युद्ध कुणाचे कुणाशी .. भाग - ३.
झालं, एका शुभ? मुहुर्तावर मोददच्या राज्यात वाटाघाटींना सुरुवात झाली, त्याच्या राज्याचा पसाराच एवढा मोठा होता की वाटाघाटी काही १-२ दिवसांत संपेनात, अधिकारी वर्तुळात जश्या मोददच्या काही खास ओळखी होत्या तश्याच त्याच्या सहका-यांच्यापण होत्याच. वाटाघाटी संथ गतीनं सुरु होत्या. दररोज, प्रत्येक प्रहरी ज्या महालात वाटाघाटी चालु होत्या तिथुन वेगवेगळ्या बातम्या येत होत्या. अशा येणा-या बातम्या आणि त्यावर होणा-या चर्चा यांना नुसतं उधाण आलं होतं. कुणाचं काय खरं मानावं आणि काय खोटं काहीच कळत नव्हते.
अशातच एका दिवशी घरात मागच्या बाजुला मोददची बायको धान्य वाळवत बसली होती, त्याचा मुलगा ते पसरलेलं धान्य घेउन खेळत होता. तिथंच एका दगडावर उकिडवा बसुन मोदद बायकोकडे पाहात होता. त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या लग्नापासुन कालपर्यंतचे सगळे प्रसंग उलगडत जात होते. लग्नात लाजरी बुजरी असणारी आणि सारखा पदर सावरणारी आता डोक्यावरचा पदर कमरेला खोचुन त्याच्या बरोबर संसाराचा गाडा ओढणारी त्याच्या बायकोकडे तो एकटक पाहात होता, तिच्या लक्षात येताच तिनं पण त्याच्याकडे पाहिलं न पाहिल्यासारखं केलं आणि पुन्हा आपल्या कामात गुंग असल्याचं भासवु लागली. त्याचा कुंतल आता ३ वर्षाचं झाला होता, मागच्या वर्षी जत्रेच्या वेळी तिची मोठी बहीण आली होती तेंव्हा तिनं तिच्याकडे ’ आता दुस-याच बघा ’ असा विषय काढला होता.
बहिण जत्रा करुन परत गेल्यावर तिनं तोच विषय मोदद कडे काढला. त्यावेळी मोददला घराचं बांधकाम पुर्ण करायचं होतं.त्याचे आई बाप खेड्यातुन राजधानीत राहायला यायचे होते, ते यायच्या आधी घराचं काम पुर्ण करणं आवश्यक होतं. त्याचं हे म्हणणं तिला पटलंही होतं. आता पण तिच्या मनात तेच विचार होते, मोदद तिला म्हणाला होता ’ एवढं घराचे पुर्ण करु, मग आई बाबा इकडे येतील, थोड्या दिवसातच कुंतलला आजीची सवय पण लागेल आणि तुझाही ताण कमी’ त्या शब्दांचे सरळ आणि वाकडे अर्थ लक्षात आल्यावर जशी लाजली तशीच आता पण लाजली. मोददनं पण हे हेरलं आणि गालातल्या गालात हसला, मनाचा मनाशी संवाद झाला आणि दोघांची नजरानजर झाली, त्याच्या नजरेनं ती अजुनच लाजुन दुसरीकडे पाहु लागली.
मोददणं कसंबसं घराचं काम संपवलं आणि या युद्धाची घोषणा झाली आणि सगळं जिथल्या तिथंच विरलं, जिथं आपल्याच उद्याची निश्चिती नाही तिथं उगाच अजुन एक निष्पाप जिवाला या जगात का आणा अशा विचारांनी त्याच्या कोमल भावनांना पार चुड्च लावला. हे सगळं त्याला तिला एकदा स्पष्ट सांगायचं होतं पण धाडस होत नव्हतं, शब्द गोळा करण्यातच वेळ जायचा. युद्धाच्या सावलीत धन धान्याची जमवाजमव, गरजेच्या सामानाची साठवणुक या सगळयातच त्याचा जास्त वेळ जाउ लागला.रात्र झाल्यावर तर पार नको नको त्या विचारांची भुतं त्याच्या डोक्यात थॆमान घालु लागायची, आपली बायको शेजारी आहे याचं देखील भान त्याला राहायचं नाही. मध्येच तो उठुन घरामागच्या परसात बसुन त्याच्या तलवारीला धार काढत बसायचा ते पार तिची हाक येईपर्यंत.
त्या दिवशी त्यांच्या राज्याचे तुकडे होणार ही अफवा आल्यावर तर तो रात्रभर जागाच होता. पहाटे पहाटे तिला जेंव्हा हे समजले तेंव्हा ती बाहेर येउन त्याच्या बाजुला त्याच्या दंडावर डोकं ठेउन बसली. काही क्षणच गेले असतील दोघांच्याही डोळ्यातुन आसवांच्या धारा वाहु लागल्या. कारण दोघांनाही सांगता येत नव्हतं, आता प्राणभिती तर नव्हती तरी पण का होती ही आसवं, त्या दोघांनाही काही कळत नव्हतं. पहाटेच्या लाल होणा-या आकाशाबरोबर ति उठली आपल्या पदरानं त्याचे डोळे पुसले, केसांतुन हात फिरवला आणि आत जाउ लागली, तसा तिचा हात धरुन मोदद पुन्हा रडायला लागला पण आता ति निश्चित उभी होती, आपला नवरा बाहेरच्या वादळाला तोंड देतो आहे तेंव्हा आपण घर आतुन सांभाळायला हवं याची जाणिव तिला होत होती. .... क्रमश:
युद्ध कुणाचे कुणाशी .. भाग - १ http://misalpav.com/node/16061
युद्ध कुणाचे कुणाशी .. भाग - २ http://misalpav.com/node/16270
प्रतिक्रिया
28 Jan 2011 - 7:49 am | शुचि
चांगली रंगतेय कथा.
28 Jan 2011 - 5:42 pm | आत्मशून्य
त्यासोबत यूध्दाच्या राजकारणावर सूध्दा थोडी जास्त माहीती कळने आवश्यक आहे. शक्य झाल्यास थोडे मोठे भाग टाकावेत. पूलेशू.