प्रेमअगन..!

पाटिल's picture
पाटिल in जनातलं, मनातलं
12 Dec 2021 - 6:15 pm

प्रेमअगन.
इसवी सन १९९८.
फरदीन खान- सूरज, मेघना कोठारी- सपना.
राज बब्बर- सूरजचा बाप+ आर्मीमध्ये कॅप्टन.
स्मिता जयकर- सूरजची आई.
अनुपम खेर- सपनाचा बाप+ अब्जाधीश उद्योगपती वगैरे.
बीना बॅनर्जी- सपनाची आई.
समीर मल्होत्रा- विशाल (सपनाचा भाऊ).

पहिल्याच सीनमध्ये भर रस्त्यात झोका बांधून त्यावर
झुलत जीवन आणि मृत्यूसंबंधी जांभईदार चिवचिवाट करणारी सपना दिसते आणि आपल्याला कळतं की आपली कशाशी गाठ पडलेली आहे..!

विशालभैय्या आणि सपना रोज वेगवेगळ्या
स्पोर्ट्सकारमधून कॉलेजला जातात.
कारण अनुपमपापा अब्जाधीश आहेत.
कॉलेजात एअरोबिक्सची ट्रेनर किरकोळ रजेवर
असल्याने सपनावर ट्रेनिंगची जबाबदारी पडतेय..
परंतु ट्रेनिंगचं अचानक गाण्यात रूपांतर होतंय.
कोरियोग्राफी वगैरेची अशी काही खास गरज नाही.
जमेल तेवढ्या जास्तीत जास्त आक्षेपार्ह हालचाली
करायला सांगितले गेले आहे.
गाण्याचे बोल साधारण असे आहेत:
शाम सुबह अय्या अय्या, रात दिन अय्या अय्या
दम लगा के मूव्ह इट मूव्ह इट, जोर लगा के डू इट डू इट

कॉलेजात साईड बाय साईड कराटेपण शिकवतात.
ट्रेनिंगच्या नावाखाली कराटेचा ट्रेनर काहीही कारण नसताना एका विद्यार्थ्याला दाणकन् उचलून आपटतो.
मग सूरज आणि विशाल तोंडातून आळीपाळीने 'हा: हू:'
'खमॉं खम्मॉं' 'हाऊजदेss' यासारखे
चित्कार काढत तायक्वांदो वगैरेची कौशल्ये उपस्थित एक्स्ट्रा कलाकारांस आणि
श्री. ट्रेनर महोदयांस दाखवतात.
श्री. ट्रेनर यांस चेहऱ्यावर आळीपाळीने कौतुक आणि क्रोध या भावना दाखवण्याचे ठोक कंत्राट दिले गेले आहे.
परंतु तेही त्यास भलतेच अवघड जातेय.
ह्या ट्रेनर मनुष्याचे पोट नीट साफ झालेले नसावे, अशी शंका घ्यायला पुरेशी जागा आहे.

या मूव्हीमध्ये नेहमीचे सगळे प्रॉब्लेम्स आहेतच‌‌.
पण संवादफेकीच्या बाबतीत विशेष गडबडगुंडा
झालेला आहे.
म्हणजे अगदी लहान मुलांचं नाटक बसवताना कसं असतं की त्यांना सांगावं लागतं प्रत्येक वेळी की,
'हं, आता तुझा डायलॉग म्हणून दाखव बरं शोनुल्या'

इथेही तसंच आहे. हे आपापल्या वाट्याला आलेले शब्द म्हणून दाखवतात फक्त. समोरच्या व्यक्तीला त्या
शब्दांतून काहीतरी भावना वगैरे पोचवायच्या असतात, याबद्दल त्यांना काहीच आयडिया नाही.
हावभाव, हातवारे आणि शब्दोच्चार ह्या़ंचा ताळमेळ पूर्णपणे गंडलेला आहे.
त्यामुळे एकमेकांशी संवाद साधणे वगैरे भानगड नष्टच होऊन गेली आहे.
शब्द घडाघडा म्हणून गप्प बसणे. दॅट्स ऑल.!!
एका पात्राच्या तोंडातून शब्द घरंगळायचे बंद झाले की लगेच पुढचे पात्र घडाघडा शब्द ओकून मोकळे होते..!
त्या ओकण्यामध्येही एक घाई आहे. एक धडपड आहे.
एक नवखा बथ्थडपणा आहे..भकासपणा आहे.. रंग-उडालेपणा आहे.
म्हणजे डायलॉग आठवून आठवून म्हणणे हा एक
भाग झाला..‌ पण सोबतच ह्यात एक दुर्मिळ प्रकारचे कुंथणेही आहे..!! सूरज-सपना आणि विशालभैय्या ह्यांच्या संवादफेकीत तर कुंथण्याची अक्षरशः चढाओढच आहे.
शिवाय आपल्यामुळे किती हजार रिटेक्स घ्यावे लागले, ह्याचा ह्या लोकांना काही मेळच नसल्यामुळे एक दयनीय निर्ढावलेपणही आहे..! काहीतरी फंडामेंटलच हुकलेलं आहे ह्या मनुष्यांचं..!

संवादफेकीचा हा मख्ख पैलू एकदा आपल्या पचनी पडला की मग काही अडचण
राहत नाही. कारण एका पॉईंटनंतर आपलं मन विशाल
होतं आणि परफॉर्मन्स मोजण्याचे बेंचमार्क्स आपण
एका झटक्यात न्यूट्रलला आणून ठेवतो.

सपना आणि सूरज तीव्र वेगाने प्रेमात पडले आहेत
आणि लगेच एकमेकांना प्रेमासंबंधी लंब्याचौड्या रोमॅंटिक
पुड्या हाणत आहेत.. त्या पुड्या कलात्मक करण्याच्या नादात स्क्रिप्टरायटर पार फाफललेला आहे.
स्क्रिप्टरायटरच्या नादाने डायरेक्टरही फाफलत
आडरानात डोंगरदऱ्यात शिरलेला आहे.
खरंतर नेमकं कुणाच्या नादाने कोण फाफललंय, हे
ठरवणं फारच गु़ंतागु़ंतीचं आहे ह्यात..!

मध्येच हे हीरो-हिरॉईन एका खोल धबधब्यात उडी
मारतात. कार्यकारणभाव असा काही नाही.
'आपल्या पवित्र प्रेमात एवढी ताकद आहे की आपण मृत्यूचं चुंबन घेऊन परत येऊ.!' असा एक केकाटणारा डायलॉग तेवढा आपल्यावर आदळतो.

शिवाय हे सगळं एका बाजूला चाललेलं असतानाच दुसऱ्या बाजूला नाच-गाणी वगैरे असतातच.. ती थांबवून कसं चालेल?

इथेएक सीन आहे.
मुलगी स्वतःच्या तोंडातून 'इष्क' असा शब्द उच्चारते
तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक खास असं हसू प्रकट होतं,
असं सूरज मनुष्याचं होपलेस निरीक्षण..!

एक हेलिकॉप्टर तेवढं उतरताना दिसतं अधूनमधून.
अनुपमपापा देशविदेशातील दौरे आटपून
हेलिकॉप्टरमधून घरी येतात. तशी पद्धतच आहे.
शिवाय एक प्रोटोकॉल वगैरेही असतो.
सपनाची आई केस कलप केलेले, साडी-मंगळसूत्र-दागिने हास्यगुटीका वगैरेसह हेलिपॅडवर स्वागताला
आणि सोबत चार एक्स्ट्रा कलाकार सूटाबूटातले..!
एक जण दरवाजा उघडायला.
एक जण सलाम करायला. एक जण पापांची
लाडकी कुत्री सांभाळायला. आणि उरलेला एक जण
फोन रिसिव्ह करायला.
दिल्लीमध्ये हमखास कॉमर्स सेक्रेटरी किंवा तत्सम फायनान्स सेक्रेटरी वगैरे अनुपमपापांसाठी तिष्ठत
बसलेले असतात, हे फोनवरून कळतं.
अनुपमपापांचं काम भव्यदिव्य आहे. ते अब्जाधीश
आहेत, हा कन्सेप्ट क्लिअर होतो.

ह्यावेळी अनुपमपापा 'सांघा इंडस्ट्रीज'शी एक मोठा औद्योगिक करार यशस्वी करून आले आहेत.
सांघा हा त्यांचा बचपनका दोस्त आहे आणि शिवाय
ह्या सांघाला राजेश नावाचा बिनलग्नाचा टोणगाही
आहे, हे परंपरेने आलेच.
हा करार फत्ते केल्यामुळे अनुपमपापांच्या जेके
इंडस्ट्रीजचा व्याप जगभर वगैरे वाढणार आहे..
लब्बाड अनुपमपापा असे एकाच दगडात तीन
पक्षी मारण्याची चाह उराशी बाळगून आहेत.

तिकडे कॅप्टन बब्बर आर्मीच्या ट्रूपला ट्रेनिंग देतायत.
ट्रेनिंग म्हणजे काही जवान मातीच्या ढिगाऱ्यांवर
गोळीबार करून मोकार धूळ उडवून देतायत, एवढंच..!
नंतर कॅप्टनसाहेब जवानांना उद्देशून एक मोटीव्हेशनल स्पीच किंवा संवादफेक किंवा ओरीएंटेशन किंवा
युद्धशास्त्रविवेचन कम् स्ट्रॅटेजिक हालचाली किंवा तत्सम हौसला बुलंद वगैरे करतायत.

हे सगळं एका बाजूला चाललेलं असतानाच आपली आयुष्यभराची सगळी बचत फुंकून ते एक महागडी
स्पोर्ट्स बाईक सूरज टोणग्यास भेट म्हणून पाठवतायत.
ही बाईक आर्मीतलाच एक माणूस पोस्टींगवरून थेट सूरजच्या मुक्कामी घेऊन येतोय. मग त्याच बाईकवर सपनाला बसवून सूरज लगेच पित्याच्या भेटीस निघतोय.
डायरेक्टरने त्या आर्मीतल्या माणसाला कशाला उगाच खालीफुकट हेलपाटा घालायला लावला कळायला मार्ग नाही. असो.

मग सासू भावी सुनेला हाताने घास वगैरे भरवतेय. सून नको वगैरे काही म्हणत नाही. पुऱ्या खातेय. पहिल्याच भेटीत जे एक अवघडलेपण असतं, तसल्या क्षुद्र पूर्ण फाटा दिलेला आहे. सगळं खुलं वातावरण.

सौ. स्मिता जयकर सासूबाईंचा आधीच कसलातरी अपघात झालाय आणि त्यामुळे त्यांना ह्या पिच्चरमध्ये कायम व्हीलचेअरवर फिरायला लागतेय.
कॅप्टनसाहेब रोज जवानांना ट्रेनिंग देऊन झाल्यावर धावतपळत येऊन बायकोची काळजी घेत असतात, म्हणजे तिला आंघोळ वगैरे घालणे.. परंतु कॅप्टनसाहेबांना आज उशीर झालाय... बायको स्वतःच्या मजबूर हालतीवर क्रुद्ध होऊन स्वतःच आंघोळ करायचं ठरवतेय.. आणि त्या प्रयत्नात जिन्यातून गडगडत खाली येऊन डोक्याला खोक वगैरे पाडून घेतेय. आता व्हीलचेअरवर बसून स्वतःला जिन्यातून लोटून दिल्यावर दुसरं काय होणार..! साधं फिजिक्स आहे..!!
परंतु पिच्चरांमधी मोकळ्या जागा भरण्यासाठी हे असलं फारच करावं लागतं..! बाकी ह्या अपघात वगैरेचा तसा अर्थाअर्थी काही संबंध नाही.
किंवा व्यापक पातळीवर बघितलं तर एकूणच ह्यात
कशाचा कशाला संबंध नाही..! पण व्यापक पातळीवर तुम्हाला कुणी बघायला सांगितलंय..! आपण आपलं नॉर्मल
पातळीवर बघावं..! ते नको असेल तर भंपक पातळीवर बघावं..! आणि तेही नको असेल
तर हरीहरी करत बसावं..!

इथे एक सीन/डायलॉग आहे. ह्या दर्जाचा माठपणा
सहजसाध्य नाही. हा पवित्र माठपणा साध्य
करण्यामागे सूरजचे आणि तीर्थरूप फिरोझ खानसाहेबांचेही बेसुमार कष्ट आहेत.

आपल्याकडे दगडांमध्ये बेसॉल्ट प्रकारचा दगड
अतिटणक मानला जातो. छिद्रं फार कमी असल्यामुळे त्यात पाणी वगैरे शिरत नाही.
सूरज शंभर टक्के बेसॉल्ट आहे..!
बेसॉल्ट इन इट्स प्युअरेस्ट फॉर्म..!
शतकातून एकदा असा सीन घडून येतो.‌!
ह्यात सूरजचा बेसॉल्टपणा अत्यंत शुद्ध स्वरूपात प्रकट झाला आहे..! किंचितही भेसळ नाही..!
निव्वळ दैवी अभिनय सूरजमधून पाझरलाय..!
सवालच नाही..! हे पहाच

अनुपमपापा आणखी कितव्यांदा तरी हेलिकॉप्टरमधून सैरसपाटा, मजाहाजा करून आले आहेत. हेलिपॅडवर नेहमीचा सगळा प्रोटोकॉल आहेच.
फरक एवढाच की आता कुत्रीसुद्धा वाट बघून बघून जांभया देताना दिसतायत.
अनुपमपापा नेहमी हेलिकॉप्टरमधून उतरले की
कुत्र्यांना कुरवाळतात. अब्जाधीशांना अशी सवय
असेल बहुतेक..!
आम्हास त्यासंबंधी कल्पना असण्याचं काहीच कारण
नाही.
कारण आम्हास आत्तापर्यंत वडाप मध्ये किंवा तत्सम टमटममध्ये वगैरे चारी बाजूंनी स्वतःस दामटून मुडपून घेत
प्रवास करण्याचाच अनुभव पुष्कळ आहे.
(उदाहरणार्थ: ओ मावशीsss बारक्याला घ्या मांडीवर..! सरकून बसा दादाss आवो पाच जन आरामशीर बस्तेत.. म्हागं फुडं सरकून बसा जराss)

----------*******----------

(पुढे चालू)

आता मारामारी केल्यामुळे सूरज सपनाला अटक झालेली आहे. विशेष म्हणजे त्या दोघांना ज्या कोठडीत ठेवले आहे, ती कोठडी म्हणजे एक मोकळ्या जागेतली खोली आहे. हे ही समजा ठीक..! पण आता तिथे एक चहावाला येऊन त्यांना चहा हवाय का असेही विचारतोय..! हे ग्रेट आहे..!

अनुपमपापा आणखी एकदा हेलिकॉप्टरमधून उतरून डायरेक्ट कोठडीबाहेर हजर. लगेच आर्मी युनिफॉर्ममध्ये कॅप्टनसाहेबही बॉडीगार्ड्सना घेऊन घटनास्थळी हजर.
मग दोन बाप मोहब्बत, कठीन रस्ता, दौलतका नशा,
हिमालय, चंद्र सूर्य, ताजमहाल, ईश्वरी वरदान,
वफा की दास्तान, कुर्बानी यासारखे ट्रकभर काव्यात्म
शब्द वापरत तब्बल पाच मिनिटे तुंबळ डायलॉगबाजी करत राहतात.

{बाकी हे कॅप्टनसाहेब आर्मी वगैरेमध्ये असले तरीही
'प्रेम' ह्या संकल्पनेवर इथे सघन उत्कट बोलतात..
कॅप्टन बब्बरसाहेब म्हटल्यावर काही प्रश्नच नाही.
ते कलावंत आहेत. मनाने रोमॅंटिक आहेत.
टवटवीत आहेत. त्यांना सर्व शक्य आहे.
म्हणजे त्यांना समजा 'सवाई गंधर्व'च्या स्टेजवर
गायला बसवलं तर ते सहजच मैफिलीमागून मैफिली
गारद करतील.
तिथेही बंदूक वगैरेसहीत फुल्ल आर्मी युनिफॉर्म घालून आलाप घेतील.!
विशेषतः प्रेमविषयक राग मधुवंती किंवा तत्सम
बागेश्री वगैरे त्यांस अतिप्यार चिम्ब जमेल..!}

आणि दुसऱ्या बाजूला अनुपमपापा समजा
रक्तपिपासू भांडवलदार वगैरे..!
एकदा बटन ऑन केलं की किमान एक हजार
शब्द बोलून झाल्याशिवाय थांबायचं नाही, अशी
प्रतिज्ञाच आहे त्यांची.

एवढा वेळ कुठेतरी लंपास झालेला इन्स्पेक्टर तिथे
प्रकटतो. त्या दोघांवरची पोलिस केस मागे घेतल्याची घोषणा करतो आणि दोघा बापांची भाषणबाजी थांबवून
प्रेक्षकांची सुटका करतो. कारण हा सगळा प्रकार मोकळ्या मैदानात खुल्यामध्ये चाललेला आहे.

मध्येच मख्ख हिरो हिरोईनचं एक भांडण आणि तीन
मिनिटांत लगेच पॅचअप. म्हणजे सरळसरळ टाईमपासच.
परंतु इथे रूसलेल्या हिरॉईनचा हिरोला उद्देशून एक डायलॉग असा आहे की 'तुम पत्थरदिल हो और
मैं एक पत्थर में प्यार ढूंढ रही थी'
ह्यावरून वरती मांडलेल्या बेसॉल्ट थेरीला आपोआप
पुष्टी मिळाली, हे एक बरे झाले.

इथे एक सीन आहे.
हिरो हिरोईन एकांतात आहेत. दोघांच्याही शरीरांमध्ये बहुदा हार्मोन्सच्या हालचाली सुरू झाल्यायत. हिरोईन म्हणतेय की
'सूरज, मुझे वो हसीन दर्द दे दो.'
आता हा हसीन दर्द कशा प्रकारे देतात, हे
बघायला आम्ही सावरून बसतो.
तशी दर्द देण्या-घेण्याची प्रोसेस सुरूही होते,रंगातही
येते परंतु शेवटास मात्र जात नाही.
कारण बाहेर वीज कडाडते आणि सूरज म्हणतो की,
'हम जजबात में बह गए थे सपना. मैंने अभीतक
तुम्हारे मांग में सिंदूर नहीं भरा. अभी हमारा मिलन
होने का वक्त नही हुआ'

ह्यावर सपनाही म्हणते की 'मी पण तुझी परीक्षा बघत
होते सूरज..! आणि तू परीक्षेत पास झालास..!
{{अरेच्चा...! हे असं नाय चालणार..!
बिलकुल नाय चालणार..!
हा अन्याय आहे..!
आंबटशौकीनांवर हा सरळसरळ
कुठाराघात आहे..! असे नका हो करू प्लीज..!
आमच्या तमाम आंबटशौकीन बांधवांच्या वतीने
आम्ही विनंती करतो. पदर पसरतो.
असा रसभंग करू नका..!
तुम्ही जजबातमध्ये असेच अजून थोडा वेळ
वाहात रहा..
आम्हालाही तुमच्यासोबत जजबातमध्ये वाहायला आवडेल..! ही हसीन दर्दवाली परीक्षा अशी
अर्ध्यावर सोडू नका..! 'पास की नापास' हे असं
एवढ्यात ठरवता येणार नाही..!
कधी नव्हे तो जरा बरा सूर लागला होता तुमचा..!
आणि ऐन मोक्याच्या क्षणी आता हे 'मांग में सिंदूर'
वगैरेसाठी अडून राहता..! हे बरोबर नाही..!

एक तर आमच्या विद्यार्थीदशेत आमची कुणी असली परीक्षाच घेतली नाही.
''नुसता सिलॅबस बघायला काय हरकत आहे'',
असं विचारलं तर ''सुपरव्हायजरना विचारून सांगते''
असं उत्तर मिळालं..!
आणि सुपरवायजर लय निकरट..! त्यांच्यापर्यंत मॅटर गेला की ते ऊसाचं कांडकंच काढणार खापकन्..!
तेंव्हा ते एक राहूनच गेलं..
बाकी नंतर वयाच्या या टप्प्यावर वेगवेगळ्या
हसीन दर्दवाल्या स्पर्धापरीक्षा देण्यात, त्यांची तयारी करण्यात
व्यावहारिक अडचणी फार..
वेगवेगळ्या परीक्षेची वेगवेगळी डीमांड..!! त्याप्रमाणे मग अभ्यासाची स्ट्रॅटेजी बदलावी लागते...!
खूप प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करावं लागतं..!
कधीकधी पुढची पार्टी वारंवार परीक्षेला
बसण्याचा हट्ट करू लागते.
. असले आकर्षक
हट्ट पुरवण्याचा नादात कायमस्वरूपी रेस्टीकेट होऊन बसण्याची रिस्क असते..!
शिवाय परीक्षाकेंद्रेही वारंवार बदलावी लागणं वगैरे...
आणि ह्यामध्ये कौटुंबिक सपोर्ट अजिबातच मिळत
नाही..!
कारण कुटुंबाचं म्हणणं असं पडतं की आता तुला
परीक्षा-फिरीक्षा द्यायची गरजच काय आहे?

त्यामुळे तुम्ही आमचं एवढं ऐकाच..!
तमाम आंबटशौकीनांची एवढी फर्माईश पुरी कराच..
ते कुंद्राशेठ चांगले कलात्मक पिच्चर काढायचे गुपचूप तर ते ही लोकांना बघवलं नाही. नजर लागली. आणि कुंद्राशेठचं दुकानच बंद झालं... आता आमच्या बांधवांचा कोण विचार करणार?नेहमी आंबटशौकीनांवरच असा अन्याय का? आम्ही उघडपणे आंदोलन करू शकत नाही म्हणून ही अशी पिळवणूक करता? कुठे फेडाल?? ईश्वराने आम्हांस असे आंबटशौकीन केले, हा काही
आमचा काही दोष नाही..! असो.}}

तेवढ्यात अनुपमपापा घटनास्थळी येतात.
बाहेर पाऊस असल्याने यावेळी हेलिकॉप्टर नाहीये.
सपना-सूरजला बेडवर बघून पापा पिसाटतात.
परंतु हसीन दर्दवाली सपना लगेच पलटी मारते आणि बापाला म्हणते की,'आमचं प्रेम पवित्र आहे.
तुम्ही उगाच गैरसमज इत्यादी करून घेताय.'

पापा सूरजला गुंडांकरवी जाम पिदवतात.
पापा सपनाला इमोशनल ब्लॅकमेल करतात आणि
ब्रेकअप करायला लावतात.

इकडे कॅप्टनसाहेब युनिफॉर्मसहित बायकोस घेऊन सूरजला सरप्राइज व्हिजिट द्यायला येतात.. वाटेत
पत्नीला सुहागरात्रीची रोमांचक नॉस्टॅल्जियात्मक
आठवणी करून देतात.
कॅप्टनसाहेब आधी घरात शिरतात आणि बघतात तर
सूरज जखमी अवस्थेत पडून आहे..!
अंगावर ठिकठिकाणी टोमॅटो सॉस कलात्मक पद्धतीने लावून ठेवलेला आहे. कॅप्टनसाहेब किंचाळतायत.

लगेच बाहेर सौ. स्मिता कॅप्टन किंचाळायला लागतात,
"क्या हुआ मेरे सूरज को ? बताओ मुझे.. क्या हुआ
सूरज को? मुझे देखने दो.. मेरा सूरज ठीक तो है ना?"

कॅप्टनसाहेब किंचाळतात की 'सूरज बिलकुल ठीक
आहे. काळजी करू नको.'
कॅप्टनसाहेब एकाच वेळी सूरजच्या
भावनिक पप्प्या वगैरे घेतायत आणि त्याच वेळी
बायकोस सगळं ठीक असल्याचं भासवतायत.
मोठीच कठीण परिस्थिती कॅप्टनसाहेबांवर
आली आहे.

खरंतर ही स्मिता जयकर नामक आई सरळसरळ
घरात येऊन बघू शकतेय.. व्हीलचेअरला काहीच
अडथळा दिसत नाहीये...पण प्रसंगात नाट्य निर्माण करण्यासाठी हा सगळा बेंटेक्स प्रकार केलेला
असणार.. शिवाय आईची वेदना, तळमळ, दु:ख,
तडफड हे सगळं असतंच...!
ते ही असं साईड बाय साईड, भडक स्वरूपात
दाखवावं लागतं..!
ज्यांना बघायचं ते बघतील..!
सर्व प्रकारच्या प्रेक्षकांचा विचार करावा लागतो.
सर्वांचं थोडं थोडं समाधान करावं लागतं. ग्राहकांची खुशी हाच परम संतोष असतो.
आणि ही रडारड बघायला ते काही एक्स्ट्रा पैसे मागत
नाहीत. एकाच तिकिटात सगळ्या भावना भरगच्च उपलब्ध असतात..! तुम्हाला ज्या हव्यात त्या तुम्ही निवडा आणि अनुभवा. उगाच पिरपिर कशासाठी ?

कॅप्टनसाहेब सूरजला बदला घेण्यासाठी मोटिव्हेट
करून पुन्हा ड्यूटीवर जातात.
सूरज नीट होतोय. सूरजची माऊली हातात
दुधाचा ग्लास घेऊन व्हीलचेअरमध्ये बसली आहे. सूरजकडे कौतुकाने प्लस मायेने पाहतेय..
सूरजचं व्यायाम, कराटे वगैरे चाललंय घरातल्या घरात. बदला घ्यायचं म्हटल्यावर हे सगळं करावंच लागणार..
दूधही प्यावं लागणार.

सूरजला सपनाकडून ब्रेकअपसंबंधी पत्र आलंय.‌
तेव्हा मोबाईलचं एवढं काही नव्हतं..!
सूरज पत्र वाचतोय.
पत्रात जुदा होण्याची वेदना आहे. भावनिक उष्णता
आहे. किस्मतला दोष आहे. नशीबापुढे शरणागती
आहे. मानवी प्रयत्नांची विफलता आहे.
वाट वेगळी झाल्याची घोषणा आहे.
ह्या सगळ्या व्यामिश्र भावनांचे वादळ सूरजने
चेहऱ्याद्वारे अभिव्यक्त करावे,
अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे..!

तिकडे अनुपमपापा हेलिकॉप्टरच्या दिशेने चाललेले
आहेत. ह्यावेळी ते बहुदा दिल्ली वगैरे ठिकाणी चालले आहेत. कारण दिल्ली एअरपोर्टवर फायनान्स
मिनिस्ट्रीतले सचिव वगैरे त्यांची वाट बघत बसले आहेत.
नंतर सगळ्या फॅमिलीसहित ऑस्ट्रेलिया वगैरे देशात जाण्याचे पापांनी नियोजन केले आहे.
हेलिकॉप्टर वरती उडते आणि खाली सूरज गुंडांचा
बदला घेतोय. तमाम गुंडमंडळी सूरजपुढे दयेची भीक मागतायत. यापैकी एक गुंड चक्क टाय वगैरे बांधून मारामारी करतोय. ही अशी भागवाभागवी करावी लागते आपल्याकडे..!

ऑस्ट्रेलियात बचपनका दोस्त सांघासाब यांचेकडे अनुपमपापांचा हा सगळा गोतावळा उतरलेला आहे.
श्री. राजेश सांघा नवरदेव एका उग्र घोड्यावर पन्नास सेकंदापर्यंत बसण्याचे प्रात्यक्षिक रोमहर्षक दाखवतोय.
हा एक विशेष प्रजातीचा घोडा आहे.
सामान्य मनुष्याला हा घोडा फक्त पाच सेकंदांमध्येच
फेकून देतो. परंतु श्री. राजेश सांघा थोर आहेत.
तब्बल पन्नास सेकंद घोड्यावर टिकून राहतात..!
खरोखरच ही एक ग्रेट ॲचिव्हमेंट आहे.
विषयच नाही..!
अनुपमपापा, सगळी फॅमिली आणि इतर टाईमपास गौरवर्णीय बघे मंडळी टाळ्या वाजवतात.
श्री. राजेश सांघा नवरदेव ह्यांच्या चेहऱ्यावरची
माशीही उठत नाही, ही किरकोळ बाब आपण
ह्याठिकाणी दुर्लक्षित केली पाहिजे.

राजेश टोणगे यांनी सपनाला मद्यसेवनाचा नाद
लावला आहे.
मग सपना रोज टुन्न होऊन घरी येऊ लागते.
परंतु अनुपमपापा आणि सपनाच्या आईस हा
सगळा चंगळवाद, भोगविलास वगैरे मान्य नाही.
सपनाची आई म्हणते,
"शेवटी तू भारतीय संस्कृतीत वाढलेली असल्यामुळे
तू राजेशला योग्य वळण लावायला हवेस.
परंतु इथे तर तूच रोज मद्य वगैरे पिऊन सुसाट
होत आहेस. हे पाहून आमचे मन फार दुखते."
{पूर्वी मूव्हींमध्ये पाश्चात्य चंगळवादी मंडळींना
उद्देशून हमखास लेक्चरबाजी करण्याची एक पद्धत असायची.. आता तो प्रकार नष्ट झालेला दिसतो.
कारण आपलेच शेकडा नव्वद लोक एवढ्या बुंगाट
वेगाने चंगळवादी किंवा तत्सम मटेरियालिस्टीक होऊन बसले आहेत की त्यापुढे पाश्चात्य लोकं म्हणजे बैरागीच म्हणावे लागतील.}

सूरज इकडे झुरत दर्दे गाणी म्हणत भारतीय
जंगलांमध्ये भटकत फिरत असतो. कॅप्टनसाहेब
पुत्रास अद्भुत सल्ला देतात की आता तू
ऑस्ट्रेलियाला जाऊन सपनाचा शोध घे.
पैसे वगैरेची चिंता करू नकोस. ही स्पोर्ट्स बाईक
विकून पैसे उभे करू..
'मुमताजला शोधण्याची वेळ आली असती तर
शहाजहानने ताजमहालही विकला असता,
त्यापुढे ही बाईक वगैरे काहीच नाही', असं
कॅप्टनसाहेबांचं म्हणणं पडतं..
ही बाईक घेण्यासाठी आपली आयुष्यभराची
पुंजी उडवावी लागली होती, हे कॅप्टनसाहेब साफ
विसरून बसले आहेत.

ताबडतोब एक विमान हवेत उडताना दिसतेय.
त्यात बहुतेक सूरजच असेल.
कारण लगेचच सूरज याचे ऑस्ट्रेलियादेशी आगमनही झालेले दिसतेय.
डायरेक्टर सूरजचा बाप असल्यामुळे ऑस्ट्रेलियात बनियनवर मोकाट फिरण्यात सूरजला अडचण नाही.

सपनाची सगाईची पार्टी चाललीय. तिथं अचानक
सूरज प्रकट होऊन नाचायला लागलेला आहे.
इतरांना तो ओळखू येत नाही. फक्त सपनाला
ओळखू येतो. खरं प्रेम हे असंच असतं..!

बाय द वे, सूरजनं वेषांतर केलंय हे एक सांगायचं राहिलं.
कारण हे वेषांतर म्हणजे डोळ्यांच्या भोवती काळे फर्राटे ओढणे, इतकंच आहे.
इथेएक सीन आहे.
राजेश सपनावर जबरदस्ती करतोय. घड्याळाला चावी दिल्यासारखी शब्दफेक चाललीय.
हतबल बेसहारा सपना म्हणते, ''मेरे जिस्म को पाना इतना आसान नहीं. मैं भारत की तहजीब का दर्पण हूं"
स्वस्त दर्जाची नशा केल्याशिवाय असे असंबंध डायलॉग लिहून होणे शक्य नाही, असे आमचे (अनुभवाअंती) मत आहे. कंगाल स्क्रीप्टरायटरचा सगळा पैसा खलास झाला झाल्यामुळे ब्रॅंड बदललेला असणार बिचाऱ्याने..!

बाकी वरच्या सीनमध्ये तर सरळसरळ हरिहरेश्वरचा बीच आहे की काय असा डाउट येतोय.
ऑस्ट्रेलियाच्या नावाखाली बरेच सीन्स आपल्याकडेच उरकले आहेत असे दिसते.
कारण ह्यांचे असले वेडे चाळे भर रस्त्यात करू द्यायला ऑस्ट्रेलियन प्रशासनाने एका झटक्यात परवानगी
नाकारली असेल काय ?

अनुपमपापा तर शेवटी शेवटी एवढे हुकलेले आहेत की ते मनात येईल त्याला गोळ्याच घालायला लागतात..!
परंतु रेपिस्ट राजेशला गोळ्या घालताना अनुपमपापा जे
डायलॉग मारतात ते ऐकण्यासारखे आहेत.
भाषेच्या अंगाने बघितलं तर त्यात फार मोठं सौंदर्य आहे.
उदाहरणार्थ हा डायलॉग पहा
"क्या यहीं दिल था जिसने हवस को पनाह दी थी?"
हा डायलॉग म्हणून झाला की अनुपमपापा राजेशच्या थेट दिलावर गोळी मारतात. राजेशला डास चावणे आणि गोळी लागणे ह्यातला फरक कळत नाही. त्याच्या प्रतिक्रिया सेमच असतात.

तर प्रेमअगन ही अशी एक अस्सल कलाकृती आहे. देश, भाषा, संस्कृती वगैरेच्या पलीकडे जाऊन समस्त मानवजातीच्या अंतःकरणास भिडण्याची क्षमता आहे ह्यात. शिवाय या चित्रपटात वारंवार पाहण्याचा मोह होईल अशा, तसेच रसग्रहण करण्यासारख्या सुंदर जागा विपुल आहेत. परंतु आमच्या दृष्टीस मर्यादा आहेत. मायनस तीन नंबर आहे चष्म्याचा..! त्यातून किती आणि काय काय पहावं!! आणि ही प्रेमाची आग एकाच बैठकीत पूर्णतः झेलण्याची ताकद नाही.! म्हणूनच हा प्रेमाचा उजेड आणखी थोड्या थोड्या काळाने आम्हास पुन्हा पुन्हा आकर्षित करत राहील, यात शंका नाही.
बाकी हा एक कलात्मक चित्रपट असल्याने त्याचा शेवट ॲब्स्ट्रॅक्ट स्वरूपाचा असा आहे.

पिच्चर पाहून संपला आणि त्यामुळे एक तृप्त तरीही
हुरहुर लावणारी भावना या क्षणी माझ्या मनात आहे. त्यासोबतच जगावं लागतं माणसाला..!
काय करणार..!
धिस इज लाईफ, यू नो.!
आपल्या हातात काय असतं दुसरं..?

जाताजाता :
आणि शेवटी ह्या चित्रपटाबद्दल आमच्या मनःस्थितीचे अचूक वर्णन करण्यासाठी कविश्रेष्ठ तुकारामबुवांच्या निर्मळ शब्दांची मदत घेणे अगदीच योग्य होईल, असे वाटते

काय वाणू आता / न पुरे ही वाणी /
मस्तक चरणी / ठेवितसे //

_/\_

विनोदमौजमजाचित्रपटप्रकटनआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

12 Dec 2021 - 7:16 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

तुषार काळभोर's picture

12 Dec 2021 - 9:55 pm | तुषार काळभोर

मस्तक चरणी / ठेवितसे //

मधला कंसातला भाग सोडला तर बाकी लेख भन्नाट झालाय. लेखासाठी नाही पण प्रेम अगन बघितल्याबद्दल तुम्हाला (अनुपमपापांच्या) हेलिकॉप्टरमधून (हरिहरेश्वरच्या) समुद्राची सैर घडवण्याचं मी जाहीर वाचन देतो.

असो.
भारतीय चित्रपटसृष्टीत पोलीस आणि सैन्य (इन्क्लुडिंग वायू आणि नौसेना) दलातील अधिकारी पदांविषयी प्रचंड अज्ञान आहे. आपल्या पीच्चरांमध्ये आर्मीतील मोठा अधिकारी कॅप्टन असतो. मेजर म्हणजे उच्चाधिकाराची परिसीमा. त्यामुळे पन्नाशीचा राज बब्बर कॅप्टन आणि निवृत्तीतून माघारी आलेला बच्चन मेजर असतो. बिनलग्नाचा तरुण एसीपी पहिल्यांदा सरफरोष मध्ये दिसला होता. त्याआधी ढेरपोटे साठीचे म्हातारे एसीपी आणि डीवायएसपी (हा एक लोकप्रिय अधिकारी असतो हिंदी पिक्चर मध्ये. दुसरा फेवरेट अधिकारी आयजी) असत.
त्याशिवाय कॅप्टन आणि मेजरला अनिर्बंध अधिकार असतात. खडकवासल्याच्या एनडीएचा सर्वेसर्वा साठीचा मेजर असतो जो कॅडेट्सला बंड करायला लावतो.
त्याशिवाय सैन्याचे लोक सदा सर्वकाळ गणवेशात असतात. (पण एकचाही क्रू-कट नसतो. अगदी बॉर्डर या बऱ्यापैकी बऱ्या चित्रपटातसुद्धा अक्षय खन्ना आणि सुनील शेट्टी जुल्फे घेऊन हिंडतात. मुख्य हिरोने सैन्याच्या भूमिकेसाठी क्रू-कट केल्याचं पहिलं उदाहरण कदाचित लक्ष्य असेल.) आणि दिसेल त्याला कडक सॅल्युट मारतात. तसेच इतर सामान्य जनता त्यांना उगाच सॅल्युट मारत असते. ते बुलेट आणि उघडी जीप (महिंद्रा कमांडर) शिवाय इतर वाहने त्याज्य मानतात. माहेरच्या साडीतला कॅप्टन रमेश भाटकर नेहमी कडक गणवेशात बुलेटवर घरी येतो.

दुसरं अज्ञान असतं महाविद्यालयीन तरुणाई विषयी. दिल चाहता है (परत एकदा फरहान अख्तर) कदाचित पहिला पिक्चर असेल ज्यात मुंबईच्या उच्चभ्रू तरुणाईचं वास्तव चित्रण आहे. बाकी मग अस्वल कपूर बारावी पास (एन्सीसी नेव्ही कॅडेट) असतो, 'विदेश में पढी' हिरोईन अती तोकड्या कपड्यात मुंबईच्या कॉलेजात प्रवेश घेते. तिथे शिवणकाम करणाऱ्या विधवा आईचा मुलगा अक्षयकुमार किंवा सुनील शेट्टी फर्स्ट क्लास फर्स्ट पास होतात. व्हीलन असलेला अमीर बाप का बिगडा मुलगा त्याच कॉलेजात असतो. तो अर्थात तोकड्या कपड्यात फिरणाऱ्या 'विदेश में पढी' हिरोईनच्या मागे असतो. ती मात्र शिवणकाम करणाऱ्या विधवा आईचा मुलगा अक्षयकुमार किंवा सुनील शेट्टी च्या प्रेमात असते. हिरोइनच्या बापाचे उद्योग सीमा टेक्सटाइल किंवा वर्मा/मल्होत्रा/खन्ना/कपूर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज याच्या पलीकडे नसतात. अगदीच हटके म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट का बिजनेस.
असो लिहावं तेवढं कमी. आपण काही डॉक्युमेंट्री बघायला थेटरमध्ये नाही जात. एन्जॉय करायला जायचं.
(पण प्रेम अगन? Urgghh!)

रावसाहेब चिंगभूतकर's picture

13 Dec 2021 - 12:01 am | रावसाहेब चिंगभूतकर

एका पात्राच्या तोंडातून शब्द घरंगळायचे बंद झाले की लगेच पुढचे पात्र घडाघडा शब्द ओकून मोकळे होते..!
त्या ओकण्यामध्येही एक घाई आहे. एक धडपड आहे.
एक नवखा बथ्थडपणा आहे..भकासपणा आहे.. रंग-उडालेपणा आहे.
म्हणजे डायलॉग आठवून आठवून म्हणणे हा एक
भाग झाला..‌ पण सोबतच ह्यात एक दुर्मिळ प्रकारचे कुंथणेही आहे..!! सूरज-सपना आणि विशालभैय्या ह्यांच्या संवादफेकीत तर कुंथण्याची अक्षरशः चढाओढच आहे.

अशक्य हसलोय पूर्ण लेख वाचून. धन्यवाद.

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Dec 2021 - 9:55 am | ज्ञानोबाचे पैजार

आणि त्याची चिरफाडही अशक्य आहे.

रेडिओ वर याची जाहिरात नेहमी असायची ती ऐकून मला याचे नाव "प्रेम अ गन" असे आहे असे बरेच दिवस वाटायचे.

पैजारबुवा,

चलत मुसाफिर's picture

19 Dec 2021 - 8:16 pm | चलत मुसाफिर

या सिनेमाचे बरेच शुटिंग पुण्याच्या एनडीएमधे झाले होते. सुदान ब्लॉकची भव्य इमारत सहज ओळखू येते (पण सिनेमात हे उडाणटप्पू मुलामुलींचे कॉलेज असे दाखवले आहे)