Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 12/06/2010 - 12:25
आज ६ डिसेंबर. मुंबईतले यच्चयावत रस्ते दादरच्या दिशेने वाहत असतील. त्यात हौशे, नवशे, गवशे, चोर, संधिसाधू राजकारणी असे सगळेच असतील. तसे ते प्रत्येक उत्सवात असतातच. पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते, पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील. त्यांच्या मनातील कृतज्ञतेची मी केवळ कल्पनाच करू शकतो. तसेही तथाकथित उच्चवर्णिय असूनही, एक भारतिय म्हणून जगताना आज मी जे काही स्वातंत्र्य उपभोगतो आहे त्याच्या श्रेयाचा एक मोठा वाटा त्यांना जातोच. तर, अशा या थोर माणासाला माझे अभिवादन. वि.सू. : हा धागा केवळ एका थोर आणि कर्तृत्ववान माणसाला वंदन करण्यासाठी काढलेला आहे. बाबासाहेबांच्या विचारांवर / अनुयायांवर वगैरे चर्चा करयासाठी वेगळा धागा काढावा. त्या व्यतिरिक्त या धाग्यात बाबासाहेबांबद्दल काही आठवणी अथवा थोडीफार साधकबाधक वैचारिक चर्चा होण्यास हरकत नाही. पण या विषयाच्याबाबतीतल्या पूर्वानुभवामुळे चर्चा भरकटल्यास / विद्वेषपूर्ण झाल्यास असे प्रतिसाद इथे ठेवले जाऊ नयेत असे वाटते.
  • Log in or register to post comments
  • 287598 views

प्रतिक्रिया

Submitted by यकु on Mon, 12/06/2010 - 12:28

Permalink

जय भीम!!!!

जय भीम!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by गांधीवादी on Mon, 12/06/2010 - 12:38

Permalink

समता

लोकशाहीचा पाया रचल्याबद्दल बाबासाहेबांना आमचे अभिवादन. !!! Image removed. बाबासाहेबांच्या आख्यायिका मिपाकरांच्या लेखणीतून येउद्यात.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Mon, 12/06/2010 - 12:42

Permalink

राज्यघटनेच्या शिल्पकाराला मुजरा.

राज्यघटनेच्या शिल्पकाराला मुजरा.
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Mon, 12/06/2010 - 12:58

Permalink

बाबासाहेबांना अभिवादन.

बाबासाहेबांना अभिवादन.
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on Mon, 12/06/2010 - 12:59

Permalink

"बुध्द आणि त्याचा धम्म" या

"बुध्द आणि त्याचा धम्म" या ग्रंथाचे लिखाण चालू होते. बाबासाहेब रात्रीच्या वेळी लिहायला बसत. एकदा रात्रीच्या वेळी ते लेखनात मग्न झाले असताना बाबासाहेबांचे सहायक/मदतनीस नानकचंद रत्तू हे बाबासाहेबांचे जेवणाचे ताट आणि दूध घेऊन आले. रात्र फार झालीय, आता जेवून घ्या असे म्हणाले. बाबासाहेब म्हणाले, "एवढा शेवटचा भाग पूर्ण करतो, आणि जेवून घेतो, तू आता घरी जा...." नानकचंद घरी निघून गेले. दुसरे दिवशी सकाळी ते परतले. अत्यंत तल्लीन होऊन सकाळीदेखील बाबासाहेबांचे लिखाण चालूच होते. आपण आलो आहोत हे जाणवून देण्यासाठी नानकचंद यांनी घसा खाकरला. लिखाणावरची नजर काढून बाबासाहेब फक्त एवढंच म्हणाले, " तू अजून घरी गेला नाहीस का? "
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on Mon, 12/06/2010 - 13:00

Permalink

पुनरूक्ती

प्र.का.टा. आ.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 12/06/2010 - 13:18

Permalink

महामानवास अभिवादन.. !! जय भिम

महामानवास अभिवादन.. !! जय भिम !!
  • Log in or register to post comments

Submitted by sneharani on Mon, 12/06/2010 - 13:54

Permalink

असेच म्हणते

या महामानवास अभिवादन!
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Mon, 12/06/2010 - 14:13

Permalink

असो

पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते, पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील.
असहमत आणि अतिशयोक्तिपुर्ण . गांधी झाले म्हणुन सगळे खादीचा वापर करतात काय ? बाकी बाबासाहेबांचा लहाणपणापासुन हेवा वाटत आलेला आहे. वक्तृत्वस्पर्धेसाठी त्यांचा विषय निवडल्याने त्यांच्याविषयी भरपुर माहिति मिळाली होती. ज्या संघर्षातुन हा माणुस वर आला त्यानंतर त्याला महामानव ही पदवी सुद्धा छोटी ठरावी. - टारझन महामानवांचे अनुयायीच महामानवाच्या तत्वांचा अपमान करतात.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 12/06/2010 - 15:20

In reply to असो by टारझन

Permalink

पण त्या गर्दीत असेही असंख्य

पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते, पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील.
वरील वाक्याचा योग्य तो अर्थ कळला असता तर 'गांधी झाले म्हणुन सगळे खादीचा वापर करतात काय ?' हे वाक्य आले नसते. विशेषतः लेखात त्या आधी आलेले 'हौशे, नवशे, गवशे' इत्यादी वाचल्यावर तर नाहीच नाही. असो. एखाद्या माणसाला अभिवादन करायला तो माणूस संपूर्णच पटला पाहिजे असे नक्कीच नाही. म्हणूनच काही गोष्टी न पटूनही मला त्यांना अभिवादन करावेसे वाटते. आणि मी तसे करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Mon, 12/06/2010 - 15:39

In reply to पण त्या गर्दीत असेही असंख्य by बिपिन कार्यकर्ते

Permalink

वरील वाक्याचा योग्य तो अर्थ

वरील वाक्याचा योग्य तो अर्थ कळला असता तर 'गांधी झाले म्हणुन सगळे खादीचा वापर करतात काय ?' हे वाक्य आले नसते.
तुर्तास वाक्याचा उत्तरार्ध मागे घेतो. .
विशेषतः लेखात त्या आधी आलेले 'हौशे, नवशे, गवशे' इत्यादी वाचल्यावर तर नाहीच नाही.
त्यानंतरही अतिशयोक्तिपुर्ण विधान , हेन्स असहमत.
एखाद्या माणसाला अभिवादन करायला तो माणूस संपूर्णच पटला पाहिजे असे नक्कीच नाही.
'येथे' गैरलागु मुद्द्याशी सहमत. आधीच्या प्रतिसादाप्रमाणे माझे साहेबांन्ना पुनःश्च अभिवादन.
म्हणूनच काही गोष्टी न पटूनही मला त्यांना अभिवादन करावेसे वाटते. आणि मी तसे करतो.
खुलाश्याबद्दल धन्यवाद. अवांतर : "६० वर्षांनंतर" एखाद्या महामानवामुळे त्याच्या धर्मबांधवांना मान मिळतो किंवा ते मानाने जगु शकतात , रोचक आहे :)
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 12/07/2010 - 13:28

In reply to वरील वाक्याचा योग्य तो अर्थ by टारझन

Permalink

हम्म!!

तुर्तास वाक्याचा उत्तरार्ध मागे घेतो. . त्यानंतरही अतिशयोक्तिपुर्ण विधान , हेन्स असहमत.
म्हणजे आता मूळ प्रतिसादातील वाक्यातले 'असहमत आणि अतिशयोक्तिपुर्ण ' एवढेच राहिले. आपल्याला अतिशयोक्तिपूर्ण का वाटले ते वाचायला आवडेल. अवांतराबद्दलही वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Tue, 12/07/2010 - 13:38

In reply to हम्म!! by बिपिन कार्यकर्ते

Permalink

http://www.misalpav.com/node/

http://www.misalpav.com/node/15719#comment-264146 ह्या प्रतिसादात वाहिदा देवींनी स्वतः माझ्या असहमतीचा पाठपुरावा करत आपल्या वरिल वाक्यात काय अतिशयोक्ती आहे ते दाखवुन दिलेले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 12/07/2010 - 14:24

In reply to http://www.misalpav.com/node/ by टारझन

Permalink

क्षमा करा, पण माझ्या

क्षमा करा, पण माझ्या अल्पमतीला कळलेच नाही काही. नीट समजावून सांगा. माझ्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट होता. या गर्दीला नाके मुरडणारे आहेत आणि त्यांचे म्हणणे अगदीच अनाठायी नाहीये. पण अशा गर्दीत चांगले वाईट दोन्ही प्रकारचे लोक असतात. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Tue, 12/07/2010 - 15:08

In reply to क्षमा करा, पण माझ्या by बिपिन कार्यकर्ते

Permalink

पण त्या गर्दीत असेही असंख्य

पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते
हे आपले वाक्य आहे.
ज्यांना हे माहीत नाही त्यांनी गावातील ढोर आळीत एकदा चक्कर मारावी. I Bet you will not have food and will not able to sleep peacefully in the night
हे वाहिदा देवींचे वाक्य आहे. ६० वर्षांनंतर ज्यांची परिस्थिती बदलायची आहे , त्यांची बदलली , जे कातडी सोलणार किंवा मैला वाहाणार ते वाहातंच बसलेले आहेत. ह्यानंतरही जर "महामानव जन्मले नसते तर ज्यांची परिस्थिती बदलली आहे ते सुद्धा आज मैला वाहात आणि कातडी सोलत बसले असते " हे निदान काढले तर ते हस्यास्पद ठरते. ह्या पुढे काहीही खुलासा मिळणार नाही (पैशे दिल्या शिवाय)
माझ्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट होता. या गर्दीला नाके मुरडणारे आहेत आणि त्यांचे म्हणणे अगदीच अनाठायी नाहीये. पण अशा गर्दीत चांगले वाईट दोन्ही प्रकारचे लोक असतात. असो.
ह्या वाक्याला आमची असहमती शोधुन दाखवा , आणि हजार रुपये मिळवा
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 12/07/2010 - 15:10

In reply to पण त्या गर्दीत असेही असंख्य by टारझन

Permalink

महामानवाच्या धाग्यावर हा

महामानवाच्या धाग्यावर हा वनमानव का दंगा घालत आहे ? परामानव
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Tue, 12/07/2010 - 15:15

In reply to महामानवाच्या धाग्यावर हा by परिकथेतील राजकुमार

Permalink

आमच्या महाचर्चेला एका

आमच्या महाचर्चेला एका फेरीमानवाने दंगा म्हनावे? कोण आहे रे तिकडे .. ह्या फेरिमानवास पंगाच्या हवाली करावे : ) आणो संस्कृतची शिकवणी घ्यावी.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 12/07/2010 - 15:28

In reply to पण त्या गर्दीत असेही असंख्य by टारझन

Permalink

आऽऽऽऽह!!!!!!!!!!!!!!!!!

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 12/07/2010 - 18:50

In reply to पण त्या गर्दीत असेही असंख्य by टारझन

Permalink

६० वर्षांनंतर ज्यांची

६० वर्षांनंतर ज्यांची परिस्थिती बदलली आहे, सुधारली आहे, आधीच चांगली होती आणि आणखी सुधारली आहे त्यांच्यापैकी कोणीही या ढोरांसाठी काहीही केलं नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे, महामानव आंबेडकरांना नव्हे, आपल्या सर्वांनाच! या ढोर, महार, मांगांना आपणही माणूसच आहोत, अगदी संस्कृत बोलणार्‍या गुरूजीएवढेच, याची जाणीव करून देणार्‍या डॉक्टरांना अभिवादन. दुर्दैवाने, संस्कृत शिकणारे/शिकवणारे अनेक लोकं मात्र अजूनही असंस्कृत गप्पा करतात.
  • Log in or register to post comments
Profile picture for user डावखुरा

Submitted by डावखुरा on Tue, 12/07/2010 - 22:17

Permalink

+१

दलितांचे ‘बाबा’ गेले----- - आचार्य अत्रे अविनाशकुलकर्णी यांचा हा प्रतिसाद वाचनीय....
  • Log in or register to post comments

Submitted by इन्द्र्राज पवार on Mon, 12/06/2010 - 15:41

Permalink

राखीव मतदार संघ ... !

"....पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील. ..." ~ हे फार महत्वाचे वाक्य आहे आणि तितकेच दलितांनी आयुष्यभर त्याबाबत आपल्या नेत्याच्या नावाशी कृतज्ञ राहिले पाहिजे. निव्वळ फोटोला हार घालून नव्हे तर त्यांचे समाजसुधारणेचे विचारही तितक्याच प्रखरतेने प्रथम त्यांच्याच भाईबंदानी प्रत्यक्षात आणले पाहिजेत. असो....[श्री.बिपिन म्हणतात त्याप्रमाणे धागा भरकटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.] आठवणी लिहिण्याविषयी परवानगी धागाकर्त्यानी दिली असल्याने या निमित्ताने एकच आठवण लिहित आहे. ती म्हणजे 'राखीव' मतदार संघ निर्माण करण्याबद्दलची त्यांची आग्रहाची भूमिका व त्यासाठी वेळ आल्यावर थेट महात्मा गांधींना विरोध. गांधींची धारणा अशी की विभक्त मतदारसंघ हे अस्पृश्यांना व हिंदूधर्माला घातक ठरतील. त्याबाबत त्यानी (गांधींनी) सर सॅम्युएल होअर या भारतमंत्र्याना ब्रिटीश सरकारने आंबेडकरांच्या प्रस्तावाला देऊ घातलेल्या मंजुरीबाबत फेरविचार करण्याबाबत पत्र लिहिले होते जे पुढे थेट लंडनला पाठविले गेले. पंतप्रधान मॅकडोनाल्ड यानी आंबेडकरांचीच भूमिका न्याय असल्याचे मान्य करून प्रांताप्रांतात दलित समाजाला विभक्त मतदार संघ जाहीर केले....(१७ ऑगस्ट १९३२ या तारखेस). डॉ.बाबासाहेबांच्या या मागणीची फळे आजही दलित घेत असून अगदी ग्रामपंचायत, नगरपालिकेपासून थेट संसद भवनापर्यंत ते आपल्या समाजाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. इन्द्रा
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Mon, 12/06/2010 - 15:46

Permalink

बाबासाहेब आंबेडकरांमुळे मराठी साहित्यविश्वात उमटलेले पडसाद

स्त्रीवादी धर्मचिकित्सा भारतीय समाजातली जातिव्यवस्था, तिच्यात अनुस्यूत असलेली उतरंड, विषमतेला सूत्रबद्ध करणारी मनुस्मृती, जात शुद्ध ठेवण्यासाठी स्त्रियांच्या लंगिकतेचं दमन करणारी कठोर बंधनं; स्त्रियांना मिळालेलं दुय्यम स्थान यांच्यातले परस्परसंबंध यांची आंबेडकराना जाण होती. हिंदू कोड बिलाची आंबेडकरांनी केलेली मांडणी हे त्यांचं एक महत्त्वाचे जीवितकार्य होते. आणि स्त्रीच्या दुय्यम स्थानाला, तिच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे हे त्यात अंतर्भूत असणारे एक महत्त्वाचे सूत्र होते. जातीग्रस्त जीवनाच्या प्रश्नांना पहिल्यांदा वाचा फोडली ती डॉ. आंबेडकरांनीच दलितांप्रमाणेच वर्णव्यवस्थेने अलग ठेवलेल्या आदिवासी भटके विमुक्त या जमातीतूनही विद्रोही साहित्य निर्माण झाले. 1956 च्या डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतरामुळे हिंदू समाजाला आणखी एक हादरा बसला आणि मुस्लिम विरोधाबरोबरच दलित विरोधाचा उघड आयाम हिंदू जमातवादास प्राप्त झाला. पण र.वा.दिघे, हमीद दलवाई यासारख्या चार दोन साहित्यीकांचा अपवाद वगळता फाळणी, दंगली किंवा जमातवादास नाटक-कादंबरीचा विषय बनवण्याबाबत अनेक साहित्यिक उदासिनच राहिले. 1990 च्या दशकात मात्र जेंव्हा मराठी साहित्य चळवळीचे व्यासपीठ कार्यरत झाले तेंव्हा जावेद कुरेशी, एहत मामू देशमुख, मुबारक शेख, फ.म. शहाजिंदे, डॉ. अझीज नवाब, इलाही जमादार, फक्रूदीन बेन्नूर या मुस्लिम मराठी साहित्यिकांनी मुस्लिमांच्या एकांगी चित्रणाबाबत आवाज उठवला. भारतात प्लेबीया ऍग्नीस, झोया हसन, रझीया पटेल, लतिका सरकार, तिस्ता सेटलबाड इत्यादींनी विविध धर्मीयांच्या कायद्याच्या अनुषंगाने धर्माचा विचार केला तरी सर्वांगिण मुक्तीदायी धर्मशास्त्र मांडण्याचे प्रयत्न अद्याप सुरु झालेले नाहीत. :-( धर्मग्रस्ततेमुळे निर्माण होणाऱ्या घटस्पोटित विधवा, परित्यकता, बहुपत्नीकत्व आदी प्रश्नांची चर्चा स्त्रीवादी विश्वात असली तरी त्याचे फारच थोडे पडसाद मराठी साहित्यात उमटले आहेत. बाबासाहेब या महामानवास विनम्र अभिवादन !! ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Mon, 12/06/2010 - 18:53

In reply to बाबासाहेब आंबेडकरांमुळे मराठी साहित्यविश्वात उमटलेले पडसाद by वाहीदा

Permalink

वाहीदा

वाहीदा यांचा हा प्रतिसाद अभ्यासपूर्ण आहे. तरी तो विस्कळीत आहे असे मला वाटले. यातील एखाद्या मुद्यावर (मराठी साहित्यातील विद्रोही विचार, हिंदूंमधील जातीयता/धार्मिक भावना, साहित्यातून होणारे मुस्लिमांचे गैर-चित्रण, स्त्रियांना धार्मिकतेतून होणारा त्रास) त्यांनी अधिक विस्तृत लिहावे, अशी विनंती करते. आंबेडकरांच्या आधी ज्योतिबा फुलेही अस्पृश्यांच्या प्रश्नांवरून लिहीत होते, विचार मांडत होते, हे मात्र नमूद करावेसे वाटते. मात्र बाबासाहेब आंबेडकरांमुळे राजकीय विचारांमध्ये या प्रश्नांचाही समावेश झाला, असे वाटते. स्त्रियांबाबतीत बोलायचे तर स्त्रियांना दुष्ट रूढींमधून मुक्तता ही आंबेडकरांच्या आधीपासून मिळण्याचे प्रयत्न सुरू झाले असावेत असे वाटते. १८१२ पासून राजा राममोहन रॉय यांनीही याआधी हिंदूंमधील विधवांना सती जाण्याच्या प्रथेपासून मुक्तता मिळावी यासाठी लेखन केले होते. मराठीतील धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना १८९३ मध्ये केली असे विकीवर कळते. विद्रोही विचार हे समाजातील दुबळ्या स्तरातून येण्याची सुरूवात मात्र जसे या गटांमध्ये शिक्षित वर्गाचे प्रमाण वाढले तसे सुरू झाले असावे. बाकी, बाबासाहेब आंबेडकरांमुळे त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते, पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील. यातील असंख्य जण बदलले असतील याच्याशी सहमत. कसे जगता येते हे अनेकांना आंबेडकरांमुळे समजले असावे. तरीही अजून असे अनेक आहेत जे अजूनही मैला डोक्यावरून नेत असतील ह्या मताशीही सहमत. आंबेडकरांना अभिवादन. मला कायम प्रश्न पडतो - भारतात डोक्यावरून सामान वाहणारे हमाल का असतात? लहान लहान दोन-चार चाकी ओढता येतील अशा गाड्या/ट्रॉल्या घेता येत का नाहीत? त्या ओढणारे हमालही चालतील, डोक्यावरून सामान नेण्यास आता या जमान्यातही हमालांची का तयारी असते? हमालांच्या युनियन असाव्यात, त्या हे प्रश्न का रेटत नाहीत? का युनियन हे प्रश्न रेटतात, आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते? तसेच सफाई-कामगार, मैला-वाहू कामगारांच्या बाबतीत. या कामगारांचे आयुष्य अतिशय वाईट, हलाखीचे जात असावे. त्यांच्यासाठी काम करणार्‍या संस्थांची माहिती या निमित्ताने कोणाकडे असली तर ती येथे द्यावी अशी विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Mon, 12/06/2010 - 15:47

Permalink

>>पण त्या गर्दीत असेही असंख्य

>>पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते, पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील अत्यंत सहमत. अशा अनेक वर्णपीडितांमध्ये स्वत्वाची जाणीव निर्माण करणार्‍या आणि इतरांनी त्यांच्याकडे माणूस म्हणूनच पाहावे म्हणून झटणार्‍या आंबेडकराना सलाम.
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Mon, 12/06/2010 - 16:01

In reply to >>पण त्या गर्दीत असेही असंख्य by नगरीनिरंजन

Permalink

जावे त्यांच्या वंशा, तेव्हा कळे ...

>>पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते, पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील पूर्णतः सहमत !! ज्यांना हे माहीत नाही त्यांनी गावातील ढोर आळीत एकदा चक्कर मारावी I Bet you will not have food and will not able to sleep peacefully in the night
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Mon, 12/06/2010 - 16:03

In reply to जावे त्यांच्या वंशा, तेव्हा कळे ... by वाहीदा

Permalink

ज्यांना हे माहीत नाही त्यांनी

ज्यांना हे माहीत नाही त्यांनी गावातील ढोर आळीत एकदा चक्कर मारावी
अच्छा , म्हणजे महामानव होऊन गेले तरी परिस्थिती बदलली नाहीये तर :) दुर्दैवी आहे हे !
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Mon, 12/06/2010 - 16:20

In reply to ज्यांना हे माहीत नाही त्यांनी by टारझन

Permalink

मायावती अन दलित

yes, that's why people like Mayawati takes advantage of the situation Uttar Pradesh is one of India's most deprived states , with a high crime rate and poor health indicators. Ms. Mayawati projects herself as an icon for India's 160 million Dalit and shamelessly builds statues of herself
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Mon, 12/06/2010 - 16:11

Permalink

अभिवादन...

डॉ. आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन आणि ह्या महामानवाच्या चरणी दंडवत.. जय भीम...
  • Log in or register to post comments

Submitted by तर्री on Mon, 12/06/2010 - 17:24

Permalink

महामानवास मुजरा.

त्यांचे "पाकिस्थान" निर्मीती / स्थिती बाबत्चे विचार अडवाणी / ठाकरे घराण्याचे वाटावे ईतके स्पष्ट आहेत. नेहरूनी ह्याही नररत्नाची ऊपेक्षा केली . घटनेच्या शिल्प्काराला नमन. बिका : स्तुत्य धागा.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Mon, 12/06/2010 - 17:52

Permalink

अभिवादन!

फार मोठा माणूस होऊन गेला. आपल्याच देशवासीयांची (आणि विशेषतः राजकारण्यांची) ह्या महामानवाला समजण्याची कुवत थिटी पडली. एखाद्या देशाची घटना तयार करणं ही साधीसुधी गोष्ट नव्हे. अशी अवघड कामगिरी मोठ्या जबाबदारीनं आणि अंगभूत बुध्दिमत्तेनं सहज पार पाडणार्‍या त्या महामानवाला विनम्र अभिवादन. बाबासाहेबांचे भाषावार प्रांतरचना, आरक्षण-सवलती ह्यासंबंधीचे विचार वाचले की वाटतं, अरे एव्हढा द्रष्टा माणूस आपल्यामध्ये होऊन गेला, अन त्यामानाने ह्या द्रष्ट्या बुध्दिवंताचे असे निरनिराळे पैलू आपल्याला ठाऊकच नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Mon, 12/06/2010 - 18:29

In reply to अभिवादन! by धमाल मुलगा

Permalink

+१ सहमत! महामानवाला अभिवादन!

+१ सहमत! महामानवाला अभिवादन!
  • Log in or register to post comments

Submitted by नीलकांत on Mon, 12/06/2010 - 19:52

Permalink

बाबासाहेबांस नमन.

बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील कोट्यावधी जनतेला परिवर्तनाचा महामंत्र दिला. ज्या लोकांना हजारो पिढ्यांपासून माणूस म्हणून जगण्याचा हक्कं नाकारला गेला होता त्या सर्व तळागाळातील लोकांना बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आदी मुल्यांची ओळख करून दिली. आपल्याच पायावर आपण उभे राहू शकतो आणि आपल्या डोक्याने आपण स्वतंत्र विचार करू शकतो ही जाणीव बाबासाहेबांनी दिली. बाबासाहेबांनी येथील पददलीतांना स्वतंत्र केले. भारतीय समाजातील अन्यायकारक जातीव्यवस्थेवर हल्ला चढवला. अत्यंत महत्वाचे म्हणजे नवीन भारताच्या निर्मीतीच्या पायाशी भक्कम असलेले संविधान हे अत्यंत परिणामकारक आणि सर्वांना समान संधी देणारं, अन्याग्रस्तांवरील अन्याय दूर करणारं असं बनवण्यासाठी कष्ट घेतले. जेव्हा हिंदू धर्मातील प्रस्थापीत समाजरचना आपल्या समाजबांधवांना योग्य न्याय देण्यास असमर्थ आहे असे लक्षात आले तेव्हा याच मातीतील तथागताच्या वाटेवर चालण्याचा आणि धम्माच्या आश्रयास जाण्याचा संदेश आपल्या अनुयायांना दिला. लेखन, राजकारण, समाजकारण, संविधान, समाजरचना आदी सर्वच क्षेत्रात बाबासाहेब अतुलनीय आहेत. अश्या बाबासाहेबांकडून प्रेरणाघेऊन आज लाखो युवक आपलं आयुष्यं स्वत:च्या हिमतीवर बांधताहेत. बाबासाहेब माझ्यासाठी सतत प्रेरणेचा स्त्रोत आहेत. बाबासाहेबांना शतशः नमन. भवतु सब्ब मंगलम ! - नीलकांत
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 12/06/2010 - 19:59

Permalink

अभिवादन

डॉ. आंबेडकरांना अभिवादन. डॉ. आंबेडकरांचे विचार, निबंध, इ.इ. संदर्भ पुस्तकांची यादी मिळू शकेल काय?
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Mon, 12/06/2010 - 21:13

In reply to अभिवादन by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

अभिवादन

Image removed. डॉ. आंबेडकरांना अभिवादन. डॉ. आंबेडकरांचे विचार, निबंध, इ.इ. संदर्भ पुस्तकांची यादी मिळू शकेल काय? कोलंबिया विद्यापिठ संकेतस्थळ आंबेडकर.ऑर्ग
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Mon, 12/06/2010 - 21:30

Permalink

घटनाकारांना अभिवादन

इंद्रा-जी, चित्राताई, नीलकांत आणि वाहीदा यांचे माहितीपूर्ण आणि विषयास धरून लिहिलेले प्रतिसाद आवडले. कांहीं माहीत नसलेल्या गोष्टी कळल्या. धागा छान वाढतो आहे. या विषयावरील माझे स्वतःचे (वैयक्तिक) वाचन फारच अपुरे आहे त्यामुळे जास्त लिहिण्याची पात्रता नाहीं. जय भीम!
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Mon, 12/06/2010 - 21:51

Permalink

अतुल पेठे यांचा हा अनुबोधपट मिळाला तर जरूर पहा

चित्रा यांच्या वर विचारणा केलेल्या माहितीसंदर्भातः कचरा कोंडी हा तासाभराचा अनुबोधपट आवर्जून पहाण्यासारखा आहे. जवळपास उपलब्ध नसेल तर बहुतेक अतुल पेठे यांच्याकडूनच इथे निरोप पाठवला तर मिळू शकेल. डॉ. आबेडकरांना मनःपूर्वक अभिवादन.
  • Log in or register to post comments

Submitted by ramjya on Mon, 12/06/2010 - 21:59

Permalink

घटनाकारांना अभिवादन

बाबासाहेबांना शतशः नमन. भवतु सब्ब मंगलम !
  • Log in or register to post comments

Submitted by गुंडोपंत on Tue, 12/07/2010 - 04:42

Permalink

समायोचित

समायोचित लेख बिपीनराव. मला वाटते की आंबेडकरांचे कार्य समजून घेण्यात आणि ते पुढे नेण्यात समाज फारच मागे पडला. वर नीलकांतने म्हंटलेच आहे, ज्या लोकांना हजारो पिढ्यांपासून माणूस म्हणून जगण्याचा हक्कं नाकारला गेला होता त्या सर्व तळागाळातील लोकांना बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आदी मुल्यांची ओळख करून दिली. आपल्याच पायावर आपण उभे राहू शकतो आणि आपल्या डोक्याने आपण स्वतंत्र विचार करू शकतो ही जाणीव बाबासाहेबांनी दिली. तेच म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by ढब्बू पैसा on Tue, 12/07/2010 - 13:17

Permalink

स्वतंत्र भारताच्या

स्वतंत्र भारताच्या आधुनिक युगात जन्मल्याने असल्याने अस्पृश्यता ही फक्त शालेय इतिहासाच्या पुस्तकातून ठावूक होती. त्याची तीव्रता कधी तेव्हा कळली नाही. आणि आरक्षणांबद्दल अनेक गैरसमज असल्याने बाबासाहेबांचा थोडा रागच येत असे. पुढे कळत्या वयात दया पवारांचं बलुतं वाचलं आणि अक्षरशः सुन्न होते तीन दिवस. पहिल्यांदा ती दाहकता जाणवली! आणि बाबासाहेबांबद्दल असा हलकट विचार केल्याबद्द्ल स्वतःची खूप लाज वाटली. आपल्या अस्तित्वाची जाणीव सुद्धा नसणार्‍या एका मोठ्या जनसमुहाला बाबासाहेबांनी संघटीत केले, त्याना आपल्या किमान मानवी हक्कांसाठी लढण्यासाठी प्रेरीत केले! त्त्यांच्या ह्या कार्याबद्दल खरच आपण सगळ्यांनीच त्यांचे ॠणी असायला हवे!
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Tue, 12/07/2010 - 16:22

Permalink

दलितांचे ‘बाबा’ गेले----- - आचार्य अत्रे

दलितांचे ‘बाबा’ गेले----- - आचार्य अत्रे ------------------------------------------------- बाबा गेले. सात कोटी अस्पृश्य आज पोरके झाले. भारतांतल्या अनाथांचा आणि अपंगांचा आज आधार गेला. शतकानुशतके समाजाने लाथाडलेल्या पतितांचा पालनहार गेला. दीनदुबळया दलितांचा कनवाळू कैवारी गेला. जुलमी आणि ढोंगी विषमतेविरुध्द जन्मभर प्राणपणाने झगडणारा झुंझार लढवय्या गेला. सामाजिक न्यायासाठी आणि माणुसकीच्या हक्कासाठी ज्यांनी जन्मभर आकाशपाताळ एक केले, असा बहादूर बंडखोर आज आमच्यामधून निघून गेला. पाच हजार वर्षे हिंदु समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला, त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे एक बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड. मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहांतील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलमाविरुध्द उगारलेली वज्राची मूठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिध्द असलेली ‘भीमा’ची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडांच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारे वाघनख होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक युध्दच होय. महात्मा फुले, कबीर आणि भगवान बुध्द हे तीन गुरुच मुळी आंबेडकरांनी असे केले की, ज्यांनी देवाचे, धर्माचे, जातीचे आणि भेदांचे थोतांड माजविणाऱ्या समाजव्यस्थेविरुध्द बंड पुकारले. पतित स्त्रियांच्या उध्दाराचा प्रयत्न करणाऱ्या महात्मा फुल्यांवर हिंदु समाजाने मारेकरी घातले, कबीराला हातपाय बांधून पाण्यात टाकण्यात आले. हत्तीच्या पायी देण्यात आले. आणि मग तो मेल्यानंतर हिंदुमुसलमानांना त्याच्याबद्दल एवढे प्रेम वाटू लागले की, त्याच्या प्रेताचा ताबा घेण्यासाठी ते एकमेकांचा खून करावयास सिध्द झाले. बुध्दधर्माचा भारतामधून उच्छेद करण्यासाठी भगवान बुध्दाच्या अनुयायांच्या कत्तली करण्यात आल्या. हालअपेष्टा आणि छळ ह्याचे हलाहल ज्यांना हयातीत आणि मेल्यानंतरही प्राशन करावे लागले, अशा बंडखोर गुरुंचे आंबेडकर हे सच्चे चेले होते
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Tue, 12/07/2010 - 16:22

Permalink

जुलूम आणि अन्याय म्हटला की

जुलूम आणि अन्याय म्हटला की आंबेडकरांच्या तळपायाची आग मस्तकाला जाई. धमन्या- धमन्यांमधून त्यांचे रक्त उसळया मारुं लागे. म्हणूनच ‘लोकसभे’ त काल पंडित नेहरु म्हणाल्याप्रमाणे, ‘हिंदु समाजाच्या प्रत्येक जुलूमाविरुध्द पुकारलेल्या बंडाचे ते प्रतीक बनले.’ हिंदु समाजाने आणि सत्ताधारी काँग्रेसने आंबेडकरांची जेवढी निंदा केली, जेवढा छळ केला, जेवढा अपमान केला, तेवढा कोणाचाही केला नसेल. पण ह्या छळाची आणि विटंबनेची त्यांनी लवमात्र पर्वा केली नाही. धर्माच्या आणि सत्तेच्या जुलमाला ते कधीही शरण गेले नाहीत. शरणागती हा शब्दच मुळी आंबेडकरांच्या शब्दकोशांत नव्हता. मोडेन, मार खाईन, मरेन पण वाकणार नाही, अशी त्यांची जिद्द होती. आणि ती शेवटपर्यंत खरी करुन दाखविली. जो तुमचा धर्म मला कुत्र्यामांजरापेक्षाही हीन रीतीने वागवतो, त्या धर्मात मी कधीही रहाणार नाही, असे कोटयवधी हिंदुधर्मियांना कित्येक वर्षापासून ते बजावत होते.माणसासारख्या माणसांना ‘अस्पृश्य’ मानणारी ती तुमची ‘मनुस्मृति’मी जाळून टाकणार, असे त्यांनी सनातनी हिंदूना छातीवर हात मारुन सांगितले होते. यामुळे हिंदुधर्मीय लोक त्यांच्यावर फारच संतापले. त्यांना वाटले की, आंबेडकर हे गझनीच्या महंमदापेक्षांहि हिंदू धर्माचे भयंकर दुष्मन आहेत. धर्मातराची घोषणा केल्यानंतर आंबेडकरांचा खून करण्याची योजना घेऊन एक हिंदू पुढारी डॉ. कुर्तकोटी यांच्याकडे गेले होते. तेव्हा डॉ. कुर्तकोटींनी त्यांना सांगितले की आंबेडकरांना तुम्ही मारलेत तर त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामधून दहा आंबेडकर बाहेर पडतील! आंबेडकरांची धर्मातराची घोषणा ही हिंदुधर्माच्या नाशाची घोषणा नव्हती. ते हिंदुधर्माच्या सुधारणेचे आव्हान होते. चातुर्वण्याने हिंदुधर्माचा आणि हिंदुस्थानाचा नाश झाला आहे असे डॉ. आंबेडकरांचे मत होते. म्हणून चातुर्वण्याची चौकट मोडून हिंदू समाजाची रचना समतेच्या आणि लोकशाहीच्या पायावर करा असे टाहो फोडून ते सांगत होते.
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Tue, 12/07/2010 - 16:23

In reply to जुलूम आणि अन्याय म्हटला की by अविनाशकुलकर्णी

Permalink

धर्मांतराच्या प्रश्नावर

धर्मांतराच्या प्रश्नावर आमच्याशी बोलताना एकदा ते म्हणाले की, ”हिंदुधर्मावर मला सूड घ्यायचा असता तर पाच वर्षांच्या आत मी या देशाचे वाटोळे करुन टाकले असते. पण या देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून माझे नाव नोंदले जावे अशी माझी इच्छा नाही !” हिंदुधर्मांप्रमाणेच महात्मा गांधी आणि काँग्रेस यांच्यावर आंबेडकर हे नेहमी प्रखर टीका करीत त्यामुळे जनाब जींनाप्रमाणेच साम्राज्यवाद्यांशी संगनमत करुन हिंदी स्वातंत्र्यांचा मार्ग ते रोखून धरीत आहेत अशीच पुष्कळ राष्ट्रवादी लोकांची समजूत झाली. अस्पृश्यतानिवारणाकडे बघण्याचा काँग्रेसचा दृष्टिकोन हा निव्वळ भुतदयावादी आणि भावनाप्रधान होता. आंबेडकर त्या प्रश्नाकडे केवळ न्यायाच्या आणि हक्काच्या दृष्टीने पहात असत. पारतंत्र्य नष्ट करण्यासाठी ब्रिटिशांविरुध्द गांधीजींनी असे बंड पुकारले, तसे अस्पृश्यता नेस्तनाबूद करण्यासाठी त्यांनी स्पृश्य समाजाविरुध्द का बंड पुकारु नये, असा आंबेडवरांचा त्यांना सवाल होता. अस्पृश्यतानिवारणा बाबत: गांधीजी आणि आंबेडकर ह्यांच्यात अशा तऱ्हेने मतभेद होते. म्हणून साम्राज्याशाहीविरोधी पातळीवर क्रांग्रेसची आणि आंबेडकरांची एकजूट होऊ शकली नाही. तथापि, गांधीजीबद्दल मनांत विरोधाची एवढी भावना असताना केवळ त्यांचे प्राण वाचविण्यासाठी म्हणून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आपली मागणी त्यांनी मागे घेतली. आणि पुणे ‘करारा’ वर सही केली. गोडशासारख्या एका ब्राम्हणाने गांधीजींचा प्राण घ्यावा आणि आंबेडकरांसारख्या एका महाराने गांधीजींचा प्राण वाचवावा ह्याचा अर्थ हिंदूसमाजाला अगदी उमजू नये ह्यांचे आम्हास दु:ख होते.’पुणे करारा’वर आंबेडकरांनी सही करून गांधीजींचे प्राण वाचवीले, पण स्वत:चे व अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेंतले. कारण ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबडकरांनी ‘पुणे करारा’ वर सही केली तो उमदेपणा आणि तो खेळाडूपणा कांग्रसने मात्र आंबेडकरांशी दाखवला नाही.आपल्याला कनिष्ठ असलेल्या महारेतर अस्पृश्याना हाती धरून कांग्रेसने आंबेडकरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा सावर्त्रिक निवडणूकींत पराभव केला आणि देशाच्या राजनैतिक जीवनातून त्यांना उठवून लावले.
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Tue, 12/07/2010 - 16:24

In reply to धर्मांतराच्या प्रश्नावर by अविनाशकुलकर्णी

Permalink

आंबेडकर त्याबद्दल नेहमी

आंबेडकर त्याबद्दल नेहमी विशादाने म्हणत कि,”स्पृश्य हिंदूच्या बहुमताच्या आधारावर माझे आणि माझ्या पक्षाचे राजकिय जीवन गांधीजी आणि कांग्रेस ह्यांनी ह्या देशामधून नेस्तनाबूत करून टाकले!” नऊ कोटी मुसलमानांना खुष करण्यासाठी काग्रेसने ह्या सुवर्ण भूमीचे तीन तुकडे करून टाकले. पण सहा कोटी अस्पृश्यांचे प्रेम मिळवण्यासाठी कागदी कायदे करण्यापलिकडे काँग्रेसने काहीही केले नाही असे असता देशाला स्वातंत्र्य मिळताच घटना समितीत अखंड हिंदूस्थानची आणि जातीय ऐक्याची प्रचंड गर्जना करून आंबेडकरानी आपल्या विरोधकांना चकित करून टाकले. आंबेडकर म्हणाले, ‘जगातील कोणतीही सत्ता या देशातील ऐक्याचा भंग करू शकणार नाही. आणि अखंड हिंदुस्थानातच आपले कल्याण आहे असे आज ना उद्यां मुसलमानांना कळून आल्या वाचुन राहणार नाही!’ आंबेडकरांचे हे उद्गार हा त्यांच्या दैदिप्यमान देशभक्तीचा ज्वलंत पुरावा होय. काँग्रेसशी पूर्वीचे असलेले सर्व वैर विसरुन आंबेडकरांनी सहकार्यासाठी नेहरुंच्या हातात हात दिला. आणि ‘स्वातंत्र भारता’ची घटना तयार करण्याची सर्व जबाबदारी त्यांनी पत्करली. ‘मनुस्मृति जाळा म्हणू सांगणारे आंबेडकर भारतीय स्वातंत्र्याचे पहिले स्मृतिकार व्हावेत हा काय योगायोग आहे!’ घटना मंजूर झाल्यानंतर त्यांनी हिंदूकोड तयार करण्याचे महान कार्य हाती घेतले. पण काँग्रेसमधल्या सर्व प्रतिगामी आणि सनातनी शक्ति आंबेडकरांना विरोध करण्यासाठी एकदम उफाळून बाहेर आल्या; आणि त्यामुळे आपल्या जागेचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळामधून बाहेर पडल्यावांचून आंबेडकरांना गत्यंतरच उरले नाही. आंबेडकरांचे ‘हिंदू कोड बिल’ जर मान्य झाले असते, तर हिंदु समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदु समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता. आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडून आली असती. पण दुदैव भारताचे! दुर्भांग्य हिंदुसमाजाचे! देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वतःचा घात करुन घेतला. राजकर्त्यांनी बहिष्कारले, हिंदु समाजाने लाथाडले, तेव्हा अखेर स्वतःचा आणि आपल्या सात कोटी असहाय नि हीनदीन अनुयायांचा उध्दार करण्यासाठी त्यांना मानवजातीला संमतेचा, दयेचा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या त्या परम कारुणिक भगवान बुध्दाला शरण जाण्यांवाचून गत्यंतर उरले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Tue, 12/07/2010 - 16:30

In reply to आंबेडकर त्याबद्दल नेहमी by अविनाशकुलकर्णी

Permalink

डॉ. आंबेडकरांच्या

डॉ. आंबेडकरांच्या विद्वतेबद्दल तर त्यांच्या शत्रूला देखील कधी संशय वाटला नाही. त्यांच्याएवढा प्रचंड बुध्दिचा, विद्वत्तेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रांत नव्हे, भारतात याक्षणी नव्हता. रानडे, भांडारकर, तेलंग आणि टिळक यांच्या ज्ञानोपासनेची महान परंपरा पुढे चालविणारा महर्षि आज आंबेडकरांवांचून भारतात दुसरा कोण होता? वाचन, चिंतन आणि लेखन ह्यांवाचून आंबेडकरांना दुसरे जीवनच नव्हते. महार जातीत जन्माला आलेला हा माणूस विद्येच्या आणि ज्ञानाच्या बळावर एकाद्या प्राचीन ऋषीपेक्षांही श्रेष्ठपदाला जाऊन पोहोचला होता. धर्मशास्त्रापासून ती घटना शाखा पर्यंत असा कोणताही एक कठीण विषय नव्हता की ज्यामध्ये त्यांची बुध्दि एकाद्या गरुडासारखी वाटेल त्या उंचीपर्यंत बिहार करु शकत नव्हती. तथापि, आंबेडकरांची धर्मांवर अंत्यतिक निष्ठा होती ही गोष्ट फार थोडया लोकांना माहित होती. आंबेडकर कितीही तर्ककर्कश आणि बुध्दिवादी असले तरी त्यांचा पिंड हा धर्मनिष्ठाचा होता. भाविक आणि श्रध्दाळू पित्याच्या पोटी जन्म झाला होता. शूचिर्भूत धार्मिक वातावरणांत त्यांचे सारे बालपण गेले होते. सर्व धर्माचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला होता. आत्म्याच्या उन्नतीसाठी धर्माची आवश्यकता आहे असे त्यांचे ठाम मत होते.धर्मावरील त्याच्या श्रद्वेमुळेच त्यांचे नैतिक चारित्र्य निरपवाद राहिलें. कोणतेच आणि कोणतेही त्यांना व्यसन नव्हते. त्यामुळेच त्यांच्या अंगात विलक्षण निर्भयता आणि आत्मविश्वास निर्माण झाला होता. आपण जे बोलतो किंवा लिहितो ते खोटे आहे असे म्हणण्याची प्रत्यक्ष परमेश्वराची प्रज्ञा नाही, असा आवेश आणि आत्मबल त्यांच्या व्यक्तिमत्वांत सदैव संचारले असे आध्यात्मिक चिंतनाने शेवटी आंबेडकर भगवान बुध्दाच्या चरणापाशी येऊन पोहोचले होते. बुध्दाला शरण गेल्यावाचून केवळ अस्पृश्यच नव्हेत, तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही, असा आंबेडकरांचा ठाम निश्चय झाला होता. म्हणूनच चौदा ऑक्टोबरला नागपूर येथे तीन लाख अस्पृश्यांना त्यांनी बुध्द धर्माची दीक्षा दिली, तेव्हा ‘साऱ्या भारताला मी बौध्द करीन!’ अशी गगनभेदी सिंह गर्जना केली. पुढील आठवडयात मुंबईमधल्या दहा लाख अस्पृश्यांना ते बुध्दधर्माची दीक्षा देणार होते. पण अदृष्टात काही तरी निराळेच होते. अन्यायाशी आणि जुलमाशी सबंध जन्मभर झगडून त्यांचे शरीर जर्जर झाले होते. दुर्लब झाले होते. विश्रांर्तींसाठी त्यांच्या शरीरातला कण न् कण आसूरला होता.
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Tue, 12/07/2010 - 16:27

Permalink

भगवान करूनेचा जेव्हा त्यांना

भगवान करूनेचा जेव्हा त्यांना अखेर आराम मिळाला, तेव्हा त्यांच्या अंतकरणात जळणारा वन्हि शीत झाल्या. आपल्या कोट्यवधि अनुयायांना अतां आपण उद्वाराचा मार्ग दाखवून ठेवला आहे, आता आपले अवतार कार्य संपले, अशी त्यांना जाणीव झाली. आणि निद्रामाऊलीच्या मांडीवर डोके ठेवून अत्यंत शांत आणि तृप्त मनानें त्यांनी आपली प्राणज्योति निर्वाणात कधी विलीन करून टाकली, त्यांच्या जगाला दुसरे दिवशी सकाळी ते जागे होईपर्यत गंधवार्तासुध्दा लागली नाही.’मी हिंदु धर्मात जन्माला आलो, त्याला माझा नाईलाज होता,पण ही हिंदुधर्मात कदापि मरणार नाही!’ ही आंबेडकरांची घोषणा हिंदुधर्माविरूध्द रागाची नव्हती. सूडाची नव्हती. झगडा करून असहाय्य झालेल्या विनम्र आणि श्रध्दाळू साधकाचे ते तळमळीचे उद्गार होते. आंबेडकरांचे चरित्र ही एक शूर आणि बंडखोर समाजसुधारकथा वीरकथा आहे, शोककथा आहे. गरीबांनी, दिनांनी आणि दलितांनी ही रोमहर्षक कथा वाचून स्फूर्ति घ्यावी आणि आंबेडकरांचा त्यांनी जन्मभर छळ केला आणि उपहास केला त्या प्रतिगामी राज्यकर्त्यानी आणि सनातनी हिंदूनी त्यांची ही शोककथा वाचून आता पश्चातापाने अवनतमस्तक व्हावे.आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसा जसा अधिक प्रकाश पडेल तसे तसे त्यांचे अलौकिकत्व प्रकट होईल आणि मग आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रु नसून उद्वारकर्तेच होते अशी भारताची खात्री पटेल. भारतातील जें जें म्हणून काही उज्ज्वल आणि उदात्त आहे त्यांचे आंबेडकर हे एक ज्वलंत भांडार होते. आंबेडकर हा स्वाभीमानाचा एक जळता ज्वालामुखी होता. भारताच्या ऐक्याचे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे ते महान् प्रणेते होते. महाराष्ट्र आणि मुंबई ह्यांचे नाते जे देवाने जोडले आहे. हे कोंणाच्या बापालाही तोडता येणार नाही असे ते म्हणत. बाबाचे कोण कोणते गुण आता आठवायचे आणि कोणकोणत्या उद्गारांचे स्मरण करायचे? सात कोटि अस्पश्यांच्या डोक्यावरचे जणू आभाळच कोसळले आहे! भगवान बुध्दाखेरीज त्यांचे समाधान कोण करू शकणार? आणि त्यांच्या डोळयातले अश्रू तरी कोण पुसणार? त्यांनी ध्यानात धरावें की, भारताच्या इतिहासात आंबेडकर नि त्यांचे कार्य अमर आहे! त्यांनी जो मार्ग आखला आणि तो प्रकाश दाखविला त्याच्याच अनुरोधानं जाऊन त्यांच्या कोटयावधी अनुयायानी आपला उध्दार करून घ्यावा! आंबेडकरांच्या प्रत्येक अनुयायांचे हृदय हे त्यांचे जीवंत स्मारक आहे. ---- - आचार्य अत्रे
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Tue, 12/07/2010 - 17:11

Permalink

माझे पण अभिवादन. पण शिवाजि

माझे पण अभिवादन. पण शिवाजि पार्कात येणारे लोक एव्द्ढी घाण घालतात कि आजुबाजुचा परिसर पुढिल २-३ दिवस सुध्हा प्र्दुशित अस्तो. माझी बहिण ह्या दिवसात फिरायला बाहेर्गावी निघुन जाते ति आता उद्या रात्री परत येइल.
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Tue, 12/07/2010 - 17:24

Permalink

चुचु चे काहीतरीच असते......

आपण काय घाण करत नाही का? बाकी बाबासाहेब खुप मोठ्ठे द्रष्टे नेते होते.त्यांना शतशःप्रणाम... आज एक आंबेडकरवीदी कुटुंब चैत्यभुमीत बाबासाहेबाना अभिवादन करण्यास कल्याण हुन रेल्वेने जात असता ,एका उत्तरभारतिय युवकाने जागेच्या वादातुन त्या ५ वर्षाच्या मुलीला रेल्वेतुन बाहेर फेकले.त्याबद्दल दु:ख वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Tue, 12/07/2010 - 17:26

In reply to चुचु चे काहीतरीच असते...... by वेताळ

Permalink

म्हणुन हल्ली मी बरेचदा गप्पच

म्हणुन हल्ली मी बरेचदा गप्पच अस्ते जरा काहि बोल्ले कि लगेच काहितरी बोल्ते म्हणे :(
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com