घाण्या वरचा बैल

रणजित चितळे's picture
रणजित चितळे in जनातलं, मनातलं
22 Nov 2010 - 10:29 am

(ईयत्ता सहावीच्या कवीतेवर आधारीत)

गोष्ट एका गावातली. तेलाची घाणी अन् त्यात कोलुवर फिरणारा बैल. बैलाच्या गळ्यातली वाजणारी घंटा म्हातोबाला दिलासा द्यायची. म्हातोबा शेजारच्या खोपट्यात आडवा पडलेला. त्याला त्या घंटेचा आराम. जो पर्यंत ती घंटा किणकिणायची तो पर्यंत सगळे व्यवस्थित चालले आहे ह्याची त्याला खात्री. मग तो खुशाल झोप काढायचा. जेव्हा बैलाला तहान भुक लागायची तेव्हा घंटा वाजायची थांबायची. ती थांबली की लागलीच एक बादली आंबोण त्याच्या पुढे तो घालायचा. त्याच वेळेस सुकं खोबरे घाणीच्या तोटीत आहे का पाहुन लागेल तसा नवा घाणा तयार करायचा. हे असे संध्याकाळ पर्यंत चालायचे. दुपार झाली की बांधुन आणलेली खायची शिदोरी सोडायचा. त्याच वेळेला स्वैर फिरण्यासाठी बैलाला पण सुटं सोडायचा. बैल कोलु फिरवायचा व म्हाताबा तेलाच्या घाण्यातुन सुटलेले तेल गाळुन डब्यांमधुन भरुन ठेवायचा, नवे घाणे तयार करुन ठेवायचा व बाकीची कामे आटोपायचा. हे सगळे करुन वेळ मिळाला तर हरी नाम घेत भजनात तल्लीन होउन बसायचा. भजनाला साथ द्यायला घंटेची किणकिण असायचीच.

तो हे काम त्याच्या वडलांकडुन शिकला होता. शालेय शिक्षण फक्त नावापुरते झालेले. पण तो जे काम करत असे त्यासाठी त्या शालेय शिक्षणाचा तो फारसा उपयोग करत होता असे त्याला वाटत नव्हते. सगळा व्यवहार मराठीतून व्हायचा. मराठी बोलता यायचे. सही पुरते लीहीताही यायचे. नाही म्हणायला मराठी पाचवी पर्यंत तो शिकला होता. त्यामुळे तो जरी अंगठा बहादर असे म्हणवुन घ्यायचा तरी खरे तर त्याला मराठी लिहीता यायचे. गावातल्या त्याच्या कामा साठी तेवढे पुरे होते.

एके दिवशी शहरातून काही मुले आली. शहरातल्या कुठल्याशा कॉलेजात शिकत होती म्हणे. काय करणार शिकुन? असे जर कोणी विचारले तर – नोकरी – ह्या व्यतिरीक्त त्यांना पण समजत नव्हते शिक्षण घेउन नमके काय करणार ते. एका प्रोजेक्ट साठी माहीती गोळा करायची होती म्हणे त्यांना. त्या शिवाय सत्र पुर्ण होणार नव्हते त्यांचे. कोणाला फारसा काही उत्साह नव्हता पण टाकण टाकल्या सारखे, एकदाचा प्रोजेक्ट पुर्ण करण्या मागे लागली होती ती मुले.

अशी सात, आठ मुलांची टोळी तो बैल जिथे कोलु फिरवत होता त्या घाण्यावर गेली. शहरात वाढलेल्या त्या मुलांना ती घाणी बघुन फार मजा वाटली. तो बैल आपसुक आपला फिरत होता. तेल निघत चालले होते, बैलाच्या गळ्यात बांधलेली घंटा किणकीणत होती. सगळे एखाद्या यंत्रागत आपोआप होत होते. त्यातल्या एकाने इकडे तिकडे पाहुन कोणी आहे का बघितले. प्रश्न विचारुन झटपट प्रोजेक्ट चे काम संपवण्या मागे त्या पोरांचे सर्व लक्ष होते. त्यातल्या एका धिट पोराने झोपलेल्या म्हातोबाला उठवले. शहरातील त्या शिक्षित तरुणांना पाहुन काहीसा ओशाळुनच डोळे चोळत म्हातोबा विचारलेल्या प्रश्नांची त्याच्या परीने उत्तरे द्यायला लागला.

काय हो हे बैलाचे काम बघायला कोणी सुपरवायजर नाहीका आय मिन कोणी माणुस ठेवला नाहीत का.

म्हातोबा - अवो माझाच कोलु हाय किवो. म्या है ना बगायला. कशाला पाइजे अजुन कुनी.

शहरातला स्मार्ट - पण तुम्ही तर त्या खोलीत असता (खरे तर त्यांना म्हणायचे होते – तुम्ही तर झोपलेले असता). बैल फिरायचा थांबला तर. तुमचे उत्पादन नाहीका कमी होणार.

म्हातोबा - अरे यो कसचा थांबतोय. फकत भुक लागली की थाबतोया बगा. तवा मग कालवतोच की त्याला आबोण.

शहरातला स्मार्ट - अन ते कसे समजते तुम्हाला. की आता त्याला भुक लागली आहे म्हणुन.

म्हातोबा - अरे बाबांनो हा शंकर लहानगा होता तवा पासुन बगतोया मी त्याची भुक. अन परत ती घंटा हाय की. ती किणकणायची थांबली की देतो बगा त्याला आंबोण.

मुलांना काही पटेना. त्या मुळे त्यांनी त्यांचा संशय बोलुन दाखवला - पण मधेच तो बैल थांबला तर. काम करायचे सोडुन. तुम्ही तर झोपलेले असता. काम होणार नाही व वेळ वाया जाईल ना.

मग त्या म्हाताब्याने त्यांना सांगितले की तो त्या घंटेच्या आवाजाशी कसा समरस झाला आहे ते. त्याला त्या घंटेच्या आवाजात मजेत झोप लागते. उलट घंटा वाजायची थांबली तर लागलीच कळते की काम थांबले आहे. पण असे कधी होत नाही उगाचच्या उगाच शक-या थांबत नाही. कारण घंटा उगाच वाजायची थांबत नाही.

म्हातोबाला प्रश्न पडला एवढी साधी गोष्ट ह्या मुलांच्या डोक्यात कशी जात नाही. घंटा वाजते म्हणजे कोलु फिरतो. कोलु बैल फिरवतो. अन घंटा उगीचच्या उगीच वाजायची थांबत नाही. मग त्यात न पटण्यासारखे काय आहे.

त्यातल्या एकाने शेवटी न राहुन विचारलेच म्हातोब्याला. हे बघा तुम्ही घंटेवर विसंबुन राहता की काम होत आहे का नाही त्यासाठी पण हे बघा जर मधुन मधुन हा बैल फिरलाच नाही व नुसतीच मान हलवत राहीला आणि घंटेचा आवाज करत राहीला तर तुम्हाला वाटत राहील की बैल कोलु फिरवत आहे पण प्रत्यक्षात दिवसातले काही तास बैल नुसताच मान हलवुन आराम करत असेल व तुम्हला समजत सुद्धा नसणार त्याची लबाडी.

मुलांच्या मनात उत्पन्न झालेली शंका आणि पसरलेली चिंता पाहुन त्याच्या डोक्यात प्रकाश पडला की ह्या मुलांना किणकिणा-या घंटेचा उपयोग एवढा वेळ पटत का नव्हता ते. शहरातल्या असुरक्षते मुळे शहरी लोकांची झालेली शंकेखोर वृत्ती बघुन म्हातोबाने हात जोडले व म्हणाला – बैलाला एवढे डोके दिले न्हाय देवाने अजुन अन म्या बि शिकलेलो न्हाय उगाचच चिंता ओढवुन घ्यायला. धन्य हो तुम्ही.

बोलघेवडा
राष्ट्रव्रत

कथासमाजजीवनमानराहणीशिक्षणविचारविरंगुळा

प्रतिक्रिया

गणेशा's picture

22 Nov 2010 - 9:36 pm | गणेशा

चांगले आहे ..

पैसा's picture

22 Nov 2010 - 9:44 pm | पैसा

बैल पुस्तकं शिकला असता तर कामचुकारपणा करायला पण शिकला असता!

नितिन थत्ते's picture

22 Nov 2010 - 9:45 pm | नितिन थत्ते

म्हणून समदी कालिजं वैग्रे बंद व्हायाला पायजेलायत.

समद्यास्नी फकस्त राष्ट्रव्रताचं शिक्षान द्याला पायजेलाय.