तर फायनली चौथ्या दिवशी 'विपश्यना' सुरु झाली. गुरुजींनी तासभर सूचना दिल्या, धीर दिला ....
आत्तापर्यंत श्वासाकडे लक्ष देऊन, आपण मनाला व्यायाम दिलाय. आता मन सूक्ष्म होऊ शकतंय.
आता, त्याला आता नाकातून बाहेर काढून शरीरभर फिरवायचे!!?
(ईईईक! ही ही ही... किती सुक्ष्म झालं तरी 'मन' वात्रट ते वात्रटच !)
आताही संवेदनाच पहायच्या होत्या, पण आता डोक्यापासून सुरु करून हळूहळू एक एक करत पायापर्यंत जायचे. गुरुजी सगळेच सोप्पे करून सांगत होते. काही जाणवत नसेल तर आधी फक्त त्वचेला होणार्या संवेदानांकडे लक्ष द्या. कपड्याचा स्पर्श, मधूनच येणार्या वार्याचा स्पर्श हे बघा. नन्तर हळूहळू लक्ष आत न्यायचे.
आता जाणीवा पूर्वीपेक्षा तीव्र झाल्या होत्या, त्यामुळे कळायला लागले, की आपण एरवी कित्तीतरी गोष्टी 'गृहीत' धरत असतो. कपड्याचा स्पर्श, वाहत्या हवेचा स्पर्श प्रत्येक वेळेस कित्ती वेग-वेगळा असतो, आपले स्वत:चे तापमान कसे बदलते, या गोष्टी कधी पाहिलेल्याच नसतात. झुळूक आली की 'इत्तके' छान वाटत होते, काय सांगू?! मी त्या ३-४ राईड्स खूप एन्जॉय केल्या, जणू काही आयुष्यात पहिल्यांदाच वारा 'खात' होते!
मग अजून आत ' बघायला' सुरुवात केली. सुरुवातीचे ३ दिवस मला सतत तळपाय-तळहात आणी मान याच्यातून उष्णतेचे लोटच्या लोट बाहेर पडत असल्यासारखे वाटत होते. आता मात्र पूर्ण शरीर अगदी तालात काम करताय असे वाटत होते. आधी संपूर्ण शरीरात ठोके जाणवायला लागले. त्या ठोक्यांच्या तालावर ३-४ राईड्स घेतल्या.
जितके खोल लक्ष द्यायला लागेन तेवढी जास्त खळबळ जाणवायला लागली. शरीरातले रस आणी त्यांची धावपळ 'दिसायला' लागली. मनात विचार आला, काही काम ना करता नुसती स्थिर बसलेय तरी इतकी खळबळ-हलकल्लोळ इ. प्रकार जाणवतायत. एरवी आपण एकाच वेळेस १७६० उद्योग करत असतो. त्यावेळेस तर कित्त्तत्त्ती गोंधळ सुरु असेल, त्यामुळे फुटून कसे काय नाही जात शरीर?
'च्यायला, काय सिस्टीम बनवलीये निसर्गानी! इतकी कॉम्प्लीकेटेड, तरीही कॉम्पॅक्ट आणी युजर फ्रेंडली देखील!'
मात्र अंगात घड्याळ बसवल्यासारखे, मला बरोब्बर १ तासांनी हे सगळे खेळ थांबवून उठावे लागायचे. ' मरणाची' तहान लागलेली असायची बसल्याबसल्या. दर तासाला ३००मिलिची एक बाटली भरून घटाघटा पाणी प्यायचे, जरा २५-३० पावले चालून न अवाघाडलेले अंग उगीच मोकळे करायचे. की पुन्हा 'राईड्स' सुरु. .......
आता थोडे विषयांतर: बरेच लोक त्राटक (ज्योती/तारा) ध्यान करतात, त्यांनी सुद्धा जाणीव सूक्ष्म व्हायला मदत होते. तार्याची/ज्योतीची 'लुकलुक' खूप वेगात असते. एरवी सहज मोजता येत नाही. त्यावर मन एकाग्र केले की हळूहळू प्रत्येक 'चमकणे' आणी 'विझणे', त्यातील अंतर हे वेगळे कळायला लागते. 'काळाची' जाणीव सूक्ष्म होते.
याचा एक चांगला उपयोग, 'इम्पल्सीव' लोकांना होऊ शकतो. रागाच्या/ भावनेच्या भरात पटकन काहीतरी बोलून जातात, काहीतरी करून टाकतात,आणि नंतर वर पुन्हा सांगतात, "मी काय केले/कधी केले, कसे केले, मला कळलेच नाही! " अशा लोकांनी थोडेसे ध्यान केल्यास निदान त्याना कळेल तरी कधी कधी नक्की काय काय झाले ते.
असो.
इथे मात्र आपण ध्यानासाठी बाहेरचे काही उसने घेत नाही, आपलाच श्वास धरतो. पण एरवी ज्याना असे काहीतरी 'इंस्ट्रुमेंट ' घेऊन ध्यान, जप, पूजा करायची सवय आहे त्यांना हे सुरुवातीला कठीण जाऊ शकते. नुसत्या श्वासावर ध्यान केंद्रित करून पुढे खोल खोल जायचे म्हणजे पुडीचा दोरा वापरून 'बंजी जम्पिंग' करण्यासारखे वाटते.( 'ध्यान करताना' मध्येच हे असे विचार करत मला फिसकन हसू यायचे.)
त्या दिवशी प्रवचनात गुरुजींनी सांगितले, संस्कार/ विकार कसे निर्माण होतात.
आधी एखादी गोष्ट घडते, ( उदा. कुणीतरी शिवी घातली!), मग संवेदना निर्माण होते, तो संदेश मेंदूपर्यंत वाहून नेला जातो. मेंदू देता स्कान करून तुलना करतो, ही शिवी आहे. घाण आहे. मग दु:खद संवेदना निर्माण करतो. शिवाय पुन्हा आदेश देतो, उलट शिवी घाल!
...की झाले सुरु भांडण ....
हे जे घाण आहे म्हणून कळते, तिथेच जागे व्हायचे, द्रष्टा भावना ठेवायची, भोक्ता नाही. मग पुढचे विकार निर्माण होतच नाहीत....इ.
हे सगळे खर तर खूप कठीण जाते, आपल्याला सवय नसते ना 'जागे' रहायची.
आणी विपश्यना म्हणजे तर 'प्रतिक्षण सजग' राहणे!
याचा विचार करत बाहेर आले, तर चप्पल स्टॅंड समोरच्या फळ्यावर पुढच्या दिवशीचा 'कार्यक्रम' लावला होता.उद्यापासून 'अधिष्ठान' सुरु. दिवसातून ३ वेळेस,१ तास पूर्ण ध्यान.बिलकुल हलायचे नाही! मी आत्तापर्यंत खाजवायला, घाम पुसायला, मांडी बदलायला पुष्कळ नाचत होते. उयापासून फेविकॉल लावायचे सगळीकडे!
(पुन्हा एकदा.. अरे देवा, कुठे येऊन पडले!)
मग अचानक स्वत:ची लाज वाटली, मनात म्हटले, 'गधडे, पूर्वी लोकांनी अरण्यात १२-१२ वर्षे तप केलंय. इथे आरामात गादीवर १ तास बसायला तुझी काय हाडे मोडली का?'
चूपचाप खोलीत जाऊन गपगार झोपून गेले.
क्रमशः
प्रतिक्रिया
22 Nov 2010 - 2:56 pm | स्पा
जबराट.......
खरच एवढं effective आहे का हे?
आरोग्याच्या दृष्टीने याचे काय फायदे आहेत, ते सांगशील का?
22 Nov 2010 - 3:52 pm | स्वानन्द
हे काय गं... परत क्रमशः ! सगळी पोतडी एकदाची रिकामी करून टाक ना. :)
22 Nov 2010 - 3:53 pm | सुप्रिया
सुंदर वर्णन! पटापट पुढचे भाग येऊ द्यात.
22 Nov 2010 - 4:29 pm | गणेशा
वाचत आहे .. लिहित रहा ...
विपश्यना बद्दल काहीच माहिती नाही .. पहिल्यांदाच हे वाचत आहे ...
22 Nov 2010 - 4:58 pm | प्राजक्ता पवार
विपश्यना बद्दल प्रथमच वाचतेय .लिहित रहा.
22 Nov 2010 - 5:29 pm | रेवती
छान वर्णन!
अधिष्ठानात अज्जिबत हलायचे नाही म्हणजे मला वाचतानाच अवघडल्यासारखे वाटते आहे.
22 Nov 2010 - 5:45 pm | ५० फक्त
मला पण विपश्यना करायला जायचं आहे, त्याबद्दल थोडं मार्गदर्शन कराल काय ?
बाकी तुमचं वर्णन वाचुन हि इच्छा जास्तच प्रबळ होत आहे.
हर्षद
7 Jan 2013 - 6:23 pm | ह भ प
मलाबी असंच वाटू राह्यलय..
22 Nov 2010 - 5:45 pm | ५० फक्त
मला पण विपश्यना करायला जायचं आहे, त्याबद्दल थोडं मार्गदर्शन कराल काय ?
बाकी तुमचं वर्णन वाचुन हि इच्छा जास्तच प्रबळ होत आहे.
हर्षद
23 Nov 2010 - 12:36 am | विलासराव
पहा काही उपयोग झालाच तर.
http://www.vridhamma.org/Code-of-Discipline.aspx
22 Nov 2010 - 8:22 pm | शुचि
हा भागदेखील छान
22 Nov 2010 - 8:39 pm | अनामिक
पुढच्या भागाची उत्सुकता लागून राहिली आहे. लवकर लिहा.
23 Nov 2010 - 1:21 am | पुष्करिणी
एका जागी काही न करता बसणं हेच फार कौतुकास्पद आहे..मला तर डोळे मिटून २ मि.पण स्वस्थ बसवणार नाही ..पण अगदी उत्सुकता वाटतेय आता...
ग्रेट, खूप पेशन्स आहे माउ तुमच्यामधे:)
19 May 2015 - 5:07 am | रुपी
हे वाचून आपणही अशा शिबिराला जावं असं वाटू लागलं आहे..
19 May 2015 - 10:43 am | कविता१९७८
मस्तच लिमे, खरच शिबीरात जायला हव