सावरकर आणि समाजकारण - पु.ल. देशपांडे

चिंतामणी's picture
चिंतामणी in जनातलं, मनातलं
24 Apr 2011 - 2:52 pm

---------------------------------------------------------------------
'सावरकरांच्या जिवनातली प्रत्येक घडी ही आत्मार्पणाचीच होती'
---------------------------------------------------------------------
नुकताच किसन शिंदे यांनी पु.ल.देशपांडे यांच्या एका भाषणाचा संदर्भ दिला होता. ते भाषण वाचताना आणि त्यातील स्वा.सावरकरांच्या उल्लेखाने त्यांच्याच अजून एका सुंदर भाषणाची आठवण जागी झाले.

स्वा. सावरकरांच्या पुण्यतिथीला, २६ फेब्रुवारी १९८३ ह्या दिवशी, अंदमानच्या सेक्युलर तुरूंगातील मैदानात पु.ल.देशपांडे यांनी भाषण केले होते. त्याचा हा गोषवारा.

-------------------------------------------------------------------------------------------------------------
मित्रहो,
माझ्या आयुष्यातली हा मी एक परमभाग्याचा दिवस समजतो. पूर्वजन्मावर माझी श्रद्धा नाही. त्यामुळे ह्या भाग्याचा मी पूर्वजन्माशी संबंध जुळवू इच्छित नाही. पण हा क्षण माझ्या आयुष्यात यावा ह्याला 'भाग्य' या पलिकडे मला काय म्हणावं ते सुचत नाही.

आपण आत्ताच सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्या खोलीचा उल्लेख अंदमानतली कोठडी असा केला जातो, परंतु ज्या वेळेला एखाद्या कोठडीमध्ये प्रत्यक्ष तेजच वस्तीला येत असतं, त्यावेळी त्या कोठडीचा गाभारा होतो. आपण आता जिथे गेलो होतो तो असाच एक गाभारा झालेला आहे. तिथे एक मुर्तीमंत तेज वावरत होत. 'तेजस्विनावधीत्मस्तु' असं आपण पुष्कळ वेळेला नुसतं म्हणतो आणि म्हटलेलं विसरुन जात असतो. पुन्हा रोज म्हणत असतो, परंतु ज्याची काया, वाचा, मन, अवघं व्यक्तिमत्व अंतबार्ह्य तेजस्वी होतं अशी अलिकडल्या काळातली भारतीय इतिहासातली व्यक्ती शोधायला गेली तर वीर सावरकरांची मुर्ती डोळ्यापुढे आल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक क्षण हा जीवन उजळण्यासाठी आहे अशा इर्षेने ते जगले. अधांराचे ते सगळ्यात मोठे शत्रू होते. मग तो अंधार अंधश्रद्धेने आलेला असो, अंधविश्वासाने आलेला असो किंवा पारतंत्र्याचा असो. त्या अंधाराविरुद्ध त्यांची झुंज होती. जीवनात प्रत्येक माणसाला तीन शक्तीशी सतत झूंज द्यावी लागते. बर्टुड रसेलने त्याचं वर्गीकरण केलं आहे. मनुष्य आणि निसर्ग, मनुष्य आणि समाज, आणि मनुष्य आणि तो स्वत: ह्या तिन्ही शक्तीशी त्याची रस्सीखेच चाललेली असते. 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' असं तुकोबांनी म्हटलं आहे. हे एक अंतर्गत युद्ध चालु असतं. आणि युद्धाचा पहिला नियम असा आहे की मी जिंकणारच आहे अशा भावनेनेच युद्धात उतरावं लागतं.सावरकरांनीसुद्धा 'मारिता मारिता मरावे' ह्याचाच जयघोष केला होता. पराजित मनाने लढणारा माणूस कधीही युद्ध जिंकू शकत नाही. सावरकरांच्या सगळ्या साहित्यातून ज्या जिवनविषयक तत्वज्ञानातून ते साहित्य निर्माण झाले होती. त्यातून जर सार काढायंचं असेल तर तर असंच म्हणावं लागेल की, केवळ राजकिय शत्रूंवरच नव्हे तर जिथे जिथे तुम्हाला अंधश्रद्धा दिसेल, अज्ञान दिसेल तिथे तिथे वीर पुरुषासारखे त्याच्यावर तुटून पडा. म्हणूनच आधुनिक काळातल्या इहवादी महर्षींमध्ये सावरकरांच नाव आदराने घायला हवे. विज्ञाननिष्ठेवरचे त्यांचे निंबंध ह्या दृष्टीने अभ्यास करण्यासारखे आहेत आणि ही विज्ञाननिष्ठा का? तर ती सदैव अज्ञानापोटी जन्माला येणाऱ्या अंधश्रद्धेच्या काळोखावर मात करायला निघालेली असते म्हणून. काळोख याचा अर्थ भय, आंधळेपण, सर्व क्षेत्रातलं आंधळेपण जावं ह्यासाठी त्यांनी आपल्या सर्वस्वाचा होम पेटवला.

आजच्या दिवसाला आपण सावरकरांच्या अत्मार्पणाचा दिवस म्हणतो. केवळ तिथीच्या हिशेबात, 'जीवनाध्वरि पडे आज पूर्णाहुती' ह्या दृष्टीने हा दिवस आत्मार्पणाचा म्हणणे संयुक्तिक होईल. पण वयाच्या सातव्या आठव्या वर्षापासून त्यांच्या जीवनातली प्रत्येक घडी ही आत्मार्पणाचीच होती. 'एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार' अश्या निष्ठेने ज्यांच्या जीवनातली वाटचाल क्रांतिपथावरुन चालत असते त्यांचा मृर्त्यु हा सांगाती असतो. आपण पुष्कळसे लोक केवळ मरता येत नाही म्हणुन जगत असतो. क्षणोक्षणी मरणाच्या धास्तीने जगत असतो. असल्या जगण्याला श्वासोच्छवास घेणे यापलिकडे फारसा अर्थ नसतो. परंतू ज्या वेळेला मनुष्य हा श्वासोच्छवास मी कशासाठी घेतो आहे याचा विचार करील त्यावेळी सार्थ जगण्याचा वाटा तो शोधायला लागेल आणि जिथे राजकिय धार्मिक किंवा आर्थिक दडपणामुळे आलेला गुदमरलेपणा, धूत:शरीरेण मृत:स जीवती अशी परिस्थिती त्याला आढळेल. जिथे जिथे म्हणून मोकळा श्वास घेता येत नाही तिथे उडी मारून तो श्वास मोकळेपणाने घेता येण्याची परिस्थिती निर्माण करण्यासाठी स्वत:चे प्राण पणाला लावेल त्याचवेळी ते जगणं खऱ्या अर्थाने पारमार्थिक होईल. आपण पारमार्थिक ह्याचा अर्थ गळ्यात माळा आणि कपाळी टिळा लावून जयजय राम कृष्ण हरी करित राहणं असा करतो पण जोवर माणुस आणि निसर्ग, माणुस आणि माणुस, माणुस आणि तो स्वत: ह्या द्वंद्वांना सामोरे जाऊन ती कोडी उलगडण्याच्या मागे लागत नाही तोवर ते जगणं केवळ आहार, निद्रा, भय, मैथुन ह्या चौकोनातच पशुवत सीमित राहिल. ते पारमार्थिक होणार नाही आणि एकदा का ह्या जीवनाचं यशार्धत्व पटलं की मग चित्त भयशून्य होत. प्रथम ते मुक्त होतं मरणाच्या महामायतून. सावरकरांना मृत्युंजय म्हणायचं ते ह्या अर्थाने.

ह्या जेलमध्ये आजसुद्धा पहा. हे पर्यटनस्थान असूनही नुसत्या त्या जेलच्या विराट स्वरुपामुळे सारं कसं भयाण वाटतं.
आपण कल्पना करा १९११ साली वर्षापूर्वी यापुढली थोडी थोडकी नाही पन्नास वर्ष या ठिकाणी डांबलेल्या असस्थेत सजा भोगण्यासाठी ते शिरत होते. भोवताली दैत्यांसारखे पहारेकरी होते ब्रिटीश सत्ता टिकवण्यासाठी. स्वातंत्र्य हा शब्द उच्चारण्यालाही ठार मारणं, त्याचे अनन्वित हाल करणं हा त्यांचा खेळ होता. अशा ह्या नरकपुरीत प्रवेश करताना सावरकरांनी उद्गार काय काढावे? ते म्हणाले होते, 'मित्रांनो एक दिवस इथे आमचे पुतळे उभे राहतील. मी जिंकणारच ह्या आत्मविश्वासाने युद्धात पडायचं असतं.' ह्या तत्वज्ञानाच्या खरेपणाचं आणखी दुसरं उदाहरण आवश्यकच नाही. हा भाबडा विश्वास नव्हता. साम्राज्यशाहिच्या आत्म्याचे गणित ते वैज्ञानिक पद्धतीने मांडू शकत होते. लोंकांमध्ये गूलामगिरीविरुद्ध द्वेष उत्पन्न होत असलेले ते पाहत होते. त्या द्वेषाला सामर्थ्या़ची जोड हवी याची त्यांना जाणीव होती. त्यासाठी प्रथम आपल्या देशबांधवांच्या मनाचे सामर्थ्य अपरंपार वाढवले पाहिजे याची तळमळ होती. त्यासाठी त्यांनी देवधर्मापेक्षा 'राष्ट्र' ह्या कल्पनेला अग्रमान दिला. आमचे देव इंग्रजांच्या बंदीत नव्हते. त्याची षोडपचार पुजा चालू होती. धर्मातही राज्यकर्ता इंग्रज लुडबुड करीत नव्हता. पण इथला माणुस मात्र त्याला सदैव दुबळाच राहायला हवा होता. सावरकरांनी हिंदु हा शब्द्च राष्ट्राला समानार्थी करुन टाकला. मी हिंदुस्थानाचाच रहिवासी आहे. माझी पुण्यभू, मातृभू, धर्मभू हिंदुस्थान हीच आहे असे म्हणणारा तो हिंदू, अशी त्यांनी धर्माची इहवादी व्याख्या बनवली आणि त्या हिंदुला समर्थ करण्यासाठी त्यांनी इथल्या रहिवाश्यांना तुम्ही 'अमृताचे पुत्र' अहात. तुम्ही मरण स्विकारायचे आहे ती होतात्म्यातून तुम्हाला अमर करणारे- हा मंत्र सांगितला हिंदू-मुसलमान-खि्स्ती कुणाचाही देव दुबळ्याच्या मदतीला धावत नाही हे ते पक्के जाणुन होते. त्यांनी सतत जर कसला धिक्कार केला असेल तर तो दुबळेपणाचा. दैववादाचा, मनुष्य बुद्धीच्या निकषावर प्रत्येक गोष्ट घासून मगच ती स्विकारतो. त्यावेळी त्याच्या आचारविचारांत एक निराळेच तेज दिसू लागते. तो जय-पराजयाची भाषा करीत नाही प्रयत्नात आपण कमी पडलो असे मानुन पराजयाच्या क्षणीही पुन्हा उठुन उभा राहतो. मर्ढेकरांनी म्हटलं आहे 'भावनेला येऊ दे गा शास्त्रकाट्य़ाची कसोटी.' अखाद्या दृश्याने किंवा कल्पनेने भावनाबंबाळ होणं ह्याला अर्थ नाही. उदाहरणार्थ हा सेल्युलर जेल पाहून मी लगेच भावनाविव्हळ होऊन ओक्साबोक्सी रडायला लागणं आणि थयथयाट करून मला किती दु:ख झालं आणि सावरकरांना भोगाव्या लागलेल्या भळाच्या आठवणींनी मी किती व्हिवळ झालो याचं प्रदर्शन माम्डणं म्हणजे माझी भावना शंभर टक्के खरी आहे असं नाही. एखाद्या गोष्टीच्या बाबतीतली उत्कट भावना तिला अश्रूंची वाट करून देण्याने सिद्ध होत नाही. उलट स्वत:ला आवर घालून जे कार्य हाती घ्याचं असतं. ते करण्याच्या हेतूने सामर्थ्य मिळायला लागणे हे महत्वाचं असतं.

आत्ताच श्री. हर्षे यांनी सांगितलं की सावरकरांच्या विषयीच्या माझ्या काही आठवणी असल्या तर त्या मी सांगाव्या. खरं सांगायचं तर त्यांच्याजवळ जाण्याची छाती आणि हिंमत मला नव्हती. सुर्याचं तेज दुरून घ्यावं, फार जवळ गेलो तर भस्मसात होण्याची भि्ती. त्यामुळे आम्ही सावरकरांना भेटत आलो ते त्यांच्या पुस्तकातून. पण माझ्या आयुष्यात एक सुंदर क्षण आला होता तो म्हणजे परशुरामभाऊ कॉलेजच्या मैदानावर त्यांचा मृत्यंजय समारंभ झाला त्यावेळी मी त्यांचे भाषण ऎकलं.

पारल्याला माझ्या लहानपणी सावरकरांची टिळक मंदिरात झालेली भाषणंही मी ऎकली आहेत. चांगल्या वक्तृत्वाच्या बाबतीत आपण 'गंगेसारखा ओघ' असं म्हणतो. त्या ओघाचा साक्षात्कार सावरकरांइतका शंभरटक्के मला कोणत्याही भाषणाने झाला नाही. विचार आणि उचार एकाच सामर्थ्याने तळपत असायचे. मातृभाषाप्रेम हा राष्ट्रप्रेमाचाच एक महत्वाचा घटक असतो. सामर्थ्याच्च्या उपासनेत आपल्या भाषेला जुलमी राज्यकर्त्याच्या उदासीपणातून, अवलबित्यातून वाचवणं हा विवेक सावरकरांच्या भाषाशुद्धीच्या चळवळीमागे होता. वास्तविक एंग्रजीवर त्यांच चांगलंच प्रभुत्व होतं. मराठी भाषणाच्या ओघात एकादा मुळातला इंग्रजी उतारा स्मरणाने धडाधड म्हणत. कुठल्याही सोवळेपणाच्या भावनेने त्यांनी इंग्रजीला अब्रहण्यम मानले नाही. त्यांना आमान्य होतं ते दुबळेपणाच्या भावनेने विदेसी भाषेतल्या श्ब्दांची घूसखोरी चालू देणं. सावरकरांची ही राष्ट्रीय अस्मिता जागवण्याची भावना ज्यांनी समजून घेतली नाही. त्यांनी त्यांच्या भाषाशुद्धीची चेष्टा केला. हे शब्द रूढच होणे शक्य नाही असे म्हणायला सूरुवात केली. पण ते सरकारी शब्दांच्या टाकसाळीत तयार केलेले नव्हते. एका प्रतिभावंत कवीची ती निर्मीती होती.

सरकारात मोले घातले रडाया (की खरडाया?) ह्या भावनेने भाषाशुद्धीचे पगारी कर्मचारी जेव्हा बसतात तेव्हा"ते इकडली इंग्रजी डिक्शनरी आणि कर त्याचा मराठी शब्दकोश' असा व्यवहार चालतो. सावरकरांना तो शब्द कोशात पडून राहणारा नको होता. तो कवितेसारखा लोंकाच्या तोंडी रूळायला हवा होता. त्यांनी रिपोर्टरला 'वार्ताहर' हा शब्द निर्माण केला. वार्ता खेचून आणणारा. इथे इंग्रजी शब्दाच्या ठिकाणी मराठी प्रतिशब्द असे होता, एक कविनिर्मीत प्रतिमा तयार झाली. प्रारंभी थट्टेवारी नेलेले शब्द व्यवहारात आले. हे शब्द सावरकरनिर्मीत आहेत ह्याचा देखील लोकांना विसर पडला. आज महाराष्ट्रात सामान्य माणसाला मेयरपेक्षा महापौरच जास्त अप्रिचित आहे. वृत्तपत्रांच्या क्षेत्रात तर संपादकापासुन स्तंभापर्यंत अनेक मराठी शब्द त्यांनी दिले आहेत. तीच गोष्ट चित्रपटसुर्ष्टीची, दिग्दर्शन, संकलन, ध्वनिमुद्रण, पटकथा हे सारे त्यांचे शब्द. मराठीला त्यांचं हे सत्व जागविण्यासाठी दिलेल मोठं देण आहे. शिवाय ते उत्तम वक्ते असल्यामुळे शब्द निर्मिती करताना त्यात उच्चारांचा सोपेपणाही त्यांनी सांभाळला. पुष्कळदा मला वाटतं की भाषेचं सामर्थ्य म्हणजे काय, ओघवती भाषा म्हणजे काय ह्याचा मुलांना साक्षात्कार घडवायचा असेल तर त्यांच्याकडून सावरकरांचे 'माणसाचा देव आणि विश्वाचा देव.' दीन शब्दांत संस्कृती, ह्या सारखे निंबंध मोठ्याने वाचून घायला हवेत. वैचारिक संस्कार आणि भाषेचे उत्तम संस्कार ह्या दोन्ही दृष्टीनी हे वाचन उपयोगी ठरेल. सावरकरांच्या जीवनात तर ग्रीक नाट्य़ातल्या महान नायकांसारखं नाट्य होतं. आणि ते त्यांच्या वाणी-लेखणीतूनही ओसंडत होतं. ते स्वत: नाटककार, थोर कवी असल्याचा दुर्दवाने त्यांच्या केवळ राजकिय कर्तूत्वाकडेच पाहिल्यामुळे विसर पडतो. 'उत्कट भव्यतेज्याचे मिळमिळीत अवघेची टाकावे' हा समर्थांचा उपदेश सावरकरांइतका तंतोतंत आचरणात आणलेला क्ववित आढळतो. त्यामुळे कवितेत देखील ते कल्पनेची हिमालयीन शिखरे गाठतात. प्रियकर प्रेयसीच्या मीलनाच्या प्रतिक्षा काळाबद्दल कविता लिहिताना ते म्हणतात-

'शतजन्म शोधताना शत आति व्यर्थ झाल्या !
शत सुर्यमालिकांच्या दिपावली विझाल्या !’

कालाचं किती विराट स्वरूप दोन ओळीत त्यांनी उभं केलं आहे पहा ! एका सुर्य मालिकेचं चित्र डोळ्यांपुढे आणताना आपण थकून जाऊ हा महाकवी शतसुर्यमालिकांच्या दिपावली विझाल्या म्हणून जातो. इतकी प्रचंड प्रतिमा घेऊन आलेल्या ह्या कोठडीत राहावं लागलं आणि ही भयाण कोठडी 'कमला सप्तर्षी, विरहाच्चवास असल्या प्रतिभेची उत्तुंग शिखर दाखवून देणाऱ्या काव्यांचं जन्मस्थळ ठरली.

ह्या कोठडीत त्यांनी जे हाल सहन केले त्याची कल्पना 'माझी जन्मठेप' वरुन येते. पण मला वाट्तं. त्यांनी खरोखरी जे शारीरिक आणि मानसिक हाल सहन केले असतील त्यातल्या एक दशांशाचं सुद्धा वर्णन त्यात लिहिलेलं नसेल. कारण हालाच वर्णन करताना त्यांना जराही संषय आला असावा की ह्या कथनामुळे लोकांच्या मनात करुणा उत्पन्न होणार आहे. तर त्या महापुरूषाला ते कदापीही रुचलं नसतं. म्हणून मला नेहमी वाटतं की इथे झालेले सगळे हाल त्यांनी लिहीलेच नाहीत. त्यांना हे पुस्तक वाचुन एखाद्या आजीबाईंनी 'आई आई गं काय हो हे हाल' म्हणायला नको होत, त्यांना असल्या हालावर मी मात करीत अशा विश्वासाने ह्या संकटात उडी टाकायला सिद्ध होणारा तरुण वाचक अभिप्रेत होता. स्वत:बद्दलची कणव निर्माण करण्याचा किंवा आपल्या त्यागाचे भांडवल करण्याचा तिटकारा होता. वार्ध्यक्याच्या काळात ते कुणालाही भेटायला उत्सुक नसत. 'त्याच कारण मला तरी असं वाटतं, की आपल्या आयुष्यातल्या थकलेल्या अवस्थेत आपल्याला कुणी पहावे हे त्याना आवडणं शक्य नव्हतं. एखाद्या म्हाताऱ्या सिंहाला वाचा फूटली तर तो जसा म्हणेल. 'मला सर्कशीतला सिंह म्हणून काय पहाता. जंगलात हत्तींची गंडस्थंळ फोडीत होतो तेव्हा पहायचं होतंत-' त्याच वृत्तीने ते एक प्रकारच्या एकांतात राहिले त्या वाधंक्यात एकच व्याधी त्यांना आतून पोखरत होती. ती म्हणजे देश दुभंगल्याची अशा अवस्थेतच त्यांनी मृत्युला आपण सामोरे जाऊन भेटण्याचा निश्चय केला.

विज्ञाननिष्ठ सावरकरांचे त्यांना धर्माभिमानी संकुचित म्हणणाऱ्यांना त्यांच्या मृत्युच्या प्रसंगी एक हादरून टाकणारे दर्शन झाले. आपल्याकडे बहुतेक लोकांची बुद्धिनिष्ठा औद्वदेहीक संस्काराच्या प्रसंगी लुळी पडते. परंपरागत रुढींचे पालन केले नाही. तर मानगुटीला बसेल त्याला नरकवास घडेल अशी नाना प्रकारची भीती मनात असते. मरणाऱ्याचीही आपल्याला मंत्राग्नी मिळावा-भंडांग्नी नको अशी अखेरची इच्छा असते आणि मुख्यत भितीपोटी ह्या इच्छेला त्याचे उत्तराधिकारी मान देत असतात. आणि अशा ह्या परिस्थितीत सावरकर आपल्या अखेरच्या इच्छापत्रात आपलें शव विद्दुत दाहिनीत टाकून द्यावे अशी इच्छा व्यक्त करतात. हे शव आहे त्याला एक काष्ठ या पलिकडे अर्थ राहिलेला नाही असं मानणं हे आद्द शंकराचार्यासारखं झालं. आद्द शंकराचार्याची आई मरण पावली. ब्राह्मणांनी तिच्या अंत्यंसंस्कारावर बहीष्कार टाकला. मृतदेह एकट्या शंकराचार्यांना उचलून स्मशानात नेता येईना. त्यांनी हे काष्ठ आहे. असं म्हणुन त्या मृतदेहांचे तीन तुकडे केले आणि एकेक तुकडा नेऊन दहन केले. विज्ञानिष्ठेची हीच परंपरा सावरकरांनी पाळली. आज आम्ही पाहतो. स्वत:ला सेक्युलर म्हणवणारे लोक आपल्या इच्छापत्रात आपली रक्षा कुठल्या सोर्वात नेऊन टाकावी हे नमुद करतात. मरणानंतर इतरांवर संकुचित धार्मिक्तेचा आरोप करणाऱ्या नेंत्यांच्या रक्षा विसर्जनाचा तमाशा दहा दहा दिवस चाललेला असतो आणि सावरकर मात्र आपले शव विद्दुतदाहिनीत टाका म्हणतात.(विद्दुत दाहिनी हा शब्दही त्यांचाच असावा असे मला वाटते.) मंत्रपठणाची गरज नाही म्हणतात. नंतरच्या क्रियाकर्माची आवश्यकता नाही म्हणून बजावतात. आयुष्यभर सावरकर ह्या बुद्धिनिष्ठेचा पाठपुरावा करीत आले. अंधश्रद्धा माणसाला दुबळं करते हे सांगत आले. इहवादाचा पुरस्कार करीत आले. राष्ट्रहिताविरुद्ध कारवाया करणाऱ्यां अनुयायी मिळवण्यासाठी त्यांनी सत्याशी तडजोड करणे नाकारले. सावरकारांनी गाईला केवळ एक उपयुक्त पशू म्हटल्यावर तिच्या पोटातल्या तेहतीस कोटी देवांच्या भाकड काथांवर आपली तुंबडी भरणारे त्यांच्यावर तुटून पडले होते.

यापुढे धर्मभोळ्या-मंत्रतंत्राच्या युगात आपल्याला राहयचं नसून विज्ञानीने समर्थ झालेल्या जगात जगायचं आहे हा विचार एका विलक्षण द्वष्टेपणाने ते मांडत आले. त्या नव्या जगात जगायला आपण नालायक ठरलो तर आपण आदिम अवस्थेतल्या जमातीतल्या माणसांसारखे ठरणार आहोत, बावळट ठरणार आहोत. अशा प्रकारच्या बावळटपणाला सावरकरांना तिटकरा असे. त्यांना दुबळा, वाकलेला, लाचार असा माणुस सहनच होत नसे. तेज:पुजतेने आकर्षण त्यांच्या साहित्यातून सदैव प्रकट झालेले दिसते. स्वातंत्र्याचं नातं देखील त्यांनी ’आत्मतेजीवाले’ प्रकटणाऱ्या रवीशी जुळवलेलं आहे, त्यांनी शेवटी मृत्युला अलिंगन दिले. ते देखील तेजाच्या एका ज्योतीने दुसऱ्या प्रचंड ज्योतीत मिळून जावे तरी. मृत्युला आपल्यावर झडप घालू न देता त्याच्या दरबारी ते धोरदात्त नायकासारखे चालत गेले. समिधेसारखं जीवन जगणाऱ्या सावरकरांची जीवनयद्वत स्वखुशीने आहुती पडली.

आपण आत्ताच ह्या बंदिगृहातल्या त्यांच्या एका गाभाऱ्यात जाउन आलो. निर्भयतेचा एक उपासक तिथे ठेवला गेला होता. नाना प्रकारचे हाल त्याला सहन करावे लागले. कोणासाठी त्यांनी ते सर्व सोसलं? तुमचा आमचा श्वासोच्छवास स्वतंत्र हिंदुस्थानातल्या हवेत मोकळेपणाने घेता यावा म्हणून. आज आपण इथे येतो. निर्भयपणाने हा भयाण कारागृहात हिंडतो. ती, सावरकरांची आणि राजबंदी म्हणून ज्या क्रांतिकारकांना इथे जन्मठेपेची सजा भोगावी लागली त्यांची पुण्याई आहे. त्या पुण्याईचे आज आपण स्मरण करतो म्हणुन आजच्या दिवसाला आपण सावरकरांची पुण्यतिथी म्हणतो. त्यांनी मिळवलं ते पुण्य जपजाप करुन नव्हे तर आयुष्याचं मौल देऊन निर्भयतेची साधना करुन आणि ती साधना कृतीत उतरवून अशा प्रसंगी त्या निर्भयतेचा थोडा तरी अंश आपल्यात उतरो ही आपली प्रार्थना असायला हवी.
प्रार्थनेचा उल्लेख आल्यावर मला स्त्रोत्राची आठवण आली. मी वाचलेल्या स्त्रोत्र-साहित्यात मला सगळ्यात आवडलेल स्त्रोत्र कुठलं असेल तर ते सावरकरांनी लिहिलेलं स्वतंत्रेच स्त्रोत्र. ’जयोस्तुते श्री महन्मगंले शिवास्पदे शुभदे.’ ह्या जयोस्तुतेच्या संदर्भात माझ्या मनाला स्पर्श करुन गेलेली एक घटना सांगितल्याशिवाय मला राहवत नाही. अस्पृश्यता निवारणाविषयींच्या सावरकरांच्या तळमळीविषयी आणि सहभोजन, मंदिरप्रवेश इत्यादी कार्यक्रमांविषयी मी आपल्याला सांगायला पाहिजे असं नाही. काही वर्षापूर्वी मी सांगलीजवळ म्हैसाळ म्हणून गांव आहे तिथे मधुकरराव देवल यांनी दलितांच्या सहकारी शेती संस्थेचा प्रयोग केला आहे तो पहायला गेलो होतो. भारतातल्या उत्तम ग्रामिण प्रकल्पापैकी हा एक प्रकल्प आहे. एक काळ असा होता की वस्तीतल्या स्त्रियांच्या अंगावर लज्जरक्षणापुरतीही वस्त्रं नसायची म्हणून त्यांना झोपडीबाहेर पडणं मुष्किल होतं. तिथे आम्ही गेलो त्या दलित वस्तीतली सर्व स्त्रीपुरूष मंडळी लग्नंसमारंभाला जावे तसा पोषाख करुन जमली होती. सहकारी शेतीने त्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवून आणलं होतं आणि ते केवळ आर्थिक परिवर्तनच नव्हतं हे लगेच माझ्या लक्षात आलं. त्या स्त्रियां समारंभात गाणं म्हणणारं होत्या. अलीकडे कुठेही सभेला गेल्यावर गाणी ऎकावी लागतात ती बहुदा सिनेमातली किंवा प्रसंगाला साजेशी अशी तितल्याच शाळेतल्या गुरुजीनीं कानामात्रांची यथेच्छ मोडतोड करून जुळवलेली स्वागतपर पद्दं. आणि इथे पेटीवाल्यांनी सुर धरला तबलजीने ठेका सुरू केला आणि अस्खलित वाणीने त्या दलित भगिनींनी गाणे सुरू केले. - जयोस्तुते श्री महन्मगंले शिवास्पदे शुभदे! स्वतंत्रते भगवती त्यामहं यशो युतावंदे! माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. ज्या दलितांचे जीवन सुधारावं, त्यांना समाजात मानाने जगता यांव- मोकळेपणाने गाता यांव वावरता यांव म्हणून सनातनी धर्मबांधवांचे शिव्याशाप सहन करित ज्या सावरकरांनी जींवाचं रान केलं त्यांनी रचनेत हे स्त्रोत्र मुक्तमनाने दलित स्त्रिया बिनचुकपणाने उत्तम सुराचालात गात होत्या. एखाद्याचं पुण्य फळाला येणं म्हणजे काय याचा मला त्या क्षणी अनुभव आला.

अशा या पुण्यशाली महापुरुषाला जिथे बंदिवास घडला ते हे क्षेत्र आता इहवादी सत्पुरुषाचं जिथे स्मरण करावं असं तिर्थक्षेत्र झालेलं आहे. ज्यामुळे आपल्या मनाला स्नान घडतं ते तिर्थ असं मी मानतो. भयाने, स्वार्थाने, संकुचीत वृत्तीने मालिन झालेली आपली मन धुवायला आपण आता ठिकाणी येतो. बाळारावांनी आणि श्री. हर्षे यांनी इथे सर्वांना एकत्र आणण्याचा योग आणला. त्यांच्या आयोजनामुळे इथे येण्याचे भाग्य मला लाभले, मी त्यांचा आभारी आहे.
वीर सावरकरांच्या स्मृतीला मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो. ह्या सभेची सांगता एकेकाळी ज्या गीताने आपले सारे राष्ट्र जागृत झाले होते त्या त्या गिताचे पडसाद ह्या बंदिक्षेत्रात उठवून आपण करुया. मुक्त मनाने वंदेमातरम गाऊ या धन्यवाद !

इतिहाससाहित्यिकविचारलेखसमीक्षा

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

24 Apr 2011 - 3:27 pm | किसन शिंदे

चिंतामणी यांचे आभार.

प्रास's picture

24 Apr 2011 - 3:23 pm | प्रास

चिंतामणीकाका, एका चांगल्या भाषणाच्या नव्याने दिलेल्या गोषवार्‍याबद्दल आभारी आहे. यातला प्रत्येक विचार अगदी झणझणीत अंजन आहे.

धन्यवाद!

यशोधरा's picture

25 Apr 2011 - 6:08 pm | यशोधरा

असेच म्हणते

सुधीर१३७'s picture

24 Apr 2011 - 3:30 pm | सुधीर१३७

वक्ता आणि ज्याव्यक्तिबद्दल भाषण केले गेले या दोन्ही व्यक्तिंबद्दल केवळ आपल्या आचरणातूनच आपण आदर व्यक्त करु शकतो.

.....चिंतामणी, धन्यवाद!!

अप्पा जोगळेकर's picture

24 Apr 2011 - 3:54 pm | अप्पा जोगळेकर

एक अतिशय चांगल्या भाषण पुन्हा एकदा वाचायला मिळाले. चिंतामणी याचे आभार.

सर्वसाक्षी's picture

24 Apr 2011 - 4:38 pm | सर्वसाक्षी

पु. लं. चे श्रवणीय भाषण इथे दिल्याबद्दल आभार.

चतुरंग's picture

24 Apr 2011 - 4:41 pm | चतुरंग

सुरेख विचार. तात्यारावांबद्दल इतके समर्पक शब्दात आणि नेटकेपणाने विचार मांडणे सोपे नव्हे. अतिशय सुंदर भाषण इथे उधृत केल्याबद्दल धन्यवाद!

-रंगा

स्वाती२'s picture

24 Apr 2011 - 4:57 pm | स्वाती२

धन्यवाद चिंतामणी! हे भाषण माझ्या संग्रहात होते पण घरे बदलली त्यात कुठे तरी हरवले. तुमच्यामुळे हा ठेवा पुन्हा एकदा गवसला. धन्यवाद!

धन्यवाद चिंतामणीसो,

एक खुप छान भाषण या निमित्तानं वाचायला मिळालं.

नितिन थत्ते's picture

25 Apr 2011 - 9:04 am | नितिन थत्ते

भाषण इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.

सावरकरांची विज्ञाननिष्ठा नेहमीच आदरणीय+अनुकरणीय वाटलेली आहे.

पंगा's picture

26 Apr 2011 - 1:10 am | पंगा

सावरकरांची विज्ञाननिष्ठा नेहमीच आदरणीय+अनुकरणीय वाटलेली आहे.

माफ करा, पण या आख्ख्या लांबलचक भाषणात सावरकरांच्या विज्ञाननिष्ठेचा उल्लेख करणारी दोन ते तीनपेक्षा* अधिक वाक्ये मला शोधूनदेखील सापडू शकली नाहीत. तो या भाषणाचा फोकस नसावा.

* "विज्ञाननिष्ठेवरचे त्यांचे निंबंध ह्या दृष्टीने अभ्यास करण्यासारखे आहेत आणि ही विज्ञाननिष्ठा का? तर ती सदैव अज्ञानापोटी जन्माला येणाऱ्या अंधश्रद्धेच्या काळोखावर मात करायला निघालेली असते म्हणून." बस, एवढेच. (परिच्छेद २मधून उद्धृत.)

त्याशिवाय, "साम्राज्यशाहीच्या आत्म्याचे गणित ते वैज्ञानिक पद्धतीने मांडू शकत होते" (परिच्छेद ४मधून उद्धृत.) या वाक्याचा अर्थ लागू शकला नाही**. गणिताच्या नेमक्या कोणत्या शाखेत हे शक्य होते? शिवाय, 'आत्मा' आणि 'वैज्ञानिक पद्धत' हे दोन शब्द एकाच वाक्यात पाहून मौज वाटली.

** अर्थात, वैज्ञानिक पद्धतीबद्दलच्या माझ्या अज्ञानाची पातळी सर्वज्ञात आहे. त्यामुळे केवळ कॉमन सेन्स***च्या आधारावर अर्थ लावणे भाग पडले. जमले नाही. तरी तज्ज्ञांनी कृपया - इच्छा असल्यास, आणि मुख्य म्हणजे जमल्यास - खुलासा करावा.

*** याला विद्वज्जनांत 'धादान्तवाद'**** की कायसेसे म्हणतात, असे ऐकून आहे. (सावरकरांना आवडण्यासारखा प्रतिशब्द!)

**** नुसता पोकळ शब्दांचा डोलारा! 'कॉमन सेन्स' सारखा साधासोपा आणि पब्लिकच्या तोंडात रुळलेला शब्द सोडून 'धादान्तवादा'सारखा फारसा कोणाच्या तोंडी नसलेला शब्द ओढूनताणून वापरायचा झाले.*****

***** तमाम विद्वज्जन सावरकरवादी असावेत काय?

नितिन थत्ते's picture

27 Apr 2011 - 8:28 am | नितिन थत्ते

मला हे पण सापडले....

सावरकर मात्र आपले शव विद्दुतदाहिनीत टाका म्हणतात.(विद्दुत दाहिनी हा शब्दही त्यांचाच असावा असे मला वाटते.) मंत्रपठणाची गरज नाही म्हणतात. नंतरच्या क्रियाकर्माची आवश्यकता नाही म्हणून बजावतात. आयुष्यभर सावरकर ह्या बुद्धिनिष्ठेचा पाठपुरावा करीत आले. अंधश्रद्धा माणसाला दुबळं करते हे सांगत आले. इहवादाचा पुरस्कार करीत आले. राष्ट्रहिताविरुद्ध कारवाया करणाऱ्यां अनुयायी मिळवण्यासाठी त्यांनी सत्याशी तडजोड करणे नाकारले. सावरकारांनी गाईला केवळ एक उपयुक्त पशू म्हटल्यावर तिच्या पोटातल्या तेहतीस कोटी देवांच्या भाकड काथांवर आपली तुंबडी भरणारे त्यांच्यावर तुटून पडले होते.

यापुढे धर्मभोळ्या-मंत्रतंत्राच्या युगात आपल्याला राहयचं नसून विज्ञानीने समर्थ झालेल्या जगात जगायचं आहे हा विचार एका विलक्षण द्वष्टेपणाने ते मांडत आले. त्या नव्या जगात जगायला आपण नालायक ठरलो तर आपण आदिम अवस्थेतल्या जमातीतल्या माणसांसारखे ठरणार आहोत, बावळट ठरणार आहोत.

>>तमाम विद्वज्जन सावरकरवादी असावेत काय? (विद्वज्जन या शब्दातून पंगा यांना काय अभिप्रेत आहे माहिती नाही)

सावरकरवादी असण्याची अनेक कारणे असावीत. प्रत्येक विद्वान किंवा सामान्य मनुष्य त्या सर्वच कारणांसाठी सावरकरवादी असणार नाही.

अवांतर: दलितांनी जयोस्तुते शुद्ध व अस्खलित म्हणण्यात सावरकरांच्या दलितोद्धाराचे सार्थक असू नये याच्याशी सहमत.

पंगा's picture

27 Apr 2011 - 8:13 pm | पंगा

सावरकर मात्र आपले शव विद्दुतदाहिनीत टाका म्हणतात.(विद्दुत दाहिनी हा शब्दही त्यांचाच असावा असे मला वाटते.) मंत्रपठणाची गरज नाही म्हणतात. नंतरच्या क्रियाकर्माची आवश्यकता नाही म्हणून बजावतात. आयुष्यभर सावरकर ह्या बुद्धिनिष्ठेचा पाठपुरावा करीत आले. अंधश्रद्धा माणसाला दुबळं करते हे सांगत आले. इहवादाचा पुरस्कार करीत आले. राष्ट्रहिताविरुद्ध कारवाया करणाऱ्यां अनुयायी मिळवण्यासाठी त्यांनी सत्याशी तडजोड करणे नाकारले. सावरकारांनी गाईला केवळ एक उपयुक्त पशू म्हटल्यावर तिच्या पोटातल्या तेहतीस कोटी देवांच्या भाकड काथांवर आपली तुंबडी भरणारे त्यांच्यावर तुटून पडले होते.

यात 'रूढींच्या अंधानुकरणास विरोध' आहे, मान्य. 'बुद्धिनिष्ठा'ही समजू शकतो. 'विज्ञाननिष्ठा' कुठे आली?

'विद्युद्दाहिनी वापरण्याचा आग्रह' हा फार तर 'अद्ययावत गोष्ट वापरण्याचा कंझ्युमेरिस्ट अट्टाहास किंवा हव्यास' म्हणता येईल. म्हणजे घरातला जुना पिच्चर ट्यूबवाला टीव्ही व्यवस्थित चालत असताना 'आम्हाला लेटेष्ट मॉडेलचा फ्ल्याटस्क्रीन एलसीडी टीव्ही पाहिजे' म्हणण्यासारखे. (त्यात काही गैर आहे असा दावा नाही. माणसाला नवनवीन वस्तूंची हौस असू शकते.) पण त्यात जोपर्यंत तो फ्ल्याट स्क्रीन एलसीडी टीव्ही (किंवा विद्युद्दाहिनी) नेमका कसा चालतो (/चालते) याचे वैयक्तिक ज्ञान किंवा संशोधन नाही, त्यातील पुढील सुधारणांसंबंधी (प्रॉडक्ट डेवलपमेंट किंवा इंप्रोवायझेशन अशा अर्थी) संशोधनाकरिता काही वैयक्तिक इन्पुट किंवा योगदान नाही, तोपर्यंत त्याला 'विज्ञाननिष्ठा' म्हणता येईल काय?

मुंबई ते ठाणे जी पहिली झुकझुकगाडी धावली, तेव्हा तिला 'चाक्या म्हसोबा' म्हणून तिच्यासमोर नारळ फोडणारांपैकी अनेकांनी पुढे 'साहेबाचा पोर्‍या मोठा अकली, बिनबैलाची गाडी कशी ढकली' म्हणतम्हणत का होईना, पण (तिकीट काढून किंवा विनातिकीट) ती झुकझुकगाडी पुढे प्रवासाकरिताही वापरली असेल. अट्टाहासाने वापरली असेल. (सोयिस्कर असेल, तर का नाही वापरणार?) ते सगळे 'विज्ञाननिष्ठ' झाले काय? 'रेल्वेचे जे काय दीडदोन पैशाचे किंवा त्या काळी जे काही भाडे असेल तितक्या पैशांचे तिकीट विकत घेणे' एवढ्या भांडवलावर स्वतःला 'विज्ञाननिष्ठ' म्हणवून घेता यावे काय? झुकझुकगाडीचे तिकीट हे विज्ञाननिष्ठांच्या मांदियाळीचेही तिकीट ठरावे काय?

'उपभोक्तावाद' ही ऑपॉप 'विज्ञाननिष्ठा' कशी काय होऊ शकते? ('उपभोक्तावादा'त नेमके गैर असे काही असावेच असे नाही हे मान्य करूनही.)

बाकी, 'विद्युद्दाहिनी' हा शब्द बनवणे हे सावरकरांच्या भाषाशुद्धीच्या ध्येयाशी सुसंगत असेलही, परंतु असा एखादा शब्द बनवणे यातही 'विज्ञाननिष्ठा' नेमकी कोठे आली?

(त्याशिवाय, "साम्राज्यशाहीच्या आत्म्याचे गणित ते वैज्ञानिक पद्धतीने मांडू शकत होते" यांसारखी वाक्ये केवळ अनाकलनीय. कोनाड्यातल्या हिंदमातेची आठवण आल्यावाचून राहिली नाही.)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Apr 2011 - 8:26 pm | निनाद मुक्काम प...

पंगा शेठ
अहो त्याकाळात अनेक लोक रूढी व परंपरा म्हणून पारंपारिक पद्धतीने आपला अंत्यसंस्कार करत व नंतर उर्वरीत सोपस्कार करत .ह्या जुन्या रूढींना सारून त्याकाळात अत्यंत व्यवहारी व सोपा आणी पर्यावरणाचे रक्षण करणारा ( वृक्ष तोड न होता ) विद्युत द्हीनीचा वापर करावयाच त्यांनी सांगितले .
.( पूर्वी दूरदर्शन वर ७ दिवस आणीबाणी लादून राष्ट्रीय नेते चंदनच्या लाकडांवर तुपाचे ढीग ओतून आपला शेवटचा सार्वजनिक सोहळा समस्त भारतीय जनतेला दाखवायचे .त्यांचे आप्त स्वकीय काळा गॉगल लावून रीन की सफेदी दाखवायचे .त्या काळात सावरकरांचा निर्णय हा तत्कालीन जुनाट रूढी विरुद्ध होता व पर्यावरणाला पोषक होता .असे मला वाटते .
बाकी एक शब्द असतांना दुसरा शब्द अनेक भाषांमध्ये असतो ( सावरकरांनी मराठी माषेत समानार्थी शब्द वाढवले व त्याने भाषेच्या शब्द भांडारात भर पडली .लोकांना ती वापर्यांचे पर्याय उपलब्ध झाले .

पंगा's picture

27 Apr 2011 - 10:24 pm | पंगा

ह्या जुन्या रूढींना सारून त्याकाळात अत्यंत व्यवहारी व सोपा आणी पर्यावरणाचे रक्षण करणारा ( वृक्ष तोड न होता ) विद्युत द्हीनीचा वापर करावयाच त्यांनी सांगितले .

वीज कोठून येते? Long tailpipe theoryबद्दल आपण ऐकलेले नाही काय?

(विजेच्या वापराला माझा व्यक्तिशः विरोध नाही, पण) पर्यावरणवादच जर यात मध्ये आणायचा असेल, तर मग विजेचा वापर हा ऑपॉप पर्यावरणवादी होतो, हे गृहीतक तपासल्याशिवाय तसेच स्वीकारता येईल काय?

वीजनिर्मिती ही सामान्यतः एक तर लाकूड किंवा कोळसा यांसारखी इंधने जाळून व्हावी (म्हणजे प्रदूषण आले आणि लाकडाच्या पर्यायात वृक्षतोड आली.) किंवा धरणांतून, पाण्याचा कडेलोट करून त्यावर जनरेटर ('जनित्रे') चालवून व्हावी (म्हणजे धरणे बांधण्यासाठी गावांचे विस्थापन वगैरे आले आणि कदाचित त्याबरोबर वृक्षतोडही आली.). (अणुऊर्जेतून वीजनिर्मिती वगैरे प्रकार सावरकरांच्या काळी असावेत का, याबद्दल साशंक आहे.) म्हणजे, वृक्षतोड, पर्यावरणाचा र्‍हास वगैरे बाबी फक्त उपभोक्त्याच्या ठिकाणापासून दूर होऊन इतरत्र गेल्या.

म्हणजे विजेच्या वापरातून पर्यावरणाचा र्‍हास टळला वगैरे नाही. दृष्टीआड झाला, इतकेच.

हं, आता हा (वीज न वापरल्याने) जागच्याजागी होणारा र्‍हास विरुद्ध (वीजनिर्मितीतून झालेला) इतरत्र गेलेला र्‍हास यांचे गणित मांडून तुलना करता येईल. त्यातून कोणता पर्याय अधिक पर्यावरणवादी, वगैरे निष्कर्ष काढता येतील. कोण जाणे, कदाचित Long tailpipe theoryत फारसे तथ्य नाही, असेही कदाचित या गणितातून सिद्ध होईल. हे गणित मी केलेले नाही, त्यामुळे नक्की काय ते मला माहीत नाही.

मुद्दा हा आहे, की (१) सावरकरांनी हे गणित केलेले होते काय? तसे गणित त्यांनी स्वतः केलेले असल्याबद्दल काही माहिती आहे काय? की (२) 'विद्युद्दाहिनीच्या वापरात वृक्षतोड ही डोळ्यांना दिसत नाही, त्यामुळे हा पर्याय वरकरणी पर्यावरणवादी वाटतो' या 'फीलगुड फ्याक्टर'वर आपले गृहीतक आधारलेले होते? की (३) विजेचा वापर हा अद्ययावत पर्याय आहे, त्यामुळे वैज्ञानिक प्रगतीचे लक्षण म्हणून बाय डिफॉल्ट 'विज्ञाननिष्ठ' पर्याय आहे, असे काही गृहीतक होते?

(२) हा पर्याय असल्यास काही आक्षेप नाही, शेवटी मानवी स्वभाव आहे आणि सावरकरही मानव होते. पण त्या परिस्थितीत त्यांचा विद्युद्दाहिनीचा आग्रह हा त्यांच्या विज्ञाननिष्ठेचे द्योतक म्हणता येईल का, याबद्दल साशंक आहे. (३) हा पर्याय 'विज्ञाननिष्ठ' पर्याय ठरू शकतो की नाही, याबद्दल खात्री नाही, परंतु निदान पर्यावरणाच्या कारणावरून तरी तो 'विज्ञाननिष्ठ' ठरू नये (कारण त्या दृष्टीने पुरेशी चिकित्सा झालेली नाही). (१) हा पर्याय योग्य आहे याबद्दल काही खात्रीलायक माहिती असल्याखेरीज या आग्रहामागे पुरेशी वैज्ञानिक चिकित्सा झालेली असल्याचे माझ्या मर्यादित समजशक्तीस तरी जाणवत नाही, त्यामुळे अशा खात्रीलायक माहितीअभावी 'विज्ञाननिष्ठे'चे लेबल लावण्याची घाई मला तरी करवत नाही.

बाकी चालू द्या.

(अर्थात, हा सगळा आमच्या अर्धवट अज्ञानाच्या आधारावर आम्हाला धड न कळलेल्या गोष्टींवर टाकून दिलेला आमचा पो आहे. वि़ज्ञाननिष्ठ तज्ज्ञ विद्वज्जन यावर योग्य काय तो तपशीलवार खुलासा करतीलच - करतच असतात. त्यामुळे, अधिक तपशिलांसाठी तज्ज्ञ विद्वज्जनांना गाठावे.)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Feb 2013 - 9:45 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

भौतिकशास्त्राचा उर्जेविषयीचा अतिशय महत्वाचा नियम आहे की,
Energy cannot be created or destroyed, it can only be changed from one form to other.

तुम्ही उर्जा कुठल्याही स्वरुपात वापरा. तीच्या स्वरुपात बदल होतं जाणारचं. पण प्रत्येक उर्जेच्या स्थित्यंतरणामधे एफिशीएन्सी किती आहे हा मुद्दा विचार करण्याजोगा नक्कीच आहे. किती तरी वेळा एंड अ‍ॅप्लिकेशन किंवा पद्धत बदललं गेलं तर उर्जेची गरज कमी सुद्धा होऊ शकते.

(अर्थात, हा सगळा आमच्या अर्धवट अज्ञानाच्या आधारावर आम्हाला धड न कळलेल्या गोष्टींवर टाकून दिलेला आमचा पो आहे. वि़ज्ञाननिष्ठ तज्ज्ञ विद्वज्जन यावर योग्य काय तो तपशीलवार खुलासा करतीलच - करतच असतात. त्यामुळे, अधिक तपशिलांसाठी तज्ज्ञ विद्वज्जनांना गाठावे.)

असा डिसक्लेमर टाकुन दिलात. त्यामुळे वरच्या पोस्टची समीक्षा करणे शक्य नाही.

असो.

पु.ल. यांच्या एका भाषणात तुम्हाला सापडणे अवघड आहे. कारण ते पु.ल. यांचे मत आहे आणि अतीशय योग्य आहे.

ते योग्य कसे हे समजायला अभ्यास करायला हवा. स्वा.सावरकरांचे लिखाण वाचा. त्यात अनेक गोष्टी दिसतील. थोडी तसदी घेतल्यास दुस-याकोणी समजावुन सांगायची गरज पडणार नाही.

गेंडा's picture

25 Apr 2011 - 9:07 am | गेंडा

महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तीमत्वाने केलेले महाराष्ट्राच्या महान व्यक्तीमत्वाचे वर्णन फारच सुंदर.

अवांतर- +१ अथवा -१ प्रतिक्रीया टाकताना कसे करायचे?? याची महिती कोठे मिळेल???

ऋषिकेश's picture

25 Apr 2011 - 9:32 am | ऋषिकेश

वा,, सुरेख भाषण
सावरकरांच्या विज्ञाननिष्ठेबाबत तसेच अंधश्रद्धानिर्मुलन, अस्पृश्यतानिवारण वगैरेसाठी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांच्याबद्द्ल खूप आदर वाटतोच.

चिंतामणी's picture

25 Apr 2011 - 3:05 pm | चिंतामणी

किसन शिंदे, प्रास, सुधीर१३७, अप्पा जोगळेकर, सर्वसाक्षी, चतुरंग, स्वाती२, ५० फक्त, नितिन थत्ते, गेंडा आणि ऋषिकेश

आपणा सर्वांचे प्रतिक्रीयेबद्दल धन्स.

परिकथेतील राजकुमार's picture

25 Apr 2011 - 5:44 pm | परिकथेतील राजकुमार

लेख आधी पु.लं. च्या संस्थळावर वाचला होता आणि मराठीजगतवर. आपल्या मिपाचे सदस्य दीपक ह्यांनी देखील तो आपल्या ब्लॉगवर उपलब्ध करुन दिला आहे.

तरी देखील धन्यवाद.

अवांतर :- ह्या संस्थळांचा उल्लेख सदर लेखनाच्या शेवटी आला असता तर बरे वाटले असते :)

धमाल मुलगा's picture

25 Apr 2011 - 7:42 pm | धमाल मुलगा

चिंतोपंत,
मनापासून आभारी आहे.

-(नि:शब्द) ध.

पंगा's picture

25 Apr 2011 - 8:10 pm | पंगा

स्वा. सावरकरांच्या पुण्यतिथीला, २६ फेब्रुवारी १९८३ ह्या दिवशी, अंदमानच्या सेक्युलर तुरूंगातील मैदानात पु.ल.देशपांडे यांनी भाषण केले होते.

'सेक्युलर' तुरुंग??? खरोखरच त्या तुरुंगाचे असे नाव आहे?

हिंदुस्थानातील सेक्युलरिझमचे मूळ इंग्रजी सत्तेत आहे, असे यातून समजावे काय?

की यात स्वातंत्र्योत्तर काळात गावोगावच्या 'मेन स्ट्रीट'चे 'महात्मा गांधी मार्ग' असे पुनर्नामकरण करणार्‍या हरामखोर काँग्रेसचा काही हात आहे?

(सावरकरांसारख्या हिंदुत्वाभिमानी महापुरुषाला 'हिंदू तुरुंगा'त ठेवण्याऐवजी जाणूनबुजून 'सेक्युलर तुरुंगा'त त्यांची रवानगी करून त्यांना यातना देऊ पाहणार्‍या अधिक त्यांचा अपमान करू पाहणार्‍या इंग्रज सरकारचा त्रिवार निषेध! कोलूचा अपमान यापुढे काहीच नव्हे.)

दीपक साळुंके's picture

25 Apr 2011 - 8:53 pm | दीपक साळुंके

तुरुंगाचे नाव "सेल्युलर जेल" असे आहे.

पंगा's picture

25 Apr 2011 - 9:02 pm | पंगा

धन्यवाद.

पंगा's picture

26 Apr 2011 - 12:25 am | पंगा

अलीकडे कुठेही सभेला गेल्यावर गाणी ऎकावी लागतात ती बहुदा सिनेमातली किंवा प्रसंगाला साजेशी अशी तितल्याच शाळेतल्या गुरुजीनीं कानामात्रांची यथेच्छ मोडतोड करून जुळवलेली स्वागतपर पद्दं. आणि इथे पेटीवाल्यांनी सुर धरला तबलजीने ठेका सुरू केला आणि अस्खलित वाणीने त्या दलित भगिनींनी गाणे सुरू केले. - जयोस्तुते श्री महन्मगंले शिवास्पदे शुभदे! स्वतंत्रते भगवती त्यामहं यशो युतावंदे! माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. ज्या दलितांचे जीवन सुधारावं, त्यांना समाजात मानाने जगता यांव- मोकळेपणाने गाता यांव वावरता यांव म्हणून सनातनी धर्मबांधवांचे शिव्याशाप सहन करित ज्या सावरकरांनी जींवाचं रान केलं त्यांनी रचनेत हे स्त्रोत्र मुक्तमनाने दलित स्त्रिया बिनचुकपणाने उत्तम सुराचालात गात होत्या.

दलित भगिनींची वाणी अस्खलित का असू नये? एखादे गाणे दलित स्त्रियांनी बिनचूकपणे आणि उत्तम सुरातालात का गाऊ नये?

यात अंगावर सर्रकन काटा येण्यासारखे नेमके काय आहे?

एखाद्याचं पुण्य फळाला येणं म्हणजे काय याचा मला त्या क्षणी अनुभव आला.

हा भाग तर मुळीच कळला नाही. सावरकरांचे पुण्य "दलितांना 'शुद्ध' बोलायला शिकवणे" यात होते काय?

(नाही म्हणजे, सावरकरांच्या कार्याबद्दल - विशेषतः दलितांसंबंधी केलेल्या कार्याबद्दल - प्रशंसा समजू शकतो. पण हे म्हणजे थोडेसे चुकीच्या गृहीतकांवरून भलत्याच गोष्टींची प्रशंसा केल्यासारखे होत नाही काय? आणि तेही बहुधा स्वतःच्याच पूर्वग्रहांतून? "दलितांची भाषा'शुद्धी'" वगैरे विचार सावरकरांच्या मनातही नसावेत, किंवा असलेच तर ते त्यांचे मुख्य उद्दिष्ट नसावे, असे मानावयास जागा आहे. शिवाय, "दलितांची भाषा, त्यांचे उच्चार शुद्ध नसतात" हे गृहीतक या वाक्यांमागे दडलेले आहे, जे अस्थानी आहे आणि तसेही तपासून पहावे लागेल. अशा परिस्थितीत अशी 'प्रशंसात्मक' वाक्ये - मग भले ती पु.लं.ची का असेनात - अनवधानाने का होईना, पण भलतेच काहीतरी सुचवून जात नाहीत काय?

दुर्दैवाने, ही विधाने बहुधा प्रामाणिकपणे केलेली असावीत, यास बहुधा अनवधान कारणीभूत असावे, असे मानावयास जागा असल्याने, याला 'वामहस्त प्रशंसा'ही म्हणवत नाही.

भाषणास उपस्थित अपेक्षित श्रोतृवर्ग - टार्गेट ऑडियन्स - नेमका कोणता होता, याची कल्पना नाही, परंतु भाषण निर्विघ्नपणे पार पडले असल्यास, एवढेच नव्हे, तर श्रोतृवर्गाच्या प्रशंसेचे धनी ठरले असल्यास, आश्चर्य वाटणार नाही.)

जयोस्तुते श्री महन्मगंले शिवास्पदे शुभदे! स्वतंत्रते भगवती त्यामहं यशो युतावंदे!

सावरकरांच्या प्रशस्तीपर असलेले एखादे भाषण उद्धृत करताना बाकीचे भाषण सोडा, पण किमान त्यात आलेले सावरकरांचेच एखादे पद तरी मुळाबरहुकूम, मोडतोड न करता, टंकलेखनाच्या चुका न करता उद्धृत करण्याची काळजी घ्यायला हवी होती, असे वाटते.

(हा ब्याकड्राप लक्षात घेता, ते गाणे कोणीतरी बिनचूकपणे गाऊ शकते हे कौतुकास्पद आहे असे कोणाला वाटल्यास, ते क्षम्य असावे का, असा विचार मनात येऊ लागतो.)

बाकी, उर्वरित भाषण उतरवून काढतानाही टंकलेखनाच्या चुका पदोपदी, मुबलक,आणि रसभंग करणार्‍या आहेत, ज्या पु.लं.नी स्वतः केल्या नसाव्यात, असे मानावयास जागा आहे. (हा बर्टुड रसेल कोण?)

पुढील लेखनास शुभेच्छा.

हा प्रतिसाद म्हणजे उगीचच पंगा घेण्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

ह्या प्रश्णांची उत्तरे मिळवायला खरे तर तुमची पु.लं.शी भेट व्हायला हवी. कारण त्याना तसे का वाटले हे तेच जास्त उत्तम रितीने सांगु शकतील.

माझ्या अल्पमतीला जे समजले ते सांगायचा प्रयत्न करतो.

दलित भगिनींची वाणी अस्खलित का असू नये? एखादे गाणे दलित स्त्रियांनी बिनचूकपणे आणि उत्तम सुरातालात का गाऊ नये?

यात अंगावर सर्रकन काटा येण्यासारखे नेमके काय आहे?

अरेरे. पु.ल.वर केलेला हा आरोप आपली मनोवृती दर्शवतो. जो अर्थ त्या वाक्यात नाही तो आपण तेथे बळाने कोंबत आहात. असो.

पु.लं.नी त्या दलीत महिलांच्या पुर्वस्थितीचे वर्णन केलेले आहे. त्यांच्या परिस्थीतीत (आर्थिक आणि मानसीक) जो बदल त्यांना जाणवला त्यामुळे त्यांच्या अंगावर काटा आला.

एखाद्याचं पुण्य फळाला येणं म्हणजे काय याचा मला त्या क्षणी अनुभव आला.

स्वा.सावरकरांनी द्लितोध्दारासाठी, समाजसुधारणेसाठी जे काम केले आहे त्याची आपल्याला माहिती नसणार. ती आधी करून घ्या. म्हणजे असली शेरेबाजी करणार नाहीत तुम्ही.

स्वा.सावरकरांनी केलेल्या कामामुळे दलीतांची आर्थीक आणि मानसीक स्थिती सुधारली (त्यांचा आत्मविश्वास त्या महिलांमधील बदलामुळेच कळला) हे त्या कामाचे फळ आहे असे पु.लं.ना म्हणायचे आहे.

सावरकरांच्या प्रशस्तीपर असलेले एखादे भाषण उद्धृत करताना बाकीचे भाषण सोडा, पण किमान त्यात आलेले सावरकरांचेच एखादे पद तरी मुळाबरहुकूम, मोडतोड न करता, टंकलेखनाच्या चुका न करता उद्धृत करण्याची काळजी घ्यायला हवी होती, असे वाटते.

ओ हो हो. असे आहे होय. हे सांगण्यासाठी एव्हढे पांडित्य दाखवले होय. मग बरोबर. आपली छिद्रान्वेशीवृती यामुळ प्रकट झाली हे ही नसे थोडके.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Apr 2011 - 1:32 am | निनाद मुक्काम प...

@प्रारंभी थट्टेवारी नेलेले शब्द व्यवहारात आले. हे शब्द सावरकरनिर्मीत आहेत ह्याचा देखील लोकांना विसर पडला. आज महाराष्ट्रात सामान्य माणसाला मेयरपेक्षा महापौरच जास्त अप्रिचित आहे.

आभासी जगतात सावकारांचे कार्य मिपावर उत्तमरीत्या चालले आहे ,
चेपू ,खरडवही असे अनेक शब्द येथेच मी पहिल्यांदा वाचले .व आता आवर्जून त्यांचा उपयोग करतो .
लेख उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद .
सावरकारांनी गाईला केवळ एक उपयुक्त पशू म्हटल्यावर तिच्या पोटातल्या तेहतीस कोटी देवांच्या भाकड काथांवर आपली तुंबडी भरणारे त्यांच्यावर तुटून पडले होते.
+ १
विज्ञान हाच एकमेव धर्म आहे .अर्थात गाय ,डुक्कर माझ्यासाठी पशु आहेत .व खाद्य

पंगा's picture

26 Apr 2011 - 1:55 am | पंगा

चेपू ,खरडवही असे अनेक शब्द येथेच मी पहिल्यांदा वाचले .व आता आवर्जून त्यांचा उपयोग करतो .

उदाहरण तितकेसे चपखल नाही. चेहरापुस्तक, खरडवही हे शब्द नको तितके सुटसुटीत आहेत. (शिवाय, नक्की खात्री नाही, पण 'चेहरा' हा शब्द बहुधा 'यावनी' - म्हणजे काय कोण जाणे - आहे. याने की आक्षेपार्ह.)

फेसबुकसाठी 'वदनग्रंथ'सारखे पर्याय अधिक सयुक्तिक ठरले असते. (खरडवहीसाठी प्रतिशब्दाबद्दल विचार करावा लागेल.)

अर्थात गाय ,डुक्कर माझ्यासाठी पशु आहेत .व खाद्य

गायीला खाद्य करण्यासाठी सावरकरवादाची (किंवा गायीचीही) कास धरावी लागत नाही. (स्वानुभवाने सांगतो.)

(अतिअवांतर: केरळमधील हिंदुबांधवांत गोमांसभक्षण निषिद्ध मानले जात नाही, किंबहुना केरळबाहेरील 'मेनस्ट्रीम' हिंदुत्वात असा काही निषेध आहे, असे त्यांच्या अनेकदा गावीही नसते, असाही अनुभव आलेला आहे.)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Apr 2011 - 1:11 pm | निनाद मुक्काम प...

@पंगा
आपल्याकडून मराठी भाषेस गटणे छाप पद्धतीच्या मराठीत नवीन नवीन शब्द निर्माण करावे .म्हणजे
आम्ही सर्व उपकृत होऊ
गायीचे उदाहरण फक्त इतक्यासाठी दिले .की जुन्या प्रथा किंवा रूढी ह्यात प्रथम दर्शनी वैज्ञानिक दृष्ट्या मला काही वावग दिसले नाही तर मी त्या पाळत नाही .
बाकी आपल्यामुळे केरळ मधील प्रथा कळली पण तिचे माझ्या प्रतिसादात काय प्रयोजन ?
आपल्या महाराष्ट्रात जेथे माझे व बहुदा तुमचे बालपण गेले तेथे ज्या रूढी पाळल्या जातात त्याच्या अनुषंगाने मी लिहिले .

पंगा's picture

27 Apr 2011 - 6:27 pm | पंगा

आपल्याकडून मराठी भाषेस गटणे छाप पद्धतीच्या मराठीत नवीन नवीन शब्द निर्माण करावे .म्हणजे
आम्ही सर्व उपकृत होऊ

'चेहरापुस्तक' वगैरे शब्दांस माझा आक्षेप नाही. (मला ते बर्‍यापैकी सुटसुटीत आणि मराठीस त्या मानाने बरेच जवळचे वाटतात.)

मुद्दा एवढाच आहे, की असे सुटसुटीत मराठीकरण हे 'सावरकरी' वाटत नाही. आणि 'यावनी' वगैरे आक्षेप माझे नाहीत. सावरकरांचे असू शकतात.

तेव्हा, 'गटणेछाप' शब्दांकरिता माझे उपकार मानू नका. ते श्रेय योग्य ठिकाणीच गेलेले बरे.

('वार्ताहर' वगैरे शब्दांचे एवढे काय कौतुक ते कळत नाही. 'खबर्‍या', किंवा गेला बाजार 'बातमीदार' वगैरे शब्दांत काय वाईट आहे? 'बातमीदार' तर मराठीत छान रुळलेला आहे. त्या मानाने 'वार्ताहर' हा छापील मराठी वगळता एरवी कोण कुठे वापरतो? आणि तिथेदेखील - म्हणजे छापील मराठीत - 'बातमीदार' हा शब्द आजमितीस जवळपास तेवढ्याच प्रमाणात वापरला जात असावा. मग 'वार्ताहर'चे एवढे काय अप्रूप?

'हुंडी'सारखे शब्द-संकल्पना मराठीत अगोदरपासून असताना 'धनादेश' कशासाठी? (आणि तसेही छापील मराठी वगळता 'धनादेश' कोण वापरतो?) 'खाणावळ' असताना 'उपाहारगृह' कशासाठी? 'आपल्याला संस्कृत शब्द माहीत आहेत, आणि आपण त्यांची जुळवाजुळव करू शकतो' हे दाखवण्यासाठी?

'महापौर' हे तर सरळसरळ 'फर्स्ट सिटिझन'चे रूपांतर वाटते. अर्थात, रूपांतरात काही गैर नाही, आणि 'मेयर' हा शब्द मराठीत अनैसर्गिक वाटतो हे खरेच आहे, पण 'महापौर' तरी आपण खर्‍या अर्थाने अंगीकारला आहे का? अनेकदा तो बोलीत ओढूनताणून 'म्हापौर' होतो, काहीतरी अनैसर्गिक - म्हणजे मराठीत अनैसर्गिक - शब्द उच्चारल्यासारखा. त्यातून 'शहराचा प्रमुख नागरिक' हा अर्थ किती जणांना चटकन लक्षात येतो? 'मेयर' ओढूनताणून म्हणायचा तसाच 'महापौर' - 'म्हापौर' ओढूनताणून म्हणायचा, इतकेच. तो शब्द म्हणताना त्या शब्दाबद्दल आपुलकीची भावना खरोखरच किती जणांना येते?

त्यापेक्षा 'पाटला'च्या किंवा 'पुढार्‍या'च्या धर्तीवरचा पण शहरी पातळीवरचा एखादा मराठी सुटसुटीत शब्द नसता का बनवता आला? 'म्होरक्या'ही एक वेळ चालू शकला असता. पण तो सोडून देऊ. 'शहरप्रमुख', किंवा 'शहर' यावनी वाटतो तर 'नगरप्रमुख', 'नगरमुख्य', 'नगरनायक' किंवा 'नगरनाईक' वगैरे नसते चालू शकले? सुटसुटीतही झाले असते, 'मराठी'ही झाले असते आणि त्यातून सुचवायचा अर्थ लोकांना चटकन सुचलाही असता. 'महापौर'ने नेमका कोणाला काय अर्थबोध होतो?

किंवा, तसेच बघायला गेले, तर 'वार्ताहर'मधून 'वार्ता खेचून आणणारा' हा अर्थ कोणाला सांगितल्याशिवाय लक्षात येतो? 'बातमीदार'मधून 'बातमी देणारा' हे चटकन समजते तरी.

अतिअवांतर: 'वार्ता खेचून आणणारा' मध्ये एका प्रकारची 'वार्ता बाहेर येत नसली, घडत नसली, तरी खेचून, म्हणजे शब्दशः "ओढून किंवा ताणून" अर्थात "ओढूनताणून" आणणारा' अशी छटा येते. 'बातमीदार'मधून 'घडते तशी बातमी निमूटपणे देणारा' असा अर्थ प्रतीत होतो. सावरकरांना 'तहलका'छाप पत्रकारिता अभिप्रेत होती काय? सावरकर द्रष्टे असल्याबद्दल ऐकलेले आहे, पण इतकेही द्रष्टे असतील असे वाटले नव्हते. आदर वाढला.)

गायीचे उदाहरण फक्त इतक्यासाठी दिले .की जुन्या प्रथा किंवा रूढी ह्यात प्रथम दर्शनी वैज्ञानिक दृष्ट्या मला काही वावग दिसले नाही तर मी त्या पाळत नाही .

मला सोयीच्या नसतील तर जुन्या रूढी मीही पाळत नाही. पण त्याकरिता सावरकरांना मध्ये का आणायचे?

बाकी आपल्यामुळे केरळ मधील प्रथा कळली पण तिचे माझ्या प्रतिसादात काय प्रयोजन ?

तो मुद्दा थोडा अवांतर होता. पण नाही म्हटले तरी त्याला प्रयोजन आहे.

केरळमधल्या हिंदूंना केरळबाहेरील उर्वरित हिंदूंमध्ये असा काही निषेध आहे हे माहीत नसावे. त्याचप्रमाणे केरळबाहेर 'सावरकर' नावाचे कोणी होऊन गेले हेही (बहुधा) माहीत नसावे.

थोडक्यात, (हिंदू असूनही) गोमांसभक्षण करण्याकरिता सावरकरवादाची आवश्यकता नसावी, एवढाच मुद्दा आहे.

चिंतामणी's picture

28 Apr 2011 - 2:01 am | चिंतामणी

केरळमधल्या हिंदूंना केरळबाहेरील उर्वरित हिंदूंमध्ये असा काही निषेध आहे हे माहीत नसावे. त्याचप्रमाणे केरळबाहेर 'सावरकर' नावाचे कोणी होऊन गेले हेही (बहुधा) माहीत नसावे.

काय तर्कवाद आहे आपला. वाह रे वाह. आपण महान आहात.

मला माहीत आहे की झोपलेल्याला जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला करता येत नाही. तरिही मी पुन्हा एकदा विनंती करतो की "विज्ञाननिष्ठ निबंध" (भाग पहीला ५ आणि भाग दोन ८ निबंध), जन्मजात अस्पृश्यतेचा मृत्युलेख (पूर्वार्ध) व (उत्तरार्ध), जात्युच्छेदक निबंध (सुमरे ३८ निबंध), क्ष किरणे (१५ लेख) हे स्वा.सावरकरांनी १९२२ पासुन १९४० पर्यन्त लिहीले वैचारीक निबंध त्याकाळाच्या पार्श्वभूमीवर वाचा.

आपण आज जे (उरफाटे) प्रतिसाद देत आहात ते २०११ मधे याचे ध्यान असू द्यात. त्यांनी विचार ज्या काळात मांडले आणि त्याचा पाया ह्याबद्दल माहिती करून घ्या आणि मग पुन्हा एकदा प्रतीसाद द्या.

महाराष्ट्रातल्या सुशिक्षीतांनासुद्धा स्वा.सावरकर समजत नाहीत ते केरळियांना काय कळणार. कप्पाळ.

अवांतर- विश्वास कल्याणकर हे सध्या पुर्वाचलाबद्दल छान लेख लिहीत आहेत आणि तेथे होणा-या कार्याची माहिती देत असतात. ते जी परीस्थीती वर्णन करतात ( विषेशतः धर्मांतरबद्दल) ते वाचताना स्वा.सावरकरांच्या दोन लेखांची प्रकर्शाने आठवण झाली. हिंदू नागलोक ख्रिश्चन का होतात (१९३१)नाग लोकांची सद्यस्थिती हे लेख सर्वांनीच वाचावेत.

पंगा's picture

28 Apr 2011 - 2:12 am | पंगा

महाराष्ट्रातल्या सुशिक्षीतांनासुद्धा स्वा.सावरकर समजत नाहीत ते केरळियांना काय कळणार.

माझ्या समजुतीकरिता विचारतो. केरळीय हे महाराष्ट्रीयांपेक्षा, खास करून महाराष्ट्रातील सुशिक्षितांपेक्षा (खास करून समजुतीत) कमी प्रतीचे असतात, असा आपला दावा आहे काय?

(अरेरे! हीच का ती 'आसिन्धुसिन्धुपर्यन्त हिन्दुबान्धवां'बद्दलची आत्मीयता? आणि तीसुद्धा (सावरकर न कळतासुद्धा) 'गाय हा एक उपयुक्त (खाद्य)पशू आहे' हे सावरकरतत्त्व नीट कळणार्‍या हिन्दुबान्धवांबद्दल???

सावरकरांचा आत्मा आपल्या विद्युद्दाहिनीत गरगर फिरू लागेल ना हे ऐकून!)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Apr 2011 - 2:56 am | निनाद मुक्काम प...

अहो पंगा शेठ निव्वळ पंगा ह्यायचा म्हणून कशाला मुद्दे मांडत आहात .
मुळात आपण केरळ वाशियांचे उदाहरण चुकीच्या मुद्यावर देत आहात .
त्यांच्यात गोमास खात असतील ( ह्यात सावरकरांचा संबंध येत नाही ) हे मलाही मान्य आहे .
पण महारष्ट्रात जेथे तुम्ही आम्ही जन्मलो तेथे अजूनही स्वस्त असून भावनिक व धार्मिक मुद्यावरून गोमास भक्षण होत नाही .हीच परिस्थिती बहुसंख्य हिंदूची आहे .ह्यात सावरकरांचे गाय ही उपयुक्त पशु आहे हे विधान आजही महाराष्ट्रातील काय पण बहुसंख्य हिंदू समाजाला जड जाते .( ही आजची परिस्थिती तर त्या काळात त्यांचे विचार नक्कीच ....) तुम्हाला माझे म्हणणे पटावे हा आग्रह नाहे .
परत दुसरा मुद्दा कि वीज ..........
अहो एक साधी गोष्ट आहे .तुम्ही चुलीवर पाणी तापवायला लाकडे वापरा नी तेवढेच पाणी हिटर मधून ध्या .( स्वस्त व सुलभ पर्याय म्हणून तुम्ही हिटर ची निवड कराल ) स्वतः तुमच्या घरात आंघोळीला पाणी हे बंबात लाकडे न घालता एकत्र गिझर किंवा नैसर्गिक वायूवर तापत असेल कारण ह्यात प्रदूषण कमी होते व ते तुलनात्मक रीत्या वापरायला सुलभ असते .)

आज मुंबईत बहुसंख्य स्मशानात विद्युत दाहिनी आहे .कारण लाकडापेक्षा तो पर्याय सुलभ आहे म्हणूनच ना .
ही साधी गोष्ट लक्षात न घेता उगाच कीस काढण्यात काय अर्थ आहे .
महाराष्ट्रातील
अवांतर ( पंगा शेठ आता पर्यत आमचे मुद्दे खोडण्यात तुम्ही धन्यता मनात आला तुम्हाला एक प्रश्न )
गायीबद्दल तुमचे मत काय ?
तुम्ही अभक्ष भक्षण करतात का ?

मते मत मी आधीच मांडले आहे .ह्याबाबतीत ( तुम्ही तुमचे मत मात्र गुलदस्त्यात ठेवून ......)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Apr 2011 - 2:58 am | निनाद मुक्काम प...

अहो पंगा शेठ निव्वळ पंगा ह्यायचा म्हणून कशाला मुद्दे मांडत आहात .
मुळात आपण केरळ वाशियांचे उदाहरण चुकीच्या मुद्यावर देत आहात .
त्यांच्यात गोमास खात असतील ( ह्यात सावरकरांचा संबंध येत नाही ) हे मलाही मान्य आहे .
पण महारष्ट्रात जेथे तुम्ही आम्ही जन्मलो तेथे अजूनही स्वस्त असून भावनिक व धार्मिक मुद्यावरून गोमास भक्षण होत नाही .हीच परिस्थिती बहुसंख्य हिंदूची आहे .ह्यात सावरकरांचे गाय ही उपयुक्त पशु आहे हे विधान आजही महाराष्ट्रातील काय पण बहुसंख्य हिंदू समाजाला जड जाते .( ही आजची परिस्थिती तर त्या काळात त्यांचे विचार नक्कीच ....) तुम्हाला माझे म्हणणे पटावे हा आग्रह नाहे .
परत दुसरा मुद्दा कि वीज ..........
अहो एक साधी गोष्ट आहे .तुम्ही चुलीवर पाणी तापवायला लाकडे वापरा नी तेवढेच पाणी हिटर मधून ध्या .( स्वस्त व सुलभ पर्याय म्हणून तुम्ही हिटर ची निवड कराल ) स्वतः तुमच्या घरात आंघोळीला पाणी हे बंबात लाकडे न घालता एकत्र गिझर किंवा नैसर्गिक वायूवर तापत असेल कारण ह्यात प्रदूषण कमी होते व ते तुलनात्मक रीत्या वापरायला सुलभ असते .)

आज मुंबईत बहुसंख्य स्मशानात विद्युत दाहिनी आहे .कारण लाकडापेक्षा तो पर्याय सुलभ आहे म्हणूनच ना .
ही साधी गोष्ट लक्षात न घेता उगाच कीस काढण्यात काय अर्थ आहे .
महाराष्ट्रातील
अवांतर ( पंगा शेठ आता पर्यत आमचे मुद्दे खोडण्यात तुम्ही धन्यता मनात आला तुम्हाला एक प्रश्न )
गायीबद्दल तुमचे मत काय ?
तुम्ही अभक्ष भक्षण करतात का ?

मते मत मी आधीच मांडले आहे .ह्याबाबतीत ( तुम्ही तुमचे मत मात्र गुलदस्त्यात ठेवून ......)

हुप्प्या's picture

2 May 2011 - 6:56 am | हुप्प्या

भाषा ही नव्या शब्दांमुळे समृद्ध होते. आता ते शब्द लोकप्रिय होतात की नाही हे लोकांवर अवलंबून आहे. सावरकर आणि सावरकरवादाची पराकोटीची अ‍ॅलर्जी असणारे त्यांच्या प्रत्येक गोष्टीला नाक मुरडतात. पण मराठी भाषा इतकी पूर्वग्रहदूषित नाही. म्हणूनच महापौर, कॉलम करता स्तंभ असे शब्द रुळले आहेत.
बातमीदार असताना वार्ताहर कशाला हवा असे विचारणे म्हणजे इंग्रजीत न्यूज रिपोर्टर आहे मग जर्नालिस्ट कशाला? किंवा रायटर असताना ऑथर कशाला असे विचारण्यासारखे मूर्खपणाचे आहे. हे शब्द वापरणारा आपली व ऐकणार्‍याची वा वाचणार्‍याची कुवत बघून शब्द निवडतो/ते आणि वापरतो/ते.

सावरकरांचा फारसी विरोध आणि संस्कृत प्रेम सगळ्यांनी आपलासा करावा असे नाही. पण ह्या प्रेरणेतून सावरकरांनी जे उत्तम शब्द निर्माण केले तेही नाकारणे हे आंधळ्या द्वेषाचे उदाहरण आहे. संस्कृतवर असणारे प्रभुत्व, भाषेची प्रतिभा ह्यातूनच चांगले नवे शब्द बनू शकतात.

नवे शब्द जेव्हा रुळतात तेव्हा त्यांची व्युत्पत्ती सर्वसामान्य लोकांना माहित नसते. अगदी इंग्रजीतही हे होते तेव्हा वार्ताहर ह्या शब्दाचा समास सामान्यांना उलगडता येत नाही म्हणून तो शब्द बाद असे म्हणणे बावळटपणाचे आहे.
शांपू ह्या शब्दाचे मूळ भारतीय चंपी मधे आहे. जगरनॉट ह्या शब्दाचे मूळ जगन्न्नाथात आहे. हे शब्द राजेरोस वापरणार्‍यांना त्यांचे हे मूळ माहित नसते. पण म्हणून हे शब्द इंग्रजीतून हद्दपार करायचा दुराग्रह लोक धरत नाहीत.

सुनील's picture

2 May 2011 - 7:18 am | सुनील

सावरकरांचा फारसी विरोध आणि संस्कृत प्रेम सगळ्यांनी आपलासा करावा असे नाही.
सहमत! त्याची काहीही आवश्यकता नाही.

पण ह्या प्रेरणेतून सावरकरांनी जे उत्तम शब्द निर्माण केले तेही नाकारणे हे आंधळ्या द्वेषाचे उदाहरण आहे.
दिनांक आणि क्रमांक ह्या दोन शब्दांचे उदाहरण घेऊ. हे दोन्हीही शब्द आजदेखिल बव्हंशी लेखी मराठीतच वापरले जातात. बोली मराठीतून तारीख आणि नंबर हे शब्द अजिबात हद्दपार झालेले नाहीत.

संस्कृतवर असणारे प्रभुत्व, भाषेची प्रतिभा ह्यातूनच चांगले नवे शब्द बनू शकतात.
मराठी शब्द बनवण्यासाठी संस्कृतच्या कुबड्यांची गरज भासणे हेच कमकुवतपणाचे लक्षण आहे.

प्रदीप's picture

2 May 2011 - 12:28 pm | प्रदीप

मराठी शब्द बनवण्यासाठी संस्कृतच्या कुबड्यांची गरज भासणे हेच कमकुवतपणाचे लक्षण आहे.

किंबहुना जी भाषा आम जनतेची भाषा होऊ शकली नाही (किंवा तसे तिला मुद्दामच होऊ दिले नाही) तिच्या कुबड्या मराठीस कशाला हव्यात? आपल्या माथ्यावर जी शासकीय मराठी मारली जात आहे, ती असल्या उद्योगाचे उत्तम उदाहरण आहे. 'शासन' काय, 'संपन्न' काय, 'प्रभावित' काय...!!

पंगा's picture

2 May 2011 - 9:51 pm | पंगा

अगदी नेमके.

आणि हे मराठीच्याच बाबतीत होते अशातलाही भाग नाही. 'ठंडा पानी' असे छान कोणालाही कळेल अशा हिंदीत लिहिता येत असताना, 'शीतल जल' कशासाठी? पण (उत्तरेतल्या) रेल्वे स्टेशनांवर असल्या पाट्या पाहिलेल्या आहेत.

त्यामुळे, हा सरसकट 'बाबू मेंट्यालिटी'चा भाग असल्यास आश्चर्य वाटणार नाही.

मैत्र's picture

3 May 2011 - 10:48 am | मैत्र

सार्वत्रिक भाषा होऊ दिली नाही वगैरे जरी खरं असलं तरी म्हणून भाषा म्हणून संस्कृत ला बाजूला सारणे आणि कुबड्या म्हणणं तितकंच संकुचित आहे.
भारतातल्या बहुतेक भाषांमध्ये (अगदी द्राविड सुद्धा) बरेच संस्कृतोतद्भव शब्द आहेत. दक्षिणेत अनेक शब्द बोली भाषेत आजही अतिशुद्ध स्वरुपात वापरले जातात. त्यात कोणाला काही अडथळा येत नाही. यापद्धतीने मराठीतले जे काही 'तत्सम' शब्द आहेत ते काढून टाकावे लागतील.
संस्कृत बोली भाषा होऊ शकली नाही / होऊ दिली नाही म्हणून शब्दांना विरोध करण्यात काहीच हशील नाही. ते घनगोल गट्टू आणि लोहरथ असले शब्द फक्त त्या फालतू विनोदापुरतेच असतात. वार्ताहर नाही पण महापौर हा शब्द चांगलाच रुळला आहे. मग जसं त्यांनी विरोधासाठी विरोध केला तसंच करण्यात अर्थ नाही.
शासकीय मराठी हा फार मोठा विषय आहे. (शासकीय हिंदी सुद्धा - कधी बँक व्यवहारातले हिंदी शब्द पहा. उदा> समाशोधन). त्याचा इथे संबंध जोडण्याचे कारण नाही.

प्रदीप's picture

3 May 2011 - 7:47 pm | प्रदीप

शासकीय मराठी हा फार मोठा विषय आहे. (शासकीय हिंदी सुद्धा - कधी बँक व्यवहारातले हिंदी शब्द पहा. उदा> समाशोधन). त्याचा इथे संबंध जोडण्याचे कारण नाही.

शासकीय मराठी व हिंदीही, विनाकारण संस्कृताळलेली आहे, असे नाही वाटत आपणास? ही वर आपण सर्वांनी दिलेली उदाहरणे संकृतशी नाळ जोडूनच तर आहेत की! ही असली शब्दावळ निर्माण करणार्‍यांची प्रेरणा व सावरकरांची प्रेरणा एकच असतील असे कुणी म्हणत नाही. सावरकरांनी त्यांच्या विशीष्ट निष्ठेमुळे हे केले, इथे काही बाबू लोक स्वतःसाठी कामे निर्माण करण्यसाठी व ती सुरू ठेवण्यासाठी करताहेत हा फरक आहे खरा, पण शेवटी परिणाम एकच.

हुप्प्या's picture

3 May 2011 - 6:38 am | हुप्प्या

>>मराठी शब्द बनवण्यासाठी संस्कृतच्या कुबड्यांची गरज भासणे हेच कमकुवतपणाचे लक्षण आहे.

संस्कृत ही मराठीची आई म्हणण्याइतकी त्या भाषेची मराठीशी जवळिक आहे. असे असताना संस्कृतचा आधार घेणे काहीही चूक नाही. इंग्रजी शब्द बनवताना सर्रास लॅटिनचा आधार घेतला जातो. इंग्रजीतील मेडिकल संज्ञा बघा.
मुळात मराठी ही तशी अर्वाचीन भाषा आहे त्यामुळे काही बाबतीत तिला मर्यादा आहेत. संस्कृतचा आधार घेणे आजिबात चुकीचे वाटत नाही. तुम्हाला संस्कृतचा तिटकारा असेल तर तो तुमचा दृष्टीकोन. तो तुम्हाला लखलाभ असो.

बातमीदार असताना वार्ताहर कशाला हवा असे विचारणे म्हणजे इंग्रजीत न्यूज रिपोर्टर आहे मग जर्नालिस्ट कशाला?

'न्यूज रिपोर्टर' आणि 'जर्नालिस्ट' हे शब्द समानार्थी नाहीत.

नवे शब्द जेव्हा रुळतात तेव्हा त्यांची व्युत्पत्ती सर्वसामान्य लोकांना माहित नसते. अगदी इंग्रजीतही हे होते तेव्हा वार्ताहर ह्या शब्दाचा समास सामान्यांना उलगडता येत नाही म्हणून तो शब्द बाद असे म्हणणे बावळटपणाचे आहे.

'वार्ताहर' हा (किंवा अन्य कुठलाही) शब्द मराठी(!)त बनवण्यास per se आक्षेप नाही. 'बातमीदार' सारखा शब्द मराठीत असताना, लोकांच्या तोंडी रुळलेला असताना, केवळ त्याचे मूळ 'यावनी' (पक्षी: 'त्यांचे') आहे एवढ्याच कारणास्तव तो हटवण्याच्या आणि त्याजागी ओढूनताणून जुळवलेला संस्कृतोद्भव (पक्षी: 'आपला') शब्द घुसडण्याच्या अट्टाहासाला विरोध आहे. (आजमितीस पाव खाल्ल्याने - किंवा शर्टप्यांट घातल्याने - जसा माणूस बाटू नये, तशीच रुळलेला 'परकीय' शब्द वापरण्याने भाषाही बाटू नये.)

शांपू ह्या शब्दाचे मूळ भारतीय चंपी मधे आहे. जगरनॉट ह्या शब्दाचे मूळ जगन्न्नाथात आहे. हे शब्द राजेरोस वापरणार्‍यांना त्यांचे हे मूळ माहित नसते. पण म्हणून हे शब्द इंग्रजीतून हद्दपार करायचा दुराग्रह लोक धरत नाहीत.

नेमके! मग रुळलेले फारसी/अरबी/इंग्रजी शब्द राजरोसपणे वापरताना (मग त्यांचे मूळ माहीत असो वा नसो) ते मराठीतून तरी हद्दपार करण्याचा दुराग्रह का धरावा?

'जगरनॉट', 'शांपू' असे शब्द वापरण्याने इंग्रजांचे स्फुल्लिंग (म्हणजे काय कोण जाणे!) विझते काय?

बाकी चालू द्या.

हुप्प्या's picture

3 May 2011 - 6:48 am | हुप्प्या

>>नेमके! मग रुळलेले फारसी/अरबी/इंग्रजी शब्द राजरोसपणे वापरताना (मग त्यांचे मूळ माहीत असो वा नसो) ते मराठीतून तरी हद्दपार करण्याचा दुराग्रह का धरावा?
<<
सावरकरांच्या मते फारसी/अरबी शब्द हे आक्रमकांच्या संस्कृतीचे प्रतिनिधी आहेत. संस्कृत ही स्थानिक भाषा आहे. मराठीला ती आईसारखी आहे म्हणून संस्कृत शब्दांचे पर्याय उपलब्ध असावेत. त्याकरता त्यांनी आपली प्रतिभा, आपले संस्कृत प्रभुत्व पणाला लावले आणि काही चांगले शब्द निर्माण केले. ते स्वीकारायला आडकाठी का? तुम्हाला त्यांची प्रेरणा मान्य नसेल तर नसू द्या पण ह्या शब्दांचा आंधळा द्वेष का?
नवे शब्द बनवायला प्रतिभा लागते. नव्या शब्दांमुळे भाषा समृद्ध होते ह्याविषयी दुमत नसावे.
व्यक्तीशः मला फारसी शब्दांची आलर्जी नाही. पण तरी सावरकरांनी निर्माण केलेले अनेक शब्द मला आवडतात. सावरकरांनी निर्माण केलेले असे अनेक शब्द आहेत जे लोकांच्या पचनी पडले नाहीत. हे चालायचेच.

>>'न्यूज रिपोर्टर' आणि 'जर्नालिस्ट' हे शब्द समानार्थी नाहीत.
असहमत. मी एक तरी थेसॉरस काढून दाखवतो जिथे ते समानार्थी आहेत. पण मान्य नसेल तर रायटर आणि ऑथर हे समानार्थी आहेत. त्यांचे उदाहरण घ्या.

नितिन थत्ते's picture

3 May 2011 - 9:36 am | नितिन थत्ते

>>सावरकरांच्या मते फारसी/अरबी शब्द हे आक्रमकांच्या संस्कृतीचे प्रतिनिधी आहेत.

या प्रेरणेलाच मुख्य आक्षेप आहे (अशी प्रेरणा असणे हे विकृतीचे-किमान आचरटपणाचे* लक्षण मानावे का?) आणि त्या प्रेरणेतून वापरातले शब्द हद्दपार करून त्याजागी संस्कृत शब्द रूढ करण्याला आहे.

कायदा हा सोपा, साधा आणि सरळ शब्द परका असल्याने तो घालवायचा होता पण त्याला चपखल संस्कृतोद्भव शब्द सापडत नव्हता तो कसा बनवला (बहुधा अधिनियम हा तो शब्द असावा) यावर सावरकरांचाच एक लेख वाचलेला आहे.

जुनीच शंका पुन्हा विचारतो. इस्पात हा शब्द संस्कृतात वापरला जात होता का? वापरला असेल तर हल्ली इस्पातपुरुष न म्हणता लोहपुरुष असे का म्हटले जाते? विचारण्याचे कारण लोह म्हणजे शुद्ध लोखंड हे इस्पातापेक्षा फारच कमकुवत आणि बहुतांशी निरुपयोगी असते. (काळेकाका कन्फर्मेशन देतीलच). [की वर दिलेल्या लोह आणि इस्पात मधील फरकानुसार इस्पातपुरूषा पेक्षा लोहपुरूष हे त्या संबोधनाने सूचित होणार्‍या व्यक्तीचे अधिक अचूक वर्णन आहे?]

*सौजन्याची ऐशीतैशी असे एक नाटक पूर्वी आलेले होते. त्यात नाना बेरके यांचे एरवी शेजार्‍यांशी भांडणारे कुटुंब सौजन्य सप्ताह पाळण्याचे ठरवते. त्यात ते "गांडीवर लाथ मारीन" ऐवजी "गुदद्वारावर लत्ताप्रहार करीन" असा शब्दप्रयोग करतात. तसे काहीसे या प्रेरणेबाबत वाटते.

चिंतामणी's picture

3 May 2011 - 12:19 pm | चिंतामणी

त्यात ते "गांडीवर लाथ मारीन" ऐवजी "गुदद्वारावर लत्ताप्रहार करीन" असा शब्दप्रयोग करतात. तसे काहीसे या प्रेरणेबाबत वाटते.

स्वा.सावरकरांना या पातळीवर आणून ठेवल्याबद्दल त्रिवार प्रणाम.

___/\___

___/\___

___/\___

आपल्या महान विचारश्क्तीला सलाम.

काढुन टाकला आहे..

काढुन टाकला आहे.

काढुन टाकला आहे.

पंगा's picture

3 May 2011 - 4:59 pm | पंगा

कायदा हा सोपा, साधा आणि सरळ शब्द परका असल्याने तो घालवायचा होता पण त्याला चपखल संस्कृतोद्भव शब्द सापडत नव्हता तो कसा बनवला (बहुधा अधिनियम हा तो शब्द असावा) यावर सावरकरांचाच एक लेख वाचलेला आहे.

'अधिनियम' म्हणजे 'कायदा' किंवा कसे याबद्दल खात्री नाही, पण आजकाल 'विधी' हा शब्द त्या अर्थी वापरला जात असावा, असे वाटते. म्हणजे, निदान कायदेमंडळाला तरी 'विधीमंडळ' म्हणतात बॉ.

यावरून, विधीमंडळात सकाळीसकाळी पास झालेल्या कायद्याला 'प्रातर्विधी' आणि दिवसाअखेरीस पास झालेल्या कायद्याला 'अंत्यविधी' म्हणावे किंवा कसे, हे कळत नाही.

>>सावरकरांच्या मते फारसी/अरबी शब्द हे आक्रमकांच्या संस्कृतीचे प्रतिनिधी आहेत.

या प्रेरणेलाच मुख्य आक्षेप आहे (अशी प्रेरणा असणे हे विकृतीचे-किमान आचरटपणाचे* लक्षण मानावे का?) आणि त्या प्रेरणेतून वापरातले शब्द हद्दपार करून त्याजागी संस्कृत शब्द रूढ करण्याला आहे.

नेमके!

(किंवदंतेवरून)

'साहेब' हा शब्द यावनी आहे, त्याऐवजी 'राव' वापरावा. 'बाळासाहेब' नाही म्हणायचे, 'बाळाराव' म्हणायचे, असा अट्टाहास. म्हणजे बहुधा 'आईसाहेब' म्हटलेले चालू नये, 'आईराव' म्हणावे लागावे. "म्हणजे यांना 'आई'मागे 'साहेब' लागलेला चालत नाही, 'राव' लागलेला चालतो" असे कोणी का म्हणू नये?

परिकथेतील राजकुमार's picture

3 May 2011 - 5:41 pm | परिकथेतील राजकुमार

सावरकर ब्राम्हण नसते तर थत्ते चाचांचा हा प्रतिसाद काय शब्दात आला असता बरे ?

नितिन थत्ते's picture

3 May 2011 - 6:16 pm | नितिन थत्ते

---------खुलासा सुरू ------------

माझ्या प्रतिसादातील वाक्य हे मला "सावरकरांच्या कुठे लाथ घालावी असे वाटून" लिहिले असल्याचा समज झालेला दिसतो. माझे मराठी लेखन इतके सुमार नसावे.

साध्या शब्दांऐवजी संस्कृताळलेले शब्द वापरले की ते स्वीकारार्ह होतात या प्रवृत्तीचे उदाहरण म्हणून ते नाटकातील वाक्य लिहिलेले आहे.

--------- खुलासा संपला. ---------

अवांतर: सावरकर ब्राह्मण नसते तर माझे वाक्य बोचले नसते का?

बाकी नवे शब्द बनवण्यात प्रतिभा तर आहेच. पण ती अस्थानी खर्च झाली आहे असे माझे मत आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

3 May 2011 - 6:21 pm | परिकथेतील राजकुमार

अवांतर: सावरकर ब्राह्मण नसते तर माझे वाक्य बोचले नसते का?

हॅ हॅ हॅ
ते नसते तर तुम्ही हे वाक्य लिहिले असते का?

चिंतामणी's picture

3 May 2011 - 6:40 pm | चिंतामणी

प्र.का.ट.आ.

चिंतामणी's picture

3 May 2011 - 6:39 pm | चिंतामणी

माझ्या प्रतिसादातील वाक्य हे मला "सावरकरांच्या कुठे लाथ घालावी असे वाटून" लिहिले असल्याचा समज झालेला दिसतो. माझे मराठी लेखन इतके सुमार नसावे.

गैरसमज नसावा. आपली प्रतीभा उत्तुंग भरा-या मारत आहे हे सगळेजण बघतच आहेत. आपण आपल्या प्रतीभेने स्वा.सावरकरांच्या भाषासुध्दी मोहीमेला ज्या पातळीवर आणून ठेवले आहेत त्याला आक्षेप आहे.

बाकी नवे शब्द बनवण्यात प्रतिभा तर आहेच. पण ती अस्थानी खर्च झाली आहे असे माझे मत आहे.

स्वा. सावरकरांच्या प्रतिभेतुन निर्माण झालेल्या कुठकुठल्या काव्याचे, पुस्तकाचे, लेखन प्रकाराचे वाचन केले आहेत??????????

त्यांची " प्रतिभा " योग्य स्थानी कुठेच खर्च झाली नाही असे आपले मत आहे का?

नितिन थत्ते's picture

3 May 2011 - 7:12 pm | नितिन थत्ते

>>त्यांची " प्रतिभा " योग्य स्थानी कुठेच खर्च झाली नाही असे आपले मत आहे का?

असा दावा मी केला असल्याचे आठवत नाही.

>>स्वा. सावरकरांच्या प्रतिभेतुन निर्माण झालेल्या कुठकुठल्या काव्याचे, पुस्तकाचे, लेखन प्रकाराचे वाचन केले आहेत??????????

१. १८५७ चे स्वातंत्र्य समर
२. विज्ञाननिष्ठ निबंध
३. माझी जन्मठेप

धन्यवाद.

सावरकरांच्या प्रतिभेविषयी कुठलीही शंका नाही. केवळ परकीय भाषेतले शब्द आहेत म्हणून त्यांचे उच्चाटन करण्यासाठी प्रतिभा खर्च करण्यावर आक्षेप आहे.

मी आंधळा गांधीभक्त असल्याचा आरोप माझ्यावर अनेकदा होतो. पण गांधींच्या ग्रामस्वराज्य, निसर्गोपचार, दलितविषयक दृष्टीकोण आदि गोष्टींवर कोणी टीका केली तर मी त्याचा प्रतिवाद करीत नाही. पक्षी आंधळी भक्ती नाही. तसेच सावरकरांच्या विज्ञाननिष्ठेला नेहमीच सलाम करीत आलो आहे. परंतु इथे आंधळी सावरकरभक्ती उघड दिसू लागली आहे. आणि सावरकरांच्या कुठल्याच गोष्टीवर टीका करायची नाही असा दृष्टीकोन दिसतो आहे.

परन्तु "बाकी नवे शब्द बनवण्यात प्रतिभा तर आहेच. पण ती अस्थानी खर्च झाली आहे असे माझे मत आहे" ह्या वाक्यातुन तेच ध्वनीत होत आहे.

बाकी तीन पुस्तकांची नावे दिलीत. धन्यु.

अजून वाचण्यासारखे खूप बाकी आहे. समग्र सावकर वाङमय याचे एकुन ८ खंड आहेत. त्यातील तीसरा खंड वाचल्यास आपणास सुमारे १०० विविध विषयावरील निबंध / स्फुटे/ लेख वाचता येतील.

त्यात १९३१ साली लिहीलेले " हिंदु नाग लोक ख्रिस्चन का होतात, नाग लोकांची सद्यस्थिती, माझ्या सनातन नाशीककर बंधुना अनावृत्त पत्र, चित्तपावन शिक्षण सहाय्यक संघ आणि बॅ.सावरकर असे काळाच्या आधी केलेले लिखाण (जे समजायला समाजाला अनेक वर्षे लागली) वाचायला मिळेल.

चौथ्या खंडात सहा सोनेरी पाने, मनुस्मृतीतील महीला (५ लेख), बालपणाचे निबंध, लंडनची बातमीपत्रे, त्यांची विविध भाषणे इत्यादी वाचायला मिळेल. या भाषणात १९३७ साली भाषासुध्दी विषयीची दोन भाषणे आहेत ती जरूर वाचावीत.

बाकी कमला काव्य, तनुवेल अशी रोमँटीक काव्ये, सिंहगड, बाजीप्रभु यांचे पोवाडे, शिवरायांची आरती, हिंदू नृसिंह इत्यादी अनेक विविध विषयांवरील काव्यांचा आस्वाद घ्यावा.

>>'न्यूज रिपोर्टर' आणि 'जर्नालिस्ट' हे शब्द समानार्थी नाहीत.
असहमत. मी एक तरी थेसॉरस काढून दाखवतो जिथे ते समानार्थी आहेत. पण मान्य नसेल तर रायटर आणि ऑथर हे समानार्थी आहेत. त्यांचे उदाहरण घ्या.

न्यूजरिपोर्टर हा बहुधा जर्नालिस्टामध्ये मोडावा, परंतु प्रत्येक जर्नालिस्ट हा न्यूजरिपोर्टर असेलच, असे नाही.

'केसरी'-'मराठा'कार लोकमान्य टिळक हे जर्नालिस्ट होते. न्यूजरिपोर्टर बहुधा नसावेत.

मान्य नसेल तर रायटर आणि ऑथर हे समानार्थी आहेत. त्यांचे उदाहरण घ्या.

हेही वरकरणी पटण्यासारखे वाटत नाही. थोडा विचार करावा लागेल.

सामान्य अर्थाने 'ऑथर' हा बहुधा 'रायटर'चा उपसंच मानता यावा. याशिवाय 'ऑथर'ला (लिखाणाशी थेट संबंध नसलेल्या) इतरही अर्थच्छटा आहेत. (पहा: writer आणि author.)

'रायटर' हा बहुधा काहीही लिहिणारा व्हावा. (म्हणजे, ऐन परीक्षेच्या वेळी जर एखाद्याचा हात फ्रॅक्चर झाला, तर त्याची परीक्षा बुडू नये म्हणून त्याने सांगितलेली उत्तरे सांगितल्याबरहुकुम लिहिणारा जो लेखनिक अनेकदा दिला जातो, त्यालाही 'रायटर' म्हणतात. तो त्या लेखनाचा 'ऑथर' होऊ शकत नाही.) 'ऑथर'मध्ये लेखनस्वामित्व अभिप्रेत असते. तसेच 'ऑथर' हा कोणत्याही निर्मितीचा कर्ता असू शकतो; लेखनाचाच, असे नव्हे.

थोड्या व्यापक अर्थाने, एखाद्या कृतीचे निर्मितीस्वामित्व ज्याला दिले जाऊ शकते, तो त्या कृतीचा 'ऑथर' ठरू शकतो. वरील दुव्यावरील 'ऑथर ऑफ अ क्राइम'ऐवजी 'रायटर ऑफ अ क्राइम' म्हणता येणार नाही.

पंगा's picture

3 May 2011 - 5:54 pm | पंगा

तुम्हाला त्यांची प्रेरणा मान्य नसेल तर नसू द्या पण ह्या शब्दांचा आंधळा द्वेष का?

या शब्दांचा द्वेष नाही. या शब्दांना, आणि अशा शब्दांमागच्या रुळलेले शब्द केवळ परकीय (विशेषतः फारसी-अरबी) भाषांतून उद्भवलेले आहेत म्हणून त्यांच्या उच्चाटनामागील द्वेषभावनेला, विरोध जरूर आहे.

शब्दाचा उगम फारसीतून असो किंवा अरबीतून असो किंवा इंग्रजीतून, एकदा तो शब्द मराठीने स्वीकारला, तो मराठीत रुळला, की तो मराठी. मग अशा मराठी शब्दांचे उच्चाटन करून त्याजागी दुसरा एखादा स्वनिर्मित शब्द लादण्याला विरोध आहे.

फारसी, अरबी शब्द हे जर मराठीत यावनी बलात्काराने आले असतील, तर त्याच न्यायाने हे कृत्रिम संस्कृतोद्भव शब्द मराठीत सावरकरी बलात्काराने आलेले आहेत, असे म्हणावे लागेल. (मराठीत परंपरेने आलेल्या तत्सम, तद्भव शब्दांना विरोध नाही. नवीन संकल्पनांकरिता, जोपर्यंत त्या संकल्पना नवीन आहेत आणि त्यांसाठी एखादा शब्द - कोणतेही मूळ असलेला - रूढ नाही तोपर्यंत आणि तोपर्यंतच, नवीन शब्द बनवायलाही तितकासा* आक्षेप नाही. विरोध आहे तो रूढ शब्दांच्या ठिकाणी असल्या लादलेल्या शब्दांना.)

* अशा संकल्पनांकरितासुद्धा एखादा शब्द मुद्दाम बनवण्याऐवजी सामान्य वापरातून नैसर्गिकरीत्या आलेला कधीही बरा. पण बनवायचाच झाला, तर तो मराठीच्या स्वभावाशी शक्यतो मिळताजुळता असावा. केवळ संस्कृत ही आपली पुरातनभाषा आहे म्हणून संस्कृतातून ओढूनताणून बनवलेला नसावा. 'रेस्तराँ'(मराठीत 'रेष्टॉरंट')करिता 'उपाहारगृह' किंवा 'भोजनालया'ऐवजी 'खाणावळ' हा शब्द त्या दृष्टीने मराठीशी मिळताजुळता आणि अधिक जवळचा आहे. बहुधा आधीपासून रूढ असावा आणि नैसर्गिकतःही बनला असावा. (खात्री नाही.) मग मुद्दाम 'उपाहारगृह' कशासाठी? कोणालातरी भारदस्त वाटते म्हणून?

विसोबा खेचर's picture

27 Apr 2011 - 9:26 am | विसोबा खेचर

जबरा..!

नितिन थत्ते's picture

27 Apr 2011 - 10:05 am | नितिन थत्ते

"दलितांनी अस्खलित जयोस्तुते म्हणण्याच्या" वर्णनात आम्हाला मेकॉले साहेब दिसला.

पंगा's picture

27 Apr 2011 - 7:04 pm | पंगा

नीटसे कळले नाही. (अंधुकसे कळल्यासारखे वाटत आहे, पण खात्री नाही.)

म्हणजे भेदनीती वगैरे?

नितिन थत्ते's picture

27 Apr 2011 - 10:36 pm | नितिन थत्ते

मेकॉले साहेबांच्या नावावर एक ढकलपत्र जालावर फिरत असते त्या ढकलपत्रानुसार मेकॉले साहेबांनी भारतीयांना इंग्रजी शिक्षण देऊन "इंग्रज बनवण्याचा" प्ल्यान आखला होता. तसे शिक्षण दिल्यावर हे शिकलेले भारतीय इंग्रजांसारखाच विचार करतील आणि ते शिक्षण दिल्याबद्दल आपले ऋणी राहून आपल्याला हवे तसे करतील अशी काहीशी योजना होती. त्याच प्रकारचा काही प्ल्यान सदरहु गृहस्थांनी चालवला होता की काय अशी शंका आली.

पंगा's picture

27 Apr 2011 - 11:32 pm | पंगा

पु.लं.च्या भाषणातील त्या विवक्षित मजकुराचा हा अभावित परिणाम (unintended consequence) समजावा काय? (माझ्याही मनाला ती शंका चाटून गेली. पण बहुधा पु.लं.ना तसे सुचवायचे नसावे असे वाटते.)

मला वाटते आपण नेमके काय सुचवीत आहोत हे बहुधा पु.लं.च्याही लक्षात आले नसावे. (श्रोत्यांच्या तर नसावेच नसावे.) समाजाच्या एका विवक्षित स्तरातील नैसर्गिक विचारपद्धतीतून (या स्तरात पु.ल.ही आले आणि श्रोतेही आले.) हे अभावितपणे होत असावे. कितीही सुधारणावादी म्हटले, तरी शेवटी 'आपल्या' विरुद्ध 'त्यांच्या' स्तरांतील 'फरका'ची जाणीव आणि त्यातून 'त्यांच्या'बद्दल सद्भावनेनेही विचार करायचा झाला तरी त्यात येणारा एका प्रकारचा कॉंडेसेंडिंग टोन किंवा विचार हा कितीही नाही म्हटले तरी अभावितपणे डोकावत असावा. (हे विधान मी पु.लं.च्या विधानाच्या संदर्भात करत आहे; सावरकरांची तशी विचारसरणी होतीच, असा दावा नाही. असेलही, किंवा नसेलही. येथे तो मुद्दा नाही.) हा नैसर्गिक मनुष्यस्वभाव आहे, आणि याला अपवाद फारसे नसावेत. (इंग्रजांचे - मेकॉलेचेसुद्धा - इतरवर्णीयांबाबत नेमके हेच झाले असावे.)

('सावरकरांची - विशेष करून संस्कृतातील - पदे अस्खलितपणे म्हणता येऊ शकणे' याचे महत्त्व - आणि त्याची दालित्यलक्षणांशी सांगड - हे पु.लं.च्या किंवा श्रोतृवर्गाच्या स्तरात अभावितपणे होऊ शकते. सावरकरांचे विचार तसे असतीलच, असे सांगता येत नाही.)

(समाजाच्या त्या विवक्षित स्तरातसुद्धा सुधारणावादी म्हणवण्याची विविध उपगटांत अहमहमिका असली, तरी शेवटी थोड्याफार फरकाने सगळे सारखेच असावेत. 'स्तर वेगळे आहेत आणि आपण त्यापैकी तथाकथित उच्च स्तराचे घटक आहोत' याची जोपर्यंत जाणीव आहे - मग 'ते स्तर वेगळे असू नयेत' ही भावना असली तरी - तोपर्यंत हे अभावितपणे व्हायचेच. त्याला इलाज नाही. मनुष्यस्वभाव आहे.)

थोडक्यात, पु.लं.ना जाणूनबुजून तसे सुचवायचे नसावे - कदाचित येथे पु.लं.च्या स्वत:च्या अभावित विचारपद्धतीचे सावरकर बळी होत असावेत - असे मानायला जागा आहे. परंतु तसे सूचित होत आहे, हे निश्चित. अर्थात, त्याकरिता सावरकरांना दोष देता येणार नाही. (तसा तो देण्याचा माझा उद्देश नाही, आणि आपलाही नसावा, याची खात्री आहे.)

नितिन थत्ते's picture

28 Apr 2011 - 8:36 am | नितिन थत्ते

दोष सावरकरांना नाहीच. पुलंनाही पूर्ण दोष नाही.

परंतु संस्कृतात असलेले धृवपद अस्खलित म्हणता येणे ही दलितोद्धार झाल्याची खूण समजली जाण्याला आहे .

त्या विशिष्ट संस्थेच्या चालकांची काय मनोधारणा होती हे माहिती नाही त्यामुळे ते मेकॉलेगिरी करीत होते असे म्हणता येईलच असे नाही. पण मेकॉले आठवला हे मात्र खरे.

अवांतर :
मेकॉले बद्दलचं ढकल पत्र त्यातला ठराविक छापाचा मजकूर पाहता तुम्हाला ज्या विचार धारणेची अ‍ॅलर्जी आहे अशा लोकांचा नेहमीचा propaganda असावा असं वाटतं.
अमर्त्य सेन यांनी An Argumentative Indian या त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकात याचा संदर्भ दिला आहे (लॉर्ड मेकॉले च्या धोरणाचा - ढकलपत्राचा नव्हे). अमर्त्य सेन हे नेहरू आणि त्यांची धोरणे जास्त पसंत करत असावेत असं त्यांच्या लेखनावरून आणि भाजप विरोधी लेखनावरून वाटतं. तेव्हा ते विनाकारण असं विधान करतील असं वाटत नाही. तसंच अमर्त्य सेन बहुतेक गोष्टी त्यांच्या प्रबंधाच्या पद्धतीने कुठले तरी जुने पुराणे संदर्भ देऊन लिहितात तेव्हा हे खरं असावं.
वरील प्रतिसादात ढकल पत्रा इतकाच ठराविक छापाचा शिक्का मारण्याच्या पद्धतीचा कल जाणवला ...

नाना बेरके's picture

27 Apr 2011 - 7:12 pm | नाना बेरके

चिंतामणीभाऊ .. उत्तम भाषण उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

सुंदर भाषण.

अवांतर : अपेक्षित व्यक्तींच्या अपेक्षित प्रतिक्रिया. त्यावर अपेक्षित चर्चाचक्र. स्वप्रांता/ देशाबाहेर राहणारे लोक जास्त भारतीय होतात (मिपा च्या केसमध्ये महाराष्ट्रीय- मराठी) हे पुन्हा दिसून आले.
अकारण वाद करण्याच्या वृत्तीला काय म्हणावे कळत नाही. मडके आधीच भरलेले असेल तर त्यात नवीन पाणी ग्रहण करण्याची क्षमता नसते त्यामुळे नवीन आलेले/ मिळालेले ज्ञानजल आधीच्या मडक्यात साचलेल्या पाण्याबरोबर कलुषित होऊन वाहताना दिसते आहे.

पुन्हा एकदा मलाव्यंचे भाषण सुंदर आहे. आणि क्रांतिसूर्यांबद्दल बोलण्याची पात्रता नाही.

चिंतामणी's picture

3 May 2011 - 8:08 pm | चिंतामणी

या प्रतिसादाची आज वारंवार आठवण झाली.

चिंतामणी's picture

28 Apr 2011 - 6:42 pm | चिंतामणी

अवांतर : अपेक्षित व्यक्तींच्या अपेक्षित प्रतिक्रिया. त्यावर अपेक्षित चर्चाचक्र. स्वप्रांता/ देशाबाहेर राहणारे लोक जास्त भारतीय होतात (मिपा च्या केसमध्ये महाराष्ट्रीय- मराठी) हे पुन्हा दिसून आले.
अकारण वाद करण्याच्या वृत्तीला काय म्हणावे कळत नाही. मडके आधीच भरलेले असेल तर त्यात नवीन पाणी ग्रहण करण्याची क्षमता नसते त्यामुळे नवीन आलेले/ मिळालेले ज्ञानजल आधीच्या मडक्यात साचलेल्या पाण्याबरोबर कलुषित होऊन वाहताना दिसते आहे.

___/\___

___/\___

___/\___

पैसा's picture

28 Apr 2011 - 7:04 pm | पैसा

सावरकर हा विषय, आणि पु.ल. वक्ते म्हणजे सोने पे सुहागा. लेख सावकाश वाचण्यासाठी बाजूला ठेवला होता, त्याचं सार्थक झालं.

आनंदयात्री's picture

29 Apr 2011 - 2:11 am | आनंदयात्री

लेख अत्यंत आवडला.

>>सावरकर हा विषय, आणि पु.ल. वक्ते म्हणजे सोने पे सुहागा. लेख सावकाश वाचण्यासाठी बाजूला ठेवला होता, त्याचं सार्थक झालं.

आणि प्रतिसाद वाचुन त्यावर पो पडला तिचायला.

प्यारे१'s picture

3 May 2011 - 5:39 pm | प्यारे१

धागाकर्ता, धागाविषय आणि धाग्यातील व्यक्ती सोडून बाकी फक्त 'विद्वज्जनांना' (इतरांनी उगाच 'झगा' ;) ओढवून घेऊ नये)

कृतानेक शिरसाष्टांग णमस्कार विणंती विशेष.

चांगले भाषण. इथे दिल्याबद्दल आभार.

जयंत कुलकर्णी's picture

3 May 2011 - 8:38 pm | जयंत कुलकर्णी

साहीत्य : मिपावरील कुठलाही लेख ज्यात सावरकर, टिळक, आंबेडकर, यशवंतराव, पु.ल.देशपांडे, अशा बिनडोक माणसांची किमान तीन किंवा जास्त वेळा नावे आलेला लेख. हे या पदार्थाचे प्रमूख साहित्य आहे. हे नसेल तर किमान एखाद्याने चांगल्या भावनेने लोकांना चांगले वाचायला मिळावे या भावनेने टाकलेला लेख. यात जर इतिहास डोकावत असल्यास हा पदार्थ अत्यंत रुचकर होतो असा अनुभव आहे.
२) ज्या दुकानदाराकडून हा लेख आणलेला आहे त्याचा मेंदू. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की या दुकानदाराला मेंद/अक्कलू नाही या वर आपला ठाम विश्वास असणे हे फार महत्वाचे आहे. पण आपण आणलेला मेंदू निघाला तर मग काय, मज्जाच मजा....
हा भाग आणताना तो नीट निवडून आणावा. त्यात भावना, विचार असले दगड असता कामा नयेत. मेंदू कसा असावा ......या मेंदूचा व लेखाचा खिमा ठो़ऊन आणावा. लेखाच्या व मेंदूच्या कशा ठिकर्‍या उडाल्या पाहिजेत ! शक्य झाल्यास ठोकणार्‍यास बाजूला सारून आपण स्वतःच ठोकावा. कदाचित त्याला कींव येऊन तो हळू ठोकेल. तशा खीम्याचा काय उपयोग ? शक्यतो जिवंत दुकानदाराचा मेंदू ठोकता आला तर फारच बरं ( हालाल !) हे करताना बरेच मित्र गोळा करावेत व त्या प्रसंगाचा आनंद घ्यावा. म्हणजे जेवताना याची आठवण करून करून डोळ्यात पाणी येईल.
३) जहाल शब्द, मसालेदार शब्द, व अजब तर्कशास्त्र. या खड्या मसाल्यांनी पदार्थ अधिक रुचकर बनतो. याच्यातला तिसरा मसाला फार महत्वाचा आहे आणि तो गुपचूप वापरायचा आहे. म्हणजे दुसर्‍याला वापरता येणार नाही व आपल्यालाच सारख्या ऑर्डर मिळत राहतील.
४) झिणझिण्या : हा एक वेगळा मसाला आहे. हा भारत देश सोडून सर्व देशात मिळतो. हा मसाला टाकला की पदार्थ खाताच खाणार्‍याच्या डोक्याला मुंग्या येतात व त्याचा तोल सुटतो. असे झाल्यास आपल्या रेसिपीला पहिले बक्षिस निश्चित मिळणार हे गृहीत धरावे.
५) लूप : हा एक तुपासारखा पदार्थ आहे. संगणक क्षेत्रात काम करणार्‍यांना याचा उपयोग चांगलाच माहीत असणार. हा तळण्यासाठी वापरला की तळणे ही प्रक्रीया थांबतच नाही. तळत रहा.. तळत रहा... अर्थात हे आपण टाकले नाही तरी चालेल . कारण हा या पदार्थाचाच एक बाय प्रॉडक्ट आहे आणि तो मुळ पदार्थात मिसळत राहतो...
६) नकारात्मकता: अत्यंत महत्वाचा मसाला. प्रत्येक वस्तूकडे नकारात्मक डृष्टीने बघता यायला पाहिजे. पण याची काळजी करू नका. आपण हा पदार्थ करायला घेतलाय म्हणजे ही आपल्याकडे भरपूर असणार.
७) व्याकरण : पदार्थ बिघडायला लागल्यास आपल्या मदतीस येणारा मसाला. याचा साठा भरपूर ठेवा. हा आपल्याला कायम लागणारच आहे.

उपकरणे :
१) एक किसणी. तुम्हाला वाटेल की याला कसलीही किसणी चालेल. पण नाही. ही काही विशिष्ट दुकानातच मिळते. याला दोन्हीकडून धार असते. याचा फायदा असा की लेख कसाही किसला तरी त्याचा कीसच पडतो. बर नुसते एवढेच नाही. याला काही मोठी भोके, काही मध्यम तर काही केसाच्या अग्राएवढी सुक्ष्म असतात. आणि या भोकांचा वापर हा क्रमाने करायचा असतो. याच्या प्रशिक्षणाची सोय काही तज्ञांकडे उपलब्ध आहे. पण थोडक्यात सांगणे झाल्यास ज्यांना या पदार्थाची रुची वाढवण्यात रस आहे त्यांनी पाळीपाळीने ही किसणी हाती घेऊन वेगवेगळ्या भोकातून हा लेख किसावा. किसताना खाली काय पडते आहे ते आजिबात बघू नये. किसत रहावे. थांबावे कधी ? यासे उत्तर फारच सोपे आहे. अशाच पदार्थाची दुसरी ऑर्डर मिळाली की किसणे थांबवावे. याने हातालाही चांगला व्यायाम होतो व मेंदूलाही आराम मिळतो. आता तुम्ही विचाराल की दुसरी ऑर्डर नाही मिळाली तर काय ? तसे झाल्यास खाणारे उठून गेले की थांबावे. व शेवटी आपण करणारेच राहीलो की हा पदार्थ ओरपून खावा. असा उरलेला पदार्थ खाण्यास फारच रुचकर लागतो व बर्‍याच दिवस पुरतो.
२) असंख्य शब्दकोष. ( मोठे भांडे व चाळणी) याचा उपयोग फारच होतो. प्रमूख साहित्यातील प्रत्येक कण या चाळणीत चाळून घ्यावा. शक्यतो इतक्यावेळा चाळावा की त्याचा भूगा झाला पाहिजे. अर्थात यात सर्व भाषेचे शब्दकोष लागतील. कधी कुठला लागेल याचा नेम नाही.
३) सगळ्या साहित्याचे तुकडे, भुगा, पीठ, मैदा करता येईल अशी सगळी उपकरणे. आपल्याकडे नसतील तर ही भाड्यानेही मिळतात.

कृती :
फारच सोपी. सगळे गोळा केलेले साहित्य एकत्र केले की आपल्याला पुढची कृती आपोआप कळायला लागेल. आपला आनंद द्विगुणीत, त्रिगुणीत होत जाईल...

तयार झालेल्या पदार्थावर आपल्या अगाध ज्ञानाचा चुरा पेरावा व मिपाच्या साईटवर ठेवून सर्व्ह केला तर हा पदार्थ दिसण्यास व खाण्यास अधिक रुचकर लागतो.

आमच्या कॅमेर्‍यात या पदार्थाची ( न मावल्यामुळे) प्रतीमा घेता आली नाही म्हणून छायाचित्र टाकता आले नाही त्याबद्दल क्षमस्व.

हलके घेणे हे वेगळ्याने सांगायला नको. :-)

चिंतामणी's picture

3 May 2011 - 8:38 pm | चिंतामणी

जयंत कुलकर्णी

पाककृती - शब्दांचा खीमा या पाकृ मधून मिपावरच्या वरिष्ठ आणि विद्वान लोकांच्या पाककृतीतील बारकावे सर्वांना समजेल अश्या भाषेत (ज्यात संस्कृत प्रचुर शब्द नाहीत) मांडल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे.

धन्यु.

___/\___

तर्री's picture

27 Feb 2013 - 9:33 am | तर्री

पु.लं.चे नेहमी प्रमाणे उत्तम भाषण वाचवायला मिळाले.
सोने पे सुहागा
बाकी चर्चा हे खास मिपा चे लक्षण .

अनुप कुलकर्णी's picture

2 Mar 2013 - 9:35 pm | अनुप कुलकर्णी

हेच भाषण पु लं च्या आवाजात mp3रुपात माझ्याकडे उपलब्ध आहे. मिपावर mp3 कसे अपलोड करावे मला माहिती नाही. तरी कुणाला हवे असल्यास मेल/व्यनि करावा अथवा अपलोड करण्याबाबत मार्गदर्शन करावे

पुन्हा एकदा आज हे भाषण वाचले. धन्यवाद.

नानबा's picture

3 Mar 2013 - 1:01 pm | नानबा

पु.लं. चं भाषण अप्रतिम.. फक्त आपण लिहीलेल्या लेखाबद्दल एक सुधारणा..

अंदमानच्या सेक्युलर तुरूंगातील

असे लिहीले आहे. ते सेल्युलर जेल आहे... बाकी सुंदरच..

केवळ राजकिय शत्रूंवरच नव्हे तर जिथे जिथे तुम्हाला अंधश्रद्धा दिसेल, अज्ञान दिसेल तिथे तिथे वीर पुरुषासारखे त्याच्यावर तुटून पडा

जीवनात प्रत्येक माणसाला तीन शक्तीशी सतत झूंज द्यावी लागते. बर्टुड रसेलने त्याचं वर्गीकरण केलं आहे. मनुष्य आणि निसर्ग, मनुष्य आणि समाज, आणि मनुष्य आणि तो स्वत: ह्या तिन्ही शक्तीशी त्याची रस्सीखेच चाललेली असते.

या दोन वाक्यांसाठी चिंतामणीला मनःपूर्वक धन्यवाद! (आणि अर्थात मृत्युंजयावरच्या या अप्रतिम लेखासाठी पुलंना विनम्र अभिवादन)

फिरंगी's picture

3 Mar 2013 - 2:05 pm | फिरंगी

वा !!!!!!!!!!!!!!!

चिंतामणी's picture

26 Feb 2015 - 3:07 pm | चिंतामणी

आज या महानायकाचा "आत्मार्पण दिन" आहे.
त्या निमीत्ताने पुन्हा एकदा आदरांजली.

एक कुणीतरी's picture

26 Feb 2015 - 5:12 pm | एक कुणीतरी

पु.ल.आणि सावरकर यांना सादर प्रणाम.
चिंतामणी शतश:धन्यवाद ...

चित्रार्जुन's picture

26 Feb 2015 - 6:23 pm | चित्रार्जुन

साहीत्य : मिपावरील कुठलाही लेख ज्यात सावरकर, टिळक, आंबेडकर, यशवंतराव, पु.ल.देशपांडे, अशा बिनडोक माणसांची किमान तीन किंवा जास्त वेळा नावे आलेला लेख

हे बिनडोक तर आपण कोन?

आदूबाळ's picture

26 Feb 2015 - 6:57 pm | आदूबाळ

उपरोध म्हन्तेत त्याला.

भाते's picture

26 Feb 2015 - 8:24 pm | भाते

धन्यवाद चिंतामणी! _ _/\_ _
लेखापध्दल आणि हा धागा पुन्हा वरती काढल्या पध्दल.
केवळ अप्रतिम!

चिंतामणी's picture

26 Feb 2015 - 11:54 pm | चिंतामणी

स्वा. सावरकरांबद्द्ल. आणी सोबत मा. अटलबिहारी बाजपेयी यांचेसुद्धा भाषण.
दूग्धशर्करा योग.

चिंतामणी's picture

28 May 2017 - 9:45 am | चिंतामणी

विनम्र प्रणाम.