घरी वायफाय सुरू झाल्यापासून गच्चीत जाणं कमी झालंय. दुपारी तासन् तास गच्चीत पिलरच्या आडोशाला बसून गाणी ऐकावी, पुस्तकं संपवावीत, आणि सगळ्याचा कंटाळा आला की लहान मुलासारखं कल्पनाविश्वात रममाण व्हावं असा नित्याचा क्रम असायचा. तहान-भूक लागली, लघवी-परसाकडण्याची घाई आली, तरी तिथून पाय निघत नसे. घरून फोन यायचा, 'जेवलायेस का? ये खाली.' दहा मिनिटांत येतो सांगून आणखी अर्धा तास काढायचो.
उन्हं मवाळ झाली की वर टाकीवर जाऊन बसावं. समोर नॅशनल पार्काच्या डोंगररांगांवरच्या ऊनामुळे बदलणा-या हिरव्या छटांची तुलना करत बसावी. कावळ्यांची शाळा भरते असं म्हणवत नाही.