उपनिषदे (१)

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
13 May 2016 - 12:43 pm

===================================================================

उपनिषदे :
(१)... (२)... (३)... (४)... (५)... (६)... (७) उपनिषदांनी आम्हाला काय दिले ?... (८) ईशावास्योपनिषद...
(९) केनोपनिषद... (१०) अविद्या... (११) मुंडकोपनिषद... (१२) प्रश्नोपनिषद-१... (१३) प्रश्नोपनिषद-२...
(१४) कठोपनिषद-१... (१५) कठोपनिषद-२... (१६) ऊर्ध्वमूलमध:शाखमश्वत्थं...

===================================================================

उपनिषदे (१)
आपण दर्शनांवरील अनेक लेख वाचले आणि अनपेक्षित वाचकसंख्या व आपण दिलेल्या प्रतिसादांवरून मी तर अचंबितच झालो होतो. या तत्वज्ञानावरील लेखांना इतका वाचकवर्ग मिपासारख्या सदातरुण संस्थेत असेल असे कधी वाटलेच नव्हते. जर दर्शनांना वाचकवर्ग असेल तर त्यांची गंगोत्री असलेल्या "उपनिषदां चीही ओळख कां करून देऊ नये असे बरेच दिवस मनांत घोळत होते. पण हे शिवधनुष्य पेलणे सोपे नाही हे माहीत असल्याने थोडा नव्हे बराच साशंक होतो. शेवटी विचार केला, आपले मित्रच आहेत, माऊलींच्या शब्दात बोलावयाचे तर ही "बालमतीची चावटी "मानून गोड करून घेतील. असो सुरवात तर करू.

प्रास्ताविक

उपनिषद याचा अर्थ "जवळ बसणे". शिष्याने गुरूच्या पायापाशी श्रद्धेने बसून ज्ञान ग्रहण करणे म्हणजे उपनिषद. कशी सुरवात झाली याला ?
वेद वाङ्मयाचे चार भाग. संहिता, ब्राह्मण, उपनिषद आणि आरण्यक. "संहिता" मध्ये देवतांची स्तुती करणारे मंत्र असून "ब्राह्मण" वैदिक मंत्रांचा यज्ञात उपयोग कसा करावयाचा हे सांगतात. "आरण्यक" ग्रंथांत कर्म आणि उपासना यांची सांगड कशी घालावी हे सांगितले आहे. "उपनिषदे सृष्टीच्या मूलतत्वांसंबंधी शोध घेतात.

लेखन तीन विभागांत देणार आहे. (१) बहिरंग, (२) अंतरंग आणि (३) काही निवडक उपनिषदांची तोंडओळख

बहिरंग,
हा भाग तसा निरसच. पण ही माहिती डोळ्याखालून गेलेली बरी. अंतरंगाची व एकेका उपनिषदाची ओळख करून घेतांना या माहितीचा उपयोग होईल. .

इथे उपनिषदांचा काळ, संख्या, महत्वाची आणि कमी महत्वाची कोणकोणती, कोणत्या वेदाशी संबंधित आहेत, प्रणेते ऋषी कोण इ. माहिती प्रथम बघू. रचनेची पूर्वमर्यादा इ.स.पूर्व १२००. अल्लोपनिषद किंवा विक्टोरियोपनिषद अर्थात इ.स.एकोणविसाव्या शतकातील.. ही फालतूक सोडून देऊन फक्त तत्वज्ञान सांगणारी घेतली तर उत्तरमर्यादा इ.स.पूर्व ६००. विविध देवतांच्या उपासनेकरिता लिहलेल्या "अथर्वशीर्ष"आणि "तापिनी" ग्रंथांनाही उपनिषदे म्हणावयाची पद्धत आहे. ती येथे विचारात घेतली नाहीत. वेदांत गर्भस्त्रावणी व सपत्नीनाशन असली अभिचारक उपनिषदेही आहेत. सोडून देऊं श्रीसूक्त व श्री भगवद्गीता यांनाही उपनिषदच म्हणतात पण त्यांचाही विचार नको. तेव्हा काळ इ.स.पूर्व १२०० ते इ.स.पूर्व ६००.

वेदांत देवताप्रार्थना आहेत तर उपनिषदात देवता प्रसन्न करून घेऊन स्वर्गभोग मिळवण्याऐवजी अंतीम सत्य, त्याला आत्मज्ञान म्हणा किंवा ब्रह्मज्ञान म्हणा, ते शोधण्याचा प्रयत्न केला आहे. क्षणभंगूर सौख्यापेक्षा शास्वत अमृतत्व शोधण्याचा हा प्रयत्न आहे. वनवासातील एकांतात चिंतन करून ऋषींना जे भावले ते उपनिषदांत त्यांनी मांडले. त्यामुळे उपनिषदांमध्ये एकवाक्यता नाही. अंतिम ध्येय एक असले तरी तेथे पोचण्याच्या वाटा निरनिराळ्या. सर्व दर्शनांची गंगोत्री असलेल्या उपनिषदांमधील या विचारवैविध्यामुळे एकच अंतिम साध्य असलेल्या दर्शनांतही विविधता आली. वैदिक तत्वज्ञानाचे परिणत स्वरूप उपनिषत्साहित्यात आढळत असल्याने उपनिषदे वेदांशी जोडली गेली आहेत. वेद, ब्राह्मणे किंवा आरण्यक ग्रंथातून ही उपनिष्दे घेतली

संख्या

: ही उपनिषदे आहेत तरी किती ? खरे म्हणजे अगणित. अशा अर्थाने की उपनिषद कशास म्हणावयाचे हे जर ठरत नसेल तर संख्या कशी ठरवणार ? मुक्तिकोपनिषदात यांची संख्या १०८ दिली आहे तर अड्यार ग्रंथसंग्रहालयामते १७९. श्री साधले १९४१ साली देतात २३९. जाऊ दे. आपण प्रमुख उपनिषदे म्हणून पुढील तेरा विचारात घेऊ. ईश, केन, कंठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, तैत्तिरीय, ऐतरेय, छांदोग्य, बृहदारण्यक,श्वेताश्वतर, कौपितकी आणि मैत्रायणि. हीच कां ? यांच्यावर जास्त टीका लिहल्या गेल्या आहेत, यांच्यातील उद्धरणे इतर ग्रंथांत येतात आणि महत्वाचे हे की यांत तत्वज्ञान म्हणजेच आत्मज्ञान म्हणजेच ब्रह्मविद्या यांचा विचार केला गेला आहे. "तत् त्वं असि" किवा "प्रज्ञानं ब्रह्म" अशी महावाक्ये (तत्वज्ञानाचा पाया) ज्यात आहे तेवढी बघावित, खरे कीं नाही?

. उपनिषदे, वेदशाखा, मूळ ग्रंथ व प्रणेते ऋषी यांची सारिणी पुढे दिली आहे.
उपनिषद नाव वेदशाखा प्र्णेते ऋषी
१. ईशावास्य शुक्ल याज्ञवल्क्य
२. केन सामवेद तलवकार
३. कठ कृष्ण यजुर्वेद कठ
४. प्रश्न अथर्ववेद पिप्पलाद
५. मुंडक अथर्ववेद शौनक महाशाल
६. मांडुक्य अथर्ववेद मांडुक्य
७. तैत्तिरीय कृष्ण यजुर्वेद तित्तिरि
८. ऐतरेय ऋग्वेद महीदास ऐतरेय
९. छांदोग्य सामवेद उद्दालक आरुणि
१०. बृहदारण्यक शुक्ल यजुर्वेद याज्ञवल्क्य
११. श्वेताश्वर कृष्ण यजुर्वेद श्वेताश्वतर
१२. कौषीतकि ऋग्वेद शांख्यायन कौषीतकि
१३. मैत्रायणि सामवेद मैत्री

सारिणीवरून लक्षात येईल की वेद व संबंधित उपनिषदे पुढीलप्रमाणे
कृष्ण यजुर्वेद .....कठ, तैत्तिरिय, श्वेतश्वतर,
शुक्ल यजुर्वेद .....ईशावास्य, बृहदारण्यक,
ऋग्वेद ..............ऐतरेय, कौषितकि,
अथर्ववेद ........ ..प्रश्न, मुंडक, मांडुक्य
सामवेदे ......... .केन, छांदोग्य, मैत्र्रायणी
ईशावास्य हे एकमेव वैदिक संहितेतून घेतले असून बाकीची आरण्यक, ब्राह्मण यांच्यातून घेतली आहेत.

प्रणेते ऋषी
याज्ञवल्क्य, उद्दालक आरुणि, कौपितकि, पिप्पलाद, महिदास ऐतरेय, मैत्री हे प्रमुख प्रणेते ऋषी दिसतात. त्यातही याज्ञवल्क्य हे प्रमुख, श्रेष्ट म्हणावयास हरकत नाही.. जनकाच्या दरबारात गार्गीने सर्वांना संगितले की "यांपुढे तुमचे काही चाणार नाही; नमस्कार करून शरण जा" यांच्याबद्दल माहिती पुढे येणार आहेच.

रचना काल
ही तेरा उपनिषदे इ.स.पूर्व १२०० ते इ.स.पूर्व ६०० या काळात लिहली गेली असली तरी त्यांच्या रचनेचे पाच कालखंड मानले आहेत. कालखंड पुढील प्रमाणे

कालखंड उपनिषदे
प्रथम बृहदारण्यक, छांदोग्य,
द्वितीय ईश, केन,
तृतीय ऐतरेय, तैत्तिरीय, कौषीतकि,
चतुर्थ कठ, मुंडक, श्वेताश्वतर,
पंचम प्रश्न, मैत्री, मांडुक्य.

भाषा
शिष्याने गुरूच्या पायाशी बसून ज्ञान मिळवावयाचे होते. त्यामुळे गुरूकुलात गुरुजीनी सांगावयाचे व विद्यार्थ्यांनी ऐकावयाचे ही झाली सामान्य पद्धत. पण उपनिषदांमध्ये जरा निराळी पद्धत वापरली आहे. येथे शिष्याने प्रश्न विचारावयाचे व गुरुजींनी उत्तर द्यावयाचे ही पद्धत उपयोजिली आहे. प्रश्नोपनिषदांत तर सहा आचार्य, हो, आचार्य, नुकत्रेच मुंज झालेले बटू नव्हेत, विद्वान आचार्य, आपल्याला न सुटलेले प्रश्न घेऊन उत्तर मिळव्ण्यासाठी, भगवान पिप्पलादांकडे हातात समिधा घेऊन नम्रतेने आले. पिप्पलादांनी त्यांना एक वर्ष आपल्या आश्रमात ठेऊन घेत्रले व मगच त्यांना प्रश्न विचारावयाची परवानगी दिली व प्रश्नांची उत्तरे दिली. ही लोकसभेतील निरर्थक प्रश्नोत्तरे नव्हेत. उत्तर मिळवावयाचे तर कष्ट भोगण्याची तयारी होती. इतर काही ठिकाणी प्रश्न गृहित धरून उत्तरे दिली आहेत.
उपनिषदे म्हणजे गुरू-शिष्यांमधील संवाद झाले आहेत. प्रवचनामध्ये एकच विषय निरनिराळे दृष्टा, उदाहरणे देऊन समजावून दिला जातो, तसे उपनिषदे आपला प्रतिपाद्य विषय नानाविध उदाहरणे देऊन समजावून सांगतो. उत्तर देतांना शिष्यांचा अधिकार लक्षात घेतला जातो. एखादा सिद्धांत ग्रथांत ज्या प्रमाणे वादविवदात्मक तत्वचर्चेच्या रुपात मांडला जातो तसा उपनिषदांमध्ये आढळून ये नाही.(अपवाद फक्त बृहदारण्यकोपनिषदाचा} प्रासादिक, छोटीछोटी वाक्ये जास्त. बर्‍याचवेळी क्रियापदे गाळलेली.,भाषा ग्रांथिक स्वरूपाची नव्हे त्रर बोलीभाषेला जवळची. पूर्वकालीन प्रमाणग्रंथातील (उदा. ऋग्वेद) उदाहरणे उपनिषदांत दिली जातात. नवीन विषय अथवा प्रकरण सुरू झाले आहे हे सांगण्याकरिता शीर्षके दिली जातात भाषा ग्रांथिक स्वरूपाची नव्हे तर बोलीभाषेला जवळची.

ब्रह्मसुत्रे
व्यासकृत ब्रह्मसूत्रे ही उपनिषदातील शब्दांचे अर्थ सुस्पष्ट करण्याकरिता लिहली आहेत. पण गंमत म्हणजे ब्रह्मसूत्रांचा अर्थ सांगण्याकरिता पुढे अनेक पंडितानी ग्रंथ लिहले. उपनिषदांवर अनेक विद्वानांनी भाष्यग्रंथ लिहले आहेत. अर्थात प्रमुख म्हणजे आद्य शंकराचार्य..

बहिरंगाबद्दल एवढे पुरे. पुढील भागात अंतरंग म्हणजे उपनिषदांचा प्रतिपाद्य विषय या बद्दल माहिती घेऊं.

शरद

.
.

संस्कृतीमाहिती

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

13 May 2016 - 1:31 pm | प्रचेतस

उत्तम माहिती.
वेदांचं सार असल्यानेच ह्यांना वेदांत असंही म्हणतात. श्रुतींचा समुच्चय असणार्‍या ह्या उपनिषदांच्या अंतरंगाबद्दलच्या भागाची प्रतिक्षा करत आहेच.

विटेकर's picture

13 May 2016 - 1:51 pm | विटेकर

येऊ दे, वाट पहात आहे

विटेकर's picture

13 May 2016 - 1:51 pm | विटेकर

येऊ दे, वाट पहात आहे

विटेकर's picture

13 May 2016 - 1:53 pm | विटेकर

येऊ दे, वाट पहात आहे

अन्या दातार's picture

13 May 2016 - 2:06 pm | अन्या दातार

वाट बघतोय

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 May 2016 - 2:25 pm | ज्ञानोबाचे पैजार

प्रत्येक उपनिषदाचा अवाका प्रचंड आहे. त्यामुळे प्रत्येक उपनिषदा करता एक किंवा एकापेक्षा जास्त लेख झाले तरी चालतील.

असे हे लेख म्हणजे माझ्या सारख्या नर्मदेतल्या गोट्यासाठी एक पर्वणीच असेल.

पैजारबुवा,

हो बरोबर आहे. आंघोळ करायला मिळने हे देखील भाग्यच.

पथिक's picture

13 May 2016 - 2:32 pm | पथिक

उत्तम माहिती

उपनिषदे हा एकूणच भारतीय तत्त्वज्ञानाची आवड असल्यामुळे मला रस असलेला विषय आहे. यावर अधिक वाचायला आवडेल.

यशोधरा's picture

13 May 2016 - 4:02 pm | यशोधरा

नियमित वाचणार. उत्तम लेखमालिका होईल असे वाटत आहे.