✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

केनोपनिषद

श
शरद यांनी
Mon, 07/04/2016 - 16:20  ·  लेख
लेख
=================================================================== उपनिषदे : (१)... (२)... (३)... (४)... (५)... (६)... (७) उपनिषदांनी आम्हाला काय दिले ?... (८) ईशावास्योपनिषद... (९) केनोपनिषद... (१०) अविद्या... (११) मुंडकोपनिषद... (१२) प्रश्नोपनिषद-१... (१३) प्रश्नोपनिषद-२... (१४) कठोपनिषद-१... (१५) कठोपनिषद-२... (१६) ऊर्ध्वमूलमध:शाखमश्वत्थं... =================================================================== केनोपनिषद केनोपनिषद हे दशोपनिषदापैकी द्वितीय असून आद्य शंकराचार्यांनी त्यावर भाष्य लिहले आहे. प्रणेते ऋषींचे नाव माहीत नाही. हे सामवेदाच्या तलवकार शाखेचे उपनिषद असून या शाखेचा एकमेव उपलब्ध ग्रंथ आहे हा तलवकार ब्राह्मणाचा नववा अध्याय आहे. याला ब्राह्मोपनिषद असेही नाव आहे. पहिल्या मंत्राची सुरवात "केनेचितम् पतति" अशी असल्याने याचे "केनोपनिषद" असे पडले. एकूण ३५ मंत्र असून चार खंडात विभाजन केले आहे. क्रमवारीने ९, ५, १२ व ९ मंत्र असून पहिले दोन खंड पद्यमय आणि शेवटचे दोन गद्यमय आहेत. पहिल्या दोन खंडात शिष्य गुरूंना प्रश्न विचारतो व गुरू त्याला उत्तर देतात.. उपनिषदातील महत्वाच्या तत्वज्ञानाचा भाग इथे आहे. तिसर्‍या व चौथ्या खंडात ब्रह्माचे महत्व विशद करणारी एक गोष्ट आहे. ब्रह्मापुढे देवता कशा निष्प्रभ होतात ते कथेत वर्णन केले आहे. प्रथम खंड सुंदर स्त्री दिसली की डोळे तिकडे वळतात. गोड गाण्याकडे कान आकर्षतात. राग-लोभादि वेळी वाणी प्रगट होते. हे तर सर्वांना कळते. पण हे कृत्य इंद्रिये करतात का ? तसे दिसत नाही. आपण "काणाडोळा" केला म्हणतो तेव्हा हीच इंद्रिये तिकडे दुर्लक्ष करतात. ही मनाची करणी म्हटले तरी मन एकदा असे व एकादा तसे का करते याचे उत्तर मिळत नाही. शेवटी एक प्रश्न अनुत्तरित राहतो. या मनाला, या इंद्रियांना, ही प्रेरणा कोण देतो ? हाच प्रश्न शिष्य आचार्यांना विचारतो. ॐ केनेचितं पतति प्रेषितं मन: ! केन प्राण: प्रथम:प्रैति युक्त: ! केनेषितां वाचमिमां वदंति ! चक्षु: श्रोत्रं क उ देवो युनक्ति !! !! 1 !! हे मन कोणापासून प्रेरणा घेऊन, कामनायुक्त होऊन आपल्या विषयामागे जाते ? कोणाकडून चालना घेऊन प्रथम प्राणाचे स्पंदन होते ? वाणी कोणाच्या सत्तेने बोलते ? कोणता देव डोळ्यांना व कानांना प्रेरणा देतो ? लक्षात घ्या, शिष्याला या देहाबाहेरची कोणी तरी शक्ती हे काम करत असावी अशी अंधुक कल्पना आहे. आत्मा-ब्रह्म इत्यादीची फार माहिती नाही म्हणून कोणीतरी "देवता" ही प्रेरणा देत असावी असे त्याला वाटते. आचार्य त्याला उत्तर देतात. श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनो यद्वाचो ह वाचं स उ प्राणस्य प्राण: ! चक्षुषश्चक्षुरतिमुच्य धीरा: प्रेत्यास्माल्लोकादमृता भवन्ति !! !! 2 !! जो कानाचा कान, मनाचे मन, वाणीची वाणी आहे तोच प्राणाचा प्राण व डोळ्याचाही डोळा आहे.(असे जाणून )धैर्यवान पुरुष संसारापासून सुटून हा लोक पार करून अमर होतात कानाचा कान असलेले, मनाचे मन असलेले, चैतन्य हेच प्राणाचा प्राण आहे., हा अंतस्थ आत्माच कानाच्या पाळीला, कानाच्या भोकाला ऐकण्याची शक्ती देतो. हे चैतन्य, हा आत्मा एकदा जाणला की इंद्रियांची, देहाची आसक्ति सोडून , "मी म्हणजे हा देह," हा भास सोडून, धैर्यवान माणसे संसारापासून सुटून, जन्म-मरणाचा फेरा नसल्याने अमर होतात. न तत्र चक्षुर्गच्छति, न वाक् गच्छति, नो मन:! न विद्मो न विजानिमो, यथैतदनुशिष्यात् !! !! 3 !! अन्यदेव तद् विदितदथो अविदितादधि ! इति शुश्रुम पूर्वेषां ये नस्तद् व्याचचक्षिरे !! !! 4 !! ( जेथे आत्मा प्रवेश करतो, त्या ब्रह्मात)) तेथे नेत्र पोहोचत नाही, वाणीचा शिरकाव होत नाही, मन जात नाही, त्यामुळे कशा प्रकारे शिष्याला त्याचा उपदेश करावा ते आम्हाला समजत नाही. ते आमच्या लक्षात येत नाही. ते माहीत असल्यापेक्षा वेगळे व अज्ञाताहून पलिकडे आहे; असे आम्ही पूरातन पुरुषांकडून ऐकले आहे. त्यांनीच ते आम्हास समजावले होते.. जेथे वाणी पोचतच नाही, त्या ब्रह्माविषयी शिष्याला वाणीने माहिती देणार तरी कशी हा आचार्यांचा प्र्श्न आहे. ते ज्ञात-अज्ञात या दोहोंपलिकडचे आहे. आचार्यांच्या आधीच्या ज्ञानी लोकांनाही तोच अनुभव होता व तसेच त्यांनी संगितले होते. एकोणिसाव्या शतकात रामकृष्णांवरही हाच प्रसंग ओढवला होता. त्यांना एकाने "समाधी" बद्दल विचारल्यावर ते म्हणाले " अरे, मलाही सांगावयाचे आहे, पण काय करू, शब्दच फुटत नाहीत." या क्षेत्रातील व्यक्तींचा हा कालाबाधित अनुभव दिसतो. यद् वाचाsभ्युदितं येच वागभ्युद्यते ! तदेव ब्रह्म त्वं विद्धि, नेदं यदिदमुपासते !! !! 5 !! जे वाणीने प्रकाशित होत नाही परंतु वाणी ज्याने प्रकाशित होते त्यालाच तू ब्रह्म (असे) जाण. ज्या (यज्ञदेवता व उपासना देवतां )ची लोक उपासना करितात त्या ते ब्रह्म नाही. वाणीला चेतना देणारे ब्रह्म वाणीने प्रकाशित होणार नाही, त्याचे वर्णन वाणी करू शकणार नाही हे कळण्यासारखे आहे. जे वाणीला प्रेरणा देते ते ब्रह्म. हे सांगतांना आचार्यांना शिष्याच्या पहिल्या प्रश्नातील देवतांबद्दलचा संदेहही निपटून टाकावयाचा आहे. ते म्हणतात. उपासनादेवता या ब्रह्म नव्हेत. यन्मनसा न मनुते येनाहुर्मनो मतं ! तदेव ब्रह्म त्वं विद्धि, नेदं यदिदमुपासते !! !! 6 !! यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षूंषि पश्यति ! तदेव ब्रह्म त्वं विद्धि, नेदं यदिदमुपासते !! !! 7 !! यच्छोत्रेण न शृणोति, येन श्रोत्रमिदं श्रुतम् ! तदेव ब्रह्म त्वं विद्धि, नेदं यदिदमुपासते !! !! 8 !! यत्प्राणेन न प्र्रणिति, यन प्राण: प्रणीयते ! तदेव ब्रह्म त्वं विद्धि, नेदं यदिदमुपासते !! !! 9 !! ज्याचे मनाने मनन करिता येत नाही पण ज्याचेमुळे मनाकडून मनन घडते असे म्हणतात, जे डोळ्याने पहाता येत नाही पण ज्याचेमुळे डोळे पाहू शकतात, जे कानाने ऐकता येत नाही पण ज्याचेमुळे कान ऐकू शकतात, जे श्वासोच्छ्वास करत नाही पण ज्यामुळे प्राण श्वासोच्छ्वास करतो, ते ब्रह्म होय. ज्याची लोक उपासना करतात, ते नव्हे उपास्य देवता या ब्रह्म नव्हेत हे शिष्यावर खोलवर ठसवावयाचे आहे. शिष्याच्या प्रश्नातील डोळे. कान. वाणी , प्राण व मन या सर्वांबद्दल ते परत परत तेच ते सांगतात. हे पुन्हापुन्हा सांगण्याचे कारण सामान्य लोकांवर ह्या देवतांच्या सामर्थ्याबद्दल फार प्रभाव होता. काही पाहिजे असेल तर ते प्रार्थना करून ह्या देवतांकडून मिळेल यावर लोकांचा धृढ विश्वास होता. खोडून काढण्य़ासाठी पुनरावृत्ती. द्वितीय खंड यदि मन्यसे सुवेदेति दहरमेवापि, नूनं त्वं वेत्थ ब्रह्मणो रूपम् ! यदवस्य त्वं वदस्य देवेषु, अत नु मीमांस्यमेव ते मन्ये विदितम् !! !!१!! जर तुला "मी ब्रह्म चांगल्या रीतीने जाणतो " असे वाटत असेल तर,तू थोडेच जाणले आहेस, त्याचे जे रूप तू जांणतोस(आध्यात्मिक) व जे रूप देवतांना ठाऊक आहे (अधिदैविक) तेही अल्पच आहे. म्हणून तू ब्रह्मस्वरूपाचा अधिक विचार केला पाहिजेस. नाहं मन्ये सुवेदिति, नो न वेदेतिवेद च ! यो नस्तद् वेद तद् वेद, नो न वेदेति वेद च !! !!२!! जर ते झाल्याची खात्री वाटत नसेल, तर तुला ज्ञान झालेच असे समज. कारण ते ज्ञान झाले असे म्हणण्याच्या पलिकडे आहे. ब्रह्माबद्दल विचार करताना, त्या बद्दल ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतांना एक मोठा धोका मुमुक्षुच्या मार्गात असतो. आचार्यांनी सांगितलेले मला समजले म्हणजे मला ब्रह्माचे ज्ञान झालेच अशी समजुत होणे सहज शक्य असते. आचार्य धोक्याच्चा कंदील दाखवतात. तुला कळले असे वाटत असेल तर तुला कळलेलेच नाही. पण अभ्यास करत राहिलास, परत परत करत राहिलास तर तुला वाटेल की आपल्याला ज्ञान झालेले नाही. त्या वेळीच तुला खरे ज्ञान झालेले असेल. ज्ञान होण्याच्य पलिकडे असलेले तेच तुला ज्ञान देईल. यस्यामतं तस्य् मतं, मतं यस्य न वेदेअ स: ! अविज्ञातं विज्ञानतां, विज्ञातमविज्ञाताम् !! !!३!! ज्या ज्ञात्याला ज्ञान झाले नाही असे वाटते, त्याला ज्ञान झाले असे मानावे. आणि ज्याला ज्ञान प्राप्त झाले असे वाटते, त्याला ज्ञान प्राप्त झाले नाही, असे मानावे. प्रतिबोधविदितं मतममृतत्वे हि विन्दते ! आत्मना विन्दते वीर्यं, विद्यया विन्दतेsमृतम् !! !!४!! संशयरहित ज्ञान ते ज्ञान होय. त्या ज्ञानाने मोक्ष मिळतो. ज्ञानामुळे सामर्थ्य प्राप्त होते व साक्षात्काराने मोक्ष मिळतो. तृतीय खंड आणि चतुर्थ खंड तिसर्‍या खंडात ब्रह्माचे महत्व सांगणारी एक कथा आहे. देव-असूर युद्धात देवांचा विजय झाल्यावर देवांना वाटले की हा आपला पराक्रम आहे. तेव्हा आकाशात एक यक्ष (ब्रह्म) प्रगट झाले,. देवांना ते कोण आहे ते कळले नाही.म्हणून त्यांनी अग्नीला त्याच्याकडे चौकशीला पाठवले अग्नीने त्याला "तू कोण ?". असा प्रश्न केला यक्षाने विचारले म्हणून त्याने आपली ओळख जातवेदस अशी करून दिली. यक्षाने त्याला विचारले "तुझे वीर्य काय? तेव्हा अग्नी म्हणाला "मी हे सर्व जग जाळून टाकू शकतो." यक्षाने त्याच्या समोर एक गवताची काडी टाकली व म्हणाले "जाळ हीला". प्रयत्न करूनही अग्नीला ती काडी जाळता आली नाही. पराजित अग्नी माघारी आल्यावर इन्द्राने वायूला पाठविले. वायूने फुशारकी मारली की "मी जगालासुद्धा उडवून टाकेन " पण यक्षाने समोर टाकलेली गवताची काडी तो हलवूही शकला नाही. तो परत आल्यावर स्वत: इन्द्र यक्षाकडे गेला. पण त्याच्याशी एक शब्दही न बोलता यक्ष गुप्त झाले. नंतर आकाशात हैमवति उमा प्रगट झली. देवांनी विचारले "गुप्त झालेले हे कोण होते ?" उमाने सांगितले ते ब्रह्म होते व त्याच्यामुळे तुम्हाला विजय मिळाला, माहत्म्य प्राप्त झाले आहे. उमेच्या सांगण्यावरून या तिघांना ब्रह्माची ओळख झाली व ते इतर देवांहून श्रेष्ठ झाले. विजेप्रमाणे ब्रह्म एकदा प्रगट झाले व लगेच गुप्त झाले. हा अधिदैवत पक्ष आहे. नंतर अध्यात्म पक्ष सांगितला जातो. मन ब्रह्म जाणते. पुन;पुन्हा त्याचे स्मरण करते. हा अध्यात्म पक्ष आहे. (४. ५.) (थोडे विषयांतर. नेहमी शांतिमंत्रात तीनदा शान्ति: शान्ति: शान्ति:अशी म्हटले जाते . का ? त्रिविध तापांची शान्ति करावयाची असते: ही तीन तापे म्हणजे आधिदैविक ताप, आधिभौतिक ताप व आध्यात्मिक ताप. यांची लक्षणे देवांपासून आधिदैविक ! .मानसताप आध्यात्मिक ! भूतांपासून तो भौतिक ! या नाव देख त्रिविध ताप ! एकनाथी भागवत. वा आपुलीच क्रिया आपणा बाधक ! आध्यात्मिक ताप तो ! पीडा जे भूतांपासून ! तो आधिभौतिक ताप जाण ! जितकी पीडा देवापासून ! आधिदैविक ताप तो.! वेदांतसूर्य (श्रीधर) या तापत्रयीपासून सुटका व्हावी म्हणून शान्ति: शान्ति: शान्ति: असे म्हणावयाचे ) क्षणिक सहवासाने देवतांना ऊमेच्या मार्गदर्शनामुळे ब्रह्माची माहिती मिळाली हा झाला देवांचा "अधिदैवत" पक्ष. माणसांनी परत परत स्मरण करून ब्रह्म जाणावे. हा झाला माणसाचा "अध्यात्म" पक्ष. देवांना ऊमेचे मार्गदर्शन लाभले, मानवाने आचार्याकडून मिळवावे. देवतांना मिळते ते मर्त्य मानवालाही मिळू शकते, किती आश्वासक गोष्ट ! तस्यै तपो दम: कर्मेति प्रतिष्ठा ! वेदा: सर्वांगानि सत्यमायतनम् !!८!! या उपनिषदाकरिता "तप","दम", "कर्म" ही पाया होत."वेद-वेदांगे" व "सत्य"हे त्या ब्रह्मविद्येचे स्थान होय. यो व एतामेवं वेद ! अपहत्य पाप्माननन्तेस्वर्गे लोके ज्येये प्रतितिष्ठति प्रतितिष्ठति !!९!! जो हे केन उपनिषद आणि ब्रह्मविद्या जाणतो, त्याचे पाप दूर होते, तसेच तो स्वर्गात अनंतकाल सुखात राहतो तत्वज्ञानाचे सार (१) जगाचे आद्य मूळ आत्मा आहे. (२) जो स्वत:ला ज्ञान झाले आहे असे समजतो, तो ज्ञान न झालेला असतो. (३) निसर्गातील प्रत्येक घटनेमागे आणि मानवी हालचालीमागे ब्रह्माची शक्ती असते. (४) हे सत्य जाणणे म्हणजे अमृतत्व मिळवणे होय. शरद

Book traversal links for केनोपनिषद

  • ‹ ईशावास्योपनिषद
  • Up
  • अविद्या ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
4406 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

सुंदर लिहिलंय. __/\__

धनंजय माने
Mon, 07/04/2016 - 16:44 नवीन
सुंदर लिहिलंय. __/\__
  • Log in or register to post comments

हा भागही आवडला.

प्रचेतस
Mon, 07/04/2016 - 17:46 नवीन
हा भागही आवडला. उपनिषदकारांना येथे ब्रह्म म्हणजे येथे परब्रह्म की ब्रह्म ही याज्ञिय देवता अपेक्षित आहे? अर्थात ब्रह्मा म्हणजेच मूळ ब्रह्म तत्वाला आलेले वेदातील देवतेचे स्वरूपच.
  • Log in or register to post comments

यज्ञीय देवता

शरद
Tue, 07/05/2016 - 11:06 नवीन
यज्ञीय देवता म्हणजे वेदांतील देवता म्हटले तर वेदांत ब्रह्मा ही देवता नाही. उपनिषदांमध्ये मुंडकोपनिषदात "ब्रह्मा" किंवा ब्रह्मदेव याला विश्वकर्ता म्हटले आहे. त्याला अथर्वन नावाचा ज्येष्ठ पुत्रही आहे. "ब्रह्म" याला कोठेही पुत्र असल्याचे लिहलेले नाही. ब्रह्म कल्पनेतच ते शक्यही नाही. तेव्हा ’ब्रह्म आणि "ब्रह्मा/ब्रह्मदेव ’ यांचा एकमेकाशी संबंध दिसत नाही. यज्ञीय देवतात वेदांगे व पुराणे यातील देवताही स्विकारल्या तर त्यात ब्रह्मदेव येईल पण तरीही त्याचा व "ब्रह्म" चा संबंध नाही. शरद
  • Log in or register to post comments

Was this quest to understand

सतिश गावडे
Tue, 07/05/2016 - 11:41 नवीन
Was this quest to understand what today's psychology calls Consciousness?
  • Log in or register to post comments

Partially yes.

धनंजय माने
Tue, 07/05/2016 - 11:49 नवीन
Partially yes. 'एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति' असं वचन असलेलं ठाऊक असेलच. सत्, चित्, आनंद, परब्रह्म, ब्रह्म,परमात्मा आणि किती तरी नावं आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

वाह! क्या बात! सुंदर लेख.

आदूबाळ
Tue, 07/05/2016 - 18:45 नवीन
वाह! क्या बात! सुंदर लेख.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा