गल्लीत नुसता गोंधळ.. दिल्लीत मुजरा नाहीच.

देवदत्त's picture
देवदत्त in जनातलं, मनातलं
2 May 2009 - 10:54 pm

गेले २ आठवडे 'गल्लीत गोंधळ.. दिल्लीत मुजरा' ह्या चित्रपटाच्या जाहिराती पाहत होतो. काल हा सिनेमा प्रदर्शित झाला. आज वेळ जमून आल्याने हा सिनेमा पहावयाचे ठरविले. आज सकाळी फोनवरून सिनेमाचे तिकीट काढून ठेवले. वाटले आज शनिवार आहे, त्यात नवीन हिंदी चित्रपट आले नाहीत. म्हणून गर्दी असायची. (मराठी सिनेमाला गर्दी असते हे आता मान्य करण्यासारखे आहे.)

तिकीटखिडकीवर जाता जाता पाहिले ४ पैकी ३ पडद्यांवर मराठी चित्रपट आहेत. अर्थात हिंदी चित्रपट प्रदर्शित न होणे हे ही कारण असू शकेल, पण आनंद वाटला की मराठी सिनेमाला मल्टीप्लेक्स मध्ये पाय पसरायलाही जागा मिळाली. पण प्रेक्षागृहात शिरताक्षणी तो आनंद मावळून गेला. जेमतेम १० ते १५ टक्के खुर्च्या भरल्या होत्या. असो.(बोक्याची टक्केवारीही काढायला पाहिजे असे वाटले. तो सिनेमा बहुधा अजूनही चांगला चालत आहे.)

ह्या सिनेमाची कथा तशी काही वेगळी नाही. (मला चित्रपटाची कथा ऐकायला आणि सांगायला आवडत नाही, पण ह्यात काही खास वळणं नाहीत. चित्रपटाच्या जाहिरातीतच सर्व दिसून येते.) एका गावातील एकमेकांवर कुरघोडी करणारे दोन जण- एक आमदार, एक सरपंच. व त्या दोघांत राहून दोघांचीही कामे करत स्वतःचा फायदा करून घेणारा गावातील एक माणूस नारायण. सुरूवातीपासून आमदार टोपे (सयाजी शिंदे) आणि सरपंच डोळे (नागेश भोसले) ह्यातील एकमेकांवर वरचढ होण्याची भांडणे दाखविली आहेत. त्यात नारायण (मकरंद अनासपुरे) दोघांकडून असल्याचा आव आणत, त्यांच्यात कळ लावत, त्यात भर घालत असतो, व स्वतःचाही फायदा करून घेत असतो. पुढे एका भांडणातून नारायण ठरवितो की तो स्वतःच निवडणूकीला उभा राहणार. मग जे राजकारणी डावपेच सूरू होतात ते सर्व पुढील चित्रपटात दाखवले आहे.

संपूर्ण चित्रपटात विनोदी वातावरण कायम राहते, आणि हा विनोद हा एका पातळीवरच राहतो. ना एकदम घसरला ना एकदम उंचावला आहे. त्यामुळे ठिक आहे. बाकी नारायणाच्या नावावरून विनोद, आमदार टोपेच्या मेव्हण्याचे एकच वाक्य ३/४ म्हणणे अशा प्रकारात थोडा कंटाळा येतो. सुरूवातीला नारायण सायकलवरून उतरल्यावर पायांची जी हालचाल करतो त्यावरून असले अंगविक्षेपाचे विनोद असल्याचे खटकले होते, पण तो प्रकार २ वेळाच दाखवला आहे. एखाद्याशी बोलत असताना आमदाराचा मुलगा मध्ये मध्ये आपले बोलणे लावत असतो ते प्रसंग नेहमीचेच वाटतात पण तरीही हसवून जातात.

वेगळेपण वाटले ते नारायण जे काही करत असतो ते नेमके कशाकरीता करत असतो त्याचा अंदाज लगेच आला नाही. एखादी गोष्ट घडून जातानाच त्यामागचे कारण कळते. उदा. डोळे व टोपे दोघांनाही शेवटच्या दिवशी ४ वाजता निवडणूकीचा अर्ज का भरायला लावतो हे मला तरी लगेच कळले नाही. त्या कार्यालयात ४ वाजल्यानंतरच कळले.

चित्रपटाला तशी एक सलग कथा असल्याचे मला तरी जाणवले नाही. एकमेकांना धूळ चारणे हा मूळ हेतू समोर ठेवून त्यानुसार मग प्रसंग टाकलेले आहेत. सयाजी शिंदे व मकरंद अनासपुरे ह्यांचे काम नेहमीच्याच शैलीत आहे. नागेश भोसलेचा अभिनय मी जास्त पाहिलेला आठवत नाही. काही वर्षांपूर्वी आलेल्या 'हसरतें' मालिकेतील त्याचे काम आवडले होते. पण त्यातील युनियन लीडरचा आवेश ह्यात सरपंच असला तरी वाटला नाही. बाकी इतर पात्रे म्हणजे आमदार/सरपंचाची बायका,मुले ह्यांची ही कामे बरी वाटली. सरपंचाच्या बायकोचा (लग्नाआधीचा) प्रियकर जो महाराज बनून वावरतो त्याचेही काम चांगले वाटले. लावणी कलाकार म्हणून असलेल्या नायिकेचे कामही बरे वाटले. एक परदेशी युवती तेथे कला शिकण्यासाठी आलेली असते त्याची गरजही सुरूवातीला वाटत नाही परंतु नंतर गरज कळते. संपूर्ण चित्रपटात दिल्लीचे नाव नाही. आहे ते फक्त लावणी मध्ये व चित्रपटाच्या शेवटी. नावावरून वाटले होते की गल्लीत म्हणजे स्वतःच्या प्रांतात काही गोष्टी करण्यासाठी दिल्लीमध्ये काही ना काही कथानक घडत असेल. पण सिनेमात नुसता गावातील कुरघोडींचा गोंधळच आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडताना एवढा काही खास प्रभाव माझ्यावर पडला असे वाटले नाही. त्यातल्या त्यात नंतरच्या १ तासात मी हा सिनेमा पाहिला हे ही विसरून गेलो.

असो, मी ही अजूनही गोंधळलो असल्याने माझे लिखाणही तसेच वाटत असेल. पण ह्या सिनेमाबद्दल मत असे की सिनेमा तसा वाईटही नाही आणि आवर्जून पहावा असाही नाही.

कलामौजमजाचित्रपटसमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

टारझन's picture

2 May 2009 - 11:23 pm | टारझन

तो मकरंद अनासपुरे तसा ही बोरंच करतो ... ह्यांच्याकडे अशोक सराफ किंवा दिलीप प्रभावळकरांसारखी प्रतिभा दिसत नाही .... त्यात सयाजी शिंदे मुळे तरी पिक्चर बरा असेल असं वाटलेलं ... पण टिव्ही वर प्रोमो पाहूनच लायकी कळाली .... हा पिक्चर फुकट पहाण्याच्या लायकीचा आहे ...

"अग्गं बाई अरेच्चा " आणि "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय " ह्या मुव्हीज आवर्जून थेटरात पाहिल्या .. अगदी संगणकावर सिडी येउन सुद्धा !!
देवदत्त साहेब .. उत्तम परिक्षण लिवलंय बॉ .. किमान एसीची हवा खाऊन आर्धे पैसे वसूल होत असतील की नाही ?

अनामिक's picture

3 May 2009 - 4:02 am | अनामिक

>>तो मकरंद अनासपुरे तसाही बोरंच करतो ...

अगदी सहमत. सुरवातीला मकरंद अनासपुरे बरा वाटायचा, पण प्रत्येक चित्रपटात तोच-तोपणा आल्याने त्याचे चित्रपट बोर होतात हल्ली.
बाकी परिक्षण चांगलं जमलं आहे.

-अनामिक

यन्ना _रास्कला's picture

3 May 2009 - 5:52 am | यन्ना _रास्कला

तर भरत जादवबी करतो. आनि गन्गुबाय पन. या लोकान्च्या एक्टिंगमधे इविधता नाय.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

भडकमकर मास्तर's picture

3 May 2009 - 8:23 am | भडकमकर मास्तर

आवर्जून परीक्षण लिहिल्याबद्दल धन्यवाद...
आणि हाच चित्रपट थिएटरात जाऊन पाहिलात या धाडसाबद्दल कौतुक सुद्धा...

____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

अनंता's picture

3 May 2009 - 9:45 am | अनंता

मक्या अनासपुरे अजून किती दिवस एकसुरी अभिनय, संवादावर जगणार आहे देव जाणे!
वेळीच सावध केल्याबद्दल आभार ;)

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;)

स्वामि's picture

3 May 2009 - 10:07 am | स्वामि

एक्टरलोकांबद्दल बोलायचं काम नाय बरका,सगळी आपली गाववाली हायेत. :D