निबंध लिहा: माझा आवडता प्राणी, शाळेचे आत्मचरित्र, वाचनाचे महत्व.
शाळेत असा प्रश्न असायचा सहामाही व वार्षिक परिक्षेला. किंवा मग पत्रलेखन. गुण १० ते १५. त्यावेळेला नेमके काय लिहावे ते माहित नसायचेच. मित्रांसोबत जास्त वेळ शाळेतील अभ्यासाचेच जास्त बोलणे व्हायचे किंवा मग खेळ , दूरदर्शनवरील कार्यक्रम, सिनेमे ह्यांच्यावर चर्चा व्हायची. पण त्यावर लिहायला कधी कोणी नाही सांगितले. त्यामुळे निबंध लिहायला मदत व्हायची निबंधावरील पुस्तकाची किंवा मार्गदर्शकाची(हो, तेव्हा मार्गदर्शक वापरणे म्हणजे थोडेफार कमीपणाचे मानले जायचे) तेही वापरावयास सुरुवात केली होती. पण त्या वाचनावर, ठरलेल्या विषयांवरच लिहिले जायचे तरीही पूर्ण गुण मिळण्याची खात्री नसायची.
तसेच नेत्यांच्या जयंती/पुण्यतिथीलाही आपण त्या त्या नेत्याबद्दल भाषण लिहून (घेउन) व त्याची तयारी करून मग व्यासपीठावर बोलायला जायचो. मग ते शाळेत असो किंवा वक्तृत्व स्पर्धेत भाग घेताना. माझ्या आठवणीप्रमाणे मी एका शाळेत जाऊन डॉ. हेडगेवारांवर भाषण केले होते. बाकी सर्व आपल्या शाळेतच. पण ते सर्व लिहिण्यातही कोणीतरी आपल्याला मदत केलेली असायचीच.
नंतर मग शाळेच्या बाहेरही थोडाफार सहभाग होऊ लागला. कॉलनीमधील गणपती उत्सवात एखाद-दुसरे एकपात्री कथन ही केले. मी ८/९ वीत असताना घरातील गणपतीची तयारी होत असताना मी व माझ्या बहिणीने गप्पा-गप्पांतच एक कथा तयार केली. ती आम्हालाच एवढी आवडली की मग आम्ही त्यावर एक अंकी नाटक लिहून काढले. मग इतरांची मदत घेऊन सार्वजनिक गणपतीत त्या नाटकाचे सादरीकरण केले.
हळू हळू (म्हणजे रखडत नाही हो, मी एक हुशार विद्यार्थी होतो :) ) वरच्या इयत्तेत गेलो, कॉलेज मध्ये गेलो तर तो अनुभव वाढत गेला. इतर पुस्तक वाचन, वर्तमान पत्रे वाचणे सुरू झाले. भरपूर लोकांची पुस्तके, कथा वाचल्या. बातम्या, सिनेमे, गावा-गावांतील अनुभव गाठीशी येत गेले. तसेच विचारशक्ती वाढत गेली. त्यामुळे मित्रांसोबत/इतर लोकांसोबत चर्चा वाढत गेल्या. वादही घालू लागलो. त्यात वेगळेपणही वाटायचे.
मग आंतरजालावरील भ्रमण सुरू झाले. कॉलेज संपल्यावर काही मित्र दूर गेले. मग त्यांच्याशी इमेलवर संपर्क चालू राहिला. स्वत:चे अनुभव त्यांना मोठ्या-मोठ्या विपत्रांतून लिहून पाठवणे चालू झाले.
आंतरजालावर भ्रमण वाढत गेले. तेव्हा मराठी संकेतस्थळेही नावारूपाला आली होती. त्यांचे सदस्यत्व घेउन वाचन चालू झाले. तिथे प्रतिक्रिया देता देता नवीन गोष्टी कळत गेल्या. मग स्वत:चेही काहीतरी लिहिणे चालू झाले. प्रतिसाद मिळत गेले तसे हुरूप आला. काही वेळा विरोधातही प्रतिक्रिया मिळाल्या. पण आता सवय झालीय. त्यामुळे आता लिहितानाच असे विषय निवडतो की ज्यात मला माहित आहे, जमल्यास वाद घालण्यासही तयारी असा ;)
आता ब्लॉगमुळे तर गेल्या वर्षापासून स्वत:च्या मनातील विचार/तक्रारी खरडणे चालू झाले.
हे सर्व आठवत असताना नुकताच पिवळा डांबिस ह्यांचा हा अग्रलेख वाचला. आणि वाटले मला वाटत असलेले विचार ह्यात आहेतच. जसा सर्वांमध्ये फरक पडला, तसा शाळेतील निबंधापासून आता थोडेफार ललित लेखनापर्यंत स्वत:हून लिहिण्याइतपत माझ्यात फरक नक्कीच पडलाय. (लोक वाचतील, नाही वाचतील तो भाग वेगळा ;) )
तेव्हा चला, आपले लिहिणे सुरूच ठेवूया. पाहू आणखी किती फरक पडतो ते :)
प्रतिक्रिया
26 Aug 2008 - 8:46 am | सहज
लिहिणे सुरूच ठेवूया
सहमत!
27 Aug 2008 - 6:05 pm | विसोबा खेचर
तेव्हा चला, आपले लिहिणे सुरूच ठेवूया. पाहू आणखी किती फरक पडतो ते
सहमत आहे! :)
आपला,
(लेखक) तात्या.
11 Sep 2008 - 1:06 am | देवदत्त
प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.
आमचे लिहिणे सुरूच ;)