रविंद्र पाटील या नावाला स्वतंत्र ओळख नाही पण 'सलमान खान' हा संदर्भ दिला की त्यांची ओळख पटू शकेल.
रविंद्र पाटील हे सलमानचा अंगरक्षक म्हणून नेमलेले पोलिस काँस्टेबल होते, होते म्हटले कारण आता ते या जगात नाहीत. पैसा आणि अधिकार या दोहोंच्या ताकदीने मिळून एका निष्पाप प्रामाणिक माणसाचा कसा बळी घेतला त्याचीच ही कहाणी.
गेले काही दिवस लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न बनलेल्या चि.कु.सलमान खान खटल्याबाबत माहिती करून घेतांना काही धागे मिळाले. या संदर्भातील काही लेख आंतरजाल तसेच व्हॉटसएप इ.वर उपलब्ध आहेत त्यातील हा एक त्यात असलेल्या तपशीलवार माहितीमुळे इथे देत आहे.
*** बहुचर्चित अशा सलमान खानच्या 'हिट अॅन्ड रन' प्रकरणाचा आज निकाल लागलाय. सलमान या प्रकरणात दोषी आढळलाय... त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय तसंच २५ हजारांचा दंडही ठोठावण्यात आलाय. पण, ही शिक्षा रविंद्र पाटीलच्या उद्ध्वस्त आयुष्यासमोर काहीच नाही... रविंद्र पाटीलचा एकच गुन्हा होता आणि तो म्हणजे, या अपघाताच्या वेळी पोलीस कॉन्स्टेबल असलेला २४ वर्षांचा रविंद्र सलमानच्या सोबतच त्याचा बॉडीगार्ड म्हणून उपस्थित होता... आता तो या जगात नाही... ३ ऑक्टोबर २००७ रोजी रविंद्रचा डिप्रेशननं आणि क्षयरोगानं बळी घेतला.
➡रविंद्रनं दाखल केली होती एफआयआर...
याच रविंद्र पाटीलनंच सलमानच्या गाडीच्या अपघातानंतर पहिल्यांदा एफआयआर दाखल केली होती. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रितसर तक्रार दिली होती. मूळचा धुळ्याचा असलेला रवींद्र पाटील १९९८ बॅचचा पोलीस कॉन्स्टेबल.... मुंबई पोलिसांच्या प्रोटेक्शन युनिटमध्ये कार्यरत होता. रवींद्रचे दोन्ही मोठे भाऊसुध्दा पोलीस दलातच कार्यरत होते.
➡रविंद्रनं कोर्टात दिली होती खरी साक्ष...
रविंद्र हा या प्रकरणातला महत्त्वाचा साक्षीदार होता... रविंद्रनं वांद्रे कोर्टात, सलमाननं जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेलहून घरी जाण्यासाठी गाडी काढली आणि वेगाने वांद्रेच्या दिशेने निघाला... यावेळी तो मद्य प्यायलेला होता... आपण त्याला याबद्दल जाणीव करून दिली होती, अशी साक्षही दिली होती.
➡रविंद्रवरचा दबाव वाढला...
यानंतर, 'हिट अॅन्ड रन' प्रकरणामुळे रविंद्रवरचा दबाव वाढला होता. तो कोर्टात वकिलांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायलाही घाबरत होता. त्यामुळेच तो डिप्रेशनमध्ये गेला...
➡पोलिसांचीच रविंद्रला वाटत होती भीती...
सीनिअर पोलीस अधिकाऱ्यांनी नोकरीवर अनुपस्थित राहिल्याचा आरोप लावून रविंद्रला नोकरीवरून काढलं होतं. त्यानंतरही पोलिसांनी त्याचा पिच्छा पुरवला... त्यामुळे रविंद्रच्या डिप्रेशनमध्ये अजूनच वाढ झाली. त्यानं मुंबई सोडली आणि दुसरीकडे निघून गेला.
➡कुटुंबीयांपासूनही दूर झाला रविंद्र...
मुंबई सोडल्यानंतर रविंद्र अनेकदा चोरून लपून आपल्या पत्नीला आणि कुटुंबीयांना भेटण्यासाठी एक-दोन दिवसांसाठी मुंबईला येत होता. कुटुंबीयांनीही त्याला या प्रकरणातून काढता हात घेण्याचा सल्ला दिला होता पण रविंद्रनं त्यांचं ऐकलं नाही...
➡साक्ष बदलण्यासाठी दबाव...
रविंद्रसोबत जे काही मोजके लोक होते त्यांच्या म्हणण्यानुसार सलमान खान प्रकरणातील साक्ष बदलण्यासाठी रविंद्रवर खूप जास्त दबाव होता. परंतु, रविंद्रनं शेवटच्या श्वासापर्यंत आपली साक्ष बदलली नाही. कुठलीही लाच त्यानं स्वीकारली नाही. धमक्यांना भीक घातली नाही.
➡कोर्टात अनुपस्थित राहण्यासाठी तुरुंगवास...
सलमान खान प्रकरणात कोर्टात अनुपस्थित राहण्याच्या आरोपाखाली रवींद्रला जेलमध्ये धाडण्यात आलं. आपल्याला तुरुंगात वाईट वागणूक मिळत असल्याचं सांगत रविंद्रनं आपल्याला तुरुंगात सीरियल किलर्सपासून दूर ठेवण्याची विनंती कोर्टात केली होती. पण, त्याची ही मागणी फेटाळण्यात आली.
➡भीक मागण्याची वेळ...
कुटुंबापासून वेगळा झाल्यानंतर रविंद्र बेपत्ता झाला होता... त्याचा ठावठिकाणा कुणालाही माहीत नव्हता. या काळात त्याला रस्त्यावर भीक मागताना अनेकांनी पाहिल्याचं सांगितलं जातं.
➡रविंद्रचे अखेरचे काही क्षण...
दारूचं व्यसन... आणि क्षयरोग
२०००७ मध्ये तो सेवरी म्युनिसिपल हॉस्पीटलमध्ये सापडला. खूप दारू प्यायल्याचा परिणाम म्हणून रविंद्रला क्षयरोग (टीबी) झाला होता. त्यामुळे, त्याच्यावर औषधांचा कोणताही परिणाम झाला नाही... आणि खंगून खंगून रविंद्रनं याच हॉस्पीटलमध्ये ३ ऑक्टोबर २००७ रोजी अखेरचा श्वास घेतला. यावेळी, त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबीयांपैकीही कुणी उपस्थित नव्हतं.
➡न्यायालयानं रविंद्रची साक्ष ग्राह्य धरली...
रविंद्रच्या मृत्यूनंतर २०१४ साली जेव्हा सलमान खानवर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली खटला पुन्हा सुरू झाला तेव्हा रविंद्रनं वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टात दिलेली साक्ष ग्राह्य धरण्याची सरकारी वकिलांची मागणी मान्य करण्यात आली...
सलमान खान ला पाच वर्षाची सजा झाली. सेशन कोर्ट जवळ बरेच सेलिब्रिटी सपोर्ट करीता आले होते. ब-याच जणांनी टीव्ही चॅनेल समोर चमकून घेतले. काहींनी अकलेचे तारे तोडले.
या सर्व केसचा उत्कृष्ट तपास करणा-या पोलीसांसाठी एकाही व्यक्तीने किंवा मिडीयाने प्रशंसा उद्गार काढलेले दिसले नाही.
सिनेस्टार ला शिक्षा झाली म्हणून सगळे चवीने चर्चा करतात. मिडीया टी.आर.पी. वाढवत बसली. हिरोला आणखी सूपरस्टार बनवतील.
जर हि शिक्षा झाली नसती तर पोलीसांचे वाभाडे मिडीयाने काढले असते आणि पोलीस तेव्हा बदनामीच्या किताबातील हीरो झाले असते. ***
सौजन्य: zeenews.india.com
या बाबतची आणखी माहिती खालील दुव्यांवर मिळू शकेल.
१. http://m.indiatimes.com/news/india/even-death-didnt-shake-his-conviction...
२. https://patil.wordpress.com/2013/07/08/ravindra-patil-salman-khan-hit-ru...
३. http://lighthouseinsights.in/blogger-soumyadipta-banerjee-deletes-his-po...
दि. ०७/०५/२०१५ च्या मटा मध्येही याबद्दल बातमी आली आहे.
या शिवाय अजूनही बरेच दुवे गुगल वर 'रवींद्र पाटील' या नावाने शोध घेतल्यास मिळू शकतात.
या खटल्यामुळे त्यांची माहिती थोडीफार वर येत आहे नाहीतर ज्या एका माणसाच्या साक्षीमुळे मुख्यत्वे सलमानवर खटला दाखल झाला आणि तो दोषी ठरून शिक्षा ही झाली, त्याचं जगणं आणि मरण दोन्ही अंधारातच राहिलं असतं.
एका धडधाकट देखण्या तरुणाचे केवळ पाच वर्षांच्या कालावधीत झालेले विदारक परिवर्तन मनाला चटका लावून जाते. त्यांची शोकांतिका वाचून कोणाही संवेदनशील माणसाचे मन हेलावून जाईल. सगळ्यात वाईट गोष्ट ही की एका होतकरू तरूणाच्या आयुष्याची परवड होत असतांना कोणीच त्याची मदत केली नाही, स्वत: त्याचं कुटुंब, त्यातही २ भाऊ पोलीस दलातच असतांनाही असं बेवारस मरण एखाद्याला यावं याहून दुर्दैव ते काय?
पोलिस खातं आपल्या रक्षणासाठी आहे असा आपला समज आहे पण हे पोलिसच जेव्हा काही पैशांसाठी विकले जातात आणि अधिकारांचा गैरवापर करून आपल्याच एका सहकाऱ्याच्या जिवावर उठतात तेव्हा कायदा आणि न्यायाची अपेक्षा आपण कोणाकडून करायची ?
'बीइंग ह्यूमन' ही संस्था काढणाऱ्या चि.कु.सलमानच्या माणूसकी बद्दल बोलावं तेवढं कमीच आहे.
स्वत: गुन्हा करूनही तो कबूल न करता सुटकेसाठी कोणत्याही थराला जाऊन, गुन्हा आपल्या ड्रायव्हरवर ढकलू पाहणारा आणि कोर्टात शपथ घेऊन निर्लज्जपणे खोटं बोलणारा हा माणूस ढोंगीपणाचा कळस आहे.
त्याची बाजू घेणारे फिल्म इंडस्ट्रीतील लोक आणि बथ्थड बिनडोक चाहते त्याला डोक्यावर घेऊन नाचताएत, त्याच्या नावावर अजूनही बरेच गुन्हे जमा आहेत हेही ते सोयिस्कर रित्या विसरतायत. चित्रपटात अन्यायाविरुध्द पेटून उठणारा, वाईट प्रवृत्तिंचा विनाश करणारा हा 'हिरो' प्रत्यक्ष आयुष्यात किती खलप्रवृत्तिचा निघाला हे कळूनही लोक त्याला सपोर्ट करणे सोडत नाहीत !!
अपघातानंतर सलमानने स्वत:हून जखमींची मदत करायला हवी होती, पोलिसांना कळवायला हवे होते, पण त्याने तिथून पळ काढण्यात धन्यता मानली, तेव्हा त्याची ह्यूमैनिटी कुठे गेली होती ?
नंतरही झालेली चूक सुधारण्याचा त्याने प्रयत्न केला नाही, उलट हे प्रकरण कुठल्याही प्रकारे दडपण्याचाच त्याचा आणि संबंधितांचा प्रयत्न होता. त्याने सरळ मार्गाने गुन्हा कबूल केला असता तर केव्हाच कायद्यानुसार मिळालेली शिक्षा भोगून आज एक प्रामाणिक नागरिक म्हणून तो उजळ माथ्याने फिरू शकला असता, पण एवढा उदात्त विचार त्याने केला असता तर काय होते..
या खटल्यातील अजुन एक दुर्लक्षलेली व्यक्ति म्हणजे कमाल खान, सलमानचा गायक मित्र/चुलत भाऊ, अपघाताचा दुसरा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार !! त्याला ह्या पूर्ण खटल्यातून पध्दतशीरपणे वगळण्यात आलं, तो कधीच समोर आला नाही जेव्हा खरंतर पहिली साक्ष त्याची असायला हवी होती.
१ साक्षीदार ज्याला साक्षीला कधी बोलावलेच गेले नाही
२ रा साक्षीदार ज्याला साक्षीदार संरक्षण (witness protection) मिळायला हवे होते ते दिले नाही, तो देशोधडीला लागून हाल हाल होऊन गेला तरी कोणाला काही पत्ता नाही.
हे सर्व आपल्या देशात, आपल्या कायद्या अंतर्गतच होऊ शकते, कोणी कसा विश्वास ठेवायचा अशा कायदा आणि न्यायव्यवस्थेवर !!
सलमानला शिक्षा झाली नाही झाली तरी त्याच्यामुळे हकनाक गेलेले दोन जीव परत येणार आहेत थोडीच, फक्त त्यांना न्याय मिळाला तरी ठीकच म्हणायचं.
यातील दुवे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून लोकांनी सलमानचा मुखवट्या आडचा चेहरा ओळखून त्याचा उदो उदो करणं बंद करावं यासाठी हा एक छोटासा प्रयत्न..
हा धागा रवींद्र पाटील यांना एक श्रध्दांजली म्हणून ...
त्यांच्या आत्म्याला शांति लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करण्याशिवाय अजून आपण काय करू शकतो ?
प्रतिक्रिया
10 Dec 2015 - 4:53 pm | नगरीनिरंजन
निष्क्रिय बघ्यांना, कोणाच्याही अध्यात-मध्यात नसलेल्यांना, सगळं काही खपवून घेणार्यांना चांगले लोक म्हणत नाहीत. आता सांगा आपल्या समाजात चांगले लोक किती?
10 Dec 2015 - 8:38 pm | अभिजित - १
मोठ्या गोष्टी तर सोडूनच द्या .. साधे साधे प्रश्न , पण जे रोज डोक्याला त्रास देतात. सोसायटी मधल्या अध्यक्ष / सेक्रेटरी यांना नुसते ते सांगायला पण लोक तयार नसतात. तक्रार तर लांब राहिली.
मुळात काही प्रश्न आहे हे पण मान्य करायला तयार नसतात. आपणच कशाला वाईट पण घ्यायचा अशी विचारसरणी !!
भारतीय समाज म्हणजे फक्त बघ्यांचा समाज आहे.
उच्च मध्यम वर्गीय सोसायटी मध्ये - जिथे सर्व लोक राहतात. आगरी / मराठी / ब्राम्हण / UP वाले / गुज्जू. एकजात सर्व गप्प !!
11 Dec 2015 - 2:40 am | रेवती
असेच म्हणते. आणि या बघ्यांमध्ये मीही आहे.
11 Dec 2015 - 5:38 pm | चिगो
सलमानला मिळालेला न्याय(?) त्याच्या वकीलांच्या हुशारीमुळे मिळाला आहे. त्याच्यामुळे सगळे लोक 'पैसाच जिंकला' वगैरे आणि रविंद्र पाटीलच्या नावानी टाहो फोडताहेत. पण खरंच एवढे कायदाप्रिय लोक आहोत आपण? साधा प्रश्न विचारतो. प्रत्येकानी स्वतःशीच प्रामाणिक उत्तर द्यावे. तुमच्या हातून गाडीचा अपघात झाला आणि तुम्हाला बचावाची पुर्ण संधी आहे. किती जण पोलिसांकडे जाऊन गुन्ह्याची कबुली द्याल? आता जरा मॅटर इंटेन्स करुया.. अपघात-कुणीतरी जखमी-बचावाची संधी.. अपघात-कुणीतरी मेलं-बचावाची संधी.. द्या उत्तर, स्वतःशीच, प्रामाणिक !!
तपासकाम गलथान झालंय, ते मुद्दाम किंवा आणखी काही कारणाने, असं न्यायालयात सिद्ध झालंय. आणि तसंही आपलं न्यायतंत्र 'शंभर अपराधी सुटले तरी चालतील, पण एकाही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये' वर चालतं.. सलमान सध्या निरपराधी ठरलाय. संपलं!
Ypu get what you deserve.. We deserved this, and this only...
11 Dec 2015 - 7:36 pm | मराठी_माणूस
इथेच ती गोम आहे. तो सगळा तपास इतक गलथान होता की वकीलांना ते सोपे गेले असावे. सामान्य माणसाच्या बाबतीत पोलीस असे करणार नाहीत.
12 Dec 2015 - 1:47 am | अर्धवटराव
खरच माझी काहि चुक नसताना केवळ अपघात म्हणुन अपघात झाला हे कायदा मान्य करायला तयार असल्याची खात्री असल्यास मी जरुर तशी कबुली देईल. आणि कायदा वाकवता येत नाहि हे मला पक्कं माहित असेल तर मी मुळात दारु ढोसुन गाडी चालवणारच नाहि.
14 Dec 2015 - 3:32 pm | चिगो
बास्स.. ह्यानंतर काहीही बोलायची गरजच नाही ना राव..
14 Dec 2015 - 4:30 pm | नीलमोहर
'कायदा वाकवता येत नाहि हे मला पक्कं माहित असेल तर मी मुळात दारु ढोसुन गाडी चालवणारच नाहि.'
- हे वाक्य फक्त 'मी मुळात दारु ढोसुन गाडी चालवणारच नाहि' मध्ये परिवर्तित होईल तो सुदिन.
16 Dec 2015 - 2:40 pm | अर्धवटराव
माझं उत्तर केवळ कायद्याच्या संदर्भात आहे.
तसं पाहिलं तर मी दारु ढोसणारच नाहि तो अनेकांचा सुदीन असेल :)
10 Dec 2015 - 4:58 pm | आबा
आजिबात आश्चर्य वाटलं नाही, इथे ऑर्गनाईझ्ड दंगली करून, हजारो निश्पापांचे बळी घेऊन निर्दोष सुटणारे लोक आहेत...
त्यांच फॅन फॉलोईंग सुद्धा सलमानला लाज वाटावी असं आहे
15 Dec 2015 - 1:37 pm | इरसाल
हे तुम्ही ८४ च्या दंगलींबद्दल बोलताय ना ?
16 Dec 2015 - 4:09 pm | आबा
हो, मी फक्त ८४ च्या दंगलींबद्दलच बोलतोय, दुसर्या कशाबद्दलही नाही, दुसरं काही आठवलं का ?
16 Dec 2015 - 4:41 pm | नीलमोहर
स्पष्टीकरण दिलं म्हणून बरं, मलाही दुसरीच शंका आली होती.
16 Dec 2015 - 4:45 pm | इरसाल
ऑर्गनाइज्ड मुळे ८४.....
21 Dec 2015 - 12:56 am | आबा
ऑर्गनाइज्ड मुळे ८४ आठवलं का? ओके.
21 Dec 2015 - 12:56 am | आबा
ऑर्गनाइज्ड मुळे ८४ आठवलं का? ओके.
21 Dec 2015 - 12:56 am | आबा
ऑर्गनाइज्ड मुळे ८४ आठवलं का? ओके.
10 Dec 2015 - 5:21 pm | वेल्लाभट
कहर आहे सगळा
10 Dec 2015 - 6:04 pm | आनंद कांबीकर
मान खाली घालायला लावणारे सत्य.
root cause : 'बथ्थड आणि बीनडोक चाहते'
10 Dec 2015 - 6:43 pm | मराठी कथालेखक
'बथ्थड आणि बीनडोक चाहते' आहेत मान्य पण न्यायालयात न्याय (?) द्यायला तर ते बसले नाहीत. आपल्याच पोलीस सहकार्याला त्रस्त करण्याची प्रेरणा इतर वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना फक्त एका अभिनेत्यावरील प्रेमामुळे मिळाली नाही.
10 Dec 2015 - 8:26 pm | सुबोध खरे
सलमान निर्दोष आहे हे ऐकून बरे वाटले.
नाही तर "पैशा"वरील विश्वासाचा उडाला असता
10 Dec 2015 - 8:29 pm | मदनबाण
सलमान निर्दोष आहे हे ऐकून बरे वाटले.
नाही तर "पैशा"वरील विश्वासाचा उडाला असता
हॅ.हॅ.हॅ...
'सलमानच्या केसमध्ये मुंबई पोलिसांना चिक्कार पैसा मिळाला असणार'
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-'Hegemony of Western media has to end' - Arnab Goswami at RT conference
10 Dec 2015 - 6:20 pm | मारवा
आठवला.
10 Dec 2015 - 6:28 pm | rahul ghate
आज काल मिडिया च्या नावे बोंबा मारण्या चा १ ट्रेंड च आला आहे काही झाले तर मिडिया ने हे केले , ते केले , TRP साठी सगळा सुरु आहे अशी खूप ओरड होते पण ह्या वर उत्तर काय आहे हे काळात नाही , आपण कधी तरी एखाद्या गोष्टी वर सामुहिक बहिष्कार टाकू शकू का ?
10 Dec 2015 - 9:02 pm | आनंद कांबीकर
मान खाली घालायला लावणारे सत्य.
root cause : 'बथ्थड आणि बीनडोक चाहते'
11 Dec 2015 - 1:44 am | ट्रेड मार्क
सलमान सुटला!
हुश्श
नाहीतर माझा पैश्यांवर सुद्धा विश्वास राहिला नसता!
#sarcasm
11 Dec 2015 - 2:43 am | रेवती
कोर्टाचा निर्णय आवडला नाही. आधीच म्हटल्यानुसार मी त्याची फ्यान वगैरे नाहीच पण या मनुष्याचे मूर्खपट आधी फारसे पहात नव्हते. आता तर नाहीच.
11 Dec 2015 - 7:30 am | अजया
जाणारे गेले कीडा मुंगीसारखे चिरडून.पाटील गेला टिबीने सडत.आणि बिइंग ह्युमन नाव घेणारा निर्लज्ज पशु निर्दोष सुटला.वा रे न्याय.
11 Dec 2015 - 10:59 am | नीलमोहर
'the judge observed that the one person who was killed that night had indeed lost his life after being run over by the car. He, however, said it was not for the court to go beyond this observation at the time and deal with the matter of who was driving the vehicle.'
'http://www.hindustantimes.com/india/2002-hit-and-run-case-salman-not-gui...'
जज साहेब म्हणतात गाडी अंगावरून गेल्याने एका माणसाचा मृत्यू झालाय हे खरं, पण यापलीकडे जाऊन गाडी कोण चालवत होतं त्याचा शोध घेणे हे कोर्टाचे काम नव्हे.
कोर्टाचं नाही तर मग कोणाचं काम आहे.. अन मग कोर्टाचं काय काम असतं ?
11 Dec 2015 - 11:33 am | सुनील
उच्च न्यायालयाने त्याला क्लीन-चीट देऊन निर्दोष जाहीर केले आहे. तरीही, तो दोषीच आहे हे गृहीत धरले जाते आहे, ते योग्य नाही.
टीप - सदर प्रकरण जर सर्वोच्च न्यायालयात गेले तर, त्याचा निकाल येईपर्यंत वरील मतप्रदर्शन प्रलंबित आहे असे समजावे.
11 Dec 2015 - 12:04 pm | गवि
निकालाचे शब्द वाचल्यास पूर्ण तांत्रिक आणि प्रोसेक्युशनच्या (जाणता-अजाणता केलेल्या-झालेल्या) दिरंगाईमुळे संशयाचा फायदा मिळून सुटला आहे.
तीनच जण गाडीत होते. एक मागच्या सीटवर,एक खुद्द आरोपी, तिसरा अंगरक्षक एफआयआर दाखल करणारा.
आरोपी ड्रायव्हरच्या दरवाजातून उतरला. पण अपघात झाल्याने तो उलट बाजूने उतरला असा दावा अग्राह्य नाही.
तेरा वर्षांनी हॉटेल आणि मूळ घटनास्थळीही कोणालाही न दिसलेला, नोंद न झालेला एक मनुष्य ड्रायव्हर म्हणून प्रकट झाला आणि चालक खुद्द होतो म्हणू लागला. तेरा वर्षांनी ही साक्ष का दिली हा प्रश्न कायद्याच्या दृष्टीने "नॉन-अॅप्लिकेबल" आहे. कोण कार चालवत होतं हे खटल्याच्या स्कोपमधे येत नाही. मधली तेरा वर्षं डिफेन्सच्या मते कार नेमकी कोण चालवत होतं हे जाहीर करणं केसच्या स्कोपमधे नव्हतं. पूर्ण स्कोप "सलमान प्यायला नव्हता आणि व्हीलवर नव्हता" हे सिद्ध करण्याचा नसून तो पिऊन व्हीलवर होता असं म्हणणा-या साक्षीपुराव्यांवर संशय निर्माण करण्याइतका आणि इतकाच होता.
कायद्याची किंवा जजची चूक नाही. त्यांनी तांत्रिक प्रक्रिया नियमानुसार पूर्ण केली. निर्दोष जाहीर केलं ते लूपहोल्समुळे. खुद्द कोर्टानेही ते म्हटलंय. इनफॅक्ट जज हतबल झाला असू शकेल आतून.
लोकांवर असं तांत्रिक बंधन नसल्याने ते दोषी मानतात मनोमन.
11 Dec 2015 - 1:11 pm | नीलमोहर
' कायद्याची किंवा जजची चूक नाही. त्यांनी तांत्रिक प्रक्रिया नियमानुसार पूर्ण केली.
निर्दोष जाहीर केलं ते लूपहोल्समुळे. खुद्द कोर्टानेही ते म्हटलंय.'
- हेही बरोबरच, शिवाय कोर्टाने सलमानच्या निर्दोष सुटकेचा ठपका पोलिसांवर ठेवला आहे.
ही केस पोलिसांनी अत्यंत चुकीच्या पध्द्तीने हाताळली, तसे करतांना त्यांनी पुरावे तयार केले,
साक्षीदारांना पढवलं आणि गुन्ह्यासंबंधी कायद्यातील तत्वांचे यथायोग्य पालन केले नाही असं कोर्टाचं म्हणणं.
11 Dec 2015 - 2:08 pm | मराठी_माणूस
सत्र न्यायालय का हतबल झाले नाही हा प्रश्न मनात येतो
11 Dec 2015 - 1:01 pm | तुडतुडी
सलमान सुटला म्हणून जल्लोष करणार्यांना लाथा घालाव्याश्या वाटतात . इथं सुटलास बेट्या . अल्लाच्या दरबारात कोण वाचवणार तुला ?
11 Dec 2015 - 1:20 pm | इरसाल
पण खात्रीलायक सुत्रांकडुन माहित आहे की सलमान स्वतः एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे
11 Dec 2015 - 5:38 pm | अभिजित - १
एक मजा म्हणजे - कोणतीही चुकीची गोष्ट घडली कि whatsapp वर , आणि इतर सोशल साईट वर जोरदार आवाज करणारे , ज्वलंत भाषेत न्याया करता आवाज उठवणारे पूर्ण पणे गप्प आहेत.
तुम्ही पण हे नोटीस केले का ?
कारण एकच - सध्या कोन्ग्रेस चे राज्य नाहीये .
11 Dec 2015 - 6:42 pm | अकिलिज
दिसतंय तसं खरं........
11 Dec 2015 - 8:42 pm | गामा पैलवान
लोकहो,
या प्रकरणात दोन गुन्हे झाले आहेत. पहिला अपघाताचा आणि त्यातून उद्भवलेल्या नुरुल्लाह शरीफच्या मनुष्यहत्येचा, आणि दुसरा रवींद्र पाटील याच्या हत्येचा. पहिल्यात सलमान उघडपणे दोषी आहे. तोच दारू पिऊन गाडी चालवत होता.
आता दुसऱ्या गुन्ह्याकडे वळूया. हा गुन्हा अधिक गंभीर आहे. पहिला गुन्हा केवळ बेपर्वाई व निष्काळजीपाणातून झालेला अपघात होता. तर दुसरा गुन्हा पोलीसदलाचं खच्चीकरण करून पद्धतशीरपणे घडवलेला आहे. या गुन्ह्यात केवळ सलमानच सामील नाही, तर पोलीसदलांतले उच्चपदस्थ आणि संघटित गुन्हेगारीतले (अंडरवर्ल्ड) दिग्गज गुंतलेले आहेत. यांचा न्याय कधी होणार ते देव जाणे. पहिल्या गुन्ह्यातली म्हातारी तर मेली आहेच. पण दुसऱ्या गुन्ह्यातून काळही सोकावलेला आहे.
महाराष्ट्र सरकारला जर पोलिसांचं मनोधैर्य उंचावायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयात भक्कम केस उभी करावीच लागेल.
आ.न.,
-गा.पै.
12 Dec 2015 - 8:04 pm | लिओ
काहि मुद्दे लिहावे असे वाटते.
रवींद्र पाटील व त्यान्चे कुटुंबीय यान्चे नुकसान (सर्व प्रकारचे) कोणीहि भरुन देउ शकत नाहि.
या प्रकरणात ३ बाजु होत्या व आहेत असे मला वाटते.
१ न्यायालय
२ आरोपी
३ तक्रारदार
यात क्रमान्क ३ तक्रारदारची व्याख्या फक्त रवींद्र पाटील नाहि तर गामा पैलवान यानी नमुद केल्या प्रमाणे पोलिस दल व राज्य सरकार आहेत. सलमान खानला शिव्या घालुन काय मिळवणार ??
पोलिस दल व राज्य सरकारच्या अपयशावर कोण बोलणार ??
६० / ६५ वर्षे असलेले कल्याणकारी सरकारची री सध्याच्या गुणवन्त भाग्यवन्त सरकारने ओढली आहे. ही चुक सुधारण्यास १५ महिने पुरेसे होते पण तसे झाले नाहि.
सर्वोच्च न्यायालयात सध्याचे सरकार काय करेल हे सरकारचे पाठराखे बोलु शकत नाहि. सर्वोच्च न्यायालयात सध्याचे सरकारने काय करावे यावर पाठराखे बोलतील काय ??
जाता जाता
****१ येरवडावासी अभिनेत्याला जामीन कसा मिळाला (सर्व बाबि ) शोधा पण चर्चा नको. ६० / ६५ वर्षे असलेले कल्याणकारी सरकारच्या चुका येणारया २० / २५ वर्षात सध्याचे सरकार बदलणार नाहि असे वाटते.
****२ हा निकाल मागील कल्याणकारी सरकारच्या कालावधी लागला असता तर ?????????????
प्रतिक्रिया अश्याच आल्या असत्या काय ??
14 Dec 2015 - 5:36 pm | नीलमोहर
'पोलिस दल व राज्य सरकारच्या अपयशावर कोण बोलणार'
- अपयश आलंय की ओढवून घेतलंय..
सलमान खान निकाल प्रकरणाचे विश्लेषण करणारा एक लेख कालच वाचनात आला.
त्यात वरील मुद्द्यांबाबत स्पष्टीकरण आणि या निमित्ताने उद्भवलेले काही प्रश्नही मांडले आहेत.
"ज्या गरीब आणि बेघर लोकांचा बळी या अपघातात गेला त्यांची अपिलासाठी संघर्ष लावण्याची कुवत नाही. सलमान संदर्भातल्या निर्णयाला आव्हान देण्याचे अधिकार सरकारला आहेत. विशिष्ट राजकीय पक्षांशी जुळवून घेऊन आणि त्यांच्या नेत्यांसोबत पतंग उडवून जवळीक साधणाऱ्या सलमानच्या संदर्भात राज्य सरकार अपिलात जाणार का हे लवकरच स्पष्ट होईल. न्यायालय न्याय देत नाही तर ते प्रकरणांचा निपटारा करून केवळ निकाल देतात आणि बऱ्याचदा निकालदेखील व्यक्तीसापेक्ष असू शकतात, असा समज प्रस्थापित होणं म्हणजे न्यायव्यवस्थेची प्रकृती चिंतेची असल्याचं लक्षण ठरेल."
http://online4.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5224150723823815485&Se...(%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AE%20%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%87)
13 Dec 2015 - 4:47 pm | अभिजीत अवलिया
सलमान पैसे देऊन सुटला असेल हे खरे. पण त्याला दोष देताना आपण स्वत: असा प्रसंग जर स्वत:च्या हातून घडला तर किती प्रामाणिकपणे वागू ह्याचे देखील प्रत्येकाने प्रामाणिक परीक्षण करायला हवे. साधे चौकात ट्राफिक पोलिसाने पकडले आणी समजा कायदेशीररीत्या तुमचा 200 रु. दंड होत आहे असे सांगितले तर लोक स्वत:च 'जरा करा कि साहेब कमी. घ्या १०० नी सोडा.' असे सांगतात. सलमान सारखा प्रसंग जर स्वत:च्या हातून घडला जिथे ५-१० वर्षाची शिक्षा होऊ शकते तर बहुतेकजण त्यांना शक्य असतील तितके पैसे पोलिसांना चारुन सुटायचाच प्रयत्न करतील.
13 Dec 2015 - 8:25 pm | नगरीनिरंजन
एक्झॅक्टली. समाजाची लायकी दिसते असे मी म्हणूनच म्हणालो. लोकांनाच आपल्या संस्था बळकट झालेल्या नको आहेत.
15 Dec 2015 - 12:53 pm | मयुरMK
कुठे ना कुठे आपण ही याचे जबाबदार आहोत .
16 Dec 2015 - 1:37 pm | प्रसाद१९७१
हे वाचा, २ माणसांना दारू पिऊन राँग साईड नी गाडी चालवुन मारणार्या जान्व्हवी गडकर ला पुम्हा ड्रायव्हिंग लायसन मिळणार.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/janhavi-gadkar...
16 Dec 2015 - 5:23 pm | नीलमोहर
याच प्रकारची एक घटना याआधी घडली होती, फक्त तिथे हेतूपूर्वक केलेला खून होता जे इथे नव्हतं.
तिथेही आरोपीची सबळ पुराव्यांअभावी ट्रायल कोर्टाद्वारे प्रथम निर्दोष सुटका झाली होती,
तिथेही कोर्टाने निकालाचा ठपका पोलिसांच्या ढिसाळ कामगिरीचे कारण देत त्यांच्यावरच ढकलला होता,
मात्र त्या केसमध्ये आरोपीला अखेरीस त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली.
जेसिका लाल खून प्रकरणात प्रथम मनू शर्माची निर्दोष सुटका झाली तेव्हा टाईम्स मध्ये हेडलाईन होती,
"नो वन किल्ड जेसिका" (याच नावाने याच घटनेवर एक चित्रपटही आला होता)
त्या निकालावरून बरेच वादंग उठले, जनक्षोभ उसळला होता, मिडीया आणि पब्लिकने या निकालाला
अनेक प्रकारे विरोध दर्शवला. यानंतर दिल्ली पोलिसांनीच कोर्टाला या खटल्याचे पुनरावलोकन करण्याची मागणी केली, हा खटला हायकोर्टात फास्ट ट्रॅक चालवला गेला आणि अखेर दोषी मनू शर्माला जन्मठेपेची शिक्षा झाली.
असं काही सलमान खान प्रकरणातही होऊ शकलं असतं मात्र त्याच्या विरोधकांपेक्षा हिपोक्राईट सपोर्टर एवढे आहेत
की अशी काही शक्यताही लांबवर दिसून येत नाही.
27 Apr 2016 - 9:51 am | मुक्त विहारि
असो.....
27 Apr 2016 - 7:47 pm | गामा पैलवान
छ्या. त्यापेक्षा सारथ्यसुरक्षेसाठी सदिच्छादूत म्हणून निवडायला हवा होता त्याला.
-गा.पै.
27 Apr 2016 - 12:36 pm | स्वधर्म
अत्यंत संतापजनक बातमी.
18 Jun 2020 - 5:36 pm | मदनबाण
मुद्दामुन हा धागा वर आणत आहे...
सुशांतला न्याय द्या; सलमान खान विरोधात २९ लाख लोकांनी केल्या सह्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Photo of the Day: India's Rama takes on China's dragon :- Taiwan News
18 Jun 2020 - 6:00 pm | चौथा कोनाडा
त्याच्यावर बहिष्काराचे प्रयत्न सुरु आहेत हे खुपच चांगले आहे, असल्या लोकांचे मुर्तीभंजन केल्याशिवाय असल्या व्याधी जाणार नाहीत !
(एक शंका: भारतात ऑनलाईन पिटीशनचा खरंच काही फायदा होतो का ?)
18 Jun 2020 - 6:05 pm | मराठी_माणूस
हीच पिटीशन मोहीम , त्याने केलेल्या अपघात नंतर, त्याने कोर्टात मारलेल्या कोलांट्या ऊड्या बद्दल , राजस्थानात केलेल्या शिकारी नंतर , रविंद्र पाटील च्या मृत्युनंतर का नव्हती चालु झाली
18 Jun 2020 - 6:51 pm | संदिप एस
अरे 'मराठी माणसा' - मग आता सुरु केली तर काय प्रॉब्लेम आहे का ?
22 Jun 2020 - 5:49 pm | मराठी_माणूस
तुला अभ्यास आणि विचार करायची गरज आहे.
18 Jun 2020 - 9:30 pm | वीणा३
हा लेख मागे वाचून रडले होते, आजपण अस्वस्थता जात नाहीये. रवींद्र पाटील यांचे फोटो बघवत नाहीत :(.
जिथपर्यंत चेपू इन्स्टा वर "watching xxx movie first day first show with xxx feeling happy " टाकायची निकड लोकांच्या मनातून संपत नाही तोपर्यंत खानावळ, चोप्रा, जोहर लोकांना मरण नाही. हे गेले तर दुसरे येतील आणि असेच वागतील. कायद्याची भीती नाही हे हि आहेच, वरपासून खालपर्यंत प्रत्येक माणसाला हि भीती वाटली पाहिजे कि ज्या समाजात मी राहतोय त्याचे नियम पाळले नाहीत तर शिक्षा होणारच, त्याशिवाय हे संपणार नाही.
19 Jun 2020 - 10:49 am | मराठी_माणूस
खरे आहे , त्यातही "वरपासून" हा शब्द फार महत्वाचा आहे. वरच्यांसाठी वेगळे नियम आहेत अस "ते" समजतात आणि बर्याचदा ते खरेही होते.
ताजी कोविड्च्या काळातील घटना: एका अतिशय सधन कुटुंबाला (जे पैशांच्या गैर व्यवहारात अगोदरच अडकलेले आहेत), त्यांच्या इच्छित स्थळी (थंड हवेच्या ठीकाणी) "मानवतेच्या दृष्टीकोनातुन" एका उच्च अधिकार्याचे "स्नेही" म्हणुन विना अडथळा पोहचवण्यात आले.
मजुर मात्र उपाशी तपाशी रणरणत्या उन्हात शेकडो मैल चालत होते.