प्रवास (२)

श्रावण मोडक's picture
श्रावण मोडक in जनातलं, मनातलं
11 Aug 2008 - 9:17 pm

सकाळ. ११. ३०.
आटपाडीहून करगणीकडे आम्ही निघतो. मुख्य रस्त्यावरचंच हे गाव. पण आम्हाला मुख्य रस्त्यावरून जवळच्या एका वाडीवर जायचं असतं. तिथं डाळिंब उत्पादकांची एक कार्यशाळा सुरू आहे. त्याच ठिकाणी लोकांशी अधिक उपयुक्त चर्चा होऊ शकते यासाठी.
करगणीच्या बाजारपेठेतच अण्णा पत्की आम्हाला येऊन मिळतात. तेच पुढचा रस्ता दाखवणार आहेत. बहात्तर वर्षांचा हा वृद्ध गृहस्थ पूर्वी जिल्हा परिषदेचा सदस्य होता. स्वच्छ पांढरं धोतर, पांढचा अंगरखा. डोक्यावर विरळ झालेल्या श्वेत छटा, गांधी टोपीतून डोकावणाऱ्या.
अण्णा येण्याआधी गाडीत आमची चर्चा सुरू असतेच. या भागाच्या दुष्काळाचा इतिहास किती जुना आहे या अनुषंगानं. या चर्चेत अर्थातच पूर्वीची पाण्याची परिस्थिती, त्या अनुषंगानं असणारी पीकव्यवस्था असे मुद्दे असतात. संपतराव सांगत असतात त्यानुसार पूर्वी स्थिती वेगळी होतीच. पण ते हा विषयच अण्णांच्या दरबारात नेण्याचं सुचवतात.
अण्णांचा आणि माझा पूर्वपरिचय काहीही नाही. त्यामुळं मी अगदी बाळबोध पद्धतीनं प्रश्न विचारू लागतो.
"अण्णा, तुमचं वय किती?"
"बहात्तर वर्षं." हे उत्तर सुखावणारं असतं. कारण किमान अडीच पिढ्यांची माहिती हा गृहस्थ देऊ शकेल हे निश्चित असतं.
"पूर्वी, म्हणजे तुमच्या लहानपणी, काय स्थिती होती इथं पाण्याची आणि पिकांची."
इथं लहानपणी हा शब्दप्रयोग मी उगाचच केला आहे हे पुढं अण्णांच्या उत्तरातून सिद्ध होतं.
"विहिरी होत्या इथं. या गावात चाळीस-एक तरी नक्कीच. त्यावर बागायती व्हायची. देशी ऊस..." अण्णा पिकांची नावं सांगू लागतात, पण त्याची गरज नसते. देशी ऊस होईल इतकं विहिरींना पाणी असेल तर प्रश्नच निकालात निघत होता.
"पुढं काय झालं?"
मग सुरू होते ती दुष्काळ कसा-कसा येत गेला त्याची कहाणी. सुरवातीला दहा-पंधरा फुटांवर असणारं विहिरीचं पाणी आधी ऑईल इंजीन आणि मग वीजेचे पंप आल्यावर कसं खोल गेलं, पाहता-पाहता विहिरी कशा खोलवर न्याव्या लागल्या, त्याच काळात झाडोऱ्याची तोडणी कशी वाढत गेली आणि पुढे पाऊसमान कसं कमी होत गेलं याची ही कहाणी असते. अण्णा त्यांच्या वयाच्या टप्प्यानुसार सांगतील अशी माझी अपेक्षा असते. पण ते थेट सालांनुसार सारं सांगत जातात आणि माझा त्यांच्याविषयीचा भ्रम दूर होतो. या माणसाचा अभ्यास आहे, हे पटतं आणि मी मनोमनच खजील होतो.
---
दुपार. १२. ००.
करगणीच्या पुढं ज्या वस्तीवर आम्ही गेलो तिला वस्ती का म्हणायचं? साधारण फर्लांगभराची त्रिज्या घेतली तर एकही घर नाहीये. या एकाकी घराच्या पटांगणात पंचवीसेक मंडळी बसली आहेत. राहुरी कृषी विद्यापीठाच्या वतीने मार्गदर्शनासाठी ही कार्यशाळा आहे. सरकारचे दोनेक कर्मचारीही आहेत. या दुष्काळी भागात डाळिंबाच्या बागा आता मोठ्या प्रमाणात फुलताहेत. गेल्या चार वर्षांतील ही घडामोड. पहिल्या दोन वर्षांत डाळिंबाचा भाव पडला आणि इथल्या डाळिंब उत्पादकांच्या तोंडचं पाणी पळालं होतं (किती सहजगत्या हे मी लिहून जातोय. या भागात तोंडचं पळण्यासाठीही पाणी नसतं हे माझ्या गावीही नाही). पण गेल्या आणि यंदाच्या वर्षी त्यांना थोडा दिलासा मिळालेला दिसतोय असा आमचा पहिला पाठ.
आधी होतो तो स्वागताचा कार्यक्रम. मला फेटा बांधला जातो. माझी ओळख करून देताना संपतराव म्हणतात, "तो श्रावण तसा येत नाही, हा आलाय." आधीच फेट्यामुळं मी नतमस्तक झालेला असतो. त्यात ही तुलना. कसंबसं हसून प्रतिसाद देतानाही मला माझ्या खुजेपणाची परत जाणीव होते. निसर्गतःच असलेला 'श्रावण' इथं काही करू शकत नाही यातून आलेली जाणीव.
डाळिंबाचं पीक इथं कसं घेतलं जात असावं?
"लहानपणी सांगलीला गेलो होतो. तिथं सापांच्या सान्निध्यात... तास असे बोर्ड पाहिले. ते पाहण्यास गेलो. सापांच्या सान्निध्यात खरंच एक माणूस बसला होता. सगळीकडं साप. कोणत्या सापाचं तोंड कुठं सुरू होतं आणि कुठं संपतं हेच कळत नव्हतं. इथं तेच आहे. पाण्यासाठीच्या पाईपलाईन. कुठून कुठं गेल्या असतील सांगता येत नाही. आपण समोर पाहतोय ती डाळिंबाची बाग साडेतीन किलोमीटर अंतरावरून पाईपलाईननं पाणी आणून उभी केली आहे." वकील खिलारे सांगतात.
अगदी चपखल वर्णन असावं हे. कारण पाईपलाईन हा विषय आमच्यासमोर एका सरकारी अहवालातून आलेला असतोच.
"इथला दुष्काळ..." फारसं बोलावं लागतच नाही.
खिलारेच पावसाचं वर्णन करतात जे याआधी आटपाडीत आम्ही ऐकलेलं होतंच. फरक इतकाच की खिलारे नेमकेपणाने मॉन्सून आणि रिटर्न मॉन्सून या शब्दांचा प्रयोग करतात. किंवा नैऋत्य मॉन्सून आणि ईशान्य मॉन्सून अशा शब्दांमध्ये.
"काय केलं जातंय नेमकं?"
"शेततळी हा एक पर्याय आहे. पण सरकारची त्याला पुरेशी साथ नाही. नद्या आणि ओढ्यांवर बंधारे झाले आहेत, पण ते गाळानं भरले आहेत. गाळ असल्यानं पुढं पाणीच नाही. त्या प्रवाहात पाणी नाही म्हणून मग विहिरी, इतर पाणवठेही कोरडे पडले आहेत..." अण्णा सांगत असतात.
कोणीतरी त्यांना रोखतो, "टेंभूचं बोला."
त्याचा तो आक्रमक सूर पाहून पाणी कसं पेटू शकतं याची कल्पना यावी. अण्णा थोडे डिफेन्सीव्ह होतात. "तेही आहेच. "
"तुम्हाला टेंभू योजनेचं कसं समजलं? योजनेची आखणी होत असताना तुमच्याशी तज्ज्ञांनी चर्चा वगैरे केली होती का?" मी विचारतो.
"नाही. इथं एक मेळावा झाला, त्यात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. स्थानिक आमदारांनी आयोजित केलेला मेळावा होता तो."
मग स्थानिक राजकारणाचा एक पाठ होतो. या दुष्काळी भागांतील काही तालुक्यांचे अपक्ष आमदार. त्यांनी सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यात या भागातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची अट टाकलेली असते. त्यातून या टेंभूची योजना तयार झाली. एक तप झालं त्याला. रयतेचा ताप मात्र तसाच आहे.
"काय करावं लागेल?"
"तुम्हीच सांगा काही तरी. आम्ही एक आहोत." अण्णा बोलतात. पुन्हा एकवार आमची चर्चा थांबते.
---
संध्याकाळ. ५. ००.
परतीच्या प्रवासात काही गावांमध्ये नवेकोरे, पक्क्या बांधकामाचे, सुंदर रंगसंगती असणारे बंगले आमचे लक्ष वेधून घेतात. स्वाभाविक प्रश्न येतोच. दुष्काळी भागात हे कसं?
त्या बंगल्यांची कहाणी वेगळीच आहे. या भागातील किमान पन्नास हजार मंडळी अशी आहेत की ज्यांनी देशाटन केलं आहे. म्हणजेच ती मंडळी इतर राज्यांत गेली आहेत. तिथं ती सोनं गाळण्याचं अगदी खास काम करतात. त्यातून आलेल्या 'समृद्धी'ची ही फळं आहेत. संपतराव त्या मंडळींचं वर्णन करतात, "ही मंडळी सोन्याची माती करतात आणि मातीचं सोनं." मला आधी हे अलंकारीक बोलणं वाटलं होतं. पण वास्तवात तसं नाहीये. हे कारागीर सोन्याची खरंच राख करतात आणि त्यातून पुन्हा सोनं मिळवतात. रासायनिक प्रक्रियेच्या आधारे.
असाच आणखी एक वर्ग इथं आहे. हे आहेत मुंबईच्या गोदीतील कामगार. या भागातील प्रत्येक खेड्यातून तालुक्याच्या ठिकाणी जाण्यास भले एस. टी. नसेल, पण मुंबईसाठी हमखास आहे. तेच पुण्याबाबत. तिथले अनेक बांधकाम मजूर या भागातलेच.
दुष्काळ आणि सुकाळ यांच्यातील सीमेवरचे हे दोन वर्ग. पहिल्या वर्गाचं वास्तव्य सीमेच्या त्या बाजूलाच अधिक. दुसऱ्या वर्गाचं वास्तव्य या बाजूलाच अधिक. हाच वर्ग संख्येनं मोठा.
---
संध्याकाळ. ६. ००.
परतीच्या प्रवासात आम्हाला किमान सहा ठिकाणी टेंभू योजनेचा कालवा आडवा आला. खोलवर गेलेला. काही ठिकाणी पंधरा मीटरपर्यंतची खोली. काही ठिकाणी त्यापेक्षा कमी. काही भागांत पाणी साचलेलं आहे तर काही ठिकाणी तळाचा खडक दिसतोय. या तालुक्याच्या जमिनीवर ही कालव्याची रांग तर जमिनीखाली पाईपलाईनची. दोन्ही कोरडेच. वरून दुष्काळ.
या योजनेच्या विहिरीपाशी आम्ही पोचलो. तिथं थोडं पाणी दिसत होतं. बांधकामदेखील वरपर्यंत चढलेलं पण अपुरंच. त्यामुळं कोरडा कालवा आणि कोरड्या पाईपलाईन पाहत आशेची किरणं धुंडाळत बसणारे गावकरी.
काळाच्या अव्याहत प्रवासातला हा दुष्काळाचा एक टप्पा. त्याच्यासाठी छोटासा. तुम्हा-आम्हासाठी पिढ्या-न-पिढ्यांचा.
---
दुपारची एक आठवण. वैयक्तिक.
करगणीच्या त्या वस्तीवर माझा परिचय नावासह करून दिलेला असतो. जेवण संपल्यावर अण्णा मला त्या घराच्या मागील बाजूला बोलावतात. पूर्वेला दूरवर डोंगरांची रांग असते. त्या दिशेनं बोट करतात.
"हा आडवा डोंगर म्हणजे कावडीची दांडी. त्या दोन टेकड्या म्हणजे कावडीची पात्रं. ही श्रावणाची कावड."
त्या डोंगराच्या अलीकडं. कावडतळं आहे. तिथंच आपल्या आईवडिलांसाठी पाणी भरण्यासाठी श्रावण गेला होता. तिथंच दशरथाचा बाण लागून त्यानं प्राण सोडला, अण्णा सांगतात.
आता माझ्याकडं शब्द नसतात.
त्या काळी घागर बुडताना "बुडबुड" आवाज येण्याइतकं तरी पाणी इथं असावं...
(पूर्ण)

वाङ्मयजीवनमानप्रवासलेखअनुभव

प्रतिक्रिया

साती's picture

12 Aug 2008 - 8:24 pm | साती

चांगलं लिहिलंय.
दुष्काळ कसा-कसा येत गेला त्याची कहाणी

खरं आहे, पाण्याच्या अनिर्बंध वापराने दुष्काळ आलाय या भागात. तरिही मान्सूनचे बदललेले वेळापत्रक वैगेरे गोष्टीसुद्धा कारणीभूत आहेतच.
साती

लिखाळ's picture

12 Aug 2008 - 8:26 pm | लिखाळ

आपले लेख नेहमीच वाचनीय असतात. हा लेख सुद्धा आवडला.
--लिखाळ.

यशोधरा's picture

12 Aug 2008 - 11:02 pm | यशोधरा

आवडला लेख.