Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by जयंत कुलकर्णी on गुरुवार, 07/08/2010 - 11:43
image006 Reprinted with permission from EnlightenNext magazine, © 2005 EnlightenNext, Inc. All rights reserved. www.enlightennext.org परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - १ परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - २ परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ३ परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ४ परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ५ परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ६ परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ७ परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ८ “जर मेंदूला ज्ञान देणार्‍या ज्ञानेंद्रियांची संख्या कमी केली तर त्या माणसाची ग्रहणशक्ती निश्चितच वाढेल या समजुतीने १९७० साली संशोधकांनी एक छोटी आणि साधी पध्दत शोधून काढली. एक माणूस, ज्याला आपण “पाठवणारा” म्हणूया आणि ज्याला पाठवले आहे त्याला “स्विकारणारा” म्हणूया. पाठवणार्‍याला एक प्रतिमा काही वेळ दाखवून त्याला ती प्रतिमा स्विकारणार्‍याला पाठवायला सांगितल्या गेल्या. (टेलीपाथीने). जो स्विकारणारा होता त्याची अगोदरच तयारी करून घेण्यात आली होती. दहाएक मि. त्याला बाकिच्या ज्ञानेंद्रियांपासून वंचित करण्यात आले आणि त्याला चार वेगवेगळ्या प्रतिमा दाखवण्यात आल्या. त्यातच एक जी पाठवली जाणार होती ती पण अंतर्भूत होती. जर योगायोगानेच ही प्रतिमा ओळखली जाते असे गृहीत धरले तर २५ टक्केच यश मिळाले असते. पण गेल्या तीस वर्षात हा प्रयोग तिन हजार एकशे वेळा वेगवेगळ्या प्रयोगशाळांतून करण्यात आला आणि त्यात ३२ टक्के यश मिळालेले आहे. सांख्यशास्त्राप्रमाणे ही बाब उल्लेखनीय आहे. परंतू विज्ञानाप्रमाणे हा एक लाखातला एक योगायोग असेच समजले जाईल. पण हे अनुमान एस्पिरीन ह्रदयरोगावर एक चांगले औषध आहे हे ठरवण्यासाठी जे प्रयोग करण्यात आले त्यापेक्षा चांगले आहेत. हेही लक्षात घेतले पाहिजे की परचित्तज्ञान हा या शास्त्रातला फार छोटास भाग आहे. म्हणून नुसते पुरावे गोळा करुन चालणार नाही तर या विषयावर मुलभूत संशोधन विज्ञानानीच हाती घेतले पाहिजे.” गेली तीस वर्षे रॅडीन सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत असल्यामुळे त्याच्या कडे माहितीची (डाटा) आजिबात वानवा नाही. हे सगळे मुद्दे आता कालबाह्य झाले आहेत. हे सगळे पुरावे, ज्यांना, विज्ञानशास्त्राचे नियम लावले गेलेले आहेत, त्याने हे सिध्द झाले आहे की अतिंद्रीय शक्ती अस्तित्वात आहे. पण वैज्ञानिक जगत त्याला अजून मान्यता देत नाही कारण सैध्दांतिक विश्लेषणाचा अभाव. मान्यता नाही कारण त्याचे पटण्याजोगे स्पष्टिकरण देता येत नाही. मी जेव्हा मागच्या थंडीत रॅडीनला भेटलो तेव्हा तो अजून एक पुस्तक लिहायच्या तयारीत होता. त्याचे नाव होते – एनटॅंगल्ड माईंड. या पुस्तकात त्याने काही सिध्दांत मांडायचा प्रयत्न केला आहे. त्याची अपेक्षा ही आहे की हे पुस्तक वाचल्यावर विज्ञानजगत अतिंद्रिय शक्ती तत्सम गोष्टींना शास्त्र म्हणून मान्यता देतील आणि या विषयाकडे जरा गंभीरपणे बघतील. ज्याप्रमाणे सरळ साध्या स्पष्टिकरणाचे स्त्रोत आटले की क्वांटम फिजीक्सचा आधार घेतला जातो त्या प्रमाणे रॅडीनसुध्दा त्याचा आधार घेऊ पहात आहे. तो म्हणतो “ अतिंद्रीय ज्ञानाचे गूढ हे पदार्थ्विज्ञानाचे गूढ आहे. प्रश्न फार सोपा आहे. तुमच्या मेंदूत काहितरी आहे जे तुमच्या नेहमीच्या ज्ञानेंद्रियातून गेलेले नाही. पण काळ आणि अवकाशाच्या सीमा त्याने गूढरित्या ओलांडलेल्या आहेत. हे जीवशास्त्र नाही, हे मानसशास्त्र नाही आणि चेताशास्त्रही नाही” क्वांटम एनटॅंगलमेंट्च्या धर्तीवर त्याने “बायो एनटॅंगल्मेंट” असू शकेल का ? असा प्रश्न विचारला आहे. एनटॅंगलमेंट हा क्वांटम फिजीक्समधला एक अत्यंत विस्मयजनक सिध्दांत आहे. (या सिध्दांताप्रमाणे कुठलेही दोन क्वांटम कण, अणू असुदेत किंवा प्रकाशाचे रेणू असूदेत, एकामेकांना असे जोडता येतात, किंवा असे जोडलेले असतात की तुम्ही त्यांना कितीही अंतराने वेगळे केले तरीही एकात थोडा जरी बदल केला तरी दुसर्‍यात तो बदल ताबडतोब होतो. किती ताबडतोब ?तर प्रकाशाच्या वेगापेक्षाही अगोदर.) जगप्रसिध्द पदार्थवैज्ञानिक श्री. श्राडिंजर यांनी याविषयी आपले मत मांडले १९३७ साली. परंतू याचे अस्तित्व सिध्द व्हायला १९८० साल उजाडावे लागले. गंमत म्हणजे क्वांटम मेकॅनिक्सचे जनक श्री. आइनस्टाईन याच्या पूर्णपणे विरोधात होते. १९७२ सालात मानवाला याचा पहिला अनुभव आला आणि त्यानंतर रॅडीनच्या म्हणण्यानुसार “याची नवनवीन उदाहरणे आता सापडत आहेत. या सगळ्याचा आपण ज्या जगात आहोत ते समजून घेण्यावर काही परिणाम होईल का ? मला वाटते जर एनटॅंगल्ड होण्यासाठी दोन वस्तूमधे जर फक्त त्यांच्या इतिहासात कधीतरी संपर्क झाला असला पाहिजे हीच अट असेल तर सगळे विश्वच एनटॅंगल्ड आहे असे म्हणावे लागेल. कारण खगोलशास्त्रज्ञ आपल्याला नेहमीच सांगतात की या विश्वाचा उगम एकाच वेळी आणि एकाच स्फोटातून झाला आहे.” ( तसे जर असेल तर शनीची जागा बदलल्यावर आपल्यातील काही अणू जागा बदलत असतील का ? :-) ). सुक्ष्म जगातून बाहेर पडून नेहमीच्या जगात या सिध्दांताचा उपयोग अनेक गोष्टींचे स्पष्टिकरण देण्यासाठी करता येईल हे वैज्ञानिक अजूनही मानायला तयार नाहीत हे आपले दुर्दैव आहे.” पण रॅडीनच्या म्हणण्यानुसार बायोएन्टॅगलमेंट वर जर खरंच आभ्यास झाला तर अतिंद्रीय अनुभवांचे स्पष्टिकरण संशोधकांना निश्चितच देता येईल ( जे भौतिकशास्त्राने देता येत नाही). जर मेंदू क्वांटम कणांप्रमाणे वागत असतील तर ते एनटॅंगल पण होऊ शकतात. “कशाशीही किंवा सगळ्याशी” हे जर आपण एकदा मान्य केले तर टोकाला जाऊन असेही म्हणता येईल की एक मेंदू दुसर्‍या मेंदूला माहिती पाठवतो असे म्हणण्याऐवजी आपण असे म्हणू शकतो की मेंदू आपले लक्ष स्वत:कडेच असलेल्या माहितीवर केंद्रित करतो. थोडक्यात थोडासा अतिशोयक्तीचा भाग सोडल्यास आपण असेही म्हणू शकतो की आपला मेंदू सगळ्याशी एकरूप आहे तर दुसर्‍याच्या मनात काय चाललेले आहे किंवा त्या पलिकडे काय चाललेले आहे याची माहिती आपल्या मेंदूत अगोदरच असणार. आपण फक्त आपल्या मेंदूला त्या माहितीकडे लक्ष द्यायला शिकवले पाहिजे.” भौतिकवाद्यां विरूध्द या लढाईत रॅडीन आणि शेल्ड्रेक आता एकाकी नाहीत. गेल्या काही वर्षात तत्वज्ञानी, धर्मशास्त्र जाणणारे पंडीत, विश्वाचा अभ्यास करणारे आणि विज्ञानाच्या मुख्य प्रवाहात असणारे काही शास्त्रज्ञ यांचाही त्यांना पाठिंबा मिळतोय. याचा सगळ्यात मोठा फायदा असा झालाय की मेंदू आणि शरीर या संबंधी नवनवीन, वेगवेगळे सिध्दांत मांडले जाऊ लागलेत. तत्वज्ञानाच्या दृष्टीकोनातून विचार केला तर भौतिकवाद आणि शरीर-मन संबंधाविषयी सध्या सगळ्यात आवडती कल्पना आहे “पॅनसायकीझम”ची. तशी ही जुनीच कल्पना आहे पण सध्या विचारल्या जाणार्‍या बर्‍याच प्रश्नांची उत्तरे यात मिळू शकतात म्हणून हा सिध्दांत लोकप्रिय झाला आहे. “पॅनसायकिझम” म्हणजे काय हे थोडक्यात सांगायचा प्रयत्न केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. पॅनसायकिझम” मधे सांख्यवादाशिवाय दुसरे काही नाही. या सिध्दांतामधे असे मानण्यात येते की सर्व भौतिक वस्तू, हे जगसुध्दा, एक चैतन्य असलेला जीव आहे. त्याला वैश्विक बुध्दी, वैश्विक मन आहे तर त्याच्यात वैश्विक स्थूल तसेच सुक्ष्म भुते आहेत. सर्व वस्तू या जिवंत असतात, त्यांच्यात प्राण असतो. याचा अर्थ असा नाही की या तत्वानुसार सर्व जडद्रव्यात चैतन्य असते आणि त्यात प्राण असतो. त्यांना एवढेच म्हणायचे असते की जड द्रव्याचा काही भाग मात्र चैतन्ययुक्त असतो. या सिध्दांतानुसार आपण शरीर/मन यांचे गूढ उकलण्यासाठी आपण हे मान्य करतो की हे विश्वाच्या अनेक गुणधर्मापैकी चैतन्य आणि अनुभव हे मुलभूत गुणधर्म आहेत आणि ते या विश्वात कोठेही कुठल्या ना कुठल्या स्वरूपात असतातच अगदी अणूरेणूमधेसुध्दा ! त्यांच्या मते हे चैतन्य मेंदूत कसे येते हे शोधून काढायची गरज नसते कारण ते सर्व विश्वात त्याच्या जन्मापासूनच असते. म्हणजे माळरानावरील दगडे आपापसात सुखदु:खाच्या गोष्टी का नाही करणार, असा प्रश्न तुम्ही विचारू शकाल, पण एक लक्षात घेतले पाहिजे की त्यांचे चैतन्य आणि आपले चैतन्य यामधे फरक आहे. अर्थात काही संशोधक याचा उपयोग करून भविष्यात चैतन्यमय यंत्रे असतील असा दावा करतात, त्या कडे आत्ताच एवढे गंभीरपणे बघायची आवश्यकता मला वाटत नाही. मला वाटते तसल्या यंत्रा अगोदर चैतन्य असलेला संगणक तयार होईल. असो. “रिडक्शनीझम” (याचा अर्थ आपण मागे बघितलेला आहे) ला उत्तर म्हणून आधुनिक शास्त्र “इमर्जन्स” कडे बघत आहे. आता आपण याचा अर्थ थोडक्यात बघूया. एखादी वस्तू अनेक घटकांची बनलेली असते. या सर्व घटकांचे मूळ गुणधर्म असतात त्यापासूनच ही नवीन वस्तू बनलेली असते, पण त्या नवीन वस्तूमधे त्या घटकांच्या गुणधर्मापेक्षाही अधिक काहितरी असते. उदा. असे म्हटले जाते की चैतन्य हे मेंदूचा, त्यातून उदय झालेला गुणधर्म आहे. गुंतागुंतीच्या व्यवस्थेचे स्पष्टिकरण देताना “इमर्जन्स”चा वापर केला जातो आणि मेंदू ही एक अत्यंत गुंतागुंतीची व्यवस्था (system) आहे हे आपण जाणतोच. त्यामुळे या संकल्पनेचा वापर संशोधकानी केला नसेल तर नवलच. थोडक्यात सांगायचे म्हणजे खालच्या पातळीवरच्या घडामोडी वरच्या पातळीवरच्या अतर्क्य घडामोडींना उदय देतात आणि त्या घटनांचा उगम त्या खालच्या पातलीवरच्या घडामोडीत आहे असे आपण सिध्द करू शकत नाही. उदा. ऑक्सीजन ओला नसतो आणि हायड्रोजनही ओला नसतो पण त्यापासून तयार होणारा पदार्थ – पाणी मात्र ओले असते. त्याच प्रमाणे मनाचे जे गूणधर्म, उदा. विचार करणे, इच्छाशक्ती, निर्णयक्षमता, भावना इ. आपल्याला मज्जातंतूच्या गुणधर्मात सापडत नाहीत. या संकल्पनेचे विशेष असे आहे की ती मनाचे मूळ हे जीवशास्त्रीय आहे हे नाकारत नाही पण त्याच्याही पलिकडच्या काही अनुभवांचा ती पाठराखण करते. माणसाच्या अतर्क्य अनुभवांना आता काही भौतिकशास्त्राच्या वैज्ञानिकांचाही पाठिंबा मिळत आहे. प्रसिध्द तत्वज्ञानी जॉन सर्ल म्हणतात ते फार महत्वाचे आहे. “चैतन्याच्या गुणधर्माची फोड आपण करू शकत नाही याचे कारण ते शब्दातीत किंवा गूढ आहे म्हनून नाही तर तो एक वैयक्तिक अनुभवच असू शकतो. विज्ञानाने आणि तत्वज्ञानाने एक फार मोठी चूक केली आहे ती म्हणजे ते म्हणतात, जर तुम्ही द्वैतवाद नाकारला तर तुम्हाला भौतिकवाद स्विकारावा लागेल किंवा भौतिकवाद नाकारला तर द्वैतवाद स्विकारावा लागेल. हे असेच असायचे सध्या काहिच कारण नाही. कारण या दोन्हीमधेच भरपूर गोंधळ आहे तो आधी निस्तरला पाहिजे.” “इमर्जन्स आणि पॅनसायकीस्ट” वाल्यांचे असे म्हणणे आहे की जर भौतिकवाद्यांना माणसांच्या सगळ्या अनुभवांचे स्पष्टीकरण देता येत नसेल तर त्यांना या अभ्यासातून वगळले तरी चालेल. त्यांना अर्थात या अभ्यासाचा भाग म्हणून मान्यता मिळेल पण त्यांच्या ठराविक पठडीतील सिद्धांत आणि मते यांना आता कितपत मान्यता मिळेल याची शंकाच आहे. आता असा काहितरी सिध्दांत मांडायला पाहिजे की आंतरिक अनुभवाचे विश्व आणि भौतिक विश्व यांच्यातील अनुभवांची सत्यता दोन्ही विश्वात सिध्द करता येईल. अवघड आहे ते ! प्रसिध्द विश्वघटनाशास्त्रज्ञ श्री. जॉर्ज एलीस म्हणतात “सर्व शास्त्रातील मुलतत्ववादी एक मोठी चूक करतात ती म्हणजे एखद्या गोष्टीचा कार्यकारणभाव समजावून सांगताना ते एखाद्या छोट्या कारणाला त्या घटनेचे संपूर्ण कारण म्हणून पुढे करतात. तेथे न्युरॉन्स आहेत हे कोणीच नाकारत नाहीत. पण मेंदूच्या कार्याचे ते एक अत्यंत छोटे कारण आहे. या शास्त्रज्ञांना वरच्या पातळीवरून खाली बघण्याचा अनुभव नाही. खरंतर तेच जीवनाला खरा अर्थ प्राप्त करून देते. आता तुम्ही खालच्याच पातळीवरून वर काय चालले आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न केलात तर तो अर्थ तुम्हाला कधीच कळणार नाही. उदा. एखादे उडणारे विमान घ्या. खालून त्याच्याकडे बघताना, ते का उडते आहे या प्रश्नाचे उत्तर फार सोपे आहे. त्या विमानाच्या पंखावर हवेचे कण खालून आदळतात आणि त्याच्या वरती असणार्‍या हवेचा वेग हा त्याच्या वेगापेक्षा कमी असतो, म्हणून विमान उडते. विमानाच्या वरच्या पातळीवरून हाच प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर येईल की कोणीतरी ते विमान उडण्यासाठी तयार केले आहे, त्यासाठी अनेक शास्त्रांच्या नियमांचा उपयोग करण्यात आलेला आहे, संगणकाचा वापर केलेला आहे. विमानाच्याच पातळीवरून ह प्रश्न विचारला तर उत्तर येईल की ते विमान उडते आहे याचे कारण एक वैमानिक ते उडवतोय. आता चेताशास्त्रज्ञ वरच्या पातळीवरचे आणि त्याच पातळीवरचे विचार करत नाहीत. (Level) ते म्हणतील त्या वैमानिकांच्या काही न्युरॉन्सच्या कार्यामुळे त्या विमानाला उडवता येत आहे. पण ते हे विसरतात की त्याने लहानपणीच वैमानिक व्हायचे ठरवले होते, त्यासाठी त्याने कष्ट काढलेले आहे.इ.इ.... एकाच पातळीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे ते दुसर्‍या पातळीवर लक्ष देत नाहीत. या असल्या सिध्दांतांची आता मुळीच वानवा नाही पण पश्चिमेने भौतिकशास्त्राच्या बाजूने जो पक्षपातीपणा चालवला आहे त्यामुळे हे सिध्दांत मागे पडत आहेत. अमेरिकी तत्वज्ञानी थॉमस कून म्हणतो “ लवकरच आपल्याला या सगळ्याकडे बघण्याच्या दृष्टीकोनात मुलभूत फरक करावा लागेल हे स्पष्ट आहे.” विज्ञान जर मन/शरीर या जोडीचे गूढ उलगडू शकला नाही तर त्याची उपयुक्तता अंतिमत: संपेल का ? हाही एक महत्वाचा प्रश्न आहेच. का न्युरोसायन्स मेंदू/शरीर यांच्यातले गूढ उकलेल आणि ज्यावर हा समजुतींचा डोलारा उभा आहे तो धडाधडा कोसळेल ? हा खरा अवघड प्रश्न आहे ! भाग ९ समाप्त. जयंत कुलकर्णी. भाग १० हा शेवटचा भाग असेल.
  • Log in or register to post comments
  • 3812 views

Book traversal links for परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - ९

  • ‹ परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - ८
  • Up
  • परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - १० या इथे ही लेखमाला संपवत आहे. ›

प्रतिक्रिया

Submitted by प्रकाश घाटपांडे on गुरुवार, 04/07/2011 - 19:35

Permalink

मेंदु

मेंदु म्हंजी साला केमिकल लोच्याच हाये! अनुभुती हा प्रांतच काही और आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 04/07/2011 - 20:39

In reply to मेंदु by प्रकाश घाटपांडे

Permalink

असेच म्हणतो

मेंदु म्हंजी साला केमिकल लोच्याच हाये! अनुभुती हा प्रांतच काही और आहे. सहमत आहे. कुलकर्णी साहेब, लेखमालिकेतील लेखांची ’प्रिंट’ काढून सर्व लेखन निवांत क्षणी अगदी मन लावून वाचावे लागेल. संग्रही ठेवावी अशी लेखमाला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Fri, 04/08/2011 - 10:30

In reply to असेच म्हणतो by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

सहमत!

मेंदु म्हंजी साला केमिकल लोच्याच हाये! अनुभुती हा प्रांतच काही और आहे. केवळ फोलिस आफिसर आणि प्रोफेश्वर यांच्या पंगतीत बसायचं म्हणून हा अभिप्राय दिला आहे...... बाकी आमच्या मेंदूला परमेश्वर काय आणि सैतान काय, सगळे सारखेच!!!!! आयला, गरिबाला कसला परमेश्वर?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Fri, 04/08/2011 - 08:55

Permalink

अनुभुती

(विशेष करुन उन्हाळ्यात) भुभु चे गार गार ओले नाक मला कपाळाला लावल्यावर लाविली थंड उटी वाळ्याची सखीच्या कुचकलशा ती अशी अनुभुती येते.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com