डोंगर-दऱ्या भटकायला सुरूवात केल्यापासून जवळपास एक तप होत आलंय. या ११-१२ वर्षांत, कित्येकदा गडकोटांवर पौर्णिमेला चांदण्या रात्रीपासून ते अमावस्येला चांदण्यानी गच्च भरलेल्या आभाळाखाली मुक्काम केला. अगदी भल्या पहाटेपासून ते रात्रीच्या किर्र अंधारात कित्येकदा जंगलातून भटकलो. कित्येक अनवट जंगलवाटा धुंडाळल्या, परंतू आजतागयत जंगली श्वापदांचा सामना प्रत्यक्षात कधीही झाला नव्हता. नाही म्हणायला, रायगडावर नगारखान्यापासून वाघ दरवाज्याकडे जाणाऱ्या वाटेवर एका 'विशिष्ठ' पावलांचे ठसे पाह्यले होते, पण ते तेवढंच.!!
आजची सकाळ मात्र सगळ्या गोष्टींना अपवाद ठरली.