इलेक्शन मंट्ले की ओसाडवाडीत एकच चैतन्य संचारायचे, तरणीबांडं पोक्त व्हायची ,थेरडी तरुण
व्हायची ,बाया बापड्या व्हायच्या ,पाराची लोकसभा व्हायची. गावाला दर पाचवर्षांनी इलेक्शन लागायचं. मंग आख्खा गाव या एकाच
विषयाभोवती फिरायचा.
गाव तसा हजार उंबर्याचा ,टुमदार. मधोमध भैरोबाचे देवळ ,देवळाला लागूनच ग्रामपंचायतीचे हापिस. रोजच्या कामाला, शेताकडं,
तालुक्याच्या गावी जायच्या अगुदर भैरोबाला जायचा गावच्या गडी माणसांचा शिरस्ता व्हता. देवळात
आल्यासरशी शेजारी ग्रामपंचायतीची खबरबात घ्यायची हुक्की अनेकानला यायची. मागच्या पाच वर्षात सरपन्च रावसाहेब जमदाडे
पाटलाच्या कारभारावर गावकरी नाराज व्हते.