आमचा ग्रॅफोलॉजीचा (हस्ताक्षर व सही याचा अभ्यास ) क्लास चालू होता . सरांनी आम्हाला प्रत्येकाला एक कोरा कागद दिला आणि काहीही मुक्तपणे लिहायला सांगितलं त्यावर आपलं नांव न टाकण्याचीही सूचना दिली . नंतर ते पेपर्स गोळा करून त्यांनी मधूनच कुठलाही पेपर काढून त्याचं अनालिसिस कसं करायच हे समजवायला सुरुवात केली. कागदावरच्या मजकुराचा आकार, मार्जिन आणि मग एक एक अक्षर घेऊन त्या व्यक्तीच व्यक्तिमत्व उलगडू लागले . एक दोन अनालिसिस झाल्यावर त्यांनी माझा कागद सगळ्यांसमोर पकडला ,मनात खूप उत्सुकता होती आज स्वतःबद्दल काय जाणून घ्यायला मिळणार ... सर सांगू लागले ही व्यक्ती तिच्या भूतकाळापासून दूर पळतेय , मनातल्या गोष्टी न बोलणे हा नवीन झालेला बदल नंतर 'आय' या अक्षरावर भिंगाने फोकस करून म्हणाले नीट बघा ह्या रेषा ,हे स्ट्रोक्स ही व्यक्ती आपल्या वडिलांपासून दुखावली गेली आहे,त्यांच्याशी निगडित कोणत्याही गोष्टीपासून ही व्यक्ती दूर राहते, भावना अव्यक्त ठेवणे हा त्याचाच परिणाम असू शकतो. मी स्तब्ध होऊन ऐकत होते डोळ्यातलं पाणी बाहेर न येऊ देण्याची काळजी घेत एक मोठ्ठा आवंढा गिळला आणि उरलेला क्लास सुन्न बसून काढला. घरी परतत असताना सरांच ते वाक्य मला सारखं आठवत होत… माझं मन कशातच लागत नव्हतं , माझ्यात झालेल्या बदलाच असं तटस्थ विवेचन ऐकून मी तर हे स्वतःशी मनातही बोललेच नव्हते हे जाणवलं . आईचा फोन आला कि अतिशय तार्किकपणे तिला समजावून सांगायची ,"जे झालं ते झालं आई आता आपण आपलं आयुष्य आनंदाने जगूया , काही फरक पडत नाही ग एवढा ,एखाद्याचा जोडीदार मरतो तेव्हा ती व्यक्ती एकटी आयुष्य जगतेच ना आता या विषयावर बोलणं बंद बर का". आज एका "आय " अक्षराने माझा समजूतदारपणाचा हा बुरखा फाडून टाकला होता. घरी आल्यावर मीच लिहिलेल्या त्या 'आय ' कडे बघत राहिले उभी रेषा आणि वरची छोटी आडवी रेषा यात पडलेली छोटीशी फट मनातले केवढे अंतर दाखवत होती ...
अगदी आठवायला लागलं तस बालपणीच जे वातावरण नेहमी आठवतं ते म्हणजे , स्वयंपाकघर आणि हॉलच्या बरोबर मध्यभागी एका कप्प्यात ठेवलेला एक भला मोठा टेपरेकॉर्डर आणि त्यावर मंद आवाजात सुरु असलेल्या गझल... मुन्नी बेगम , मेहदी हसन तर कधी रुना लैला ,गुलाम अली यांच्या तलम आवाजातल्या जीवाच्या ठाव घेणाऱ्या गझल. डायनिंग टेबलवर ठेवलेले शेंगदाणे ,तळलेला लसूण आणि अर्धवट संपलेलं बाबांचं ड्रिंक ... आमच्यासाठी हे रोजचंच वातावरण ...मी माझा भाऊ आणि आई तिथेच बाबांशी गप्पा मारत तिथेच आजूबाजूला बसलेलॊ साहित्य , जुनी हिंदी गाणी असे अभिजात विषय ...सोबत शेरोशायरी, कविता तर बाबांच्या मुखोद्गत, मध्येच लहर आली कि एखादी सुंदर कविता सगळे मिळून जोरजोरात म्हणत असू यात बोरकरांच्या कविता आघाडीवर "मंद मंद वाजत आली तुझी गो पैंजणा ","डाळिंबीची डहाळीशी नको वाऱ्यासवे झुलू" अशा अगदी मुखपाठ. बाबा स्वतः एक उत्तम लेखक ,कवी त्यामुळे ते सतत काहीतरी लिहीत वाचत असत. कविता लिहून झाली रे झाली की लगेच आम्हाला समोर बसवून त्यांच्या खास लकबीत वाचुन दाखवत. एखादा लेख किंवा कविता सुचत असेल तर बाबांच्या दोन खोल्यांमधल्या येरझाऱ्या खूप वाढायच्या आम्ही कंटाळून कधी काय हे बाबा? असं म्हटलं तर म्हणायचे ,"अरे माझ्या प्रसवकळा आहेत ह्या ". अमृता प्रीतम ,गुलजार ,कैफी आझमी अशी अनेक मोठी नाव आम्ही सतत आणि सहज ऐकत होतो . ड्रिंक्स घेणारे बाबा कधी त्रासदायक ,भयानक वागले नाहीत उलट ते अधिक तरल व्हायचे. तेव्हा कानावर पडलेल्या त्या गझल्स खूप खोल मनात रुजलेल्या आहेत, कधीकधी माझ्या स्वप्नात कोणतीही घटना घडत असो बॅकराउंडला एखादी गझल चालू असते.. " मेरे हमनफस मेरे हमनवा ", "रंजीश ही सही " घरात पुस्तकांचा अमाप संग्रह ,अतिशय दुर्मिळ, अभिजात आणि बाबांनी अट्टाहासाने जमा केलेली ८ ते १० हजार पुस्तकं . तुम्ही कुठलही पुस्तक, कुठलीही कविता, कुठलीही ओळ विचारा बाबा एका मिनिटात ते काढून द्यायचे . मी तर त्यांना एखाद्या परीक्षार्थी मुलासारखं रोज चार पाच तास लिहिताना वाचतांना पाहिलंय.
आमच घरही आईबाबांनी फार प्रेमाने बांधलेलं ,सजवलेलं .त्या घरात तीन रूम्स स्लॅबच्या होत्या आणि एक रूम मुद्दाम माळवदाची बनवलेली जुन्या घरांचा फील येण्यासाठी आणि एका रूमला पत्रे टाकले होते ,बाबा म्हणायचे पत्र्याच्या खोलीत पावसाचा अनुभव खूप छान येतो. घराच्या पश्चिमेला सगळी सुगंधी फुलाची झाडं लावलेली चमेली,जुई,जाई ,मोगरा, रातराणी कारण वारा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतो. या सर्व वेलींना मांडव घातलेले आणि त्यांच्याजवळ एक शिडी ठेवलेली माझ्यासाठी, "माझ्या सोन्याला कळ्या तोडायला सोप्प जावं म्हणून" घरासमोर चाफा ,पारिजात अशी फुलांचा सडा टाकणारी झाडं. त्यात भर बहाव्याची गेटच्या दोन्ही बाजूला दोन जणू स्वागतासाठी उभे .परसदारी सगळी फळझाडं सोबत केवडा, बकुळ, कदंब अशी शोधून आणलेली दुर्मिळ झाडं . गुलाबांच्या तर कितीतरी जाती .अंगणाच्या एका कोपऱ्यात मला आणि माझ्या भावाला खेळण्यासाठी केलेला वाळूचा मोठा चौकोन. हापशाजवळ लावलेला चमकोरा,पुदिना . घरासमोर केलेले लिलीचे ताटवे .कॅक्टसचंही खूप छान कलेक्शन आणि त्याला लावायला केलेली छोटी टेकडी . सुगंधाने भारावून टाकणारा मरवा . कृष्णकमळ ,मधुमालती अशा झाडांनी आमचं घर झाकून टाकलं होत. या सगळ्या झाडांशी आमचं स्पेशल नातं होत . बागेत एखाद्या पक्ष्याने घरटं केलं की आमच्या आनंदाला पारावार उरायचा नाही. दर रविवारी आई बाबा आम्हाला घेऊन बागकाम करायचे. प्रत्येक झाडाविषयी खूप माहिती ते आम्हाला सहजच सांगत असत. बाबांनी खूप ठिकाणाहून जमा केलेले दगड ,गारगोट्या आमच्या व्हरांडाभर पसरलेल्या होत्या. त्यात मला काष्ठशिल्पांचा नाद लागला आणि व्हरांड्यात त्यांचीही भर पडत गेली . काष्ठशिल्प शोधत आम्ही कधी लक्कडकोटला (लाकूड कापण्याचा कारखाना ) जायचो . बाबा तिथल्या माणसाला त्याच्याच भाषेत सांगायचे "कोई ऐसा वल्ली फल्ली लकडी दिखा ना तो रख दो हमारे लिये "
खाण्यापिण्यातली रसिकताही तशीच... कुठेही चांगला पदार्थ खाण्यात आला की आवर्जून आम्हाला तिथे नेऊन खाऊ घालायचे . त्यांच्या कॉलेजच्या कँटीनला कधी बटाटेवडा फक्कड जमून आला असेल तर लगेच पार्सल चपराश्यासोबत घरी पाठवून द्यायचे . प्रत्येक गोष्टीच प्रचंड सेलेब्रेशन असायचं. साधा क्षणही सुंदर बनवण्याची कला होती त्यांच्यात. सुट्टीच्या दिवशी तर बागकाम झालं कि दुसरा चहा पिण्याचे बहाणे ,त्यावर रचलेले गाणे जोरजोरात म्हणून आईला भंडावून सोडायचो. घरात वातावरण एकदम मस्त ,मनमोकळं. आम्ही चौघे एकमेकांचे चांगले मित्र होतो. कुठलीही प्रतिक्रिया, मतभेद बिनधास्त मांडून मोकळे व्हायचो. बाबा गमतीने म्हणायचे, आमच्या घरात चार वेगळे देश आणि त्याचे चार वेगळे झेंडे आहेत.मनात आलेली कुठलीही गोष्ट बोलायला आम्हाला कधी टेन्शन वाटायचं नाही. आम्ही एका छोट्या गावात राहत होतो ,तिथे बाहेर जेवायला जाण्यासारख्या, फिरण्यासारख्या जागा नव्हत्या तरी आम्ही कित्येक तासांचा प्रवास करून हॉटेलिंग,चांगले चित्रपट ,पर्यटन करायला जात असू . रसिकता आणि अभिजात आवडी निवडी यांचे संस्कार सहजतेने पण खोलवर होत गेले. आमच्या योग्य वयात आम्हाला कोणती पुस्तकं वाचायला द्यायला हवीत याबद्दल बाबा फार जागरूक होते. त्यांनी माझ्यासाठी आणलेलं पहिलं पुस्तक म्हणजे विंदाचं 'राणीचा बाग 'नंतर 'तोत्तोचान','एक होता कोर्व्हर ', प्रकाश संताचं 'वनवास ', 'पंखा 'असं उत्तम बालसाहित्यापासून ते 'वयात येतांना ' इ . पुस्तकं ते आवर्जून वाचायला लावत.
माझ्या अठराव्या वाढदिवसाला बाबा अगदी हळवे झाले होते .संध्याकाळी आईबाबा माझ्याशी बोलत बसले. त्यांच्या मनात ते खूप दिवसापासून काय बोलायचं याची तयारी करत असावेत . "सोन्या आज तुला अठरा वर्षे पूर्ण झाली. कायद्याने तू आता सज्ञान आहेस. आयुष्याचे सगळे निर्णय तू आता घेऊ शकतेस. तुझ्या मनाप्रमाणे जोडीदारही निवडू शकतेस. तुझ्या आयुष्यातल्या एका सुंदर पर्वाला सुरुवात झाली आहे आणि आता आपण मित्र आहोत. कधीही मनापासून कोणी आवडलं तर आम्हाला सांगायला संकोचू नकोस.त्याचा जात धर्म या कशाचाही विचार न करता आम्ही तुझ्या पाठीशी उभे राहू ".या बोलण्याने त्यांनी मला प्रगल्भ बनवलं होतं . मी माझं आयुष्य नेहमीच खूप उत्स्फूर्तपणे जगले. माझ्या आयुष्याची जबाबदारी आता माझीच आहे ही गोष्ट खूप आत्मविश्वास वाढवणारी होती. पुढे माझ्या भावाच्या लग्नाच्या वेळी कोणीतरी म्हणालं "कमाल आहे तुमची आंतरजातीय लग्न स्वीकारण्याची " तर बाबा म्हणाले "त्याचा आंतरजातीय नाही प्रेमविवाह आहे. "
आम्ही पुण्याला शिकायला गेलो तेव्हा आईबाबा आणि घराशिवाय दूर राहणं फार वेदनादायी होतं . तेव्हा S T D वर रात्री ८ ते ११ कमी पैसे लागायचे. मी रोज घरी फोन करायची . आईबाबांना सांगायच्या गोष्टींची यादी भलीमोठी असायची. दूर राहण्याचा सगळ्यात सुंदर परिणाम म्हणजे आम्ही एकमेकांना पत्र लिहू लागलो . पानच्या पान खरडली जायची पण विषय संपायचे नाहीत. मी इंग्लिश लिटरेचर स्पेशल घेतलं मग तर बाबाना साहित्याचं एक नवं दालनच उघडलं. साहित्याच्या वैश्विक भाषेशी ते सहजच जोडल्या गेले. पुढे मी लिहायला लागले तेव्हा बाबांच्या आनंदाला पारावार उरला नाही. एकदा माझा एक लेख पेपरात छापून येणार होता. तो केव्हा येईल हे निश्चित नव्हते. बाबा एका महत्वाच्या कामासाठी दुसऱ्या गावी निघाले होते. ट्रेनमध्ये पेपर वाचतांना त्यांनी माझा लेख पहिला. तेव्हा मोबाईल नव्हते .बाबा सरळ ट्रेनमधून उतरून मला तो लेख दाखवायला घरी आले तेव्हा मी थक्क झाले त्यांची excitement पाहून.
मी तेव्हा थर्ड इयरला होते. सुट्ट्यात घरी होते बाबांच्या कॉलेजमध्ये इंटरव्ह्यू सुरु होते. त्यासाठी एक मुलगी आली होती माझ्यापेक्षा काहीच वर्षांनी मोठी . तिची आई माझ्या बाबांना ओळखत असल्याने तिच्याजवळ त्यांनी बाबांसाठी एक पत्र दिलं होतं पत्रात “माझ्या मुलीचे तुम्ही लोकल गार्डियन व्हा आणि जमेल ती मदत करा "असं लिहिलं होतं. ही मुलगी आपल्या नवऱ्यापासून वेगळी झालेली होती आणि तिला एक छोटी मुलगी होती. आईबाबा कायम कोणाच्याही मदतीला तयार असत . पुढे तिचं नोकरीच काम झालं आणि ती कॉलेजमध्ये रुजू झाली. आई तिला घरी येत जा ,एकटं वाटू देऊ नकोस असं सांगायची.तिच्या छोट्या मुलींसाठी घरात नेहमी एक बरणीभर चॉकलेट्स असायचे. पुस्तकं वाचण्यासाठी ,संदर्भासाठी ती घरी येऊ लागली. मी तेव्हा एम.ए. करत होते. माझ्या वडिलांचे वडील माझे आजोबा वारले. आजी अगदी धक्क्यात होती. एवढ्या वर्षांच्या सहजीवनानंतर एकटं राहणं तिला सहन होत नव्हतं . मग आईने तिच्याजवळ जाऊन राहण्याचा निर्णय घेतला.मी आणि भाऊ पुण्यात असल्यामुळे बाबा आता एकटेच होते ते आई आणि आजीला भेटायला जात असत.
ती मुलगी नंतरही आमच्या घरी येतच होती पण सगळेच तिला ओळखत असल्याने काहीच वेगळं वाटलं नाही.नंतर एक दिवस आमच्या एका शेजाऱ्यांचा आईला फोन आला आमच्या घरात काही गैर गोष्टी चालू आहेत असं सांगितलं. आईने त्या फोनची दखल न घेता पुन्हा माझ्या नवऱ्याविषयी असं बोलू नका म्हणून सांगितलं. आई तिच्या नोकरीत आणि आजीला सांभाळण्यात व्यस्त होती. बाबा आणि ती मुलगी यांच्यात नॉर्मल संबंध नाहीत असं सांगणारे आता बरेच जण भेटायला लागले. मग आईने बाबांना सरळ विचारलं तर मी तिचा पालकच आहे अशी त्यांनी खात्री दिली. कॉलेजमध्येही त्या दोघांचं वागणं सगळ्यांना खटकत होत. आईला बरेच जणांनी घरी परत यायला सांगितलं. आई परत आली तोपर्यंत परिस्थिती फार बिघडली होती. आईचा तर विश्वासच बसेना. त्या मुलीलाही तिने सरळ जाब विचारला तर ती उद्धटपणे म्हणाली,"मी तुम्हाला स्वीकारू शकते तर तुम्ही मला का नाही ?"आईचा बी. पी. लो झाला, तिला ऍडमिट करावं लागलं. आम्ही सगळेच आता धक्क्यात होतो. आमच्या सुंदर चौकोनी कुटुंबाला ग्रहण लागलं होतं.एखाद्या पोरवयातल्या मुलाने वागावं तसं बाबांचं वागणं आमच्या मनातल्या त्यांच्या प्रतिमेला न शोभणार होत. आम्हा सगळ्यांची जराही पर्वा न करता ते तुफानासोबत वाहत चालले होते. सुरुवातीला आम्ही सगळे त्यांना बसून नीट समजावून पाहत होतो. ही गोष्ट किती दूरवर वाईट परिणाम करू शकते ,आम्हाला सगळ्यांना दुखावून तुम्ही कोणतं असं सुख मिळवणार, हे तात्पुरतं आकर्षण आहे यातून काही चांगलं होऊ शकत नाही असं सगळं त्यांना आम्ही समजावून सांगत होतो .ते मात्र काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.आईची अवस्था तर फार वाईट होती.तिच्या इतक्या वर्षांच्या सहजीवनानंतरचा विश्वास चक्काचूर झाला होता. इतक्या वर्षांनी एका निवांत आयुष्यात एक वादळ आलं होत. बाबा रिटायर्मेंटच्या वयात पोहचलेले होते आणि आमचे शिक्षण पूर्ण होत आले होते. एका छताखाली राहताना आईबाबांची कसरत होत होती. नात्यातली विश्वासाची गुंफण आता शिल्लक नव्हती.कॉलेजमध्येही या दोघांच्या वागण्याला कंटाळून त्या मुलीला काढून टाकण्याचा निर्णय कॉलेज कमिटीने घेतला. बाबांनी खूप त्रागा केला. आम्हाला थोडं हायस वाटलं पण हा काही शेवट नव्हता...
त्या मुलीचे आईवडीलही एका वयस्कर माणसासोबतच्या तिच्या नात्याच्या विरोधात होते. दोन्ही घरात कल्लोळ माजला होता.बाबांनी त्या मुलीला आपल्या ओळखीने दुसऱ्या एका गावी नोकरीला लावून दिले. आणि आता त्यांच्या तिकडे चकरा सुरु झाल्या . कुठल्याही विरोधाला ते जुमानत नव्हते. आई फार हतबल झाली होती. इतकी वर्षे आम्हाला शिकवलेल्या तत्वांना ते स्वतःच मुरड घालत होते. खोटं बोलणं तर इतकं वाढलं कि त्यांची सगळी विश्वासार्हता संपून गेली. आमच्यावर इतका जीव ओतणारे बाबा इतके परके वाटू लागले. बाबांचं पिणं आता खूप वाढलं होतं.एकटे रूममध्ये बसून ते ड्रिंक घेत. त्यांचं कधीही न पाहिलेलं भयंकर रूप आता बघायला मिळू लागलं. आईशी भांडण वाढली. दोघांमध्ये सारखे खटके उडू लागले. त्यात आम्ही दोघे तिथं नाही त्यामुळे खूप काळजी वाटायला लागली. परिस्थिती इतकी तणावग्रस्त होती की आईला मारहाण तर होणार नाही ना याची काळजी वाटायला लागली. रोज सकाळी उठताच मी आईला फोन करत असे ती ठीक आहे ना एवढच मला जाणून घ्यायचं असायचं.
बाबा रिटायर झाले आणि त्यांनी आपण आता नेहमीसाठी त्या मुलीकडे राहायला जाणार असं जाहीर केलं. सगळं माहित असूनही तो क्षण खूप कठीण होता. आत्तापर्यंत साम दाम दंड भेद सगळं वापरून झालं होत आमचं.आता आमच्या नात्याची शप्पथ घालून त्यांना थांबवणं शक्य नव्हतं. एक व्यक्ती म्हणून कुठलीही सक्ती करणं पटत नव्हतं, त्यांनी बाय चॉईस आम्हाला निवडायला हवं होत. मागील काही वर्षात आम्ही सगळे इतक्या तणावातून गेलो होतो की, कुठल्या टोकाला जाण्यापेक्षा शांतपणे वेगळं होऊन नात्याची पुढची विटंबना थांबवणं आवश्यक होतं . आनंदाच्या प्रसंगात एकमेकांविषयी वाटण खूप स्वाभाविक पण माझ्या आईने दाखवलेली प्रेमाची वेगळी छटा माझ्या कायम लक्षात राहील. आईचे नातेवाईक बाबांवर कायदेशीर कार्रवाही करावी असं सुचवत होते पण आई म्हणाली ,"ज्या माणसावर मी इतकं प्रेम केलं त्याला त्रास देऊ इच्छित नाही. "
बाबा खरचंच घर सोडून निघून गेले...
आमच्या सगळ्यांच्या डोळ्यांमधून कित्येक लिटर पाणी वाहील असेल. त्या दिवशीनंतर एकही दिवस आम्ही १०० टक्के आनंदी होऊ शकलो नाही. आयुष्यात कायम एक अपूर्णता राहिली. कित्येकदा स्वतःला बाबांच्या जागी ठेवून पाहते आणि विचार करते कोणती अशी गोष्ट आहे जी मला माझ्या कुटुंबाच्यापेक्षा मोलाची वाटेल? उत्तर एकच "कोणतीच नाही". ज्या बाबांशिवाय कधी जगू असं वाटत नव्हतं त्यांचं आज कित्येक वर्षांपासून तोंडही पाहिलेलं नाही.
सिल्विया प्लाथ या कवियत्रीची एक कविता आठवते -
Daddy, I have had to kill you,
you died before I had time
Marble heavy, a bag full of God,
Ghastly statue with one gray toe,
Big as a Frisco seal...
प्रेम आणि तिरस्काराची एक संमिश्र भावना. आपण काढून टाकतो एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून आणि ती भेटत राहते आपल्याला आपल्याच सवयीतून ,बोलण्यातून,संवेदनेतून, आठवणीतून.... मन कित्येकदा पेटून उठत बाबा का केलत असं तुम्ही?
आयुष्याच्या इतक्या उशिरा त्यांनी उचललेल्या पावलाचा क्षणोक्षणी भोग भोगतोय आम्ही . आईसाठी तर काय लिहू एका दिव्यातून जातेय ती. उतारवयात माणसाला सोबतीची जास्त गरज असते म्हणतात . या वयात हे एकटेपण तिच्यावर लादलं गेलं. सार्वजनिक जीवनात अनेक प्रश्नांना, प्रसंगांना तिला सामोरं जावं लागतं. मी आणि माझ्या भावाने तिला आमच्याकडे निघून यायला सांगितलं तर तिने ते मान्य केलं नाही, ती म्हणते ज्या गावात मी सून म्हणून आले आमचा संसार थाटला एक विश्व उभं केलं तिथून मी पळून जाणार नाही. तिचं एकटेपण आम्ही काही केलं तरी भरून काढू शकत नाही. आईची काळजी करता करता कधी मी तिची आई झालेय असं मला वाटू लागलं मला कळलंही नाही . अतिशय समजूतदारपणा दाखवत मी तिला आता तुझं आयुष्य तू वेगळ्या स्पिरिटने जग असं सांगत असे. पण एक दिवस बाबांच्या एका मित्राकडून आम्हाला बाबांबद्दल कळालं की "त्यांना मुलगी झाली... "प्रचंड धक्का बसला मला एखाद्या मूर्तीसारखी कितीक वेळ मी बसून होते. डोळे कोरडे आणि डोकं सुन्न झालेलं . आज पहिल्यांदा मला आईची वेदना खऱ्या अर्थाने कळली होती. बाबांनी आधी आईच स्थान कोणाला तरी देऊ केलं होत. आज मात्र माझ्या स्थानाला धक्का लागला होता. बाबांची मी पुम्मूशी परी असा कित्येक वर्षांचा बाळगलेला अभिमान क्षणात तुटून पडला. नंतर कित्येक दिवस मी सारखी रडत होते. यानंतर त्यांचं कधीही ना घ्यायचं नाही असं ठरवलं. आता आयुष्यात मला कोणत्याच घटनेने एवढा धक्का बसत नाही . "मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही "यासारखं फोल वाक्य या पृथ्वीतलावर नाही. कुटुंब म्हणजे तेच जिथे एकाच्या कृतीने दुसऱ्याला प्रचंड फरक पडतो. बाबा कोणत्या सुखाच्या शोधात निघाले होते आणि त्यांना ते मिळालं का नाही हे त्यांचं त्यांनाच ठाऊक पण आमच्या मनातलं, समाजातलं आदराचं स्थान ते कायमच गमावून बसले आहेत. माझं हे दुःस्वप्न अजूनही चालू आहे आणि बॅकराउंडला एक गझल चालू आहे ...
फासले ऐसे भी होंगे ये कभी सोचा न था
सामने बैठा था मेरे और वो मेरा न था ।
प्रतिक्रिया
21 Sep 2017 - 9:44 am | माहितगार
राजा हरीश्चंद्राला किंवा शिबी राजाला असा आक्षेप घेण्याचा नैतीक अधिकार नक्कीच असेल. चर्चीत व्यक्तिची स्खलनशीलता मान्यच आहे. पण कमिटमेंटच्या बंधनांचा हवाला देणार्या नात्यांचा कमिटमेंटचा हवाला देणे संपुर्णतः नि:स्वार्थी असतेच असे म्हणता येते का ? राहीला भाग कमिटमेंटचा, एकदा कमिटमेंट घेतली की माणूस (स्त्री असो वा पुरुष) सबंध आयुष्यासाठी वेठबिगार म्हणून राबवलाच पाहीजे का ? माणूस माणूस आहे की रोबोट ? नवनवीन आकर्षणे वाटणे मानवीय आहे मग ते पुरुषाचे असो वा स्त्रीचे असो कबुल न करणारे नितीरक्षक ! आणि कबुल करणारा पापी ? निती माणसांसाठी आहेत का माणेसे नितीसाठी ?
एखादा वैवाहीक बंध आटोपता घेण्याची इच्छा झाल्यास घटस्फोट घेण्याची कायद्याने सुविधा दिली आहेच . जर चर्चित व्यक्तिने कायदेशीर दृष्ट्या वैध पद्धतीने घटस्फोट घेतला असता आणि मग दुसरा विवाह केला असता. उद्देशात स्वार्थ असो वा परमार्थ समाजाला तो आजच्या काळात तरी स्विकारावाच लागतो ? इथे आधीच्या व्यक्तिला न नाकारता -हि प्रस्थापित सांस्कृतीक जबाबदारी आहे म्हणून - अजून एका व्यक्तिला जिवनात प्रवेश देतो आहे -प्रस्थापित संकेतांच्या विरोधी असेल पण त्या व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वांतत्र्याचा तो हक्कदार आहे हे इथे लक्षात घेतले जावयास हवे की नको ?- तेही जबाबदार्या न टाळता, म्हणजे आधीची कमिटमेंट पाळणे आणि वर अधिकची कमिटमेंट घेणे हा गुन्हा ठरतोय.
चर्चित व्यक्तिने घर माझे आहे मी नविन व्यक्ति या घराचा अविभाज्य भाग आहे, हे ठणकावून सांगितले तर काय करता आले असते ? मान्य आहे की स्वातंत्र्योत्तर भारतात बहुपत्नी विवाह कायद्याने रद्द बादल होण्याचा स्त्रीयांना फायदा पोहोचला तो तसा पोहोचावयासही हवा होता. पण दोन वस्तुस्थिती तरीही डोळेझाक करता येत नाहीत पहिले कायदे माणसांसाठी असतात माणसे कायद्यासाठी नव्हे आणि या बाबतीत अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या सीमांची कसोटी कुणी घ्यायचीच ठरवले तर फाशीवर चढवण्या एवढा देशद्रोहपण नव्हे, दुसरे बहुपत्नी विवाहाचे प्रमाण विरळ झाले असले तरी लाखभर कुटूंबात एखादे त्रिकुट -अनधिकृत असले तरीही - पहाण्यात येतेच (मी बाहुसंख्यांकांबद्दलच बोलतो आहे) आणि कुरकुरत का होईना ते समाज स्विकारतो.
माझा मुख्य मुद्दा काय आहे की पालकांच्या आपापसातील निष्ठा बदलल्या तरीही पाल्यांच प्रत्येक पालकाप्रतीच नातं मर्यादेबाहेर तुटू नये ते प्रशस्त नाही. भारतीय संस्कृतीत दशरथ एका पत्नीच्या अधिक आहारी गेला तरीही पाल्यांनी त्याचा आदर करणे आणि अगदी कैकैचाही आदर करणे' हे आजच्या काळाच्या दृष्टीने एक मागे पडलेले टोक झाले असे समजले तरीही समजा दशरथ कौसल्येकडून कैकैकडे गेलाच तरी आजच्याही काळात दशरथ आणि कौसल्येने आपापसातील न पटण्याची सावली मुलांवर पडू देणे आणि मुलांनी स्वतःवर पाडून घेणे भावबंधाच्या जपणूकीच्या दृष्टीने रास्त ठरते किंवा कसे ? मग भले कौसल्येला सोडून कैकै कडे जाणारा आजच्या काळातला दशरथ रामासारखा एकपत्नी एकवचनी पुरुषोत्तम भले नसेल.
थोडी आधूनिक काळातील उदाहरणे घ्यायची झाली तर डॉ. द्वारकानाथ कोटणीस त्यांनी भारतात संसार होता तरीही चीन मध्ये ऐन युद्धकाळातील परिस्थितीतही वेगळा संसार थाटला आणि ते हयात नसतानाही दोन्ही देशातील पिढ्या एकमेकांशी स्थलकालाच्या मर्यादा पार करून जुळवून घेताना दिसतात. अगदी अलिकडे स्त्रीवादाच्या दृष्टीने कितीही आदर्श नसला तरी डोनाल्ड ट्रंपची आधीच्या बायको पासूनची मुलगी डोनाल्ड ट्रंपशी जुळवून घेतेच आणि त्यातील सांपत्तीक आकर्षणे नसली तरीही एक पिता आणि एक मुलगी (किंवा एक मुलगा) यांचे भावबंध (आईवडील एकमेकापासून दुरावले तरी) जुळलेले का राहू नयेत .
समजा लेखिकेचा पिता दुसर्या स्त्री सोबत न जाता एकटाच इतर कारणानी पत्नीशी न पटून वेगळा जाऊन राहीला असता तर लेखिकेने पित्याशी संबंध नक्की म्हणजे नक्की तोडले असते का ?
एक व्यक्ती दुसर्या व्यक्तीपासून दुरावण्याची असंख्य कारणे असू शकतात- दुसर्याशी जाऊन विवाह करेल असे नव्हे समजा नुसताच जाऊन वेगळा एकटाच राहील - होऊच नये पण, उद्या समजा लेखिका आणि त्यांच्या पतींना कोणत्याही कारणाने एकमेका पासून दुरावले तर त्या दुरावण्याची सावली पाल्याअर पडू देणे रास्त होते का ?
20 Sep 2017 - 11:02 pm | माहितगार
आधीची जबाबदारी नाकारली तर संवेदना संपली म्हटता येते नाकारली नसेल तर संवेदना संपली असे म्हणता येते का ? अजून एक विचार जो माझा नाही - एका पुस्तकातून उचलेगिरी केलेला आहे.
"..प्रत्येक पुरुषाला वाटते आपण स्त्रीच्या जिवनातील पहिलाच पुरुष असावे आणि प्रत्येक स्त्रीला वाटते आपण पुरुषाच्या जिवनातील शेवटची स्त्री असावे..पण प्रौढ व्यक्तींच्या बाबतीत अशी हमी कशी देता येईल" या वाक्यात म्हटले तर फूलप्रुफ कमिटमेंटचा अभाव आहे; पण त्याच वेळी अपवादात्मक पुरुषोत्तम असल्याची ओढून ताणूनची ढोंगबाजी नाही. पर्सनल कमिटमेंटच्या तत्वावर वाक्य टिकणारे नाही तरीही अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या कक्षेबाहेरही जात नाही.
विवाहातल्या काही वर्षानंतर एकमेकात फक्त दगडातला देव दिसत असेल तर त्या नात्यातला देव दिसतो दगड दिसत नाही असे कुणाला वाटणे रास्त असू शकते का ? एखाद्या व्यक्तीचा पिंडच बंडखोरीचा आहे अशा एखाद्या व्यक्तिसाठी अभिस्वातंत्र्याचा जाहीरनाम त्याच्या जिवनाचे मुल्य असू शकते का ?
21 Sep 2017 - 3:16 am | Duishen
.....त्यावेळेस सामाजिक संवेदना.... यामध्ये 'संवेदना' हा इन्व्हर्टेड कॉमा मधे मी लिहिणे गरजेचे होते... ती संवेदना नसून एक सामाजिक भीतीच असणार, समाजाच्या विरोधात न जाण्याची भीती असू शकते जी आजही सर्व भारतीय समाजात मोठ्या प्रमाणावर विवाहाच्या संदर्भाने पाहायला मिळते.
बंडखोर (रॅडिकल) आणि अपराधी हे दोघेही समाजाचे कायदे आणि प्रचलित नीती धाब्यावर बसवणारे दिसतात... मग व्यक्ती अपराधी की बंडखोर कसे ठरणार? ....,,,त्यांचे हेतू बघून आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे दूरगामी परिणाम बघून,..बंडखोर व्यक्ती ती, जी आजचा त्रास सोसून इतरांना भविष्याचा, सुखाचा मार्ग निर्माण करते आणि अवांछित प्रथा बदलून सर्वसमावेशक प्रथांना मोकळी वाट करून देते...तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य लागू पडते...
बंडखोरीचे एक उत्तम उदाहरण... - सावित्रीबाईना मुल होत नाही मग माझ्यात समस्या असू शकेल असे म्हणणारे महात्मा फुले बंडखोर; मी तिला सवती आणण्यापेक्षा मला सवता आणणार का असे १५० वर्षापूर्वी विचारणारे फुले बंडखोर; प्रचलित परंपरेला अनुसरून दुसऱ्या लग्नाचा निर्णय न घेता मुल दत्तक घेणारे आणि तेही एका विधवेचे आणि तेही जाती बाहेरच्या... हे बंडखोरीचे लक्षण.. उक्ती आणि कृती मधील समन्वय हे खरे अभिव्यक्ती स्वातंत्र्य... अन्याय्य प्रथेला आव्हान देऊन न्याय प्रथेचे वागणुकीतून उदाहरण घालून दिले.. बंडखोर लोक सामाजिक मुल्ये बदलतात... अपराधी मात्र फक्त मुल्ये धाब्यावर बसवतात...
21 Sep 2017 - 3:42 am | पिलीयन रायडर
तुमचे सगळे प्रतिसाद आवडले.
21 Sep 2017 - 11:03 am | माहितगार
काही बंडखोरी स्वतःसाठी आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या कक्षेत बसणारी असू शकत नाही का ? त्यांनी अधिकृतपणे घटस्फोट घेतला तरीही तुम्ही त्यांना अपराधीच ठरवू शकताच नाही का ? तेच स्त्रीने स्वतःसाठी घटस्फोटासाठी पुढाकार घेतला तरीही स्त्रीला सामाजिक स्त्री दाक्षीण्याचाही आणि स्त्रीवादाचाही फायदा मिळतो. पण पुरुषाने अधिकृतपणे घटस्फोटजरी घेतला तरीही समाज त्यांना अपराधी ठरवण्यात धन्य मानत राहील - कारण काय तर त्यांनी समाजासाठी नाही स्वत:साठी घटस्फोट घेतला. असा समाज जो वाघ म्हटलातरी खातो आणि वाघोबा म्हटला तरी खातो त्या समाजाची अभिव्यक्तिस्वातंत्र्य स्वतःसाठी जोपासू इच्छिणार्या व्यक्तिने कशासाठी म्हणून पत्रास ठेवावी असाही मुद्दा त्यांच्या बाजूने शिल्लक राहतोच
20 Sep 2017 - 8:13 pm | राघव
उत्कट आणि तेवढंच कठोर.
अधिक लिहिण्याची ईच्छा खरंतर खूप आहे, पण ते सध्या संयुक्तीक होईलसं वाटत नाही.
तुम्हाला परत आनंदी राहायची मनापासून ईच्छा व्हावी असं मात्र मनापासून वाटतं. तेवढं व्हावं.
राघव
20 Sep 2017 - 9:17 pm | मिसळ
_^_. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!!
20 Sep 2017 - 9:48 pm | मोदक
तुम्हाला परत आनंदी राहायची मनापासून ईच्छा व्हावी असं मात्र मनापासून वाटतं. तेवढं व्हावं.
हीच भावना मला सुरूवातीला शब्दात मांडता आली नाही..!
धन्यवाद राघव.
21 Sep 2017 - 12:47 am | आनंदयात्री
>>तुम्हाला परत आनंदी राहायची मनापासून ईच्छा व्हावी असं मात्र मनापासून वाटतं. तेवढं व्हावं.
खरं आहे.
22 Sep 2017 - 7:27 pm | अजया
21 Sep 2017 - 1:20 am | Naval
सगळ्याच प्रतिक्रियांच खूप मनापासून स्वागत! हा सगळा उहापोह वाचून एक वाचक म्हणून खूप आनंद मिळाला. कुठलही वेगळ मत ऐकायची तयारी नसती तर फक्त डायरी लिहून मोकळी झाले असते. एकदा लिहून झाल की ते फक्त आपल उरत नाही हे खर...खूप धन्यवाद!!
21 Sep 2017 - 1:37 pm | माहितगार
दोन्ही कारणांनी एकतर माझा वेळ वाचावा आणि दुसरे लेखकांच्या मतांचा अवाजवी प्रभाव माझ्यावर न पडवा म्हणून लेख/लेखन उलट्या दिशेने वाचतो आणि चिकित्साही विरुद्ध दिशेने करतो.
तत्पुर्वी हा धागा लेख मिपावर नंतरही राहील, तरी काही विशेष कारण झाल्याशिवाय कोणत्याही चर्चेत राहण्याचा सर्वसाधारण काळ बराच मर्यादीत असतो. हि-किंवा ती मते मांडणारी मंडळी नंतर पुढचा विषय चघळायला घेतील किंवा आपापल्या कामाला लागलेली असतील. बाकी कोण व्यक्ती व्यक्तिगत जिवनात कोणती नाती कशी जपतो किंवा धुत्कारतो याने वास्तवात आजू बाजूच्या जगास शष्प फरक पडत नसतो. व्यक्ती व्यक्तिगत जिवनात कोणतीही नाती जपणे (किंवा न जपणे) हा सर्वस्वी तुमचा निर्णय असतो आणि तो तसा असावयासही हवा.
आता धागा लेखाकडे येऊ, शेवटी दिलेल्या गझलेच्या सर्व ओळी मला माहित नाहीत जेवढे उधृत केले आहे त्यातील "सामने बैठा था मेरे और वो मेरा न था ।" हे खरेच ते तुमच्या एकट्याचे (?) होते तेव्हाही आणि नंतरही खरेच किती लागू पडते हे Revisit करण्यासाठी अद्याप बराच वाव असावा. मला काय म्हणावयाचे आहे ते आपल्याला उमगेल असे वाटते तरीही शंका वाटल्यास जरूर विचारावी.
21 Sep 2017 - 3:19 pm | माहितगार
तुमच्याच लेखाच्या पुर्वार्धात प्रत्येकाचा झेंडा वेगळा याचे कौतुक आहे आणि शेवट ....कुटुंब म्हणजे तेच जिथे एकाच्या कृतीने दुसऱ्याला प्रचंड फरक पडतो. याची सुसंगती काळाच्या ओघात तुम्ही लावण्यास स़क्षम असणार केवळ निर्देश करुन ठेवला म्हणजे झाले, असो.
प्रश्न जरा अवघड आहे. ज्याने तुम्हाला तुमच्या सुखाच्या स्वप्नांबाबत संकोचू नका असे सांगितले, कशाचाही विचार न करता आम्ही तुझ्या पाठीशी उभे राहू हे सांगितले . -यालाच आपल्या प्रेमाच प्रेम जिथे असे त्यावर प्रेम करणे म्हणतात ? - आणि पुढे शब्द पाठीशी राहून प्रत्यक्षात आणले. नाते इथून पुढे नाते मैत्रिचे आहे सांगितले, - पृथ्वी गोल असते म्हणतात- योगा योगाने त्यांच्या जिवनात नवे प्रेम आले आणि तुम्ही त्यांच्याकडून संकोचण्याची अपेक्षा केली ? त्यांना तुमच्या सुखात सुख वाटावयास हवे तुमच्या सुखाच्या निर्णयांचा आदर करावयास हवा पण त्यांनी त्यांचे सुख निवडले तर लगेच अनादरास प्राप्त होतात ? तेही आपल्या अनादरा सोबत जमेल तेवढ्या समाजातील लोकांच्या अनादराची भेट देऊन ? संस्कृती शुत्रुबुद्धी विनाशाय शिकवते हा तर तुमचाच माणूस होता ना ?
21 Sep 2017 - 3:53 pm | माहितगार
माझे इथले प्रश्न जरा हलकेच घ्या.
"मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही " हे तुमच्या घरी कोण कोणास उद्देशून म्हणाले याची माहिती लेखात नाही. जे काही असेल, "यासारखं फोल वाक्य या पृथ्वीतलावर नाही." हे आपल्याला आपल्या आईस सांगणे बहुधा कठीणच गेले असण्याची शक्यता आहे अथवा बहुधा सांगता आले नसेल हे समजण्यासारखे असू शकते. ह्या प्रतिसादाची प्रिंट दाखवावी असा दुष्टपणा ही करणे सुचवावे वाटत नाही पण वास्तव वास्तव नसते का ? महात्मा गौतम बुद्धही हे सांगत नाहीत का ? मग दु:ख कशासाठी ?
लेखाच्या पुर्वार्धात स्वतःच्या प्रगल्भतेकडच्या वाटचालीचे वर्णन आहे आणि मग "त्यांना मुलगी झाली... " याचा धक्का वगैरे कशासाठी बसावा ? ;) तुम्हाला आधिच एक भाऊ आहे तो तुमच्या पेक्षा लहान आहे अथवा मोठा माहित नाही. दोघांमध्ये तुम्हीच लहान असाल घरात नवे भावंड आके तर जरासा धक्का लहानपणी बसणे सहाजिक समजता येते. लहान भावंड घरात आल्यानंतर असे धक्के तर असंख्य मोठ्या भावांना बसतात पण ते त्यातून सावरत असतात आणि तुम्हीही सावराल अशी आशा आणि विश्वास आहे. तुमच्या आईला घरात नवी सून आली तरी तिच्या जागेला जरासा धक्का बसतच असतो, तुम्हाला वहिनी आली तरी तुमच्या जागेला जरासा धक्का बसलेलाच असतो तेच तुमच्या विवाहानेही आसपासच्या लोकांच्या जागेला जरासा धक्का बसणे सहाजिक असते. क्षणिक रुसवा, राग, जळफळाट हे सगळे मानवी आहे त्यात गैर काही नाही पण त्याचे तुम्ही कायम स्वरुपी दुश्वासात "फासले ऐसे भी होंगे" मध्ये रुपांतरण करता का ? नाही तर मग त्याही नात्याच्या बाबतीत मर्यादेच्या बाहेर दुं:ख्ख दुश्वास आणि फासले कशासाठी ?
21 Sep 2017 - 4:57 pm | माहितगार
इथे बर्याच जणांनी चर्चेसाठी वेगळा धागा काढण्याचे सुचवले. खरेतर आई सोबतच्या भावबंधांचा आढावा खुल्या मनाने घेतला जावा म्हणून अलिकडे वेगळा धागा काढलाही होता पण कदाचित मी पुरेसे डिटेल मध्ये व्यवस्थीत न लिहिल्यामुळे त्यावर चर्चा सहभाग आला नसावा असो.
आता पर्यंतचे या धाग्य्यावरचे चर्चा प्रतिसाद पाहीले बहुतांश समाज तुमच्याच पद्धतीने म्हणजे तुमच्या आई बद्दल सहानुभूतीनेच विचार करताना दिसतो आहे इथे तर सार्वजनिक जीवनात अनेक प्रश्नांना, प्रसंगांना तुमच्या वडीलांना जावयास लागण्याची शक्यता अधिक दिसते आहे. जवळपास प्रत्येकजण तुम्ही स्वतः लेखिका म्हणून रंगवताय त्यापेक्षाही अधिक तुमच्या वडीलांना जघन्य अपराधी ठरवून द्विगुणीत आनंद उपभोगताना दिसतो आहे.
वस्तुतः आपल्या आणि समाजाच्या प्रतिक्रीया आपण आणि समाज ज्या narrative ने प्रभावित आहे त्यातून येत असतात. आपल्या आणि समाजमनावरचा प्रभाव टाकणारा narrative प्रत्येकवेळी अचूकच असतो का ? मी आधीच्या एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे एकपत्नीत्वाची संकल्पना भारतात आदर्श फार पुर्वी पासून मानली गेली तरीही हिंदू कोड बीले पास होई पर्यंत बहुपत्नीत्वाची चाल भारतात पुरेशा प्रमाणात होतीच एकाच घरात एका पेक्षा अधिक स्त्रीया वावरतच असंत त्यात काही विशेष नव्हते. एक पत्नी राम, राधेचे प्रेम रंगवणारा कृष्ण, आणि बहुपत्नीक खंडेराया या तिन्ही प्रतिमा सारख्याच आदराने भारतीय समाजाने स्विकारलेल्या होत्या. एक कायद्याचा प्रभाव दुसरे हिंदी चित्रसृष्टीतून प्रेमाच्या त्रिकोणांपेक्षा प्रेमाचे प्रमाण १:१ असले पाहीजे हा narrative अप्रत्यक्षपणे गेल्या बर्याच दशकात बर्यापैकी समाज मनावर बिंबवला गेला आहे का - आणि एकपत्नी राम पुरुषोत्तम ह्या संकल्पनेने तो अधिक चटकन स्विकारला गेला आहे का ?- आणि आपण, आपले निकटवर्तीय कुटूंबीय आणि आपणास सहानुभूती दाखवणारा समाज या narrative च्या प्रभावाखाली आहे असे म्हणता येते का ? हि विचार प्रणाली आदर्श असली तरीही एक मराठी लेखक त्यांच्या आत्मकथनात म्हणतात की दोन वयस्क मंडळी एकमेकांच्या संपर्कात आली आणि ती समजून उमजून एकमेकांच्या प्रेमात पडूही शकतातच ना ? आणि मग त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यास सामावून घेण्यासाठी या narrative मध्ये काही स्पेस हवा का नको ?
"मी तुम्हाला स्वीकारू शकते तर तुम्ही मला का नाही ?" ह्या वाक्याने तुमच्या आई दुखावल्या असतील तर त्या वाक्याचे स्पष्टीकरण आपण आपल्या नव्या आईकडून घेतलेत का ? तटस्थपणे विचार केला असता या वाक्या मागे खरेच ती स्ती स्वतः आहे का तुमचे वडील असू शकतात की जे तिला आपल्या सध्य पत्नीस स्विकारण्याची अट घालत असू शकतात ? शेवटी तुमच्या आईस महत्वाचे काय यावर सर्व अवलंबून होते असा याचा निष्कर्ष निघू शकणार नाही का ? वस्तुतः "मी तुम्हाला स्वीकारू शकते तर तुम्ही मला का नाही ?" हे वाक्य तुमच्या आईने नव्या स्त्रीस उद्देशून वापरता आले असते (इथे तुमच्या वडीलांबद्दल एक आदरार्थीच विनोद सुचतोय पण विनोंद न कळणार्या व्यक्तींच्या भावना दुखावू नयेत म्हणून बाजूस ठेवतो) किंवा अजूनही वापरले तर एकटेपणाचा सोडून जाण्याचा प्रश्न त्रिकोणी संसार स्विकारुन मार्गी लागू शकलाच असता किंवा अजूनही शक्यता का नाकारावी ? किंवा उलटपक्षी तुमच्या वडीलांप्रमाणे नवा संसार याही वयात थाटण्याचे त्यांचे स्वातंत्र्य का नाकारावे ?
आणि दोन्ही गोष्टी मान्य नसतील तर एकटेपण स्विकारण्याचा निर्णय स्वतःचाच असेल तर, 'क्षणोक्षणी भोग भोगतोय आम्ही' अशा तक्ररी न करता तुम्हीच तुमच्या लेखात म्हटल्या प्रमाणे नव्या स्पिरीटने आनंदाने एकटेपण साजरे का करू नये ? स्वतःस एकटेपण नको म्हणून जोडीदारावर वैवाहिक गुलामी लादण्याचा अट्टाहास कशासाठी ?
21 Sep 2017 - 5:18 pm | माहितगार
तुम्ही तुमच्या आईच्या ज्या प्रेमाच्या छ्टेचा उल्लेख केलात त्यास जरा आणखीही उदात्तता जोडता येतेच की, "ज्या माणसावर मी इतकं प्रेम केलत त्याच नव प्रेमही म्हटल तर स्विकारता येतच की, त्यासाठी तणावात राहीलेच पाहीजे असे काही नाही.
इथे तुम्ही व्यक्त झालात ते उत्तमच पण इथे बाकीचे ९ कोटी मराठी जन तुमचे वडीलच कसे अपराधी आहेत हे सांगून तुमचे सांत्वन करतीलही पण त्या तात्पुरत्या खर्या-खोट्या सहानुभूतीने तुमच्या दुख्खाचे सांत्वन खरेच होणार आहे का ? तुम्हीच म्हणता तसे तुम्हाला तुमच्या वडीलांना विसरणे शक्य आहे का ? मग वास्तव स्विकारून फासले वाढवण्यापेक्षा जमेल तेवढे अंतर कमी करण्याचा प्रयत्न आणि तुमच्या ग्रॅफॉलॉजी टिचरने दर्शवलेला तुमचा दुखावलेला I (अंह) बाजूस ठेऊन तुम्ही तुमच्या वडीलांना जमेल तेवढे स्विकारण्याचा मार्ग कायमस्वरुपी बंद करणे खरेच गरजेचे आहे का ?
त्यांचा निर्णय झाला तेव्हा तुम्ही १८+ होता म्हणून , हेच जर तुम्ही वयाच्या ८ व्यावर्षी असताना घडले असते तर न्यायालयाने पुढच्या दहावर्षात किमान २० वेळा तुमची आणि तुमच्या वडीलांची भेट घालून दिली असती नाही का ? तुमच्या वैवाहीक जिवनात कोणत्याही कारणाने अंतर आले (तसे होऊ नये ही सदीच्छा आहेच) तर त्याची छायेने कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीचे आपापसातील नाते ग्रस्त झालेच पाहीजे का ? मला वाटते या बद्दल आधीच्या प्रतिसादातून मी आधीच लिहिले आहे तेव्हा अधिक पुर्नावृत्तीत पॉईंट आहे असे नाही.
एका प्रतिसादकाने लिहिले आहे की तुम्ही आनंदात रहा म्हणजे झाले, माझेही म्हणणे तेच आहे ते होण्यासाठी तुमचे हे व्यक्त होणे अंशतः उपयूक्तच आहे पण अंशतःच तुमचे व्यक्त होणे पुर्णत्वास तुमच्या ह्या भावना तुमच्या वडीलांच्या पर्यंत पोहोचण्याने आणि परस्पर संवाद साधला जाऊन अंतर कमी होण्याने आनंद वाढू शकतो. दूर गेलेल्या पाखरांना घरटी नेहमीच उघडी असतात आणि असावीत.
त्यासाठी अनेक शुभेच्छांसह एक मिपाकर
21 Sep 2017 - 5:31 pm | स्रुजा
बास झालं आता. फार किस पाडलात. जरा भान ठेवा दुसर्यांच्या भावनांचं. दुसरी आई काय आणि प्रश्न काय. चवीने चघळायला दुसरं गॉसिप शोधा.
लेखिकेने यातल्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देऊन याला डिग्निफाय करु नये असं मला वाटतंय.
21 Sep 2017 - 6:14 pm | माहितगार
ओह एक सांगायचच राहील मला स्वतःला कोणतीच उत्तर नको आहेत . खर म्हणजे प्रश्न लेखिकेने स्वतःच स्वतःपुढे उपस्थित करण्यासाठी आहेत. आणि प्रश्न अथवा वेगळे विचार झेलण्या एवढा मोकळेपणा त्यांच्याकडे आहे असे म्हटल्यानंतरच प्रश्न केले आहेत. मनाचा खुलेपणा असेल तर त्यात असुरक्षीत वाटण्यासारखे काहीच नाही. लेखिका स्वतःच म्हणते की त्यांची 'कुठलही वेगळ मत ऐकायची तयारी आहे'. एकदा लिहून झाल की ते फक्त आपल उरत नाही हे खर..सगळ्याच प्रतिक्रियांच खूप मनापासून स्वागत!
वास्तव स्विकारण्याची भावना असुरक्षीत फिल करवत असू शकेल पण ते एकदा स्विकारल की त्यात असुरक्षीतता नाही असाही अनुभव येऊ शकतोच की. प्रत्येक गोष्टीकडे असुरक्षीतपणे नकारात्मकपणेच पाहीले पाहीजे असे नसावे बाकी ज्याची त्याची मर्जी.
मी एकप्त्नीत्वाचा समर्थक असलो तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही तेवढाच पुरस्करता आहे. कुणाला बास वाटेल त्यांनी आपले वाचन खुशाल थांबवावे इतरांनाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यात अडथळे करण्याच्या पंचायत्यात न पडलेले अधिक बरे नव्हे का ?
21 Sep 2017 - 6:25 pm | माहितगार
कोणताच नाही. फिल फ्री. टू टेक यूअर ओन डिसीजन्स. इथे लेखिकेने नाही पण माझ्याप्रमाणेच तिर्हाईत प्रतिसादकाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यास आव्हान दिलेच आहे तर ते स्विकारण्यासाठी. अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्वतःचे आणि इतरांचेही जपण्याचे हेच बळ लेखिकेतही येवो हीच सदिच्छा.
21 Sep 2017 - 7:10 am | एमी
जर बर्याचजणांना चर्चा करायची इच्छा असेल पण इथे लिहिणे ठीक वाटत नसेल तर नवीन धागा काढा कोणीतरी (माहितगार/ Duishen/ राघव/ इतरकोणी)...
21 Sep 2017 - 4:58 pm | एमी
माहितगार,
तुमचे या धाग्यावरचे आतापर्यंतचे सर्वच प्रतिसाद आवडले.
(कुठे उपप्रतिसाद द्यावा हे न कळल्याने स्वतःलाच दिलाय :))
21 Sep 2017 - 5:22 pm | माहितगार
:) धन्यवाद
21 Sep 2017 - 11:55 am | शित्रेउमेश
निशब्दः
काहीच लिहु शकत नाहीये.... :,(
21 Sep 2017 - 4:05 pm | सूड
हा परिच्छेद नीट कोरीलेट करु शकतो. हा एकच क्षण होता जिथे आई गेली ते बरं झालं असं वाटलं मला. असो, ही कथा नसून खरं घडलेलं असेल तर काही प्रश्न सोडून दिले की सुटतात हे खरंय. त्यामुळे यापुढे हा विषय बंद हा जो काही पवित्रा आहे तो उत्तम.
21 Sep 2017 - 4:44 pm | अत्रन्गि पाउस
अस्वस्थ करणार आहे हे सगळे.
21 Sep 2017 - 5:00 pm | स्मिता.
लेख कितीही चांगला लिहीलेला असला तरी चांगला म्हणवत नाही. तुम्ही इथे तुमचे मन मोकळे केले हे खूप चांगले झाले. तुम्हाला आणि तुमच्या आईला यातून सावरण्याची शक्ती मिळो!
हे विसरणे तर होणारच नाही पण तरी तुम्ही, खासकरून आईंनी दुसरीकडे कुठेतरी मन रमवण्याचा प्रयत्न करणे हेच बरे वाटते.
बाकी झाल्याप्रकारावर चर्चा करणं संयुक्तिक वाटत नाही. पण विवाहबाह्य संबंध कधीच समर्थनिय नव्हते आणि नाहीत हे मात्र नक्की!
21 Sep 2017 - 5:26 pm | सिरुसेरि
छान कथा लेखन आणी विचार करण्यासारखे प्रतीसाद . आपकी अदालत या कार्यक्रमाची आठवण झाली .
21 Sep 2017 - 8:00 pm | Naval
माझ्या लिखाणातून मी नेहमी भावनांचाच मक्ता घेतला.हा लेख लिहणं माझ्यासाठी माझ्याच एखाद्या अवयवावर टीका करण्यासारखं होतं. आधी नात्यांमधला विश्वास,पारदर्शकता,जबाबदारी यांचे संस्कार करून पुढे त्यांनाच पळवाट शोधणाऱ्या प्रवृत्तीचा हा निषेध आहे ,व्यक्ती म्हणून त्यांचं स्वातंत्र्य जपणाऱ्या जोडीदारालाच दोष देण्याच्या प्रवृत्तीचा हा निषेध आहे,आमच्या कुटुंबाच्या आनंदी जीवनावर प्रश्न निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीचा हा निषेध आहे केवळ विवाहबाह्य संबंध इतकंच याला पाहू शकत नाही. माझी शक्ती मी पुढच्या लिखाणासाठी शिल्लक ठेवते आणि इथेच थांबते.
21 Sep 2017 - 8:21 pm | माहितगार
Men Are from Mars, Women Are from Venus
21 Sep 2017 - 11:22 pm | पिलीयन रायडर
नाही..हा स्त्री आणि पुरुषाच्या विचार करण्याच्या पद्धतीतला फरक नाहीये. ह्या माणूस म्हणून केलेल्या चुका आहेत.
खरं तर लेखिकाच थांबल्यानंतर काही लिहायचे प्रयोजन उरत नाही. पण मला ह्या निमित्ताने इथे जो एक युक्तिवाद मांडला गेला आहे त्यावर भाष्य नक्कीच करावं वाटतं. मला आधी वाटलं होतं की आपल्या संसाराला अर्ध्यात सोडून जाण्याचा विचार करणार्या माणसाला विचार करायला भाग पाडणारा हा लेख आहे. पण माहितगारांच्या प्रतिसादातून असंही होऊ शकतं की कुणाला असं काही करण्याचं नैतिक अधिष्ठानच मिळेल. कदाचित ह्या घटनेतला सोडून जाणारा माणूस असाच विचार करत असेल. माहितगारांचे विचार कुणीही सहज उचलून आपल्या समर्थनार्थ वापरेल. हे जास्त गंभीर आहे.
जगात आयुष्याच्या बर्याच नंतरच्या टप्प्यावर प्रेम मिळणारे लोक कमी नाहीत. त्यासाठी घटस्फोट घेऊन वेगळे होणारेही कमी नाहीत. जोडीदाराला सोडून जाणं ही काही अपवादात्मक घटना नाही. पण जाताना माणूस नक्की कसं गेलं हे फार महत्वाचं आहे.
माहितगारांनी जवळपास सगळा लेखच उद्धॄत केलाय. पण ते करताना ही वाक्य नाही दिसली का जिथे आईने त्या मुली सोबतच्या नात्याबद्दल स्पष्ट विचारले होते आणि वडीलांनी ते चक्क नाकारले? किंवा दारूचे प्रमाण वाढले आणि वडील परके वाटू लागले? किंवा एका लग्न झालेल्या मुलीला आपल्या आईला मारहाण होते की काय अशी भीती वाटू लागली?
हे व्यक्तिस्वातंत्र्याचे कोणते रुप? खोटं बोलणं, समोरच्याला भीती वाटेल असं वागणं, कामाच्या ठिकाणी पडसाद उमटतील असं काही करणं?
तुम्ही आज स्वतःला मूल असलेल्या आणि संसाराचा १० वर्ष अनुभव असलेल्या बाईला विचारताय की ८ व्या वर्षी घटस्फोट झाला असता तर नसतात का भेटला वडीलांना? ८ व्या न कळत्या वयात वडीलांनी आईशी कायदेशीररित्या संबंध संपवणे आणि लग्नाच्या वयात वडीलांनी घरात तमाशा करुन घर सोडणे ह्या एक सारख्या गोष्टी असतात का? पाल्या ८ वर्षाचं असेल तर त्याचे माय बाप तुटू नये म्हणणं एक गोष्ट आहे आणि एका सज्ञान मुलीने वडिलांचे वागणे पाहुन अत्यंत प्रेम असूनही वडीलांना सोडणे हे एक सारखंच असतं का?
तुम्ही म्हणता की "नव्या आईला" स्वीकारा. एक तर हा शबदप्रयोग अत्यंत उथळपणा दाखवतो. जो माणूस आपले घर तुटल्याचे दु:ख मांडत आहे त्याला नवी आई आणि नवी बहीण वगैरे सांगणं हा कळस आहे ह्या सगळ्याचा. पण असो... तर त्यांना स्वीकारा म्हणताय. लोक मरतातत तेव्हा आपण सहवास संपला हे स्वीकारतोच ना, तसंच हे ही स्वीकारा म्हणण्यासारखं आहे हे. दोन्ही भावना सारख्याच असतात का ह्या?
ज्या बाईने आयुष्याची महत्वाची वर्ष एका नात्याला दिली, त्या नात्यातून तिला इतकं दःख मिळालं. उतारवयात जोडीदार इतके प्रश्न निर्माण करून निघून गेला. आणि तुम्ही म्हणताय ह्याचा तर्कशुद्ध विचार करा? कुठल्या तर्काने माणसाने हे अभिव्यक्तिस्वातंत्र्य मान्य करायचे आहे?
ह्याच घटने विषयी नाही पण इन जनरल जगात अनेकदा संसारी पुरुष वयाने लहान स्त्री च्या मागे जाताना दिसतात. साधारणपणे बायको जेव्हा दोन पोरं जन्माला घालून, संसारात राबून, सणवार सासू सासरे ह्यांचू उस्तवार करुन उतारवयाला लागलेली असते तेव्हा नवर्यांना नव्याचे आकर्षण वाटणं फार कॉमनली दिसतं आपल्याकडे. त्याला उदात् प्रेम म्हणत नाहीत.लफडं हे लफडंच असतं त्याला महान बनवु नका.
इथे तुम्ही एका निव्वळ वाचनातून कळलेल्या माणसाला डिफेंड करताय पण लेखिकेसाठी ते तिचे हाडामासाचे आई बाप आहेत. तुम्ही ज्या निर्विकार पणे ही चर्चा करताय त्या तटस्थपणे आपल्या आई वडीलांविषयी कुणी बोलावं हा अट्टाहासच चुकीचा आहे. त्यातही तुमच्या नवर्याने असे केले तर काय वगैरे प्रश्न विचारणं संयुक्तिक वाटतं तुम्हाला? ह्याच धर्तीवर तुमच्या बायकोविषयी किंवा आईविषयी मी सुद्धा प्रश्न विचारु शकते (सुरुवात देव न करो किंवा प्लिझ राग मानू नका हं अशीच करेन) पण ते विचारण्याची पद्दह्त नसते हे मला समजतं.
ही काही कल्पो कलपित कथा नाही. तुम्ही वेगळा धागा काढून हा कल्पना विस्तार करुच शकला असता. लेखिकेने संपुर्ण सत्य इथे मांडलेले नसेल, अनेक घटना ज्यामुळे त्या ह्या मनस्थितीमध्ये आल्या त्याही आपल्याला माहिती नसतील, पण तरीही तुम्हाला खीस पाडायचा होताच.
असो.. ज्याचं त्याचं अभिव्यक्तिस्वातंत्र्य... मला हा प्रकार अत्यंत खटकलेला आहे इतके तरी मी नक्कीच लिहून ठेवेन.
स्वतः काठावर उभं राहुन, गटांगळ्या खाणार्याला माणसाला हे उपदेश देणं फार सोप्पं असतं. कारण आपल्या नाकातोंडात पाणी जाऊन श्वास गुदमरलेला नसतो. इथे तुम्हाला वाटतंय की तुम्ही त्या माणसाला पाण्यातून बाहेर ये म्हणून सांगून एक उदात्त काम करताय. वास्तविक त्याचा उपयोग काडीचाही नाही.
21 Sep 2017 - 11:39 pm | मोदक
शत प्रतिशत सहमत.
आज माहितगारांचे प्रतिसाद वाचून "माहिती आणि ज्ञान यात फरक असतो" हे वाक्य आणखी एकदा पटले.
माहितगार साहेब - तुमचा या धाग्यावर असलेला पवित्रा पटला नाही.
22 Sep 2017 - 8:25 am | माहितगार
-ज्याचा अर्थ वाद विवादानेच सत्याचा बोध होतो.
(अर्थात केव्ळ नाण्याची एकच बाजू लक्षात घेतल्याने नव्हे)
22 Sep 2017 - 2:24 am | स्मिता.
शब्दा-शब्दाशी सहमत! मला तर माहितगार हा आयडी हॅक झाल्यासारखं वाटत होतं.
22 Sep 2017 - 8:26 am | माहितगार
याचा अर्थ मी एकाच बाजूने लिहित नाही असे सर्टिफिकेट म्हणून घेतो.
22 Sep 2017 - 2:39 am | ट्रेड मार्क
ज्याचं जळतं त्यालाच कळतं. लेखिकेने त्यांची परिस्थिती मांडली, त्याचा उगाच उहापोह करून झालेल्या गोष्टी काही बदलणार नाहीयेत. त्या घटना आणि आठवणी लिहून काढून त्यांनी मनात साचलेलं बाहेर काढायचा प्रयत्न केला, त्याला उगाच बाकी फाटे फोडून काय साध्य होणार आहे? अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रकार सध्या फारच वाढलाय. हे स्वातंत्र्य काय मर्यादेपर्यंत असावं याचा खरंच विचार करायची वेळ आली आहे.
उत्तम म्हणजे आता फक्त त्यांनी त्या घटना चक्क विसरून जाऊन आपले आणि आपल्या आईंचे पुढचे आयुष्य सुखी आणि आनंदी करावे.
22 Sep 2017 - 9:42 am | माहितगार
'..वुमेन आर फ्रॉम व्हीनस' पुस्तकाचा उल्लेख लेखात नमुद समस्येचा स्त्री पुरुष असा भेद करण्यासाठी नव्हे पण पुरुष विचार करताना सोल्युशन्सचा विचार करतात आणि स्त्रीयांना वस्तुतः सोल्युशन नकोच असते केवळ भावनांना वाट करुन द्यायची असते. आणि पुरुष सोल्यूशन सांगत बसतात तसे या केस मध्ये विश्लेषणावर मी वेळ घालवताना झाले का असे मला वाटून गेले कारण तर्काची कसोटी लावून उपयोग नाही या बद्दल तुम्ही कदाचित बरोबर ठरता आहात.
जेव्हा प्रॅक्टीकल सोल्यूशन्स सुचवली जातात तेव्हा लॅटरल थिकिंग, आऊट ऑफ बॉक्स सोल्युशन्स असू शकतात. ईतर लोक कुणी काय बरोबर केले चुक केले यावर फोकस करताहेत तेही आमच्यापैकी कुणाच्या आयुष्यात असे झाले तर काय या नसत्या धास्तीने. आणि हि भावनाही मुख्यत्वे मध्यमवर्गीय मंडळी अधिक जोपासतात. गरीब आणि श्रीमंत दोन्ही या बाबींचा फारसा बाऊ करत नसावेत. माझ्याघरी घरकाम करणार्या एक मावशी नवर्याने दुसरी बायको करुनही त्रिकुटी संसारातच रहातात, दुसर्या काम करणार्या मावशींच्या वडीलांबद्दल अशी स्थिती आहे की ज्यात म्हातारपणी सावत्र मुलगा सावत्र आईला सांभाळतो आहे. वरच्या दिशेने पाहीले तर अमोल पालेकर, अमीर खान अशी त्रिकुटी नसली तरी नवा संसार थाटून संसार करणारी मंडळी दिसतातच -त्यांना आधीच्या पत्नीला मजबूत मोबदला देऊन सुखात ठेवणे परवडते. मी दोन नात्याती अंतर कमी व्हावे म्हणून आऊट ऑफ बॉक्स सोल्यूशन सुचवले एवढेच. अर्थात ज्यांना प्रत्यक्षात कोणतेच सोल्यूशन नको आहे त्यांची गोष्ट निराळी.
"पद्धत"
नुसताच सोप ऑपेरा नसून सोल्यूशन्स मध्ये खरेच रस असेल त्यासाठी भूमिका तर्कपूर्ण असण्याची गरज असते. तार्कीक उणीवा निदर्शनास आणताना शेवटी तर्क महत्वाचा असतो भावना गौण असतात -यात वास्तव लक्षात घेताना तुमच्या माझ्या दुखर्या भावनांना फारही गोंजारता येत नाही. मी तर्कांच्या कसोटीवर पारखेन असे सांगताना लेखिकेस पुर्व कल्पना देऊन आणि वेगळे विचार वाचण्याची त्यांची तयारी पाहूनच लेखन केले. तसेही ज्या लेखनास अंशतः का होईना आधी पब्लिक डिस्कोर्स आणि त्यानंतर ज्ञानकोशीय उल्लेखनीयता लाभण्याची शक्यता असते त्याची अनेक बाजूने समिक्षा होतेच अशी समिक्षा होणे स्वाभाविक आणि गरजेचे असते हे इतरांपॅ़क्षा लेखिकेस माहित असावे असे वाटते.
माणूस कळला बिळला असा दावा नाहीच आणि त्याची गरज ही नाही. हाडा मासाचे आई बाप आहेत म्हणूनच बाकी जगाची पर्वा न करता आऊट ऑफ बॉक्स सोल्यूशन वापरून जवळ आणा म्हणतोय. वडीलांना एकट्यालाच घेऊन या म्हणणे म्हणजे त्यांनी उभारलेल्या नव्या संसारा तडा देणे आणि जन्माला घातलेल्या नव्या मुलीस आधीच्या मुलीच्या यातना परत देणे नाही का ?
१) मी किंवा माझ्या सोबत इतरांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन केल्याने ज्यांना प्रेमात पडता येत नाही /किंवा ज्यांना प्रेमात पडायचे नाही ते पडत नाहीत, आणि जी प्रेमात पडणारी मंडळी आहेत ती कोणत्याही आदळ आपट आक्रस्ताळेपणा किंवा कोण्त्याही विशेषणांच्या लाखोलीने थांबत नाहीत, ती मंडळी सुद्धा तर्काच्या पलिकडे असणारी भावनेत वहावलेली असतात, उलट 'प्रेमात सर्व माफ असते' असे सांगतात. (मी तर्कनिष्ठ असल्याने प्रेमात सर्व गोष्टी माफ असतात असे समजत/म्हणत नाही) त्यांना थांबवणे शक्य झाले असते तर लेखिकेचा लेखन प्रपंच आणि इतरांचा पंक्ती प्रपंच झालाच नसता. वास्तवाला स्विकारण्यास वेळ लागल्याने ओळींचा मग तोंडातील अथवा लेखी वापर वाढतो एवढेच.
२) आपल्या कडे काय आणि दुसरीकडे काय माणूस माणूस आहे रोबोट नाही, वेठबिगार नाही वेगळा मार्ग चोखाळू इच्छिणार्यांनाही भावना असतात तेव्हा तुमच्या केलेल्या मानसिक भावनीक आणि इतर गुंतवणूकीचे कितीही उद्दातीकरण केले तरी वैवाहीक गुलामी प्रत्येकाने स्विकारलीच पाहीजे असे बंधन घालता येत नाही.
बाकी केवळ पुरुष नव्हे संधी सुरक्षीत आणि कमी जोखीमीची असेल तर स्त्रीयाही तसेच वागू शकतात. - नाहीतर रस्ता भटकणार्या पुरुषांना स्त्रीया कुठे मिळतात. फक्त भावी आयुष्याबाबत जोखीम कमी आणी सुरक्षीत आहे का पाहून करतात याचा अर्थ मन संसारात रमतेच याची स्त्रींयाच्या बाबतीतही गॅरंटी देता येत नाही त्यांना स्वतःला गँरंट्या हव्या असल्यातरीही. शोधलीत तर पुरेशी उदाहरणे मिळतीलही. बेसिकली दोन जाणत्या व्यक्तींना जबरदस्तीने कोंडण्याचा संसार हा कोंडवाडा व्हावा यालाही पॉईंट नसतो.
आणि किमान एका फ्रेंच प्रायमिनीस्टर का प्प्रेसिडेंटने या बाबतीत स्त्री वयाने लहान असली पाहीजे याचा पायंडा तोडला आहे म्हणे आणि त्याला समाजाचेच नाही स्त्रीयांनीही पुरेसे गौरवले असावे.
अशी नाती स्विकारणारी असंख्य नाती इतिहास ते आज तागायत आहेत. यात कळस बिळस काही नाही नॉर्मल आहे. दुसरा विवाह कायदेशीर असो अथवा नसो जेनेटीकली भाऊ भाऊ असतो बहीण बहीण असते. ज्यांचा जन्मास येण्यात काहीच दोष नाही किमान त्यांचा दुष्वास करण्यात पॉईंट नाही. सावत्र आईचे भारतीय कथानकातून वास्तवापलिकडे जाऊन नकारात्मक चित्रण केले गेले आहे त्याचा समाज मनावर आणि येथील बहुतेक प्रतिक्रीया देणार्यांच्या प्रतिक्रियांवर प्रभाव आहे. पण सावत्र आईस स्विकारणारा एक लेखक किमान संदर्भा सहीत नमुद करु शकेन हे नक्कीच.
सज्ञानता खरेच वया सोबत येते , बाकी उत्तर मी लेखिकेस प्रश्नातून मांडले आहे त्याची पुर्नावृत्ती करण्याची येथे गरज नाही.
चर्चित व्यक्तिची नवीन स्त्रीचे पालकत्व घेतले असताना त्याबाबत मारलेमी कोलांट उडी आणि उपरोल्लेखीत काही बाबी निंदाजनक निश्चितच आहेत तरीपण संबधीत स्त्रीची सहमती आणि प्रेमाच्या भावनेत वाहीलेले नवे जोडपे प्रेमात सर्व गुन्हे माफ या तोर्यात असते. आणि ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चौकटीत बसत असेल तर कितीही आकांड तांडव आणि निंदा केलीत तरीही स्विकारण्या पलिकडे खरेतर पर्याय नसतो हो म्हणून स्विकारता की नाही म्हणून स्विकारता. स्विकारण्यात स्वतःच्या मनाला अधिक शांतता लाभण्याची संधी अधिक असू शकते का ?
वस्तुस्थिती स्विकारण्यास जेवढा वेळ लागेल तेवढा घोळ वाढलेला दिसतो.
मानवी संस्कृतीच्या आरंभापासून ते आज तागायत आणि बहुधा पुढेही राहील जी गोष्ट वास्तव आहे , ती गोष्ट माहितगारच्या मांडणीमुळे वाढते म्हणणे हास्यास्पद आहे. आणि त्यातला वैवाहीक गुलामीस नाकारणारा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो भाग बरोबर आहे त्यास बरोबर म्हणून हो म्हणून स्विकारा अथवा नाही म्हणून स्विकारा स्विकारण्या शिवाय गत्यंतर नाही. मी वस्तुस्थिती बोलून दाखवली एवढेच आणि उर्वरीत उत्तर याच प्रतिसादात आलेही आहे त्याच्या पुर्नौल्लेखाची गरज नसावी .
अधिक चर्चेची संधी दिल्या बद्दल आभार
22 Sep 2017 - 12:17 pm | सूड
हे आणि असंच सगळं लिहायचा विचार आला होता, पण काही कारणाने हात आवरला.
25 Sep 2017 - 7:56 pm | सप्तरंगी
@नवल
'' मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही "यासारखं फोल वाक्य या पृथ्वीतलावर नाही.'' अगदी खरं , कोणी असो नसो, मनात खूप साचते पण जगणे तर सुरूच राहते..
कोणत्या परिस्थितीत कोण काय आणि का ठरवतो याची गणिते खरे तर ज्याची त्यालाच माहिती असतात त्यामुळे तुझ्या बाबांनी असे का केले याचे ठोकताळे बांधणे अवघडच आहे. पण आता त्यांनी जे केले ते तर झाले आता बदलणे शक्यच नाही, या परिस्थितीत आपण काय करू शकतो ते करावे आणि ते तर तू करते आहेसच. तू तुझ्या आईची काळजी घेते आहेस, मुख्य म्हणजे आई धीराने सगळे handle करते आहे, हि अतिशय जमेची बाजू आहे.
आणि इथे व्यक्त होऊनसुद्धा तू एक धाडसच करते आहे हे हि काही सोपे नाही.
शेवटी कितीही जवळचे नाते तरीही ते गरजेवरच आधारित असते त्यामुळे नाती दुरावतात तेंव्हा त्याचीही एक सवय होऊ लागते आणि त्यातून तावून-सुलाखून आपण अजून चांगले manage करू लागतो, तू करतच असशील, करशील... take care !!
@पिरा तुझ्या शब्दाशब्दाशी सहमत. आपले मन मोकळे करू पाहणाऱ्या लेखिकेला प्रश्न विचारून बेजार करण्यात काय पॉईंट आहे. प्रत्येकच गोष्टीचे analysis करायची गरज नसते. कधीकधी फक्त कान द्यावा, समजून घ्यावे, फार फार तर सल्ला द्यावा नाहीतर बाकी लोक असे निनावी व्यक्त व्हायलापण चाचरतील. लोकं हे लक्षात न घेता का वागतात हे कोडेच आहे.
22 Sep 2017 - 5:15 am | एस
'जनातलं मनातलं' आणि 'काथ्याकूट' या दोन विभागांमध्ये फरक असतो ही साधी माहिती कुणाला नसावी किंवा जाणूनबुजून, अगदी ठरवून इथे ठरवून ट्रोलिंग करण्याचा उद्देश त्यामागे नसावाच असे मानण्यास पुरेपूर वाव दिसतोय किंवा कसे? किंबहुना नवीन लेखकांना लक्ष्य करण्याचा हा प्रकार नाही का असे अनेक प्रश्न पडले आहेत. लेखिकेने 'फाट्यावर मारणे' ह्या आंतरजालावर अत्यंत आवश्यक असलेल्या सद्गुणाचा इथे आवर्जून वापर करण्याची आवश्यकता आहे.
22 Sep 2017 - 7:48 am | माहितगार
गॉसिपिंं कोण करतं ?
लेखिकेने स्वतःच्याच नात्यावर टिका कर्णे ठिक आहे पण त्या नात्याचे अपराधीत्व वाढवून नात्यांमधला दुरावा वाढवणारे गॉसिपींअ करतात की दोन व्यक्तितला दुरावा कमी व्हावा हि सदिच्छा ठेवणारे. ज्यांना नात्यांमधले अंतर कमी व्हावे अशी सदीच्छा असते तेच मनमोकळे पणाने त्रुटी दाखवू शकतात किंवा कसे आणि अशा त्रुती दाखवण्याला आणि तेही लेखिकेच पूर्व कल्पना देऊन लेखन केले असेल तर त्याला ट्रोलींग कसे संबोधता येते. उलटपक्षी इतर लोक सहानुभूती दाखवण्याच्या नावाखाली विंगेबाहेरून भावनांचा तमाशा पहात आणि करत आहेत असे का म्हणू नये ?
22 Sep 2017 - 10:47 am | कपिलमुनी
जाम बोअर मारता राव तुम्ही !
निसटत्या बाजू आणी प्रश्न !
सरकारी कारकूनी भाषा , बाकी चालू द्या
22 Sep 2017 - 10:58 am | माहितगार
विशेषणांनी वस्तुस्थिती आणि प्रश्न दोन्हीही बदलत नाहीत. वस्तुनिष्ठ मुल्यमापन बोचून घेण्यापेक्षा परीस्थितीस सामोरे जाण्याच्या सर्व पर्यायांचा साकल्याने विचार करणे सोडून डोके धरुन बसण्यात बरेच धन्यता मानतात बट सर्टनली दॅट ब्रींग्स नो सोल्यूशन्स.
ज्यांना विशेषणांचे पाठ पढायचे होते त्यांचे होई पर्यंत चार दिवस थांबलो मगच आणि तेही विचारून लेखन केले हे पुन्हा पुन्हा नमुद करतो आहे. पण आपल्याला नको असलेली वस्तुस्थीती स्विकारणे बहुतांना कठीण असते त्यामुळे बाकी ह्या धागा प्रतिसादांचा मळा बहुतांना विशेषणे योजण्यासाठी मोकळाच आहे. बाकी उर्वरीतांमध्ये आपल्याही विशेषणांचे स्वागत करतो म्हणजे इतरांनाही बाकी विशेषणे चालू ठेवण्यास मनमोकळे वाटेल. असो.
22 Sep 2017 - 11:57 am | गामा पैलवान
माहितगार,
प्रस्तुत लेख शुक्रावर लिहिलाय आणि तुमचे प्रतिसाद मंगळग्रहावरचे दिसताहेत. अर्थात चूक वा बरोबर या वादात पडंत नाही मी, फक्त तुमच्या प्रतिसादात दोन बाबींची चर्चा करतो.
पहिली आणि खटकलेली बाब म्हणजे तुम्ही केलेला वैवाहिक गुलामगिरी असा उल्लेख. प्रत्यक्षात ही गुलामगिरी आजिबात नव्हती. बाबा जुन्या संसारात दु:खी नव्हतेच मुळी. अधिक अचूक शब्दयोजना अपेक्षित आहे.
आता दुसरी गोष्ट. लेखिकेचं आजून एक दु:ख म्हणजे आदर्शांची पडझड. हा भाग अद्यापि फारसा चर्चेत आला नाहीये. जी मूल्ये बाबांनी जुन्या कुटुंबात रुजवली, तीच मूल्ये नंतर पायदळी तुडवली. याचंही बरंच दु:ख असतं. शिवाय मनाचा गोंधळ उडतो तो वेगळाच. मूल्यं आणि ती आचारणारी व्यक्ती दोन भिन्न वस्तू आहेत, हे सत्य पचवणं बायकांना चांगलंच अवघड जातं. वडील जाणं वेगळं आणि वडील नामे आदर्श गायब होणं वेगळं. तुम्ही जो तोडगा सुचवलात तो मूल्यांच्या पुनर्बांधणीशी सुसंगत हवा. याविषयी फारशी चर्चा न झाल्याने अधिक सांगू शकंत नाही.
आ.न.,
-गा.पै.
22 Sep 2017 - 1:43 pm | माहितगार
अंशतः सहमत लेखिकेचे वडील स्वतःस गुलाम समजत नाहीत हे मान्य, त्यांच्यावर झालेल्या चुकांपलिकडे अपराधीत्व चिटकवू पहाणारी मंडळी त्यांना वैवाहीक गुलाम समजतात का असा प्रश्न अहे. बहुधा आपण म्हणता तसे अधिक चपखल शब्दाची गरज आहे. पण वस्तुतः चर्चीत व्यक्ती या चर्चेत नाही आणि त्यांच्या स्थितीची खरी व्याख्या त्यांनी स्वतः करणे अधिक श्रेयस्कर राहीले असते.
दुसरा मुद्दाही वस्तुतः लेखिकेच्या वडलांच्या अखत्यारीतील आहे.
जिथ पर्यंत माझे उत्तर आहे ते निश्चित मत बनवून मग देईन. निर्देशांबद्दल अनेक आभार
22 Sep 2017 - 4:34 pm | माहितगार
मूल्यं आणि ती आचारणारी व्यक्ती दोन भिन्न वस्तू आहेत. हा मुद्दा आपण योग्य पकडला आहेत असे वाटते. किशोर वयातून तारुण्याच्या उंबरठ्यावर १४ ते १८ येताना एखादा आदर्श व्यक्ति भावतो अथवा भावून जाणारा आदर्श व्यक्ती आयुष्यात येऊन जावा असे वाटते. फारच क्वचित लोकांना आयुष्यभर पुजता येईल हिरो वरशीप करता येईल असा आदर्श भेटतो बाकी बहुतेकांना तारुण्यात येताच, जगात विवीध आदर्श गुण असलेल्या व्यक्ती असतात पण पूर्ण आदर्श कुणीच नसतो जमतील झेपतील तेवढे आदर्श उचलायचे हे माहित झालेले असते- व्यक्तीपुजा चालू राहीलीतरी माणसे स्खलनशील असू शकतात हे मनाच्या कोपर्यात कुठेतरी कोरले जाते. क्वचित काही जणांना तशी संधी मिळत नसावी. घरातल्याच व्यक्तीला आदर्श मानल्या नंतर प्रसंगी ती स्खलनशील सुद्धा असू शकते हे स्विकारणे मोठे कठीण जात असावे.
प्रत्येक खुर्चीचा एक रोल असतो. त्या त्या खुर्चीतल्या रोल मध्ये आदर्श समोर ठेवण्याचा रोल असेल तर तो रोल त्या व्यक्तीला निभवावा लागतो. आपण म्हणता तसे मूल्य आणि ती आचारणारी व्यक्ती आपण म्हणता तसे भिन्न असतात. अगदी जवळी व्यक्तीसुद्धा पूर्ण कळली असे म्हणणे धाडसाचेच असते. प्रिझमच्या सर्व बाजू कधीच एका वेळी पहाता येत नाहीत त्यातून येणार्या वेगवेगळ्या किरण प्रतिमांनी आपण प्रभावित होत असलो तरीही.
आपल्यासाठी महत्वाचे काय आहे ? आपण आत्मसात केलेले आदर्श आणि मुल्य आपल्यासाठी महत्वाची आहेत ती व्यक्तिगत जिवनात जरुर होता होईतो आचरणात आणावीत. पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आदर्श आणि मुल्य पुस्तकी पद्धतीने इंप्लिमेंट करता येत नाही तसेच. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आदर्श आणि मुल्य पुस्तकी पद्धतीने आपल्याला इंप्लिमेंट करता येत नाही तर तशी आशा दुसर्यांकडून अपेक्षा करताना अगदी आदर्श समोर ठेवणारी व्यक्ती असली तरीही त्यांची बाजू किमान समजून घेण्याची गरज निर्माण होते. प्रत्येक पिचवरच्या बॅटमनलाच चेंडू नेमका कसा आला ते माहित असते बाकिचे सर्व बॅटमनपेक्षा वेगळ्या अँगलनेच बघत असतात त्यामुळे येणारा चेंडू नेमका कसा आला ते बॅटमनचे बॅटमनलाच माहीत असते. त्याने चेंडू आपणास हवा तसा टोलवला नाही आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या पद्धतीने टोलवला म्हणून कामावरून काढण्या आधी त्याची बाजू खुल्या मनाने ऐकुन घेणे गरजेचे असते. किंवा ड्रायव्हींगचे उदाहरण घ्या ड्राय्व्हरला त्याच्या पोझीशन मधून गोष्टी जशा दिसतात तशा त्या इतरांना दिसत नाहीत. त्यामुळे एखादी कॉमेंट मारण्या आधी ड्रायव्हरशी संवाद साधणे खरे म्हणजे जरुरी असते. प्रत्यक्षात काही वेगळेच घडते.
आदर्श पुढे ठेवणार्या व्यक्तिने पाळो अथवा न पाळो त्याला त्याच्या आदर्शांची गाडी नेमकी कशी चालवावी लागली त्याचे त्याला माहीत असते. शक्य आहे की तो ड्रायव्हींग मध्ये चुकलाही असेल. गाडीत एक्स्ट्रा प्रवासी घेतला जावा असे तुम्हाला वाटत नाही पण ड्रायव्हर एखादा एक्स्ट्रा प्रवासी विवीध कारणांनी घेत असू शकतो त्यातील सर्वच कारणे योग्य किंवा पद्धती योग्य असतील असे नव्हे. एकदा गाडीत एक्स्ट्रा प्रवासी आला तर नेमके काय करावयाचे ? ऐन आडरानात त्याला सोडून द्यायचे की त्याला त्याच्या थांब्यापर्यंत पोहोचेपर्यंत अॅडस्टमेंट करून घ्यायची. ड्रायव्हरला ड्रायव्हींग करू द्यायचे की हल्लकल्लोळ करुन त्याचे लक्ष विचलीत करावयाचे. ड्राय्व्हर चुकत असेल तर त्याला एक्सप्लनेशन मागावे पण त्याला बॅड रिमार्क देऊन दुसरी नौकरी मिळू नये म्हणून त्याचे जिणे दूष्कर करणे ही समजता येते पण दुसर्याचे जिणे दुष्कर करता करता आपले लक्ष त्यात फोकस होत रहाते. द्वेष जळफळाट होत रहातो. आणि तो ड्राय्व्हर गाडीचा मालकही असेल तर त्याच्यावर टिकाकरण्यास मर्यादा असतात. म्हाभारतातील कर्ण लाख चुकीचा असेल पण ऐन युद्धात त्याचे लक्ष विचलीत करत रहाणारा नामुष्की आणणारा त्याचा सारथी शल्य सर्वोत्कृष्ट सारथीही म्हणवला जाऊ शकत नाही. सारथ्य करतानाचा रोल सारथ्याने साथ देऊनच पार पाडणे अपेक्षीत नसते का ? शेवटी युद्ध कुणाशी आहे ? तुमच्याच सगे सोयर्यांशी त्यांनी किती युद्धाचे नियम मोडले म्हणून तुम्ही किती मोडायचे ? युद्ध टाळून तहाच्या संधी काही आहेत का तेही घरच्यांसाठी पहाण्यात काही गैर आहे का ?
लेखिकेसाठी शेवटी अधिक महत्वाचे काय आहे ? आपल्या पित्याशी असलेले अंतर कमी करणे की जो इतरांचासुद्धा होऊन चुकला आहे त्यांना नामोहरम करणे ? त्याच्यावर नामुष्की आणून प्रत्यक्ष जमले नाही तर अप्रत्यक्ष बदला घेणे आणि त्यासाठी आदर्श पायदळी तुडवले गेल्याचे भांडवल करणे ? ते लेखिकेस स्वतः निवडायचे आहे.
लेखिकेशिवाय टिका करनार्यांना मी राजा हरिश्चंद्र नाहीत त्यांच्या अवाजवी अपेक्षांबद्दल साशंकता आधीच व्यक्त केलेली आहे. येशू ख्रिस्ताने ज्यांनी कधिच कोणती पापे केली नाहीत त्यांनी फक्त दगड फेकावेत असे सांगून ठेवले आहे. या येशु उपदेशाचा अर्थ समजून घेणे
महत्वाचे आहे.
समजा तुम्ही एक स्त्री आहात तुम्हाला एक मुलगा आहे. स्त्रीचा मुलगा चर्चीत व्यक्तिसारखा मार्ग भटकला तर त्याचे दोन संसार समजा तयार झालेच आणि पहिला संसारातील लोक दुक्खी झाले आहेत तुम्ही त्या स्त्रीच्या जागी आहात तुम्ही तुमच्या मुलाला काय सांगणार नंतरचा संसार दे वाटेत सोडून आणि पहिल्या संसराकडे वळ म्हणून आणि मग आता दुसर्या उभा टाकत असलेल्या संसाराचे काय ?
मी या वेळी नसताच गहजब नको म्हणून लेखिकेच्या मुलाने असे केले तर काय असे म्हणायचे टाळले आहे. पण समजा लेखिका स्वतःच्या पित्याच्या आईच्या जागी किंवा दुसर्या सल्लागाराच्या रोल मध्ये असेल तर नेमके काय सांगेल ? गोष्टी कशा जुळवून आणण्याचे मार्ग सांगेल की कोणात्याही एकाच बाजुचा हट्ट मानून एकाच बाजूची तळी उचलून धरावी आणि दुसर्या बाजूस मुक वंश संहारास समोर जाण्यास सांगावे ? असो.
22 Sep 2017 - 9:36 pm | Naval
मला काय म्हणायचंय हे नीट पोहोचलेलं पाहून हि प्रतिक्रिया लिहिल्याशिवाय राहू शकले नाही. गामा पैलवान खूप खूप धन्यवाद ! शब्दशः सहमत !!
22 Sep 2017 - 9:39 pm | Naval
मला काय म्हणायचंय हे नीट पोहोचलेलं पाहून हि प्रतिक्रिया लिहिल्याशिवाय राहू शकले नाही. गामा पैलवान खूप खूप धन्यवाद ! शब्दशः सहमत !!
22 Sep 2017 - 12:59 pm | राघव
माहितगार साहेब,
शब्दानं फक्त शब्द वाढत जातो, त्यामुळं माझ्या या प्रतिसादाला कृपया वाद-विवाद पातळीवर घेऊ नये. त्यात मला खरोखरंच रस नाही.
पटलं तर मानावं अथवा सोडून द्यावं.
आपण कोणत्या धाग्यावर लिहितो आहोत, कोणासंदर्भात लिहितो आहोत व कोणासाठी लिहितो आहोत याचं भान राखलं पाहिजे.
अनेकांना इथं मदत करायची ईच्छा असणार आणि ते अगदी स्वाभाविक आहे. पण तसं करण्यासाठी आपण [स्वतःला धरून सांगतोय] त्या पातळीवर असायला हवं की ज्यावरून हे शक्य होईल. प्रत्येकाला स्वतःचे प्रॉब्लेम समजतात, तसेच उपायही समजतात. अनेक जण अनेक प्रकारे उपदेश करतच असतात. सर्व कितीही बरोबर असलेत तरीही, त्यांचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा त्या व्यक्तीची आतून्/मनापासून तशी ईच्छा असते. त्या पातळीवर उतरून मग ती मदत शक्य होते.
ज्या व्यक्तीला आपण नीटसं ओळखतसुद्धा नाही त्या व्यक्तीला आपली कशी आणि किती मदत होणार? त्यासाठी आपण प्रथम नीट जाणून घेतलं पाहिजे. नुसतं तटस्थपणे सांगून फार उपयोग होत नाही. या भावनिक गुंत्यातून निघून तटस्थपणे बघणं प्रत्येकाला सहज शक्य होत नाही, प्रत्येकाची वेळ निराळी. ते होईलतो थांबायला हवं. धीर देण्यासाठी आधी धीर धरायला हवा. आपण तो गुंता आपल्या नकळत वाढवत तर नाही ना याची दक्षता घ्यायला हवी.
अधिक काय सांगावं? आपण सूज्ञ आहात. अगदी राहवलं नाही म्हणून सांगितलं. चु.भू.द्या.घ्या.
22 Sep 2017 - 1:30 pm | माहितगार
वस्तुतः विशेषणांच्या आतीषबाजीच्या स्पर्धेत भाग घेणारे भानावर आहेत की माझ्या भानाचा प्रश्न आहे ? मी वडीलांनी पत्नीचा दर्जा देऊ केलेल्या स्त्रीला आई हा शब्द का वापरला म्हणून टिका करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही आई माना न माना कुणाची तरी ती आई आहेच आणि तेवढा आदरही असावयास नको ? प्रत्यक्ष बोललेनाह तरी ** शेमींग मध्ये या टिकाकारांना रस दिसतो तोही स्त्रीयांना न्याय देणारा आहे का ? अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी सहज तडजोड ही सुल्तानीला जन्म देणारी ठरू शकते जी पुन्हा सर्वसाधारण स्त्रीयांनाच अहितकारक असते.
सहमत आहे
मुद्दा बरोबर असला तरीही तो विशेषणांच्या आतीषबाजीच्या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणार्यांना लागू होत असावा. धीराची गोष्ट मी इतरांचे प्रतिसाद देऊन हॉईपर्यंत किमान चार दिवसतरी थांबलोच त्या शिवाय लेखिकेच्या लेखातील निसटत्या बाजू माझ्या परीने दाखवल्या तरी त्यांना आधीच्या प्रतिसादातून कल्पना दिली त्या वेगळे विचार ऐकु शकते म्हणाल्या. वेगळे विचार वाचणे लेखिकेपेक्षा इतरांना अधिक कठीण जाते आहे म्हणून तक्रार करत आहेत. प्रतिसादातून वेगळे विचार मांडले जात असल्या बद्दल लेखिकेची तक्रार दिसत नाही.
माझ्या वेगळ्या विचारांनी माणसातील अंतर कमि झाले तर गुंताउंत कशी वाढेल ते उमगले नाही. घरात झेंडे अधिक झाले तर गुंतागुंतच वाढते की आनंदही वाढू शकतो ही ज्याची त्याची बघण्याची बाजू आहे. मी एकत्र कुटूंब पद्धतीचा आणि सामावून घेण्याच्या विचारांचा समर्थक आहे. त्यामुळे असहमती बद्दल समहमत होऊ शकतो या बद्दल क्षमस्व.
22 Sep 2017 - 2:25 pm | मोदक
(माहितगार मोड ऑन)
माहितगारांच्या शब्दबंबाळगिरीला कंटाळून हा धागा वाचनमात्र होईल अशी एक शक्यता वर्तवत आहे. अर्थात अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्य हे जागृत लोकशाहीचा पाया आहेच पण त्याच वेळी घडणार्या परिणामांची जबाबदारी नक्की कोण घेणार हाही महत्वाचा मुद्दा नजरेआड होता कामा नये.
.
.
(यानंतर तुम्हाला हव्या त्या विषयावर पंधरा वीस असंबद्ध कारकुनी ओळी कल्पाव्यात)
.
.
.
पण ही सगळी वस्तुस्थिती प्रत्यक्षात येईल याची शक्यता वाटत असली तरी ते येईलच असे सांगता येत नाही.
(माहितगार मोड ऑफ)
*****
(हा प्रतिसाद कोणत्याही धाग्यावर वापरता येऊ शकतो.)
*****
असा प्रतिसाद देणार नव्हतो पण माहितगार आपल्या शब्दांनी सर्वांना गार करत सुटलेत म्हणून रहावले नाही. :))
22 Sep 2017 - 2:50 pm | माहितगार
आंजावर न पटणार्या खूप गोष्टी लिहिल्या जातात ज्या क्षणी त्यावर सेंसॉरशीप बसवावी वाटते त्या क्षणी तरी ते वाचणे सोडून देणे अधिक उत्तम. प्रत्यक्ष चर्चेत प्रतिवाद करता आले नाही की माघारी गॉसीप करायचे आणि प्रत्यक्ष चर्चेतल्या लोकांनाच गॉसीप शब्दबंबाळ आणि काय काय विशेषणे लावायची.
लेखिकेने दुसर्या धाग्यातून एक मुल असताना दुसरे दत्तक घेण्याचे कौतुक केले आहे . स्वतःचे मुल दत्तक म्हणतात खरे खोटे त्या जाणे पण त्या दत्तक मुलांच्या मूळ पालकत्वाचे हिशेब त्या मांडत बसणार आहेत ? दत्तक घेतलेल्या मुलांना नवी आई स्विकारण्यास सूचवले अथवा लादली जात नाही ? ठिक आहे की नाते लहान वयात निर्माण झाले की अधीक सहज स्विकारले जाते मोठेपणी शिंगे फुटली की अवघड जाते. लेखिका स्त्री आहे म्हणून त्या जागी त्यांचा भाऊ असेल तर वडीलांच्या आयुष्यात आलेल्या नव्या स्त्रीचे नाते कोणते म्हणावे ? पर स्त्रीचे नाते तसेही आईचेच म्हणवले जाते ना ? किमान तिच्या मुलांसाठी आईच आहे ना ? तिचे शेमींग केले की तिच्या निरपराध मुलांचे जिवन असह्य होऊ शकते हे येथील माझ्यापेक्षा अधिक सुज्ञ आणि तेही स्त्रीयांना समजत कसे नाही ? धागा लेखिका खरेच संवेदनशील असेल तर तिने स्वतःच खरे तर या मुद्द्यावर भूमिका घेण्याची गरज आहे जेणे करून आवडोत न आवडोत पण स्वतःला मिळणारे चटके दुसर्या दोन लहानग्यांना सहन करावे लागणार नाहीत नाही तर लेखिकेची सहानुभूतीदार मंडळी त्यांच्याही आयुष्याचा धुव्वा उडवल्या शिवाय रहाणार नाहीत.
मी काय लेखिकेचा वडील आहे की त्यांचे काही देणे घेणे लागतो की त्यांच्या बद्दल कधी या लेखापुर्वी कधी काही वाचले ? की जाणीवपुर्वक त्यांच्या बाजूने लिहिन दोन माणसातील अंतर कमी होण्याची साधी सदीच्छा अस्तीत्वातच असू शकत नाही.
लेखिकेल सेंसॉरीग करायचे नसावे पण अधिक रचनात्मक सकारात्मक सुचले नाही की इतरांच्याच पोटात दुखावयास लागते. आणि मग सेंसॉरींग साठी लेखिकेपेक्षा अधिक उत्साह नक्कीच दाखवला जाऊ शकतो. एकुण काय तर माझे विचार चुकीचे ? शब्दबंबाळ अन काय अन काय ?
सेंसॉर प्रवर्तकांना त्यांच्या प्रयत्नास शुभेच्छा.
22 Sep 2017 - 3:16 pm | मोदक
बरोब्बर... १००% सहमत आहे.
22 Sep 2017 - 3:37 pm | सस्नेह
मा. श्री श्री मोदकचंद्ररावजी,
आपण नक्की कुणाशी सहमत आहात, हे एकदा निश्चित करावे.
22 Sep 2017 - 3:39 pm | मोदक
हो तुमचेच बरोबर आहे.
(असे लिहिले की परत प्रतिसाद येणार नाही अशी भाबडी आशा आहे.)
22 Sep 2017 - 3:41 pm | सस्नेह
=)))
22 Sep 2017 - 3:26 pm | पैसा
>>>(यानंतर तुम्हाला हव्या त्या विषयावर पंधरा वीस असंबद्ध कारकुनी ओळी कल्पाव्यात)>>>
कोणत्याही व्यवसायाबद्दल असे लिहिणे आवडले नाही. मी 25 वर्षे कारकुनी केली आणि त्याबद्दल मला यत्किंचितही कमीपणा वाटत नाही.
कारकून काय करू शकतो हे बघायचे असेल तर सोन्याबापूने प्रेमचंदाच्या कथेचा केलेला अनुवाद बघावा! :)
22 Sep 2017 - 3:34 pm | मोदक
थांबा थांबा.. मी ते कपिलमुनीच्या प्रतिसादाच्या अनुषंगाने लिहिले आहे. तरीपण तुमच्या भावना दुखावल्या असल्या तर मोठ्या मनाने क्षमा करा.
(आयटीवाल्यांना दिल्या जाणार्या शिव्या निमूटपणे खाणारा :p) मोदक.
22 Sep 2017 - 3:52 pm | पैसा
माफी मागायसारखे काही नाही त्यात. सूर जरा अधिक्षेपाचा वाटला म्हणून लिहिले. मागे बुवांना कोणीतरी त्यांच्या वृत्तीवरून हिणवले होते, कोणी उसातल्यानी भारतातल्याना "द्राक्षे आंबट" म्हटले होते. तसे करताना आपल्याला त्याच्याबद्दल त्याच्या आर्थिक स्थितीबद्दल किंवा व्यवसायाबद्दल कितीशी माहिती असते? न्हावी किंवा चांभार या व्यवसायाबद्दल लिहिले तर attrocity ऍक्ट लागू होईल का नाही?
दुसरा मुद्दा असा की तुम्ही जर ऑफिसमध्ये मालक किंवा सर्वात वरच्या पोस्टला नसाल तर त्या पोस्टला नाव भले मॅनेजर म्हणून असेल सगळे शेवट सॉफीस्तिकेटेड कारकूनच असतात! =))
22 Sep 2017 - 4:03 pm | मोदक
हो. बरोबर आहे तुमचे. :p
22 Sep 2017 - 4:45 pm | स्रुजा
22 Sep 2017 - 3:30 pm | पुंबा
येस मिनिस्टरमधला सर हंफ्रे अॅपलबी कधी कधी बोलतो तसे लंबेचौडे प्रतिसाद मारतात माहितगार साहेब..
22 Sep 2017 - 3:36 pm | माहितगार
आपल्या भूमिकेला चिटकून राहायचे आहे मनाचा खुलेपणा नको आहे तर मग दुसर्याचे शुद्धलेखन ते प्रतिसादाची लांबी कै पण खुपवता येते. कुणीतरी माझ्या माघारी मीच धागा लेखिकेचा वडील असेन किंवा तसाच असेन आणि म्हणून क्लोजर शोधतोय अशी सनसनाटी लोणकढीपण मारली. प्रतिवाद करता आलेच नाहीत तर समोरच्या व्यक्तिलाच सांगावे की बाबारे आता तूच तुझा प्रतिवाद लिही आणि माझ्या सारखा तटस्थ व्यक्ती आणि अंशतः का होईना कायद्याचा अभ्यास असलेला व्यक्ती तुमच्या बाजूनेही लिहू शकतो. पण मला जमत नाही तुम्ही जरा लिवाना एवढे म्हणायचा तरी प्रामाणिकपणा हवा. असो बाकी चालू द्या
22 Sep 2017 - 4:47 pm | मराठी कथालेखक
छान लिहिलंय...
सगळे प्रतिसाद वाचणे शक्य नव्हतं..पण मला ते "एकाच जन्मात दोन आयुष्य जगणं" हे खूप पटलं ... फक्त प्रेम/संसार वा जोडीदाराबाबतच नव्हे तर इतर बाबतीतही असं दुसरं आयुष्य जगण्याची आस अनेकांना असू शकेल.. मला करिअरमध्ये नेहमी अशी इच्छा होत रहाते..
22 Sep 2017 - 6:01 pm | यशोधरा
आता ह्या धाग्याला कुलुप मारा. लई झालं बिल.
22 Sep 2017 - 11:16 pm | शिव कन्या
मन हवाल दिल झाले एकदम.
26 Sep 2017 - 3:14 am | बांवरे
खरंय. पण यातून पुढं गेलं पाहिजे. त्या आठवणींतून शिकलेल्या चांगल्या गोष्टींच्या जोरावर पेट्रोनस पुन्हा एकदा चेतवला पाहिजे.
26 Sep 2017 - 10:09 pm | असंका
धागा वाचून काल्पनिक आहे असं एक क्षणभर वाटलेलं. तो आधार लेखिकेने स्वतःच काढून घेतल्यावर, म्हणजे हे वास्तव आहे हे कळल्यावर जरा अवघडच गेलं .. लिखाण अप्रतिम!!
धन्यवाद...
पण माहितगार यांच्या प्रतिसादावर जो गदारोळ उठला तो अजिबात पटलेला नाही. त्यांचे अगदी सुरुवातीपासूनचे सर्व प्रतिसाद अत्यंत तर्कशुद्ध आहेत आणि काळाच्या ओघात टिकून राहणारे आहेत. या वातावरणात एवढ्या ठामपणे भुमिका घेतल्याबद्दल माहितगार यांचे मनापासून अभिनंदन...आणि आभार सुद्धा...
27 Sep 2017 - 8:07 am | एमी
पण माहितगार यांच्या प्रतिसादावर जो गदारोळ उठला तो अजिबात पटलेला नाही. त्यांचे अगदी सुरुवातीपासूनचे सर्व प्रतिसाद अत्यंत तर्कशुद्ध आहेत आणि काळाच्या ओघात टिकून राहणारे आहेत. या वातावरणात एवढ्या ठामपणे भुमिका घेतल्याबद्दल माहितगार यांचे मनापासून अभिनंदन...आणि आभार सुद्धा... >> +1
28 Sep 2017 - 11:03 am | भ ट क्या खे ड वा ला
नाना पाटेकर व रेखा यांचा "यात्रा" हा सिनेमा आठवला. अर्थात त्याची कथा वेगळी आहे,पण काही गोष्टी अशाच आहेत त्यात.