लहानपणी मी एक कोडं ऐकलं होतं, 'पोळी का जळली? घोडा का अडला? विड्याचं पान का सडलं? या तीनही प्रश्नांचं एकच उत्तर सांगा.' तसाच अनेक प्रश्नांचं एकच उत्तर देणारा अनुभव आज मला आला. 'मराठी माणूस धंद्यात मागे का पडतो? पुस्तकांचा खप कमी का होतो? पुणेरी दुकानदाराची प्रतिमा वाईट का आहे?' हे ते प्रश्न.
अनुभव अगदी ताजा आहे. काही तासांपूर्वीचा. अमेरिकेला परत जायचे वेध लागले की पुस्तकांच्या खरेदीसाठी काही फेऱ्या होतातच. आज वैजूमावशीबरोबर पुण्यात अप्पा बळवंत चौकात गेलो. पुस्तकांची भरपूर दुकानं, पण बहुतेक सगळी टेक्स्टबुकं, अमुक कसे करावे वगैरेची, ज्योतिष, पाककृतींसारखी गृहोपयोगी दुकानं. ललित पुस्तकं विकणारी थोडीच. 'आजकाल लोक पुस्तकं फार विकत घेत नाहीत. पैसा व शिक्षण वाढूनही इंटरनेट, टीव्ही अशा माध्यमांचं वर्चस्व वाढलेलं आहे' वगैरे आम्ही बोलत होतो. पूर्वी जिथे पुस्तकं विकत घेतलेली आहेत अशा, चांगला संग्रह असलेल्या दुकानात गेलो. आधीचे अनुभव अतिशय चांगले होते. पण आज जो काही इरसाल नमुना भेटला तो पाहून हातच टेकले.
एका बोळात ते दुकान आहे. बोळात शिरताना कोपऱ्यावरच मुत्रीच्या वासामुळे नाक दाबावं लागलं. दुकान तसं बाहेरून दिसायला नीटनेटकं, अगदी लहान नाही, पण फार मोठंही नाही. काही पुस्तकं दर्शनी मांडलेली. काउंटरच्या अलिकडे आपण उभं राहायचं, पलिकडून विक्रेता आपण सांगू ती पुस्तकं त्यांच्याकडे असतील तर देणार अशी एकंदरीत योजना. मी व वैजूमावशी गेलो तेव्हा एक वयस्क, गोरेसे गृहस्थ मागच्या टेबलामागे बसले होते. तो मालक किंवा निदान मॅनेजर असावा अशी आमची कल्पना झाली.
"मी एक आठदहा दिवसांपूर्वी आलो होतो आणि काही पुस्तकं मागवली होती. ते म्हणाले.." मी म्हणालो.
"नाही, मी नव्हतो तेव्हा" माझं वाक्यसुद्धा पुरं न होऊ देता तो माणूस म्हणाला
"हो, माहिती आहे. पण जे होते त्यांनी सांगितलं..."
"नाही मला काही माहीत नाही त्याविषयी" एकंदरीत महाशयांना वाक्य तोडून बोलण्याची सवय होती. किंवा त्यांना मला काय म्हणायचंय याविषयी आंतर्ज्ञान असावं.
"त्यांनी सांगितलं की पुस्तकं आली असतील तर फोन करेन. त्यांनी फोन केला नाही म्हणून..."
"मग आली नसतील पुस्तकं." कुठची पुस्तकं, ती नसतील तर इतर हवी आहेत का, वगैरे काही नाही. पण मलाच पुस्तकं घ्यायची होती.
"अहो ऐकून तर घ्या. मला ती पुस्तकं आली असतील तर सांगा. आणि माझ्याकडे दुसरी यादी पण आहे"
"कुठची होती पुस्तकं?"
"कोलटकरांची. अरुण कोलटकरांची जेजुरी, भिजकी.."
"कोलटकरांची काही नाहीत आमच्याकडे."
"बरं मग श्याम मनोहरांचं एक पुस्तक होतं."
"श्याम मनोहर?"
"हो. कथासंग्रह आहे किंवा लेखांचा संग्रह..."
"कथा की लेख माहीत नाही?"
"नाही."
"मग प्रकाशक कोण आहे"
"नाही हो, प्रकाशक माहीत नाही."
"प्रकाशक नाही माहीत? आमचा संबंध प्रकाशकांशी येतो. प्रकाशक सांगा मी ताबडतोब सांगतो."
"अहो पण आम्ही वाचक. आमचा संबंध लेखकांशी येतो. कोणीतरी सांगतं या लेखकाचं पुस्तक चांगलं आहे..."
"नाही बहुतेक. श्याम मनोहर नाहीत."
माझ्या आधीच्या मागणीतली काहीच पुस्तकं नाहीत हे म्हटल्यावर माझी छोटीशी यादी काढली.
"आनंद यादव. त्यांचं झोंबीच्या नंतरचं पुस्तक आहे का?"
"कुठलं?"
"नाव माहीत नाही. मला त्या सीरीजमधली पुढची पुस्तकं हवी आहेत."
"अशी नाही शोधता येणार. तुम्हाला प्रकाशक माहीत आहे का?"
"त्यांचं नटरंग आहे का?" त्यांनी प्रकाशक म्हटल्यावर मी यादीतल्या पुढच्या ओळीवर गेलो.
"नटरंग?"
"हो, तो सिनेमा आहे ना नटरंग, त्याची मूळ कादंबरी."
शेवटी तो माणूस उठला. मागच्या शोकेसमधनं एक पुस्तक काढलं.
"हे. घ्या. आनंद यादवांचंच आहे. पण हीच त्या सिनेमाची मूळ कादंबरी की काय माहीत नाही."
चला, यादीपैकी एक पुस्तक तर मिळालं. म्हणून मी खुष झालो.
"झोंबीच्या सीरीजमधली काही पुस्तकं नाहीतच का?" मी पुन्हा एकदा खडा टाकून बघितला.
"अहो असं सांगून कसं सापडणार?"
"तुमच्याकडे काही कॅटेलॉग वगैरे नाही का?"
"आमच्याकडे पस्तीस हजार पुस्तकं आहेत. इतकी व्हरायटी तुम्हाला कुठे मिळणार नाही. पण पस्तीस हजार पुस्तकांचा कॅटेलॉग करायचा झाला तर तो केवढा होईल माहिती आहे का? इतका जाडा होईल." दोन हातांमध्ये सहा इंचांचं बाड असल्यासारखं दाखवत म्हणाले.
"कॉंप्युटर वगैरे वापरता येत नाही का तुम्हाला?" त्या माणसाने एक विचित्र चेहेरा करून मान हलवत खांदे उडवले. काय ही पीडा आली आहे, घ्या आता तुम्ही मला माझा धंदा शिकवा, ही नवीन थेरं माझ्या पोरांकडून चालवून घेत नाही तर तुमचं कुठून ऐकू... असे बरेच विचार त्या चेहेऱ्यावरच्या भावांतून मानेवरनं ओघळून खांद्याबरोबर उडाले.
तितक्यात एक सेल्समन आला. मी त्याला शेवटचा उपाय म्हणून म्हटलं.
"आनंद यादवांची काही इतर पुस्तकं दाखवता का?"
त्याने शांतपणे त्याच शोकेसमधून आनंद यादवांचा एक कथासंग्रह व 'नांगरणी' काढून दिलं. पहिल्याच माणसाने ती काढून द्यायला काहीच हरकत नव्हती. 'नांगरणी' च्या अर्पणपत्रिकेच्या मागच्या बाजूला
'नांगरणी' च्या आधीचे 'झोंबी' व नंतरचे 'घरभिंती' व 'काचवेल' हे खंड प्रसिद्ध झाले आहेत.
असं लिहिलं होतं. मी आनंदाने त्यांना दाखवलं आणि म्हटलं
"बघा इथे लिहिलं आहे, नांगरणीच्या आधीचे झोंबी आणि नंतरचे..."
"अहो पण झोंबी तुमच्याकडे आहे ना..." इति मालक-मॅनेजर. त्यांनी 'टाक म्हटलं की पाणी टाकायचं...' वगैरे म्हणी ऐकल्या नसाव्यात.
"ते आहे, पण मी म्हणत होतो की इथे झोंबीच्या सीरीजमधल्या पुस्तकांची यादी दिली आहे."
"पण तुम्हाला झोंबी नको होतं." आता मात्र माझा स्वतःवरचा ताबा सुटला. वैतागून मी म्हटलं
"मी तुम्हाला इथे यादी आहे हे दाखवत होतो. आणि समजा माझ्याकडे झोंबी असूनही तुम्ही दाखवलं आणि मोह पडून मी अजून एक कॉपी घेतली तर तुम्हाला वाईट वाटलं असतं का? निदान पुढच्या पुस्तकांची यादी तरी दिसली असती ना?"
पुन्हा एक निश्वास आणि टेबलावरच्या कामात लक्ष. या धंद्यातच आहे म्हणून, नाहीतर या उद्धट माणसाला एकही पुस्तक विकलं नसतं, असे यावेळी विचार असावेत.
"चला ते काचपाणी आणि घरभिंती सुद्धा द्या." सेल्समनने मुकाट्याने ती पुस्तकं आणि यादवांचंच कलेचे कातडे ही आणून दिलं.
यादीतली पुस्तकं घेऊन झाल्यावर म्हटलं तुमच्याकडे काही चांगल्या कादंबऱ्या काव्यसंग्रह वगैरे असतील तर दाखवा. पुढचा अर्धा तास सेल्समन पुस्तकांचा गठ्ठा आणून देणार मी थोडंसं चाळून पुस्तक निवडायचं असं चाललं होतं. शेवटी पाच कादंबऱ्या, दहा काव्यसंग्रह घेतले. वैजूमावशीसाठी दोन आहारविषयक पुस्तकं घेतली. सेल्समन खूपच चांगला होता. इतकी पुस्तकं घेतो आहे म्हटल्यावर त्याने "तुम्हाला आत येऊन निवडायची असतील तर बघा" असंही म्हटलं. मी म्हटलं "नको, आता बास. आणखी मोह नको." तरी त्याने एक काव्यसंग्रह आणखी पुढे आणलाच.
असे सहासात इंची दोन गठ्ठे झाले. सेल्समनने सर्व पुस्तकांची नावं व त्यांच्या किमती वाचून दाखवल्या. मालक-मॅनेजर साहेबांनी ते लिहून काढले. बेरीज केली. २१५० ची टोटल झाली.
"काय, काही डिस्काउंट वगैरे.."
"हो, ते देऊनच टोटल केली आहे." मी बघितलं १०% डिस्काउंट दिलं होतं.
पैसे द्यायची वेळ आली तेव्हा मालक-मॅनेजर सेल्समनला म्हणाले,
"किती, २१९० झाले ना?"
"नाही, २१५० झाले." सेल्समनने माझ्याकडून रिसीट घेऊन, ती तपासून म्हटलं. मा-मॅ साहेबांनी गंडवण्याचा प्रयत्न अर्थातच केला नसावा, पण त्या आकड्याच्या बाबतीतही एक छोटासा घोळ करून घेतला.
"मग पिशवी देणार का?"
"नाही, आजकाल कॅरीबॅग देता येत नाही ना..." इति मालक-मॅनेजर
"मी तुम्हाला बांधून देतो." सेल्समन
"बरं, दोन गठ्ठे ठेवा. एक मोठा करू नका." मी म्हटलं. सेल्समन आतून कागद, दोऱ्या वगैरे आणायला गेला.
"पिशव्या देत नाही का आजकाल?"
"हो आजकाल हलक्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी आणली आहेत ना. किमान पन्नास ग्रॅमची असायला लागते पिशवी."
"पण साडीवाले देतात ना."
"अहो त्यांचं वेगळं असतं. साडीच्या धंद्यात तीन-तीनशे टक्के फायदा असतो. आम्हाला कुठे पाच दहा टक्के मिळतात." साडीच्या धंद्यात इतकी कॉंपिटिशन असताना तीनशे टक्के फायदा मिळतो हे मला पचायला जड गेलं.
"काय सांगता - मी दादरच्या अमुक तमुक फेमस दुकानातून पुस्तकं घेतली तर त्यांनी मला पंधरा टक्के डिस्काउंट दिलं. तुम्ही दहाच टक्के दिलं. मग फायदा पाचच टक्के कसा असेल?"
"हॅहॅहॅ... अमुक तमुक वाल्यांची गोष्ट वेगळी आहे. "
"म्हणजे"
"आणि त्यांच्याकडे आमच्याइतकी व्हरायटी नसते." गोष्ट नक्की कशी वेगळी ही धंद्यातली इतकी अंदरकी बात आहे की ती तुम्हाला सांगण्यात रस नाही, किंवा इतका खर्च करायला वेळ नाही, असं त्याला म्हणायचं असावं. काही का असेना त्याने उत्तर टाळलं हे खरं. "आम्हीच त्यांना काही पुस्तकं पुरवतो. आमच्याकडे पस्तीस हजार टायटल्स आहेत." तसं असेल तर तुमच्याकडे फक्त दहा टक्के तर त्यांच्याकडे पंधरा टक्के डिस्काउंट हे उलटं गणित कसं, असा प्रश्न पडूनही मी विचारला नाही.
"अहो काहीतरी काय सांगता - तुमच्याकडे कोलटकरांची काही पुस्तकं नाहीत. मला अमुक तमुक कडे निदान चिरीमिरी आणि द्रोण तरी सापडलं."
"ते वेगळं. ती मुंबईची प्रॉडक्ट्स आहेत."
मला हा तर्क कळला नाही, पण काहीतरी गहन असेल म्हणून मी सोडून दिलं. एव्हाना सेल्समनचं पुस्तकं बांधणं चालू झालं होतं.
"काय हो, त्या साडीवाल्यांच्या पिशव्यांची किंमत काय असते."
"पाच, सहा, सात काही आठ रुपयेही असते." पन्नास, साठ, सत्तर, ऐशी रुपये म्हटल्यासारखं त्याने म्हटलं. दोन - अडीच हजाराचा माल खरेदी करणाऱ्यालाही सहा रुपयांच्या पिशव्या देणं परवडत नसेल तर काय करणार.
बाहेर पडताना मला खरोखरच एखाद्या दुकानात, जिथे मी पैसे खर्च करायला आलो आहे अशा ठिकाणी असा अनुभव आला हे खरंच वाटत नव्हतं. हसावं की रडावं कळत नव्हतं म्हणून मी हसायचं ठरवलं. पण त्यामागे एक ठार अविश्वास होता. या माणसाने माझं बोलणं नीट ऐकून घेतलं नाही. 'लेखक माहीत असून काय उपयोग, आम्हाला प्रकाशक माहीत, तेव्हा ते सांगा' असं म्हटलं. आपल्याकडे असलेल्या संग्रहाचा अभिमान दाखवला. पण माझी सोय होण्यासाठी नवीन तंत्रज्ञान सोडाच, जुनंही वापरलं नाही. पुस्तकांचा मला लोभ निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण केली नाही. माझ्या चुका काढल्या. मी वैतागलेलो दिसल्यावर माफी मागितली नाही. स्वतः चुकीची, निदान मला चुकीची वाटतील अशी विधानं केली. आधीच पुस्तकांना ग्राहक कमी, त्यात अशी वागणूक मिळाल्यावर आणखीन काय होणार? हा अर्थातच सामान्य अनुभव नाही, नसावा. इतर दुकानांतले व इथेही आधीचे अनुभव चांगले आहेत. पण त्यामुळे माझं आजचं डोकं फिरणं कसं थांबणार?
गेल्याच वर्षी माझा मेव्हणा, अप्पा बळवंत चौकात गेला होता. लहानपणी वाचलेला फास्टर फेणेचा संपूर्ण संच आणि नंदू नवाथेचे संच व इतर बरीच पुस्तकं त्याला घ्यायची होती. पाऊण तास गाडीतून फिरून त्याला पार्किंग सापडलं नाही. एरवी पुण्याविषयी अतिशय प्रेम असलेला तोसुद्धा वैतागून म्हणाला, "मी चार हजाराची पुस्तकं घेणार होतो आज. पन्नास रुपये देऊन गाडी पार्क करायची देखील तयारी होती माझी. पण हॅट, असला अनुभव आल्यावर मी इथे पाऊलसुद्धा ठेवणार नाही."
तर त्या तीन प्रश्नांचं माझ्यासाठी, आजच्यापुरतं उत्तर आहे 'ग्राहकाविषयीची अनास्था'.
प्रतिक्रिया
13 Jul 2010 - 6:07 pm | अभिरत भिरभि-या
ते नफा कमवत नाहीत असे कोण म्हणतेय ? तुमचे वाक्य असेल ते ..
गिर्हाईकांशी नीट वागत नाही हा आक्षेप आहे .. डोळे उघडा साहेब
लेख पुन्हा वाचा हवे तर !!
हे हे हे .. टाळ्या मिळाल्या .. भले शाब्बास !
पण त्याने वास्तव बदलत नाही !
करेक्ट .. आणि त्यातली बरिचशी पुण्यात दुकानदार असतात ..
अर्थात सर्व दुकानदार असे नव्हेत; काही सन्माननीय अपवाद याच पुनवडीत आहेत हे नक्की सांगावेसे वाटते.
13 Jul 2010 - 7:38 pm | सहज
श्री ए. बी. व श्री डि. बी. माझ्या पुणेकर बंधुंनो कृपया बास करा. दोघांचे मुद्दे मांडून झाले आहे आता आणखी शब्दछल नको.
चला १००व्या प्रतिसादाकडे कूच करुया
21 Jul 2010 - 7:06 am | सोम्यागोम्या
>>पण उगाच कोणीही सोम्यागोम्या यावा आणि पुणेरी लोकांवर टिप्प्णी करावी??
पुणेकरांनी खच्चून भरलेल्या संकेतस्थळावर येवून पुणेरी लोकांवर टिप्पणी करायला माझी मती भ्रष्ट झाली नाही अजून !
:)
13 Jul 2010 - 2:46 pm | प्रदीप
अत्यंत सुंदर प्रतिसाद, मनापासून आवडला.
13 Jul 2010 - 3:58 pm | परिकथेतील राजकुमार
झ का स !!!
आणि तसेही गळे काढणार्या लेखकांना आणि ग्राहकांना गळे काढणारेच पुस्तकवाले भेटणार म्हणा.
मुळात आधी हि लोक 'कधीतरी आपली पायधुळ दुकानाला लागेल ह्या आशेन ह्या दुकानदाराने हे दुकान उघडले आहे' अशा थाटात दुकानात वागत-बोलत असतात. एकदा क्रॉसवर्ड किंवा ताजमध्ये वगैरे असे वागुन दाखवा बरे ! तिथल्या वेटरनी १५ मिनिटे लावली पाणी आणायल तरी हे 'हॅ हॅ हॅ' असे गुळमुळीत हसतील, क्रॉसवर्ड वाल्यानी ह्यांच्याकडे 'हे सुशिक्षीत आहेत ?' अशा नजरेने बघितले तरी ह्यांना धन्य वाटेल. पण हेच अप्पा बळवंत चौकात अथवा बादशाहीत घडले की हे शुरवीर लगेच 'काय राव ते पुणे आणि पुणेकर' म्हणुन बोटं मोडायला तयार. आणि पुन्हा पुढच्या खरेदीला ह्यांना पुणेच लागणार.
अहो काय जबरदस्ती आहे का ? अगदी हजारोंचे हिशेब देताना, मग करा अजुन हजाराचे पेट्रोल वाया आणि जावा मुंबई-दिल्लीला खरेदीला. तुमच्यावाचुन काय पुण्याचा बाजारपेठा ओस पडणार आहेत का पुण्यावर आर्थीक संकट कोसळणार आहे ?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
13 Jul 2010 - 4:00 pm | अवलिया
पुर्ण सहमत आहे.
--अवलिया
13 Jul 2010 - 4:17 pm | पांथस्थ
लय भारी.
- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
13 Jul 2010 - 4:23 pm | Dhananjay Borgaonkar
+ ५००
एक नंबर परा.
13 Jul 2010 - 6:30 pm | अभिरत भिरभि-या
पराशेठ,
पुण्यातले "ते" दुकानदार दिल्लीमुंबईतल्या धनिक लक्ष्मीपतींशी वाईट वागताना सर्वसामान्यांशी चांगले वागले असते तर समजून घेता आले असते. दुर्दैबाने अनुभव तशे नाहीत.
ग्रामीण भागातून आलेल्या (ज्यांना ते क्रासवर्ड आणि कॉफी डे माहितही नसेल) अशा लोकांना अतिशय तुच्छतेने वागवताना मी पाहिले आहे.
अस्मितेच्या खोट्या दर्पाने तेही समर्थनीय होते का ?
13 Jul 2010 - 7:01 pm | परिकथेतील राजकुमार
हा अनुभव फक्त आणि फक्त पुण्यातच येतो का मालक ? नक्कीच नाही. जरा साध्या कपड्यातला, दाढी वगैरे वाढलेला माणुस आला तर साधा पानवाला देखील तो जाईपर्यंत त्यावर डोळ्याच्या कडेतुन लक्ष ठेवुन असतोच की ;) हे असे अनुभव सार्वत्रीक आहेत ! राग आहे तो 'हे फक्त पुण्यातच घडते' ह्या रडगाण्यावर.
आणि तसेही काजुचा भाव विचारुन काड्यापेटी विकत घेणारा कोण हे पुणेकर दुकानदार बरोब्बर ओळखतो ;)
गंमत अशी आहे की हाच अनुभव 'सातारा -सांगली- खेड' अशा भागात आला तर कोणी पुन्हा तो आठवण्याचे कष्ट सुद्धा घेणार नाही.
असो..
शेवटी ज्याची त्याची जाण...समज वगैरे वगैरे...
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
13 Jul 2010 - 7:54 pm | अभिरत भिरभि-या
काड्यापेटी आणि काजूने आपणच (हुश्शार !!) पुणेकर दुकानदाराची पाठ थोपटावी आणि बाकीच्यांनी काही म्हटले तर ते पुण्याला खड्यासारखे बाजूला काढून हेत्वारोप करताहेत असे म्हणावे ते ही एकाच वेळी ! .
खरे तर दोन्ही स्टिरिओटायपिंगच ! :)
मग एक समर्थनीय आणि दुसरे अब्रह्मण्यम कसे काय बुवा ?
फक्त पुण्यातच असे अनुभव येत नाहीत हे खरे; पण पुण्यात हे अनुभव प्रातिनिधिकपणे येतात असे बर्याच जणांना वाटते.
आता "न्यून ते सरावे" असे वाटणे आणि ""हे आनंदे मिरवावे" असे वाटणे हा ज्याचा त्याचा प्रश्न.
पुण्यात सगळेच "तसे" नाहीत याची नोंद चावी म्हणून ही प्रतिक्रिया.
आणि इति अलम्
:)
13 Jul 2010 - 10:00 pm | Nile
भिरभिर्यांचे प्रतिसाद मस्त आहेत. अनुमोदन.
(परा 'पुणेरी दुकानदार' असल्याने त्यांचीच बाजु घेणार) ;)
-Nile
16 Jul 2010 - 10:11 am | llपुण्याचे पेशवेll
स्टीरीओटाईप प्रतिसाद आवडला.
बाकी प्रस्तुत धागा प्रवर्तक गरीब व ग्रामीण भागातले आहेत म्हणून त्यांना वागवले असे म्हणणे आहे का?
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.
13 Jul 2010 - 11:58 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
राजेश, अलिकडे कुठलीही अस्मिता, भावना फार लवकर दुखावली जाते हे तुझ्या लक्षात आलेलं दिसत नाही, मग ती अस्मिता, भावना भाषिक असेल, प्रादेशिक असेल नाहीतर पुणेरी! आता हा मराठी, नग दुकानदार पुण्यात आणि तुलाच सापडला ही तुझीच चूक नाही का? ;-)
अदिती
15 Jul 2010 - 5:20 am | पंगा
नग दुकानदार पुण्यात सापडत नाहीत असा दावा कोणीच केला असावासे वाटत नाही. अगदी पुणेकरांनीसुद्धा! मुद्दा तो नाही. (महाराष्ट्रातील इतर शहरांतही असे नग सापडत नसावेतच, याबद्दलही थोडा साशंक आहे, पण तोही मुद्दा नाही.)
मुद्दा एवढाच आहे, की या साच्यात न बसणारे मराठी दुकानदारही (अगदी अगत्यशील, ग्राहकसेवातत्पर, वगैरे वगैरे वगैरे) पुण्यात हवे तेवढे मिळू शकतात, नव्हे मिळतात. अशा परिस्थितीत (१) (पुण्यास खरेदी करण्यासाठी) येताना पूर्वग्रह बाळगून येणे, (२) (मुबलक इतर पर्याय उपलब्ध असताना) तो पूर्वग्रह बळावेल नेमक्या अशाच ठिकाणी खरेदीला जाणे, आणि मुख्य म्हणजे (३) त्यानंतर 'पूर्वग्रह बळावणारा अनुभव आला होऽऽऽ' म्हणून बोभाटा करणे, हे किंचित मजेशीर वाटते. (पैकी पहिला मुद्दा हा सामान्य मनुष्यस्वभावाचा भाग आहे, पूर्वग्रह सर्वांनाच असू शकतात, कोणाच्याही बाबतीत हे होऊ शकते म्हणून सोडून देऊ. दुसरा मुद्दा हा योगायोग किंवा माहितीचा अभाव यांमुळेही असू शकतो, म्हणून त्याकडेही दुर्लक्ष करू. मुख्य मुद्दा तिसरा आहे. परंतु - एवढे सगळे म्हणून झाल्यावर - 'असतो एकेकाचा स्वभाव' म्हणून तेही विसरून जाऊ.)
'अप्पा बळवंत चौकाजवळ सहज पार्किंग मिळत नाही (पैसे मोजण्याची तयारी असूनसुद्धा!)' ही तक्रार काहीशी 'दादरला (गर्दीच्या वेळांत, ट्राफिकच्या दिशेने जाणार्या) लोकलमध्ये चढल्यावर बसायला जागा मिळत नाही (फर्स्टक्लासचे भाडे भरण्याची तयारी असूनसुद्धा!)' या तक्रारीसारखी आहे, एवढेच नोंदवून तोही मुद्दा निकालात काढू. (तसेही अप्पा बळवंत चौकाच्या बर्यापैकी जवळ - मला व्यक्तिशः माहीत नसले, तरी - पार्किंगला पर्याय असू शकतात, हे वरील काही प्रतिसादांवरून लक्षात यावेच.)
(अतिअवांतरः अप्पा बळवंत चौकात रिक्षा जातात. त्यामुळे, तुम्ही कोठून निघालात यावर अवलंबून तोही एक पर्याय उपलब्ध असू शकतो, हेही नोंदवू इच्छितो. केवळ माहितीकरिता. कदाचित माहीत नसेल तर.)
बाकी अस्मिता, भावना वगैरेंची (आणि आणखी ज्याज्या कोणी असतील त्यांचीसुद्धा) जगातल्या एकमेवाद्वितीय वस्तुसंग्रहालयात एक्झिबिट म्हणून रवानगी करायला व्यक्तिशः निदान माझी तरी काही हरकत नाही.
- पंडित गागाभट्ट.
15 Jul 2010 - 9:25 am | पांथस्थ
हा हे एकदम बराबर हाय.
- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
15 Jul 2010 - 2:46 pm | राजेश घासकडवी
पंगा,
तुम्ही जर मूळ लेख काळजीपूर्वक वाचलात तर खरंच बरं होईल हो..
मी कुठचाही पूर्वग्रह बाळगून आलो नव्हतो. आपण माझ्याविषयी पूर्वग्रह बाळगू नये ही विनंती.
हे तर साफ चुकीचं! आधी चांगला अनुभव आला म्हणून तिथे गेलो असं स्पष्ट लिहिलेलं आहे ते दिसलं नाही का? असा आंधळेपणा नक्की कुठल्या ज्वलंत अभिमानाने डोळे दिपल्यामुळे येतो कोण जाणे!
आधीचेच मुद्दे अपुर्या अभ्यासावर असल्याने पुढच्यास उत्तर देण्यात काही हशील नाही. उगाच पंगे करण्याच्या नादात गागाभट्टांनी पांडित्य हरवू नये ही विनंती.
15 Jul 2010 - 4:22 pm | पंगा
आपल्या म्हणण्याप्रमाणे लेख पुन्हा एकदा वाचला. ("काय कामाला लावलाय येड्याला!" असो.) काही प्रश्न पडले.
- 'मराठी, पुणेरी, पुस्तकवाला: एक डेडली काँबिनेशन' हे शीर्षक या कथेसाठी आपण नेमके कोणत्या कारणास्तव निवडले आहे? कथेशी, कथेतून जे काही सांगायचे आहे त्याच्याशी काही संबंध आहे म्हणून, की केवळ छान दिसेल असे वाटले म्हणून?
- पहिल्याच परिच्छेदात पुढील वाक्य आहे: "तसाच अनेक प्रश्नांचं एकच उत्तर देणारा अनुभव आज मला आला. 'मराठी माणूस धंद्यात मागे का पडतो? पुस्तकांचा खप कमी का होतो? पुणेरी दुकानदाराची प्रतिमा वाईट का आहे?' हे ते प्रश्न." यातील अधोरेखित प्रश्न आपल्याला नेमका कशामुळे पडला? म्हणजे, 'पुणेरी दुकानदाराची प्रतिमा वाईट आहे' असा साक्षात्कार आपल्याला या अनुभवानंतर घडला, की तशी काही कल्पना आपल्याला या अनुभवाआधीपासून होती?
(एका अनुभवानंतर, 'हा ग्राहकसेवेचा विशिष्ट अनुभव वाईट होता' हे कोणालाही कळावे. परंतु पुणेरी दुकानदारांबद्दल अगोदर कोणतीही प्रतिमा मनात नसताना, एका वाईट अनुभवानंतर अचानक 'पुणेरी दुकानदारांची प्रतिमा वाईट आहे' ही माहिती अथवा कल्पना नव्याने होणे हे माझ्या आकलनशक्तीच्या पली़कडचे आहे. 'पुणेरी दुकानदारांची प्रतिमा वाईट आहे' या पूर्वकल्पनेअभावी 'पुणेरी दुकानदारांची प्रतिमा वाईट का आहे' असा प्रश्न पडणे संभवत नाही. फार फार तर 'हा दुकानदार माझ्याशी असे का बरे वागला' असा प्रश्न पडावा. पण मग 'पूर्वग्रह', 'पूर्वग्रह' म्हणतात ते अशा पूर्वकल्पनेलाच नाही काय?)
- पुढील एका परिच्छेदात "एका बोळात ते दुकान आहे. बोळात शिरताना कोपऱ्यावरच मुत्रीच्या वासामुळे नाक दाबावं लागलं." अशी वाक्ये आहेत. यांपैकी अधोरेखित वाक्य हे वातावरणनिर्मितीसाठी योजले आहे काय? अन्यथा या कथेच्या किंवा त्यातून जे काही सांगायचे आहे त्याच्या संदर्भात या वाक्याचे प्रयोजन कळत नाही. पण ते एक असो. आपली वाक्यांची निवड आपल्या जागी योग्य. माझ्या लेखी हा तितकासा महत्त्वाचा मुद्दा नाही. केवळ एक कुतूहल म्हणून विचारले.
- आपणच नमूद केल्याप्रमाणे, त्या विशिष्ट दुकानाचा आपला पूर्वानुभव वाईट नव्हता. मग एकदा एक वाईट अनुभव आल्यावर अचानक पुणेरी दुकानदारांच्या प्रतिमेबद्दलची काळजी आपल्याला का बरे निर्माण झाली? त्याऐवजी प्रथम इतर पर्यायी दुकानांत जाऊन पाहण्याचा विचार आपण केला नाही का? नसल्यास का केला नाही? की 'एकदा दुधाने तोंड पोळले की माणूस ताकसुद्धा फुंकून पिऊ लागतो' हा न्यायाने, 'एका पुणेरी दुकानदाराचा वाईट अनुभव आल्यावर पुन्हा दुसर्याची परीक्षा कशाला घ्या' अशा विचाराने आपण असा विचार रहित केला? पण मग हाही एका प्रकारचा पूर्वग्रहच नव्हे काय?
- शेवटून दुसरा परिच्छेद. "गेल्याच वर्षी माझा मेव्हणा, अप्पा बळवंत चौकात गेला होता. लहानपणी वाचलेला फास्टर फेणेचा संपूर्ण संच आणि नंदू नवाथेचे संच व इतर बरीच पुस्तकं त्याला घ्यायची होती. पाऊण तास गाडीतून फिरून त्याला पार्किंग सापडलं नाही. एरवी पुण्याविषयी अतिशय प्रेम असलेला तोसुद्धा वैतागून म्हणाला, 'मी चार हजाराची पुस्तकं घेणार होतो आज. पन्नास रुपये देऊन गाडी पार्क करायची देखील तयारी होती माझी. पण हॅट, असला अनुभव आल्यावर मी इथे पाऊलसुद्धा ठेवणार नाही.'"
या परिच्छेदाचा, त्याच्याचपुढच्या समारोपाच्या परिच्छेदातील "तर त्या तीन प्रश्नांचं माझ्यासाठी, आजच्यापुरतं उत्तर आहे 'ग्राहकाविषयीची अनास्था'." या निष्कर्षाशी नेमका काय संबंध आहे? अप्पा बळवंत चौक परिसरात पार्किंगची परिस्थिती बिकट असणे, तेथे सहजासहजी पार्किंग न मिळणे हे त्या परिसरातील दुकानदाराच्या ग्राहकाविषयीच्या अनास्थेचे द्योतक कसे ठरू शकते? या बाबतीत त्या दुकानदाराने नेमके काय करावे अशी अपेक्षा आहे?
- सरतेशेवटी:
"आधी चांगला अनुभव आला म्हणून तिथे गेलो असं स्पष्ट लिहिलेलं आहे ते दिसलं नाही का?" अशा प्रकारची भाषा आपण नेमकी कोठे शिकलात? आणि, "असा आंधळेपणा नक्की कुठल्या ज्वलंत अभिमानाने डोळे दिपल्यामुळे येतो कोण जाणे!" हाही एका प्रकारचा पूर्वग्रहच नव्हे काय?
असो. योग्य वाटल्यास या प्रश्नांवर विचार करून आपल्याला स्वतःलाच मनापासून समाधानकारक वाटतील अशी उत्तरे द्यावीत. अन्यथा माझा आग्रह नाही.
- पंडित गागाभट्ट.
15 Jul 2010 - 4:47 pm | राजेश घासकडवी
कथेत तीन प्रश्न मांडले आहेत. त्यांचा सारांश म्हणून हे तीन शब्द येतात.
एखादी वदंता माहीत असणं म्हणजे त्यावर विश्वास असणं नव्हे. (जंतूंचा जेम्स लेन विषयीचा लेख वाचावा) प्रतिमा वाईट नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का?
छे हो, मला अजून पुस्तकं घ्यायची आहेत. अनेक दुकानदारांकडे मी जाणार आहे. हा एक क्षुल्लक अनुभव. त्याचं एवढं अवडंबर का होतंय कळत नाही.
पार्किंगचा अनुभव हा ग्राहकाची सिस्टीम पातळीवर कशी अनास्था होते हे अधोरेखित करायला आला होता.
मायला पूर्वग्रहविरहित वाचण्यालायक लेख किती असतात? ते किती सिरियसली घ्यायचे हा मुद्दा आहे.
अवांतर - केवढा मोठ्ठा प्रतिसाद... पंगा हे डान्राव असावेत का?
15 Jul 2010 - 5:40 pm | जृंभणश्वान
येथे ग्राहक शब्द वापरणे धाडसी वाटते. पार्किंगचा अनुभव हा नागरिकाची सिस्टीम पातळीवर कशी अनास्था होते हे अधोरेखित करायला आला होता - असे वाक्य एकवेळ चालेल.
माझ्या मते जगातील कुठल्याही डाउनटाउनमधे पार्किंग मिळणे जितके जिकीरीचे आहे तितकेच जिकीरीचे पुण्यातील पेठांमधे आहे, कधी विशेष फरक जाणवला नाही. पेठांमधे चारचाकी पार्किंगची माझ्या माहितीमधली चारपाच ठिकाणे आहेत( वर प्रतिसादांमधे उल्लेख आहे) या ठिकाणांहून पेठांमधला बराचसा भाग चालत पंधरा मिनीटात कव्हर करता येतो. दुचाकीची पार्किंग तर बक्कळ आहेत.
दुकानदार आपल्या परीने ग्राहकांना पार्किंगसाठी मदत करायचा प्रयत्न करतात. अ.ब.चौक, लक्ष्मी रस्ता, गावात एकूणच पेठांमध्ये "आज पार्किंग समोर आहे" अशा पाट्या अनेक दुकानांसमोर दिसतील. तरीही काही महाभाग चुकीच्या बाजूला गाडी लावतात तेंव्हा दुकानदार आत गेल्यावर गाडी उचलून नेतील असा अंदाज देवून ठेवतात.
16 Jul 2010 - 8:58 am | पांथस्थ
हो निश्चितपणे असेच म्हणायचे आहे. मला गेल्या २५/३० वर्षात असा अनुभव आल्याचे स्मरत नाही. आता काहि उणे दुणे असणार पण त्यामुळे सगळ्या दुकानदारांची प्रतिमा मलिन करणे योग्य वाटत नाहि.
पुणेरी भाषेचे वळण फटकळ्/परखड आहे. त्यात खोटे अगत्य नाहि. किंवा एखादि व्यक्ती ग्राहक आहे म्हणुन तिच्याशी (वरवरच्या) व्यावसायिक सौजन्याने बोलले जाईलच असे नाहि. उलट अनेक वेळा दुकानदार परखड पण योग्य तेच मत व्यक्त करेल. आता ज्याला त्याची सवय नाहि त्याला कदाचित ते विचित्र वाटु शकते आणि अश्या ठिकाणी खरेदि करायची की नाहि हे स्वातंत्र्य त्यांना आहेच कि.
कुणी एक खडुस म्हणुनच गेला आहे "व्यक्ती जर स्वतः चांगली असेल तर त्याला नेहमी चांगलेच अनुभव येतात असे माझ्या घरचे म्हणतात" तेव्हा... ;)
कृपया हलके घेणे :)
- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
13 Jul 2010 - 12:23 pm | पंगा
ठीक. म्हणजे बिगरमराठी बिगरपुस्तकवाल्या पुणेकरांविषयी स्पष्टपणे काहीही म्हटलेले नाही, हे मान्य. परंतु लेखाचे शीर्षक 'मराठी, पुस्तकवाला: एक डेडली काँबिनेशन!' याऐवजी 'मराठी, पुणेरी, पुस्तकवाला: एक डेडली काँबिनेशन!' असे आहे, याचा अर्थ त्या कॉंबिनेशनाच्या डेडलित्वात पुणेरित्व हा एक अविभाज्य घटक असणे लेखकास अभिप्रेत आहे, असा का घेता येऊ नये, याचा कृपया खुलासा व्हावा.
असो. लेखाबद्दल किंवा वरील मखलाशीवजा प्रतिक्रियेबद्दल अजिबात आश्चर्य वाटले नाही, एवढेच नोंदवू इच्छितो. बाकी चालू द्या.
- पंडित गागाभट्ट.
13 Jul 2010 - 12:21 pm | सहज
"एक सांगतो अस्सल पुणेकराला कोणत्या दुकानात कोणाकडे, काय व किती प्रश्न विचारायचे हे बरोबर कळते.."
>हे रिव्हर्स स्टेरिओटायपिंग नाही का?
जोवर ते वाक्य लेखातले वाक्य म्हणून किमान डझनभर वेळा विविध अनुभवकथनात येत नाही तोवर नक्कीच रिव्हर्स स्टेरिओटायपिंग नाही. तुम्ही आपले गुर्जी म्हणुन प्रॉब्लेम जसा दिसला तसा सांगीतला. आता ती तुम्हाला पटणे न पटणे, मानणे न मानणे बाब वेगळी. कृपया पुन्हा एकदा त्या वाक्यातले फक्त शब्द पहा. पुन्हा आरोप करण्याकरता कसे वापरता येतील हे बघु नका पण नेमका अर्थ ध्यानात घ्या.
अजुन एक दोन मुद्दे जसे जर ते वयस्क गृहस्थांऐवजी तो सेल्समन तुम्ही गेल्या गेल्या समोर आला असता तर हा लेख आला असता का? याचे उत्तर मिळाले तर आवडेल.
13 Jul 2010 - 2:08 pm | राजेश घासकडवी
बरोब्बर. मुद्दा असा आहे की तुम्ही जे म्हणता ते सर्वांनीच केलं तर पूर्वग्रहदूषिततेचे ९९% आरोप गळून पडतील. एका छोट्याशा गोष्टीवर फोकस केलं तर अनर्थ होऊ शकतो हे मला दाखवायचं होतं.
अर्थातच नसता आला. तुम्ही आधी लिहिलेला सांख्यिकीचा मुद्दा पटतो. अनुभव भले-बुरे, आधी -नंतर, नशीबाने येतात. दर अनुभवानंतर धनंजय यांनी म्हटल्याप्रमाणे योग्य रकान्यात आणखी एक फुली असंच बघावं लागतं.
अनुभव कथन करताना शक्य तितकं सत्य वाचकासमोर ठेवून मर्यादित निष्कर्ष काढणं इतकंच लेखकाला करता येतं. त्या निष्कर्षाची व्याप्ती वाचक किती वाढवतील हे त्याच्या हाती नाही.
13 Jul 2010 - 2:14 pm | सहज
म्हणुनच आधीच असलेले पुर्वग्रह वाढीस लागतील असे लेख लिहण्यापेक्षा, पुर्वग्रह कमी करणारे असे प्रतिसाद जमेल तेव्हा अश्या धाग्यात यापुढे द्याल अशी आशा करतो :-)
बोधः बडवला कळफलक लिहला लेख असे शक्यतो होउ नये किमान जाणकारांकडून.
जाताजाता - एक तरी धागा दंगा करायला मिळाला की दिवस कसा आनंदात जातो नै ;-)
14 Jul 2010 - 12:51 am | राजेश घासकडवी
पूर्वग्रह का आहेत? त्याची ही अमुक अमुक कारणं तर नसावीत? असे प्रश्न विचारणं म्हणजे पूर्वग्रह वाढवणं होत नाही असं माझं मत आहे.
लेख लिहिण्यामागचं उद्दिष्ट महत्त्वाचं असं तुम्ही म्हणता आहात असं वाटतं. हेच प्रतिसादांबाबतही म्हणता येईल.
दंगाच करायचा तर तो पूर्वग्रह कमी करणारा करावा.. हेही जाताजाताच...
13 Jul 2010 - 12:29 pm | बिपिन कार्यकर्ते
या लेखाच्या निमित्ताने श्री. घासकडवी यांना त्यांच्या स्वभावातले विविध पैलू सापडले असतील, त्याबद्दल श्री. घासकडवी यांचे अभिनंदन.
बिपिन कार्यकर्ते
13 Jul 2010 - 7:34 pm | सहज
अभिनंदन.
१०० प्रतिसाद मिळणारा धागा घासकडवी यांच्या नावावर लागणार.
14 Jul 2010 - 10:48 am | आळश्यांचा राजा
बेस्ट वन!
बाकी परांच्या प्रतिक्रिया धमाल आहेत. पुण्यात मीही साताठ वर्षे राहिलो आहे. पण नो कॉमेंट्स!
पर्सनली नाही घेतलं कुणीच तर हा धागा आणि त्यावरचे प्रतिसाद म्हणजे निखळ करमणूक आहे. नावं ठेवणं किंवा कौतुक करणं असं दोन्ही टाळणं अशक्य आहे काही किश्शांच्या बाबत. उदा. वरती मास्तरांनी सांगितलेला अर्धवट माहिती असलेल्या लोकांना वाटेला लावणे...खलास झालो!
प्रतिसादांमध्ये पुण्यातील चांगली/ वाईट दुकाने आणि पार्किंगची सोय, कुठल्या रस्त्यात तुळशीबाग पडते वगैरे बरीच उपयोगी माहिती आली आहे. एकूण हा विषय बर्याच जणांच्या जिव्हाळ्याचा दिसतोय! :)
आळश्यांचा राजा
13 Jul 2010 - 1:22 pm | मृत्युन्जय
मी कालच अत्रे सभाग्रुह (बाजीराव रस्ता) येथे भरलेल्या पुस्तक प्रदर्शनातुन ४१०० रुपयाची पुस्तके सवलतीच्या दरात ३००० रुपयात घेतली. श्याम मनोहर आणी आनंद यादव यांची पुस्तके देखील होती तिथे. पुस्तके हाताळता येतात शिवाय काउंटर वर् बसलेल्या माणसाला सांगितले तर तो इतरांना सांगुन पुस्तके शोधुन पण देत होता.
१-२ हवी असलेली पुस्तके नव्हती ती ३-४ दिवसात आणुन ठेवतो म्हणाला.
प्रदर्शन खुप छान आहे. हवी असतील तर तिथुनच पुस्तके घ्या.
13 Jul 2010 - 1:28 pm | यशोधरा
अरे वा! मस्त! :)
13 Jul 2010 - 1:59 pm | कवितानागेश
मला देखिल अप्पा बळवंत चौकातच अनेक दुकानदारांच्या तुसडेपणचे अनुभव आले आहेत, तेसुद्धा टेक्स्ट बूक्स घ्यायला गेले असताना!
शिवाय स्वत।च प्रकाशित केलेले नवीन पुस्तक विकतानासुद्धा!!
गिरगाव, दादर, ठाणे येथे पुस्तक विक्रेते नीट वागले आहेत.... फरक स्प ष्ट जाणवतो.
परवा तर पुद्दुचेरीला सुद्धा एका तमिळ मुलीनी पुस्तके घेताना व्यवस्थित मदत केली.
============
माउ
13 Jul 2010 - 2:25 pm | प्रकाश घाटपांडे
पुलंचे "तुम्हाला कोण व्हायचय पुणेकर मुंबईकर कि नागपुरकर? " हे यानिमित्त आठवले. पुणेरी दुकानदार तुच्छतेने कसा वागतो याचे मजेदार वर्णन आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
13 Jul 2010 - 2:50 pm | ऋषिकेश
पुणे आणि तेथील विक्रेते या विषयावर नो कमेंट्स ;)
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
13 Jul 2010 - 3:19 pm | भडकमकर मास्तर
आता आमचा पण त्याच दुकानाचा एक वेगळा लक्षात राहणारा अनुभव... २००१ किंवा ०२ सालचा असेल्..महाविद्यालयात असल्यापासून तिथे एकांकिकांची / नाटकांची पुस्तकं घ्यायला जात असे... (अजूनही तिथेच जातो.. अनुभव बरा असतो) तर तिथे गेल्यावर मी विजय तेंडुलकरांच्या एकांकिका मागितल्या. त्यांनी आता उपलब्ध नाहीत / आउट ऑफ प्रिन्ट आहेत असे काही सांगितले...( तोपर्यन्त पॉप्युलरचे संच निघाले नव्हते) मग एकदम मला आत बोलावले, म्हणाले, "एक काम करतो, तुम्ही तेंडुलकरांशी बोला" मला काही कळेना, थेट त्यांना एकांकिका कशाला मागायच्या आपण असे वाटले... आणि यांनी आपणहून न बोलता मी का बोलायचे मला कळेना... त्यावर ते मला म्हणाले, " अहो आम्ही प्रकाशक, आम्ही थेट लेखकाला फोन केला की बरं नाही दिसत ते... तुम्ही वाचक, तुमचं चालतंय... सांगा हो, आम्ही नाटकाच्या ग्रुपमध्ये वाचन वगैरे करतो त्यासाठी तुमच्या एकांकिका हव्यात वगैरे" आणि माझ्या हातात फोन लावून दिला.... गम्मत वाटली.. सुदैवाने तेंडुलकर फोनवर आले... . शांत व्यवस्थित बोलल्याचे आठवते... "आत्तातरी एकांकिका उपलब्ध नाहीत... पण पुढल्या काही महिन्यांमध्ये पॉप्युलर प्रकाशन नव्याने संच छापणार आहे ...तुम्हाला अगदीच हव्या असतील तर त्यांच्याशी संपर्क साधा" असे काहीसे बोलले... आभार मानून मी फोन ठेवला. त्यांना माहिती दिली... काकांना सूक्ष्म दु:ख झाल्याचे मला उगीचच जाणवले. मला चाहत्याला होतो तसला आनंद झाला होता. ( पुढे २००६ मध्ये चार दिवस तेंडुलकरांच्या भेटीचा योगही आला, पण हे अकस्मात फोनवर बोलणे भारी वाटले)
.... काकांनी दिलेल्या या संधीबद्दल काकांचे आभार मानून बाहेर पडलो... अशी काकांची बिझनेस स्ट्रॅटेटेजी मोठी इन्ट्रेष्टिंग होती...
13 Jul 2010 - 4:10 pm | चिंतातुर जंतू
निलायम चित्रपटगृहाजवळ (ना.सी.फडके चौक) 'पाथफाईंडर' या दुकानात जाऊन पाहावे. दुपारी दुकान बंद असते आणि जेवणाच्या वेळात गेल्यास विक्रेते दुकान बंद करण्याच्या घाईत असतात, पण इतर वेळी खरेदीचा अनुभव चांगला असतो. संगणकावरील यादीत पुस्तके नावानिशी, लेखकानिशी शोधून मिळतात. नसलेली पुस्तके मागवून घेणे, आली की दूरध्वनीने कळवणे या बाबतीत मंडळी तत्पर आहेत.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
13 Jul 2010 - 9:36 pm | योगी९००
दुपारी दुकान बंद असते आणि जेवणाच्या वेळात गेल्यास विक्रेते दुकान बंद करण्याच्या घाईत असतात,पण..
जेवू द्या की त्यांना शांतपणे..तुमच्या जेवणाच्या वेळेत आलो तर चालेल काय?
खादाडमाऊ
14 Jul 2010 - 12:39 am | चिंतातुर जंतू
नाहीच चालणार! आमचे विधान ही तक्रार नव्हती तर आम्हाला जी सर्वसामान्य दैनंदिन परिस्थिती वाटते, तिची इतरांना जाणीव फक्त करून देण्याचा त्यामागे हेतू होता - कुणी नेमके जेवणाच्या वेळेत जाऊन आले, आणि मग आमचा अनुभव कसा पुणेरी आणि वाईट होता, असे धागे पुन्हा काढले असे होणे टाळावे यासाठीच केवळ. बाकी दुकानाची तरफदारी आम्ही केली आहेच.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
13 Jul 2010 - 5:49 pm | जे.पी.मॉर्गन
.. लेखानी नाही तर त्यावरच्या प्रतिसादांनी... आयला असं कॅरॅक्टर असलेलं शहर महाराष्ट्रात काय भारतात सापडणार नाही (इथे "जगात" म्हणण्याचा पुणेरी आगाउपणा खूप मुश्किलीने आवरलाय). कोणीही काहीही म्हणा.... भेंडी पुणं ते पुणं. खवचट पुणं, कंजुष पुणं, तिरसट पुणं... ट्रॅफिकची वाट लागलेलं पुणं... आणि पानशेतच्या धरणफुटीच्या गोष्टी सांगणारं पुणं.... कसब्याच्या मिरवणुकीत ४० ढोल २० ताशे वाजवणारं पुणं... "आयुष्यावर बोलू काही" कॉलेजियन्सच्या गर्दीनं "हाऊसफुल्ल" करणारं पुणं....दिवाळीच्या पहाटे आख्खी सारसबाग पणत्यांनी सजवणारं पुणं.... "पुरुषोत्तम" चा जल्लोष करणारं पुणं..... संपले संपले... माझे शब्द तर इथेच संपले.
असा धागा आणि अश्या प्रतिक्रिया पुणे आणि पुणेकरांबद्दल आल्या ह्यातच सगळं आलं. :)
जाता जाता... मला पुणेकर असल्याचा जाज्वल्य अभिमान आहे :) बाकी चालूद्या!
जे पी
13 Jul 2010 - 5:52 pm | यशोधरा
ब्येश्ट हो!
- पुण्याचा जाज्वल्य अभिमान बाळगणारी,
* जाज्वल्य नसेल तर तो अभिमानच नाही! ;)
यशो
13 Jul 2010 - 7:45 pm | रामदास
चांगले आणि वाईट सेवादाता सर्वत्र असतात. त्या दिवशी तुमची मनस्थीती फार हळवी असावी आणि त्या काकांची कोण आले हे बाजीराव अशी असावी.(म्हातारपणात मूड स्विंग्ज कोणाला चुकले आहेत ?)
पण अशा अनुभवांना सोबत घेऊन जाण्यापेक्षा एखाद्या दुसर्या दुकानात जाऊन या.सोबत चांगल्या आठवणी घेऊन जाणे बरे.
14 Jul 2010 - 7:47 am | पक्या
दुकान उघडून बसलात की ग्राहकसेवा ही उत्तमच असली पाहिजे. दुकानदार, व्यावसायिक यांच्यासाठी ग्राहक हा ग्राहकराजा असतो.
ग्राहकाने वागण्या बोलण्यातील मर्यादाच ओलांडली तर मात्र दुकानदाराने खत्र्रृडपणा केला तर समजू शकते. अन्यथा उत्तम ग्राहक सेवा ही कोणत्याही व्यवसायासाठी पहिली पायरी असावीच असावी.
(घरचे लोक पुण्यात व्यवसाय करणारे असल्याने त्या अनुभवातूनच बोलत आहे.)
३५००० पुस्तके असलेल्या दुकानात कॅटलॉग ठेवणे उपयुक्ततेचे आहे. त्यातही चालता बोलता कॅट्लॉग (सेल्समन) उपलब्ध नसेल तर खूपच गरजेचे आहे.
काही दुकानदारांची त्यांच्या क्षेत्रात मक्तेदारी असल्याने ग्राहकांची त्यांना गरजच नाही असे त्यांचे वागणे पाहून जाणवते. आणि मक्तेदारी असल्याने ग्राहकालाही त्या दुकानदाराशिवाय अन्य पर्याय नसू शकतो. अशावेळी बर्याचदा ग्राहकाला त्रास सहन करावा लागतो.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
14 Jul 2010 - 10:15 am | नाखु
=D> प्रतिसाद सर्वोत्तम....
याच पुण्याला नाव ठेवण्याच्या "परंपरेवर" सुधीर गाडगीळ लोकप्रभमधुन चागला समाचार घेत असत...
नाद खुळा..
स.प. आणि सदाशिव पेठेत "शिक्षाण झालेला"
14 Jul 2010 - 10:53 am | खडूस
मला आजवर (गेली १० वर्षे) पुण्यात चांगलाच अनुभव आला आहे.
परेश मध्ये त्याच काकांनी कौतुकाने मला सर्व पुस्तके तर दिलीच वर न मागता extra discount ही दिला होता.
मी या शनिवारी अत्रे सभाग्रुह (बाजीराव रस्ता) येथे भरलेल्या पुस्तक प्रदर्शनातुन पुस्तके घेतली. तिथे योग्य व्यक्तीला विचारले तर तो पुस्तके शोधुन पण देत होता.
एक खास आवर्जून सांगण्यासारखा किस्सा म्हणजे
साहित्य संमेलनाला तर मी जवळपास ७५-८० पुस्तकांची यादीच नेली होती. पण मला त्यांचे प्रकाशक माहीत नव्हते. तर सुरूवातीच्या एक्-दोन स्टॉल्सवर थोडा त्रास झाला. मात्र continental च्या stall वर मात्र माझी यादी हातात घेऊन त्याने स्वतःकडची पुस्तके तर दिलीच वर त्याला माहीत असलेल्या पुस्तकांचे प्रकाशक पण update केले.
व्यक्ती जर स्वतः चांगली असेल तर त्याला नेहमी चांगलेच अनुभव येतात असे माझ्या घरचे म्हणतात
»
- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
14 Jul 2010 - 12:29 pm | पांथस्थ
सच बोला भाई! पण ह्याचा implied अर्थ काय काढावा ;)
- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
14 Jul 2010 - 12:33 pm | खडूस
जो जे वांछिल तो ते अर्थ काढो ;)
- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
14 Jul 2010 - 4:38 pm | दिपक
जय जय महाराष्ट्र माझा , गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा , कृष्ण कोयना , भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो , शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला , निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो , महाराष्ट्र माझा
कवि - राजा बढे
संगीत - श्रीनिवास खळे
गायक - शाहीर साबळे
15 Jul 2010 - 9:30 am | पांथस्थ
कविता ठिक आहे, पण या धाग्यावर टाकायचे प्रयोजन काय?
जागे व्हा, नाहितर तुमचा वाढदिवस साजरा व्हायचा ;)
- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर