कोहम्
मी व्यक्तीशः या पृथ्वीवर का आलो? येऊन नक्की काय करायचा प्रयत्न करतोय? मी नसतो आलो इथे तर या पृथ्वीमध्ये म्हणा किंवा कोणाच्याही आयुष्यात म्हणा काय फरक पडला असता? जर आपण निमित्तमात्र आहोत आणि आपली दोरी त्या विधात्याच्या हातात आहे (आठवा तो आनंद सिनेमातला राजेश खन्ना चा प्रसिद्ध डायलॉग!) तर तुम नही तो कोई और सही असं म्हणून परमेश्वराने दुसऱ्या कोणाकडून तरी कामे करवून घेतली असती. म्हणजे थोडक्यात मदाय्राने दोरीने बांधलेल्या माकडासारखी माझी अवस्था आहे तर. असे काही बाही विचार हल्ली माझ्या डोक्यात येत असतात. कदाचित चाळीशी उलटल्याचा हा परिणाम असावा किंवा हल्ली म्हातारचळ लवकर सुरु होत असावा.