गोळाबेरीज या चित्रपटाबद्दल समजल्यापसूनच प्रचंड कुतुहल मनात होतं. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पु. लं. नी अक्षरश। (विसर्ग कसा लिहितात प्लीज सांगा कोणीतरी) जिवंत करून सोडलेल्या व्यक्ती आणी वल्ली कशा रेखाटल्या असतील? हे सर्व विविध पात्रे एका कथानकात कशी गुंफली असतील? मातब्बर कलालारांचे सैन्य आपल्या मनातल्या या व्यक्तिरेखांना कितपत न्याय देऊ शकतील? असे प्रचंड औत्सुक्य मनात घेऊनच सिनेमाग्रुहात पाय ठेवला.
संपूर्ण महाराष्ट्राला मुखोद्गत असलेले पु. लं. चे लिखाण पडद्यावर उतरवण्याचा प्रयत्न म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखेच. असो.
चित्रपटाची सुरुवात होते ती भाईंच्या बालपणाच्या काळात, हरीतात्यांच्या प्रवेशाने. हरीतात्या मुलांना इतिहासातल्या गोष्टी सांगण्यात मग्न असताना पुर्ष्याचे आई वडील सूत्रधारासारखे मागे बोलताना दिसतात. (ही बाई संपूर्ण वेळ कोकणी का बोलताना दाखवली आहे, हे कोडं अजून उमगलं नाही.)
कालानुरूप, पु.लं.(निखिल रत्नपारखी) कॉलेजमध्ये जातात, तिथे त्यांना भय्या नागपूरकर, नंदा प्रधान (सुबोध भावे), व नाथा कामतच्या व्यक्तिरेखेशी साधर्म्य असलेले दोन मित्र (पुष्कर श्रोत्री, प्रसाद ओक) आदि भेटतात. त्यांचे कॉलेजच्या काळातील प्रसंग अधिक खुलतील असे वाटत असतानाच, काळ अजून पुढे सरकतो. पु.लं आता एका कॉलेजात प्राध्यापक झालेले असतात. तिथे सुनिताबाई भेटणे, युगुलगीत (सुंदर चित्रिकरण, गाणं मात्र लक्षात न राहण्याजोगे.), विवाह वगैरे.
पुढे पु.लं चा चित्रपट स्रुष्टीतिल प्रवास, कोकणातल्या ट्रिप्स, बेळगावातील वास्तव्य, इत्यादि प्रसंगांतून नामू परीट (शरद पोंक्षे), नारायण(आनंद इंगळे) अन्तू बर्वा(दिलीप प्रभावळकर), रावसाहेब(क्षितिज झारापकर), पेस्तनकाका(सतीश शहा), घर बांधणारा कुलकर्ण्या (प्रशांत दामले), चितळे मास्तर (मोहन आगाशे), बबडू(संजय नार्वेकर) इत्यादि पात्रं येत राहतात.
स्वत। पु.लं (यावेळी मनोज जोशी) कथाकथनात आपली जीवनकथा प्रेक्षकांसमोर मांडत आहेत अश्या पध्दतीने कथा पुढे सरकत राहते.
काही दिग्गज अभिनेत्यांचा सुंदर अभिनय, व पात्रांना एका कथानकात गुंफण्याचे कौशल्य या चित्रपटाच्या दोन जमेच्या बाजू.
विशेष लक्षात राहतात ते मोहन आगाशे, सुबोध भावे, आणी संजय नार्वेकर. या तिघांच्या कास्टिंगबद्दल दिग्दर्शकाला (क्षितिज झारापकर) अगदी वरचा सा द्यायला हवा. विशेषत।, पु.लं च्या तोंडून हज्जारदा ऐकलेले चितळे मास्तर मनात कोरलेले असूनही मोहन आगाशे चांगलीच छाप पाडतात. नार्वेकर, ओक, भावेंना या बाबतीत अंमळ अॅडव्हांटेज आहे.
दिलीप प्रभावळकर पण ठीकठाक. प्रशांत दामले अगदीच पाट्या टाकल्यासारखे वावरतात. हरीतात्यांच्या भूमिकेतला अविनाश नार्वेकर मात्र कमालीचा डोक्यात जातो.
कथाविस्तारात जरी सर्व पात्रांना पूर्ण न्याय देणे शक्य नाही हे मान्य केले, तरी काही पात्रं (उदा. भया नागपूरकर, नाथा कामत, पेस्तनकाका) अगदीच उरकल्यासारखी वाटतात. लखू रिसबूड ला देखील कॉलेजाअत दाखवून धमाल करता आली असती.
या प्रकारच्या प्रयोगाला पार्श्वसंगीत उत्तम असणे देखील फार गरजेचे असते. ती बाजू मात्र लंगडी पडली आहे. "इंद्रायणी काठी" व शेवटी येणारे "नाच रे मोरा" ही गाणी मात्र उत्तम जमली आहेत. जयतीर्थ मेवुंडी व मधुरा दातार या गुणी गायकांनी ती गायलीयेत देखील उत्तमच. "इथेच टाका तंबू" या सुंदर गाण्याचे आयटम साँग करण्याची अवदसा दिग्दर्शकाला का सुचली असावी देव जाणे. विनाकारण चित्रपटात आयटम साँग घुसवण्याचे हे पाप अक्षम्यच.
तांत्रिक बाबींबद्दल बोलावेसे चित्रपटात विशेष नाही. काही क्लोज अप्स तर इतके अंगावर येतात, की विचारुन सोय नाही. सतीश शहांच्या खांद्यावर बसून आपण चित्रपट पाहतोय की काय असे वाटते. बाकी काही तुरळक त्रुटी अहेत (म्हातार्या भाईंचा वर्गमित्र बबडू तरणाबांड, वगैरे.)
पु.लं बद्दलचे प्रेम, व चित्रपटाबद्दल कुतुहल वगैरे म्हणून बरेच पु.लं. भक्त हा चित्रपट पाहतील हे नक्की, पण फारश्या अपेक्षा न घेऊन बघायला जाणे हेच उत्तम.
(अवांतर : मराठी लिखाणाची फारशी सवय नसूनही "राजहंसाचे चालणे..." या पु.लं च्या उपदेशास शिरसावंद्य मानून, नव्हे, जीवनविषयक सूत्र मानून, चित्रपट परिचयाचा हा लहानसा प्रयत्न. तेव्हा, शुध्दलेखन, अथवा व्याकरणाच्या चुका झाल्या असल्यास निदर्शनास आणून देणे, ही नम्र विनंती. बाकी मि. पा. वरील दिग्गज लिहितीलच.)
प्रतिक्रिया
11 Feb 2012 - 2:59 am | रामपुरी
विसर्ग लिहिताना ":" (कोलन) वापरा..
11 Feb 2012 - 10:02 am | श्रीरंग
अरे हो की.. शतशः धन्यवाद, रामपुरी! :)
11 Feb 2012 - 5:06 am | बहुगुणी
चित्रपटातील त्रुटी कळूनही तो पहावासा वाटतोय, कधी जमतं ते पाहू.
In the meanwhile, हा व्हिडिओ सापडला झारापकरांच्या मुलाखतीचा. त्यात त्यांनी मी 'एका लेखकाची गोष्ट'... 'आपल्या लाडक्या माणसाची गोष्ट' म्हणून मांडायचा प्रयत्न केला आहे, असं म्हंटलं आहे, आणि ती सांगतांना पुलंच्या आयुष्यातली खरी पात्रं आणि त्यांनी निर्माण केलेली काल्पनिक पात्रं या सर्वांचा वापर करून घेतला आहे, असं म्हंटलंय. त्यादृष्टीने विचार करता अशा सर्वगुणी आयुष्याचं सलग चित्र उभं करणं हे अवघडच काम आहे. त्यात झारापकरांना आणि त्यांच्या कलावंतांना बरंच यश मिळालेलं असावं असं तुमच्या परीक्षणावरून वाटतं.
11 Feb 2012 - 7:20 am | सन्जोप राव
मोजक्या शब्दांत घेतलेला या चित्रपटाचा मागोवा आवडला. हरीतात्यांच्या भूमिकेतला अविनाश नार्वेकर मात्र कमालीचा डोक्यात जातो. हे अगदीच पटण्यासारखे आहे.
मराठी लिखाणाची फारशी सवय नसूनही "राजहंसाचे चालणे..." या पु.लं च्या उपदेशास शिरसावंद्य मानून, नव्हे, जीवनविषयक सूत्र मानून, चित्रपट परिचयाचा हा लहानसा प्रयत्न.
प्रयत्न कौतुकास्पद आहे. लिखाणात नवखेपणा जाणवत नाही. स्वागत!
11 Feb 2012 - 9:30 am | प्रचेतस
परीक्षण आवडले.
11 Feb 2012 - 9:43 am | तर्री
पु.ल. वरच्या कलाक्रुतींची ऊंची नेहमीच खुजी असते हे माझे (स्पष्ट) मत आहे. मग ती नाटके असोत वा चित्रपठ.
पु.ल. हे कलेच्या दुनिये मधले चलनी नाणे आहे. काही कर्यक्रामांच्या जाहिरातीमधील "पु.ल." शी जोडलेला बादरायण संबंध पाहून कीव येते.
ह्या असल्या भाकड कथां पाहून स्वतःची "खिल्ली" ऊडवून घेण्यापेक्षा , घरातच हातात "गोळाबेरीज" घेवून पडावे.
"नस्ती ऊठाठेव" कशापायी करवी ?
11 Feb 2012 - 7:30 pm | अत्रुप्त आत्मा
@पु.ल. वरच्या कलाक्रुतींची ऊंची नेहमीच खुजी असते>>> येकदम करेक्ट
@पु.ल. हे कलेच्या दुनिये मधले चलनी नाणे आहे.>>> १००टक्के सहमत,हल्ली सुमार चित्रपट निर्मिती होत असल्यानी...सगळ्यांची पु.लं.वर धाड पडली आहे...(अजुन असले १/२चित्रपट येतायत म्हणे..)
@ह्या असल्या भाकड कथां पाहून स्वतःची "खिल्ली" ऊडवून घेण्यापेक्षा , घरातच हातात "गोळाबेरीज" घेवून पडावे.
"नस्ती ऊठाठेव" कशापायी करवी ?>>>परखड मतप्रदर्शनाबद्दल
11 Feb 2012 - 2:12 pm | वपाडाव
छान परिक्षण... चित्रपट पाहिला जाइल...
11 Feb 2012 - 3:42 pm | अत्रुप्त आत्मा
परिक्षण चांगले झाले आहे... चित्रपट पाहायचा की नाही..?याचा निर्णय घेता येण्याइतके चांगले
11 Feb 2012 - 4:26 pm | अमोल केळकर
नक्की बघणार सिनेमा :)
अमोल केळकर
11 Feb 2012 - 7:07 pm | पैसा
कारण पुलंचे आजी आजोबा (आईकडून) कारवारचे कोकणी होते.
11 Feb 2012 - 10:39 pm | श्रीरंग
मान्य. पण हरीतात्या, बबडू वगैरेंबरोबरचे तिचे संवाद मूळ लिखाणात मराठी असूनही, चित्रपटात ते संपूर्ण कोकणीत दाखवण्याचे प्रयोजन समजले नाही.
11 Feb 2012 - 10:10 pm | प्राजु
चित्रपट बघायची इच्छा आहे.. मात्र एक खरे की नाटके असोत वा चित्रपट ... पु ल ना त्यात बांधायला आणि सादर करायला कोणालाच जमलेले नाही.
किंवा आपण फारच अपेक्षा उंचावतो आहोत..
12 Feb 2012 - 11:44 am | बालगंधर्व
आत्ताच गोळाबेरिज या पिक्चरचे सकाळ आणी म.टा. मधले परीक्शण वच्ले. हा पिक्चर येवधा काही जमून आलेला नाही असे दोन्ही थिकाणी होते. नुस्ती मोथी स्तारकास्त आहे. परन्त्यु पाहिजे तेवधा क्सोप कुणालही दिला गेलेला नाही. प्रशन्त दमले नाही वाय घालव्ले अहे. प्रसद ओक आणि मुत्का बर्वे याचा एक शोत त्रेलर मध्ये पहिला होता. सी केपि, दीआर बी अश्या एकमेकानच्या जाती कुले ते एकमेकानना सानगत अहेत, असे त्यत दखवले होते.
पुल्न्च्या नातीने पन त्यात काम केले अहे. पन तिला अभिनय दखवयाइत्का फरसास्कोप नही.
निखिल रत्नपरखि म्हणजे तोच असवा जो एका एलसीदीच्य आदवरतीज मध्ये न्यायाधीशासमोर कोत्ला मैदानावर दहाव्यालाईनम्ध्ये बसलेल्या माणसाचे आणि त्याच्या कुर्ळ्या केसवाल्या गर्ल्फ्रेन्ड बद्दल माहिती देतो. आह्दि मला तो त्याच्य चोत्या चोत्या दोळ्यान्मुळे बेन्गोली वात्ला होता. पण त्यचा अभिनय चान्गला अहे असे पेपर्मध्ये वचले आहे.
13 Feb 2012 - 10:18 am | इरसाल
आत्ताच गोळाबेरिज या पिक्चरचे सकाळ आणी म.टा. मधले परीक्षण वाचले हा पिक्चर येवढा काही जमून आलेला नाही असे दोन्ही ठिकाणी होते. नुसती मोठी स्टारकास्ट आहे.परंतु पाहिजे तेवढा स्कोप कुणालाही दिला गेलेला नाही.प्रशांत दामलेंनाही वाया घालवले आहे प्रसाद ओक आणि मुक्ता बर्वे याचा एक शॉट ट्रेलरमध्ये पहिला होता. सीकेपि, दीआर बी?????? अश्या एकमेकांच्या जातीकुळे ते एकमेकांना सांगत आहेत , असे त्यात दाखवले होते.पुलंच्या नातीने पण त्यात काम केले आहे .पण तिला अभिनय दाखवण्याइतका फारसा स्कोप नाही.निखिल रत्नपारखी म्हणजे तोच असावा जो एका एलसीडीच्या एडवरटाइजमध्ये न्यायाधीशासमोर कोटला मैदानावर दहाव्या लाईनमध्ये बसलेल्या माणसाचे आणि त्याच्या कुरळ्या केसवाल्या गर्लफ्रेंड बद्दल माहिती देतो. आधी मला तो त्याच्या छोट्या छोट्या डोळ्यांमुळे बंगाली वाटला होता पण त्याचा अभिनय चांगला आहे असे पेपरमध्ये वाचले आहे.
13 Feb 2012 - 12:30 pm | बालगंधर्व
हो मी तुम्हाला धन्यवाद देतो कि तुम्ही चान्गल्या शब्दात माझ्या भावना व्यत्क केल्या. इरसार.
त्याच्प्रमाणे मीसौरभ, श्रीर्न्ग या ही मझ्या इतर मिपाबन्धवानी माझ्ह्या काही लेख्नचुका स्पश्तपणे सान्गितल्यात. मला थोडसा तन्कलेल्ख करायचा प्रोब्लेम येतोये. त्यमुळे काहे चुका होता अहेत.
तसेच मी सध्या पुण्यात असल्यने मला सगळ्या पुणेकराना एक विचारावेसे वाट्ते, कि आपण सगळे मिळुन गोळाबेरिज किनवा दुसर्या कुथल्यातरी मुव्ही ला बघायला एकत्र जयचे का> म्ह्णज अप्ल्या सगळ्यन्च्या ओळखी पण होउन आप्ले समबन्द प्रस्थापित होतील. किन्वा तसे होण्यची शक्यत तरे निर्मान होउ शकते.
13 Feb 2012 - 3:28 pm | मोदक
>>>म्ह्णज अप्ल्या सगळ्यन्च्या ओळखी पण होउन आप्ले समबन्द प्रस्थापित होतील.
याला मिपाच्या भाषेत कट्टा असे म्हणतात. ;-)
13 Feb 2012 - 10:26 am | सातबारा
मुत्का बर्वे , चोत्या चोत्या दोळ्या , तेवधा क्सोप इ.इ. ...
मोकळतायत दाही दिशा आता ...
अ़जुन गडी कसे आले नाहीत मैदानात ?
13 Feb 2012 - 10:41 am | मी-सौरभ
परीक्षण छान लिहीले आहेस :)
पु.ल. चा एक चाहता म्हणून हा चित्रपट जरुर पाहीन..
13 Feb 2012 - 11:00 am | मस्त कलंदर
सिनेमात एकंदरीत सगळ्याच गोष्टींची वाट लावली आहे. बालगंधर्व मध्ये स्लाईडशो होता असं म्हटलं तर गोळाबेरीज म्हणजे प्रत्येक व्यक्तीचित्र हे एका स्लाईडवरचं बुलेट पॉईंट आहे. पहिल्या अर्ध्या तासात बरेच जण हजेरी लावून जातात. त्यामुळॅ व्यक्तिरेखा फुलणं हा प्रकारच नाही. भय्या नागपूरकर आणि कुठल्याशा परांजपे साहेबाला एकेरी संबोधून 'डोन्ट वरी' म्हणणारा बापू अनुक्रमे चाळीस व तीस सेकंदात आणि पाच व चार वाक्यांत आटोपले. मग घेतलंच कशाला यांना इथे? सगळंच दाखवायला हवं हा अट्टहास का हा प्रश्न पुन्हा एकदा पडला. त्यातल्या त्यात नंदा, गटणे, चितळेमास्तर पुन्हा येऊन त्यांना अगदीच उडवलं नाही हे दाखवतात. पण इतर व्यक्तिरेखांच्या बाबतीत असं म्हणता येत नाही.
इथे तीन तीन पुलं का हाही एक प्रश्न आहेच. आदरांजली म्हणून मूळ पुलं नी असण्याशी मला हरकत नाही. मग निखिल रत्नपारखी आणि मनोज जोशी दोघे कशाला हवेत? एकानेच काम काम भागलं नसतं का? पुलंची आई अगदी सर्वसामान्याला न कळेल असलं कोंकणी बोलते. (माझ्या मते बरयतां हे गोवन कोंकणी आणि उलयतां हे कारवारी कोंकणी. या बाईंचं कारवारी कोंकणी डोक्यावरून जातं). तीच गोष्ट सुनिताबाई आणि पुलंच्या लग्नाची. तिथे पण तीन फोटो(तीन सेकंदां)त त्यांचे प्रेमप्रकरण आणि लग्न आटोपून नंतर लक्षात न राहिलसं पाच मिनिटांचं गाणं खर्ची घातलंय. (बहुधा 'आहे मनोहर तरी' मध्ये वाचल्याप्रमाणे दोघांची भेट कॉलेजात शिकवताना न होता संघाच्या हापिसात झाली होती, आणि बर्याच ठिकाणी वाचल्याप्रमाणे लग्न घरातल्याच साडीवर नोंदणी पद्धतीने झाले होते. ते इथे शालू नेसून विधीवत होते.)
पुलंची व्यक्तीचित्रे जशी अजरामर तशीच त्यांनी लिहिलेली वाक्यंही. या वाक्यांची तर चुकीच्या संवादफेकीने अक्षरशः वाट लावलीय. वानगीदाखल सांगायचं तर "रत्नांग्रीच्या समस्त म्हयशी तूर्तास गाभण काय रे झंप्या?" हे वाक्य प्रश्नार्थक न येता तारस्वरात विधानार्थी येतं, तसंच "इथं पण ऑटोमॅटिक होतं की कुंथायला लागतं?" या टंग इन चीक वाक्याची तर अगदी फेफे उडवलीय. पुलंनी लिहिलेली वाक्यं कुठं ना कुठं वापरायलाच हवीत या समजाने ती काही ठिकाणी घुसडल्यासारखी वाटतात. सिनेमातले पुलं स्वगत बोलताना चेहर्यावर सास बहू सिरियलमधल्या बायकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त हावभाव दाखवतात. या सगळ्या गोष्टींमुळे चित्रपटात नर्मविनोद आणि सटल्टी या दोन गोष्टी जाम हरवून गेल्या आहेत.
दिग्दर्शन कसं असावं याबद्दल जास्त काही बोलता येत नसलं तरी 'किमानपक्षी' कसं असावं हे ज्ञान सिनेमे बघून प्रेक्षकाला आलं असावं हे बहुधा झारापकराच्या गावी नसावं. आनंदवनातलं कथाकथन संपल्यावर बाबा आमटे पुलंना भेटायला येतात. प्रथम दिसतो तो त्यांचा कटिप्रदेश(!) आणि मग कॅमेरा वर जाऊन चेहर्यावरती स्थिरावण्याऐवजी तो पाठी जाऊन होऊन आमटे उर्ध्व-अधर दिशेने वाढतात. गदिमांची आई किंवा बायको, "अधून मधून दिसत जा" म्हणते आणि निर्विकार चेहर्याने फ्रेममधून निघून जाते. संवाद म्हणताना जर तिचा चेहरा दाखवला नाही, तर नंतर आणि तोही असा दाखवायची गरज काय? पुलं वृद्ध होतात पण त्यांचा मित्र बबडू अगदी तरणाबांड आहे, नंदा प्रधानची आई ही सुद्धा पुलंच्याच वयाची दिसते. नंदा शेवटपर्यंत पहिल्या दृश्यात दिसला तसाच दिसतो. त्याची आई कुठल्याही अँगलमधून श्रीमंत-सुखवस्तू बाई वाटत नाही. एक ना दोन!!! इतर गोष्टींबद्दल सांगायचं तर आपला सिनेमा विंटरनॅशनल फिल्म फेष्टिवलमध्ये दाखवला जाणार असल्याची खात्री असल्याने सगळ्या पाट्या विंग्रजीत आहेत. पुलंच्या कथाकथन आणि इतर गोष्टी सांगताना त्यांचे दोन-चारच फोटो पुन्हा पुन्हा दाखवलेयत.
बाकी, काय बरं आहे हे सांगायचं तर शेवटाकडे चितळे मास्तर सॉल्लीड जमून आले आहेत, रावसाहेब मस्त रंगलेयत आणि 'इंद्रायणी काठी' हे गाणं छान जमून आलंय, आणि त्यातल्या त्यात सुनिताबाईच काय त्या आपला आब आणि भूमिकेचा बाज सांभाळून आहेत. थोडक्यात सिनेमाला माझ्याकडून दहापैकी अर्धा गुण. पुलं प्रेमींनी आणि एकूणच रसिकांनी पिक्चर न पाहता त्यांचं कोणतंही पुस्तक कुठल्याही पानाशी उघडावं आणि वाचावं.
जाता जाता: अवांतर हा मिपाचा युएसपी असला तरी 'अति केलं आणि हसूही नाही आलं' हा प्रकार होताना दिसतोय. कुठल्याशा धाग्याव्र नवीन प्रतिक्रिया वाचायला जावं तर बाष्फळ अवांतरावाचून काही दिसत नाही. असो, सूज्ञांस अधिक सांगणे न लगे.
13 Feb 2012 - 11:49 am | प्रीत-मोहर
बरयता आणि उल्यतां हेदोन्ही गोवन आणि कारवारी कोकणी दोन्ही मधे सारख्याच अर्थाने वापरले जातात. (बरयता= लिहितो. उलयता= बोल्तो.) आणि ती बाई शुद्ध गोवन कोकणीत बोलत होती.
बाकी पर्याच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत..
13 Feb 2012 - 11:59 am | श्रीरंग
अगदी पर्फेक्ट बोललात. सदोष संवादफेकीने पार चिंधड्या उडवल्या आहेत.
चित्रपटातील ज्युनियर कलाकार (उदा: अन्तू शेठ बरोबर गप्पा मारणारा कंपू, एक षश्टमांश गोरी यमी, मांडी खाजीवणारे तबलजी वगैरे) पु.लं नी लिहिलेल्या काही धमाल संवाद / वाक्यांची वाट लावतातच, पण प्रशांत दामलेंसारख्या कसलेल्या अभिनेत्याकडून तर हे मुळीच अपेक्षित नव्हतं.
भय्या नागपूरकर, बापू काणे, यांच्याप्रमाणेच पेस्तनकाका, हरीतात्या पण जेमतेम उरकलेत (अविनाश नारकरने हरीतात्यांच्या व्यक्तिरेखेचा पाडलेला खून पाहता, एका अर्थी त्यांना लवकर उरकलं हे एका अर्थी बरंच वाटतं).
पुलं प्रेमींनी आणि एकूणच रसिकांनी पिक्चर न पाहता त्यांचं कोणतंही पुस्तक कुठल्याही पानाशी उघडावं आणि वाचावं.
या आपल्या मताशी सहमत आहे. पुलंच्या कलाक्रुतींना न्याय देणं सध्याच्या कोणत्याच दिग्दर्शकाच्या आवाक्यातलं काम दिसत नसलं, तरी पु.लं बद्दल लोकांना असलेले प्रेम, कुतुहलामुळे सिनेमाग्रुहात खेचला जाणारा प्रेक्षकवर्ग, यांचा आयटम साँग वगैरे घुसवून अपमान तरी करायला नको होता असं वाटत राहतं.
13 Feb 2012 - 3:05 pm | परिकथेतील राजकुमार
'वरच्यांचेच' ह्या सगळ्याला आशिर्वाद असल्यावरती कोण काय करू शकणार ? ह्याच कारणाने काल पियुषाला ह्यापुढे इथे न लिहिता ब्लॉगवरती लिहित जा अशी विनंती केली आहे.
बाकी गोळाबेरीजची गंमत म्हणजे, ह्या लोकांना साधा दामले मास्तर आणि चितळे मास्तर ह्यांच्यातला फरकच कळलेला नाहीये. रादर चितळे मास्तर अक्षरशः दामले मास्तरांची भूमीका जगताना पाहून ड्वाले पाणावले. निखिल रत्नपारखीला सतत 'ऑ' 'ऑ' करताना आणी सतत नाटकी अभिनय करताना पाहून लक्षा काय वाईट होता असे वाटून गेले.
अतिशय सामान्य दर्जाचे डबिंग तर डोक्याची नस न नस पेटवून टाकते. पु. लं. च्या आईची भूमीका केलेली अभिनेत्री मराठी शब्दांचे तोंड हलवते आणि डबिंग आहे कोकणी शब्दांचे. प्रसाद आणि पुष्कर ह्यातला नाथा कामत नक्की कोण हे त्या दोघांना देखील समजले असेल का नाही शंका आहे. आणि पु. लं. चा नारायण येवढा गुटगुटीत होता ? म्हैस कथेचा वाद झाल्या झाल्याच तो संपूर्ण प्रसंग उडवायला हवा होता. तो प्रसंग १/२ सेकंद दाखवुन उलट गोंधळ अजून वाढवला आहे. पु. लं. च्या केसाची सुतरफेणी झालेली असताना, इकडे नंदा प्रधान आणि बबडू मात्र एकदम नौजवान. अरे काय येडे वाटलो आम्ही काही दाखवायला ?
एक ना धड भराभर चिंध्या अशी अवस्था झालेली आहे. ह्यापेक्षा दोन-चार पात्रे घेऊन एक कथा निट गुंफली असती तर आनंद वाटला असता. काही काही मालिकांचे विषय हे खरेतर ३ तासाच्या चित्रपटात संपून जातील असे वाटत असते, इकडे मात्र उलटी परिस्थिती आहे.
13 Feb 2012 - 9:18 pm | llपुण्याचे पेशवेll
बाकी गोळाबेरीजची गंमत म्हणजे, ह्या लोकांना साधा दामले मास्तर आणि चितळे मास्तर ह्यांच्यातला फरकच कळलेला नाहीये. रादर चितळे मास्तर अक्षरशः दामले मास्तरांची भूमीका जगताना पाहून ड्वाले पाणावले. निखिल रत्नपारखीला सतत 'ऑ' 'ऑ' करताना आणी सतत नाटकी अभिनय करताना पाहून लक्षा काय वाईट होता असे वाटून गेले.
सहमत. दामले मास्तराचा हेल, ४ वर्ग हाकण्यासाठी लागणारा राकटपणा, ४ वर्गांवर लक्ष ठेवण्यासाठी लागणारी कावळ्यासारखी नजर आणि तिखटपणा हे आगाशेंना मुळीच दाखवण्यास जमले नाही.
नारायण मधला लग्नाचा बोहला म्हणजे हल्लीच्या उत्तर भारतीय लग्नांप्रमाणे फेरे घालायला केलेल्या स्टेज सारखे वाटत होते.
सर्वात महत्वाचे म्हणजे पुठ्ट्याच्या टोप्या ज्या पूर्वीच्या पिढीत वापरात होत्या त्या अजूनही बाजारत मिळतात, त्या घेण्याऐवजी मुसलमानांसारख्या निमुळ्त्या टोप्या घेण्याचे कारण काय हे कळले नाही.
बबडू, रावसाहेब, हरितात्या (जे सदर धागाप्रवर्तकास मुळीच रुचले नाहीत) हे मात्र आवडून गेले. सदर धागाप्रवर्तकास न आवडलेली डाळमेच्या ताळ्येपरी ही कविताही प्रचंड आवडली . असो.
13 Feb 2012 - 12:06 pm | प्रीत-मोहर
या चित्र्पटाने पार पार पर अपेक्षाभंग केला अहे. अगदी डोक्याला शॉटच लागला पाह्ता पाहता
13 Feb 2012 - 12:22 pm | पिलीयन रायडर
मला माहिती नव्हतं की असा काही पिक्चर आलाय... आणि माहिती असतं तरी मी पाहिला नसता कारण एक तर पु.ल नी केवळ शब्दात व्यक्तीरेखा उभ्या केल्यात, त्यांना ऑडिओ-व्हिज्युअल ची गरजच नाहीये... आणि पुन्हा त्या इतक्या समर्थ पणे उभ्या केल्यात की मला त्या डोक्यातुन काढुन हे नेहमी दिसणारे आणि स्वतःची एक वेगळी शैली असणारे कलाकार बघायचेच नाहीयेत...
पण तरीही मोह वगैरे होउन "चुकुनही" पिक्चर पहावा वाटु नये ह्याची तरतुद केल्या बद्दल धन्यवाद....
13 Feb 2012 - 3:31 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
:)
13 Feb 2012 - 4:43 pm | गणपा
एकंदर वरील काही प्रतिसाद पहाता दोन अडीच तास पदरच्या दमड्या मोजुन एसीची थंड हवा खाण्या ऐवजी त्याच किमतीत पुलंच्या कथाकथनाच्या सीडी विकत घेतुन (फुकट्यांसाठी जालावर मोफत उपलब्ध आहेत. :) ) साध्या पंख्याखालीही मजेत वेळ घालवू शकतो.
पुलंच लेखन वाचण्यात जेवढी मजा आहे तेवढीच (उलट किंचीत जास्ततच) ते त्यांच्या तोंडून एकण्यातच आहे. येरागबाळ्याचे हे काम नोहे.
आमचे पैशे वाचवल्या बद्दल धन्स.
13 Feb 2012 - 4:47 pm | वपाडाव
तुमच्या पदरच्या त्या दमड्या अन आमच्या काय परसात हिरवं झाड हय का?
13 Feb 2012 - 7:00 pm | गणपा
बाळा मी असं कुठे म्हटलय?
उलट ते मी आपल्या सर्वांच्या वतीने म्हटलय.
तुझ्यासाठी आजचा गृहपाठ : वरच्या प्रतिसादातला पहिला परिच्छेद १० वेळा वाचणे. त्यातल्या अशुद्ध लेखनाच्या चुका काढुन ५ वेळा लिहुन आणणे.
13 Feb 2012 - 4:48 pm | मी-सौरभ
गणपाशेफः म्या बी ह्येच मंतो...
तवा पु.ल. ऐकता ऐकता एखादी फर्मास पा.कृ. बनवून इथे टाका की :)
13 Feb 2012 - 5:42 pm | अप्रतिम
चित्रपट पाहून संताप संताप झाला.
13 Feb 2012 - 6:10 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
जाऊ द्या हो. हे ही दिवस जातील. ;)