वर्षा ऋतू जीवनधारांचे सिंचन करत येतो आणि मातीच्या गर्भात असणार्या प्रत्येक बीज, कंदांना नवजीवनाचे अंकूर देतो. पावसाचे आगमन हळू हळू डोंगर, रानवाटा हिरव्यागार करत जातात. जून जुलै मध्ये रानावनातील कोवळी हिरवळ बाळसं घेत असते. साधारण ऑगस्ट पासून ह्या हिरवळीवर विविध रंगात हसरी फुले गवत, झुडपे, वेलींवर झुलताना दिसतात. ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने म्हणजे रानफुलांच्या बहराचे.
महाराष्ट्रात रानफुलांसाठी प्रसिद्ध असलेले कासचे पठारही आता फुलू लागेल.