खाणे या विषयावर मिसळ्पाव वर एवढे काही लिहिले गेले आहे की आपल्याकडे या विषयावर काही लिहिण्यासारखे आहे असे म्हणण्याचे धाडस माझ्यात उरले नव्हते. त्यात वर पालापाचोळा खाउन जगणारा (माझ्यासारखा) माणुस खाद्यभ्रमंती वर अजुन काय लिहिणार. एखादा कायस्थ मला केवळ मासोळीचे ५० प्रकार सांगुन गप्प करायचा. पण नाही. माझे खाण्यावरचे प्रेम मला गप्प बसु देइना. अगदीच काही नाहीतरी ६-७ गावांमधील बल्लवाचार्यांबद्दल नक्की लिहु शकतो मी.
खाण्यापिण्याच्या (अभक्ष्यभक्षण न करणारा माणुस तसा पिउन पिउन पिणार तरी काय म्हणा?) बाबतित मी लहानपणापासुन तसा सुदैवी आहे. सुदैवी कारण घरचे सगळेच तसे खाद्यप्रेमाचे पुरावे पोटावर बाळगुन आहेत. आणि त्याबद्दल फारशी चिंता न करणारे (चिंता चितेसमान असते असे ऐकल्यापासुन तर अजिबात नाही). त्यात आमच्या पिताश्रींची फिरतीची बदली त्यामुळे प्रत्येक २ वर्षानी कासवाचे बिर्हाड पाठीवर टाकुन नविन गावी स्थलायन (मोहम्मदाचे पलायन शब्द बदलुन महाराष्ट्र शासनाने "स्थलायन" केले तेव्हापासुन हा शब्द च्यायला डोक्यात फिट्ट बसला आहे) केले की आम्ही त्या गावची खाद्यसंस्क्रुती अंगिकारायचो.
पहिली आणी धुसर आठवण आहे नंदुरबारची. बाकी काही आठवत नाही तिथले "पात्रा" सोडुन. एकाच हलवायाकडे तो मिळायचा पण ५० चितळे ओवाळुन टाकावेत (चितळ्यांची जाहीर माफी) इतका सुंदर असायचा तो. बाकी या पदार्थाला "पात्रा" हे नाव देणार्या लोकांची कीव येते मला. फुलपात्र म्हणल्यासारखे वाटते. पण एव्हढा सुंदर पदार्थ जन्माला घालणारया लोकाना एक खुन माफ. बास नंदुरबार म्हणले की मला एवढेच आठवते.
पात्र्यासारख्या आंबट गोड पदार्थावरुन माझी ओळख थेट मिसळीशी झाली. तेही कोल्हापुरी मिसळीशी . मान्य कोल्हापुरी ही एक चव आहे. कोल्हापुरी म्हण्जे तिखट नाही वगैरे. पण हे सगळे सदाशिव पेठेत कोल्हापुरी होटेल टाकल्यावर म्हणायला ठीक आहे. एरवी गोड कोल्हापुरी मिसळ देखील तिखट पुणेरी मिसळीपेक्षा तिखट असते. नाही म्हणायला फडतरे तशी कमी तिखट मिसळ करतात. पण फडतरेच फक्त कोल्हापुरचे प्रतिनिधित्व करतात असे वाटत असेल तर सांभळुन हो राजाभाउ. गगनबावडा, मोहन, चोरगे, खासबाग, ओपल तुमने नही खाया तो तुम्हारा जीवन व्यर्थ. सगळेच एक से बढकर एक. केवळ कोल्हापुरी मिसळीमुळे दुर्लक्षिला गेलेली दुसरी कोल्हापुरी स्पेशलिटी म्हणजे "भेळ" पुर्वी रंकाळ्यावर खुप सुंदर भेळ मिळायची. आता मंदिरजवळ राजाभाउ. रंकाळ्यावर किंवा इतरत्र आहेत ते डुप्लिकेट. इतकी सुंदर भेळ मी दुसरिकडे कठेही खाल्लि नाही. अगदी पुण्याच्या कल्पना किंवा कल्याण कडे देखील नाही. नाही म्हणायला संगमनेरचा नढे मात्र तोडीस तोड. गंगामाइच्या घाटावर जाउन प्रवरेच्या पाण्यात पाय सोडुन बसायचे आणि नंतर निवांत नढेची भेळ ओरपायची. आहाहा. तुलनाच नाही. गेले ते दिवस. आता प्रवरेच्या प्रवाहातच पाणी नसते त्यामुळे असेल कदाचित नढेची भेळ पण पुर्वीचा आनंद देउन जात नाही. (तरी ती चांगलीच). संगमनेरचा दुसरा जीभेवर रेंगाळणारा स्वाद म्हणजे जोशीचा कालाजामुन. गरम गरम कढईतुन तोंडात टाकायचा म्हणजे केवळ निखळ आनंद. आणि तिसरी कलाक्रुती म्हणजे प्रशांत आणि सुदामाची पावभाजी. पावभाजीचे याच्याहुन चांगले वर्जन मला अजुन चाखायचे आहे. अगदी इन्दोरच्या सराफ्यात किंवा ५६ दुकानात देखील याहुन चांगली पावभाजी नाही खाल्ली मी.
पण तेवढी एक गोष्ट सोडल्यास इन्दोर म्हणजे अगदी सचिन तेंडुलकर किंवा ऐश्वर्या राय. परिपुर्ण. (काळानुसार प्रमाण बदलतात बघा. १० वर्षापुर्वी विचारले असते तर माधुरी म्हणालो असतो. अजुन २ वर्षानी कदाचीत कत्रिना म्हणेन. जाउदे विषय भरकटला)
बाकी इन्दोर विषयी उद्या (म्हणजे मी उद्या पण लिहिणार. तुम्ही उद्यापण आजकाल कोणीही उठसुट उपट्सुंभ्या अर्थहीन लिहायला सुरुवात करतो असे म्हणणार. आणी मी बेशरमपणे तरीसुद्धा इतकेच वाइट लिहीत राहणार. :) )
प्रतिक्रिया
28 May 2010 - 12:43 am | मदनबाण
मान्य कोल्हापुरी ही एक चव आहे. कोल्हापुरी म्हण्जे तिखट नाही वगैरे.
चला...कोणाला तरी पटलं !!! ;)
दुर्लक्षिला गेलेली दुसरी कोल्हापुरी स्पेशलिटी म्हणजे "भेळ" पुर्वी रंकाळ्यावर खुप सुंदर भेळ मिळायची.
भडंग घातलेल्या भेळेची चव अफलातुनच असते...
बाकी इन्दोर विषयी उद्या
नक्कीच लिहा वाट पाहतोय्...इंदुरच्या रबडीची चव अजुन जिभेवर आहे...
मदनबाण.....
Jealousy is nothing more than a fear of abandonment.
28 May 2010 - 12:50 am | jaypal
राजाभाऊ इंटर नॅशनल भेळ आणि त्याच्यां बाजुच्या गाडीवरची कांदा भजी, तालमी समोरच दुध, पवार नगरातली मिसळ या माझ्या आठवणी ( आणि सोळंकी आईसक्रीम पण) :) :* @) :X =P~
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/त्र
28 May 2010 - 1:42 am | Pain
इतकी सुंदर भेळ मी दुसरिकडे कठेही खाल्लि नाही. अगदी पुण्याच्या कल्पना किंवा कल्याण कडे देखील नाही
पुष्करणी भेळ नाही खाल्ली अजुन ?
28 May 2010 - 2:16 am | रामपुरी
मान्य कोल्हापुरी ही एक चव आहे. कोल्हापुरी म्हण्जे तिखट नाही वगैरे.
कसं बोललात...
पण फडतरेच फक्त कोल्हापुरचे प्रतिनिधित्व करतात असे वाटत असेल तर सांभळुन हो राजाभाउ. गगनबावडा, मोहन, चोरगे, खासबाग, ओपल तुमने नही खाया तो तुम्हारा जीवन व्यर्थ. सगळेच एक से बढकर एक.
+१.. प्रत्येक जण आपापली चव आणि "पेशालिटी" सांभाळून आहे. "आहार" पण विसरू नका.
अगदी पुण्याच्या कल्पना किंवा कल्याण कडे देखील नाही.
इथे मात्र मतभेद... ही तुलनाच होऊ शकत नाही. राजाभाउ नंतर दुसरा नंबर येतच नाही. मला वाटतं ही एक नंबर चव चिरमुर्यांमुळे येत असावी. अमेरीकेत सुद्धा "KolhapurI Murmura" वेगळे मिळतात. ते लांबडे लांबडे चिरमुरे बेचव असतात. त्यामुळे भेळेमध्ये जान येत नाही. (आपल्याला तर हे चिरमुरे नुस्ते भाजलेल्या शेगदाण्यांबरोबर किंवा पापा परदेशीच्या फरसाण बरोबर खायला आवडतात. आहाहा... स्वर्ग)
28 May 2010 - 2:43 am | babadi manjar
खरच काही पदार्थ काही विशिष्ट ठिकाणी जसे मिळतात ,तसे दुसरी कडे मिळणे कठीण असते एवढी अप्रतिम
चव असते .कोलकत्ता ला असेच एकदा जाण्याचा योग आला होता.आणि तिथल्या खास मिठाई च्या दुकानात
रसगुल्ला khaila मिळाला .तोपर्यंत हल्दीरामच्या डब्यातले रस्गुले छान vataiche पण एकदा तिथला रसगुल्ला
तोंडात टाकला आणि कळले की बंगाली मिठाई बंगाल मधेच येऊन खावी.इतका लुसलुशीत आणि अप्रतिम चव होती
त्याला .वर्षे उलटली पण तशी चव मिळाली नाही.
28 May 2010 - 9:55 am | शैलेन्द्र
तुमच्या हाताच्या बोटाचे हाड वाढल्याणे (संदर्भ- टारझन) मधुनच कंट्रोल+\ दाबल जातयं की तुम्ही वाचुन समजुन घेण्यात भाषा हा अडथळा असु शकत नाही या विषयावर डॉक्टरेट करताय?
बाकी प्रतिक्रीया छान
28 May 2010 - 8:39 am | सुखदा राव
बबडीशी सहमत. एकेका ठिकाणची चवच खास असते. आम्हीही खाद्यप्रेमी. मिळेल तिथे खातो. पण इन्दोर म्हणजे 'या सम हाच'. आणि नन्दुरबार म्हणजे खानदेश. तिकडे अळुवडी जरा वेगळ्या पद्धतीने करतात अन त्याला पात्रा म्हणतात. त्या साइडची खाद्यभ्रमन्ती म्हणजे शेवेची भाजी, हिरव्या वान्ग्याच भरीत, कळण्याच्या भाकरी, खापरावरचे मान्डे, दराब्याचे लाडू, बिबड्या (पापडाचडा १ प्रकार) ईत्यादी ईत्यादी. (नन्दुरबार वाचल्यावर हे आठवल अन लिहिल्यावाचुन राहावल नाही, चुभुद्याघ्या).
28 May 2010 - 9:43 am | शैलेन्द्र
"नाही म्हणायला संगमनेरचा नढे मात्र तोडीस तोड. गंगामाइच्या घाटावर जाउन प्रवरेच्या पाण्यात पाय सोडुन बसायचे आणि नंतर निवांत नढेची भेळ ओरपायची. आहाहा. तुलनाच नाही. गेले ते दिवस."
अजुन एक वाईट बातमी सांगतो, नढेची भेळ बंद होतीये, म्हणजे नढे दुकाण विकतायत. त्यांचा वारसा चालवायला म्हणे कुणी नाही आता.(मुलगा पुण्यात नोकरी करतो, त्याला रस नाही)
जोशीचा दहीवडा(मीठ्ठावडा) खाल्ल्याय? हा दहीवडा म्हणजे दह्यातला वडा नव्हे, तर बालुशाहीसारखा एक प्रकार असतो. मस्तच..
28 May 2010 - 9:48 am | सहज
वाचतो आहे. लेख व प्रतिसाद वाचून मिपाकरांची एक खाद्ययात्रा काढता येईल. न्याहरी एकीकडे झाली की लंच दुसरीकडे की संध्याकाळचा स्नॅक मग रात्रीचे जेवण मग मध्यरात्री/पहाटे सपर. मस्त २४ तास भटकंती खाद्य यात्रा!
28 May 2010 - 12:04 pm | मृत्युन्जय
अरेरे नढे बद्दल ऐकून वाईट वाटले. मीठ्ठावडा खाल्ला आहे जोशिचा. तसा चांगला असतो. पण मुळात मला तो पदार्थच आवडत नाही. त्यामुळे.....
28 May 2010 - 12:13 pm | जिप्सी
कोल्हापुरच नाव निघालेलच आहे तर मिसळ बरोबरच कट वडा ही सुधा कोल्हापूरची स्पेशॅलिटी आहे. उमा समोरच्या हॉटेल दिल बहार मधला कट वडा एकदा तरी नक्की खायलाच पाहिजे. त्या नंतर संध्याकाळी अर्ध्या शिवाजी पुतळ्याचा चारुदत्तचा वडापाव खावाच. पुण्यातल्या जोशी वडेवाल्यांपेक्षा तिप्पट मोठा असतो कोल्हापुरातला वडा. तसाच मस्त वडा मिळायचे अजून १ ठिकाण म्हणजे राजाराम कॉलेज मधला श्यामचा वडा. बेष्ट. त्यानंतर लस्सी प्यावीशी वाटली तर मिरजकर तिकटीला सुगंधा.
कोल्हापूरला एकदा गेल कि काय खायचं आणि काय नाही अस होऊन जातंय राव ! मी तर सवडीन ८ दिवस गेलो कि अगदी मन तृप्त होईपर्यंत सगळखाऊन घेतो आणि त्या चवीवर पुण्यातले पुढचे २ महिने काढतो.
अवांतर :- कोल्हापूरची खासबाग मिसळ पुण्यात सुरू झालेली आहे. सिंहगड रोड,पु.ल.देशपांडे बागे समोर रीबोक शो रूम च्या कॉंप्लेक्स मध्ये. बेष्ट मिसळ आहे.
31 May 2010 - 5:55 pm | विसोबा खेचर
छान लेख..