ज्येष्ठ नागरिक अत्याचार : जागृती, कायदा, मदत व उपाय

अरुंधती's picture
अरुंधती in जनातलं, मनातलं
16 Jun 2011 - 8:05 pm

सत्तर वर्षाच्या डॉ. सिंग यांना दोन वर्षांपूर्वी पत्नीशोक झाला. पण आपला मुलगा, सून व नातू यांच्या सहवासात आपले दु:ख कमी होईल असे त्यांना वाटले. पण खरे दु:ख तर पुढेच होते. आपल्याच मालकीच्या घरात डॉ. सिंगांना हळूहळू जगणे असह्य झाले. मधुमेहाचे रोगी असलेल्या डॉक्टरांच्या खाण्यापिण्याच्या वेळा, घरातील वावरणे, घरातील व्यवहारांत सहभाग याविषयी त्यांच्याच घरच्यांनी उदासीनता दाखवायला सुरुवात केली. नियमित वेळेला खाणे, पथ्य वगैरे तर राहूच दे, पण त्यांनी काही सांगितलेलेही घरच्यांना पटेना. गोष्टी एवढ्या थराला गेल्या की डॉ. सिंगांनी मुलगा व सुनेला आपले घर खाली करायला सांगितले तरी त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून ते तिथेच राहत आहेत व डॉ. सिंगांचे हालही अजून चालूच आहेत.

१२९८ ह्या मुंबईतील हेल्पलाईन क्रमांकावर बांद्र्यातील एका निनावी व्यक्तीचा फोन आला. तिने सांगितले की एक वृद्ध महिला गेले ४ दिवस रस्त्यावर बेवारशी वावरत आहे व पावसाची गेले अनेक दिवस संततधार चालू आहे. त्या महिलेचे आरोग्य धोक्यात होते. हेल्पलाईनने १०९० ह्या पोलिस क्रमांकावर कॉल ट्रान्स्फर केला. कॉलनंतर १५ मिनिटांत पोलिसांची व्हॅन तिथे आली व त्या महिलेस हॉस्पिटलामध्ये दाखल करून तिचा जीव वाचविता आला.

ह्या दोन्ही केसेस इथे देण्याचे कारण म्हणजे नुकताच १५ जून रोजी 'जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार विषयक जागृती दिन' पार पडला.

भारतात दिवसेंदिवस वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती व आयुर्वर्धमान तंत्रांमुळे म्हातार्‍या माणसांची संख्या वाढत आहे. सध्या भारतात ९० दशलक्ष वृद्ध व्यक्ती असून पुढील दशकात त्यांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यातील ३३% वृध्द हे दारिद्र्य रेषेखाली आहेत, तर ७३% अशिक्षित आहेत किंवा शारीरिक श्रमांतून मिळणार्‍या उत्पन्नावर अवलंबून आहेत. ह्या पार्श्वभूमीवर वृद्ध व्यक्तींचे हक्क, त्यांच्या समस्या व त्यांच्यावरील अत्याचाराविषयी जागृती निर्माण होणे व त्यांना निरोगी, सुदृढ व आनंददायी आयुष्य जगण्यासाठी पूरक वातावरण निर्माण करणे हे येत्या काळातील मोठे आव्हान ठरणार आहे.

कुटुंबसंस्थेच्या पारंपरिक साच्यात आधुनिक काळात झालेले बदल लक्षात घेता कुटुंबातील वृद्धाचे स्थान व त्यांची देखभाल हे आता अडचणीचे ठरू लागले आहे ह्याचा पुरावा आपल्याला सध्याची परिस्थिती देते. घरात पूर्वी त्यांचे हवे-नको बघण्यासाठी जे मनुष्यबळ होते ते आता सर्व प्रौढ गृहसदस्य उपजीविकेच्या कामात गुंतल्यामुळे शक्य होत नाही. शहरांमध्ये राहण्याच्या अपुर्‍या जागा, महागाई, मनुष्यबळाची कमतरता व घरी कोणी नसणे यामुळे घरात वृद्ध व्यक्ती असणे हे सध्याच्या पिढीत लोकांना अडचणीचे वाटते हे वास्तव आहे. त्यातच आपापसांत न पटणे, इस्टेट - पैसा - जमीन जुमला इत्यादी संदर्भात भांडणे, गैरसमज वगैरेंची भर पडली की त्या घरातील वृद्ध व्यक्तीला तिथे राहणे म्हणजे एक ओझे वाटू लागते. बरं, शहरांतील वृद्धाश्रमाची किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळ्या निवासांची व्यवस्था सर्वांनाच परवडते किंवा रुचते असे नाही. शिवाय वृद्धाश्रमांमध्येही सध्या प्रतीक्षा यादी असते.

अशा परिस्थितीत वृद्ध व्यक्ती अनेकदा अत्याचाराच्या बळी पडू शकतात.

जिथे विश्वासाचे नाते / अपेक्षा असते त्याला तडा जाणारी व वारंवार घडणारी कृती, ज्यामुळे वृद्ध व्यक्तीस शारीरिक/ मानसिक / भावनिक / आर्थिक इजा अथवा दु:ख होते त्याला वृद्ध व्यक्तीवर होणारा अत्याचार असे म्हणता येईल.

हे अत्याचार गरीब/ मध्यम वर्गीय/ श्रीमंत / सुशिक्षित / अशिक्षित/ कोणत्याही धर्म - जातींत घडू शकतात व घडत असतात. अनेकदा तीर्थक्षेत्री, मोठ्या शहरांमध्ये अगर वृद्धाश्रमांमध्ये वृद्धांना सरळ सोडून दिले जाते. किंवा त्यांच्याशी असलेला सर्व संपर्क तोडण्यात येतो. त्यांना घराबाहेर हाकलले जाते, किंवा अडगळीच्या जागेत डांबले जाते. शहरांत - खेड्यांत सर्रास आढळणारे हे प्रकार आहेत. वृद्धांवर कोणकोणत्या प्रकारे अत्याचार केले जातात हे सर्वप्रथम जाणून घेऊ.

हे अत्याचार म्हणजे :

१. शारीरिक छळ
२. मानसिक / भावनिक छळ (ह्यात शिवीगाळ होण्याचाही अंतर्भाव)
३. आर्थिक स्वरूपाचे / वस्तूंशी निगडित शोषण
४. दुर्लक्ष
५. लैंगिक छळ
६. वृद्ध व्यक्तीचा त्याग करणे
७. स्वतःकडे दुर्लक्ष करणे

वृद्ध व्यक्तींवर होणार्‍या अत्याचारांविषयी भारतातील काही बोलकी आकडेवारी :

# जवळपास ५० % वृद्ध हे आर्थिक दृष्ट्या परावलंबी आहेत.

# ३५% वृद्धांनी अत्याचाराचा कोणता ना कोणता प्रकार सोसला आहे. (अनादर, दुर्लक्ष, आर्थिक शोषण, शिवीगाळ)

# जवळपास ३० % वृद्ध भावनिक आधार व मूलभूत सोयींच्या अभावापायी अत्याचाराचे बळी ठरतात. (अनुक्रमे ३०% व २९%)

# ४०% वृद्धानं आपण दुर्लक्षित आहोत असे वाटते. आपले कुटुंबिय कामात किंवा त्यांच्या व्यापांत व्यस्त आहेत व त्यांना आपल्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही असे त्यांना वाटते.

# ५०% पेक्षा जास्त वृद्ध त्यांच्यावर होणार्‍या अत्याचारांविरुद्ध काही अ‍ॅक्शन घेण्यास राजी नाहीत, कारण त्यांना आपल्यावर अत्याचार होत आहेत ह्याचीच जाणीव नाही, आणि त्यांनी काही अ‍ॅक्शन घेतली तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही ही भीती वाटते. तसेच समाज काय म्हणेल ह्याची भीती व भविष्यात आणखी अत्याचार सहन करावे लागतील ह्याची भीती. ह्या सर्वांमुळेही अत्याचार ग्रस्त व्यक्ती त्याविरोधात काही करण्यासाठी नाखूष असतात.

# शहरांमधील वृद्धांचे सर्वसाधारण वय हे ६८ आहे. तर कोलकाता येथील ५४ % वृद्धांचे सर्वसाधारण वय ७०+ वर्षे आहे.

# तीन पंचमांश वृद्धांचे मासिक उत्पन्न १०,००० रुपयांपेक्षा कमी आहे.

# ५७% पेक्षा जास्त वृद्ध आपल्या मुलावर आर्थिक दृष्ट्या अवलंबून आहेत. तर एक चतुर्थांश वृद्ध आपल्या जोडीदारावर आर्थिक दृष्ट्या अवलंबून आहेत.

# अत्याचार करणारे लोक घरातीलच असतात. (मुलगा, सून, मुलगी, जावई इत्यादी). काही ठिकाणी नोकरांकडून अत्याचार होतात. बर्‍याचदा अत्याचार होण्याचे कारण प्रॉपर्टी विषयक वाद, मतभेद इत्यादी असते. (३५% वृद्ध)

# अत्याचाराविरुद्ध तक्रार केलेल्यांपैकी ३३% वृद्धांनी तक्रारीनंतर काहीच झाले नाही असे सांगितले, तर २७ % वृद्धांनी पोलिसांनी घरी भेट दिल्याचे सांगितले.

# वृद्धांविषयीचे कायदे, योजना, कल्याण कार्यक्रम तसेच मदत करणार्‍या संघटना, त्यांची भूमिका - कार्य ह्यांविषयी वृद्धांमध्ये जागरूकतेचे प्रमाण तुलनेने खूप कमी आढळले. (जेमतेम ३३%)

# वृद्धांनी मदत संघटनांकडून ह्या प्रकारची मदत मिळावी असे सुचविले : १. घरी येऊन भेट देणे. २. सुरक्षा पुरविणे. ३. पोलिसांनी मुलांकडून मेन्टेनन्स मिळण्यासाठी ( The Maintenance and Welfare of Parents and Senior Citizen’s Act) मदत करावी.

वृद्ध व्यक्तींना सहन करावा लागणारा अत्याचार रोखण्यासाठी वृद्धांनीच सुचविलेले उपाय :

१. वृद्धांना नियमित व पुरेसे उत्पन्न असणे आवश्यक.
२. कुटुंबियांशी तडजोड / मतभेद मिटविणे.
३. आर्थिक परावलंबित्व टाळण्यासाठी स्वतःच्या मालकीची प्रॉपर्टी बाळगणे.
४. मानसिक आधार, मदत ह्यासाठी आवश्यकतेनुसार वृद्धांचे व कुटुंबियांचे समुपदेशन

मदत संस्था / संघटना कशा प्रकारे वृद्धांना साहाय्य करू शकतात?

# वृद्धाश्रमांची माहिती देणे. तसेच परवडणार्‍या वृद्धाश्रमात प्रवेशासाठी मदत.

# वृद्धांना कायदेशीर बाबींमध्ये मदत.

# अत्याचार रोखण्यासाठी घरी भेट देणे, मदत करणे.

# वैद्यकीय देखभाल करणारी व्यक्ती / केअर टेकर मिळविण्यासाठी मदत.

# वृद्धांचे हक्क, त्यांच्याविषयीच्या सरकारी योजना, कार्यक्रम, मदत सुविधा, मदत संस्था इत्यादींविषयी जागृतीसाठी मदत.

वृद्धांना मदत करणार्‍या संस्थांची ही काही संस्थळे :

हेल्प एज इंडिया : http://www.helpageindia.org/
http://www.helpageindia.org/contact-us.php

हार्मनी इंडिया : http://www.harmonyindia.org/

सिल्व्हर इनिंग्ज : http://www.silverinnings.com/

मेन्टेनन्स वेल्फेअर ऑफ पेरन्ट्स अ‍ॅन्ड सिनियर सिटिझन्स अ‍ॅक्ट, इंडिया (हिंदी) :
(माता - पिता और वरिष्ठ नागरिकोंका भरणपोषण तथा कल्याण अधिनियम, २००७.)

http://www.voice4india.org/wp-content/uploads/2009/03/maintenance-and-we...

* ह्या कायद्यानुसार ''बालक'' म्हणजे मुलगा, मुलगी, नातू, नात हे आहेत.

* भरणपोषण ह्याचा अर्थ अन्न, वस्त्र, निवारा तसेच वैद्यकीय मदत व उपचार असा आहे.

* माता-पिता म्हणजे परिस्थितीनुसार जैविक, दत्तक, सावत्र माता-पिता. ते वरिष्ठ (ज्येष्ठ) नागरिक नसले तरी.

* ह्या कायद्यानुसार वरिष्ठ नागरिक म्हणजे भारताचे वय वर्षे साठ पूर्ण केलेले नागरिक.

* जे माता-पिता आपल्या वृध्दापकाळात आपल्या उत्पन्नातून अथवा संपत्तीतून स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ आहेत त्यांना आपल्या सज्ञ अशा मुलगा/ मुलगी/ नातू/ नात यांकडून योग्य भरणपोषणाचा हक्क हा कायदा देतो, जेणे करून त्यांना सर्वसामान्य जीवन जगता येईल. नि:संतान ज्येष्ठ नागरिकांना विशिष्ट स्थितीत आपल्या नातेवाईकांकडूनही भरणपोषणाचा हक्क हा कायदा देतो.

मदतीसाठीचे काही दूरध्वनी क्रमांक :

पुणे

पुणे पोलिस ज्येष्ठ नागरिक मदत दूरध्वनी क्रमांक : 1091

डिग्निटी हेल्पलाईन : 020 - 30439100

मुंबई

मुंबई पोलिस ज्येष्ठ नागरिकांसाठी : 1090, 103

डिग्निटी हेल्पलाईन : 022 - 61381100

हेल्प एज इंडिया : 26370740, 26370754

ज्येष्ठ नागरिकांना मदतीसाठी हेल्पलाईन : 23898078, 23898079

जसे वृध्दांनी येणार्‍या काळात उभ्या ठाकणार्‍या आव्हानांना तोंड देण्यासाठी समर्थ होणे गरजेचे आहे तसेच नव्या पिढीनेही वृध्द व्यक्तींची कौटुंबिक व सामाजिक जीवनात असलेली उपयुक्तता, त्यांचा समृध्द जीवन-अनुभव हे ध्यानात घेऊन त्यांचे एकटेपण दूर करणे, त्यांना आवश्यक आधार देणे ह्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.
तंत्रज्ञानाच्या झपाट्याने पसरलेल्या जाळ्यामुळे कुटुंबातील माणसांनी एकमेकांपासून दूर न जाता त्याचा आपले संबंध सशक्त करण्यासाठी वापर करणेही तितकेच आवश्यक आहे. तरुणाई ह्या कामी विशेष प्रयत्न करु शकते व करत आहे. मोठ्या शहरांमधून अनेक युवा गट आणि ज्येष्ठ नागरिक मदत गट संयुक्त विद्यमाने वृध्दांना दिलासा देण्याचे काम करत आहेत. परंतु मुळातच घरातील विसंवाद टाळले, एकमेकांना सामावून घेत थोडी तडजोड केली व म्हातारपणाच्या दृष्टीने योग्य आर्थिक तरतूद केली तर बाहेरून मदत घेण्याची वेळ येणार नाही. वृध्दत्वात येणारे नैराश्य, एकटेपण, शारीरिक किंवा मानसिक दौर्बल्य यांसाठी वेळीच वैद्यकीय उपचार केले, समुपदेशन घेतले तर त्यामुळेही पुढील समस्या टळू शकतील.

~ लेखन व संकलन~

अरुंधती

------------------------------------------------------------------------------------------------

लेखासाठी वापरलेले संदर्भ :

* ELDER ABUSE IN INDIA Country Report for World Health Organization, Shubha Soneja.

* REPORT ON ELDER ABUSE IN INDIA, HelpAge India.

* http://silverinnings.blogspot.com/

----------------------------------------------------------------------------------

** ह्या विषयी संबंधित आपल्याकडील माहितीही ह्या धाग्यावर अवश्य लिहावी.

वावरसमाजजीवनमानलेखमदतमाहिती

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

16 Jun 2011 - 8:41 pm | नगरीनिरंजन

वृद्धांसाठी कायदे, संस्था आहेत म्हणून आशावादी व्हावं की म्हातारे व लहान मुले यांच्यावरच्या वाढत्या अत्याचारांकडे बघून निराश व्हावं असा संभ्रम पडला. उपयुक्त माहिती आहे. वाचनखूण साठवली आहे पण ही माहिती वापरण्याची वेळ येऊ नये अशीच इच्छा आहे.

आनंदयात्री's picture

16 Jun 2011 - 11:23 pm | आनंदयात्री

सहमत आहे.
अरुंधती यांचे धन्यवाद.

गणेशा's picture

16 Jun 2011 - 9:56 pm | गणेशा

वाचनखुण साठवली आहे.
प्रतिक्रिया काय द्यावी हे लगेच कळले नाही.

हम्म......
या गोष्टींना बरेच पदर असतात. तरीही काही नियम हे करावे लागतातच.

४०% वृद्धानं आपण दुर्लक्षित आहोत असे वाटते. आपले कुटुंबिय कामात किंवा त्यांच्या व्यापांत व्यस्त आहेत व त्यांना आपल्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही असे त्यांना वाटते.
याच्याशी ५०% सहमत.

काही दिवसांपूर्वी लहान मुलांबद्दलही लिहिले होतेस.

धनंजय's picture

17 Jun 2011 - 2:02 am | धनंजय

चांगली माहिती

*यादीपैकी "दुर्लक्ष" नामक अत्याचार जरा जिव्हारीच लागला. माझ्या वृद्ध नातेवाइकांशी माझा संपर्क फारच कमी असतो. ("दुर्लक्ष" या महत्त्वाच्या मुद्द्याला "अत्याचारा"ऐवजी "समस्या" मानावे असे वाटते. म्हणजे त्यावर इलाज आर्थिक/सामाजिक/शैक्षणिक असावेत फौजदारी नकोत.) कदाचित येथे "घरच्या घरी दुर्लक्ष->शारिरिक अपाय होण्याइतपत दुर्लक्ष" असे म्हणायचे असावे. अशा प्रकारचे दुर्लक्ष हा फौजदारी गुन्हा असावा : मान्य.*

अन्या दातार's picture

17 Jun 2011 - 7:24 pm | अन्या दातार

*यादीपैकी "दुर्लक्ष" नामक अत्याचार जरा जिव्हारीच लागला. माझ्या वृद्ध नातेवाइकांशी माझा संपर्क फारच कमी असतो. ("दुर्लक्ष" या महत्त्वाच्या मुद्द्याला "अत्याचारा"ऐवजी "समस्या" मानावे असे वाटते. म्हणजे त्यावर इलाज आर्थिक/सामाजिक/शैक्षणिक असावेत फौजदारी नकोत.) कदाचित येथे "घरच्या घरी दुर्लक्ष->शारिरिक अपाय होण्याइतपत दुर्लक्ष" असे म्हणायचे असावे. अशा प्रकारचे दुर्लक्ष हा फौजदारी गुन्हा असावा : मान्य.*

हेच टंकायला आलो होतो. बाकी वाखू साठवली आहे.

अरुंधती's picture

19 Jun 2011 - 5:04 pm | अरुंधती

तुमचा मुद्दा बरोबर आहे. शारीरिक अथवा मानसिक इजा / दुखापत होईल अशा पध्दतीचे व सतत होणारे दुर्लक्ष हा अर्थ येथे अभिप्रेत आहे! धन्यवाद!

अतिशय उपयुक्त माहिति, अतिशय धन्यवाद अरुंधति.

पप्पु अंकल's picture

17 Jun 2011 - 10:08 am | पप्पु अंकल

फारच छान
हा लेख वर्तमान पत्राद्वारे अजुन वाचकां समोर आला पाहिजे.
धन्यवाद

-----------------------------------------

रणजित चितळे's picture

17 Jun 2011 - 10:38 am | रणजित चितळे

कोठच्या थराला पोहोचलो आहोत आपण.

चेतन's picture

17 Jun 2011 - 12:02 pm | चेतन

माहितीपूर्ण लेख.....

धन्यवाद

चेतन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jun 2011 - 12:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीपूर्ण लेखन. अरुंधती यांचे आभार.....!

-दिलीप बिरुटे

डॉ.श्रीराम दिवटे's picture

17 Jun 2011 - 12:21 pm | डॉ.श्रीराम दिवटे

उपयुक्त माहिती...

विसोबा खेचर's picture

18 Jun 2011 - 11:14 am | विसोबा खेचर

सहमत..

नितिन थत्ते's picture

17 Jun 2011 - 12:26 pm | नितिन थत्ते

उत्तम माहिती आहे.
धन्यवाद.

पालकांनी आपले सर्वस्व मुलांना देऊन टाकू नये असे वाटते. त्यामुळे वार्धक्य सन्मानाने जगले जाऊ शकते. अर्थात ज्यांना परिस्थितीमुळे किंवा इतर कारणांमुळे वृद्धापकाळासाठी पुरेशी बचत करणे शक्य होत नाही त्यांचा प्रश्न गंभीर आहेच.

अवांतर: अलिकडेच एका दुर्लक्षित पालकाशी बोलणे झाले. ते हैदराबादला राहतात आणि हैदराबादेत त्यांनी आपली बचत वापरून एक २ मजली घर मोठे बांधले आहे. घर बांधताना मुलगा त्यांच्याबरोबर त्या घरात राहील अशी त्यांची अपेक्षा होती. घराचा अर्धा भाग भाड्याने दिला आहे. आता मुलगा हिरव्या देशात नोकरी करतो. या पालकांचे म्हणणे त्या मुलाने हैदराबादेतच नोकरी करावी. घराचे भाडे + हैदराबादेत नोकरी हे इनकम पुरेसे आहे की. कशाला अमेरिकेत नोकरी करायची ? आता मुलगा त्यांच्याजवळ रहात नाही म्हणून त्यांना दुर्लक्षित + आयुष्य व्यर्थ वगैरे वाटत आहे. ते पालक तब्येतीने ठणठणीत आहेत. पण My son is not there to look after me असे त्याम्चे म्हणणे आहे.

अरुंधती's picture

17 Jun 2011 - 6:34 pm | अरुंधती

प्रतिसाद देणार्‍या सर्वांचेच धन्यवाद!
नगरीनिरंजन , आनंदयात्री, रेवती, रणजित, डॉ. दिलीप, डॉ श्रीराम, चेतन, ५० फक्त, धनंजय, पप्पु अंकल, गणेशा... सर्वांचेच आभार.
नितीन, लोचा तिथेच तर असतो ना, दोन्ही पिढ्यांतील लोक आपापल्या मुद्द्यांवर जेव्हा अडून बसतात तेव्हा त्या वृध्द व्यक्तीस नैराश्य/ एकटेपणा/ दुर्लक्षित झाल्याची भावना हे होणारच. तब्येतीने ठणठणीत असणार्‍या म्हातार्‍या माणसांनाही भावनिक आधार लागतो. इथे तुम्ही म्हटलेल्या केसमध्ये मुलगा जवळ नाही ही त्यांची खंत आहे. अनेकदा मुले जवळ असूनही मनाने लांब गेली ही खंत असते. वृध्द व त्यांचे कुटुंबिय, सर्वांनीच इथे थोडी तडजोड केली तर हे प्रश्न निकालात निघू शकतात. इंटरनेट, इमेल, चॅट, स्काईप इत्यादींच्या माध्यमातून परदेशी असलेल्या कुटुंबियांशी सुसंवाद संपर्क ठेवणे, भारतातील स्थानिक स्नेहीजनांशी उत्तम संपर्क ठेवणे, जमल्यास मुलाकडे काही दिवस राहून येणे हे उपाय त्या वृध्द व्यक्तीला शक्य आहेत. शेवटी आपण आपला स्नेहाचा हात जितका पुढे करू तितके यश येणार.... जर आपणच हात आखडता घेतला तर कसे होणार?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jun 2011 - 12:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दोन्ही पिढ्यांतील लोक आपापल्या मुद्द्यांवर जेव्हा अडून बसतात तेव्हा त्या वृध्द व्यक्तीस नैराश्य/ एकटेपणा/ दुर्लक्षित झाल्याची भावना हे होणारच. तब्येतीने ठणठणीत असणार्‍या म्हातार्‍या माणसांनाही भावनिक आधार लागतो.

अगदी खरं आहे. आपल्या अस्तित्त्वाची नोंद घ्यावी, आपल्या विचारांना मान मिळावा, आपण म्हणू ते झालं पाहिजे, लहान-सहान गोष्टींसाठी हट्ट त्यावरुन होणारे मतभेद-मनभेद या आणि अशा काही कारणांमुळे दोन पिढ्यांमधील प्रेम कमी होऊ लागते. मतभेद होतात. आणि मग हीच वृद्ध मंडळी घरात अडचण होऊन बसतात. कधी एकदाची यांच्यापासून सुटका होईल असा विचार मनात यायला सुरुवात झाली म्हणजे त्याच दिवशी घरातली ही वृद्ध मंडळी आपण ’तिरडीवर’ नेऊन ठेवलेली असतात.

एकत्र कुटुंब आहे आणि वृद्धांकडे महिन्याच्या शेवटी चांगली पेन्शन येते तेव्हा वृद्धांना होणारा त्रास कमी असावा असे वाटते. वृद्धांच्या आयुष्यात पैशाचे खूप महत्त्व आहे असे वाटते. बाकी, ” कुटुंबसंस्थेच्या पारंपरिक साच्याबद्दल तुम्ही मुद्दा मांडलाच आहे” तोच अधिक महत्त्वाचा मुद्दा आहे.

-दिलीप बिरुटे

RUPALI POYEKAR's picture

18 Jun 2011 - 2:48 pm | RUPALI POYEKAR

अतिशय उपयुक्त माहिति

अरुंधती's picture

19 Jun 2011 - 5:06 pm | अरुंधती

धन्यवाद विसोबा व रुपाली!

प्रकाश घाटपांडे's picture

19 Jun 2011 - 7:11 pm | प्रकाश घाटपांडे

संध्याछाया भिवविती हृदया |
उत्तम लेख!

अनेक मिती असलेला प्रश्न. अतिशय गंभीर समस्या होऊन पुढे आलेला आणि इथून पुढे आणखीन जटिल होत जाणारा.
इथून पुढे वृद्धांनी त्यांची सगळी मिळकत, राहते घर हे मुला-मुलींच्या नावावर करणे टाळावे, स्वतःची तब्बेत कशी उत्तम राहील हे बघणे अत्यावश्यक. जास्तितजास्त वर्षे ही स्वतःला वेगवेगळ्या कामात गुंतवून घेऊन मनाची तब्बेत टिकवणे हे सुद्धा गरजेचे. त्यामुळे प्रश्न सर्वस्वी सुटणार नाहीत परंतु तीव्रता आणि संख्या निश्चित आटोक्यात येऊ शकेल.
आता मध्यमवयीन (४०+) असलेल्या लोकांनी प्लॅनिंग सुरु करणे अत्यावश्यक म्हणजे आणखी २५-३० वर्षांनी आपण या समस्येचा भाग बनून राहणार नाही!

-रंगा