रिक्षावाले, संप आणि आम्ही ...

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in जनातलं, मनातलं
2 May 2009 - 10:19 pm

आज सकाळी (जरासे अंमळ उशीरानेच) उठलो, नेहमीच्या सवयीनुसार आधी लॅपटॉप चालु करुन नेट चालु केले व काय चालु आहे ह्याची चाचपणी केली. सकाळ-सकाळ एका महत्वाच्या बातमीने आमचे लक्ष वेधुन घेतले ( काळजी नको, अजुन कोण नवा चप्पल्/बुट फेकीचा नवा बकरा झाले नाही. त्याबद्दल सविस्तर नंतर कधीतरी.) ते म्हणजे "दरकपातीच्या निषेधार्थ पुण्यातले २५००० रिक्षावाले संपावर ....".
हीच बातमी जवळपास सगळ्या पेपरमध्ये आणि सोशल वेबसाईटवर दिमाखात झळकत आहे. बरोबर आहे ना, अहो हा प्रश्न "पुण्याशी" निगडीत आहे ना, मग त्याला "वैश्विक प्रश्नाचा" दर्जा नको द्यायला ? आज ही बातमीकडे दुर्लक्ष केल्याची गुस्ताखी पुणेकरांनी माफ केली तर उद्या "पुण्यात ह्यावेळी कडाक्याची थंडी" ही बातमीही तुम्ही लेको मिडीयावाले छापणार नाही, कुठे फेडाल असली पापं ?
असो. तर मुद्दा पुणेकर हा नसुन पुण्यातल्या रिक्षावाल्यांचा संप असा आहे ...

बातमी वाचुन आमचे अंमळ मनोरंजन झाले व धक्काही बसला, रिक्षावाल्यांनी आम्हाला धक्का देण्याची ही दुसरी खेप. मागे एकदा आम्हाला बेंगलोरमध्ये रात्री ८.३० वाजता एक रिक्षावाला चक्क यायला तयार झाला, हिंदीतही व्यवस्थित बोलला, मीटर प्रमाणेच भाडे घतेल, उरलेले सुट्टे मात्र ३ रुपये परत केले व वर जाताना "गुड नाईट सर" असे म्हणाला तेव्हा असाच धक्का बसला होता, त्या धक्क्याने आम्ही एवढे अंतर्बाह्य हादरुन गेलो होतो की रिक्षातुन उतरल्यावर आजुबाजुच्या माणसांचा आम्ही फुल्ल टल्ली होऊन कसेबसे रिक्षातुन घरापर्यंत परत आलो आहोत व अजुन लटपट लटपट चालत आहोत असा (कन्नडमधुन) गैरसमज झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बातमी सविस्तर वाचल्यावर आमच्या असे लक्षात आले की " रिक्षाच्या भाड्यामध्ये ( पक्षी : दरामध्ये, मी रिक्षावाल्याला भाड्या असे म्हटलो नाही, तो शब्दच तसा आहे.) प्रति किमी मात्र १ रुपायाने कपात करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ( बापरे, काय अवघड शब्द आहे, च्यायला असल्या जड सरकारी शब्दांविरुद्ध एकदा संप पुकारावा लागणार ) दिल्याने त्याच्या निषेधार्थ पुण्यातल्या सुमारे २५००० रिक्षावाल्यांनी ( सुमारे म्हणजे अंदाजे, रिक्षाच्या "सुमार दर्जाशी" ह्याचा काही संबंध नाही) बेमुदत संप पुकारला आहे. "
मला नाही कळाले. रिक्षावाल्यांचा संप म्हणजे काय व तो कसा जस्टिफाईड असु शकतो ?

रिक्षा ह्या व्यवसायावर पोट कुणाचे अवलंबुन आहे ? गरज कुणाला आहे ?
ह्याच चालीवर उद्या समजा भिकार्‍यांनी कमीत कमी मात्र १० रुपये भीक मिळावी म्हणुन, पुण्यातल्या दुकानातल्या ग्राहकांनी त्यांना दुकानात सन्मानजनक वागणुक मिळावी म्हणुन, दारुड्यांनी एका बाटलीबरोबर सोडा/थम्सप फ्री मिळावे म्हणुन ,अन्नछत्रातल्या यात्रेकरुंनी जेवणात ताटात तुपाची धार कमी पडते आहे म्हणुन्,भंगार गोळा करणार्‍यांनी भंगार वस्तुतल्या खालावत्या क्वालिटीचा निषेध म्हणुन संप पुकारावा हे जस्टिफाईड आहे का ?
तसा जर ह्यांना हक्क नसेल तर मनमानी करुन वागणार्‍या, अडवणुक करणार्‍या,ग्राहकांना कस्पटासमान वागणुक देऊन त्यांच्याशी उद्धट व्यवहार करणार्‍या, मनाला येईल ते भाडे मागणार्‍या, ग्राहकाची गैरसोय न पाहता एखाद्या रुटवरचे भाडे नाकारणार्‍या ह्या डोईजड रिक्षावाल्यांना "मात्र १ रुपये/किमी" च्या दरकपातीसाठी संप करणे बरोबर वाटते का ?

रिक्षा पंचायतीच्या पदाधिकार्‍यांच्या मते ... जाऊ दे, आधी ह्या "पंचायत" वाल्यांना पाहु. हे लोक नक्की कोण ? भाषणबाजी आणि आडवणुक सोडली तर ह्यांचा रिक्षा ह्या व्यवसायाशी संबंध काय ? हे नक्की काय करतात ? ह्यांचा पोटापाण्याचा धंदा हा रिक्षा अथवा तत्सम आहे का ? वर्षातुन एकदा चौकात भलामोठ्ठा मंडप टाकुन सत्यनारायण घालणे व त्यावेळी रिक्षांची मिरवणुक काढणे ह्याव्यतिरीक्त ही पंचायत रिक्षावाल्यांसाठी नक्की काय करते ? एखाद्या पक्षाच्या मंचावर ह्यांच्या नेत्यांनी जाणे व रिक्षावाल्यांनी त्या पक्षाचे झेंडे रिक्षांवर लाऊन मग्रुरी करत गुंडागर्दी करणे हे कलम रिक्षा पंचायतीच्या अधिकॄत घटनेत लिखीत स्वरुपात आहे का ? नसल्यास मग पंचायत अशा समाजविरोधी तत्वांच्या विरोधात का संप करत नाही ?
जसे १ रुपायाने भाडे कमी होणे हा मुद्दा रिक्षावाल्यांसाठी महत्वाचा ठरतो तसेच रिक्षाच्या ग्राहकांसाठी " सन्मानजनक वागणुक, शुद्ध व सज्जन आचरण असणारे व कमीत कमी उर्मट आणि शिव्यागाळी न करणारे रिक्षावाले, मीटरप्रमाणे भाडे, सर्व मार्गांवर हव्या त्या वेळी सेवा , एखाद्या विशिष्ठ मार्गावर सेवा न नाकारणे, रिक्षामध्ये मद्यपान धुम्रपान आणि इतर व्यसने न करणे, रिक्षांचा दर्जा सुसह्य राखणे" ह्याविषयी पंचायतीकडे काही कार्यक्रम आहेत का ? का ह्या गोष्टी त्यांच्या "रिक्षाकुलाला बौलु लागेल" अशा कॅटॅगिरीत येतात ?

मुळात ५ रुपयाने डिसेल कमी झाले असताना १रु./किमी दरकपात कशी अन्यायकारक ठरते हेच मला समजेना, हे लोक आता सुटे भाग व ऑईलची दरवाढ, दंडाच्या रकमेत वाढ वगैरे सांगत आहेत. योगायोगाने मी ह्याच क्षेत्रातला असल्याने ( १ मिनीट, मी रिक्षावाला नाही, वाहननिर्मीती उद्योगातला म्हणत आहे) ह्या गोष्टींची महागाई किती वाढली व ह्याचा दरसाल कितपत खर्च येतो ह्याची मला व्यवस्थित कल्पना आहे. हे सरळसरळ वडाची साल पिंपळाला लावण्यासारखे आहे. हां, इथे जर सर्व जीवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या किमतींचा विचार केला तर आपला रिक्षावाल्यांना सॉफ्ट कॉर्नर असु शकतो.
पण हे सगळे केव्हा ?
जेव्हा रिक्षावाले शुद्ध आणि सरळ "मिटरप्रमाणे" भाडे आकारतील तेव्हा ....
आयला दर भाड्यामागे १०-१५ रुपये जास्त मागायचे, मिटर फास्ट करुन ठेवायचे, डिसेलच्या जागी रॉकेल मिश्रीत इंधन वापरायचे आणि वरुन "१ रुपया दरकपातीविषयी" बोंबाबोंब करायची हा कुठला न्याय ?

पुण्यतल्या सो कॉल्ड २५००० रिक्षांपैकी किती रिक्षा मात्र "डिसेल्"वर चालतात ? कारण आम्ही "सी एन जी"वर चालणार्‍या रिक्षा रस्त्यावर धावत असल्याच्या बातम्या वाचतो. रिक्षावाल्यांच्या व्याख्येनुसार शहराच्या आउटसाईडला ( म्हणजे अख्ख्या पुण्यात ) मिटरप्रमाणे भाडे चालत नाही, मग हा १रु/किमी दर येतोच कुठे ? जर ६-आसनी रिक्षावाले ह्यात सामिल असतील तर त्यांनी कॄपया मिटरवर चालणारी ६-आसनी रिक्षा दाखवावी, आम्ही स्वखर्चाने त्यांचा "महावस्त्र(पक्षी:शाल) व श्रीफळ" देऊन सत्कार करु व मिटरपेक्षा १० रुपये जास्त बक्षिशी देऊ.किती रिक्षांचे मिटर योग्य मापकाप्रमाणे रिडिंग दाखवातात ? कारण आम्ही शि. नगर ते स्वारगेट ह्या मार्गावर "२२ रुपये ते ४० रुपये ह्याप्रमाणे कितीही मिटरप्रमाणे भाडे" दिल्याचे आठवते.
मग असे असताना १रु/किमी दरकपातीची एवढी बोंबाबोंब करुन पब्लिकला वेठीस का धरत आहेत हे रिक्षावाले ?
प्रामाणीकपणे कष्ट करुन जगणारे रिक्षावाले ह्यात भरडले जातात हे मान्य आहे पण तरीसुद्धा त्यांना मिळणारा पैसा हा तितकासा अन्यायकारक नाही हे सत्य आहे ...

मग हा एवढा माज आणि मस्ती कशासाठी ???
त्याचे कसे आहे की आज्-उद्या सुट्टी आहे म्हणुन आपण घरी बसुन आरामात "माजले आहेत हे रिक्षावाले भ**, एकेकाला चाबकाने फोडुन काढायला हवे, हवे तर घरी बसा म्हणावं, गेले उडतं" अशा आरामात प्रतिक्रिया देऊ, सध्या कसे सगळे गारगार आहे.
पण सोमवारी जेव्हा रणरणत्या उन्हात सकाळी हापीसाला जाताना गच्च भरलेली बस ३ वेळा सोडावी लागेल तेव्हा साहेब तुम्हाला "ए भैय्या, हिंजवडी चलेगा क्या ? " असे रिक्षावाल्यालाच विनवावे लागेल हे सत्य आहे. कितीही नाकारले तरी पुण्यातले "सार्वजनिक परिवहन" हे अत्यंत भिकार आहे हे सत्य आहे, ते तुम्हालाही माहित आहे आणि रिक्षावाल्यांनाही. तुम्ही त्याचा दर्जा सहन करत फार वेळ प्रवास करु शकणार नाही हे रिक्षावाल्यांना व्यवस्थित माहित असल्याने त्यांचा हा माज आहे ...
असो, त्यालाही पर्याय नाही..
एवढीच अपेक्षा करु की ह्याची पुढची पायरी ही रिक्षावाल्यांच्या आंदोलनात न होऊन दगडफेक, जाळपोळ, प्रवाश्यांची अडवणुक वगैरे प्रकारात होऊ नये ...
नुकत्याच निवडणुका झाल्याने अशा गोष्टी अशक्य नाहीत अशी शक्यता वाटते ...

" जे जे होईल ते पहावे, न्हेले रिक्षावाले तरच हापीशी जावे ..."

बाय द वे, रिक्षावाले हा लेख वाचण्याची शक्यता नाही ना ? नायतर पुढच्या पुणे वारीत मला रिक्षावाल्यांच्या माझ्यावर संभाव्य बहिष्कारामुळे पदयात्रा करण्याची पाळी येईल. तसे असेल तर सांगा, लगेच नाव बदलुन "रिक्षावाल्यांच्या समर्थनार्थ " अजुन एक खणखणीत लेख लिहायला बसतो. काय करणार बाबा, सवाल पुणे मे प्रवास का है...

वावरसमाजजीवनमानविचारलेखमतप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

2 May 2009 - 10:29 pm | आनंदयात्री

काय फरक पडतो असा एक रुपया भाडेकपातीने ? हे माजोरडे रिक्षावाले एक तर कमीत कमी ५० रुपयांवरचे अंतर असल्याशिवाय येत नाहीत. मुख्य रस्त्यापासुन आत जायचे असेल तर १० रुपये जास्त घेणार. नवख्याला तर १०० टक्के लांबुन नेउन उल्लु बनवणार. दादागिरी आहेच. एवढा सगळा माज असतांना १ रुपयांनी काय फरक पडणारे ?

पुण्यात दुकानदारांनंतर धसका घ्यायसारखी ही अजुन एक जमात ,, बास्स !!

टारझन's picture

3 May 2009 - 12:11 am | टारझन

बाय द वे, रिक्षावाले हा लेख वाचण्याची शक्यता नाही ना ? नायतर पुढच्या पुणे वारीत मला रिक्षावाल्यांच्या माझ्यावर संभाव्य बहिष्कारामुळे पदयात्रा करण्याची पाळी येईल. तसे असेल तर सांगा, लगेच नाव बदलुन "रिक्षावाल्यांच्या समर्थनार्थ " अजुन एक खणखणीत लेख लिहायला बसतो.

=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))

मेल्या .. कं जबरा लिवलं रं .. अगदी तुझ्या स्पेषल षैली मधे .. बाकी आंद्या म्हणतो त्याच्याशी सहमत ...
त्याचाच णिशेद म्हणून .. आम्हाला मुंबैत कट मारणार्‍या दोन (युपीवाल्या) रिक्षावाल्यांच्या डॉस्क्यात आम्ही हेल्मेट घातलंय ..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 May 2009 - 10:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

डान्राव, लेख नेहेमीप्रमाणे खणखणीत! हा संप मोडून काढला जावो अशी एक क्षुद्र अपेक्षा आहे. आजच संध्याकाळीही रस्त्यावर बर्‍यापैकी रिक्षा दिसल्या होत्याच, बाणेर भागात!

पुण्यात क्वचित कधी रिक्षात बसायची वेळ आली आहे, त्यातल्या काही वेळा प्रामाणिक रिक्षेवालेही सापडले आहेत. काही व्यवच्छेदक निरीक्षणं:
१. गोरे पाहूणे रिक्षातून नेताना रिक्षावाला 'तुम्ही मराठी, मी मराठी' गप्पा मारायला लागला की समजावं, प्रवासाचा शेवट भांडणाने होणार आहे.
२. रिक्षास्टँडवर गोर्‍या पाहूण्यांसमोर रिक्षावाल्याशी हुज्जत घातली की "यासाठीच का (शिवाजी) महाराज लढले होते", अशा टाईपचं 'लूटमारी'चं बकवास समर्थन ऐकायला मिळणार आहे.
३. "आयुकाला येणार का?" या प्रश्नावर काय आयुका, कुठे आयुका हे माहिती नसताना ४० रुपये होतील असं उत्तर येणार. आपण मनात ठरवावं की याने झिगझिग केली नाही तर ५० रुपयेही द्यायला हरकत नाही, तर त्याने आत पोहोचल्यावर ७५ ची मागणी करावी.
४. अशा माजोर्ड्यांपैकी काही रिक्षावाल्यांच्या रिक्षा जेवढ्या वेगात सरळ दिशेत हलतात त्यापेक्षा जास्त (अँग्युलर) गतीने उभ्या दिशेतही हलतात.

डोंबिवलीला एका रिक्षात बसले होते आणि रिक्षाचा आवाजच नाही! मी खोदून विचारलं तेव्हा चालकाने सांगितलं, रिक्षा नवीन आहे. म्हणजे बाकीच्या रिक्षावाल्यांना किती प्रेम असतं त्या बापड्या वहानावर ते समजलं.

पण थोड्या रिक्षाप्रवासानंतरचा माझा ठोकताळा, दिवसाउजेडी किमान अर्धेतरी रिक्षावाले माणसासारखे बोलतात. रात्र झाली की त्यांच्या अंगात येत असावं. काही रिक्षावाले हे मुहूर्त न मानणार्‍या प्रकारातले असल्यामुळे दिवस-रात्र कसलीही पर्वा न करता, आपण रिक्षा चालवतो म्हणजे अगदी देशच चालवतो अशाच आविर्भावात असतात.

अवांतरः काही व्यवच्छेदक लक्षणं वाचून मराठी विरुद्ध बिगरमराठी रिक्षावाले असा वाद उफाळून येऊ नये अशी छोटीशी अपेक्षा!

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

आनंदयात्री's picture

2 May 2009 - 10:40 pm | आनंदयात्री

उत्तम प्रतिक्रिया.
मुंबईतल्या रिक्षावाल्यांचा चांगला अनुभव आहे.

दवबिन्दु's picture

3 May 2009 - 8:22 am | दवबिन्दु

मुंबईतल्या रिक्षावाल्यांचा चांगला अनुभव आहे.

चान्गल वागतात कारन शाप आहे, B.E.S.T. खरोखर ब्येस आहे, रिक्शाने संप क्येला तर B.E.S.T. लगेच जादा गाड्या रस्त्यावर काडते.
.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?

मेघना भुस्कुटे's picture

4 May 2009 - 6:48 pm | मेघना भुस्कुटे

खरंय. मुंबईतले रिक्षावाले खरंच सौजन्यपुतळेच म्हणायला हवेत असे अनुभव बाहेर येतात.
बाकी डॉन्या, खणखणीत लेख एकदम. मजा आली.

बिपिन कार्यकर्ते's picture

2 May 2009 - 11:11 pm | बिपिन कार्यकर्ते

डॉन्याने उत्तमपणे लेख लिहिला आहे. अदिती आणि आंदोबाशी सहमत. रिक्षावाल्यांमधे काही फरक पडेल असे वाटत नाही. त्यांना पब्लिकची नस बरोबर माहित आहे. मला यावेळी पुण्यात दोन रिक्षावाल्यांनी 'निंबाळकर तालिम' एवढा सुप्रसिद्ध लँडमार्क सांगूनसुद्धा दोन्ही वेळेला मस्त फिरवले. नेमक्या जागी सोडलंच नाही.

अवांतर: मुंबईत तुलनेने परिस्थिती बरी आहे. इथे मात्र बाहेरचे आणि मराठी असे दोन्ही चालक नीटच वागतात. याला काही प्रमाणात जनतेचा वचक आणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरण दोन्ही कारणीभूत आहे असे वाटते.

बिपिन कार्यकर्ते

ऍडीजोशी's picture

5 May 2009 - 3:42 pm | ऍडीजोशी (not verified)

इथे मात्र बाहेरचे आणि मराठी असे दोन्ही चालक नीटच वागतात. याला काही प्रमाणात जनतेचा वचक आणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरण दोन्ही कारणीभूत आहे असे वाटते.

रिक्षावाल्याने माज दाखवला की त्याला तिथल्यातिथे खणखणीत कानाखाली वाजवणारे लोकं आहेत अजून मुंबईत आणि ट्रॅफिक पोलीसही दांडूका घेऊन उभे असतात म्हणून रिक्षावाले नीट वागतात.

अभिज्ञ's picture

2 May 2009 - 11:12 pm | अभिज्ञ

डॉनराव,
लेख एकांगी वाटला.
मला हे एक वाक्य फार आवडले.
एक रुपयाने काय फरक पडतो?

मला वाटते कि रिक्षावाले हि हेच म्हणत असतील कि
एक रुपायाने काय फरक पडतो?
असो.

सविस्तर प्रतिसाद सवडिने देतो.
:)

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

छोटा डॉन's picture

2 May 2009 - 11:57 pm | छोटा डॉन

सर्वात प्रथम लेख एकांगी वाटण्याबद्दल, तो वाटु शकतो. माझी ह्याला हरकत नाही/नसणार.
लेख लिहताना "एक बाजु" घेऊन विचार केला की लिहणे मुद्देसुद होते म्हणुन मी फक्त रिक्षावाल्यांच्या "विरोधात" विचार केल्याने लेख एकांगी वाटु शकतो. मात्र मला ह्या उद्दाम रिक्षावाल्यांबद्दल काडीची आत्मियता वाटत नसल्याने मला काही फरक पडेल असे वाटत नाही ...

>>एक रुपायाने काय फरक पडतो?
छे छे, मुद्दा कधीही "फक्त १ रुपया" ह्याचा नव्हता ?
अहो दर भाड्यामागे सरासरी १० रु. जास्त कमावणार्‍यांना १ रुपयाची किंमत ती काय ?
आमचे मत "म्हातारी मेली तरी हरकत नाही पण काळ सोकायला नको" असे असल्याने आम्ही ह्या "मात्र १ रुपया"च्या मागे लेख वगैरे लिहला ...
हे झाले "१ रुपया"चे समर्थन ...

आता बोलु "फरक काय पडतो ? " ह्या मानसिकतेबद्दल ...
एकुण अंदाजे किती वर्षे आपण लोक "फरक काय पडतो?" ही हतभागी, निराश, बेफिकीर आणि पराभुत मानसीकता घेऊन जगणार आहोत ह्याचा एकदा व्यापक अभ्यास व्हायला हवा. पब्लिकला काही सिरीयस वाटतच नाही, फरकच पडत नाही ...
"फरक पडायला हवा" ह्या विचारातुन शोध लागले, क्रांत्या झाल्या, देश स्वतंत्र झाके, अनेक सत्ता उलथल्या गेल्या, प्रगती झाली हे सर्व असताना "फरक काय पडतो" हे वाक्य खरोखर संतापजनक आहे ...
प्रश्न १ रुपयाचा मुळीच नाही, ह्या "ऍडजस्ट" करणार्‍या मानसिकतेचा आहे, आमचा विरोध त्यालाच आहे ...
आज जर तुम्हाला १ रुपयाचा फरक पडत नसेल तर भविष्यात होणार्‍या कसल्याही समप्रतीच्या अन्याय अथवा असमान वाटणीचा "फरक तुम्हाला पडणे अपेक्षीत नाही" हे सरळ आहे. काही बेसीक गोष्टीं आणि सुविधांच्या बाबत आपण "नो टॉलरंस" ऍटीट्युड कधी ठेवणार आहोत हे देव जाणे ...
अभिज्ञसाहेबा, हा रोख आपल्यावर नाही तर विषय निघाला म्हणुन बोलुन घेतले ...

बाकी आपल्या "सविस्तर" प्रतिसादाची वाट पहातो आहे ...

वैयक्तिक विचारशील तर माझा "फरक काय पडतो" ह्या पॉलिसीला "झिरो टॉलरंस विरोध" आहे.
माझ्यासाठी प्रत्येक गोष्टीचा फरक जरुर पडतो, ज्या गोष्टीचा फरक पडणार नाही अशी गोष्ट ह्या माझ्यापुरत्या विश्वात अस्तित्वात नाही. ....

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

प्राजु's picture

2 May 2009 - 11:50 pm | प्राजु

अगदी प्रत्येक अक्षरातून खणान् खण आवाज येत आहे. :)
रिक्षावाले या विषयांवर पीएच डी होऊ शकते. (आदितीने उगाचच दुर्बिणक्षेत्रात पीएच डी केली... छ्या!! चांगला विषय हातचा गमावला!) ;)

डॉन राव,
आपली निरिक्षणे आणि त्यावरचे निष्कर्ष यावर दाद द्यायला हवी. पुण्यात तसा रिक्षाने खूप फिरण्याचा योग नाही आला. पण जितक्या वेळेला हिंडले तेव्हा, संमिश्र अनुभव आला.
कुमठेकर रोड, तुळशी बाग, मंडई या भागातून संध्याकाळी ६ नंतर रिक्षावाले कोथरूड, कर्वेनगर या भागात यायला अजिबात तयार होत नाहीत. एखादा झालाच तर ५ रूपये (४ वर्षापूर्वी) जास्ती मागायचा.
आपली रिक्षा नसून, आपले चार्टर प्लेन आहे आणि त्यात बसलेला प्रवासी हक्काने लुबाडण्यासाठीच आहे अशी त्यांची समजूत (छे!! खात्रीच असते). त्यातही तुम्ही पहाटे, किंवा रात्री उशिरा बसलात रिक्षात तर, त्यावर सुवर्णवर्ख दिल्याप्रमाणे ते अगदी व्यवस्थित गोड बोलून लुटतात. आणि लुटायाचे असते म्हणून की काय, राजकारण, समाजकारण,.. बॉम्बस्फोट असल्या विषयांवर गप्पाही ठोकतात.
एकदा मी, रिक्षातून बसून घरी जात होते. रिक्षावाला का कोण जाणे बराच कातावलेला वाटत होता. त्यातही रोड खणलेलेच ठेवण्याची शपथ्थ घेतलेल्या पुण्यात, तो कर्वेरोड सारख्या नियमीत उकरून ठेवलेल्या रोड वरून निघाला होता. रिक्षामध्ये हॉर्न सोडून सगळं वाजत होतं. तरीही "च्यामारी, या म्युन्सिपाल्टीच्या..********* घातली लाथ, कशाला र्‍हायचं असल्या श्येरात(शहरात)?? मुक्त संचार (बहुतेक कुठल्या भाषणात हा शब्द ऐकला असावा त्याने) असता तर कध्धीच आम्मी आट्रुलिया {(ऑस्ट्रेलिया), हाच देश का निवडला त्याने देव जाणे!!)} ला निघून गेलो असतो.. " इ. मुक्ताफळे शिंपडायला चालू केली. खूप इच्छा झाली होती त्याला सांगायची की, बाबारे, तुझ्या रिक्षातले खणखण्णारे आवाज बंद कर, मला घरी सोड आणि मग ऑट्रुलिया ला जा"... असो. हा विषय न संपणारा आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

निखिल देशपांडे's picture

3 May 2009 - 9:26 am | निखिल देशपांडे

डॉनभाउ लेख मस्तच जमला आहे. आता पुण्यात मला पण एक दोन वेळा असा अनुभव आला आहे.

प्राजुतै मी करतो आहे हो सध्या ह्या विषयात पी एच डि
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर.

देवदत्त's picture

3 May 2009 - 12:05 am | देवदत्त

अरे वा, माझे दोन मुद्देही (किंवा प्रश्न) ह्यात सविस्तर आले आहेत. :)
रिक्षा पंचायतीचे म्हणायचे तर ठाण्यातील रिक्षा युनियन वाल्यांनी दिलेल्या उत्तरानुसार, ग्राहकाला काही तक्रार असेल तर ती वाहतूक पोलिसाकडे करायची. रिक्षा युनियन फक्त रिक्षा चालकांच्या तक्रारींवर लक्ष देते.

बाकी, तुमचे सर्व मुद्दे सडेतोड आहेत :)

घाटावरचे भट's picture

3 May 2009 - 12:23 am | घाटावरचे भट

डॉणभाऊ, उत्तम लेख.

यशोधरा's picture

3 May 2009 - 12:24 am | यशोधरा

डॉन्या, चांगले लिहिले आहेस.

भाग्यश्री's picture

3 May 2009 - 1:36 am | भाग्यश्री

खरं सांगायचे तर मला रिक्षावाल्यांचा एखाद दुसरा सोडला तर वाईट अनुभव नाही..
हा, तुळशीबागेतून रात्री कर्वेरोडला यायला फारसं कोणीच तयार नसायचे हा मात्र अनुभव बर्‍याचदा आला.. हे असं का? माहीत नाही! काही चालक माजोरडेपणाचा क्लास काढता येईल इतके मुजोर असतात , असंही का, माहीत नाही! :) कसला माज देवाला ठाऊक!

पण एकंदरीत उठ-सुठ संप करण्याबद्द्ल माझाही विरोध.. माझी दुचाकी नसताना रिक्शा हाच एक आधार असायचा.. बस हा पर्याय उत्तम असूनही कधी वाटेला गेले नाही.. त्यामुळे माझ्यासारखे अजुन कोणी असतील तर त्यांची गैरसोय अगदी नक्कीच झाली असणार!

लेख उत्तम! :)

www.bhagyashree.co.cc

१. रिक्षाचालकांचे नेत्तृत्व करणारी मंडळी नालायक आहेत. मी बाबा आढाव(की आघाव) या माणसाला रिक्षाचालकांचा एक मुजोर नेता असेच समजत होतो. त्यांचे कष्टकरी हमाल यासंबधीचे काम याविषयी नंतर माहिती झाली. अर्थात त्यांच्या जागी दुसरा कोणीही असता तरी असाच वागला असता, पण तथाकथित समाजवादी नेत्याचे सामान्य जनतेची कदर न करणारे विचार झेपत नाहीत.
२. पिंपरी चिंचवड परिसरात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नियम करुन देखिल रि़क्षा मीटरप्रमाणे भाडे आकारत नाहीत. भाडेकपात रद्द झाली तर हे साले तिथे मीटरप्रमाणे भाडे घेणार काय?
३. या सर्वाच्या मुळाशी आपली सडकी सार्वजनिक परिवहन व्यवस्था आहे. राजकीय नेतॄत्वाचा अदूरदर्शीपणा, सामान्य जनतेची मतदानाचे कर्तव्य बजावण्यातली अनास्था ह्या सगळ्याच गोष्टी या सगळ्याच्या मुळाशी आहेत.
धन्य ते तोक्योतले महभाग ज्यांनी १९२७ साली मेट्रो चालु केली. इथेही प्रचंड भ्रष्टाचार चालतो, पण जनतेचे हित आणि कामाचा दर्जा याबाबत तडजोड होत नाही.
समाजसेवाच करायची होती तर,२८ गाडया बाळगणार्‍या डीएसकेंनी २५ गाडया स्वारगेट ते शिवाजीनगर सोडायला हरकत नव्हती,:D
पुण्यातल्या कुठल्याही राजकीय पक्षाने यावर मतप्रदर्शन केल्याचे दिसले नाही.निवडणुक झाली आता पाच वर्षांनी पाहु असाच सार्‍यांचा विचार दिसतो.
४.प्राधिकरणात बिग इंडिया ते निगडी ह्या २.४ किलोमीटर अंतरासाठी रिक्षावाले १५ रुपये घ्यायचे. रात्री अपरात्री नवख्याकडुन तर जास्तच..
पण नव्या पीएमपीएलने निगडी ते आकुर्डी रेल्वे स्टेशन अशी शटल बससेवा दर १० मिनिटाच्या वारंवारतेने चालु केल्यापासुन आम्ही फक्त ३ रुपयात घरी जातो. आता रिक्षावाले हात चोळत बसले आहेत. एक रिक्षास्टॅन्ड चक्क बंद पडला. पीएमपीएलने अशी सेवा सर्वत्र द्यावी.

- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

सहज's picture

3 May 2009 - 7:19 am | सहज

वरील बर्‍याच प्रतिक्रियांशी सहमत. एकंदर मोठा चर्चेचा विषय आहे. पुण्याची सार्वजनीक वाहतूक न सुधारण्यात राजकीय पक्षांचे हित असावे असाच निष्कर्ष निघतो आहे असे वाटते.

नुकत्याच झालेल्या पुणेप्रवासात रिक्षाने फिरायची अनेकदा वेळ आली. ह्यावेळी फारसा वाईट अनुभव आला नाही हेही नमूद करावेसे वाटते.

जृंभणश्वान's picture

3 May 2009 - 7:30 am | जृंभणश्वान

मस्तच आहे लेख.
मला एकाआड एक चांगले/वाईट अजुभव येतात रिक्षावाल्यांचे त्यामुळे कधी वाटते मिळुदे बिचारर्‍यांना एखादा रुपया जास्त कधी वाटते माजलेत लगेच संप.

विनायक प्रभू's picture

3 May 2009 - 8:35 am | विनायक प्रभू

डॉन्या छान ल्हिहितोस रे तु.
सहमत.
जेंव्हा जेंव्हा पुण्यात गेलो तेंव्हा नेहेमी रिक्षावाल्याने लुटले नाही असे झालेच नाही अगदी गंजलेल्या रिक्षात बसलो तरी सुद्धा.

कलंत्री's picture

3 May 2009 - 9:08 am | कलंत्री

तसे पाहिले तर सर्वच क्षेत्रात अनांगोदी, इतरांना लुटण्याची हौसच चालु आहे असे दिसत आहे. शिक्षणक्षेत्र, वैद्यकियसेवा, बाजारपेठा असे सांगता येईल. तोच नियम रिक्षावाल्यानाही लागु पडतो. सर्वसामान्य भाववाढ आणि महागाई याचा विचार केला तर यातुन सर्वमान्य तोडगा निघायला हवा.

एकदम संप हाही मार्ग अतिरेकी वाटतो.

स्वाती दिनेश's picture

3 May 2009 - 3:04 pm | स्वाती दिनेश

डॉन्या, चांगला आढावा घेतला आहेस.
स्वाती

कुंदन's picture

3 May 2009 - 3:33 pm | कुंदन

मस्त चटपटीत लिवलय तुम्ही.

नंदन's picture

3 May 2009 - 3:46 pm | नंदन

लेख, डॉन्राव! 'सुमारे'वरची कोटी खासच.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

ढ's picture

3 May 2009 - 4:26 pm |

डानराव सुरेख लेख!

आता खरंतर प्रवाशांनीच संप केला पाहिजे. म्हणजे आपल्याला कितीही घाई असली तरी रिक्षा करायची नाही. वेळ लागला तरी चालेल पण रिक्षात बसणार नाही अशी काहीशी भूमिका घेतल्यास
" अहो तुम्ही द्याल ते घेईन हो पण बसा गाडीत" असं रिक्षावाले म्हणतील!

छे: अशी स्वप्नं देखील पाहणं म्हणजे ते कायसं दिवास्वप्न का काय म्हणतात तसं होईल!!!

शितल's picture

3 May 2009 - 6:16 pm | शितल

डॉन्या,
मस्त मीटर पाडुन लेखणी चालवली आहे. :)
पुण्यातील रिक्षावाले ह्यांना माजोरी आहेत हे मात्र नक्की.

अभिज्ञ's picture

3 May 2009 - 11:49 pm | अभिज्ञ

संपुर्ण लेख वाचल्यावर माझ्यापुढे रिक्षावाला म्हणजे
एक अत्यंत श्रीमंत, ज्याने रिक्षा चालवून पाच सहा बंगले बांधले आहेत व त्या श्रीमंतीच्या जोरावर तो माज करत
सामान्य लोकांशी अत्यंत मस्तवाल पणे वागणारा मनुष्य अशी एक प्रतिमा उभी राहिली.
बहुतांश प्रतिसादकर्त्यांचा रोख हा रिक्षावाल्यांच्या माजोरडेपणावर आहे.किंबहुना लेखकाचा मुद्दा हि सरसकट हाच वाटला.
मला वाटत मुद्दा हा रिक्षा भाडे कपात व त्याला विरोध म्हणून रिक्षावाल्यांनी पुकारलेला संप एवढाच आहे.
रिक्षावाले माजोरडे असतात,रिक्षा सुमार दर्ज्याच्या असतात,हि काहि विधाने इथे (संपाच्या असमर्थानाकरिता) अनाकलनीय वाटली.
रिक्षावाले बरोबर आहेत किंवा चुक आहेत हा भाग वेगळा आहे.
मुळ लेखात फ़क्त रिक्षावाले चुक आहेत एवढ्याच भावनेने लिहिलेले दिसते.
त्या अनुषंगाने माझे काहि मुद्दे इथे मांडू इच्छितो.

मुळात रिक्षा हे पीएमटी वा तत्सम महानगर पालिके पुरस्कृत वाहन आहे काय?
नसावे.
जरी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण हे रिक्षाचे दरभाडे ठरवत असले तरी तिथे पीएमटी सारखी
तिकिटाची व्यवस्था नाहि.उतारू व रिक्षाचालक ह्यांच्यातच हा थेट व्यवहार होत असतो.
आता हा व्यवहार दोघातच होत असल्याने वेळ, पुरवठा, मागणी अन तुमची आगतिकता ह्यावर उतारू व
रिक्षावाला दोघेहि संधीचा फ़ायदा घ्यायचा प्रयत्न करतात.ब-याच वेळा मीटरपेक्षा जास्त भाडे आकारून हा व्यवहार होतो.
रिक्षावाले हे ब-याच वेळा अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात.
हे सुध्दा वर म्हंटल्याप्रमाणे ब-याचश्या गोष्टींवर अवलंबुन असते.
जसे बाजारात एखादे दिवस पापलेटची आवक कमी झाली कि लगेच त्याचे भाव वाढतात.
पुरवठा कमी व मागणी वाढली कि आपोआप हे प्रकार घडतातच.

रिक्षावाला हा अत्यंत माजोरडा इसम असतो असे एका प्रतिसादातून ध्वनीत झाले.

मुळात रिक्षा हि कोण चालवते? समाजातला उच्चभ्रु वर्ग ह्या भानगडीत नसतो.
बहुतांश रिक्षावाले हे अतिकनिष्ठ मध्यमवर्गीयांमधून किंवा लोअर इनकम ग्रुप मधून आलेले असतात.
शिक्षण पुर्ण न झालेले, किंवा नोकरी न मिळालेले वा अंगात पोट भरण्याकरीता दुसरी कुठलीहि कला नसलेले लोक इथे सापडतात.
त्यामुळे तिथे काहि अवगुण हे असणारच व आहेत.

एका रिक्षावाल्याचे दिवसाचे उत्पन्न किती असावे?
तर सरासरी हे उत्पन्न दिवसाला २५० ते ३०० रुपये एवढेच असते.
बहुतांश रिक्षा चालवणारे हे निव्वळ चालक असतात, रिक्षाचा मालक वेगळाच असतो.
दिवसाला १५०-२०० रु ह्या दराने हि रिक्षा चालवायला दिलेली असते. हे २०० रु व उत्पन्न २५० रु धरले तर
रिक्षा चालकाला बाकिचा चहा पाण्याचा खर्च,इंधनाचा खर्च व इतर खर्च वगळता दिवसाला किमान ७०० रु चा धंदा करावा लागतो.
आता हे टारगेट पुर्ण करायला त्याला कधी कधी दिवसातले १२ ते १४ तास खर्ची घालावे लागतात.
त्यातहि पुन्हा प्रचंड ट्रफ़िक आली, खणलेले रस्ते आले, इंधन भरण्याकरीता लागलेल्या रांगा आल्या.,पोलिसी त्रास आला.
मग सहाजिकच ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे रिक्षावाले हे इझी मनीचा मार्ग स्वीकारतात.
कुणाला बस पकडायची असते,कुणाला ट्रेन चुकवायची नसते,फ़्लाईट मिस करून तर चालणारच नसते, मग
अशा वेळि मीटर गेला खड्यात,रिक्षावाल्याशी डायरेक्ट भाव केला जातो.
रिक्षावाल्यांचा अजून एक मुद्दा म्हणजे इनसेक्युरिटि.
आपल्या सारखे हेल्थ इंन्श्युरन्स, पी एफ़,ग्रेट्युइटी ह्या भानगडी ह्या लोकांना लागू होत नाहीत.
क्रेडिट कार्ड,होम लोन सारखे प्रकार हि ह्यांना कोणी देत नाही.
आधीच उच्च विद्याविभुषित लोकांना मिळणारे "कार्पोरेट ट्रेनिंग" ह्याना मिळत नसते.
दिवसातले १२ ते १४ तास राबून म्हणावा तसा पैसा मिळत नाहि.
आधीच दिशा नसलेले आयुष्य मग आणीक कूठेतरी भरकटते.दारु ,लॊटरी तत्सम प्रकारचि व्यसने सुरु होतात.
मला वाटते ह्या सर्वाचा परिणाम हा मीटर टेम्परींग,अव्वाच्या सव्वा भाडे आकारणे, असा कुठेसा होत असावा.
इझी मनी.
आता प्रश्न आहे एक रुपायाचा,
रिक्षा चे भाडेदर प्रति किमी १ रुपयाने कमी करावे असा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने निर्णय घेतला आहे.
त्याचे मुख्य कारण असे आहे कि इंधनाचे दर हे कमी झालेले आहेत.
सकृतदर्शनी हे कारण योग्य असले तरी मला काहि मुद्दे मांडावेसे वाटतात.
पेट्रोल डिझेल गॆस ह्यांचे भाव कमी झाल्यानंतर देखील
१.पीएमटी वा बहुतांश सरकारी वाहनांच्या भाडयात त्या प्रमाणात कपात झालेली नाहि.
२.महागाइचा दर शुन्य टक्क्याच्या आसपास येउन देखील बाजारात वस्तुंच्या वाढलेल्या दरात फ़ारशी घट झालेली नाहि.
३.महागाईचा दर शुन्य टक्क्याच्या आसपास येउन देखील, सरकारने कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात कपात केलेली नाहि.
४.मुलभुत सुविधा (जसे इंधन) स्वस्त झाल्याने कुठल्याहि उद्योग धंद्याने आपल्या प्रॊडक्टचे दर कमी केलेले नाहीत.
५.होटेल उद्योगात कुठल्याहि डिशचे भाव ह्या इंधन स्वस्ताई मुळे कमी झालेले दिसत नाहित.
६.कुठल्याहि हॊस्पिटलने आमचा महिन्याचा जनरेटरचा खर्च डिझेल स्वस्त झाल्याने कमी झालाय म्हणून दर कमी केलेत?
अशी अनेक उदाहरणॆ आहेत.
मग हा एक रुपाया रिक्षावाल्यांच्या बाबतीच का इतका प्राईम ठरावा ह्याचे गणित मला कळालेले नाहि.
मुळात आपल्या पैकी किती लोक रेग्युलर रिक्षा वापरतात? रिक्षाचे भाव सध्या आहेत तसे ठेवले तर आपल्यावर किती बोजा
पडेल? रिक्षाचे भाव कमी झाले तर एकंदर महागाईवर वा आपल्या महिन्याच्या बजेटवर किती फ़रक पडेल?
जागतिक मंदिमुळे बहुतांश कंपन्या आता वेतन कमी करत आहेत,वा त्या मार्गावर आहेत.
१० ते १५% वेतन कपात संभावित आहे. हे होणे कुठल्याहि नोकरदार माणसाला मनापासून पसंत नाहि.
तरी देखील तो १०% कमी वेतनात ब-यापैकी निभावून जाउ शकतो.
परंतु हा घटलेला एक रुपाया कदाचित रिक्षावाल्यांचे उत्पन्न २०% पर्यंत कमी करतो
.आधीच आवक कमी असलेल्या ह्या उत्पन्न गटाला हा भार मोठा आहे,अन शेवटि ह्याची परिणीती
तो भार ग्राहकांनाच कळत नकळत उचलावा लागणार.
मला वाटते कि ह्या सर्व मुद्यांचा लेखकाने व इतरांनी जरूर विचार करावा.

जाता जाता.
रिक्षा ह्या व्यवसायावर पोट कुणाचे अवलंबुन आहे ? गरज कुणाला आहे ?
ह्याच चालीवर उद्या समजा भिकार्‍यांनी कमीत कमी मात्र १० रुपये भीक मिळावी म्हणुन, पुण्यातल्या दुकानातल्या ग्राहकांनी त्यांना दुकानात सन्मानजनक वागणुक मिळावी म्हणुन, दारुड्यांनी एका बाटलीबरोबर सोडा/थम्सप फ्री मिळावे म्हणुन ,अन्नछत्रातल्या यात्रेकरुंनी जेवणात ताटात तुपाची धार कमी पडते आहे म्हणुन्,भंगार गोळा करणार्‍यांनी भंगार वस्तुतल्या खालावत्या क्वालिटीचा निषेध म्हणुन संप पुकारावा हे जस्टिफाईड आहे का ?

हे वाक्य टाळ्या घेण्यासारखे असले तरी मला वाटते कि इथे लेखकाने विचारलेला प्रश्न व दिलेली काहि उदाहरणे प्रचंड असंबध्द व विसंगत वाटली.

असो.

अभिज्ञ.

(डॉनराव्,वैयक्तिक न घेणे. अर्थात आपल्याला सांगायची गरज नाहिच म्हणा. :))

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

अनामिक's picture

4 May 2009 - 12:46 am | अनामिक

माझ्याही मनात असंच काहीसं होतं, पण एकत्रीतपणे मांडायला जमलंच नाही (कारणे- आमचं लेखण कौशल्य आणि वेळे आभावी), पण अभिज्ञची प्रतिक्रिया वाचली आणि वाटलं आपल्याला हेच तर म्हणायचं होतं. रिक्षावाल्यांची भाषा, अरेरावी, ग्राहकाला दिलेली वागणूक हा भाग वगळता त्यांच्या भाड्यात (१रु./ किमी) झालेली कपात बर्‍याच अंशी पटली नाही. (बहुतांशी) खालच्या वर्गातून आलेल्या रिक्षाचालकांचं पोट रोजगारावर अवलंबून असताना आणि दररोजच्या मुलभूत गरजांचे (रोटी-कपडा) दर कोणत्याच प्रकारे कमी झालेले नसताना, रिक्षाचालकांच्या भाड्यात अशी दर कपात करणे पटत नाही.

याचा अर्थ असा नाही की मी त्यांच्या जलद केलेल्या मीटरचं, मीटरच्या वर घेण्यात येणार्‍या पैश्यांच, रिक्षाच्या अस्वच्छतेचं, वापरण्यात येणार्‍या चुकीच्या इंधनाचं, नशेत असलेल्या रिक्षावाल्यांचं समर्थन करतोय. ते सगळं चूक आहेच, अशावेळी आपली गौरसोय झालीच तर आपण (बहुतेक) प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे किंवा योग्य ठिकाणी त्यांची तक्रार करावी. ग्राहकानेसुद्धा आपल्या अनुभवातून शिकून रिक्षात बसायच्या आधीच योग्य ती बोलणी करावी.... मी पुण्यात जवळ जवळ दोन वर्षे होतो (६-७ वर्षांपुर्वी), एक दोन वाईट अनुभवही आलेत, पण आपण स्वतः दक्षता घेतल्यास असे वाईट अनुभवही टाळता येतात.

काहीवेळा आपले ठिकाण रिक्षावाल्याला माहीत नसते, तेव्हा ते काहीतरी भाडं सांगतात.... आपणही कमी सांगीतलं म्हणून खूश होतो... आणि पोचल्या ठिकाणी गेल्यावर त्यांनी वाद घातला की आपणही चिडतो.... पण त्यांनी कमी भाडं सांगीतलं तेव्हाच त्यांना "नाही बाबा, बाकीचे ४० नाही ५०रु. घेतात, तेव्हा तू तेवढेच घे, पण तिथे गेल्यावर वाद घालू नको" असे सांगतो का?.... तर नाही, कारण आपल्यालाही आपले १० रु. वाचवायचे असतात.

अजून एक - वरच्या लेखात "गरज कोणाला आहे?" हा प्रश्न आलाय... तर गरज इथे ग्राहक आणि रिक्षावाला दोघांनाही आहे.... रिक्षावाल्याला पैश्याची तर ग्राहकाला नियोजीत ठिकाणी वेळेत पोचण्याची. बाकीच्या उदाहरणातल्यांशी (जसे भिकारी, अन्नछत्रातले यात्रेकरू, भंगारवाला) ही तुलना पटत नाही.

आज इंधनाचे भाव कमी झालेत म्हणून रिक्षाभाडे कमी करा म्हणतोय... पण आपली पगारवाढ झाली तर आपण घरातल्या कामवालीचा, स्वयंपाकवाल्या बाईंचा पगार वाढवतो का? किंवा आजच्या रेसेशन मधे तुमचा पगार १०% नी कमी झाला तर कामवाली बाई ५००रु ऐवजी ४५०रु घेईल का? दोन्हीची उत्तरे नाही अशीच आहेत, तेव्हा इंधन दर कपातीचा बोजा फक्तं रिक्षावाल्यांनीच उचलावा हे पटत नाही. पाठीवर मारा (रिक्षाचालकांसाठी इतर कडक नियम करुन), पोटावर का मारताय?

-अनामिक

संपुर्ण लेख वाचल्यावर माझ्यापुढे रिक्षावाला म्हणजे एक अत्यंत श्रीमंत, ज्याने रिक्षा चालवून पाच सहा बंगले बांधले आहेत व त्या श्रीमंतीच्या जोरावर तो माज करत सामान्य लोकांशी अत्यंत मस्तवाल पणे वागणारा मनुष्य अशी एक प्रतिमा उभी राहिली.

=)) अगदी स्पष्ट असहमत ...
कदाचित आपण "उपहास" म्हणुन म्हणत असाल तर मान्य दाद देतो. मात्र हा लेख लिहताना आम्ही आत्तापर्यंत पाहिलेला " कनिष्ठ मध्यमवर्ग अथवा त्याखालच्या वर्गातुन आलेला, शिक्षण जास्त न झालेला व इतर कोणते व्यव्सायीक कौशल्य ज्ञात नसलेला व म्हणुनच रिक्षा चालवुन आपले पोट भरु इच्छिणारा" असा प्रामाणिक रिक्षावाला अशी कल्पना मनात ठेऊन हा लेख लिहला ...
माणसाला जर वस्तुस्थीतीची संपुर्ण कल्पना असेल व त्यानंतर सुद्धा वागण्यात जो मस्तवालपणा येतो त्याला "गर्व अथवा मस्ती" म्हणतात ...
उदा : श्रीमंत बापाची वाया गेलेली पोरे ...
पण जर मुळात काही नसेल आणि माणुस फुकाचा मस्तवालपणा करत असेल तर त्याला "माज" म्हणतात. ...
उदा : रिक्षावाले, मजुर वर्ग वगैरे ...

बहुतांश प्रतिसादकर्त्यांचा रोख हा रिक्षावाल्यांच्या माजोरडेपणावर आहे.किंबहुना लेखकाचा मुद्दा हि सरसकट हाच वाटला.

अर्धसत्य ....
माझा बहुतांशी रोख रिक्षावाल्यांचा "अनावश्यक, अनवॉरंटेड, अनजस्टिफाईड, अतार्किक" अशा मस्ती आणि माजोरडेपणावर आहे.मी अवतरणचिन्हात वापरलेले शब्द टाकुन माझ्यामते मी सांगत असलेल्या माजोरडेपणाची व्याख्या होऊ शकत नाही ...
असो, माझा मुद्दा हा रिक्षावाल्यांचा "अनावश्यक, अनवॉरंटेड, अनजस्टिफाईड, अतार्किक" माजोरडेपणा हाच आहे/असणार.

मला वाटत मुद्दा हा रिक्षा भाडे कपात व त्याला विरोध म्हणून रिक्षावाल्यांनी पुकारलेला संप एवढाच आहे.

नाही, झालेल्या न्याय्य अथवा अन्याय्य म्हणा दरकपातीच्या विरोधात रिक्षावाल्यांनी ज्यांच्यावर त्यांचे पोट अवलंबुन आले अशा ग्राहकांना वेढीला धरुन पुकारलेल्या "अनजस्टिफाईड आणि अवानश्यक" संपाला मला करावा वाटलेला विरोध हा मुद्दा आहे ...

रिक्षावाले माजोरडे असतात,रिक्षा सुमार दर्ज्याच्या असतात,हि काहि विधाने इथे (संपाच्या असमर्थानाकरिता) अनाकलनीय वाटली.

आपली गल्लत होते आहे, मी असे केव्हाही म्हणलो नाही ...
"सुमार" वगैरे तर विनोद होते कोटी करुन केलेले, सबब हा मुद्दा अमान्य ...

रिक्षावाले बरोबर आहेत किंवा चुक आहेत हा भाग वेगळा आहे. मुळ लेखात फ़क्त रिक्षावाले चुक आहेत एवढ्याच भावनेने लिहिलेले दिसते.

पुन्हा अर्धसत्य.
मी इथे रिक्षावाल्यांचे संपाशी निगडीत आडवणुक करणारे मुजोर वागणे हे "चुक" आहेच असे स्पष्ट म्हणतो, मी ते "बरोबर" आहे असे म्हटलो नाही/म्हणणार नाही ...
कदाचित त्यांचा दरकपातीला विरोध हे म्हणणे न्याय्य असेल पण त्यासाठी उचलेले संपाचे हत्यार हे "नामंजुर" आहे ...

उतारू व रिक्षाचालक ह्यांच्यातच हा थेट व्यवहार होत असतो.

करेक्ट ...
व्यवहार : जेव्हा ग्राहक आणि विक्रेता ह्यांच्यात योग्य बोलाचाली होऊन अन्याय न होता अथवा अडवणुक न होता दिलेल्या सेवेच्या मोबदल्यात योग्य दाम ठरवला जाऊन जेव्हा ग्राहक आणि विक्रेता ह्या दोघांचेही समाधान होते ह्याला अर्थशात्राच्या भाषेत "व्यवहार" म्हणातात ...
पण जेव्हा ह्यातुन "आडवणुक होउन, अवाजावी दाम, अर्वाच्च भाषेत दिली जाणारी प्रवाश्यांना वागणुक, ग्राहकावर अन्याय" वगैरे गोष्टी येतात तेव्हा ह्याच व्य्वहाराला समाजशास्त्र "लुट अथवा लुबाडणे" असे व्याख्येत बसवते ....
आमचे रोख ह्यावरच आहे, असण्यास प्रत्यवाय नसावा ....

आता हा व्यवहार दोघातच होत असल्याने वेळ, पुरवठा, मागणी अन तुमची आगतिकता ह्यावर उतारू व रिक्षावाला दोघेहि संधीचा फ़ायदा घ्यायचा प्रयत्न करतात.ब-याच वेळा मीटरपेक्षा जास्त भाडे आकारून हा व्यवहार होतो.

ग्राहक कसा काय फायदा घेईल बॉ ?
म्हणजे रिक्षावाला रिकामा बसला आहे हे गॄहीत धरुन संधीचा फायदा म्हणुन रिक्षावाल्याने ५० रुपयाचे भाडे ३० रुपयात न्हेणेप्रॅक्टिकली शक्य आहे का ?
हे तर धंद्याच्या तत्वांच्या विरोधात आहे ...

रिक्षावाले हे ब-याच वेळा अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात. हे सुध्दा वर म्हंटल्याप्रमाणे ब-याचश्या गोष्टींवर अवलंबुन असते.

जाऊ देत, ह्या मुद्द्यावर बरेच लिहण्यासारखे आहे ...
तरी "अवलंबुन" हा शब्द मी मान्य करुन आपला मुद्दा मान्य करतो ...

बहुतांश रिक्षावाले हे अतिकनिष्ठ मध्यमवर्गीयांमधून किंवा लोअर इनकम ग्रुप मधून आलेले असतात. शिक्षण पुर्ण न झालेले, किंवा नोकरी न मिळालेले वा अंगात पोट भरण्याकरीता दुसरी कुठलीहि कला नसलेले लोक इथे सापडतात. त्यामुळे तिथे काहि अवगुण हे असणारच व आहेत.

अजिबात शक्य नाही. हा मुद्दा होऊच कसा शकतो ? त्यांचे "अवगुणांचे" जरी जस्टीफिकेशन केले नाही तरी त्यांना "त्यासकट" सिकारा असे मतप्रदर्शन आणि त्याचे समर्थन होऊच कसे शकते ...
अरे एवढी अवगुणांची चरबी चढत आहे तर रिक्षा टाका आणि हत्यारे घेउन गुंडागर्दीत शिरा ना ...
मग ह्याच वर्गातुन आलेल्या "पेपरवाले, चहावाले, टपरीवाले, पंक्चरवाले, भाजीवाले ... इ.इ. " अगणिक व्यवसायिकांनी काय "चांगुलपणाचा" ठेका घेतला आहे का ?
का जो ह्या वर्गातुन रिक्षा चालवायला जातो त्याकडेच हे अवगुण जातात ...
लोअर इनकम ग्रुपमधुन आला म्हणुन अवगुणांचे समर्थन होऊ शकत नाही, करणे हा माझ्यामते "सामाजिक अपराध" पकडायला हरकत नसावी ...

त्यातहि पुन्हा प्रचंड ट्रफ़िक आली, खणलेले रस्ते आले, इंधन भरण्याकरीता लागलेल्या रांगा आल्या.,पोलिसी त्रास आला. मग सहाजिकच ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे रिक्षावाले हे इझी मनीचा मार्ग स्वीकारतात.

मान्य ...!!!!
पण आपण जेव्हा एखादा व्यवसाय स्विकारतो तेव्हा त्याबरोबर येणार्‍या गोष्टी स्विकारु नयेत काय ?
शिवाय आपण जे म्हणाता ते मान्य जरी केले तरी "जस्टिफिकेशन"चा प्रश्न आहे तिथेच राहतो, त्याचे काय ????

रिक्षावाल्यांचा अजून एक मुद्दा म्हणजे इनसेक्युरिटि. आपल्या सारखे हेल्थ इंन्श्युरन्स, पी एफ़,ग्रेट्युइटी ह्या भानगडी ह्या लोकांना लागू होत नाहीत. क्रेडिट कार्ड,होम लोन सारखे प्रकार हि ह्यांना कोणी देत नाही. आधीच उच्च विद्याविभुषित लोकांना मिळणारे "कार्पोरेट ट्रेनिंग" ह्याना मिळत नसते.

ह्यात दोष कुणाचा ?
वर आम्ही "पंचायतीला" कशासाठी हाणले आहे ? ही त्यांची जबाबदारी नाही का ?

दिशा नसलेले आयुष्य मग आणीक कूठेतरी भरकटते.दारु ,लॊटरी तत्सम प्रकारचि व्यसने सुरु होतात. मला वाटते ह्या सर्वाचा परिणाम हा मीटर टेम्परींग,अव्वाच्या सव्वा भाडे आकारणे, असा कुठेसा होत असावा.

तर्क जरी मान्य केला तरी मनाला हा मार्ग पटत नाही....
असो.

मग हा एक रुपाया रिक्षावाल्यांच्या बाबतीच का इतका प्राईम ठरावा ह्याचे गणित मला कळालेले नाहि.

हो, कारण मुळात पुण्यात रिक्षाचे दर "अव्वाच्या सव्वा" आहेत ...
जर तुम्ही बेंगलोर अथवा चेन्नईशी तुलना करत असाल तर पुण्यातील रिक्षा हे खरोखर महाग प्रकरण आहे ...
तुलनात्मक सांगतो की इंधन अलमोस्ट सारखे आहे, भाव जवळपास तोच आहे, पुण्यात रोड टॅक्स कमी आहे, ट्रिफिक ज्यॅममुळे होणारा इंधनाचा अपव्याय व मेंटेनन्स इश्श्यु कमी आहेत, रिक्षांचे उत्पादक पुण्याजवळ असल्याने सर्व्हिसिंग आण इनिशियल इन्व्हेस्तमेंट चा खर्च खरोखर पुण्यात कमी आहे ...
तरीही सध्या "रिक्षांचे दर" हे तुलनेत जास्त आहेत....
असो.

रिक्षाचे भाव सध्या आहेत तसे ठेवले तर आपल्यावर किती बोजा पडेल? रिक्षाचे भाव कमी झाले तर एकंदर महागाईवर वा आपल्या महिन्याच्या बजेटवर किती फ़रक पडेल?

मालक, आम्ही केव्हापासुन सांगतो आहे की मुद्दा हा " १रुपयाचा" नव्हेच, मुद्दा हा रिक्षावाल्यांचा "सोकावण्याचा " आहे ...
"म्हातारी मेली तरी हरकत नाही, काळ सोकवायला नको" हीच भुमिका आहे/होती/असणार ...

परंतु हा घटलेला एक रुपाया कदाचित रिक्षावाल्यांचे उत्पन्न २०% पर्यंत कमी करतो

.
कसे काय ???
मला हे व्यवहारी आणि गणिती तर्कानुसार पटत नाही.
असो, मी वर मांडलेल्या "सध्याच्या अव्वाच्या सव्वा भावाचा" आणि उत्पन्नाचा जरुर विचार व्हावा ...

हे वाक्य टाळ्या घेण्यासारखे असले तरी मला वाटते कि इथे लेखकाने विचारलेला प्रश्न व दिलेली काहि उदाहरणे प्रचंड असंबध्द व विसंगत वाटली.

असु शकेल. मला दिलेली उदाहरणे प्रचंड तर्कसंगत आणि योग्य वाटली.
असो, आपल्या "अमान्य"असण्याला आक्षेप असण्याचे कारण नाही, चालते तेवढे ...

बाकी आम्ही कधीच "पर्सनल" घेत नाहे, काळजी नसावी, मनोसोक्त वाद घाला ...
असो.

------
(विस्तारीत)छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

देवदत्त's picture

5 May 2009 - 12:36 am | देवदत्त

जरी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण हे रिक्षाचे दरभाडे ठरवत असले तरी तिथे पीएमटी सारखी
तिकिटाची व्यवस्था नाहि.उतारू व रिक्षाचालक ह्यांच्यातच हा थेट व्यवहार होत असतो.

तिकिट व्यवस्था नाही. पण जे मीटर लावून दिले आहे ते शोभेसाठी आहे का? तो व्यवहार तर नीट करा.
मनपा च्या हद्दीबाहेर तर सोडाच (तिथे तर मीटर खाली पडलेले खूप कमी वेळा दिसते), पण पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर जे रिक्षावाले उभे असतात त्यांच्या तोंडून तुम्ही भाव ऐका, मीटरने येत तर नाहीतच, वर ६० रूपये होतात तिथे१८० रू मागतात.

रिक्षावाला हा अत्यंत माजोरडा इसम असतो असे एका प्रतिसादातून ध्वनीत झाले.
मी तर म्हणतो ज्याला माणुसकी नाही त्याला माजोरडा म्हणणे ही कमीच आहे. दवाखान्यातून माझ्या आईला घरी आणायचे होते. जिथे मीटरप्रमाणे पाहिले तर जेमतेम ५ रूपये होतील.(कमीत कमी भाडे ८ रू आहे, म्हणून ८ मानतो) तेथे त्या रिक्षावाल्याने सांगितले मी नाही येणार, दुसरा बघा. सर्वांनी २५ रू मागितले, कारण काय तर त्या भागात कमीतकमी २५ रू घेतात.

रिक्षाचे भाव सध्या आहेत तसे ठेवले तर आपल्यावर किती बोजा
पडेल? रिक्षाचे भाव कमी झाले तर एकंदर महागाईवर वा आपल्या महिन्याच्या बजेटवर किती फ़रक पडेल?

असल्या मनोवृत्तीमुळेच सगळीकडचे भाव अवास्तव वाढले आहेत. आज १ रू करीता सोडून द्यायचे, उद्या १० रू करीता सोडून द्यायचे. पण ह्यात मुद्दा हा आहे की तोच भाव ठेवल्यानंतर जर रिक्षाचालक फक्त मीटरनेच येण्याचे मान्य करत असतील तर विचार करण्यासारखे आहे. आणि नाही, तर मीटरचा भाव १ ने कमी करा की ५ ने काय फरक पडणार आहे?

आणि इतर काही मुद्द्यांचे म्हणाल तर, त्याने गाय मारली म्हणून मीही वासरू मारेन हा न्याय पटत नाही. हेच मुद्दे बहुधा इतर ठिकाणीही मांडु शकतो. आज रिक्षावाल्यांचे आहे,उद्या मल्टीप्लेक्स वाल्यांचेही मांडूया. सगळीकडे आपण सोडूनच देउया.

परिकथेतील राजकुमार's picture

4 May 2009 - 12:27 pm | परिकथेतील राजकुमार

=)) =))
लै बेक्कार लै बेकार हसलो राव !
मला हा लेख आणी त्या लेखावर आलेल्या प्रतिक्रीयांचा अर्थ आणी उद्देशच कळला नाहीये.

सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की रिक्षावाले तुमच्या बा चे नोकर नाहीत. आम्ही रिक्षा चालवतो ते आमचा वेळ जात नाही म्हणुन आणी तुमच्यावर उपकार म्हणुन.

साला तुमचा चॅनेल व्ही बघणारा पोरगा 'ओ वडील / मातोश्री जा आजच्या दिवस चालत एकटे मी काय हा प्रोग्रॅम सोडुन येणार नाही ' असे ठणकावतो, तेंव्हा तुम्ही किती कौतुकानी त्याच्याकडे बघता आणी स्वतःच्या खिशातले पैसे भरुन, कर्ज काढुन रीक्षा घेणारा रिक्षावाला 'येत नाही' म्हणाला तर तो माजोरडा होय ? अरे वाह र तुम्ही सुशिक्षीत !

साहेब जरा तेव्हडे बिलाचे बघा म्हणताना टेबला खालुन हळुच १०० सरकवता तेंव्हा स्वतःच्या अक्कल हुषारीचे कौतुक करुन घेता आणी रिक्षावाल्यानी अंधार्‍या रात्री घरी सोडायचे १० रुपये जास्ती मागितले तर लगेच बोंबलता होय ?

स्वतः कधी दारु पिउन गाडी चालवली नाहीत का ? मग आमच्या रिक्षात आम्ही दरु पिली, पुडी खाल्ली तर तुमच्या पोटात का दुखते ?

पगार वाढवायला सरकारी / बँक नोकरांनी , अनाधिकृत झोपड्या अधिकृत करायला झोपडीवाल्यांनी मोर्चा काढला , कामकाज बंद ठेवले तर त्यांना सहानभुती आणी आम्हाला खेटराची पुजा होय ?

आठवडाभर सिग्नलला गाडी बंद करुन उभा राहिला तर ५० रुपये वाचत्याल राव तुमचे, कशाला रुपायापायी आम्हा गरीबाच्या पोटावर पाय देता ?

आन असल येव्हडीच हौस तर वाट पाहा (पाहात रहा) आणी पी यम टी नी जावा.

आबा गाढाव
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

छोटा डॉन's picture

4 May 2009 - 12:33 pm | छोटा डॉन

एक नंबर हाणला आसेस परा भौ, जबरदस्त ..
=)) =)) =)) =)) =))

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

मैत्र's picture

4 May 2009 - 2:15 pm | मैत्र

डॉन भौ ... दणदणीत पुनरागमन...
मुद्दा एक रुपयापेक्षा वृत्तीचा आणि मुजोरीचा आहे.
दिलिप बंड ( काय मस्त नाव आहे) - प्रा प प्रा ( सोप्या भाषेत आर टी ओ) चे मुख्य. त्यांनी मुद्दा मांडला आहे की पेट्रोल डिझेल चे भाव कमी झाले तेव्हा रिक्षाचे दर कमी न करता सी एन जी , एल पी जी ला प्रोत्साहन देऊन जुने दर कायम ठेवावे. ज्यामुळे पुण्याचे प्रदुषण कमी व्हायला मदत होईल. त्याबरोबर सी एन जी / एल पी जी साठीचा खर्च भरून निघायला मदत होईल. या ईंधनाचे दर हे पेट्रोल पेक्षा खूप जास्त परवडतात असं वाचलं होतं. तेव्हापासून दोन महिन्यात कुठल्याही संघटनांनी काहीही केलं नाही. विरोधही केला नाही, वेळ वाढवून मागितला नाही. रिक्षाचालकांना हे तुमच्या आणि पुणेकरांच्या फायद्याचं आहे असं सांगून सी एन जी वापरायला प्रोत्साहनही दिलं नाही. मग जर पेट्रोलचे भाव किमान दहा रुपयांनी कमी झाले तर वीस टक्के दरकपात बारा टक्के भाडे कपातीत जायला काही हरकत नाही. तेव्हा ज्या अर्थी रिक्षा संघटना आणि रिक्षाचालकांनी काहीही हालचाल केली नाही त्या अर्थी त्यांना ही भाडे कपात मान्य आहे!
अभिज्ञ - पी एम पी एम एल ने एक रुपयाने भाडे कपात केली आहे. कंपनीच्या बसेस च्या भाड्यात त्या प्रमाणात कपात झाली आहे. मुंबई, ठाणे इथे रिक्षाचे दर असेच कमी झाले आहेत.
पुण्याचे रिक्षावालेही असेच पुणेरी आणि एम एच बाराचे आहेत हे सिद्ध झालं आहे.
दहा लाखांवर दुचाकी आणि दोन तीन लाख चार चाकी असलेले पुणे फक्त पंचवीस ते तीस हजार रिक्षा रस्त्यावर न उतरल्याने किती सुसह्य होते ते कोणी गेल्या तीन दिवसात अनुभवले का? पुण्यातले प्रदूषण अचानक प्रचंड प्रमाणात आणि जाणवण्याइतके कमी झाले. कुठेही ट्रॅफिक जाम नव्हते. पोलिसांचा कामाचा ताण कमी झाला असे ट्रॅफिक पोलिसांनी पत्रकारांना सांगितले.
याचा अर्थ काय होतो? सुज्ञास सांगणे न लगे. पण याचा अर्थ रिक्षा ही सोय आहे पण त्यामुळे संपूर्ण वाहतूकीवर ताण येतो, प्रदुषण खूप मोठ्या प्रमाणावर होते आणि बेशिस्त, बेमुर्वत पणे हाकण्याची प्रवृत्ती वाढते. भाडे वाढवून जगातले सर्व शहरातले रिक्षा आणी टॅक्सी वाले मागतात आणि फसवतात. बेंगलूरू ला कदाचित अनभिषिक्त सम्राट म्हणून घोषित करता येईल.

मूळ मुद्दा काळ सोकावतो -- एक हैदराबादचा एकदम सारखा अनुभव.
हैदराबादमध्ये इन्फोसिस, विप्रो, पोलॅरिस, मायक्रोसॉफ्ट, आय एस बी वगैरे एका नवीन वसवलेल्या भागात आहेत जिथे सुमारे दोन वर्षापूर्वी काहीही सोयी नव्हत्या. मेन रोड पासून सुमारे दिड ते अडीच किलोमीटर अंतर आतमध्ये जाण्यासाठी शेअर रिक्षा प्रत्येकी तीन ते चार रुपये घेत होत्या. एका रिक्षात किमान पाच जण !! अर्थात ती हैदराबादची परंपरा आहे. पेट्रोल डिझेलच्या भाड्यात भाववाढ झाल्याने त्यांनी थेट तीन चे चार आणि चार चे पाच केले. डिझेल चे भाव वाढले तीन रुपयांनी लिटर मागे - यांनी भाव वाढवले पाच रुपये एक दोन किलोमीटर मागे. खूप आरडा ओरडा केला गेला. तेव्हा "तुम्ही इतके कमावता मग आम्हाला थोडे दिले तर काय बिघडलं"चा नेहमीचा घोष झाला. आता भाव उतरले पण हे भाडे तसेच राहिले! काळ सोकावतो हेच खरं.

मनिष's picture

4 May 2009 - 2:31 pm | मनिष

दहा लाखांवर दुचाकी आणि दोन तीन लाख चार चाकी असलेले पुणे फक्त पंचवीस ते तीस हजार रिक्षा रस्त्यावर न उतरल्याने किती सुसह्य होते ते कोणी गेल्या तीन दिवसात अनुभवले का? पुण्यातले प्रदूषण अचानक प्रचंड प्रमाणात आणि जाणवण्याइतके कमी झाले. कुठेही ट्रॅफिक जाम नव्हते. पोलिसांचा कामाचा ताण कमी झाला असे ट्रॅफिक पोलिसांनी पत्रकारांना सांगितले.
याचा अर्थ काय होतो? सुज्ञास सांगणे न लगे. पण याचा अर्थ रिक्षा ही सोय आहे पण त्यामुळे संपूर्ण वाहतूकीवर ताण येतो, प्रदुषण खूप मोठ्या प्रमाणावर होते आणि बेशिस्त, बेमुर्वत पणे हाकण्याची प्रवृत्ती वाढते. भाडे वाढवून जगातले सर्व शहरातले रिक्षा आणी टॅक्सी वाले मागतात आणि फसवतात.

बेशिस्त खूप कमी होते. रिक्षावाल्यांकडे पोलिसांनी पी. यू. सी. (कार आणि दुचाकी प्रमाणे) मागितल्याचे पाहिले नाही. रिक्षावाल्यांच्या माजोरीपणावर एक स्वतंत्र लेखच लिहीता येईल.

शिवाय जेंव्हा पेट्रोल ५०चे ५५ रु. झाले तेव्हा भाडे किलोमईट्र ला ६ चे ८ झाले - ३३% वाढ. तेंव्हा रिक्षेवाल्यांच्या संघटनांनी (बाबा आढाव धरून) पेट्रोल ६५ रु. होईपर्यंत भाववाढ करणार नाही असे सांगितले होते. आता पेट्रोल ५५ चे ४५ झाले आहे. रिक्षावाल्यांच्या आधिच्या हिशोबाने जायचे तर ४ रु> भावकपात केली पाहिजे; निदान २ रू. तरी; पण फक्त १ रू कपात करून आर टी ऑ ने खरे तर खूपच मवाळ भाडेकपात केली आहे, कुठेतरी रिक्षावाल्यांच्या मुजोर आणि मनमानी वागण्याला आळा बसलाच पाहिजे!

चिरोटा's picture

4 May 2009 - 7:03 pm | चिरोटा

बेंगलूरू ला कदाचित अनभिषिक्त सम्राट म्हणून घोषित करता येईल

सहमत्.**त प्रचंड मस्ती असेल तर बेंगळुरुचे रिक्षा चालक. मीटर पे़क्षा जास्त भाडे मिळत नसेल तर रि़क्षा तशीच २/३ तास रिकामी ठेवून गप्पा मारत बसतील . पॅसेंजर आणि चालक ह्यांची दररोजची खडाजंगी ठरलेली असते.ही मस्ती चढायला कारणीभूत महानगर पालिकेची दळभद्री बससेवा.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

रेवती's picture

5 May 2009 - 1:17 am | रेवती

चांगला लेख आहे. चर्चाही चांगली आहे.
तसं पुण्यात राहून म्हणावा असा वाईट अनुभव (अमक्या ठीकाणी येणार नाही असंही फारसं नाही) आला नाही.;)
आता पुण्यात गेले की माझ्या मुलाला रिक्षा हा प्रकार नविन व भन्नाट वाटतो. रिक्षातून उतरताना त्याने काहीवेळा
किती 'डॉलर' द्यायचे असं (मजा वाटाते म्हणून)विचारल्यावर मात्र्.......वाईट्ट अनुभव आले. त्याला आता दम दिलाय
की तोंड उघडायचं नाही म्हणून.

रेवती