदात होत्या. कारण सायलीला आज त्या धृवबाळाची गोष्ट सांगणार होत्या!
**********************************************
उत्तमकथा, २००३ मधील एका अंकात पूर्वप्रसिद्धी.
शाळेमध्ये मुले परीक्षेत नापास का होतात
प्रेषक शैलेश हिंदळेकर ( शुक्र, 03/12/2010 - 15:35) .एका वर्षामध्ये फक्त ३६५ दिवस असल्यामूळे शक्यतो मुले परीक्षेत नापास होतात.
आता बघुया एखाद्या मुलाचे शैक्षणिक वर्ष कसे जाते.
तुम्हाला माहित आहे तरीही लक्षात ठेवा की एका वर्षामध्ये ३६५ दिवस असतात.
एका वर्षामध्ये ५२ रविवार असतात. आता रविवारी अभ्यास करणार की खेळणार.
मग ३६५ मधून ५२ वजा केले की राहिलेत ३१३ दिवस.
उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी, नाताळची सुट्टी अशा ५० सुट्ट्या वजा केल्यास राहिलेत २६३ दिवस.
दररोज आपण ८ तास झोपतो. म्हणजे वर्षाला १३० दिवस झोपतो. आता हे दिवस वजा केल्यास राहिलेत १४१ दिवस.
मुले रोज १ तास खेळतात. खेळल्याने मुलांची तब्येत सुधारते. अशा प्रकारे रोज १ तास म्हणजे वर्षाला १५ दिवस खेळतात. आता हे दिवस वजा केल्यास राहिलेत १२६ दिवस.
दररोज २ तास दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण आणि न्याहरी करण्यात जातात. म्हणजेच वर्षाला एकुण ३० दिवस लागतात. आता हे दिवस वजा केल्यास राहिलेत ९६ दिवस.
दररोज १ तास बोलण्यात आणि इथे तिथे जाण्यात जातो. म्हणजे वर्षाला १५ दिवस लागतात. हे दिवस वजा केल्यास राहिलेत ८१ दिवस.
वर्षातील ३५ दिवस शाळेमध्ये परीक्षा असतात. आता परीक्षेच्या दिवशी अभ्यास करणार का पेपर सोडविणार हे दिवस वजा केल्यास राहिले ४६ दिवस.
वर्षातील ४० दिवस निरनिराळे सण, गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, इतर लहान-मोठे सण यांच्यामध्ये जातात. आता हे ४० दिवस वजा केल्यास राहिलेत ६ दिवस.
वर्षातील ३ दिवस तरी निदान आजारपण, ताप, सर्दी तांच्यामध्ये जातात. आता राहिलेत ३ दिवस.
वर्षातील २ दिवस ( फक्त ) चित्रपट, टिव्हीवरील कार्यक्रम बघण्यात जातात.
आता उरला १ दिवस आणि त्या दिवशी त्या मुलाचा वाढदिवस असतो, या दिवशी कोणी अभ्यास करतो का ? मग उरले ० दिवस. आता सांगा मुले अभ्यास करणार कधी आणि परीक्षेमध्ये पास होणार कधी.
कारभारी गोपाळे!
प्रेषक चतुरंग ( शुक्र, 03/12/2010 - 10:04) .दिवाळीच्या आसपासचे अंगावर काटा मारणारे थंडीचे दिवस. सायकल दामटत शाळेत निघालो होतो. उललेल्या ओठांवर बोचर्या वार्याने चुरचुरत होतं. डोळ्यांना झोंबरं वारं लागून पाणी येत होतं.
पहाटेच्या अंधारात सायकल स्टँडला लावून कुलूप घातले. किल्ली खिशात टाकली. तालमीच्या लाकडी दरवाज्याजवळ दबकत दबकत गेलो. जोर घुमवणार्या पोरांचे आवाज कानावर आले..
"हुंयक हुंय्या!" - "हुंयक हुंय्या!"
"हुंयक हुंय्या!" - "हुंयक हुंय्या!"
हळूच दरवाजा लोटून आत डोकावलो. डावीकडे जमिनीलगत समोरासमोर दोन भलेमोठे आरसे लावलेले होते आणि त्याच्यासमोर दोन्ही बाजूला पोरे एकमेकांकडे तोंडे करुन जोर घुमवत होती!
मला आत आलेले पाहून गोपाळे सरांनी त्यांचे जोर मारणे थांबवून मिस्किल हसत विचारले "या राजे! वाजले का साडेपाच?"
भिंतीवरल्या घड्याळातला मोठा काटा पावणेसहाची वेळ दाखवत होता मी ओशाळून मान खाली घातली.
"चला, चला लवकर या जोर मारायला. सव्वासहा वाजता सुरु करायची आहे प्रॅक्टिस." सर म्हणाले.
लंगोट कसून, त्यावर जांग्या नेसून मी घरुन तयारी करुनच निघालो होतो त्यामुळे झटपट शर्टचड्डी उतरवून त्या पोरांच्यात सामील झालो.
जोर, बैठका, आखाडा खोदणे आणि दोर चढणे असा व्यायाम झाल्यावर खरंतर हातपाय भरुन आले होते पण पहिलाच दिवस असल्याने उत्साह अमाप होता!
तालमीच्या मध्यभागी जमिनीत रोवलेला, साधारण १०-११ फूट उंच, वरच्या बाजूला निमुळता होत गेलेला लाकडी खांब होता, मल्लखांब! तेल प्यालेलं गर्द तपकिरी रंगाचं ते लाकूड चमकत होतं. लाकडाची अंगची नक्षी अगदी नजरबंदी करत होती. त्याच्या भोवती चारी बाजूला गाद्या टाकल्या होत्या. गोपाळे सरांनी हातात एरंडेल तेल घेऊन खांबाला लावले. आम्ही आठ-दहाजण भोवती अर्धगोलात उभे होतो. एकेकाला तेल संपूर्ण अंगाला आणि विशेषतः दंड मांड्यांना लावायला सांगितले. पहाटे-पहाटे एरंडेलाचा तो उग्र वास आणि बुळबुळीत, चिकट स्पर्श अगदी नकोसा झाला पण इलाज नव्हता. सरांनी खांबावरची पहिली पकड समजावून सांगायला सुरुवात केली.
--------------------------------------------------------------
कारभारी गोपाळे. साडेपाच फूटच असतील जेमतेम. मागं वळवलेले केस. व्यायामाचं शरीर. पण आडदांड नाहीत. अतिशय मिस्किल झाक डोळ्यात. तसं बघायला गेलं तर कागदोपत्री सरांचा विषय भूगोल पण त्यांचं मन रमायचं ते खेळात. लेझीम, कुस्ती हे त्यांचे आवडीचे खेळ.
इयत्ता पाचवीत असताना मी पहिल्यांदा मल्लखांब शब्द ऐकला तो त्यांच्याकडूनच. "पहाटे यायला तयार असली पोरं तर मी शिकवायला तयार आहे!" म्हणताच आम्ही आठदहा जण जमा झालो होतो.
कुठल्याही पैशांची अपेक्षा न करता फक्त आवड म्हणून आणि आपली पोरे एका वेगळ्या खेळात चमकावीत म्हणून मास्तरांनी हा उद्योग सुरु केला होता! मुख्याध्यापकांच्या मागे लागून तालमीच्या किल्ल्या स्वत:कडे ठेवायची परवानगी मिळवण्यापासून त्यांनी सगळं केलं.
मल्लखांब शिकवताना त्यांची एकाग्रता बघण्यासारखी असे. ते तल्लीन होऊन शिकवत. एखाद्याचे लक्ष नाही किंवा पोरे एकमेकात खुसफुसत काहीतरी टवाळकी करताहेत असं वाटलं तर ते एकदम गप्प होत आणि रोखून बघत. पुन्हा दुर्लक्ष करण्याची हिंमत नसे, म्हणजे सर मारत वगैरे नसत पण त्यांच्या तळमळीनं शिकवण्याचाच धाक पुरेसा असे.
इयत्ता पाचवी ते नववी असा पाच वर्षे मी मल्लखांब केला. झेप, सुई-दोरा, आकडी, घाणा, बोंडावरचे ताडासन, मयूरासन असे मल्लखांबावरच्या अनेक उड्या आणि पकडींचे विविध प्रकार त्यांनी शिकवले.
मल्लखांबाच्या व्यायामानं अंग अतिशय लवचिक आणि काटक बनतं. शरीराला बाभळीच्या लाकडासारखा घोटीव टणकपणा येतो. पाठीचा कणा अक्षरशः इलॅस्टिकसारखा लवचिक बनतो. मी कुठल्याही क्षणी चटकन पश्चिमोत्तानासान करु शकत असे किंवा कमान/चक्रासन करु शकत असे. (हल्ली आता उभ्यानं आपलीच पावलं दिसणंही मुश्किल झालंय, तो भाग वेगळा!
) ह्या शारीरिक फायद्यांबरोबर मानसिक फायदेही पुष्कळ झाले. एकाग्रता वाढली, ठराविक वेळात अचूकतेने आणि वेगानं गोष्टी करण्याचा सराव झाला, वैयक्तिक आणि सांघिक असा दोन्हीस्तरावर हा खेळ असल्यानं दुहेरी फायदा झाला.मल्लखांब सोडून इतकी वर्ष झाली पण त्याचे फायदे मला जीवनभरासाठी साथ देणार आहेत!
---------------------------------------------------------------
आम्ही मल्लखांब सुरु केला त्याआधी राजीव जालनापूरकर हा सरांचा विद्यार्थी होता. त्यावेळी मोजकेच विद्यार्थी ह्या खेळाला येत. त्यामुळे अहमदनगरहून तो बदली होऊन पुण्याला गेला आणि सरांच्या शिकवण्यात खंड पडायचा धोका निर्माण झाला. आमची आठ-नऊ जणांची बॅच मिळाली आणि सरांना पुन्हा हुरुप आला. पुण्याला मल्लखांब जोरात होता. त्याचवेळी मुंबईच्या समर्थ व्यायाममंदिराचा मल्लखांब संघही चमकत होता. एक दिवस सरांनी नोटीसबोर्डावर पत्रक लावलं "मल्लखांब राज्यस्तरीय स्पर्धा." आमचा साताठ जणांचा संघ तयार करायला घेतला. स्पर्धा पुण्यात होत्या, मला वाटतं गुलटेकडीला एक विद्यालय आहे तिथे होत्या. सरांना उत्साह अमाप. आम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी पोचलो दुसर्या दिवशी सकाळी स्पर्धा. रात्री जेवणं झाल्यावर सगळ्यांना एकत्र बसवून सरांनी सांगितले "तुमच्यापैकी कुणीही बक्षीस मिळवू शकेल असं मला वाटत नाही, पण आपण त्यासाठी आलोच नाहीये. तुम्हाला त्याहूनही मोठं बक्षीस मिळणार आहे ते राज्यातल्या नामवंत खेळाडूंचा खेळ प्रत्यक्ष बघता येणार आहे! एकेक उडी बघून घ्या, पकडी लक्षात ठेवा काय तयारीनं पोरं इथे येतात हे पहा, आज ना उद्या आपल्याला तिथे पोचायचंय!" माझे डोळे आताही हे लिहिताना भरुन आले. कारण हा जो आत्मविश्वास सरांनी जागवला, ध्येय डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल कशी करावी ह्याचं जे शिक्षण नकळत दिलं त्याचा मी ऋणी आहे!
सकाळ वेगळीच उजाडली. पोटात फुलपाखरं नाचत होती. मैदानावर आमचा संघ गेला. आम्ही चांगला पर्फॉर्मन्स दिला. समर्थ व्यायामचा दत्ताराम दुदम हे मुख्य आकर्षण होतं! त्यांची टर्न आली आम्ही श्वास रोखून पहात होतो. शिसवीच्या लाकडासारख्या टणक आणि गोटीबंद शरीराचा बुटकेलासा दत्ताराम येऊन उभा राहिला. टाचा उंच करुन त्यानं हात उंचावला आणि विजेच्या वेगानं पळत येऊन खांबावर झेप घेतली थेट पायात खांब पकडला. एखाद्या चपळ फुरश्यासारखा तो वळसे घेत होता, एका पकडीतून दुसरी पकड, दसरंग झाला, घाणा झाला, सुईदोरा झाला. त्याचे सांधे बहुदा रबराचे असावेत!
शेवटी तो क्षण आला. खांबाच्या बोंडावर दोन्ही हात टेकवून दत्तारामनं त्याचे पाय हळूहळू पाठीमागे न्यायला सुरुवात केली. सगळं मैदान श्वास रोखून बघत होतं एखाद्या मशीनप्रमाणे सावकाश कमरेतून वर जात जात शेवटी त्यानं हँडस्टँड पूर्ण केला. ११ फुटी खांबाच्या सरळ रेषेत तो खांबावर उलटा उभा होता, तसूभरही न हालता!! पुढच्या सेकंदात त्यानं सरळ वरुन उलटी झेप घेतली आणि खाली येतायेताच खांब मांड्यात पकडला आणि लँडिंग केलं! टाळ्यांचा कडकडाट झाला. सरांनी जाऊन त्याचं अभिनंदन केलं, त्याच्या शिक्षकांचंही केलं.
-----------------------------------------------------------------
आम्ही परत आल्यावर आमच्या सरावात नवीन उड्यांचा समावेश झाला. आमच्यातल्या दोन जणांना हा हँडस्टँड शिकवलाच सरांनी. ज्यादिवशी तो जमला त्यादिवशीचा आनंद काय वर्णावा सरांचे डोळे चमकत होते! मग मशालीचा मल्लखांब सरांनी स्वतःच्या जबाबदारीवर शिकवायला घेतला. दंड, हात, मांड्या ह्यांना पेटत्या मशाली बांधून मी स्वत: शाळेच्या स्नेहसंमेलनात तो केला. मी सुखरुप लँडींग केलं आणि सर रडायला लागले आनंदाने!
-----------------------------------------------------------------
पुढे काही कारणाने ह्या सगळ्या खेळांवर गदा आली. बोर्डात पोरे चमकावणे ह्या एकाच नादापायी पालकांचंही सगळ्याच खेळांकडे हळूहळू दुर्लक्ष होऊ लागलं. आमचीही शाळा सोडण्याची वेळ आली होती. बारावी झाल्यावर इंजिनिअरिंगला जायच्या आधी सरांना शाळेत जाऊन भेटलो होतो. त्याही वेळी मला म्हणाले "ए उंटा (मी किडमिडीत आणि उंच असल्याने माझं नाव त्यांनी उंट ठेवलं होतं), मल्लखांब विसरु नकोस. तू करत रहा तुझ्या पोरांनाही शिकव!" त्यानंतर बरेच वर्षांनी सर भेटले, वाकून नमस्कार केला. तसे मिठी मारुन म्हणाले "तुमची बॅच भारी होती राव. तुमच्यासारखी पोरं परत काय मिळाली नाईत. आजकाल सगळे माना मुरगाळून फक्त पुस्तकंच वाचत्यात!" सरांच्या डोळ्यातली वेदना मला अस्वस्थ करुन गेली.
----------------------------------------------------------------
माझा मुलगा आजकाल जिमनॅस्टिक्सला जातो त्याच्या उड्या बघून मला माझा मल्लखांब आठवला आणि मग सहाजिकच गोपाळे सर आठवले. आता सर निवृत्त आहेत त्यांच्या गावी गेलेत. बरेच वर्षात सरांची गाठ नाही पण आजही कुठे मल्लखांब शब्द ऐकला, किंवा चित्र बघितलं तरी डोळ्यांसमोर येतात कारभारी गोपाळे!
-चतुरंग
बतावणी!
प्रेषक चतुरंग ( शुक्र, 03/12/2010 - 00:54) .(स्थळ - क्षीरसागर, विष्णूंचा महाल.
एका कोचावर गरुड लॅपटॉपवर 'मिपा मिपा' खेळतोय!
टीपॉयवर काही आध्यात्मिक ग्रंथ पसरुन ठेवलेत.)
(आतल्या खोलीतून) लक्ष्मी : अहो! अहोऽऽ!!
लगबगीनं बाहेर येत : आँ..कुठे कडमडले हे आता?
(गरुडाकडे पहात) : ए चोच्या, कुठैत रे हे?
अं...आँ....कोण कुठे?
अरे अं आँ काय? हे कुठे गेलेत आत्ता सकाळी सकाळी विचारतेय मी?
हां हां ते होय, ते मगाशीच बाहेर पडले! जाताना काही सांगितलं नाही पण 'मानससरोवर' असं काहीतरी पुटपुटत होते!
मानससरोवर?? इतक्या लांब आणि तुला न घेता कसे गेले?
मला काय माहीत? मी नेऊ का विचारलं तर फक्त हातानेच नको अशी खूण केली!
(कानाशी आयफोन लावत) लक्ष्मी : छ्या..मोबाईलही ऑफ करुन ठेवलाय!! मेसेजवर जातोय!!! कसं शोधायचं आता कोण जाणे? काही शिस्तच राहिली नाहीये! जाऊ दे मेलं, मी आता नाष्टा करुन घेते नाहीतर आणखीन कलकलतं मग!! (आत जाते)
नारद (महालात प्रवेश करत) : नारायण! नाऽरायण!!
गरुड : या या मुनिवर! आज सकाळीच येणं?
लक्ष्मी लगबगीनं बाहेर येत (हातात धिरड्याची प्लेट) : यावं मुनिवर. आसन ग्रहण करा आणि मग हे धिरडंही!
नारद (काऊचवर बसत) : वा वा! देवी, आपण भलत्याच सुग्रण आहात, काय खमंग वास सुटलाय धिरड्याचा! वा!!
(धिरडं खात) नारद : कुठे आहेत तुमचे हे?
लक्ष्मी : अहो काय सांगू मुनिवर? सकाळपासूनच गायब झालेत! हा गरुड म्हणतोय की 'मानससरोवर' असं काहीतरी म्हणत गेले म्हणे!
नारद : हंम्म्म्. हे अंमळ भलतंच काहीतरी! आत्ता यावेळी तिकडे?
(नारद अजून एक धिरडं चापतात आणि वरती फक्कड चहाही हाणतात!)
आहा! आता कसं पोट छान भरलं बघा देवी. काल भूलोकावर फारच चालणं झालं होतं, आणि भूकही अंमळ जास्तच लागते आजकाल!
चला आता निघावे म्हणतो. हे घरी आले की कळवा.
लक्ष्मी : हो हो नक्कीच कळवेन. फोनवर भेटला नाहीत तर व्यनि तरी नक्कीच टाकेन!
नारद : हो हो व्यनिच करा. खरडींचा काय भरोसा, त्या 'बिका'ट वाटेने 'परा'गंदा होतात लगेच!
(एवढ्यात विष्णू महालात प्रवेश करतात)
लक्ष्मी (पुढे होत) : अग्गोबाई!! आलात? या, तुमचीच वाट बघत होते हो सगळे!! कुठे नाहीसे झाला होतात?
विष्णू : सांगतो, सांगतो!! आधी मला एक चहा आण आणि थोडं खायला सुद्धा!!
(लक्ष्मी आणते म्हणत आत जाते.)
विष्णू : हुश्य्.....दमलो बुवा! हं .....बोला मुनिवर कसं काय येणं केलंत?
नारद : काही नाही सहजच आलो होतो बरेच दिवसात आपलं दर्शन नव्हतं!
(लक्ष्मी बाहेर येत धिरडं आणि चहा टीपॉयवर ठेवते. विष्णू सगळं झटपट संपवतात आणि उपरण्याला हात, तोंड पुसतात!)
विष्णू (लोडाला टेकत): तर मी सकाळीच कुठे गेलो असा तुमचा प्रश्न आहे! ती एक समस्याच होती.
??
विष्णू : त्याचं काय झालं काल मी भूलोकावर हिंडत असताना अचानक दुर्वास ऋषी सामोरे आले. त्यांच्या चरख्यावर त्यांनी एक दोन इंची मिळमिळीत धागा काढला होता!
मी विचारता झालो की "तुम्ही इतके सुंदर धागे ह्यापूर्वी कातलेले असताना असला धागा कातण्याचे प्रयोजन काय?"
तर माझ्यावर कोपिष्ट होत गरजले "देवा, तुमच्यासारख्यानंही पक्षपाती व्हावं ना? इकडे स्पष्टवक्तेपणाचा आव आणताय तिकडे लोक प्रक्षोभक धाग्यामागून धागे उसवताहेत, तुमचं लक्ष नाही आणि माझ्या निरुपद्रवी धाग्यावर तुमचा आक्षेप??"
मी म्हणालो "समजलं नाही मुनिवर! काही उदाहरण देऊ शकाल का? चूक झाली असेल तर अवश्य दुरुस्त करेन!"
तेव्हा छद्मी हसत गरजले "आत्मपरीक्षण करा देवा! तुमचं तुम्हालाच सापडेल!"
तेव्हापासून जो भंजाळलोय मी तो आत्तापर्यंत!
अहो तुम्हाला सांगतो देवर्षी, रात्रभर तळमळतोय, डोळ्याला डोळा नाही!
ही, ही बघा, ही सगळी पुस्तकं दिसताहेत ना? सगळी चाळली हो, पण शिंचं कोणी आत्मपरीक्षण कसं करावं त्याबद्दल बोलतंच नाही.
गूगलवर 'आत्मपरीक्षण' असा सर्च दिला तर भलभलत्याच साईट्स उघडल्या! 
शेवटी वैतागून सक्काळी मानससरोवराच्या काठी जाण्यासाठी निघालो, म्हटलं त्या शांततेत तरी काही सुचेल पण नाही जातानाच एवढा ट्रॅफिक जाम की काही विचारु नका!
आणि तिथे सरोवराकाठी सुद्धा एक चमत्कारिक दृश्य दिसलं हो माझ्यासारखेच साताठजण विमनस्क चेहेर्याने तिथे हिंडत होते एकाला विचारलं तर म्हणाला "दुर्वास भेटले होते आणि आत्मपरीक्षणाबद्दलच सांगितलं!" तिथे झाडावरही काही मंडळी दबा धरुन बसली होती मज्जा बघायला बसल्यासारखी (त्यातला एकजण जाम उचकवत होता बाकीच्यांना, स्वर्गाच्या पश्चिम भागातला असावा असा संशय आहे.)
तिथे बराच वेळ डोळे बंद करुन बसलो तळ्याकाठी पण मग काही अप्सरा जलक्रीडेसाठी उतरल्या पाण्यात मग लक्ष लागेना, सारखे डोळे किलकिले व्हायला लागले!!
मग आलो परत बापडा.
(लक्ष्मी डोळे मोठे करुन) : हंम्म्म्म्म (एवढंच करते)
नारद (मोठ्यानेहसत) : हा हा हा हा!! अहो इतकंच ना मला एक एसेमेस केला असतात तर चुटकीसरशी सोडवला असता प्रॉब्लेम तुमचा!!!
विष्णू : आँ काय सांगताय काय?
नारद : मग! चला आत्ता लगेच निघूया.
विष्णू : कुठे?
नारद : आत्मपरीक्षणाला! दुसरीकडे कुठे?
(चला दोघेही निघतात)
लक्ष्मी : अहो पण मुनिवर येणार कधी तुम्ही?
नारद : आमची वाट नका बघू देवी अंमळ वेळ लागेल!
(महालातून बाहेर पडतात)
विष्णू : अहो पण मुनिवर निघालोय कुठे आपण!
नारद : देवा, अहो कसलं डोंबलाचं आत्मपरीक्षण हो! बशीभर काजू, एक तळलेल्या पापलेटने भरलेली डिश आणि फक्कडसा सोमरसाचा प्याला, बास सुरु आत्मपरीक्षण!!
विष्णू : आँ!!!!! मुनिवर ??!!...
नारद (डोळे मिचकावत) : चला, चला, लवकर चला! 'पूनम' झिंदाबाद!! आत्मपरीक्षण झिंदाबाद!!!
-चतुरंग
मुंबई - तिरुपती - चेन्नई - मुंबई
प्रेषक इंटरनेटप्रेमी ( गुरू, 03/11/2010 - 20:02) .या (2010) वर्षीच्या मे महिन्याच्या उत्तरार्धात ४-6 दिवसांचा मुंबई - तिरुपती - चेन्नई - मुंबई असा धार्मिक प्रवास योजिला आहे.
रेल्वेचे confirm आरक्षण झालेले आहे, मात्र अजून राहण्याच्या व फिरण्याच्या ठिकाणांबद्दल काही संशोधन केलेले नाही. सन्माननीय मिपाकरांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी, तिरुपती, चेन्नई येथे प्रवास करत असतानाच्या घ्यावयाच्या काळजी बद्दल माहिती दयावी.
अजून एक गोष्ट अशी की, जातानाचा प्रवास जरी ६ जणांना जरी समूहाने करायचा असला तरी वैयक्तिक कारणांमुळे माझा येतानाचा प्रवास एकट्यानेच आहे. त्यामुळे Two Tier AC ने एकट्याने रात्री २.०० ते दुसर्या दिवशी सकाळी ६.०० पर्यंत असा [रेनीगुंटा (तिरुपतीचे सर्वात नजीकचे रेल्वे स्थानक) - दादर] प्रवास करताना सुरक्षेची कोणती खबरदारी घ्यावी याचीही माहिती द्यावी.
MISALPAV CHAT
प्रेषक मंगेशपावसकर ( गुरू, 03/11/2010 - 10:04) .मागील काही दिवस मला लेखकांशी व्यक्तिगत बोलायचे आहे असे त्यांचा प्रतिक्रियेमध्ये दर्शवले असता, चुकीचा समज करून घेण्यात आला.
मला वाटत मिपा वरही ऑर्कुट प्रमाणे गप्पा करण्याची सोय असावी. कारण त्यामुळे लेखकाच्या लेखनाबद्दल आणखी जाणून घेता येते. त्याचा व्यक्तिमत्वाचा कानोसा घेता येतो. त्याची विचारसरणी कळते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट तो लेख त्याच व्यक्ती ने लिहिला आहे कि नाही याची देखील प्रचीती येते, ह्याने नवोदित लेखकांना मदतच होईल असे मला तरी वाटते.
जर वाचक सहमत असतील तर नक्कीच प्रतिक्रिया द्याव्यात.
तात्या एक सुचवायचे आहे .
राग मानून घेऊ नका
बाकी संकेतस्थळांच्या तुलनेने आपला हस्तक्षेप संपादक म्हणून इथे जास्त असतो ह्याने लोकांना तुम्हाला बाकी काही काम धंधा नसावा,तुम्ही रिकामटेकडे आहात असे वाटते, जे खरे नाही हे मला माहित आहे आणि आपल्याच संकेतस्थळावर आपलेच वेळोवेळी वस्त्रहरण केले जाते [मी ही चुकून केले होते] . जरा काळजी घ्या.
MANGESH PAWASKAR
अगस्त्य जीव नाडी भाग ४...
प्रेषक शशिकांत ओक ( बुध, 03/10/2010 - 19:18) .अगस्त्य जीव नाडी भाग ४...
महर्षी म्हणाले, ‘थांब थोडे. गंमत पहा.’
....
‘महर्षी म्हणतात, इतके सांगतो की तू त्याच्या शोधाचे पहिले पाऊल उचललेस की तुला सर्व काही सापडेल.’
आलेले संकट अगस्त्य जीवनाडीच्या पॅकेटच्या बंदुकीच्या सदृश दिसणाऱ्या आकारामुळे टळले होते!.... पुढे वाचा...
....एक गाडी अशी एकाकी का थांबलेली आहे असे पाहून आन्ध्रप्रदेश राज्य परिवहनमंडळाची बस थांबली. त्या पाठोपाठ एक पोलिसांची गाडी येऊन थडकली. त्यांना सांगितले गेले काय काय झाले ते, ते ऐकून त्यातील पोलिस प्रमुखाला जीवनाडीबद्दल उत्सुकता वाटली. घटनेची पोलिस कंप्लेंट करायला लक्षाधीश लागले. इकडे पोलिस गाडीत बसून जीवनाडी वाचायला दासन यांनी सुरवात केली. ते म्हणाले की तुझा एक भाऊ लहानपणीच हरवला व वारला असा समज आहे. पण तसे नाही. तो जीवंत आहे. काही वाईट लोकाच्या संगतीत राहून तो चोऱायला, डाके घालण्यास लागला व नंतर दहशतवादी कृत्ये करू लागला. नक्षली बनून टोळ्याकरून डाके घालू लागला. त्याने आपले नावही बदलले आहे. तो आता ‘नागी रेड्डी’ म्हणवतो. ते सर्व ऐकून त्या पोलिस अधिकाऱ्याला आपल्या धाकट्या भावाबद्दल फारच आश्चर्य वाटले. त्याची चिंता वाटून ‘आता तो कुठे असेल?’ असे त्याने अगस्त्यांना विचारले. हनुमत दासनी त्याच्या काळजीचे कारण लक्षात घेऊन पट्टी पुढे वाचून सांगितले की ‘महर्षी म्हणतात, आत्ता तुला तुझे लक्ष्य दाखवले आहे. यानंतरचे शोधायचे काम तुला करायचे आहे. मात्र इतके सांगतो की तू त्याच्या शोधाचे पहिले पाऊल उचललेस की तुला सर्व काही सापडेल.’
ते वाचन संपले व ताडपट्ट्या गुंडाळता गुंडाळता दासनना वाटले की पूरग्रस्त परिस्थती, नंतर ही नक्षली लोकांची धाड, त्यांच्याकडून पट्ट्या पळवल्या जाण्याची व सर्वकाही लुटले जाण्याची शक्यता, या सारख्या सध्याच्या भीषण परिस्थितीला ते तर जबाबदार नाहीत? माझ्याकडून काही आगळीक तर झाली नाही? त्यांनी आपल्यासाठी पुन्हा पट्ट्या उघडल्या. त्यात त्यांनी वाचले की हे सर्व होण्याला त्या लक्षाधीशाच्या आणखी एका अंबॅसेडरकारमधील एक स्त्री कारणीभूत आहे. तिला धडा शिकवण्यासाठी हे घडले आहे. महर्षी म्हणाले, ‘तिने नजरचुकवून या पट्ट्यांतील दोन ताडपट्ट्याची पाने पळवली आहेत. ती तिने आपल्या साडीत लपवली आहेत. त्यातच तिची मासिक पाळी चालू असल्याचे तिने इतरांपासून लपवून ठेवले आहे. तिचा उद्देश चोरी करण्याचा नाही पण उत्सुकते पोटी तिने ते केले आहे. तिला तिच्या कृत्याचा धसका बसावा व अद्दल घडावी म्हणून नक्षली लोकांच्या धाडीचा उपद्रव वाटेत घडवला गेला.’ ते ऐकून दासन विचारात पडले. त्या पट्ट्या तिच्याकडून परत कशा मिळवायच्या? महर्षींना म्हणाले, ‘आता मी काय कराय़चे? महर्षी म्हणाले, ‘तू काही करु नकोस. त्या बाईकडून मिळवल्या तरी त्या आता काही कामाच्या नाहीत. कारण त्या चोंबाळून दुमडून खराब झाल्या आहेत. त्यात मी नाही आहे.’ ते सर्व ऐकून हनुमत दासन सर्द झाले. त्यांना वाटू लागले की असे वारंवार घडले तर पट्यांची निगराणी व संरक्षण करायचे तरी कसे? त्या वाचनात त्यांना या बाबत सांगण्यात आले. ‘त्याची काळजी करायची तुला गरज नाही. मात्र या घटनेमुळे गंगेच्या किनारी गोमुख नावाचे स्थान आहे. तेथे जाऊन तुला एक पूजा करावी लागेल. त्यापुजेत तुला एका आर्मीतील अधिकाऱ्याची मदत मिळेल. त्याच दरम्यान त्याला मोठ्या कौटुंबिक संकटातून मी सोडवेन. त्यावेळी वाटेत तु जीवनाडीपट्ट्यांना घेऊन प्रत्येक ठिकाणी गंगेच्या पवित्र जलाने पुजा करत करत हरिद्वार, ऋषिकेश, बद्रीनाथ, केदारनाथ करत गोमुखला न्यावेस. पुजा करून परतल्यावर त्यानंतर या नाडीपट्ट्यांचे समसमान दोन भाग करायचे. त्यातील तू एक ठेवायची व उरलेली पाने कोणाला द्यायची ते मी ठरवेन. तुझ्य़ाकडील पानातून मी गरजूंच्या समस्यांनाना पौर्णिमा ते अमावास्या या काळात व अश्विनी व रेवती या नक्षत्रांच्या दिवशी उत्तरे व उपाय सांगेन.’
दासन यांच्या मनांत दोन गोष्टींची रुखरुख होती. ‘एक त्या बाईने घेतलेल्या पट्ट्यांची तिला सजा होणार की तिला माफ केले जाणार? व दुसरे असे की या जीवनाडीच्या पट्यांचे असे दोन भाग करायची अगदीच गरज आहे काय? त्या संपुर्ण माझ्याकडेच का नकोत? महर्षी म्हणाले, ‘थांब थोडे. गंमत पहा.’
असे म्हणेपर्यंत करकचून ब्रेक लावून गाडी थांबल्याच्या आवाजाने दासन यांचे भान तुटले. ती गाडी होती ज्यात त्या बाई बसलेल्या होत्या त्या गाडीची! ती गाडी मागून आली होती. ‘त्यातील मागे बसलेल्या एका व्यक्तीचे जोरजोरात विव्हळणे ऐकू येऊ लागले. ते पाहून दासनांच्या सह सर्व तेथे धावले. त्या बाईच्या पोटात अत्यंत जोरात कळा येत होत्या. ती वेदनेने कळवळत होती. तिच्या त्या भयानक पोटदुखीचे कारण दासनांच्या ताबडतोब लक्षात आले. ते त्या लक्षाधीश व्यक्तीच्या कानावर घातल्यावर त्यांनी त्या बाईला साडीत लपवलेली नाडीग्रंथाची पाने परत करायला सांगितले.
‘ती म्हणाली मला त्या चोरायच्या नव्हत्या. पण आपल्याजवळ असाव्यात असे वाटून मी त्या लपवल्या होत्या. आधीच माझे पोट दुखत होते. ते यापट्ट्या लपवल्या पासून अतिशय तीव्र झाले. आता मला सहन न होण्यापलिकडे गेले आहे.’ असे म्हणून तिने त्या लपवलेल्या पट्ट्या दूर फेकल्या. त्यानंतर तिची व्यथा एकदम कमी झाली. त्यावर त्याकुटुंबाने घडलेल्या घटनेबद्दल माफी मागून दासनांचे व महर्षी अगस्त्यांचे आभार मानले.
पुढला प्रवास दासनांनी त्यांच्या कारमधून न करता पोलिसांच्या गाडीतून करायचे ठरवले. पोलिसांची गाडी रेल्वे स्टेशनचा 20 किमीचा रस्ता कापू लागली. ते चेन्नईचे तिकिट काढून ते पोलिसांसह प्लॅटफॉर्मवर येऊन बसले. पुढची ट्रेन रात्री 1 नंतर येणार असे कळले. त्यामुळे मधे खूप वेळ होता. काही वेळ गेला असेल, तेवढ्यात हातात शस्त्रे परजत कोणी लुटारू लोक आलेले पाहून तिकिटविक्रीची खिडकी व तेथील दिवे घाईने बंद केल्यामुळे अंधारगुडुप्प झाला. रात्रीच्यावेळचा चंद्रप्रकाश व दूरवर मिणमिणते लाईट फक्त होते. त्यांनी लोकांना वेढा घातला. मात्र ते पोलीस असल्याचे लक्षात आल्यावर ते पळून जाऊ लागले. त्यांचा पाठलाग पोलीस करू लागले. अंधाराचा फायदा घेऊन काही जण पसार झाले. काही वेळाने एकाला पोलिसांनी पकडून आणलेला दासनांनी पाहिला. ज्या पोलिसाला दासनांनी अगस्त्य नाडीचे वाचन पोलिसांच्या लॉरीत केले होते त्याला विचारता कळले की पकडला गेलेला माणूसही त्या आधीच्या नक्षली टोळीपैकी होता. हा पकडला गेला. बाकीचे पसार झाले. ते त्याला घेऊन कारवाई करायला निघुन गेले. नंतर गाडी आली. घडलेल्या घटनेची गाडी थांबल्यावर प्लॅटफॉर्मवर चर्चा झाली. दासननी जनरल डब्यात प्रवेश केला नंतर त्यांना टीटीईने कनफर्म्ड बर्थ दिला. त्यांच्या आपापसातील बोलण्यातून त्यांना कळले की पकडला गेलेल्या माणसाचे नाव ‘नागीरेड्डी’ होते. ते नाव त्यांच्या कानावर पडताच तो त्या पोलिसाचा लहानपणी हरवला भाऊ तर नव्हे? असे वाटून ते महर्षींकडून जाणून घ्यायची उत्सुकता त्यांना लागली. यथावकाश त्यांना वाचनातून नागीरेड्डी तोच होता असे महर्षींनीही सांगून खात्री केली! ... क्रमशः
(अशीच एक जीव नाडी सध्या पुण्यात उपलब्ध आहे. इच्छुकांनी लेखकाशी रात्री ९ ते १०च्या दरम्यान संपर्क करावा)
संकलक – विंग कमांडर शशिकांत ओक . मो - 9881901049,
शब्दबंध २०१०
प्रेषक बेसनलाडू ( बुध, 03/10/2010 - 10:21) .२००८ व २००९ या दोन्ही वर्षी 'शब्दबंध' या आंतरजालीय जालनिशीकारांच्या उपक्रमात सहभागी झालो होतो. आता या वर्षीच्या 'शब्दबंध'चे वारे वाहू लागले आहेत. त्या संबंधीची 'शब्दबंध'च्या अधिकृत जालनिशीवरील उद्घोषणा इच्छुकांच्या अधिक माहितीसाठी येथे डकवत आहे.
===========================================================================
२००८ मधे १० लोकांनी साकारलेल्या शब्दबंधने मागच्या वर्षी २९ लोकाना सामावून घेतलं! मराठी ब्लॉगर्सच्या या जागतीक ई-सभेचे आयोजन आपण याही वर्षी दिमाखात करणार आहोत. मित्रहो तारखांची नोंद करा - ५ आणि ६ जुन २०१०!
परत एकदा आपण सर्वजण या सभेत भेटायचंय. काही नवे तर काही जुने शब्दबंधी घेऊन यायचंय. जिथे आहात तिथून, थेट सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचायचंय. परत एकदा सर्व हौशी मराठी ब्लॉगर्सना त्यांचं लिखाण त्यांच्या थाटात व्यक्त करण्यासाठी हे खास व्यासपीठ सजवायचंय.
मागील वेळेसारखेच, मराठीमध्ये १०० % स्वतःचं लेखन असलेला किमान एक ब्लॉग असलेल्या कुठल्याही ब्लॉगकाराला यात सहभागी होता येईल. या सभेची व्याप्ती अधिकाधिक वाढवणे आणि अधिकाधिक मराठी ब्लॉगर्सना त्यांनी लिहिलेल्या, त्याना आवडणाऱ्या, आणि त्यांच्या लिखाणाचं वाचन करण्यासाठी ई-व्यासपीठ ऊपलब्ध करून देणे हा यावेळीही हेतू आहे. मराठीमधलं लिखाण हा एकच समान दुवा पकडून आपण सर्वजण एकत्र येणार आहोत. प्रवास वर्णनं, अनुभव, कथा, कविता, व्यक्तीचित्रं, लघुनिबंध, तंत्रज्ञान आणि अशाच कित्येक छटांनी सजलेल्या मराठी ब्लॉगविश्वाची छोटीशी झलक आपल्याला या सभेमधे साकार करायचीये. तेही अनौपचारीक पद्धतीने.
सर्वसाधारणतः या सभेचं स्वरूप असं असेल. स्काईप, किंवा तत्सम साधन वापरून, आपण वेगवेगळी सत्रं आयोजीत करू. सहभागी होणाऱ्या सर्व हौशी ब्लॉगर्सना या तंत्राची माहिती सभेच्या आधी करून देण्यात येईल. जपान-ऑस्ट्रेलियापासून ही सभा सुरू होईल. सत्रांची सूत्रं क्रमाक्रमाने पश्चिमेकडे हस्तांतरीत होऊन भारत-आफ़्रिका-युरोप-अमेरिका या क्रमाने अभिवाचनाचं सत्र सुरू राहील.
शब्दबंध-२०१० मधे सहभागी होणं सोपं आहे. सहभाग घेण्यासाठी किंवा केवळ आयोजनामधे मदत करण्यासाठीही, कृपया या फॉर्मवर नोंद करावी -https://spreadsheets.google.com/viewform?formkey=dHhIT3dWN21tYWpDVHo4UG9yMlZycWc6MA. तुमच्याबद्दलची माहिती आणि तुमच्या सहभागाचं स्वरूप आम्हाला या फॉर्मवरून कळेल. सर्व जुन्या आणि नव्या शब्दबंधीनी या फॉर्मवरून नोंद करावी ही विनंती. ईथे नाव नोंदवणाऱ्या सर्वाना आपोआप shabdabandha@googlegroups.com मधे प्रवेश दिला जाईल आणि तिथेच पुढच्या सर्व चर्चा होतील. (तुम्ही आधीपासून जरी shabdabandha@googlegroups.com चे सभासद असाल, तरीसुद्धा शब्दबंध-२०१० मध्ये सहभागासाठी, कृपया फॉर्ममधे नोंद करावी. तसदीबद्दल क्षमस्व.)
लवकरच भेटू. आपली वाट बघतोय.
- शब्दबंध स्वागतक आणि कार्यकारी मंडळ
विचारवंत म्हणजे नक्की कोण?
प्रेषक मुत्सद्दि ( मंगळ, 03/09/2010 - 20:10) .विचारवंत म्हणजे नक्की कोण?
मागे एकदा "तेंडुलकरांना" असा प्रश्न कोणितरी विचारल्याचे स्मरणात आहे.
त्यावर त्यांचे उत्तर काय होते हे आता आठवत नाही.(कोणी ह्याबाबत त्यांच्या उत्तराचा दुवा दिला तर बरे होईल)
परंतु आजकालचा एकंदर कल पाहता
"विचारवंत" असण्यासाठी (तथाकथित) धर्मनिरपेक्षवादी (त्यातही अल्पसंख्यांक समाजाची बाजु घेणारे) वा अल्पसंख्यांक समाजाचे असणे आवश्यक आहे का?
उदा.तिस्ता सेटलवाड,जावेद अख्तर, मेधा पाटकर, वगैरे वगैरे....
मुत्सद्दि.
लोकशिक्षण ही गुरुकिल्ली
प्रेषक प्रकाश घाटपांडे ( सोम, 03/08/2010 - 20:55) .सांडपाण्याच्या व्यवस्थापनाला पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्व आहे. अमेरिकेसारख्या देशातही ही समस्या आहे. समरव्हील या शहरात त्या दृष्टीने अभ्यास करण्यात आल. भारतातही या प्रश्नी खुप काही करणे शकय आहे फक्त त्यासाठी लोकशिक्षण सर्वात महत्वाचे आहे. ....... पुढे वाचा
हा दैनिक सकाळ दि. ८ मार्च २०१० च्या पुणे आवृत्तीत लेख वाचल्यावर लिखाण ओळखीचे वाटायला लागले. पण हे विठ्ठल देशपांडे कोण बाबा? हे नक्कीच विकास देशपांडे असणार त्यातुन शहर बॊस्टन म्हणल्यावर नक्कीच सकाळ ने काहितरी नावात चुक केली आहे असे वाटू लागले. पण नावात काय आहे?
मंडळी हे विठठल देशपांडे म्हणजेच आपले मिपाकर आडव्या उभ्यारेषा नसलेले विकास. उत्तम लेख सकाळने प्रिंट मिडियातील जागर मधे टाकल्या बद्दल दैनिक सकाळ चे आभार .



