महाराष्ट्र दर्शन - भाग २/ "दौलताबाद"

स्पा's picture
स्पा in जनातलं, मनातलं
18 Nov 2010 - 12:57 pm

भाग १ दुवा,

अंबाजोगैहून २ वाजता निघालो खरे, पण मोठा प्रॉब्लेम झाला , त्यादिवशी private गाड्या दिसतंच नव्हत्या,जादा गाडी ४ ची होती,म्हणजे जर ती गाडी पकडली असती तर पोहोचे पर्यंत ११-१२ वाजले असते. मग काय २.१५ च्या "लाल डब्यात" कसे बसे चढलो ( तिथेच माती खाल्ली).
ती बस already खच्चून भरलेली होती.... सुरु झाल्यावर कळलं , कि आपल्याला औरंगाबादच्या तिकिटात , Essel world ची सफर सुद्धा फुकटात लाभणार आहे.....खिळखिळेपणाचा कळस होती ती बस.... एवढ्या टिनपाट डब्यात पहिल्यांदाच बसलो होतो. पहिल्या १० मिनटातच सगळी हाडं ढिली झाली...
त्यात बसायला जागा नवती... पाऊस सुद्धा तोंड घेऊन पळालेला......डबा दुपारच्या रणरणत्या उन्हात चांगलाच तापलेला... अश्या परीस्थित अजून ६ तास काढायचेत या कल्पनेनेच भोवळ यायला लागली..... मास्तर एकदम मजेत होता... दर ५ मिनिटांनी सांगायचा "अहो फक्त २ तास उभे राहा बीड ला बसायला मिळेल तुम्हाला"........ पण देवाच्या कृपेने त्या आधीच शेवटच्या "शिटेवर" अस्मादिक्काना बसायला मिळाले..... हुश्श.................
रात्री पोहोचायला १०.३० वाजलेच तरी ....सुदैवाने औरंगाबादेद हाटेल झकास आहेत.... मस्त जेवून झोपून गेलो ...सकाळी ९.३० MTDC ची बस होती.. त्यामुळे आमच्या डोक्याला ताप नव्हता.. ते दाखवतील ते फक्त बघायचे बास्स... :) बरेच "गोरे" लोक सुद्धा होते... माझ्या बाजूच्या सीट वर दोघे "angry young man " बसलेले. बस निघाली, पहिलं ठिकाण होतं "दौलताबाद चा कणखर किल्ला" बरंच ऐकून होतो, आज प्रत्यक्ष बघायला मिळणार म्हणून मन अधीर झालं होतं.... त्या "गोरयांशी " पण एव्हाना गप्पा टप्पा चालू झाल्या होत्या... आणि आला एकदाचा देवगिरी....... आपल्या सह्याद्रीच्या किल्ल्यांपेक्षा एकदम वेगळ्या धाटणीचा

एव्हांना आमचा "गाईड" पेटला होता.. फुल टू जोश में तो सगळं वर्णन सांगत होता... (आता माझ्या सगळं काही लक्षात नाही, जाणकारांनी प्रकाश टाकावा) तर .. दौलताबाद हा भारतातील अतिशय मजबूत किल्ल्यांपैकी एक आहे ..१३२७ मध्ये "मोहम्मद तुघलक" याने हा किल्ला बांधला.आपल्या सह्याद्रीच्या किल्ल्यांसारखा हा एकदम उंचावर बांधलेला नाहीये, संपूर्ण पणे मुघली प्रभाव आहे याच्या बांधकामावर... चांद मिनार, किल्ल्याभोवती २.५ km व्यासाचे पाण्याचे खंदक, आणि किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पार करावा लागणारा "भूलभुलैया"हि याची खास वैशिष्ठे.

किल्ल्याभोवती अजस्त्र तटबंदी आहे..............

किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर .. बहुतेक हे बाझार भरण्याचे ठिकाण असावे

माझी फोटूग्राफी

महाद्वार

महाद्वारातून आत गेल्यावर एक मस्त मोठे पटांगण लागते....
बहुदा राजकीय सभा होत असाव्यात त्या काळी तेथे.......

आता तिकडे एक "भारत मातेचे" देऊळ बांधले आहे.....
तिथून उजवीकडे बाहेर पडल्यावर आपण "सुप्रसिद्ध चांद मिनार" पाशी पोहोचतो ...
याची उंची साधारण ३ ते ४ मजले, इतकी आहे ... वर जाण्यासाठी आतून पायऱ्या सुद्धा आहेत,
पण सुरक्षिततेच्या कारणासाठी हल्ली वर जाऊ देत नाहीत

काही कलाकृती ....

ह्या किल्ल्याचा नकाशा , भिंती आणि प्रवेशद्वाराची रचना अशी योजनाबद्ध
रीतीने करण्यात आलेली आहे की , शत्रूच्या हल्ल्यापासून किल्ला सुरक्षित
राखता येईल असे वळणा-वळणाचे अरुंद रस्ते शत्रुसैन्याच्या सहज प्रवेशाला
थोपवून धरतात. तर उंच , उंच भिंती किल्लेबंदी करणा-या उरतात. संपूर्ण
किल्ला चहूकडून जलमय कालव्यांनी वेढलेला आहे. किल्ल्याची उंची
गाठण्यासाठी डोंगर पोखरुन तयार करण्यात आलेल्या दूर्गम , अतिसुरक्षित असे
अंधारे बोगदे ओलांडावे लागतात. किल्ल्याच्या या रचनेमुळे लक्षात येते
की , शत्रुची दिशाभुल करण्यासाठी आणि त्याला फसवण्यासाठी अशी रचना केलेली
असावी.

तिथून पुढे आपण खंदकापाशी येऊन थांबतो....
या पाण्यात पूर्वी विषारी पाणसाप, अजस्त्र मगरी तसेच सुसरी असत ...

खंदकातून किल्ल्यात जाणारा एकमेव रस्ता

किल्याच्या एका बुरुजावर एक अजस्त्र अशी " मेंढा तोफ " आहे....
अतिशय सुंदर अशी पंचधातूने बनलेली हि तोफ वजनाने तब्बल "१४ टन" भरते.......
५०० -६०० वर्षांनंतर सुद्धा तिचं सौंदर्य तसंच टिकून आहे.....

कै च्या कै ऊन होतं.... त्या समोरच्या डोंगराचा हेवा वाटत होता......

शेवटी आसपास भटकलो......
हे राव मस्त "दुपारचं भोजन " घेत होते

"my angles" :)

आता अजून फिरणं मनात इच्छा असून देखील शक्य नव्हतं... एकतर उन्ह खूप होत ,शिवाय अजून वेरूळ चा पल्ला गाठायचा होता..........
बस मध्ये बसलो आणि..बस वेरूळ कडे निघाली........
क्रमश:

संस्कृतीधर्मदेशांतरभाषाइतिहाससमाजजीवनमानभूगोलरेखाटनछायाचित्रणलेख

प्रतिक्रिया

पण सुरक्षिततेच्या कारणासाठी हल्ली वर जाऊ देत नाहीत
हे फार बरं केलं त्यांनी !!

चांगभलं's picture

18 Nov 2010 - 1:20 pm | चांगभलं

झकास रे स्पायल्या................

देवगिरी किल्ल्याबाबत अजून कोणी माहिती दिली तर बर होईल.
शिवाजी महराज्जनी कधी या किल्ल्यावर आक्रमण केल्याचे आठवत नाही....
पण बहुधा पेशव्यांनी २ वर्ष हा किल्ला त्यांच्या ताब्यात घेतलेला होता.....

बाकी स्पा... महाराष्ट्र दर्शन रंगतंय....
येउंदेत पुढचा लेख

मस्त मस्त ,पन अजुन काहि फोटो का नाहि दिलेस्? प्रत्यक्श नाहि पाहिला कधि फोटो त समाधान

पन अजुन काहि फोटो का नाहि दिलेस्?

धन्यवाद................

लेख जरा मोठा आणि रटाळ झाला असता म्हणून.... selected फोटो टाकलेत

यकु's picture

21 Nov 2010 - 4:12 pm | यकु

स्पा,
तुम्ही येऊन गेलात??
मी मुंबईत हिंडत होतो राव.
अरेरे!
तुमची या भागातले रस्ते वगैरेबद्दल माहिती विचारणारी पोस्ट वाचली होती.

बाकी फटू जबराट!

प्रचेतस's picture

21 Nov 2010 - 4:23 pm | प्रचेतस

११८७ साली भिल्लण यादवाने हा किल्ला बांधला / मजबूत केला पण कदाचित ७ व्या शतकापासूनही देवगिरी अस्तिवात असावा. त्याच्यावरील सामर्थ्याशाली राजवटीशिवाय वेरूळची सुंदर कोरीव लेणी अस्तिवात येणे तसे कठिणच.
देवगिरी किल्ल्यातही अनेक उत्तम मंदिरे होती. नंतरच्या इस्लामिक राजवटींमध्ये इथली मंदिरे उद्ध्व्स्त झाली ते अवशेषही किल्ल्याच्या नंतरच्या बांधकामात वापरेलेले पाहावयास मिळतात.
औरंगाबाद तर मुघलांचे दक्षिणेतील प्रमुख ठाणे असल्याने शिवाजी महाराजांनी कधी यावर स्वारी केली नाही पण नंतर भाउसाहेब पेशवे (चिमाजीअप्पांचे सुपुत्र व इब्राहीमखान गारदी) यांनी हा किल्ला जिंकला पण तो मात्र निजामशहाकडून.

माहितीबद्दल धन्यवाद.. वल्ली साहेब

शैलेन्द्र's picture

21 Nov 2010 - 8:40 pm | शैलेन्द्र

"पण नंतर भाउसाहेब पेशवे (चिमाजीअप्पांचे सुपुत्र व इब्राहीमखान गारदी) यांनी हा किल्ला जिंकला पण तो मात्र निजामशहाकडून."

निजाम्शहा नाही, हैद्राबादच्या निजामाकडुन, (निजाम्शहा किंवा निजाम्शाही हे विषेशन साधरन्पणे अहमदनगरच्या राजवटीबद्दल वापरले जाते)

प्रचेतस's picture

22 Nov 2010 - 8:53 am | प्रचेतस

निजामच म्हणायचे होते. पण लिहिण्याच्या ओघात निजामशहा म्हणून गेलो. :)

स्पा's picture

21 Nov 2010 - 4:29 pm | स्पा

धन्यवाद.. माहिती दिल्याबद्दल....... :)

स्वाती२'s picture

21 Nov 2010 - 7:45 pm | स्वाती२

छान!

पैसा's picture

21 Nov 2010 - 8:53 pm | पैसा

भाग मस्त जमलाय. तुझे सगळेच फोटो अप्रतिम आहेत.
वल्लीनी धाग्यात आणखी रंग भरला.

मन१'s picture

22 Nov 2010 - 12:26 pm | मन१

सांगत होता गाइड.
>>..१३२७ मध्ये "मोहम्मद तुघलक" याने हा किल्ला बांधला.आपल्या सह्याद्रीच्या किल्ल्यांसारखा हा एकदम उंचावर बांधलेला नाहीये, संपूर्ण पणे मुघली प्रभाव आहे याच्या बांधकामावर... चांद मिनार, किल्ल्याभोवती २.५ km व्यासाचे पाण्याचे खंदक, आणि किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पार करावा लागणारा "भूलभुलैया"हि याची खास वैशिष्ठे.

वरती आधी लिहिल्याप्रमाणं हा ११८७ मध्ये भिल्लण यादवानं बांधला/मज्बूत केला.
किल्ला जवळ जवळ अजिंक्य होता. सरळ सरळ लधुन हा कधीही फारसा जिंकला गेला नाही. कारण;- अत्यंत कल्पक रचना आणि भक्कम तटबंदी. युद्धशास्त्रासाठीचा अत्युकृष्ट नमुना म्हंजे हा किल्ला.(स्वतः मला , ह्याच्या तोडीचे वाटाणारे किल्ले भारतात हाताच्य बोटावर मोजण्याइतकेच अस्तील.)
साधारण एकानंतर एक अशा ७ भव्य दिव्य तटबंदी होत्या.(त्यातल्या कित्येकांचे अवशेष माजही वेरूल कडे जाताना रस्त्याच्या डाव्या बाजुला दिसतात.)
कुठही प्रवेश करायला अरुंद दार होतं. म्हणजे मान वाकवुनच प्रवेश करावा लागणार.
आतला शिपाइ मग सहजच प्रवेश कराणार्‍या शत्रुचं मुंडकं सहज उडवु शकणार!
शिवाय किल्ल्याला स्वतःचा जलस्त्रोत होता/आहे.(ते तळं)
कुणी चाल करुन किल्ल्याच्या मध्यापर्यंत पोचलाच, तर त्याला त्या खोल खोल तळ्यात फेकायचं महाजाल म्हण्जे ते "भुयार". भुयाराला अनेक तोडं आहेत तिथें.(सहसा दोनच असतातः- प्रवेश आणि गमन करण्यासाठी.इथं अनेक प्रवेश, आनी अनेक गमन होते. कसे, वापरले जात, ते आता बघालच.)
त्या भुयाराचं वैशिष्ट्य म्हंजे त्याला वरुन दोन्-तीन छोटी छोटी openings/भोकं(भांडंभर आकाराची) आहेत. म्हंजे, वरती बसलेला किल्लेदार त्या openings मधुन उकळतं शिसं,तेल टाकत राहणार, तुमचं पुढं सरकणं अशक्य करणार्.बरं,त्यातुन धड बाहेर सुटायचा मर्गही तुम्हाला धड दिसणार नाही.भर दुपारी १२वाजता,अगदि उन्हाळ्यातही तिथं कुट्टं ,काळाकुट्टं काळोख असतो.
म्हंजे, ह्या "अग्नि-प्रलयातुन" बाहेर पडणार कसं?तर वाट फुटेल तिकडं. जेव्हा सगळीकडुन उष्ण अग्निवर्षाव होतोय्,रस्ता सुचत नाहीये,अशी स्थिती असते,तेव्हा साहजिकच मानवी मन जिथुन गारवा येतोय, त्या बाजुला जायला subconsciously उद्युक्त होतं. आणि अशी एखादी "गारवा" येणारी वाट त्या भुयारात आहे का? हो! नक्कीच आहे!
आणी तुम्ही सहजच/नकळतपणी त्या बाजुला धावता. बरं,तुमचं तिकडं जाणं सोपं करायला एक मंद उतार केलाय, जो नंतर नंतर अजुन तीव्र होतो.
हां तर कुठं होतो? तुम्ही त्या गारव्याकडे जायला लागता.पळु लागता, आणि अचानक धाडकन जाउन आतल्या एका खोल्-खोल (मगर्-सुसर वगैरे हिंस्त्र श्वापदं असलेल्या) तळ्यात पडता!
अच्छा! म्हंजे इथुन,ह्या तळ्याच्या मुखावर जे दार/opening आहे,तिथुन गारवा येत होता तर!
पण हे कळेपर्यंत तुमच्या सैन्याच्या आघाडीवीरांची दाणदाण उडालिए. अंधारात कुठं जावं तुम्हाला कळत नाहिये.एका बाजुला आगीच्या फुफाट्यात तुम्ही/तुमचं सैन्य मरतय आणि उरलेले जाउन शे-दोन शे फूट खाली असलेल्या तळ्यात!
तुम्हाला पुढही जाता येत नाहिये आणि बाजुलाही सरकता येत नाहिये!
मग काय? माघार घेता? अहो अंधारात तेही शक्य नाहिये!
आणि चुकुन माकुन घेतलितच माघार, तर भुयाराचं परतीचं तोंड जिथं उघडातं ती जागा बाले किल्ल्ल्याच्या आणि इतर बुरुजाच्या सहज मार्‍याच्या टप्प्यत येते.
तुम्ही बाहेर निघालात तरी, बाण वर्षावात( sniper च्या हल्ल्यात) गचकता. शिवाय बाहेर हत्ती काढुन ठेवलेलेच आहेत तुम्हाला चिरडायला.(तिथं किल्ल्यात त्या पटांगणापाशी कुठंतरी एक मोट्ठा tank\हौद पाहिला होता. अंदाजे तिथं पन्नसेक हते सहज डुंबु शकत म्हणे. )
आता ही असली आफत अंगावर ओढवुन घ्यायला कुणाची माय व्यालीए साला?
किल्ला राहणारच ना शतकानुशतके अजिंक्य.
किल्ल्यातला बालेकिल्ला,राणीमहाल, गोदाम हे ही बघितले असतीलच की.

स्पा's picture

22 Nov 2010 - 12:41 pm | स्पा

कडक माहिती....."मन१"
तो तलाव बघितला.... खरच ५० हत्ती डुंबू शकतील .....

भूलभुलैया तर भयाण होता

हे यादव साम्राज्य तेव्हा दक्षिण्-पश्चिम भारतातली एक प्रबळ सत्ता होतं.
इथं सुबत्ता नांदत होती.निम्म्याहुन अधिक महाराष्ट्र आणि उत्तर करनाटक हा प्रांत त्याच्या ताब्यात होता.
दक्षिणेला गोवा(कदंब राजांना हरवुन ह्यांनी ते जिंकलं होतं.), बेळगाव पासुन ते उत्तरेला धुळे-जळ्गाव हा भूभाग त्यांच्या ताब्यात होता. पूर्वेला एलिचपूर(अमरावती-नागपूर जवळ) हे त्यांचं महत्वाचं ठाणं होतं. आणखी महत्वाचे प्रदेश म्हंजे जुन्नर्,नाणेघाट(पुण्याच्या आसपासचा तत्कालीन समृद्ध परिसर) हा ही यादवांच्या ताब्यात होता.
समृद्धी केवळ अन्न्-धान्याची नवह्ती तर कला-संस्कृतीतही होती.
राजा कृष्णदेवरायाच्या काळात, एक किशोर वयीन पोर्,थेट श्रीमद् भगत गीतेशीच ज्ञानाचा सारीपाट मांडुन बसलं होतं.ते अनाथ पोर रहाणारं होतं यादवांच्या राज्धानीजवळच्या एका छोट्याश्या गावातलं-नेवाश्यातलं.पोराचं नाव ज्ञानेश्वर.
दरबारात चतुरस्त्र विद्वान हेमाद्री पंत होते.(आख्ख्या महाराश्ट्रात जी भक्कम पण सुंदर दगडी मंदीरं आहेत "हेमाडपंती" शैलीतली, त्याचे हे जनक ) औबाद पाशी सातार्‍यातल "खंडोबाचं" देउळ हे त्याचच एक उदाहरण. किंवा तुम्ही बघितलेलं कुठलही छानसं,भरपूर कोरीव काम असलेलं दगडी मंदीर.
जगभर आपल्या संस्कृत ज्ञानाची छाप पाडणारे ब्राम्हण,अनेक कलात प्रवीण असणारे कारागीर(अतिकुशल विणकर्,कापड उद्योजक, उतृष्त रेशीम बनवणारे,कोरीव काम करणारे,हात माग विणणारे,पाक कला कुशल बल्लवाचार्य,performing arts मधले super -expert असे संत एक्नाथांचे पूर्वज,बहुभाषाकोविद ) ह्यामुळं, भारतातलं "पैठण" ह्या नावाचा दबदबा होता.(दक्षिण काशी म्हणायचे ह्याला.) हे ही देव्गिरीपासुन हाकेच्या अंतरावर.
अंबाजोगै ही तेव्हाची ह्यांची भरभराटील्;आ आलेली व्यापारी पेठ. जवळ परळी-वैजनाथ ही ज्योतिर्लिंगं होती.
अंबाजोगइ ला कवी आद्य मराठी कवी मुकुंदराज (ज्ञानेश्वर पूर्व काळातील) ह्यांचं वास्तव्य होतं. राजदरबारात विद्वान कवी नरेंद्र विराज्मान होते.
एकुणात काय, तर असं मोठं साम्राज्य,भक्कम राजधानी, कला-संस्कृतीच्या वैभवाच्या शिखरावर असलेल्या ह्या यादवांची राजधानी म्हंजे देवगिरी.(जसा मुघलांच्या वैभवाची साक्ष लाल्-किल्ल देतो, तसच.)
आख्खा उत्तर-मध्य भारत परकिय आक्रमणाखाली तुडवला जात असताना हे राज्य मात्र अजुन तरी स्वतंत्र होतं.

आता गंमत बघा:- इतक्या शक्तिशाली राज्याची राजधानी-देवगिरी पराभुत किती काळात झाली? केवळ १५ दिवसात!
हिच्या सत्तेच्या,गर्वाच्या ,सामर्थ्याच्या चिंधड्या उडायला किती वेळ लागला?---केवळ १५ दिवस!
काय म्हणताय? " असं कसं झालं? कसं होउ शकतं?" जाउ द्या, ते पुन्हा कधी तरी सांगेन
----बहुतांश माहिती माझ्या औ.बादच्या वास्तव्यादरम्यान जुन्या/वृद्ध माणसांकडुन ऐकलिये. आणि बरीचशी बाबासाहेब पुरंदरेंच्या "राजा श्री शिव छत्रपतीमधुन" घेतलिए.

इन्द्र्राज पवार's picture

22 Nov 2010 - 7:54 pm | इन्द्र्राज पवार

सुंदर वर्णनाबरोबरीने समोर आलेल्या त्याहूनी सुंदर फोटोंनी दौलताबादची आगळी सफरच झाली [आणि लेखकाने, मायबाप यस्टीच्या मागील 'शीट' वर बसून केलेल्या सहासात तासाच्या एक्स्ट्राऑर्डिनरी कोझी प्रवासाची मजाही घेतली....].

अगदी सुरेख धावते वर्णन आणि टिपण्या केल्यात श्री.स्पा यानी....किल्ल्याबद्दल जास्तीचे काही त्यानी लिहिले आहे काय हे पाहात असतानाच श्री.मन१ यांचे याच विषयावरील भरघोस प्रतिसाद वाचायला मिळाले, अन् मग सर्वच माहिती आयतीच परात भरून समोर आली. थॅन्क्स टु बोथ ऑफ यू !

[स्पा...थोडासा आगावूपणा करू का?
खंदकाचे वर्णन करताना तुम्ही लिहिले आहे : "या पाण्यात पूर्वी विषारी पाणसाप, अजस्त्र मगरी तसेच सुसरी असत ..."

इथे थोडासा बदल अपेक्षित आहे. 'पाणसाप' बिनविषारी असतात. फक्त छोटे मासे, सरडेसद्दश्य सरपटणारे लहानलहान प्राणी, पैसाकिडा, जळवा यासारखे पाण्यातच वाढणारे घटक यांचे खाद्य असते. पूर्ण वाढलेला पाणसाप प्रसंगी चिमणी, बेडूक यांनाही वेगाने पकडून 'गिळंकृत' करतो....चावत नाही. मानवी हालचालीपासूनही पाणसर्प दूरच राहणे पसंत करतात.]

इन्द्रा

विकास's picture

22 Nov 2010 - 8:12 pm | विकास

अनेक वर्षांपूर्वी देवगिरीचा किल्ला पाहीला होता. वाटाड्याकडून माहीती ऐकताना अस्वस्थता आली की इतका अभेद्य किल्ला असताना किती म्हणून तो राज्यकर्त्यांचा नालायकपणा... येथील राज्यकर्त्यांनी जवळपास हजारएक वर्ष हा भाग वैभवास आणला आणि उपभोगला देखील. मात्र एक नाकर्ती आणि फितुरांची पिढी जन्माला येण्याचीच गरज असते. जिथे दारूगोळा असायला हवा तेथे मिठाच्या गोण्या ठेवल्या गेल्या आणि पुढचा सारा इतिहास आहे...

नगरीनिरंजन's picture

22 Nov 2010 - 8:29 pm | नगरीनिरंजन

+१. असेच म्हणतो.
रामदेव आणि शंकरदेवाचा मला फार राग आला होता आणि वाईटही वाटलं होतं किल्ला पाहताना. आसो. जे वर जातं ते खाली येणारच.

चिगो's picture

22 Nov 2010 - 8:21 pm | चिगो

अगदी सुंदर लेख आहे हा... त्यात मन१ ने दिलेल्या माहीतीने आणखीनच बहार आणली आहे.. मन१ ने आणखी माहिती द्यावी, ही विनंती.. त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा किल्ला अजेय होता, तो केवळ फंद-फितुरीच्या बळावर जिंकल्या गेला इतिहासात..
महंमद तुघलकाने सुलतान झाल्यावर दक्षिणेवर चांगल्याप्रकारे लक्ष ठेवता यावे, म्हणून राजधानी दिल्लीवरुन "देवगिरी" ला हलवली, आणि त्याचे नामकरण "दौलताबाद" असे केले.. सुलतानच तो, प्रचंड पैसा आणि मनुष्यबळाचा चुराडा करत त्याने हा खेळ केला. असं म्हणतात, की हजारों सैनिक आणि लवाजम्यात निघालेले नागरीक, व्यापारी वगैरे ह्या खडतर प्रवासात मृत्युमूखी पडले ! :-( इथे आल्यावर मात्र काही दिवसांतच त्याच्या लक्षात आलं की, जसे दिल्लीवरुन दक्षिणेवर कंट्रोल ठेवता येत नाही तसेच दक्षिणेतून दिल्लीवर नजर ठेवणे हेही कठीण आहे. (तसेही दिल्लीवाले पुरातन काळापासुन जास्त उचापती
;-)) मग आले परत दिल्लीत..
ह्याला इतिहासात "पगला महंमद" म्हणूनही ओळखतात. त्याने "टोकन कॉईन्स"चा प्रयोग पण केला होता.. म्हणजे सोन्याच्या नाण्यांऐवजी पितळी नाणी (त्यांची तेवढीच किंमत आहे असं समजून) वापरायची ! सपशेल फसली ही योजना.. बरेच दिवस मग ह्या पितळी नाण्यांचा ढिगच्या ढिग दिल्लीच्या किल्ल्याबाहेर पडलेला होता..

वोक्के.. आमचं ज्ञान सरलं. स्पा, जबरा !! लगे रहो..

प्रभो's picture

22 Nov 2010 - 8:23 pm | प्रभो

मस्त रे!!

प्राजु's picture

22 Nov 2010 - 8:25 pm | प्राजु

मस्त लिहितो आहेस.. :)

इतिहास उलगडून दाखवल्याबद्दल धन्यवाद... चीगो... :)

बाकी सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनापासून आभार... :)

विलासराव's picture

23 Nov 2010 - 12:18 am | विलासराव

मस्त चाललाय तुमचा प्रवास. मन ने दिलेली माहीती तर खुपच छान आहे. जातोच आता तिकडे.
मला एक सांगा २-३ दिवसात अजंठा, वेरुळ, देवगिरी पाहुन होईल का? की आणखीही काही आहे तिकडे पहाण्यासारखे?
मी ५-७(८) डिसेंबरला जाणार आहे तिकडे. आणखीही काही उपयोगाची माहीती असल्यास कळवा ही विनंती.

इंटरनेटस्नेही's picture

25 Nov 2010 - 2:36 am | इंटरनेटस्नेही

लेख आवडला. हा देखील भाग चांगला जमलाय!