बादलीयुद्ध १४
बादलीयुद्ध एक , दोन , तीन , चार , पाच , सहा , सात , आठ , नऊ , दहा , अकरा , बारा , तेरा
...........................................................................
खरतंर सामान भरायला घेतलं तेव्हा जाणवलं की किती मोठा पसारा झालाय इथे. जागोजागी रद्दीचे कागद. ही सकाळ असूनसुद्धा किती उदास वाटत होती. बहुतेक जण गेलेलीच होती. इंजिनियरींग कॉलेजचं एक बरं आहे. काहीच काम नसताना दोनदोन महिने होस्टेल थांबणारे इथे बरेज जण असतात. संध्याकाळी टेकाडावरुन परत येताना अगदी रिकामं रिकामं वाटत होतं. भुऱ्या अंधारात होस्टेलचे पेटलेले दिवे मन विषण्ण करत होते. गोरख आजकाल खोली करुन बाहेरच राहतो. दिलीपही त्याच्या पाठोपाठ तिकडेच गेला. मी मात्र होस्टेलवरंच अडकून पडलो. मनीनंसुद्धा सतरा रुम बदलल्या. ती सुद्धा कॉलेज संपवून गावी गेली त्यावेळीसुद्धा असंच विषण्ण वाटलं होतं. जाताना तिनं एक रुमाल दिला होता तेवढीच तिची आठवण.
उडपीमध्ये जाऊन घोट दोन घोट चहा पिलो. तो जास्तच गरम वाटला. मग गोरखकडेच गेलो. म्हटलं, आज पिच्चरला जाऊया.
त्याचा काय मूड दिसत नव्हता. मग त्याच्याबरोबर मेसवर जेवायला गेलो. त्यादिवशीचं जेवणसुद्धा अगदी कुणीतरी शिक्षा देऊन जबरदस्तीनं खायला लावल्यासारखं झालं.
गोरख म्हणाला, आता काय आम्हाला विसरु नको. आठवण ठेव.
त्याचंही बरोबरंच होतं. बरंच कष्ट करुन आता कुठं त्याची गाडी सेकंड इयरला येऊन थांबली होती. अजून पाच सहा वर्षेतरी त्याला कसली भिती नव्हती. आम्ही आपले केळीच्या पानावरून घसल्यासारखे नॉनस्टॉप पुढे सरकत गेलो.
मी म्हटलं, माझी गादी वापर तू.
तो म्हणाला, म्हणजे काय? मीच उचलून आणणार हाय ती.
वाटलं जरा दारु वगैरे प्यायला पाहिजे होती. पण गोरखला तसली काय सवयंच नव्हती. मग दिलीपकडे जाऊन दोन सिगारेटी पिलो.
त्यानेपण तीच डायलॉगबाजी सुरु केली, हमे भुलियो मत. मुंबईला आल्यावर ओळख दाखव. TIAR लाच जाणार हाय ना?
म्हटलं, मी वाट बघेन.
मग रुमवर येऊन मी झोपलो.
सकाळी सामान बांधताना जाणवलं की भरपूर पसारा झालाय इथे. पुस्तकाचे गठ्ठे करुन कॉटवर ठेऊन दिले. पण पानं इतकी विखुरली होती की आवरायचा विचारंच सोडून दिला. सुटकेसमध्ये बसेल इतकंच पॅक केलं आणि बाकीचं सोडून दिलं कॉलेजला दान म्हणून.
मग गोरख आला. गादी गुंडाळून कॉटवर ठेवली. वाटलं होतं थाडीतरी पुस्तके घेईल. पण त्याने तर सगळीच घेतली.
म्हणाला, अरे एवढी बादलीतरी घेऊन जा.एवढी पण जाईत नाही का?
म्हटलं, मी पुन्हा केव्हा आलो तर मला आंघोळीला बरं पडेल. ठेव तुझ्याकडेच.
ती अवजड सुटकेस होस्टेलवरुन घेऊन जाताना वाटलं होतं अश्रू अनावर होतील. पण तसं काही झालं नाही. कधी एकदा घरी जाऊन हातातलं हे ओझं उतरवतोय असं झालं.
टेकडीवर सुप्रसिद्ध कांदापोह्याचा सुवास दरवळत होता. रिक्षात बसताना पत्र्याचा ताडमाड उभा असा बसस्टॉप दिसला. मनातल्या मनातच त्याला बाय केले. जाता जाता दूरुन कॉलेजची इमारत पाहायचं राहूनंच गेलं.
गोरख स्टँडपर्यंत सोडायला आला. म्हटलं, जा आता. जातो मी.
पण गोरख तिथून हलला नाही. हात बांधून जरा गंभीरचपणे म्हणाला, यार, तुझी खूप आठवण येईल.
मी फक्त हसलो. अवजड सुटकेस घेऊन त्याला बाय करत शेवटी एस.टी.त चढलो. गाडी रस्त्याला लागली तरी गोरख तिथेच उभा होता.
धूळदान उडवत गाडी पळू लागली. आणि सगळंच मागे पडत गेलं. आता मात्र धडपडत पुन्हा एकदा सुरुवात करावी लागणार.
...................
[समाप्त]
Book traversal links for बादलीयुद्ध १४
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
भारी झाली कथा जव्हेरजी. मजा
अरेरे, संपूच नये असे वाटत
संपली? अरेरे. अजून वाचायला
अरे काय हे?
छान झाली मालिका, अतिशय आवडली.
खूप छान!
समाप्त ?
__/\__
मस्त शेवट
संपली? छान लिहिलेत.
सुंदर!! धन्यवाद!!
कॉलेज कुठलं ?? ते सांगा की
अरे रे ! संपली ?
मस्त लेखमाला
धूळदान उडवत गाडी पळू लागली.
फक्त १४ भागांत संपवली जव्हेरभौ!
मनी