पराभवाचे श्राद्ध... भाग -४

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
22 Oct 2011 - 10:01 pm

पराभवाचे श्राद्ध - भाग १
पराभवाचे श्राद्ध - भाग २
पराभवाचे श्राद्ध - भाग ३

ज. कौल यांनी आपल्या आठवणीत श्री. कृष्णमेनन यांच्या उद्धटपणाच्या अनेक हकीकती लिहून ठेवल्या आहेत. ज. कौल तर पं. नेहरूंच्या मर्जीतले असताना ही तर्‍हा होती. बाकीच्यांचे हाल तर विचारायलाच नको. हळूहळू श्री. कृष्णमेनन यांच्या भोवती खुषमस्कर्‍यांची भुतावळ वाढू लागली. ज्यांना युद्धनितीमधील कष्पही :-) कळत नव्हते असे नागरी आधिकारी श्री. कृष्णमेनन यांना सैन्य कुठे हलवायचे, चौक्या, ठाणी कुठे उभी करायची याचे सल्ले देऊ लागले. त्यांनी नंतर नंतर तर सरकारने नेमलेल्या समित्यांना टाळून निर्णय घ्यायला सुरु केले. ते काय करत नसत ? ते सीमावाद निस्तरायचे, नागांचा प्रश्नही तेच सोडवायचे, नेफा तर त्यांचा आवडता प्रश्न होता. या सगळ्या प्रश्नांचे त्यांनी काय करून ठेवले हे आपण बघतोच आहे. त्यांचे काही नागरी सहकारी तर आता जनरल्सपेक्षाही या विषयातील तज्ञ मानले जावू लागले. जर एखाद्या जनरलने वेगळा मार्ग सुचवला किंवा आक्षेप घेतला तर त्यांचे उत्तर ठरलेले असायचे “सरकारने ठरवलेले आहे किंवा “राजकीय आवश्यकता आहे”. याची हद्द झाली १९६२ सालच्या सप्टेंबरमधे. या मूर्ख लोकांचे आदेश पाळणे जमिनीवर अशक्य होऊ लागले किंवा धोकादायक ठरू लागले. लष्करी आधिकार्‍यांची कर्तव्य आणि शिस्त हे गुण गुलामगिरी व कमकुवतपणा मानले जाऊ लागले. ज्या नागरी अधिकार्‍यांनी आपले आयुष्य तुलनेने आरामात व्यतीत केले होते त्यांना हे गुलाम फारच आवडले.

श्री. कृष्णमेनन जरी बाहेरून स्पष्टव्यक्ते, निर्भिड वाटायचे तरी त्यांच्यात पं नेहरूंच्या विरूद्ध जायचे धैर्य नव्हतेच. तसे ते त्या काळात कुठल्याच कॉंग्रेसी खासदारामधे नव्हते म्हणा. अर्थात फिरोज गांधींसारखे काही अपवाद होते पण ते फक्त नियम सिद्ध करण्यासाठीच. श्री. कृष्णमेनन यांना त्यांचे राजकीय भवितव्य पं नेहरूंच्या हातात आहे याची पूर्ण कल्पना होती आणि मंत्रीपदापुढे देशाचे हीत बघायचे ही कॉंग्रेसी परंपरा नव्हती/नाही. (काही सी डी देशमूखां सारखे मंत्रीगण सोडून) या कारणामुळे त्यांनी श्री. देसाई यांच्याबरोबर असलेले मतभेद पं. नेहरूंच्या कानावर घातले नाहीत ना त्याच्यावर चर्चा घडवून आणल्या. याच पार्श्वभूमीवर दुर्दैवाने त्यांनी पं. नेहरूंच्या “फॉर्वड पॉलीसी” च्या विरूद्ध जायचेही धैर्य दाखवले नाही. त्यांच्या मनात अजून एक भीतीही दडलेली होती ती म्हणजे त्यांच्या डावीकडे झुकलेल्या विचारसरणीमुळे ते चीनच्या विरूद्ध जाण्यात कचरतात असे इतरांना वाटले तर ? हेही एक कारण असू शकते.

१९६२ सालच्या धक्क्यानंतर नेहरू आणि श्री. कृष्णमेनन यांच्या बागलबच्च्यांनी श्री मोरारजी देसाईंवर हे प्रकरण शेकवायचा बराच प्रयत्न केला. उदा. त्यांनी असे पसरवले की श्री. देसाईंनी वेळेवर निधी, विशेषत: परकीय चलन उपलब्ध करून न दिल्यामुळे संरक्षणदलाला साहित्य मिळाले नाही इ. इ... या दोघांतून विस्तव जात नव्हता हे सत्य आहे पण त्यामुळे असे झाले का ? हा संशोधनाचा विषय आहे. त्यावेळेच्या परिस्थितीचे अचूक वर्णन श्री. वेलेस हॅंगेन (जे एक वार्ताहर होते आणि ज्यांनी After Nehru Who ? हे पुस्तक लिहिले आहे) यांनी केले आहे. ते म्हणतात “ भारतावरचे खरे संकट हे श्री. कृष्णमेनन व श्री. देसाई यांच्या मधील वितुष्ट आणि त्यांच्या पाठिराख्यांच्या चकमकी हेच आहे. महत्वाचे निर्णय संपूर्ण लोकसभा क्वचितच घेते. फार तर असे निर्णय लोकसभेतील एखादी समिती घेते आणि ही समिती खुद्द पं. नेहरू नेमत असत त्यामुळे त्यावर कोणाची वर्णी लागायची हे सांगायची गरज नाही. साधारणत: या दोघांच्या सल्लामसलतीने या समित्या स्थापन होत असत.”

श्री. देसाई यांना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमुळे महाराष्ट्राच्या बाहेर नेणे आवश्यक होते. त्याच काळात आपले अर्थमंत्री श्री टी. टी. कृष्णम्माचारी यांना भ्रष्टाचाराच्या चौकशीमुळे आपले पद सोडायला लागले होते त्या मंत्रीपदावर श्री. देसाई यांची वर्णी लागली.

टी. टी. के यांनी मुंदडा नावाच्या व्यापार्‍याला मदत करण्यासाठी सरकारी विमा कंपनीला त्याच्या कंपन्यांचे दीड कोटी रुपयाचे भाग भांडवल विकत घ्यायला लावले होते. या शेअरची बाजारभावाने किंमत कवडीमोल होती असं म्हणतात. बरं घेतले तर घेतलेच पण त्यात बरेच शेअर हे बनावट होते. न्या. छागला यांना चौकशी समितीवर नेमण्यात आले व त्यांनी निर्भिडपणे यातला भ्रष्टाचार बाहेर आणला. असो. हे लिहिले याचे कारण आपल्या जनतेचा पैसा आणि स्वत:चा पैसा यात तेव्हाचे राजकारणी आणि आताचे राजकारणी आजिबात भेदभाव करत नसत आणि आत्ताही करत नाहीत. जनतेचा पैसा हे ते आपलाच मानतात व असल्या सत्कारणी लावतात......

श्री देसाई यांची मते जगजाहीर होती. जसे श्री. कृष्णमेनन आणि नेहरू हे कॉंग्रेसमधील समाजवादी होते तसे श्री देसाई हे कॉंग्रेसमधील उजव्या विचाराचे होते. त्यांना देशातील खाजगी उत्पादन व्यवस्थेचे महत्व पटलेले होते आणि त्यांच्यावर जबाबदार्‍या टाकण्याची त्यांची मानसिक तयारी झालेली होती. त्याच्या विरूद्ध सरकारी उत्पादन व्यवस्थेला पर्याय नाही असे श्री. कृष्णमेनन आणि पं नेहरुंचे ठाम होते. श्री. मोरारजी देसाई हे स्वत:ला पंतप्रधानपदाचे दावेदार मानत आणि त्या दिशेने त्यांनी पाऊले टाकायला सुरवातही केली होती व स्वत: कॉंग्रेसचे लोकसभेतील उपनेतेपदासाठी होणारी निवडणूक लढवलीही होती, पण नेहरूंनी त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडले. त्यासाठी श्री. कृष्णमेनन यांचा उपयोग करून घेण्यात आला. त्यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी श्री. जगजीवनराम यांना पाठिंबा दिला. पं. नेहरूंनी परंपरा मोडून दोन उपनेते बनवले व नवीन प्रथा पाडली. मोरारजींचे प्यादे एक घर मागे सरकले खरे, पण तेही काही कच्च्या गुरूचे चेले नव्हते. १९६२च्या निवडणुकीनंतर श्री. देसाईंना दुसरे खाते देण्याचा निकराचा प्रयत्न करण्यात आला पण श्री मोरारजींनी याला कडाडून विरोध केला व ते परत एकदा अर्थमंत्री झाले.

श्री मोरारजी देसाई यांचे श्री. कृष्णमेनन यांच्याबद्दल काय मत होते ते बघा “ ते एक कुठल्याही विचारांची बैठक नसलेले अराजकवादी आहेत. ते घटकेत अती उजवे असतात तर कधी अती अती डावे असतात. राजकीय दृष्ट्या ते अस्तित्वहीन आहेत आणि जनतेत ते, ते कधी मिळवू शकतील असे वाटत नाही.” १९६२ सालच्या गोंधळानंतर श्री. कृष्णमेनन यांचा पत्ता कापला गेल्यामुळे मोरारजीभाईंचे पारडे जड झाले. हे बघताच कामराज प्लॅन अंमलात आणून ज्या अनेक मंत्र्यांचा राजीनामा घेतला गेला त्यात मोरारजीभाईंचाही राजीनामा घेतला गेला. नेहरूंनीही राजीनामा सादर केला होता पण त्यांना खात्री होती की त्यांचा राजीनामा स्विकारला जाणार नाही. तसेच झाले. डोईजड झालेल्या मंत्र्यांचा सफाया करण्यासाठीच हा सर्व डाव रचला गेला होता असे मानायला पुष्कळ जागा आहे. थोडक्यात काय, भारताचे भवितव्य आणि उच्चस्तरीय युद्ध सुकाणू समिती ही पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि अर्थमंत्री यांच्या हातात होती.

यातील दोघांचे एकामेकांशी अजिबात पटत नव्हते आणि तिसर्‍याने यात लक्ष न घालता याच्यात भरच घातली. यातील कोणाचे चुकले हे शोधून काढणे फार अवघड नाही पण पंतप्रधानांनीच याची नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे हे निश्चित.
श्री. कृष्णमेनन यांच्या समाजवादी विचारामुळे ते खाजगी उद्योगांकडॆ नेहमीच संशयाने बघायचे. संरक्षणदलांना लागणारे सर्व साहित्य ते सरकारी ऑर्डिनन्स फॅक्टरीमधूनच तयार करायला सांगायचे. मोरारजीभाईही भारतात तयार होऊ शकणार्‍या वस्तूंसाठी कधीच आर्थिक पुरवठा करायचे नाहीत. पण त्यांच्या एक लक्षात येत नव्हते. हे धोरण इतर ठिकाणी ठीक होते. संरक्षणाच्या बाबतीत वेळेला महत्व असते आणि तेथे हे धोरण चालत नाही. या सगळ्याचा परिपाक संरक्षण दलाला लागणार्‍या सगळ्या वस्तूंचे दुर्भिक्ष जाणवू लागले. पॅराशूट, डबाबंद अन्न, हे तर जाऊदे, बूट आणि योग्य कपडेही मिळत नव्हते. आघाडीवरच्या सैन्यदलांना बर्फात वापरायचे कपडे, ग्रेनेडस्‌, दारूगोळा, लोकरीची अंतर्वस्त्रे एवढेच काय बुटांना मारायच्या खिळ्यांचाही तुटवडा भासत होता. श्री. कृष्णमेनन यांच्या काळात “ उपलब्ध नाही “ हा शेरा फारच सहजतेने उपलब्ध होता.
ज्या महत्वाच्या आणि तातडीने लागणार्‍या हवाईदलाला आणि लष्कराला लागणार्‍या सामुग्रीच्या बाबतीत तात्विक मतभेद आड येत होतेच. ही सामुग्री किती अत्याधुनिक आणि उत्कृष्ठ आहे यापेक्षा रुपये देऊन ती घेता येईल का याकडे जास्त लक्ष देण्यात येत होते. म्हणजे त्याची उपयुक्तता किती आहे त्यापेक्षा ते स्वस्त आणि आपले चलन देऊन उपलब्ध आहे का हे बघितले जात होते. त्यामुळे रशियाशिवाय दुसर्‍या देशाकडून आपण काही घेऊ शकत नव्हतो. याचा त्या काळात फारच तोटा झाला. ( त्याचा फायदा आता होतो आहे का हा येथे चर्चेचा विषय नाही) भारताने पश्चिमेची शस्त्रपुरवठा करण्याची मक्तेदारी मोडली खरी पण त्याबरोबर आपल्या संरक्षण दलाचे कंबरडेही मोडले. श्री. कृष्णमेनन यांनी छोट्या शस्त्रात अमेरिकेची स्वयंचलित रायफल नाकारली तसेच c-130 नावाच्या मालवाहू विमानाची चाचणीही घ्यायची पण नाकारली. त्यांच्या दुर्दैवाने नंतर याच विमानाने लडाखमधे अमेरिकेने आपल्याला शस्त्रात्रे पाठवली. श्री. कृष्णमेनन यांनी तिबेटच्या सरहद्दीवर फौजा तैनात करायचे आदेश काढले पण त्यांना लागणारे साहित्य तेथे पोहोचते करायला पुरेशी विमाने ते देऊ शकले नाहीत. श्री. कृष्णमेनन यांनी रणगाडे आणि विमाने बनवायचा संकल्प सोडला ( जी आपण अजून बनवत नाही, आणि आता खाजगी उद्योगाकडे हे काम सुपूर्त करायचे चालले आहे) आणि सैनिकाकडे असण्यार्‍या शस्त्राकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यांनी जुनाट विमानवाहू नौका नौदलासाठी खरेदी केली आणि सैनिकाकडे असणारी बोल्ट रायफल जी प्रदर्शनातही कोणी ठेवणार नाही, ती बदलायचा काडीचाही प्रयत्न केला नाही. प्रयत्न जाऊ दे त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. आपल्या तोफखानादलाकडे ना आधुनिक तोफा होत्या ना तोफगोळा. चीनी सैन्याकडे आपल्याकडे असणार्‍या तोफांपेक्षा जास्त पल्ल्याच्या तोफा होत्या आणि त्याची संख्याही तुलनेने प्रचंड होती. हे सगळे वाचताना आपल्या मनात एक प्रश्न उभा राहतो आणि तो म्हणजे अशी भयानक परिस्थिती असतान आपले सैन्यातील वरिष्ठ अधिकारी काय करत होते. सेनादलांचे प्रमुख आपल्याकडे असणार्‍या शस्त्रात्रांचे आधुनिकीकरण करण्याचा सतत पाठपुरावा करत होते. पण त्यांच्याकडे आणि त्यांच्या मागण्यांकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आले. याचे एक उदाहरण देता येईल. प्रत्येक सैनिकाकडे एक रायफल असते हे आपल्याला माहीत असतेच. त्या काळात आपल्याकडे १९०४ सालात तयार केलेली ली-एन्फिल्ड रायफल सैनिकाला देण्यात आली होती.
हीच ती रायफल -

आणि ही सध्याची रायफल जी आपल्याकडे तेव्हा पाहिजे होती आणि आत्ता यापेक्षाही आधुनिक पाहिजे आहे.

म्हणजे जी पहिल्या महायुद्धाच्या अगोदर तयार करण्यात आली होती. या रायफलच्या जागी नवीन स्वयंचलित रायफल आणण्यात यावी यासाठी प्रत्येक बैठकीत मागणी करण्यात येत होती. सेनादलाचे मासिक “द इन्फंट्री जर्नल” याच्यात याबाबतीत सतत चर्चा छापल्या जात असत. हे जर्नल सेनेतील एक अनुभवी अधिकारी मे. प्राऊडफूट हे संपादित करत असत. हा मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी आपण याच जर्नलमधे वेगवेगळ्या काळात आलेल्या दोन लेखांमधील उतारे बघूया. हे आहेत छोट्या शस्त्रांबद्दल-

ऑक्टोबर १९५९ पान चार...
सेल्फ लोडिंग रायफल.
विमानदलाचे आणि नौदलाचे आधुनिकीकरण हे अत्यंत आवश्यक असले तरीही एक गोष्ट विसरता येत नाही की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पायदळाला सीमेवर सतत शत्रूंच्या कारवायांना तोंड द्यावे लागत आहे. एवढेच नव्हे तर अंतर्गत संरक्षणाचे कामही पायदळाला अनेक वेळा करावे लागले आहे. सैनिकांना आपल्याला जुनाट, पहिल्या महायुद्धातल्या, रायफली अजून का वापराव्या लागतात याचे कारण सापडलेले नाही. ही रायफलची जागा आता खरे तर वस्तूसंग्रहालयातच आहे आणि जगात कुठल्याही आधुनिक सैन्यात ती वापरली जात नाही. ज्या प्रकारचे युद्ध आपल्या सेनादलांना या पुढे लढायला लागणार आहे त्यात अत्याधुनिक रायफल असलेल्या शत्रूच्या सैनिकांबरोबर त्यांना लढायला सांगणे हे अन्यायकारक आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. या प्रकारच्या सर्व युद्धांचा निकाल हा शेवटी जमिनीवरच लागतो हे विसरून चालणार नाही”

एप्रिल १९६०, पान २.
उत्तर सीमेवर नुकत्याच झालेल्या चीनी घुसखोरीमुळे व त्यामुळे भविष्यात उद्भोवू शकणार्याल गंभीर धोक्यामुळे, एकंदरीतच देशात संरक्षण व्यवस्थेचे महत्व पटू लागले आहे. ज्या राष्ट्रांकडे अत्याधुनिक सैन्य आहे त्यांच्याकडे अशावेळी गहज़ब होणे जरा असंभव आहे, कारण स्पष्ट आहे. त्यांनी या बाबींचा विचार अगोदरच केलेला असतो. एवढ्या महत्वाच्या गोष्टींवर आग लागल्यावर कोणी विहीर खणत नाही. सध्याच्या काळात कशाची आवश्यकता असेल तर स्वयंचलित शस्त्रास्त्रांची. पायदळाकडे तर सेल्फ लोडींग रायफल हवीच. हे आम्ही अनेक वेळा या माध्यामातून सांगितले आहे पण आज परत एकदा हे सांगणे हे आमचे कर्तव्य आहे. नाहीतर पुढची पिढी आम्हाला याला जबाबदार धरेल. होणारी युद्धे ही अत्यंत दुर्गम, डोंगराळ, बर्फाळ प्रदेशात लढली जाणार आहेत. ही युद्धे फार काळ न चालणारी असतील आणि यात पायदळाच्या सैनिकांनाच महत्वाची पण अखेरची भूमिका बजवावी लागणार आहे. हे सर्व संबधितांनी लक्षात ठेवावे. यासाठी स्चयंचलित रायफल्सची संख्या प्रचंड प्रमाणात वाढवणे अटळ आहे.”

हे वाचल्यावर मला खात्री आहे की पुढच्या पिढ्या त्या पराभवाचे खापर सेनादलांवर न फोडता योग्य ठिकाणी, योग्य लोकांना यासाठी जबाबदार धरतील. श्री. कृष्णमेनन यांनी परराष्ट्रखात्यात लुडबुड करण्यापेक्षा स्वत:च्या खात्यात जास्त लक्ष दिले असते आणि सेनादलातील अधिकार्‍यांशी योग्य प्रकारे चर्चा केली असती तर मला खात्री आहे आपल्या देशावर ही नामुष्की ओढवली नसती. पण श्री. कृष्णमेनन यांना परराष्ट्र खात्याचे फारच आकर्षण होते.....श्री. कृष्णमेनन यांचे काम काय होते, त्यांच्या जबाबदार्‍या काय होत्या यात कुठलीही संदिग्धता नव्हती. सेनादलांच्या आधुनिकीकरणासाठी निधी प्राप्त करायची जबाबदारी त्याचीच होती. यासाठी सर्वोच्च अधिकार असणार्‍या माणसाकडे (ज्याच्याकडे त्यांचे सगळ्यात जास्त वजन होते) मागणी नोंदवून ती त्यांना मान्य करायला लावणे ही ही त्यांचीच जबाबदारी होती. बरं हे सगळे होत नव्हते, सेनादलांची स्थिती अत्यंत वाईट होती तर त्यांनी युद्ध गर्जना करायला नको होत्या..................या पुढे दिवाळी नंतर.......

या विषयाअंतर्गत अजून एका महत्वाच्या व्यक्तिमत्वावर लिहायला पाहिजेच. ते म्हणजे जनरल कौल.
श्री. कृष्णमेनन यांनी स्वत:च्या खात्याची वाट तर लावलीच होती पण त्यांना विरोध करणार्‍या वरिष्ठ अधिकार्‍यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला होता. जून्या आधिकार्‍यांनी विरोध केला होता, तरीही ज. कौल यांच्या बढतीत श्री. कृष्णमेनन यांचा हात होताच. ते या नावाबद्द्ल एवढे का आग्रही होते हे एक उघड गुपीत आहे. सगळ्यात कहर झाला म्हणजे ज. कौल यांना हाताशी धरून श्री. कृष्णमेनन यांनी ज. मानेकशॉ यांना बढतीपासून रोखण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा. नशिबाने तीन जनरल्सच्या चौकशी समितीने त्यांना निर्दोश तर ठरवलेच पण साक्षिदारांचीच चौकशी करायचे आदेश काढल्यावर हे प्रयत्न थंडे पडले.

लोकं समजतात तसे हे जनरल कौल काही मुर्ख नव्हते, हा माणूस अत्यंत हुषार, बुद्धिमान व सॅंढर्स्ट, इंग्लंड, येथून किंग्ज कमिशन घेऊन बाहेर पडला होता. त्यांनी आयुष्यात एकच मोठी चूक केली ती म्हणजे दुर्दैवाने त्यांनी पायदळाच्या पुरवठा विभागात कमिशन स्विकारले. त्यातून बाहेर पडून, लढणार्‍या रेजिमेंट्मधे जायचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला पण ते त्यांना जमले नाही. शेवटी त्यांच्या दुर्दैवाने किंवा आपल्या दुर्दैवाने त्यांची पं नेहरूंची गाठ पडली आणि त्यांच्या ओळखीने त्यांनी हे आपले स्वप्न पूर्ण केले. ते झाले Lt. General B.M. Kaul, GOC IV Corps. यांना ना युद्धभूमीचा अनुभव होता ना युद्धनिती आखण्याचा. नामका-चूच्या किनारी जे युद्ध झाले त्यात यांच्यामुळे ७व्या ब्रिगेडचा सफाया झाला आणि आपल्या पायदळाला नामुष्कीने जगात मान खाली घालायला लागली. या ७-ब्रिगेडला तोफखान्याची अत्यंत जरूरी आहे असे ज. कौल यांचे सगळे सहकारी सांगत असताना त्यांनी त्यांचे ते जगप्रसिद्ध उदगार काढले “ज्या सैन्याचे मनोबल उच्च आहे त्यांना तोफखान्याची जरूरी काय !” सध्या आपल्या सर्व अधिकार्‍यांना युद्ध कसे करू नये हे शिकवण्यासाठी या लढाईचे उदाहरण दिले जाते. जेव्हा पं नेहरूंनी आणि श्री. कृष्णमेनन यांनी चिन्यांना बाहेर फेकून द्यायच्या वल्गना केल्या व थागलामधे कारवाई करण्याचे आदेश दिले तेव्हा ज. कौल यांच्यावर विश्वास असल्यामुळे त्यांना ही कामगिरी देण्यात आली. याचवेळी इतरांनी राजिनामे का दिले नाहीत याचे उत्तर शोधावे लागेल आणि त्यासाठीही मला वाटते काहींना जबाबदार धरावे लागेलच. उदा. ज. थापर- चिफ ऑफ आर्मी स्टाफ आणि ले. जनरल सेन जे इस्टर्न कंमाडचे जी.ओ.सी होते. अर्थात त्यांचे मुल्यमापन करताना हेही लक्षात घेतले पाहिजे की त्या काळात वरिष्ठ लष्करी आधिकार्‍यांची इतकी मानहानी करण्यात आली होती की सगळे दबून होते. ज. कौल यांच्या विरुद्ध काही बोलणे म्हणजे नोकरीवर गदा, किंवा निवृत्त झाल्यावर मिळणार्‍या फायद्यांवर पाणी सोडणे इतका सरळ अर्थ होता. कारण यांनाही पं नेहरूंचा वैयक्तिक पाठिंबा होता व त्याची कारणे दोन. एक तर ते काश्मिरी होते आणि दुसरे म्हणजे ज. कौल यांनी त्यांच्यावर प्रचंड छाप पाडली होती. चिफ ऑफ जनरल स्टाफ या पदावरून त्यांनी हे युद्ध आपल्या तंत्राने चालवले. हे पद नंतर रद्दच करण्यात आले ती गोष्ट वेगळी.

नामकाचूला काय झाले याच्यात फार खोलात जाण्यात अर्थ नाही. त्यावर एक वेगळी लेखमालाच लिहावी लागेल पण थोडक्यात सांगतो. ७व्या ब्रिगेडला जवळजवळ ६०० टन सामानाची आवश्यकता होती. त्या बदल्यात त्यांना मिळाले फक्त १२० टन. लक्षात घ्या त्यांना चिनी सैन्यावर आक्रमण करायचा आदेश होता. त्यांच्याकडे फक्त दोन हॉविट्झर तोफा होत्या ज्यांचा पल्ला चीनी तोफांपेक्षा खूपच कमी होता. त्यासाठी लागणारा दारूगोळ्याच्या फक्त २६० राऊंडस देण्यात आले होते. त्या विभागातले भारतीय रस्ते (?) हे पूर्णपणे चीनी सैन्याच्या नजरेखाली येत होते. सैनिक सपाट प्रदेशातून एकदम उंचीवर लढायला गेल्यामुळे काही युद्धभूमीवर जायच्या अगोदरच मृत्यूमूखी पडले वा आजारी पडले. त्यांच्या अंगावर सूती गणवेश आणि लागलाच तर एक पातळ स्वेटर होता आणि रात्री हाडे गोठवणार्‍या थंडीपासून बचाव करण्यासाठी त्यांना उदार अंतकरणाने एक ब्लॅंकेट देण्यात आले होते. बरे ते सुद्धा काही सैनिकांना दोघात एक असे वापरावे लागत होते. सगळ्यात हद्द झाली ती म्हणजे जेव्हा चिन्यांशी यांची गाठ पडली तेव्हा यांच्या कडे प्रत्येकी त्यांच्या जुनाट बंदूकीच्या फक्त ६० फैरी होत्या. काही पुढच्या आघाडीवर त्या संपल्यावर पुरवठाही होत नव्हता, बटालियनच्या उखळी तोफांना दारूगोळा नव्हता तर साखर, चहा आणि मिठाचे दुर्भिक्ष होते. पैसे वाचवण्यासाठी लष्कराच्या पुरवठा खात्याने जुनी पॅराशूट दुरूस्त करून विमानातून पुरवठा करण्यासाठी वापरली होती जी मधेच तुटायची किवा फाटायची आणि भरकटत कुठेही जाऊन पडायची. काही वेळा तर सैनिकांना ती मिळवण्यासाठी खाली वर ८/९ मैलाची सफर करायला लागायची.

ज. कौल स्वत: या युद्धाच्या तयारीवर नजर ठेवून होते व त्यांनीच या युद्धाची योजना आखली होती. पण यांनी आक्रमण करायच्या अगोदरच जेव्हा चीननेच आक्रमण केले तेव्हा ज. कौल स्वत: आघाडीवर युद्धभूमीची पहाणी करायला गेले. तेव्हा यांना आपण आपल्या सैनिकांना कशाच्या खाईत ढकलले हे याची जाणीव झाली. हे झाल्यावर ते आजारी पडले (खरंतर त्यांना एवढ्या उंचावर जाण्याची काही आवश्यकता नव्हती आणि नंतर हेही सिद्ध झाले की ते आजारी नव्हते) आणि त्यांनी सरकारला तातडीचा निरोप पाठवला की चिनी सैन्याने मोठ्या प्रमाणावर आक्रमण केले आहे आणि त्यांना थोपवण्यासाठी अमेरिका आणि इंग्लंडने मध्यस्ती किंवा मदत केली तरच आपला निभाव लागेल. आघाडीवर असताना ब्रिगेड कमांडरला काही थातूरमातूर सुचना करून झाल्यावर या जनरलने अजून एक प्रसिद्ध वाक्य उच्चारले. “ आता ही लढाई तुमची आहे – म्हणजे आता तुम्हीच हे सांभाळा”.
यांची अजून एक मजेशीर हकीकत सांगून यांची कहाणी संपवतो. जेव्हा ज. कौल तवांगला भेट द्यायला गेले तेव्हा त्यांना आघाडीवरची ठाणी स्वत:ला तपासायची होती. विरळ हवेमुळे त्यांची अगोदरच दमछाक झाली होती. खेचरेही उपलब्ध नव्हती. एका हमालाने चक्क आपल्या General Officer Commanding, Indian IV Corps and temporarily-on-leave Chief of the General Staff यांना पाठूंगळी घेतले आणि तो चढ चढला. ज्या सैनिकांच्या पाठीवर अवजड सामानचे ओझे होते, गळ्यात ती जुनाट जड रायफल होती आणि जे मोठ्या कष्टाने तो मार्ग गेले काही दिवस चढत होते, त्यांच्या शेजारून चालत होते, त्यांना हे दृष्य पाहून काय वाटले असेल हे परमेश्वरालाच माहीत.......................

आता भेट पुढच्या महिन्यात..... तो पर्यंत दिपावलीच्या शुभेच्छा !
जयंत कुलकर्णी.

इतिहासकथासमाजराजकारणसमीक्षालेखअनुभवसंदर्भ

प्रतिक्रिया

इरसाल's picture

22 Oct 2011 - 10:38 pm | इरसाल

भयानक आहे हे............

लॉरी टांगटूंगकर's picture

22 Oct 2011 - 10:51 pm | लॉरी टांगटूंगकर

मागच्या गोष्टीन मधून काही शिकले पाहिजे म्हणून त्या सांगितल्या जातात पण इथे असे काही आपण शिकलोय असं वाटत नाही... :’(

अंधारातील गोष्टी अंधारात असू द्याव्या असे उगाच वाटले ...

शेवटचे काही परिच्छेद वाचून अविश्वसनीय!! भीषण! हेच शब्द सुचतात.
आपण पानीपतच्या पराजयाची कारणमीमांसा, मुंबई हल्ल्यात गेलेल्या बळींची कारणमीमांसा वाचतो ते, आणि हे फार वेगळे आहे असे वाटत नाही... पहिले पाढे पंचावन!
आपण काहीही शिकत नाही, शिकणार नाही हे अधोरेखित झाले.

आपण हे लिहील्याबद्दल धन्यवाद.

आत्मशून्य's picture

23 Oct 2011 - 12:48 am | आत्मशून्य

खरोखर लज्जास्पद...

मन१'s picture

22 Oct 2011 - 11:58 pm | मन१

.

सुहास झेले's picture

23 Oct 2011 - 1:00 am | सुहास झेले

काय बोलावं हेच सुचत नाही.... हम नही सुधरेंगे :( :(

तिमा's picture

23 Oct 2011 - 10:45 am | तिमा

जयंतराव,
हे सर्व वाचून मन एवढे निराश होते की मधूनमधून 'आता तरी तसे नाहीये' असे कोणी सांगावेसे वाटते. अर्थात तेही वास्तवात तसेच असले तर! आत्ताही तीच परिस्थिती असली तर आपल्या देशाला वाचवणार कोण?

आजही ही परिस्थिती फारशी बदललेली नाही. कारगिल युद्धातही आपल्या सैनिकांकडे घुसखोरांपेक्षा कमी दर्जाची शस्त्रास्त्रे व सामुग्री होती. ( उदा. एके-५७ वि. इन्सास). खुद्द परमवीर चक्र मिळालेल्या वीराची बंदूक अडकली आणि त्याला शत्रूवर संगीन / दस्त्याने हल्ला करायची वेळ आली ज्यात त्याचा खांदा फ्रॅक्चर झाला.

हे वाचल्यावर मला खात्री आहे की पुढच्या पिढ्या त्या पराभवाचे खापर सेनादलांवर न फोडता योग्य ठिकाणी, योग्य लोकांना यासाठी जबाबदार धरतील.

सैन्यदलांवर याचे किंवा कशाचेच खापर कधीही, कोणीही फोडले नसावे. या सर्व लोकांच्या एकत्रित गाढवपणाची किंमत ते शेवटी आपल्या रक्ताने चुकवतात, चुकवत आहेत.

अप्पा जोगळेकर's picture

23 Oct 2011 - 4:26 pm | अप्पा जोगळेकर

डोकं गरगरायला लागलं आहे.
जनरल कौल यांच्याबद्दल जे लिहिले आहे ते वाचून तर डोके बधिर झाले.

“ आता ही लढाई तुमची आहे – म्हणजे आता तुम्हीच हे सांभाळा”
असे उद्गार काढण्यापेक्षा विष खाउन मेले असते तर बरे झाले असते.
भारतीय सैन्यात अशा दर्जाच्या माणसाची जनरलपदी नेमणूक व्हावी ही शरमेची बाब आहे.

मदनबाण's picture

24 Oct 2011 - 10:37 am | मदनबाण

आरारा...बेक्कार ! :(
पुढच्या भागाची वाट पाहतोय...

ऋषिकेश's picture

24 Oct 2011 - 11:56 am | ऋषिकेश

सर्वप्रथम लेखमाला (एकांगी असली तरी) चांगली चालु आहे व अभ्यासपूर्ण आहे. अभिनंदन!

१९६२ सालच्या धक्क्यानंतर नेहरू आणि श्री. कृष्णमेनन यांच्या बागलबच्च्यांनी श्री मोरारजी देसाईंवर हे प्रकरण शेकवायचा बराच प्रयत्न केला.

आणि तुम्ही श्री कृष्णमेनन यांच्यावर शेकवायचा प्रयत्न करताय :) ;)
असो. सत्य या सगळ्याच्या मधे कुठेतरी असावे असे वाटते.

या विषयावर डिट्टेलवार जाहिर चर्चा करण्यापूर्वी पार्श्वभूमी म्हणून काहि प्रश्नांवर आपली मते जाणून घेऊ इच्छितो.
काहि प्रश्न:
१. चीनने आपल्यावर हल्ला का केला असे आपल्याला वाटते? भारतावर हल्ला हा केवळ चीनचा विस्तारवाद होता असे आपल्याला वाटते का?
२. चीन युद्धा आधी भारताची पाश्चिमात्य देशांकडून शस्त्रे खरेदी करायची (आर्थिक) कुवत होती का?
३. (समजा भारताची कुवत असो नसो, भारताने शस्त्रखरेदी करायची ठरविली तर) शस्त्रखरेदीसाठी पाश्चिमात्य देशांनी काहि अटी घातल्याची आपल्याला कल्पना असेलच. त्या अटी स्वीकारून भारताने ती शस्त्रे खरेदी करावीत असे आपणाला वाटते का?
४. (समजा भारताची कुवत असो नसो, भारताने शस्त्रखरेदी करायची ठरविली तर) ती शत्रे विकत घेऊन हे युद्ध आपण निश्चितपणे जिंकलो असतो असे आपण मानता का? असल्यास कशाच्या आधारावर आपले असे मत आहे?

या प्रश्नांच्या मुळाशी शिरलात तर या युद्धाकडे, प्रशासनाच्या व सरकारच्या भुमिकेकडे बघायचा दृष्टीकोन बदलेल असे वाटते.

जयंत कुलकर्णी's picture

24 Oct 2011 - 3:56 pm | जयंत कुलकर्णी

// सर्वप्रथम लेखमाला (एकांगी असली तरी) चांगली चालु आहे व अभ्यासपूर्ण आहे. अभिनंदन!//

आपण जर माझा मन१ यांना दिलेला प्रतिसाद वाचला असतात तर हे वाक्य कदाचित आपण लिहिले नसते ( नैसर्गिकरीत्या. अर्थात काहितरी विरूद्ध लिहायचेच असे असेल तर हे वाक्य बरोबर आहे.

//आणि तुम्ही श्री कृष्णमेनन यांच्यावर शेकवायचा प्रयत्न करताय...//

मी फक्त काय झाले आहे ते मांडायचा प्रयत्न करतोय. त्यात मी काही खोटे लिहिले असेल तरच वाद होऊ शकतो.

//या विषयावर डिट्टेलवार जाहिर चर्चा करण्यापूर्वी पार्श्वभूमी म्हणून काहि प्रश्नांवर आपली मते जाणून घेऊ इच्छित////

मला या विषयावर डिट्टेलवार चर्चा करायची नाही. आपण आपली मते व सत्यशोधन अजून एखाद्या धाग्यावर लेख लिहून मांडावीत त्याचे स्वागत आहे. म्हणजे ती मते व सत्य शोधन येथे देऊ नका असे माझे म्हणणे नाही पण एक वेगळा धागा काढला (काथ्याकूट) तर त्यावर तुम्हाला डिट्टेलवार चर्चा करता येईल.

//१. चीनने आपल्यावर हल्ला का केला असे आपल्याला वाटते? भारतावर हल्ला हा केवळ चीनचा विस्तारवाद होता असे आपल्याला वाटते क//////
याबाबत मी अजून लिहिले नाही. आपण का घाई करताय ?

//चीन युद्धा आधी भारताची पाश्चिमात्य देशांकडून शस्त्रे खरेदी करायची (आर्थिक) कुवत होती क//////

जरी नसली तरीही शेवटी आपण ती मागितली आणि ती आपल्याला फूकट मिळाली हे सत्य आहे. कारणे काहीही असोत. म्हणजे चीन एक कम्यूनिस्ट राष्ट्र असल्यामुळे मिळाली असोत. दुर्दैवाने कम्युनीस्ट रशीयाने आपल्याला त्यावेळी मदत केली नाही हे सत्य आहे.

//(समजा भारताची कुवत असो नसो, भारताने शस्त्रखरेदी करायची ठरविली तर) शस्त्रखरेदीसाठी पाश्चिमात्य देशांनी काहि अटी घातल्याची आपल्याला कल्पना असेलच. त्या अटी स्वीकारून भारताने ती शस्त्रे खरेदी करावीत असे आपणाला वाटते क//////

आपण कुठल्या काळातील शस्त्रे खरेदी बद्दल बोलत आहात त्याची कल्प्ना नाही. पण चीनच्या आक्रमणाच्या वेळी कसल्याही अटी अमेरिका व इंग्लंडने घातलेल्या मला माहित नाहीत. आपणास माहित असल्यास सांगणे, ती ही माहिती या लेखात दिली जाईल.

//(समजा भारताची कुवत असो नसो, भारताने शस्त्रखरेदी करायची ठरविली तर) ती शत्रे विकत घेऊन हे युद्ध आपण निश्चितपणे जिंकलो असतो असे आपण मानता का? असल्यास कशाच्या आधारावर आपले असे मत आह//////

परत घाई ! मी या लेखात आत्तापर्यंत कसलेही दावे केलेले नाहीत. त्यामुळे या जरतरीय प्रश्नाचे उत्तर मी कसे देणार ? मी जी माहीती आपल्या समोर ठेवणार आहे त्यावारून वाचकांनी आपले मत बनवायचे आहे.

:-)

//या प्रश्नांच्या मुळाशी शिरलात तर या युद्धाकडे, प्रशासनाच्या व सरकारच्या भुमिकेकडे बघायचा दृष्टीकोन बदलेल असे वाटत//////

आपले वय काय आहे याची मला कल्पना नाही. आपण प्रशासन/ सेनादले/सरकार/ यांच्या भुमिकेचा आभ्यास केला आहे का ? -त्यावेळेच्या.... केला असेल तर कदाचित आपला दृष्टीकोन बदलेल असे मला खात्रीने वाटते. पण आपण केला नसेल तर आपण तो जरूर करावा हि विनंती. अहो, या विषयावर सध्या आपण सगळे विचार करताय हेच माझ्यासाठी खूप आहे. :-)

ऋषिकेश's picture

24 Oct 2011 - 6:27 pm | ऋषिकेश

आपले वय काय आहे याची मला कल्पना नाही.

याचा इथे काय संबंध हे कळले नाहि!
असो.

मला या विषयावर डिट्टेलवार चर्चा करायची नाही.

धन्यवाद! स्पष्ट केल्याबद्दल (व माझे टंकनकष्ट वाचवल्याबद्द्ल) विशेष आभार!
माझ्याकडून (प्रस्तावित) चर्चेला व या लेखमालेवरील प्रतिक्रीयांना पूर्णविराम देतो.

जयंत कुलकर्णी's picture

24 Oct 2011 - 6:35 pm | जयंत कुलकर्णी

नमस्कार,

आपल्या वयाबद्दल बोललो त्याचा आपल्याला राग आला असेल तर आपली क्षमा मागतो. वय विचारले त्याचे कारण फक्त एकच वयानुसार माणसाची विचार करायची पद्धत बदलते. आपण जर माझ्याच वयाचे असाल तर शक्यता आहे की आपल्याला माझे म्हणणे लवकर पटेल किंवा तुमचे मला. दुसरे तुम्ही वयाने माझ्या एवढे असाल तर त्या काळाच्या आसपास आपण समजदार असाल तरीही चर्चा जास्त साधक बाधक होऊ शकते.

दुसर्‍या परिच्छेदासाठी धन्यवाद, आपली मर्जी ! मीही जरा लेखनात वेळ घालवावा म्हणतो.

ऋषिकेश's picture

24 Oct 2011 - 6:55 pm | ऋषिकेश

आपल्या वयाबद्दल बोललो त्याचा आपल्याला राग आला असेल तर आपली क्षमा मागतो.

राग आला नसल्याने क्षमा गैरलागू :) प्रश्न विचारला कारण मला संबंध लावता न आल्याने उत्सुकता होती.

वयानुसार माणसाची विचार करायची पद्धत बदलते

सहमत आहे

दादा कोंडके's picture

24 Oct 2011 - 4:55 pm | दादा कोंडके

च्यामारी, हे वाचून त्यांच्या अंगात "रक्त होतं का गाढवाचं मूत*, हेच कळत नाही".
*सदर शब्द जीएंकडून उधार.

अप्पा जोगळेकर's picture

24 Oct 2011 - 9:46 pm | अप्पा जोगळेकर

हा जीए कोण आहे ते ठाउक नाही.
पण अशा प्रकारची प्रतिक्रिया येथे देण्याची काही गरज नव्हती.
कॄपया हीन शब्द वापरुन चांगल्या धाग्याची वाट लावू नये अशी कळकळीची विनंती.

आत्मशून्य's picture

25 Oct 2011 - 3:40 am | आत्मशून्य

जीए म्हणजे बहूतेक जीए कूलकर्णी असावे.

प्रदीप's picture

25 Oct 2011 - 3:31 pm | प्रदीप

जीए म्हणजे बहूतेक जीए कूलकर्णी असावे.

जीए कूलकर्णी नव्हे, जीएकूलकर्णी.

वसईचे किल्लेदार's picture

25 Oct 2011 - 12:54 am | वसईचे किल्लेदार

बास ... दिवाळीपर्यंत (सूटीत) विचार + अभ्यास करण्यास एव्हढे पूरेसे आहे.
पूढील भागांची ऊत्सूकता आहेच ...
धन्यवाद!

जयंत कुलकर्णी's picture

25 Oct 2011 - 4:27 pm | जयंत कुलकर्णी

अचानक लक्षात आले आहे की दिवाळीतच जास्त वेळ मिळतोय म्हणून पूधचा भागही टाकत आहे. :-)

हुप्प्या's picture

25 Oct 2011 - 6:16 am | हुप्प्या

नेहरू-गांधी घराण्याशी कडवे इमान असणार्‍या जातिवंतांना ह्या लेखमालेने मिरच्या झोंबणे स्वाभाविक आहे.
पण विरोधाचे नाणे खणखणीत असल्याने मूग गिळून सहन करावे लागणार असेच दिसते आहे.

एकंदरीत नेहरू आणि त्याच्या पिलावळीचा भारतीय लोकांकडे बघण्याचा तुच्छतेचा दृष्टीकोन अधोरेखित होत आहे.
केवळ खादी गुंडाळली म्हणून हा माणूस (आणि पिलावळ) भारतीय झाला नाही. मनाने कायम वर्णद्वेष्टा इंग्रजच राहिला असे दिसते आहे.
भोंगळ समाजवाद, विश्वबंधूत्वाच्या तत्त्वज्ञानाची भुरळ पडलेला हा माणूस असे उत्पात घडवून आणता झाला ह्यात आश्चर्य नाही.
काश्मीरचे भिजत घोंगडे, चीनविरुद्ध मानहानीकारक पराभव, मुस्लिम लांगूलचालन अशी कर्तबगारी असताना इतके भगतगण त्याच्या कच्छपी कसे लागतात हेच आश्चर्य आहे.

नितिन थत्ते's picture

25 Oct 2011 - 8:47 am | नितिन थत्ते

>>पण विरोधाचे नाणे खणखणीत असल्याने मूग गिळून सहन करावे लागणार असेच दिसते आहे.

ओ थांबा थांबा,

आमचा संन्यास चालू आहे.

शिवाय

या विषयावर चर्चा करण्याची इच्छा नाही असे धागाकर्त्यांनी मला आणि काही प्रश्न विचारणार्‍या ऋषिकेष यांना सुचवल्याने संन्यास संपल्यावरही गप्पच राहणार आहे.

जयंत कुलकर्णी's picture

25 Oct 2011 - 10:48 am | जयंत कुलकर्णी

//या विषयावर चर्चा करण्याची इच्छा नाही असे धागाकर्त्यांनी मला आणि काही प्रश्न विचारणार्‍या ऋषिकेष यांना सुचवल्याने संन्यास संपल्यावरही गप्पच राहणार आह//////

चर्चेसाठी वेगळा काथ्याकूट धागा काढायची विनंती केली आहे हे पण लिहा. दुसरे त्यांनी मला जे प्रश्न विचारले आहेत ते असे झाले तर तसे झाले तर.. या स्वरूपाचे आहेत. मी इतिहास लिहितोय. त्या प्रश्नांची उत्तरे मी पामर काय देणार ?

नितिन थत्ते's picture

25 Oct 2011 - 11:59 am | नितिन थत्ते

वेगळा काथ्याकूट काढावा की नाही तो निर्णय आम्ही घेऊ परंतु या धाग्यांवर चर्चा करण्यास आपण बंदी केली आहे हे तर खरेच आहे.

अन्यथा धागा वाचनमात्र* ठेवण्याची सुरुवातीसच व्यवस्थापनास विनंती करायला हवी होती.

* मात्र धागा वाचनमात्र ठेवला असता तर "चान चान", "वा वा, अजून येऊ द्या" असे प्रतिसाद येऊ शकले नसते.

जयंत कुलकर्णी's picture

25 Oct 2011 - 12:24 pm | जयंत कुलकर्णी

तुम्ही नीट वाचत नाही बूवा. मी उलट असे म्हटलेले आहे की येथे कोणालाही मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे, फक्त मी त्याचा प्रतिवाद करेन असे नाही..... येथे लिहायला कोण कोणाला आडवणार ?

///* मात्र धागा वाचनमात्र ठेवला असता तर "चान चान", "वा वा, अजून येऊ द्या" असे प्रतिसाद येऊ शकले नस///////
हे जरा वैयक्तिक होते आहे. मी चान चान साठी लिहीत नाही मला वाटते आपल्याला हे आत्तापर्यंत कळायला हवे होते. ते येतच असतात......

मी आपल्याला मी असेही म्हटले आहे असे लिहिले आहे. आपण धागा काढावा की नाही हा निर्णय आपला आहे हे समजण्या एवढे सुज्ञ आपण सर्वच आहोत.
असो हा माझा आपल्याला शेवटचा प्रतिसाद, कारण मी चान चान साठी लिहितो हे वाचणे माझ्या कुवतीच्या बाहेर आहे.
:-)

या धाग्यावर /याच्या पुढच्या भागावर रामदास काकांच्या प्रतिसादाची आतुरतेने वाट पाहत आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Oct 2011 - 2:48 pm | llपुण्याचे पेशवेll

आपल्यामुळे बर्‍याच गोष्टी कळत आहेत. अन्यथा आम्ही पण बुद्धीभेदी लिखाण वाचून नेहरू चान चान होते असे म्हणत राहीलो असतो.
अवांतरः ले.जनरल थोरात देखील त्याच काळात लष्करी सेवेत होते ना?

अन्यथा आम्ही पण बुद्धीभेदी लिखाण वाचून नेहरू चान चान होते असे म्हणत राहीलो असतो.

आत्ताच एक धक्का दायक भाग वाचला... जेव्हा ब्रिटीश जनरल सर रॉब लॉकहार्ट डिफेन्स पेपर घेउन नेहरुंकडे गेले होते तेव्हा... लॉकहार्ट ने दिलेले पेपर पाहुन बकवास आहे, आम्हाला डिफेन्स पॉलिसीची गरज नाही,आमची पॉलिसी "अहिंसा" आहे.आम्हाला कोणापासुनही धोका नाही,हे सर्व स्कॅप्र करुन टाका,असे नेहरु म्हणाले !
संदर्भ :--- http://goo.gl/zZ3qi (पान नंबर २०)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Oct 2011 - 12:41 am | निनाद मुक्काम प...

येथे आर्मी चीफ थापर ह्यांचा उल्लेख आला. त्यांना १९६२ च्या मानहानीकारक पराभवासाठी प्रचंड मानहानी वाट्याला येऊन शेवटी राजीनामा द्यावा लागला .पुढे त्यांचे ज्युनियर अधिकारी माणकेशा ह्यांची त्याकाळात मुस्कटदाबी होत होती त्यांना यशवंत रावांच्या काळात योग्य ती संधी मिळाली .पुढे ते १९७१ च्या युद्धाचे शिल्पकार म्हणून ओळखू जाऊ लागले.
हे थापर सुप्रसिद्ध इतिहासकार रोमेल थापर ह्यांचे काका व मुलाखतकार करन थापर ह्यांचे वडील होते .
पुढे करन थापर ह्यांनी वेळी वेळी माणकेशा ह्यांच्याविषयी मुलाखती घेतल्या
.( पण आजही भारतीयांच्या मनात मान्केषा आदर आहे. थापर ह्यांचे नाव सुद्धा आजच्या पिढीला माहीत नाही आहे .)

@ ऋषिकेश

नितीन थत्ते ह्यांच्या खव मध्ये मी काही मुद्दे मांडले आहेत .ज्याच्याशी ते बहुतांशी सहमत आहेत. तुम्ही ते वाचा. ह्या उपर तुम्हाला काही शंका असतील तर त्यांचे समाधान मी ह्याच लेखात जाहीररीत्या करेन .( तुम्ही एक प्रश्न मात्र सुरेख विचारला की आपली शस्त्र खरेदी करायची शमता त्यावेळी होती का ?) माझ्या मते नव्हती .

.अश्यावेळी १९४७ ला पाकिस्तानशी युद्ध व चीन शी सीमेबद्दल वाद व हैद्राबाद चा निजाम व गोवा हे आपल्यासाठी तेव्हा मोठे प्रश्न होते .अश्यावेळी कोणी आगाऊ पणा करून आपल्यासारख्याच छोट्या राष्ट्राना एकत्र घेऊन दोन बड्या महासत्तांना शहाणपण शिकवण्यासाठी तिसरी आघाडी निर्माण करायला सांगितले

आज जर आपण नवजात राष्ट्र आहोत तेव्हा बड्या राष्ट्रांशी मिळून मिसळून राहिलो असतो तर चीन ने एवढी हिंमत केली नसती .) नेहरू ह्यांना जागतिक राजकारण पुढेपुढे करायची फार खुमखुमी होती .जगाला शांतता शिकवायला निघाले होते .पण हे सोयीस्कर रीत्या विसरले की बाजूला चीन ,पाकिस्तान ,निजाम ,गोवा अशी अनेक धगधगती तत्कालीन कारणे असून कधीही युद्ध पेटू शकते .पाकिस्तान ने तर काश्मीर वरून उभा दावा मांडला होता .व निजाम सुरवातीपासून भारतविरोधी कारवाया करत होता.

मेनन ह्यांनी अमेरिकेत १९६१ साली गोव्याविषयी आपली भूमिका अमेरिकेत समजवायला गेले होते ( की आम्ही का लष्करी कारवाई केली .मात्र त्यांच्या राष्ट्राध्यांना शांततेचा बोधान्मृत पाजून ते परत आले .ह्यामुळे वेस्टन वल्ड च्या मनात भारताविषयी अढी निर्माण झाली .शेवटी राव ह्यांच्या हाती सत्ता आली .प्रथमच गांधी घराण्या व्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीकडे सत्ता हाती आल्यावर राव ह्यांनी आर्थिक व परराष्ट्र धोरण बदलले व लुक वेस्ट हा नारा दिला .ह्याचा परिणाम म्हणून आतापर्यत बहुतेक महत्वाच्या वेस्टन वल्ड च्या नेत्यांनी आपल्या देशाला ह्या ५ वर्षात भेट देऊन आर्थिक व सामरिक करार केले आहेत
.
मेनन ह्यांच्या व मिजासखोर स्वभावामुळे वेस्टन वल्ड मध्ये त्यांची व पर्यायाने आपली प्रतिमा खराब झाली होती .मेनन हे अमेरिका व रशिया किंवा इंग्लंड चे मंत्री असते तर जगात त्यांच्या ह्याचं स्वभावाचे कौतुक झाले असते .
.( महासत्तेने मिजासखोरी केली तर चालून जाते हे अमेरिकेचे आजवरचे वर्तन पहिले तर कळून येते. आहे .मात्र १९६० च्या दशकात भारताच्या ह्या मंत्र्यातर्फे ही मिजासखोरी कशी सहन होईन .)
वर नेहरूंची भाषा जागतिक शांततेची गूग्ले मरथि