हे वाचा: शेष प्रश्न
कटाक्ष:
भाषा- हिंदी (मूळ बंगाली)
लेखक- शरच्चंद्र चट्टोपाध्याय
प्रकाशन- डायमंड बुक्स
प्रथमावृत्ती- १९३१
पृष्ठसंख्या- २०८
किंमत- ₹१५०
ISBN : 978-81-7182-917-1
ओळख:
कहाणीचा काळ स्वातंत्र्यपूर्व, वीसाव्या शतकाचा पूर्वार्ध. सगळे कथानक आग्र्यातल्या बंगाली वस्तीत घडते. आशु बाबु, अविनाश, हरेन्द्र, अक्षय आणि इतर ही बंगाली भद्र मंडळी. संस्कृतीचे पाईक आणि पूजक अशा या मंडळींची गाठ पडते कथेची नायिका कमल हिच्याशी (कथेला नायक नाही!). कमल आणि तिचा गायक पती शिवनाथ यांच्या विवाहाची वैधता ते कमलचे कुळ, जात इ. मुळे सभ्य समाजात कमलची सतत अवहेलना केली जाते. परंतु आपल्या तर्कशुद्ध प्रतीवादांनी कमल या मंडळींना वारंवार त्यांच्या धारणांचा पुनर्विचार करण्यास बाध्य करते. बंगाली मंडळी सांस्कृतिक-धार्मिक परंपरा, 'भारत जगद्गुरु' (आजच्या भाषेत विश्वगुरू!) यांच्या सर्वोच्च महत्तेचे गुणगान करत असताना कमलच्या भूमिकेतून दोन्ही बाजूंनी समाधान होणार नाहीत असे प्रश्न उभे राहतात तेच 'शेष प्रश्न'. त्यांचे समाधान होते का? तात्त्विक भूमिकांना व्यवहारी जगात जीवंतपणा कसा प्रदान करावा? आणि काहीतरी जुना, काळाच्या कसोटीवर तपासून स्थिर झालेला विचार सर्वांनी आज जसाच्या तसा स्वीकारावा हे योग्य की अयोग्य? अशा प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आणि शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांच्या नजरेतून स्त्री मनाचे अंधारे कोनाडे जाणून घेण्यासाठी वाचायला हवे - 'शेष प्रश्न'.
शिल्लक:
ही कादंबरी रूढी प्रियतेवर घाव घालणारी असून जीवनात व्यक्तीगत पातळीवरील विचारांना ती समाजमान्यतेच्या बरोबरचे किंबहुना जास्तीचे महत्व देते. ज्यांना कथेत नाट्य आवडते त्यांच्यासाठी ही कादंबरी नाही. कथा निरस होणार नाही एवढे नाट्य पुरेशा प्रमाणात असले तरी 'शेष प्रश्नां' भोवतीची चर्चा हा या कादंबरीचा आत्मा आहे. १९३१ साली नायिकेच्या हातात प्रागतिक विचारांची मशाल देणे ही एक क्रांतिकारी घटना होती. आजच्या स्त्रीवादी (फेमिनिस्ट) चळवळीने अंगीकारावेत असे अनेक विचार या शतकभर जुन्या कलाकृतीत पदोपदी आढळतात. केवळ मनोरंजन म्हणून वाचण्यासाठी हे पुस्तक नाही.
तळटीप:
'श्रीमान योगी' च्या प्रस्तावनेत (जे मुळात नरहर कुरुंदकरांनी रणजित देसाई यांना लिहिलेले पत्र होते) "शिवाजीला कुणी बालमित्र असतील, असे वाटत नाही. ‘शेषप्रश्न’ या कादंबरीत सव्यसाचीची अशी स्वभावरेखा आहे, त्याच्याशी मिळतीजुळती शिवाजीची आहे. .... सव्यसाची एकवार बारकाईने वाचावा, अशी सूचना आहे." असा एक उतारा आहे. परंतु 'शेष प्रश्न' मध्ये सव्यसाची नावाची व्यक्तिरेखाच नाही. येथे कुरुंदकरांना शरच्चंद्र बाबुंची 'पथेर दाबी' (१९२६) ही राजकीय कादंबरी आणि तिचा क्रांतिकारक नायक सव्यसाची अभिप्रेत असावा. स्मरणातील गोंधळाने 'शेष प्रश्न'चा चुकीचा संदर्भ दिला गेला असण्याची शक्यता आहे. आज 'श्रीमान योगी'च्या एकतिसाव्या (२०१६) आवृत्तीतही ती चूक सुधारली गेली नाही याचे आश्चर्य वाटते.
वाचने
4832
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
सव्यसाची
In reply to सव्यसाची by अर्धवटराव
आशा आहे की
In reply to आशा आहे की by अनुस्वार
धन्यवाद !!
समाजात जेवढी असमानता, अन्याय अधिक . . .
कालमानानुसार
शरच्चंद्र
समग्र शरदचंद्र वाचलेय -
यावरून एक विचारतो . .
In reply to यावरून एक विचारतो . . by कंजूस
पुन्हा काळ मागे चालला.+१
सुंदर ओळख.