अ सेपरेशन – इराणी घटस्फोट की इराणपासून घटस्फोट?
गेल्या काही वर्षांत अहमदीनेजादच्या अधिपत्याखाली इराण हा आपल्या सर्वसामान्य नागरिकांवर अधिकाधिक बळजबरी करू लागला आहे. सरकारला विरोध केला म्हणून जाफर पनाहीसारख्या जगविख्यात दिग्दर्शकाला सहा वर्षं कैद आणि २० वर्षं चित्रपट बनवायला आणि देशाबाहेर जायला बंदी अशी शिक्षा भोगायला लागते आहे. नागरिकांच्या सर्व प्रकारच्या अभिव्यक्तीवर सरकारची कडक नजर आहे. अर्थात, चित्रपटासारख्या माध्यमावर कडक सेन्सॉरशिप आहे. अशा परिस्थितीत जर व्यवस्थेवर टीका करायची असेल तर ती कशी करता येईल? असगर फरहादी या दिग्दर्शकानं त्याच्या ‘अ सेपरेशन’ या चित्रपटात यावर एक अनोखा उपाय शोधला आहे. या चित्रपटाला नुकतंच बर्लिनमध्ये ‘गोल्डन बेअर’ पारितोषिक मिळालं. इतकंच नाही, तर ‘सर्वोत्कृष्ट परकीय चित्रपट’ म्हणून इराण सरकारनं या वर्षी ऑस्करसाठी याचं नाव सुचवलं आहे. असगर फरहादीला हे कसं जमलं याचा शोध घेता घेता चित्रपटात कथेपलीकडे जाऊन आपल्याला हवं ते सूचक पद्धतीनं कसं मांडता येतं, याचाही धडा कदाचित घेता येईल.
नादिर आणि सिमीन या मध्यमवर्गीय आणि मध्यमवयीन जोडप्याच्या घटस्फोटाची गोष्ट असं वरवर पाहता चित्रपटाचं स्वरूप आहे, पण प्रकरण दिसतंय तितकं सरळसोट नाही याची जाणीव सुरुवातीपासूनच होते. नादिर, सिमीन आणि त्यांची शाळेत जाणारी मुलगी यांना परदेशात जाण्यासाठी व्हिसा मिळालेला आहे, पण नादिर आपल्या आजारी वडलांना मायदेशी एकटं सोडून परदेशी जायला तयार नाही. त्याच्या या आडमुठेपणापायी माझ्या मुलीचं भवितव्य बरबाद होईल म्हणून मला त्याच्यापासून घटस्फोट हवा आहे असं सिमीन समुपदेशकाला सांगते. मुलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी परदेशात जायची काही गरज नाही; हे काही घटस्फोटासाठी पुरेसं कारण होऊ शकत नाही; नवरा तुला मारहाण वगैरे करत असता तर गोष्ट वेगळी, असं सांगून घटस्फोट नाकारला जातो.
परदेशात म्हणजे कुठे याचा उल्लेख होत नाही, पण पाश्चिमात्य देश हे त्यात गृहित असावं. म्हणजे नवऱ्याला इराणमध्ये राहायचंय तर बायकोला पश्चिमेकडे जायचंय. त्यात इराण न सोडण्याचं कारण जे आहेत, त्या नादिरच्या म्हाताऱ्या वडलांना अल्झायमर्स झालेला आहे. त्यामुळे ते आपला मुलगा, सून, नात यांनासुद्धा ओळखू शकत नाहीत. हा म्हातारा चित्रपटभर पार्श्वभूमीवर असतो. पितृसत्ताक राजवटीचं प्रतीक म्हणूनच जणू तो आहे. त्याचं चित्रण दुष्ट किंवा त्रासदायक म्हणून मात्र केलेलं नाही. आपल्याच अभिमानास्पद भूतकाळाचं विस्मरण झालेला, ऱ्हासाकडे अपरिहार्य प्रवास सुरू झालेला हा म्हातारा अतिशय करुण वाटतो. चित्रपटात एका टप्प्यावर त्याचं बोलणंही बंद होतं. देश सोडून जाणं आणि म्हाताऱ्याला सोडून जाणं याची आपोआप एक घट्ट, सुसंगत वीण घातली जाते.
कोणत्याही कारणानं का होईना, पण देश सोडून जाणाऱ्या माणसाला सहसा आपल्या देशाबद्दल घृणा वाटत नसते; उलट प्रेमच वाटतं. नवरा वडलांना सोडून येत नसला तरी सिमीनला आपल्या सासऱ्याविषयी चीड वाटत नाही; उलट त्याची काळजी वाटते. इतके दिवस ती त्याची शुश्रूषा करत असते. आता मात्र ती घर सोडण्याचा निर्णय घेते. नादिर दिवसभर कामानिमित्त बाहेर असणार म्हणून ती सासऱ्याची काळजी घ्यायला एक बाई आणून देते. म्हाताऱ्याला सिमीन ओळखू येत नाही तरी आपली शुश्रूषा करणारी ही बाई पाहताच तो तिला सिमीन समजतो.
इथे चित्रपट वेगळं आणि महत्त्वाचं वळण घेतो. आतापर्यंत आपण एक सुखवस्तू, सुशिक्षित इराणी कुटुंब पाहत असतो. आता वडलांची शुश्रूषा करायला आलेली रझिया ही एक गरीब, धार्मिक बाई असते. तिला आधीची एक लहान मुलगी असते, शिवाय ती गरोदर असते. तिच्या धार्मिकतेची आपल्याला लगेच चुणूक मिळते. म्हातारा आपली सलवार ओली करतो. परपुरुषाला स्पर्श करून त्याला कपडे बदलायला मदत करणं गरजेचं आहे खरं, पण ते पाप होईल का अशी रझियाला भीतीही आहे. मग ती फोनवर धार्मिक सल्ला घेते. जर मदत करू शकेल असं इतर कुणीही नसेल, तर यात पाप नाही असं तिला सांगितलं जातं. रझिया कुणी क्रूर धर्मांध बाई नाही. तिला आपलं परिस्थितीजन्य कर्तव्य कळतं, पण धर्माची भीतीही वाटते, हे इथे स्पष्ट आहे. माणुसकी आणि धर्म या तिढ्यात अडकलेली रझिया आपल्या परिस्थितीची शिकार आहे. एकटी असली तरीही तिचा देव तिला मोकळं सोडत नाही.
मग रझियाच्या नवऱ्याचं कथानकात आगमन होतं. रझियाचा नवरा होज्जत आणि नादिर यांच्यातला सामाजिक दर्जाचा फरक उघड आहे. होज्जत भडक डोक्याचा आहे; नादिर थंड डोक्याचा आहे. होज्जत पटकन हमरीतुमरीवर येतो, तर नादिर शांत असला तरीही सिमीनला त्याच्या हट्टीपणाचा व्हायचा तो त्रास होतच असतो. सिमीन, तिची मुलगी तरमेह आणि रझिया यांच्यातही शिक्षण, धर्माचा पगडा अशा अनेक बाबींमध्ये फरक आहे. रझिया पूर्ण अंग झाकणारा बुरखा घेते, तर सिमीन जीन्ससारख्या आधुनिक पोशाख घालते आणि फक्त स्कार्फनं डोकं झाकते (तसा कायदा नसता तर कदाचित तिनं डोकंदेखील झाकलं नसतं.) असा फरक असला तरीही पितृसत्ताक पद्धतीत त्या सर्व स्त्रियांचं काय होतं यात साम्य आहे. मग सिमीनला हा देश आणि इथल्या वातावरणात आपली मुलगी कशी वाढेल याची काळजी का वाटते, याचा अंदाज येऊ लागतो. शाळेत जाणारी तरमेह दिसते, तशीच रझियाची लहान मुलगीही आपल्याला दिसत असते. आईबरोबर दिवसभर लोकांच्या घरी राहणाऱ्या मुलीचं शिक्षण कसं होणार? तिचं भविष्य कसं असेल, याविषयी प्रेक्षकांना प्रश्न पडतील अशीच पात्रांची आणि प्रसंगांची रचना आहे.
कथानक अधिक सांगून रसभंग करत नाही, पण रझियाच्या पोटातल्या बाळाचा जीव आणि म्हाताऱ्याचा जीव यांच्यात, म्हणजे एकीकडे समृद्ध भूतकाळ आणि त्याविषयी वाटणारी आत्मीयता, तर दुसरीकडे अनिश्चित भविष्याविषयीची काळजी यांच्यात एक तिढा आहे. धर्माचं ओझं आणि त्यातून येणारी पाप-पुण्याची संकल्पना आणि नैतिक जबाबदारी असाही एक तिढा आहे. धार्मिक असणारी रझिया एका कळीच्या प्रसंगात अनैतिक वागणं सोपं आणि सोयीचं असताना तसं वागत नाही, त्यामुळे धर्म हा यात खलनायक नाही. पुरुष आणि स्त्रिया असा तिढा आहेच, पण त्यातही खलनायक पुरुष आणि परिस्थितीनं गांजलेल्या बायका असं सरळसोट चित्रण नाही. शिवाय उच्चशिक्षित, आधुनिक मध्यमवर्ग आणि कनिष्ठ सामाजिक स्तर यांतही संघर्ष आहे, पण त्यातही दोन्ही स्तरातली माणसं चुकतात, खोटं बोलतात, तशीच प्रसंगी चांगलंही वागतात. म्हणून हा चित्रपट प्रचारकी होत नाही. उलट यातले प्रसंग हाडामांसाच्या माणसांच्या आयुष्यातले खरे कसोटीचे प्रसंग वाटू शकतात आणि त्यांद्वारे अखेर एका देशातल्या व्यामिश्र वास्तवाचा पट उभा होतो. कुटुंब, धर्म, पितृसत्ताक पद्धती अशा अनेक सामाजिक संस्थांचा माणसांच्या व्यक्तिगत आयुष्यावर किती खोल परिणाम होतो आणि यांपासून स्वातंत्र्य मिळवणं किती कठीण आहे, हे पदोपदी जाणवत राहतं.
चित्रपटातला आशेचा किरण हा मुख्यत: पुढच्या पिढीकडून येतो. सर्व तिढे पाहातपाहात हळूहळू आपल्या डोळ्यांदेखत तरमेह प्रगल्भ होत जाते. सध्याच्या सरकारविरोधी गटातदेखील मोठ्या प्रमाणात तरुणतरुणी आहेत हे इथे लक्षात घेतलं, तर चित्रपट व्यक्तिगत गोष्टी दाखवत दाखवत त्यांतूनच राजकीय भान बाळगणारी एक सूचक चिन्हव्यवस्था कशी उभी करतो आणि ती क्रांतिकारक कशी आहे, हे लक्षात येईल. हेच कदाचित आजच्या अंदाधुंदीतल्या इराणच्या प्रगल्भ भविष्याचं आश्वासक चिन्ह आहे.
मध्यपूर्व म्हणजे मागास आणि आपण म्हणजे महासत्ता असं चित्र रंगवण्याकडे आपल्याकडच्या काही लोकांचा आजकाल कल दिसतो. त्यांच्यासारखे प्रगल्भ चित्रपट आपण का बनवू शकत नाही, असा प्रश्न आपल्याला विचारून पाहिला तर ते कदाचित आपल्या अधिक हिताचं आणि विधायक होईल.वर्गीकरण
प्रतिक्रिया
उत्तम
+१
आवडले परीक्षण
परीक्षण आवडले
मी डाऊनलोड केला, पण पासवर्डशी
इराणी चित्रपटाचा विशय निघूनही
पुणेरी इराणी !!!!
चित्रपट परिचय आवडला...
उत्तम !!!
छान
शेवटच्या परिच्छेदाविषयी
सहमत
>>इराण व इतर मध्यपूर्व
सुंदर
छान परीक्षण. हासुद्धा यादीत
सुरेख, समतोल परिचय
विवेचन चांगलं
छान
प्रतिसाद
- नुरी बिल्ज सेलान (तुर्कस्तान)
- फतेह अकीन (तुर्कस्तान-जर्मनी)
- एलिया सुलेमान (पॅलेस्टाईन)
- आनमारी यासिर (पॅलेस्टाईन)
- हिनीर सलीम (कुर्द-इराक)
- बहमान घोबाडी (कुर्द-इराण)
- अतिक राहिमी (अफगाण-फ्रान्स) - (याची गंमत म्हणजे हा उत्तम चित्रपट दिग्दर्शकही आहे आणि लेखकही. 'गोन्कूर' हा फ्रान्सचा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार याला मिळालेला आहे.)
- अमोस गिताई (इस्राईल)*
- युसुफ सेदार (इस्राईल)
- एरन कोलीरीन (इस्राईल)
- रशीद बुखारेब (अल्जेरीआ)
- राबा आमिर झेमेश (अल्जेरीआ)
- यामिना बशीर शुईख (अल्जेरीआ)
- जोआना हाजी थॉमस (लेबनॉन)
- खलील जोरेगे (लेबनॉन)
- लैला माराकेशी (मोरोक्को)
- फौझी बेन सायेदी (मोरोक्को)
- ओसामा मोहम्मद (सिरीआ)
* इस्राईली सिनेमा उत्तम आहे, पण इस्राईलसारखा देश सांस्कृतिकदृष्ट्या युरोपच्या खूप जवळ आहे म्हणून मध्यपूर्वेत गणता येईलच असं नाही. तरीही संवेदनांच्या पातळीवर इस्राईलचं मध्यपूर्वेशी असलेलं अतूट नातं अनेक चित्रपटांत दिसतं हेही खरं. या तुलनेत भारतीय सिनेमा कुठे आहे असा विचार केला, तर परिस्थिती खूप लाजिरवाणी आहे हे उघड व्हावं. मुंबई-पुण्याचे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हे काही कान वगैरेंच्या दर्जाचे नसतात; तरीही इथे स्पर्धात्मक विभागासाठी येणारे मध्यपूर्वेतले चित्रपट पाहता त्या दर्जाचे भारतीय चित्रपट फारसे बनत नाहीत हे दरवर्षी पदोपदी दिसत (आणि खुपत) राहतं. दरवर्षी भारतात एकूण किती सिनेमे बनतात त्या तुलनेत हे पाहिलं तर ते अधिकच खुपतं. हे आपलं दाहक वास्तव आहे.इराणी चित्रपट....
वा
(+१)
सेन्सॉरशिप आणि सूचकता
यादी वाढतेच आहे.
छान
कॅम्पफायर
प्रामाणिक शंका
कन्सिस्टन्सी
कन्सिस्टंसी
उत्तम
उत्तम परीक्षण जंतुबुवा!
ऑस्कर पारितोषिक
डाउन लोड...
सुंदर चित्रपट
या चित्रपटाची कथा यावर्षीच्या
'नेटफ्लिक्स'वर कालच 'द
हा सिनेमा पहायला हवा.