मुलं - काही नोंदी

मितान's picture
मितान in जनातलं, मनातलं
21 Oct 2013 - 12:40 pm

गेले काही दिवस खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस हाताळायला मिळतायत. आलिप्त राहून काम करायचे ठरवले तरी मनात अस्वस्थता दाटून राहतेच. लिहिल्याने थोडे बरे वाटेल असं वाटतंय म्ह॑णून हा प्रपंच..लिहिताना अर्थात त्या त्या व्यक्तींच्या खाजगीपणाला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेत आहे.

अवनी. वय १७.
गेली चार वर्षं दरवर्षी एक अश्या कुटुंबातल्या ४ व्यक्तींचा मृत्यू या मुलीने पाहिलाय. आता एकटी आहे. १२ वीत उत्तम गुणांनी पास झाली आहे. तिचा प्रश्न " माझ्या आजूबाजूची एकेक माणसं मरतायत आणि मी मजेत जगतेय.. मला नको असं जगणं.." स्वार्थी नातेवाईक, एकटेपणा, अकाली प्रौढत्व, मित्र मैत्रिणी आणि हिच्या जगण्याच्या शैलीतली तफावत, अपरिपक्व निर्णक्षमता अशा अनेक गोष्टींनी नैराश्याच्या गर्तेच्या तोंडाशी उभी ही !

नीरव,वय १९.
लहाणपणापासून प्रत्येक हट्ट पुरवला गेला. अकरावीत असताना अनेक व्यसने लागली. त्यातून बहेर पडला तेव्हा बारावीच्या परीक्षेला ३ महिने उरले होते.१० वीला ९२% मिळवणारा हा मुलगा १२ वीत कसाबसा पास झाला.हट्टी हेकेखोर स्वभाव मात्र तसाच आहे. लाड पुरवणे तसेच आहे. वडिलांचा व्यवसाय. आई नोकरदार. नीरव ने मागच्या आठवड्यात नवे गेम खेळण्यासाठी नवा लॅपटॉप मागितला. त्याला हवा असलेला लॅपटॉप मिळाला नाही तर आत्महत्येची धमकी दिली. घरातून दोन दिवस गायब झाला. वडिलांनी घाबरून लॅपटॉप घेऊन दिला. आई हतबद्ध !

रचिता. १५ वर्षे. घरात आईबाबांची सतत भांडणं. हिच्याकडे होणारे दुर्लक्ष हे या संवेदनशील मेधावी बुद्धिमत्तेच्या मुलीला सहन झालं नाही. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला.

सरयू.२१ वर्षे.
११ वर्षांपूर्वी दिल्लीतल्या एका डॉक्टरने ही स्लो लर्नर आहे असे सांगितले. मग स्पेशल स्कूल, रेमिडियल क्लासेस असे चक्र सुरू झाले. आत्ता टेस्ट केली तर बुद्ध्यांक सामान्यांपेक्षा वरचाच आहे. पण लेखनातली अध्ययन अकार्यक्षमता आहे असे आढळले. ही नुकतीच १० वी झाली. पुढे काय हा निर्णय घेता येत नाही.

संकेत आणि संध्या.
१४ वर्षे. एका महागड्या प्रसिद्ध कोचिंग क्लास मध्ये गेलं वर्षभर लैंगिक शोषणाला बळी पडलेली ही मुलं. आई बाबांचे खूप पैसे वाया जातील असे वाटल्यामुळे सहन करत राहिली. असह्य झाल्यावर बोलण्याचे धाडस केले.

विरेन.१४ वर्ष.
अती बुद्धिमान. त्याच्या मते ही शिक्षणपद्धत, राजकारण, समाजरचना 'होपलेस' आहे. त्याला याचा भाग होण्याची इच्छा नाही. त्याने शाळेत येणं सोडून दिलंय. गेले सहा महिने केवळ शास्त्रीय संगीत ऐकतोय. कोणाशीही संवादाची इच्छा नाही.

अक्षता. १५ वर्षं.
गेली २ वर्षं तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या असणार्‍या मुलाच्या प्रेमात(?) आहे. आता त्याला दुसरी मैत्रिण भेटली आहे. म्हणून हिने अभ्यास शाळा सोडून देण्याचा निर्णय घेतला.हट्टाने घरातून बाहेर पडली नि होस्टेलवर आहे. तिथे तिच्याबद्दल चोरीच्या तक्रारी पुराव्यांसह येताहेत.

रीमा. वय ८.
कॉलनीत एक टोळी आहे. त्या टोळीची ही लीडर. ५ ते ८ वयातल्या या मुली रोज ठरवून एकीच्या घरून पैसे चोरून आणतात. ते जंक फूडवर खर्च करतात. जी मुलगी याला विरोध करेल तिला वाळीत टाकलं जातं. पालक हैराण..

अर्णव.वय ६. आई सतत आजारी असते म्हणून त्याला ती अज्जिबात आवडत नाही. घरी असलेल्या वेळापैकी ६-७ तास हा टी व्ही किंवा व्हिडिओ गेम्स खेळतो. ते बंद केले तर याला खूप उलट्या सुरू होतात. हे व्यसन कसं घालवायचं या संभ्रमात पालक.

निधी. वय ५. दत्तक मुलगी. आई बाबा ५० च्या वरचे. ही चंचल आहे. दिवसाला ३ बिस्किटांशिवाय काहीही खात नाही. अचानक अंथरुण ओले करणे सुरू झाले आहे. बोलण्यात तोतरेपणा यायला लागला आहे.

अंकुर. वय ४. बोलत नाही ही तक्रार घेऊन पालक आले. चाचणीनंतर समजले तो कर्णबधीर आहे. आई म्हणाली आमच्या लक्षातच आलं नाही.

राधा . वय ६.उत्तम चित्र काढते. अचानक तिने घरावरून वाहणारी नदी आणि घराखाली जळणारे डोंगर एवढीच चित्रं काढायला सुरुवात केली आहे. पालकांना समुपदेशकाकडे यायला गेली ५ महिने वेळ मिळत नाही.

सारिका वय ११
वर्गात शेजारी कोणालाही बसू देत नाही अशी सतत तक्रार. आई सांगते घरीही कोणाला हात लावू देत नाही. आणि सतत हात धूत असते. लाईटच्या बटणाला हात लावताना बोटाला रुमाल गुंडाळायचा. बेसीनमध्ये हात धुताना आधी नळावर वारंवार पाणी टाकायचं, दार उघडलं की हात धुवायला पलायचं.... दिवसातून ३४ वेळा हात धुतल्याची नोंद केली आहे त्यांनी ! दोन वर्षांपूर्वी एका सहलीत तिला कोणीतरी 'बॅड टच' केला होता म्हणाली. तेव्हापासून तिला कोणत्याही स्पर्शाची भिती वाटते. मामाने गालाला हात लावलेला तर सहनच होत नाही.
आई वडील अल्पशिक्षित श्रीमंत. ' तिच्यावर वाटेल तेवढा पैसा खर्च करतो पण हे खुळ तिच्या डोक्यातून काढा " असे म्हणतात. त्यांच्याजवळ पैसा आहे. पण संवाद साधण्यासाठी वेळ नाही. :(

केतन. वय १७.
वडील एका अती महत्त्वाच्या सरकारी खात्यात उच्चपदस्थ आहेत. आई मानसशास्त्राची पदवीधर. दोघेही अतिशय प्रामाणिक आणि सरळ साधे जगायला आवडणारे. केतनचा स्वभावही साधा. काहीसा भाबडाच. आता त्याला त्याचे मित्र 'सरकारी तोर्‍यात रहा, गाड्या वापर, पैसे उधळ.." असा आग्रह करतात. आई बाबा समजावून बोलून थकलेत. केतनला मित्र हवेत म्हणून त्यांचे ऐकावे लागेल असे ठामपणे वाटतंय. तो आता घरातून किरकोळ चोर्‍या करायला लागला आहे. स्वतःच्या स्टेटस साठी सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग करतोय. बाबांना ते अजिबात मान्य नाही. याच्या काळजीने ते त्रस्त आहेत.

संकल्प, वय १२
आई बाबा दोघे नोकरीवर गेल्यावर घरी एकटा असताना इंटरनेटवर पॉर्न पाहण्यात आले. मग आवडले. मग वारंवार बघण्याची सवय लागली. बाबांना समजल्यावर खूप मार खावा लागला. आता घरात नाही बघत. सायबर कॅफे मध्ये बघतो. त्यासाठी लागणारे पैसे चोरतो. दिवास्वप्नात राहणं खूप वाढलंय. भाषा आणि नजर बदलली आहे. तो आता मुलामुलींना नको तिथे स्पर्श करण्याची संधी शोधत असतो. आई बाबांच्या पापभीरु विश्वाला हा प्रचंड मोठा हादरा आहे. ते म्हणाले की आम्ही त्याचा तिरस्कार करतो. ही चटक संकल्पला विकृत बनवतेय. कळतंय पण वळत नाही. तो एकटा पडलाय.

मृण्मयी वय १५.
दहावीत शिकणार्‍या मृण्मयीच्या आई बाबांचा घटस्फोट होतोय. मार्च मध्ये शेवटची सुनावणी आहे. ती आईच्या पाठीशी ठाम उभी आहे. बुद्धिमान आहे. कष्टाळू आहे. आता तिला ताण आहे तो लोकांच्या प्रश्नांचा, मित्रमैत्रिणी दुरावण्याचा. तिला निद्रानाशाचे निदान झाले आहे.

सारंग, वय ८
मोठ्या एकत्र कुटुंबातला मुलगा. आई बाबा आपापल्या व्यवसायात मग्न. आई त्याला भेटतच नाही. सकाळी ८ ते रात्री १०-११ ती ऑफीसात असते. सारंग भेटला की मनातल्या अपराधीपणाला घालवण्यासाठी वाट्टेल ते लाड होतात. आता शाळेतून तक्रारी येतायत. आई सोडून सारंगचा आवाज कधीच कोणी ऐकला नाही. माझ्याकडे पहिले सेशन झाले तेव्हा ४० मिनिटांनी पहिला शब्द त्याने उच्चारला. "बाय" !
आता आपणहून येतो. समोर नुसता बसतो. चित्र काढतो. मेकॅनो किंवा टूलकिट काढून खेळतो. अवघड पझल्स लीलया सोडवतो. बाय म्हणतो नि जातो.

निनाद, वय ८
६ महिन्यांपूर्वी अचानकच याच्या समोरच याची आजी गेली. तेव्हा घरात निनाद नि आजीच. याने आईला फोन केला. " बहुतेक आजी वारली. कारण ती आता जप करत नाहिये."
निनादला तान्हा असल्यापासून आजीनेच सांभाळलं. काहीशी अती काळजी घेणारी पण शिस्तीत नि प्रेमळ धाकात वाढवणारी आजी निनादसाठी सर्वस्व होती.
ती गेल्यानंतर निनाद रडला नाही. सकाळी उठल्यापासून जी कामे आजी करायची ती स्वतःहून करायला लागला. रांगोळी, पूजा, स्वतःची आंघोळ.... आई बाबांशी संवाद नाही. चिडणे नाही. बोलणे नाही. अभ्यास उत्तम. शाळेतून काही तक्रार नाही.

अकल्पिता, वय ४
घरात आई बाबांचे सतत होणारे वाद बघते. बहुतेक मारहाणही. एक दिवस शाळेत तिच्या मनाविरुद्ध काहीतरी झाले म्हणून हिने शिक्षिकेसमोर बेंचवर स्वतःचे डोके आपटून घेतले. सगळा वर्ग स्तब्ध ! शिक्षिका हतबद्ध ! आता तिने पुन्हा असे करू नये म्हणून घरात नि वर्गात सगळे तिच्या मनासारखे वागतात. तरीही अकल्पिता आनंदी नाही.

मनाच्या जंगलात हरवलेली ही मुलं सतत काहीतरी सांगू पहातायत. ते आपल्याला कधी ऐकू येणार ?

समाजजीवनमानविचारअनुभव

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

21 Oct 2013 - 1:03 pm | मदनबाण

बलमनांच्या नोंदी वाचुन अस्वस्थ व्हायला झालं !
संकेत आणि संध्या यांना तर भयानक अनुभव आलाय ! कोवळ्या वयातच मनावर ओरखडे ! :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Oct 2013 - 4:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बालमनांच्या नोंदी वाचुन अस्वस्थ व्हायला झालं !

-दिलीप बिरुटे

भयाण आहे सारं. परंतू वाचून धक्का नाही बसला.

अशी खुप मुलं आपल्या आजूबाजूला असतात. कळत नकळत आई-वडीलांकडून किंवा पालकांकडून भावनिक शोषण (इमोशनल अ‍ॅब्युज), शारिरिक शोषण (फिजिकल अ‍ॅब्युज) आणि शाब्दिक शोषण (व्हर्बल अ‍ॅब्युज) होत असते. नात्यातील कुणीतरी, शाळेत कॉलेजात किंवा अगदी अपवादात्मक परिस्थितीमध्ये अगदी पालकांकडुनही लैंगिक शोषण होत असते. अशा वेळी मुलांची अवस्था "मुकी बिचारी कुणीही हाकावी" अशी असते.

अशा शोषित मुलांच्या पालकांपैकी खुप कमी पालकांना जाणवत असतं की आपल्या मुलांना काही समस्या आहे किंवा आपण चुकीच्या पद्धतीने मुलांना वाढवतोय. खुप कमी मुलं समुपदेशकाकडे (कौन्सेलरकडे), मानसशास्त्रज्ञाकडे (सायकॉलॉजीस्टकडे) किंवा मानसोपचारतज्ञाकडे (सायकीयाट्रीस्ट्रकडे) नेली जातात.

मुलांना धपाटे दिल्याशिवाय त्यांना वळण लावताच येत नाही हा आपला गोड गैरसमज असतो. ज्यांनी लहानपणी असे धपाटे खाल्लेले असतात त्यांना त्याचं केव्हढं कौतुक असतं. ते ही परंपरा पुढे चालू ठेवतात. मुलांवर ओरडणे ही तर एक क्षुल्लक बाब असते पालकांच्या दृष्टीने. मात्र या क्षुल्लक बाबींचा मुलांवर काय परीणाम होत असेल याचा विचारच होत नाही.

डोक्यावर छप्पर, घालायला कपडे, खायला अन्न आणी शिकायला पुस्तकं दिली म्हणजे आपण जगातले सर्वोत्कृष्ट पालक झालो असं खुप सार्‍या पालकांना वाटतं. मुलांना ह सारं दयायलाच हवं. तो त्यांचा हक्क असतो. पण त्याचबरोबर मुलांना समजून घेणंही गरजेचं असतं. "आम्ही तुझ्यासोबत आहोत" अशी विश्वासाची भावना मुलांच्या मनात निर्माण करणं गरजेचं असतं. सात आठ वर्ष वयापर्यंत मुलांना मोठयांना खुप काही सांगायचं असतं, खुप सार्‍या प्रश्नांची उत्तर मिळवायची असतात. त्यांच्या प्रत्येक हाकेला पालकांनी ओ दयावी अशी त्यांची ईच्छा असते. दुर्दैवाने खुपच पालक हे सारं करतात.

खरं तर लहान मुल वाढवणं ही एक आनंदयात्रा असते. अर्थात ते आपल्याला कळलं तर.

मुक्त विहारि's picture

21 Oct 2013 - 1:22 pm | मुक्त विहारि

"खरं तर लहान मुल वाढवणं ही एक आनंदयात्रा असते. अर्थात ते आपल्याला कळलं तर."

एका "च" ची सुधारणा करावीशी वाटली,ती केली...

बाकी आपण मुद्दाम गहन विचार करत नसल्याने तुमचे लेख आणि प्रतिसाद वाचनीय असतात..

खरं तर लहान मुल वाढवणं ही एक आनंदयात्रा असते. अर्थात ते आपल्याला कळलं तर. >> +१

रामपुरी's picture

23 Oct 2013 - 2:22 am | रामपुरी

मुलांना धपाटे देऊ नयेत, मुलांना रागवू नये हा सुद्धा एक गोड गैरसमज असतो, एवढेच नमूद करावेसे वाटते.

स्पंदना's picture

21 Oct 2013 - 1:14 pm | स्पंदना

अस्वस्थ!

मुक्त विहारि's picture

21 Oct 2013 - 1:17 pm | मुक्त विहारि

त्यांचे पालक(?) त्यांना असे करायला भाग पाडतात.

मुले काही आकाशातून सगळे घेवू न येत नाहीत,(एक अंकूरचे उदाहरण सोडले तर ... अर्थात तिथेही पालकांचा प्रश्र्न आहेच.....अरे तुम्ही एका मुलाला जन्म देत आहात तर त्याची काळजी कुणी करायची?)

असो...

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

21 Oct 2013 - 2:09 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

विमनस्क करुन गेले लिखाण.
असं काही वाचलं कि आजकाल फार त्रास होतो.
पण या साठी कुणीतरी कुठेतरी काहीतरी करत असतीलचं ना?
तिथे काही मदत करता येइल कां आम्हाला?
हि परिस्थिती भयंकर आहे, पण यावर उपायही असतीलचं की.

मितान's picture

22 Oct 2013 - 12:08 pm | मितान

मि का
यावर नक्कीच उपाय आहेत. पालक, समुपदेशक, शिक्षक आणि मूल अशी टीम यातून एकत्रितपणे यावर काम करू शकते. सर्वांचा सहभाग मोलाचा.

हतबुध्द, अवाक आणि खूप जास्त चिंतीत! माझ्या घरातल्या नविन पिढीसोबत असं काही घडू नये ह्यासाठी काय करावं लागेल नेमकं?

आनंदयात्रा संगोपनाची नावाचं डॉ. लता काटदरेंचं एक छान पुस्तक आहे.

मुलं वाढवणार्‍या प्रत्येकानं वाचावं असं हे पुस्तक आहे.

या क्षेत्रातील वास्तव किती भयाण आहे याचं ताजं, अगदी आज दुपारचं उदाहरण आहे.

पिंपरीला मनपाच्या एका माध्यमिक शाळेत मुलांची मारामारी होऊन एका विदयार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

प्यारे१'s picture

21 Oct 2013 - 5:12 pm | प्यारे१

अवस्थ!

- कॉलेजमध्ये असताना स्वतःसाठी आयपीएच ला भेट दिलेला प्यारे.

प्यारे१'s picture

21 Oct 2013 - 5:13 pm | प्यारे१

अस्वस्थ. टायपो एरर.

मुक्त विहारि's picture

21 Oct 2013 - 5:17 pm | मुक्त विहारि

माझी पण तशीच अवस्था झाली होती..

खरं आहे गं अगदी! काय बोलावं सुचत नाही. पण आपल्यासारख्या साध्या घरातून आलेल्या मुलांना या विचित्र परिस्थितीतील मुलांचा त्रासच होतो. माझ्या मुलाच्या स्कूलबस्टॉपवरील एका मुलीच्या आईवडीलांचा डिव्होर्स होऊन २ महिने झालेत. ती बराचवेळ बरी असते पण कधीकधी एकदम सगळ्यांना मारत सुटते. तिला परिस्थिती स्विकारायला थोडा वेळ द्यायला हवा पण आईला वेळ नाही आणि कोर्टाने व्यसनी वडीलांवर निर्बंध घातलेत. बरं आता ही आमची टीनएजर मुले आणखीनच अवघडली आहेत. मग त्यावर सध्यापुरता एक उपाय काढलाय आणि तो बर्‍यापेकी वर्क होतोय. परवाच मुलाचा मित्र बस स्टॉपवर कोणाशीही बोलत नव्हता आणि एकदम झाडामागे जाऊन रडायला लागला. आम्ही सगळेच बघायला लागलो. तो कोणालाही जवळ येऊ देत नव्हता. नंतर समजले की त्याचे आईवडीलही वेगळे होणारेत.

अनन्न्या's picture

21 Oct 2013 - 6:52 pm | अनन्न्या

या निदान समोअर तरी आल्या. पण आणि किती असतील ज्या समोरच येत नसतील.

लौंगी मिरची's picture

21 Oct 2013 - 7:32 pm | लौंगी मिरची

हे सगळं अस्वस्थ करणारं आहे , पण तुम्ही त्यातुन त्यांना काय मार्गदर्शन केलत हे वाचायला जास्त आवडेल .

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Oct 2013 - 7:39 pm | बिपिन कार्यकर्ते

लिही लिही म्हणून आग्रह केला होता...

!

प्रकाश घाटपांडे's picture

21 Oct 2013 - 7:46 pm | प्रकाश घाटपांडे

.लिहिताना अर्थात त्या त्या व्यक्तींच्या खाजगीपणाला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेत आहे.

हे जरी खर असल तरी समाजाचे चित्र अशा अनेक खाजगीपणाच्या आवरणाखाली नीट समजू शकत नाही. समाजात घडणार्‍या अनेक बाबी दबून राहिल्या. समाजाचे प्रश्न समजण्यासाठी अशा बाबींचा उलगडा होणे अपरिहार्य ठरते. साहित्य अशा वेळी चांगले काम करते.

लौंगी मिरची's picture

21 Oct 2013 - 7:54 pm | लौंगी मिरची

माझ्या मुलगा आता ८ वर्षांचा आहे . एक दिवस फारच अपसेट होउन घरी आला , नेहेमी असा येत नाहि . थोडासा जरी फरक जाणवला तरी आजकाल घाबरायला होतं .
हे जरी खरं असलं तरी संवाद साधणं महत्वाचच . मी आल्या आल्या काहि लगेच विचारलं नाहि ..... संध्याकाळी जेवणं झाल्यावर सगळेच थोडावेळ एकमेकांच्या संपूर्ण दिवसाचा आढावा घेतो , ती फक्त आवर्जुन कम्पल्सरी केलेली एकमेकांशी संवाद साधायची वेळ .
त्यावेळी त्याच्या बाबाला मी आधीच सांगितलेला त्याच्या अपसेट होण्याचा विषय काढला तेव्हा तो अक्षरशा डोळ्यात पाणि आणुन म्हणाला " बाबा ठ्येयलर चे मॉम डॅड
सेपरेट होतायत , तो फार रडतो , टिफिन सुद्धा देत नाहि कि स्नॅकहि मिळत नाहि घरुन असे का वागतात त्याच्याशी ? त्याची काय चुक आहे ?
खरच काय बोलावं तेच समजलं नाहि :(

आतिवास's picture

21 Oct 2013 - 7:59 pm | आतिवास

अवघड आहे.
ही मुलं-मुली निदान तुमच्यापर्यंत पोचली तरी, ज्यांना ती संधी नाही, त्यांच काय असेल या विचारांनी अजून अस्वस्थता वाढली.

पण थोडा विचार करता असंही वाटलं की निदान हा प्रश्न समोर येतोय - म्हणजे तो आहे हे मान्य केलं जातंय पालकांकडून हीही एक मोठ्ठी पायरी गाठली आहे आपण समाज म्हणून. "प्रश्न नाहीच" असं मानून जगण्यापेक्षा हे कैक पटींनी उत्तम; कारण त्या प्रश्नातून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण होते प्रश्न स्वीकारण्यातून!

आपल्या आसपास अशा खूप कहाण्या खरे तर दिसतात. पण आपण कशाला मधे पडा या विचाराने आपण गप्प रहातो. खरं सांगायचं तर तुझ्याकडे ही मुलं आणली गेली असतील तर त्यांचं नशीब म्हणायला पाहिजे.

माझ्या मुलीच्या वर्गातला एक मुलगा फारच हायपर वागतो, त्याला सायकिअ‍ॅट्रिस्टकडे न्या म्हणून आईला सांगितलं तर "तो अपुर्‍या दिवसाचा आहे त्यामुळे त्याच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो आणि तो असा करतो" हे उत्तर मिळालं. काय बोलणार?

मुक्त विहारि's picture

21 Oct 2013 - 8:49 pm | मुक्त विहारि

सायकॉलॉजी हा विषय शाळेपासूनच शिकवायला हवा.

(त्या नागरीक शास्त्रापेक्षा हे कितीतरी बरे.....हे वाक्य किंचीत विचार करून लिहीले असल्याने, मुद्दाम गहन विचार करणार्‍यांनी ह्या उपप्रतिसादावर आपल्या मताची पिंक टाकू नये.)

मुक्त विहारी, सुदैवाने अशी संधी मला मिळतेय. सध्या मी एका शाळेत ७ वी आणि ८ वी च्या विद्यार्थ्यांना भावना आणि विचार शिकवतेय. मला खूप आनंद मिळतोय यातून.

मुक्त विहारि's picture

22 Oct 2013 - 12:21 pm | मुक्त विहारि

मुलांपेक्षा त्यांच्या जन्मदात्यांना त्याची जास्त गरज आहे.

(जन्मदाता ते पालक ते सूजाण पालक असा प्रवास करु इच्छिणारा) मुवि..

कवितानागेश's picture

21 Oct 2013 - 10:03 pm | कवितानागेश

'आपण कशाला मधे पडा', हाच अडथळा होतो आणि जीव हळहळतो. अगदी जवळच्या नात्यातल्या मुलांचे पण काही बिघडताना दिसलं तरी काही करता येत नाही.

असेच बरेचसे पालक आमच्याकडे मुलांची तक्रार घेऊन येतात कि तुम्ही मुलांना काही तरी सांगा. त्यांच्याशी बोलले तर हे लक्षात येते कि आईबापांची फार मोठी चूक होत आहे. पण ती चूक जर लक्षात आणून दिली तर ते स्वीकार करण्याची तयारी नसते किंवा कळते पण वळत नाही. अशा अनुभवातून आम्ही( मी आणी माझी पत्नी) शहाणे झालो आहोत. लोक फुकट सल्ल्यासाठी येतात त सुद्धा आम्ही त्यांच्या मुलांचे समुपदेशन करावे यासाठी. त्यांना त्यांची चूक दाखवून दिलेली आवडत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना आता मानसशास्त्रज्ञांकडे समुपदेशनासाठी जा असा सल्ला देतो. ज्यांना तितकी तळमळ असते ते जातात. ज्यांना नसते ते आपला प्रश्न बासनात गुंडाळून बसतात. याचा माझ्या पत्नीस फार त्रास होत असे पण तुम्ही जग सुधारू शकत नाही हे माझे बाकी तिला आता आता पटायला लागले आहे. आपण लोकांना सल्ला द्यावा पण त्यांनी तो ऐकल अन्ही तर आपण जीवाला त्रास करून घेऊ नये हे आता तिला पटायला लागले आहे. नेकी कर दरिया मी डाल.
चार पावले चालल्यावर धाप लागत असलेला माणूस इ सी जी मध्ये हृदयविकार बळावल्याची लक्षणे असताना मी दिवाळीनंतर रुग्णालयात गेलो तर चालेले का असे विचारतो. मग या माणसाना त्या गोष्टीचे गांभीर्य कसे पटावे . यावर मी एक लेख लिहिला होता (तेरी आंख के आंसू पी जाऊ) http://www.misalpav.com/node/25642 .
केवळ जास्त प्रशिक्षित समुपदेशकांची गरज आहे असे नव्हे तर समाजप्रबोधनाची जास्त गरज आहे.

मितान's picture

22 Oct 2013 - 12:14 pm | मितान

सुबोध खरे, सहमत ! +१
आमच्याकडे आलेले पालकही बहुतांश वेळेला त्यांच्या वागण्यात बदल सुचवले की परत येत नाहीत. मग हाताशी असणार्‍या मुलासोबत जेवढे काम करणे शक्य आहे तेवढे करते. पालकांना ' चॉइस आणि प्राइस" ची थिअरी मात्र आवर्जून सांगते. माझ्या कामाच्या मर्यादा मी कधीच मान्य केल्यात म्हणून शांत झोपू शकते :)

किती दिवसांनी लिहिलंस गं मितान, भिडलं अगदी..
पुन्हा लिहित जा नं..

स्वाती दिनेश's picture

22 Oct 2013 - 1:15 pm | स्वाती दिनेश

किती दिवसांनी लिहिलंस गं मितान, भिडलं अगदी..
पुन्हा लिहित जा नं..

कोमल सारखेच म्हणते,
स्वाती

बापरे, नोकरी निमित्त परदेशी असल्यामुळे मी गेले एक वर्ष माझ्या मुलीना भेटू शकलो नाही आहे….

स्पंदना's picture

22 Oct 2013 - 4:12 am | स्पंदना

स्काइपवर भेटत असालच ना? मग आता अस करा. वेळ ठरवुन घ्या. मुलींना अस लिहील्याने दोन असाव्यात अशी माझी समजुत. तर एक तास फक्त एकटीने तुमच्याशी कानगोष्टी करायच्या. त्यावेळी अगदी आईला सुद्धा जरा वेळ दे ग तिला एकटीला अस सांगा. मग पुढच्या आठवड्यात दुसरीला. अन रात्री कधीतरी किंवा मुलींना सांगुन एकट्या आईला असा वन टु वन वेळ द्या. तुम्ही लांब असल्याने आता फटकन ओरडु नाही शकणार हे चुकल, ते चुकल म्हणुन,आणि मुलींनापण आपलही कोणी ऐकतय ही भावना निर्माण होइल. इतका दुरवर असलेला बाबा असा एकदम जवळचा होउन जाइल की त्याच्याशी कान गोष्टी कराव्या. टिनएजर असतील तर मात्र हे सगळ विसरा.

खटपट्या's picture

23 Oct 2013 - 10:25 am | खटपट्या

स्काइप वर बोलतो, कधी कधी छान संवाद होतो. कधी कधी लहान मुलगी (तिसरीत आहे) गप्प बसून माझ्याकडे एकटक बघत राहते. बोल म्हणता बोलत नाही. आणि मग एकदम रडू लागते. नंतर आई जवळ म्हणते कि बाबा बरोबर फिरायला जायचे आहे. मन सुन्न होते.

मुक्त विहारि's picture

23 Oct 2013 - 10:48 am | मुक्त विहारि

दोन वेळेच्या जेवणाची किंमत....

चतुरंग's picture

23 Oct 2013 - 11:13 am | चतुरंग

जिथे असाल तिथून तुम्ही तिच्यासाठी फोटो काढून पाठवा. तिला चित्रं काढायला लावून रोज स्काईपवरुन दाखवायला सांगा.
तुम्ही रोज कायकाय केलंत हे तिला सांगत रहा. तिच्या मित्रमैत्रिणींची चौकशी करा.तिने कायकाय खाल्लं हे विचारत रहा
अधूनमधून एखादं खेळण्याचं पार्सल तिच्या नावाने पाठवा, फार महागाचं काही लागतं असं नाही, माझ्या नावाने काहीतरी आलंय हेच त्यांना अप्रूप असतं! तुम्ही लांब का आहात हे तिला सांगा. मुलांना आपल्याला वाटतं त्यापेक्षा भरपूर समज असते.
हळूहळू ती निश्चितपणे बोलायला लागेल. मुख्य म्हणजे तुम्ही तिच्यासमोर उदास होऊ नका नाहीतर मुलं लगेच गळपटतात. आपल्याला लांब राहण्याचा ताण असतोच परंतु आता तंत्रज्ञानाचा उपयोग करुन तो ताण कमी कसा करता येईल हे बघा. शुभेच्छा!

-(बाप्)रंगा

मुक्त विहारि's picture

23 Oct 2013 - 12:05 pm | मुक्त विहारि

कं लिवलय....

तुमास्नी आमच्या कडून एक कटिंग बगा.

अपर्णा ताई आणि तुमचे खूप खूप आभार. मी हे करून बघेन. आता तर मी दिवाळी साठी भारतात जात आहे. येताना दोघींना महिन्याभरासाठी घेवून येत आहे

मुक्त विहारि's picture

22 Oct 2013 - 11:20 am | मुक्त विहारि

तुमच्याच जात्यातला.

त्यामुळे ह्या कर्माची फळे भोगणारा....

(हतबल मुवि)

चतुरंग's picture

22 Oct 2013 - 11:01 am | चतुरंग

मुलांना द्यायला वेळ नसणं हे आई-बाप आणि मुलं सगळ्यांचच एकप्रकारे दुर्दैव मग ते स्वेच्छेने असो की परिस्थितीने.

वरचं वाचून खूप मोठ्ठा प्रतिसाद लिहावासा वाटत होतं पण झाकली मूठ सवा लाखाची !! आपण मुलांना हवं ते खायला दिलं, म्हणतील ते कपडे दिले की झालं असं वाटतं काही पालकांना. मुलांच्या मनात काय चाललंय, त्यांना खरंच काही प्रॉब्लेम आहे का हे जाणून घ्यायची इच्छा सुद्धा नसते. मी म्हणेन ते आणि तसंच केलं पाह्यजे मुलांनी (रादर सगळ्यांनीच हे सांगतील ते ऐकावं असं वाटत असतं, जो ऐकणार नाही तो वाईट) अशी अपेक्षा असते. दुसर्‍यांना उपदेशाचे डोस देणारे हे मात्र स्वत:च्या बाबतीत त्याच गोष्ट लागू करताना डळमळतात. अशात मुलांनी एखादी गोष्ट जरी मनाविरुद्ध केली की अहंकाराला प्रचंड धक्का बसतो आणि मग उभं राहतं चार भिंतीतलं रणांगण!!

मुक्त विहारि's picture

22 Oct 2013 - 11:22 am | मुक्त विहारि

आणि मग

स्मशान शांतता...

फार जवळून अनुभव घेतला आहे अशा कुटुंबांचा.

परफेक्ट !!

मितान's picture

22 Oct 2013 - 12:16 pm | मितान

सर्वांच्या संवेदनशील प्रतिसादांबद्दल आभार.

मुक्त विहारि's picture

22 Oct 2013 - 12:23 pm | मुक्त विहारि

ज्या दिवशी असा लेख लिहायची पाळीच येणार नाही, त्या दिवसाची वाट बघत आहे....

आशावादी मुवि.

सस्नेह's picture

22 Oct 2013 - 12:23 pm | सस्नेह

खूप अस्वस्थ करत आहे हे सारं. पण पालक खरंच या सगळ्याला तॉड द्यायला पुरे पडतील का ?
आपण फार तर हे करू शकतो...

सस्नेह's picture

22 Oct 2013 - 12:24 pm | सस्नेह

का नाही?

माझ्या सारखा "ढ" मुलगा जर हे करू शकतो तर इतर माणसे का नाही करू शकणार?

बाहुली's picture

22 Oct 2013 - 1:24 pm | बाहुली

कधी कधी वाटते की आपल्या बदलत्या जीवन शैलीचा हा परिणाम आहे.

मुक्त विहारि's picture

22 Oct 2013 - 2:51 pm | मुक्त विहारि

"आपल्या बदलत्या जीवन शैलीचा हा परिणाम आहे."

आणि आपल्या हिंदू संतवाणी कडे झालेले दुर्लक्ष...

(आता हिंदू म्हणाल्याने काही मुद्दाम गहन विचार करणारे इथे मतांची पिंक टाकायला येतीलच... पण त्यांनी येवू नये...ही विनंती....)

अनिरुद्ध प's picture

22 Oct 2013 - 5:39 pm | अनिरुद्ध प

एव्हडे दुखी नका होवु,नक्किच काही तरी चान्गले होईल.

गोष्ट निराळी होती....

पण आज बराच सामाजिक आणि वैचारिक गोंधळ सुरु आहे.

जगणेच इतके कठीण झाले आहे की आपण जगणेच विसरून चाललेले आहोत.

दोन-दमडीच्या मालिका बघायला वेळ आहे पण मुलांच्या अमुल्य आयुष्याकडे बघायला वेळ नाही.हे पचवणे फार जड जाते.

अगदी सहमत. बाकीच्या मुलांच्या आणि पालकांच्या विचित्र वागण्यानं आपल्यावर जे प्रेशर येतं त्याचं गणित कसं आणि कुठं मांडावं कळत नाही. इथं घरी कितीही शिस्तीचा प्रयत्न केला तरी बाहेर वाट्टेल ते बघून आपली मुलं खरंतर गोंधळात पडतात. घरी अमूक गोष्ट शिकवावी तर बाहेर तसं न वागताही इतरांना मिळणारे चार फायदे बघून मुलं कोड्यात पडतात. तात्पुरता फायदा आणि कायम्स्वरुपी चांगली सवय यासाठी समजूत घालताना नाकी नऊ येतात.

धन्या's picture

22 Oct 2013 - 6:59 pm | धन्या

भारतात वाढलेल्या आई वडीलांच्या अमेरिका/युरोपात वाढणार्‍या मुलांवर होणारे संस्कार हा खुप गुंतागुंतीचा विषय आहे. घरामधील भारतीय संस्कार आणि घराबाहेरील बरंचसं अनिर्बंध आणि भोगवादी जीवनशैली उचलून धरणारं वातावरण यातून भारतीय पालकांची मुलं एबीसीडी अर्थात अमेरिकन बॉर्न कन्फ्युज्ड देसी होतात.

खरे तर हा एक वेगळा विषय आहे...

तरी पण...उत्तर द्यायचा प्रयत्न करतो....

तेल आणि पाणी एकत्र मिसळायचा प्रयत्न केला तर चालत नाही.

पण माणसांत आणि तेल-पाण्यात खूप फरक आहे.तेलाला पाणी होण्याशिवाय गत्यंतर नाही.जर तुम्ही तिथे राहणार असाल तर कशाला २ भाग करता? तिथलेच जीवन आहे तसे स्वीकारणे हा सर्वोत्तम मार्ग आहे.तितले पाणी, हवा , सुखी आयुष्य चालते तर मग तिथली संस्क्रुती का नको?

मी स्वतः गुजरातमध्ये ५ वर्षे होतो.तिथली संस्क्रुती महाराष्ट्रापेक्षा खूप वेगळी आहे.तरी पण मला त्रास झाला नाही.कारण तिथली संस्क्रुती मी मनापासून स्वीकारली होती.

तुमच्या मुलाचे/मुलींचे मित्र-मैत्रीणी अमेरिकन्,तुमचे सहकारी अमेरिकन, मग अडचण येते कुठे?मध्यंतरी एक सुंदर पुस्तक वाचले होते.(बहुदा श्रीनिवास ठाणेकरांचे). त्यात त्यांनी ह्या प्रश्र्नाची छान उकल केली आहे.

असो,

हे विश्र्वची माझे घर

अहो धनाजीराव, ती कन्फ्युज्ड मुलंही आता मोठी झाली असतील. आमची मुलं सध्यातरी कन्फ्युज्ड वाटत नाहीत. मी एकंदरीतच भारतात किंवा कुठेही दिसणार्‍या जीवनशैलीबद्दल म्हणतीये. भारतात राहणारे आमचे भाचे पुतणे पाहते तर एकदम भारी ष्टाईलीत वावरताना दिसतात. त्यामुळे कधीकधी माझा मुल्गा कन्फ्युज्ड असतो. भारताचं वर्णन केल्याप्रमाणे त्यालाच काय आम्हालाही आता दिसत नाही. ;) तेवढे बदल आता जमेत धरूनच टाकलेत. ;)

भारतात राहणारे आमचे भाचे पुतणे पाहते तर एकदम भारी ष्टाईलीत वावरताना दिसतात. त्यामुळे कधीकधी माझा मुल्गा कन्फ्युज्ड असतो

रेवतीताई, हे खासच. :)

संदीप चित्रे's picture

23 Oct 2013 - 7:42 pm | संदीप चित्रे

सहमत आहे रेवती!
आता प्रत्येक भारत भेटीत आम्हाला 'उलटा सांस्कृतिक धक्का' (रिवर्स कल्चर शॉक) बसतो ;)

स्पंदना's picture

24 Oct 2013 - 5:15 am | स्पंदना

मेरेकू भी. माझ्या घरात तर कोणीच शुभंकरोती म्हणत नाही. अन कपडे म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर नुसत्या होरो हिरॉइनीच असल्या सारख वाटत. बोलायच्या गप्पा सिरीयल्सवर. कोणीही वर्तमानपत्रातल्या बातम्या किंवा टीव्हीवरच्या बातम्या ऐकुन त्यावर चर्चा करत नाही.
बघावे तेंव्हा बाहेर जाऊन खाण्याचा कल दिसतो. काहे बनवुन खाव अस दिसतच नाही इनस्टेड हे इथे छान मिळत ते तिथे छान मिळत अश्या गप्पा असतात, अन तस विकत आणुन खाल्लही जात. सकाळी सकाळी ते तळकट वडे चहाला?

भ ट क्या खे ड वा ला's picture

22 Oct 2013 - 6:50 pm | भ ट क्या खे ड वा ला

हे थांबायला हवे , काय करता येईल ?

मुक्त विहारि's picture

22 Oct 2013 - 9:27 pm | मुक्त विहारि

थेंबे थेंबे तळे साचे......

आणि

एक उत्तम घर एका गावाला सुधारून टाकते

एक गांव एका राज्याला सुधारु शकते.

आणि एक राज्य एका देशाला सुधारु शकते.

बापूंचे वाक्य आहेच... खेड्यात जा आणि खेडी सुधारा...

अग्निकोल्हा's picture

23 Oct 2013 - 12:49 am | अग्निकोल्हा

सरयूला जर संगणकाची आवड असे तर ती नक्किच छान करीअर करु शकते. संगणक ही सध्या एकमेव अशी गोश्ट आहे जी कोणतीही गोष्ट कितीही वेळा न चिडता, न हिणवता जो पर्यंत आकलन होत नाही तो पर्यंत पुन्हा पुन्हा शिकवते. हा अनुभव वर्गातील गुरुजींनी वैयक्तिक लक्ष देणे, अथवा आपल्यालाच कळाले नाही याबाबतचा भिडस्तपणा जो इतर मुलांमुळे वाढलेला असतो यावर अतिशय रामबाण उपाय आहेच परंतु अध्ययन अकार्यक्षमतेवरही याचा सुरेख उपयोग होतो, अन मुख्य म्हणजे अभ्यासत असलेल्या विषयाचीसुध्दा गोडी वाढवतो. जरुर प्रयत्न व्हावा.

केतनवर मुळातच संस्कार चांगले असल्याने जरा गोंधळलाय इतकच. अन तो जर स्वतःच्या स्टेटस साठी सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग वगैरे करतोय तर छानच आहे, फक्त आता फक्त दुरूपयोग का करावा अन केंव्हा करु नये याबाबतचा विवेक पुश्ठ झाला की विषय संपला. पोरग अतिशय कृतिशील दिसत आहे, मनानेही चांगला आहे, असले टोणगे दोस्त केंव्हा अन कशी साथ सोडतात, का सोबत असतात याची अक्कल आली की तोच यांना बरोबर तालावर नाचवेल (अथवा दुर राहिल). फक्त या ज्ञानाची फार मोठी किंमत चुकवावी लागु नये म्हणून आइ वडिलांनी थोडं जागरुक राहणे पुरेसं आहे.

विरेन हा दुर्दैवाने (?) त्याच्या सभोवताली असलेल्यांमधे सर्वात चलाख अन बुध्दीमान प्राणी आहे ज्यामुळे एका निरस आयुष्याला सामोरा जातोय अन फक्त ही निरसता हे एकमेव वास्तव समजतोय, अतिशय हुशार असल्याने अनुभवातुन उमजायच्या अनेक प्रश्नांची उकल निव्वळ बुध्दीमत्तेने (पण यशस्वी) करुन अजुन निरसता निर्माण करतोय, याला ताबडतो मिपाचे सदस्यत्व देणे अत्यावश्यक .

निनाद आजीच्या जाण्याने अतिशय रिता झाला आहे, तरीही त्याच्या खंबीर व काहिशा संतुलीत भासणार्‍या जिवनशैलीची पायाभरणीही आज्जिनेच केली आहे. फक्त आता तीची रिकामी पोकळी भरुन काढणारे व्यक्तिमत्व सोबत दिसत नसल्याने, त्याला स्वतःचे व्यक्तिमत्वही तितकेच रिते भासत आहे, आइ वडिलांसोबत सुटलेले बोलणे ही एकमेव चिंतेच बाब असेल तर हळु हळु इंटीग्रेटी वाढावायच्या प्रयत्नाने व वाढत्या वयासोबत तो पुन्हा सबोल होइल असे वाटते.

इतरांच्या (व बहुतेकांच्या) मनात कोणत्या ना कोणत्या कारणाने निर्माण झालेली पराकोटीची असुरक्षितता हा एक समान धागा आहे, ज्यामागील कारण जाणून योग्यती फुंकर मारणे साध्य झाले तर नक्किच हे लोक एक तणावरहित आयुष्य जगतिल.

असो... जे वाटलं ते लिहलं... हे योग्य आहेच असा कोणताही दावा नाही.

रामपुरी's picture

23 Oct 2013 - 2:32 am | रामपुरी

प्रत्येक मूल वेगळं असतं आणि आई-वडीलच त्याला सर्वात जास्त समजून घेऊ शकतात अर्थात समजून घेणारे असतील तर ... मग समुपदेशकाची / मानसोपचार तज्ञाची गरजच पडणार नाही

मन१'s picture

23 Oct 2013 - 7:28 am | मन१

विचित्र.
परवाच आलेला राष्ट्रिय पुरस्कार प्राप्त इन्व्वेस्टमेंट हा मराठी चित्रपट पाहिलाय का कुणी?
फारच थोड्या लोकांनी पाहिला असावा; थेट्रात दहा-बाराच्या वर डोकी दिसत नव्हती पहिला आथवडा असूनसुद्धा.

मुक्त विहारि's picture

23 Oct 2013 - 1:05 pm | मुक्त विहारि

आम्ही इंग्रजी हॉटेलांत जेवतो.बरेच जण खानावळीत जेवतात.

फारच थोड्या लोकांनी पाहिला असावा; थेट्रात दहा-बाराच्या वर डोकी दिसत नव्हती पहिला आथवडा असूनसुद्धा.

चित्रपताची म्हणावी तशी जाहीरात झाली नव्हती. मला वाटतं हे एक कारण असावं.

पिलीयन रायडर's picture

23 Oct 2013 - 1:24 pm | पिलीयन रायडर

मला एक प्रश्न पडलाय..
इथे कुणीतरी वर लिहीलय की "मुलांना मारु / ओरडु नका". ते मला पटतं सुद्धा. पण माझा मुलगा (वय दिड वर्ष) जेव्हा खुप चेकाळतो तेव्हा सगळ्यांना चावत सुटतो. आम्ही नको नको म्हणुन ओरडतो ती त्याला मज्जा वाटते. किंवा मग बोचकारे काढत असतो. आत्ता हे लिहिताना माझ्या डोळ्याखाली मस्त जखम आहे त्याच्या नखाची. आता ह्या प्रकाराला कसे रिअ‍ॅक्ट करावे? म्हणजे राग येतो.. म्हणुन ओरडुन पाहिलं तर त्याला कळतच नाही की आपलं काही चुकलय म्हणुन हे ओरडत आहेत. डॉक्टर म्हणतात ओरडु नका, तो अजुन जोरात ओरडायला शिकेल. मारुन पाहिलं तर त्याला हे ही कळालं नाही की अमुक गोष्ट करायची नाहीये म्हणुन मारलं. पुढच्या सेकंदाला तो परत चावतो/ बोचकारतो/ केस ओढतो.. जे त्याचं चाल्ल होतं तेच कंटिन्यु करतो.. भरीस भर हे पाहुन तो आम्हाला मारायलाही शिकला.
ह्ट्ट करतो तेव्हा जोरात रडापड सुरू होते. कितीही दुर्लक्ष करायचं म्हणलं तरी ते जमत नाही.
कधी कधी कुणाला खेळणी देत नसला आणि "असं करु नये, द्यावी आपली खेळणी..दे बरं" असं शांतपणे सांगितलं तर गपचुप खेळणी देतो. पण हीच मात्रा चावणे/ बोचकारणे ह्या प्रकाराला लागु पडत नाही.
मग नक्की करायचं काय म्हणजे त्याला हे समजेल की मारु नये, चावु नये..

डॉक्टरांच म्हणणं की हे लोह कमी पडतय मेंदुला म्हणुन असा वागतोय. अंडी द्या / नॉन व्हेज द्या..भाज्या वाढवा इ..

हवालदार's picture

23 Oct 2013 - 2:39 pm | हवालदार

http://www.supernanny.co.uk/TV-Show.aspx

ही वेबसाइट देखिल पहा. आम्हला जुळे आहेत अनि या वेबसाइटवरच्या टिप्स खुप उपयोगी पडल्या आहेत.

सुबोध खरे's picture

23 Oct 2013 - 7:04 pm | सुबोध खरे

पि रा ताई,
प्रतिसाद द्यावा कि नाही या संभ्रमात होतो. जसे मुलाला त्यःच्या सद्वर्तनाबद्दल बक्षीस द्यावे तसेच दुर्वर्तनाबद्दल शिक्षा सुद्धा द्यावी.
मुलांचे मानसशास्त्र हे एका पातळी पर्यंत ठीक असते. दीड दोन वर्षाची मुले हॉटेलात आईच्या थोबाडीत मारताना पाहतो तेंव्हा आयांना किती कानकोंडे होते ते आपल्याला दिसून येते. दीड वर्षाच्या मुलाला आपण करतो आहे हे चूक आहे हे नक्की कळते.पण आक्रस्ताळे पन केला कि मनासारखे होते हे कळून आले कि ती आपल्याला पाहिजे ते करण्यासाठी तसेच परत परत करीत राहतात. एक लहानसा फोक/ छडी आणून ठेवा आणी तो आक्रस्ताळे पण करायला लागला तर प्रथम दोन वेळा स्पष्ट शब्दात सांगून पहा. (त्याने तो बहुधा सुधारणार नाही त्याने तुमचे पाणी जोखले आहे. यानंतर त्याचे हात धरून त्याला घट्ट जमिनीशी दोन ते तीन मिनिटे दाबून ठेवा याने हि त्याने ऐकले नाही तर त्या फोक किंवा छडीने एक वळ उठेल इतके जोरात मारा. आणी या वेळेस त्याला कोणतीही दया दाखवणे चुकीचे ठरेल. त्याला हि गोष्ट स्पष्ट पणे सांगणे जरुरीचे आहे कि कोणालाही चावणे किंवा ओरबाडणे खपवून घेतले जाणार नाही.त्याने परत चावले किंवा ओरबाडले तर परत एक छडी ओढा. तिसर्या छडी पर्यंत मुलाला नक्की कळून येते कि आपला आक्रस्ताळे पणा खपवून घेतला जाणार नाही. मुलगा दहा मिनिटे रडेल तर त्याला रडू द्या मुळीच सहानुभूती दाखवू नका. तुम्हाला हे झेपणार नसेल किंवा तुम्हाला रडायला येणार असेल तर तुमच्या यजमानांना सांगा. मध्येच तुम्ही कच खाल्लीत तर मुलगा तुमचे पाणी जोखेल आणी पुढच्या वेळेस आणखी आक्रस्ताळे पणा करेल. पुढच्या वेळेस मुलाने याची पुनरावृत्ती केली तर परत छडीचा वापर करण्यास कचरू नका एकदा मुलाला हे स्पष्टपणे कळले कि आई वडील भलत्याच गोष्टी खपवून घेत नाहीत कि तो आपोआप सुधारेल. हे आपल्याला जमणार नसेल तर सोडून द्या. या गोष्टीची मुलाचे आजी आजोबा असतील तर त्यांना स्पष्ट शब्दात कल्पना देणे आवश्यक आहे अन्यथा दुसरा मोठा यात पडणार असेल तर आपले प्रयत्न व्यर्थ जातील.
कारण हीच गोष्ट मुलगा पुढे बाहेरच्या मुलांबरोबर करेल तेंव्हा ते ती मुले खपवून घेणार नाहीत आणी एक तर त्याच्याशी कोणी खेळायला येणार नाही किंवा त्याला मार खावा लागेल. मुलांना वेळेत शिस्त लावणे आणी कोणती गोष्ट खपवली जाणार नाही हे स्पष्ट शब्दात सांगणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा पुढे आई वडिलांना रडायची पाळी येउ शकते.
वरील गोष्ट मी माझ्या स्वतःच्या आक्रस्ताळ्या मुलाला सरळ करण्यात यशस्वीपणे वापरली आहे. सुदैवाने माझ्या घरी माझी पत्नी आई आणी वडील यांच्या कडून मला पूर्ण पाठींबा होता. माझी आई एम ए बी एड आणी एका शाळेची मुख्याध्यापक होती मुलाचे मानस शास्त्र घेऊन बी ए झालेली होती. माझ्या आई वडिलांपैकी एक मुलाला रागवत असेल तर दुसरा कधीही मुलाला पाठीशी घालत नसे. आणी जरी पालकाची चूक असे तरीही मुलासमोर कधीही पाणउतारा करीत नसे. हीच गोष्ट मी माझ्या मुलांबाबत करतो. बाबा वेडेच आहेत आई वाईटच आहे असे मुलांचे सांत्वन कधीही करू नये (असे न केल्यास मुलांना आई किंवा वडिलांची किंमत राहत नाही) माझ्या आईवडिलांची एक शिस्त होती कि शिस्तीच्या वेळेस शिस्त आणी लाडाच्या वेळेस लाड त्यात सरमिसळ नाही. हा उपाय आजच्या पिढीतील नव्या आईबापाना पटेल असे नाही म्हणून मी प्रतिसाद द्यायला कचरत होतो. आपल्याला पटेल तर करा नाही तर सोडून द्या.
मुलांचे मानसशास्त्र या विषयावर एखाद्याला पिंक टाकायची असेल तर टाका मी प्रतिसाद देणार नाही.कारण यावर कितीही वितंडवाद घालता येईल. मी बरोबर कि चूक हे मी माझ्या मुलांच्या बाबतीत स्वताला सिद्ध केले आहे इतरांना सिद्ध करायची मला गरज वाटत नाही

टवाळ कार्टा's picture

24 Oct 2013 - 7:44 am | टवाळ कार्टा

भारी

सुबोध खरे's picture

23 Oct 2013 - 7:08 pm | सुबोध खरे

छडी पायावर मारा. हाताने थोबाडीत मारण्यापेक्षा दुप्पट जोराने पायावर मारलेली छडी हि जास्त परिणामकारक आणी कोणताही शारीरिक अपाय न करणारी असते.रागाच्या भरात हात शिवशिवतात पण थंड डोक्याने छडी घेऊन यावी म्हणजे पुढच्या वेळेस छडी पहिली कि मुल आपोआप वळणावर येते. नंतर नंतर मारण्याची गरजच पडत नाही. फक्त छडीचे नाव पुरते. पण छडी खुंटीवर मात्र असावी

पिलीयन रायडर's picture

23 Oct 2013 - 7:42 pm | पिलीयन रायडर

तुमचं बरोबर आहे की आज कालच्या पालकांना हे पटणार नाही. मलाही पटले नाही. म्हणजे मला मुद्दा पटलाय पण उपाय नाही. मी माझ्या मुलाला छडीने मारु शकणार नाही. अर्थात मी त्याला पाठीत धपाटा घालणे हा प्रयोग केलाय. मग त्याला ओरडणे आणि त्याच्याशी न बोलणे. त्याने बोचकारलं तर हातावर फटका मारणे इ. पण मुळात त्याची बुद्धी (जी एरवी महा स्पीड्ने चालत असते) ती ह्या वेळेला का चालत नसेल? त्याला हे लक्षातच येत नाहीये की समोरचा ओरडतोय तर ते करायच नाही. त्याला समजेल अशी शिक्षा कोणती? त्याला शिक्षा केलीच पाहीजे ह्या मताशी मी पण सहमत आहेच. कारण जे चांगलं असेल त्याला लग्गेच "वा वा वा" करुन आम्ही त्याची पाठ थोपटतो. तर तो उत्साहाने ती गोष्ट करतो. आता असच काही करुन त्याला हे ही समजावायचे आहे की चुक केली की शिक्षा मिळते. पण छडीचा उपाय माझ्याचाने होणार नाही. कादाचित नवरा करु शकेल. मग मला ते पहावणार नाही.
आणि तुमचं हे ही अगदी बरोबर आहे की त्यानी आमचं पाणी जोखलय. आणि त्यने अजुन पब्लिकली ह्युमिलिएट करणे वगैरे सुरु केलं नसलं तरी ह्या मार्गाने लवकरच सुपुत्र श्रीमुखात भडकावुन देतील अशी चिन्हे दिसत आहेत.

हवालदार's picture

23 Oct 2013 - 7:52 pm | हवालदार

मारण्याच्या बाजूने न्हवतो म्हणून वर दिलेल्या लिन्क मध्ल्या टिप्स वपरल्या अनि मुलाना न मारता शिस्त लवण्याचा प्रयत्न आत्ता पर्यन्त यशस्वी झाला आहे. डोक्टरनी सन्गितल्याप्रमणे मेसेज जाणे महतत्वाचे आहे.

चतुरंग's picture

23 Oct 2013 - 10:02 pm | चतुरंग

घरातली एक जागा ठरवून घ्या. समजा खोलीचा कोपरा. तुमच्या मुलाने मारले, ओचकारले की प्रथम त्याचे दोन्ही हात घट्ट पकडा. त्याला अतिशय ठाम आणि स्पष्ट शब्दात सांगा "माझ्याकडे बघ!" त्याने तुमच्याकडे डोळ्यात डोळे घालून बघेपर्यंत हेच वाक्य जरबेने म्हणत राहा (ओरडून नव्हे). मुलांना आवाजातला बदल ताबडतोब समजतो. एकदा त्याने बघितले की मग त्याला सांगा "तू जे आत्ता केले आहेस ते चुकीचे आहे. मला आवडलेले नाही. त्यासाठी तुला या कोपर्‍यात भिंतीकडे तोंड करुन ५ मिनिटे उभे राहावे लागेल." त्याला तिथे जबरदस्तीने नेऊन उभे करा. तो परत येईल पुन्हा उभे करा, रडेल, ओरडेल, आदळआपट करेल बिलकूल लक्ष न देता पुन्हा पुन्हा कोपर्‍यात नेऊन उभे करत राहा. ही प्रक्रिया तुमच्या पेशन्सचा कस पाहणारी असते. परंतु एकदा त्याला समजले की आई-बाबा अजिबात ऐकत नाहीत आणि चूक केली तर ते कोपर्‍यात उभे करतात की तो राहायला लागेल. (या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आजी-आजोबांसकट इतरांनी तटस्थ राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मूल रडत त्यांच्याकडे गेले तर त्यांनी स्पष्ट सांगायला हवे की "आई-बाबा जसे सांगताहेत तसेच कर." एकदा आपल्या चुकीला कोणाचाही आधार नाही हे समजले की मुले चट सरळ येतात!)
पुढचा भागही तितकाच महत्त्वाचा आहे. एकदा तो पाच मिनिटे उभा राहिला की त्याला जवळ बोलवा आणि प्रेमाने समजावून सांगा की त्याला तिकडे का उभे केले होते. तो तुमचा लाडका आहे परंतु त्याने चूक केली तर ती अ‍ॅक्सेप्ट केली जाणार नाही आणि त्याला दरवेळी असाच टाईम आऊट मिळेल. याहीवेळी बोलणे हे डोळ्यात बघूनच व्हायला हवे, हे फार महत्त्वाचे आहे. कारण त्याशिवाय त्यांचं संपूर्ण चित्त तुमच्या सांगण्याकडे नसतं आणि मुलांच्या मनात तो प्रसंग घर करुन बसत नाही!
काही मुले जाम टारगट असतात. पुढेपुढे ओचकारुन किंवा मारुन स्वतःच कोपर्‍यात जाऊन उभी राहतात! तर त्यावरचा उपाय म्हणजे एकतर टाईम आऊटची वेळ वाढवणे किंवा त्यांची आवडती वस्तू काही काळासाठी लपवून ठेवली जाईल असे सांगून ती काढून घेणे. इथपर्यंत बहुतेक वळण लागलेले असते! प्रसंगी एखादा जोरदार धपाटा किंवा पार्श्वभागावर सटका ठेवून देणेही चुकीचे नाहीये. परंतु टाईम आऊट आणि आवडती वस्तू, खेळ न मिळणे, इतरांपासून वेगळे पडणे याचा धाक मोठा असतो. एकूणच तुमच्या वागण्यात सातत्य हे फार महत्त्वाचे आहे. तुम्हाला काय चालते आणि काय चालत नाही यांच्या सीमारेषा अतिशय स्पष्ट हव्यात.

-रंगा

हवालदार's picture

28 Oct 2013 - 7:17 pm | हवालदार

टाइमआउट वपरले आहे अनि तेच मी वर दिलेल्य लिन्क मध्ये शिकवले आहे. त्यामुळे न मारता चान्गली शिस्त लागते याला अनुमोदन

निम's picture

28 Oct 2013 - 6:39 pm | निम

पी रा ताई
जर छडी मारणे जमणार नसेल तर नारळाच्या / काथ्याच्या दोरीने हातपाय घट्ट बांधून ठेवणे हासुद्धा एक चांगला पर्याय आहे. मुलगा पहिल्यांदा रडेन, आरडा-ओरड करेन, मग शांत होईल. तोपर्यंत whos the boss here ?? या प्रश्नाचे त्याच्या बालमनाने आकलन केले असणार . त्यानंतर तुम्ही त्याला त्याची चूक समजावून पुन्हा असे न करण्याच्या अटीवर मुक्त करावे .

पिलीयन रायडर's picture

28 Oct 2013 - 6:56 pm | पिलीयन रायडर

आता मी सांगते की ह्या धाग्यावरुन बोध घेऊन मी काय केले आणि त्याचे काय परिणाम दिसत आहेत..

मी मुलाने चावले, ओरबाडले, मारले तर आधी धपाटा देऊन पाहीला. त्याला हे अजिबात कळले नाही की का मारलाय (मुळात मला असं वाटतय की हेच पाहुन तो मारायला शिकलाय..). मग त्याचे केस ओढले की आपण पन त्याचे केस हलकेच धरुन ठेवायचे म्हणजे तो माझ्या केसांच्या नादी लागत नाही हे लक्षात आले. पण ते चावणे आणि बोचकारणे ह्यांना लागु होत नाही.
मग शेवटचा उपाय म्हणजे, बाथरुम मध्ये नेऊन दार लावुन घेणे. असं केल्यावर तो रडतो. "बायको.. बायको" म्हणुन हाका मारतो (ही त्याची थिअरी आहे, की आई ऐवजी बायको म्हणलं तर ही बाई पिघळते). ३० सेकंदात मी दार उघडते कारण तो भलताच धाय मोकलुन रडतो. अशानी बाथरुमची हकनाक भिती मनात बसत आहे असही वाटतय.

मला असं खुप मनातुन वाटतय की त्याला "शिक्षा" ही गोष्ट कळालीच नाहीये. त्याला "वेदना" झाली तर त्याला ते कळेल (जे अभिप्रेत असते जेव्हा आपण मुलांना मारतो). पण ती वेदना मी माझ्या मुलाला देऊ शकत नाहीये. त्याला वळन लावलं पाहीजे हे ही मला समजतय. पण मी तेवढी कणखर नाही. तो चावतो तेव्हा मला अशीही शंका येतेय की हा दात सळसलत असल्याने असं करतोय का? कारण तो चिडुन चावत नाही. मस्ती म्हणुन मागे लाग्तो. त्याला बोचकारणे पण मस्ती वाटतेय बहुदा.
पण तो मारतो ते मात्र चिडुन.. त्याच्या मनविरुद्ध झालं की तो मारतो (त्याला काही लागलं तर त्याला "हात रे" करायला आम्हिच शिकवलय.. राग आला की आम्हि मारतो, त्यामुळे राग आला की मारायचं / ओरडायचं हे हि तो आमच्या कडुन शिक्लाय )

आता बोला काय करु..

आणि हो, दोरीने हात पाय बांधने वगैरे तर मी इतर कुणा सोबत पण करणार नाही, तो तर माझा पोटचा गोळा आहे.

मला समजतय की शिस्त लवायलाच हवी, पण १.५ वर्षाच्या मुलासाठी काही सोप्पं नाही का सांगता येणार?

पैसा's picture

28 Oct 2013 - 7:09 pm | पैसा

एवढ्या लहान मुलाला अजिबात मारू नको. काही वेळ न बोलणे आणि मुद्दाम दुर्लक्ष करणे हा उपाय करून बघ. तो चावतो ते दात येत असल्यानेच असेल. पण काही मुलाना सवय असते. आमच्या सोसायटीतला एक मुलगा अगदी ५ वीत जाईपर्यंत दुसर्‍या मुलाना चावायचा. नंतर हळूहळू सुधारला.

सुबोध खरे's picture

28 Oct 2013 - 8:11 pm | सुबोध खरे

मुलांना दात वयाच्या सहाव्या महिन्यापासून येतात त्यामुळे मुले त्या वयात कोणतीही गोष्ट तोंडात घालतात. दीड वर्षाचे मुल दात येण्यामुळे चावत नाहीत( ते कुत्र्याचे पिल्लू नाही गल्लत करू नका). त्याला आपण चावतो ओरबाडतो किंवा केस ओढतो या गोष्टी कळत नाहीत हा आपला गैरसमज आहे. स्पष्ट शब्दात सांगतो आपण स्वताची फसवणूक करीत आहात. दीड वर्षाच्या मुलाला स्पष्टपणे आपण काय चूक करीत आहोत ते कळले पाहिजे. अन्यथा ते तीच गोष्ट बाहेरच्या माणसाबरोबर करू शकेल आणि यातून आपल्याला अत्यंत अडचणीची किंवा अवघड (embarrassing/ awkward) उद्भवू शकते.
मी आपल्याला प्रथमच सांगितले होते कि जर आपल्याला जमत नसेल तर आपल्या यजमानांना सांगा.
मुलाला त्रास होईल म्हणून आपण लस टोचणे(इञ्जेक्शन) थांबविले आहे काय? मुलावरील प्रेम हे अंतिमतः मुलाच्या हितासाठी असावे.येथे हळवेपणा कामाचा नाही.

प्यारे१'s picture

29 Oct 2013 - 1:40 pm | प्यारे१

@ डॉ. साहेब,

माझा मुलगा उद्याच्या ३ तारखेला एक वर्षाचा होतोय.
अजून एकही दात आलेला नाही.
काय कारण असेल?
दात न आलेला माणूस नसतो मान्य. येतीलही.
पण दात वेळेत न येण्यानं खाता न आल्यानं शारिरीक वाढ कमी होते का?

दात येण्यास सुरुवात होण्याची साधारण वेळ म्हणजे ३ ते १ २ महिने. परंतु काही मुलांना जन्मजात सुद्धा दात आलेले असतात त्यामुळे आईला स्तनपान देताना त्रास पण होतो. याउलट काही मुलांना दीड वर्षापर्यंत दात येत नाहीत.
दाताचा आणि अकलेचा काहीही संबंध नाही. दुधाचेच नव्हे तर अक्कलदाढेचा आणि अकलेचा काहीही संबंध नाही. मुलाला सर्व गोष्टी खायला द्या. दात नसलेले म्हातारे सुद्धा चिक्की कुटून खातात मग तुमच्या बाळाला द्या की कशाला घाबरता?एक वर्षाच्या मुलाला आई बाप जे जेवतात ते पूर्ण जेवण द्यावे. आपल्याकडे संगणक आहे म्हणजे आपण मध्यम किंवा उच्च मध्यम वर्गात मोडता तेंव्हा मुलाचे पोषण कमी होईल हि भितीसोडून द्या.

मुलावरील प्रेम हे अंतिमतः मुलाच्या हितासाठी असावे.येथे हळवेपणा कामाचा नाही.
अगदी मनापासुन सहमत ! आमचं पिल्लु हल्ली फार दंगा करत ! घरातला जो कप्पा /खण दिसला की त्यातल्या सगळ्या वस्तु अत्यंत वेगाने बाहेर फेकणे हा आवडता छंद झाला आहे.{ आत्ता पर्यंत १०-१५ वेळा चिकटपट्या लावुन खण बंद केले होते ज्याचा टिकाव लागला नाही.} मी एकदा झोपलो होतो तेव्हा पायाच्या कंरगळीचा हळुच चावा घेउन बघितला ! मी ओरडलो नाही तेव्हा अंगठा कडकडुन चावला ! बरं हे सर्व करुन हसुन दाखवायच !
एक नंबरी वस्ताद आहे,मध्यंतरी जेव्हा थोडासा पाउस पडत होता आणि ढगांचा कडकडाट होत होता, तेव्हा खिडकी जवळ येउन हीने ढगालाच एयय्य करुन दम दिला. :)
ती जे काही नविन शिकते / करुन दाखवते तेव्हा मी अगदी मनभरुन कौतुक करतो, पण जेव्हा मोकाटपणा वाढतो तेव्हा इवल्याशी ढुंगीवर अगदी अलगदच चापटी मारतो आणि ती काय चुकीचे करते आहे ते सांगतो... आत्ता पर्यंतचा अनुभव आहे की तिला चुकीचे काय आहे ते सांगितले की कळते ! आत्ता पर्यंत फक्त १-२ दाच अशी चिंटकली चापटी मारावी लागली आहे,आता मी फक्त तीच्या कौतुक करण्यासाठी ठेवलेल्या अनेक नावांपैकी एखादे घेऊन दणका हवा का ? असे विचारतो त्यानेच काम भागते ! :) जास्तीत जास्त बुवाजीला बोलवुन आणु का ? असा पोकळ धाक दाखवतो. ;)

{कोमल पिल्लाचा कोमल हॄद्य असलेला बाबा}

दोरीने हात पाय बांधने वगैरे
बापरे! हे कसं करणं शक्य आहे? नकोच! मीही कल्पना करू शकत नाही.
दीड वर्षं म्हणजे लहान आहे तो!

रामपुरी's picture

23 Oct 2013 - 8:08 pm | रामपुरी

किंवा निसर्गाने फक्त शिक्षाच करण्यासाठी निर्माण केलेल्या भागावर...
बाकी वरच्या प्रतिसादाशी हजार वेळा सहमत. मारू नये वगैरे मानसशास्त्र एका मर्यादेपर्यंतच ठीक आहे. असो ज्याचा त्याचा प्रश्न.

किंवा निसर्गाने फक्त शिक्षाच करण्यासाठी निर्माण केलेल्या भागावर...

मी असं गॄहीत धरतोय की तुम्हाला इथे पार्श्वभाग अभिप्रेत आहे. तो भाग निसर्गाने शिक्षा करण्यासाठी निर्माण केला आहे हे कशावरुन ठरतं?

मारू नये वगैरे मानसशास्त्र एका मर्यादेपर्यंतच ठीक आहे.

एखादी न करण्यासारखी गोष्ट लहान मुलांनी केल्यानंतर जर त्यांना मारले तर कदाचित पुन्हा मार मिळेल या भीतीपोटी ती गोष्ट मुलं करणार नाहीत. परंतू असा मार खाल्ल्यानंतर मुलांच्या मनात भीती कायमची घर करुन बसते.

लौंगी मिरची's picture

23 Oct 2013 - 8:24 pm | लौंगी मिरची

सहमत .

मुलं भितीपोटी काहि चुकिचं केलं आणि अंगाशी आलं तरि घरी सांगणार नाहित आणि हे फार धोकादायक असतं .

रामपुरी's picture

23 Oct 2013 - 11:05 pm | रामपुरी

"तो भाग निसर्गाने शिक्षा करण्यासाठी निर्माण केला आहे हे कशावरुन ठरतं?"
पु ल देशपांडें या लेखकाचा "माझे शालेय जीवन" हा लेख वाचला असता तर वरील वाक्याचा संदर्भ लक्षात आला असता. असो...
मुलांना केव्हा, कशासाठी, किती, कुठली शिक्षा करायची हा तारतम्याचा भाग असतो. "मार खाल्ल्यानंतर मुलांच्या मनात भीती कायमची घर करुन बसत", "ती घरी कुठलीही गोष्ट सांगत नाहीत" असे सरसकट म्हणता येत नाही. कुठल्या वेळी समजावून सांगायचं कधी शिक्षा करायची आणि कधी चक्क दुर्लक्ष करायचं हे प्रत्येक मुलासाठी वेगळं असतं. थोड्याश्या निरीक्षणाने आई वडीलांना ते लक्षात येत असतं. शेवटी मुलाला कसं वाढवायचं हा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि पालकांसाठी आयुष्यभराचा अनुभव. मुलांना मारणं/शिक्षा करणं पूर्णपणे चुकीचं किंवा अजिबात न मारता फक्त समजावून सांगणं हेच बरोबर अशी सरसकट विधानं मी तरी करू शकत नाही. ती पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ गोष्ट आहे.

पु ल देशपांडें या लेखकाचा "माझे शालेय जीवन" हा लेख वाचला असता तर वरील वाक्याचा संदर्भ लक्षात आला असता.

"अरे इसने पुलं का माझे शालेय जीवन नही पढा" असं म्हणायचंय का तुम्हाला? ;)