लिहु कि नको? का लिहावं? खरचं?
काय लिहाव? का? अनेक प्रश्न. मी का लिहितो? कशासाठी?
इथेच का लिहाव? ......
आजचा दिवस असाच गेला... आयुष्य का जगतो.. माहित नाही.. नक्की कुठे जायचय.. काय करायचय.
आजकाल मिपावर काय धिंगाणा चाललाय.. खरच चाललाय कि मला वाटतय. हे तर कायमचच.. बदल होत राहतात. कुणीतरी पिंग केलं होतं.. ते काय होतं. कुठे थांबेल? की स्वत:च थांबाव. एक ब्रेक घ्यावा. शांत जागेत जावं. फोटोग्राफी सुरु करावी का? जाउदेत..
आज काय जेवायचं. फेसबुकवर जाउया.. बघुया काय काय नविन आहे. अरे इथे पण काहीच नाही.. एखादा सिनेमा पाहुया. पण कोणता आणि काय मिळणार, ह्म्म्म्म आज एखाद्या मित्राला फोन करुया. पण त्याने काय होणार. तो मुड मधे नसेल तर. मग काय.. पुन्हा तेच. पुन्हा तेच म्हणजे काय. सगळं क्षणिक असतं, सापेक्षही असतं. मी कुठे आहे या सगळ्यात. म्हणजे चाल्ल्लय तरी काय. काहीतरी नविन करावं.. आयुष्याचा आनंद घ्यावा.. पण म्हणजे नक्की काय कराव. नाच करावा की गाणं म्हणावं.
आजची बातमी औरच होती. बायकोने नवर्याला मारुन त्याचे शरीराचे भाग कुकरमधे शिजवले? हे का होत असावं, असं काय घडलं असेल किंवा असं काय होत असेल मानवी मेंदुला की असे प्रकार घडावेत. स्टीव जॉब्स गेला म्हणे, आपणही असं काही करावं का? त्याच्यासारखं? सगळे लोक सगळ काही करू शकतात हा माझा ठाम विश्वास आहे. पण मग का थांबतात, मी का थांबतो कि थकतो. माहित नाही.
हे जग कदाचित असंच चालतं. पण मग असंच चालावं का? वाटतं की चांगलं काहीतरी करावं, पण कसं? माहित नाही.
ही नोकरी, घरदार हे सगळं असंच. मग मी कोण, का..
हापिसात रोजचंच जाणं.. आणि येणं.. रोज तेच प्रश्न. तेच अखंडचक्र.. विचारचक्र.. तेच लोकं तोच रस्ता, तेच काम.. लोकांना कटाळा कसा येत नाही ब्वॉ.. मलापण हेच वाटतं.. अरे हो सण आलाय. घरी फोन करावा लागेल.. बिल्स भरायची बाकी आहेत.. वाढदिवस येताहेत, गिफ्ट्स घ्यावी लागतील. बायको नक्की खुष आहे का. कसं कळेल.. वीकांताला तिला बाहेर फिरायला घेऊन जाउया, पण मग आराम कधी मिळेल.. आराम महत्वाचा नाही. असो.
बरेच दिवस झाले, चांगलं मटण नाही खाल्लं.. एखादा आठवडा निवांत मिळेल का. की सुट्टी टाकु.. अरे नको.. सुट्टी म्हणजे म्यानेजरच्या शिव्या.. पुढच्या महिन्यात बघुया..
ह्म्म्म्म्म जेवण करायची वेळ झाली आहे. आयला हे जेवण म्हणजे पण एक काम आहे.. रोज २-३ वेळा करावं लागतं.
पण आयुष्यात सुख आणि दु:ख म्हणजे काय. कारण ते पण सापेक्ष आहे ना..
मग मी खरच सुखी आहे कि दु:खी?
आपला,
मराठमोळा
प्रतिक्रिया
7 Oct 2011 - 7:23 pm | सुहास..
7 Oct 2011 - 8:22 pm | गणेशा
असे प्रश्न उपस्थित होत असतील तर तुम्ही सुखी आहे का दु:खी ह्या पेक्षा तुम्ही अस्थीर गोंधळलेला आहात हे समजावे ..
व.पु.काळेंचे एक वाक्य आठवले .. जसे आठवले आहे तसे देतोय,
पाणी म्हणजे h2o, येथेच जग थांबले आहे, पृथ्थकरण करायचे ते पाण्याचे तहानेचे नाहि.. तहान लागली की पाणि प्यावे. त्यात कीती ऑक्सीजन आहे आणि कीती हायड्रोजन हे पाहत बसु नये.
तसेच जीवनाचे आहे राव.. सु:ख - दु:ख हे आनंदाचे परिमाण आहेत, ज्यात आनंद.. ती गोष्ट करायची... ज्यात आनंद नाही.. समाधान नाही ती गोष्ट नाहि करायची ..
आणि सापेक्ष म्हणाल तर हे आयुष्यच सापेक्ष नाहि काय ? आणि असा विचार सारखे करुन आपण सापेक्ष असलेल्या विचारांना नाहि का निरंतर करत ...
7 Oct 2011 - 8:31 pm | रेवती
चांगले प्रकटन आहे. आवडले.
7 Oct 2011 - 8:35 pm | प्रभाकर पेठकर
अरेरे.... 'मराठमोळ्या'चा पार चोळामोळा झालेला दिसतो आहे.
भविष्यासाठी अनेकानेक शुभेच्छा...!
7 Oct 2011 - 8:50 pm | धन्या
इथल्याच एका छिद्रान्वेषी वैतागसम्राटाच्या डायरीची आठवण झाली. :)
7 Oct 2011 - 9:08 pm | गणपा
काय झाल रे एकदम. काल परवा पर्यंत बरा होतास. ;)
7 Oct 2011 - 9:25 pm | पैसा
१५ दिवस रजा घ्या आणि भटकून या मस्तपैकी!
8 Oct 2011 - 8:13 am | ५० फक्त
तुमचं नुकतंच लग्न झालं आहे का ? म्हणजे प्रश्न थोडा जास्तच वैयक्तिक आहे पण तरी सुद्धा विचारायचं धाडस करतोय. तसं असेल तर असे प्रश्न पडणं ठिक आहे, आणि महत्वाचं तुम्ही खुप सुखि आहात.
समोर पडलेल्या दोन कापडांपैकी कोणता काळा अन कोणता पांढरा हे समजु शकणं किंवा समजण्याएवढी जाणिव डोळ्यात अन मेदुत शिल्लक असणं ही फार मोठी अॅचिव्हमेंट आहे आणि ती टिकवुन ठेवा. मग एक दिवस सज्जनगडावर समर्थांच्या समाधीसमोर उभे राहुन म्हणु शकाल
जगी सर्व सुखी असा मीच आहे
विचारे मना मीच सांगीत आहे.
8 Oct 2011 - 10:36 am | पिंगू
अंदाज अगदी बरोबर आहे. बाकी ममोला हा सल्ला पाळलाच पाहिजे..
- (वैतागूनही न वैतागणारा) पिंगू
8 Oct 2011 - 12:36 pm | lakhu risbud
सुख-दुख सापेक्ष असते हो सगळे !
पुराव्यासाठी आपल्या श्री ब्रिटीश यांचा लेख वाचा.
8 Oct 2011 - 12:38 pm | lakhu risbud
हि घ्या लिंक
http://www.misalpav.com/node/8554
8 Oct 2011 - 4:45 pm | अप्पा जोगळेकर
असं काही वाटायला लागलं तर चूपचाप जाउन दोन पेग रिचवावेत.
8 Oct 2011 - 10:18 pm | विश्वनाथ मेहेंदळे
यावर ममो ची प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक आहे.
9 Oct 2011 - 4:11 am | राघव
फावला वेळ बराच असतांना मनात सुरु झालेले प्रश्न, नंतर फावला वेळ नसतांनासुद्धा मनात ठाण मांडून बसतात. असे झाले की मग उगाचच कोणत्याही कामांत रस न वाटण्याची भावना उत्पन्न होते. यालाच मग वैताग/त्रागा/चिडचिड/अस्वस्थता असे म्हटले जाते.
तर मुळात सांगायचा मुद्दा हा की तू छान मजेत आहेस. विश्वास बसत नसेल तर कोणत्याही अगदी लहान बाळाकडे बघ. तुझ्या चेहर्यावर हसू आले तर माझे म्हणणे खरे! कसे?
राघव