✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

खुशबू (भाग १३)

प
पगला गजोधर यांनी
गुरुवार, 03/05/2015 - 18:00  ·  लेख
लेख
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ | भाग ८| भाग ९| भाग १०| भाग ११| भाग १२ रात्रीच्या वेळेला बाहेर धो धो पाउस पडत होता … अंधार मी म्हणत होता …. हेमंत कोकरे कंदिलाच्या उजेडात त्यांची डायरी लिहित होते … आज तिला जाउन १० वर्षे झाली… सविता ही माझी पत्नी. तीही माझ्यासारखी लॉ ग्राज्युएट. पण गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, असे ध्येय असलेल्या ऐका ऐन जी ओ मधे उमेद्वार्या करण्याची धडपड ती त्यावेळी करत होती. दाभोलकर आणि त्यांच्या पत्नी यांनी त्यावेळी नुकतीच कुठे आपल्या सामाजिक कार्याला ऐन जी ओ द्वारे सुरुवात केली होती. तिच्या मनाचा गाभा ऐका संवेदनाशील कवयत्रिचा, अशाच एका काव्यमोहोत्सवात तिच्याशी भेटीचा योग आला, पुढे अनेक कवितांच्या कार्यक्रमात आमच्या ओळखित वाढ होउन, त्याचे घनीष्ठ मैत्रीत रुपांतर झाले, नंतर प्रेमबंध जुळून आल्यानंतर १९९० साली आम्ही दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. पण पुढील काही वर्षे आम्ही आनंदाच्या शिखरावर असतानाच, आमचा एकुलता एक मुलगा अतुलचे मोटार अपघातात निधन झाले. अचानक कोसळलेल्या या महासंकटाने सविता आणि मी, दोघेही पुरते कोसळलो. हताश झालो. आमच्या जगण्यातला आनंदाचा ठेवा हरपला. मुलाच्या निधनानंतर निराश झाल्यामुळे सविताने जीवनाकडे कायमची पाठ फिरवली. या घटनेनंतर कधीही ती नॉरमल जगलीच नाही. शेवटी काळाने दहा वर्षापूर्वी आजच्याच दिवशी तिच्यावरही 'ब्लड कॅन्सर' रूपाने झडप घालून, तिला माझ्यापासून हिरावून नेलं. तिच्या डायरीतील ऐका पानामुळे मलामात्र दु:खाचे ते विष धैर्याने पचवून, आपल्या वेदनांचा बाजार न मांडता, लष्करी सेवा आणखी जोमाने करायला लावली. तिच्या मृत्यूनंतर लष्करी सेवा व माळीण गाव हाच माझ्यासारख्या अभाग्यासाठी श्वास आणि प्राण ठरला आहे. त्या डायरीच्या पानावर तीने अतुलच्या जन्मानंतर काही ओळी लिहिल्या होत्या, आजही मला त्या आठवतात … जगाला प्रेम अर्पिण्याची भावना असते उत्कट भावना … प्रत्येक मनाचा असतो तो ऐक अविभाज्य भाग … कारण हे कर्ज आहे मानवतेच … कर्ज आहे आपल्याला घडविणाऱ्या हाताचं…. ते आहे न संपणारं, अन्यथा मागे उरते ती उपकृतता … हे कर्ज फेडावे लागते आपल्याला समर्पणाने…. आत्मियतेच्या ओढीने… मांगल्याचा स्पर्श झालेल्या मनाच्या मोठेपणाने … कदाचित सविताने, अतुल मोठा झाल्यावर, त्याने वाचावी म्हणून लिहिली असेल का ती कविता ? अस त्यावेळी वाटलं होत मला. त्याक्षणी मी ठरविले…. माळीण गावात महिन्यातून एकदा तरी मुक्कामी चक्कर मारून मुलांना शिकवायचे.… गावातल्यांना माहिती नाही मी कोण आहे ते… त्यांना वाटत असेल, दर महिन्यातून येणारा हा सुद्धा असेल एखादा निवृत्त मास्तर किंवा एखादा एन जी ओ वाला, येत असेल पुण्याहून… मला 'मास्तरं' म्हणून दंडवत घालतात…. कोणाच्याही घरी रात्री मुक्कामाला ठेवून भाकर तुकडा खाऊ घालतात… खरंच यांच्या सहवासात, एकटेपणा छळत नाही कधी … आज या पावसात, माझ्या हातातल्या तिच्या फोटोकडे पाहून, तिच्या कवितेतली ऐक ओळ मनात येत आहे … `तुझ्या खांद्यांवर माझी मान टेकलेली असावी ... अन् त्याच क्षणी माझा अखेरचा श्वास सरावा... कारण मला मृत्यूही कसा काव्यमय यायला हवा.… ------------------------------------------------------------------- आजचा दिवस तसा मस्त गेला, हेमंत काल म्हणाला, 'अरे सन्याशा उद्याचा काय प्लान तुझा ?'…. 'अपने ना कोई आगे पीछे, आपको तो मालूम है हेमंत !'… 'चल माझ्याबरोबर, मस्त निसर्गाच्या सान्निध्यात, घेऊन जातो तुला … आज पहाटे निघू…दुसर्या दिवशी संध्याकाळी परत येवू … मस्त शांत वातावरणात शहरी गोंगाटापासून दूर …. ' 'ओ के … ' स्टीव जॉब चे पुस्तक वाचता वाचता वाझ यांच्या डोळ्यात आताशा मंद झोप यायला लागली. हे शेवटच पान वाचून, आपण झोपी जायचं …. म्हणून ते वाचू लागले … "मरण कुणालाच नको असते . ज्यांना स्वर्गात जाण्याची इच्छा असते त्यांना सुद्धा न मरता तिथे जायचे असते. आणि असे असले तरीही आपल्या सगळ्यांना मरण येणारच आहे. ते कुणालाच चुकलेले नाही . असे असेल तरी मृत्यू हे आयुष्यातला सर्वात चांगला शोध आहे. जुने नाहीसे करून नव्या साठी मोकळी जागा करण्याची ही क्रिया आहे. आता तुम्ही ते ‘नवे’ आहात पण थोड्याफार काळानंतर तुम्ही जुने होणार आणि नव्यासाठी तुम्हाला जावे लागणार . इतके स्पष्टपणे सांगितल्याबद्दल माफ करा पण हेच सत्य आहे. तुमच्या कडे खूप कमी वेळ आहे तो मौल्यवान वेळ दुसर्याचे आयुष्य जगण्यात घालवू नका. दुसर्यांच्या मतांच्या ओझ्यात तुमचे मत दाबून जाऊ देऊ नका. सगळ्यात महत्त्वाचे हे की तुमचे हृदय आणि तुमची अंतःप्रेरणा तुम्हाला काय सांगते ते ऐका. या गोष्टींना माहीत असत की तुम्हाला काय बनायचे आहे. बाकी कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाही." वाझने पुस्तक बंद करून ठेवलं आणि झोपण्याची तयारी करू लागले, बाहेर सोसाट्याचा वारा चालू होता, त्यातच माळीण गावात पावसाची आणखी ऐक जोरदार सर बरसून गेली … ------------------------------------------------------------------- सकाळी सकाळी मंचरहून निघालेली एस टी बस गावची हद्द ओलांडून कच्च्या रस्त्यावरून धाऊ लागली, तेव्हा गाडीमागे चिखल फवारू लागला. मुसळधार पावसामुळे जागोजागी पडलेले खड्डे चुकविण्याचा प्रयत्न तो ड्रायवर करत होता, पण एक खड्डा चुकवताना दुसरा मोठा खड्डा समोर येत होता. बस ड्रायवर त्या रूटवरचा अनुभवी ड्रायवर होता, पण पदोपदी असलेले खड्डे चुकवताना तो खूपच इरीटेट झाला होता. मनातल्या मनात त्यान तिथल्या राजकारण्याना शिव्या घातल्या, 'हरामखोर साले, साखरकारखान्याकडे ऊस नेणारे रोड फक्त हंगामापुरते मलमपट्टी करून ठेवतात, बाकी दिवस, बाकीचे रोड बोंब नुसती …. चायला … आमच्या मतावर निवडून येतात … पब्लिकच हाल दिसतं का न्हायी हेन्ला !' रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या ब्रिटीशकालीन चिंचेच्या झाडीतून एस टी नदीबरोबर चालणार्या उतार रस्त्याला लागली, पुढे जाऊन वळण घेतलं, अन माळीणगावाच्या नदीपलीकडील तो पिंपळ दिसू लागला. मंचरहून, आसाणे गावाकडे जाताना वाटेत दोन ठिकाणी एस टी थांबायची, त्यातलं माळीण हे पाहिलं ठिकाण, थोडस डोंगर उताराच्या खळगीत वसलेलं गाव. गावाकडे येण्यापूर्वीच नदीच्या या बाजूने डोंगरावरची ८०-९० उंबरा असलेल्या गावातली कौलारू घरं, पाहणार्याच्या नजरेत भरायची. …....... पण आज कंडक्टरन सिंगल बेल द्यायच्या आधीच, ड्रायवरनं करकचून ब्रेक दाबला…. मशीनची चित्रविचित्र घरघर होऊन एस टी जाग्यावरच थांबली, आश्चार्यान तोंडातला गाय-छापचा गोंडा घशात जाताजाता वाचला. कंडक्टरकड वळून जवळ जवळ तो ओरडला 'सोपान बग तिकड वर … आर घर कुट गेली तिथली ?', सकाळच्या उजेडात माळीण गावाच्या जागी भलामोठा चिखलाचा राडा दिसत होता … धडधडत्या हातानी ड्रायवरन मंचर डेपोचा नंबर आपल्या मोबाईलवर लावला … ------------------------------------------------------------------- मी अश्या प्रकारे घरी येवून ढसाढसा रडेन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं... पण आले... त्या दिवशी सकाळपासूनच पाउस होता.. मीही माझ्या ऑफिसच्या पिकअप बसची वाट बघत होते होतं... तेवढ्यात मोबाईलवर प्रीतमसिंगचा फोन आला.. "नेहमीप्रमाणे सुट्टीच्या दिवशी माळीणगावाला भेट द्यायला गेलेले हेमंतसर आणि वाझसरांचा पत्ता लागत नाही आहे" .. असं बरंच काही..रस्त्यावर तमाशा नको म्हणून, ऑफिसमधे मोबाईलवरून कळवलं की तबियत ठीक नाही ….बस पिकअप पॉइन्टवरून एकटीच परत घरी गेले..... पूर्ण दिवस घरातल्या खोलीत कोंडून घेतलं..अम्मा बिचारी माझी अवस्था बघून काळजीने घरात येरझर्या घालत होती … पण तिला तिच्या या खुशबूबेटीला अजून दुखवायचं नसेल म्हणून काही चाकर शब्दाने प्रश्न विचारला नाही मला … उपाशीपोटी तो दिवस ती रात्र काढली... मनात एकच विचार होता...सगळं संपलं ..
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
2122 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

अबब सगळे भाग एकदम वाचले.

विजुभाऊ
गुरुवार, 03/05/2015 - 18:22 नवीन
अबब सगळे भाग एकदम वाचले. क्यानव्हास इतका मोठ्ठा आहे की अंदाजच येत नाहिय्ये. पण मस्त फ्लो मधे लिहिताय.
  • Log in or register to post comments

काही तरी भरकटलय...

बाबा पाटील
गुरुवार, 03/05/2015 - 19:24 नवीन
अस नाही वाटत
  • Log in or register to post comments

हा भाग जरा वेगळा वाटतोय.

मास्टरमाईन्ड
गुरुवार, 03/05/2015 - 20:18 नवीन
बघू पुढच्या भागात.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा