आमचा ग्रॅफोलॉजीचा (हस्ताक्षर व सही याचा अभ्यास ) क्लास चालू होता . सरांनी आम्हाला प्रत्येकाला एक कोरा कागद दिला आणि काहीही मुक्तपणे लिहायला सांगितलं त्यावर आपलं नांव न टाकण्याचीही सूचना दिली . नंतर ते पेपर्स गोळा करून त्यांनी मधूनच कुठलाही पेपर काढून त्याचं अनालिसिस कसं करायच हे समजवायला सुरुवात केली. कागदावरच्या मजकुराचा आकार, मार्जिन आणि मग एक एक अक्षर घेऊन त्या व्यक्तीच व्यक्तिमत्व उलगडू लागले . एक दोन अनालिसिस झाल्यावर त्यांनी माझा कागद सगळ्यांसमोर पकडला ,मनात खूप उत्सुकता होती आज स्वतःबद्दल काय जाणून घ्यायला मिळणार ... सर सांगू लागले ही व्यक्ती तिच्या भूतकाळापासून दूर पळतेय , मनातल्या गोष्टी न बोलणे हा नवीन झालेला बदल नंतर 'आय' या अक्षरावर भिंगाने फोकस करून म्हणाले नीट बघा ह्या रेषा ,हे स्ट्रोक्स ही व्यक्ती आपल्या वडिलांपासून दुखावली गेली आहे,त्यांच्याशी निगडित कोणत्याही गोष्टीपासून ही व्यक्ती दूर राहते, भावना अव्यक्त ठेवणे हा त्याचाच परिणाम असू शकतो. मी स्तब्ध होऊन ऐकत होते डोळ्यातलं पाणी बाहेर न येऊ देण्याची काळजी घेत एक मोठ्ठा आवंढा गिळला आणि उरलेला क्लास सुन्न बसून काढला. घरी परतत असताना सरांच ते वाक्य मला सारखं आठवत होत… माझं मन कशातच लागत नव्हतं , माझ्यात झालेल्या बदलाच असं तटस्थ विवेचन ऐकून मी तर हे स्वतःशी मनातही बोललेच नव्हते हे जाणवलं . आईचा फोन आला कि अतिशय तार्किकपणे तिला समजावून सांगायची ,"जे झालं ते झालं आई आता आपण आपलं आयुष्य आनंदाने जगूया , काही फरक पडत नाही ग एवढा ,एखाद्याचा जोडीदार मरतो तेव्हा ती व्यक्ती एकटी आयुष्य जगतेच ना आता या विषयावर बोलणं बंद बर का". आज एका "आय " अक्षराने माझा समजूतदारपणाचा हा बुरखा फाडून टाकला होता. घरी आल्यावर मीच लिहिलेल्या त्या 'आय ' कडे बघत राहिले उभी रेषा आणि वरची छोटी आडवी रेषा यात पडलेली छोटीशी फट मनातले केवढे अंतर दाखवत होती ...
अगदी आठवायला लागलं तस बालपणीच जे वातावरण नेहमी आठवतं ते म्हणजे , स्वयंपाकघर आणि हॉलच्या बरोबर मध्यभागी एका कप्प्यात ठेवलेला एक भला मोठा टेपरेकॉर्डर आणि त्यावर मंद आवाजात सुरु असलेल्या गझल... मुन्नी बेगम , मेहदी हसन तर कधी रुना लैला ,गुलाम अली यांच्या तलम आवाजातल्या जीवाच्या ठाव घेणाऱ्या गझल. डायनिंग टेबलवर ठेवलेले शेंगदाणे ,तळलेला लसूण आणि अर्धवट संपलेलं बाबांचं ड्रिंक ... आमच्यासाठी हे रोजचंच वातावरण ...मी माझा भाऊ आणि आई तिथेच बाबांशी गप्पा मारत तिथेच आजूबाजूला बसलेलॊ साहित्य , जुनी हिंदी गाणी असे अभिजात विषय ...सोबत शेरोशायरी, कविता तर बाबांच्या मुखोद्गत, मध्येच लहर आली कि एखादी सुंदर कविता सगळे मिळून जोरजोरात म्हणत असू यात बोरकरांच्या कविता आघाडीवर "मंद मंद वाजत आली तुझी गो पैंजणा ","डाळिंबीची डहाळीशी नको वाऱ्यासवे झुलू" अशा अगदी मुखपाठ. बाबा स्वतः एक उत्तम लेखक ,कवी त्यामुळे ते सतत काहीतरी लिहीत वाचत असत. कविता लिहून झाली रे झाली की लगेच आम्हाला समोर बसवून त्यांच्या खास लकबीत वाचुन दाखवत. एखादा लेख किंवा कविता सुचत असेल तर बाबांच्या दोन खोल्यांमधल्या येरझाऱ्या खूप वाढायच्या आम्ही कंटाळून कधी काय हे बाबा? असं म्हटलं तर म्हणायचे ,"अरे माझ्या प्रसवकळा आहेत ह्या ". अमृता प्रीतम ,गुलजार ,कैफी आझमी अशी अनेक मोठी नाव आम्ही सतत आणि सहज ऐकत होतो . ड्रिंक्स घेणारे बाबा कधी त्रासदायक ,भयानक वागले नाहीत उलट ते अधिक तरल व्हायचे. तेव्हा कानावर पडलेल्या त्या गझल्स खूप खोल मनात रुजलेल्या आहेत, कधीकधी माझ्या स्वप्नात कोणतीही घटना घडत असो बॅकराउंडला एखादी गझल चालू असते.. " मेरे हमनफस मेरे हमनवा ", "रंजीश ही सही " घरात पुस्तकांचा अमाप संग्रह ,अतिशय दुर्मिळ, अभिजात आणि बाबांनी अट्टाहासाने जमा केलेली ८ ते १० हजार पुस्तकं . तुम्ही कुठलही पुस्तक, कुठलीही कविता, कुठलीही ओळ विचारा बाबा एका मिनिटात ते काढून द्यायचे . मी तर त्यांना एखाद्या परीक्षार्थी मुलासारखं रोज चार पाच तास लिहिताना वाचतांना पाहिलंय.
आमच घरही आईबाबांनी फार प्रेमाने बांधलेलं ,सजवलेलं .त्या घरात तीन रूम्स स्लॅबच्या होत्या आणि एक रूम मुद्दाम माळवदाची बनवलेली जुन्या घरांचा फील येण्यासाठी आणि एका रूमला पत्रे टाकले होते ,बाबा म्हणायचे पत्र्याच्या खोलीत पावसाचा अनुभव खूप छान येतो. घराच्या पश्चिमेला सगळी सुगंधी फुलाची झाडं लावलेली चमेली,जुई,जाई ,मोगरा, रातराणी कारण वारा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतो. या सर्व वेलींना मांडव घातलेले आणि त्यांच्याजवळ एक शिडी ठेवलेली माझ्यासाठी, "माझ्या सोन्याला कळ्या तोडायला सोप्प जावं म्हणून" घरासमोर चाफा ,पारिजात अशी फुलांचा सडा टाकणारी झाडं. त्यात भर बहाव्याची गेटच्या दोन्ही बाजूला दोन जणू स्वागतासाठी उभे .परसदारी सगळी फळझाडं सोबत केवडा, बकुळ, कदंब अशी शोधून आणलेली दुर्मिळ झाडं . गुलाबांच्या तर कितीतरी जाती .अंगणाच्या एका कोपऱ्यात मला आणि माझ्या भावाला खेळण्यासाठी केलेला वाळूचा मोठा चौकोन. हापशाजवळ लावलेला चमकोरा,पुदिना . घरासमोर केलेले लिलीचे ताटवे .कॅक्टसचंही खूप छान कलेक्शन आणि त्याला लावायला केलेली छोटी टेकडी . सुगंधाने भारावून टाकणारा मरवा . कृष्णकमळ ,मधुमालती अशा झाडांनी आमचं घर झाकून टाकलं होत. या सगळ्या झाडांशी आमचं स्पेशल नातं होत . बागेत एखाद्या पक्ष्याने घरटं केलं की आमच्या आनंदाला पारावार उरायचा नाही. दर रविवारी आई बाबा आम्हाला घेऊन बागकाम करायचे. प्रत्येक झाडाविषयी खूप माहिती ते आम्हाला सहजच सांगत असत. बाबांनी खूप ठिकाणाहून जमा केलेले दगड ,गारगोट्या आमच्या व्हरांडाभर पसरलेल्या होत्या. त्यात मला काष्ठशिल्पांचा नाद लागला आणि व्हरांड्यात त्यांचीही भर पडत गेली . काष्ठशिल्प शोधत आम्ही कधी लक्कडकोटला (लाकूड कापण्याचा कारखाना ) जायचो . बाबा तिथल्या माणसाला त्याच्याच भाषेत सांगायचे "कोई ऐसा वल्ली फल्ली लकडी दिखा ना तो रख दो हमारे लिये "
खाण्यापिण्यातली रसिकताही तशीच... कुठेही चांगला पदार्थ खाण्यात आला की आवर्जून आम्हाला तिथे नेऊन खाऊ घालायचे . त्यांच्या कॉलेजच्या कँटीनला कधी बटाटेवडा फक्कड जमून आला असेल तर लगेच पार्सल चपराश्यासोबत घरी पाठवून द्यायचे . प्रत्येक गोष्टीच प्रचंड सेलेब्रेशन असायचं. साधा क्षणही सुंदर बनवण्याची कला होती त्यांच्यात. सुट्टीच्या दिवशी तर बागकाम झालं कि दुसरा चहा पिण्याचे बहाणे ,त्यावर रचलेले गाणे जोरजोरात म्हणून आईला भंडावून सोडायचो. घरात वातावरण एकदम मस्त ,मनमोकळं. आम्ही चौघे एकमेकांचे चांगले मित्र होतो. कुठलीही प्रतिक्रिया, मतभेद बिनधास्त मांडून मोकळे व्हायचो. बाबा गमतीने म्हणायचे, आमच्या घरात चार वेगळे देश आणि त्याचे चार वेगळे झेंडे आहेत.मनात आलेली कुठलीही गोष्ट बोलायला आम्हाला कधी टेन्शन वाटायचं नाही. आम्ही एका छोट्या गावात राहत होतो ,तिथे बाहेर जेवायला जाण्यासारख्या, फिरण्यासारख्या जागा नव्हत्या तरी आम्ही कित्येक तासांचा प्रवास करून हॉटेलिंग,चांगले चित्रपट ,पर्यटन करायला जात असू . रसिकता आणि अभिजात आवडी निवडी यांचे संस्कार सहजतेने पण खोलवर होत गेले. आमच्या योग्य वयात आम्हाला कोणती पुस्तकं वाचायला द्यायला हवीत याबद्दल बाबा फार जागरूक होते. त्यांनी माझ्यासाठी आणलेलं पहिलं पुस्तक म्हणजे विंदाचं 'राणीचा बाग 'नंतर 'तोत्तोचान','एक होता कोर्व्हर ', प्रकाश संताचं 'वनवास ', 'पंखा 'असं उत्तम बालसाहित्यापासून ते 'वयात येतांना ' इ . पुस्तकं ते आवर्जून वाचायला लावत.
माझ्या अठराव्या वाढदिवसाला बाबा अगदी हळवे झाले होते .संध्याकाळी आईबाबा माझ्याशी बोलत बसले. त्यांच्या मनात ते खूप दिवसापासून काय बोलायचं याची तयारी करत असावेत . "सोन्या आज तुला अठरा वर्षे पूर्ण झाली. कायद्याने तू आता सज्ञान आहेस. आयुष्याचे सगळे निर्णय तू आता घेऊ शकतेस. तुझ्या मनाप्रमाणे जोडीदारही निवडू शकतेस. तुझ्या आयुष्यातल्या एका सुंदर पर्वाला सुरुवात झाली आहे आणि आता आपण मित्र आहोत. कधीही मनापासून कोणी आवडलं तर आम्हाला सांगायला संकोचू नकोस.त्याचा जात धर्म या कशाचाही विचार न करता आम्ही तुझ्या पाठीशी उभे राहू ".या बोलण्याने त्यांनी मला प्रगल्भ बनवलं होतं . मी माझं आयुष्य नेहमीच खूप उत्स्फूर्तपणे जगले. माझ्या आयुष्याची जबाबदारी आता माझीच आहे ही गोष्ट खूप आत्मविश्वास वाढवणारी होती. पुढे माझ्या भावाच्या लग्नाच्या वेळी कोणीतरी म्हणालं "कमाल आहे तुमची आंतरजातीय लग्न स्वीकारण्याची " तर बाबा म्हणाले "त्याचा आंतरजातीय नाही प्रेमविवाह आहे. "
आम्ही पुण्याला शिकायला गेलो तेव्हा आईबाबा आणि घराशिवाय दूर राहणं फार वेदनादायी होतं . तेव्हा S T D वर रात्री ८ ते ११ कमी पैसे लागायचे. मी रोज घरी फोन करायची . आईबाबांना सांगायच्या गोष्टींची यादी भलीमोठी असायची. दूर राहण्याचा सगळ्यात सुंदर परिणाम म्हणजे आम्ही एकमेकांना पत्र लिहू लागलो . पानच्या पान खरडली जायची पण विषय संपायचे नाहीत. मी इंग्लिश लिटरेचर स्पेशल घेतलं मग तर बाबाना साहित्याचं एक नवं दालनच उघडलं. साहित्याच्या वैश्विक भाषेशी ते सहजच जोडल्या गेले. पुढे मी लिहायला लागले तेव्हा बाबांच्या आनंदाला पारावार उरला नाही. एकदा माझा एक लेख पेपरात छापून येणार होता. तो केव्हा येईल हे निश्चित नव्हते. बाबा एका महत्वाच्या कामासाठी दुसऱ्या गावी निघाले होते. ट्रेनमध्ये पेपर वाचतांना त्यांनी माझा लेख पहिला. तेव्हा मोबाईल नव्हते .बाबा सरळ ट्रेनमधून उतरून मला तो लेख दाखवायला घरी आले तेव्हा मी थक्क झाले त्यांची excitement पाहून.
मी तेव्हा थर्ड इयरला होते. सुट्ट्यात घरी होते बाबांच्या कॉलेजमध्ये इंटरव्ह्यू सुरु होते. त्यासाठी एक मुलगी आली होती माझ्यापेक्षा काहीच वर्षांनी मोठी . तिची आई माझ्या बाबांना ओळखत असल्याने तिच्याजवळ त्यांनी बाबांसाठी एक पत्र दिलं होतं पत्रात “माझ्या मुलीचे तुम्ही लोकल गार्डियन व्हा आणि जमेल ती मदत करा "असं लिहिलं होतं. ही मुलगी आपल्या नवऱ्यापासून वेगळी झालेली होती आणि तिला एक छोटी मुलगी होती. आईबाबा कायम कोणाच्याही मदतीला तयार असत . पुढे तिचं नोकरीच काम झालं आणि ती कॉलेजमध्ये रुजू झाली. आई तिला घरी येत जा ,एकटं वाटू देऊ नकोस असं सांगायची.तिच्या छोट्या मुलींसाठी घरात नेहमी एक बरणीभर चॉकलेट्स असायचे. पुस्तकं वाचण्यासाठी ,संदर्भासाठी ती घरी येऊ लागली. मी तेव्हा एम.ए. करत होते. माझ्या वडिलांचे वडील माझे आजोबा वारले. आजी अगदी धक्क्यात होती. एवढ्या वर्षांच्या सहजीवनानंतर एकटं राहणं तिला सहन होत नव्हतं . मग आईने तिच्याजवळ जाऊन राहण्याचा निर्णय घेतला.मी आणि भाऊ पुण्यात असल्यामुळे बाबा आता एकटेच होते ते आई आणि आजीला भेटायला जात असत.
ती मुलगी नंतरही आमच्या घरी येतच होती पण सगळेच तिला ओळखत असल्याने काहीच वेगळं वाटलं नाही.नंतर एक दिवस आमच्या एका शेजाऱ्यांचा आईला फोन आला आमच्या घरात काही गैर गोष्टी चालू आहेत असं सांगितलं. आईने त्या फोनची दखल न घेता पुन्हा माझ्या नवऱ्याविषयी असं बोलू नका म्हणून सांगितलं. आई तिच्या नोकरीत आणि आजीला सांभाळण्यात व्यस्त होती. बाबा आणि ती मुलगी यांच्यात नॉर्मल संबंध नाहीत असं सांगणारे आता बरेच जण भेटायला लागले. मग आईने बाबांना सरळ विचारलं तर मी तिचा पालकच आहे अशी त्यांनी खात्री दिली. कॉलेजमध्येही त्या दोघांचं वागणं सगळ्यांना खटकत होत. आईला बरेच जणांनी घरी परत यायला सांगितलं. आई परत आली तोपर्यंत परिस्थिती फार बिघडली होती. आईचा तर विश्वासच बसेना. त्या मुलीलाही तिने सरळ जाब विचारला तर ती उद्धटपणे म्हणाली,"मी तुम्हाला स्वीकारू शकते तर तुम्ही मला का नाही ?"आईचा बी. पी. लो झाला, तिला ऍडमिट करावं लागलं. आम्ही सगळेच आता धक्क्यात होतो. आमच्या सुंदर चौकोनी कुटुंबाला ग्रहण लागलं होतं.एखाद्या पोरवयातल्या मुलाने वागावं तसं बाबांचं वागणं आमच्या मनातल्या त्यांच्या प्रतिमेला न शोभणार होत. आम्हा सगळ्यांची जराही पर्वा न करता ते तुफानासोबत वाहत चालले होते. सुरुवातीला आम्ही सगळे त्यांना बसून नीट समजावून पाहत होतो. ही गोष्ट किती दूरवर वाईट परिणाम करू शकते ,आम्हाला सगळ्यांना दुखावून तुम्ही कोणतं असं सुख मिळवणार, हे तात्पुरतं आकर्षण आहे यातून काही चांगलं होऊ शकत नाही असं सगळं त्यांना आम्ही समजावून सांगत होतो .ते मात्र काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.आईची अवस्था तर फार वाईट होती.तिच्या इतक्या वर्षांच्या सहजीवनानंतरचा विश्वास चक्काचूर झाला होता. इतक्या वर्षांनी एका निवांत आयुष्यात एक वादळ आलं होत. बाबा रिटायर्मेंटच्या वयात पोहचलेले होते आणि आमचे शिक्षण पूर्ण होत आले होते. एका छताखाली राहताना आईबाबांची कसरत होत होती. नात्यातली विश्वासाची गुंफण आता शिल्लक नव्हती.कॉलेजमध्येही या दोघांच्या वागण्याला कंटाळून त्या मुलीला काढून टाकण्याचा निर्णय कॉलेज कमिटीने घेतला. बाबांनी खूप त्रागा केला. आम्हाला थोडं हायस वाटलं पण हा काही शेवट नव्हता...
त्या मुलीचे आईवडीलही एका वयस्कर माणसासोबतच्या तिच्या नात्याच्या विरोधात होते. दोन्ही घरात कल्लोळ माजला होता.बाबांनी त्या मुलीला आपल्या ओळखीने दुसऱ्या एका गावी नोकरीला लावून दिले. आणि आता त्यांच्या तिकडे चकरा सुरु झाल्या . कुठल्याही विरोधाला ते जुमानत नव्हते. आई फार हतबल झाली होती. इतकी वर्षे आम्हाला शिकवलेल्या तत्वांना ते स्वतःच मुरड घालत होते. खोटं बोलणं तर इतकं वाढलं कि त्यांची सगळी विश्वासार्हता संपून गेली. आमच्यावर इतका जीव ओतणारे बाबा इतके परके वाटू लागले. बाबांचं पिणं आता खूप वाढलं होतं.एकटे रूममध्ये बसून ते ड्रिंक घेत. त्यांचं कधीही न पाहिलेलं भयंकर रूप आता बघायला मिळू लागलं. आईशी भांडण वाढली. दोघांमध्ये सारखे खटके उडू लागले. त्यात आम्ही दोघे तिथं नाही त्यामुळे खूप काळजी वाटायला लागली. परिस्थिती इतकी तणावग्रस्त होती की आईला मारहाण तर होणार नाही ना याची काळजी वाटायला लागली. रोज सकाळी उठताच मी आईला फोन करत असे ती ठीक आहे ना एवढच मला जाणून घ्यायचं असायचं.
बाबा रिटायर झाले आणि त्यांनी आपण आता नेहमीसाठी त्या मुलीकडे राहायला जाणार असं जाहीर केलं. सगळं माहित असूनही तो क्षण खूप कठीण होता. आत्तापर्यंत साम दाम दंड भेद सगळं वापरून झालं होत आमचं.आता आमच्या नात्याची शप्पथ घालून त्यांना थांबवणं शक्य नव्हतं. एक व्यक्ती म्हणून कुठलीही सक्ती करणं पटत नव्हतं, त्यांनी बाय चॉईस आम्हाला निवडायला हवं होत. मागील काही वर्षात आम्ही सगळे इतक्या तणावातून गेलो होतो की, कुठल्या टोकाला जाण्यापेक्षा शांतपणे वेगळं होऊन नात्याची पुढची विटंबना थांबवणं आवश्यक होतं . आनंदाच्या प्रसंगात एकमेकांविषयी वाटण खूप स्वाभाविक पण माझ्या आईने दाखवलेली प्रेमाची वेगळी छटा माझ्या कायम लक्षात राहील. आईचे नातेवाईक बाबांवर कायदेशीर कार्रवाही करावी असं सुचवत होते पण आई म्हणाली ,"ज्या माणसावर मी इतकं प्रेम केलं त्याला त्रास देऊ इच्छित नाही. "
बाबा खरचंच घर सोडून निघून गेले...
आमच्या सगळ्यांच्या डोळ्यांमधून कित्येक लिटर पाणी वाहील असेल. त्या दिवशीनंतर एकही दिवस आम्ही १०० टक्के आनंदी होऊ शकलो नाही. आयुष्यात कायम एक अपूर्णता राहिली. कित्येकदा स्वतःला बाबांच्या जागी ठेवून पाहते आणि विचार करते कोणती अशी गोष्ट आहे जी मला माझ्या कुटुंबाच्यापेक्षा मोलाची वाटेल? उत्तर एकच "कोणतीच नाही". ज्या बाबांशिवाय कधी जगू असं वाटत नव्हतं त्यांचं आज कित्येक वर्षांपासून तोंडही पाहिलेलं नाही.
सिल्विया प्लाथ या कवियत्रीची एक कविता आठवते -
Daddy, I have had to kill you,
you died before I had time
Marble heavy, a bag full of God,
Ghastly statue with one gray toe,
Big as a Frisco seal...
प्रेम आणि तिरस्काराची एक संमिश्र भावना. आपण काढून टाकतो एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून आणि ती भेटत राहते आपल्याला आपल्याच सवयीतून ,बोलण्यातून,संवेदनेतून, आठवणीतून.... मन कित्येकदा पेटून उठत बाबा का केलत असं तुम्ही?
आयुष्याच्या इतक्या उशिरा त्यांनी उचललेल्या पावलाचा क्षणोक्षणी भोग भोगतोय आम्ही . आईसाठी तर काय लिहू एका दिव्यातून जातेय ती. उतारवयात माणसाला सोबतीची जास्त गरज असते म्हणतात . या वयात हे एकटेपण तिच्यावर लादलं गेलं. सार्वजनिक जीवनात अनेक प्रश्नांना, प्रसंगांना तिला सामोरं जावं लागतं. मी आणि माझ्या भावाने तिला आमच्याकडे निघून यायला सांगितलं तर तिने ते मान्य केलं नाही, ती म्हणते ज्या गावात मी सून म्हणून आले आमचा संसार थाटला एक विश्व उभं केलं तिथून मी पळून जाणार नाही. तिचं एकटेपण आम्ही काही केलं तरी भरून काढू शकत नाही. आईची काळजी करता करता कधी मी तिची आई झालेय असं मला वाटू लागलं मला कळलंही नाही . अतिशय समजूतदारपणा दाखवत मी तिला आता तुझं आयुष्य तू वेगळ्या स्पिरिटने जग असं सांगत असे. पण एक दिवस बाबांच्या एका मित्राकडून आम्हाला बाबांबद्दल कळालं की "त्यांना मुलगी झाली... "प्रचंड धक्का बसला मला एखाद्या मूर्तीसारखी कितीक वेळ मी बसून होते. डोळे कोरडे आणि डोकं सुन्न झालेलं . आज पहिल्यांदा मला आईची वेदना खऱ्या अर्थाने कळली होती. बाबांनी आधी आईच स्थान कोणाला तरी देऊ केलं होत. आज मात्र माझ्या स्थानाला धक्का लागला होता. बाबांची मी पुम्मूशी परी असा कित्येक वर्षांचा बाळगलेला अभिमान क्षणात तुटून पडला. नंतर कित्येक दिवस मी सारखी रडत होते. यानंतर त्यांचं कधीही ना घ्यायचं नाही असं ठरवलं. आता आयुष्यात मला कोणत्याच घटनेने एवढा धक्का बसत नाही . "मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही "यासारखं फोल वाक्य या पृथ्वीतलावर नाही. कुटुंब म्हणजे तेच जिथे एकाच्या कृतीने दुसऱ्याला प्रचंड फरक पडतो. बाबा कोणत्या सुखाच्या शोधात निघाले होते आणि त्यांना ते मिळालं का नाही हे त्यांचं त्यांनाच ठाऊक पण आमच्या मनातलं, समाजातलं आदराचं स्थान ते कायमच गमावून बसले आहेत. माझं हे दुःस्वप्न अजूनही चालू आहे आणि बॅकराउंडला एक गझल चालू आहे ...
फासले ऐसे भी होंगे ये कभी सोचा न था
सामने बैठा था मेरे और वो मेरा न था ।
प्रतिक्रिया
14 Sep 2017 - 9:03 pm | तुषार काळभोर
..
14 Sep 2017 - 9:21 pm | भिंगरी
.........
14 Sep 2017 - 9:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
अफाट लिहिलंय !
14 Sep 2017 - 11:46 pm | लॉरी टांगटूंगकर
अफाट लिहीलं आहे.._/\_
14 Sep 2017 - 9:29 pm | जेडी
.......
14 Sep 2017 - 9:52 pm | बदामची राणी
......._/\_
14 Sep 2017 - 10:00 pm | पद्मावति
निशब्दः __/\__
14 Sep 2017 - 10:04 pm | मोदक
प्रतिसाद देण्यासाठी शब्द नाहीत हो.. अशी वेळ कुणावरही येऊ नये. __/\__
14 Sep 2017 - 10:11 pm | पैसा
हम्म..
14 Sep 2017 - 10:12 pm | झेन
.
14 Sep 2017 - 10:25 pm | रेवती
लैखनशैली आवडली असं म्हणेन पण विषय वाचून डोळ्यात पाणी आलं.
14 Sep 2017 - 10:48 pm | Rahul D
14 Sep 2017 - 10:49 pm | Rahul D
14 Sep 2017 - 11:06 pm | ट्रेड मार्क
तुम्ही केलेलं घराचं आणि घरातल्या वातावरणाचं वर्णन इतकं सुंदर आहे की क्षणभर मला हेवा वाटला होता. पण परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही हेच खरं. आयुष्यातली एक चूक आपल्या जवळच्यांना किती भारी पडते.
माझं हे दुःस्वप्न अजूनही चालू आहे
- यातून बाहेर पडणं खरंच अवघड आहे पण ते तुमच्याच हातात आहे. अगदी अश्याच नाही पण यासारख्या, म्हणजे ज्या व्यक्तीला आपण आदर्श मानतो त्याच अगदी जवळच्या व्यक्तीने मोठा विश्वासघात करावा, या प्रसंगातून मी गेलो आहे आणि आता त्यातून बाहेरही पडलो आहे. विसरून जाणे आणि क्षमा करणे या दोन गोष्टी आपल्याला मिळालेली वरदाने आहेत. हे अवघड आहे पण अशक्य नाही.तुमच्या आईची नीट काळजी घ्या आणि लिहीत रहा.
14 Sep 2017 - 11:10 pm | दशानन
प्रत्येक नाण्याची एक बाजू असते, आणि प्रत्येक घटनेला कारण.
हे समजण्यासाठी मला देखील वर्षानु वर्ष लागली, व जेव्हा अर्थ समजला तेव्हा हाती काहीच नाही ही भावना. तुम्हाला सल्ला द्यावा एवढा मोठाही नाही व असेच सोडून द्यावे असे वाटत देखील नाही.
जेवढे लिहले आहे त्यातून सार उलगडून काढणे सोपं नाही हे मात्र जाणवलं.
अजून काय लिहू? फक्त हात जोडून नमस्कार करतो!
14 Sep 2017 - 11:12 pm | स्वाती दिनेश
वाचताना सुन्न झाले.
प्रतिसाद देण्यासाठी शब्द नाहीत हो.. अशी वेळ कुणावरही येऊ नये. __/\__
मोदकसारखेच मनात आले.
स्वाती
14 Sep 2017 - 11:53 pm | अमरेंद्र बाहुबली
तुमच्या भावना अगदी जश्याच्या तश्या लेखात उतरल्या आहेत....खरचं जिवन कोणत्या क्षणी कुठे वळण घेईल काहीच भरवसा नसतो. तुमची कथा वाचुन पुर्णपणे हादरलो. काळजी घ्या आईची आणी स्वतः ची ही!
15 Sep 2017 - 12:51 am | जव्हेरगंज
ताई,
किती ताकदीने लिहिताय!!
विषयाचं गांभीर्य थेट पोहोचतंय!! तुम्ही वेगळ्याच धाटणीच्या लेखिका आहात.
सलाम!!
15 Sep 2017 - 10:58 am | संजय पाटिल
शब्दशः सहमत _/\_
15 Sep 2017 - 2:02 am | सांरा
....
15 Sep 2017 - 2:42 am | Ram ram
माणूस कधी अचानक psychopath सारखा का वागायला लागतो? मला वाटतं पुरूष अनंत काळचा नर असावा.
15 Sep 2017 - 3:35 am | गामा पैलवान
रामराम,
अनंत काळचा नर म्हणा वा पुत्र म्हणा. बालक म्हंटलंत तरी चालेल. इथे बाबा नवीन आयुष्य जगू पाहताहेत. बाबांना त्या मुलीने दुसरं तारुण्य प्राप्त करवून दिलंय. मात्र याची किंमत लेखिकेने आणि तिच्या आईने मोजलीये.
पुरुषाने मध्यमवयात आपली सरती जवानी सावरण्यासाठी दुसरा घरोबा करावा का, असा प्रश्न आहे. प्रत्येकाची उत्तरं वेगवेगळी असणार आहेत. इथे इंग्लंडमध्ये साठीचा पुरुष आपल्याहून वीसेक वर्षांनी तरुण पत्नी शोधू पाहतो. कारण येत्या दहाएक वर्षांत त्याचं आरोग्य ढासळणार असतं. दारू आणि नको ते खाणं आपला परिणाम व्यक्त करणार असतं. अशा वेळेस थाई (वा आग्नेय आशियाई वा फिलिपिनो) बायको बरी पडते. एकनिष्ठ राहते. नवऱ्याचं सगळं करते. शिवाय स्वयंपाकही करते. इंग्लंडमध्ये म्हण आहे ओल्ड मेन मॅरी नर्सेस! प्रस्तुत लेखात ओल्ड मॅन मॅरिड अॅन अॅफ्रोडिझियाक !
आ.न.,
-गा.पै.
15 Sep 2017 - 4:35 am | रविकिरण फडके
कारण त्यावर विश्वास ठेवावा असे काही आत्तापर्यंत वाचनात आलेले नाही माझ्या.
18 Sep 2017 - 1:19 am | Duishen
एखादी व्यक्ती डाव्या हाताने लिहू शकते का? ज्या व्यक्तीला दोन्ही हात नसतांना पायाने किंवा तोंडात पेन धरून लिहू शकते का... याचे होकारार्थी उत्तर आहे. मुळात आपला मेंदू 'लिहिण्याचे' काम करतो. अक्षरांची जडणघडण आपल्या अनुभवाने आणि स्वभावाने ठरते.... जे सर्व मेंदूमधे साठवलेले असतात. यातून केवळ व्यक्तिगत गुण आणि तात्कालिक परिस्थिती समजून येते. एकदा बेसिक शिकले की मग त्या व्यक्तीची सर्जनशीलता त्याचा / तिचा ग्रॅफोलॉजीचा खोल अभ्यास ठरवते. ग्रॅफोलॉजी (खास करून आर्थिक गुन्हे, आत्महत्या इ...) समजून घेण्यासाठी न्यायालयीन कामकाजामध्येही काही वेळेस वापरली जाते.
15 Sep 2017 - 4:39 am | तर्राट जोकर
ओके
15 Sep 2017 - 5:44 am | रुपी
काय प्रतिसाद द्यावा सुचत नाहीये..
खरंच तुमचं बालपण अगदीच हेवा वाटावा असंच होतं.
जे घडलं ते खरंच त्रासदायकच. पण लिहिताना तुम्ही जे विचार मांडलेत ते खूप पटले.
खास करुन,"त्यांनी बाय चॉईस आम्हाला निवडायला हवं होतं", "नात्याची पुढची विटंबना थांबवणं आवश्यक होतं" हे. आपण कुणालाही आपल्यावर प्रेम करण्याची जबरदस्ती नाही करु शकत हेच खरं..
शेवटच्या परिच्छेदातही तुम्ही स्वतःच्या भावनांबद्दल किती प्रामाणिकपणे लिहिलंय!
तुमच्या आईची काळजी घ्या.
15 Sep 2017 - 5:59 am | एस
फार उत्कटतेने लिहिले आहे. असे लिखाण आजकाल विरळाच!
15 Sep 2017 - 9:25 am | नावातकायआहे
रडवलत..........
निशब्द
15 Sep 2017 - 9:32 am | अनन्त्_यात्री
पुढचा शेर हाच उपाय आहे आपल्या सुन्न अवस्थेवर....
याद कर के और भी तकलीफ़ होती थी 'अदीम'
भूल जाने के सिवा अब कोई भी चारा न था
15 Sep 2017 - 9:46 am | सुबोध खरे
हि वस्तुस्थिती असेल तर अतिशय भयानक आहे.
कल्पना विलास असेल तरीही अतिशय परिणामकारक लिहिलं आहे.
कुठेतरी खोल कधीही न भरून येणारी जखम झाल्यासारखे वाटते आहे.
नात्यातली विश्वासाची गुंफण
मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही "यासारखं फोल वाक्य या पृथ्वीतलावर नाही.
आता आयुष्यात मला कोणत्याच घटनेने एवढा धक्का बसत नाही .
किती परिणामकारक लिहिलंय --/\--
--/\--.
15 Sep 2017 - 3:20 pm | mayu4u
_/\_
15 Sep 2017 - 10:40 am | अप्पा जोगळेकर
अत्यंत प्रतिभावान लिखाण. गणेश लेखमालेत सुद्धा अतिशय दर्जेदार लिहिले होते तुम्ही.
15 Sep 2017 - 10:52 am | शब्दबम्बाळ
घालमेलीच्या भावना उत्तमपणे उतरवल्या आहेत...
काल्पनिक कथा असावी अशी अपेक्षा आहे! अशी वेळ कोणावर येऊ नये...
बेखबर हो गये है कुछ लोग,
जो हमारी जरुरत तक मेहसूस नही करते
कभी बहोत बाते किया करते थे हमसे
अब खैरीयत तक पूछा नही करते...
15 Sep 2017 - 11:00 am | वरुण मोहिते
फक्त वाचल्याची पोचपावती !!!
15 Sep 2017 - 11:03 am | हेमंत८२
... खूपच भावपूर्वक आहे.
असेच एक माझ्या सुद्धा एका मैन्त्रिणी सोबत घडले आहे.. कधीतरी नंतर सांगेन पण त्यात थोडे वेगळे होते. पण यात ना मुले भरडली जातात. माझी सहानभूती आपल्याला व आपल्या आई बद्दल थोडीशी जास्तच आहे.. कारण तुमच्यापेक्षा त्यांनी खूप जास्त सहन केले आहे.
15 Sep 2017 - 11:08 am | सस्नेह
ही खरंच तुमची वास्तवातली कथा असेल तर अत्यंत सहानुभूती आहे.
कल्पनेतली असेल तर एकदम हटके आहे. हो, असंही होत असतं !
तुमच्या बालपणातले घर आणि बगीचा इ. वर्णन वाचून हेवा वाटला . आहे का अजून ते घर ?
15 Sep 2017 - 11:31 am | रायनची आई
काहीही झाल तरी आपल्या आई वडिलांचा आपल्याला एक रॉक सॉलिड सपोर्ट असतो. बाहेर कोणीही कसही वागल, काही झाल तरी आपण आई बाबांकडे जाउ शकतो..त्यानीच अस वागाव म्हणजे? सुन्न व्हायला झाल..
15 Sep 2017 - 11:36 am | आकाश कंदील
सुन्न
15 Sep 2017 - 12:00 pm | जागु
नि:शब्द.
15 Sep 2017 - 12:34 pm | बाजीप्रभू
नवलताई!! मी म्हटलं होतं ना तुम्हाला ("कुण्या देशीच पाखरू" लेखामध्ये) कि तुम्ही एक कसलेल्या लेखिका हात म्हणून... हा लेख अजून एक उधाहरण आहे त्याचं.... खूप छान ओघवतं लिहिता... हा लेख खरंतर दिवाळी अंकाच्या "व्यक्तीचित्रा" साठी फिट्ट बसला असता.
पांढरी साडी काळ्या बॉर्डरमुळे उठून दिसते... या तंत्राचा खुबीने वापर करीत स्वभावातील उत्कर्ष बिंदू ते ऱ्हास, हेवा ते द्वेष उत्तम मांडला अहात. तुम्ही लिहीत राहा मिपाकरांच्या खूप अपेक्षा आहेत तुमच्याकडून.
15 Sep 2017 - 12:40 pm | गामा पैलवान
नवलताई,
हे पटलं :
खरं वाक्य असंय की, मी माझ्याशिवाय जगू शकंत नाही.
बाबा प्रचंड रजोगुणी (passionate) आणि सर्जनशील (creative) आहेत. अशा माणसाला सांभाळणं दिव्यच आहे. जेव्हा अशा पुरुषाची सर्जनशीलता उफाळून येते तेंव्हा सहभोगार्थ (= शेअर करायला) सोबत कोणतरी स्त्री लागते. तुमची आई होती, तुम्ही होतात तोवर अडचण आली नव्हती. नेमकी तुमची आई आणि तुम्ही दूर असतांना हे प्रकरण घडलं. त्यातून त्यांना तुम्ही दोघी 'म्हाताऱ्या' झाल्या आहात असं दिसून आलं. नवी मुलगी मात्र 'तरुण' असून आपल्या स्वत:च्या 'तारुण्या'स सोबत देऊ शकेलसं वाटलं. खरंतर अगोदरच अनेक प्रकरणे घडायला हवी होती. पण तुमच्या आईने योग्य ती साथ दिलेली दिसतेय. याबद्दल तुमचं आणि आईंचं खरंच कौतुक आहे.
नवी मुलगी उद्धटपणे आईंना म्हणते की, जर मी तुम्हाला स्वीकारलंय तर तुम्ही का नाही मला स्वीकारंत ! पण याची दुसरी बाजू अशीही आहे की, जर मी तुमच्या प्रिय व्यक्तीचं तारुण्य परत आणलंय तर तुम्ही ते का नाकारता आहात ! बाबांची दारू पिऊन भांडणं व्हायची ती याच कारणासाठी बहुतेक.
बाबांनी तिला नोकरी दुसऱ्या गावी कशाला लावून दिली? त्याच गावात लावता आली नसती का? पण दोघी बायकांनी एकमेकींना स्वीकारलं तरंच हे शक्य आहे. अन्यथा पहिलीस सोडावं लागेल. यामागे नव्या मुलीसोबत जाण्याच्या नव्या उत्साहाऐवजी जुन्यापासून दूर पळायची इच्छा दिसते आहे.
जर केवळ स्त्रीसहवासच हवा असेल तर तो नव्या मुलीकडून मिळंत होता. मग परत अपत्यप्राप्ती कशासाठी, असाही एक प्रश्न आहे. बाबा परत एक आयुष्य जगू पाहताहेत. हेच माझ्या मते यावरचं स्पष्टीकरण आहे. एकाच जन्मात दोन आयुष्यं जगायचा मोह भल्याभल्यांना सोडवंत नाही. त्याची जातकुळीच वेगळी असते. तो कशातही मोजता येत नाही. आयुष्याचं मोजमाप करणारा पेला आजून अस्तित्वात यायचा आहे. म्हातारपण हे दुसरं बालपण याचसाठी धरतात. कदाचित त्यांना लवकर नातवंडं मिळाली असती तर काहीतरी फरक पडला असता. पण हा जरतरचा प्रकार आहे.
तुमच्या भावाची काहीच माहिती कळली नाही लेखातून. त्याची भूमिका काय होती ते स्पष्ट होत नाही. तुमची कथा तुमच्या हस्ताक्षरातल्या आय सारखीच तुटक आहे. आणि नेमकं हेच तिचं वैशिष्ट्य आहे. परिपूर्णत्वाचा आग्रह सर्वत्र धरणं अनावश्यक आहे.
असो.
मी फक्त कार्यकारणाचा अन्वयार्थ देतोय, कसलंही समर्थन करीत नाहीये. तुमच्या दु:खात मनापासून सहभागी आहे. असं व्हायला नको होतं. पण म्हणतात ना कुणीतरी पश्चातचिकित्सा करावी लागते. गाळलेल्या जागा भरून तशी ती करतोय म्हणून समजा.
आ.न.,
-गा.पै.
15 Sep 2017 - 4:13 pm | विशुमित
+1
15 Sep 2017 - 12:48 pm | वकील साहेब
निशब्द करून टाकलत ताई तुम्ही.
आईंची काळजी घ्या.
सहज एक प्रश्न मनात आला, तुमच्या वडिलांच्या हस्ताक्षरात आता सुखी माणसाचं आयुष्य डोकावत असेल का ?
15 Sep 2017 - 12:59 pm | चिर्कुट
सगळ्यांनी लिहिल्याप्रमाणे अत्यंत सुन्न करणारा लेख आहे.
एकंदरीत वर्णनावरुन तरी बाबा कुटुंबाविषयी अति संवेदनशील होते असं दिसतंय. असा माणूस इतका बदलू शकतो हेच पटत नाही. :(
15 Sep 2017 - 1:25 pm | सिरुसेरि
हि जर एक काल्पनीक कथा असेल तर खुप परिणामकारक लेखन आहे . जर खरा अनुभव / सत्य घटना असेल तर निशब्द .
"नटसम्राट" मधली वडिलांवर चोरीचा आळ घेणारी मुलगी काय , किंवा या कथेतील स्वार्थी वडील काय ही सर्व काळाने विचारलेल्या प्रश्नांवर काळानेच दिलेली उत्तरे आहेत . जी गुंतागुंता अधिक वाढवतात .
15 Sep 2017 - 2:01 pm | पुंबा
निशःब्द..
15 Sep 2017 - 2:05 pm | Minal Rao
नि:शब्द.
15 Sep 2017 - 2:48 pm | नंदन
...
15 Sep 2017 - 3:16 pm | मोहनराव
....
15 Sep 2017 - 3:25 pm | प्राची अश्विनी
सुन्न झाले.
"बाप"रे म्हणवत नाहीये.
15 Sep 2017 - 3:44 pm | कवितानागेश
फार दिवसांनी उत्तम लिखाण वाचतेय!
15 Sep 2017 - 3:48 pm | प्रचेतस
उत्कृष्ट लेखन
15 Sep 2017 - 4:07 pm | नि३सोलपुरकर
हि एक काल्पनीक कथा असावी अशी अपेक्षा आहे .
15 Sep 2017 - 4:43 pm | अभ्या..
अप्रतिम लिहिलंय.
15 Sep 2017 - 5:19 pm | हर्मायनी
खूप छान भावनाविवश करणारी कथा.. कथा काल्पनिक असावी अशी आशा आहे.
15 Sep 2017 - 6:42 pm | सानझरी
.......
15 Sep 2017 - 7:07 pm | Naval
मिपाकरांचे खूप आभार !! तुम्ही सगळे मला अनोळखी हीच माझी ताकद आहे,पूर्णपणे प्रामाणिक राहून लिहिण्यासाठी. खरंच हि कल्पना असती तर किती बरं झालं असत ... नागराज मंजुळेच्या शब्दात सांगायचं तर जिव्हारी कळ लागावी आणि करकचून ओरडावं तस लिहिलं मी हे सगळं... कित्येक वर्षांचा writers block निघायला मदत झाली या लिखाणाने. कुठलीही सहानुभूती किंवा प्रसिद्धी यातून अपेक्षित नाही.
15 Sep 2017 - 8:07 pm | गामा पैलवान
नवलताई,
तुमचं हे वाक्य वरवर आकर्षक पण पार फसवा दिलासा देणारं आहे :
मी मला ओळखते हीच माझी ताकद आहे, असं तुमच्याकडून वाचायला आवडेल. ते तुमच्या अनुभवास येवो.
आ.न.,
-गा.पै.
15 Sep 2017 - 8:24 pm | प्रदीप
आपल्या वैर्यावरही येऊ नये, असा अनुभव तुम्हा दोघींच्या वाट्याला आला आहे. त्यातून बाहेर पडणे आता जरूरी आहे. तुमच्या आई अतिशय खंबीर व धीराच्या दिसतात. त्यांना ह्यातून बाहेर पडण्यासाठी तुमची मदत लागेल. तेव्हा त्याअगोदर तुम्ही स्वतःस आवरणे आवश्यक आहे.
माणसासारखे स्वार्थी जनावर दुसरे नाही, ह्याची खूणगाठ मनात बांधून, व तरीही कटूता मनात येऊ न देता पुढे जाता आले तर पहा. तुम्हा दोघींना आपापली आयुष्ये आहेत. ती तुम्ही न कुढता, पुढे पहात जगावे, अशी सदिच्छा ब्यक्त करण्यापलिकडे माझ्यासारख्या त्रयस्थाला काही करता येण्यासारखे नाही.
15 Sep 2017 - 9:03 pm | स्वलेकर
शब्द नाहित.
15 Sep 2017 - 9:05 pm | माम्लेदारचा पन्खा
दुःख तर आहे पण ते कमी होऊ देत हीच इच्छा !
15 Sep 2017 - 11:12 pm | सर टोबी
माझे वडील दोन वर्षापर्यंत अगदी व्यवस्थित जीवन जगात होते. अचानक काठी घेऊन त्यांनी चालायला सुरुवात केली. थोडासा तोल सांभाळण्याचा त्रास होऊ शकतो, कुठे तरी पडण्यापेक्षा काळजी घेतात ते ठीकच आहे म्हणून मी दुर्लक्ष केले. नंतर मानसिक आजाराची तक्रार सुरु केली. त्यांच्या एका डॉक्टर मित्राने, तुम्हाला पार्किन्सनची शक्यता आहे असे सांगितल्यावर त्याच्या तपासण्या सुरु केल्या. पार्किन्सन आहे कि नाही याची थोडी भवतीं भवती झाल्यावर एकदाचे डॉक्टरांनी पार्किन्सन आहे हे सांगितले. हि गोष्ट त्यांनी मला अशा अविर्भावात सांगितली कि ते आजारपण एन्जॉय करतात कि काय अशी मला शंका आली.
पार्किन्सन च्या औषोधोपचाराचा त्यांना इतका त्रास झाला कि ज्याचे नाव ते. युरीन इन्फेकशन, पायाला सूज येणे, झोप न येणे असे एक ना दोन अनेक त्रास त्यांना लागोपाठ झाले. मधल्या काही दिवसात त्यांची पूर्ण रया गेल्यासारखी झाली आहे. त्यांना ओळखणाऱ्या लोकांना त्यांची हि अवस्था बघून वाईट वाटते. पण वडिलांची स्वमग्नता इतकी कि त्यांना याचे काहीच वाटत नाही. कोणी आधार दिला, मदत करण्यासाठी हात पुढे केला कि सगळा भार त्या माणसावर टाकून मोकळे होतात. मुद्दाम चिरक्या, बारीक आवाजात बोलायचे, वाकून चालायचे असे काहीही प्रकार चालू असतात.
माझ्या लहानपणापासून त्यांना अतिशय व्यवस्थित राहताना, वागताना पहिले आहे. हल्ली असे का वागतात हेच कळत नाही.
15 Sep 2017 - 11:55 pm | मोदक
तुम्ही २ - ३ वर्षांपूर्वी नोकरीला लागला आहात का..? किंवा वडिलांना रिटायर होऊन ५ ते ८ वर्षे झाली आहेत का..?
भविष्य / कुंडली वगैरेच्या अनुषंगाने विचारत नाहीये.
15 Sep 2017 - 11:55 pm | सुचिता१
शैली उत्तम आहे, हा कल्पना विस्तार असावा ,अशूी आशा होती , पण वस्तुस्थीती आहे हे वाचून वाइट वाटल्ं.
आई ची काळजी घ्या . लिहीत राह ा .
तुमचे लेखन तुमची ताकद आहे. मनापासून शुभेच्छा !
16 Sep 2017 - 9:06 am | जेडी
पुण्यात असेच एक प्राध्यापक आहेत, त्यांचे आडनाव व**र. त्यांनी पुस्तकेही लिहिलीत . चांगले विडंबन ते करत असत . त्यांच्याशी बोलल्यावर त्यांना असलेल्या ज्ञानाचा आवाका लगेच दिसून येतो . भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहेच पण दभिनशी त्यांची ओळख होती म्हणजे ते साहित्यिक वर्तुळात ते बऱ्यापैकी ज्ञातही असावेत . कविता , गजल पाठ आहेत त्यांच्या . दारूचेही व्यसन आहेच त्यांना . पण त्यांनी असे पाऊल उचलले कारण त्यांची बायकोबरोबर अतिशय भांडणे होत , पटत नव्हते असे कारण सांगतात. मुलीशी मात्र त्यांचे फारच सख्य होते असे बोलून दाखवतात . प्रेमाला वय नसते हे सांगून त्यांनी आपल्या दुसऱ्या पत्नीची ओळख एकाच्या एकसष्टी मध्ये करून दिली होती . अर्थात त्याआधी त्यांनी एक गजल का शायरी पेश केली होती. त्यांचे भाषणही खूप सुंदर होते.
असो तर सांगायचा मुद्दा म्हणजे तुम्ही त्यांच्या बाजूने विचार करून पाहिलाय का?मोठ्या मनाने माफ करा . त्यांचेही मन कोठेतरी त्यांना खातच असेल... मुलांची होणारी घुसमट अत्यंत केविलवाणी असते हेही खरेच .
भारतात कुटुंब व्यवस्थेला खूपच महत्व आहे त्यामुळे हे न बुजणारे ओरखडे उठत राहतात . शिवाय मूव्ह ऑन होणेही तितकेच गरचेचे आहे . समुपदेशन करून घेऊन हा गिल्ट संपवता येतो .
16 Sep 2017 - 9:41 am | सुबोध खरे
कलाकाराला "काहीही माफ" असते हा दांभिक पणा आहे. कलाकाराची सृजनशीलता इ इ शब्दांचे अवडंबर रचले म्हणजे आपली चूक झाकली जाते असे नव्हे. कलाकारांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा सृजनशीलता याचे इतके स्तोम माजवलेले आहे कि त्यांना वाटते काहीही खपून जाईल.
माझ्या स्वतःच्या आयुष्यात असे (मोहाचे) प्रसंग आले. परंतु क्षणिक मोह टाळला तर अशा मोठ्या वादळाला सामोरे जावे लागत नाही. आमच्या माहितीचे एक हृदयरोग तज्ज्ञ आहेत ज्यांनी आपल्या अर्ध्या वयाच्या मुलीबरोबर संबंध जुळवले (लिव्ह इन). त्यांचा जावई माझं वर्ग मित्र आहे. त्याला या डॉक्टरांबद्दल तिडीक बसली आणि त्याची बायको अत्यंत मानसिक तणावातून जात होती. या नात्यामुळे त्यांच्या व्यवसायावर पण मोठा परिणाम झाला होता. यथावकाश त्यांचे ते संबंध संपले आणि त्या मुलीने याना सोडून आपल्या आयुष्याला नवी सुरुवात केली. पण नवरा बायको आणि बाप मुलीचे संबंध दुभंगले ते कायमचे. डॉक्टरांचा व्यवसाय परत व्यवस्थित चालू झाला
तात्पर्य -- व्यवसायामुळे केवळ स्त्रियांशी(पुरुषांशी) संबंध येतात म्हणून तुम्हाला लग्नबाह्य संबंध ठेवणे सोपे जाते. म्हणजे जसे कलाकाराला ते सोपे असते तसेच डॉक्टर किंवा तत्सम व्यवसायासाठी ते सोपे असते याचा अर्थ असा नव्हे कि अनैतिक( याला दुसरा चपखल शब्द आता सुचत नाहीये) गोष्टींचे समर्थन करता येते.
16 Sep 2017 - 9:46 am | संत घोडेकर
...
16 Sep 2017 - 1:22 pm | श्रीगुरुजी
आयुष्याच्या संध्याकाळी कधीतरी आपण आयुष्यातलं काहीतरी अमूल्य असं कायमस्वरूपी गमावलं आहे याची या वडीलांना जाणीव होईल आणि त्यावेळी आपल्या वागणुकीचा पश्चाताप होऊनही आता उपयोग नाही हे लक्षात येईल. हीच त्यांना मिळालेली शिक्षा असेल.
ही काल्पनिक कथा असावी अशी इच्छा आहे.
17 Sep 2017 - 12:50 pm | नाखु
उशीरा आलेल्या शहाणपणा ने, केलेली अवहेलना, आणि नातेविश्वासाचा मुजोर अनादर कधीच विसरू शकत नाही
देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुखि ठेवो हीच सदिच्छा!
कुटुंबवत्सल पालक नाखु पांढरपेशा
16 Sep 2017 - 7:39 pm | Naval
खूप आभार, मनापासून दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल !
17 Sep 2017 - 12:16 pm | पिशी अबोली
सुन्न झाले होते वाचून. त्यामुळे प्रतिक्रियेला इतका काळ गेला.. लिहिलं खूप तळमळीने आहे. ही पात्रं खरी असोत वा खोटी, ही तळमळ खूप खरी आहे..
17 Sep 2017 - 1:00 pm | समाधान राऊत
:(
17 Sep 2017 - 1:20 pm | गामा पैलवान
खरे डॉक्टर,
तुमचं इथलं तात्पर्य वाचलं. त्याच्याशी सहमत आहे. मात्र मागे केक ठिकाणी तुम्ही नवरा म्हणू नये आपला अशी म्हण वापरली होती. अर्थात हिचा संदर्भ साफ वेगळा आहे.
पण जर तुमचं तात्पर्य आणि त्या म्हणीचा उत्तरार्ध शब्दश: एकत्र वाचले तर अर्थबोध करवून घेण्याची प्रक्रिया काय असावी? हा प्रश्न लेकुरवाळ्या प्रौढ स्त्रीस जास्तकरून पडेल.
आ.न.,
-गा.पै.
17 Sep 2017 - 1:21 pm | गामा पैलवान
केक ठिकाणी नाही हं, एके ठिकाणी असं वाचा बरं.
-गा.पै.
17 Sep 2017 - 9:55 pm | विजुभाऊ
यात मुलीच्य बाबाची काही चूक आहे असे वाटत नाही.
न पटणार्या जोडीदारासोबत कायम रहायचा अट्टहास कशाला ठेवायचा
17 Sep 2017 - 11:32 pm | Duishen
उत्तम लेख पण विदारक अनुभव! कदाचित जास्त करून दु:खं ही कलेची जननी असावी. जे स्वप्नातही वाटत नाही असं काही प्रत्यक्षात घडून जातं. तुम्हाला स्वत:च्या भावना आणि भावनिक घालमेल ओळखायला खूप छान जमलं आणि तसेच ते त्या ताकदीने शब्दात मांडण्यासाठीही! हे सर्व तुमच्या आईच्या नजरेतून बघण्याचा प्रयत्न केला.. फक्त प्रयत्न... पण केवळ वादळी शांतता उमजली... त्या माउलीला आणि तुम्हाला पण सलाम!
विश्वास तोडू शकणारी व्यक्ती मुळात विश्वासार्ह असू शकते का...? संवेदनशील असणे आणि संवेदनशील आहोत असे दाखवण्याची कला अवगत असणे यात नक्कीच फरक आहे. एका संस्कृत श्लोक आठवला- "काक: कृष्ण, पिक: कृष्ण: को भेद: पिक काकयो वसंत समये प्राप्ते, काक: काक:, पिक: पिक:।"
20 Sep 2017 - 1:55 am | Naval
विजुभाऊ बाबांना त्यांचा जोडीदार नकोसा होता हे तुम्ही नेमक कस ठरवलत? आणि साधारण किती वर्षांनी आपल्याला आपला जोडीदार नकोसा आहे हे कळत?आणि तरीही बाबांवर व्यक्ती म्हणून कोणती सक्ती झाली? बाबांनी हव ते केल त्याच खापर आईच्या माथ्यावर कशाला?
20 Sep 2017 - 3:05 pm | माहितगार
लेखिका आणि त्यांच्या नाते संबंधातील सर्वांच्या भावनांबद्दल आदर करून तर्काच्या कसोतीवर काही बाजू निसटत्या असल्याची शक्यता जाणवते. भावनीक नात्यांचे गांभीर्य लक्षात घेण्याच्या दृष्टीने लगेच खीस पाडण्याचे टाळले. प्रतिसाद इथेच द्यावा की व्यनिने या बद्दल संभ्रमात आहे.
20 Sep 2017 - 6:33 pm | पिलीयन रायडर
तर्काच्या कसोट्या लावायला हव्यातच का? लेखिकेने तिच्या वडीलांसोबतचे तिचे नाते कसे बदल गेले हे लिहीलंय. अर्थातच लिखाणाला काही मर्यादा असतात. उद्या त्यांच्या आईने लिहायचं ठरवलं तर कदाचित एक वेगळीच बाजू समोर येईल. घरातल्या इतर सदस्यांनी लिहीलं तरी आपल्याला वेगवेगळ्या बाजू कळत जातील आणि तरीही न उलगडलेलं सत्य शिल्लक असेलच.
माणसाचे विविध पैलू असतात, आई वडील म्हणून आपल्यासमोर त्यांची अत्यंत चांगलीच बाजू येत असते. आपल्याला कायम तीच जपावीशी वाटणं स्वाभाविक आहे. मुलगी म्हणून त्यांच्या मनात आजही तेच बालपण आठवणींच्या रुपात शिल्लक आहे असं दिसतंय. आता ते तुमच्या तर्कांच्या कसोट्यांवर नाही उतरलं तरी काय फरक पडतो? इथे माणसाचं व्यक्त होणं शेवटी महत्वाचं नाही का?
हा लेख काल्पनिक नाही हे समजून प्रतिक्रिया यायला हव्या होत्या. अर्थात तसं बंधन नाहीये. पण इथे कुठलीही टिपण्णी करण्याएवढी माहिती आपल्या कुणाकडेही नाही आणि कथेतली लूपहोल्स शोधत बसायला हे काही फिक्शन नाही. त्यामुळे उहापोह करत बसण्यापेक्षा त्यांच्या व्यक्त होण्याचा आदर करुया आणि आणखीन प्रश्न नको विचारुया का?
20 Sep 2017 - 7:04 pm | माहितगार
प्रतिक्रीया काल्पनिक समजून नाही आहे. एकदा सार्वजनिक ठिकाणी मांडणी केल्या नंतर उहापोह होणारच नाही असेही गृहीत का धरावे ? लेख वाचल्या नंतर पहिली प्रतिक्रीया देण्याची संधी असतानाही ती दिली नाही, एवढा सम्यम पाळलाच आहे आणि तार्कीक उहापोह करण्याची इच्छा असली तरी त्यास नकारात्मकपणे पाहीले पाहीजे असेही नसावे.
तो आहेच , भावनेच्या भरात काही पैलु सुटलेले असू शकतात, जे भावनेच्या भरात न वाहणार्यांना अधिक सहज लक्षात येतात.
महत्वाच आहेच पण भावनांचा निचरा झाल्या, त्यांच्या आजुबाजूचे इतर पैलु अभ्यासणे उपयूक्तही असू शकते. किंवा कसे.
20 Sep 2017 - 8:02 pm | पिलीयन रायडर
तुमची मर्जी! एकदा लेख टाकला की चर्चा होणार हे आहेच, मी आपलं एक सजेस्ट करुन पाहिलं.
पण वर दिलेला लेख म्हणजेच केवळ १००% सत्य नसण्याची शक्यता आहेच, तेव्हा तुमच्या कडे उहापोह करायला पुरेशी माहिती आहे का? हा प्रश्न आहे. लेखिकेने आपला जेवढे हवे ते आणि जसे हवे तसे लिहीण्याचा हक्का बजावला असेलच ना.
ह्याउप्पर तुम्हाला जे प्रश्न पडलेत ते विचारण्याचा तुमचा हक्क मान्य आहेच. वेगळा धागाही काढू शकताच असे सुचवते.
20 Sep 2017 - 8:32 pm | माहितगार
पिरा लेखिकेला असत्य ठरवण्यात मला मुळीच रस नाही. लेखिकेने लेखातून पुर्ण मन मोकळे लिहूनही लेखिकेची "माझं हे दुःस्वप्न अजूनही चालू आहे.." हि भावना संपलेली नाही आणि भावनेने ओथंबलेल्या लेखाला आलेल्या भावनिक सहमतीच्या प्रतिसादांचाही हि भावना ओसरण्यासाठी उपयोग आहे का ? हा मला पडलेला साधा सुधा प्रश्न आहे.
20 Sep 2017 - 8:44 pm | पिलीयन रायडर
हे असत्य नाही हो.. संपूर्ण सत्य नाही असे म्हणायचे आहे मला. तुम्ही तसा काही प्रयत्न करताय असं मला वाटत नाही.
इथे त्यांना कुणाच्या प्रतिसादाने काही फरक पडेल असं मला तसंही वाटत नाही, बहुदा लेखिकेचाही तो हेतू नसावाच. कित्येकदा माणसाला नुसतं व्यक्त व्हायचं असतं. ते ही अनोळखी लोकांसमोर, म्हणजे चर्चा आणि प्रश्न टळतात. (लेखिका वर म्हणतेय की तुम्ही अनोळखी आहात हीच माझी ताकद आहे.) एखाद्याला कधी तरी फक्त ऐकून घेणारे हवे असू शकतातच की.
तुम्हाला त्यांना मदत करावीशी वाटतेय हे ही सहृदयतेचं लक्षण आहे, पण मला असं वाटतंय की त्यांना कोणतंही उत्तर नकोय. कदाचित आपण उहापोह न करणे हीच सर्वात मोठी मदत असू शकेल.
असो.. मला ह्या धाग्यावर अजून चर्चा करणे संयुक्तिक वाटत नाही. तुम्ही दुसरा धागा काढलात तर मी नक्कीच तिथे येईन. पण मला व्यक्तिशः इथे इतक्या संवेदनाशील विषयावर तिर्हाईतांनी चर्चा करणं बरोबर वाटत नाही. केवळ कुणाला दुखवायचं नाही म्हणूनच नव्हे तर आपल्या हातात पुरेशी माहितीच नाही ह्या करिता सुद्धा.
धन्यवाद!
20 Sep 2017 - 8:55 pm | माहितगार
हो असा विचार माझ्याही मनात आल्यामुळे सविस्तर प्रतिसाद न देता, काही निसटत्या बाजू लक्षात घेणे त्यांना दिलासा देणारे असू शकेल एवडी हिंट देऊन सोडू शकतो आणखी काय .
20 Sep 2017 - 8:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
सहमत !
दोन माणसांमधिल भावनिक संबंधात पहिल्याची एक बाजू असते, दुसर्याची दुसरी बाजू असते आणि तिसरी बाजू सत्याची असते असे म्हणतात... आणि म्हणूनच ज्यांना संपूर्ण सत्य माहीत नाही अश्या व्यक्तीची चवथी बाजू पहिल्या तिघांनाही न्याय देऊ शकत नाही, तेव्हा अश्या व्यक्तीने गप्प राहणे बहुतेक सर्वात जास्त न्याय्य असते !
20 Sep 2017 - 7:04 pm | Duishen
माणूस कसा ओळखावा याच्या कसोट्या प्रसंगानुरूप वेगवेगळ्या असू शकतात. या कसोट्यांमधे धर्म, नीती, तत्वे, मुल्ये, कायदा यांचा समावेश आहे. धर्म, तत्वे आणि कायदा कालानुरूप बदलता येतो पण मुल्ये वैश्विक असतात.
लेखिकेचे वडील धार्मिक असावेत असे लिखाणावरून वाटत नाही पण ज्या काळात त्यांचे लग्न झाले असेल त्यावरून त्यांनी धार्मिक लग्न केले असणार हे नक्की. जिथे लग्न ही पवित्र संकल्पना मानल्या जाते. मग या व्यक्तीचे धार्मिक नियमांवर विश्लेषण नक्कीच होऊ शकेल.. ७ फेरे, त्यातील शपथा...विशेषत: पावित्र्य !!! जेंव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात (स्व-संमतीने किंवा समाजाच्या संमतीने) तेंव्हा विलग होण्याचा निर्णय एकट्याने घेणे हे कितपत संयुक्तिक असावे? ...खासकरून स्वार्थासाठी निर्णय असेल तर....
लग्न हा काही परंपरेत (...आणि धर्मात) करार मनाला जातो, ते योग्य पण कुठलाही करार तुटला तर त्रास होणारच...पण नौकरीचा व इतर कुठलाही करार आणि लग्नाचा करार यामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे...तो म्हणजे मनाचा, प्रेमाचा...!!!
एखाद्याच्या आयुष्याचे कायमस्वरूपी नुकसान व्हावे असे कृत्य किंवा शब्द देऊन फिरवणे; हे कुठल्या नीती-मूल्यात बसू शकते हे विचार करण्यासारखे आहे.
या व्यक्तीने घटस्फोट घेऊन नवीन संसार उभारला असे लिखाणात दिसले नाही. याचा अर्थ घटस्फोट न घेता नवीन संसार थाटणे हे कायद्याच्या कक्षेतही येत नाही.
नॉर्मल पातळीवर लैंगिक सुख आणि प्रेम हे एका नाण्याच्या दोन बाजू मानवी साहचर्यांमध्ये असतात. मृत्यू संदर्भात अतिशय घाबरट आणि भित्र्या असणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव लैंगिक सुख आणि पुनुर्त्पादन याकडे जास्त वळतो.बायोसायकोलॉजी नुसार हे वर्तन अपसामान्य आहे. एकाच जीवनात दोन आयुष्य जगावेसे वाटणे हे या 'महान' व्यक्तीचा आयुष्याच्या क्षणभंगुरतेबाबतचा (मृत्यूबाबतचा) घबराटपणा दर्शवत असेल काय? कुठल्याही कसोट्या घेतल्या तरीही या व्यक्तीचे वागणे समर्थनीय ठरेल असे वाटत नाही.
याउलट लेखिकेच्या स्वानुभवाचे सार अगदी दुसऱ्या टोकावर जाऊन एका वाक्यात येते,,, एका कसोटीमध्ये येते,,,,, - आई म्हणाली ,"ज्या माणसावर मी इतकं प्रेम केलं त्याला त्रास देऊ इच्छित नाही. "
20 Sep 2017 - 7:20 pm | माहितगार
सहमत. अर्थात अभिव्यक्ति स्वातंत्र्यस धक्का लावण्याबाबत कायद्यास मर्यादाही आहेत
इतिहासात असंख्य वीर स्री पुरुषांनी एका पेक्षा अधिक व्यक्तिंवर प्रेम आणि विवाह दोन्ही केले आहे. एकापेक्षा अधिक विवाह टाळणे यात कौटूंबीक आर्थीक सुरक्षीततेची अधिक हमी आहे यात वाद नाही - मी एक व्यक्ती विवाहाचाच समर्थक आहे. पण एक व्यक्ती एका पेक्षा अधिक व्यक्तीवर प्रेम करूच शकत नाही ही तार्कीक उणीव नाही का ? एखादी व्यक्ती स्त्री अथवा पुरुष सोबतीच्या मृत्यू नंतर लैंगिक सुख आणि पुनुर्त्पादन याकडे दुसरा विवाह करून वळू शकतात तेव्हा तेव्हा बायोसायकोलॉजी नुसार हे वर्तन अपसामान्य भित्र्या आणि घाबरट असतात ? या नियमाने विधवा विवाह चुकीचे ठरतात किंवा कसे ?
20 Sep 2017 - 10:10 pm | Duishen
प्रेम आणि विवाह या परस्परपूरक असतात अशी (फोल) अपेक्षा असते. त्यामुळे प्रेम एकापेक्षा अधिक व्यक्तींवर किंवा एकाच वेळेस अधिक व्यक्तींवर असू शकते. याबाबत सहमत! पण प्रश्न असा आहे की जी गोष्ट समाजाच्या साक्षीने (किंवा कायद्याच्या साक्षीने) झाली आहे, जो शब्द , जी जबाबदारी स्वीकारली आहे त्यापासून स्वार्थासाठी पळून जाणे कितपत इष्ट? जर असे गृहीत धरले की समाजाच्यासाठी किंवा आई-वडिलांसाठी, त्यांच्या संवेदना जपण्यासाठी २५-३० वर्षापूर्वी लग्न केले... मग त्यावेळेस सामाजिक संवेदना समजू शकणारे मन संपले असे समजावे का? कारण सध्याच्या कृतीत कुठलीही संवेदनशीलता जाणवत नाही.
एखादी व्यक्ती स्त्री अथवा पुरुष सोबतीच्या मृत्यू नंतर लैंगिक सुख आणि पुनुर्त्पादन याकडे दुसरा विवाह करून वळू शकतात तेव्हा....
सोबती जिवंत असतांना आणि सर्व योग्य असतांना केवळ 'नाविन्याच्या' ओढीने घेतलेले स्वार्थी निर्णय हे मात्र नक्कीच अपसामान्य वर्तन...
मानवी उत्क्रांती मधे निर्माण झालेल्या संस्थांचा (धर्म, विवाह, कुटुंब, राज्य इ.) मी समर्थकही नाही किंवा विरोधकही नाही मात्र ज्या कारणांमुळे या संस्था निर्माण झाल्या आणि ज्या मुल्यांवर वा नितीनियामांवर उभ्या आहेत त्याचा मात्र मी समर्थक किंवा विरोधक नक्कीच आहे. प्रेमाला समर्थन आहेच पण जे प्रेम चांगल्या मूल्यांना धक्का लावून अनेकांना 'संपवू' शकतं ते प्रेम केवळ स्वैराचार आहे..
याउलट "मी त्यांच्यावर प्रेम केले त्यांना त्रास देऊ इच्छित नाही" हे प्रेमाचे उत्कट रूप अधिक भावते.
20 Sep 2017 - 10:44 pm | माहितगार
धागा लेखात नमुद केसकडे तुम्ही कसे बघता त्यावर अवलंबून आहे. वेगळ्या दृष्टीने पाहीले तर नविन आणखी एक जबाबदारी घेतली आहे, आधीची जबाबदारी पित्याने स्वतःहून नाकारल्याचे दिसत नाही, तेही आधीची जबाबदारी स्वच्छ नाकारणे कायदेशीर दृष्ट्या राजमार्ग आणि आधी जबाबदारी चालू ठेवणे कायदेशीरदृष्ट्या जोखीमेचे असले तरीही.
म्हणजे नविन व्यक्तिला जिवनात समावेश देताना आधीच्या व्यक्तिला दिलेल्या कमिटमेंट (एकमेवतेची सोडून) पूर्ण करत राहील्यास मुल्य आणि नितींची काळजी घेतल्यास संस्था आणि नियमावली गौण आहेत हे आपणास मान्य आहे ?
21 Sep 2017 - 2:28 am | Duishen
म्हणजे नविन व्यक्तिला जिवनात समावेश देताना...
हे घडल्याबरोबरच आधीची कमीटमेंट अपूर्ण राहिली आणि नितीमुल्ये पायदळी गेले.......