कट्यार बद्दल खूप काही वाचून, जुनं-नावं नाटक आणि त्यातील सगळे आदळलेले संदर्भ झेलून सिनेमा बघायला गेले. गेले, ती एकाच ओढीने, की हे सुवर्णयुग बघता आलं नाही, त्याचं नवं रूप तरी पाहू. पाहिला, आवडला, पण सगळ्या चर्चा, टीका या डोक्यात पिंगा घालत होत्या. पण त्याहीपलीकडे कुठेतरी हे वाटत होतं की फक्त जुनं नाटक, नवं नाटक आणि नवीन चित्रपट यापलीकडे जाऊन कुणी याचा फार विचार करत नाहीये. माध्यम कसंही आणि काहीही असलं, तरी ही कथा अगदी क्लासिक आहे आणि त्यातूनही कलावंताला स्पर्शून जाणारा अहंकार, आणि त्या अहंकाराचा त्याच्यातील कलाकाराशी होणारा लढा ही तर अगदी भौगोलिक मर्यादा ओलांडणारी आणि कालातीत अशी गोष्ट.